हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ मे, २०२५

आपले विश्व: भास आणि वास्तव

विश्वाचे रहस्य आपल्याला कधी उलगडेल का? मला नाही वाटत कधीच उलगडेल.
मुळात ज्याला आपण विश्व समजतो ते आपण समजतो तशा स्वरूपात अस्तित्वात तरी आहे का अशी मला शंकाच आहे. जे विश्व आपल्याला जाणवते ते काय आहे? तर आपल्या पाच सेन्सेसनी म्हणजे इंद्रियांनी जो काही सिग्नल आपल्या मेंदूला दिला त्याचा आपल्या मेंदूने लावलेला काहीतरी अर्थ. पण आपल्याला हेही माहीत आहे की आपल्या सेन्सेसला जाणवत नाही असेही खूप काही आहे या विश्वात. 

भाग 1: प्रकाश वा तरंग


साधारण 400 ते 750 नॅनोमिटर एवढ्याच तरंगलांबीचा प्रकाश आपल्याला दिसतो, त्याच्याहुन छोट्या वा मोठ्या तरंगलांबी आपल्याला दिसत नाहीत. आणि हे जे आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही त्याला आपण कसे शोधतो? तर काहीतरी क्लुप्ती लावून आपण या अननोन गोष्टींना आपल्या पाच इंद्रियांनी ओळखता येईल अशा अवस्थेत आणतो. उदा. आपल्याला एक्सरे दिसत नाहीत. पण ते आहेत हे कळते, कसे? तर फोटोग्राफीक प्लेटवर एक्सरे टाकले की ती प्लेट काळी होते. ते काळे होणे आपण आपल्या सेन्सेसनी पाहू शकतो म्हणून आपल्याला कळते की एक्सरे अस्तित्वात आहेत. पण अशा अगणित गोष्टी असू शकतात ज्यांना आपण कधीही अशा स्वरूपात आणू शकणार नाही जेणेकरून आपल्या पाच सेन्सेसला त्यांची जाणीव होईल. हे विश्व जे आपल्याला 400 ते 750 या खिडकीतून दिसते ती खिडकी जगातल्या एकूण प्रकाशाच्या वा एकूण इलेकट्रोमॅग्नेटीक तरंगांच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. जेवढ्या तरंगलांबी आपल्याला डिटेक्ट झाल्यात त्यांच्या तुलनेत ही खिडकी आहे फक्त 3 × 10⁻²⁶ टक्के इतकी. 10 चा वजा 26वा घात म्हणजे बघा आपल्याला किती अल्प प्रमाणात जाणवते हे विश्व. बरे हे झाले जेवढ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगलांबी आपल्याला आजपर्यंत कळल्यात त्यांच्या तुलनेत. ज्या आपल्याला अद्याप कळल्याच नाहीत त्या तर यात गृहितही धरलेल्या नाहीत. आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात. पण हे रंग काही खरेच एखादी अस्तित्वात असलेली वस्तू नाहीयेत. तर ते फक्त आणि फक्त आपल्या मेंदूने काही विशिष्ट तरंगलांबींना दिलेला एक अर्थ आहे. आपले इव्होल्यूशन थोडे वेगळे झाले असते आणि आपल्याला एक्स रे किंवा गॅमा रे दिसत असते तर आपल्याला रंग नावाची कल्पनाही कधी आली नसती. इतकेच नाही तर इतर प्राण्यांना जाणवणारे रंग आणि आपल्याला जाणवणारे रंग हे पूर्णतः वेगवेगळे असू शकतात. इतकेच नाही तर आपल्यालाही एकमेकांना होणारा रंगांचा आभास वा त्यांची प्रतिमा ही प्रत्येकाच्या मेंदूत वेगवेगळी असू शकते. प्रकाश वा रंग म्हणजे केवळ आपल्या अवतीभोवती अस्तित्वात असलेल्या अगणित तरंगलांबींतील एका छोट्याश्या भागाचा आपल्या मेंदूंनी लावलेला एक कृत्रिम अर्थ होय. ज्या वेव्ह आपल्या मेंदूला जाणवेल असा सिग्नल तयार करतात त्यांना आपण प्रकाश समजतो. प्रकाश हा फक्त आपल्यासाठी अस्तित्वात आहे. विश्व हे ऑलरेडी अनंत तरंगांनी भरलेलेच आहे, प्रकाश आणि अंधार असे काहीही विश्वात अस्तित्वात नाही. आपल्या मेंदूला जे तरंग डिटेक्ट होतात तो प्रकाश आणि जे तरंग थोड्या वेगळ्या प्रकारे डिटेक्ट होतात तो आवाज असा आपल्या मेंदूने या तरंगांचा लावलेला कृत्रिम अर्थ आहे. अनेक लोकांना वेगवेगळे रंग पाहून आवाज ऐकू येतात तर अनेकांना आवाज ऐकून वेगवेगळ्या चवी जाणवतात. हे मेंदूचे आजार असतात. पण यामुळे आपण समजतो तसे रंग वा आवाज वगैरे काही अस्तित्वात नसून आपला मेंदू त्याचा काय अर्थ लावतो तेच आपल्याला खरे वाटते हे सिद्ध होते. प्रत्यक्षात प्रकाश नाही की रंग नाहीत की आवाज नाही. ते आहेत असे आपल्याला वाटते कारण आपल्या मेंदूने त्याचा तसा अर्थ लावलेला असतो. मेंदूने रंगाला आवाज म्हणून अर्थ लावला की आपल्याला रंग ऐकू येतात. प्रत्यक्षात विश्वात अनंत तरंगलांबी आहेत, त्यातील अगदी अल्पशा भागाला आपल्या मेंदूने दिलेले कृत्रिम अर्थ वा स्वरूप म्हणजे प्रकाश, रंग वा आवाज.



भाग 2: वस्तुमान, मॅटर


ढोबळपणे ज्याला आपण स्पर्श करू शकतो ते म्हणजे मास, मॅटर वा वस्तुमान असे आपण मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का? विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तू कधीही एकमेकांना स्पर्श करत नाहीत वा करूच शकत नाहीत. पण मी हा मोबाईल हातात धरून लिहितोय, तो काय त्याला स्पर्श केल्याविना? माझा मोबाईल टचस्क्रीन आहे. टाइप करताना मी त्याला टच म्हणजे स्पर्श तर करतोच आहे ना? आपण वस्तूंना, इतर माणसांना स्पर्श करतो. एखादा स्पर्श तर आपल्याला किती रोमांचित करतो ते काय खोटे असते? सर्वात आनंददायी सुख तर स्पर्शातच आहे. ते खरे नाही का? तर याचे उत्तर आहे की होय जगातल्या कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना कधीही डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा थेट स्पर्श करू शकत नाहीत. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करू पाहतो तेव्हा तो स्पर्श नसतो. प्रत्येक पदार्थात ऍटम असतात, सगळ्या ऍटममध्ये इलेक्ट्रॉन असतात. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तुजवळ जाते तेव्हा त्या दोन्ही वस्तूंमधले इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असल्याने ते एकमेकांना प्रतिरोध करतात. कितीही जोर लावला तरी दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना स्पर्श करतच नाहीत. ते एकमेकांना प्रतिरोधच करतात. त्यामुळे आपल्याला जी स्पर्शाची जाणीव होत असते तो खरा स्पर्श नसतो तर तो आपल्या शरीरातील इलेक्ट्रॉन्सला दुसऱ्या व्यक्ती वा वस्तूतील इलेक्ट्रॉन्सनी केलेला केवळ प्रतिरोध असतो. तुम्ही कितीही ताकद वा प्रेशर अप्लाय करा की कितीही स्ट्रॉंग ग्लू लावून पहा. दोन वस्तू कधीही एकमेकांना स्पर्श करूच शकत नाहीत. ऍटोमिक लेव्हलवरच नाही तर क्वांटम लेव्हलवर सुद्धा हेच खरे आहे.
साधारणतः जिथे आपल्याला प्रतिरोध होतो त्या ठिकाणाला आपण वस्तुमान किंवा मॅटर समजतो. त्याला आपण वस्तू वा मास समजतो. मास म्हणजे काहीतरी ठोस असा पदार्थ असे आपण समजतो, पण मास म्हणजे असा कोणताही पदार्थ नसतो तर मास म्हणजे फक्त अशी काहीतरी रचना असते जी आपल्याला वा प्रकाशाला वा इतर वस्तूंना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रतिरोध करते. जसे दोन चुंबकांचे समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. हे ध्रुव कोणत्याही माध्यमाविना एकमेकांना दूर ढकलतात. कुणालाही दूर ढकलण्यासाठी आपल्याला नेहमी हातांची वा एखाद्या वस्तूची गरज भासते. या मॅग्नेटसना मात्र अशा कोणत्याही हाताची वा वस्तूची गरज लागत नाही. मात्र तरीही ते एकमेकांना दूर ढकलतात. याचे कारण काय? तर या मॅग्नेट भोवती एक मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. आणि हे फिल्ड दुसऱ्या मॅग्नेटच्या समान ध्रुवाला जवळ येण्यास प्रतिरोध करते. अगदी असेच मॅटर म्हणजे कोणतीही वस्तू नसते तर ती फक्त एक वेगवेगळ्या फिल्ड्सची गुंडाळी वा कॉम्बिनेशन असते जे त्याच्याहून इतर फिल्ड्सला जवळ येण्यापासून वा स्वतःच्या आरपार जाण्यापासून विरोध करते. सगळे विश्व ज्या मूळ कणांपासून बनले आहे त्या कणांना कोणताही आकार नाही. इलेक्ट्रॉनला कोणताही आकार नाही. त्याला काहीही डायमेन्शन्स नाहीत. अशाच कोणताही आकार वा डायमेन्शन्स नसलेल्या मूळ कणांपासून हे विश्व बनले आहे. मुळातच डायमेन्शन वा आकार नसलेल्या वस्तुंपासून काहीही ठोस कसे बनेल? मॅटर ही कोणतीही आपल्या कल्पनेतील फिजिकल अस्तित्व असलेली ठोस गोष्ट नाही तर फक्त वेगवेगळ्या मूल कणांच्या वेगवेगळ्या फिल्ड्सच्या मिश्रणातून तयार झालेले व इतर फिल्ड्सला प्रतिरोध करणारे एक महाफिल्ड आहे. जसे एकमेकांना दूर ढकलणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड्ला कोणतेही फिजिकल अस्तित्व नसते तसेच मॅटरला सुद्धा कोणतेही फिजिकल अस्तित्व नाही. ते आपल्याला तसे जाणवते कारण आपल्याला होणाऱ्या प्रतिरोधाला आपले मेंदू तसे एक काल्पनिक रूप देतात. जसा प्रकाश वा रंग आपल्याला वाटतात तसेच अस्तित्वात नाहीयेत तर ते फक्त आपल्या मेंदूने लावलेले काल्पनिक अर्थ आहेत तसेच मॅटर हे सुद्धा आपल्याला वाटते तशी कोणतीही वस्तू नाहीय तर तेही फक्त आपल्या मेंदूने आपल्याला होणाऱ्या विविध फिल्ड्सच्या प्रतिरोधाचा लावलेला एक कृत्रिम व अवास्तव अर्थ आहे. कोणताही स्पर्श हा खराखुरा टच नसतो तर तो फक्त इलेक्ट्रॉन्सनी एकमेकांना केलेला प्रतिरोध असतो. मॅटरचे वजन किंवा वस्तुमान हेही त्या फिल्डमध्ये किती ऊर्जा आहे त्याचे एक प्रमाण असते. मास आणि एनर्जी हे एकच आहेत हे आपण जाणतो ना? त्यामुळेच मास हे सुद्धा फक्त एक विशिष्ट प्रमाणात एनर्जी अंतर्भूत असलेले फिल्ड असते. वजन, आकार वा ठोसपणा हा फक्त आपल्या मेंदूने त्या फिल्डला दिलेला अर्थ आहे.


भाग 3: अंतर आकार आणि दिशा


समजा विश्व पूर्णतः रिकामे असून पूर्ण विश्वात फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन मग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय की एकाच जागी स्थिर आहे? तो गतिमान असलाच तर कोणत्या दिशेला जातो आहे? हे आपण सांगूच शकत नाही. का? कारण एखाद्या वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी जाणे वा दिशा बदलणे हे ओळखण्यासाठी आपल्याला काही ना काही संदर्भ बिंदू हवा असतो. कसे?
तर समजा आपण त्या इलेक्ट्रॉनच्या जवळ गेलो आणि मग त्याला पाहीले. मग जर तो आपल्यापासून जवळ वा दूर गेला म्हणजे त्याची पोजिशन आपल्या पोजिशन पासून बदलली तर आपल्याला कळेल की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. त्याचे अंतर आपल्या पासून वाढले तर आपल्याला कळेल की तो दूर जातोय. कमी झाले तर कळेल की तो जवळ येतोय. इथे आपण एक संदर्भ झालो. इलेक्ट्रॉन आपल्या पोजिशनच्या तुलनेत दूर गेला म्हणून आपल्याला वाटते की तो हलतो आहे. पण जर एका इलेक्ट्रॉनला असा कोणताही संदर्भ नसेल, त्याची पोजिशन जवळ आहे की लांब हे ठरवण्यासाठी कोणताही दुसरा संदर्भ बिंदू नसेल तर तो इलेक्ट्रॉन स्थिर आहे की गतिमान आहे हे आपण सांगूच शकणार नाही.
थोडक्यात काय की जर काहीही रेफरन्स किंवा संदर्भ नसेल तर आपल्याला अंतर समजूच शकत नाही. बंद लिफ्टमध्ये जर फ्लोअरचा नंबर डिस्प्ले केलेला नसेल तर आपण किती अंतर वा किती फ्लोअर पार केले हे आपल्याला कळूच शकत नाही. कारण अंतर कळण्यासाठी काहीतरी रेफरन्स बिंदू किंवा तुलना करण्यासाठी एखादी संदर्भ रेषा आवश्यक असते. बंद लिफ्टमध्ये ते नसते. म्हणजेच काय की अंतर काय असते तर एखाद्या संदर्भ बिंदूच्या तुलनेत इतर वस्तूच्या वा जागेच्या पोजिशनची तुलना. अमुक तारा इतके प्रकाशवर्षे दूर आहे हे आपण आपल्या संदर्भात सांगत असतो. पण विश्वात फक्त एकच तारा असता इतर काही नसते तर तो तारा नेमका कुठे आहे हे सांगताच आले नसते. हेच दिशा किंवा डायमेंशन्सचे आहे. अनोळखी प्रदेशात आकाशात ढग असतील तर आपल्याला दिशा कळत नाहीत. का? तर दिशा कळण्यासाठी सूर्य किंवा ध्रुव तारा हे आपले रेफरन्स आहेत. तेच नसले तर दिशाच नसतात. एखाद्या वस्तूचा आकार सुद्धा आपण त्याच वस्तूतील इतर भागांपासूनचे अंतर वा उंची यांच्या संदर्भात ठरवतो. वा इतर वस्तूंच्या तुलनेत ठरवतो. डोंगर उंच आहे हे आपण पायथ्याच्या तुलनेत ठरवतो. एखादी बिल्डिंग चौकोनी आहे की त्रिकोणी हे आपण त्याच बिंडिंगच्या टोकांच्या एकमेकांतील अंतरावरून ठरवतो.
दिशा असो की अंतर की अगदी आकार हे सुद्धा कशाच्या तरी संदर्भातच आपण ठरवतो. कोणताही संदर्भ नसला तर आपल्याला अंतर, आकार वा दिशा हे कळूच शकत नाहीत. थोडक्यात काय की हे सुद्धा आपल्या मेंदूने कुठल्यातरी एका संदर्भ बिंदूच्या तुलनेत इतर वस्तूंच्या पोजिशनला दिलेले अर्थ आहेत. जर आपल्या मेंदूला ही रेफरन्स बघण्याची क्षमताच नसती तर आपल्यासाठी अंतर, दिशा, आकार हे अस्तित्वात नसते. काहीतरी संदर्भ हवा असणे हा ती क्वांटीटी अबसोल्युट नसण्याचा पुरावा आहे.
जर विश्वात इतर काहीही नसेल फक्त एक इलेक्ट्रॉन असेल तर दिशा, अंतर, वेग हे सगळे अस्तित्वातच असू शकत नाही. तो इलेक्ट्रॉन भलेही गतिमान असो, म्हणजे फिरता असो, पण त्याचा वेग, त्याने कापलेले अंतर हे काहीही मोजले जाऊ शकत नाही. किंबहुना त्यावेळी स्पेसला स्पेस सुद्धा म्हणता येणार नाही. कारण स्पेस म्हणजे सुद्धा एक विशिष्ट एरिया/वोल्युम असते. आणि जिथे अंतर वा डिस्टन्सच अस्तित्वात नाही तिथे एरिया वा वोल्युम कुठून असणार.



भाग 4: काळ


अरिस्टॉटल म्हणतो की काळाला आपण भूत, वर्तमान, भविष्य अशा तीन भागांत विभाजित करतो. भूतकाळ घडून गेलेला असला तरी सध्या अस्तित्वात नाहीय. भविष्यही याक्षणी अस्तित्वात नाहीय. जे अस्तित्वात आहे ते म्हणजे वर्तमान. थोडक्यात वर्तमान म्हणजे काय तर दोन अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींच्या मधला अगदी अल्प असा काळ.
जावेद अख्तर म्हणतात की जसे आपण ट्रेन मधून जात असताना झाडे मागे जाताना दिसतात, पण प्रत्यक्षात ती एकाच जागेवर स्थिर असतात आणि आपणच पुढे जात असतो, तसे काय घ्या काळ हा एकाच जागी स्थिर असेल आणि आपणच पुढे जात असू.
असो, तर काळ म्हणजे काय हे बघण्याआधी एन्ट्रोपी या गोष्टीला उजळणी देऊ.
एन्ट्रोपी हा विश्वाचा स्थायीभाव आहे. स्थायीभाव हा शब्द किती बरोबर आहे माहीत नाही कारण स्थायी नसणे म्हणजेच एन्ट्रोपी. ते म्हणतात ना चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट.
एन्ट्रोपी म्हणजे विश्वात वाढत जाणारी अस्ताव्यस्तता किंवा फाफटपसारा. क्षणोक्षणी विश्वाची एन्ट्रोपी वाढत जात आहे. आता याक्षणी विश्व जसे आहे त्यापेक्षा पुढच्या क्षणी ते वेगळ्या स्थितीत असते. याला एन्ट्रोपी वाढणे असे म्हणतात. जर विश्व आहे त्याच स्थितीत कायमचे स्थिर राहीले तर एन्ट्रोपी वाढणार नाही.
जसे अंतर, दिशा यांच्यासाठी काहीतरी संदर्भ हवा असतो तसेच काळ मोजण्यासाठी सुद्धा काहीतरी संदर्भ हवा असतो. आणि काळ आपल्याला मोजता येतो वा जाणवतो वा भासतो तो केवळ आणि केवळ एन्ट्रोपी मुळे.
मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे जर विश्वात फक्त एक इलेक्ट्रॉन असेल तर इतर काही संदर्भ नसल्याने त्याची पोजिशन, मूव्हमेंट हे सगळे शून्य असेल आणि म्हणून विश्वाची एन्ट्रोपी शून्य असेल कारण विश्वात काहीही बदल होणार नाही. जेव्हा अजून एक इलेक्ट्रॉन येईल आणि त्या दोन इलेक्ट्रॉनमध्ये काही इन्ट्रॅक्शन होईल तेव्हा विश्वाची एन्ट्रोपी वाढू लागेल. कारण मग एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याच्या तुलनेत काहीतरी हालचाल करेल. पण जर दोघेही स्थिर राहीले तर मात्र एन्ट्रोपी शून्यच राहील. कारण काहीतरी वेगळा बदल होणे म्हणजे एन्ट्रोपी. जर पुढे अजून अनेक इलेक्ट्रॉन, ऍटम वगैरे विश्वात येत राहीले तर मात्र विश्वाची एन्ट्रोपी वाढत राहील. कारण ते सगळे एकमेकांशी काही रीऍक्शन करतील ज्यामुळे पुढे पुढे अनेक बदल होत जातील. हे बदल वाढणे, त्यायोगे विश्व अधिकाधिक अस्ताव्यस्त होणे म्हणजे एन्ट्रोपी.
आज विश्वात असंख्य वस्तू आहेत आणि सगळ्या वस्तू एकमेकांच्या तुलनेत दर क्षणी बदलत असतात. सगळ्यांमध्ये नवनवे कॉम्बिनेशन आणि त्यायोगे नवनवे बदल घडत असतात, म्हणून विश्वाची एन्ट्रोपी लगातार वाढत आहे.
पण जर समजा, विश्व एका क्षणी जसे आहे अगदी तसेच्या तसेच दुसऱ्याही क्षणी राहीले, तिसऱ्याही क्षणी राहीले तर? म्हणजे जर विश्व आता या घडीला जसे आहे अगदी तसेच्या तसेच कायमचे राहीले त्यात अगदी सूक्ष्म बदलही झाला नाही तर? तर आपण म्हणू की विश्व स्थिर झाले. किंवा काळ थांबला.
पण आपल्या समजुतीप्रमाणे तर काळ कधीच थांबू शकत नाही. बरोबर ना? विश्व थांबले म्हणून काय झाले? काळ तर चालतच रहायला हवा.
ग्राउंडहॉग डे किंवा टॉम क्रूजचा 'एज ऑफ टुमारो' या फिल्म पाहिल्या आहेत का? त्यात काय होते? तर जग पुन्हा पुन्हा एका पूर्वस्थितीत पोचत असते. काल सकाळी 7 वाजता जे घडले अगदी तसेच्या तसे आज सुद्धा घडत असते. काल मेलेले लोक पुन्हा जिवंत होतात, काल घडलेल्या सगळ्या घटना अनडु होतात आणि आज सगळे विश्व पुन्हा पुन्हा त्या एकाच पूर्वस्थितीला पोचत असते. इथे काय होते? तर इथे विश्वाची एन्ट्रोपी कमी होते. क्षणोक्षणी काहीतरी बदल होत जाणे म्हणजे एन्ट्रोपी वाढणे. काहीच बदल न होणे म्हणजे एन्ट्रोपी स्थिर होणे, आणि जे बदल झालेत ते रिवर्स होणे वा अनडू होणे म्हणजे एन्ट्रोपी कमी होणे. या फिल्म मध्ये एका दिवसात जे जे बदल होतात, युद्ध होते, संहार होतो, एलियन येतात ते सगळे काही पुन्हा रिसेट होते. सगळे काही एका क्षणात रिवर्स होते. म्हणजे एका दिवसात जी अस्ताव्यस्तता वाढली होती ती परत तिच्या पूर्वपदावर येते. म्हणजेच एन्ट्रोपी कमी होते. आणि एन्ट्रोपी कमी होते म्हणजेच काळ मागे जातो.
विश्वाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याला आपण काळ असे समजतो. प्रत्यक्षात काळ वगैरे काही अस्तित्वात नाही. जर या फिल्म्सप्रमाणे काही बदलांनंतर विश्व पुन्हा जसेच्या तसे होत राहीले तर काळ हा एका लूप मध्ये फिरतोय असे आपण समजू.
फिल्म किंवा व्हिडीओ म्हणजे काय असते? तर अनेक फोटो एकामागून एक ठराविक स्पीडने डोळ्यापुढे आणले की आपल्याला ते फोटो हलत असल्याचा भास होतो. विश्वात होणारा प्रत्येक बदल हा त्या फिल्मच्या एकेका फोटो सारखा आहे, आपण ते एकामागून एक क्रमाने पाहतो म्हणून आपल्याला तो काळ वाटतो. फ्रेममध्ये बदल होतो म्हणून तो काळ वाटतो.
जर आपण एकच फोटो त्याच्या अनेक कॉपी बनवून त्याचीच फिल्म बनवून प्ले केली तर फिल्म तर रन होत असेल पण आपल्याला मात्र ती एकाच क्षणात थांबल्यासारखी वाटेल. कारण फ्रेम बदलत असल्या तरी सगळ्या फ्रेम्स मध्ये एकच फोटो असल्याने तो बदल तंतोतंत आधीच्या स्थितीसारखाच वाटेल त्यामुळे फिल्म चालू आहे की नाही हे आपल्याला कळूच शकणार नाही. सेम असेच काळाचे आहे. विश्वाच्या आपल्याला दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या फ्रेम बदलत्या असतात म्हणून आपल्याला काळाचा भास होतो. विश्वाचे निरंतर बदलणे किंवा एका फ्रेम मधून दुसऱ्या फ्रेम मध्ये जाणे म्हणजे एन्ट्रोपी. जर विश्व एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत गेले मात्र ती दुसरी स्थिती तंतोतंत आधीच्या स्थितीसारखी असेल तर एन्ट्रोपी वाढणारच नाही. आणि त्यामुळे काळ व्यतीत झालाय हे आपल्याला कळणारच नाही. विश्व जसेच्या तसेच राहीले तर काळाची जाणीवच होणार नाही. एन्ट्रोपी वाढलीच नाही तर आपोआप काळ नष्ट होतो, किंवा स्थिर होतो.
मात्र विश्व हे प्रत्यक्षात लगातार एका स्थितीतून दुसऱ्या नव्या स्थितीत परिवर्तित होत आहे. ते कधीही पूर्वस्थितीला येत नाही. हे जे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत परिवर्तन होणे आहे त्यालाच आपण काळ समजतो. म्हणजे काय की आपण एक रेफरन्स पॉईंट पकडतो. विश्वाची आजची स्थिती हा तो रेफरन्स पॉईंट. पुढच्या क्षणी विश्वाची स्थिती बदलते. आपल्या रेफरन्स पॉईंट पेक्षा विश्व हे एका वेगळ्या स्थितीत येते. फिल्म मध्ये नेक्स्ट फ्रेम येते तसे. हे पुढच्या क्षणामधील बदल विश्वाला पूर्णतः नव्या स्थितीत घेऊन जात असतात म्हणून आपल्याला ते वेगळे जाणवते. विश्वाच्या या परिवर्तनाच्या असंख्य स्टेप्स आहेत. आपला मेंदू जितक्या समर्थपणे या सगळ्या बदलाच्या स्टेप्स ओळखू शकतो त्याला आपण काळ असे समजतो. जसे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या एका फेरीला आपण एक दिवस समजतो, व सूर्याभोवतीच्या एका फेरीला वर्ष समजतो.
समजा आज जे बदल होताहेत त्याऐवजी विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा फक्त आहे त्या जागी व्हायब्रेट होत असता, इतर कोणतेही इन्ट्रॅक्शन वा रिऍकशन करत नसता. तर काय झाले असते? पृथ्वी आहे त्या जागी, सूर्य,चंद्र, सगळ्या गॅलक्सी आहेत त्या जागी फक्त व्हायब्रेट होत राहील्या असत्या तर एन्ट्रोपी वाढलीच नसती. जर हे व्हायब्रेशन एक सेकंदाचे असते. म्हणजे दर एका सेकंदाने प्रत्येक गोष्ट पुन्हा तिच्या मूळ स्थितीला आली असती तर जी काय एन्ट्रोपी तेवढ्या वेळात वाढली असती ती परत एक सेकंदात शून्य झाली असती. आणि त्यामुळे काळ सुद्धा वाढलाच नसता. जर फक्त एका सेकंदात व्हायब्रेट होऊन प्रत्येक वस्तू परत मूळ जागी आली असती तर विश्वाचे आयुष्य हे नेहमीकरता एका लूप मध्ये फक्त एक सेकंदाचे ठरले असते.
जर विश्वाची एन्ट्रोपी कमी होऊ लागली, म्हणजे विश्व पुन्हा पूर्वस्थितीला येऊ लागले तर काळ उलटा फिरू लागला असे आपण म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट ज्या क्रमाने बदलली त्याच क्रमाने उलटी झाली तर विश्वाची एन्ट्रोपी कमी कमी होत जाईल. असे झाल्याने आपण पुन्हा लहान होऊ, पुन्हा डायनोसॉर अस्तित्वात येतील. पुन्हा जग बिगबँगच्या स्थितीला येईल आणि त्या क्षणी एन्ट्रोपी शून्य होईल.
विश्वाच्या अ या स्थितीला आपण रेफरन्स पॉईंट धरतो आणि त्या क्षणापासून विश्वाची एन्ट्रोपी किती स्टेप्स मध्ये वाढली त्याला काहीतरी प्रमाण देऊन त्याला काळ असे समजतो. प्रत्यक्ष काळ वगैरे काही नाहीय. तर फक्त विश्वात जे परिवर्तन होतेय वा जे बदल होताहेत त्या बदलाच्या एका गृहीत संदर्भ स्थितीपासून होणाऱ्या परिवर्तनाच्या आपल्याला होणाऱ्या जाणिवेला आपण काळ समजतो. जर विश्वात आपल्याला जाणवेल असा बदल झालाच नाही तर काळ आपल्यासाठी स्थिर होईल. मग आपण काळ मोजूच शकणार नाही. जसे विश्वात फक्त एकच इलेक्ट्रॉन असला तर तो जरी गतिशील असला तरी आपण तो गतिशील आहे की स्थिर आहे ते सांगूच शकणार नाही कारण त्यासाठी आपल्याकडे त्या इलेक्ट्रॉनच्या स्थितीत होणारा बदल ओळखायला कोणताही दुसरा संदर्भ बिंदूच नसेल. त्यामुळे विश्वात जर फक्त एकच इलेक्ट्रॉन अस्तित्वात असेल तर विश्वात काळ अस्तित्वातच असू शकणार नाही. कारण त्यावेळी विश्वाची एन्ट्रोपी शून्य असेल.
जरी एक इलेक्ट्रॉन नाही तर आता आहे तितक्याच वस्तू विश्वात असतील मात्र विश्वाची कोणतीही पूर्वस्थिती जर होणारा बदल ओळखण्यासाठी संदर्भाला नसेल, किंवा सगळेच बदल हे तंतोतंत पूर्वीसारखेच असतील तर एन्ट्रोपी वाढणार नाही आणि त्यामुळे काळही असणार नाही. जर विश्वाची एन्ट्रोपीच अजिबात वाढली नाही तर आपल्याला विश्व अगदी कोट्यवधी वर्षे आहे त्याच अवस्थेत अस्तित्वात राहीले तरी काळ मात्र स्थिर आहे असेच वाटेल.
थोडक्यात काळ म्हणजे विश्वाच्या स्थितीत होणाऱ्या जाणवण्याइतक्या बदलाचा त्या बदलाच्या पूर्वस्थितीशी असणारी तुलनात्मक विविधता ओळखण्याची आपल्या मेंदूची क्षमता. हे बदल होतात म्हणून आपल्याला काळ भासतो. जर विश्व पूर्णतः स्थिर असते तर काळ अस्तित्वातच नसता. किंवा आपले मेंदू काळ ही कल्पना करूच शकले नसते. काळ म्हणजे आपण समजतो तसा वेळ नाही तर फक्त विश्वाच्या बदलत्या स्थितींमधली आपल्या लक्षात येणारी क्रमवारी आहे.
जर विश्वातल्या आपण ओळखू शकतो त्या सगळ्या वस्तू नष्ट झाल्या तर काळ नष्ट होईल. कारण सगळे काही नष्ट झाले तर काही बदल होणार नाहीत, काही बदल झाले नाहीत तर एन्ट्रोपी शून्य होईल. विश्वाच्या स्थितीतील बदल मोजायला आपल्याकडे काहीही संदर्भ नसेल आणि त्यामुळे काळ नष्ट होऊन जाईल.
काळ नावाचे काही अस्तित्वातच नाही. काळ ही सुद्धा अंतर, वेग, दिशा यांच्यासारखी फक्त रिलेटीव्ह संकल्पना आहे. काळ हा या विश्वातील बदलांच्या फ्रेम्सच्या क्रमामुळे केवळ आपल्याला होणारा एक भास आहे. या फ्रेम्समधील बदल जितक्या क्षमतेने आपण ओळखू शकतो तितका त्याचा वेग ठरतो. प्रत्यक्षात काळाला वेगही नाही, तो फक्त आपल्या बदल ओळखण्याच्या क्षमतेचा एक आभास आहे.






टीप: सगळ्या इमेजेस ह्या एआयने जनरेट केल्या आहेत : चॅट जीपीटी, डीप एआय, एम एस डिझायनर इत्यादि

 

..