तसा तो 'ठक्या वाळंकर' म्हणूनच सगळ्यांना ज्ञात आहे (गावी तांबेकराला 'तांबकर', भांगरेला 'भांगरा', दिघेला 'दिघा' अशी संबोधनपद्धती प्रचलित आहे). आम्ही त्याला 'ठक्या बाबा' म्हणत असू. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर आणि दोन्ही कानांच्या पाळयांवर गंधटिळा, पायात वर्षानुवर्षांच्या त्याच जाड्या-जुड्या अन दणगट वहाणा, कमरेला धोतर, अंगात कोपरी, गळ्यात मफलर किंवा उपरणे, आणि नेहमी डोक्यावर टोपी अथवा पागोटे आणि त्यातून डोकावणारे पिकलेले केस असा त्याचा पेहराव.! आमच्या सदानकदा उघड्या झिपऱ्या पाहून 'माणसाने कधीही बोडके राहू नये' असे तो नेहमी आम्हाला सांगायचा. ठक्या वाळंकराच्या वाट्याला दीड एकरच्या आसपास जमीन, ४ शेरड्या अन एक गाय आली होती. जमिनीत केवळ भात होई. बहुतेक वेळा मी त्याला आमच्याच शेतावर काम करताना बघायचो. आमचेच बैलजोडी अन नांगर दोन तीन दिवसांसाठी घेऊन जाऊन ठक्या बाबा त्याची भाताची पेरणी आटोपत असे. कित्येक वेळा मी त्याला आमच्याच इथून आजीकडून तांदूळ, डाळी-डुळी नेताना बघायचो. दिवसभर ठक्या वाळंकर राब राब राबायचा, उन्हातान्हात थकून मरगळून जायचा. मात्र संध्याकाळ झाली की त्याच्यात एक नवा उत्साह संचारत असे. सांजवेळ होताच तो देवळाचा ताबा घ्यायचा. आणि मग तिथली झाडलोट, दिवाबत्ती झाली की त्याची एक विणा होती ती संथपणे वाजवीत बसायचा. आम्ही सगळी लहान पोरे हळूहळू देवळात जमा व्हायचो. मग दहा बारा पोरे जमली की ठक्या बाबा आम्हाला देवळात घेऊन त्याचेबरोबर भजने गायला लावायचा. पुढे तो वीणा घेऊन भजने म्हणायचा आणि आम्ही टाळ घेऊन त्याला साथ करीत असू. रोज रात्रीचा त्याचा हाच कार्यक्रम असे. दिवसभर काबाडकष्ट अन रात्री भजन..!! गावचा हरिनाम सप्ताह चालू झाला की मग मात्र ठक्या बाबाचे अष्टौप्रहर देवळातच जायचे. सप्ताहात देवाच्या भजनाची वीणा कधीच खाली ठेवायची नसते. एकाची घेऊन झाली की दुसरा अशी ती संपूर्ण सप्ताह घॆउन उभे रहावे लागते. अर्थात सर्वात अधिक वेळ वीणा ठक्या वाळंकराच्याच हाती असायची. ज्याच्या हातात वीणा असेल त्याच्या सर्व लहानथोर लोक पाया पडतात. नेहमी "ए ठक्या" असेच एकेरी उद्धटपणे संबोधणाऱ्या लहान पोरांपासून तर पाटील, सरपंचांपर्यंत कुणीही ठक्या वाळंकराला आदरसन्मान दिल्याची ती एकमेव वेळ असायची. आलेल्या कीर्तन-प्रवचनकारांची देवळात उठबस करण्यात, त्यांना भजनात साथ देण्यात ठक्या वाळंकर तल्लीन होऊन जायचा. ठक्या बाबा खूप अभंग गायचा आणि 'हे अभंग मी स्वत: रचले आहेत' असे तो आम्हाला सांगायचा. प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या ओळीत "ठका म्हणे" असे शब्द असायचे. स्वत:च्या शब्दांसकट त्याने अभंगांना लावलेल्या त्या सुंदर चालींमुळे त्याच्या या महान प्रतिभेचे आम्हाला कोण कौतुक आणि आदर वाटायचा.!! आम्हाला ते अभंग काही कळत नसले तरी मुखोद्गत झालेले असायचे. त्यांची लयबद्ध चाल आणि त्यावर त्याची वीणा आणि आमचे टाळ व मृदंग यांचा तो मेळ आमचे भान हरपून टाकायचा. आमच्या लहानपणीच्या कैक रात्री त्याच्या या प्रतिभेने भारावून गेल्याच्या आनंदात आम्ही व्यतीत केल्या आहेत. मात्र जसे जसे मोठे होत गेलो तसे तसे गावातले लोक त्याची टर उडवतात हे आमच्या लक्षात येऊ लागले. संत एकनाथ, नामदेव, तुकाराम इत्यादी यांचेच अभंग म्हणून त्यात "तुका म्हणे"च्या जागी तो "ठका म्हणे" असे स्वत:चे नाव चिकटवतो असे लोक म्हणत. त्यात बव्हंशी तथ्यही होते. संतवाङ्ग्मयाशी माझा पुस्तकातून परिचय झाल्यावर तो असे करतो हे मलाही कळले. कित्येकदा तो दोन संतांचे वेगवेगळे अभंग अर्धेमुर्धे जोडून त्यालाही 'ठका म्हणे' लावून टाकत असे. असे असले तरीही त्याच्या किमान अर्ध्या रचना तरी स्वरचित होत्या याची मला अजूनही खात्री आहे. मात्र एकदा 'ढापू' हे नाव पडले की त्याच्या खऱ्या निर्मितेकडेही लोक लक्ष देत नाहीत. म्हणून ठक्या वाळंकराचे स्वरचित अभंगही दुर्लक्षिले आणि उपेक्षिले गेले ते गेलेच. माझाही मग ठक्या वाळंकराबद्दल असलेला आदर हळूहळू कमी होत जाउन मग देवळात रोज भजन गाणे वगैरेतला रस संपला. काही असो पण ठक्या वाळंकरामुळेच मला अभंगाची, भजनाची गोडी लागली हे मात्र खरे. नाव बदलून का होईना पण ठीकठाकशी अक्षरओळख होण्यापूर्वीच या महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ वारसा असणाऱ्या संतवाङ्ग्मयाशी माझे आणि कित्येकांचे नाते जोडले गेले ते ठक्या वाळंकरामुळे हे निर्विवाद सत्य आहे.
ठक्या वाळंकराला दोन पोरे. बायको दुसऱ्या पोराच्या जन्माच्या वेळीच गेली होती. ठक्या वाळंकराने बाप आणि आई दोन्ही बनून पोरे सांभाळली. मोठ्या लेकाचे लग्न झाल्यावर तो भांडून वायला (वेगळा) निघाला. ठक्या आता धाकट्याकडे राहतो. आधीच्याच दीड एकराचे दोन तुकडे झाले आणि गरिबी अजून मोठी झाली. आता त्याचा धाकटा लेक आमच्याकडे शेत कामाला येतो. ठक्या वाळंकराचा विषय मी काढला की "आमचा म्हातारा येडा होता आणि टाळ कुटण्यात त्याने जल्म वाया घालवला" असे तो नेहमी म्हणतो. अजूनही ठक्या वाळंकर नित्यनेमाने देवळात दिवाबत्ती करतो. गेली सत्तर-एक वर्षे त्याने देवळातला दिवा विझू दिला नाहीये. ठक्या वाळंकराच्या घरात मी कधी गेलो नाही किंवा त्यानेही कधी मला नेले नाही. पण जेव्हा कधी त्याच्या घरात डोकावलो तेव्हा दिवसाउजेडीदेखील त्याच्या घरात कुट्ट अंधार दिसायचा. मी एकदा लहानपणी त्याला विचारले होते की "ठक्या बाबा किती अंधार आहे घरात दिवा का लावीत नाहीस?" तर म्हणाला की "दिवा लावायला तेल लागते त्यासाठी पैसे कुठून आणणार?" मी म्हणालो की "देवळात सगळे जण रोज एवढे तेल आणून देतात त्यातून थोडेसे घेऊन यायचे", तर म्हणाला "नाही रे बाबा त्ये महापाप होईल. अंधारात राहीन, उपाशी मरेन पण देवाच्या एवढ्याशा वस्तूला हात लावणार नाही मी.!!" ठक्या वाळंकराच्या लेकाला मुलबाळ झाले नाही. आयुष्यभर देवाच्या गाभाऱ्यातला दिवा पाजळता ठेवणाऱ्या ठक्या वाळंकराच्या घराला उजेडाचा आणि वंशाचाही दिवाच लाभला नाही....
परवा रात्री गावात गेल्यावर परतताना देवळात भजनाचा आवाज ऐकू आला. सहज म्हणून देवळात गेलो तर आता ऐंशी-पंच्याऐंशीचा सुरकुतलेला ठक्या वाळंकर तसाच आठ-दहा वर्षांच्या पोरांना घेऊन वीणा हातात धरून अभंग गात होता. पोरे भजनात तल्लीन होऊन गेली होती, आणि ठक्या वाळंकराने दोनदा "ठका म्हणे"ची ओळ गाउन पुढचा अभंग सुरु केला होता. मी त्या कोवळ्या निरागस पोरांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव बघून दुरूनच हात जोडले, दत्ताला नव्हे तर ठक्या वाळंकराला..!!