हा ब्लॉग शोधा

सोमवार, १६ जून, २०१४

भामी

सातपूरात तीनचार आठवडे झाले, बाजारपेठेत, मांजीरगाव रोडच्या गल्लीत, एसटी स्टॅंडवर, कधी चावडी तर कधी देवळाच्या पुढच्या पाराजवळ ती दिसू लागली होती. तिशीतली असेल. एक पिशवी आणि एक गाठोडे होते तिच्याकडे.  जिथे जाईल तिथे आपली ही तमाम संपत्ती ती बरोबरच न्यायची. मोकळे भुरकट मातकट केस. वीतभर लांब असतील फक्त. तिच्या गव्हाळी चेहऱ्यावर विस्करलेल्या त्या झिपऱ्यांमुळे ती जमेल तेवढी ओंगळवाणी दिसायची. नेहमी धांदुक नेसलेली. बहुदा दोन असावीत तिच्याकडे, किंवा एकच असेल, सहसा फारसे मळलेले नसायचे म्हणून दोन असावीत असा आपला अंदाज, नाहीतर अशा भिकारणीकडे किती कपडे आहेत याची काळजी करत बसायला कुणाला वेळ आहे?
कुठून आली किंवा कुणी तिला इथे आणून सोडली याबद्दल कुणालाही काही माहिती नव्हती. तिचे येणे म्हणजे कोणती मोठी महत्वपूर्ण घटना होती? येण्यापूर्वी गावाच्या चौकाचौकात "आपले हार्दिक स्वागत" असे फ्लेक्स तिच्यासाठी कोणी लावले नव्हते, तिचे येणे हे निदान चार दिवस कुणाच्या लक्षात सुद्धा आले नाही.  खानावळीच्या, हॉटेलांच्या बाहेर ती तासतासभर उभी राहू लागली तेव्हा तिच्याकडे लोकांचे लक्ष गेले. मग ती बऱ्याच वेळा एखाद्या चुरगळलेल्या पेपरच्या कागदाच्या पुडक्यातले काहीबाही खाताना, एखाद्या चहाच्या हॉटेलबाहेर ठेवलेल्या पिंपातील पाणी तोटी उघडून ओंजळ करून पिताना दिसायची. कधीही काहीही बोलत नसल्यामुळे अथवा कुणी "ए भिकारडे" अशी माणुसकीची हाक मारली तरी तिकडे ढुंकूनही पाहत नसल्याने ती मुकी बहिरी असावी असा गावाचा समज झाला होता. 
एके दिवशी सगळ्या गावाला बेवडा म्हणून सुपरिचित असलेला जानकु शिंदा संत्र्याची अख्खी बाटली संपवून झोकांड्या घेत एसटी स्टॅंडकडे चालला होता. तोंडाने "भामे अगं ए भामे, दार उघड मी आज खरच पिलेलो नाही" असे काही काहीसे बडबडत होता. स्टॅंडमध्ये घुसल्यावर त्याने एकदा परत "भामे ए भामे" अशी आरोळी ठोकली. ती आरोळी ऐकून की सहज म्हणून कुणास ठाऊक ती कुठूनतरी अचानक त्याच्याजवळ आली आणि "कशाला वरडतो रे?" असे त्याला विचारून निघून गेली. एवढी घटना पाहणारांनी लगोलग ती मुकी बहिरी नसून तिचे नाव भामी असावे अशी माहिती गावात कानोकान पसरवून दिली. कधी कधी चार आयाबाया तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत. कुठून आली, नवऱ्याने सोडून दिली आहे काय? पोरंबाळं आहेत काय? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवू पाहत, पण ती काहीतरी उगीच असंबद्ध बडबड करी. आपलेच केस ओरबाडत राही, कशीनुशी हसत बसे. या नव्या अनुभवांनी मग ती वेडी आहे ही तिच्याबद्दलची आणखी नवी माहिती गावाच्या कानाकोपऱ्यात पोचली. आयाबाया तिला पाहून उगीच हळहळत बसत. कधी कधी एखादी तिला जेवण देई, कुणी एखादे लुगडे तिच्या हातात ठेवून जाई. पण तिने बहुदा कधीच ती लुगडी घातली नसावीत. एके दिवशी एका माऊलीला तिची फार दया आली आणि ती तिला घेऊन घरी गेली. तिला न्हाउमाखू घातले, आपले एक लुगडे नेसवले, केस व्यवस्थित विंचरून दिले. आणि म्हणाली मला वाटलंच होतं, कशी गोजिरी दिसतेस, बाई गं तू राहा माझ्याबरोबर. इथं व्यवस्थित राहशील. पडली धडली कामे केली तर कर नाहीतर नको करूस, मी सांभाळीन तुला. दोन वेळची न्याहारी तुला भरवणे काही जड नाही मला. भामीला अशाप्रकारे छत मिळाले. पण तिचे नशीब एवढे थोर असते तर कशाला आधीच तिला कुणी अशी वाऱ्यावर सोडून दिली असती? रात्री त्या माय माउलीचा नवरा दारू पिउन घरी आला, मग रात्रीतून काय झाले कुणास ठाऊक? त्या बाईने भल्या पहाटेच तिला घरातून घालवून दिले आणि भामी पुन्हा एकदा आभाळाच्या छताखाली रहायला आली. 
हळूहळू भामी एक अविभाज्य भाग होऊन गावात मिसळून गेली. अनेकदा समजावूनही ऐकत नसलेल्या एखाद्या खोडकर पोराला आई धमकी देई की चांगला वागला नाहीस तर तुला भामीला देऊन टाकीन, आणि पोरगे आपसूक वठणीवर येई. पोरीने नकार दिल्यामुळे अत्यंत दु:खात असणाऱ्या एखाद्या कॉलेजवीराला त्याचा मित्र समजावी, अरे जाऊ दे, ती कोण एवढी परी लागून गेली? तिच्यापेक्षा भामी बरी.!! एखादा लयीच पुड्या सोडू लागला की समोरचा वैतागून म्हणे, अरे किती फेकतोस? भामीला सांगितलेस ना तर तिलासुद्धा पटणार नाही हे. कधी साईप्रसाद हॉटेलात कुणी घुसे व दोन भजीपावाची ऑर्डर देई, आणि यातला एक भजीपाव बाहेर भामीला नेउन दे असे हॉटेलातल्या पोऱ्याला सांगे. आपल्याला हे अन्नदान कुणी केले आहे याची कल्पना नसलेली भामी बाहेरूनच गल्ल्यावर बसलेल्या हॉटेल मालकालाच हात जोडून ते पुडके घेई. मालकही एका हाताने ढेरीवरचे बनियन थोडे वर करून पोट खाजवीत खाजवीत, अथवा मागच्या भिंतीवरच्या साईबाबांच्या फोटोपुढची एखादी अगरबत्तीची काडी घेऊन दात कोरता कोरता हात उचलून तिचे ते अभिवादन स्वीकारी. हिवाळ्यात भामीच्या अंगावर कुणी दिलेले एखादे ठिगळलेले, विरलेले स्वेटर दिसे तर पावसाळ्यात एखादा फाटका तुटका रेनकोट.!! कधी एखाद्या लग्नाच्या मंडपाबाहेर भामी जोरजोरात रडत बसे तर कधी एखाद्याच्या दहाव्याला मोठमोठ्याने हसे, पण या गोष्टींचे कुणाला फारसे वैषम्य वाटत नसे. फार फार तर अशावेळी कुणी भामीला हाताला पकडून त्या ठिकाणाहून थोडे दूर सोडून येई. बोलून चालून वेडीच ती. तिचे काय मनावर घ्यायचे..!!
अंत्या हा गावातला एक टुकार पोऱ्या. दिवसभर दुसरी पोरे गोळा करून भटकत राहणे,  सतत तोंडात गुटख्याचा तोबारा भरून ठेवणे, बिड्या फुकत राहणे आणि रात्री मिळेल ती दारू पिउन उगीच कुणाला नडणे, धतींग, मारामाऱ्या करणे, हे अंत्याचे रोजचे धंदे. एकट्या दुसऱ्या पोरीचा पाठलाग करणे, पोरींना घाणेरड्या हाका  मारणे, एसटीमध्ये एखादी पोरगी बसली असेल तर तिच्या खिडकीजवळ जाउन थाप मारणे, असे  उद्योग नेहमी करीत असल्याने अंत्याने कैक वेळा मार खाल्ला होता, पण तरीही तो कधीही सुधारला नाही. अंत्याचे जोडीदार सारखे बदलत राहिले. जुन्यांपैकी कुणी वर्दीची गाडी चालवू लागला, तर कुणी टपऱ्या, दुकान टाकले, कुणी नोकरीला लागला तर कुणी वडापावच्या गाड्या टाकल्या. हळूहळू ते अंत्यापासून दूर जात आणि लग्ने केल्यावर तर त्याच्याशी पूर्णपणे संबंध तोडून टाकीत. अंत्यानेही एकदा चहाची टपरी टाकली होती जी बरेच दिवस चालली, पण कमावू लागल्यावरही पूर्वाश्रमीच्या ख्यातीमुळे कुणीही त्याला मुलगी दिली नाही त्यामुळे त्याचे लग्न काही जमले नाही. मात्र अंत्यास नवे नवे मित्र मिळतच राहिले आणि तो मार खाण्यायोग्य त्या सगळ्या भानगडी करीतच राहिला. एकदा अंत्या आणि त्याचे जोडीदार नाक्यावर बिड्या फुंकत बसले होते, भामी तिथे आली. अंत्या इतरांस म्हणाला की आपण भामीची गंमत करूयात. मग त्याने भामीला जवळ बोलावले, आणि तिला हातातली बीडी देत "घे पी" म्हणाला. भामीने नकार दिला. मग अंत्याने भामीपुढे एक पुडके ठेवले आणि म्हणाला यात वडापाव आहे, पण तू जर ही बिडी ओढलीस तरच तुला देईन. भामीला असे अडचणीत टाकल्यावर तिची गोंधळलेली स्थिती पाहून त्याचे जोडीदार एकमेकांस टाळ्या देऊ देऊ हसत होते. हो ना करता करता शेवटी अंत्याने बळजबरीने भामीच्या तोंडात बिडी कोंबलीच. भामीला जोरात ठसका आला.  डोळ्यांतून पाणी आले हे पाहून केवळ अंत्याच्या दोस्तांनीच नव्हे तर रस्त्याने येणारा जाणारांनीही विनाखर्च हसून घेतले.  शेवटी खूप मजा येउन संपल्यावर मग अंत्याच्या मित्रांपैकी एकाने भामीच्या हाती तो वडापाव सुपूर्त केला.
भामी आता अशीच कधी एखाद्या वात्रट पोराने मारलेले दगड खात, अंत्यासारख्या कुणी दिलेल्या त्रासाला सामोरे जात जीवनयात्रा यथार्थ करीत होती. खंगत होती. दिवसेंदिवस ती अधिकाधिक दुर्गंधी आणि कळकट मळकट होत चालली होती. तिच्या त्या घाणेरड्या अवतारामुळे आधी तिच्या हातात जेवण देणारे आता आणलेले खाणे लांबच ठेऊन तिला उचलून घ्यायला सांगत. हॉटेलच्या बाहेरच्या पिंपातील पाणी आता तिला ओंजळीने पिऊ दिले जाणे बंद झाले. नटून मुरडून फिरत निघालेल्या पोरीबाळी तर भामी जवळून गेली की लगेच तोंडाला रुमाल लावीत. तशी आधीही ती फार स्वच्छ वगैरे नसायची, पण आता अंगावरची मळाची पुटे फारच किळसवाणी होऊ लागली होती. भामी कधी आजारी पडली नसेल काय? भामी आपल्या इतर शरीरधर्मांचे कसे नियोजन करीत असेल? आपला भूतकाळ सुखाचा असो की दु:खाचा, पण त्याची आठवण डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहत नाही, भामीला तिच्या जुन्या दिवसांतले थोडे फार तरी काही आठवत असेल? भामीला अनेकदा उचकी यायची, ते पाहून वाटायचे की कुणीतरी लांब कुठेतरी भामीची आठवण काढीत असेल काय? मनात उमटलेल्या नेमक्या कुठल्या विचारांनी ती वेळी अवेळी अशी रडत किंवा हसत असेल? तिला एकटीला अंधाराची भीती वाटत नसेल?
अशाच एका रात्री सुनसान झालेल्या एसटी स्टॅंडमध्ये भामी झोपली होती, मध्यरात्र उलटून गेली असेल, अंत्या आणि त्याचे तीन मित्र पिउन तर्राट झाल्यावर आता उशीर झाल्यामुळे घरी जाता येणार नाही असा विचार करून रात्र घालवण्यासाठी स्टॅंडमध्ये आले. तिथल्या काळपट पडलेल्या मंद ट्यूबलाईटच्या उजेडात त्यातल्या एकाला भामी झोपलेली दिसली. "आयला अंत्या ती बघ भामी". असे त्याने अंत्याला सांगितले. अंत्याचे जडावत चाललेले डोळे अचानक विस्फारले, एक विचित्रशी सणक त्याच्या मेंदूत उठली. ते चौघे भामीच्या जवळ गेले. अंत्याने नशेतच तिच्या पाठीत लाथ घातली आणि भामी जागी झाली. तिने मोठ्याने आरडाओरडा चालू केला. ते पाहून अंत्या तिचे तोंड दाबण्यासाठी पुढे सरसावला. आणि त्याने तिला आवळून तिच्या तोंडावर हात ठेवला. त्याच्या हातून सुटण्यासाठी भामी धडपडू लागली आणि त्या झटापटीत तिच्या अंगावरचे वस्त्र काहीसे विलग झाले. ते पाहून चौघांच्या अंतरातला सैतान जागा झाला. त्यांनी तशीच भामीला उचलली व स्टॅंडबाहेर लांब ओसाडीला घेऊन गेले. आणि मग भामीच्या अंगांगावर कित्येक वेळ एकामागून एक विजा कोसळत राहिल्या.  त्यानंतर हे रोज घडू लागले. आपापल्या सुखांच्या निद्रांत विसावलेल्या गावाला रोज रात्री स्टॅंडजवळ हे असे सैतानी वादळ येते आणि भामीची रोज कत्तल करून जाते याची कल्पनाही आली नाही.
असे काहीसे घडत असावे अथवा घडले असावे हे गावाला कळले ते सहा सात महिन्यांनंतर. भामीचे पोट दिसू लागले तेव्हा. भामीवर रोज अत्याचार होत असताना गाव जरी झोपलेला असला तरी निसर्ग मात्र चोखपणे आपल्या धर्माला जागला होता. भामीला दिवस गेले होते. आणि मग गाव खडबडून गेले. जिकडेतिकडे चर्चांना उधाण आले. एकदा सरपंच तालुक्याला पंचायत समितीत आपल्या सातपूर गावच्या कामांचा उहापोह करून सांगत होता तेव्हा त्याला मधेच थांबवून एक दुसऱ्या गावचा गावपुढारी म्हणाला, "काय कौतुक सांगता तुमच्या गावाचे? अहो ज्या गावात एका कळकटलेल्या वेडीला दिवस जातात त्या गावाबद्दल कौतुकाने बोलायला तुम्हाला शरम वाटली पाहीजे." ते ऐकून सरपंच निरुत्तर झाला. सातपुरात परतला तेव्हा तो अपमानाने धुसमुसत होता. आल्या आल्या लगेच सरपंचाने गुरख्याला फैलावर घेतले पण त्याला काहीच माहित नव्हते. खरेतर भामीला स्वत:लाही दुसऱ्या दिवशी आदल्या रात्रीचे काही आठवत नसे. त्यामुळे पोलिस पाटलाने भामीला खोदुन खोदुन विचारले पण ती काही बोलतच नव्हती आणि बोलली तरी त्यातून काही बोध होत नव्हता. गावातून जाणाऱ्या हायवेवर काही दिवसांपूर्वी उघडलेल्या ढाब्यावर थांबलेल्या ट्रकवाल्यांपैकीच कुणीतरी हे केले असावे असा एक प्रवाद जवळजवळ सगळ्या गावाने मान्य केला. अंत्या आणि त्याचे मित्र मात्र नामानिराळे राहिले, त्यांचेवर कुणी साधा संशय देखील घेतला नाही. एक दीड महीना असाच गावाच्या निरर्थक चर्चा आणि कुजबुजींत निघून गेला. कुणाला खरे काय ते काहीच कळले नाही, आणि एक दिवस अचानक भामी गावातून कुठेतरी गायब झाली. चर्चेला चघळण्यासाठी मिळालेला अजून एक नवा विषय या व्यतिरिक्त गावास तिच्या जाण्याने काही फरक पडला नाही. 
दोनेक आठवड्यांनी पुन्हा भामी गावात आली तेव्हा तिच्या हातात पाच सहा दिवसांचे एक नवजात अर्भक होते. आता डोक्यावर गाठोडे आणि पाठीवर एका कापडात बांधलेले ते मुल, अशा अवतारात पुन्हा भामीचा तोच जुना दिनक्रम सुरु झाला. लोकांनी तिच्या पोरासाठी अंगडे टोपडे दिले. तिला स्वत:हून भाकर तुकडा आणून देऊ लागले. कधी कधी ते मुल फार जोरजोरात रडायचे आणि मग भामी अगदी गडबडून जायची. पोराला छातीशी दाबून धरायची. पण पोरगे रडायचे थांबायचे नाही. मग एखादी बाई पुढे येउन पोराला घ्यायची, आणि भामीला थोपटायचे कसे ते दाखवायची. मग तसे थोपटले की पोर झोपी जायचे. पोरगं जगणार नाही असे गावातले लोक बोलत. एखाद्या अनाथाश्रमात अथवा एखाद्या मुल होत नसलेल्या जोडप्याकडे तिचे मुल द्यावे असे गावातले बहुतांश लोक म्हणत. नुसतेच म्हणत....
अंत्या रोज एसटी स्टॅंडवर चक्कर मारी, पण आता सरपंचाच्या ताकीदीमुळे गुरखा स्टॅंडवरच झोपलेला असे त्यामुळे त्याला काही करता येईना. असे थोडेफार दिवस गेले. भामी तशी नेहमी स्टॅंडवरच झोपत असली तरी डासांच्या त्रासामुळे बऱ्याच वेळा इतर ठिकाणीही जात असे. गावात एके ठिकाणी कुणाच्या बंगल्याचे बांधकाम चालू होते, भामी एके दिवशी पोराला घेऊन तिथे झोपायला गेली. तिथे भिंतींचे संरक्षण तर होतेच पण बांधकामावर मारल्या जाणाऱ्या पाण्यामुळे गारवाही होता. अंत्याने नेमके तिला तिकडे जाताना पाहिले, आणि त्याने ती तिकडे एकटीच मुलाला घेऊन गेली आहे याची व्यवस्थित खात्री करून घेतली. मग आधी गुत्त्यावर प्यायला बसून थोडी रात्र सरल्यावर परत एकदा अंत्या आणि त्याचे मित्र सावजाची पारध करायला निघाले. ते बांधकामाच्या जागी पोचले, कुणी आजूबाजूस नाही याची खात्री करून घेतली. आणि मग भामी झोपली होती तिथे आले. ती पोराला पुढ्यात घेऊन गाढ झोपली होती. पोराला बाजूला काढावे लागेल असे एकजण म्हणाला. मग दुसऱ्याने हळूच तिचा हात पोरावरून बाजूला केला आणि अंत्याने पोराला उचलले. त्या स्पर्शाने पोर जागे झाले आणि रडू लागले तशी भामीला जाग आली, आणि काय होते आहे हे तिने पाहिले. अंत्या पोराला उचलून घेत होता हे पाहून तिने जोरात आरोळी ठोकली. मग दोघांनी तिला धरून ठेवले आणि अंत्या छद्मीपणे हसत त्या मुलाला घेऊन बाहेर जाऊ लागला. आपले मुल अंत्या कुठेतरी घेऊन जात आहे हे पाहताच भामीच्या अंगात कुठली शक्ती संचारली कुणास ठाऊक, तिने आपल्याला पकडणाऱ्या दोघांना दूर लोटून दिले. आणि ती अंत्याच्या मागे धावली. अंत्या पोरास घेऊन बाहेर आला होता. बाजूच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर पोराला ठेऊन आत जायचे असा त्याचा बेत होता. तो पोराला ठेवण्यासाठी खाली वाकला तोच मागून वाऱ्याच्या वेगाने भामी तिथे आली. आपल्या मुलाच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट होते आहे या विचाराने ती पेटून उठली आणि जवळच असलेल्या बांधकामाच्या दगडांतला एक दगड तिने उचलला व अंत्याच्या डोक्यात घातला. अंत्या हेलपाटून बाजूला पडला. भामी एवढी उद्वेगीत झाली होती की पहिल्याच वेळी मर्मावर घाव बसून अंत्या मेला असूनही अगदी त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होईपर्यंत ती त्याच्यावर दगड मारत राहिली. मग थोड्यावेळाने तिला वाळूच्या ढिगाऱ्यावर ठेवलेल्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा तिने हातातला दगड बाजूला टाकून मुलास उचलून घेतले आणि मग त्याला आपल्या अंगाशी घट्ट कवटाळून एसटी स्टॅंडमध्ये झोपायला निघून गेली. अंत्याचे मित्र ते दृश्य पाहून गर्भगळीत झाले. आणि गुपचूप वाट फुटेल तसे तिथून पळून गेले.
दुसऱ्या दिवशी गावात अंत्याचा मर्डर झाल्याची बातमी सकाळीच पसरली. हे कुणी केले असेल हे कुणालाही कळले नाही. अंत्याचे मित्र अथवा नातेवाईक यांचेकडे कसून चौकशी करूनही पोलिसांच्या हाती देखील कुठलाच धागादोरा लागला नाही.
इकडे स्टॅंडमध्ये भामी सकाळच्या कोवळ्या उन्हात गोड हसत मजेने हातपाय हलविणाऱ्या आपल्या लेकराकडे कौतुकाने पाहत होती. नेहमीप्रमाणे रात्री काय घडले ते तिला आठवत नव्हते. भामीच्या बाबतीत नेहमी असेच झाले होते. काल काय घडले किंवा उद्या काय होईल याची तिला काळजी जाणवत नव्हती. भामी फक्त आजची होती. तिने कधी काही केले नाही, सगळे तिच्या बाबतीत घडत राहिले. दहा महिन्यांपूर्वी तिच्या बाबतीत निसर्गाने आपला धर्म पाळला होता, आणि कालच्या रात्री नियतीने तिचा न्याय केला होता.