हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

हिवाळा ३


चंद्र वितळून उतरलेला असतो भंडारदऱ्याच्या पाण्यात. पण मागच्या डोंगरालाही तो हवा असतो. तो शोषून घेत राहतो चंद्राला स्वत:कडे. पाण्याची प्रचंड तळमळ होते. डोळ्यात पाणी आणून ते आर्जव करीत राहते चंद्रास, पण चंद्र असहायपणे सरकतच राहतो डोंगराकडे. 

मी समोर उभा राहून बघत असतो डोंगर अन पाण्याची ही स्पर्धा, मला वाटते दोघांपैकी चंद्र पाण्यालाच मिळावा. पण आता तो टेकलेला असतो थेट डोंगराच्या माथ्यावर. एक मंद झुळूक येते थंडगार वाऱ्याची. डोळ्याला झोंबते. आणि क्षणार्धात पुढचे व्याकुळ पाणी डोळ्यात येउन दाटते. अशा वेळी पापणीही मिटू नये. कारण आता चंद्र विरघळलेला असतो थेट आपल्या डोळ्यात. नेमका तेव्हाच डोंगर गिळून टाकणार असतो त्याला. पण पाण्याने धरूनच ठेवलेले असते त्याचे शुभ्र तलम उत्तरीय. मी पापणीच मिटत नाही. मिटली तर चंद्र सुटून जाईल. मग डोंगर समोरून एक फुंकर घालतो जोराची. तो वारा डोळ्यांना बोचतो. थेंब मोठा होतो आणि मग डोळ्यांतून चंद्र अलगद ओघळून जातो. डोंगर जिंकतो. पाणी दु:खावेगाने हेलावत राहते. असा कसा रे तू? कधीच डोळ्यांत पाणी थोपवता येत नाही तुला, आणि मग नेहमीच चंद्र निसटून जातो.  

हताश होऊन मग उपडे पडावे किर्र काळोखात. हळूहळू डोळ्यांची फोकल लेंथ ऍडजस्ट होते थेट वरच्या काळ्या पडद्यावर. निसर्गचित्राचे कोट्यावधी पिक्सेल्स दिसू लागतात. कित्येक वर्षे रात्री आजूबाजूच्या लाईट्समुळे आभाळ असे स्पष्ट दिसलेलेच नसते आपल्याला. सप्तर्षी लगेच ओळख दाखवतो. आणि मग सरळ घेऊन जातो धृवाकडे. धृवच तो, मी भेटायला आलो तरीही तसूभर हलत नाही जागचा. शुक्र लांबून हाय करतो. बस फक्त हे तिघेच. बाकीच्यांची नावेच मला आठवत नाहीत. पण चेहऱ्याने सगळे ओळखीचे असतात. असेच होते नेहमी एखाद्या जुन्या ओळखीच्या गावी गेल्यावर, केवळ चारेक मित्रांची नावे आठवतात, बाकी नुसतेच चेहरे..

इंचनइंच व्यापलेला असतो आभाळाचा त्या पांढऱ्या थेंबांनी. मुंबईवरून दोनशे किलोमीटर आपल्याच गावी जायला देखील मी चार सहा महिने लावतो. आणि हे पद्मावधी सवंगडी रोज येत असतात भेटायला लक्षावधी प्रकाशवर्षे दुरून. पण आपणच करंटे, रोज लपून बसतो कॉंक्रीटच्या कवचाखाली. पण आज भेटीचा योग आलाच. त्यांना भेटून मन भरून येते. तेही आनंदून भेटतात. आभाळाला मी म्हणतो एवढे मोती अंगावर कसा ल्यातोस? तुला जड होत नाहीत? आकाश म्हणते अरे हे माझे अंगच आहे. अंग अंगाला कसे जड होईल? थांब तुलाच अनुभव करवितो. ते जर्कीन, ग्लोव्ज, सॉक्स काढून टाक बरे अंगावरून. काय ही थेरे? माहीतीये मोठा मुंबईवाला आहेस. पण जरा जुन्यासारखा नुसता शर्ट घालून पडून रहा डोळे मिटून. मी ओशाळून सगळी शहरी थेरे अंगावरून काढून टाकतो. आणि डोळे मिटून शांत पडून राहतो. हलकासा मंद वारा अंगाला स्पर्शून जातो आणि थंडीने रंध्रारंध्रातले रक्त जणू गोठून जाते. शरीराची जाणीवच होत नाही. मग आभाळ म्हणते आता आपल्याच सर्वांगाला स्पर्श कर. मी स्पर्शून बघतो. अंगभर कित्येक मोती जडविले गेलेले असतात शहाऱ्याचे. असा गोठविणारा काटा आलाच नव्हता अंगावर कित्येक दिवस. मी डोळे उघडत नाही. पण तरीही दिसत राहते वर ताऱ्यांनी पूर्ण भरलेले आभाळ. मला स्पर्शानेच सगळे तारे दिसत राहतात. अगदी थेट अंगावर येउन टेकलेले असावे आभाळ. किंवा असेही नाही. बहुदा माझे अंगच आभाळ झाले असावे.