आजपासून
तब्बल १० हजार वर्षांनी (एका संस्कृतीचा काळ आपण ५-७ हजार वर्षे धरू). एक
मोठे उत्खनन झाले तर त्या माणसांस आपली शहरे गावे इत्यादि पाहून आजच्या आपल्या ज्ञानाबद्दल नक्कीच आश्चर्य वाटेल. आज जशा आपण मोहेंजोदडो, हडप्पा, मेसोपोटेमिया इत्यादी
संस्कृती उत्खननात बघतो आणि त्यांचे ज्ञान पाहून अचंबित होतो तशीच भविष्यातील माणसे आपले अवशेष पाहूनही अचंबित होतील. हडप्पा मेसोपोटेमिया आणि तशाच कित्येक जुन्या प्रगत संस्कृती त्यांच्या सर्वोच्च उत्कर्ष
काळातच नष्ट झाल्या असाव्यात, आणि बहुदा सर्वसंहारक युद्ध हेच त्याचे कारण
असावे. मला वाटते प्रगत मानवी समूह हे ५-७ हजार वर्षांच्या कालावधीनंतर अंतर्गत कलहांपरांत
नेहमीच स्वत:ला पूर्णत: नष्ट करून टाकत असावेत. आणि मग कुठेतरी विजनात तग धरून
राहिलेली अप्रगत माणसे अथवा त्या नष्ट झालेल्या प्रगत संस्कृतीतील अलिप्त
(बहुदा मागासपणामुळे/ अशिक्षितपणामुळे अथवा बंड करून वेगळी लपून राहिलेली)
माणसे पुन्हा नव्याने नवीन मानवी प्रगती आणि संस्कृती निर्मितीस सुरुवात करीत असतील.
शक्यतो
ही नव्याने सुरु करण्याची सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानीक प्रगती अथवा सांस्कृतिक नवनिर्मिती मोठी भ्रमीत करणारी एवं गोंधळपूर्ण असेल.
म्हणजे कसे? हे समजून घेण्यासाठी आपण थोडे कल्पनारंजन करूयात.
तर असे समजू की आजच्या काळात म्हणजे आजपासून काही वर्षांत एक मोठे महायुद्ध होऊन आजचे सगळे देश त्यात पूर्णत: विनाश पावले. मात्र या विनाशातूनही समजा सोमालियातले काही बंडखोर जे समुद्रात पळून जाउन एखाद्या बेटावर जाउन लपून राहीले असतील ते, अथवा ब्राजीलमधील जंगलांत अजूनही प्रकाशात न आलेली एखादी आदिम जमात हे मानवी समूह बचावले. तर मग पृथ्वीवर मानवी वंश पुढे चालविण्याची पूर्ण जबाबदारी ही या समूहांवर येउन पडेल. आता प्रगती हा मानवी स्थायीभावच असल्याने समयपरत्वे हे दोन्ही समूह उपलब्ध साधनांचा उपयोग करून जीवन अधिकाधिक सुखकर आणि सुसूत्र करण्यासाठी हळूहळू विविध प्रकारे प्रगती करू लागतील.
तर असे समजू की आजच्या काळात म्हणजे आजपासून काही वर्षांत एक मोठे महायुद्ध होऊन आजचे सगळे देश त्यात पूर्णत: विनाश पावले. मात्र या विनाशातूनही समजा सोमालियातले काही बंडखोर जे समुद्रात पळून जाउन एखाद्या बेटावर जाउन लपून राहीले असतील ते, अथवा ब्राजीलमधील जंगलांत अजूनही प्रकाशात न आलेली एखादी आदिम जमात हे मानवी समूह बचावले. तर मग पृथ्वीवर मानवी वंश पुढे चालविण्याची पूर्ण जबाबदारी ही या समूहांवर येउन पडेल. आता प्रगती हा मानवी स्थायीभावच असल्याने समयपरत्वे हे दोन्ही समूह उपलब्ध साधनांचा उपयोग करून जीवन अधिकाधिक सुखकर आणि सुसूत्र करण्यासाठी हळूहळू विविध प्रकारे प्रगती करू लागतील.
आता ब्राजीलातील ती आदिम जमात ही जशी अश्मयुगातील माणसाची झाली असे आपण म्हणतो, तशी त्यांच्या नैसर्गिक वेगाने प्रगतीकडे वाटचाल करती होईल, पण सोमालियातील बंडखोर हे मात्र सगळा सावळा गोंधळ माजवतील. हा गोंधळ या गोष्टीमुळे माजेल की सोमालीयनांना आजचे
उपग्रह, कम्प्युटर, मोबाइल, इन्टरनेट, चंद्रावर मानवी पाऊल, विमान, रॉकेट,
पेट्रोल/डीजेलवर चालणाऱ्या गाड्या, अणुबॉम्ब आदी सगळे माहित तर असेल मात्र
त्याविषयीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान त्यांचेकडे असणार नाही. मग ते या साऱ्यांचे अस्तित्व आणि उपयोग हे माहित असूनही यातली
कोणतीही वस्तू बनवू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रगत तंत्रांची अथवा साधनांची संकल्पना तर त्यांना माहित आहे, किंबहुना तिचा वापर करण्याचा अनुभव सुद्धा आहे मात्र त्यांचे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्या साधनांची निर्मिती करून वापर करता येत नाही म्हणून त्यांच्यात एकप्रकारच्या हतबलतेतून आलेल्या न्यूनगंडाने मोठा गोंधळ माजेल. म्हणजे त्यांचेकडे मोबाइल असतील, गाड्या असतील अथवा जिथे ते लपून बसले होते त्या बेटावरून परत मुख्य भूमीत आल्यावर त्यांना ते सापडतील, मात्र ते मोबाइल वगैरे साधनांचे इन्फ्रास्ट्रक्चरच नष्ट झालेले असल्यामुळे त्याचा उपयोग करू शकणार नाहीत. वाहने ते थोडाकाळ फारतर उपयोगात आणू शकतील पण एका काळानंतर तीही निरुपयोगी बनून गंजून नष्ट होऊन जातील. आणि मग अर्थातच उपयोगात नसल्याने त्या गोष्टींबद्दलची माहिती अथवा त्यांचे एकूण अस्तित्व हेच संपुष्टात येइल. अशा प्रकारे मग आजच्या मानवाची तंत्र आणि विज्ञानातली एवढी मोठी प्रगती ही पुरेशा ज्ञानाअभावी नष्ट होऊन जाईल.
नव्याने जन्मलेल्या पिढीला तर ते सगळे कळणार नाहीच पण जुन्या पिढीतील ते लोक ज्यांनी हे सगळे पाहीले अनुभवले आणि वापरले असेल तेही मग वेगाने झालेल्या या अध:पतनामुळे अतिशय निराश होऊन जातील. त्यातील काहीजण बऱ्यापैकी संवेदनशील असतील
आणि त्यांना वाटले की निदान पुढच्या पिढ्यांना या सगळ्या प्रगतीची माहिती
तरी व्हावी जेणेकरून पुढच्या कुठल्याशा पिढीत कोणी न्यूटन अथवा आइनस्टाइन जन्मला तर तो किमान या साधनांच्या संकल्पनेचा धागा पकडून त्यांचे तंत्र शोधू शकेल. अन्यथा संकल्पना शोधण्यातच किती तरी बुद्धिवंतांची बुद्धी खर्च पडून कालपरत्वे वाया जात असते. म्हणून मग ते त्यासाठी किमान ही सगळी तंत्रे काय होती आणि ती कशी काम
करायची हे माहित नसले तरी काय काम करायची हे तरी लिहून ठेवतील. आणि ही त्यांनी लिहिलेली माहिती सुद्धा येणाऱ्या काळात नष्ट होऊ नये म्हणून
येणाऱ्या पिढ्यांकडून ते ती वदवून, रटून घेतील. अर्थातच मग ही माहिती लिहून
ठेवलेली पुस्तके ही त्यांनी एकेकाळी स्वत: अनुभवलेल्या तांत्रिक प्रगतीचे
म्हणजेच जुन्या मानवी इतिहासाचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणून गणले जातील. तंत्राचा उपयोग तर माहित आहे
पण बनविण्याचे ज्ञान तेवढे नाही आणि त्यामुळे एकंदर जीवन फार कठीण होणार
आहे, त्यामुळे निदान पुढे कोणती तरी पिढी हुशार निपजेल तेव्हा ही तंत्रांची
जुजबी माहिती त्यांना खूप उपयोगी होईल या भावनेने ते सदर माहिती अंतर्भूत
असलेले ग्रंथ हे फार महत्वाचे ठरवून पिढी दरपिढी ते पुढे दिले जात रहावेत, अभ्यासले जात रहावेत
म्हणून त्या ग्रंथांना काहीतरी अत्यंत महत्वाचा अथवा दैवी दर्जा देतील. पुढे मग एखादी पिढी त्या माहितीला एखाद्या वेधक आणि नाट्यमय स्वरूपात मांडून सुधारीत आवृत्ती बनवतील. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांस ते अभ्यासणे रटाळवाणे वाटणार नाही. अशा प्रकारे नाट्यमय बनविल्याने व महत्वाचा दर्जा देण्यामुळे आगामी अनेक पिढ्या त्यांचे पठन करत राहतील. मात्र यामुळे नव्या पिढ्यांत ग्रंथप्रामाण्य मानण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टीकोण येण्याऐवजी त्या अधिकाधिक दैववादी होत जातील.
या सगळ्या घटनांच्या नंतर जवळ जवळ चारेक हजार वर्षांनी वैज्ञानिकतेचा पाया रोवला जाईल. आणि मग थोड्याफार वैचारिक संघर्षानंतर विज्ञान हळूहळू जुन्या परंपरा आणि संकल्पनांवर आघात करू लागेल. नवे शोध लागतील, नवी तंत्रे विकसित होतील. थोडक्यात काय तर प्रत्यक्ष स्वयंअनुभूती आणि प्रायोगीकतेवर आधारीत नवयुगाची सुरुवात होईल.
आता समजा या नव्या प्रगतीच्या ओघात त्या भविष्यातील मनुष्यांस आपले आजच्या युगाचे जे शोध लागले आहेत म्हणजे जसे की लॉज ऑफ मोशन, फिशन, रिलेटीविटी, इलेक्ट्रोनिक्स इत्यादि ते न लागता त्यांचेकडून वैश्विक रचनेची आताहुन काही वेगळीच तत्वे शोधली गेली तर काय होईल? म्हणजे समजा इलेक्ट्रोमेग्नेटीझमचा शोध या नव्या प्रगत संस्कृतीस लागलाच
नाही आणि त्यांनी आपली संचार, उर्जादि गरज भागविण्यासाठी दुसऱ्याच
एखाद्या तत्वाचा शोध लावला, तर मग आपली आताची इलेक्ट्रोनिक प्रगती ही
त्यांच्यासाठी एक मिथकच ठरेल. असे झाले तर त्यांस त्या सोमालियातील बचावलेल्या आपल्या काळातील माणसांनी लिहिलेली व परंपरागत श्रेष्ठ दर्जा दिलेली पुस्तके, ग्रंथ हे त्यांच्या संस्कृतीने सत्याचे दस्तऐवज म्हणून पिढ्यान पिढ्या अभ्यासले असले तरीही ते त्यांच्या तेव्हाच्या वैज्ञानिक ज्ञानाने सिद्ध होऊ शकत नसल्याने ते खोटे वाटू लागतील. इलेक्ट्रोमेग्नेटीझम माहीतच न झाल्याने आज आपण वापरत असलेले मोबाईल, उपग्रह, इंटरनेट, कम्प्युटर, एलईडी इत्यादी सर्व साधने काम करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसणार नाही, कारण या किंवा अशा सोयस्कर कामांसाठी त्यांनी विज्ञानाच्या दुसऱ्या नियमांवर आधारित शोधांवरून काही अन्य तंत्रे शोधली असतील. आणि ज्या मूळ इलेक्ट्रोमेग्नेटीझम या तत्वावर आपली आजची सगळी तंत्रप्रणाली बेतलेली आहे तिची कल्पनाच न आल्यामुळे त्यांना आपले आजचे शोध आजिबात खरे वाटणार नाहीत.
अशावेळी पारंपारिक आणि नवविचारांत संघर्ष होणे अटळच. मग नवविचारांचे समर्थक परंपरावाद्यांस म्हणजे कम्प्युटर उपग्रह आदि गोष्टींवर विश्वास ठेवणारांस अनेक प्रकारे मागास आणि निर्बुद्ध सिद्ध करतील. ते सरळ सरळ म्हणतील की तुमच्या या परंपरागत ग्रंथांत लिहिलेल्या गोष्टी या केवळ कल्पनेचे मनोरे आहेत. एक सहज हातात धरता येणारे यंत्र (म्हणजे मोबाईल) ज्याद्वारे जगाच्या कुठल्याही व्यक्तीशी थेट (लाइव) बोलले जाऊ शकते असे अस्तित्वात असणे शक्यच नाही. आणि एक असे यंत्र (टीवी) ज्यात माणसे जगातली कुठलीही घटना घरात बसून पाहू प्रत्यक्ष शकत, ती अस्तित्वात होती असे मानणे म्हणजे तर निर्बुद्धपणाच होय. आणि काय तर म्हणे तेव्हाची माणसे एका यंत्राच्या सहाय्याने (कम्प्युटर) केवळ काही कळा दाबून बसल्या बसल्या मोठमोठी कामे करत. कितीही गोष्टींची माहिती कायमस्वरूपी साठवून ठेऊ शकत, मोठमोठी गणिते केवळ काही सेकंदांत करू शकत, आणि आकाशात सोडलेल्या यंत्रांच्या (उपग्रह) आधारे संपूर्ण पृथ्वीवर नजर ठेऊ शकत असे मानणे ही तर बौद्धिक दिवाळखोरीच होय. तुमची परंपरागत दैवी पुस्तके ही कुठल्याही वैज्ञानिक कसोटीवर खरी ठरू शकत नाहीत. त्या केवळ कवीकल्पना असून, नाट्यमय रीतीने मांडलेल्या या कल्पनांस खरे मानणे हा मूर्खपणा होय. जर तुम्ही ती यंत्रे बनवून वापरून दाखवू शकत नसाल तर त्यांचे अस्तित्व होते असे मानणे हे निव्वळ मागासपणाचे लक्षण होय. हे मोबाईल, कम्प्युटर, विमान, टीवी, उपग्रह इत्यादि कधी अस्तित्वात असणेच शक्य नाही. आणि अर्थातच इलेक्ट्रोमेग्नेटीझमचा शोधच लागलेला नसल्याने परंपरावादी लोक अशी काही साधने अस्तित्वात होती हे सिद्ध करूच शकणार नाहीत. मग ते आपोआप खोटारडे अथवा कनिष्ठ ठरतील.
हेच सद्य स्थितीतही खरे नाही का? शंकराने मारलेल्या हत्तीचे मुंडके गणपतीस जोडणे, येशुने मृत मुलांस जिवंत करणे अथवा स्वत: मृत्युनंतर ३ दिवसांनी जिवंत होऊन परत येणे, कृष्ण, हनुमानाने पर्वत उचलणे, अल्लाहने आपले संदेश पैगंबरास सांगणे, हलाल केलेले पक्षी अल्लाहच्या चमत्काराने जिवंत होऊन उडत उडत परत येणे, संजीवनी विद्या, आकाशवाणी, अमृत, स्वर्ग, पाताळ, नरक, देवदूत, शाप, वरदान, अक्षय्य भाता, वज्र या जुन्या ग्रंथांतील नोंद केलेल्या गोष्टींपैकी एकतरी कल्पना आज विज्ञानाच्या कसोटीस उतरते का? मग हे सगळे नेमके काय? केवळ कपोलकल्पिते की आजच्या विज्ञानाच्या आवाक्याबाहेर असलेले सत्य?