आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे वाचणाऱ्या प्रत्येकाचाच भ्रमनिरास होणार आहे हे मी आधीच सांगून ठेवतो. तुम्ही आर्यन इन्वेजन/मायग्रेशनला खरे मानत असा की खोटे, तुम्ही नाराजच होणार आहात याची गॅरंटी.
१) नेमके इतिहास म्हणजे तरी काय
तर मुद्दा हा आहे की कोण्या राजाच्या वा सत्ताधीशाच्या कथांनी एखाद्या संस्कृतीच्या इतिहासाने आकलन होत नाही, तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या पुराव्यांनीच त्याचे आकलन होते. आपण याबाबतीत नशीबवान आहोत की आपल्या भारतात अशा जुन्या संस्कृतींचे प्रचंड अवशेष सापडले आहेत.
चित्र: दायमाबादमध्ये मिळालेली तांब्याची बैलगाडी
प्रवरेला अमृतवाहिनी म्हंटले जाते त्याची एक प्रचलित काल्पनिक कथा आहे, पण
असे दिसते की प्रवरेच्या तीरावरच उदय झालेली ही महाराष्ट्रात सर्वदूर
पसरलेली जोर्वे संस्कृती जन्माला घालणारी आपली प्रवरा हीच खऱ्या अर्थाने
महाराष्ट्राची जननी आणि म्हणूनच खरीखुरी अमृतवाहीनी आहे. आणि या पुरातन अशा
महान वारशाचे आपण विशेषतः आजही प्रवरेच्या तीरावर राहत असल्याने खरेखुरे
आणि या ज्ञात काळाहूनही प्राचीन असलेल्या परंपरेच्या शृंखलेचे अखंड आणि
अतूट असे पाईक आहोत. पुढे भारताच्या संदर्भात वळू पण या पहील्या भागात तरी
महाराष्ट्राची जननी ही आपली प्रवराच आहे असे म्हणायला मला खूप आनंद होतो
आहे.
..............
२) ना सिंधू ना गंगा: तिसरीच आहे भारताची जननी
आज जगात फक्त एकच मानव स्पेसिस अस्तित्वात आहे, आपण सगळे त्याच स्पेसिसचे मानव म्हणजे होमो सेपियन्स आहोत. मात्र पृथ्वीवर फक्त आपलाच मानववंश अस्तित्वात होता असे नाही. आजपर्यंत जगात वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आपल्या व्यतिरिक्त एकूण किमान आठ मानव प्रजाती अस्तित्वात होत्या याचे पुरावे मिळाले आहेत. इतर मानव प्रजाती आपल्याही कितीतरी आधीपासून अस्तित्वात होत्या. होमो निअंडरथल, होमो इरेक्टस या त्यातील काही महत्वाच्या प्रजाती होत. अंदाजे वीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहीला मानव प्राणी अस्तित्वात आला आणि होमो सेपियन्स म्हणजे आपण 2 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलो.
आफ्रिकेतच पहीला मानव अस्तित्वात आला आणि तिथूनच सगळीकडे पसरला. होमो सेपियन सुद्धा 2 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतच अस्तित्वात आले आणि 1 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतून बाहेर पडून जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोचले. निअंडरथल मानवाने आपल्यापेक्षा जास्त काळ या पृथ्वीवर राज्य केले आहे. होमो सेपियन्स बरोबर एकाच वेळी पृथ्वीवर निअंडरथल देखील अस्तित्वात होते. अगदी अलीकडे म्हणजे 40 हजार वर्षांपूर्वीपर्यंत निअंडरथल अस्तित्वात होते असे पुरावे मिळाले आहेत. होमो सेपियन आणि निअंडरथल यांच्यात इंटरकास्ट (सॉरी इंटरस्पेसिस) मॅरेजही होत होते. कारण आज आपल्या सर्वांत काही न काही प्रमाणात निअंडरथल डीएनए देखील अस्तित्वात आहे.
असो, तर जगात सगळीकडे विलुप्त मानवजातींचे अवशेष भेटत होते, पण भारतात मात्र असे अवशेष मिळत नव्हते. भारतात डायनोसॉरचे सुद्धा अवशेष मिळाले आहेत पण मानवाचे मिळत नव्हते. त्यामुळे 70 हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आलेले होमो सेपियन्स हेच भारतातील पहीले मानव असावेत असे वाटत होते. मात्र 1982 साली भारतीय पुरातत्व खात्याचे एक अधिकारी 'श्री. सोनाकीया' हे मध्यप्रदेशात नर्मदेच्या काठावर सर्व्हे करत असताना त्यांना मातीच्या ढिगाऱ्यावर एक गोल हाड दिसले. ते उकरून पाहीले असता ती एक अर्धी मानवी कवटी आहे असे त्यांच्या लक्षात आले. आधी ती त्यांना अशीच साधी कवटी वाटली, पण लॅबमध्ये व्यवस्थित परीक्षण केल्यावर ती एका प्राचीन मानवी प्रजातीची कवटी आहे हे त्यांना कळले. भारतात सापडलेला प्राचीन मानवी प्रजातीचा हा एकमेव अवशेष होय. ही कवटी अगदी योगायोगानेच सापडली. नाहीतर भारतात प्राचीन मानव प्रजाती होती की नाही हे आपण ठामपणे सांगू शकलो नसतो.
यानंतर अजून एक दोन कॉलर बोन आणि छातीच्या फासळ्या(बरगड्या) देखील सापडल्या, पण ती कवटी हीच त्यात सर्वात महत्वाचा पुरावा आहे.
या कवटीचा अभ्यास केला असता तिचे बहुतांश गुण हे होमो इरेक्टस या प्रजातीशी मिळतेजुळते असल्याने ती होमो इरेक्टसची कवटी आहे असे मानण्यात आले. मात्र अजून काही वैज्ञानिकांनी अभ्यास केल्यावर ही कवटी विशेषतः तिच्यातील मेंदूच्या आकारामुळे ती होमो सेपियन्सची म्हणजे आजच्या मानवाची असावी असा निष्कर्ष काढला. आधी ही कवटी एका पुरुषाची आहे असे मानण्यात येत होते, त्यामुळे त्याला नर्मदा मॅन म्हणण्यात येत होते. मात्र नंतर ती एका स्त्रीची आहे असे लक्षात आल्याने तिला नर्मदा ह्युमन असे आता म्हणण्यात येते.
ज्या स्त्रीची ही कवटी आहे ती साधारण पाच ते सहा लाख वर्षांपूर्वीची आहे असे सोनाकीया यांनी तिच्या वयाचे अनुमान काढले आहे. हा एकमेव फॉसिल असल्याने त्याला कार्बन किंवा इतर डेटिंग टेक्निक साठी द्यायला भारतीय पुरातत्व विभाग तयार नाही, कारण डेटिंग साठी सॅम्पल काढावे लागते जे वाया जाते. मात्र इतर पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे 5 ते 6 लाख वर्षांपूर्वी इतका त्याचा काळ निघतो. म्हणजे पृथ्वीवर होमो सेपियन्स ही प्रजाती अस्तित्वात येण्यापूर्वीच या भारतभूमीवर होमो सेपियन्स आणि होमो इरेक्टस या दोहोंशी साधर्म्य दाखविणारी एक मानव प्रजाती अस्तित्वात होती.
अजूनही काही अभ्यासक या स्त्रीला होमो इरेक्टस तर काही जण होमो सेपियनच मानतात. कारण दोन्हींची काही काही वैशिष्ट्ये तिच्यात आढळली आहेत. आणि यामुळेच काही शास्त्रज्ञ म्हणतात की कदाचित ही मानवाची या दोहोंपेक्षा सर्वस्वी वेगळी अशी एखादी नवीच प्रजाती असू शकते. त्या प्रजातीला "होमो नर्मदेन्सिस" असे नाव द्यावे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र याला दुजोरा देण्यासाठी अजून काही अवशेष सापडणे गरजेचे आहे. एकच कवटी आणि तीही अर्धीच सापडली असल्याने काही ठाम सांगता येत नाही. पण ही एक पूर्णतः वेगळी अशी शुद्ध भारतीय प्रजाती सिद्ध झाली तर मला खूप आनंद होईल.
सिंधू, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा या हिमालयन नद्यांपेक्षाही नर्मदा ही अधिक प्राचीन नदी आहे. जशी मागच्या भागात मी सांगितल्याप्रमाणे प्रवरेच्या तीरावर पहीली महाराष्ट्रीय संस्कृती उदयास आली तसेच भारतातील पहीला मानव हा नर्मदेच्याच तीरावर अस्तित्वात आला असे आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आपण मानतो तसे सिंधू किंवा गंगा नव्हेत तर नर्मदा हीच खरी भारताची जननी आहे.
एक दुर्दैवाची गोष्ट अशी की जिथे पूर्ण भारतात फक्त एकच आणि तीही अर्धी कवटी मिळाली आहे तिथे इतक्या जुन्या सॅम्पलचा डीएनए तर मिळणे शक्यच नाही. त्यामुळे आपणा भारतीयांत या नर्मदा ह्युमनचा किती डीएनए असेल ते आपण सांगू शकत नाही.
काही असो, पण ही जी नर्मदा ह्युमन म्हणून ओळखली जाणारी तब्बल पाच ते सहा लाख वर्षांपूर्वीची स्त्री आहे तीच आपल्या सर्वांची सर्वात पहीली ज्ञात पूर्वज आहे हे नक्की. आणि म्हणूनच या नर्मदा ह्युमनलाच खरी भारतमाता असे म्हणणे हे मलातरी अगदी सर्वस्वी योग्य वाटते.
3) भटके
आपण सारे मूलतः भटके आहोत, आणि सगळेच आफ्रिकेतून बाहेर पडलो
आहोत. डार्विनने सगळ्यात आधी ही आउट ऑफ आफ्रीका थिअरी मांडली आणि त्यांनतर
वेळोवेळी वेगवेगळ्या अभ्यासांनी ती कन्फर्म केली. आपल्या तमाम मानव
प्रजातींचे सर्वात जुने अवशेष आफ्रिकेत सापडतात आणि मग ते त्यानंतरच्या
कालावधीत एशिया युरोप असे पसरत गेले असे आढळते. मानव ही प्रजाती पृथ्वीवर
जवळजवळ १८ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत अस्तित्वात आली, तेव्हापासून मानव
भटकतच आहेत. मानवांतील होमो सेपियन्स म्हणजे आपली प्रजाती ही २ लाख
वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आणि १ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतून बाहेर
निघाली.
असे म्हणतात की ७४ हजार वर्षांपूर्वी इंडोनेशियातील टोबा इथे एक
मोठा ज्वालामुखी फुटला आणि त्यातून १५ दिवस उत्सर्जन होत राहीले. त्यामुळे
पृथ्वीवर आईसएज आले आणि जवळजवळ सगळेच मानव नष्ट झाले. याला ग्लोबल
पॉप्युलेशनची 'बॉटलनेक' असे म्हणतात. ते यासाठी की या घटनेतून फक्त मोजके
तीन ते दहा हजार होमो सेपियन्सच जिवंत राहिले. आज जे मानव अस्तित्वात आहेत
ते सगळे या टोबा ज्वालामुखीच्या प्रभावातून वाचलेल्या त्या फक्त अंदाजित ३
ते १० हजार मानवांचे वंशज आहेत. याच वाचलेल्या मानवांपैकी काही जण ७० हजार
वर्षांपूर्वी पुन्हा एकदा आफ्रिकेतून बाहेर पडले आणि जगभरात पसरले.
या
दुसऱ्या लॉटच्या 'आउट ऑफ आफ्रिका' होमो सेपियन्सचा एक गृप भारतात आला,
भारतात ते बहुतेक समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने आले असावेत. भारतातही ते
समुद्र किनाऱ्यावरूनच पसरत गेले. ते पश्चिम किनाऱ्यावरून भारताच्या
दक्षिणेपर्यंत गेले आणि दक्षिणेकडून पूर्व किनाऱ्याने परत बांगलादेश, आसाम,
अरुणाचल करत अंदमान आणि इंडोनेशियात गेले. हेच लोक पुढे ऑस्ट्रेलियामधेही
पोचले. मायटोकाँड्रिएल डीएनए म्हणजे मातेकडून ट्रान्फर होणार डीएनए तपासला
असता असे कळले की आजच्या जगातील सर्व लोकांची एकमेव माता जिला
'मायटोकाँड्रियन ईव्ह' (बायबल मधली ईव्ह हा संदर्भ) असे म्हणतात, ती
आफ्रिकेत राहत होती. तीच आपल्या सर्वांची माता आहे. कारण जगातील आजच्या
सर्व मानवांचा डीएनए हा मागे मागे वंशावळ काढत गेले असता याच एका आफ्रिकन
स्त्रीशी कनेक्ट होतो. या जगन्मातेचा L३ हा हेप्लोग्रुप होता. या
हेप्लोग्रुप पासूनच साधारण ६०-७० हजार वर्षांपूर्वी M आणि N हे हेप्लोग्रुप
बनले जे भारतीय भूमीवर अस्तित्वात आले. मायटोकाँड्रिएल डीएनएच्या
अभ्यासावरून कळले की जगातले आजचे सगळे मानव हे भारतातील या M आणि N
हेप्लोगृपचेच वंशज आहेत. भारतातून एक शाखा ६० हजार वर्षांपूर्वी
इंडोनेशियामध्ये आणि तिथून ४५ हजार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात गेली, तर एक
शाखा चीन मधून रशिया व तिथून जपान मध्ये गेली. हेच रशियातील लोक पुढे ३०
हजार वर्षांपूर्वी नॉर्थ अमेरिकेत आणि मग तिथून साऊथ अमेरिकेत गेले.
भारतातून व इजिप्त मधून एक शाखा ४० हजार वर्षांपूर्वी युरोप मध्ये सुद्धा
गेली. म्हणजे असे की आपले सर्वांचे मूळ आफ्रिकेत असले तरीही सगळ्या
मानवांचे डिस्ट्रिब्युशन मात्र भारतातूनच जगभर झाले आहे. आफ्रिकेतील L ३
भारतात येऊन M आणि N हेप्लोग्रुप बनले आणि याच M आणि N पासून पुढे चीन,
इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका येथे
गेलेले मानव बनले. इतकेच नाही तर युरोपातही याच हेप्लोग्रुप मधून इव्हॉल्व
झालेले मानव पोचले. मूळ अमेरिकन आदिवासींना तिथे इंडियन असे म्हणतात.
अर्थात हा फक्त योगायोग आहे पण खरेच ते मूळ अमेरिकन आदिवासी हे एकेकाळी
भारतात राहणाऱ्या लोकांचेच वंशज म्हणजे खरेच मूलतः इंडियन आहेत, मात्र
त्यापूर्वी त्यांचा अनेक इतर फुटलेल्या शाखांशी संबंध आल्याने त्यांचा
डीएनए हा अंदमानी डीएनए हुन वेगळा आहे.
साधारण ६० ते ७० हजार वर्षांपूर्वी मानव आफ्रिकेतून पूर्वेकडे भारतात आले, मात्र आफ्रिकेपासून अगदी जवळ असलेल्या युरोपात मात्र गेले नाहीत. कारण तेव्हा युरोपात निअँडरथल मानव राहत होते, त्यांनी होमो सेपियन्सला युरोपात येऊ दिले नाही. मात्र ४५ हजार वर्षांपूर्वी भारत/चीन/इजिप्त मधून होमो सेपियन मानव युरोपात गेले आणि काही वर्षे निअँडरथल बरोबर तिथे राहिले. मग साधारण ४० हजार वर्षांपूर्वी निअँडरथल तिथे विलुप्त झाले आणि संपूर्ण युरोपवरही होमो सेपियन्सचे राज्य पसरले.
चित्र: होमो सेपियन्सचा आऊट ऑफ आफ्रीका प्रवास (निळ्या रेघेने दाखवलेले सिंगल डिस्पर्शन मॉडेल योग्य ठरते)
नवनव्या प्रदेशांच्या शोधात सारखे भटकत राहील्याने मानव वेळोवेळी वेगळ्या झालेल्या इतर ग्रुप्सच्या संपर्कात येत राहिले. त्यांच्यात इंटर ब्रीडिंग होत राहिले. त्यामुळे आधुनिक मानवांत या सगळ्या वेगवेगळ्या ग्रुप्सचे डीएनए ट्रेसेस मिळतात. पण अंदमानात गेलेले हे लोक बाह्य जगापासून पूर्णतः अलिप्त राहिल्याने त्यांचा डीएनए हा त्याच भारतात ६० हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या होमो सेपियन्सचा आहे असे आपण म्हणू शकतो. त्याला आपण अंदमानी डीएनए म्हणू. अंदमानी डीएनएवाले लोकच भारतात सगळ्यात प्रथम आलेले होमो सेपियन्स (म्हणजे आजचे मानव) होत. म्हणजे हेच लोक भारताच्या आजच्या पॉप्युलेशन पैकी भारताचे मूळ निवासी होत. मी 'आजच्या पॉप्युलेशन पैकी' असे म्हंटले कारण मानवाच्या नर्मदा ह्युमन सारख्या इतर स्पेसिस लाखो वर्षांपूर्वी भारतात अस्तित्वात होत्याच. होमो सेपियन्सपैकी मात्र अंदमानी डीएनए वाले लोक हेच भारताचे प्रथम रहिवासी होत. ते भारतात आले तेव्हा पृथ्वीवरच्या इतर मानव प्रजाती नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे एकदा भारतात आल्यानंतर जवळजवळ ५०-६० हजार वर्षे हे लोक भारतीय भूमीवर एकटेच राहीले. हेच अंदमानी हंटर गॅदरर म्हणून ओळखले जाणारे लोक आपल्या सर्वांचे प्रथम भारतीय पूर्वज होत.
..........
४) डीएनए
आऊट ऑफ आफ्रीका लॉट २ नंतर पृथ्वीवर फक्त होमो सेपियन्स उरल्याने त्यांना सगळी पृथ्वी बिनविरोध ताब्यात मिळाली. त्यामुळे वाट फुटेल तिकडे आपण बिनधास्त भटकत राहिलो. या दरम्यान आधी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले लोक कुठेतरी फिरून पुन्हा भेटले. त्यांच्यात इंटरब्रीडिंग झाले. हेही लोक अजून पूर्वी वेगळ्या झालेल्या लोकांना परत भेटले. कधी ते एकमेकांना ठार मारत तर कधी एकमेकांशी मिसळून जात. ही प्रक्रिया विविध प्रदेशांतर्गत अविरत चालू होती आणि आताच्या जमान्यात तर ती अगदी ग्लोबल झाली आहे. तेव्हा आफ्रिकेतून अमेरिकेत पोचायला मानवांना तब्बल ४० ते ५० हजार वर्षे लागली तेच आता आपण फक्त काही तासांत पोचू शकतो. त्यामुळे आता आपले मिक्सिंग हे जास्त वेगाने होत आहे.
सगळे लोक मिक्स होत राहीले हे खरे असले तरी हळूहळू आपली भटक्यांपासून सेटल होण्याची प्रक्रिया चालू झाली. तेव्हा मात्र प्रदेशानुसार लोक एकाच ठिकाणी सेटल होऊ लागले. त्यामुळे या वेगवेगळ्या ठिकाणी सेटल झालेल्या लोकांचे काही समान गुण असलेले वैशिष्ट्यपूर्ण असे वंश तयार झाले. मात्र तरीही शेतीचा शोध लागेपर्यंत लोकांचे ग्रुप्स काही प्रमाणात नवनव्या प्रदेशान्त जाताच राहीले व तिथे आधीच असलेल्या लोकांशी हिंसक वा प्रेमाचे संबंध बनवतच राहिले. तरीही साधारण शेतीच्या थोडे आधी म्हणजे १५ ते २० हजार वर्षांपूर्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशांत बहुतांशी सेटल झालेल्या वेगवेगळ्या लोकांना आपण आज वेगवेगळे वंश म्हणून ओळखू शकतो. आणि आजच्या जगातील सगळे लोक हे या २० ते ६० हजार वर्षांपूर्वीच्या वेगवेगळ्या दाखविल्या जाऊ शकणाऱ्या वंशांच्या डीएनएचेच वंशज आहेत असेही आपण म्हणू शकतो.
आता माझा डीएनए हा एखाद्या रशियन माणसाच्या डीएनएहुन वेगळा आहे असे मी आज म्हणतो तेव्हा तो नेमका किती वेगळा असतो?तसे बघितले तर माणूस आणि चिंपांझी यांचा डीएनए हा ९८.८ टक्के म्हणजे जवळजवळ ९९% समानच आहे. मग जर चिंपांझीशी आपले ९९% साम्य आहे तर माणसा माणसांत किती साम्य असेल?तर असे आहे की जगातील कोणत्याही २ माणसांचा डीएनए हा ९९.९ टक्के समानच असतो. मग जर इतकी समानता आहे तर माणसाच्या आजच्या डीएनएवरून त्याच्या पूर्वजांची किंवा पूर्वजांच्या डीएनएची माहिती कशी मिळते?
आपल्या डीएनएमध्ये चार प्रकारचे बेसेस (म्हणजे केमिकल मॉलिक्यूल)असतात. हे बेस नेहमी दोन दोनच्या जोडीने असतात. या जोडीला बेस पेअर म्हणतात. आपल्या डीएनएमध्ये असे तब्बल ३०० कोटी बेस पेअर्स असतात. हे बेस पेअर्स वेगवेगळ्या क्रमाने दोन बटांच्या वेणीच्या आकारात (हेलिक्स) आपल्या डीएनएमध्ये बसवले गेलेले असतात. अशा वेगवेगळ्या क्रमाने डीएनएच्या वेणीत असलेल्या सलग अशा सात ते आठ (किंवा जास्तही) बेस पेअर्सच्या गटाला एक जीन असे म्हणतात. प्रत्येक जीनचे वेगवेगळे कार्य असते. काही जीन तुमच्या त्वचेचा रंग ठरवतात, काही तुमच्या नाकाचा आकार ठरवतात, काही तुमची उंची ठरवतात वगैरे. मानवी डीएनएत असे एकूण २० हजार ते २५ हजार जीन्स असतात. आणि गंमत म्हणजे आपल्या पूर्ण डीएनएपैकी फक्त १ टक्के भागच फंक्शनल असतो. म्हणजे फक्त एक टक्के भागातील डीएनएनेच आपल्या शरीराचे नियंत्रण होते. आपल्या बाकी ९९% डीएनएचे अजूनतरी कोणतेही कार्य सापडले नाहीय. जो १% फंक्शनल भाग आहे त्यात जर काही बदल (म्युटेशन) झाला तर त्याचा माणसावर सहसा वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ कोणी नपुंसक होऊ शकते वा त्यांना एखादा कँसर होऊ शकतो. त्यामुळे हे बदल शरीराद्वारे रिपेअर केले जातात किंवा अशी माणसे मरतात आणि पुढच्या पिढ्यांत तो बदल किंवा म्युटेशन जात नाही. अगदी कमी प्रमाणात या फंक्शनल डीएनएतील म्युटेशन्स पुढच्या पिढ्यांत जातात आणि त्यामुळेच इव्होल्यूशन होते. डीएनएचा जो ९९ टक्के भाग फंक्शनल नाही त्यात जे बदल होतात त्यामुळे आपल्या शरीरावर काही परिणाम होत नसल्याने ते बदल रिपेअर केले जात नाहीत आणि जसेच्या तसे पुढच्या पिढ्यांत ट्रान्स्फर होतात. या नॉन फंक्शनल पार्टमध्ये सगळ्या पूर्वीच्या पिढ्यांतील सगळे बदल हे त्यामुळे जसेच्या तसे स्टोअर राहतात. ते तसे पिढ्यानपिढ्या स्टोअर राहतात म्हणूनच मग आपल्याला पूर्वजांच्या डीएनएचे स्वरूप कळण्यास मदत होते.
तर आउट ऑफ आफ्रिका लॉट २ च्या माणसांचे खूप वेगवेगळे गट बनले हे आपण पाहिले. याच गटांचे अस्तित्व एखाद्या प्रदेशात अनेक वर्षे राहीले की त्या प्रदेशातील लोकांचा स्वतःचा असा एक वेगळा वंश म्हणजेच डीएनए पॅटर्न तयार होतो. किंबहुना खरेतर त्या प्रदेशातील लोकांत जगातील इतर प्रदेशांतील लोकांहून वेगळा असा एक स्पेशल डीएनएचा पार्ट तयार होतो. उदा. चीन या प्रदेशात डोळे बारीक असण्याचा गुणधर्म हा त्याच्या स्पेसिफिक प्रादेशिक डीएनए रचनेमुळे येतो. असे प्रदेशानुसार आणि एका प्रदेशातही वेगवेगळ्या काळानुसार आपण अनेक वेगवेगळे डीएनए गट ओळखू शकतो. उदा. इराण मध्ये १२००० वर्षांपूर्वी राहत असलेल्या लोकांचा डीएनए हा तिथे ५००० वर्षांपूर्वी आलेल्या लोकांच्या डीएनएहुन वेगळा होता. लक्षात घ्या की डीएनए वेगळा होता म्हणजे डीएनएचा अगदी एक छोटासा पार्ट वेगळा असतो. बाकी सगळ्या माणसांचा ९९.९ टक्के डीएनए हा समानच आहे. तसे अगदी प्रत्येक गावातील लोकांचा वेगळा डीएनए मोजला जाऊ शकतो, पण सोपे करण्यासाठी एखाद्या खूप मोठ्या प्रदेशातील डीएनएला आपण तिथला मुख्य डीएनए म्हणून मानतो. अशा पूर्वीच्या जगभरातील ठराविक २०-२५ प्रादेशिक डीएनएच्या गटांच्या वैशिष्ट्यपूर्ण डीएनएचा पार्ट लक्षात आला की मग आपण आजच्या लोकांत त्यातील कोणत्या डीएनएचा किती अंश आला आहे ते सांगू शकतो. हे खूप किचकट आहे आणि मोठ्या क्षमतेचे कम्प्युटर्स त्याचे कॅल्क्युलेशन करायला वापरावे लागतात.
तर जगभरातील विविध प्रदेशांतील आजच्या तसेच उत्खननात सापडलेल्या पुरातन मानवांचे डीएनए तपासले असता त्यांत जे काही एखाद्या प्रदेशात कॉमन मात्र इतर प्रदेशांहून वेगळे असे डीएनएचे पार्ट मिळाले त्या पार्ट्सला त्या प्रदेशाचा किंवा वंशाचा डीएनए म्हणून ओळखण्यात येते. आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली आहे की एखाद्या वांशिकदृष्ट्या खूप मिक्स झालेल्या समाजातही पूर्वीच्या कोणत्या प्रांतातील कोणत्या वंशाचा किती टक्के डीएनए अस्तित्वात आहे हेही आपण सांगू शकतो. इतकेच नाही तर हे डीएनएचे मिक्सिंग त्या समाजात साधारण किती पिढ्यांआधी झाले असेल तेही आपल्याला आता कॅल्क्युलेट करता येते.
आपल्या भारतीय लोकांच्या डीएनएमध्ये मुख्यत्वे ६० हजार वर्षांपूर्वीचा अंदमानी, १२००० वर्षांच्या आधीचा एनाटोलीयन, आणि साडे तीन हजार वर्षांपूर्वीचा स्टेपी या तीन मुख्य डीएनएंचे मिक्श्चर सापडते. हे झाले आजच्या भारतीयांचे. पण आपल्या सिंधू संस्कृतीच्या लोकांचा डीएनए कसा होता?
इंडस व्हॅली सिविलायजेशन (IVC) किंवा सिंधू संस्कृतीचे अनेक पुरातत्वीय अवशेष मिळाले असले तरीही भारतीय उपखंडातल्या अत्यंत तीव्र हवामानामुळे या संस्कृतीतील लोकांचे डीएनए मिळतच नव्हते. आपल्या येथील एक्स्ट्रीम हवामानाने इथल्या सांगाड्यांतील डीएनए नष्ट करून टाकले आहेत. राखीगडीचा डीएनए मिळण्यापूर्वी आजच्या तुर्कमेनिस्तान आणि इराण येथे जे हजारो पुरातन (साधारण ६००० वर्षांपूर्वीचे) सांगाडे मिळाले त्यांत एकूण 11 सांगाड्यांत आऊटलीयर म्हणजेच परके किंवा पाहुणे डीएनए मिळाले होते. त्या आऊटलियर डीएनएलाच सिंधू संस्कृतीच्या लोकांचा डीएनए मानण्यात येते होते. याला दोन कारणे होती. हे सांगाडे ज्या कबरींत सापडले त्या तिथल्या इतर बहुसंख्य लोकांच्या सामान्य कबरींहून वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या प्रकारच्या होत्या आणि या ११ कबरींत सिंधू संस्कृतीच्या वस्तूही होत्या, ज्या इतर बहुसंख्य कबरींत मात्र नव्हत्या. सिंधू संस्कृतीचा मेसोपोटेमिया वगैरे अनेक जुन्या संस्कृतींशी व्यापार होत होता, त्यामुळे हे ११ लोक तिथे तात्पुरते व्यापारासाठी आलेले लोक असणार हे स्पष्ट होते. आणि त्यांच्या डीएनएमध्ये अंदमानी डीएनए देखील आढळल्याने हे लोक सिंधू संस्कृतीचेच लोक असणार हे सिद्ध होत होते. तिथल्या इतर बहुसंख्य लोकांच्या सांगाड्यांच्या डीएनएमध्ये मात्र हा अंदमानी डीएनए अजिबात सापडला नाही. त्यामुळे या दोन देशांतील त्या ११ लोकांत मिळालेला हा अपवादात्मक डीएनए हाच सिंधू संस्कृतीच्या लोकांचा डीएनए असणार असे मानण्यात येत होते. पण ते खरे होते का?की ते कोणी वेगळेच लोक होते?राखीगडीच्या डीएनएने हे रहस्य सोडवले. कसे ते पुढच्या काही भागांत पाहू.
..............
५) आर्य या संज्ञेचे बदलते स्वरूप
आज आर्य हा शब्द प्रामुख्याने वांशिक ओळख या अर्थाने वापरला जातो. आर्यन ब्लड, आर्यवंश असे शब्द आपण अनेकदा ऐकतो. पण पूर्वी असे नव्हते. खरेतर असे आहे की कोणत्याही संस्कृतीत विशिष्ट शब्दांनी निर्दिष्टित केलेल्या संज्ञांचे अर्थ हे काळानुरूप बदलत जातात. अगदी अनेक कृतींचेही अर्थ काळानुरूप बदलत जातात.
आर्य हा शब्द भारतात पूर्वी कधीही वंश या अर्थाने वापरला गेला नाही. पूर्वी आर्य हा शब्द 'आदरणीय/महत्वाचा' या अर्थाने वापरला जात होता. त्यामुळे एक वेदाभ्यासी ब्राम्हण हा सुद्धा आर्य होता आणि वैदीक धर्माचा विरोध करणारा एक बौद्ध भिक्खू हाही आर्य होता. बऱ्याच बौद्ध साहित्यात याच अर्थाने आर्य हा शब्द आढळतो.
नंतर हा शब्द आर्यन भाषा बोलणारे अशा अर्थाने वापरला जाऊ लागला. काही इराणी (झोरॅष्ट्रियन) आणि भारतीय असे दोन्ही पौराणिक साहित्यातील लोक स्वतःला आर्य म्हणजेच त्यांची विशिष्ट भाषा बोलणारे असे म्हणून घेतात. दोन्ही ठिकाणी ही ओळख विशिष्ट (आर्यन) भाषा बोलणारे याच अर्थाने येते. साधारण ५१९ ख्रिस्त पूर्व काळातला पर्शियन राजा डायरियस याने त्याच्या शिलालेखांमध्ये लिहून ठेवले आहे की मी जगातील पहिला भाषा लिखित स्वरूपात नोंदवू शकणारा आर्य आहे. भाषा बोलणारा तो आर्य असा अर्थ होता पण भाषेला मात्र अद्याप आर्यन भाषा ही ओळख नव्हती. आताच्या काळात भाषांसाठी आर्यन लैंग्वेज हा शब्द वापरला जात असला तरी पूर्वी आर्यन हा शब्द भाषेसाठी किंवा वंशासाठी सुद्धा वापरला जात नव्हता. भाषेच्या अनुषंगाने वेदांपैकी फक्त एका ठिकाणी म्हणजे कौशिकी आरण्यक या ब्राह्मणामध्ये आर्यवाक नावाचा शब्द वापरण्यात आला आहे, आणि त्याचा अर्थ म्हणजे असा भूभाग जिथे वैदिक संस्कृत बोलली जाते या अर्थाने तो आला आहे.
ऋग्वेदातील वर्णनांवरून लक्षात येते की वेदिक लोक (आर्य) हे भटके पशुपालक होते आणि ते एका ठिकाणी स्थायिक होत नव्हते. आर्यावर्त म्हणजे आर्यांचा फिरण्याचा प्रदेश होय. किंवा असा प्रदेश जिथे आर्यांची जनावरे चरू शकतात. याचाच अर्थ असा की आर्यांच्या मालकीचा तो प्रदेश ज्यात आर्यांची जनावरे विनासायास चरू शकतात तो म्हणजे आर्यावर्त. इतर लोकांच्या मालकीच्या प्रदेशात हे आर्य जात नसत. जेमिनीय ब्राह्मणामध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की आर्यांनी कोणत्याही स्थानिक दस्युंच्या गावात वास्तव्य करू नये. आपल्याला आश्चर्य वाटेल पण इराण हे नाव सुद्धा आर्य या शब्दावरूनच आले आहे. आर्यचे आर्यनम झाले, आर्यनम म्हणजेच आर्य भाषा बोलणारांचा देश आणि आर्यनमचेच पुढे आर्यन आणि त्याचेच इराण असे झाले.
कालानुरूप भाषांत बदल होत जातो. त्यामुळे भाषा एकाच असली तरी ती कोणत्या काळातली आहे ते आपण सांगू शकतो. उदा. साधारण १९५०च्या आधीच्या पुस्तकांत मी अनेकदा people is असा शब्दप्रयोग वाचला आहे, आज मात्र आपण people are असा अनेकवचनी प्रत्यय वापरतो. असेच भाषाशास्त्रीय दृष्ट्या अभ्यासले असता ऋग्वेदाची संस्कृत भाषा ही ३३०० वर्षांपूर्वीची ठरते. आणि विशेष म्हणजे अवेस्ता या झोरॅष्ट्रियन धर्मग्रंथाची रचनाही याच काळात झाली असल्याचे सिद्ध होते. अवेस्ता आणि ऋग्वेद या दोहोंत देव, नावे आणि अनेक शब्द हे अगदी समान आहेत. याच भाषांच्या गटाला इंडोयुरोपियन भाषा असे म्हंटले जाते. संस्कृत भाषा भारतात आली खरी पण त्यापूर्वी इथे सिंधू संस्कृतीची भाषा होती. ही भाषा द्राविडीयन कुळाची असणार असे साधारण मानण्यात येते. आर्य हे मुख्यत्वे भटके पशुपालक असल्याने संस्कृत भाषेत शेतीविषयीचे किंवा शेतीच्या अवजारांचे शब्द नाहीत. ते शब्द संस्कृतने इथल्या जुन्या भाषांतून जसेच्या तसे उचलले या शब्दांना उसने म्हणजे लोन वर्ड्स असे म्हणतात. आज आपण पोत्याने इंग्रजी वर्ड्स वापरतो ते सगळे मराठीसाठी लोन वर्डच होत. प्रत्येक भाषेत असे लोन वर्ड येतात. शेतीच्या अवजारांसाठी संस्कृतने हे शब्द घेतले म्हणजेच आर्य लोक हे भारतात आल्यानंतरच शेती करू लागले हे सिद्ध होते. आता एखादा शब्द लोन वर्ड आहे की नाही हे कसे कळते? तर प्रत्येक भाषेचे शब्द तयार करण्याचे एक तंत्र असते त्याहून वेगळा शब्द असला की तो लोन वर्ड होय. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये (म्हणजेच सगळ्या इंडोयुरोपियन भाषांमध्ये) जेव्हा दोन शब्द एकत्र जोडून नवा शब्द बनतो तेव्हा पहिल्या शब्दाचा अंत आणि दुसऱ्याची सुरुवात हे एकमेकांत मिक्स होऊन नवा शब्द बनतो. जसे की सूर्योदय. यात सूर्य आणि उदय हे दोन शब्द एकत्र झाले असता दोन्हींचे मूळ स्वरूप त्या नव्या शब्दात बदलते. त्याउलट द्राविडीयन भाषांत मात्र ते स्वरूप पूर्वी होते तसेच राहते. उदा. लाकूडतोड्या या शब्दात लाकूड आणि तोड्या हे शब्द जसेच्या तसेच राहीले आहेत. म्हणजे मराठीतही लाकूडतोड्या हा शब्द द्राविडीयन प्रभावाचा म्हणजेच लोन वर्ड आहे असे आपण म्हणू शकतो.
साधारण १५ व्या शतकात युरोपियन ट्रॅव्हलर्स भारतात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये बरेच साम्य आहे. मग त्यानंतर इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी भाषांचा अभ्यास चालू केला असता लक्षात आले की संस्कृत आणि युरोपियन लँग्वेजेस मध्ये खूपच साधर्म्य आहे. मग त्यांनी भाषाशास्त्रीय दृष्ट्या संस्कृत आणि युरोपियन भाषांचा अभ्यास केला असता लक्षात आले की संस्कृत आणि युरोपियन भाषा यांची मिळून पूर्वी कोणतीतरी एक मूळ भाषा असायला हवी. त्यानंतर साधारण एकोणिसाव्या शतकामध्ये ही भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी इंडोआर्यन किंवा इंडोयुरोपियन भाषा असा शब्दप्रयोग करण्यात आला. कारण भारताचा ऋग्वेद आणि इराणचा अवेस्ता नावाचा ग्रंथ या दोन्हींमध्ये या भाषेला आर्यभाषा असेच म्हणण्यात आले होते. मग इंडोयुरोपियन लैंग्वेज बोलणारे ते आर्य असा अर्थप्रयोग साधारण १८५० च्या आसपास जगभर प्रचलित झाला. त्यानंतरच पुढे कधीतरी ही भाषेची ओळख बदलून आर्यन ही एक वांशिक ओळख सुद्धा झाली. हिटलरने या वांशिक ओळखीवर अगदी प्रभावशाली अशी छाप सोडली. आणि गंमत म्हणजे अगदी अलीकडे म्हणजे एकोणिसाव्या शतकात पहील्यांदा प्रचलित झालेली ही आर्य नावाची ओळख आपण आज वांशिक समजतो. पण खरे हे आहे की मूळ आदरणीय या अर्थापासून पुढे आर्य या शब्दाचा एक विशिष्ट भाषा बोलणारे लोक असा अर्थ झाला. एक भाषा बोलणारे लोक एकाच वंशाचे असतात असे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्लंडात सगळेच इंग्लिश बोलतात, पण सगळे एकाच वंशाचे नाहीत. वेदिक काळात संस्कृत बोलणारे सर्वजण एकाच वंशाचे होते का? तर त्याचे उत्तर 'नाही' असेच आहे. कालानुरूप आर्य म्हणजे एक विशिष्ट भाषा बोलणारे याचेही स्वरूप बदलून पुढे भाषेलाच आर्यन भाषा अशी ओळख मिळाली आणि त्यांनतर काही वर्षांनी ती एक वांशिक ओळख बनली. असा आर्य या संज्ञेच्या अर्थाचा काळानुरूप अनर्थ होत गेला आहे.
.........
६) हडप्पा आणि आर्य
आपण बघितले की आर्य या शब्दाने संबोधित होणाऱ्या संज्ञेचा अर्थ कालानुरूप बदलत गेला आहे आणि आर्य या शब्दाला वांशिक ओळख मिळून अजून २०० वर्षेही झाली नाहीत. मग अशावेळी प्रश्न येतो की ज्यांना आज आपण आर्य असे मानतो, ते एका विशिष्ट वंशाचे लोक नाहीत काय? तर उत्तर आहे की युरोपात आणि भारतात मिळून ज्याला 'आर्य' म्हणता येऊ शकेल असा पूर्वी एक विशिष्ट वंश होता. या वंशाचे स्थान हे कॅस्पियन समुद्र आणि ब्लॅक समुद्राच्या मध्ये उत्तरेला होते. हे 'स्टेपी पॅस्ट्रोलिस्ट' किंवा 'यामन्या' वंशाचे जे लोक होते त्यांनाच आज जगभरात आर्य या नावाने ओळखले जाते. (स्टेपी म्हणजे गवतांची मोठमोठी कुरणे असलेला प्रदेश, आणि पॅस्ट्रोलिस्ट म्हणजे जनावरे पाळणारे). इथून हे लोक पसरले असले तरी त्यांचे नेमके उद्गमस्थान कोणते हे मात्र अजून निश्चित नाही. हे लोक इथूनच पश्चिमेला संपूर्ण युरोपात गेले आणि पूर्वेला भारतातही आले. पश्चिमेला युरोपात गेलेल्यांनी तिथे कत्ले आम करून टाकले. मात्र भारतात आलेल्या गटाने असे केले नाही. कारण भारतात ते हळूहळू येत राहिले. युरोपात त्यांनी इन्व्हेजन (म्हणजे हल्ला करून प्रदेश ताब्यात घेणे) केले, तर भारतात मात्र त्यांनी मायग्रेशन (स्थलांतर) केले असे म्हणता येईल. याच लोकांनी संस्कृत भाषा आणि वैदिक धर्म भारतात आणला असे मानण्यात येते. मात्र या स्टेपी/यामन्या (सध्या त्यांना आपण आर्य म्हणू) लोकांच्या आगमनापूर्वीच भारतात हडप्पा संस्कृती तिच्या पूर्ण वैभवाला पोचलेली होती. हडप्पा संस्कृतीच्या दफनभूमीमध्ये किंवा उत्खननात इतर जे अवशेष सापडले त्यांच्यामध्ये वेदिक आणि हडप्पा (सिंधू) संस्कृती यांचा संगम झाल्याचे पुरावे मिळत नाहीत. ते पूर्णतः प्युअरली हडप्पन संस्कृतीचेच पुरावे आहेत. म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळात या दोन्ही संस्कृतींचा संकर झाला नव्हता असे दर्शवणारेच सगळे पुरावे आहेत.
हडप्पा संस्कृतीचेही तीन टप्पे आहेत. अर्ली हडप्पन म्हणजे सुरुवातीच्या काळातली हडप्पा संस्कृती. ही ५३०० ते ४६०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. त्यानंतर येतो मॅच्युअर हडप्पन काळ म्हणजे ४६०० ते ३९०० वर्षांपूर्वीचा काळ व शेवटी येतो लेट हडप्पन म्हणजे ३९०० ते ३३०० वर्षांपूर्वीचा काळ. लेट हडप्पन काळात हडप्पा संस्कृतीचे लोक सिंधू नदीपासून अधिक पूर्वेकडे म्हणजे आजच्या भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा प्रदेशांकडे वास्तव्यास जायला लागले. आर्यांचे (यामन्या/स्टेपी) भारतात आगमन हे ही याच काळात म्हणजे ३ ते ४ हजार वर्षांपूर्वी सुरु झाले. म्हणजे आर्य लोकांनी सिंधू संस्कृतीचा उत्कर्षकाळ तर पाहीला नाहीच, त्यांनी हडप्पा मोहेंजोदडो ही शहरेही पाहीली नाहीत. नेमका हडप्पा संस्कृतीचा विनाश कसा झाला ते आज आपण सांगू शकत नाही. हडप्पा संस्कृतीच्या शहरांत कुठेही युद्धाची हत्यारे सापडली नाहीत. म्हणजे हे लोक युद्धच करत नव्हते का? एवढेच नाही तर युद्ध झाल्याचेही पुरावे या संस्कृतींत सापडत नाहीत. युद्धात होते तसे या शहरांत कुठेही अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले हाडांचे सांगाडे सापडत नाहीत. प्रॉपर दफनभूमींतच सांगाडे सापडतात. युद्ध झाले असते तर फक्त दफनभूमींत प्रॉपर सगळ्या रितीरिवाजानुसार दफन केलेले सांगाडे सापडले नसते. कदाचित दुष्काळामुळे किंवा इतर देशांशी तेव्हा होत असलेला व्यापार काही कारणांमुळे संपल्यामुळे आर्थिक संकटापायी ही संस्कृती नष्ट झाली असावी असे समजण्यात येते. फक्त एकट्या मोहेंजोदडो शहरात थोडेफार सांगाडे मुख्य रस्त्यांत सापडले आहेत. मात्र त्यांचेवर कोणतेही हत्याराने वार झाल्याचे निशाण नाहीत. म्हणजे कदाचित ते एखाद्या अतिशय प्राणघातक अशा संसर्गजन्य रोगाचे शिकार होऊन नष्ट झाले असतील अशीही शंका घेण्यास वाव आहे. काहीही असो, या लोकांनी आपली शहरे सोडून पूर्वेकडे स्थलांतर केले हे निश्चित. कारण आता आपल्याला भारतात पूर्वेकडे उत्खननात हडप्पाच्या लेट हडप्पन आणि त्यापुढील काळातील अवशेष सापडतात.
मॅच्युअर हडप्पा संस्कृती आणि आर्य यांचा एकमेकांशी काहीही संबंध आला नाही असे पुरातत्वीय पुराव्यांवरून कळते. याचे एक उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडयांचे अवशेष मिळत नाहीत. किंवा घोड्याचे चित्र असलेले अवशेषही मिळत नाहीत. घोडा हा प्राणी आर्यांनीच भारतात आणला आहे. आर्यांच्या येण्यापूर्वी भारताच्या उत्तर भागात घोडा फॅमिलीची (इक्विडी फॅमिली) एक घोडासदृश प्राण्याची प्रजाती अस्तित्वात होती, तिचे नाव इक्कस नेमेडिकस असे आहे. ती प्रजाती १० हजार वर्षांपूर्वी विलुप्त झाली, आणि बहुदा तिला कधीही पाळीव बनवले गेले नाही. आफ्रिकेतील झेब्रा हाही घोड्याच्याच फॅमिलीतला प्राणी आहे आणि झेब्र्यालाही आपण कधी पाळीव बनवू शकलेलो नाही. गाढव देखील याच फॅमिलीतला प्राणी आहे. अगदी एखाद दोन ठिकाणी सिंधू संस्कृतीत घोडा फॅमिलीची काही हाडे मिळाली आहेत, पण ही त्या विलुप्त झालेल्या घोडा प्रजातीची किंवा गाढवाची किंवा अगदी झेब्र्याची सुद्धा असू शकतात. तेवढ्या अगदी अपवादात्मक हाडांनी आपण स्टेपी म्हणजे आर्यांपूर्वी इथे घोडे होते असे म्हणू शकत नाही.
भारताला म्हणजे खरेतर सिंधू संस्कृतीच्या देशाला मेसोपोटेमिया मध्ये तेव्हा मेलूहा म्हणत होते हे तर आपल्याला माहित आहे. रोमीला थापर यांच्या म्हणण्यानुसार वेदिक साहित्यात वापरला गेलेला म्लेंच्छ हा शब्द कदाचित मेलूहा या शब्दाचा अपभ्रंश असू शकतो. म्लेंच्छ बरोबरच पाली भाषेमध्ये मिलख हाही एक शब्द सिंधु नदीच्या दक्षिणेतील (गुजरात,आणि पाकिस्तानी पंजाबमधील) लोकांसाठी वापरला जात होता. तेव्हा या मेलूहा (म्हणजे सिंधू संस्कृतीच्या) लोकांनाच पुढे आर्यांनी म्लेंच्छ ही ओळख दिली असणार असा थापर यांचा दावा आहे.
७) भारतीय डीएनएचे बदलते स्वरूप
भारताच्या वांशिक डीएनएचे आपण काळानुसार साधारण चार भागांत वर्गीकरण करू शकतो. पहीला आहे अंदमानी डीएनए. हा साधारण ६० ते ७० हजार वर्षांपूर्वी भारतात आला. किंबहुना हेच भारतात सर्वप्रथम आलेले होमो सेपियन्स म्हणजे आजचे मानव होत. त्यानंतरचा डीएनए आहे सिंधू/हडप्पा संस्कृतीतील लोकांचा. यांनतर भारतात आगमन झाले ते आर्यांचे म्हणजे स्टेपी लोकांचे. आर्यांच्या आगमनामुळे सिंधू संस्कृतीचा डीएनए हा दोन ग्रुप्समध्ये म्हणजे अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन्स (ANI) आणि अँसेस्ट्रल साऊथ इंडियन्स (ASI) यात विभागला गेला. हेच ANI आणि ASI झाले भारताचा तिसऱ्या स्टेजचा डीएनए आणि आज जो भारतीयांचा डीएनए आहे तो आहे या ANI व ASI यांचे मिक्श्चर म्हणजेच भारताचा चौथ्या स्टेजचा डीएनए. काही अभ्यासक आरोप करतात की हे ASI आणि ANI वर्गीकरण भारतातील पॉलिटिकल नरेशन चेंज होऊ नये म्हणून करण्यात आले आहे. एका ऑथरचा दावा होता की हार्वर्डचे एक वैज्ञानिक रेईश यांना राखीगडीचा डीएनए हवा होता म्हणून त्यांना आर्यन मायग्रेशन हा शब्द न वापरता इंटिग्रेशन हा शब्द त्यांच्या प्रबंधात वापरायला सांगण्यात आला, आणि त्यांना अभ्यासासाठी राखीगडीचे दुर्मिळ सॅम्पल हवे असल्याने त्यांनीही ते मान्य केले. पण गम्मत म्हणजे या प्रबंधाच्या टेक्स्टमध्ये ASI आणि ANI असे उल्लेख असले तरी डेटामध्ये मात्र फक्त अंदमानी, सिंधू संस्कृती आणि स्टेपी(आर्य) असाच उल्लेख आहे (आणि हा डेटासुद्धा थेट प्रबंधात उपलब्ध नाही तर सप्लिमेंटरी मटेरियल्समध्ये आहे).
तर आपण साधारण भारताच्या डीएनएचे स्वरूप कसे बदलत गेले ते पाहू. सर्वप्रथम भारतात आला तो अंदमानी डीएनए. हा अंदमानी डीएनए आजही अंदमानच्या आदिवासींत पूर्णतः आणि काही मोजक्या केरळ व तामिळनाडूतील आदिवासींत मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यानंतर साधारण किमान १२००० वर्षांच्याही आधी कधीतरी भारतात अर्ली इरानियन हंटर गॅदरर्सचा डीएनए आला आणि या अंदमानी लोकांच्या डीएनएत मिसळला व याच मिश्रणातून सिंधू संस्कृतीच्या डीएनएचा म्हणजे वंशाचा जन्म झाला. म्हणजे इराणी लोक भारतात आले असा त्याचा अर्थ नाही तर हे १२००० वर्षांपूर्वीचे इराणी भटके आणि भारतात अंदमानी लोकांसमवेत मिक्स व्हायला आलेले लोक यांचा डीएनए कोणत्यातरी एकाच वंशाचा होता असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या लोकांचा एक गृप भारतात आला आणि एक इराणमध्ये गेला. सिंधू संस्कृतीचे डीएनए पूर्वी मिळत नसल्याने त्याला 'इराणी हंटर गॅदरर्स डीएनए' हेच नाव पडले. हे लोक बहुदा रशियाच्या पश्चिम सायबेरियातून आले असावेत असा अंदाज आहे. नामांकनासाठी त्यांना अर्ली इराणी म्हणू. या अर्ली इराणी आणि भारतातले मुळचे अंदमानी लोक यांचा मिळून १२००० वर्षांच्या आधी कधीतरी जो वंश बनला तोच सिंधू संस्कृतीचा वंश होय (हे मिक्सिंग १२००० वर्षांच्या पूर्वी झाले आहे हे निश्चित, पण नेमके कधी ते सांगता येत नाही कारण हा दुवा दाखवणारे मधले डीएनए उपलब्ध नाहीत). या मिक्सिंगमध्ये अंदमानी डीएनए हा १० ते ५०% इतका होता. राखीगडीच्या डीएनए नुसार ऑन एव्हरेज या सिंधू संस्कृतीच्या लोकांत अर्ली इराणी डीएनए ७० टक्के आणि अंदमानी डीएनए ३० टक्के होता असे आपण म्हणू शकतो. याच अर्ली इराणी लोकांचा दुसरा ग्रुप इराणमध्ये गेल्यावर त्यांचा एनाटोलियन (तुर्की) वंशाशी संगम झाला आणि तिथे 'इरानियन फार्मर' हा नवा वंश बनला. साधारण ८ ते ९ हजार वर्षांपूर्वी याच एनाटोलियन लोकांनी सगळ्यात आधी शेतीचा शोध लावला असे मानण्यात येते. त्यामुळे याच लोकांनी हे ज्ञान सिंधू संस्कृतीतील लोकांना दिले असेल आणि सिंधू संस्कृतीतील लोकांतही हा एनाटोलियन डीएनए असेल असे आधी मानण्यात येत होते. पण मी पूर्वी सांगितलेल्या ११ आउटलीयर संभाव्य सिंधू संस्कृतीच्या लोकांत आणि राखीगडीच्यादेखील डीएनएत एनाटोलियन आणि स्टेपी या दोन्ही डीएनएचा अंश सापडला नाही. आणि त्यामुळेच सिंधू संस्कृतीत म्हणजे भारतात शेतीचा शोध स्वतंत्रपणे म्हणजे इंडिपेंडंटली लागला हे सिद्ध होते. खरेतर भारत असे म्हणणे चूक आहे. त्याऐवजी दक्षिण आशिया असे म्हणणे बरोबर होईल. भारत हा या इतिहासाचा फक्त एक भाग आहे, मुख्यत्वे यात आजचा पाकीस्तान हे सर्वात महत्वाचे स्थान आहे. अफगाणिस्तान ते श्रीलंका असा पूर्ण भाग म्हणजे दक्षिण आशिया होय. मला आपल्या देशावरील प्रेमामुळे भारत लिहायला आवडते म्हणून मी भारत लिहितोय पण खरेतर जिथे जिथे मी भारत लिहितोय ते दक्षिण आशिया असेच समजावे.
साधारण साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वी म्हणजे सिंधू संस्कृतीच्या अस्ताच्या वेळी स्टेपी म्हणजेच यामन्या म्हणजेच आर्य वंशाचे लोक भारतात यायला सुरुवात झाली. साधारण याच सुमारास म्हणजे ४ हजार वर्षांपूर्वीच आर्य लोक अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बॅक्ट्रिया मार्जियना संस्कृतीतही दाखल व्हायला सुरुवात झाली असे डीएनए रिझल्ट सांगतो. सगळे पुरातत्वीय आणि भाषाशास्त्रीय पुरावे आर्य हे साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वी भारतात दाखल झाले आणि त्यांनीच संस्कृत (किंवा खरेतर इंडोयुरोपियन) भाषा मध्य आशियातून भारतात आणल्या असे दर्शवत होते. राखीगडीच्या डीएनए रिपोर्टने त्यावर शिक्कामोर्तब केले. डीएनए मधील R१a हा स्टेपी म्हणजेच आर्यवंशाची ओळख असलेला हेप्लोग्रुप आहे. हा आर्यांचा R१a आणि एनाटोलियन (तुर्की) डीएनएसुद्धा राखीगडीच्या डीएनए मध्ये मिळाला नाही. त्यावरून हे स्पष्ट होते की हडप्पा संस्कृतीच्या काळापर्यंत आर्य भारतात आले नव्हते. तुर्कमेनिस्तान आणि इराण येथील ज्या ११ आउटलीयर डिएनएन्ना सिंधू संस्कृतीचे मानण्यात येत होते त्यातही हे दोन डीएनए मिक्स झाल्याचे सापडत नाही. आज भारतात सगळीकडे आर्यन डीएनए म्हणजे R१a हेप्लोग्रुप सापडतो. पण ४ हजार वर्षांपूर्वीच्या राखीगडी किंवा ११ आऊटलीयर्स मध्ये तो सापडत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की आर्य किमान ४००० वर्षे आधीपर्यंत तरी भारतात आले नव्हते. यामन्या म्हणजे आर्य हे ३३०० इसापूर्व (म्हणजे टोटल ५३०० वर्षांपूर्वी) काळात ब्लॅक समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांच्या उत्तरेकडच्या प्रदेशातून (सेंट्रल स्टेपी) निघाले असे सिद्ध होते. नरसिम्हन आणि ग्रुप यांनी थेट ८००० इसापूर्व ते आजच्या काळातील लोकांचे डीएनए अभ्यासले आहेत. आणि त्यामुळे त्यांचेकडे स्थळ आणि काळ या दोहोंमध्ये डीएनएचा प्रसार कधी आणि कोणत्या मार्गाने झाला त्याचे पूर्ण प्रोफाइल आहे. यामुळे आर्य डीएनए नेमका कधी कुठून निघाला आणि कधी कुठे पोचला हेही ते सांगतात. इतकेच नाही तर आजच्या लोकांच्या डीएनए एनालिसिस वरून त्यांच्यात कोणता डीएनए नेमका कधी मिक्स झाला हेही आता कळते. त्यानुसार आर्यन डीएनए हा भारतात (दक्षिण आशिया) इसवी सन पूर्व २००० ते १००० या काळात मिक्स झाला आहे हे समजते. हाच यामन्या उर्फ आर्यन उर्फ स्टेपी डीएनए जर्मनीत २७०० इसापूर्व, फ्रान्समध्ये २५०० इसापूर्व, इंग्लंडमध्ये २४०० इसापूर्व, स्पेनमध्ये २३०० इसापूर्व, आणि बॅक्ट्रियामध्ये २१०० इसापूर्व या काळात पोचला इतके डिटेलमध्ये त्याचे प्रोफाईलींग झाले आहे (बॅक्ट्रिया ही अफगाणिस्तानच्या थोडे पश्चिमेकडे आणि सिंधू संस्कृतीच्या बाहेरची संस्कृती होती). आर्य आधी बॅक्ट्रियात गेले आणि मग भारतात आले हेही टाइम प्रोफाईलने सिद्ध झाले आहे. आपल्या भारतात अनेकजण आर्य भारतातूनच बाहेर गेले असा दावा अस्मितेतून ठोकतात. पण डीएनएची टाइमलाईन त्याला स्पष्टपणे खोटे सिद्ध करते. जो डीएनए भारतातच ४००० वर्षांपूर्वी पहील्यांदा आला असे सिद्ध होते तो ५३०० वर्षांपूर्वी भारतातून सेंट्रल स्टेपी प्रदेशात जाईलच कसा?अजून एक, आज प्रत्येक भारतीयांत अंदमानी/सिंधू संस्कृतीचा डीएनए आहे, पण हा डीएनए भारत वगळता युरोपात कुठेही मिळत नाही. जर भारतीय इथून युरोपात गेले असते तर त्या लोकांत अंदमानी/सिंधू डीएनए अल्प प्रमाणात का होईना मिळायलाच हवा होता. पण तसे नाहीय. सगळ्या जगातले पुरावे हेच सिद्ध करतात की आर्य हे सेंट्रल स्टेपी मधून पश्चिमेकडे युरोपात आणि पूर्वेकडे भारतात आले. सगळ्या जगातले लोक हे मान्यही करतात. यामन्या म्हणजे आर्य हे सेंट्रल स्टेपी मधूनच जर्मनी, फ्रांस, इंग्लंडात आले, ते तेथील मूळ निवासी नव्हते याने जर्मन, फ्रेंच व इंग्लिश लोकांच्या भावना दुखावत नाहीत. फक्त भारतात मात्र हे सत्य मान्य करायला लोकांना प्रचंड प्रॉब्लेम आहे.
आर्यांमध्ये किंवा वैदिक धर्म मानणारांमध्ये आजही पुरुषसत्ताक पद्धत होती/आहे. आपला वंश हा फक्त मुलांमुळे म्हणजे पुरुष वंशजांमुळे वाढतो ही जशी आजची आपल्या समाजात वेडगळ समजूत आहे तशीच ती तेव्हाही या आर्यांची होती (आणि आर्यांनीच ती भारतीयांत रुजवली असणार). त्यामुळे भारतातल्या आजच्या लोकांत जो काही आर्यन डीएनए आहे तो मुख्यत्वे पुरुष किंवा पित्याच्या पूर्वज लिंकमधूनच आलेला आहे. आर्य हे बहुदा फक्त पुरुषच भारतात आले आणि इथल्या सिंधू संस्कृती पश्चातच्या लोकांशी मिक्स झाले. केवळ पुरुषांमुळेच आपला वंश पुढे चालतो या मूर्ख समजुतीमुळे पुढच्या पहिल्याच पिढीत त्यांचा आर्यन डीएनए ५०% झाला, आणि त्यापुढच्या पिढ्यांत तर तो अजून कमी कमीच होत गेला. ज्यांच्यात हे आर्यन मिसळले ते झाले ANI आणि ज्यांच्यात ते थेट मिसळले नाहीत ते झाले ASI. मात्र आर्य आल्यानंतरही खूप काळ जातीव्यवस्था आली नसल्याने हे ASI आणि ANI देखील पुढे दोनेक हजार वर्षांपर्यंत एकमेकांत मिसळतच राहिले. या मिसळण्याला बंधन होते ते फक्त भौगोलिक अंतराचे. हे मिश्रण सर्वंकष असले (म्हणजे कुणीही कुणाशीही लग्न करत होते) तरीही दक्षिण भारतात ते कमी प्रमाणात आणि उत्तर भारतात ते जास्त प्रमाणात झाले. त्यामुळे साधारणपणे आर्यन डीएनए हा उत्तर भारतात जास्त प्रमाणात तर दक्षिण भारतातल्या लोकांत काहीसा कमी प्रमाणात आढळतो. साधारण फक्त १६०० वर्षांपूर्वी जातीव्यवस्था आणि त्यानंतर आलेल्या जातीअंतर्गत विवाहाच्या बंधनानंतर ही मिक्सिंगची प्रक्रिया थांबली (१६०० वर्षांपूर्वी अगदी संथ झाली, आणि हळूहळू थांबलीच. कोणत्या मुर्खाने ती व्यवस्था आणली काय माहित?). म्हणजे आर्य भारतात आल्यानंतरही जवळजवळ २००० वर्षे इथले लोक एकमेकांसमवेत मिक्स होतच राहिले. त्यामुळे आपण आज जातिव्यवस्थेमुळे समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात भारतीय लोकांच्या डीएनएमध्ये युनिफॉर्मिटी आहे. आणि हो, आज धर्म या ओळखीमुळे एक भारतीय लोकांचा गट ज्या दुसऱ्या धार्मिक गटाचा प्रचंड तिरस्कार करतो त्यांचे डीएनए मात्र अगदी तंतोतंत समान आहेत. भारतात तरी आपली धर्म नावाची ओळख ही अत्यंत कृत्रिम असून जीवशास्त्रीय निकषांवर ती केवळ मूर्खपणा ठरते. भारतातले कोणतेही दोन लोक कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांचा डीएनए मात्र अगदी समान आहे. धर्मांच्या बाबतीत भारतात ही एकरूपता आहे पण जातींच्या बाबतीतही हेच खरे आहे का?आणि असलेच तर कोणत्या जातीत/धर्मात किती टक्के आर्यन/सिंधू/अंदमानी डीएनए आहे ते आपण पुढच्या भागांत पाहू. ..............
८) निसटते दुवे
पाकीस्तानात 'कलाश' नावाच्या जमातीचे काही लोक राहतात. डीएनए एनालिसिस सांगते की संपूर्ण भारतीय उपखंडात (दक्षिण आशियात) या कलाश लोकांतच सर्वात जास्त प्रमाणात आर्यवंशीय (स्टेपी, यामन्या) डीएनए आहे. यांच्या जवळच नुरिस्तान नावाच्या अफगाणिस्तानातील भागात या कलाश लोकांसारखीच संस्कृती असणारे दुसरे लोक होते पण त्यांना अफगाणी सत्तेतील कट्टर लोकांनी मुस्लिम बनवले त्यामुळे आता त्यांची ती संस्कृती पूर्णतः नष्ट झालेली आहे. अफगाण पाकिस्तान बॉर्डरच्या अलीकडील तुलनेने कमी कट्टर असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही कलाश लोकांना मुस्लिम बनवण्याचे प्रयत्न केले पण त्यांनी त्यास जोरदार विरोध केला त्यामुळे त्यांची संस्कृती मात्र अजून टिकून राहिली आहे. पण आता रीसेंट्ली काही पाकिस्तानी यूट्युबर्स तिथे गेले, व त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी काही प्रश्न विचारले आणि मग ते व्हिडीओ प्रसारित करून पाकीस्तानात कसे अजूनही एक काफिरीस्तान आहे आणि ते लोक किती अधार्मिक परंपरा पाळतात असा प्रचार केला. त्यामुळे आता त्यांच्यावर पुन्हा एकदा धर्मांतर करण्याचा दबाव वाढत आहे. पण काही चांगले पाकिस्तानी युट्युबर्सही आहेत ज्यांनी मात्र या लोकांची संस्कृती टिकून रहावी यासाठी आवाज उठवला आहे.
या कलाश लोकांचे देवही इंद्र, यम हे आहेत. देवलोग नावाच्या भागात देव राहतात असे ते मानतात. 'देव' हा शब्द ते 'दी' असा उच्चारतात आणि 'महान'ला फक्त 'मान' असे म्हणतात, त्यामुळे त्यांचा मांदी नावाचा देव हा महादेव आहे असेही अनेक अभ्यासक म्हणतात.
आणि कसे आहे ना, जे अनटच्ड आहे, पुरातन आहे ते आपलेच आहे असे सिद्ध करण्याची एक विकृती सगळ्याच माणसांत असते. त्यामुळे मधेच एक टूम निघाली की हे लोक अलेक्झांडरचे वंशज आहेत. मग काय ग्रीक लोकांनी तर तुम्ही आमचेच आहात म्हणून त्यांना कम्युनिटी हॉल बांधून दिले, घरे बांधून दिली, पैसे देऊन आपले पेहराव, सण हेही त्यांचेवर थोपवण्याचा प्रयत्न केले. आणि आता तीच ग्रीकांनी केलेली बांधकामे दाखवून काही लोक यांचे परंपरागत बांधकाम ग्रीक शैलीचे आहे, म्हणून ते ग्रीक आहेत असे म्हणतात. अर्थात नंतर हे चालले नाही, पण अजूनही ग्रीक मिशनरी तेथे येत असतात आणि या लोकांना पैसे देत असतात.
कलाश लोकांत अजूनही टिकून असलेल्या आणि ज्यांना आर्य वा वैदिक म्हणता येईल अशा काही परंपरा आहेत. त्या अशा की, ते लोक आपल्या देवतांना यज्ञाप्रमाणेच अग्नीतून काही वस्तू आहुती म्हणून अर्पण करतात. त्यांच्याही या हवन विधीत तूप हा एक महत्वाचा भाग असतो. त्यांचे देव लाकडाचे असून त्यांच्या खाली ते त्यांचा होमहवनाचा विधी करतात. व धुरातून ही सगळी अर्पणे देवांपर्यंत पोचतात असे मानतात. चातुर्मासही ते सण म्हणून साजरा करतात. आणि जसे भारतात चातुर्मासात देव झोपी जातात, तसे त्यांच्यातही या काळात देवाचे नियम लागू होत नाही असे मानतात. यांच्या मौखिक कथांनुसार ते 'त्साम' या भागातून आले होते, आणि या त्सामच्या एका देवाला महादेवाने ठार मारले अन्यथा तो त्साम मधून येऊन मानव जातीला संभोग क्रियेचा खरा पवित्र विधी शिकवणार होता. पण तो मारला गेल्याने ते फक्त पवित्र गाणी/मंत्र हेच शिकू शकले आणि तेच ते आता त्यांच्या सणांत गातात. हा त्यांचा त्सामचा देव म्हणजेच आपल्याकडच्या कथांत महादेवाने मारलेला कामदेव असेल का?ऋग्वेदात जिथे सर्वोत्तम सोमवल्ली मिळते असे लिहिले आहे ते ठिकाणही इथून जवळच आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे भारतात मानतात तसे मासिक पाळीला विटाळ मानणे हीही या लोकांत प्रथा आहे. या लोकांच्या गावात एक सेपरेट इमारत असते जिच्यात मासिक पाळीच्या दिवसात प्रत्येक स्त्रीला जाऊन रहावे लागते. ऋतुमती असलेल्या स्त्रीला, तिच्या कोणतयाही वस्तूला, किंबहुना त्या इमारतीला, एवढेच नाही तर अगदी त्या इमारतीच्या बाहेर असलेल्या कंपाउंडच्या भिंतीला जरी नुसता स्पर्श झाला तरी त्या पुरुषाला विटाळ झाला असे ते समजतात. नुसती पाळी आल्यावरच नाही तर प्रसूती झाल्यावर देखील स्त्रियांना पहिले काही दिवस तिथेच ठेवावे लागते. स्वयंवर पद्धतीप्रमाणे इथेही स्त्रियांना स्वतःचा वर निवडता येतो. आणि पटत नसल्यास पती बदलता देखील येतो. स्त्री स्वतःच पती निवडते आणि तो स्वतःच्या इच्छेनुसार बदलते सुद्धा, या परंपरेला पाकिस्तानी युट्युबर्सनी वेश्यावृत्ती असे सांगून या लोकांची बदनामी केली. आजूबाजूच्या प्रदेशांत सगळेच मुस्लिम असल्याने त्यांच्यातील पुरुष आता इस्लामी कुर्ता पायजमाच वापरायला लागले आहेत, पुरुषांचा पारंपरिक वेष ते विसरले आहेत. स्त्रिया मात्र अजूनही पारंपरिक रंगीत आणि कवड्यांचा वापर असलेली वस्त्रे व आभूषणे घालतात. अर्थात ते लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत हेही विशेष.
अजून एक. पारसी आणि वैदिक (हिंदू) हे समान देव आणि परंपरा पाळतात हे आता सर्वश्रुत आहे, पण पारशी आणि हिंदू यांत दुवा ठरू शकेल अशी कलाश लोकांची एक परंपरा आहे ती म्हणजे अशी की हे लोकही पारशी लोकांप्रमाणे मयत व्यक्तींचे मृतदेह उघड्यावर ठेवून देतात. एवढेच की हे मृतदेह कफिन सारख्या एखाद्या लाकडी पण उघड्या पेटित ठेवले जातात.
वैदिक संस्कृती आणि संस्कृत भाषा ही इराणमधून भारतात आली असे पुरातत्वीय व डीएनएचे पुरावे सांगतात. अनेकांना हे पटत नाही, आणि ते उलट हे सगळे भारतातूनच तिकडे गेले असे ते म्हणतात. कुणाचे म्हणणे काहीही असो, पण कलाश, सेंटिनली वा ब्राहुई लोकांसारखे अजूनही टिकून असलेले लोक हे या विवादित इतिहासाला जोडणारे सर्वात महत्वाचे धागे आहेत हे नक्की. हे आपल्या इतिहासाच्या खुणा अजूनही जपून आणि जिवंत ठेवणारे अत्यल्प असे निसटते दुवे आहेत. मात्र आज भारतीय उपखंडात जे एकंदरच धर्माचे अनाठायी वेड वाढते आहे त्या वेडापायी त्यांची संस्कृती नष्ट केली जाऊ नये एवढ्या अपेक्षेव्यतिरिक्त आपण काय करू शकतो...
हजारो वर्षांच्या परंपरेत एखादीच नालायक आणि अविचारी पिढी अल्पकाळासाठी का होईना पण पावरफुल असणे हे त्या पूर्ण हजारो वर्षांच्या मौलिक वारशास सपशेल मिटवून टाकण्यास पुरेसे असते. विविधता ही एकसुरी पद्धतीपेक्षा खूप सुंदर आणि कितीतरी अधिक मौल्यवान असते हे या नालायक पिढीला कळत नाही. विशेष म्हणजे एकुणातील सगळ्या पिढ्यांत ही नालायक पिढी हीच सर्वात कुचकामी आणि संकुचित असते, त्यामुळे जिथेतिथे आपलाच रंग, आपलीच दृष्टी, आपलीच प्रतीके असली पाहिजेत असे ते मानतात. यामुळेच मग बमियानमधल्या बुद्ध मूर्ती उध्वस्त होतात. मशिदी, चर्च आणि पुरातन मंदिरे पाडली जातात, शहरांची नावे बदलतात, धर्मांतरे केली जातात...
...............
९) आर्य कोण? द कंक्लूजन-१
सगळ्या भारतीयांत अनेक वेगवेगळ्या वंशांचे डीएनए मिक्स झालेले आहेत हे आपण पाहिले. आजचे भारतीय हे मुख्यत्वे अंदमानी, सिंधू आणि आर्यन डीएनएचे मिक्स्चर आहेत, याव्यतिरिक्त इतर वांशिकतांचा फारसा विचार केला गेला नाही आणि त्यांचा पुरेसा डेटाही उपलब्ध नाही. आणि भारतात आजच्या कोणातही पूर्वीच्या या वेगवेगळ्या वंशांपैकी कोणत्याही एकाच वंशाचा १००% डीएनए अस्तित्वात नाही (अपवाद अंदमानचे काही आदिवासी). पण तरीही आता आपल्याला कोणीतरी अमक्या वंशाचा आहे हे मानण्यासाठी त्याच्या डीएनएत त्या वंशाचा किती टक्के अंश असायला पाहीजे? समजा कुणात २० टक्के अंदमानी, २० टक्के सिंधू आणि ६० टक्के आर्यन डीएनए असेल तर त्याला आपण आर्यन मानायचे का? आणि कुणात ३० टक्के अंदमानी, ३० टक्के सिंधू आणि ४० टक्के आर्यन डीएनए असेल तर त्याला तो आर्यन आहे असे मानायचे का? पहील्या उदाहरणात आर्यन क्लिअरली बहुमतात आहे. पण दुसऱ्यात आर्यन सर्वात मोठा असला तरी अंदमानी+सिंधू मिळून जास्त ठरतात. दुसऱ्यात आपण एक विनर म्हणू शकत नाही, पण तरीही आपल्याला एक विनर ठरवायचाच असेल तर त्याच्या डीएनएत ज्या वंशाचे पर्सेंटेज जास्त आहे त्यालाच आपण त्या माणसाचा वंश ठरवू. बरोबर ना?
मुख्यत्वे भारतात आज आर्यन डीएनए आणि पर्यायाने आर्यन वंश इथला की परका हा एक सर्वात हॉट टॉपिक आहे. आपण बहुतेक आर्यनच आहोत आणि आर्य हे ३५०० वर्षांपूर्वी भारतात आले हे मान्य केल्यास विदेशी ठरू म्हणून आपण आर्यन मायग्रेशन थिअरीला काहीही करून नाकारू असा तुम्हांपैकी कोणी बेत केला असेल तर.... आणि त्याचबरोबर आर्य बाहेरून आले होते म्हणून ज्यांच्यात हा आर्यन डीएनए सगळ्यात जास्त आहे त्यांना आपण विदेशी ठरवू. आणि हे लोक अर्थातच ब्राम्हण असणार, मग ब्राह्मणांना आपण विदेशी ठरवू असा बेत करून जर तुम्ही ही लेखमाला वाचली असेल तर मित्रहो तुम्हा दोन्ही टाईपच्या लोकांच्या पदरी घोर निराशा पडणार आहे.
नरसिम्हन यांचा भारतीय उपखंडातल्या प्रातिनिधिक अडीचशे जातींच्या/वर्गांच्या डीएनएचा रिझल्ट बघितला असता पुढील बाबी लक्षात आल्या.
भारतीय उपखंडात कोणत्याही जातीत सर्वात अधिक आर्यन वांशिकतेचे (Ancestry) जे पर्सेंटेज आहे ते आहे ३०%. आणि ते आहे मागच्या भागात सांगितलेल्या 'कलाश' या पाकीस्तानी जमातीत. हे कलाश लोक हिंदू नाहीत. त्यांनतर सर्वात अधिक आर्यन पूर्वज डीएनए आहे तो पाकीस्तानातीलच 'पठाण' या लोकांचा आणि तोही आहे २८%. म्हणजे काय तर भारतीय उपखंडात जे सगळ्यात जास्त आर्यन वांशिकता असणारे लोक आहेत ते ब्राम्हण सोडा, भारतीय अथवा हिंदूही नाहीत. यही नही अभी और सुनो. हे झाले पाकिस्तानी लोकांचे, पण भारतात काय? भारतात तर सगळे ब्राह्मणच सर्वाधिक आर्य असणार ना? तर नाही. भारतात उत्तरेतील ब्राह्मणांत अधिक प्रमाणात आर्यन डीएनए आहे हे खरे पण तो सर्वाधिक नाही. बिहार मध्ये एक नॉन ब्राम्हण (पण तथाकथित उच्चवर्णीय) जात आहे ज्यांच्यात भारतात सर्वाधिक म्हणजे २८% आर्यन डीएनए आहे. त्यांनतर एक उत्तर भारतीय व्यापारी/शेतकरी जात, एक शीख धर्मीय जात, एक गुजराथी व्यापारी जात, नेपाळी ब्राम्हण, आणि उत्तर प्रदेशातील एक ब्राम्हण जात यांच्यात २५ ते २७ टक्के इतका आर्यन डीएनए आढळतो. तसेही ज्या वंशाची वांशिकता ही कुणामध्येही जास्तीत जास्त २८ टक्के आहे (म्हणजे एकुणातील एक तृतियांशहून देखील कमी) त्याला त्या कुणाचा वंश कसे म्हणता येईल? आजच्या कोणत्याही भारतीयाची वा एकंदरच भारतीय उपखंडात कोणत्याही समाजाची सर्वात मोठी (Maximum) वांशिकता ही आर्यन नाही. सर्वांची सर्वात मोठी वांशिकता ही एकतर सिंधू संस्कृतीच्या वंशाची आहे अथवा अंदमानी वंशाची. थोडक्यात काय की मेजोरिटी हा निकष लावला तर आज भारतात कोणीही आर्यवंशीय नाही असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल.
आता अजून शॉक देणारे रिझल्ट तर पुढे आहेत.
हरियाणातील एक ओबीसी जात, यूपीतील एक ओबीसी जात, आणि हरियाणातीलच एक दलित (SC) जात यांच्यात युपी/बिहार वगळता इतर राज्यांतील ब्राह्मणांपेक्षा जास्त आर्यन डीएनए आहे (२०%). हरियाणा व यूपीतील इतरही काही दलित जातींत भारतातील इतर राज्यांतील ब्राह्मणांपेक्षा जास्त आर्यन डीएनए आहे. दलित आणि ब्राह्मण जाती मी यासाठी विशेषत्वाने सांगतोय की दलित हे नॉन आर्यन आणि ब्राम्हण हे आर्यन असा एक पॉप्युलर अपप्रचार भारतात प्रचलित आहे. पण तो पूर्णतः चूक आहे. अनेक दलित जातींत अनेक ब्राह्मण जातींहून अधिक आर्यन डीएनए आहे. अजून एक अतिशय महत्वाची बाब अशी की भारतात अशी एकही जात नाही ज्यांच्यात काही प्रमाणात का होईना आर्यन डीएनए अस्तित्वात नाही (अपवाद पुढे सांगतो). सर्वात कमी आर्यन डीएनए हा केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील म्हणजे द्रविडीयन आदिवासी जमातींत फक्त ३.५% इतका आहे.
म्हणजे थोडक्यात असे आहे की भारतातल्या आजच्या कोणत्याही जातीत डीएनएचा सर्वात मोठा भाग आर्यवंशीय नसल्याने भारतात कोणीही आर्यवंशीय नाही, किंवा त्याचबरोबर वेगळ्या दृष्टीने विचार केल्यास असेही म्हणता येईल की प्रत्येक जातीत कमी प्रमाणात का होईना आर्यन डीएनए सापडत असल्यामुळे प्रत्येकजण हा काही प्रमाणात आर्यच आहे. आंध्रप्रदेशातील एक जात व कर्नाटकातील एक जात ज्यांना काही लोक ब्राह्मण तर काही क्षत्रिय म्हणतात त्यांच्यात या द्राविडीयन आदिवासेतर सर्वात कमी आर्यन डीएनए आहे व तो आहे ६% इतका. भारतात आर्यन डीएनए हा सरासरी फक्त १३ टक्के इतका आहे. महाराष्ट्रात सगळ्या जातींतील आकडे उपलब्ध नाहीत पण महाराष्ट्राच्या सीमेवरील लोकांचे डीएनए सेम महाराष्ट्रातील लोकांइतके असतील असे मानले तर भिल्ल, तडवी, मराठा यांत आर्यन डीएनए हा ९ ते ११ % इतका आहे तर वारली जमातीत तो ७ % इतका आहे. कर्नाटकी कुणबींत तो ८% आहे. महाराष्ट्राच्या देशस्थ ब्राह्मणांत आर्यन डीएनए हा ११ टक्के म्हणजे भारतीय सरासरी जी १३% आहे त्यापेक्षाही कमी आहे. दुसऱ्या एका अभ्यासात महाराष्ट्रात वारली आणि कुणबी मराठा यांत ६% तर भिल, पावरा, कोकणा यांत ७% आर्यन डीएनए आहे असे आढळले. वेगवेगळ्या अभ्यासांत असा थोडाफार (म्हणजे स्टॅंडर्ड डेव्हिएशनच्या मर्यादेत) वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. का ते पुढे सांगतो.
मागे काही वर्तमानपत्रांत आणि त्यामुळे सोशियल मीडियातही बातम्या आल्या होत्या की रिसर्चमध्ये आढळले की ब्राह्मणांत सर्वात जास्त आर्यन जीन सापडला आणि त्यातही विशेषतः उत्तरेतल्या ब्राह्मणांत ७०% इतका आर्यन डीएनए आढळतो, आणि अर्थातच त्यामुळे हीही वावडी उठली की आर्य हे बाहेरून आले म्हणून ब्राह्मण देखील बाहेरचे आहेत. ही बातमी खरी होती का? तर होय, ही बातमी खरी होती, असा रिसर्च झालेला आहे पण त्याचा अर्थ चुकीचा लावला गेला. तो रिझल्ट ब्राह्मणांत ७०% आर्यन डीएनए आढळला असा नाहीय तर ७०% ब्राह्मणांत आर्यन डीएनए आढळला असा आहे. म्हणजे जर १०० ब्राह्मणांचे sample घेतले असेल तर त्यातील ७० ब्राह्मणांत आर्यन डीएनए आढळला आणि ३० ब्राह्मणांत आढळला नाही असा त्याचा अर्थ आहे. वर जे सगळे आकडे मी दिले आहेत ते सगळे सरासरीचे आकडे आहेत. एखाद्या जातीत १०% आर्यन डीएनए आहे असे म्हंटले म्हणजे त्या जातीच्या प्रत्येक व्यक्तीत १० टक्के आर्यन डीएनए आहे असा त्याचा अर्थ नाही, तर त्या जातीची सरासरी तेवढी आहे असा अर्थ होतो. त्या जातीत वैयक्तिक कुणात २० टक्के तर कुणात ० टक्केही असू शकतो. जातीची सरासरी कितीही असो, प्रत्येक व्यक्तीचा वांशिकतेचा आकडा हा वेगवेगळा असू शकतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वंश वैयक्तिकपणे शोधला जात नाही तोवर आपण केवळ जातीच्या सरासरीवरून त्याची वांशिकता अमुक आहे असे म्हणू शकत नाही. मात्र त्या जातीतील बहुतांश लोकांची वांशिकता ही त्या सरासरीच्या आसपासची असेल असे मात्र आपण म्हणू शकतो.
आर्यन वांशिकता ही भारतीय उपखंडात सिंधू, अंदमानी आणि आर्यन या तीन प्रमुख वांशिकतांपैकी सर्वात कमी आहे हे तर कळले. मग सिंधू वांशिकता आणि अंदमानी वांशिकता आपल्यात किती आहे?
सिंधू संस्कृतीची सर्वात अधिक वांशिकता ही आंध्रप्रदेशातील एका जातीत सापडते (६७%). या जातीत आर्यन डीएनए मात्र फक्त ६% आढळतो. तसा साधारणपणे सिंधू डीएनए हा मुख्यत्वे इंडो युरोपियन लोकांत (म्हणजे नॉर्थ इंडियन) जास्त मिळतो पण या एका द्राविडी भाषिक वर्गातल्या जमातीत तो भारतात सर्वाधिक आहे हे विशेष होय. तशीच सिंधू वांशिकता ही कलाश, पठाण या पाकिस्तानींत आणि गुजरातमधल्या वर सांगितलेल्या व्यापारी जमातीतही ६५% इतकी आढळते. म्हणजे ढोबळपणे ज्यांच्यात आर्यन डीएनए जास्त आढळतो त्यांच्यात सिंधू डीएनए हा एकूणातल्या ५०% पेक्षा अधिक आहे असे आढळते. म्हणजे हे लोक आर्यन नाहीत तर सिंधू वंशाचे अधिक आहेत असे ठामपणे म्हणता येईल. सर्वात कमी सिंधू डीएनए हा केरळच्या एका आदिवासी जमातीत आणि तोही तब्बल ३०% इतका असल्याचे आढळते. म्हणजेच असे की भारतात कोणाचाही आर्यन डीएनए हा त्यांच्यात असलेल्या सिंधू डीएनएपेक्षा जास्त नाही. भारतात कोणत्याही जातीत maximum आर्यन डीएनए जितका आहे त्याहून जास्त प्रमाणात minimum सिंधू डीएनए आहे. भारतातील सर्व लोकांत सिंधू डीएनए हा सरासरी ५१% इतका आहे.
सिंधुनंतर अंदमानी डीएनए बघितला असता हाही डीएनए भारतातील प्रत्येक जातीत आहे असे आढळते. तो सर्वात कमी हा कलाश लोकांत ४% इतका तर सर्वात अधिक केरळ तामिळनाडू मधील आदिवासी जमातींत ६५% इतका आढळतो. भारतात सरासरी अंदमानी डीएनए हा ३६% इतका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक अंदमानी डीएनए हा वारली जमातीत ५४% इतका आढळतो, तर कर्नाटकी कुणबींत ४७% इतका आढळतो. अंदमानी डीएनए हा दक्षिण भारतीय म्हणजे द्राविडीयन भाषिक जमातींत जास्त तर उत्तर भारतीय म्हणजे इंडो युरोपियन भाषिक जमातींत कमी आढळतो.
माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझ्यात (म्हणजे जातीची सरासरी) सर्वाधिक आहे तो अंदमानी डीएनए जो ४९% इतका आहे त्यांनतर आहे सिंधू डीएनए जो ४२% इतका आहे व त्यांनतर येतो तो आर्यन डीएनए जो ९ टक्के आहे. आणि माझ्या डीएनएमध्ये हा संकर तब्बल २८०० वर्षांपूर्वी झाला आहे.
पुढच्या शेवटच्या भागात भारतात कोणी कोणताही बाह्य डीएनए (आर्य वा इरानियन वा सिंधू) नसलेले लोक आहेत का ते पाहू आणि त्याचबरोबर मराठा जातीत एक अत्यंत अनपेक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण असा डीएनए वंश मोठ्या प्रमाणात सापडतो तो पाहू.
...............
१०) अनार्य कोण? द कंक्लूजन-२
भारत आणि दक्षिण पूर्व आशिया अशा दोन्हीकडे या ऑस्ट्रोएशियाटिक लोकांच्या डीएनएत समान घटक मिळत असल्याने कोण कुठून कुठे गेले ते निश्चित सांगता येत नाही. आर्यांचे असे नाही. युरोप वा स्टेपी मध्ये भारतीय सिंधू वा अंदमानी डीएनए मिळत नाही त्यामुळे भारतीय लोक भारतातून तिकडे गेले नाहीत हे नक्की कळते. पण सगळ्या ऑस्ट्रोएशियाटिक लोकांत भारतीय अंदमानी डीएनए असल्याने ते इकडून तिकडे गेले असावेत याची जास्त शक्यता वाटते. भारतात भात शेती या ऑस्ट्रोएशियाटिक लोकांनीच सुरु केली/आणली असे अनेक अभ्यासक म्हणतात. बंगाल आणि मध्य भारतातील गंगेची मैदाने यांत हेच लोक सर्वात आधी आले असे म्हणतात. बंगालचे मूळ नाव बंगा आणि गंगेचे गंगा हे नाव हे दोन्ही ऑस्ट्रोएशियाटिक भाषेचे शब्द आहेत. या ऑस्ट्रोएशियाटिक लोकांत आर्यन डीएनए तर नाहीच पण सिंधू संस्कृतीचा किंवा अर्ली इरानियन हंटर गॅदरर्सचा डीएनए सुद्धा नाही. एवढेच नाही तर १२००० वर्षांपूर्वी इरानियन डीएनए भारतात येण्याच्या आधीच ऑस्ट्रोएशियाटिक लोक भारतात राहत होते हेही नक्की. म्हणजे ते मुळ भारतीय असोत की दक्षिण पूर्व आशियातून आलेले असोत, ते भारतात सिंधू संस्कृतीचाही आधीचे लोक आहेत हे मात्र नक्की. आजच्या ऑस्ट्रोएशियाटिक लोकांत आर्यन किंवा अगदी सिंधू संस्कृतीचाही डीएनए मिळत नाही. नरसिम्हन यांनी त्यांच्या प्रबंधात अनेक ऑस्ट्रोएशियाटिक लोकांचे सॅम्पल तर घेतले आहे परंतु त्यांच्या डीएनएमध्ये सिंधू आणि आर्यन डीएनए अत्यल्प/गैरहजर असल्याने त्यांच्या मॉडेलशी तो मॅच होत नाही म्हणून त्याच्या रिझल्ट्सचे कोणतेही आकडे दिले नाहीत. मुख्यत्वे सिंधू, आर्य, आणि अंदमानी डीएनए शोधण्याच्या या अभ्यासात या लोकांत मुख्य दोन म्हणजे सिंधू आणि आर्य हेच डीएनए अजिबात नसल्याने त्यांनी ते दिले नाहीत.
अगदी आतापर्यंत भारतातल्या लोकांत फक्त सिंधू, अंदमानी आणि आर्यन वांशिकता आहे असे मानले जात होते. किंवा फक्त ANI (सिंधू+आर्यन) आणि ASI (सिंधू+अंदमानी) हेच सगळ्या भारतीय वांशिकतेचे सोर्स आहेत असे मानले जात होते. त्यामुळे नरसिंहन यांनी ऑस्ट्रोएशियाटिक आणि तिबेटोबर्मन डीएनए हा वेगळा कन्सिडरच केला नव्हता. म्हणून त्यांच्या अभ्यासात या लोकांचे डीएनए रिझल्ट्स दिलेले नाहीत. मात्र बसू यांनी नरसिम्हन यांच्यानंतर स्पेसिफिकली ऑस्ट्रोएशियाटिक आणि तिबेटोबर्मन लोकांच्या डीएनएचा अभ्यास केला आहे. त्यात लक्षात आले की भारताच्या वांशिकतेत याही डीएनए गटांचे मिक्स्चर सामावलेले आहे. ऑस्ट्रोएशियाटिक डीएनए भारतातील इतर लोकांत मिळत असला तरी गोंड वगळता कोणत्याही ऑस्ट्रोएशियाटिक जमातीत मात्र सिंधू व आर्यन डीएनए (ANI) अजिबात मिळत नाही. पण या सर्वांत ASI डीएनए मात्र मिळतो. मात्र त्यातही कोरवा आणि बिरहोर या जमातीत हे दोन्ही म्हणजे ANI तसेच ASI डीएनए अजिबात मिळत नाहीत. संथाल जमातीत १३ टक्के तिबेटोबर्मन आणि २० % ASI डीएनए मिळतो. गोंड आणि हो या जमातीत तिबेटोबर्मन ६% आणि ASI १७% इतके मिळतात. कोणत्याही ऑस्ट्रोएशियाटिक जमातींत आर्यन डीएनए मिळत नाही.
जेव्हा ANI असे डीएनएचे वर्गीकरण करतो तेव्हा या ANI मध्ये साधारण एक चतुर्थांश इतका आर्यन डीएनए आणि बाकी 75% इरानियन आणि अंदमानी डीएनए असतो. त्यानुसार तिबेटोबर्मन लोकांपैकी मणिपुरी ब्राह्मणांत आर्यन डीएनए हा फक्त ६% आहे (म्हणजे त्यांचा ANI 26% आहे) तर त्यांचा ६५% डीएनए हा तिबेटोबर्मन आहे. म्हणजे एका ब्राह्मण जमातीत सुद्धा आर्यन डीएनए हा एखाद्या इंडोयुरोपियन आदिवासी जमातींपेक्षा कमी आहे. किंवा द्रविडीयन आदिवासी जमातीच्या इतका आहे असे म्हणता येईल. बाकीच्या तिबेटोबर्मन जमातींत ANI हा एक टक्क्याच्या आसपास तर ऑस्ट्रोएशियाटिक डीएनए सुद्धा १ टक्क्याहून कमी आहे असे लक्षात येते.
भारतात आपण आर्यन डीएनए असलेले आणि नसलेले असे दोन्ही गट पाहीले. मग भारतात असे मिक्स ऍन्सेस्टरी (वांशिकता) नसणारे कोणीच नाही का? तर असे आहे की संपूर्ण भारतात फक्त अंदमानातील ओंग आणि जारवा या दोन जमाती पूर्णपणे अलिप्त (किंवा शुद्ध म्हणू शकता) आहेत. फक्त तेच मूळ स्वरूपातील भारतीय आहेत आणि त्यांच्यात भारतातील इतर कोणत्याही बाह्य वांशिकतेचा थोडाही अंश मिश्रित झालेला नाही. याव्यतिरिक्त केरळातील पनिया (९६% अंदमानी) आणि झारखंड मधील बिरहोर (९७% ऑस्ट्रोएशियाटिक) यांचीही वांशिकता जवळजवळ एकाच वंशाची आहे असे म्हणू शकतो.
आधी ऑस्ट्रोएशियाटिक डीएनए हा भारतीय डीएनएचा भाग असू शकतो ही कल्पना नसल्याने त्याचा वांशिकतेत विचार झाला नव्हता मात्र बसू यांनी जेव्हा तो शोधला तेव्हा लक्षात आले की भारतीय डीएनएमध्ये याही डीएनएचा मोठा सहभाग आहे, हा डीएनए भारतात किमान सिंधू डीएनएच्या आधी आलेला आहे हे डीएनए वरून सिद्ध होते. त्यामुळे आपण त्याला मूळ भारतीय डीएनएसुद्धा म्हणू शकतो.
एकदा बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश पेंदाम हे शरद पवारांसोबतच्या एका सभेत बोलले होते की 'मराठा हे सुद्धा आदिवासीच आहेत'. तेव्हा मला हे त्यांनी केलेले शरद पवारांचे लांगुलचालन वाटले होते. अर्थात पेंदाम यांनाही हे माहीत नसेल पण बसू यांच्या अभ्यासात कळले की खरेच मराठ्यांत ऑस्ट्रोएशियाटिक डीएनए हा तब्बल २१% इतका आहे. द्राविडीयन भाषिकांपैकी तो पल्लन या सवर्ण जमातीत २२% इतका तर वेस्ट बंगालचे ब्राह्मण या इंडोयुरोपियन तसेच अय्यर या द्राविडी ब्राह्मण जमातींत १० टक्के इतका आहे. पश्चिमेकडच्या इंडोयुरोपियन गुजराथी ब्राह्मणांत देखील तो ५% इतका आहे. आपण आधी पाहीले की महाराष्ट्रातील मराठा, ब्राह्मण व आदिवासींच्या डीएनएत तितकासा फरक नाहीय त्यामुळे महाराष्ट्रातीलाही सर्व जातींत ऑस्ट्रोएशियाटिक डीएनए हा मराठ्यांप्रमाणेच २०% वा त्याहून अधिक असू शकतो असे म्हणता येईल. भारतात जातीअंतर्गत विवाह हे साधारण १६०० वर्षांपूर्वी गुप्त साम्राज्याच्या काळात सुरु झाले. परंतु विशेषतः ऑस्ट्रोएशियाटिक जातींत मात्र ते त्यानंतरही जवळजवळ ५००-६०० वर्षे सुरूच होते. मराठ्यांतही हे आंतरजातीय विवाह (म्हणजे डीएनए संकर) ऑस्ट्रोएशियाटिक लोकांइतक्याच काळापर्यंत सुरु होते असेही डीएनए वरून कळते.
वांशिकतेची अनेक वर्गीकरणे आहेत. नरसिम्हन आणि इतरांनी ३ म्हणजे अंदमानी, सिंधू आणि आर्य हे वर्ग मानले मात्र त्याचबरोबर आर्यांनंतर अंदमानी, सिंधू आणि आर्य यांचे मिळून ANI (Ancestral North Indians) आणि ASI (Ancestral South Indians) असे दोन वर्ग बनले असे सांगितले. त्यांनी ऑस्ट्रोएशियाटिक आणि तिबेटोबर्मन डीएनए समाविष्ट केले नव्हते. त्यानंतर बसू आणि इतरांनी मात्र ऑस्ट्रोएशियाटिक (AAA=Ancestral Austro-Asiatic) आणि तिबेटोबर्मन (ATB=Ancestral Tibeto-Burman) हेही डीएनए समाविष्ट केले, तसेच अंदमानी लोकांत हे कोणतेच मिश्रण नसल्याने त्यांचा एक वेगळा वर्ग ठरविला. म्हणजे आता भारत हा एकूण ५ पुरातन वांशिकतांचा वारस आहे असे आपण म्हणू शकतो. त्यापैकी ४ वांशिकता (ANI, ASI, AAA, ATB) या मुख्य भारतभूमीवर तर १ ही अंदमानात आहे. बसू सांगतात की ASI आणि AAA यांचा एकाच कॉमन पूर्वज वंश होता (बहुतेक अंदमानी डीएनए). त्यामुळे असे सिद्ध होते की हे दोन्ही भारताचे प्रथम रहीवासी होते. किंबहुना त्यांच्या वांशिकता बाहेरून आलेल्या नाहीत.
अजून एक. आपणां महाराष्ट्रीय लोकांना उत्तरेतले लोक दख्खनी म्हणतात तर दक्षिणेतले लोक उत्तर भारतीय समजतात. पण खरे हे आहे की आपण परफेक्टली मध्य भारतीय लोक आहोत. आणि आपल्या डीएनएत अंदमानी, सिंधू, आर्यन, ऑस्ट्रोएशियाटिक असे सगळे डीएनए आहेत. आणि ज्याअर्थी झारखंडातील ऑस्ट्रोएशियाटिक आदिवासी जमातींत तिबेटोबर्मन डीएनएचेही अंश आहेत, व आपल्यात २० टक्केहून अधिक ऑस्ट्रोएशियाटिक वांशिकता आहे, त्याअर्थी आपल्यातही तिबेटबर्मन डीएनएचे अंश अल्प प्रमाणात का होईना असतीलच असे वाटते. म्हणजे आपण अंदाजे म्हणू शकतो की बहुतेक संपूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रीयन लोकच असे असतील ज्यांच्यात भारतातले सगळेच मुख्य वांशिक डीएनए (ANI, ASI, AAA, ATB) आहेत. म्हणजे आपणच एका अर्थी पूर्ण भारत आहोत.
इतर विशेष नोंदी
इरानियन हंटर्स आणि आर्यांप्रमाणेच शक, कुशाण, हूण हेही वंश बाहेरून भारतात दाखल झाले, पण आजच्या भारतीयांत त्यांचे डीएनए सापडत नाहीत. म्हणजे ते इतक्या कमी प्रमाणात आहेत की ते आजच्या भारतीयांत वेगळे म्हणून डिटेक्ट करता येत नाहीत
सर्व भारतीयांचा मातृ डीएनए (mitochondrial) हा मूळ भारतीयच आहे, मात्र पितृ डीएनएचा (Y Chromosome) मोठा भाग हा (आर्यन आणि काहींच्या मतानुसार ऑस्ट्रोएशियाटिक सुद्धा) बाहेरून आलेला आहे.
भारतातील इंडोयुरोपियन मागासवर्गीयांचा डीएनए हा उच्च वर्णियांपेक्षा आदिवासींशी जास्त मॅच होतो.
............
नोंद: सर्व फोटो URL ने वापरले आहेत. सदर URL वर गेल्यास त्याचा सोर्स मिळेल.
रेफरन्स:
2. Anatole A. Klyosov, Igor L. Rozhanski (2012). Haplogroup R1a as the Proto Indo-Europeans and the Legendary Aryans as Witnessed by the DNA of Their Current Descendants, Advances in Anthropology, Vol.2, No.1, 1-13.
3. David Reich, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Alkes L. Price, and Lalji Singh (2009). Reconstructing Indian Population History, Nature, 461(7263): 489–494. doi:10.1038/nature08365.
4. Guilherme Debortoli, Cristina Abbatangelo, Francisco Ceballos, Cesar Fortes-Lima, Heather L. Norton, Shantanu Ozarkar, Esteban J. Parra & Manjari Jonnalagadda (2020). Novel insights on demographic history of tribal and caste groups from West Maharashtra (India) using genome-wide data, Nature Scientific reports 10:10075. https://doi.org/10.1038/s41598-020-66953-3
5. Gyaneshwer Chaubey, Mait Metspalu, Ying Choi, Reedik Ma¨gi, Irene Gallego Romero, Pedro Soares, Mannis van Oven, Doron M. Behar, Siiri Rootsi, Georgi Hudjashov, Chandana Basu Mallick, Monika Karmin, Mari Nelis, Ju¨ri Parik, Alla Goverdhana Reddy, Ene Metspalu, George van Driem, Yali Xue, Chris Tyler-Smith, Kumarasamy Thangaraj, Lalji Singh, Maido Remm, Martin B. Richards, Marta Mirazon Lahr, Manfred Kayser, Richard Villems, and Toomas Kivisild (2011). Population Genetic Structure in Indian Austroasiatic Speakers: The Role of Landscape Barriers and Sex-Specific Admixture, Mol. Biol. Evol. 28(2):1013–1024. doi:10.1093/molbev/msq288
6. Ismail Thanseem, Kumarasamy Thangaraj, Gyaneshwer Chaubey, Vijay Kumar Singh, Lakkakula VKS Bhaskar, B Mohan Reddy, Alla G Reddy and Lalji Singh. (2006). Genetic affinities among the lower castes and tribal groups of India: inference from Y chromosome and mitochondrial DNA, BMC Genetics, 7:42. doi:10.1186/1471-2156-7-42
7. Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson, Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich, and Lalji Singh (2013). Genetic Evidence for Recent Population Mixture in India, The American Journal of Human Genetics 93, 422–438.
8. R. Trivedi, Sanghamitra Sahoo, Anamika Singh, G. Hima Bindu, Jheelam Banerjee, Manuj Tandon, Sonali Gaikwad, Revathi Rajkumar, T Sitalaximi, Richa Ashma, G. B. N. Chainy and V. K. Kashyap (2007). High Resolution Phylogeographic Map of Y-Chromosomes Reveal the Genetic Signatures of Pleistocene Origin of Indian Populations, Anthropology Today: Trends, Scope and Applications. Anthropologist Special Volume No. 3: 393-414.
9. Romila Thapar, Michael Witzel, Jaya Menon, Kal Friese, Razis Khan, (2019). Which Of Us Are Aryans? Rethinking The Concept of Our Origins, Aleph Book Company, 7/16 Ansari Road, Daryaganj, New Delhi 110 002, ISBN: 978-93-88292-38-2.
10. Saioa López, Lucy van Dorp and Garrett Hellenthal (2015). Human Dispersal Out of Africa: A Lasting Debate, Evolutionary Bioinformatics:11(s2) 57–68. doi: 10.4137/EBo.s33489.
11. Sanghamitra Sahoo, Anamika Singh, G. Himabindu, Jheelam Banerjee, T. Sitalaximi, Sonali Gaikwad, R. Trivedi, Phillip Endicott, Toomas Kivisild, Mait Metspalu, Richard Villems, and V. K. Kashyap (2006). A prehistory of Indian Y chromosomes: Evaluating demic diffusion scenarios. PNAS, vol. 103, no.4, 843–848. www.pnas.org/cgi/doi/10.1073/pnas.0507714103
12. Sanghamitra Sengupta, Lev A. Zhivotovsky, Roy King, S. Q. Mehdi, Christopher A. Edmonds, Cheryl-Emiliane T. Chow,3 Alice A. Lin, Mitashree Mitra, Samir K. Sil, A. Ramesh, M. V. Usha Rani, Chitra M. Thakur, L. Luca Cavalli-Sforza, Partha P. Majumder, and Peter A. Underhill (2006) Polarity and Temporality of High-Resolution Y-Chromosome Distributions in India Identify Both Indigenous and Exogenous Expansions and Reveal Minor Genetic Influence of Central Asian Pastoralists, The American Journal of Human Genetics, Volume 78.
13. Susanta Roychoudhury, Sangita Roy, Badal Dey, Madan Chakraborty, Monami Roy, Bidyut Roy, A. Ramesh, N. Prabhakaran, M. V. Usha Rani, H. Vishwanathan,Mitashree Mitra, Samir K. Sil, and Partha P. Majumder (2000). Fundamental genomic unity of ethnic India is revealed by analysis of mitochondrial DNA, Current Science, vol. 79, no. 9.
14. Swarkar Sharma, Ekta Rai, Prithviraj Sharma, Mamata Jena, Shweta Singh, Katayoon Darvishi, Audesh K Bhat, AJS Bhanwer, Pramod Kumar Tiwari and Rameshwar NK Bamezai (2009). The Indian origin of paternal haplogroup R1a1* substantiates the autochthonous origin of Brahmins and the caste system. Journal of Human Genetics 54, 47–55. doi:10.1038/jhg.2008.2
15. V. M. Narasimhan et al., (2019). The formation of human populations in South and Central Asia. Science 365, DOI: 10.1126/science.aat7487
16. Vasant Shinde, Vagheesh M. Narasimhan, Nadin Rohland, Swapan Mallick, Matthew Mah, Mark Lipson, Nathan Nakatsuka, Nicole Adamski, Nasreen Broomandkhoshbacht, Matthew Ferry, Ann Marie Lawson, Megan Michel, Jonas Oppenheimer, Kristin Stewardson, Nilesh Jadhav, Yong Jun Kim, Malavika Chatterjee, Avradeep Munshi, Amrithavalli Panyam, Pranjali Waghmare, Yogesh Yadav,Himani Patel, Amit Kaushik, Kumarasamy Thangaraj, Matthias Meyer, Nick Patterson, Niraj Rai, and David Reich (2019). An Ancient Harappan Genome Lacks Ancestry from Steppe Pastoralists or Iranian Farmers, Cell 179, 729–735. https://doi.org/10.1016/j.cell.2019.08.048
17. Vikrant Kumar and B Mohan Reddy (2003). Status of Austro-Asiatic groups in the peopling of India: An exploratory study based on the available prehistoric, linguistic and biological evidences, J. Biosci., Vol. 28, No. 4, 507–522.
18. Vikrant Kumar, Arimanda NS Reddy, Jagedeesh P Babu, Tipirisetti N Rao, Banrida T Langstieh, Kumarasamy Thangaraj, Alla G Reddy, Lalji Singh, and Battini M Reddy (2007). Y-chromosome evidence suggests a common paternal heritage of Austro-Asiatic populations, BMC Evolutionary Biology, 7:47. doi:10.1186/1471-2148-7-47
19. Vincent Macaulay, Catherine Hill, Alessandro Achilli, Chiara Rengo, Douglas Clarke, William Meehan, James Blackburn, Ornella Semino, Rosaria Scozzari,Fulvio Cruciani, Adi Taha, Norazila Kassim Shaari,Joseph Maripa Raja, Patimah Ismail, Zafarina Zainuddin, William Goodwin, David Bulbeck, Hans-Ju¨rgen Bandelt, Stephen Oppenheimer, Antonio Torroni, Martin Richards (2005). Single, Rapid Coastal Settlement of Asia Revealed by Analysis of Complete Mitochondrial Genomes. Science 308, 1034; DOI: 10.1126/science.1109792
20. Xiaoming Zhang, Shiyu Liao, Xuebin Qi, Jiewei Liu, Jatupol Kampuansai, Hui Zhang, Zhaohui Yang, Bun Serey, Tuot Sovannary, Long Bunnath, Hong Seang Aun, Ham Samnom, Daoroong Kangwanpong, Hong Shi, & Bing Su (2015). Y-chromosome diversity suggests southern origin and Paleolithic backwave migration of Austro-Asiatic speakers from eastern Asia to the Indian subcontinent. Nature Scientific Reports, 5:15486. DOI: 10.1038/srep15486