हा ब्लॉग शोधा

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

महादेव कोळी जमातीचा मराठा सत्तेशी समावेशक आणि समांतर इतिहास

महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेले राज्य किंवा राजघराणे कोणते असे विचारले तर त्याचे उत्तर आहे "जव्हारचे मुकणे" हे महादेव कोळी या आदिवासी जमातीचे राजघराणे.! दिल्ली सल्तनतीच्या महाराष्ट्रातील आगमनाच्या आणि शिलाहारांच्या पतनकाळात स्थापन झालेले हे राज्य थेट स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थाने विलीन होण्याच्या काळापर्यंत टिकून राहिले. आजही हे राजघराणे अस्तित्वात असून राज्यस्थापनेपासून आजपर्यंतचा त्यांचा काळ हा जवळजवळ ७०० हुन अधिक वर्षांचा होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या चालुक्यांचा खरेतर तीन वेगवेगळी राजघराणी असलेला काळही एकत्रपणे मोजला तरी जव्हारचे हे एकच राजघराणे त्याहूनही जास्त काळ अस्तित्वात राहीले आहे हे विशेष होय. आदिवासी महादेव कोळी या जमातीचा इतिहास हा अगदी पुरातन काळापासूनच  एक लढवय्या जमात याच स्वरूपाचा राहीला आहे. वेगवेगळ्या राजवटींत अनेक महादेव कोळी सरदारांनी मोठी पदे भूषविल्याचे अनेक दाखले मिळतात. सह्याद्रीच्या अत्यंत मोक्याच्या डोंगरखोऱ्यांत प्राचीन काळापासून वस्ती करून राहीलेला हा सह्याद्रीच्या बेलाग पर्वतरांगांतील पहीला समाज आहे. मात्र एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचाच इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्याने महादेव कोळ्यांचा इतिहास देखील अगदीच धूसर स्वरूपात उपलब्ध आहे. यात अजून एक मेख आहे. कोळी या नावाच्या अनेक जाती आहेत आणि इतिहासात महादेव कोळ्यांनाही कोळी एवढ्याच नावाने संबोधले गेले असल्याने ते नेमके महादेव कोळी होते की इतर कोणी हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र तरीही भौगोलिक क्षेत्राचा विचार करता पश्चिम घाटात आणि विशेषत्वाने डोंगरी प्रदेशांत ज्यांचा सरदार/लढवय्ये अथवा महादेवाच्या मंदिरावरील अधिकारांच्या बाबतींत उल्लेख आढळतो ते महादेव कोळीच होते असे मानण्यास हरकत नाही. 

मला मिळालेला महादेव कोळ्यांचा सगळ्यात जुना लिखित उल्लेख येतो तो देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंहण नावाच्या राजाच्या महाबळेश्वर भेटीत (१२१०-१२४७). या राजाने तिथल्या महादेव कोळ्यांसाठी हेमाडपंती पद्धतीचे एक शिवमंदिर बांधले आणि 'बाबाजी कोळी' नावाच्या माणसाला त्या मंदिराच्या पूजेचे अधिकार दिले. (संदर्भ: पारसनीस, १९१६). पुढे सतराव्या शतकात शिवाजी महाराज आणि जावळीचे मोरे यांच्यात जो संघर्ष झाला, त्यावेळी चंद्रराव मोरे यांनी जावळीचा खजिना हा 'कान्होजी कोळी' याच्या ताब्यात ठेवलेला होता, आणि त्याबद्दल त्यांना वार्षिक रु. ६० आणि जमीन जहागीर म्हणून देण्यात आलेली होती. यामुळे जावळीच्या खोऱ्यात झालेल्या लढाईत चंद्रराव मोरे यांच्या पतनानंतर शिवाजी महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य यांच्याकरवी महादेव कोळ्यांचे महाबळेश्वर मंदीरातील अधिकार काढून घेऊन ते गुरवांना दिले. त्यांनतर १७०७ साली शाहू राजांनी हे अधिकार सूर्याजी कोळी यांच्यामार्फत पुन्हा महादेव कोळ्यांना दिले, मात्र ते फार काळ टिकले नाहीत, ते पुन्हा गुरवांना मिळाले आणि त्यांनतर महादेव कोळ्यांचे महाबळेश्वर शिवमंदिरावरील अधिकार संपले ते आजतागायत.  

 Mahabaleshwar Mandir, Mahabaleshwar - Timings, History, Pooja & Aarti  schedule,

 चित्र : महाबळेश्वरचे हेमाडपंती शिव मंदीर 


हा काळ प्रचंड अस्थिरतेचा होता. बहामनी राजवटीची स्थापना आणि एतद्देशीय शिलाहार राजवंशाचा अस्त यांचा हा काळ होता. बहामनी साम्राज्याचीही शकले होऊन वेगवेगळ्या शाह्या स्थापन झालेल्या होत्या. राज्यकारभाराचे जुने स्वरूप पूर्णतः बदलून या नव्या शाह्यांनी नवी राज्यव्यवस्था आणली होती. इथल्या प्रजेला ही नवी राज्यव्यवस्था समजून घेण्याचाच काळ असताना इथे बंड करून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा विचार करणे हे जरा दुर्मिळच होते. पण याच सत्ता आणि समाज परिवर्तनाच्या काळात प्रामुख्याने उल्लेख येतो तो सर्वशृत असलेल्या जव्हारचे पहीले राजे 'जायबा मुकणे' यांचा. दख्खनेत पहिल्यांदाच मुस्लिम राजवटीचा अंमल सुरु झाल्यावर एतद्देशियांत नाराजी आणि अस्वस्थता होतीच. डोंगर माथ्यावरील गडकोटांचे पारंपारीक किल्लेदार असलेल्या महादेव कोळ्यांतही यामुळे प्रचंड अस्वस्थता होती. आपले अधिकार, त्यांच्यावर पातशाह्यांनी आणलेल्या मर्यादा आणि सुलतानांची त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यातली अनुत्सुकता यामुळे या लोकांत नाराजी खदखदतच होती. त्यामुळे असेच एकदा निजामशहा हा पट्टा किल्ल्यापासून जात असताना अनेक महादेव कोळी सैनिकांनी मिळून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या कोळ्यांचा कोणी भक्कम नेता नसल्याने त्यांना विशेष यश मिळाले नाही. मग त्यांनी त्यांच्यातील सर्वात तेजस्वी असलेल्या 'जायबा' यांना आपला नेता ठरवले. जायबा यांनी मग आपला लढा उभारून १३०६ मध्ये जव्हार राज्याची स्थापना केली. हेच ते आजपर्यंत टिकलेले महाराष्ट्राचे सर्वात जुने राजघराणे.! त्यानंतर जायबा यांचे पुत्र नेमशहा यांना दिल्ली सल्तनतीने १३४३ मध्ये मान्यता देऊन 'राजा' हा किताब बहाल केला. अत्यंत कर्तबगार असलेल्या राजे नेमशहा यांच्या कारकिर्दीत जव्हार राज्याचा विस्तार इतका झालेला होता की तेव्हा जव्हारचा महसूल सुमारे ९ लाख रुपये इतका होता (संदर्भ: Aitchison,C.U. 1933).  नेमशहा यांच्या कारकिर्दीनंतर दोन अडीचशे वर्षे जव्हारचे राज्य विनासंघर्ष चालत राहिले. मोगल अथवा इतर बहामनी सल्तनती या नेहमी जव्हार पासून लांबच राहिल्या त्यामुळे या काळात जव्हारच्या कोणत्याही लढाईची नोंद नाही. मात्र पुढे १५८३ मध्ये जव्हारच्या राजाने हल्ला करून पोर्तुगीजांना तुंगारेश्वर सहीत वसईच्या पूर्वेकडील सगळ्या गावांतून हाकलून लावले अशी नोंद आहे (संदर्भ: J. Gerson Da Cunha, 1876). हीच महादेव कोळी आणि पोर्तुगीज संघर्षाची सुरुवात होती असे म्हणावे लागेल. 

undefined

 चित्र : जव्हार राज्याचा भौगोलिक विस्तार 

इथे एका बहुतांशी अपरिचित असलेल्या अजून एका महादेव कोळी राजाचा उल्लेख करणे योग्य होईल. जव्हार राज्याचे संस्थापक जायबा यांनी धरमगड येथील राजाची कन्या मोहनादेवी हिच्यासोबत विवाह केला. धरमगडचे तेव्हाचे नाव होते रामनगर. साधारणतः जायबा यांच्या काही वर्षे आधीच्या काळात रामशाह नावाच्या महादेव कोळी व्यक्तीने रामनगर या राज्याची स्थापना केली होती. नंतर साधारण सतराव्या शतकात रामनगर वर सिसोदिया घराण्याचे राज्य आले आणि त्याचे नाव धरमपूर असे झाले. काही कागदपत्रांत हे धरमपूरचे सिसोदिया रामशाह यांना आपलाच पूर्वज मानतात असे दिसते. मात्र ज्या अर्थी जायबा यांच्याशी तिथल्या राजकन्येचा विवाह झाला त्या अर्थी रामशाह हे महादेव कोळीच असणार हे नक्की. या म्हणण्याला दुजोरा देणारे अजून काही घटनाक्रम आहेत ते थेट शिवाजी महाराजांच्या काळातले. हे घटनाक्रम पुढीलप्रमाणे.  

शिवाजी महाराज जेव्हा सुरतेच्या लुटीसाठी पहिल्यांदा निघाले तेव्हा जव्हार आणि रामनगर इथल्या दोन्ही कोळी राजांनी त्यांना साथ दिली. सुरत मोहिमेसाठी सोबत ४००० सैन्य घेऊन निघालेल्या शिवाजी राजांचे सैन्य या दोन राजांशी हातमिळवणी केल्यानंतर तब्बल १०००० इतके झाले (संदर्भ: Jadunath Sarkar 1919). नंतरच्या काळात पोर्तुगीज लोकांचा दोन्ही महादेव कोळी राज्यांसोबत संघर्ष होतच राहिला. मराठ्यांचा एक महत्वाचा उत्पन्न कर म्हणजे चौथाई होय. या चौथाई कराचा जनक म्हणजे रामनगरचे महादेव कोळी राजा 'सोमशाह' हे होत (संदर्भ: Lele, 1987). सोमशाह हे दादरा आणि नगर हवेलीच्या पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करत असत. चौथाई ही एक प्रकारची खंडणी होती. यात एकूण उत्पन्नाच्या एक चतुर्थांश इतका हिस्सा शेजारच्या राज्यातील राजाला द्यायचा असे जेणेकरून तो राजा आपल्या राज्यावर हल्ला करणार नाही. पोर्तुगीजांनी मग सोमशाह यांचा बंदोबस्त करण्यासाठी जव्हारच्या राजाशी संपर्क केला आणि त्यांनी रामनगरवर हल्ला केल्यास जव्हारला चौथाई देऊ असे सांगितले. त्यानुसार जव्हारच्या राजाने रामनगरवर हल्ला करून त्यांची अनेक गावे जिंकून घेतली, मात्र प्रत्यक्ष रामनगरवर हल्ला केला नाही. त्यामुळे झाले काय की आता पोर्तुगीजांना रामनगर आणि जव्हार अशा दोन्ही राजांना चौथाई द्यावी लागू लागली. पोर्तुगीजांनी जव्हारला वारंवार रामनगरचा बंदोबस्त करण्यास सांगितले, मात्र दोन्ही राजे एकाच जातीचे असल्याने जव्हार तसे करणार नाही असे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी या दोन्हींचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांना चौथाई देण्याचा वायदा केला. मात्र शिवाजी राजांच्याही सैन्यात अनेक महादेव कोळी सरदार असल्यामुळे तेही या दोघांवर हल्ला करण्यास अनुत्सुकच होते (संदर्भ Karandikar 1969). आता पोर्तुगीजांची अडचण अशी झाली की जव्हार आणि रामनगर बरोबरच शिवाजी महाराजांनीही त्यांच्याकडून चौथाई वसूल करण्यास सुरुवात केली. परंतु नंतर पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना चौथाई देणे बंद केले आणि जोपर्यंत तुम्ही जव्हार आणि रामनगरचा बंदोबस्त करत नाही तोवर चौथाई देणार नाही असे सांगितले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी १६७२ मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांना उत्तरेकडे पाठवले. तेव्हा मोरो त्रिंबक यांनी जव्हारचे राजे विक्रम शाह यांचा पराभव करून त्यांच्याकडून १७ लाख रुपये इतकी खंडणी वसूल केली (संदर्भ: Jadunath Sarkar 1919). यांनतर मोरोपंत पेशव्यांनी रामनगरवरही हल्ला केला, मात्र तिथला राजा पळून गेला. त्यांनतर सोमशाह यांनी मुघल सरदार दिलेर खान सोबत सैन्य जमवले आणि मराठा सैन्यावर हल्ला करून गंभीरगड ताब्यात घेतला. पण हे दोघे एकत्र आल्याची खबर लागताच मोरोपंत पेशवे कोकणात निघून गेले आणि मग थोड्या दिवसांनंतर त्यांनी परत रामनगरवर हल्ला करून सोमशाह यांस पकडले व त्यांचा शिरच्छेद केला आणि रामनगरचे राज्य मराठेशाहीत विलीन करून घेतले (Law Narendra Nath, 1939).

 How did Shivaji Maharaj loot Surat? - Quora

 चित्र: शिवाजी महाराजांकडून सुरतेची लूट

 

तेव्हाचे राजकीय संबंध किती लवचिक असत याचे हे एक समर्पक उदाहरण आहे. सुरत लुटीच्या वेळी शिवाजीराजे, विक्रम शहा आणि सोम शहा हे तिघे एकत्रपणे मुघलांशी लढले. मात्र थोड्याच दिवसांनी पोर्तुगीजांनी या तिघांनाही एकमेकांच्या विरुद्ध उभे केले. जव्हार आणि रामनगरचे राजे तर एकाच जातीचे असूनही एकमेकांविरुद्ध लढले. इतिहासाचा अभ्यास करताना तटस्थपणा राखायचा असतो तो याचसाठी. कारण इतिहासातील व्यक्तिंत आपण आपले आणि शत्रू असा भेद करून इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इतिहास सर्वंकषपणे कधीच समजणार नाही. आपले आणि शत्रू असे वर्गीकरण केल्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे अयोग्य आकलन तर होतेच पण त्याचबरोबर अशा व्यक्तिरेखांना एका चाकोरीत बंद केल्याने त्यांचे अगदी मर्यादित रूपच आपण पाहू शकतो. म्हणजे अगदी पोर्तुगीजांनाही यात शत्रू म्हणून पहायला नको असे माझे म्हणणे आहे. कसे एका परदेशी सत्तेने तीन तीन एतद्देशीय सत्तांना आपसांत लढविले, आणि त्याच वेळी ते स्वतःही इंग्रज या दुसऱ्या परदेशी सत्तेशी लढत राहीले हे किती क्लिष्ट आणि अचंबित करणारे वास्तव आहे. आपले आणि शत्रू असा भेद केला तर आपल्याला कित्येकदा आपलेच आपल्यांशी आणि परके परक्यांशी लढलेले आढळतील. ही अशी सगळी सरमिसळ म्हणजे इतिहासाच्या कधी उलट्या तर कधी सुलट्या अशा सगळ्या बाजूंनी हेलकावे घेणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असते. म्हणून ते सगळे तटस्थपणे पाहणे हाच इतिहास जाणून घेण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. 


असो, तर जायबा मुकणे यांच्यानंतर उल्लेख येतो तो एका अत्यंत मोठ्या पदावर असलेल्या महादेव कोळी सरदार साबाजी यांचा. जेव्हा अहमदनगरच्या निजामशहावर इतर शाह्यांनी हल्ले केले तेव्हा तो जुन्नर भागातल्या डोंगरी किल्ल्यांवर आश्रयाला गेला तिथेच त्याला साबाजी कोळी हे सरदार भेटले (संदर्भ:  मॅकिन्टोश 1844). साबाजी हे निजामशाहीचे अत्यंत जवळचे साथीदार बनले. साबाजी हे महापराक्रमी होतेच. त्यामुळे ते अहमदनगरच्या निजामशाहीत थेट सेनाप्रमुख म्हणजे सरसेनापती या पदावर कार्यरत होते. बुऱ्हाण निजाम शहा याने त्यांच्या डोंगर किल्ल्यांवरील पराक्रमामुळे त्यांना 'पर्वतराय' ही पदवी दिली होती. निजामशहा साबाजी यांना प्रतापराजा, परशुरामप्रताप आणि नरसिंहप्रताप या नावांनीही संबोधत असे (Shyam Radhey, 1966). काही ठिकाणी साबाजी कोळी आणि निजाम शहाच्या घरात एकदा वैवाहीक संबंध झाले होते असाही उल्लेख आहे. विजयनगरचा राजा आलिया राम राय आणि विजापूरचा आदिलशहा यांनी मिळून जेव्हा अहमदनगरवर हल्ला केला तेव्हा साबाजी यांनी प्रतिहल्ला करून त्यांचे तब्बल तीन हजार सैन्य मारले आणि सोबतच आदिलशहाच्या पुतण्याला देखील ठार मारले. त्यांनी एकूण तीन निजाम शहांची कारकीर्द पहिली. विशेष म्हणजे शिवरायांचे वडील शहाजी राजे हे अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार बनण्याच्या तब्बल शंभर वर्षे आधीच साबाजी हे सेनाप्रमुख म्हणून त्याच निजामशाहीत कार्यरत होते. मात्र इतक्या महत्वाच्या पदावर असूनही त्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख मिळत नाही. त्यामुळे त्यांचे गाव, आडनाव नेमके काय असेल त्याची काहीही माहिती मिळत नाही. 

Ahmadnagar (Malik Ambar) | Civilization V Customisation Wiki | Fandom
 चित्र: अहमदनगरच्या निजामशाही सल्तनतीचा नकाशा

 

आता आपण मावळ आणि मावळे या शब्दांचा उगम पाहू. सह्याद्रीचा पश्चिम भाग म्हणजे जिथे सूर्य मावळतो त्या भागाला मावळ असे म्हणतात. आणि या भागात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणून ओळखले जाते. अनेक नद्यांची खोरे आणि नेरे ही मावळात येतात. जुन्नर हे एकूण ५२ मावळांचे केंद्र होते. आणि या सर्व या ५२ मावळांचे प्रमुख हे सगळे महादेव कोळी नाईक होते. बिदरच्या बिदरशाहीच्या अंमलात या सर्व ५२ नाईकांचा प्रमुख म्हणजे सरनाईक हा जुन्नर येथे वास्तव्यास राहत असे. आणि जुन्नरच्या चावडीत त्यांची मसलत भरत असे. मावळे हे प्रामुख्याने महादेव कोळीच असल्याने 'हर हर महादेव' ही युद्धगर्जना सुद्धा मूळची महादेव कोळ्यांचीच होय. 

 Nice trecking trip - Reviews, Photos - Shivneri Fort - Tripadvisor

चित्र: जुन्नर हे ५२ मावळांतील महादेव कोळी नाईकांचे मुख्य केंद्र आणि शिवरायांचे जन्मस्थान   

शिवाजी राजांच्या जन्मानंतर १६३२ला जिजाऊंनी शिवनेरी किल्ला सोडल्यावर तो १६३७ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. साधारण १६५०च्या सुमारास औरंगजेब दुसऱ्यांदा दक्खनचा सुभेदार म्हणून महाराष्ट्रात आलेला होता. एव्हना शिवाजी राजांनी स्वराज्य उभे करायला सुरुवात केली होती आणि यामुळे शहाजी राजांना अटक करण्यात आली होती. शहाजीजीराजे कैदेत असताना साधारण १६४९ ते १६५५ शिवाजी महाराजांनी कोणतीही मोहीम हाती घेतली नाही (संदर्भ: Jadunath Sarkar 1919). मात्र १६५६ला त्यांनी जावळीचे खोरे जिंकून घेतले आणि स्वराज्य स्थापनेचे वारे पुन्हा एकदा सह्याद्रीत वाहू लागले. याच काळात जुन्नर आणि एकूण बावन्न मावळांतळे महादेव कोळी नाईक हे सरनाईक खेमू यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम राजवट उलथून देण्याच्या भावनेने प्रेरित झाले. त्यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या बाजूचे घोषित केले (संदर्भ: Ghurye 1963). कॅप्टन मॅकिन्टोश हा खेमू नाईक यांस केंग कुळाचा म्हणतो, म्हणजे खेमू नाईकांचे आडनाव केंगले असावे (संदर्भ: Mackintosh 1844). खेमू नाईक यांच्या नेतृत्वाखाली मग शिवनेरीसह जुन्नर परिसरातील अनेक किल्ले महादेव कोळ्यांनी परत जिंकून घेतले. निजामशाहीचा पाडाव करून हा परीसर मुघल राज्यात समाविष्ट केलेल्या दक्खनचा सुभेदार शहाजादा औरंगजेबास जेव्हा ही विद्रोहाची बातमी कळली तेव्हा तो संतापाने पेटून उठला आणि त्याने मोठी फौज देऊन खेमू नाईकचा बंदोबस्त करायला पाठवले. 

अजून शिवाजी राजांचा संघर्ष दिल्लीच्या मुघल सत्तेशी झाला नव्हता. खेमू नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी मुघलांच्या या प्रचंड फौजेशी पराक्रमाची शर्थ केली पण हजारोंच्या मुघल फौजेपुढे संख्येने त्यांच्या एक दशांशच असलेले हे मावळे टिकले नाहीत. खेमू नाईक आणि त्यांच्या साथीदारांना पकडून शिवनेरी किल्ल्यावर आणण्यात आले. मुघलांशी महाराष्ट्रातून पहिल्यांदाच अशी थेट टक्कर घेणाऱ्या या मावळ्यांना धडा शिकवावा आणि पुन्हा कोणी मोगली सत्तेला आव्हान देऊ नये म्हणून खेमू नाईकांच्या वंशातील व जवळच्या नातेसंबंधातील अगदी तान्ह्या मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांना शिवनेरीवर पकडून आणले गेले व एकूण १६०० मावळवीरांचा तिथे शिरच्छेद करण्यात आला. खेमू नाईक आणि त्यांचे कुटुंब पूर्णतः निर्वंश झाले. या १६०० मुंडक्यांच्या राशी रचून त्यावर एक चबुतरा बांधण्यात आला. या चबुतऱ्याला 'कोळी चौथरा' असे म्हंटले जाते आणि आजही तो शिवनेरी किल्ल्यावर अस्तित्वात आहे. हर्डीमन म्हणतो की या घटनेनंतरच महादेव कोळ्यांना 'मर्द मावळे' असे संबोधले जाऊ लागले (Hardiman, 2007). शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत या मर्द मावळ्यांची भूमिका अतिशय महत्वाची राहिली. आणि अगदी शेवटपर्यंत ते मराठा साम्राज्याच्या सगळ्या छत्रपतींशी एकनिष्ठ राहिले. कोळी चौथऱ्याच्या नरसंहारानंतर झोमाजी बोकड हा बावन्न मावळांचा सरनाईक बनला. झोमाजी नाईकाने खूप पराक्रम करून अनेक किल्ले जिंकून घेतल्याने त्याला ‘मनसबदार’ ही पदवी बहाल करण्यात आली होती (संदर्भ: Mackintosh 1844). 


 Treks around Thane and Mumbai: March 2019

चित्र: शिवनेरी किल्ल्यावर १६०० मावळवीरांच्या शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असलेला कोळी चौथरा  


छत्रपती शाहू यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची घडी काहीशी विस्कळीत झाली होती. अशावेळी मराठी साम्राज्य वाढविण्याचा नानासाहेब पेशव्यांनी निर्धार केला होता. याच काळात त्यांनी राजूर आणि कोतुळ प्रांतातील भांगरे व खाडे या दोन सरदारांना त्र्यंबक किल्ला मोगलांकडून जिंकून घेण्याची कामगिरी सोपवली. या दोघांनी या कामगिरीसाठी पटेकर बंधूंची मदत घेतली. पटेकर बंधू हे पाच भाऊ होते. पाचही जण अत्यंत शूरवीर आणि कर्तबगार होते. वेष बदलून हेरगिरी करण्यात, कोणताही अवघड डोंगरकडा लीलया चढून जाण्यात त्यांचा हात धरणारे कोणी नव्हते. एक एक पटेकर बंधू दहा दहा जणांना पुरून उरत असे इतके ते पाचही जण शूर होते (संदर्भ: Mackintosh 1844). जेव्हा भांगरे आणि खाडे सरदार त्र्यंबक किल्ल्याखाली जमले तेव्हा किल्ल्याचा उभा कडा पाहून त्यांच्या सैनिकांची वर जाण्याची हिम्मत होईना. इतका अवघड कडा चढता येणार नाही, आणि चढलो तरी इतकी दमछाक होईल की वर गेल्यावर लढाई करण्याइतकी ताकद उरणार नाही असे सगळे म्हणू लागले. सैनिकांनी अशी कच खाल्ली आहे हे पाहून मग पाच पटेकर बंधूंतील दोघेजण पुढे आले व बघता बघता ते सर्वांपुढे अगदी लीलया तो कडा चढून वर गेले आणि दोन तासातच थेट किल्लेदाराचा चांदीचा हुक्काच घेऊन खाली आले. हे पाहून इतरांनाही हिम्मत आली आणि ते त्वेषाने किल्ल्यावर चाल करून गेले व किल्ला ताब्यात घेतला. या यशानंतर पेशव्यांनी भांगरे आणि खाडे सरदारांना जव्हारच्या राजाच्या ताब्यातील रतनगड, कलाडगड, अलंग आणि कुलंग हे किल्लेही जिंकून घ्यायला सांगितले आणि त्यांनी हे किल्लेही जव्हारच्या राजाकडून जिंकून घेऊन मराठा साम्राज्यात सामील केले. रतनगडावर जव्हारचे राजे त्यांच्या कुटुंबासहीत स्वतः हजर होते, त्यामुळे रतनगडाची लढाई अगदीच अटीतटीची झाली व दोन्हीकडचे मिळून तब्बल दोनशे लोक मारले गेले. किल्ला आला तरी जव्हारचे राजे मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर थोरल्या पटेकर बंधूला आणि खेरुजी नाईक खाडे याला पेशव्यांतर्फे पालखीचा मान बहाल करण्यात आला. तसेच सरदार खेरुजी खाडे यांस बारी हे गाव तर सरदार यमाजी भांगरे यांस साकीरवाडी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले (संदर्भ: Mackintosh 1844). 

 Trekkers Of Maharashtra Tour Travel

चित्र: सह्याद्री पर्वतरांगेतील महत्वाचा रतनगड किल्ला  


मावळे म्हणजे महादेव कोळी सरदार हे सगळ्या मराठा छत्रपतींशी एकनिष्ठ राहीले असले तरी पेशव्यांशी मात्र त्यांनी अनेकवेळा वैर घेतले होते. आणि यातील सर्वात महत्वाचे आणि ज्यांना महादेव कोळ्यांचे शिवाजी असे म्हणता येईल असे सरदार आहेत सुभेदार नाईक जावजी बांबळे. 

जावजी बांबळे यांचे वडील हिरोजी बांबळे यांच्या मृत्यूनंतर जावजी यांनी त्यांचे नाईकपद आपल्याला मिळावे असा जुन्नरच्या सुभेदाराकडे अर्ज केला. मात्र सुभेदाराला जावजी पसंत नसल्याने त्याने जावजी यांचा अर्ज फेटाळून त्यांना फक्त एका गावची पाटीलकी देऊन रवाना केले. जावजीही मुकाट्याने शेती आणि पाटीलकी यांत व्यस्त होते. पण सुभेदाराला त्यांची खोडच काढायची होती म्हणून त्याने एकदा जावजी पुरेसा महसूल जमा करत नाही अशी नोटीस बजावून एका शिपायाला त्यांचेकडे वसुलीसाठी पाठवले. याने जावजींना राग येऊन त्यांनी विद्रोहाचे हत्यार उपसले. जावजींनी मग पेशव्यांच्या राज्यातून खंडणी उकळायला सुरुवात केली. यामुळे मग नाना फडणविस यांनी जुन्नरच्या सरदार राजा सावंत याला मोठी फौज देऊन जावजीला पकडायला सांगितले. राजा सावंतने जावजींच्या कुटुंबाला अटक केली आणि त्यांच्या दोन भावांना पकडून कडेलोटाची शिक्षा दिली. त्यानंतर त्याने जावजींच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांकडून एक मोठी तुकडी मागवून घेतली आणि तो स्वतः पेशव्यांच्या सैन्याची ही मोठी तुकडी घेऊन जावजींना शोधत फिरू लागला. जावजी त्याच्या हाती तर लागलेच नाहीत, पण उलटपक्षी एकदा एका ठिकाणी तळ ठोकलेला असताना जावजींनीच रात्रीच्या अंधारात राजा सावंतावर हल्ला करून त्याला आणि त्याच्या सगळ्या सैनिकांना ठार केले. त्यानंतर राजा सावंताच्या मुलाला नाना फडणविस यांनी जुन्नरचा सुभेदार बनवले. पण त्यालाही जावजींनी जुन्नर येथे हल्ला करून ठार केले. हे ऐकल्यावर नाना फडणविसाने देवजी कोकाटे या महादेव कोळ्याला सरनाईक बनवून जावजींचा बंदोबस्त करायला पाठवले. पण जावजींच्या एका मराठा सैनिकाने त्यांना कोकाटे हा तुम्हाला ठार मारायला आला आहे असे सांगितले तेव्हा जावजींनीच कोकाटेला ठार करून टाकले. 

याचवेळी राघोबादादा यांनी पेशवाईवर स्वतःचा दावा सांगून बंड केले होते. मग जावजींनी राघोबादादाशी संपर्क केला. राघोबादादांनी सांगितले की खरा पेशवा मीच आहे, त्यामुळे तू आता नाना फडणवीसाच्या ताब्यातील किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात कर. राघोबादादाची मोहोर असलेला हा खलिता मिळाल्याने जावजींना इतरही अनेक महादेव कोळी नाईकांची साथ मिळाली आणि मग त्यांनी एकामागून एक लढाया करत कोथळीगड, भैरवगड, सिद्धगड असे पेशव्यांच्या ताब्यातील किल्ले लगोलग जिंकून घेतले. नाना फडणविसांनी अजून एक तुकडी जावजीला मारण्यासाठी कोकणात पाठवली, पण जावजींनी स्वतःच त्यांच्यावर हल्ला करून त्यांची वाताहत केली आणि लगेच गोरखगडही जिंकून घेतला. त्यांनतर जावजी घाट चढून वर आले आणि त्यांनी रतनगड, अलंग आणि मदनगड हे किल्लेही ताब्यात घेतले. लागोपाठ होणाऱ्या इतक्या पराभवांनी तेव्हा संपूर्ण भारतात अतिशय बुद्धिमान आणि चतुरस्त्र राजकारणी म्हणून नावाजलेले नाना फडणवीस खूपच क्रोधीत झाले. त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक सैन्य तुकडीचा जावजींनी समाचार घेतला होताच पण जावजी एकामागून एक पेशवाईचे किल्लेही ताब्यात घेत चालले होते. हा नाना फडणवीस यांच्या 'भारतातील सर्वात मोठा मुत्सद्दी' या प्रतिमेला मोठा तडा होता. इंग्रजांसहीत सगळ्या देशातील सत्ता नाना फडणविसांपुढे गारद होत असताना हा एक य:किंचित नाईक त्यांना भारी पडत होता. हे सहन न होऊन नाना फडणविसांनी गोडबोले नावाच्या सरदाराकडे मोठ्या तुकड्या देऊन त्याला जावजींच्या मागे पाठवले. आणि जावजीला लवकरात लवकर पकडून तोफेच्या तोंडी द्यावे असा आदेश दिला. पण जावजी गोडबोलेवरही गनिमी काव्याने हल्ले करतच राहिले. एकदा गोडबोलेला खबर लागली की जावजी रतनगडावर आहेत. गोडबोलेने तात्काळ रतनगडाला वेढा दिला. आता जावजी काही वाचत नाही असा विचार करत असतानाच जावजी रतनगडावरून रातोरात निसटून महालदेशात पेशव्यांच्या गावांतून खंडणी सुद्धा वसूल करू लागले होते. आणि गोडबोले उगीचच रतनगडाला वेढा देऊन बसला होता. इतकी मोठी फौज देऊनही जावजी सापडत नाहीत हे पाहून निराश होऊन नाना फडणविसांनी गोडबोलेला परत बोलावून घेतले. दरम्यान राघोबादादा स्वतःच इंग्रजांच्या नजरकैदेत अडकला असून तो पेशवा होण्याची काही शक्यता नाही हे जावजींना लक्षात आले. आजपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी नाना फडणवीसांना नामोहरम केले असले तरी फडणवीस अत्यंत चिकाटीचा माणूस असून तो आपल्याला ठार मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे जावजींनी ओळखले होते. मग जावजींनी तुकोजी होळकर यांच्याशी समेट केला आणि तुकोजी यांचा शब्द नाना फडणवीस मोडू शकत नाही हे माहित असल्याने नाना फडणवीसांशी समझोता केला. इतकेच नाही तर समेट होत असतानाच जावजी यांनी अगदी सहजपणे लोहगड जिंकून पेशवाईत सामील केला.

आता समेट झाल्यावर जावजी यांच्यासाठी मग राजूर नावाचा नवा सुभा तयार करून त्यांना त्याचे सुभेदारपद देण्यात आले. या सुभ्यात राजुरातील चाळीस गावे, महालदेशातील बावीस गावे, साकुर्ली जिल्ह्यातील साठ गावे आणि कोकणातील अजून अठ्ठावीस गावे अशी जवळजवळ दीडशे गावे जावजी यांच्या अधिपत्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त टाकेद हे गाव जावजी यांना त्यांची वैयक्तिक जहागीर म्हणून देण्यात आले. जावजी यांचा हा सुभा किती मोठा होता याची यावरून कल्पना यावी की त्यावेळी जव्हारच्या राजाकडे सुद्धा जावजी यांच्या निम्मीच गावे होती. 

शिवाजी महाराजांप्रमाणेच जावजी यांनीही शून्यातून सुरुवात करून थेट तेव्हाच्या भारतातील सर्वात शक्तिशाली सत्ता असलेल्या पेशवाईलाच आव्हान दिले होते. इंग्रजांसारख्या मातब्बर शत्रूलाही मुत्सद्देगिरीने मात देणाऱ्या नाना फडणवीसांना जावजी यांनी हतप्रभ केले होते. इतकेच नाही तर एकही लढाई न हरता पेशव्यांची आपल्याविरुद्ध असलेली प्रत्येक मोहीम त्यांनी अयशस्वी ठरवली आणि एका स्वतंत्र राज्यापेक्षा दुप्पट भूभाग असलेला नवा सुभा मिळवला. मात्र खेदाची गोष्ट ही की इतिहासाचे हे एक महत्वाचे पान आपल्या पराक्रमाने असे सुवर्णाक्षरांत लिहूनही जावजी बांबळे या शूराला आज कोणीही ओळखत नाही. राजूरला आजही लोक 'बांबळ्याचे राजूर' म्हणून ओळखतात, पण राजूरमध्येही कुणालाच आपल्या गावाचे हे नाव असे बांबळे आडनावावरून कसे पडले हे माहीत नाही. ही आपल्या इतिहासातील एक मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल. जावजी बांबळे यांची वरील पूर्ण माहिती ही मॅकिन्टोश (संदर्भ: Mackintosh 1844) या इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवल्यामुळे आज कळू शकते, अन्यथा हा वीर कायमचा विस्मृतीत गेला असता.  

Elevation of Akole, Maharashtra, India - Topographic Map - Altitude Map

 चित्र: जावजी बांबळे यांची कर्मभूमी असलेल्या राजूरमधील पारंपारिक उरूस

 

यानंतर पेशवाईचा १८१८ मध्ये अंत होईपर्यंत काही महादेव कोळी इंग्रज तसेच पेशव्यांविरुद्ध बंड करत राहिले. ओतूरचे सत्तू शेळकंदे, कोकाटे, देवगावचे गोविंद भांगरे, वाळोजी भांगरे हे त्यातील प्रमुख होत. पण मराठी सत्तेच्या अस्तानंतर इंग्रजांनी सगळया नाईकांना, सरदारांना, सैनिकांना इंग्रजी पोलीस सेवेत दाखल करून घ्यायला सुरुवात केली. बरेच जण इंग्रजांच्या या नोकरीत सामीलही झाले पण काही अपवाद होतेच. रतनगडाचे किल्लेदार गोविंदजी खाडे हे त्यांपैकी एक. त्यांनी इंग्रजी नोकरीत सामील होण्यास नकार दिला. त्यांना वाटत होते की इंग्रजी सत्ता संपून पुन्हा मराठा राज्य येईल. पण तसे झाले नाही. त्यांनी नारायणराव होळकर यांना सामील होण्याचे ठरवले. पण गोविंदराव हे खूपच वृद्ध असल्याने ते जास्त काळ लढा देऊ शकले नाहीत. गोविंदजी यांच्यानंतर त्यांचे पुत्र काशीबा खाडे आणि राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध मोठे बंड केले. मात्र कॅप्टन मॅकिन्टोश या हुशार इंग्रज अधिकाऱ्यामुळे हे बंद मोडून काढण्यात आले. रामजी यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली आणि ते तिथेच मृत्यू पावले. फक्त पुरुषच नाही तर महादेव कोळी समाजाच्या स्त्रियाही अतिशय पराक्रमी होत्या. मॅकिन्टॉश सांगतो की ओतूरची एक 'ताई शेळकंदे' नावाची शूर स्त्री होती. ती कोणत्याही मोहिमेवर जाण्यास कधीही नकार देत नसे. ती जेव्हा कधी लोकांत येत असे तेव्हा नेहमी तिच्या हातात धनुष्यबाण आणि पाठीवर एक बाणांचा भाता असे (संदर्भ: Mackintosh 1844). 

महादेव कोळ्यांनी विशेषतः नगरच्या अकोले तालुक्यात खूप लोकांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले, आजही गावागावांत या वीरांना बंडकरी म्हणून ओळखले जाते आणि अतिशय आदराने त्यांची आठवण काढली जाते. इंग्रजी सत्ता उलथून टाकणे या उद्देशाने हे शेकडो स्वातंत्र्यसैनिक आपल्या प्राणांचीही पर्वा न करता लढले आणि सगळ्यांनीच आपल्या जीवाचे बलिदान दिले. या सर्वांत प्रामुख्याने सांगता येतील ते म्हणजे रामा किरवे. रामा किरवे यांनी बरेच बंडकरी जमवून इंग्रजांच्या ठिकठिकाणच्या तुकड्यांवर हल्ले करून त्यांना नामोहरम केले. इंग्रजांनी रामा किरवे यांनी पकडण्यासाठी अनेक रेजिमेंट पाठवल्या पण ते हाती लागले नाहीत. एकदा किरवे यांच्या गटाची नांदवा नावाच्या गावात इंग्रजांच्या ११व्या रेजिमेंटशी गाठ पडली. किरवे आणि त्यांच्या साथीदारांनी या रेजिमेंटवर जबरदस्त हल्ला चढवला. आणि अनेक इंग्रज शिपायांना त्यांनी ठार केले. इंग्रजांच्या सुदैवाने त्यांनी गावातल्या एका मंदिरात आश्रय घेतला आणि तिथे ते गुपचूप लपून बसले म्हणून बऱ्याचशा शिपायांचे प्राण वाचले. यानंतर मग रामा किरवे यांनी कणवली या गावावर हल्ला करून लूट केली. इंग्रजांच्या ११व्या आणि १३व्या रेजिमेंटचे लेफ्टनंट लॉयड आणि लेफ्टनंट फोर्ब्ज यांनी एकदा रामा किरवे यांच्या घराला वेढा घातला. पण किरवे त्यातूनही शिताफीने निसटून गेले आणि त्यांची खबर देणाऱ्या कोतूळच्या पाटलाचे घर त्यांनी नंतर जाळून टाकले. मात्र पुढे पुन्हा एकदा फितुरीमुळे रामा किरवे यांचा पत्ता इंग्रजांना मिळाला आणि मग त्यांना अटक करून १८३० च्या सुमारास अहमदनगर येथे फाशी देण्यात आले (संदर्भ: Mackintosh 1844).


यानंतर संघर्ष येतो तो इंग्रजांविरुद्ध सर्वात मोठा लढा उभारणाऱ्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा. रामजी भांगरे यांच्यानंतर राघोजी भांगरेंना त्यांच्या वडिलांचे जमादार हे पोलीस पद मिळाले नाही तरीही ते मिळालेल्या वंशपरंपरागत पाटीलकीमध्येच समाधान मानून देवगाव येथे राहत होते, परंतु राघोजी यांचा पारंपारिक हक्क असलेले पोलीस जमादारपद मिळालेला अमृतराव कुलकर्णी हा मात्र राघोजी कधीतरी आपले पद काढून घेईल म्हणून अस्वस्थ होता. एक दिवस तो देवगावला गेला, त्याच्यासोबत आबाजी बांबळेसुद्धा होता. त्यांनी राघोजींच्या घरातील स्त्रियांशी गैरवर्तन केले व इतर पुरुषांनाही टॉर्चर केले, आणि छोट्या राघोजीला पकडून घेऊन राजूरला आणून कैदेत टाकले. एक दिवस राघोजींची आई तुरुंगात जेवण घेऊन आली आणि तिने भाकरीमध्ये लपवुन एक सुरा राघोजींच्या हवाली केला. त्या सुऱ्याच्या मदतीने राघोजींनी आपले चामड्याचे बंध तोडून पोलीस स्टेशनमधून पलायन केले.

 Maharashtra News Nashik News Krantiveer Raghoji Bhangre statue erected at  Igatpuri | Nashik News : नाशिकच्या इगतपुरीत क्रांतिवीर राघोजी भांगरेचे  स्मारक उभारणार, जिल्हाधिकारी ...

चित्र: आद्यक्रांतिकारक थोर वीर राघोजी भांगरे  


या प्रसंगानंतर राघोजींनी इंग्रज सत्तेविरुद्ध खुले बंड पुकारले. त्यांनी राजूर पोलीस स्टेशनवर हल्ला करून अमृतराव कुलकर्णी यास ठार केले आणि पोलिसांची शस्त्रे घेऊन ते फरार झाले. यानंतर इंग्रजांनी राघोजींच्या आईला आणि इतर स्त्रियांना अटक करून तुरुंगात त्यांचे खूप हाल केले. हे समजल्यावर विनाकारण आईला अटक करणाऱ्या सर्व पोलिसांना शोधून काढून राघोजींनी ठार मारले. राघोजींनी 1844 च्या सुरुवातीला तीन इंग्रज शिपायांना चिचोंडी येथे गोळीबारात ठार केले व त्यानंतर सप्टेंबरमध्ये भीमाशंकर येथे इंग्रज पोलिस तुकडीवर हल्ला करून आठ पोलिस ठार केले व तीन पोलीस पकडून ठेवले. या पकडलेल्या पोलिसांना मात्र ठार न करता असे सांगून सोडले की तुम्ही तुमच्या गोऱ्या साहेबाला सांगा की तू काळे शिपाई माझ्याशी लढण्यासाठी का पाठवतोस? त्याऐवजी तू गोऱ्या इंग्रजांना पाठव, मग मी त्या सगळ्यांची शिरे कापून या रानात सगळीकडे टांगून ठेवेल (संदर्भ: Hardiman 1995). 

याचदरम्यान राघोजींनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला ज्यात त्यांनी इंग्रजांच्या सेवेत असलेल्या लोकांना आणि नगर जिल्ह्याच्या 18 परगण्यातील सर्व लोकांना व अधिकारी, पाटील यांना सांगितले की त्यांनी इंग्रजांशी एकनिष्ठ न राहता "सरदार नाईक राघोजी भांगरे" यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनाच सारा द्यावा. असे न केल्यास इंग्रजांची साथ देणाऱ्यांचे नाक व कान कापले जातील. कुणीही इंग्रजांना घाबरण्याचे कारण नाही, कारण इंग्रजांचे राज्य आता संपल्याचे मी घोषित करत आहे. त्यानंतर राघोजी गावोगावी जाऊन सारा गोळा करत असत. असे करण्यापूर्वी ते गावामध्ये एक शेणाचा गोळा आणि एक टोकाला कापड गुंडाळलेला बाण पाठवत असत. शेणाचा गोळा पाठवणे म्हणजे तुम्ही माझे ऐकले नाहीत तर तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा होईल असा संकेत होता तर टोकाला कापड गुंडाळलेला बाण म्हणजे तुमची घरे-दारे जाळून टाकण्यात येतील असा संकेत होता. अनेक ठिकाणी उल्लेख केला जातो की राघोजींनी गावांत दरोडे टाकले, परंतु ते दरोडे नव्हते तर राघोजी प्रत्येक गावात जाऊन पाटलाला भेटून पाटलाने किती कर गोळा केला आहे ते विचारून त्याच्याकडून तो कर स्वतः घेत असत.  आणि कर वसूल केला नसेल तर त्याला त्यावेळी कर वसूल करायला लावून त्याच्याकडून ही रक्कम घेऊन त्याला त्याची रीतसर लेखी पावती सुद्धा देत असत. जर ते दरोडे असते तर अशी पावती देण्याचे काही कारण नव्हते. आपण इंग्रज सत्ता अमान्य करत असून स्वदेशी राज्य स्थापित केले आहे, आणि म्हणून कर वसूल करत आहोत अशी राघोजींची भूमिका होती (संदर्भ: Hardiman 1995). 

इंग्रजी सत्तेबरोबरच राघोजींनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सावकारांविरुद्ध सुद्धा खूप कारवाया केल्या. गावोगावच्या अन्यायी सावकारांवर हल्ला करून राघोजी त्यांची नाके व कान कापून त्यांच्या हिशेबाच्या साऱ्या कागदपत्रांची होळी करत असत. जर कुणी विरोध केला तर त्यांची घरेही जाळून टाकली जात. मात्र त्यांची घरे जाळण्यापूर्वी आजूबाजूच्या लोकांना सावध करून आग तुमच्या घरापर्यंत पोचणार नाही यासाठी सावध रहायला सांगत. 

राघोजी भांगरे यांनी अहमदनगर कोर्टाला लिहिलेल्या एका पत्रात सांगितले होते की रयतेचे फार हाल होत असून इंग्रज न्यायालय आणि सावकार हे रयतेला खूप त्रास देत आहेत. मी सावकारांचा बंदोबस्त केला असून सरकारने जर आता रयतेस त्रास देणे थांबवले नाही तर तुमचा देखील तसाच बंदोबस्त करण्यात येईल. नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा आणि कोकण या भागांत राघोजींनी अनेक अन्यायी सावकारांवर हल्ले करून त्यांचे रेकॉर्ड्स जाळून टाकून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. सगळ्या गावांतून राघोजींचे स्वागत आणि समर्थन केले जात होते. ते जिथे लपले असतील तिथे जवळच्या गावातील लोक त्यांना जंगलात धान्य आणि अन्य रसद स्वतःहून पुरवत असत.

स्त्रियांच्या मान सन्मानाच्या बाबतीतही राघोजी अत्यंत तत्वप्रिय व संवेदनशील होते. ज्या अन्यायी सावकारांना कान व नाक कापून त्यांनी अद्दल घडवली त्यांच्या घरातील कोणत्याही स्त्रीला त्यांनी कधीही थोडीफारही इजा केली नाही. राघोजींनी ज्या गावांतून कर वसुली केली वा सावकारांना अद्दल घडवली त्यातील अनेक पंचनामे इंग्रजांनी लिहून ठेवले आहेत. अशा कुठल्याही मोहीमेत कधीही कोणत्याही स्त्रीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्याचे इंग्रजांच्या कोणत्याही नोंदींत नमूद नाही. उलट स्त्रियांच्या सन्मान ठेवला नाही म्हणून राघोजींनी अनेकांना शिक्षा केल्या. एकदा तर राघोजी यांनी त्यांच्याच टोळीतील एका सैनिकाने एका स्त्रीशी गैरवर्तन केले म्हणून त्यास ठार मारण्याची शिक्षा दिली होती (संदर्भ: Hardiman 1995).

राघोजींचे मित्र आणि समर्थक त्यांच्याशी इतके एकनिष्ठ होते की बुधा पेढेकर या मित्रास जेव्हा इंग्रजांनी पकडले आणि राघोजींचा ठावठिकाणा सांगण्यासाठी टॉर्चर केले तेव्हा ठावठिकाणा दाखवतो असे सांगून बुधा पेढेकर त्यांना घेऊन एका डोंगरावर गेले आणि तिथे गेल्यावर कड्यावरून उडी घेऊन प्राण दिले पण राघोजींची माहीती अजिबात सांगितली नाही. 1839 ला साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांचे संस्थान खालसा करण्यात आले, व ते उत्तरेत निघून गेले. त्यानंतर इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्यासाठी आणि आणि पुन्हा प्रतापसिंह त्यांना छत्रपती बनविण्यासाठी गुप्तपणे हालचाली चालू झाल्या. 1843 मध्ये अंतोबा लोटेकर यांनी एक सनद महाराष्ट्रात आणली जी त्यांना ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी दिलेली होती, आणि त्यात सातारचे राजे प्रतापसिंह यांना परत छत्रपती बनविण्याचा उल्लेख होता. 29 जानेवारी 1844 ला अंतोबा लोटेकर हे राघोजी भांगरे यांना पाडोशी येथे भेटले आणि त्यांनी राघोजी यांना ती सनद दाखवली व इंग्रजांचे राज्य उलथवून छत्रपतींचे राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले (संदर्भ: Hardiman 1995). काही ठिकाणी राघोजी यांनी गुप्तपणे उत्तरेत जाऊन छत्रपती प्रतापसिंह यांचीही गुप्त भेट घेतल्याचे नमूद केलेले आहे.

राघोजींच्या आधीही अनेक बंडे झाली. मात्र ती बंडे शक्यतो वैयक्तिक ध्येयासाठी होती. जनतेसाठी लढा देणाऱ्या क्रांतीची अजून सुरुवात झाली नव्हती. वैयक्तिक लढ्यापासून जनतेसाठीच्या लढ्याच्या परिवर्तनाच्या टाईमलाईनवर बरोबर मध्यावर राघोजी यांचा लढा येतो. राघोजी हे पहीले क्रांतिकारक होते ज्यांनी त्यांचा लढा जनतेसाठी लढला. इंग्रज सत्ता नष्ट करून पुन्हा मराठा सत्तेची स्थापना करण्यासाठी लढा लढला. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धही पहील्या सशस्त्र लढ्याचे श्रेय राघोजी भांगरे यांनाच जाईल. राघोजींनी नुसता एक सशस्त्र लढाच उभारला नाही तर लोकांमध्ये हक्कांसाठी लढण्याची चेतना जागृत केली. 

ज्या स्त्रियांनी चूल आणि मूल यापलीकडे काही विचार केला नाही त्यांच्यातही राघोजी यांच्या लढ्याने अन्यायाविरुद्ध जाब विचारण्याची प्रेरणा निर्माण केली. बंडकरी न सापडल्यामुळे पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायका व कुटुंबातील इतर स्त्रियांना त्रास देत व कधीकधी त्यांनाच अटक करून तुरुंगामध्ये डांबत असत. त्यामुळेच 1844 मध्ये इंग्रजांनी कैदेत टाकलेल्या बंडकऱ्यांच्या बायकांपैकी एका स्त्रीने अहमदनगरच्या इंग्रज अधिकाऱ्यास पत्र लिहून असा जाब विचारला की तुमचे सरकार असे कुठल्या प्रकारचे सरकार आहे जे स्त्रियांना बंदी करून मग क्रांतिकारकांशी लढू इच्छिते? एक लक्षात ठेवा, स्त्रियांना त्रास देऊन कोणीही क्रांतिकारक तुम्हाला वश होणार नाही. तुमचा कायदा निरपराध लोकांना त्रास देण्यास मनाई करत असताना तुम्ही आम्हा स्त्रियांस का अटक केली आहे? जर तुमच्यात आम्हाला मोकळे सोडण्याची हिंमत नसेल तर आम्हाला असे नुसते तुरुंगात डांबण्यापेक्षा आम्हाला अहमदनगरला नेऊन थेट फासावर चढवावे. 

नेहमी इंग्रजांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झालेल्या राघोजी यांना कुणीतरी फितुरी करून टीप दिल्याने 1848 मध्ये पंढरपूर येथे अटक करण्यात आली.  त्यानंतर त्यांना एकतर्फी खटला चालवून डिफेन्सची संधी न देता दोषी ठरवून 2 मे 1848ला ठाणे कारागृहात फाशी देण्यात आले. राघोजींचे प्राण घेण्यात आले मात्र राघोजींच्या लढ्याची प्रेरणा घेऊन बंड मात्र चालूच राहीले. राघोजींनंतर नगर आणि पुणे जिल्ह्यांत होनाजी केंगले यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा उभारला, त्यानंतर दगडू देशमुख, कोंडाजी नवले, चिमण निर्मळ, सत्तू मराडे या आणि अशा अनेक महान क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध दंड थोपटून, बंड उभारून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत लढत राहून आपल्या प्राणांची आहुती दिली. 



संदर्भ सूची 

१. रावबहादूर डी बी पारसनीस, १९१६ पुस्तक 'महाबळेश्वर' पृष्ठ क्र ६ आणि १३६

२. Aitchison C.U. 1933, A Collection of Treaties Engagements and Sanads Relating to India and Neighbouring Countries Vol.IV

३. J. Gerson Da Cunha, 1876, Notes on The History and Antiquities Chaul and Bassein, J. Gerson Da Cunha, Thacker, Vining & Co. 

४. Jadunath Sarkar, 1919, Shivaji and His Times

५. Lele, Purushottam Shripad (1987). Dadra and Nagar Haveli: Past and Present

६. Karandikar, Shivaram Laxman 1969, The Rise and Fall of the Maratha Power

७. Law Narendra Nath, 1939, The Indian Historical Quarterly, Volume 15. Calcutta Oriental Press.

८. Mackintosh 1844.: Transactions of bombay geographical society, page २३६

९. Shyam Radhey, 1966, The Kingdom of Ahmadnagar. Motilal Banarsidass Publ. p. 515

१०. Ghurye G. S.  1963, The Mahadev kolis 

११. Hardiman David 2007, Histories for the Subordinated. New Delhi, India: Seagull Books. p. 103

१२. Hardiman David 1995, Community, patriarchy, honour: Raghu Bhanagre's revolt, The Journal of Peasant Studies, 23:1, 88-130

 

 

चित्र सोर्स

https://www.trawell.in/admin/images/upload/162482405Mahabaleshwar_Mahabaleshwar_Temple_Main.jpg

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/00/Thana_Agency_Jawhar_State_during_British_India.svg/800px-Thana_Agency_Jawhar_State_during_British_India.svg.png

https://qph.cf2.quoracdn.net/main-qimg-b871efb2cec16e7a43b44d5ef60d5a5a-lq

https://static.wikia.nocookie.net/civilization-v-customisation/images/d/dd/Agla_Ahmadnagar_MalikAmbar_Map.png/revision/latest?cb=20240221235022 

https://media-cdn.tripadvisor.com/media/photo-s/04/35/a5/00/shivneri-fort.jpg

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEinXhUg6Kq37treViv1MoC3SDml3MMQuX1DGBcEvWaYACQ5K5e5qnQIqKJ0f2b9I9K1kD5zFJEmHvGjJkkpQowk-r3ldlOCHgZ9WKiZrB2BwwgPmEU0sRnsjpZXCW8Ou8pYLgVxff8wYaam/s1600/koli+chauthara+shivneri+fort+junnar.JPG

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQtH6iZgk0LAtBHllefhrP8g7lKnzgWNiCarg&usqp=CAU

https://live.staticflickr.com/7694/17245523411_65c50f2f13_o.jpg

https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/8c2fed35d127949fb2d81835b6dea761_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=640