हा ब्लॉग शोधा

रविवार, २२ जून, २०२५

आर्थिक साक्षरता


१. इट्स ऑल अबाउट मनी हनी

सिकंदर, औरंगजेब, ओबामा, ओसामा, ट्रम्प, चंद्रगुप्त, नेपोलियन, थॉमस एडिसन, हडप्पा संस्कृती, मेसोपोटेमिया, मंदीर, चर्च, मशीद, रावण, मोझेस, मुंबई, मोझाम्बिक या सगळ्या वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या धर्मात होऊन गेलेल्या लोकांत एक गोष्ट कॉमन आहे. सगळेच्या सगळे पैसा या एका संकल्पनेला हमखास मानतात. एकवेळ देवाला वा धर्माला यातील कोणी मानणार नाहीत, पण पैसा वा संपत्ती या गोष्टीला झाडून सगळेच्या सगळे खलपुरुष वा सत्पुरुष वा स्त्रिया हे मानतात म्हणजे मानतातच.
जेव्हा माणूस शेती करायला लागला आणि धान्य साठवू लागला, तेव्हा केव्हातरी 'संपत्ती' या संकल्पनेचा जन्म झाला. शेती आणि गाव हे मागेपुढेच अस्तित्वात आले. माणूस मोठे समूह बनवून राहू लागला. त्यावेळी त्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडू लागली. प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असू शकत नाही, म्हणून मग 'माझी वस्तू घेऊन तुझी वस्तू दे' असे व्यवहार सुरु झाले तेव्हापासून संपत्ती ही संकल्पना अस्तित्वात आली ती आजतागायत. देवाची, धर्माची रूपे आणि संकल्पना ही सुद्धा काळानुरूप मागच्या १०००० वर्षांत खूप बदलत गेली, पण आपल्याकडील संपत्तीच्या बदल्यात दुसरी संपत्ती घेणे व देणे हे मात्र जसेच्या तसे कायम आहे. हडप्पा संस्कृतीत धर्म होता का, जाती होत्या का, काव्ये होती का, राजा होता का हे आपल्याला नक्की माहित नाही, पण व्यापार मात्र नक्की होता याचे पुरावे मिळतात. ही पैशाची ताकद आहे.
'वीज चमकवणारी, पाऊस पाडणारी कोणतीतरी अज्ञात शक्ती' अशी देवाची सुरुवात होती, ती मग पुढे विश्वाचे निर्माण करणारा अज्ञात व्यक्ती अशी झाली. मग देवाला मानवी रूप मिळाले, मग देव अगदी माणसातही अवतार घेऊन आले. जगभरातले राजे स्वतःला ईश्वरच म्हणवून घेत असत. मग देवाचे पुत्र आले, मग प्रेषित आले. अशा प्रकारे काळानुरूप देव मुळातून खूप बदलत राहीला. पण 'तुझे दे आणि माझे घे' ही पैशाची संकल्पना काही बदलली नाही. इतकेच नाही तर देव, धर्म, राज्यव्यवस्था हे सगळे काही पैशाच्याच आधाराने वा आधारासाठी उभे राहीले. आपण सहसा म्हणतो की पैशापेक्षा सत्तेची ओढ जास्त असते, पण खरे तर सत्ता हा सुद्धा पैसा मिळविण्याचाच एक मार्ग/साधन आहे. लोक धर्मासाठी, देवासाठी जेवढे वेडे होणार नाहीत त्याहून जास्त पैशासाठी होतात. बिल गेट्सने दर तासाला २ कोटी रुपये खर्च केले तरी त्याची संपत्ती आयुष्यभर संपणार नाही. मात्र तरीही तो अजून पैसे कमविण्याच्या मागे लागलेलाच आहे. पैशाने मिळू शकेल असे त्याला जे पाहीजे ते सगळे काही उपभोगण्यासाठी सहज खरेदी करू शकत असूनही तो अजून अजून पैसे कमावण्याच्या मागेच लागलेला आहे. याहून मोठा अन्य वेडेपणा काय असू शकतो? ओसामा हा ओबामाच्या देवाला व धर्माला शून्य किंमत देत होता, मात्र ओबामाच्या डॉलरची जेवढी किंमत ओबामासाठी होती तेवढीच किंमत ओसामासाठीही होती. ती मात्र तो विनातक्रार अगदी तंतोतंत पाळत होता.
औरंगजेबाच्या साम्राज्यात म्हणे २८ परगणे होते आणि शिवाजी महाराजांचे राज्य हे त्यातील कोणत्याही एका परगण्याहूनही कितीतरी छोटे होते. तरीही तो ते संपविण्यासाठी दक्षिणेत आला. का? कारण पैसा. कोणताही राजा राज्यविस्तार का करतो? तर महसुलाचा म्हणजे कराचा मुलुख वाढविण्यासाठी. 'जितका आपल्या ताब्यातील प्रदेश मोठा, तेवढा कररूपाने मिळणारा पैसा जास्त' असे हे साधे गणित आहे. जेवढे होते त्याच्याहुन दहा टक्के छोटे इतकेच राज्य असते तरीही औरंगजेब हा सम्राट म्हणून जगातील सर्वोत्तम सुखांचा उपभोग घेऊ शकत होता. पण नाही. बिल गेट्सला जसा अजूनही पैसा कमवायचाच आहे, तसे तेव्हा जगातील सर्वात श्रीमंत राजा असूनही औरंगजेबाला अजून पैसा कमवायचाच होता. तुलनेने अगदी छोट्या भूभागावर का असेना पण कुणीतरी विद्रोही राजा आपला महसूल हक्क मारतो आहे, आपल्या शहरांना लुटतो आहे, आपली संपत्ती बळकावतो आहे, वा वाढविण्याला विरोध करतो आहे हे कुणाही शक्तिशाली राजास कसे सहन होईल? म्हणून औरंगजेब इकडे महाराष्ट्रात आला. आज जसा इलॉन मस्क भारतात येतोय तसा तेव्हा औरंगजेब आला. दोघांची साधने वेगवेगळी आहेत पण उद्दिष्ट एकच... पैसा.!! जसा महाराष्ट्रात न येताही औरंगजेब हा तेव्हाच्या जगातील सर्वात श्रीमंत दुसऱ्या क्रमांकाच्या सम्राट चौदाव्या लुई पेक्षा दहापट अधिक श्रीमंत होता (अनेक दाव्यांनुसार), तसाच भारतात न येताही इलॉन मस्क हा ऑलरेडी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेच. आणि तशा अर्थाने त्याच्यासाठी भारतात येणे हे खरेतर इनसिग्निफिकंट आहे, पण तरीही माय फ्रेंड डोलान्डचा विरोध पत्करूनही तो भारतात येतोय. इंग्रज हजारो किलोमीटरवरून का आले? केवळ पैशांसाठी. 
धर्म, सत्ता ही पैशासाठीच वापरण्यात येणारी प्रमुख साधने आणि दुय्यम उद्दिष्टे आहेत. पण कोणीही मी हे पैशासाठी करतो आहे हे मान्य करायला तयार होत नाही. कारण का कुणास ठाऊक पण मी हे पैशांसाठी करतोय हे सांगणे लोकांना लज्जास्पद वाटते. त्याऐवजी मी हे जनतेसाठी करतोय, मी हे धर्मासाठी करतोय, मी हे राष्ट्रासाठी करतोय, मी हे प्रगतीसाठी करतोय हे सांगणे अभिमानाचे ठरते. पण हे तद्दन खोटे असते. मला इतिहासातील एक राजा वा राजनेता सांगा ज्याने जनतेकडून अजिबातही कर घेतला नाही. वा ज्याने इतर राज्यातील जनतेला वा राजाला अजिबात लुबाडले नाही, वा ज्याने इतर प्रदेश जिंकून घेतल्यावर तिथल्या लोकांवर, वा पराभूत राजावर अजिबात कर लावला नाही. असा कोणी राजा सांगा ज्याने आपला वारस म्हणून आपल्याच वंशातील कोणीतरी राज्य चालवेल अशी तरतूद करून न ठेवता पुढचा राजा जनतेतूनच एखादा योग्य माणूस बनेल अशी व्यवस्था बनवली. किमान असा कोणी राजा ज्याने त्याचा प्रदेश वा सत्ता वाढल्यावर आपल्या जनतेवरील कर हळूहळू कमी करत नेला? असा कोण राजा होता ज्याने स्वतःसाठी अजिबात लग्झरी न घेता, जनतेसारखे कपडे, रहायला जनतेसारखी झोपडी इत्यादिच वापरली? खरे हे आहे की असा कोणीही राजा या पृथ्वीवर कधी अस्तित्वात आला नाही. जर जनतेसाठी कुणाचे राज्य असते तर स्वतःच्या राज्यातील लोकांकडून घेतले जाणारे कर हे त्याने शून्य वा किमान अत्यल्प करायला हवे होते. आणि धर्मासाठी असते तर आपल्याच धर्माच्या दुसऱ्या राज्यावर त्याने स्वारीच करायला नको होती. पण तसे कधीही झाले नाही. स्वतःच्या धर्माच्या, भाषेच्या, देशाच्या लोकांनाही प्रत्येक राजाने ठार मारलेच आहे. यावरून सिद्ध होते की कोणीही धर्मासाठी, जनतेसाठी वा देशासाठी राज्य स्थापन करत नव्हता, तर पैसा हाच प्रत्येकाच्या मागचा सर्वात मोठा ड्रायविंग फोर्स होता. धर्म, राष्ट्र, जनकल्याण हे सगळे फक्त या संपत्ती मिळविण्याच्या कार्यातले मुखवटे असतात. कुणी कितीही मानवकल्याणाचा वा धर्मरक्षणाचा दावा करो, मेंकेन म्हणतो तेच खरे आहे की, "The urge to save humanity is almost always only a false-face for the urge to rule it." आणि फक्त राजसत्ताच नव्हे तर देव, धार्मिक स्थळांचेही तेच आहे. ओशो म्हणतात की तुम्ही जर पैसे देणे बंद केले तर सहा महिन्यांत जगातील तमाम मंदिरे, मशिदी व चर्चेस हे सपशेल बंद पडतील. या स्थळांना देव नाही तर पैसा चालवत असतो. गाडगे महाराज नाही का म्हणत की 'मंदिरात देव नसतो, तर मंदिरात पुजाऱ्याचे पोट असते'. देवाचे प्रार्थनास्थळ असो, की राज्यसत्ता की एखादा अन्य व्यवसाय. ही सगळी फक्त वेगवेगळी बिजनेस मॉडेल्स आहेत आणि अपरिहार्यपणे पैसा कमावण्याचीच साधने आहेत. देव आणि धर्म या बिजनेस मॉडेल मध्ये फसवलेल्या लोकांची अस्मिता आणि भीती हे बिनखर्चाचे भांडवल असते. मला जगातील एक धार्मिक स्थळ सांगा जे एकही पैसा स्वीकारत नाही, वा अशी राज्यव्यवस्था सांगा जी एकही पैसा मिळवत नाही, मग मी माझे म्हणणे नक्की बदलेल. 
अर्थात जशी कंपनी चालवायला काही पैसे लागतात, तसे राज्य चालवायलाही पैसे लागतात हे मान्य. पण दोन्हींत जास्तीतजास्त नेट प्रॉफिट कमावणे हाच उद्देश असतो. अगदी आजही ट्रम्पचे आकांडतांडव कशासाठी चालू आहे, तर जास्तीतजास्त पैसा ओढून आणण्यासाठी. आपले राजनेते निवडणूक कशासाठी लढतात? आयएएस बनण्यासाठी लोक का प्रचंड मेहनत घेतात? तर पैशांसाठी.!! हे पैसे स्वतः, कंपनी, मुले, संस्था, राजकीय संघटना, नातेवाईक, मित्र अशा आपल्या कोणत्याही हितकारक संस्थेसाठी असू शकतात. देशसेवा, धर्मसेवा, भाषासेवा ही सगळी फक्त त्यासाठीची साधने आहेत. खरेतर आपण पैशांसाठीच हे सगळे करतोय हे सांगण्याची सगळ्यांनाच लाज वाटते म्हणून ही बाकीची साधने मुखवट्याच्या स्वरूपात पुढे केली जातात. ही साधने पुढे केली की जनमान्यता तर मिळतेच वरून आपण पैसे मिळवावेत यासाठी फुकट वा अगदी अल्प मोबदल्यात काम करायला मूर्ख पण झपाटून काम करणारे कामगार उपलब्ध होतात हेही एक कारण आहे. एक धार्मिक बाबा आहे, जो त्याच्या आश्रमात सेवेच्या नावाखाली भक्तांकडून फुकट कामे करवून घेतो आणि त्यांनी बनवलेले प्रोडक्ट हे मोठ्या किंमतीला बाजारात विकतो. पण त्याच्या भक्तांना हे सांगितले तर ते भडकतील आणि आमच्या स्वामी महाराजांवर असा आरोप करतोस? म्हणून उलट आपल्यावरच उखडतील. म्हणून मी म्हंटले की अस्मिता या भांडवलावर मुबलक आणि जवळजवळ मोफत असे अगणित कामगार मिळवण्याचे हे फुलप्रूफ बिझनेस मॉडेल आहे. दहशतवादी लोक सुद्धा जे धर्माच्या नावाने तरुणांना भडकावून अतिरेकी कृत्ये करायला लावतात त्यामागे पैसे मिळवणे हे मुख्य कारण असते. दहशतवादी संघटनेत सामील झाला म्हणून अजमल कसाबच्या बापाला काही पैसे देण्यात आले होते. टेररिस्ट लोकांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे देणग्या, लूट आणि खंडणी. विशेषतः लूट आणि खंडणी यांसाठी त्यांना दहशत माजवणे जरुरी असते. अफगाणिस्तानात तालिबान वा त्यांचे विरोधी यांची लढाई खरेतर धर्मासाठी व देशासाठी नव्हती तर देशातील अफीमच्या अवैध उत्पन्नातील पैसे तसेच हायवे टोल टॅक्सचा पैसा मिळविण्यासाठी होती. धर्म फक्त साधन असते. फुकट किंवा अत्यल्प मोबदल्यात अगदी जीवावर उदार होणारे मजूर मिळविण्यासाठी धर्म हे एक सोपे आणि प्रभावी साधन आहे. 
हेच कमीअधिक प्रमाणात राजकीय पक्ष, कंपन्या हे सगळे करत असतात. कंपन्यांचे मालक नाही का आवाहन करत की ही कंपनी जगातील एक नंबरची कंपनी व्हावी अशी माझी इच्छा आहे, मग त्यासाठी तुम्ही माझी साथ द्यायला तयार आहात का? की लगेच कंपनीचे सगळे कर्मचारी अस्मिता अन अभिमानाने आणि जोशात अजून काम करायला तयार होतात. ऑलरेडी ग्रेट असलेल्या अमेरिकेला करायचे का पुन्हा ग्रेट? किंवा कोणत्याही खतऱ्यात नसलेल्या बहुसंख्य धर्माला वाचवायचे का अल्पसंख्यांकडून (or vice versa)? असे आवाहन केले की सारा सारासारविवेक गहाण टाकून कित्येक मंदबुद्धी लोक बिनपगारी कामगार बनायला स्वेच्छेने तयार होतात. अस्मिता आणि अभिमान गोंजारणे हे आपल्या देशातच नाही तर जगभरातले अगदी हुकमी असे चलनी नाणे आहे.
सांगायचे हे आहे की कोणतीही व कुणाचीही कामे करा, पण त्याचा योग्य मोबदला मिळेल याची सुनिश्चीती करून घ्या. जर तुम्ही फक्त अस्मिता, अभिमान आदी कारणांनी कुणासाठी तरी फुकट राबत असाल तर तुम्ही तुमच्या कष्टांनी इतर कुणालातरी श्रीमंत करत आहात. देव, धर्म, तत्व, कर्म या सगळ्यांपेक्षा पैसा हा जास्त शक्तिशाली आहे. किंबहुना ही सगळी अल्टीमेटली पैसा मिळविण्याचीच साधने आहेत आणि यात सहसा सामान्य जनता ही गमावणाऱ्याच्याच भूमिकेत असते, कमावणाऱ्याच्या नाही. त्यामुळे राबायचेच असेल तर स्वतःसाठी राबा. मी तर म्हणेल की इव्हन पैसा चांगला आहे की वाईट ह्या मंथनाच्या भानगडीत पडणे म्हणजे सुद्धा वेळ व्यर्थ घालवणे आहे. डोन्ट बी इमोशनल, बी प्रॅक्टिकल. चर्चिल नाही का म्हणायचा की जर तुम्ही तुमच्या टीन एजमध्ये कम्युनिस्ट विचारांचे नसाल तर तुम्ही भावनाहीन आहात, आणि जर तुम्ही तुमच्या प्रौढ वयातही भांडवलवादी नसाल तर तुम्ही बुद्धिहीन आहात. जितके लवकर बुद्धिवान बनाल तितके तुमच्या फायद्याचे ठरेल. ठीक आहे सगळ्यांनाच अतिश्रीमंत वगैरे होता येऊ शकत नाही, पण किमान आपल्या क्षमता आणि प्रयत्न यांना योग्य न्याय आणि योग्य मूल्य मिळेल इतके तर प्रत्येकाने कमावलेच पाहीजे असे माझे म्हणणे आहे. तुम्हाला स्वतःला काही उत्पन्न मिळवून देत नसेल तर केवळ भावनेपोटी देव, धर्म, इतिहास यांत आणि स्वतः कमाईने एका कम्फर्टेबल लेव्हलइतके सक्षम बनलेले नसाल तर समाजोद्धार वा विश्वोद्धार यात तारुण्य व आयुष्य खर्च करणे हा माझ्यामते स्पष्ट मूर्खपणा आहे. पैशाने सर्व सुखे विकत घेता येत नाहीत हे १०० टक्के खरे आहे, पण पैशाने किमान जो काही कम्फर्ट मिळवता येतो तो कम्फर्ट देव, धर्म, जात, इतिहास, अस्मिता हे देऊ शकत नाहीत हेही १०० टक्के खरे आहे. त्यामुळे जर करायची खुमखुमीच असेल तर पाहीजे ते कुचकामी नाद खुशाल करा, पण त्याआधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा असे मला वाटते.
जगातली सर्वात मोठी शक्ती पैसे हीच आहे. बाकी एकूणएक गोष्टी या पैसे मिळवण्याचेच मार्ग आहेत. राष्ट्र धर्म संस्कृती सगळ्यांचा आधार पैसा हाच आहे. 
पैशाची ही महत्ता जितक्या लवकर आपल्याला समजून येईल तितक्या लवकर आपली प्रगती व उन्नती होईल.

.......

२. पैसा म्हणजे काय 

आपल्या मनात पैशांबद्दल खूप गैरसमज वा अज्ञान असते. आपण सहसा नोटांना पैसा समजतो. पण नोटा या पैसा नाहीत तर चलन आहेत. दोन्हींत फरक आहे. मोदींनी नोटबंदी केली तेव्हा पैसा समाप्त झाला नाही तर फक्त जुन्या चलनाची किंमत संपली. नोट म्हणजे पैसा नाही. खरेतर नोटेचे पूर्ण नाव हे प्रॉमिसरी नोट असे आहे. म्हणजे काय की नोट हा एक असा दस्तावेज आहे ज्यावर ती नोट इशू करणाराने तिची विशिष्ट किंमत मिळण्याची हमी दिलेली असते. हे थोडे उदाहरणाने समजून घेऊ. शिवाजी महाराज हे आपल्या सैनिकांना नेहमी अगदी वेळेवर आणि सहसा ऍडव्हान्स मध्ये पगार देत असत. अनेक सैनिक महाराजांच्या सेनेत सामील होण्यास उत्सुक असत त्याचे एक महत्वाचे कारण वेळेवर पगार मिळतो हेही होते. पण अर्थातच दरवेळी पगार देण्यासाठी महाराजांकडे रोख रक्कम उपलब्ध नसायची. मग अशावेळी पगार हे 'वराता' पद्धतीने दिले जात. म्हणजे सैनिकांना शाही फर्मानासारखा एक कागद लिहून दिला जाई त्यावर त्या कागद दाखवणाराला किती रक्कम द्यायची ते लिहीलेले असे. मग हा कागद घेऊन सैनिक जेव्हा एखाद्या आधीच ठरवून दिलेल्या व्यापाऱ्याकडे जाई तेव्हा मग तो व्यापारी तो कागद घेऊन तेवढी रक्कम त्या सैनिकास देत असे. नंतर किती कागद जमले त्यानुसार त्या व्यापाऱ्याचे सुद्धा पैसे पे केले जात. ही पद्धत थोडी आजच्या चेक/डीडी/नोट सारखीच होती. आजही तुम्ही जर नोटा बघितल्या तर प्रत्येक नोटेवर गव्हर्नरच्या सही सहीत 'मै धारक को अमुक अमुक इतके रुपये अदा करने का वचन देता हूं' असे लिहीलेले असते. हे वचन म्हणजेच प्रॉमिस आणि म्हणून ती प्रॉमिसरी नोट होय. नोटेवरच्या अंकापेक्षा हे वचन लिहिलेला मजकूर हा जास्त महत्वाचा असतो.
पैसा म्हणजे खरेतर संपत्ती. संपत्ती म्हणजे एखाद्याकडे जी एकूण मालमत्ता आहे तिचे मूल्य किंवा किंमत होय. 
आपण अंबानींची संपत्ती अमुक इतके हजार कोटी रुपये आहे असे म्हणतो त्याचा अर्थ हा नाही की त्यांच्याकडे तेवढ्या किंमतीच्या नोटा आहेत. तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे जी एकूण मालमत्ता आहे तिचे बाजार मूल्य तेवढे आहे. संपत्तीचे मूल्य कधीही फिक्स नसते. तर मागणीनुसार ते बदलत असते. मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे यावर कोणत्याही वस्तूचे मूल्य ठरते. आज जमिनीच्या, घरांच्या किंमती का वाढल्या? अचानक जमिनींची उत्पादकता खूप वाढली आहे का? 30 वर्षांपूर्वी होती त्याहून फार अधिक उच्च दर्जाची घरे बनताहेत का? नाही. जमिनीची उत्पादकता तेवढीच आहे आणि घरांचा दर्जाही तेवढाच आहे. पण वाढले काय आहे? तर मागणी वाढली आहे. भारताची लोकसंख्या 30 वर्षांत 50 कोटींनी वाढली आहे, म्हणजे 50 कोटींनी मागणी वाढली आहे. जमीन वाढत नाही, मागणी मात्र वाढते आहे म्हणून तिची किंमत वाढते. मागणी आणि पुरवठा यांत तफावत झाली की किंमती कमी जास्त होत असतात. मागणी आणि पुरवठा यांच्यानुसार वस्तूंच्या किंमती कशा बदलतात याचे भाजीपाला हे उत्तम उदाहरण आहे. कधी 2 एकरात टोमॅटो लावणारा शेतकरी एका सिजनमध्ये लक्षाधीश होतो तर कधी 10 एकरवाल्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. का? तर मागणी आणि पुरवठा यांच्या गणितामुळे किंमतीत प्रचंड मोठे चढउतार होतात. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असला की टोमॅटो 2 रु किलोनेही मिळतात, पुरवठा कमी असला की 100 रु किलोने विकले जातात.
पूर्वीच्या काळी नाणी हे चलन होते, आता नोटा आणि डिजिटल पैसा हे चलन आहे. आजचा पैसा हा पूर्णतः बँकींगने नियंत्रित केला जातो. प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते जी त्या देशातील पैशावर नियंत्रण ठेवते. जशी आपली रिजर्व बँक आहे. इतर सगळ्या बँका याच रिजर्व बँकेशी संलग्न असतात. प्रत्येक बँकेला आपल्या एकूण ठेवींतली काही रक्कम रिजर्व बँकेकडे ठेवावी लागते. सगळे मिळून साधारण प्रत्येक बँकेत खातेदारांकडून डिपॉजीट झालेल्या एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम बँकांना रिजर्व बँकेत किंवा त्यांनी सांगितलेल्या सरकारी बॉण्ड्स मध्ये गुंतवावी लागते. आणि उर्वरित 75% मधूनच त्यांना कर्जे द्यावी लागतात. जसे आपल्याला बँक सेविंगवर काही व्याज देते तसे रिजर्व बँक सुद्धा बँकांना काही व्याज देते, म्हणून बँका सुद्धा रिजर्व बँकेत पैसे सेव करतात.
मार्केट मध्ये किती पैसा असतो त्यावर देशाची इकॉनॉमी अवलंबून असते. आणि मार्केट मध्ये पैसा हा बँकांच्याच माध्यमातून येतो. उत्पादनात, सेवांत जितका पैसा जास्त असेल तितकी प्रगती अधिक होते. उद्योजक असोत की शेतकरी, ते बँकेकडून कर्ज घेतात, उत्पादन काढतात आणि ते विकून फायदा कमावतात. कितीही मोठी कंपनी असली तरी तिला एक्सपांड करण्यासाठी पैसा लागतोच जो नुसत्याच नफ्यातून मिळत नाही. त्यासाठी कर्ज काढावे लागते किंवा शेअर्स काढावे लागतात. जर अधिक उत्पन्नासाठी पैसे नसतील तर उत्पादन वाढणार नाही, नफा वाढणार नाही. हे झाले उत्पादकांचे. ग्राहकांचे काय? जर ग्राहकांच्या हातात पैसे असले तर ते जास्त खर्च करतील, त्यामुळे उत्पादकांचा नफा वाढेल, आणि एकूण आर्थिक प्रगती जास्त होईल.
जर बँकेत सेविंग किंवा एफडीचे रेट जास्त असतील तर लोक पैसे त्यातच गुंतवतील. खर्च करणार नाहीत, त्यामुळे प्रगतीला खीळ बसेल. म्हणून दिवसेंदिवस सेविंग आणि डिपॉझिटचे व्याजदर कमी कमी होत चालले आहेत. लोकांनी जास्त खर्च केला तरच इकॉनॉमी पुढे जाते.
म्हणजे काय की मार्केट मध्ये जितका जास्त पैसा येईल तितकी जास्त प्रगती होते. मग सरकार अमर्याद पैसे छापून मार्केट मध्ये खूप पैसे का आणत नाही? 
सरकार असे करू शकते, पण करत नाही. का? कारण वर सांगितलेल्या टोमॅटोच्या उदाहरणाप्रमाणे पैशाची किंमत ही सुद्धा मागणी पुरवठा याच तत्वानुसार चालते. किंमत पेक्षा क्रयशक्ती हा जास्त योग्य शब्द आहे. जसे टोमॅटोचा खूप जास्त पुरवठा झाला की त्याच्या किंमती कमी होतात, तसेच खूप जास्त पैसा मार्केटमध्ये आला की त्याची किंमत म्हणजे क्रयशक्ती कमी होते. म्हणजे समजा माझ्याकडे 100 रूपये आहेत आणि मला दोन आंबे घ्यायचे आहेत जे प्रत्येकी 50 रुपयांना आहेत. तर मी दोन घ्यायला शंभर वेळा विचार करेल. आणि म्हणेल की जाऊ द्या एकच आंबा घेऊ. पण जर माझ्याकडे 200 रु असतील तर मी दोन आंबे सहज घेईल. असेच सगळ्यांकडे 100 ऐवजी 200 रु आले तर सगळेच 2 आंबे घेतील. मग आंब्यांना मागणी वाढेल. पण आंब्याचे उत्पादन तर फिक्स आहे. पण मागणी जास्त आहे, अशावेळी मग मागणी व पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी आंब्यांची किंमत आपोआप वाढेल आणि ती 100रु ला एक आंबा अशी होईल. अशावेळी माझ्याकडे 200 रु असूनही मी परत एकच आंबा घेऊ शकेल. म्हणजे माझ्याकडे पैसे दुप्पट झाले तरीही त्यातून जी वस्तू मला घ्यायची आहे ती मात्र मला एकच घेता येतेय. थोडक्यात काय की जो आंबा मला 50 ला मिळत होता, तो सगळ्या लोकांकडे जास्त पैसे आल्याने 100 ला मिळू लागला. म्हणजेच काय की माझ्या पैशाची किंमत कमी झाली. किंबहुना ती निम्मी झाली. आता जर प्रत्येकाकडे 1000 रुपये आले तर आंबा 500 ला एक होईल, म्हणजे माझ्या पैशाची किंमत दहा पट कमी होईल. माझ्याकडे दहापट जास्त पैसा आला तरी वस्तू मात्र मी एकच घेऊ शकतो. माझ्याकडे 1000 रुपये आहेत आणि मी एक आंबा घेऊ शकतो, माझ्याकडे 100 रुपये होते तेव्हाही मी एक आंबा घेऊ शकत होतो, तर माझे उत्पन्न 10 पट वाढल्याचा काही उपयोग नाही. बाजारात खूप जास्त पैसा आला की पैशाची क्रयशक्ती कमी होते. म्हणजेच काय की सरकारने खूप अमर्याद पैसे छापले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. झिम्बाब्वेमध्ये सरकारने अमर्याद पैसे छापले, त्यामुळे झाले काय की एक ब्रेड पॅकेट घ्यायला एक पिशवीभरून पैसे द्यावे लागायचे. 
इकॉनॉमी चालावी म्हणून सरकारला मार्केटमध्ये पैसे वाढवावे लागतात, आणि हे पैसे आल्यामुळे उत्पादन वाढेल हे सुनिश्चित करावे लागते. त्याशिवाय आर्थिक प्रगती होऊच शकत नाही, पण त्याचवेळी इतकेही जास्त पैसे वाढवता येत नाहीत की पैशाची क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पावरच नष्ट होऊन जावी. नेमका किती पैसा मार्केट मध्ये आणावा याचा बॅलन्स ठेवावा लागतो. जे सरकार हा बॅलन्स योग्य रीतीने ठेवू शकते तो देश प्रगत होतो. चीनने असाच प्रचंड पैसा छापून मार्केट मध्ये आणला, आणि तो पैसा उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यावरच खर्च होईल असे परफेक्ट नियोजन केले. त्याचा परिणाम असा झाला की चीन आज जगातला दुसरा श्रीमंत देश बनला आहे. अमेरिकेने कोविडमध्ये प्रचंड पैसा छापून बाजारात आणला, त्याने त्यांची इकॉनॉमी सावरली.
आपल्या देशात इंनोवेशन आणि उत्पादन होत नाही म्हणून आपण खूप स्लो आहोत. पियुष गोयल बरोबर बोलले होते की आपण फक्त होम डिलिव्हरी, बेटिंग ऍप, आणि खाण्याचे प्रॉडक्ट हेच बिजनेस करतो आहोत. खरेखुरे वस्तूंचे उत्पादन, नवनवे प्रॉडक्ट शोधणाऱ्या व बनवणाऱ्या कंपन्या उदयास येत नाहीत हा आपला प्रॉब्लेम आहे. येतील तरी कशा, इतिहासात कोण राजा श्रेष्ठ वा दुष्ट होता, आणि कुठे मंदिर वा मस्जिद आहे, आपल्या जुन्या पुस्तकांत काय लिहिले आहे, माझी भाषा, जात वा धर्म खतऱ्यात आहे आणि आपण विश्वगुरु आहोत यातच आपली सगळी सामूहिक बुद्धी व्यस्त आहे, आपण काय इनोव्हेशन आणि नवउत्पादन करणार? जे आहे तेच चालू आहे हीच आश्चर्याची बाब आहे. पूर्वीपासून सरकार नेहमी उद्यमशीलता वाढावी म्हणून अनेक योजना, अनुदाने, डिस्काउंट देत असते, पण देशातील प्रस्थापित उद्योजक त्याचा फायदा घेऊन अनुत्पादक व्यवसायांतच पैसे गुंतवतात. भले त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा होतो, पण देशाची प्रगती होत नाही. म्हणून तरुणाईने सरकारच्या योजनांचा, अनुदानांचा, कर्जाचा फायदा घेऊन MSME मार्फत नवनव्या उत्पादनांची निर्मिती करणारा बिजनेस केला पाहीजे. प्रस्थापित लोक त्यात इंटेरेस्टड नाहीत, नव्या उद्योजकांनाच ती जबाबदारी उचलावी लागेल. अन्यथा देशाची प्रगती होणार नाहीच, पण अन्य देश जर प्रगती करू लागले तर उलट आपली अधोगती सुरू होईल.

मतितार्थ असा की चलन म्हणजे संपत्ती नाही. लोक बँकेत पैसे जमा करतात, त्यातून बँक उद्योगांना पतपुरवठा करतात, त्यातून उद्योग व उत्पादने वाढतात आणि देशाची प्रगती होते. बँका या आधुनिक युगाच्या प्रगतीचा कणा आहेत.
दुसरे म्हणजे पैसा ही खरी संपत्ती नाही, ती तात्कालिक असून कायमस्वरूपी मूल्य नसलेली केवळ एक विनिमयाची वस्तू आहे. वस्तू उत्पादन ही खरी संपत्ती आहे. जितके देशातील उत्पादन वाढेल तितकी देशाची आणि माणसांचीही अधिक प्रगती होईल. पैशाने पैसा निर्माण होतो हे खरे आहे, पण तो थेट पैशाने निर्माण होत नाही तर पैशाने उत्पादन निर्माण झाले तरच त्या उत्पादनामार्फत शाश्वत पैसा निर्माण होऊ शकतो. आपली इकॉनॉमी ही सेवाधारीत वरून उत्पादनाधारीत होईल तेव्हाच आपली प्रगती वेगाने होऊ शकेल.

......



३. पैसा आणि भारतीय मानसिकता 

भारत हा औरंगजेबाच्या काळापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत देश होता म्हणे. भारतातून पूर्वी सोन्याचा धूर निघत असे म्हणे. मग ही श्रीमंती गेली कुठे?आणि ही श्रीमंती आजच्यासारखीच केवळ काही एखाद अर्धा टक्के अतिश्रीमंत लोकांची होती की सगळी जनताच श्रीमंत होती?अगदी औरंगजेबालाही कर्ज देणारे सावकार तेव्हा होते. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा अशाच एका सावकाराला सुद्धा लुटले होते. तर भारत 'सोने की चिडिया' होता म्हणजे भारताची सगळी जनता श्रीमंत होती का? 
अर्थातच याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल. कारण भारतात नेहमीच 90 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेतीच होता. बाकी अदमासे साताठ टक्के हे सैनिक, एक दोन टक्के हे पुजारी, आणि एकाध अर्धा टक्के हे व्यापारी/सावकार असतील. शेतकरी आणि श्रीमंती हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत (मोठ्या जमिनींचे मालक हे शेतमालक/जमीनदार असतात, शेतकरी नव्हे. जो प्रत्यक्ष राबतो तो शेतकरी. जो राबवून घेतो तो शेतकरी नव्हे). देश कधीकाळी श्रीमंत असला तरी जनता ही कायम गरीबच होती आणि आहे.
तर बहुतांश जनता ही अठराविश्वे गरीब असूनही आपल्या समाजात कुठून काय माहीत पण पैसा म्हणजे वाईट ही प्रवृत्ती शिरली. माणूस कितीही मोठा झाला तरी श्रीमंत असला की तो वाईटच असणार ही भारतीय मानसिकता आहे. गांधीजींचे गरीबीत राहणे हे त्यांना ग्रेट मानण्याचे मुख्य कारण आहे. मोदींनी चहा विकलाय, त्यांची आई लोकांकडे घरकाम करत असे याचा त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड मोठा वाटा आहे. नेहरुंनी सगळी संपत्ती दान केली, संत तुकारामांनी सगळी संपत्ती दान/त्याग केली. गाडगेबाबांकडे एक गाडगे हीच संपत्ती होती, ज्ञानेश्वर भिक्षा मागत होते. शिवाजी महाराज सुद्धा खूप छोट्या सुभेदारीतून मोठे राजे झाले. रामाला, पांडवांना 14 वर्षे वनवास म्हणजे दारिद्र्य भोगावेच लागले. गरिबी हा आपण महानतेशी जोडलेला एक गुण आहे. एकतरी संत, एकतरी नेता महान मानण्यात येतो आणि जन्मतः श्रीमंत होता असा आहे का? एक तरी राजा वा महापुरुष सांगा जो वा ज्याचा कोणी पूर्वज गरीब नव्हता आणि तरीही त्याला महान म्हणतात? 
गरिबी या अवस्थेलाच भारतात खरे ग्लॅमर आहे, आणि श्रीमंतीला हमखास वाईट ठरवले जाते. अंबानी अदानी यांच्याबद्दल किती लोक चांगले बोलतात?ती मागे कोण प्रवचनकार होती तिची पर्स लाखो रुपयांची होती म्हणून तिच्यावर किती टीका झाली. कोणा नेत्याचा टी शर्ट महागाचा होता म्हणून किती टीका झाली. रोजच्या अशा अनेको उदाहरणांतून कळते की श्रीमंती म्हणजे वाईटच ही विकृती भारतीय समाजात अगदी खोलवर रुजली आहे. 
लोकांनी दर्जेदार कला दाखवावी पण त्याचे पैसे घेऊन श्रीमंत होऊ नये, समाजसेवा करावी पण त्याचा मोबदला घेऊन श्रीमंत होऊ नये, क्रिकेटपटुंनी खेळाव्यतिरिक्त जाहिराती करू नयेत, लेखकांनी पुस्तके जास्त किंमतीला विकू नयेत, व्यापाऱ्याने धंदा करावा पण जास्त प्रॉफीट कमावू नये, शेतकऱ्याने भाव वाढवू नयेत ही आपली सामूहिक सर्वदूर मानसिकता आहे. आणि जे लोक नफा कमावतात, कलेचे, बुद्धीचे पैसे कमावतात, तेही यामुळे आपल्या समाजात मनातून आपल्या श्रीमंतीबद्दल उगीच एक अपराधीपणाची भावना बाळगतात. भ्रष्टाचारी, चोर मात्र बहुदा ही अपराधीपणाची भावना बाळगत नाहीत. हुंडा घेणारे नामर्द लोक मात्र ही भावना बहुदा बाळगत नाहीत. साध्या हॉटेलवाल्याने फॉर्चूनर घेतली की ती सगळ्यांना खुपते, पण हुंड्यात मिळालेल्या फॉर्चूनरची चावी मात्र बिनधास्त नेत्यांच्या हस्ते दिली जाते. सन्मार्गाने श्रीमंत होणारे लोक उगाच अपराधी भाव ठेवतात आणि अनैतिक मार्गे श्रीमंत होणारे गर्वाने मिरवतात हे आपले चित्र आहे. 
पैसा/श्रीमंती वाईट आहे ही जी प्रवृत्ती आपल्या समाजमनात रुजली आहे ती सर्वप्रथम नष्ट झाली पाहीजे. किंबहुना मला वाटते की स्वतःच्या गरिबीचे दुःख सौम्य वाटावे म्हणून दरिद्री भारतीय समाजाने स्वतःत पेरलेली ही एक कृत्रिम, फसवी व नुकसानदायी भावना आहे. श्रीमंत लोक सुखी नसतात, त्यापेक्षा गरीब लोक खऱ्या अर्थाने सुखी असतात, श्रीमंतांना गाद्यागिर्द्यांवरही झोप येत नाही, गरीब मात्र फुटपाथवरही झोपतो ही एक तद्दन खोटी आणि खुळी समजूत आपल्या समाजात अत्यंत पॉप्युलर आहे. बरे ही समजूत फक्त दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी असती तर ठीक, पण ती आपल्याला निरुद्योगी बनवण्यास कारणीभूत ठरली आहे हे मात्र चूक आहे. श्रीमंताला झोप येत नाही म्हंटल्यावर कोण कशाला श्रीमंत होण्यासाठी अथक प्रयत्न करेल?जे करतोय त्याने सहज वा आपोआप श्रीमंत झालो तर ठीक, नाही झालो तर गरीब जास्त सुखी असतात ही समजूत समाधानासाठी सोबतीला आहेच. पैशाने सगळी सुखे विकत घेता येत नाहीत हे खरे आहे हे मान्य, पण मला सांगा जे पैशाने विकत घेता येत नाही असे कोणते सुख आहे जे फक्त गरिबांना मिळते व श्रीमंतांना मिळूच शकत नाही? असे कोणतेही सुख अस्तित्वात नाही जे फक्त गरिबांना मिळते व श्रीमंतांना हवे असल्यास मिळू शकत नाही. पण अशी अनेक सुखे/कम्फर्टस आहेत जी पैशांनी विकत घेता येतात आणि त्यामुळे गरिबांना ती मिळू शकत नाहीत. 
फक्त अनैतिक मार्गाने श्रीमंत होता येते ही एक आपल्यातील अजून चुकीची समजूत आहे. या समजुतीमुळे देशात भ्रष्टाचार प्रचंड फैलावला आहे. पण खरेतर अनैतिक पैसा हा गुन्हेगारीचा पैसा आहे. आणि गुन्हेगारीचा पैसा नेहमी वाईट व धोक्याचा असतो. प्रामाणिकपणे कमावलेला पैसा जास्त समाधान आणि शाश्वत सुख देतो. त्याउलट फसवणुकीचा, भ्रष्टाचाराचा पैसा म्हणजे सदैव कायद्याची टांगती तलवार..! ज्या श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही ते असे भ्रष्टाचाराच्या व हरामाच्या कमाईने पैसे मिळविणारे श्रीमंत असावेत. कायद्याच्या भीतीने त्यांची झोप उडत असावी. 
ठेविले अनंते तैसेचि रहावे ही आपल्या समाजात रुजलेली अजून एक वाईट प्रवृत्ती. हे खरेतर निरुद्योगी समाजाचे तत्व आहे. बिल गेट्सच्या वा स्टीव्ह जॉब्जच्या नावाने एक सुभाषित फिरत असते की 'तुम्ही गरीब म्हणून जन्मलात तर त्यात तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो मात्र तुमचा दोष आहे.' हा पाश्चात्य आणि आपल्या म्हणजे पौर्वात्य लोकांच्या दृष्टिकोनांतला फरक आहे. आपल्याला जसे नशिबाने ठेवले आहे तसेच राहणे क्रमप्राप्त आहे, 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलता नही' हे आपल्याकडचे अगदी धार्मिक ऋचांइतके वा त्याहून अधिक पॉप्युलर असलेले वाक्य आहे. विकसित देशात लोक आपली स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. मी एवढ्यावरच का समाधान मानू?मी अजून खूप काही करू शकतो अशी तिथल्या बहुतांश लोकांची मानसिकता असते. त्याउलट आपल्या इथे जे चालले आहे त्यात उगाच ढवळाढवळ करून काही बिघडवण्याचा चान्स का घ्या ही प्रवृत्ती असते. आपल्या नि विकसित देशांच्या मानसिकतेत मोठा फरक आहे. आपण अत्यंत अल्पसंतोषी आहोत आणि ते लोक अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. यशाची शिखरे महत्वाकांक्षेच्याच पंखांनी गाठता येऊ शकतात, आहे ते ठीक आहे या मानसिकतेने नाही. आपली अजून एक विकृती म्हणजे आपले जे आहे ते कितीही निकृष्ट वा दर्जाहीन असले तरी आपण त्याला खूप महान आणि श्रेष्ठ मानतो. आपण कुपमंडूकासारखे आपल्या विहिरीतल्याच गोष्टींना जगातल्या बेस्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी समजतो. आपल्या कुपात राहून आपली मंडूक मानसिकता सदानकदा स्वतःच स्वतःला विश्वगुरू ठरवत असते. आपल्या वैचारिक क्षमता सुद्धा त्यामुळे अत्यंत मर्यादित आहेत. आपल्याच एवढ्याशा मर्यादित कोशात अडकलेले असल्याने आपल्याला यश, समृद्धी म्हणजे काय हेच माहित होत नाही तर त्यासाठी आपण प्रयत्न तरी कसे करणार?आपली संकुचित मानसिकता बदलणे, ती विस्तारणे गरजेचे आहे. आपली मानसिकता किती मागास आणि निरुपयोगी आहे याचे उदाहरण म्हणजे विकसित देशांत पैशांवरील पुस्तके बेस्ट सेलर्स होतात,आणि आपल्याकडे?धार्मिक पुस्तके.! 
आपली मानसिकता अगदी मर्यादित आहे असे मी म्हणतो कारण आपली श्रीमंत होण्याची पद्धत काय? किंवा आपले सर्वात हुशार विद्यार्थी काय करतात? तर मोठ्या पगाराची नोकरी, किंवा भ्रष्टाचार..!! उद्यमशीलता, व्यापार हे आपल्या पैसे कमावण्याच्या व्याख्येत किंवा ऑप्शन्समधेच नसतात. आपली बिजनेसची सुद्धा कॉमन आयडिया काय? तर दुकान, हॉटेल किंवा गाडी घेणे (ट्रान्सपोर्ट). या तीन व्यतिरिक्त किती लोकांना अन्य धंदे, व्यवसाय सुचतात? पाश्चिमात्य देशांतील लोक एकामागोमाग एक नवनवे प्रॉडक्ट लॉन्च करतात, नवनवे इन्व्हेंशन करतात, वेगवेगळ्या गुंतवणुकी करतात. आणि आपल्या इथे ९९ टक्के लोकांसाठी गुंतवणूक म्हणजे काय तर घर/जमीन/सोने विकत घेणे, एफ डी करणे किंवा अलीकडे थोडेफार शेअर मार्केटात इन्व्हेस्ट करणे. ठीक आहे घर, जमीन, सोने यांच्या किंमती वाढत जातात, पण त्या नॉन प्रॉडक्टिव्ह गुंतवणुकी आहेत. गुंतवणूक ही प्रॉडक्टिव्ह गोष्टीत केली पाहीजे. तिथे खरा जास्त आणि अस्सल परतावा मिळत असतो. आपण अशा गोष्टींत बुद्धी पैसा आणि मेहनतीची गुंतवणूक केली पाहीजे जी वारंवार वाढीव नफा देत राहील. एफडी हा गुंतवणुकीचा सगळ्यात फसवा मार्ग आहे. आज समजा 7 टक्के दराने आपण एफडी करतो, पण महागाई तर त्याहून जास्त दराने वाढत असते. एक वर्षाने जेव्हा एफडीमध्ये आपल्या 100 रुपयांचे 107 रुपये होतात तेव्हा महागाई वाढल्याने त्यांची क्रयशक्ती ही आजच्या 107 पेक्षा खूप कमी झालेली असते. त्याउलट तेच शंभर रुपये एखाद्या उत्पादनात गुंतवले तर महागाई वाढली तर उत्पादनाची किंमतही त्याच वेगाने वाढते, त्यामुळे जो नफा मिळतो तो जास्त व अस्सल असतो. म्हणून उत्पादक गोष्टींत गुंतवणूक करणे हे आवश्यक आहे. बहुतांश शहरी भारतीय हे होम लोन मध्ये आयुष्याची सर्वात मोठी गुंतवणूक करतात. अर्थात घर ही गरज असली तरी ती एक अनुत्पादक गुंतवणूक आहे. आणि बहुतांश कमाई ही या अनुत्पादक गोष्टीवर व्यय झाल्याने इतर उत्पादक गोष्टींत गुंतवणूक करायला मध्यमवर्गाकडे पैसाच उरत नाही. भारतीय मानसिकता ही खर्च करण्याऐवजी बचत करण्याची जास्त आहे. अर्थात गरिबी हेच त्याचे मुख्य कारण आहे. गरिबीमुळे आपण भविष्यातील आर्थिक सुरक्षेला अधिक महत्व देतो. गरिबी आहे म्हणून आपण पैसा खर्च करत नाही वा उत्पादक वा रिस्की गोष्टींत गुंतवणूक करत नाही, त्यामुळे बाजारात अधिक उत्पादन वाढत नाही, उत्पादन वाढत नाही म्हणून इकॉनॉमी वेगाने वाढत नाही आणि इकॉनॉमी पुरेशी वाढत नाही म्हणून आपण गरीबच राहतो अशा दुष्टचक्रात आपण फसलेलो आहोत. म्हणून आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अधिक व्यापक थिंकिंग आणि रिस्क घेण्याची वृत्ती जागवणे गरजेचे आहे. कोण्या मोजक्या दोनचार व्यक्तींत नव्हे तर एकंदरीतच सामूहिकपणे सगळ्या समाजात हा वैचारिक व प्रवृत्तीतील बदल होणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या आणि देशाच्याही प्रगतीसाठी जुन्या पारंपरिक,सामूहिक मर्यादा तोडून आपण सर्वांनी नवा व्यापक दृष्टीकोन अंगीकारणे गरजेचे आहे.   

....

४. समाज, संस्कृती आणि आर्थिक साक्षरता

पैशाचे गणित एकदम साधे आहे. जितकी जास्त बुद्धी, वेळ आणि मेहनत तुम्ही पैसे कमावण्यासाठी लावाल तितका अधिक पैसा तुम्हाला मिळेल. जितके आपण निरुपयोगी गोष्टींत बुद्धी, वेळ आणि मेहनत वाया घालवू तितके आपण दरिद्री राहू.
मागे आमच्याकडे आदिवासी समाजात अचानक संस्कृती संवर्धन मेळावे चालू झाले. गावोगाव हे मेळावे अतिशय उत्साहाने पार पडले. मला एक कळत नाही की संस्कृतीमध्ये असे काय आहे की तिचे संवर्धन करायचे आहे? त्यावर माझे शंभरातले नव्व्यान्नव आदिवासी बांधव सांगतील की आज जगात जे क्लायमेट चेंज होतेय, ग्लोबल वार्मिंग आहे, नवनवे रोग येत आहेत त्यावर उपाय म्हणजे आदिवासी जीवन पद्धती आणि आदिवासी संस्कृती.! प्रगत समाजाने आदिवासी संस्कृतीचा स्वीकार केला तर हे जग टिकेल नाहीतर ग्लोबल वार्मिंग आणि क्लायमेट चेंज मुळे जगाचा सर्वनाश होईल... सकृतदर्शनी हा अत्यंत आदर्श असा दावा वाटतो, पण प्रत्यक्षात तसे आहे का? तर प्रत्यक्षात दुर्दैवाने तसे अजिबात नाहीय. हे जग जीवघेण्या वेगाने पुढे धावते आहे, सावरता येत नाही इतक्या वेगाने वृक्षतोड, संसाधनांचा ऱ्हास आणि पोलुशन होते आहे. हे सगळे थांबवले पाहीजे हे नक्की. पण ते थांबविण्याचा मक्ता काय फक्त आदिवासींनी घेतला आहे का? आणि तोही स्वतः प्रचंड दारिद्र्यात खितपत पडलेले असताना? ही कोणती बुद्धिमत्ता झाली की 95% लोकांनी पृथ्वीचा ऱ्हास करावा, त्याचे फायदे लाटून ऐषारामाचे आयुष्य जगावे आणि उर्वरित 5 टक्क्यांनी मात्र ते जपण्याच्या नादात दारिद्र्याचे भोग भोगत बसावेत? याव्यतिरिक्तही अनेक खऱ्याखोट्या गोष्टी सांगून आपली संस्कृती श्रेष्ठ आहे हे सगळ्या समाजावर असे मेळावे, समाजमाध्यमे, लेख, पुस्तके यातून वारंवार बजावले जाते. माझे स्पष्ट म्हणणे आहे की मी आदिवासी संस्कृतीला अजिबातही श्रेष्ठ मानत नाही. मी भारतीय संस्कृतीला अजिबातही श्रेष्ठ मानत नाही, मी कोणत्याच जुन्या संस्कृतीला श्रेष्ठ वा महान मानत नाही. कारण माझा रोख प्रश्न आहे की जर तुमची हजारो वर्षांची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे तर तुम्ही इतके दारिद्र्यात का आहात? जर तुमची संस्कृती श्रेष्ठ असेल तर तिच्यायोगे तुम्ही खूप समृद्ध असायला हवेत. तुमची जीवनपद्धती श्रेष्ठ असती तर तुमचे जीवन हलाखीचे असायलाच नको होते. कसे आहे ना की आपली संस्कृती श्रेष्ठ आहे हे प्रत्येक संस्कृतीच्या लोकांना वाटते. जगात कोणताही असा समाज नाही जो म्हणेल की आमची संस्कृती खराब आहे, वा आमचा समाज श्रेष्ठ नाही. तुम्हालाही तसे वाटते यात काही आश्चर्य वा विशेष नाही. उलट तसे वाटणे हे अल्पबुद्धीचे व अप्रगत राहण्याच्या दरिद्री वृत्तीचे लक्षण आहे.
मी अनेक वेळा बघतो, की सामाजिक, जातीय, धार्मिक कट्टरतेने आजची तरुणाई लिडबीडून गेली आहे. माझा इतिहास उज्ज्वल होता, आम्ही इतिहासात श्रेष्ठ होतो, आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत, आमच्यात मर्दांचे रक्त सळसळते आहे. आजही ठरवले ना तर ही पृथ्वी पालथी करून टाकू. अरे मग ठरव की, आणि पाडून दाखव पृथ्वी पालथी. उगाच आपल्या काहीही गमजा ठोकायच्या. 
यावेळी गावी गेलो होतो तेव्हा एक विशेष गोष्ट दिसली. अनेक पोरांच्या टी शर्टवर लिहीलेले होते, 'आम्ही सह्याद्रीचे राजे'. मी म्हंटले क्या बात है, पण हे सह्याद्रीच्या राजांनो, आज रात्री तुमच्या घरी भाकरीबरोबर खाण्यासाठी पुरेशी डाळ आहे का रे? याच्याकडे साधे तालुक्याच्या ठिकाणी जायला एसटीच्या भाड्याचे पैसे नाहीत पण हा कोण तर म्हणे सह्याद्रीचा राजा.! किती ही दांभिकता..!! दारिद्र्यातून बाहेर पडणे एकवेळ शक्य होईल पण दांभिक दरिद्री वृत्तीतून बाहेर पडणे अवघड आहे.
अजून एक विकृती मी समाजात बघतो की अनेक स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लोक मला भेटतात. यातील बहुतांश लोक हे एकतर शाळा वा कॉलेज ड्रॉपआउट झालेले असतात, किंवा नोकरीतून सस्पेंड झालेले असतात. यांना विचारले ना की का रे बाबा नापास झालास? तर म्हणतात समाजाच्या कार्यासाठी वेळ दिल्यामुळे अभ्यासाला वेळच मिळाला नाही. याच्याइतके लबाड आणि खोटारडे कारण अन्य असू शकत नाही. असे म्हणणारे सगळेच्या सगळे खोटारडे असतात. आपल्या वैयक्तिक अपयशाचे खापर ते लबाडपणे समाजकार्यावर फोडतात. माझे स्पष्ट म्हणणे आहे की समाजाचा उद्धार करणे हे एका स्वतःच दरिद्री वा मागासलेला असलेल्या माणसाकडून होऊ शकत नाही. आधी स्वतःचा उद्धार तर नीट करा मग समाजाचे पहा. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे कॉलेजमधले सहकारी चिडवत असत की अरे तू समाजाच्या आंदोलनांत का सहभागी होत नाहीस? सारखे काय अभ्यास? समाजाला गरज असताना तू डिग्रीच्या मागे काय लागलेला आहेस? त्यावर बाबासाहेब म्हणायचे की मी स्वतः सक्षम झाल्याशिवाय समाजाला सक्षम बनवू शकत नाही. माझ्याच पायात शक्ती नसेल तर मी समाजाचा गाडा वेगाने हाकू शकत नाही. बाबासाहेबांनी आधी स्वतःला सक्षम बनवले. आणि मग ते समाजाच्या कार्यात उतरले. मला सांगा, संपूर्ण जगात एखाद्या समाजाचा इतका आमूलाग्र प्रमाणातील उद्धार अन्य कोणातरी मनुष्याने केला आहे का? तेच बाबासाहेब जर कॉलेज मध्ये आंदोलनांत गुंतून पडते तर फारतर एखादे छोटेमोठे पुढारी वा नेते झाले असते. असे झाले असते तर आज भारत वजा बाबासाहेब आंबेडकर ही किती मोठी पोकळी आपल्याला बघावी, भोगावी लागली असती? 
माझे म्हणणे स्पष्ट आहे, समाजाच्या उद्धाराच्या फुक्या बाता मारू नका. समाजाचे राहू द्या, आधी स्वतःचा वैयक्तिक उद्धार करा. आधी स्वतःला तर सक्षम करा. स्वतः समृद्ध झालेला मात्र समाजासाठी काम न करणारा आणि स्वतः दरिद्री राहून समाजाचे काम करतोय असे दाखवणारा यांत मी स्वतः समृद्ध झालेल्याला श्रेष्ठ मानेल. कारण समाजातील प्रत्येकाने स्वतःला सक्षम केले की समाज आपोआप सक्षम होणारच असतो. समाज व्यक्तींनी बनतो. म्हणून व्यक्ती सक्षम होणे महत्त्वाचे आहे, तसे झाले की समाज आपोआप सक्षम होतो. उलट माझे निरीक्षण आहे की कोणीतरी दुसरा आपल्यासाठी लढतो आहे ही जाणीव समाजातील वैयक्तिक लढाऊ वृत्तीला मारक असते. त्यामुळे 'कुणीतरी दुसरा जीव लावून लढतोय ना मग होईल बदल, आपण फक्त त्याला सपोर्ट केले की झाले' ही समाजाची मानसिकता होते. त्याउलट तू एकटा आहेस, आणि तुलाच स्वतःसाठी लढायचे आहे ही जाणीव माणसाला जास्त प्रयत्नशील बनवते. म्हणून सामूहिक नव्हे तर वैयक्तीक प्रगतीवर जोर दिला पाहिजे.  
आज पारंपारिकतेला ठोकायचेच ठरवले आहे तर माझ्यापुढे अजून एक वर्ग आहे. हा समाजातील वर्ग बुद्धिमान आहे, आर्थिक दृष्ट्या अगदी श्रीमंत नसला तरी स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभा आहे. हा वर्ग आता इतिहास संशोधन आणि आपल्या परंपरा कशा श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे आपली ऊर्जा लावू लागला आहे. हे लोक अतिशय तळमळीने व शुद्ध भावनेने प्रेरित होऊन हे काम करतात. पण जरी अतिशय प्रामाणिकपणे व समाजाचा उतराई होण्यासाठी ते लोक हे काम करत असले तरी खऱ्या अर्थाने ते एक निरुपयोगी काम आहे असे माझे स्पष्ट मत आहे. चला जर समजा आपला कोणी एक ऐतिहासिक पुरुष श्रेष्ठ होता हे सिद्ध झाले. आपल्या लोकांनी मदत केली नसती तर शिवाजी महाराजांना राज्य स्थापन करता आले नसते हे समजा सिद्ध झाले, शिवाजी महाराज नसते तर यांव झाले नसते वगैरे सगळे सिद्ध झाले, तर त्याने काय फायदा होणार आहे? आपले पूर्वज अफाट पराक्रमी होते हे सिद्ध झाल्याने नेमके काय होणार आहे? अगदी आपली एखादी प्रथा वा परंपरा जगाने श्रेष्ठ म्हणून मान्य केली (तसे कधीच होणार नाही पण उदाहरणासाठी मानू) किंवा आपल्या एखाद्या पारंपरिक पद्धतीचे एखाद्या आधुनिक टेक्नॉलॉजीशी साधर्म्य आहे हे सिद्ध झाले तर आपला नेमका काय फायदा होणार आहे? आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध झाल्याने आपला पगार एक रुपयाने तरी वाढणार आहे का? आपल्या ताटात त्यामुळे आपोआप भाकरी येणार आहे का? आपण वा आपली संस्कृती श्रेष्ठ आहोत हे सिद्ध झाल्याने आपल्या शेतमालाला जास्त भाव मिळणार आहे का? तर नाही, असे काहीही होणार नाहीय. मग हे सगळे तद्दन निरुपयोगी नाही का? आपण श्रेष्ठ आहोत, आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, आपला इतिहास जाज्वल्य आहे हे प्रबोधन केल्याने समाज उलट त्यात गुंतून त्यातच बुद्धी आणि ऊर्जा खर्च करून अजून मागास आणि निरुद्योगी राहतो आहे. तसेही आपण श्रेष्ठ आहोत हे आपण स्वतःच सिद्ध करून मानल्याने काहीही उपयोग नाही. प्रॅक्टिकली समाजाला आर्थिक, वैचारिक समृद्धीची खरी गरज आहे. निरुपयोगी गोष्टींऐवजी आपली ऊर्जा, समाजातील लोकांत जागरूकता, शिक्षण, उद्योजगता, कल्पकता, आहे ती परिस्थिती, दु:स्थिती बदलण्याची प्रवृत्ती निर्माण होईल असे प्रबोधन करण्यात घालवणे अधिक योग्य नाही का?
अर्थात ही जी नव्याने मध्यमवर्गात प्रवेश करणारी व प्रबोधनात रस घेणारी पिढी आहे ती स्वतःच आर्थिक दृष्ट्या साक्षर नाहीय. त्यामुळे ते समाजाला तरी काय शिकवणार म्हणा.! जसे अंधश्रद्ध पालक मुलांना अंधश्रद्धाच शिकवतात, तसे स्वतःच आर्थिक निरक्षर असलेली मार्गदर्शक पिढी समाजाला आर्थिक साक्षरता शिकवू शकत नाही. म्हणून आधी प्रबोधन करणारांतच आर्थिक शहाणपण येणे आवश्यक आहे. वैचारिक समृद्धी ही गरज आहेच पण आर्थिक समृद्धीची समाजाला जास्त गरज आहे. वैचारिक समृद्धी आणणे गरजेचे आहे असे मी म्हणतो तेव्हा कुणाचा तरी द्वेष करायला शिकवणे वा आपण सोडून इतर सगळ्यांवर संशय घेऊन त्यांच्यावर अविश्वास ठेवणे हा जर आपल्या वैचारिक प्रबोधनाचा रिझल्ट असेल तर असे प्रबोधन सुद्धा चुकीचे आहे. इतरांचा द्वेष करणे हे संकुचित वृत्तीचे लक्षण आहे आणि संकुचित वृत्ती बाळगून कोणत्याही समाजाची व्यापक प्रगती होऊ शकत नाही. आपली भाषा, परंपरा, समाज, धर्म यातील जे चुकीचे आहे त्याला स्पष्टपणे चुकीचे म्हणून त्यागून टाकणे, जे चांगले व फायद्याचे आहे ते जपणे, जे दुसऱ्यांचे चांगले आहे ते स्वीकारणे, आधुनिकता, आधुनिक ज्ञान स्वीकारणे, उद्यमशील होणे, स्वतःच्या उत्कर्षासाठीच सगळी ऊर्जा बुद्धी व वेळ खर्च करणे हा खरा प्रगतीचा मार्ग आहे. संस्कृती, जात, धर्म अशा निरुपयोगी व अनुत्पादक गोष्टींना जीवनात जितके कमी महत्व, जितका कमी वेळ व मेहनत देऊ तितका आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. झाडे, जंगले, नद्या डोंगर हे नक्की जपा, पण आधी स्वतः सक्षम होऊन मग हे करा. हे जग पैशावर चालते हेच सत्य आहे. पैसा हीच जगातली सर्वात मोठी ताकद आहे हे स्वीकारणे ही पहिली गरज आहे. जगातील तमाम युद्धे, संघर्ष, करार हे प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे पैशांसाठीच आहेत. संस्कृती, जात, धर्म, इतिहास ही सगळी तुमच्या प्रगतीच्या मार्गातील जोखडे आहेत. ती झुगारून देणे आपल्याला जेवढ्या लवकर जमेल तितक्या लवकर आपली प्रगती होईल. आणि हो पैसा सहजासहजी येत नाही. त्यासाठी आधी ती वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. तिथून पुढे मग त्या वृत्तीला जोपासणारी कल्पकता आणि मेहनत यांची आपल्याला आवश्यकता आहे. आपला इतिहास महान होता, आपली संस्कृती महान आहे हे मानने वा शोधणे पूर्णतः बिनकामाचे आहे. आपली प्रगती कशी होईल, दारिद्र्य कसे संपेल यासाठी आपली बुद्धी व मेहनत खर्च करणे हे उपयोगी आहे. 
मी तर म्हणेल की वैचारीक प्रगती पेक्षाही आर्थिक प्रगती आजच्या युगात अधिक महत्वाची आहे. आपण सधन झाल्यानंतरही विचार सुधारता येतील की. मी खात्रीने सांगतो, कोणत्याही प्रबोधन मेळाव्यात भाषण देणारा कोणताही एखादा वक्ता हा मुकेश अंबानी यांच्यापेक्षा वैचारीक बैठकीत कितीतरी पट श्रेष्ठ ठरेल. पण प्रत्यक्ष आयुष्यात तो अंबानी यांच्याच कंपनीत एखाद्या साध्या पोस्टवर नोकरीला असेल. काय जास्त महत्वाचे आहे हे यातून स्पष्ट होईल असे मला वाटते. आपले एक श्रेष्ठ कवी आहेत, ते ज्या कंपनीत कामाला होते त्या कंपनीचा मालक ट्विटरवर इतका थिल्लरपणा दाखवतो की काय सांगू. कुणीही म्हणेल काय बालिश माणूस आहे.! त्याउलट या कवींची कोणतीही एक कविता वाचली तर आपण अगदी अचंबित होऊ की कोणी एवढा अफाट विचार कसे करू शकते. अर्थात हे झाले वैचारिक पटलावर. पण वास्तवातल्या दुनियादारीमध्ये तो बालिशपणा करणारा व्यक्ती मालक आहे आणि श्रेष्ठ विचार करणारा व्यक्ती त्याचाच अगदी साधा नोकर.! म्हणून वैचारिक प्रगती महत्वाची असली तरी तिची पुढची स्टेप आर्थिक प्रगती ही नसेल तर वैचारिक प्रगतीही कुचकामी आहे असेच मी म्हणेल. आर्थिक साक्षरता हीच सर्वात महत्वाची आहे. समाजात धर्म, संस्कृती, इतिहास यांचे प्राबल्य असणे हे आर्थिक निरक्षरतेचे द्योतक आहे. भारतीय लोक जितक्या लवकर आर्थिक साक्षर होतील तितक्या लवकर भारत विकसित होईल. फूनसुख वांगडू म्हणतो ना तसे आपली संस्कृती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याच्या मागे स्वतःच धावू नका, तुम्ही प्रगत आणि सक्षम बना, जग स्वतःहून तुमच्या संस्कृतीला श्रेष्ठ मानू लागेल. आज जगातील प्रत्येकाला अमेरिकेचा नागरिक का व्हायचे आहे? कारण अमेरिका आर्थिक ताकदीने समृद्ध आहे. तुम्ही आधी समृद्ध बना मग जग स्वतःहून तुम्हाला श्रेष्ठ म्हणून मान्यता देईल.