हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २९ मार्च, २०११

युद्ध

१ मार्च २००३. तब्बल तीन वर्षांनंतर आलेला योग. विश्वचषक नाही मिळाला तर चालेल पण ही लढत जिंकायची होती. वर्षानुवर्षांचे पारंपारिक वैर आणि युद्धापेक्षाही निकराने लढली जाणारी क्रिकेटची ही लढत.

          
स्थळ - सेंच्युरीयन. (आणि सबंध भारत वर्षातले प्रत्येक घर)
 
नेहमीच भारताविरुद्ध त्वेषाने खेळणारा.. आणि निवृत्तीचा उंबरठा ओलांडून, संन्यस्त होऊन दाढी वाढविलेला पण विश्वचषकासाठी परत माघारी आलेला सैद अन्वर पुन्हा एकदा नडला आणि त्याच्या शतकाच्या जोरावर पाक ने २७३ धावांचे लक्ष ठेवले.

२५० च्या वरचे टारगेट म्हणजे हमखास विजय असे त्यावेळचे सूत्र. पाकिस्तानची वसीम, वकार व शोएब आदींनी भरलेली जगातली सर्वोत्तम गोलंदाजी आणि जगातली सर्वाधिक बेभरवशाची भारतीय फलंदाजी.

 
पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सचिनने वसीम अक्रम ला कवर्समधून सीमेवर टोलावला आणि ठिणगी पडली!! वेगाच्या खुमखुमीत असणाऱ्या शोएबला डावाच्या पुढच्या षटकातील चौथ्या चेंडूवर point च्या डोक्यावरून सचिनने आसमान दाखविले आणि अंगांगात थरार पेटून उठला! (या षटकारास त्या विश्वचषकातील सर्वोत्तम क्षण म्हणून नंतर ICC ने जाहीर केले) पुढच्याच षटकात सेहवागने वकारला तिथेच आणि तसाच भिरकावला व भक्कम पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडविल्याची नांदी दिली.
पुढे वकार ने सेहवागला बाद करून, पुढच्याच चेंडूवर लटपटत्या गांगुलीस देखील माघारी धाडला आणि उत्कंठेने व भीतीने शंभर कोट हृदये धडधडू लागली. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.!! आमचा देव अजून मैदानात होता.. आणि हा देव ज्याला मारी त्याला कोण तारणार? पाकिस्तान्यांची यथेच्छ धुलाई त्याने चालूच ठेवली. सचिनने आपली ६० वी फिफ्टी साजरी केली तेव्हा भारताचा स्कोअर होता ८१.

नेमकी इथे लाईट गेली आणि राजुरातल्या एकमेव जनरेटर  असलेल्या दुकानासमोर सगळे राजूर जमा झाले. १६व्या षटकात टीमचे १४४ रन पूर्ण करून वैयक्तिक १२००० धावांचा पल्ला ओलांडला आणि सचिन लंगडू लागला. २८विसाव्या षटकात वैयक्तिक धावसंख्या ९८ व भारतीय धावसंख्या १७७ असताना सचिनसाठी रनर मैदानात आला. त्या दिवसापर्यंतच काय पण आजपावेतो सचिनने एकही धाव रनर घेऊन काढलेली नाही. (आज त्याचे ३२७१० आंतरराष्ट्रीय रन्स आहेत) म्हणून छातीत धस्स झाले. आणि शोएबने डाव साधला. सचिन ९८ वर बाद... पण जखमी वाघाची शिकार करून आनंद साजरा करण्याच्या स्थितीत सचिनने पाकिस्तान्यांना सोडलेच नव्हते. सचिनच्या कामगिरीवर कळस चढवीत युवराजने अर्धशतक मारून विजयश्री खेचून आणली.. आणि एकच जल्लोष झाला..!! प्रत्येक रनाबरोबर थिरकणारे आणि प्रत्येक चौकार षटकारा नंतर उधाणणारे राजूर संपूर्ण जल्लोषात बुडून गेले. आत्मप्रेरणेने कुठलेसे एक ढोल-पथक आले आणि सुरु झाला राजूर बाजारपेठेत प्रचंड उल्हासात एक सामुहिक विजयी नृत्याचा उन्माद..!! वाजविणारे ही बेभान आणि नाचणारे तर त्याहून बेभान. फटाक्यांच्या माळा फुटत होत्या, आरोळ्या आणि घोषणा आसमंत दणाणून सोडीत होत्या व सबंध भारत देशाबरोबर राजूर अपूर्व विजयोन्मादी तालांवर थिरकत होते..!! रात्री किती वाजेपर्यंत धिंगाणा चालला आठवत नाही.. पण उद्याच्या लढती आधी पुन्हा एकदा त्या आठवणींनी उर भरून आलाय हे मात्र नक्की..!!

शनिवार, ५ मार्च, २०११

श्रीमुख गाथा

आटपाट शाळा होती.. ३००-४०० विद्यार्थी होते.  गुण्या-गोविंदाने राहत होते. सकाळी उठत, PT करत आणि आणि मग जोडी-जोडीने, समूहा-समूहांत परसाकडे जात असत.
एका बादलीत दोघे तिघे शुचिर्भूत होऊन अल्पोपाहारासाठी निघत असत. वर्षानुवर्षे सबंध आटपाट शाळेतील जन हेच व्रत पाळीत असत. भोजनसमयी, एकमेकांची उडविणे, दुसऱ्यांस शिव्या वाहणे, कुरापती करणे, अव्याहत बडबड करणे आदी वसे प्रत्येकाने घेतलेले असत.
अशाच एके दिवशी अल्पोपाहारात साबुदान्यांच्या खिचडीचा नैवेद्य बनविला होता. त्यावर यथेच्च ताव मारील्यावरही शेवटच्या वाढीनंतर मेजावर तसेच थाळींत बरेचसे साबुदाणे पडलेले होते.  त्याकाळी कॅरम नावाच्या क्रीडाप्रकाराचे प्रस्थ समाजात असे. तद्वत आटपाट शाळेकर कशानेही कॅरम खेळण्यात तरबेज असत. त्याची दिवशी एके राहुल नामक विद्यार्थ्याने मेजावरील साबुदान्यांसावे कॅरम खेळून चिंतामणी नामक विद्यार्थ्यावर त्यांचा मारा केला असे. प्रत्युत्तरात चिंतामणीने देखील राहुल वरी तसाच मारा केला असे. यावत क्रीडाप्रकारे मेजावरील समस्त साबुदाणे समाप्त जाहल्यावरी राहुलने आपुल्या थाळीतील साबुदाणे मेजावरी उपडे करून ओतले असत. व उत्साहात येऊन उभे राहून दोन्ही हातांनी त्यांस चिंतामणीच्या मस्तकावर अभिषेकण्याचा  मानस केला असे. पण दैवाची दुर्गती बघा. राहुल यास या व्रताचे पुण्य न मिळो यास्तव इंद्र देवाने निमी नामक व्यक्ती भोजन गृहात धाडिली असे. राहुलच्या व्रतात व्यत्यय आणून त्याचे श्रीमुख गरम करण्याचे त्यास संकेत होते. तद्वत ज्याक्षणी राहुलने उभे राहून साबुदाण्याचे पहिले अर्घ्य चिंतामणीवर वाहिले तेव्हाच त्याने दुरून मोठी गर्जना करून.. "ए तू बाहर आ, रुक जा और ऐसेही बाहर आ" इत्यादी शब्दांनी त्याचेवर आगपाखड केली. निमी नामक व्यक्ती कधीही क्रोधीत झालेली कुणी पाहिली नसल्याकारणाने सगळीकडे भयाण शांतता पसरली. एव्हना राहुल बाकावरून बाहेर येऊन मेजपंक्तीच्या सुरुवातीस येऊन उभा राहिला. निमीने त्याचे बखोट डाव्या हाताने पकडले. आणि उजव्या हाताने त्याचे श्रीमुखाचे तापमान एकेके थापडीसरशी वाढवीत नेले.  आणि त्यास कोपर्यापर्यंत ढकलीत नेवून भिंतीस टेकवून आणखी त्याचे मुखातही २-३ टेकविल्या. त्यानंतर संबंध भोजन गृहावर आगपाखड करुनी तो चालता जाहला..!! मागे फक्त राहुल आणि त्याचे वर्गातली बाकी मंडळी.. मनात हसून परी बाहेर सांत्वनापर बोल लावून त्यास आधार देत घेऊन गेले. दैवाचा डाव असा फिरला आणि काही क्षणांपूर्वी मेजावर मोठमोठे पराक्रम करणारा राहुल मान खाली घालून अश्रू ढाळता झाला. जसा तो खेळला जसा तो रडला पण पुन्हा २ दिवसांनी पूर्ववत होऊन कुरापती कार्यास रुजू जाहला तसे तुम्हीही जाहो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.