हा ब्लॉग शोधा

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

ओळख

(प्राथमिक निवेदन - ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यात कुठलाही तथ्यांश नाही. घडलेल्या खऱ्या प्रसंगांचे, घटनांचे उल्लेख आणि संदर्भ हे केवळ कथानकाच्या सोयीसाठी घेतलेले आहेत.) 

"अहमदनगर", सामान्य माणसांचे एक सामान्य महाराष्ट्रीय शहर.! त्या शहरात १५ जानेवारी १९८२ला असाच एक सामान्य मुलगा जन्मास आला. अहमद त्याचे नाव. तीन मुलींनंतर झालेला अब्दुल आणि रिझवाना तांबोळी यांचा हा मुलगा. सहा वर्षांचा होताच अब्दुलने त्यास झेडपीच्या शाळेत टाकले. पोरगा चांगला हुशार निघाला. वर्गशिक्षक शिंदेमास्तर जेव्हा कधी बाजारात अब्दुलला भेटत तेव्हा अहमदच्या हुशारीबद्दल भरभरून कौतुक करीत आणि अब्दुलची छाती अभिमानाने भरून येई. "छोकरे कु भोत बडा आदमी बनायेंगे" असे तो नेहमी रिझवानेस सांगायचा.
चौथी पाचवीपासूनच अहमदला वाचनाची प्रचंड गोडी लागली. पण शाळेच्या लायब्ररीत जेमतेम पन्नासएक पुस्तके होती. म्हणून मग त्याने नगरपालिकेच्या लायब्ररीत जायला सुरुवात केली. खांडेकरांपासून सुशिंपर्यंत सगळे मराठी लेखक वाचून काढले. मृत्युंजय ही त्याची सर्वात आवडती कादंबरी. कर्णाने त्याच्या किशोर मनास पार हेलावून टाकले. मृत्युंजयाची त्याने पंधराएक पारायणे तरी केली असतील.
'अहमदला दुसऱ्या चांगल्या शाळेत टाका' असे शिंदेमास्तर आता नेहमी म्हणू लागले होते. "इथे पोराला योग्य न्याय मिळणार नाही. चांगली शाळा मिळाली ना अब्दुल तर तुझा पोरगा बोर्डात येईल बोर्डात.!" अब्दुललाही हे कळत होते, पण पोराच्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्चण्याची त्याची ऐपत नव्हती. त्याची परिस्थिती हलाखीची होती. ज्या घरात ते राहत त्याचीही कोर्टात केस चालू होती. शेजारचा किराणा दुकानदार त्यावर दावा करीत होता. पैशाअभावी अब्दुलच्या दोन मुली कोवळ्या वयातच आजारपणाने मृत्युमुखी पडल्या होत्या. तिथे मुलाच्या शाळेसाठी खर्च तो काय करणार? अहमद झेडपी शाळेतच राहिला.
अहमद दहावीला असताना अब्दुल घराची केस हरला. वस्तीत कोंबड्यांच्या मुत्र-विष्ठांचा वास आल्याने शेजाऱ्यांना त्रास होतो म्हणून त्याचा धंदा आधीच शेजाऱ्यांनी बंद करायला लावला होता, आता डोक्यावरचे छप्पर देखील गेले. अब्दुलने निर्णय घेतला मुंबईला जाण्याचा. मुंबईला त्याचा एक चुलत भाऊ बऱ्याच वर्षांपूर्वी गेला होता. तिकडे किमान जगण्यापुरते काम तरी मिळेल असे त्याने सांगितले होते. अब्दुलने अहमदला घेऊन मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. अहमदने दहावीचे वर्ष तरी मला इथेच राहूदेत म्हणून प्रचंड त्रागा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अहमदच्या बहिणीस आणि रीझवानास तिच्या भावाकडे ठेऊन दोघे मुंबईस गोवंडीत आले.
अब्दुल एका कॉन्ट्रॅक्टरकडे रोजंदारीवर काम करू लागला आणि अहमद एका चहावाल्याकडे. शाळा कायमची सुटली ती सुटलीच. अशात काही वर्षे गेली. मध्यंतरी नगरला त्याच्या मोठ्या बहिणीचा त्यांनी निकाह लावून दिला. आता एकट्या असलेल्या अम्मीस मुंबईत आणायला हरकत नाही असे बाप-बेटयांत ठरू लागले. पण त्याच काळात सन १९९२ला बाबरी मशीद पडली आणि अचानक अहमदचे आयुष्यच बदलून गेले. वस्तीत जिकडे तिकडे इस्लाम, हिंदू, शिवसेना, भाजप या चर्चा रंगू लागल्या. आपण काहीतरी वेगळे आहोत, मुसलमान आहोत, याची त्याला पहिल्यांदाच प्रखर जाणीव झाली. आणि मग मुंबईत सुरु झाली एक जीवघेणी क्रूर दंगल. त्या दिवसांत घाबरून अहमद दिवसभर घरात दडून राही. आजूबाजूचे मित्र रात्री अपरात्री काठ्या, कोयते घेऊन येत आणि चल आमच्याबरोबर असे म्हणत. पण अहमद अजून भेदरून जाऊन नकार देई. एके दिवशी अब्दुल घरी परतला नाही. त्याला शोधण्यासाठी बाहेर जाण्यासही अहमदला धीर होईना. दोन दिवसांनी शेजारच्या मुनाफने सांगितले, तुझ्या अब्बाचे प्रेत रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेय म्हणून..
अहमद आता आतल्या आत धुसमुसत होता. त्याच्या अब्बूचा मृत्यू त्याच्या काही केल्या पचनी पडेना. एवढा गरीब, शांत, प्रेमळ अब्बा, त्याला कुणी का मारले असेल? अहमदचे रोम अन रोम थरथरुन उठत होते. मुठी आवळल्या जात होत्या. इन्तकाम, इन्तकाम, इन्तकाम हा एकाच शब्द त्याच्या मनात रुंजी घालत होता. वस्तीत एके रात्री एक मिटिंग झाली. त्यातली भाषणे ऐकता ऐकता अहमदची तळपायाची आग मस्तकाला जात होती. कानशिले गरम झाली होती. सभा संपली आणि घरी परतताना अहमद मुनाफला म्हणाला, "माझ्याकडे एक कोयता दे आणि चल, दिसेल त्या काफीराची आताच्या आता खांडोळी करायची आहेत मला". मुनाफने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, "थांब. असा उतावीळ होऊ नकोस. तुला संधी नक्की मिळेल. आपल्या डोक्यातली आग तोपर्यंत काबूत ठेव."
दोन महिन्यांनंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. मुनाफ त्या दिवसापासून गायब झाला. वस्तीतले अनेकजण पोलिसांनी पकडून नेले. पुन्हा संपूर्ण मुंबईभर तणाव निर्माण झाला. अहमद आणि इतर मुले रात्ररात्रभर कित्येक दिवस टोळकी करून वस्तीत गस्त घालत राहिली. मिटींगा होत राहिल्या, भाषणे होत राहिली. दिवसेंदिवस सुडाची भावना अहमदच्या मनात अधिकाधिक दृगोच्चर होत राहीली. मात्र काही दिवसांनी वातावरण निवळले. मुंबई पुन्हा धावू लागली. आता अहमद रफिकभाईच्या गॅरेजमध्ये कामाला लागला. अशीच चारेक वर्षे गेली. अहमद आता दाढी राखू लागला होता. शर्ट पॅन्ट त्यागून कुर्ता घालू लागला होता. अब्बूची आणि अम्मीची त्याला सारखी आठवण येई. मध्यंतरी दोनतीन वेळा तो नगरला जाउन अम्मीला भेटून आला. मात्र आता अब्बुच्या जाण्यानंतर त्याला अम्मीला मुंबईस आणावेसे वाटेना. काही दिवसांनी मुनाफ वस्तीत परत आला. इतके दिवस दुबईला नोकरीसाठी गेलो असल्याचे त्याने सगळ्यांना सांगितले. एके दिवशी तो अहमदकडे आला. त्याला कसा आहेस ते विचारले. अब्बू की मौत भूल तो नही गया ना? असे विचारले.  मग तो रोज रात्री अहमदकडे येऊ लागला. दोघे खूप गप्पा मारीत. तो दुबईला नव्हे तर पाकिस्तानात गेला असल्याचे त्याने अहमदला सांगितले. "ये काफिर लोग हमारे लिये कूछ नही करेंगे, उलटा इनका बस चले तो ये हमे जिंदा काट देंगे", असे तो म्हणे. "पण आपणही शांत बसायचे नाही, जब टाईम आयेगा तब कौम के लिये कुर्बानी देने के लिये तैय्यार रहना" असे तो अहमदला नेहमी सांगे. वेळी अवेळी वेगवेगळी माणसे मुनाफला भेटायला येत. ते सगळे नेहमी कुठल्याश्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलत असत. अशात ९ सप्टेंबरला अमेरिकेत वल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला झाला आणि पुन्हा एकदा तणाव मुंबईत निर्माण झाला. आता दंगल झाली तर थेट तीत तुटून पडायचे असे अहमदने ठरविले. पण दंगल झाली नाही. टीव्हीवर रात्रंदिवस बातम्या ऐकून आणि ओसामा बिन लादेन हे नाव ऐकून अहमदला त्याचेबद्दल मोठे कुतूहल वाटे. काफिरांबरोबर आता त्याचा एक नवा शत्रू निर्माण झाला होता, अमेरिका.! एक वर्षानंतर गुजरातेत दंगल उसळली. मार्चमध्ये एक दिवस मुनाफ आला, त्याचेकडे एक लॅपटॉप होता. त्याने अहमदला त्यातून काही व्हिडीओ दाखविले. आणि म्हणाला, " अब कूछ तो करना ही पडेगा. तू तय्यार रहना." मग एके रात्री मुनाफ अहमदकडे आला आणि म्हणाला "चल, बडा काम करनेका टाईम आ गया". दोघे कुर्ल्यात आले. तिथे अजून बरीच मुले होती. एक मोठा दाढीवाला माणूस सगळ्यांना काहीतरी सांगत होता. खोलीत जाताच मुनाफने ओळख करून दिली, "ये अहमद है, इसका अब्बा ९३ के दंगे मे मारा गया, इंतकाम लेना चाहता है, कौम के लिये कुछ करना चाहता है." त्या माणसाने अहमदच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला की तुम्हारा वक्त भी आयेगा. हम तुम्हारे अब्बू का और हमारे हजारो भाईयोंका बदला जरूर लेकर रहेंगे. मग त्याच रात्री अहमद आणि मुनाफ़सह वीसजण पाटण्याच्या ट्रेनमध्ये चढले. पाटण्यावरुन काही दिवसांनी त्यांना दिल्ली आणि तिथून काश्मीरमार्गे पाकिस्तानात नेण्यात आले. ते तिथे एका प्रशिक्षण शिबिरात ३ महिने राहिले. मुनाफची तिथे बऱ्याच जणांशी आधीच ओळख होती. नंतर मग त्यांना शपथ देववून पुन्हा भारतात पाठविण्यात आले.
भारतात परतल्यावर आधी काही दिवस अहमद आजमगडमध्ये राहिला. अनेक तरुण तिथे येत, गप्पा मारीत आणि शपथा घेत. बॉम्ब बनविण्याचे सराव केले जात. एक इंजिनियर होता, तो बॉम्बबद्दल बरीच माहिती देई. ते अनेक पुस्तके आणीत आणि वाचीत बसत. अहमदला मात्र ती पुस्तके वाचता येत नसत. त्याला उर्दूचे ज्ञान नव्हते. मुनाफ त्यावरून त्याला खूप दुषणे लावीत असे. काफिरांची भाषा वाचून तू त्यांचे विरुद्ध कसा लढणार असे त्याला त्याचे नवे मित्र म्हणत. त्याने उर्दू शिकायचे ठरविले. तोपर्यंत मग त्याला हिंदीतली पुस्तके वाचायला दिली जात. सगळी पुस्तके धार्मिक, आणि धर्मावरील अन्यायाला उद्गत करीत असत. कधी कधी मात्र एखादे मगेझीन हातात आले की वाचता वाचता अहमदला नगरची, शाळेची आणि अम्मीची खूप आठवण येई. आपण करत आहोत ते योग्य आहे का असा प्रश्न पडे. पण मग मुनाफशी बोलले की त्याच्या शंका कुशंका दूर होऊन जात. तिथेच एक दिवस त्याची भेट यासीन भटकळशी झाली. हा खूप तापट डोक्याचा माणूस होता. दोन तीन वेळा त्याने त्याच्याच साथीदारांच्या कानफटात मारल्याचे अहमदने पाहिले. तो नेहमीच खूप आवेशात बोलत असे. असेच काही दिवस गेल्यावर एकदा सगळ्या जणांनी आजमगडमधून पांगण्याचे व नंतर मुंबईत भेटायचे ठरविले. सगळ्यांनी आपापली सीमकार्ड्स तोडून टाकली आणि नवी सीमकार्ड्स घेतली. मुंबईत पोचताच ही सीमकार्ड्स देखील फेकून द्यायची होती. अहमदला आधी हैदराबादला पाठविण्यात आले. आणि निरोप येताच मुंबईला यायला सांगितले. त्या आधी त्याला एक दिवसासाठी नगरला जाउन अम्मीस भेटण्याची परवानगी मिळाली. 
अम्मी आजारी होती. अहमद तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. घरी आल्यावर अंथरुणावरच्या अम्मीला अहमद म्हणाला, अम्मी मी आता एका मोठ्या कामासाठी जात आहे. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. अम्मी रडू लागली. "बेटा असे का बोलतोस? तू एखादे वाईट काम तर करत नाहीस ना? तू वाईट लोकांच्या संगतीत तर पडला नाहीस ना? इकडे रोज रोज वेगवेगळ्या बातम्या ऐकून मला घाबरायला होते." "नाही अम्मी मी एक मोठे काम करायला चाललो आहे. तू काळजी करू नकोस. मी असे काम करणार आहे ज्यामुळे तुला फक्र वाटेल तुझ्या मुलावर." मग अम्मीकडे थोडे पैसे देऊन अहमदने निरोप घेतला.
मुंबईत आल्यावर रात्री ठरल्याप्रमाणे मुनाफ आला आणि त्याला घेऊन कुर्ल्याच्या त्याच घरात गेला. तिथे अजून १० लोक होते. बऱ्याच नव्या कोऱ्या बॅगा आणि प्रेशर कुकरची खोकी पडलेली होती. गुजरातेचा सूड घेण्याची वेळ आली आहे, आता तयार व्हा असे अहमद आणि इतर तरुणांस सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी परत सगळे जमले. प्रत्येकाला काही सुचना मिळाल्या. "घाबरू नका, खुदा आपल्या बरोबर आहे", असे सांगण्यात आले. सगळे जण परतले. आणि मग तो ठरलेला दिवस उजाडला. सकाळी नऊ वाजता सगळे कुर्ल्यात जमले. अहमदसह इतर दहा जणांकडे एक एक बॅग आणि त्यात एक एक प्रेशर कुकर ही सामग्री देण्यात आली. सगळ्यांना टी शर्ट जीन्स अथवा फॉर्मल ऑफिस ड्रेस घालायला आधीच सांगितले होते. प्रत्येकाला फस्ट क्लासची तिकिटे देण्यात आली. प्रत्येकाला गाडीची वेळ आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर थांबायचे, काय करायचे याच्या सूचना देण्यात आल्या. चार टॅक्सींत बसुन सगळेजण तीन वाजेच्या दरम्यान चर्चगेटकडे रवाना झाले. काम झाले की सर्वांनी वेगवेगळे मुंबई सोडून जायचे होते. कुणाशीही याबद्दल काही बोलायचे नाही आणि आपले मोबाइल टाकून द्यायचे असे ठरले. त्यानुसार संध्याकाळी पाच वाजता अहमद विरार लोकलमध्ये चढला आणि दादरला उतरून कुर्ल्यावरुन गोवन्डीस आला. तिथून इतर कुठेही न जाता त्याने मैत्री पार्कवरून पुण्याची गाडी पकडली आणि रातोरात नगरला निघून गेला.
नगरला पोचल्यावरच त्याने टीव्हीवर बातम्या पाहिल्या. तो प्रचंड घाबरलेला होता. कसाबसा झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो टीव्हीवरच्या बातम्या बघत होता. अम्मी अजून आजारातून बरी झाली नव्हती. मग तो बाहेर गेला. एस.टी.डी.वरून एक फोन केला आणि पडलेल्या चेहऱ्याने घरी परतला. मुनाफ पकडला गेला होता. आणि हे ऐकून अहमदच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो प्रचंड अस्वस्थ झाला. मग दुपारी तो अम्मीकडे गेला. "अम्मी तू बातम्या तर पहिल्याच आहेत, मी त्यातला एक बॉम्ब ठेवला होता. मुझे अब्बा की याद आ रही है" असे सांगून तो ढसाढसा रडू लागला. अम्मीने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, "असे का केलेस? मी तुला सांगितले होते ना अशा वाईट लोकांपासून दूर रहायला? तू निरपराध लोकांचा बळी कसा घेऊ शकलास? अल्लाताला तुला कधीही माफ करणार नाही." "पण अम्मी मला अब्बुचा सूड घ्यायचा होता माझ्या हजारो बंधू भगिनींचा सूड घ्यायचा होता." अम्मी हे ऐकून स्तब्ध झाली आणि ढसाढसा रडू लागली. रडता रडता ती अहमदला मारू लागली. "क्या हुआ अम्मी? क्या तुझे लगता है कि मैने कुछ गलत किया? क्या अब्बू की मौत का बदला इन काफिरोंसे लेना गलत है? आपल्या कौमवर होणारे अन्याय बघून माझे रक्त उसळल्याशिवाय कसे राहील? मी रक्ताला जागलो आहे अम्मी. इस कौम के लिये मेरा, मेरे भाईयोंका खून बहेगा तो मै काफिरोंका खून भी बहाउंगा."
अम्मीने त्याचा गालावर एक जोरात थप्पड मारून म्हंटले, "किस खून की बात कर रहा है तू? हे जे तुझे रक्त उसळून येते असे तू म्हणतोस ना? ते रक्त कोणा मुसलमानाचे नाहीच. तू मुसलमान नाहीस तर एका हिंदुचाच मुलगा आहेस."
"ऐक. मला तुझ्या आधी तीन मुली झाल्या होत्या आणि तुझ्या आजीला मुलगाच हवा होता. आता परत मुलगी झाली तर अब्दुलचा दुसरा निकाह लावून द्यायचा असे ती म्हणत असे. तुझी मावशी सरकारी दवाखान्यात नर्स होती. मला तिथेच प्रसूतीसाठी घेऊन गेले. मावशीनेच माझी प्रसूती केली आणि मला पुन्हा एक मुलगीच झाली. ती ही मृत. मावशी म्हंटली तू काळजी करू नकोस. त्याच रात्री अजून एक प्रसूती झाली होती. एका हिंदू ऊसतोडणी कामगाराच्या बायकोची. तिला मुलगा झाला होता. प्रसुतीनंतर ती बेशुद्ध होती. त्यावेळी मावशीने त्या मुलाची आणि माझ्या मृत मुलीची अदलाबदल केली. तू तोच मुलगा आहेस. ते बिचारे गरीब लोक मृत मुलगी झाली म्हणून दु:ख करीत निघून गेले. पण त्यांची हाय मला लागली. माझ्या दोन मुली आणि शौहर मरण पावले. तिसऱ्या मुलीचाही तलाक झाला, आणि तू ही असा दहशतवादी निघालास. मी आणि तुझ्या मावशीने तुझ्या जन्माचे हे गुपित शेवटपर्यंत कुणालाही, अगदी तुझ्या अब्बालादेखील सांगितले नाही. आणि तोच तू आज अशा घाणेरड्या बाता करतोस?" हे ऐकून अहमद स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूदेखील वाहेनासे झाले. चक्कर येउन तो अचानक खाली कोसळला. 
भानावर आल्यावर त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. त्याला काही सुचेना. तो उठला आणि बाजूच्या टेकडीवरील पीराच्या मझारकडे निघून गेला.  तिथे जाउन तो ओक्साबोक्षी रडू लागला. झालेल्या घटना क्रमवार त्याच्या डोळ्यांपुढून सरकत होत्या. टीव्हीवरचे छोट्या छोट्या मुलांचे आणि स्त्रियांचे आक्रोश आठवून त्याला हुंदके दाटून येत होते. असे कसे झाले? ज्या माणसांना पाहून माझ्या कपाळाची शीर तडकत असे, मी ही त्यांचेपैकीच एक आहे? आता या क्षणाला माझा धर्म तरी कोणता? हट साला धर्म बिर्म सब झूट आहे. तुमचा वंश काय आणि रक्त कोणते याचा विचार आणि त्याचा अभिमान, अथवा इतरांचा द्वेष हे सारे मिथ्या आहे.  नाहीतर रक्ताने हिंदू असलेला मी हिंदूंचाच द्वेष का करतां? माझे खरे आईबाप कुठे आणि कसे असतील? मी त्यांना शोधू काय? ते मला स्वीकारतील काय? पण मग माझ्यावर एवढे प्रेम करणाऱ्या अम्मीचे आणि अब्बुचे काय? माझ्या तलाकशुदा बहिणीचे काय? अहमदला मग त्याचे लहानपणीचे मित्र आठवले. तेव्हा हिंदू काय आणि मुसलमान काय हेच माहित नव्हते. कुणी कोणत्या धर्माचा आहे त्याने काही फरक पडत नव्हता. त्याला शाळा आठवली, शिंदेमास्तर आठवले, नगरपालिकेची लायब्ररी आठवली. आणि मग अचानक मृत्युंजयचा कर्ण आठवला. कर्ण त्याच्या बालपणीचा महानायक..!! कर्णाला जेव्हा कळले की तो पांडवांचा भाऊच आहे तेव्हा त्याची माझ्यासारखीच स्थिती झाली असेल काय? आणि तो राजा होईल हे माहित असूनही तो पांडवांकडे का गेला नसेल? अहमदला आता त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. जसा कर्ण त्याला  सांभाळणाऱ्या कुटुंबाला आणि दुर्योधनाला सोडून गेला नाही, तसा काहीही झाले तरी मी अम्मीला सोडून जाणार नाही. मी आजन्म मुस्लिमच राहणार. ही खुणगाठ मनाशी बांधून तो घरी आला. घरी पोचला तर त्याची बहिण धाय मोकलून रडत होती. मामाने त्याला कुठे गेला होतास म्हणून विचारले. "बेटा अहमद, एक घंटा पहले रिझवाना अल्लाह को प्यारी हो गई." अहमद मटकन खालीच बसला. बराच वेळ तो सुन्नपणे बसून होता. थोड्या वेळाने त्याची बहिण त्याचेजवळ आली आणि तिने त्याचा हात पकडताच अहमद हंबरडा फोडून रडून लागला.
स्वत:ला पोलिसांच्या हवाली करावे असा अहमद विचार करीत होता. त्याच विवंचनेत त्याचे दिवस चालले होते. तो मनाशी काहीतरी ठरवणारच होता पण एके दिवशी मामा त्याला म्हणाला, "हे बघ बेटा अहमद, मी आता थकलो आहे. मला धंदा सांभाळणे जमत नाही. आता तुलाच धंद्याची आणि कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागेल. तू परत मुंबईला जाऊ नकोस. तू निघून गेलास तर आम्ही सगळे उपासमारीने मरू." मग अहमदने दुसरी कुठलीही भूमिका न घेता नगरलाच राहण्याचे ठरविले.
दोन वर्षांनी २६ नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. आता अहमदचे मन त्याला आतल्या आत खात होते. त्याला वारंवार वाटे की पोलिसांकडे जाउन आपल्या गुन्ह्यांची कबुली द्यावी. पण मग त्याला त्याची बहिण, मामा, त्याची मुले यांचे चेहरे आठवत, आणि तो हा विचार सोडून देई. आता नगरमध्ये देखील जिकडे तिकडे जिहाद, दहशतवाद, पाकिस्तान, कसाब याच चर्चा कानावर पडत. अहमदला सगळ्यांच्या नजरांत त्याच्याविषयी एक संशय दिसून येई. त्याला त्याचे मन सारखे कुरतडत राही. याच विवंचनेत आतल्या आत कुंठत तो दिवस व्यतीत करीत होता. १२ फेब्रुवारी २०१०ला एकजण अहमदला घरी भेटायला आला. त्याने त्याला त्याच्या गोवंडीच्या ओळखीवरून इथे आल्याचे सांगितले.  आणि मला इथून औरंगाबादेस पोचविण्याची व्यवस्था कर असे म्हणाला. अहमदने त्याला एक भाड्याची जीप बघून दिली. तो अजून तीन जणांना घेऊन औरंगाबादला निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुण्यात बॉम्बब्लास्ट झाले. अहमदला आपण पुन्हा नकळत एखाद्या दहशतवाद्यास मदत तर केली नाही ना अशी शंका आली. दीड-एक वर्षाने तोच माणूस पुन्हा एकदा अहमदकडे आला आणि गाडीची व्यवस्था कर म्हणाला. अहमदने त्याला तू नेमका कोण आहेस असे विचारले. तो नुसता हसला. यावेळी त्याने अहमदला त्याचेबरोबर यावयास सांगितले. अहमदने नकार दिला पण तो आणि त्याचे बरोबरचे आणखी चार जण ऐकायला तयार होईनात. ते हमरीतुमरीवर आले.  ड्रायवर हे पाहून अहमदकडे आला आणि क्या बात है अहमदभाई? असे विचारले. आता अधिक तमाशा नको म्हणून अहमद म्हणाला काही नाही. पाहुणे म्हणताहेत की औरंगाबादला चल . मग आता चल मी ही बरोबर येतो. 
औरंगाबादला पोचल्यावर त्यांनी गाडी परत पाठवली. अहमद म्हणाला की मी ही आता गाडीबरोबरच परत जातो पण त्यांनी ऐकले नाही. मग एक रिक्षा करून ते एके ठिकाणी गेले. तिथे भटकळ होता. अहमदला पाहून तो म्हणाला बंबई का काम तुने बखुबी किया भाई, और पुलिस को भी अच्छा चकमा दिया. आता अजून एक काम करावे लागेल. आपल्याला अजून एक धमाका करावयाचा आहे. इस बार हमला सबसे बडा होगा. मी आता नेपाळला जात आहे. तिथे आय.एस.आयचे अधिकाऱ्यांस भेटायचे आहे आणि प्लान फ़ायनल करायचा आहे. दोन महिन्यांनी मी परत येईन तेव्हा अशीच आपल्या माणसांची व्यवस्था करायची, हे तुला पर्सनली सांगण्यासाठी मी इथे बोलावले आहे. यावेळी तू जरा खळखळ करत होतास असे मला कळले. कौम को तुम्हारी जरुरत है भाई. ठीक आहे? मी येत्या पंधरा तारखेला नेपाळ बॉर्डर पार करणार आहे. त्यानंतर महिन्याभरात तुझ्याशी पुन्हा संपर्क करीन. तयार रहा. मग अहमदकडे त्याने एक पिस्तुल दिले आणि सांभाळून ठेव असे सांगितले. इसे चला पाओगे ना? पाकिस्तान मे ली हुई ट्रेनिंग भुले तो नही? असे म्हणून हसत त्याने अहमदला निरोप दिला. अहमद दुसऱ्या दिवशी घरी आला. त्याच्या मनात आता थैमान चालू झाले. त्याला आता स्वस्थ बसवेना. दहशतवादाचा ससेमिरा त्याची पाठ सोडायला तयार नव्हता. तो घरात गेला आणि उद्या आपण पुण्याला जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी पुण्यात जाउन त्याने एका लॉजवर मुक्काम ठोकला. मुंबई एटीएसला आधी एका कॅफेतुन मेल केला आणि मग आणि मग एका नव्यानेच घेतलेल्या सीमकार्डवरून फोन लावला. यासीन भटकळची सगळी माहिती त्यांना सांगितली. तो नेपाळला कधी कुठे केव्हा असणार आहे ते सांगितले. आणि मग ते सीमकार्ड फेकून देऊन नगरचा रस्ता धरला. 
नगरला आला तेव्हा त्याचेकडे दोन पाहुणे आले होते. ते त्याला आधी औरंगाबादेत भेटले होते. त्यांनी अहमदला तातडीने दोन लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. अहमदला काही सुचेना. तो जितका या सर्वांपासून दूर पळत होता तितका अजूनच त्यात ओढला जात होता. त्याने त्या दोघांस तुम्ही बाहेर चला मी पैशाची तजवीज करून निघतो असे सांगितले. मामा आणि बहिणीस थोड्या दिवसांनी परत येतो म्हंटला आणि बाहेर पडला. त्या दोघांना घेऊन तो बसस्टॅंडकडे गेला. एक गाडी पकडली आणि ते सगळे औरंगाबादेस निघाले. थोड्या वेळाने त्याने मी स्वत: औरंगाबादला येण्याची गरज आहे का असे त्याने विचारले. "नही भाई सिर्फ हमको पैसा दिया तो भी चलेगा."  मग पांढरीच्या पुलाजवळ पोचल्यावर त्याने त्यांना तिथेच उतरण्यास सांगितले. मी इथूनच परत जाईल आणि तुम्ही दुसरी गाडी पकडून पुढे जा असे म्हणाला. मग ते कुणास दिसू नये म्हणून रस्त्यापासून थोडे दूर बाजूस झुडपांआड गेले. रस्त्यापासून पुरेसे दूर आडोश्याला गेल्यावर अहमदने सोबत आणलेली बॅग खांद्यावरून बाजूला काढली. पूर्ण दोन लाख आहेत ना? एकाने विचारले. अहमद फक्त हसला. मग त्याने बॅगेतून भटकळने दिलेले पिस्तुल काढले, आणि त्या दोघांवर दोन गोळ्या झाडून मग स्वत:च्या डोक्यातही गोळी झाडून घेतली.

आठ दिवसांनी पोलिसांना यासीन भटकळ नेपाळ बॉर्डरवर ताब्यात सापडला. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी तीन बेवारस आणि सडलेले मृतदेह व एक पिस्तुल पांढरीच्या पुलाजवळच्या झुडुपांत सापडले. त्या मृतदेहांजवळ एक बॅगदेखील सापडली.  तिच्यात मृत्युंजय ही कादंबरी ठेवलेली होती.. 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अपकर्ष - Der Untergang (The Downfall)



"डॉक्टर म्हणाला होता की सायनाईड प्राशन करून डोक्यात गोळी मारणे हा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे मरण्याचा.! ही हिमलरने दिलेली सायनाईडची कॅप्सूल आणि हे माझे भरलेले पिस्तूल.. पाचदहा सेकंदांचा खेळ फक्त.!! मग सगळेच संपेल.. सगळे संपेल? सगळे संपवावे? इतक्या सहज? एवढ्या पराक्रमाने जिंकलेला संपूर्ण युरोप!! जगावर राज्य करायला तयार असलेले माझे सैन्य...!! पण आता सगळे कसे पालटले आहे. युरोप तर ताब्यातून गेलाच पण खुद्द माझ्याच देशात हे रशियन शत्रूसैन्य इथे या माझ्या बंकरपासून केवळ एका किलोमीटरपर्यंत येउन ठेपले आहे. जिंकलेले प्रदेश एकेक करून निखळले. या प्रदेशांचे काय? आज गेले उद्या परत येतील. पण माझी माणसे? त्यांचे निखळणे हे अधिक वेदनादायक आहे. माझा सर्वात विश्वसनीय हिमलर मलाच फितूर व्हावा? आणि गोअरींग सुद्धा? छे.. हे सारे असहनीय आहे."
"सगळे म्हणतात की बर्लीन सोडून जा, कुठेही अज्ञातवासात जा, वा दुसऱ्या देशात आश्रीत म्हणून रहा. त्यांना त्यांचा फ्युरर जिवंत हवा आहे. मात्र मी माझ्या सगळ्या जनरल्सना स्पष्ट सांगितले होते की मी बर्लिन सोडून जाणार नाही. भले तर जीव देईन पण माझा देश सोडणार नाही.
आणि एक मात्र नक्की की मी एवढ्या सहजासहजी पराभव आणि मृत्यु स्वीकारणार नाही. जगाच्या इतिहासातून माझे, या फ्युररचे नाव अशा ओंगळवाण्या रीतीने कदापि पुसले जाणार नाही."
....
"समोर ही ईव्हा कशी निवांत झोपली आहे. ती चेहऱ्यावर काळजीचा, चिंतेचा लवलेशही दिसू देत नाही. तिला म्हंटले इथून तिच्या जाण्याची व्यवस्था करतो पण ती मला सोडून जायला तयार नाही. किती उत्साही आणि अवखळ स्त्री आहे ही. अगदी विजययात्रांत डौलाने फडकणाऱ्या माझ्या स्वस्तिक झेंड्यासारखी..!! मी सोडून तिला जगात काहीच नको आहे. कालच मी तिच्याशी लग्न केले आणि ती बिचारी माझ्याशी नव्हे तर दुर्दैवाशी विवाहबद्ध झाली.. ईव्हा माझी प्रिय ईव्हा..!! हिला मृत्युच्या स्वाधीन कसा करू? नाही. माझी हिम्मत नाही असे करण्याची. होय या जगात असेही काही आहे जे करण्याची हिम्मत साक्षात या फ्युरर मध्येही नाही."
"या इथे एक गुप्त दरवाजा आहे. तिथून एक भुयारी रस्ता बाहेर जातो... थेट रशियन सैन्यवेढ्याच्याही कितीतरी बाहेरपर्यंत.. ईव्हाला घेऊन त्यातून निघून जाऊ? पण मग जग मला पळपुटा म्हणून हसणार नाही काय? पण असे हसे होऊ नये याचीही तजवीज करता येईल. माझा प्रिय गोबेल्स त्यातूनही काहीतरी मार्ग नक्की काढेल. माझ्या मृत्यूची अफवा उडवून देईल अथवा मी भूमिगत राहून लढणार आहे अशी द्वाही फिरवेल.. या गोष्टीत त्याचा हातखंडा आहे.. किंवा असे केले तर…. छे.. विचार, विचार, विचार... नुसतेच विचार.. विचार हा ही एक त्रासदायक विकार आहे, नाही काय? मी थकलो आहे. गेले कित्येक दिवस फक्त पराभव, फितुरी आणि विद्रोहांच्या बातम्या ऐकून ऐकून मला प्रचंड शीण आला आहे. थोडे पहुडावे म्हणतो, पण झोप ती कशी कित्येक दिवसांत आलीच नाहीये.. तरीही आता या क्षणी या सर्वांच्या परोक्ष काहीतरी आनंददायी करावे म्हणतोय. माझे आवडते राष्ट्रगीत "हॉस्ट व्हेसल लीड" गुणगुणले की नेहमीच किती प्रसन्न वाटते..!!
"आम्ही आगेकूच करीतच राहू
सर्वकाही का विच्छिन्न होईना मग,
आज जर्मनी आमची आहे अन
उद्या आमचेच असेल सारे जग"
तेच हॉस्ट व्हेसल लीड गुणगुणत बसून थोडावेळ डोळे मिटून पडूयात तर खरे.. "
...
"अरे तू कोण आहेस? आणि तू आत कसा आलास? तू रशियन तर नाहीस ना? तुला मी कधी पाहिल्याचे स्मरत नाही. तुझा पेहराव देखील किती निराळा आहे. काही दगाफटका करायला आला असशील तर याद राख. चल निघ बाहेर इथून. नाहीतर थांब मी माझ्या सुरक्षारक्षकांस बोलावतो."
"थांब थांब.. फ्युरर थांब.!! कुणालाही बोलावण्याची गरज नाही. कारण त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. मी माझ्या मर्जीने आलो आहे आणि मर्जीनेच जाणार. तुझे सुरक्षारक्षक मला पाहूदेखील शकणार नाहीत. मी तुला दगाफटका करायला नव्हे तर तुझी मदत करायलाच आलो आहे."
"माझी मदत करायला तू आहेस कोण? एखादा देवदूत तर नाहीस ना? आणि मला मदत करायला आला आहेस म्हणजे नेमके काय करणार आहेस तू? युद्धाचे पारडे फिरवणार आहेस? पुन्हा माझ्या देशाला उभारी देणार आहेस? की मला येथून सपत्निक सुरक्षित बाहेर नेणार आहेस?"
"नाही, मी असे काहीही करणार नाहीये. फक्त थोड्या गप्पा मारणार आहे तुझ्याशी."
"निव्वळ गप्पा मारल्याने माझी काय मदत होणार आहे? मला वाटते की एकतर तू वेडा असशील अथवा मला वेडा ठरविण्यासाठी सोंग घेऊन आला असशील. थांब मी ईव्हास उठवितो आणि तुला बाहेर घालवून देतो."
"नको नको वीर पुरुषा, तिला निद्रीस्तच राहू देत. मी सांगतो तुला मी कोण आहे ते... मी देखील तुझ्यासारखाच एक महायुद्ध घडवून आणलेला आणि त्यात पराभूत झालेला दुर्दैवी योद्धा आहे. माझ्यासाठी देखील युद्धात लक्षावधी वीरांनी प्राणाहुती दिली आहे. मी देखील एक मोठे साम्राज्य गमावून बसलेलो आहे. खरेतर मी आधीच तुला भेटावयास यायला हवे होते जेणेकरून हे युद्ध टाळता आले असते. पण या युद्धात एवढी हानी होईल याची मला कल्पना नव्हती, आणि जरी असती तरी तू माझे ऐकून युद्ध थांबविले नसतेस. युद्धज्वर ही मृत्युशिवाय कशानेही बरी न होणारी व्याधी आहे. युद्ध पुकारणारावर तो चढला की कुणीही त्यास उतरवू शकत नाही. मी कितीही समजावले असते तरी तू थांबला नसतास. मी तरी कुठे बधलो होतो कित्येक थोरा-मोठ्यांच्या सांगण्याला? तुझ्यासारखाच मलाही ठाम विश्वास होता, माझ्या सैन्य ताकदीवर आणि माझ्या शूर योद्ध्यांवर..! आणि तो अगदीच काही अनाठायी देखील नव्हता. त्यामुळे त्याच ताकदीच्या गर्वामुळे मला सामोपचाराचे सल्ले देणारांस, मग तो साक्षात देव का असेना, मी धुडकावून लावले होते."


"ते सगळे सोड. मला मरायचे नाहीये आणि पळपुटा देखील म्हणवून घ्यायचे नाहीये. तेव्हा आता मी कुठे दडी मारून बसू ते सांग, जेणेकरून शत्रू राष्ट्रे मला कधीच शोधू शकणार नाहीत?"
"अहो महाशय या जगात पराभूताचे मरण अटळ आहे, आणि जर तो पराभूत पुरुष मोठ्या नरसंहारास कारणीभूत असेल तर तो कधीच दडून राहू शकत नाही."
"असे कसे म्हणतोस तू? अरे एवढी मोठी ही पृथ्वी आहे, एवढी अब्जावधी माणसे आहेत, त्यात एक माणूस बेमालूम मिसळून जाऊ शकत नाही?"
"नाही.. जेत्यांच्या हातून जीताच्या प्राक्तनातला मृत्यू तो लपून बसल्याने टळत नाही. फार फार तर काही काळ तो लांबू शकतो, पण अपमानास्पद मरण त्याला टळू शकत नाही. इतिहासातही ते मृत्यू टळले नाहीत आणि भविष्यातही टळणार नाहीत. माझा स्वत:चा अनुभव आहे हा.! मी ही युद्ध समाप्तीच्या समयी नदीच्या एका निर्जन, खोल डोहात लपून बसलो होतो. मात्र त्यांनी मला शोधून काढलेच. तद्वत तुझेही मरण अटळ आहे."


"असे असेल तर मी निकराने लढेल आणि लढता लढता धारातीर्थी पडेल. हुतात्मा ठरेल. काही झाले तरी माझ्या राष्ट्रास मी न भूतो न भविष्यति अशा उत्कर्षास नेले होते.! माझ्या मृत्यूनंतरही माझ्या राष्ट्राच्या पुढील सगळ्या पिढ्या माझे गोडवे गातील, अभिमानाने माझे नाव घेतील. माझा मृत्यू राष्ट्रभक्तीचे एक आदर्श प्रतिमान ठरेल."


"खरे सांगू का? भविष्याच्या पिढ्यांपर्यंत आपला तोच इतिहास पोचतो, जो जेते त्यांना सांगतात. युद्ध हरणारे नेहमीच खलनायक ठरतात. जेते चांगले असोत वा वाईट, त्यांचे फक्त चांगले स्वरूप पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचते आणि जीतांचे केवळ वाईट स्वरुप.!! मी काय, तू काय किंवा भविष्यात जन्मणारा अजून कुणी पराभूत पुरुष काय, आपला इतिहास एवढा विकृत केला जातो की कुणी आपल्या एखाद्या सद्गुणास वाखाणने हे देखील दुर्वर्तन समजले जाते. हा भोग मी भोगतो आहे आणि तुही भोगशील."

"आणि मला आपली चुक सुधारायची असेल तर? पश्चाताप करण्याची संधी प्रत्येकास मिळायलाच हवी. तेच न्याय्य आहे, नाही का?"

"आपल्या आत्यांतिक दुर्गर्व आणि तिरस्कारातून छेडल्या गेलेल्या युद्धाची चुक सुधारण्याची एकच वेळ असते.. ती चुक घडण्याआधीची.. एकदा ती घडली की तिला माफी नाही.. या पृथ्वीतलावर मृत्युही त्यातून आपली सुटका करीत नाही... आपले दोष, उणीवा येणाऱ्या हजारो पिढ्यांपर्यंत आपल्याला कुरतडत असतात.. हेच बघ ना, मृत्यूनंतर मलाही माझ्या शत्रूंप्रमाणे परलोकांत नरक न लाभता स्वर्गच लाभला.. पण इहलोकी मात्र हजारो वर्षांनंतरही मी एक खलनायकच आहे, आणि निर्भत्सनेच्या नरकातच खितपत पडलो आहे."

"पण माझे शत्रू दावा करतात की त्यांचे युद्ध मानवतेच्या हितासाठी आहे, मग ते मला माफ करणे सोड, पण किमानपक्षी सन्मानजनक मृत्यू देणार नाहीत कशावरून? शेवटी त्यांची बाजू मानवतावादी मुल्यांची आणि न्यायाची आहे..."

"हा हा हा.. !!! तुझ्या सहकारी मुसोलिनीचा मृत्यु विसरलास? त्याला नाही का अपमानास्पद रीतीने मारून त्याच्या मृतदेहाचे देखील धिंडवडे काढण्यात आले. त्याच्या मृतदेहाला त्यांनी लाथा मारल्या, त्यावर थुंकले, आणि तेवढ्याने समाधान झाले नाही म्हणून मृतदेह भर चौकात उलटे टांगून लोकांनी त्याला दगड फेकून मारले. मी हा जो तुझ्याशी बोलतो आहे, त्या मला कसे मरण लाभले माहीत आहे? स्वत:ला धर्माचे पालक समजणारे माझे शत्रू जे खरेतर माझेच बांधव होते, घायाळ मरणासन्न अवस्थेत रानात मला एकटेच सोडून गेले... आकाशात गिधाडे आणि आजूबाजूस हिंस्र श्वापदे आपल्या मरण्याची वाट पाहत घिरटया घालत आहेत आणि आपली प्राणज्योत मालवताच किंबहुना अगदी जिवंत असतानाच आपल्या शरीराचे लचके तोडले जाणार आहेत हे माहीत असलेल्या मन:स्थितीत मी मृत्युस सामोरा गेलोय.. इथे माझ्या जवळ ये आणि ही माझी विच्छिन्न झालेली मांडी बघ... बघ आर्यपुत्रा.. मी महाभारतीय महायुद्धाचा पराभूत योद्धा दुर्योधन आहे..!!!"
....

दुसऱ्या दिवशी जगभरातल्या वर्तमानपत्रांत मथळा झळकला......
"नाझी भस्मासुर हिटलरची डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या"