हा ब्लॉग शोधा

रविवार, २३ मार्च, २०१४

उन्हाळा ३ - जत्रा


"पाटील, फागुन संपत आला. तव्हा आता चैतरात गावोगाव जत्रा चालू व्हनार बगा. आपल्या बी जत्रंच्या तयारीला लागाया पायजे. उंद्याला सरपंचानं मिटिंग बोलावली हाय." गुणा पाटलाच्या घरी बसता बसता नारबा म्हणाला. 
"आता काय जत्रांत मजा रायली नाय बग नारबा, मायला काय योक काळ व्हता. आरं आपल्या गावच्या जत्रंला काय लोकं यायची. काय आपल्या गावाचा तमाशा असायचा. आन काय कुस्त्यांचा जंगी फड रंगायचा. संब्याचं नाव ऐकलंय काय रं त्वा?"
"कंचा त्यो नाच्या?"
"व्हय व्हय त्योच. आरं काय नाचायचा आन काय गाणं म्हणायचा म्हणून सांगू तुला.!! पार पुना अन नगरातून लोकं यायची खास संब्याचा नाच अन वग पहाया. एकदा गावकऱ्यांनी नारायणगावाहून खरीखुरी बाई आणली तमाशात नाचवायला. पण संब्यालाच पहायाला आलेल्या लोकांना ती खरीखुरी बया आज्याबात आवडली नाय. लोकांनी मोठा गोंधळ घातला. दगडं फेकली अन रातीचा फड बंद पाडला. मग दुसऱ्या दिशी हाजऱ्यांमंदी परत संब्याला बाईच्या जागी उभा क्येला तवा कुठं लोकांनी वग होऊ दिला. त्याचा त्यो वग "सखु सासराशी जाते" काय गाजला व्हता म्हणून सांगू? किती लांबलांबवरनं लोकं यायची संब्याच्या तमाशाची सुपारी घियाला. मोठमोठ्या बोली लागायच्या संब्याच्या सुपारीसाठी. गावोगाव तमाशा येवढा नावाला आला की थेट पुण्याच्या एका गोऱ्या सायबापतुर किरत पोचली संब्याची. माकिंत्या सायेब नाव त्येचं. पुण्याहून येकदा त्यो एका मोठ्या बामण कारभाऱ्याला घेऊन आला खास संब्याचा वग पहाया. या इथं पारावं खुर्ची सोडून निस्त्या सतरंजीवं मांड घालून बसला सायेब, अन जोडीला पुण्याचा त्यो बामण कारभारी बी. तुला सांगतो नारबा, सखूचं सोंग घेतलेल्या संब्याचं काम बगून ढसाढसा रडला कारभारी.!! माकिंत्या सायबाला कितीक भाषा समजली कोणास ठाऊक पण त्येनं बी डोळ्याला रुमाल लावला बग. वगाचा पडदा पडला अन पुण्याचा कारभारी सोता उठून संब्याकडं ग्येला, त्येचा हात हातात घेतला आनं त्येची पाठ थोपीटली. त्ये पाहून ह्या आपल्या पिल्याभटाचा बाप नाग्याभट लगोलग म्होरं ग्येला अन कारभाऱ्याला म्हणाला, "पंत त्यो म्हार हाय त्येला शिवू नगा" त्ये आयकून कारभाऱ्यानं संब्याचा हात सोडला, अन नाग्याभटाला इचारलं काय म्हणता? ह्यो महार हाय? व्हय व्हय सरकार याला शिवलात आणि इटाळ करून घेतला तुमी. हे ऐकताच त्या कारभाऱ्यानं काय करावं? तडक देवळाम्होरं आला, पाटलाच्या मंजी माह्या आज्याच्या अन नाग्याभटाच्या संगं संब्याला पुढं बोलीवला आनं समद्या माणसांपुढं त्याला कडकडून मिठी मारली. मंग त्यो नाग्याभटाला म्हणाला, नागोजी अवं नाटक म्हंजी पाचवा वेद हाय. आनं या संबाजीच्या अंगात कलेच्या रुपात साक्षात देवच येतो. कुठं शिवाशिव घेऊन बसलाइसा? समदी लोकं तवा कशी पार गलबलून गेली व्हती. तुला सांगतो नारबा भैरुनाथ देवळातून समदं बगत असतो. संब्याची कला भैरुनाथाला दिसत व्हतीच म्हणून तर मग माकिंत्या सायबानं कारभाऱ्याच्या शिफारसीवरून संब्याला तिथल्या तिथं नदीच्या कडंची ३० येकर जमीन नावावं करून दिली. मी तवा लय ल्हान होतो पण मला चांगलं आठवतंय,  म्या भैरुनाथाच्या मूर्तीकडं पायलं तर मूर्ती हसत असल्यासारखी मला दिसली."

"पाटील अन त्यो उस्मान पहिलवान आठतुय का? त्येची काय गोष्ट हाय? त्येच्याबद्दल आमी लय आईकलंय पण समदं वरवरचं. आसं खोलात शिरून तुमीच काही माहिती दिलीत तर बरं हुयील." 
"व्हय व्हय चांगलाच आठवतोय मला उस्मान पैलवान. काय उंचपुरा अन दणगट गडी व्हता. काय पछाड मारायचा म्हणून सांगू..!!  म्या सोता पाहिलंय त्याला कुस्ती खेळताना. उस्मान समशेरपुराचा. सलग पाच वरसं उस्मान कुठंबी कुणाकडनंबी कुस्ती हारला नाय. ज्या ज्या जत्रेत उस्मान गेला, तिथली कुस्ती त्येनं मारलीच. या आपल्या शेजारच्या वाघदरी गावाचा कुस्त्यांचा फड सगळ्यात तवा सगळ्यात जास्त मोठा व्हायचा. त्या काळात बी दुसरीकडं शे-पाचशेच्या कुस्त्या व्हत असताना ५०००ची कुस्ती असायची वाघदरीत. उस्माननं  मोठमोठ्या पैलवानांस हरवून सलग ४ येळा त्ये ५००० जीतले. पाचव्या वर्षी वाघदरीचा संतू पाटील बाजूच्या ४ गावच्या पाटलांना घेऊन आमच्या आबाकडं आला अन म्हणाला, "चार वरीस झालं, येक मुसलमान आपल्या जत्रांच्या कुस्त्या मारतुया. आपल्याला लाज वाटाया पायजे."
"त्यात काय लाज वाटायची? आरं मुसलमान आसला तरी बक्षीस घेताना पागोटं बांधतो, कपाळाला गुलाल बुक्का लावून घेतोच की तो. उलटं आपल्यास्नी अभिमान वाटाया हवा की आपल्या तालुक्याचा माणूस आजूबाजूच्या दोन तीन जील्यांतल्या कुस्त्या मारतोय."
"न्हाय गुणा पाटील काय बी झालं तरी यंदा जीतणारा माणूस हिंदूच असला पायजे बगा."
"पण संतु पाटील तुमी सांगा उस्मान्याला हरवील असा एकतरी गडी हाये का समद्या जील्ल्यात?"
"मायला पाटील तुम्या आसं म्हणावं? आवं आता म्हतारपन आलं म्हणून गुमान हाय, नायतर सोता मैदानात उतरून लोळावला आस्ता बगा त्या उस्मान्याला. पण आता आम्ही समदे पाच गावाचे पाटील एक ठराव करून आलोय. यंदा थेट कोल्हापुराच्या तालमीतून मोठा मल्ल भाड्याने आणायचा उस्मानबरुबर भिडाया. शिकलेल्या अन कसलेल्या मल्लापुढं कसा टिकतोय हा गावठी वळू त्ये यंदा बगूच.!! काय बी झालं तरी भैरुनाथाची कावडी यंदा मुसलमानाच्या खांद्यावं जाणार न्हाय...."  
"त्या वर्षी जत्रंच्या कुस्तीच्या फडात मग मागच्या वर्षी जीतलेल्या उस्मानला जवा आखाड्यातून आव्हान देत फिरवला तवा गर्दीतून कोल्हापूरवरून संतू पाटलानं आणलेला मानसिंग काकडा उभा ऱ्हायला, अन त्येनं उस्मानचा हात धरून आव्हान स्वीकारलं. मानसिंग काकडे म्हणजे हा असा मोठा सात फुटी उभा अन मोठ्या आंब्याच्या खोडासारखा आडवा आडदांड गडी बरं का नारबा. कापडं काढून त्यो आखाड्यात उतरला अन माती अंगाला लावून त्येनं जवा शड्डू ठोकला तवा समद्या बगणारांच्या काळजाचा ठोका चुकला. आता उस्मानचं काय खरं  नाय आसं समदे कुजबुजू लागले."
"कुस्ती चालू झाली. संतू पाटील लय वरडत व्हता. दोघं पैलवान भिडलं. मानसिंग गडी लय दमदार. उस्मान्यानं लय चपळाई केली पण मानसिंगानं त्याला खाली पाडलाच. उस्मान आता पोटावं पडला व्हता पण दोन्ही हात मातीत घट रेलून मानसिंगाला पलटी मारून पाठ जमिनीला टेकवू देत नव्हता. बाहेर संतू पाटील आखाड्याला येढा घालीतच व्हता. त्यो जोरात वरडून म्हणाला, भैरुनाथाच्या कावडीला यंदा मुसलमानाचा हात नाय लागणार. शाब्बास रे मानसिंग मर्दा. आता लोळव त्याला.!! तेवढाच एक कौतुकाचा शब्द आनं मानसिंगाने संतू पाटलाकडे ते कौतुक स्वीकारायसाठी पाहिलं. बास तेवढा येकच क्षण अन मानसिंगाचा फासा हलकासा ढिला झाला. उस्मान्यानं ती ढिलाई लगेच हेरली. तो क्षणात गुडघ्यावर आला अन डावा हात तसाच जमिनीवर ठीऊन उजव्या हातानं पलटी मारून मानसिंगला बाजूला पाडला आन मग चपळाईनं कोलांटी मारून मानसिंगाच्या मागं गेला आणि त्याचा हुकमी पछाड टाकला. मानसिंग भांबावला व्हता, काय व्हतय हे कळायच्या आत उस्मान्यांनं मानसिंगाला उलटा केला अन कुस्ती जिंकली. जितल्यावर उस्मान्यांनं आखाड्यातली माती उधळीत लय थयथयाट केला. आपल्यापेक्षा दीड अंग मोठा असलेल्या मानसिंग काकड्याला मात देणारा उस्मानचा त्यो डाव पाहून लोक कितीतरी येळ बेभान व्हऊन नुसते टाळ्या वाजवीत राहीले. सांजच्याला भैरुनाथाची कावडी उचलायची येळ आली तवा उस्मानने आमच्या आबास पुढं बोलीवलं. संतू पाटील कावडी उचलून उस्मानच्या खांद्यावं देण्यासाठी पडलेल्या तोंडानं उभा व्हता. उस्मान पुढं झाला त्यानं कावडीला लवून नमस्कार केला, भंडारा वाहिला आणि मग संतु पाटलाला म्हणाला, पाटील मी तर भेद मानीत न्हाय पण तुमी मानीत व्हता तर मला सांगायचं व्हतं. अवं भैरुनाथासाठी कुस्ती खेळलो सुदिक नसतो मी. आसं म्हणून उस्मान बाजूला उभ्या आमच्या आबास म्हणाला, "गुणा पाटील भैरुनाथाच्या किरपेनं मला चार साल कावडी उचलायचा मान मिळाला, पण आता मी कावडी घेण्याचा मान तुम्हाला देतो. आनं यापुढं कंच्या बी जत्रेत कुस्ती खेळणार न्हाई आसं मी भैरुनाथाच्या साक्षीनं जाहीर करतो." त्यानंतर उस्मान परत कधी कुस्ती खेळला न्हाई. लोकांनी कावडी उस्मानच्याच खांद्यावं न्यावी म्हणून लई घोषणा दिल्या, पण उस्माननं नकार दिला. त्या दिशी लोकांनी कावडीच्या मिरवणुकीत भैरुनाथाइतकाच उस्मानचा म्हंजी एका मुसलमानाचा बी जयजयकार क्येला ह्ये मी माज्या डोळ्यांनी पायलंय नारबा.!!! सच्चा माणूस व्हता उस्मान... म्हणून त्येला लोकांतून येवडा मान मिळाला. भैरुनाथ समदं बघत असतो बग. त्या दिशी दुसऱ्यांदा भैरुनाथाची मूर्ती म्या हसताना पाह्यली.  आपल्या भैरुनाथाची मूर्ती हसणाऱ्या रूपातली नाय, पण संब्या अन उस्मानसाठी म्या भैरुनाथाला हसताना पाह्यलंय.!!"
"पाटील, यंदा जत्रंला उस्मानचा ल्योक आनं संब्याचा नातू यास्नी बोलावून त्येंचा सत्कार केला तर?"
"वा वा नारबा अगदी मनातलं बोललास बग. उद्या गावकीची मिटिंग बोलीवली हाय तिच्यात ठरवू. "
"व्हय व्हय पाटील त्ये वर्गणी अन बाकी कार्यक्रमाचं नियोजन ठरवायचं हाय. उद्याच आटपून घेतलं म्हंजी तयारीला वखत पूरंल. कसं?"
दुसऱ्या दिवशी मिटिंगीला गावकरी जमले. हजार रुपये घरटी वर्गणी गोळा करायचे ठरले. काठीच्या पूजेला आमदाराला बोलवायचे असे एकजण म्हणाला. "आरं आमदार न्हाई येऊ शकणार". सरपंच म्हणाला. "त्ये निवडणुका जाहीर झाल्यात न्हवं का? तवा आमदाराला आसं काय करता येत न्हाय."
"काय म्हणता सरपंच? आवं आधी बी एवढ्या निवडणुका झाल्या तवा तर आमदार येतच व्हता की."
"आरं येड्या तुला काय म्हाईत हाय का? आता तिकडं दिल्लीत कोण सेसन सायेब आलाय त्येनं नियम बदलल्यात. लई कडक हाये म्हणं त्यो. आपला आमदारच काय, तर मंत्र्यांस्नी बी हादरवून ठिवलय त्या सायबानं. मात्र काळजी करू नगा. यंदा आमदार जत्रसाठी दुप्पट देणगी देणार हाय. आनं निवडणुका संपल्यावर देवळाचा मंडप शिमेंट मदी बांधून देणार हाये सायेब. त्येच्या बदल्यात आपल्या गावातलं एक बी मत दुसरीकडं जाणार न्हाई असा शब्द दिलाय म्या आमदाराला."
"अन तमाशाचं काय करायचं?"
"आरं ती मेनका खटावकर हाये ना, तिच्याच फडाला सुपारी देऊ यंदा. संगीत बारी लय झ्याक हाये त्या फडाची. वग कमजोर आसतुया पण आजकाल तसाबी वग कोण बघतो? चार पोरी हायेत लय फटाकड्या. पप्लिक त्येंचा नाच बगून जाम खुस व्हनार बगा." 
"अन सरपंच आम्ही तरुण मंडळी राब राब राबणार तवा आमची बी सोय हुयाला पायजेल काय?"
"आरं हो हो राज्यांनो. तुमच्यासाठी खास इंग्रजी मागवू. पोरं ती इंग्रजी घेतील अन म्हतारी ध्येंडं आपली मारतील हातभट्टीची."
"पण गावच्या वर्गणीतून दारू नको बरं का सरपंच, देवाचं कार्य हाये, तसं केल्यावं वंगाळ दिसंल." एक वयस्कर थेर बोललं. 
"आरं गावाच्या देवाच्या पैक्याला कोण हात लावतुय रं? मला काय समजत नाय की काय? यंदा आपण जुगार मटकेवाल्यांस बी जागा देऊ. त्येंच्याकुन येणाऱ्या भाड्यात दारू आणू. कसं?"
गुणा पाटील इतका वेळ गुपचूप ऐकत होता पण आता त्याला कळ निघेना. 
"अहो सरपंच ह्ये काय चाललंय? काज देवाचं हाय आनं तुमी खुशाल दारू अन जुगार आणताय? ह्ये बरुबर न्हाय"
"ओ पाटील गप बसा, तुमची पाटीलकी गेली, नदीत बुडाली कवाच. आता जन्ता जे म्हणंल त्येच व्हणार. उगाच परंपरा हाय म्हणून तुमाला बोलीवलं जातंय. तुमी गप ऱ्हावा हेच बरं."  एक तरुण बोलला.
"आरं ये संप्या, बस्तू का गुमान सुक्काळीच्या? पाटलाला आसं बोलतोस? वढू का दोन कानाखाली?" सरपंच भडकलेल्या संप्यास म्हणाला. आणि मग पाटलाकडे वळून, "पाटील तुम्ही मनावं घेऊ नगा. पोरगं बैताल हाय."
असे म्हणून थोड्या वेळातच मांडलेले सगळे ठराव पास करून सरपंचाने मिटिंग संपवली. सगळे निघून गेले. फक्त गुणा पाटील, नारबा आणि सरपंच उरले. मग सरपंच पाटलाकडे आला आणि म्हणाला, "पाटील अवं त्या संप्याचं काय मनावर घेऊ नगा. आणि हे दारू अन जुगाराचं मला बी पटलेलं न्हाई बगा. पण तुमी समजून घ्या. महीन्याभरानं विलेक्शन हाये. तवा लोक खुश ऱ्हाया पायजे, म्हणून सोता आमदार सायबानं तसा आदेश दिलाय मला. ह्ये राजकारण हाय पाटील. आता आमदाराला तसं मागच्या सारखं खुले आम दारू अन पैका देता येत न्हाय. म्हणून हा मार्ग शोधलाय."
"अवो सरपंच, पण म्हणून जत्राचा असा नास करायचा व्हय? अवो भैरुनाथाला काय वाटंल?"
"पाटील अवो आमदाराला खुश ठिवलं ना की त्यो भैरुनाथाचा मंडप शिमेंटमदी बांधून देणार हाय. भैरुनाथासाठीच करतुया हे समदं. भैरुनाथ बी खुश व्हईल, तुमी काळजी करू नगा."
असे सांगून सरपंचही निघून गेला, "भैरुनाथ समदं बघतुया, भैरुनाथ समदं बघतुया... " असं काहीसं अस्पष्ट पुटपुटत पाटील पारावरून उतरून चालू लागला. नारबाने खिन्नपणे देवळाच्या आत भैरवनाथाच्या मूर्तीकडे पाहिले, त्याला गुणा पाटलानंतर आता तिसऱ्यांदा भैरुनाथाची मूर्ती हसत असलेली दिसली.

मंगळवार, १८ मार्च, २०१४

उन्हाळा-२

शाळेची परीक्षा संपली. आता दिन्या उंडारायला मोकळा झाला. दिवसभर नुसते खेळायचे, पोहायला जायचे, करवंदे, आंबे, जांभळे खायची, रानात खूप भटकायचे हा दिन्याचा उन्हाळ्याच्या सुट्टीतला नेहमीचा कार्यक्रम. याहीवेळी हे सगळे करण्यासाठी दिन्या सज्ज झाला.
दिन्या तसा पोरांपेक्षा पोरींतच अधिक रमायचा, त्यामुळे विटीदांडू, लिंगोरच्या, गोट्या, कांदाफोड अशा पोरांच्या खेळांपेक्षा त्याला चल्लसपाणी, आट्यापाट्या, झिम्मा, लपाछपी, बाहुला-बाहुली, भांडी-कुंडी, सागरगोटे असे पोरींचे खेळच अधिक भावायाचे. दिन्याच्या अशा आवडीचे कारण म्हणजे मिनी. दिन्याच्याच वर्गातली त्याच्या शेजारी राहणारी त्याची लहानपणापासूनची एकमेव मैत्रीण. मिनीला दिन्यावाचून आणि दिन्याला मिनीवाचून अजिबात करमत नसे. दिन्याला मिनीस सोडून काहीही खेळायला आवडायचे नाही, मिनी नसेल तर रानात आंबे करवंदे आणायला, नदीवर पोहायला जायला देखील त्याला कंटाळा येई. सगळेजण दिन्या आणि मिनीस नवरा बायको असे चिडवीत. दिन्याला असे चिडविणाऱ्याचा खूप राग यायचा, तो त्यास मारायचा अथवा चावायाचा, पण मिनी म्हणायची, हो हो आम्ही लग्न करूच, तुम्हाला काय घेणे देणे?

सकाळीच दिन्या मिनीच्या घरी गेला आणि म्हणाला, मिने गाबरातला शेंदऱ्या आंबा लय पिकतोय. चल, लवकर गेलो तर पाटीभर तरी साका मिळतील. मग मिनी आणि दिन्या गाबरात पोचले. त्यांनी रात्रभर खाली पडलेले आंबे गोळा केले आणि मग दिन्या म्हणाला, "मीने तू वर जाऊन फांद्या हेलकाव, मी खाली पडणारे आंबे गोळा करतो." मिनीने बांगड्या मागे सारल्या, परकराला काचा मारला आणि झाडावर चढली.  आंबे हेलकावण्यासाठी मिनी एका फांदीवर जाऊ लागली, तेवढ्यात खालून दिन्या म्हणाला, "मीने अगं तिकडं नको, त्या बाजूच्या फांदीवर जा." मिनीने खाली पाहिले, दिन्या तिला बाजूची फांदी हाताने दाखवत होता. मिनी तशीच खाली आली आणि दिन्याला म्हणाली, "मी नाही जाणार, तू वर जा आणि फांद्या हलव. मी खाली आंबे गोळा करते".
"अगं पण खाली अडचणीत आंबे पडतात ते काढायला जमत नाही म्हणून नेहमी तूच झाडावर जाते आणि मला आंबे गोळा करायला लावतेस ना?"
"नाही नाही इथून पुढे मी कधीही झाडावर जाणार नाही तूच जा मी खालीच आंबे गोळा करीन."
"का बरे?" मिनी हसली, आणि म्हणाली, "काही नाही. मी म्हणते ना मग माझ्यासाठी जा की"
"बराय" म्हणून दिन्या वर गेला आणि पाटीभर आंबे पाडले. यंदा शेंदऱ्या आंबा दरसालापेक्षा थोडा लवकर बाझायला लागला नाही का गं मिने?
खायला मिळतोय ना? मग तो लवकर बाझो की उशीरा, आपल्याला काय घेणे देणे?

मीने तुला सांगितले ना आता अशी पोरासोरांत उंडारत जाऊ नकोस. आता काय तू लहान राहिली नाहीस. दिन्या पोहायला जाण्यासाठी बोलवायला आला तेव्हा मिनीची आई तिला सांगत होती. मिनी म्हणाली, "दिन्या तू जा रे मी नाही येत आज."  "अगं पण का?"  "आई रागावालेय ना म्हणून."  "चल की त्याला काय होतंय? ओ मामी येऊ द्या ना मिनीला."
"ठीक आहे जा, पण मिनीवर लक्ष ठेव बरे का रे दिनू."
"काय मामी मिनी काय आता लहान आहे काय तिच्यावर लक्ष ठेवायला? अहो उलटे मीच पाण्यात बुडालो बिडालो तर मिनी मला खेचून बाहेर काढील. सगळ्या गावात सर्वात पट्टीची पोहणारी आहे मिनी." दिन्या म्हणाला. 
"मीने तिकडे कोणी असेल तर सरळ भानूच्या डोहात जा बरे का" असे सांगून मिनीच्या आईने मिनीला पाठवले.
दोघे नदीवर आली दिन्याने जाताच शर्ट काढून डोहात उडी घेतली, आणि मिनीला म्हणाला ये चल लवकर, आज शर्यत लावायची आहे. मिनी हळूच पाण्यात उतरली. अगं काय लय थंडी वाजतेय काय? कपड्यांसहित पाण्यात आलीस ते? मिनी नुसती हसली. तेवढ्यात गावातला भीमा नदीवर आला. भीमा हा दिन्या आणि मिनीपेक्षा चार पाच वर्षे मोठा असेल. त्याला पाहताच मिनी बाहेर निघाली आणि दिन्याला म्हणाली दिन्या मी भानूच्या डोहात जाते रे. भीमा तिला म्हणाला, "काय झालं गं मीने? भानूच्या डोहात काय मजा? तिथं नुसत्या बायाच. इकडं ये की माझ्याबरोबर शर्यत लाव, लय मजा येईल."
"हो हो मीने चल आपण या भीमादादाला शर्यतीत हरवू" दिन्या म्हणाला. पण मिनी तरीही निघालीच.
"अगं ए मिने थांब की, मी येऊ काय तुला सोबत तिथपर्यंत? वाटेत काही साप-बीप असतात उन्हाचे" भीमा ओरडून म्हणाला.
मिनी भीमाला रागावून म्हणाली, "अरे जा रे नालायका, मला माहित आहे तू कसा आहेस ते. मला साप चावो नाही तर विंचू, माकडा तुला त्याचे काय घेणे देणे?

मिनी काहीशी विचित्र वागू लागली होती. आता ती दिन्याबरोबर तशी नेहमी नेहमी येईना. दिनूने तिचा हात धरला की ती संकोचू लागली. दिन्याबरोबर पोहायला येईनाशी झाली. नेहमी जिथे फक्त बाया जात त्या भानूच्या डोहातच जाऊ लागली. असे का होते आहे ते दिन्यास कळेना. एकदा दिन्याने मिनीच्या आईस देखील विचारले, त्यावर ती हसून म्हणाली "दिनू अरे आता असेच वागायचे. तुम्ही मोठे झालात ना?" केवळ आठवीतून नववीत जाणार असताना आपण अचानक काय एवढे मोठे झालो ते दिन्यास काही केल्या कळेना. मिनी आता चल्लस, आट्यापाट्या खेळताना दिन्याची जोडीदारही बनेना. मुंबईवरून सुट्टीला बंटी आला होता, मिनी सहसा आता त्यालाच जोडीदार बनवी. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मिनीने बंटीस खेळात घ्यायला सुद्धा नकार दिला होता पण यंदा तिने त्याला दिनूची जागा देऊन टाकली होती. पण बंटी तर मिनी आणि माझ्यापेक्षा किती मोठा आहे, तरीही मिनी त्याच्याशी किती चांगले वागते, मग माझ्याशी का नाही हे सारखे दिन्याच्या मनात येई.  लपाछपीचा डाव चालू होता. दिन्यावर पहिले राज्य आले. दिन्याने सगळ्यांना हुडकून 'इष्टाप' केले पण बंटी आणि मिनी काही सापडेनात. दिन्याने सगळीकडे शोधले, पण दोघे सापडेनात. कंटाळून बाकीची पोरे निघून गेली. दिनू तसाच सूर्य डोक्यावर येईपर्यंत त्यांस शोधत राहीला. थोड्या वेळाने मग दोघे देवराईच्या बाजूने येताना दिसली. मिनीचे केस पार विस्कटून गेले होते. तिचा तसा अवतार पाहून दिन्या घाबरला. तो पळत गेला आणि मिनीचा हात धरला, मीने तुला काही झाले नाही ना गं? मला तर खूप काळजी वाटत होती. इतक्या लांब देवराईत कशाला गेले तुम्ही लपायला? लपाछपी संपली सुद्धा.
"अरे हो की, लपाछपी खेळत होतो नाही का आपण?" असे म्हणून मिनीने बंटीकडे पाहिले. दोघे खूप जोरात हसली. दिनूचे काळीज अजूनही मिनीस काही लागले बिगले तर नसेल ना म्हणून धडधडत होते. त्याने न राहवून तिला मिठी मारली. आणि तिच्या पाठीवरून हात फिरविला. मीने तू कुठे पडली की काय? तुझ्या झम्परला आणि केसांना पाठीमागून माती आणि कचरा लागला आहे. तुला कुठे लागलेय का पाहू बरे? 
दिन्याने असे म्हणताच मिनीने त्यास बाजूला ढकलले आणि केस व पाठ झटकू लागली. "हे बघ दिन्या उगीच माझ्या गोष्टींत नाक खुपसू नकोस. जर याबद्दल कुठे बोलशील तर बघ. आता पुन्हा मी तूझ्याबरोबर कधी खेळणार नाही. आणि हो, परत मला असा अंगास हातबित लावलेला आवडणार नाही सांगून ठेवते. मी पडो नाही तर मोडो तुला काय घेणे देणे?"

मिनी बंटीबरोबर तिथून निघून गेली. ऊन डोक्यावर आले होते. दिन्या सुन्न झाला होता. त्याला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. एवढ्या उन्हात काळजीने आपण मिनीला शोधले, तिची विचारपूस केली आणि तिने मला असे का बोलावे? मिनीला काय झालेय? दिन्याचा घसा कोरडा पडला होता. मिनी पहिल्यांदाच त्याचेशी अशी वागली होती. त्याला उन्हाचा चटका सहन होईना. छे यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे. यंदा सुट्टीची काहीच मजा येत नाही. आता मिनी खरेच परत माझ्याशी खेळणार नाही काय? दिनू उन्हाचा तडाखा सहन न होऊन चालता चालता एका सादड्याचे झाडाखाली बसला आणि त्याने आजूबाजूला पाहिले. क्षितीजसमांतर रेषेवर सगळे धुसर धुसर दिसत होते. पाण्यातून पहावे तसे सगळे काही अस्पष्ट होऊन हलत होते. दूरपर्यंत एकही आकृती स्पष्ट नव्हती. हे असे दिन्यास त्या प्रचंड तापलेल्या उन्हाच्या झळ्यांमुळे दिसत होते की पाणावलेल्या डोळ्यांमुळे, याचेशी आपल्याला काय घेणे देणे....!! 

बुधवार, १२ मार्च, २०१४

उन्हाळा



घारीच्या सावलीवर पाय द्यायचा, आणि त्या जागेवर तीन दगड रचून ठेवायचे. मग पाच दिवसांनी तिथे खणले की पैसे सापडतात.
एक दिवस विटी दांडू खेळत असावे. दिवस डोक्यावर चढून रटरटत असावा. एकनाथ्याने विटी खूप उंच कोलावी आणि सूर्याने दिपून ती कुणास झेलताच येऊ नये. तेवढ्यात कुणीतरी वर घारीस घिरट्या घालतांना पहावे आणि तिची सावली कुठे पडली असेल याचा अंदाज घेऊन "चला रे तिकडं घारीच्या वसव्यावं पाय दियाला" अशी घोषणा द्यावी. एकनाथ्यासकट सगळ्यांनी मग क्षणार्धात विटीदांडूचा रंगलेला डाव मोडून घारीच्या सावलीमागे पळत सुटावे. दिन्याच्या फक्त हातभर लांबून सावली पळून जावी. भुऱ्याने तर अगदी बरोबर सावलीच्या जागी पाय द्यावा पण एक सेकंदाने वेळ चुकून सावली पुढे निघून जावी. गुणा सावलीवर पाय देण्याच्या नादात ठेचकाळून पडावा. घारीने हुलकावणी देत रहावी अन सावली कुणाच्याच पायाखाली येऊ नये. बऱ्याच वेळाने मग पोरे हटत नाहीत हे पाहून घारीनेच दमून कुठेतरी निघून जावे. पोरांनी जाम ओशाळून, घामावून बाजूच्या हिरडीखाली जमावे. मग नदीवर पोहायला जायचा ठराव मांडला जाताच मंजूर होऊन कारवाईत देखील यावा. सगळी नदी उड्या मारमारून ढवळून काढावी. तिकडून परतल्यावर लांब आकाशात एक उंच अशी धुळीची उभी रेघ दिसावी. मग हळू हळू एखादा कागद त्या रेघेच्या पुढे मागे हेलपाटे खाताना दिसावा. "गावातच येत्येय रे जणू वहाटुळ" असा पुकारा करताच मग ती पहायला पळत सुटावे. पोरे आणि वावटळीने सोबतच गाव गाठावे. "आररं बेम्बट्याच्या गवताच्या पेंढ्या पार उडाल्या रे" असे कुणी हळहळून म्हणावे. "पारूबाई त्वा कापडं धिवुन वाळत टाकली व्हती ना? ती पार तिकडं लांब उडून गेली" असे एकाने पारूबाईच्या घरी जाऊन सांगावे. गल्लीबोळातून वासुदेवासारखे वावटळीने गिरक्या घेत घेत नाचावे आणि प्रत्येक घरातून काही ना काही पदरात पाडून घ्यावे. उठलेल्या धुरळ्यात बराच वेळ गाव हरवून जावे. कागदे, कचरा, पाचोळा वरवर आभाळात भिरभिरत रहावा. आणि मग तो वाऱ्याचा भला थोरला भोवरा दूर निघून गेला की कचरा उडून गेल्याने गाव कसे स्वच्छ स्वच्छ दिसू लागावे.!
आता उन्हे पार कलतीला जाउन संध्याकाळ होत आलेली असावी, कापडाचा चेंडू घेऊन आबाधोबी किंवा लिंगोरच्याचा डाव सुरु असावा आणि मग अचानक कुणाला तरी आकाशात बगळ्यांची माळ पुढे पुढे सरकताना दिसावी. मग "बगळ्या बगळ्या कवडी दे,धामणगावची नवरी ने. धामणगाव जळाला, बगळा उठून पळाला" असे म्हणत सगळ्यांनी बगळ्यांकडे पाहत हात जोरजोरात हलवत बसावे. नखांवर मग कुणाला एक तर कुणाला दोन पांढऱ्या ठिपक्यांच्या कवड्या मिळाव्यात. किती सुख किती आनंद होता या सगळ्यात...
आता पैसा, प्रतिष्ठा, प्रगती, प्रेम अशा कितीतरी घारी उडत असतात आकाशात, पण आजही कितीही पळाले तरी एकीच्याही सावलीवर धड पाय ठेवता येत नाही. गाव झाडून नेणाऱ्या वावटळी तर येतच नाहीत, अन आलीच तर उलटे भोवताली कचरा आणून टाकणारी वादळेच येतात. स्वप्नांचा धामणगाव जाळून पळणारे बगळे महिनाअखेरीस बँकेत कुणासाठी एक तर कुणासाठी दोन कवड्या ठेवून जातात, पण या कवड्या कवडीमोलच... त्यांना त्या नखावरल्या कवड्यांच्या नखाचीही सर नाही.