हा ब्लॉग शोधा

बुधवार, १२ मार्च, २०१४

उन्हाळा



घारीच्या सावलीवर पाय द्यायचा, आणि त्या जागेवर तीन दगड रचून ठेवायचे. मग पाच दिवसांनी तिथे खणले की पैसे सापडतात.
एक दिवस विटी दांडू खेळत असावे. दिवस डोक्यावर चढून रटरटत असावा. एकनाथ्याने विटी खूप उंच कोलावी आणि सूर्याने दिपून ती कुणास झेलताच येऊ नये. तेवढ्यात कुणीतरी वर घारीस घिरट्या घालतांना पहावे आणि तिची सावली कुठे पडली असेल याचा अंदाज घेऊन "चला रे तिकडं घारीच्या वसव्यावं पाय दियाला" अशी घोषणा द्यावी. एकनाथ्यासकट सगळ्यांनी मग क्षणार्धात विटीदांडूचा रंगलेला डाव मोडून घारीच्या सावलीमागे पळत सुटावे. दिन्याच्या फक्त हातभर लांबून सावली पळून जावी. भुऱ्याने तर अगदी बरोबर सावलीच्या जागी पाय द्यावा पण एक सेकंदाने वेळ चुकून सावली पुढे निघून जावी. गुणा सावलीवर पाय देण्याच्या नादात ठेचकाळून पडावा. घारीने हुलकावणी देत रहावी अन सावली कुणाच्याच पायाखाली येऊ नये. बऱ्याच वेळाने मग पोरे हटत नाहीत हे पाहून घारीनेच दमून कुठेतरी निघून जावे. पोरांनी जाम ओशाळून, घामावून बाजूच्या हिरडीखाली जमावे. मग नदीवर पोहायला जायचा ठराव मांडला जाताच मंजूर होऊन कारवाईत देखील यावा. सगळी नदी उड्या मारमारून ढवळून काढावी. तिकडून परतल्यावर लांब आकाशात एक उंच अशी धुळीची उभी रेघ दिसावी. मग हळू हळू एखादा कागद त्या रेघेच्या पुढे मागे हेलपाटे खाताना दिसावा. "गावातच येत्येय रे जणू वहाटुळ" असा पुकारा करताच मग ती पहायला पळत सुटावे. पोरे आणि वावटळीने सोबतच गाव गाठावे. "आररं बेम्बट्याच्या गवताच्या पेंढ्या पार उडाल्या रे" असे कुणी हळहळून म्हणावे. "पारूबाई त्वा कापडं धिवुन वाळत टाकली व्हती ना? ती पार तिकडं लांब उडून गेली" असे एकाने पारूबाईच्या घरी जाऊन सांगावे. गल्लीबोळातून वासुदेवासारखे वावटळीने गिरक्या घेत घेत नाचावे आणि प्रत्येक घरातून काही ना काही पदरात पाडून घ्यावे. उठलेल्या धुरळ्यात बराच वेळ गाव हरवून जावे. कागदे, कचरा, पाचोळा वरवर आभाळात भिरभिरत रहावा. आणि मग तो वाऱ्याचा भला थोरला भोवरा दूर निघून गेला की कचरा उडून गेल्याने गाव कसे स्वच्छ स्वच्छ दिसू लागावे.!
आता उन्हे पार कलतीला जाउन संध्याकाळ होत आलेली असावी, कापडाचा चेंडू घेऊन आबाधोबी किंवा लिंगोरच्याचा डाव सुरु असावा आणि मग अचानक कुणाला तरी आकाशात बगळ्यांची माळ पुढे पुढे सरकताना दिसावी. मग "बगळ्या बगळ्या कवडी दे,धामणगावची नवरी ने. धामणगाव जळाला, बगळा उठून पळाला" असे म्हणत सगळ्यांनी बगळ्यांकडे पाहत हात जोरजोरात हलवत बसावे. नखांवर मग कुणाला एक तर कुणाला दोन पांढऱ्या ठिपक्यांच्या कवड्या मिळाव्यात. किती सुख किती आनंद होता या सगळ्यात...
आता पैसा, प्रतिष्ठा, प्रगती, प्रेम अशा कितीतरी घारी उडत असतात आकाशात, पण आजही कितीही पळाले तरी एकीच्याही सावलीवर धड पाय ठेवता येत नाही. गाव झाडून नेणाऱ्या वावटळी तर येतच नाहीत, अन आलीच तर उलटे भोवताली कचरा आणून टाकणारी वादळेच येतात. स्वप्नांचा धामणगाव जाळून पळणारे बगळे महिनाअखेरीस बँकेत कुणासाठी एक तर कुणासाठी दोन कवड्या ठेवून जातात, पण या कवड्या कवडीमोलच... त्यांना त्या नखावरल्या कवड्यांच्या नखाचीही सर नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा