हा ब्लॉग शोधा

शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

दु:खश्रेष्ठा


देवाधिदेव सपत्निक ध्यानस्थ बसले होते, तेवढ्यात वीणेचे मंजुळ स्वर ऐकू येऊ लागले आणि सोबतीने "नारायण नारायण" असा घोष झाला. भगवन तर स्वयं अंतर्यामीच होत, मात्र हे संकेत म्हणजे महर्षी नारदांच्याच आगमनाची चाहूल हे तर कुणीही ओळखले असते. म्हणूनच समोर येऊन अभिवादनासाठी हात जोडून प्रभूंस साद देण्यापूर्वीच स्वत: देवाधिदेवांनीच नारदांस म्हंटले, "सादर प्रणाम मुनीवर. बोला आपली काय सेवा करू?"
"प्रभू अहो आपण आमची सेवा करावी एवढे आम्ही थोर नाही. केवळ आपल्या दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून आलो."
यावर डाव्या बाजूला बसलेल्या देवींकडे वळून हसत देवाधिदेव म्हणाले, "देवी अर्धांगिनी तुम्हीच सांगा, महर्षी नारदजी कधी दर्शनमात्रे येतील काय?" देवींनी हलकेच हसून प्रभूंस संमती दिली, आणि नारदांकडे पाहून म्हणाल्या, "आदरणीय महर्षी कृपया आपल्या येण्याचे प्रयोजन शीघ्र सांगावे. आपला वास तिन्ही लोकांत असतो, त्यामुळे आपल्याशी होणाऱ्या वार्तालापातून आम्हास नेहमीच नवनव्या गोष्टी कळतात."
नारद म्हणाले, "हे जगत्पिता आणि हे जगन्माता, आम्ही एक मोठा पेच घेऊन आपल्याकडे आलो आहोत." 
"मोठा पेच? म्हणजे नक्कीच आपण भुतलावरुन आलेले दिसता. बोला मुनीवर, काय म्हणताहेत आमचे प्रिय मानवजन?"
"देवा आपले प्रिय मानवजन आत्यंतिक दु:खात आहेत."
"मानवजन दु:खात आहेत? पण मुनीवर आम्ही तर वेळी दरवेळी भूतलावरचे दु:ख हरण्यासाठी आमचे प्रेषित महापुरुषांच्या रुपात पाठवत राहिलो आहोत. तरीही मानवजात अजूनही दु:खास मात देऊ शकली नाही?"
"देवा आपण पाठविलेले ते युगपुरुष हेच उलट लोकांच्या दु:खांचे एक मोठे कारण बनले आहेत. लोकांनी त्यांस आपापल्या वेगवेगळ्या धर्मात, जातींत विभागून घेतले आहे, आणि त्यांच्या नावाखाली ते एकमेकांचा तिरस्कार करून अधिकाधिक दु:खीच होत आहेत. प्रत्येक गोष्टीत यांनी परस्परविरोधी हितसंबंध जोपासून ठेवले आहेत. एकाचे सुख दुसऱ्याचे दु:ख बनले आहे. फार कशाला प्रभो, मृत्यू हा 'दु:खाचा शेवट' असे आपणांस अभिप्रेत आहे ना, मात्र तिथे मृत्यू हेच दु:ख बनले आहे."
देवाधिदेव थोडावेळ विचारात पडले. स्वर्ग आणि नरकाव्यतिरिक्त जीवनाचा पहिला आणि एकमेव प्रयोग जिथे त्यांनी केला तो हा इहलोक.!! त्या व्यतिरिक्त कुठे तेज, कुठे रज, कुठे नुसतेच द्रव्य असा संबंध ब्रम्हांडाचा पसारा सांभाळता सांभाळता खरेच बरेचसे दिवस स्वयें त्यांस आणि देवींसही त्यांनीच निर्मिलेल्या या ब्रम्हांडाचा एक अब्जावधीव्या अंशाहूनही कितीतरी सूक्ष्म असलेल्या इहलोकीचा काहीसा विसर पडला होता हे खरेच होते. पूर्वी देवाधिदेव वारंवार त्यांच्या या आवडत्या इहलोकाची आवर्जून माहिती ठेवत असत, तिथे भेट देत असत, मात्र आता वाढत्या ब्रम्हांडाच्या पसाऱ्याबरोबर हा इवलासा कण त्यांस काहीसा दुरावलाच होता. अगदी अंतर्ज्ञानाने देखील कित्येक शतके त्यांनी तिथली बित्तंबातमी घेतली नव्हती हे खरेच.
"पण मुनीवर सुख आणि दु:ख या दोन्ही संकल्पना केवळ आभास आहेत हे तर आपण जाणताच. दोन्ही गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. सुख आणि दु:ख या संवेदनांच्या पलीकडेच मोक्ष आहे, अशीच रचना आहे ना जीवनाची? जो जो मृत्युपूर्व या सुख दु:खाच्या गर्तेतून बाहेर पडेल तोच मोक्ष प्राप्त करता होईल. हे सुख आणि दु:ख म्हणजे जीवनाची एक प्रकारची परीक्षाच आहे."
"ते सर्व मी जाणतो देवा, मात्र आपणांस कल्पना नाही एवढे दुर्भाग्य आणि दु:खाचे स्तोम माजले आहे इहलोकी. आपण मागचे युगभर तिथे गेला नाही म्हणून आपणांस तेथील दु:खांची कल्पना नाही. जीवन नावाच्या अहोभाग्याचे धनी होऊनही तिथे हरेकजण स्वत:स दुर्भागी मानून दु:खी होतो आहे. मला तर आश्चर्य वाटते की प्रत्यक्षात तितकेसे नसलेल्या गोष्टींचे एवढे स्तोम माजविण्याची क्षमता या लोकांत कुठून येते?"
"क्षमता म्हणाल महामुनी, तर त्या मात्र आम्ही अमर्याद दिल्या आहेत आमच्या प्रिय मानवजनांस.. त्यांस केवळ त्या क्षमतांशी स्वत:चा परिचय करून घेणे एवढेच कार्य सोपविले आहे आम्ही. आणि कित्येकांनी बऱ्याच अंशी तो तसा परिचय केल्याचेही स्मरते आम्हांस. मात्र केवळ काहीजणांनी तो परिचय करून उपयोग नाही. जेव्हा समस्त मानवजन तसे आपल्या क्षमतांस ओळखून त्यांचा उपयोग करू लागतील तेव्हाच आम्हास जीवननिर्मितेचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. अहो आम्ही मानवांस दिलेल्या या क्षमता इतक्या प्रबळ आहेत की समग्र विश्वातले सगळे दु:ख एकवटूनही एक मानव ढासळणार नाही "
"मात्र हे ईश्वर, ही क्षमता जाणून घेण्यास मानवांस मर्यादा आहेत, हळूहळू आपल्या क्षमतांशी अवगत होऊन स्वयंप्रबोधित होण्याच्या या प्रक्रियेस काळाचे बंधन आहे. आपणच ते घालून दिले आहे. मात्र आता भूतलावर संचार करताना असे वाटते की दु:खाच्या जाणीवेचा वेग हा आत्मज्ञानाने स्वयंप्रकाशीत होण्याच्या वेगाहून अधिक तर नाही?" तिथले पदोपदी आढळणारे आपण अभागी असल्याचे समजून येणारे दु:खावेग पाहूनच एक पेच मनात निर्माण झाला, तोच सोडविण्यासाठी आम्ही आपणांकडे येण्याचे प्रयोजन केले आहे."
"असा कोणता पेच आपणांस पडला महर्षी, की इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण आवर्जून आम्हास दर्शन देऊ झालात? 
"प्रभो पेच असा पडला आहे की आपण निर्मिलेल्या या जीवसृष्टीतील आजतागायतच्या मानवांत सर्वाधिक दु:खी आणि दुर्भागी असलेला मानव कोण?"
"ती नक्कीच कोणी स्त्री असणार, महाप्रभूंनी स्त्रीला थोडे अधिकच दुर्बल बनविले आहे." देवाधिदेवांनी काही सांगण्याआधीच देवी उत्तरल्या.
देवींच्या लटक्या क्रोधास स्मित हसून प्रतिसाद देत देवेश्वर वदले, "आम्ही स्त्रीस काहीसे कोमल बनविले हे खरे असले तरी तीस दुर्बल केले नाही. किंबहुना आम्ही तीस पुरुषांहूनही अधिक बलशाली बनविले आहे, फक्त स्त्रीने आपले बलस्थान ओळखण्याची आवश्यकता आहे."
"मग कोण असेल ती दुर्भागी व्यक्ति प्रभू?"
"देवीच सांगतील. काय देवी?" प्रभूंनी देवींस विचारले 
देवी विचारात पडल्या.
"सर्वाधिक दु:खी किंवा दुर्भागी म्हणावे तर अनेक नावे समोर येतात. त्यांतून एक नाव निवडणे कठीण आहे."
"देवी आपण नामांचे पर्याय तर द्या म्हणजे त्यातून कोण अधिक दुर्भागी ते आपणांस निवडता येईल आणि मुनिवरांस त्यांच्या प्रश्नाचे उत्तर अशा रितीने चर्चेद्वारे मिळून जाईल.
देवींनी ध्यान लावले, इहलोकीच्या निर्मितीपासून वर्तमानापर्यंतच्या घडामोडींचे स्मरण केले आणि उद्गारल्या, "देवराया सर्वात आधी आमच्या समोर नाव येते ते सीतेचे, जन्मदात्या पित्याने तीस नवजातच पेटीत घालून टाकून दिले, लग्नानंतर वनवास मिळाला, तिथेही अपहरण झाले, नंतर पतीसमोर पावित्र्याची अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि तीत निभावून गेली तरीही पतीने तिला त्यागलेच.. दुसरी अहल्या, पतीशी एकनिष्ठ राहूनही युगानुयुगे शापित शीळा होऊन रहावे लागले तिला. तिसरी आहे कुंती, तिने तर आयुष्यभर केवळ दु:खच भोगले. कुमारीमाता झाली, पतीसुखास पारखी झाली, वनवास घ्यावा लागला, मुलांबरोबर तिचीही फरफट झाली आणि लोकलज्जेस्तव एका मुलाकडून दुसऱ्या मुलाचा वध झाल्याचे निमुटपणे पहावे लागले बिचारीला. चौथी द्रौपदी, पाच पतींत तिचे प्रेम विभागले गेले, सम्राज्ञी असूनही वनवास भोगावा लागला, भर सभेत पराक्रमी पतींसमोर तिची विटंबना झाली, पाचही पुत्र मारले गेले. पाचवी उर्मिला, लक्ष्मणाची पत्नी, सीता वनवासात गेली तरी तिला निदान पतीचा सहवास तरी लाभला होता. उर्मिलेस तर काहीच चूक नसताना ऐन तारुण्यात पतीविना तब्बल चौदा वर्षे वैरागी जीवन जगावे लागले. याचप्रमाणे देवकी, गांधारी, मंदोदरी, शकुंतला, शर्मिष्ठा, सुग्रीवपत्नी तारा, यशोधरा, मीरा ते अगदी अलीकडील अरुणा शानबाग, निर्भया अशा शेकडोजणी आहेत देवा, ज्यांच्या दु:खाला आणि दुर्भाग्याला पारावार नाही."
देवींचे बोल ऐकता ऐकता नारदांनी उत्तरीयाने डोळ्यांच्या कडा टिपल्या आणि देवाधिदेवांकडे पाहीले. देवांनी डोळे मिटले होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे ते नेहमीचे स्मित मालवून चेहरा धीरगंभीर झाला होता. बराचवेळ तसे समाधिस्थ गंभीर मुद्रेत राहिल्यावर एक दीर्घ सुस्कारा टाकून देवांनी डोळे उघडले. आणि देवींकडे एक नजर टाकून त्यांचा हात हातात घेत नारदांकडे वळून म्हणाले, "महर्षि आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता आम्हीही व्यथित झालो आहोत. देवींनी ज्यांची नावे सांगितली त्या सगळ्या स्त्रियांनी किंबहुना त्यांनी नावे न उल्लेखिलेल्या अशा अगणित स्त्रियांनी आणि केवळ स्त्रियाच नव्हे तर तेवढ्याच पुरुषांनीही अपार दु:खे भोगिली आहेत हे आम्ही जाणतो. मात्र तरीही आमच्या डोळ्यासमोर जी व्यक्ती आहे तिचे दुर्भाग्य आणि तिचे दु:ख हे या सर्वांहून अधिक द्रावक आहे."
देवेश्वरांच्या या भाष्यावर स्वत: देवींसह महर्षी नारदांनीही प्रश्नार्थक मुद्रा केली. देवाधिदेवांनी त्या दोघांकडेही आळीपाळीने पाहीले आणि मग उद्गारले,
"आपण उल्लेखिलेल्या अथवा न उल्लेखिलेल्या सर्व दु:खीजनांच्या आयुष्यात किमान एकतरी अपार सुखाचा काळ होता. तो काळ म्हणजे त्यांचे बालपण होय.! बालपणाएवढा सुखाचा काळ कोणताही नाही. बालपणात कुठली जबाबदारी नसते, चिंता नसते, त्या काळातल्या सगळ्या जाणीवा या शुद्ध भौतिक प्रतिसाद असतात, त्यात अनुभवांतून आलेली प्रतिक्रिया नसते.  बालपणात एकवेळ वेदना असतील पण दु:ख नसते. वेदनांची कारणे आणि परिणाम यांची जाणीव म्हणजे दु:ख.! ते वेदनेहूनही अधिक दाहक असते. यास्तवच बालपणी उपाशी, जखमी व्हावे, रहावे लागले तरी त्यांचा आवाका केवळ क्षणिक वेदनेपुरता, त्याला दु:खाची जोड नसते. म्हणूनच कितीही दु:खी माणूस असला तरी त्याला त्याच्या शैशवाची स्मृती नेहमीच सुखावह वाटते. मृत्यू हे दु:ख नव्हेच, हे मघाशी आपणही उल्लेखीलेत मुनीवर, त्याप्रमाणेच बालमृत्यू झालेली व्यक्तीदेखील दु:खी नव्हे,  कारण तोवर तीस मृत्यूची दाहकता उमगलेली नसते. गंगेने पाण्यात बुडविलेली मुले असोत की कंसाने भिंतीवर भिरकावलेली बालके, त्यांस मृत्यूच्या परिणामांची जाणच नसल्याने त्यांचे बालमृत्यू हे त्यांचे स्वत:साठी तरी तेवढे दु:खदायी ठरत नाहीत. बालपण हा केवळ सुखाचा काळ, तो प्रत्येकाला दिला गेला आहे. आणि म्हणूनच प्रौढावस्था अथवा उत्तरार्धात कितीही दु:खे लाभली तरी ज्यास बालपणाच्या आठवणी लाभल्या तो अहोभागीच होय."
"म्हणजे जगात कुणीच दु:खी, दुर्भागी नाही असे समजावे काय देवाधिदेवा?" नारदांनी विचारले.
"नाही महातपस्वीजी, मात्र जगातील सर्वाधिक दुर्भागी व्यक्ती ही एखादी स्त्रीच असेल या देवींच्या मताशी आम्हीही सहमत आहोत."
"असे असेल तर कोण आहे ती स्त्री प्राणनाथ?" देवींनी न राहवून देवांस विचारले.
"ती एक अशी स्त्री आहे जी तरुणच जन्मास आली. तिच्या पित्यास आपल्या अपमानाचा सूड घेणारा पराक्रमी पुत्र हवा होता म्हणून त्याने यज्ञ केला, परंतु जन्मास आली ती मुलगी. तीही कृष्णवर्णी.!! पुढे आयुष्यभर तिने दु:खच भोगले, आणि त्या दु:खावर फुंकर ठरावे असे बालपणही तिला लाभलेच नाही. कुणी व्यक्ती कितीही दु:खी असो मुनीवर, पण तीस जर बालपणीच्या गोड आठवणी सोडा, खुद्द बालपणच नसेल तर ती सर्वाधिक दुर्दैवी होय. आणि ती दुर्दैवी स्त्री म्हणजे, द्रोणाच्या आज्ञेवरून कौरव राजपुत्रांनी द्रुपदाला पराभूत केल्यावर, त्याने द्रोणाचा वध करण्यासाठी योजलेल्या पुत्रप्राप्तीयज्ञात तरुणच जन्माला आलेली कृष्णा म्हणजेच द्रौपदी ही होय. तिला बालपण लाभले नाही. ती थेट यौवनसंपन्न जन्मास आली. तिच्याहून दुर्दैवी आणि दु:खी अन्य कोणी व्यक्ती नाही. बालपणाहून मोठे सुख दुसरे नाही, आणि ते नसण्याहून मोठे दु:ख देखील कोठले नाही..म्हणूनच इहलोकात द्रौपदीहून कुणी दु:खी आणि दुर्भागी नाही."
एवढे बोलून देवाधिदेव सपत्निक अंतर्धान पावले, मग त्यांच्या बैठकीलाच दंडवत घालून "नारायण नारायण" जपत जड पावलांनी नारदांनीही पुढचा रस्ता धरला. 

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

आठवणीतल्या दिवसाचे गाव

संपूर्ण जग आता एक खेडे, एक गाव बनले आहे असे आपण वारंवार ऐकतो. पण झपाट्याने जगाचे शहरीकरण होत असताना खरेखुरे गाव मात्र हरवत चालले आहे. इथे शहरात जिकडे तिकडे नुसती गर्दी, गोंगाट, घाई पसरलेली दिसते. सकाळी बाहेर पडण्यासाठी आणि रात्री आत येण्यासाठी असे दोनदाच घरांचे दरवाजे उघडतात. इथे डोंगर दिसत नाहीत, खळाळती नदी नाही, आणि कारखान्यांचा धूर व स्ट्रीट लाईट्सच्या प्रखरतेने रात्रीच्या आकाशातली चांदण्यांची चमचमती झालर तर अजिबात दिसत नाही. त्यामुळेच गावची नदी, डोंगर, आभाळ, झाडे, माती, गुरे, माणसे, देऊळ, शाळा या सगळ्यांशी जन्मत:च नाळ जोडली गेली असल्याने उपजीविकेसाठी शहरात यावे लागलेल्या आमच्यासारख्या कैकांना गाव आणि गावाची आठवण नेहमीच अंतर्मुख करून टाकते. 

अमुक अमुक शहर कधीच झोपत नाही असे अनेक शहरांबद्दल लोक कौतुकाने बोलतात, गावाला मात्र गाढ झोप यायची. दिवसभराच्या शेतातल्या कामावरून परतून, गुरे बांधून अन गायी म्हशी पाजून झाल्या की पारावर जमलेल्या  बाप्यांच्या गप्पांना रंग येई. चावडीपुढच्या अशा यार दोस्तांच्या गप्पा रंगलेल्या असतानाच थोड्या वेळाने एखादे पोरगे येऊन बापाला म्हणे की "दादा, सैपाक झालाय, आयेनं जेवाया बोलीवलंय" ते ऐकताच मग टोळक्यातल्या सगळ्यांना भूक लागे आणि मैफल लगेच बरखास्त होऊन जो तो आपल्या घरी जेवण्यासाठी रवाना होई. जेवल्यावर अर्ध्या एक तासाने पुन्हा निम्मेअधिक जण तिथेच एकत्र जमत. बिड्या, तंबाखूची देवाणघेवाण करीत आणि उरलेल्या गप्पा चघळीत बसत. लांब तिकडे देवळात भजन रंगलेले असे, आयाबायांनी अंगणात उजेडात भांडी घासायला काढलेली असत. एखाद्या मोठ्या खटल्याच्या घरात ओसरीवर म्हाताऱ्याची धुनी पेटलेली असे, आणि तिच्याभोवती कोंडाळे करून "आज्या गोष्ट सांग ना रे" असा नातवंडांचा धोशा चाललेला असे. मग धुनीतली राख बाजूला करून लाकडे लावता लावता आजोबाची राजाराणीची गोष्ट संपायला आली की पोरे तिथेच पेंगू लागत. सगळी नातवंडे झोपली हे पाहून आपल्या चार लेकांतल्या लग्न न झालेल्या धाकट्याला तो आजोबा पोरांना उचलून घरात अंथरुणावर नेउन ठेवायला सांगे. एव्हना चावडीवरची बैठक आणि देवळातले भजनही उरकलेले असे. "मला तांब्याभर पाणी आणून द्या अन कंदिलाची वात बारीक करा रे" असे न चुकता सांगून म्हातारा ओसरीवर झोपू लागे तेव्हा रातकिड्यांची किरकिर आणि मध्येच हुक्की आल्याने एकापाठोपाठ एक ओरडणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वगळता सगळे गाव शांत होऊन जाई. 

पहाट मात्र गजबजलेली असे,  मंजुळ किलकिलाट करीत पाखरे घरट्यांतून कुठेशी उडून चाललेली असत. घराच्या एका कोपऱ्यात जात्याची घरघर चालू असे,  त्या तालावर जाते ओढता ओढता बायांच्या ओव्या चालू होत. स्वयंपाकघरात चूल पेटलेली असे, मधून मधून तिथूनही फुंकणीचा आवाज येई. न्हाणीकडे हंडे, कळश्या विसळल्या जात, मधेच एखाद्या हंड्याचा टण्ण असा आवाज येई. डोळे चोळीत उठावे आणि अंगणात यावे तर पूर्वेचे आकाश तांबडे होऊन गेलेले असे. पाणवठ्यावरून दुडी अन तीडीने हंडे भरून पानेरणी येताना दिसत. आपल्या किटल्यांमध्ये दुध घेऊन डेरीवर आलेला एखादाजण एका किटलीच्या दुधाला डिग्री बसत नाही म्हणून दुध नाकारणाऱ्या डेरीवाल्याशी हुज्जत घालीत बसलेला असे. पाहुण्या गावाला जायचे या आनंदात बाजूलाच रस्त्याच्या कडेला सकाळच्या एसटीची वाट बघत आई बापाबरोबर नवे कपडे घालून नवाजून गेलेली पोरे उभी असत. रस्त्यावर जाऊ नका म्हणून बाप उगीच त्या पोरांना दटावीत राही. 
हळूहळू सूर्य वर येई, गाव पिवळे होऊन जाई. पाठीवर दप्तर, खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा लवाजमा घेऊन पोरे शाळेची वाट धरीत. गोठ्यातून बाहेर पडताच अंग शहारून आळस झटकणाऱ्या गुरांना हलकेसे दामटीत हातात काठी अन कमरेला बासरी खोचून गायखे रानात निघत. तिकडे शाळेत चालू असलेली प्रार्थना ऐकत बसायला शेतकऱ्यांना वेळ नसे. प्रात:सभा संपून पोरे वर्गात बसेतो भिवाजीचा एक पट नांगरुनही झालेला असे. घराघराच्या कौलारू छपरांतून चुलींचा धूर वाट काढून बाहेर पडत राही. रस्त्याने अनेकांचे रामराम घेत आणि काठी टेकीत टेकीत काही वयस्क धेंडे देवळापुढे, चावडीवर जमत व जुन्या आठवणींना उजाळा देत बसत. 
घरात कारभारणींना वेळ पुरत नसे. आंधणावर आंधणे ठेवली जात, चुलीवर भाकरी थापत असताना बाजूच्या औलावर कोरड्यास उकळून रटरटत असे. सांभाळायला दिलेली सगळी तान्हुली गोंधळ घालून, रडारड करून वैताग देऊ लागली की उशीर होतोय, धूर झालाय अशी कारणे काढून म्हातारी सासू तिच्या सुनांवर ओरडत राही. सगळी झाडलोट, सारवण उरकले की पोराटोरांना जेवू घालेपर्यंत सूर्य बराच वर आलेला असे. मग "औतकऱ्यांना न्याहारी घेऊन निघा की गं कोणीतरी, लेकरं भूकावली असतील माझी" असा सूचनावजा आदेश म्हातारी सुनांना देई. आणि मग एखादी सून पाटीत जेवण घेऊन रानात निघे. तिकडे दोन मोठी वावरे नांगरून झाल्यावर औते सोडत असताना न्याहरी येई, पण बैलांना सावलीत बांधून पेंढा खायला टाकल्याशिवाय कुणीही जेवायला घेत नसे. जेवायला बसले की सगळ्या ताटांत वाढून होईपर्यंत पाटीतला कांदा घेऊन बुक्कीने ठेचून होई.  जेवणाबरोबर त्या फोडलेल्या कांद्याला न्यारीच चव येई. मग सगळ्यांचे जेवण उरकून थोडा वेळ बसले की सगळे औतकरी पुन्हा जमीन उसवायला भिडत. 

गाव दुपारच्याला तसे ओसाड झाल्यासारखे दिसे, सुतारांची ठक ठक, आणि लोहाराच्या घणाचा आवाज तेवढा येत राही. दारावरून जाणाऱ्या एखाद्या पाहुण्याला मग तो अनोळखी का असेना, रामराम घालून, "ऊन लई झालंय, वाईच या सावलीला, पाणी घ्या" म्हणून घरात बोलावले जाई. पाणी दिल्यावर जेवणाचाही फार आग्रह होई. इकडची तिकडची विचारपुस्त होई. मग पाहुण्याच्या गावाच्या आपल्या मित्रा अथवा नातेवाईकांना राम राम सांगा असे म्हणून थोडा उन्हाचा कडाका कमी झाल्यावर पाहुण्याला निरोप देण्यात येई. शाळेतून आल्यावर जेवून खेळता खेळता खूप भांडून पोरे झोपून गेलेली असत. तर काही थोडी मोठी पोरे नदीवर पोहायला, विटीदांडू खेळायला निघून जात.                

सूर्य मावळतीला कलताना परत गावाची लगबग चालू होई. गावभराच्या घरांवर पुन्हा एकदा धुराची एक रुंद पट्टी पसरत जाई. अंगणांत पोरांचे खेळ रंगलेले असत. लांबवर बगळ्यांचा बाण आकाशातून झेपावतांना नजरेस पडे. थोड्याच वेळात आपल्या गळ्यातल्या घंटांची खणखण घेऊन एकामागून एक मोठमोठे गुरांचे कळप गावात शिरत. सकाळी घर सोडून रानात जातांना गुरे सावकाश चालत जात मात्र संध्याकाळी मागून धावणाऱ्या गुराख्याची तारांबळ उडवीत सगळी गुरे पळत पळतच गावात शिरत. एकामागून एक लोंढे गावात येत. वेशीपासूनच हंबरडे फोडून गायी गोठ्यांतल्या आपल्या वासरांना आपण आल्याची सूचना देत. त्याला प्रतिसाद म्हणून गोठ्यांतूनही दावणीला उगीच झटत वासरे हंबरडा फोडीत. प्रत्येक लोंढ्याबरोबर तो गुरांचा एक आल्हाददायी वास गावाला कवेत घेई, तो पायरव, घंटानाद यांनी कान भरून जात, आणि मातीच्या रस्त्यावर एकाच वेळी धावत चाललेल्या शेकडो खुरांच्या खालून उडणारी धूळ घरांवरच्या धुरात मिसळून गाव, आकाश, डोंगर हे सारे क्षणभर हरवून गेल्यासारखा भास होई.

आज प्रचंड गर्दीतून वाट काढीत, लोकलचा खडखडाट व वाहनांचे कर्कश हॉर्न कानात ओतून आणि कित्येक नळकांड्यानी हवेत सोडलेला धूर नाकात, डोळ्यात भरून कसाबसा घरात पोचतो ना, तेव्हा डोळ्यांपुढे दाटून आलेल्या विषण्णतेच्या शेकडो शून्यांच्या वर्तुळांत संध्याकाळच्या त्याच गाव हरवून जाण्याच्या विलोभनीय क्षणांना मन शोधत राहते.