संपूर्ण जग आता एक खेडे, एक गाव बनले आहे असे आपण वारंवार ऐकतो. पण झपाट्याने जगाचे शहरीकरण होत असताना खरेखुरे गाव मात्र हरवत चालले आहे. इथे शहरात जिकडे तिकडे नुसती गर्दी, गोंगाट, घाई पसरलेली दिसते. सकाळी बाहेर पडण्यासाठी आणि रात्री आत येण्यासाठी असे दोनदाच घरांचे दरवाजे उघडतात. इथे डोंगर दिसत नाहीत, खळाळती नदी नाही, आणि कारखान्यांचा धूर व स्ट्रीट लाईट्सच्या प्रखरतेने रात्रीच्या आकाशातली चांदण्यांची चमचमती झालर तर अजिबात दिसत नाही. त्यामुळेच गावची नदी, डोंगर, आभाळ, झाडे, माती, गुरे, माणसे, देऊळ, शाळा या सगळ्यांशी जन्मत:च नाळ जोडली गेली असल्याने उपजीविकेसाठी शहरात यावे लागलेल्या आमच्यासारख्या कैकांना गाव आणि गावाची आठवण नेहमीच अंतर्मुख करून टाकते.
अमुक अमुक शहर कधीच झोपत नाही असे अनेक शहरांबद्दल लोक कौतुकाने बोलतात, गावाला मात्र गाढ झोप यायची. दिवसभराच्या शेतातल्या कामावरून परतून, गुरे बांधून अन गायी म्हशी पाजून झाल्या की पारावर जमलेल्या बाप्यांच्या गप्पांना रंग येई. चावडीपुढच्या अशा यार दोस्तांच्या गप्पा रंगलेल्या असतानाच थोड्या वेळाने एखादे पोरगे येऊन बापाला म्हणे की "दादा, सैपाक झालाय, आयेनं जेवाया बोलीवलंय" ते ऐकताच मग टोळक्यातल्या सगळ्यांना भूक लागे आणि मैफल लगेच बरखास्त होऊन जो तो आपल्या घरी जेवण्यासाठी रवाना होई. जेवल्यावर अर्ध्या एक तासाने पुन्हा निम्मेअधिक जण तिथेच एकत्र जमत. बिड्या, तंबाखूची देवाणघेवाण करीत आणि उरलेल्या गप्पा चघळीत बसत. लांब तिकडे देवळात भजन रंगलेले असे, आयाबायांनी अंगणात उजेडात भांडी घासायला काढलेली असत. एखाद्या मोठ्या खटल्याच्या घरात ओसरीवर म्हाताऱ्याची धुनी पेटलेली असे, आणि तिच्याभोवती कोंडाळे करून "आज्या गोष्ट सांग ना रे" असा नातवंडांचा धोशा चाललेला असे. मग धुनीतली राख बाजूला करून लाकडे लावता लावता आजोबाची राजाराणीची गोष्ट संपायला आली की पोरे तिथेच पेंगू लागत. सगळी नातवंडे झोपली हे पाहून आपल्या चार लेकांतल्या लग्न न झालेल्या धाकट्याला तो आजोबा पोरांना उचलून घरात अंथरुणावर नेउन ठेवायला सांगे. एव्हना चावडीवरची बैठक आणि देवळातले भजनही उरकलेले असे. "मला तांब्याभर पाणी आणून द्या अन कंदिलाची वात बारीक करा रे" असे न चुकता सांगून म्हातारा ओसरीवर झोपू लागे तेव्हा रातकिड्यांची किरकिर आणि मध्येच हुक्की आल्याने एकापाठोपाठ एक ओरडणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वगळता सगळे गाव शांत होऊन जाई.
पहाट मात्र गजबजलेली असे, मंजुळ किलकिलाट करीत पाखरे घरट्यांतून कुठेशी उडून चाललेली असत. घराच्या एका कोपऱ्यात जात्याची घरघर चालू असे, त्या तालावर जाते ओढता ओढता बायांच्या ओव्या चालू होत. स्वयंपाकघरात चूल पेटलेली असे, मधून मधून तिथूनही फुंकणीचा आवाज येई. न्हाणीकडे हंडे, कळश्या विसळल्या जात, मधेच एखाद्या हंड्याचा टण्ण असा आवाज येई. डोळे चोळीत उठावे आणि अंगणात यावे तर पूर्वेचे आकाश तांबडे होऊन गेलेले असे. पाणवठ्यावरून दुडी अन तीडीने हंडे भरून पानेरणी येताना दिसत. आपल्या किटल्यांमध्ये दुध घेऊन डेरीवर आलेला एखादाजण एका किटलीच्या दुधाला डिग्री बसत नाही म्हणून दुध नाकारणाऱ्या डेरीवाल्याशी हुज्जत घालीत बसलेला असे. पाहुण्या गावाला जायचे या आनंदात बाजूलाच रस्त्याच्या कडेला सकाळच्या एसटीची वाट बघत आई बापाबरोबर नवे कपडे घालून नवाजून गेलेली पोरे उभी असत. रस्त्यावर जाऊ नका म्हणून बाप उगीच त्या पोरांना दटावीत राही.
हळूहळू सूर्य वर येई, गाव पिवळे होऊन जाई. पाठीवर दप्तर, खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा लवाजमा घेऊन पोरे शाळेची वाट धरीत. गोठ्यातून बाहेर पडताच अंग शहारून आळस झटकणाऱ्या गुरांना हलकेसे दामटीत हातात काठी अन कमरेला बासरी खोचून गायखे रानात निघत. तिकडे शाळेत चालू असलेली प्रार्थना ऐकत बसायला शेतकऱ्यांना वेळ नसे. प्रात:सभा संपून पोरे वर्गात बसेतो भिवाजीचा एक पट नांगरुनही झालेला असे. घराघराच्या कौलारू छपरांतून चुलींचा धूर वाट काढून बाहेर पडत राही. रस्त्याने अनेकांचे रामराम घेत आणि काठी टेकीत टेकीत काही वयस्क धेंडे देवळापुढे, चावडीवर जमत व जुन्या आठवणींना उजाळा देत बसत.
घरात कारभारणींना वेळ पुरत नसे. आंधणावर आंधणे ठेवली जात, चुलीवर भाकरी थापत असताना बाजूच्या औलावर कोरड्यास उकळून रटरटत असे. सांभाळायला दिलेली सगळी तान्हुली गोंधळ घालून, रडारड करून वैताग देऊ लागली की उशीर होतोय, धूर झालाय अशी कारणे काढून म्हातारी सासू तिच्या सुनांवर ओरडत राही. सगळी झाडलोट, सारवण उरकले की पोराटोरांना जेवू घालेपर्यंत सूर्य बराच वर आलेला असे. मग "औतकऱ्यांना न्याहारी घेऊन निघा की गं कोणीतरी, लेकरं भूकावली असतील माझी" असा सूचनावजा आदेश म्हातारी सुनांना देई. आणि मग एखादी सून पाटीत जेवण घेऊन रानात निघे. तिकडे दोन मोठी वावरे नांगरून झाल्यावर औते सोडत असताना न्याहरी येई, पण बैलांना सावलीत बांधून पेंढा खायला टाकल्याशिवाय कुणीही जेवायला घेत नसे. जेवायला बसले की सगळ्या ताटांत वाढून होईपर्यंत पाटीतला कांदा घेऊन बुक्कीने ठेचून होई. जेवणाबरोबर त्या फोडलेल्या कांद्याला न्यारीच चव येई. मग सगळ्यांचे जेवण उरकून थोडा वेळ बसले की सगळे औतकरी पुन्हा जमीन उसवायला भिडत.
गाव दुपारच्याला तसे ओसाड झाल्यासारखे दिसे, सुतारांची ठक ठक, आणि लोहाराच्या घणाचा आवाज तेवढा येत राही. दारावरून जाणाऱ्या एखाद्या पाहुण्याला मग तो अनोळखी का असेना, रामराम घालून, "ऊन लई झालंय, वाईच या सावलीला, पाणी घ्या" म्हणून घरात बोलावले जाई. पाणी दिल्यावर जेवणाचाही फार आग्रह होई. इकडची तिकडची विचारपुस्त होई. मग पाहुण्याच्या गावाच्या आपल्या मित्रा अथवा नातेवाईकांना राम राम सांगा असे म्हणून थोडा उन्हाचा कडाका कमी झाल्यावर पाहुण्याला निरोप देण्यात येई. शाळेतून आल्यावर जेवून खेळता खेळता खूप भांडून पोरे झोपून गेलेली असत. तर काही थोडी मोठी पोरे नदीवर पोहायला, विटीदांडू खेळायला निघून जात.
सूर्य मावळतीला कलताना परत गावाची लगबग चालू होई. गावभराच्या घरांवर पुन्हा एकदा धुराची एक रुंद पट्टी पसरत जाई. अंगणांत पोरांचे खेळ रंगलेले असत. लांबवर बगळ्यांचा बाण आकाशातून झेपावतांना नजरेस पडे. थोड्याच वेळात आपल्या गळ्यातल्या घंटांची खणखण घेऊन एकामागून एक मोठमोठे गुरांचे कळप गावात शिरत. सकाळी घर सोडून रानात जातांना गुरे सावकाश चालत जात मात्र संध्याकाळी मागून धावणाऱ्या गुराख्याची तारांबळ उडवीत सगळी गुरे पळत पळतच गावात शिरत. एकामागून एक लोंढे गावात येत. वेशीपासूनच हंबरडे फोडून गायी गोठ्यांतल्या आपल्या वासरांना आपण आल्याची सूचना देत. त्याला प्रतिसाद म्हणून गोठ्यांतूनही दावणीला उगीच झटत वासरे हंबरडा फोडीत. प्रत्येक लोंढ्याबरोबर तो गुरांचा एक आल्हाददायी वास गावाला कवेत घेई, तो पायरव, घंटानाद यांनी कान भरून जात, आणि मातीच्या रस्त्यावर एकाच वेळी धावत चाललेल्या शेकडो खुरांच्या खालून उडणारी धूळ घरांवरच्या धुरात मिसळून गाव, आकाश, डोंगर हे सारे क्षणभर हरवून गेल्यासारखा भास होई.
आज प्रचंड गर्दीतून वाट काढीत, लोकलचा खडखडाट व वाहनांचे कर्कश हॉर्न कानात ओतून आणि कित्येक नळकांड्यानी हवेत सोडलेला धूर नाकात, डोळ्यात भरून कसाबसा घरात पोचतो ना, तेव्हा डोळ्यांपुढे दाटून आलेल्या विषण्णतेच्या शेकडो शून्यांच्या वर्तुळांत संध्याकाळच्या त्याच गाव हरवून जाण्याच्या विलोभनीय क्षणांना मन शोधत राहते.
आज प्रचंड गर्दीतून वाट काढीत, लोकलचा खडखडाट व वाहनांचे कर्कश हॉर्न कानात ओतून आणि कित्येक नळकांड्यानी हवेत सोडलेला धूर नाकात, डोळ्यात भरून कसाबसा घरात पोचतो ना, तेव्हा डोळ्यांपुढे दाटून आलेल्या विषण्णतेच्या शेकडो शून्यांच्या वर्तुळांत संध्याकाळच्या त्याच गाव हरवून जाण्याच्या विलोभनीय क्षणांना मन शोधत राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा