हा ब्लॉग शोधा

सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

ज्युवेल ऑफ द ओशियन

लंगर उचलले आणि इंजिनाच्या घरघरीत आपल्याला निरोप द्यायला आलेल्या लोकांना बाय बाय करण्यासाठी हजारो प्रवाशांनी डेकवर एकच गिलका केला. शेवटच्या क्षणी नशिबाने तिकीट मिळविलेला जॅक डॉसन आणि त्याचा मित्र हेनरी हे दोघे उगीचच धक्क्यावर उभ्या असलेल्या हजारो अनोळखी चेहऱ्यांकडे फ्लाईंग कीस फेकून त्यांना टाटा करीत राहीले. थोड्याच वेळात टायटॅनिकच्या चारही धुराड्यांतून भक भक करत धुराचे मोठे लोट आकाशात एक काळी रेष आखत पुढे पुढे जाऊ लागले. हळूहळू बंदरातले लोक आणि थोड्यावेळाने मग किनाऱ्यालगत लांबच लांब पसरलेले साउदम्पटनही दिसेनासे झाले. डेकवरचे सगळे लोक आता आत आपापल्या कम्पार्टमेंट्समध्ये गेले. फक्त तेवढा जॅक डॉसन आणि हेनरी असे दोघेच तिथे उरले. जॅकने हेनरीला हसून विचारले, "काय रे? तू कुणाला बाय करत होतास इतका वेळ? तुला विचारणारे कुणीतरी आहे काय साउदम्पटनमध्ये?" "अरे असे कसे म्हणतोस तू? माझ्या शंभराने गर्लफ्रेंड पडल्यात त्या शहरात. त्यातलीच माझी आताची लेटेस्ट गर्लफ्रेंड आली होती निरोप द्यायला. तिला बाय करण्यासाठी एवढा वेळ लागणारच ना?"
"अच्छा अरे पण मी तर तुझ्या ओळखीची कुणीही मुलगी नाही पाहीली तिथे."
"अरे यार ती नव्हे का त्या आलिशान गाडीतून उतरली, आणि मग डाव्या बाजूला केबीनच्या गॅलेरीत जाउन उभी राहिली, ऊन येत होते म्हणून नाही का तिच्यामागे एकजण छत्री घेऊन उभा होता. ती नाजूक परीसारखी दिसणारी, तीच तर होती माझी गर्लफ्रेंड आणि तिथे मलाच तर निरोप द्यायला आली होती."
"कोण ती पांढऱ्या रंगाच्या गाउन आणि पिंक हॅटमधली मुलगी? अरे बाबा तिला मी ओळखत नाही असे कसे होईल? सगळे साउदम्पटन ओळखते तिला. राजकन्याच आहे म्हण ना साउदम्पटनची. तिचा बाप ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत दहा लोकांपैकी एक आहे. त्याला म्हणे आफ्रिकेत एक सोन्याची खाण हाती लागली आहे. नुसती श्रीमंतच नाही तर शहरातली सर्वात सुंदर मुलगी आहे ती. तिला मिळविण्याचे भाग्य हे केवळ राजघराण्यातल्याच कुणा राजकुमाराचे. आपल्यासारख्या रोडरोमिओंना ती नुसती बघायला मिळणे हे ही भाग्याचे आहे, आपल्याला अशा मुली फक्त स्वप्नातच मिळू शकतात, समजले? म्हणे माझी गर्लफ्रेंड." हेनरी यावर मनसोक्त हसला, आणि जॅकशी टाळी घेत म्हणाला, "खरेच यार अशी पोरगी किमान एक दिवसासाठी तरी मिळाली तर किती धमाल येईल नाही? च्यायला फक्त एकदा अशी एखादी मिळाली की मग दुसऱ्याच क्षणी मी आनंदाने मरायला सुद्धा तयार आहे."
"असू द्या असू द्या, खयाली पुलाव पकवू नका राजे, चला आपल्या बर्थ ताब्यात घेऊ आता. कुणा आंटीने तिच्या रडक्या पोरांसाठी त्या बळकावल्या तर अमेरिकेपर्यंत डेकवरच बसून जावे लागेल आपल्याला." जॅक असे बोलताच मग दोघेही थर्ड क्लासच्या कम्पार्टमेंट्सकडे पळाले.

या दिवसानंतर चौथ्या दिवशी हेनरीने जॅकला गाठले, आणि म्हणाला, "अरे कुठे गायब असतोस? त्या दिवशी डेकवर भेटलास तेव्हापासून परत दिसला नाहीस. मी तुझ्या बर्थवर रोज येउन पाहत होतो. पण तू भेटलाच नाहीस. काय भानगड काय? काही लफडा तर नाही ना बॉस?"
"काय सांगू यार तुला, मला माझ्या जीवनाचे खरे प्रेम मिळाले आहे."
"काय बोलतोस? कोण आहे ती? कुठल्या कम्पार्टमेंटमधली आहे? मी पाहिलेय आमच्या शेजारच्या D-6 कम्पार्टमेंटमध्ये नर्सेसचा एक ग्रुप आहे, काय एकाहून एक सुंदर पोरी आहेत तुला सांगू, असे वाटते की आयुष्यभर आजारी पडावे आणि त्यांचेकडून सेवा करून घ्यावी. त्यांतलीच कुणी तर नाही ना पटली तुला? ती सेक्सी, कमनीय, हॉट, ब्लॉंड कॅथरिन तर नाही ना पटविलीस? ती पोरगी काय माल आहे यार..!!" हेनरीने डावा डोळा मिचकावीत विचारले. "आणि जर तुला ती पटली असेल तर दुसऱ्या एखादीशी माझीही ओळख करून द्यायला सांग ना तिला. सगळ्याच अत्यंत सुंदर आणि हॉट आहेत. मला तर कोणतीही चालेल."
"च्यायला साल्या तू सुधारणार नाहीस. मी खरे बोलतोय, खरेच मला माझे खरे प्रेम मिळाले आहे. रोझ नाव आहे तिचे. जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे ती."
"रोझ? पण मी तर थर्ड क्लासमधल्या सगळ्या सुंदर मुलींचे बायोडाटा काढलेत. रोझ नावाची तर कुणीच नाही. ती सेकंड क्लासमधली आहे की काय कुणी?" हेनरीने जॅकला कोपरखिळी मारत विचारले. 
"नाही ती फर्स्ट क्लास मधली आहे." जॅक असे बोलल्यावर हेनरी थोडावेळ एकदम गप्प झाला आणि मग जोरात हसत म्हणाला. "राजे आता तुम्ही खयाली पुलाव पकविणे बंद करा. फर्स्ट क्लासची आयटम थर्ड क्लासच्या रोडरोमिओंच्या नशिबात नसते. आपण फक्त बघून आनंद लुटायचा. तूच बोलला होतास ना की अशा मुली आपल्यासारख्यांना फक्त स्वप्नातच मिळू शकतात?"
"हे स्वप्नवत आहे हे मलाही मान्य आहे, पण माझ्या कोणत्या पूर्वजाने मोठे पुण्य केले होते कुणास ठाऊक, की ज्यामुळे मला एवढी सुंदर ललना तिच्या प्रेमासकट मिळालीय."
"तू खरे सांगतो आहेस?"
"होय अरे देवाशप्पथ. हे बघ आजच मी तिचे एक स्केचसुद्धा काढले आहे." असे म्हणून जॅकने त्याला आपल्या स्केचबुकात ठेवलेले एक स्केच दाखवले. हेनरी ते पाहून थोडावेळ स्तिमितच झाला. अरे हिला मी पाहिली आहे. नितांत सुंदर तरुणी आहे ही.!! अफाट सौंदर्य लाभले आहे तिला. पहिल्या दिवशीच डेकवर दिसली होती. मात्र देवाने एवढे समरसून सौंदर्य दिलेले असूनही उगीच उदासशी भासत होती. या स्केचमध्ये मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा ओसंडून वाहताना दिसतो आहे. हा तुझ्या कलेचा परीणाम आहे की प्रेमाचा?" जॅक हसला. "खरे सांगतो जॅक हिला स्केचमध्ये असे निर्वस्त्र पाहूनचही आयुष्यात पहिल्यांदा मला तिच्याविषयी तुला कोणताही चावट प्रश्न विचारावासा वाटत नाहीये. पण मला एक सांग या नखशिखांत दैवी सौंदर्यालाही ज्याचा मोह सुटला नाही असे तिच्या फक्त गळ्यात उरलेले हे कोणते एकमेव विशेष आभूषण आहे?"
"ते ना? अरे तो एक हार आहे, ज्युवेल ऑफ द ओशियन..!! त्यात जो हिरा आहे ना तो आहे भारताच्या गोळकोंडा खाणीत मिळालेला जगातला सर्वाधिक किंमतीचा हिरा.!! पण तुला एक सांगू? असेना का तो जगातला सर्वात मौल्यवान हिरा, रोझसारख्या सौंदर्यरत्नापुढे मला तो कस्पटासमानच."
"हो रे. खरे सांगतो मला जर अशी गर्लफ्रेंड मिळाली ना तर कुणी मला इंग्लंडचे राज्य देऊ केले तरी मी ते राज्य नाकारीन पण तिला त्यागणार नाही. तू भाग्यवान आहेस लेका."
"खरे आहे मित्रा, आज मला रोझच्या प्रेमाने, तिच्या सुगंधी सहवासाने, तिच्या रेशमी स्पर्शाने जी सुंदर अनुभूती दिली आहे ना, त्या मोबदल्यात उद्या माझे प्राण गेले तरी मला तीळमात्रही वैषम्य वाटणार नाही. आज माझ्या जन्माचे सार्थक झालेले आहे."

दुसऱ्या दिवशीही हेनरीला जॅक दिसला नाही. तो रोझबरोबर असेल हे हेनरीने ओळखले. कुठेतरी त्याच्या मनात जॅकविषयी थोडीशी असूयाही उमटून गेली. कर्माने करंटा असूनही नशिबाने राजा निघाला साला.!! दिवस आता कलतीला लागून बराच वेळ झाला होता. हळूहळू जहाज पश्चिमेला पाण्यात वितळत जाणाऱ्या सूर्याकडे आगेकूच करत होते. थोड्याच वेळात समुद्राने सगळा सूर्य गिळून घेतला, आणि संपूर्ण अंधारात गुडूप झालेल्या समुद्रात मग आकाशात उमलू लागलेल्या ताऱ्यांना सोबत म्हणून जहाजावरचे दिवेही मंद मंद लुकलुकू लागले. हेनरी कॅंटीनकडे निघाला, जॅक काही भेटणार नाही हे त्याला ठाऊक होते. तो डेकवरून एक मजला उतरून खालच्या कॉरीडॉरमधे आला. डावीकडच्या जिन्याने अजून दोन मजले उतरून गेले की थर्ड क्लासचे कॅंटीन होते. हेनरी तिकडे जाण्यासाठी डावीकडे वळला तोच मागून त्याला काहीसा गोंधळाचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिले तर जहाजाचा सिक्युरिटी चीफ दोन गार्ड्सबरोबर जॅकचे हात बांधून त्याला कुठेतरी घेऊन चालला होता. बहुदा जॅकचे आणि रोझचे बिंग फुटले असावे आणि आता हे लोक रात्रीच्या अंधारात त्याला समुद्रात फेकून देण्यासाठी घेऊन चालले असावेत अशी शंका हेनरीला आली. तो मग गुपचूप लपत लपत त्यांचा पाठलाग करू लागला. ते जॅकला घेऊन एका अडगळीच्या खोलीत शिरले. हेनरीने तिथेच दरवाजाजवळच्या फर्निचरआड लपून त्यांचा कानोसा घेतला. आतमध्ये सिक्युरिटी चीफ जॅकला बेदम मारत होता आणि हार कुठे आहे असे विचारीत होता. जॅक हार माझ्याकडे नाही आणि मला त्याबद्दल काही माहीतीही नाही असे म्हणत होता. चीफ त्याच्या प्रत्येक नकाराबरोबर त्याला अजून मारीत होता. बराच वेळ झाला पण जॅक काही सांगत नाही हे पाहून चीफ गार्ड्सना म्हणाला, त्याची परत एकदा झडती घ्या. गार्ड्सनी जॅकची परत झडती घेतली पण त्यांना काहीही मिळाले नाही. मग चीफने जॅकच्या हातात बेडी लावून त्याला त्याच खोलीतल्या एका खांबाला गुंतवून टाकले. आणि गार्ड्सला म्हाणाला की आता त्याच्या बर्थची आणि सामानाची झडती घ्या. हार मिळेपर्यंत या चोराला राहू देत इथेच. त्यानंतर त्याला समुद्रात फेकून देऊ. असे ठरवून मग ते सगळेजण तिथून निघून गेले. आता हेनरी फर्निचरआडून बाहेर आला आणि त्या खोलीत गेला. जॅकच्या हाताला बेडी बांधलेली होती. हेनरीने ती खोलण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमेना. तो जॅकला म्हणाला, "काय झाले? ते तुझ्याकडे कोणता हार शोधत होते? भानगड काय आहे? तू ज्युवेल ऑफ ओशियन चोरला तर नाहीस ना?" जॅक म्हणाला, "नाही रे मी असे कसे करेन? मी तो चोरला नाही तर रोझने तो माझ्याकडे दिला आहे."
"काय? मग तू कुठे ठेवलास त्याला?"
"अरे तो माझ्याकडेच आहे."
"कुठे आहे? पण त्यांनी तर तुझी झडती घेतली होती ना?"
"अरे आपण ब्रिटनच्या पोलिसांना इतक्या वेळा चकमा दिलाय तिथे हे जहाजाचे गार्ड कोण? हे बघ या माझ्या बेल्टच्या आत एक चोरकप्पा आहे. तो हार त्यातच आहे. एक काम कर, तू हा काढ आणि रोझला फर्स्ट क्लासच्या  A-11 कम्पार्टमेंट मध्ये जाउन गुपचूप देऊन ये. नाहीतर यांना तो माझ्याकडे सापडला तर मला ते समुद्रात फेकून देतील. रोझने हार सापडल्याचे त्यांना सांगितले की मग ते मला इथे येउन सोडून देतील. ठीक आहे?" हेनरीने मान डोलावली. तो हार त्याने जॅकच्या कमरेवरच्या बेल्टच्या चोरकप्यातुन काढून घेतला आणि मी रोझला हा देऊन परत येतो असे सांगून तो बाहेर पडला.
हार घेऊन हेनरी फर्स्ट क्लासच्या मोस्ट एलाईट सूट्सच्या A विंगकडे जाऊ लागला. मात्र कुणी थर्ड क्लासचा प्रवासी एलाईट सूट्सकडे एवढ्या सहज कसा जाऊ शकेल? त्याला दरवाजावरच एका गार्डने अडविले. हेनरीने त्याला खूप गयावया केले मात्र तो काही केल्या ऐकेना. मग हेनरीने शेवटी एक चिट्ठी लिहिली. आणि त्यात रोझला जॅक कुठे बंद आहे ते सांगितले. तिथे येउन त्याला सोडव असे लिहून त्याने गार्डकडे ती चिठ्ठी दिली आणि निदान एवढी चिठ्ठी तरी A-11 मध्ये रोझला दे अशी विनंती केली. त्याने मुद्दाम चिठ्ठीत हाराचा काही उल्लेख केला नाही. न जाणो गार्ड अथवा चीफने ती वाचली तर? म्हणून फक्त जॅक कुठे बंदिस्त आहे तेवढा पत्ता देऊन तो निघाला. त्याने ठरविले की आता जॅककडे जाऊ आणि त्याला सोडविण्याचा प्रयत्न करू. मात्र तो एलाईट सूट्सकडून निघून थोडावेळ तिथेच बाहेर घुटमळला. जर चुकून रोझ बाहेर आली तर तिला प्रत्यक्षच भेटू असा विचार करून डेकवरच बसला. पण रोझ काही बाहेर आली नाही. थोड्या वेळाने मग हेनरी डेकवरून खाली बेसमेंटला जॅककडे जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात अचानक जहाजाला एक फार मोठा झटका बसला. हेनरी कोलमडून खाली पडला. त्याचे डोके डेकवरच्या कुठल्याशा वस्तूवर आदळून तो तिथेच बेशुद्ध झाला.  

हेनरी कितीवेळ बेशुद्ध होता कुणास ठाऊक, पण जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो एका मोठ्या लाकडी दरवाजावर समुद्रात कुठेसा तरंगत होता. आजूबाजूला टायटॅनिकचे कुठे दूरदूरपर्यंत नामोनिशानही दिसत नव्हते. त्याला नेमके काय झालेय ते कळेना. जहाजाला मोठा धक्का बसला आणि आपण पडलो एवढेच त्याला आठवत होते. नेमके जहाजाला काही झाले की आपल्याला समुद्रात फेकण्यात आले हे त्याला कळेना. पण आपल्याला कशाला समुद्रात फेकतील? अरे हो तो हार, तो हार तर सापडला नाही ना त्यांना माझ्याकडे? त्याने खिसा चाचपून पाहीला, हार तिथेच होता. म्हणजे नक्कीच जहाज बुडाले असणार. म्हणून तर आपल्याला हा तुटलेला दरवाजा मिळाला. जहाज बुडाले असेल या विचारासरशी त्याला जॅकची आठवण आली. तो वाचला असेल काय? रोझ वाचली असेल काय? आपण वाचू शकतो काय? असा विचार तो करू लागला. शुद्धीवर आल्यानंतरही दोनेक दिवस तो तसाच त्या दरवाजावर समुद्रात दिशाहीन भरकटत राहीला. पहिल्या दिवशी त्याने खूप धुसफूस केली, हातांनीच उगीच पाणी इकडून तिकडे वल्हवित राहिला. पण समुद्रात दिशाच समजत नसल्याने आपण नेमके एखाद्या ठराविक दिशेला जात आहोत की तिथल्या तिथेच गोल गोल फिरत आहोत हेही त्याला समजायला मार्ग नव्हता. नंतर त्याच्या अंगातले त्राण संपले. त्याला आपण आता जगणार नाही असे वाटू लागले. आपण कितीही प्रयत्न केले तरीही आता आपले जगणे हे केवळ देवाच्या हाती आहे. त्याला हवे असेल तर तो वाचवेल आणि नसेल तर आपण काहीही केले तरी वाचू शकत नाही असे त्याच्या मनात आले. बहुदा आपण मरावे असेच देवाने ठरविले असावे असा विचार त्याच्या मनात आला आणि मग तो निपचित पडून राहिला. तिसऱ्या दिवशी उजाडले तेव्हा चेहऱ्यावर ऊन पडताच हेनरीला जाग आली. त्याने पडल्या पडल्याच आजूबाजूस पाहिले तर त्याला पूर्वेकडे एक किनारा दिसला. जमीन पाहून त्याला असे वाटले की जणू काही त्याच्या आयुष्याचाच हा नवा सूर्योदय होतो आहे. त्याच्या अंगात नवे बळ संचारले, जगण्याची आशा पल्लवित झाली, आणि तो झपाझप हाताने वल्हवित किनाऱ्याकडे निघाला.  

हेनरीने पाहिलेल्या ब्रिटनच्या अनेक किनाऱ्यांपेक्षा कितीतरी निराळा होता हा किनारा. पांढरी शुभ्र मऊशार वाळू, गडद निळे आणि थेट तळ दिसेल एवढे स्वच्छ पाणी. किनाऱ्यालगतच नारळाची फळांनी लगडलेली कितीतरी दाट झाडे. थोडे पुढे केळींचे वृक्ष, आणि मग त्यापलीकडे नजर पोचेपर्यंत पसरलेले अत्यंत विशाल घनदाट जंगल. बहुदा या बेटावर पोचलेले आपण एकमेव आणि पहिलेच मानव असू असे हेनरीला वाटले. कदाचित इथे हिंस्र श्वापदे असतील तेव्हा थोडे सांभाळूनच जायला हवे हा विचारही त्याच्या मनात आला. त्या लाकडी दरवाजावरून किनाऱ्यावर उतरताना त्याला वाटले की न जाणो कदाचित इथून परत जाण्यासाठी तो उपयोगात येईल, म्हणून तो खाली उतरून दरवाजाचे हॅंडल धरून त्याला किनाऱ्याकडे ओढू लागला, पण एक जोरात हिसका दिल्याने ते हॅंडलच तुटून त्याच्या हातात आले, तरीही एका बाजूला पकडून परत जाणाऱ्या लाटेसरशी आत पाण्यात ओढला जाणारा तो दरवाजा हेनरीने ओढून बाहेर काढलाच.  आता त्याला प्रचंड भूक आणि तहान लागली होती. त्याने  समोरच्या खाली झुकलेल्या एका नारळाच्या झाडावरून चारपाच नारळ तोडले आणि त्या हॅंडलचा चाकूसारखा उपयोग करून ते छिलून त्यांतले पाणी प्याला. थोडे पुढे त्याला केळी दिसल्या. त्याने एक पिवळाजर्द घड तोडून घेतला आणि पुढे एका झाडाच्या सावलीत ते खात खात बसला. पोट भरल्यावर मग त्याने तिथेच छोटीशी डुलकी घेतली. त्याला जाग आली तेव्हा मध्यान्ह नुकतीच ढळली होती. आता काही तासांनी रात्र होईल तेव्हा अंधारात झोपण्यासाठी व श्वापदांपासून वाचण्यासाठी एखाद्या उंच जागेवर मचाणासारखे काहीतरी बनवून ठेवावे असा विचार त्याच्या मनात आला आणि तो लगेच त्या कामाला लागला. संध्याकाळ होईपर्यंत त्याने किनाऱ्यापासून थोडे आत एका छोट्या टेकडीवर शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच झाडांवर तो दरवाजा आडवा अडकवून एक बऱ्यापैकी मचाण तयारही केले. दिवस ढळेपर्यंत तो मचाण बांधतच होता. ते मनाजोगते पूर्ण झाल्यावर त्याने परत केळी खाल्ली, नारळातले पाणी पिले आणि मग तो थोडा पहुडला.

सूर्य मावळून बराच वेळ झाला होता. आजूबाजूला किर्र अंधार होता. रातकिड्यांची किरकिर सुरु झाली होती. मधून मधून जंगली श्वापदांचे कसलेसे आवाजही येत होते. मात्र आजूबाजूला काही म्हणजे काहीच दिसत नव्हते. हेनरीला कधी नव्हे इतके भयाण एकटे वाटू लागले. त्याच्या डोक्यात भीतीचे थैमान चालू झाले. त्याच्या कानात त्या जंगलाच्या आवाजाव्यतिरिक्तही किंकाळयांसारखे कित्येक आवाज जोरजोरात वाजू लागले. त्याला आजूबाजूचा एवढा काळाकुट्ट अंधार सहन होईना. डोळे मिटले आहेत की नाहीत हेही समजू नये एवढा त्याचा भोवताल काळवंडून गेलेला होता. हेनरीला फियर ऑफ अननोनने पछाडले. तो प्रचंड अस्वस्थ झाला. वेळ पुढे जातच नाहीये की काय असे त्याला वाटले.  त्याला वेगवेगळे भीतीदायक भास होऊ लागले. समुद्रातही तो दोन रात्री एकटा होता मात्र तिथे शांतता होती. हे असे भयावह आवाज नव्हते. आणि अशा कर्कश गूढ आवाजांच्या पार्श्वभूमीवर इथल्यासारखी नुसती स्वत:च्याच श्वासांच्या आवाजाने देखील धडकी भरत नव्हती. त्याला काही सुचेना, झोप तर काही केल्या येईना. मग तो बळेबळे डोळे मिटून जरावेळ निपचित पडला. थोडा वेळ गेला असावा. आणि त्याला अचानक एकही आवाज ऐकू येईनासा झाला. मघाशी त्या आवाजांनी अस्वस्थ झालेला हेनरी या आवाजशुन्य स्थितीने अधिकच कासावीस झाला. त्याने डोळे अजून घट्ट मिटले. आता हलकेसे वारे वाहू लागले होते. मग त्याला अचानक मधून मधून हलकासा वाद्यसंगीताचा आवाज येऊ लागला. बहुदा आपल्याला वेड लागले असावे अशी त्याची खात्री पटली. त्याने हातांनी दोन्ही कान दाबून घेतले आणि तो आवाज बंद झाला. थोड्या वेळाने त्याने कानावरचे हात काढले. त्याला आता रातकिड्यांची किरकिर पुन्हा स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्याने जोरजोरात श्वास घेतले. एक वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्याला थोडे बरे वाटले. पण परत परत त्याला वाद्यसंगीताचा आवाज ऐकू येऊ लागला. त्याने डोळे उघडले. मग त्याच्या लक्षात आले की वारे डाव्या बाजूने आले तरच त्याला तो आवाज ऐकू येतो आहे. त्याने त्या दिशेकडे डोळे फिरविले. त्याला त्या दिशेला आकाश दुरवर हलकेसे तांबडे झाल्यासारखे दिसले. त्याला मोठे नवल वाटले. तो तांबडा प्रकाश हळूहळू कमी होई आणि मग खूप कमी झाला की अचानक पुन्हा मोठा होई. आणि तिकडून वारे आले की त्याला पुन्हा ते संगीत ऐकू येई. त्याने विचार केला की कुणास ठाऊक पण कदाचित हा आभास नसावा. तिकडे त्या उजेडाच्या दिशेला नक्कीच एखादी मानवी वस्ती असावी. आणि तिथेच हे वाद्यसंगीत वाजविले जात असावे. या विचारासरशी तो आकाशात पसरलेला तांबडा रंग आणि ते संगीताचे आवाज यांनी त्याला अधिकच बरे वाटू लागले. तिकडे जायचेच असे त्याच्या मनाने ठरविले. पण भोवताली कुट्ट अंधार होता. त्यामुळे आता जाणे शक्य नाही हे त्याला कळले. सकाळी उजाडताच त्या दिशेला जायचे असे त्याने ठरविले. पण मग ती दिशा कोणती हे सकाळी कसे समजेल? त्याने बरोबर घेतलेला केळाचा घड मचाणाच्या त्या दिशेला सरकावून ठेवला. उद्या सकाळी त्या घडाच्या दिशेलाच दूरपर्यंत जाउन बघायचे असे त्याने ठरविले. आता त्याची भीती कुठल्या कुठे निघून गेली आणि तो आनंदाने झोपी गेला.

दुसऱ्या दिवशीची सकाळ अत्यंत प्रसन्न होती. हेनरी उठला तेव्हा पाखरांनी किलकिलाट करून उच्छाद मांडला होता. खूप वेगवेगळे रंगीत पक्षी. त्याला फक्त तितर तेवढे ओळखता आले. बाकी पक्षी त्याने कधीही पाहिले नव्हते. कालचा त्याचा सगळा दिवस केवळ मचाण बांधण्यात गेला होता त्यामुळे त्याने आजूबाजूस तेवढेसे लक्ष देऊन पाहिले नव्हते. थोडे पुढे गेल्यावर त्याला अत्यंत विशाल वृक्ष दिसले. सगळ्या झाडांची पाने अगदी गडद हिरवी होती. हवेत एक कुंद गारवा होता. सगळ्या जंगलावर वेलींची घनदाट जाळी पसरलेली होती. मधूनच त्या जाळीतून एखादा चोरटा किरण जमिनीपर्यंत पोचत होता. हवेत अत्यंत ताजेपणा होता. त्याला कधी नव्हे एवढे फ्रेश वाटत होते. बराच वेळ चालत असूनही अजिबात थकवा जाणवत नव्हता. किती वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष होते तिथे. इंग्लंडमध्ये असतानाही हेनरी कधी जंगलात गेलाच नव्हता. त्यामुळे हे सगळे त्याचेसाठी अत्यंत नवखे होते. काही झाडांवर वेगवेगळी फळे लागलेली होती. एका झाडाच्या तर खोडावरच मोठमोठी फुटबॉलसारखी गुळगुळीत अन गोल फळे लागलेली होती. जवळ जवळ प्रत्येक झाडाच्या खोडावर, फांद्यांवर शेवाळासारखे हिरवे आवरण होते. मधून मधून एखादी खार समोरून पळत जाई, एका ठिकाणी तर त्याला एक उदबिलावही दिसले. उदबिलाव हेनरीने आधी फक्त चित्रातच पाहिले होते. असे कित्येक छोटे छोटे प्राणी पक्षी त्याने तिथे पाहिले ज्यांची नावेही त्याला ठाऊक नव्हती. हेनरी एका दिशेचा उद्देश ठेऊन तिकडेच चालला होता. दिशा चुकू नये म्हणून लांब असलेल्या एका डोंगराच्या सुळक्यावर तो लक्ष ठेऊन होता. आणि त्याच्याच संदर्भाने योजित दिशेकडे चालत होता. त्याच्या अंदाजानुसार एव्हना तो त्या रात्रीच्या उजेडाच्या आणि संगीताच्या जागेपर्यंत पोचायला हवा होता. आपण चुकलो तर नाही ना असे त्याला वाटले. पण त्याला आपल्या अंदाजाची खात्री होती. मधेच एकदा तो थोडा थबकला. त्याच्या मनात आले, जर खरेच इथे माणसे असतील, तर कशावरून ते आपले स्वागतच करतील? त्याने अशा बेटांच्या अनेक कथा ऐकलेल्या होत्या, काय घ्यावे कदाचित ही माणसे आपल्याला भाजूनही खातील. हा विचार येताच तो क्षणभर थबकला. मग त्याला त्याची रात्रीची मनस्थिती आठवली. छे तसे एकांतात भीतीने मारण्यापेक्षा इथल्या माणसांच्या हातून मरणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल. तसे एकांतात भीत भीत मरण्यापेक्षा हेच बरे. तसेही इथे माणसे असतील तर ती आपल्याला मारतीलच कशावरून? इथे माणसे भेटली तर जगण्याची एक आशा तरी आहे. भलेही त्यांची भाषा आपल्याला येत नसेल, पण संवाद तर मुकी माणसे सुद्धा साधतातच की. असा विचार करून मग त्याने मनातली शंका झटकून टाकली आणि तो पुढे निघाला.

अजून थोडेच पुढे गेल्यावर त्याला एक मोकळा प्रदेश दिसला. अतिशय आखीव गवताचे पट्टे त्या संपूर्ण प्रदेशावर पसरलेले होते. मधून मधून काही झाडे होती, पण तीही एका नियोजनबद्ध रीतीने कुठलीशी भूमिती साकारत आहेत असे जाणवत होते. पलीकडे एक डोंगर होता. त्या डोंगरावर एक अतिशय सुंदर अशी इमारत बनलेली होती. पूर्णत: पांढऱ्या रंगाची. तिचे घुमट अतिशय गोलाकार असून त्यांच्या मधून अनेक मिनार वरती झेपावत होते. त्या टेकडीच्या खालीही बरीच घरे होती. सगळी अतिशय कोरीव.!! जवळ जवळ सगळ्याच घरांची छते घुमटाची होती. निदान ती घरे पाहून तरी अशी सुंदर घरे बांधणारी माणसे आपल्याला जीवे तरी मारणार नाहीत याची हेनरीला खात्री पटली. तो थोडा पुढे गेला, त्याला आता त्या नगराचा दरवाजा दिसत होता. नगराला तटबंदी नसली तरी एक खूप सुंदर कमानीचे प्रवेशद्वार मात्र होते.  थोड्या थोड्या अंतरावर बहुतेक टेहाळणीसाठी उंच अशा चौक्या बनविलेल्या होत्या. प्रवेशद्वार जरी असले तरी तिथे कुणीही रखवालदार वगैरे नव्हता. नगरात फार गजबज असणार असे प्रथमदर्शनी जाणवत होते. हेनरी अचंबित झाला होता, थोडा आनंदीही होता, अन त्याचबरोबर त्याचे मन काहीसे साशंकही होते. आजूबाजूचे निरीक्षण करता करता तो प्रवेशदाराजवळ आला.  तेवढ्यात त्याला पाठीमागून काहीसा आवाज आला. त्याने वळून पाहिले तर मागे थोड्या अंतरावर एक स्त्रियांचा घोळका नगरात जाण्यासाठी येत होता. त्या स्त्रियांना जवळ येताना पाहून हेनरी त्यांस वाट देण्यासाठी अदबीने रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. त्या थोड्या जवळ आल्या तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्यांनी अंगावर वस्त्रे घातलेली नसून केवळ काही दागिनेच घातलेले आहेत. त्या स्त्रिया जवळ आल्या, त्यांनी कडेला उभ्या असलेल्या हेनरीकडे विचित्र नजरेने पाहिले, आणि आपसांत काहीतरी कुजबुजत, त्या प्रवेशदारातून आत गेल्या. खरेतर हेनरीने त्यांना येताना पाहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले होते, मात्र त्यांना पाहून तो अवाक होण्यापलीकडे काहीच करू शकला नाही. लाखो कॅथरिन आणि हजारो रोझ फिक्या पडतील एवढी त्यातली प्रत्येक स्त्री सुंदर होती. चेहरा, अंगयष्टी, केस, हात, पाय सगळे अफाट सुंदर होते. शरीराचा कण अन कण केवळ परिपूर्ण याच संकल्पनेने वर्णिता येईल असे ते दिव्य देह होते. एवढ्या मोठ्या घोळक्याने एवढे अलौकिक सौंदर्य आपल्या जवळून गेलेले पाहून कितीतरी वेळ हेनरी अचंब्यातून येणाऱ्या शून्यपणात हरवून गेला. त्याच्या अंगावर सरसरून काटा उठला होता.  त्या स्त्रिया निघून गेल्यावर खूप वेळाने तो भानावर आला, जेव्हा त्याला स्वत:ची जाणीव झाली तेव्हा त्याच्या अंगावर पुन्हा शहारे उठले. स्वत:ची जाणीव होणेही एवढे रोमांचकारी असू शकते ही अनुभूती त्याच्यासाठी नवी होती. आपण स्वर्गात तर पोचलो नाही ना अशी एक शंका त्याच्या मनाला चाटून गेली. आता भानावर येऊनही त्याची पावले त्या दरवाजातून आत जाण्यास धजेनात. एवढे अफाट सौंदर्य जगात असू शकते? आता या शहरात अजून काय काय वाढून ठेवले असेल या विचारानेच हेनरीचे मन आत जायला तयार होईना. बराच वेळ अशा द्विधेत गेल्यावर शेवटी एकदाचा मनाचा ठिय्या करून हेनरी आत जायला निघाला. 
ते अजब नगर होते, प्रवेशदारापासून वर्तुळाच्या त्रिज्येसारखे एकाच बिंदुतून आठ सरळ रस्ते वेगवेगळ्या दिशांना समांतर आणि समानांतर गेलेले होते. घरांची रचना दोन रस्त्यांच्या मधल्या त्रिकोणी भागात अशी केलेली होती की प्रवेशदारातून प्रत्येक घराचा दरवाजा स्पष्ट दिसत होता. पलीकडच्या बाजूला एक डोंगर होता आणि त्या डोंगरावर बरोबर मधल्या रस्त्याच्या रेषेवर हेनरीला लांबून दिसलेली ती भव्य पांढरी इमारत उभी होती. एकाही घराच्या दरवाजास दारे नव्हती. केवळ मुख्य आठ रस्त्यांच्या कडेलाच घरे होती. दोन रस्त्यांच्या उर्वरित मधल्या जागेत, रथासारखी पण खूप नाजूक वाहने ठेवलेली होती. त्याच जागेत घोडे, हरीणे, सांभरे, ससे, हत्ती अशा विविध प्राण्यांची वेगवेगळी दालने होती. मोर आणि हरीणांची पाडसे अशीच रस्त्यावर, घरांतून इतस्तत: फिरत होती. त्यांचेबरोबर छोटी छोटी मुले खेळत होती. मोठी माणसेही फक्त इकडून तिकडे फिरत होती. त्यांतल्या कुणाचेही हेनरीकडे लक्ष गेले नाही.  स्त्रिया आणि पुरुष असे सगळे आपापल्या कामांत व्यग्र होते आणि हेनरीकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेही वेळ नव्हता असे दिसत होते. हेनरीने पाहिले की तिथल्या सगळ्याच स्त्रिया आत्यंतिक सुंदर आहेत. एवढेच नव्हे तर तिथले सगळे पुरुषदेखील अत्यंत देखणे आणि रुबाबदार होते. सगळ्यांची शरीरयष्टी अतिशय रेखीव आणि पिळदार होती. बऱ्याच पुरुषांनी कोणतेही वस्त्र घातले नव्हते. स्त्रियांनीही वस्त्रे घातली नव्हती, मात्र खूप सारी आभूषणे अंगावर ल्यालेली होती. काही अगदी थोड्या पुरुषांच्या खांद्यावर एक लांब फीतीसारखे वस्त्र होते. हेनरी तिथली प्रत्येक गोष्ट पाहून क्षणाक्षणाला अवाक होत होता. कुणाचे आपल्याकडे लक्ष जात  नाही हे पाहून शेवटी तो एका रस्त्यावरून पुढे गेला आणि बाजूला कोणत्यातरी सामानाचा ढीग रचून ठेवीत असलेल्या एका माणसाकडे पोचला. त्याचेजवळ जाऊन त्याने त्याचे लक्ष वेधण्यासाठी हाक मारली, "गुड मॉर्निंग सर". त्या माणसाने चमकून हेनरीकडे पाहिले आणि लागलीच म्हणाला, "गुड मॉर्निंग जंटलमन."
तो माणूस हेनरीस पाहून जेवढा आश्चर्यचकित झाला नसेल तेवढा हेनरी त्याने "गुड मॉर्निंग" केले हे पाहून झाला.  सर आ... आप ...णांस इंग्लिश येते? त्याने विचारले. "होय येते ना. पण आपण कोण आहात? कुणी परदेशी दिसता.  इथे कसे पोचलात?" मग हेनरीने त्यास सगळी हकीगत सांगितली. तो म्हणाला, "तुम्ही इथे आलात हे कदाचित आमच्या माणसांना सहन होणार नाही. तुम्ही चांगले गृहस्थ दिसता मात्र मला तुम्हास आमच्या निर्णयदलापुढे सादर करावेच लागेल. ते जो निर्णय घेतील त्यावर तुमचे इथले अस्तित्व अवलंबून असेल." असे म्हणून त्या माणसाने इमर्जन्सी इमर्जन्सी असा जोरात आवाज दिला, आणि तो आवाज ऐकून जवळ जवळ पंधराएक स्त्रीपुरुष तिथे जमा झाले. त्या माणसाने सर्वांस सांगितले की हा एक नवा माणूस आलेला आहे. मात्र तो आपल्यापैकी नाही. आजपर्यंत असे कधीही घडले नाही तेव्हा याचे काय करायचे याचा निर्णय करावा लागेल. याला निर्णयमंचाकडे घेऊन चला. जसजसा हेनरी तिथे येणाऱ्या नवनव्या माणसांना पाहत होता तसतसा तो अधिकाधिक आश्चर्यचकित होत होता. तिथला प्रत्येक पुरुष हा सुदृढ, देखणा आणि प्रत्येक स्त्री कमनीय अन अपार सौंदर्यवती होती. त्या स्त्रीपुरुषांनी मग हेनरीच्या पायात एक अवजड लाकडी खोडा घातला आणि त्याला एका घसरगाडीवर ठेवून मागे त्या डोंगरावरच्या पांढऱ्या इमारतीकडे घेऊन जाऊ लागले. त्या इमारतीच्या खाली एक मोठा शामियाना होता. हेनरीला त्या शामियान्यात नेण्यात आले. मग नगराध्यक्षास बोलावण्यात आले. नगराध्यक्ष ही एक स्त्री होती. तिला पाहताच ही स्त्री तरुण आणि अत्यंत सुंदर आहे हे तर स्पष्ट दिसतच होते मात्र तिच्या चेहऱ्यावर, देहबोलीत जो एक दृढ आत्मविश्वास जाणवत होता, त्यावरून ती मोठी विदुषी असणार हे ही हेनरीला जाणवले. हेनरीला मधोमध उभे करून नगराध्यक्षेसह इतर सर्वजण बाजूने मांड्या घालून जमिनीवर बसले. नगराध्यक्षेने कारवाईच्या आधी विचारले, या माणसास कोणती भाषा समजते याची चौकशी करायला हवी. म्हणजे आपल्याला न्यायोचित निवाडा करता येईल. तेवढ्यात तो मघाशी हेनरीला भेटलेला माणूस पुढे झाला आणि म्हणाला महोदया या माणसास इंग्लिश बोलता येते. "काय?" नगराध्यक्षा म्हणाली, "पृथ्वीवर अजूनही इंग्रजी बोलली जाते? रोमन आणि अरामईक भाषेने इंग्लिश संपविली नाही?" यावर हेनरीच उत्तरला, "नाही महोदया, उलट आता तर इंग्लिश ही जगाची मुख्य भाषा बनण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे." "काय सांगता? ही तर मोठीच आनंदाची गोष्ट आहे, आपण पृथ्वीच्या कोणत्या भागातून आला आहात?" "मी इंग्लंडमधून आलो आहे. मात्र आपण असे का विचारता आहात? आपण सध्या जिथे आहोत ती पृथ्वी नाही काय?" हेनरीच्या या प्रश्नावर थोडावेळ शांतता पसरली. मग ती नगराध्यक्षाच म्हणाली, "हे बघा आमची एक विशिष्ट संस्कृती आहे, परंपरा आहे, तत्वे आहेत. आम्ही हे सारे तुम्हा पृथ्वीवासियांपासून गुप्त ठेवलेले आहे, आणि यापुढेही ते तुम्हापासून गुप्तच रहावे याची खात्री करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे. आजपर्यंत आमच्या कित्येक पिढ्या यासाठी झटल्या आहेत आणि पुढेही त्या तशा झटत राहतील. आम्ही पुरेपूर काळजी आणि व्यवस्था ठेवलेली असूनही आपणांस इथे कसे येता आले याचेच आम्हाला आश्चर्य वाटते आहे. मात्र आता तुमच्याकरवी आम्ही आमचे हे गुपित पृथ्वीवासियांपर्यंत पोचू देणार नाही. असा प्रयत्न झालाच तर सदर इसमास देहदंड देण्यात यावा असा आमच्या नियामकग्रंथात नियम लिहिलेला आहे. मात्र आपण आमचीच भाषा बोलत असल्याने आपणांस विशेष तरतुदीन्वये काही सवलत देता येऊ शकेल, त्यामुळे आता आमच्यापुढे दोनच मार्ग आहेत. एकतर तुम्हास देहदंड देण्यात यावा अथवा तुम्हास आजीवन इथेच बंदिवासात ठेवण्यात यावे. यापैकी तुम्ही काय स्वीकारणार याचा निर्णय आम्ही आपल्यावर सोपवितो." हेनरी आता गोंधळात पडला. कोणता निर्णय घ्यावा यास्तव नव्हे तर आपण नेमके कुठे पोचलो आहोत, आणि ही माणसे नेमकी कोण आहेत हा विचार त्याला छळत होता. तो म्हणाला, "हे बघा मी माझा निर्णय सांगेन, मात्र त्यासाठी मलाही आपल्याबद्दल माहिती मिळायला हवी, म्हणजे माझ्या निर्णयास ठोस आधार मिळेल. ही जर पृथ्वी नाही तर मग काय आहे? आणि जर ही पृथ्वी नसेल तर आपणांस इंग्लिश कसे येते?"
हेनरीच्या या प्रश्नावर नगराध्यक्षेने एकवार सगळ्या जणांकडे पाहीले. तिथे असे काही पहिल्यांदाच घडत असल्याने सगळ्यांचे चेहरे होणाऱ्या घडामोडींनी गोंधळून गेलेले होते.  मग ती म्हणाली, "ठीक आहे. आम्ही आपणांस माहिती देण्यास तयार आहोत. तसेही आम्ही आमचा इतिहास सगळ्या पिढ्यांना समजावा म्हणून त्याची नेहमी उजळणी करतच असतो, आज तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याचीउजळणी करूयात." 
"तर जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रोमन साम्राज्य तेव्हा सगळ्या जगात सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य होते. आणि रोमन साम्राज्यातलेच सर्वाधिक प्रगत आणि बलशाली राज्य आमचे होते. आमचा तेव्हापासूनच 'विशिष्ट चयनात्मक वंश सुदृढीकरण' या संकल्पनेवर विश्वास होता. म्हणजे जो फक्त सुंदर, अव्यंग, सुदृढ, आणि निरोगी असेल तोच वंश पुढे चालत राहीला पाहिजे, जेणेकरून भविष्यातली मानवी पिढी केवळ सुदृढ आणि सुंदरच निपजेल. त्यामुळे सगळ्या रोमन साम्राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून आम्ही सुंदर स्त्रिया, राजबिंडे पुरुष गुप्तपणे निवडून आमच्या राज्यात आणीत असू. या कामी कधी मर्जीचा तर कधी बळाचाही वापर केला जाई. जगातल्या विविध वंशांतली सर्वोत्तम बीजे एकत्र करून एक नवा सुंदर आणि सुदृढ मानव वंश तयार करणे ही आमची विचारधारा होती. त्यासाठी आम्ही आमच्या राज्यातील रोगी, कुरूप, निर्बल, आणि व्यंग आलेल्या लोकांस ठार करून टाकत असू. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बालकातही यापैकी कुठला दुर्गुण असेल तर त्यालाही ठार करण्यात येत असे. अशाप्रकारे आमचे संपूर्ण राज्य आम्ही सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ मानवी वंशाचे बनविले होते. आमच्या वंशाचे नाव होते 'बिहटी वंश'. इंग्लिशच्या 'ब्युटी' या शब्दाचा उद्गम आमच्याच वंशनामामुळेच झाला आहे. आमच्या या प्रयत्नांमुळे आमच्या नव्या पिढ्याही जन्मत:च अधिकाधिक सुंदर आणि सुदृढ निपजू लागल्या होत्या. बिहटी राज्य तर संपूर्ण उत्तम वंशाच्या लोकांचे झाले होतेच पण त्यानंतर संपूर्ण विश्वच आमच्यासारख्या सुंदर वंशाच्या लोकांनी व्यापलेले असावे, संपूर्ण जगातच कुरूपता, रोग, व्यंग राहू नये या विचाराने आम्ही आमचा राज्यविस्तार सुरु केला. आजूबाजूच्या क्षेत्रातील लाखो कमजोर, कुरूप, रोगीट माणसे आम्ही ठार मारली. अशाप्रकारे संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी, उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली ही मोहीम अनेक लोकांस मात्र रुचली नाही. त्याच काळात जेरुसलेममध्ये एक माणूस उदयास आला होता. जगातल्या सगळ्या गरीब, दलित, पतित माणसांना जगण्याचा हक्क आहे असे तो सांगत असे. त्याचे नाव होते ईशो. कुणीही माणूस मग तो गरीब असो की श्रीमंत असो, सुंदर असो की कुरूप असो, रोगी असो की सुदृढ असो, तो देवाला सारखाच आवडतो असे तो सांगे. आपण देवाचे पुत्र आहोत असा त्याचा दावा होता. तो अनेक चमत्कार करून दाखवत असे. त्याला खूप लोकांचे समर्थन लाभत होते. तो अतिशय लोकप्रिय झाला होता. अगदी रोमन राजेही त्याच्या लोकप्रियतेमुळे भेदरलेले होते. त्याच्या उदयामुळे आमची चळवळ खूप अयशस्वी होऊ लागली. आम्ही रोमन साम्राज्यास आम्हाला समर्थन द्या असा प्रस्ताव पाठवला. मात्र त्या चमत्कारी माणसाच्या प्रभावामुळे आपण सामान्यांच्या विरोधात अशी स्पष्ट भूमिका घेतल्यास मोठ्या जनक्षोभाचे बळी ठरू अशी त्यांना भीती वाटत होती, त्यामुळे त्यांनी आम्हास नकार दिला. एवढेच नाही तर त्या ईशोपेक्षा आपणच जनतेचे मोठे कैवारी आहोत हे दर्शविण्यासाठी त्यांनी आमच्याच विरोधात चळवळ उघडली. महान बलशाली असलो तरीही संख्याबळात आम्ही कमी पडलो. आमच्या हजारो माणसांच्या कत्तली घडवून आणण्यात आल्या. मग आम्ही रोमनांस तहाचा प्रस्ताव पाठवला. मात्र त्यांनी तो अमान्य केला व उलटपक्षी आम्ही तुम्हाला तर समूळ नष्ट करूच पण तुमची नामोनिशाणी मिटविण्याबरोबरच तुमच्यासारखा कोणताही वंश कधीकाळी पृथ्वीवर अस्तित्वात होता ही माहीतीही आम्ही पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचू देणार नाही. तुमच्यासकट आम्ही तुमचा संपूर्ण इतिहासही पुसून टाकू अशी त्यांनी धमकी दिली. आम्ही मग आमचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिथून एखाद्या कधीही न पाहिल्या गेलेल्या दूर आणि अगम्य अशा भूभागावर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही खूपशी जहाजे तयार करून जमतील तेवढे लोक घेऊन समुद्रातून पळून आलो. आम्हाला सुदैवाने हे मोठे सुपीक भूखंड सापडले आणि आम्ही इथेच जीवन सुरु केले. काल आमचा या बेटावर पहिल्यांदा पोचण्याचा वार्षिक सोहळा होता. आम्ही तो रात्रभर नाचगाणे करून साजरा करतो. आपण नेमके त्याच दिवशी इथे पोचला आहात. मागच्या दोन हजार वर्षात इथपर्यंत बाहेरचा एकही मनुष्य पोहोचू शकला नाही. आम्हीही त्या जगाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. एकेकाळी लक्षावधी असलेले आम्ही बिहटी आज इथे केवळ दहा हजार शिल्लक आहोत. आमचा इतिहास पूर्णत: नष्ट करण्यात आला असणार हे तर आम्हाला ठाऊक आहेच, मात्र नंतर जगावर आमचे विरोधी असलेले ते रोमन अथवा तो अरामईक ईशो यांचेच राज्य प्रस्थापित झाले असणार असा आमचा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही तिथे संपर्क साधण्याचा अथवा परतण्याचा कधीही विचार केला नाही. आम्ही निर्गमन केल्यानंतर इंग्लिश भाषा बोलणारे केवळ आमच्या राज्याच्या पश्चिमेस एका बेटावर 'ब्रीटन्स' या जमातीचे काही लोक होते. त्या एवढ्याशा रानटी लोकांनी ही भाषा एवढी जपून ठेवली हे खरेच आश्चर्याचे आहे. 
हेनरी म्हणाला नुसती जपलीच नाही तर आज ती सर्वात महत्वाची भाषा बनण्याच्या मार्गावर आहे. दोन हजार वर्षांपूर्वी तुम्ही समजत असाल तेवढेसे नाहीये हे जग. हे जग प्रचंड मोठे आहे. तुम्ही तेव्हा ज्याला जग समजत असाल तो कदाचित खऱ्या जगाचा केवळ दहा टक्केच भाग असेल. आणि या विशाल जगापैकी आज अर्ध्या जगावर तेच 'ब्रीटन्स' राज्य करीत आहेत. त्यांना आता ब्रिटीश असे म्हणतात. मी ही एक ब्रिटीशच आहे. ब्रिटीश आता जगभर नवनवे प्रदेश, भूभाग शोधण्याच्या आणि जिंकण्याच्या मागे लागलेले आहेत. मी हे तुमचे नगर शोधल्याचे जाहीर केले तर मला जगभर फार मानमरातब मिळेल. मात्र तुमची कथा ऐकून आणि तुमची अनोखी संस्कृती पाहून ती अशीच जगापासून अलिप्त राहून बहरत जावी असे मला आता वाटते आहे. त्यामुळे मी बाहेर गेलो तरीही तुमच्या बद्दल कुणालाही काहीही सांगणार नाही. वांशिक श्रेष्ठता, चयनात्मक वंश वृद्धी इत्यादी संकल्पनांनी आता जग पेटून उठेल आणि तुम्हास इथूनही नष्ट करण्यात येईल. त्यामुळे आता मी माझा निर्णय तुम्हास सांगतो. मी इथून न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मी तुम्हास विनंती करतो की मला देहदंड अथवा बंदीवास न देता, आपल्यात सामील करून घ्यावे. जगातल्या सर्वोत्तम वंशांस स्वत:त सामील करणे ही तर तुमची परंपराच आहे. आणि तसेही तुमच्या उत्कर्षकाळातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यापेक्षा कित्येकपट अधिक मोठ्या भूभागावर राज्य करणाऱ्या जमातीचा हा माणूस तुम्हात योग्य रीतीने नक्कीच सामावू शकेलच. तेव्हा तुम्ही मला आपणांत सामावून घ्यावे.  
हेनरीच्या या प्रस्तावावर तिथे कुजबुज चालू झाली. सगळ्यांतून चार स्त्रिया आणि चार पुरुष पुढे आले. त्यांनी नगराध्यक्षेसमवेत आपसांत काही चर्चा केली आणि मग नगराध्यक्षेने निर्णय जाहीर केला. केवळ एका विशिष्ट श्रेष्ठ अथवा राज्यकर्त्या वंशाचे असणे हा बिहटी बनण्याचा पात्रता निकष नाही. मात्र आलेला पाहुणा हा शारीरिकदृष्ट्या त्या लायक असल्यामुळे त्याला सामावून घेण्यास हरकत नाही. गेल्या दोन हजार वर्षांत असे घडले नसले तरी हीच आपली परंपरा आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे लगेच इथे डोंगरावरच्या मंदिरात त्यास दीक्षा देऊन बिहटी बनविण्यात येईल. हा आपला नवा पाहुणा त्याच्या परीने आपल्या बिहटी वंशाचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न करीन अशी आम्ही आशा करतो.

हेनरी आता बिहटी बनला. त्याला एक घर देण्यात आले. त्याला एक बिहटी वस्त्र म्हणजे ती खांद्यावर ठेवण्यासाठीची कापडाची नक्षीदार फीत देण्यात आली. हेनरी ने बिहटी बनून तिथेच राहण्याचा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे होती. त्याने कितीही प्रयत्न केला तरी कसेही करून हे लोक त्यास तिथून बाहेर जाऊ देणे शक्य नव्हते. त्यांनी त्याला न मारता जिवंत बंदिवासात ठेवलेही असते पण त्याला तेही नको होते. मरण्यापेक्षा त्यास जगणे महत्वाचे वाटत होतेच पण बंदिवासात जगण्यापेक्षा या लोकांचा धर्म स्वीकारून मुक्त राहणे अधिक उपयुक्त होते. नंतर यथावकाश काही उपाय योजून कदाचित आपल्याला परत निघूनही जाता येईल असाही त्याचा विचार होता. आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेथील स्त्रिया. एवढ्या अफाट सौंदर्यवतींपैकी काहीजणी तरी मिळविणे हे आता त्याचे स्वप्न बनले होते. आणि जरी अनेकजणी मिळाल्या नाहीत तरी नुसती नाममात्र आभूषणे घालणाऱ्या त्यांना आणि त्यांच्या देहांना बघण्यातही एक अपार आनंद जो इंगलंडमध्ये सामाजिक परंपरांच्या नावाखाली दुरापास्त होता तो त्याला अशा प्रकारे मुक्त राहून लाभणार होता. आपली एकतरी अत्यंत सुंदर गर्लफ्रेंड असावी हीच तर त्याची आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा होती. बंदीवासात जगता तर येऊ शकत होते मात्र स्त्रीसुखाचा आनंद मिळू शकत नव्हता. उर्वरित जगातली कोणतीही सुंदरातली सर्वात सुंदर स्त्रीदेखील इथल्या एकाही स्त्रीपेक्षा सुंदर नसेल याची त्याला खात्री होती. म्हणून त्याने हा मार्ग पत्काराला. 
दोन दिवसांनी लगेच त्याने नगराध्यक्षेची भेट घेऊन मला एक पत्नी हवी आहे, आपणांत काय पद्धत असेल त्यानुसार माझे लग्न लावून द्या अशी विनंती केली. नगराध्याक्षेने त्याचेकडे गोंधळलेल्या नजरेने पाहीले. आपण काय बोलत आहात? पत्नी आणि लग्न म्हणजे काय हे आम्हास ठाऊक नाही. "काय? अहो पत्नी आणि लग्न ही प्रजाती वाढत रहावी यासाठीची योजना आहे. जेणेकरून एखादी स्त्री ही तिचे लग्न लावून दिलेल्या पुरुषाशीच अपत्यप्राप्तीस्तव लैंगिक संबंध ठेवण्यास करारबद्ध होते." "काय? पण आमच्या इथे अशी पद्धत नाही. इथे कोणताही पुरुष कोणत्याही एका स्त्रीशी आणि कोणतीही स्त्री कोणत्याही एका पुरुषाशी करारबद्ध होत नाही. कुणीही कुणाशीही कधीही संबंध ठेऊ शकतो. हे आमच्या नियामक ग्रंथातच नमूद केलेले आहे. विविध इसमांशी संबंध ठेऊन बीजोत्पादन केल्याने संतती अधिक उत्कृष्ट होते असे आमच्या ग्रंथात सांगितलेले आहे. त्यामुळे आम्ही हीच पद्धत वापरतो. तुम्हास आवश्यकता असेल तर संततीसाठी तुम्ही आभूषणप्राप्त कोणत्याही स्त्रियांशी त्यांच्या संमतीने संबंध ठेऊ शकता." आभूषणप्राप्त होणे हा स्त्रीचा प्रजोत्पादनासाठी आणि संबंधासाठी तयार होण्याचा संकेत होता. योग्य वयाची झाल्यावर मुलीला एक समारंभ करून आभूषणे दिली जात असत. अशा आभूषणे घातलेल्या स्त्रिया या प्रजोत्पादनासाठी तयार आहेत असा तो संकेत होता. हेनरीसाठी ही तर सुवर्णसंधी होती. त्याने अनेक स्त्रियांशी संबंध स्थापले. तिथे प्रत्येक पुरुष देखणा आणि राजबिंडा असल्याने सहसा कोणत्याही पुरुषाला कोणतीही स्त्री नकार देत नसे. मात्र एका स्त्रीने हेनरीस नकार दिला. ती म्हणाली मला काहीतरी वेगळे देणारा पुरुष हवा आहे. एकसारख्या पुरुषांचा मला कंटाळा आला आहे. हेनरी या पहिल्या नकाराने अतिशय बेचैन झाला. हिला काहीही करून प्राप्त करायचेच असे त्याने ठरविले. पण तिला काय वेगळे करून दाखवावे ते त्यास समजेना. तिला काहीतरी छान भेट द्यावी असे त्याने ठरविले. त्यावर तो विचार करू लागला आणि अचानक त्याला आठवला तो त्याच्याकडेच राहिलेला ज्युवेल ऑफ द ओशियन. तसेही इथल्या स्त्रिया फक्त आभूषणेच घालतात. त्यामुळे तिला हा हार आवडणारच असा विचार त्याने केला. हेनरीने तिथे आवश्यकताच नसल्याने त्याचे आधीचे अंगावरचे कपडे काढून घरात कुठेसे ठेवून दिले होते. त्याने ते हुडकून त्यांतले खिसे चाचपून तो हार शोधला आणि स्वत:शीच पुटपुटला,  अशी सुंदर भेट पाहून तिचे मन न मोहले तरच नवल. मग एक दिवस त्या स्त्रीस त्याने एकांतात गाठले आणि तिला तो हार तिला दाखविला. ती तो हार पाहून मोहरली. हेनरी म्हणाला जितके दिवस तू माझी मर्जी सांभाळशील तितके दिवस मी तुला हा हार घालण्यासाठी देईन. ती तयार झाली. त्यानंतर मग तिलाच नव्हे तर इतरही एकाहून एक सुंदर स्त्रियांस त्यांनी नकार दिल्यावर त्या हाराच्या मोहात पाडून हेनरीने उपभोगले. असे बरेच दिवस गेले. हेनरी अत्यंत मजेत होता. त्याला आता तिथे आल्याचे फार समाधान वाटत होते. आता तिथून परत जाण्याचा विचारही त्याच्या मनास शिवत नव्हता.

एके दिवशी डोंगरावरच्या मंदिरात बसलेला असताना हेनरीस ती दिसली. अठरा-एकोणीस वर्षांची असेल. तिने आभूषणे घातलेली नव्हती. सहसा वयाच्या विसाव्या वर्षी आभूषणे दिली जात. डोंगराच्या पायथ्यावरच ती आलेली असताना हेनरीचे तिच्याकडे लक्ष गेले. इतक्या खालवरचे स्पष्ट दिसत नसूनही ही इथली आजपर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर स्त्री आहे हे त्याने लागलीच ओळखले. ती तशी येत असताना कुठलाही मानवी देह चालत आहे असे वाटतच नव्हते. वीज आजूबाजूला आपली प्रभा पसरीत आकाश भेदून सगळे तिच्यावर थिजलेले डोळे दिपवित झेपावून येत आहे असे भासत होते. तिचे अंग अन अंग वितळलेल्या सोन्यातून नुकतेच बाहेर काढल्यासारखे तेजस्वी होते. नदीने डोंगराला मोठा गोलाकार वळसा घ्यावा तशी तिची कंबर बाकदार होती. जशी जशी ती जवळ येत होती तसतसे तिचे सौंदर्य अधिकाधिक स्पष्ट होत होते. तिची पावले इतक्या तालबद्ध रीतीने पडत होती की हजारो देहांच्या पायघड्या करून तिचे पदन्यास वेचून घ्यावेत. तिच्या पापण्यांची उघडझाप म्हणजे फुलपाखरांच्या पंखांची नाजूक फडफड होती. तिचे वाऱ्यावर भुरभुरणारे केस हे केस नव्हेतच, त्या धुंद करणाऱ्या केवड्याच्या पाती होत्या ज्यांच्या सुगंधाशी खेळून पुढे जाणाऱ्या गंधित वाऱ्यात लाखोंनी बेहोष होऊन पडावे. तिच्या चेहऱ्यापुढे हजारो चंद्र फिके होते. तिचे कर्णपाळ गुलाब पाकळयांसारखे मुलायम होते. तिच्या डोळ्यांत इंद्रधनुषी रंग होते, तिच्या ओठांवर मदिरेचे कुंभ होते. निर्विवादपणे ती विधात्याची विश्वातली सर्वोत्तम निर्मिती होती. ती पायऱ्या चढून वर मंदिरात आली. आता हेनरीला ती कशी अगदी जवळून दिसत होती. तिला एवढे जवळ पाहून त्याच्या नसांतून रक्त आत्यंतिक वेगाने वाहू लागले. हृदयाची धडधड प्रचंड वाढली. एवढे अजोड सौंदर्य त्याच्या पूर्ण नैसर्गिक रुपात आपल्या इतक्या जवळ उभे आहे या जाणीवेतला प्रचंड आनंद त्याच्या इवल्याश्या हृदयात मावू शकला नाही आणि तो तिथेच भोवळ येऊन बेशुद्ध पडला.  

हेनरी बेचैन होता. त्या दैवी सौंदर्यवतीची आठवण, तिची ओढ त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. एवढे अफाट सौंदर्य या दहा हजार लोकवस्तीच्या खुराड्यात व्यर्थ पडले आहे असे त्याला वाटले. हिने इथून बाहेर पडायला हवे. जगावर राज्य गाजवायला हवे. सगळे जग हसत हसत हिचे मांडलिक होईल. हिला मिळविण्यासाठी तिकडे महायुद्धे होतील. देशच्या देश अन खंडच्या खंड हिला मिळविण्याच्या लालसेपोटी बेचिराख होतील हे त्याला ठाऊक होते. मात्र आपल्या सौंदर्याची तिला कल्पना असावी असे काही हेनरीला वाटेना. इथले लोकही महामूर्ख आहेत. त्यांना अस्सल सौंदर्याची जाण नाही.  मान्य आहे की इथली हरेक स्त्री अत्यंत सौंदर्यवती आहे मात्र तरीही त्या साऱ्या सौंदर्यवतींनाही कितीही कमालीचा असला तरीही एक मानवी चेहराच आहे. पण हिचे सौंदर्य हे मानवी नाहीच, ते केवळ आणि केवळ दैवी असू शकते. आयुष्यभर या टीचभर बेटावर कुठल्याशा पहीलवानी पुरुषांशी यांत्रिकपणे ती रत होत राहील. ना तिला आपल्या कौमार्याची किंमत माहित असणार ना तिला भोगणाऱ्या पुरुषांस स्वत:च्या अहोभाग्याची कल्पना. हिला स्पर्शणारा पहिला भाग्यवान पुरुष कोण असेल? तो मीच का असू नये? नाहीतरी इथे या वेड्या माणसांना कौमार्य आणि प्रथमसंभोग आदी गोष्टींचे काडीमात्रही घेणे देणे नाही. दोन हजार वर्षांपूर्वीच्या रानटी समजुतींचे रानटी लोक हे, आणि म्हणे आम्ही जगातला सर्वश्रेष्ठ मानवी वंश आहोत. दळभद्री कुठले. 
हेनरीने ठरविले की त्या मुलीस प्रथम स्पर्श करणारा पुरुष आपण बनायचे. एवढेच नव्हे, किंबहुना तिला आयुष्यभर स्पर्श करणारा एकमेव पुरुष आपणच बनायचे. मग तो त्या दृष्टीने लागलीच प्रयत्नशील झाला. आजकाल मार्था त्याच्या घरात त्याचेबरोबर राहत होती. त्यादिवशी मंदिरात तीही हेनरीबरोबर होती. त्याने तिला विचारले, "त्या दिवशी मंदिरात आलेली ती विनाआभूषणवाली मुलगी कोण होती?" मार्था म्हणाली, "ती? ती युलिया आहे. महिनाभराने पौर्णिमेच्या रात्री तिच्या आभूषणग्रहणाचा सोहळा आहे. त्याच्याच पूर्वतयारीसाठी ती आली होती".  "म्हणजे महिन्याभरानंतर ती शरीरसंबंधांस तयार होईल?"
"हो. तीच तर पद्धत आहे."
"मग ती कुणाबरोबर संबंध ठेवेल?"
"ते सर्वस्वी तिच्या मनावर अवलंबून आहे. ती ज्या पुरुषाची निवड करेल तो तिच्याशी तिला हवे असेपर्यंत संबंध ठेवेल. पण तू हे का विचारतो आहेस? तुला तिच्याशी संबंध ठेवायचे आहेत काय? तुझा तो निळ्या खड्याचा हार दे तिला, मग ती तुझीच निवड करेल." मार्था हसून म्हणाली.
"खरेच गं मला ना तिला भेटायचे आहे. तिच्याशी बोलायचे आहे. मला तिच्याशिवाय दुसरे काही सुचत नाही.मला वाटते की मी ना तिच्या प्रेमात पडलो आहे. नुसता पडलोच नाही तर आकंठ बुडालेलो आहे."
"काय म्हणालास? प्रेमात पडणे म्हणजे काय?" हेनरीला मार्थाच्या या प्रश्नावर तिला काय सांगावे हेच कळेना. स्त्री पुरुष संबंध हे अन्नग्रहण अन मलमुत्रत्यागासारखी यांत्रिक जीवनक्रिया आहे यापलीकडे त्याविषयी तिथे कुणाचीही वेगळी भावना नव्हती. तिला तो प्रेम म्हणजे काय हे काय सांगणार? तो तिला म्हणाला की ते तुला समजणार नाही. तू फक्त लगेचच्या लगेच माझी युलियाशी भेट घालून दे. मार्था म्हणाली, "नाही असे करता येणार नाही. कारण तू फीतधारी पुरुष आहेस. आणि तिचे आभूषणग्रहण होईतो कुणीही फीतधारी पुरुष तिच्याशी बोलू शकत नाही." "मग तू माझ्यासाठी एक काम करशील? हा हार तिला नेऊन दे आणि तिला सांग की मी तिचा अभिलाषी आहे. तिने मला समर्पित व्हावे म्हणून मी हा हार तिला देत आहे. आभूषणग्रहणाच्या नंतर तिने मलाच तिचा प्रथम पुरुष म्हणून निवडावे." ठीक आहे, असे म्हणून मार्थाने तो ज्युवेल ऑफ ओशियन घेतला. ती दुपारी युलियास भेटणार होती.
इकडे हेनरी अत्यंत उतावीळपणे मार्थाकरवी युलियाचा होकार येण्याची वाट पाहत होता. त्याला मधून मधून उगीच कुणाच्या येण्याचे भास होत. तो धावून बाहेर येई, मात्र कुणीही नाही हे पाहून पुन्हा आत जाई. त्याची बेचैनी प्रचंड वाढत चालली होती. येणारा प्रत्येक क्षण हा युलिया आणि त्याच्यातल्या अंतरात अधिकाधिक भर टाकतो आहे असे त्याला वाटत होते.  शेवटी एकदाची दुपार ढळल्यानंतर मार्था आली. इतका उशीर झाल्याने हेनरीला तिचा खूप राग आला होता. हेनरीने विचारले, काय झाले? मार्था म्हणाली, युलियाच्या आभूषणग्रहणाच्याच दिवशी समांक नावाच्या एका तरुणाचेही फीतधारण आहे. युलियाकडे मी गेले तेव्हा सगळे हेच बोलत होते की नेहमीच्या पद्धतीनुसार युलिया कदाचित त्यालाच निवडेल. सहसा ज्यांचे हे सोहळे एका दिवशी होतात तेच तरुण तरुणी संबंध करतात." मार्थाचे हे बोलणे ऐकून हेनरीचे माथे भडकू लागले. किती आस लावून मार्था काहीतरी चांगली बातमी आणेल या प्रतीक्षेत तो बसून बेचैन झाला होता. कुणी दुसरा पुरुष युलियास स्पर्शतो आहे ही कल्पना त्यास सहन होईना. त्याचा पारा चढला. त्याने विचारले, "अगं पण तूच तर म्हणाली होतीस ना की जो पुरुष तिला पसंत पडेल त्यालाच ती निवडेल? मग तू तिला माझ्याबद्दल काही बोललीस की नाही?"
"अरे तिथे सगळेजण तिच्या आणि समांकविषयीच बोलत होते. म्हणून मी कुणाला काही म्हंटले नाही."
"पण तू तिला भेटून माझा हार तर दिलास ना?"
"नाही रे. त्याचे काय झाले मला मनाद भेटला होता. उद्यापासून नाही का मी त्याच्याचकडे रहायला जाणार आहे. मी त्याला तो हार दाखविला. तो मला म्हणाला की उद्या मी त्याचेकडे जाताना त्याला मला तो हार घातलेले पहायचे आहे. म्हणून मग मी तो माझ्याकडेच ठेवला. नंतर एक दोन दिवसांनी देईन मी युलियाला." "काय?" हेनरी अत्यंत जोरात ओरडला. त्याला मार्थाच्या या कृत्याचा अत्यंत संताप आला. त्याने मार्थेचे केस धरून ओढले आणि तिला खाली जमिनीवर पाडले. नंतर तिच्या अंगावर बसून तो तिला जोरजोरात मारू लागला. "त्या कोणा फडतूस मनादसाठी तू तो हार ठेवून घेतलास? तुझी लायकी आहे का त्याला हात तरी लावण्याची?" हेनरीचा राग अनावर झाला होता. त्याच्या मस्तकाची शीर तडतडत होती. त्याने रागाच्या भरात मार्थाचा गळा आवळायला सुरुवात केली. तिने वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु हेनरीच्या अंगात सैतान संचारला होता. त्याने खूप जोरात तिचा गळा आवळला, आणि मग थोड्याच वेळात मार्थाची हालचाल बंद झाली. मात्र तिला ठार करूनही हेनरीचा संताप संपत नव्हता. त्याने माझी युलिया माझी युलिया असे ओरडत तिथेच तिच्या थंड पडलेल्या प्रेताशी कामक्रीडा केली. नंतर तिच्या शवास जोरजोरात लाथा मारल्या. तरीही त्याचा संताप जाईना. रात्र होईपर्यंत तो तसाच धुसफुसत बसून राहिला, आणि मग अंधार झाल्यावर त्याने मार्थेचे प्रेत उचलून डोंगराकडील घरांच्या मागे असलेल्या प्राण्यांच्या दालनांसमोर फेकून दिले.

आता त्याच्यासमोर एकच नाव तरळत होते. 'समांक.' कोण असेल तो? खूप राजबिंडा असेल काय? युलिया त्यालाच पसंत करील काय? नाही, मी हे कदापि होऊ देणार नाही. दुसऱ्याच दिवशी हेनरीने समांकला शोधायला सुरुवात केली. दुपारच्या वेळी त्याला समांक भेटला. त्या बेटावर अगदी सामान्य म्हणता येईल असाच तो होता. एवढ्या दैवी सौंदर्यवतीने ज्याला समर्पित व्हावे अशा लायकीचे त्याच्यात यत्किंचितही काही नव्हते. हेनरी त्याचेकडे गेला. तो नगराच्या बाहेर जंगलात शिकारीसाठी निघाला होता. हेनरीने त्याला सोबत येऊ का असे विचारले. त्याने होकार दिला. मग दोघे बाहेर जंगलात गेले. त्याच्याशी बोलताना हेनरीस कळले की अजून या मुलास साधी अक्कलही आलेली नाही. किंबहुना तो मठ्ठच असावा. पुढे जंगलात गेल्यावर ते एका ठिकाणी थांबले. हेनरीनेच मग त्याला विचारले. तू युलियास ओळखतोस? समांक म्हणाला, "होय. मी तर तिला रोजच भेटतो. आमचा सोहळा एकाच दिवशी आहे." "अरे हो तुझा फीतधारण सोहळा आहे नाही का? मग काय? कोणत्या भाग्यवान स्त्रीस तू प्रथम संबंधासाठी निवडले आहेस?" "नाही नाही भाग्यवान कुठली? कोणतीही जाणती स्त्री माझ्यासारख्या नवख्या फीतधारकांबरोबर संबंध ठेवण्यास उत्सुक नसते. त्यामुळे मी नाईलाजाने युलियास विचारले आहे व आता तीच त्यासाठी तयार झाली आहे. खरेतर नवख्या मुलीशी संबंध करायला इतरांप्रमाणेच मलाही आवडत नाही, पण आता काही दिवस तरी दुसरा काही पर्याय नसल्याने मी युलियाशीच संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकताच हेनरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. युलियाशी संबंध ठेवायची स्वप्ने बघतो? आणि तेही दुसरा पर्याय नाही म्हणून ठेवतो आहे असे म्हणतो? एवढा माज? अरे याची लायकी आहे का तिचे नुसते नाव तरी घेण्याची? हेनरीच्या मस्तकाची शीर तडतडू लागली. त्याने जोरात समांकास धक्का मारून खाली पाडले. आणि त्याला काही समजायच्या आत त्याच्या छातीत शिकारीचा सुरा खुपसला. माझ्या युलियाशी बोलतोस? तिला फसवून संबंधांसाठी राजी करतोस? ती माझी आहे आणि फक्त माझीच राहणार, समजलास काय? असे म्हणून मग त्याने समांकचे प्रेत तिथून उचलून एका खोल दरीत फेकून दिले.

हेनरी आता वेडापिसा झाला होता. आता त्याचेबरोबर राहायला आलेल्या मिंडालाही त्याचे वागणे कळेना. त्याने रात्रभर तिला जागोजाग चावले होते. तिला मधूनच मारत होता. विचीत्रसे चित्कारत होता. नंतर तर तो मेल्यासारखा उताणा पडून गाढ झोपून गेला. कदाचित त्यास बरे नसावे असे तिला वाटले. पुन्हा असे वागला तर त्यास सोडून जायचे असे तिने ठरविले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हेनरी उठला तेव्हा तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्याने मिंडाला कालच्या अमानुष वागणुकीबद्दल फार दीनपणे माफी मागितली. माझे चित्त बिघडलेले आहे असे तो तिला म्हणाला. कितीतरी वेळ तिच्या मांडीवर डोके ठेवून तो रडत राहीला. मिंडा त्याला एवढे उद्विग्न झालेले पाहून रात्रीचे सगळे विसरून त्याचे मस्तक थोपटत राहीली. दुपारनंतर हेनरी मंदिराकडे निघाला, आणि जाऊन त्यादिवशी युलिया जिथून दिसली होती त्या जागी बसला. त्याला मिंडाने सांगितले होते की पूर्ण चांद्रमासभर नवआभूषीला मंदीरात जाऊन पूर्वसंस्कार घ्यावे लागतात. तेव्हा त्या निमित्ताने आलेली युलिया दिसावी म्हणूनच तो आला होता. थोड्यावेळाने ठरलेल्या वेळी युलिया खाली आली. हेनरी उठून उभा राहीला. त्याच्या कल्पनेतले ते अमाप सुख पायऱ्या चढून वर वर त्याचेकडेच येत होते. त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती अत्यंत प्रफुल्लीत झाल्या. आता त्याला सभोवतीचे काहीच जाणवत नव्हते. फक्त क्षणाक्षणाला अधिकाधिक जवळ येणारी युलिया आणि तो स्वत: एवढीच त्याला जाणीव होत होती. युलिया आता अगदी जवळ आली. हेनरी आता तिच्या समोरच येउन उभा राहीला.  त्याच्या हृदयाची धडधड पुन्हा प्रचंड वाढली होती. धमन्यांतून रक्त वेगाने दौडत होते. त्याची कानशिले गरम झाली होती. ती वर पोचली आणि तिने नजर उंचावून समोर उभ्या असलेल्या हेनरीकडे पाहीले व हलकेसे स्मित केले. ते पाहून हेनरी परत एकदा बेहोष होऊन तिथेच कोसळला. तिच्या नजरेचा बाण त्यावर लागलेल्या तिच्या स्मिताच्या जहरासहित थेट हेनरीच्या हृदयात घुसला होता. तिच्या त्याच्यातील त्या आभासी अस्तित्वाचे, सकाराचे जहर वेगाने त्याच्या नसेनसेत पसरू लागले होते. हेनरीचा देह आता एकदम हलका झाला होता. वाऱ्यावर मंद हेलकावे खात हळू हळू तरंगणाऱ्या एखाद्या पीसासारखा तो हवेत तरंगत होता. अफाट सुखाची त्याला अनुभूती होत होती. एक झोपाळा होता त्यावर युलिया बसली होती. हेनरी तिच्या शेजारी होता, नव्हे तो तिच्यातच होता, की त्याला अस्तित्वच नव्हते? तिच्याशी एकरूपतेची ती एक अपार आनंददायी स्थिती होती. हेनरीला कुठेतरी दूरवरून हाक मारल्याचे ऐकू आले, मिंडा त्याला हाका मारीत होती, पण त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही हेनरीला त्या अलौकिक मदहोशीच्या स्थितीतून बाहेर पडावेसेच वाटत नव्हते.

आज मिंडा अत्यंत सुख पावली होती. सकाळीच हेनरी शुद्धीवर आला होता आणि आता मिंडा त्याच्या बाहुपाशांत होती. एखाद्या फुलासारखे हेनरीने तिला अलगद उचलले होते. हेनरी अत्यंत आनंदी दिसत होता, आणि त्याच्या ओसंडून वाहणाऱ्या त्या आनंदाची भागीदार झाली होती मिंडा. एवढे सुख तिलाही कधीच लाभले नव्हते. किती वेळ दोघे सगळ्या जगास हरपून एकमेकांत गुंतून पडले होते कुणास ठाऊक. हेनरीला आपला नवा जन्म झाल्यासारखे वाटत होते तर मिंडा आपले अस्तित्वही विसरून गेली होती. किती वेळा प्रेमाचे आवेग आले आणि किती वेळा ते ओसरले याचे त्यांस भान नव्हते. पहाटे जाग आल्यावर मिंडेने हेनरीस एक घट्ट आलिंगन दिले आणि म्हणाली माझ्या राजा तुला माझ्याकडून काय हवे ते माग. आता तू माझे प्राण जरी मागितलेस तरी मी ते द्यायला तयार आहे. हेनरी उठला. त्याने तिचा हात समोर आपल्या हातात धरला, त्यावर तो ज्युवेल ऑफ द ओशियन ठेवला, आणि तिला म्हणाला की हा हार तू युलियाला नेउन दे आणि तिने आभूषणप्राप्तीनंतर मला निवडावे ही माझी याचना तिला सांग. मिंडेने तो हार घेतला आणि तो युलियास देण्याचे कबुल केले. दुपारनंतर मिंडा घरी आली तेव्हा हेनरी तिची वाटच पाहत होता. त्याने तिला आल्या आल्या विचारले, काय झाले? युलियाने तो हार घेतला? मिंडा म्हणाली अरे या नगरात अशी कोणती स्त्री आहे जी तो हार घेणार नाही? तिला बघताक्षणी तो हार आवडला. "मग ती काय म्हणाली? ती मला स्वीकारेल?" "का स्वीकारणार नाही? उलट ती मला म्हणाली की तिला असा अनुभवी पुरुष मिळणे हे तिचे भाग्य आहे. आभूषणप्राप्तीच्या दिवशी ती स्वत:स तुलाच समर्पित करणार आहे." हे ऐकून हेनरीला आता स्वर्ग केवळ दोन अंगुळे उरला होता. ज्या युलियासाठी तो एवढा हळहळत होता, अष्टौप्रहर झुरत होता ती आता त्याची होणार होती. या विश्वातली सर्वात सुंदर स्त्री त्याची सहगामिनी होणार होती. हेनरीला अत्यानंदाने काय करावे ते सुचेना. त्याने न राहवून मिंडाला घट्ट मिठी मारली. आणि तिला धरून वेड्यासारखा घरभर कितीतरी वेळ आनंदाने नाचला.

मग तो पौर्णिमेचा दिवस उजाडला. युलियास समारंभपुर्वक आभूषणे देण्यात आली. तिने हेनरीस तिचा प्रथम पुरुष म्हणून निवडले. हेनरीनेही तिचा स्वीकार केला. सोहळा संपला आणि हेनरीला सांगण्यात आले की तुम्हा दोघांत तूच वयाने मोठा असल्याकारणाने आता तू तिला तुझ्याच घरी घेऊन जा. तुझी आणि तिची अशी दोघांचीही मर्जी असेपर्यंत तिला सोबत ठेव आणि बिहटी वंशाची वृद्धी कर.

युलिया आता हेनरीपुढे बसली होती. दोघांत केवळ वीतभर अंतर होते. हेनरीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते की त्याला काही हालचाल करायला सुचत नव्हते. अफाट अफाट आनंदाने तो भांबावून गेला होता. प्रत्यक्ष युलिया, जिच्या केवळ दर्शनमात्रे करोडोंनी आपली जीविते ओवाळून टाकावीत, जिच्या चरणांशी महान पराक्रमी सम्राटांनीही आपले ताज उतरून ठेवावेत, जिला केवळ पाहिल्यावर पुन्हा जगातल्या कुठल्याही मोहाने माणसाने मोहू नये, जिला पाहून स्त्रियांनाही आपल्या स्त्री असण्याचा खेद व्हावा, जिच्या हसण्याने ऋतू बदलावेत, जिच्या कूस पालटण्याने दिवस रात्र पलटावेत, ती अलौकिका त्याच्यासमोर त्याचीच होऊन बसली होती. त्याला काही बोलणे कसे सुचावे.!! हेनरी तिला तसे पाहून जागच्या जागी थिजून गेला होता. त्याच्या सगळ्या संवेदना एवढ्या उद्दीपित झाल्या होत्या की त्यांची अनुभूती त्याच्या मेंदूस पेलण्याच्या पलीकडे गेली होती. मग युलियानेच आपल्या अंगावरची सारी आभूषणे काढून टाकली. आता तिच्या अंगावर केवळ तो ज्युवेल ऑफ द ओशियन उरला होता. त्या निळ्या हिऱ्याची आभा तिच्या छातीवर, गळ्यावर पसरली होती. तिच्या गौर अंगावर त्या कोंदणातून चौफेर पसरणारे नीलकिरण माखून राहिले होते, आज जणू त्या हाराचे अस्तित्वच सार्थक झाले होते. बहुदा त्याच आनंदात त्याची नीलप्रभा आज खूपच प्रखर भासत होती. ती खोली, हेनरीचे डोळे, त्याचे अंतरंग हे सारे त्या निळाईने भरून गेले होते. सगळे निळे आभाळ एकवटून समोर युलियाच्या छातीवर येउन दाटले आहे असे हेनरीस वाटले. त्याला ती निळाई आणि तिची त्याच्या अंतरंगालाही भेदणारी शीतलता पेलवेना. त्याने डोळे घट्ट मिटले. अजूनही युलिया आणि तो स्वत: हे वेगळे जीव आहेत ही जाणीव त्यास सहन होईना. मिटलेल्या डोळ्यांनीच त्याने आपला चेहरा पुढे केला, युलियाही पुढे झुकली, आणि मग कुठेतरी गूढ गहिऱ्या गुरुत्वीय पोकळीत हेनरीचे ओठ अत्यावेगाने युलियाच्या ओठांवर टेकले. वीज धरित्रीला भेटली होती. ती विद्द्युल्लता क्षणार्धात हेनरीच्या सर्वांगात पसरली. त्याची पेशी अन पेशी पेटून उठली. हेनरी आता हेनरी राहिला नव्हता.  तो युलियाच्या छातीवरची ती निळी आभा झाला होता. तो स्वत्वाच्या पलीकडच्या कुठल्याशा अस्तित्वात पोचला होता. त्या निळाईचा तरंग होऊन तो युलियाच्या गळ्याभोवती थोडासा घुटमळला. तिने हात पसरले. आणि मग तिच्या गळ्यातून हेनरी मुक्त झाला. सुखाचे एकामागून एक आभास त्याला होत होते. त्याचे द्वैत मिटले होते. युलिया आणि हेनरी हे आता दोन देह राहिले नव्हते. ते दोघे एकरूप झाले. एक तेजोमय शलाका बनून दोघे त्या नगरातून, त्या बेटावरून, समुद्रावरून, पृथ्वीवरून दूर दूर निघून चालले होते.  आणि मग तो अंतिम क्षण आला. समोर फक्त तेज आणि तेजच पसरलेले होते. सुखाच्या जाणीवा उत्कटतेच्या सगळ्या सीमा तोडून स्वैर वाहत होत्या. पतंगाने झपाटून जाऊन ज्योतीस बिलगावे तशी त्या दोघांची ती शलाका त्या वैश्विक तेजास बिलगली. आता कसे मोकळे वाटत होते. मन साफ झाले होते. अगदी जिथपर्यंत मनाचा तळ आहे तिथवर सारेकाही स्पष्ट दिसत होते. दूर लांब क्षितिजावरचा मोहाचा निळा रंग आता हळूहळू लोप पावत होता. तो रंग पूर्णत: विरला, तेजाने सारे क्षितीज व्यापले आणि हेनरीला जाणवले की आता आपण परीपूर्ण झालो. 

भांबावून गेलेली युलिया जोरजोरात हेनरीला हाक मारीत होती. युलियाच्या ओठांस स्पर्श करताच काही क्षणांतच हेनरी गतप्राण होऊन खाली कोसळला होता. असे क्षणार्धात नेमके काय झाले हे युलियास कळण्याच्या आत त्याचा देह थंडगार पडला होता. तिने जोरात हंबरडा फोडला. तिचे रुदन ऐकून लोक गोळा झाले. युलियाने आपल्या गळ्यातला तो ज्युवेल ऑफ द ओशियन काढून हेनरीच्या निष्प्राण कलेवराला चढविला. लोकांनी हेनरीची जवळच पडलेली फीत त्याच्या खांद्यावर टाकली. थोड्या वेळाने एका उघड्या लाकडी पेटीत त्याचे शव ठेवले गेले आणि परंपरेप्रमाणे ती लाकडी पेटी अफाट समुद्राच्या पोटात सोडून दिली गेली.  त्याच्या छातीवरचा तो नीळा खडा अजूनही चमकत होता. थोड्याच वेळात एक मोठी लाट उसळली आणि क्षणार्धात ती इवलीशी निळाई अनंत निळाईत मिसळून गेली. 

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

फुलपाखरे



एक शहरवजा गाव, गावात शाळा, शाळेत चौथीचा वर्ग, वर्गाच्या ब तुकडीत भिंतीकडील रांगेच्या तिसऱ्या बेंचवर बसणारा भास्कर. बेंचशेजारीच खिडकी, खिडकीबाहेर एका बाजूला गुलमोहोराचे झाड, अन दुसऱ्या बाजूला मुख्याध्यापकांनी मुलांकडून बनवून, निगा राखून फुलवलेली फुलझाडांची बाग. बाजूने झेंडू, मग सदाफुली, त्यापुढे निशिगंध, मग वेगवेगळ्या तऱ्हेचे कितीतरी गुलाब, बाजूला मोगरा, त्यांच्यापुढे मोठी झालेली दोन चाफ्याची झाडे, आणि भिंतीच्या बाजूला उगीच फोफावलेला जास्वंद. दोन्ही चाफ्यांच्या मधल्या जागेत एक संपूर्ण वाफा जरबेराच्या विविधरंगी फुलांचा. पुढे शाळेच्या बाउन्ड्रीवर रेषेत लावलेली कर्दळ. कर्दळीच्या पुढे पडका माळ, त्याच्यावर अशीच कधीमधी विरळ फुलणारी रानफुले, माळावर उगीच जमिनीवरच्या विरळ गवताच्या बुंध्यांना तोंड लावीत हिंडणारी गुरे. माळाच्या पुढे दूर उसाची हिरवीगार शेते, त्या शेतांच्या पलीकडे गावातली घरे, यस्टीचे स्टॅंड, बाजारपेठ आदि. पण भास्करला शेतांच्या पुढचे गाव अजिबात दिसायचे नाही. शाळेच्या पुढच्या बाजूने गावात जाणारा रस्ता त्याला शेतांजवळील वळणापर्यंत दिसायचा. तोही रोज तिथवरच बघायचा. तिथे वळणाच्या बाजूला पांढऱ्या भिंतींचे एकुलते एक घर दिसायचे. गावाच्या सुरुवातीलाच असलेले हेच एकमेव घर शाळेतून दिसे. खरेतर एवढ्या दुरवर काही स्पष्ट दिसत नसे पण तरीही भास्कर सारखा अधूनमधून घराकडेच पाहत राही. घरापुढे सगळ्यात आधी एक आकृती दिसे मग तो ओळखे की ही मंदाकाकी, दुसरी थोडी छोटी आकृती दिसली की सखूआजी. कधी कधी मग मधूनच एक खूप इकडे तिकडे फिरणारी आकृती दिसे, आणि भास्करच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरे. मग तो हर्षून तिलाच निरखित राही. ती अवखळ आकृती असे सुमीताईची. भास्करची खूप आवडती ताई. ती भास्करचे खूप लाड करी आणि भास्करलाही तिचा फार लळा होता. सुमीताई यंदाच नववीत गेली होती, नववी, दहावीची शाळा दुपारी भरे. मागची तिन्ही वर्षे भास्कर सुमीताईबरोबरच शाळेत येई. त्याला तिच्याबरोबर शाळेत यायला खूप मजा येई. यंदा त्याला तिच्याविना यायला अजिबात आवडत नसे. मग तो खिडकीतून सारखा घराबाहेर सुमीताई दिसते का ते बघत राही. 

सुमीताईला फुलपाखरे खूप आवडत, मागच्या वर्षीपर्यंत सकाळची शाळा सुटली की इतर मुलांबरोबर सरळ रस्त्याने न जाता सुमीताई भास्करबरोबर बागेत जाई, तिथून मग समोरच्या माळावर फिरत ते दोघे पुढे घरी पोचत. बागेत फुले फुललेली असली की खूप फुलपाखरे बागडताना दिसत. समोर माळरानावर तर फुलपाखरांची जत्राच भरलेली असे. छोटी छोटी पिवळी फुलपाखरे संख्येने सर्वाधिक दिसत. लाल ठिपक्यांची काळी फुलपाखरे, निळ्या पंखांची फुलपाखरे, पंखांवर मोरपिसासारखा डोळा असणारी फुलपाखरे, राजा, राणी नावाची मोठी फुलपाखरे, करडी, पांढरी, विविधरंगी फुलपाखरे.!! कित्येकवेळा फुलपाखरे आपसूक येउन सुमीताईच्या खांद्यावर, डोक्यावर, हातावर बसत. अशावेळी सुमीताई अगदी निस्तब्ध बसून राही. मग फुलपाखरेही कित्येकवेळ तशीच बसून राहत. कधीकधी तर चार पाच फुलपाखरे एकाचवेळी तिच्या अंगावर येउन बसत. भास्करच्याही अंगावर कधी चुकून एखादे फुलपाखरू येउन बसे पण त्याला निश्चल राहताच येत नसे, त्यामुळे ते लगेच उडून जाई. फुलपाखरांशी सुमीताईचे हे सुंदर नाते पाहून भास्करला फार छान वाटे. कुठेही एखादे नवे किंवा तिचे खूप आवडते फुलपाखरू दिसले की तो लगेच तिला ते दाखवत असे. भास्करने एकदा एक फुलपाखरू पकडले, दोन बोटांच्या चिमटीत त्याचे पंख पकडून तो सुमीताईला ते दाखवायला गेला. ते बिचारे भास्करच्या हातातून सुटण्यासाठी फडफडत होते. सुमीताईने ते पाहिले आणि ती भास्करला रागेच भरली. "अरे असे का पकडलेस त्याला? बघ बरे त्याला किती त्रास होतोय. त्याचे पंखसुद्धा फाटले. आता बिचारे उडता नाही आले तर मरून जाईल. चल सोड पाहू त्याला." भास्करलाही आपल्यामुळे एवढे सुंदर फुलपाखरू मरणार याचे वाईट वाटले, आणि त्याने ते फुलपाखरू सोडून दिले. त्याचा एक पंख फाटलेला असूनही ते उडाले आणि दूर निघून गेले. "खरेच का गं ते फुलपाखरू माझ्यामुळे मरेल सुमीताई? अगं खूप सुंदर होते म्हणून मी तुला दाखविण्यासाठी पकडून आणले. मला आता पाप लागेल ना?" यावर मग सुमीताईने भास्करला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली, "नाही रे बाबा, तुला पाप नाही लागणार हो. ते मेले तरी पाप मलाच लागेल, कारण मला दाखविण्यासाठीच तर तू त्याला पकडले होतेस ना?" यावर भास्करचे समाधान होण्याऐवजी तो अजूनच कोमेजला. त्याच्या चेहऱ्यावर 'आपल्यामुळे सुमीताईला पाप लागणार' या अपराधाची भावना अजूनच गडदली. ते पाहून मग सुमीताईच म्हणाली,  "काळजी करू नकोस रे नाही मरणार. बघ ना पंख फाटूनही छान उडाले ना? आता जगेल ते." मग ती म्हणाली तुझा हात पाहू, भास्करने तिला हात दाखवला, हाताच्या बोटांवर त्या पकडलेल्या फुलपाखराचे रंग माखून राहिलेले होते. छोटे छोटे चमकणारे रंगबिरंगी कण.! सुमीताईने ते हळूच आपल्या वहीच्या पानावर उमटवून घेतले आणि म्हणाली, "भास्कर बघ, तू त्या फुलपाखराचे पंख फाडूनही त्याने तुझ्या हातावर किती सुंदर रंगांची नक्षी भेट दिली. आपल्याला त्रास देणारांनाही आपण असे प्रेमाने काही दिले की देव आपल्याला फुलपाखरासारखेच सुंदर बनवतो. तू सुद्धा फ़ुलपाखरासारखा बनशील ना?" भास्करने मान डोलावली. खरेतर सुमीताईचे फुलपाखरांवरचे प्रेम पाहून भास्करलाही आपणच फुलपाखरू असल्यासारखे वाटे. कारण ती जशी फुलपाखरांची काळजी घेई त्यांच्यावर जीव ओवाळून टाकी तशीच ती भास्करशीही वागे. कुणी भास्करला त्रास दिलेला तिला सहन होत नसे. एकदा एका मुलाने तिला आपल्या वहीत दाबून ठेवलेली चारपाच फुलपाखरे दाखवली तेव्हा ती फार ओरडली त्याच्यावर. 'पुन्हा असे केलेस तर याद राख' असे ती त्याला म्हणाली आणि ती सगळी फुलपाखरे अलगद काढून घेऊन तिने माळावर जाउन एका खड्ड्यात पुरून टाकली. भास्कर म्हणायचा, "तुला एवढी आवडतात ना फुलपाखरे? मग तू या माळावरच का राहत नाहीस?" सुमीताई म्हणाली, "मला तर खरेच असे वाटते की इथेच रहावे. मस्तपैकी या माळावर पहुडावे, मग एखाद्या फुलपाखराने हळूच माझ्या गालांवर पंख फडकावून मला जागे करावे. मी खूप खूप फुलपाखरांना आवाज द्यावा, आणि त्यांनी चोहीकडून उडत उडत येउन माझ्या सर्वांगावर बसावे. कधी मला अलगद उचलून लांब ढगांची सफर करवून आणावी. त्यांच्या पंखांना जिथून रंग मिळतात तिथे मला न्यावे, मला सुंदर सुंदर सुगंधी फुलांच्या सान्निध्यात नेउन ठेवावे..." असे काही बोलू लागली की सुमीताई बोलतच राही, आणि भास्करसुद्धा कितीही वेळ ते भारावून ऐकत राही. 
कधीकधी तर माळावर एखादे खूप दुर्मिळ फुलपाखरू दिसले की सुमीताई पार वेडी होऊन जाई, दप्तर खाली टाकून ती कितीतरी वेळ त्याच्या मागे मागे धावत राही, आणि भास्कर तिच्यामागे धावत राही. एकदा त्यांना एक निळ्या, हिरव्या अन लाल रंगाचे खूप डोळे असलेले एक पिवळसर चमक असणाऱ्या पंखांचे फुलपाखरू दिसले. सुमीताई म्हणाली, "भास्कर अरे बघ ना किती सुंदर आहे हे फुलपाखरू, चल आपण त्याच्या मागे फिरूयात." मग भास्करच्या प्रतिसादाची वाटही न पाहता तिने दप्तर खाली टाकले आणि त्या फुलपाखराच्या मागे मागे पळू लागली. भास्करही तिच्याबरोबर पळू लागला. हे फुलपाखरू फारच चपळ होते. त्याच्याबरोबर खूप वेळ धावताना सुमीताई काही थांबेना, पण भास्कर मात्र पार थकून गेला. मग तो धापा टाकत कमरेत वाकून गुडघ्यांवर हात ठेवून एका जागी उभा राहीला. आणि म्हणाला, "सुमीताई आता बस झाले, मी पार दमलोय, आता थांब आणि चल घरी जाउयात." सुमीताई थांबली. "असा कसा रे तू फुसक्या भास्कर? लगेच दमतोस. तुझे नाव भास्कर नाही तर फ़ुस्कर असायला पाहिजे होते. किती सुंदर होते ते फुलपाखरू, बघ तुझ्यामुळे हरवले ना आता? भास्कर फुस्कर कुठला." फुस्कर म्हंटले की भास्करला खूप राग येई. मग तो चिडून तोंड फुगवून बसला. सुमीताई त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, "बाई गं एका पोराच्या गालाचा तर फुगा झालाय. दोरी बांधली तर खेळता पण येईल." असे म्हणून ती त्याच्या शेजारी हसत हसत बसली. भास्करचा फुगा अजून थोडा मोठा झाला. मग म्हणाली, "ठीक आहे बाबा, आजपासून मी नाही म्हणणार तुला फुस्कर. मग तर झाले?" तरीही फुगा फुटेना. मग सुमीताई नुसतीच शेजारी बसून राहिली. तेवढ्यात भास्करला ते मघाचे फुलपाखरू दिसले आणि तो आनंदाने आपला रागही विसरून म्हणाला, "सुमीताई ते बघ ते मघाचे फुलपाखरू इकडेच येतेय." सुमीताईने तिकडे पाहिले तर खरेच मघाशी एवढे पळायला लावणारे ते फुलपाखरू शेजारीच एका झुडूपाभोवती घोंगावत होते. "वा किती सुंदर आहे ना सुमीताई हे फुलपाखरू. आपण आजपर्यंत पाहिलेल्यांपैकी सर्वाधिक सुंदर. हो ना?' भास्कर म्हणाला. पण सुमीताईचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. ती त्या फुलपाखराला बघण्यात तल्लीन होऊन गेली होती. "श्श… आवाज आणि हालचाल करू नकोस", असे ती हळूच पुटपुटली. ते फुलपाखरू त्या झुडूपाजवळून उडाले आणि थेट सुमीताईच्या खांद्यावर येऊन बसले. सुमीताईच्या तर आनंदाला पारावार उरला नव्हताच पण भास्करही अगदी हरखून गेला. बस एखाद दोन क्षण आणि लगेच पंख फडकावित ते फुलपाखरू उडूनही गेले. भास्कर म्हणाला, "सुमीताई अगं त्या फुलपाखराने उडताना पंख हलविले ना तेव्हा तुझ्या खांद्यावर सोन्याचे कण पडलेत बघ." सुमीताई म्हणाली, "त्याला मी आवडले ना म्हणून त्याने मला ही भेट दिलीये." "मग ते माझ्या खांद्यावर का नाही बसले?" "कारण त्याला फक्त मीच आवडते." सगळ्या फुलपाखरांना सुमीताईच आवडते हे तर भास्करला चांगलेच ठाऊक होते. मग सुमीताईने हळूच तिच्या खांद्यावर सांडलेले ते पिवळे कण आपल्या वहीच्या पानावर टिपून घेतले.

आज जवळजवळ आठवडाभराने भास्कर वर्गात आला होता, बाहेरचा गुलमोहोर, बाग, माळ, शेत हे काहीही आज त्याला पहावेसे वाटत नव्हते. तो बाहेर पाहतही नव्हता. मध्येच एक वाऱ्याची झुळूक आली आणि बाहेरच्या मोगऱ्याचा गंध वर्गात आला. बाहेर बघणे टाळत असूनही त्या सुगंधाबरोबर सवय म्हणून भास्करची मान बाहेर वळली. नेहमीप्रमाणे त्याची नजर लांब शेतांजवळच्या वळणापर्यंत गेली. त्याला तेच पांढऱ्या रंगाचे घर दिसले, आज काही तिथे सुमीताई दिसणार नाही हे त्याला जाणवले आणि टचकन त्याच्या डोळ्यात पाणी आले. चार दिवसांपूर्वीची गोष्ट, सुमीताई गावात रस्ता ओलांडत असताना एका भरधाव जीपने तिला धडक दिली. तब्बल दोन दिवस ती बेशुद्ध होती. भास्करला तशी अंगभर बँडेज गुंडाळलेली सुमीताई बघून सारखे गलबलून येई. आपली सुमीताई कधी बरी होईल असे तो सारखा त्याच्या आईला, मंदाकाकीला, सखूआजीला विचारत राही. त्याला सुमीताईसाठी काहीतरी करावे असे खूप वाटे पण काय करावे हे सुचत नसे आणि तो अधिकच व्याकुळ होई. दोन दिवसांनी सुमीताई शुद्धीवर आली तेव्हा भास्कर हॉस्पिटलमधेच होता. तिने डोळे उघडून सगळ्यांकडे पाहिले. भास्करकडे पाहून ती हलकेच हसली. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पाचेक दिवसांनी तिला घरी नेता येईल असे डॉक्टर म्हणाले. भास्कर दिवसभर सुमीताईशेजारीच बसून राहिला. तिला बोलता येत नव्हते. ती फक्त डोळे उघडून पाहत असे आणि हलकेसे हसत असे. संध्याकाळीही त्याला तिच्याजवळच थांबायचे होते पण लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये थांबू देत नाहीत असे सांगून त्याच्या आईने त्याला बळेच तिथून घरी नेले. दिवसभर हॉस्पिटलमध्ये तो गांगरून अगदी शांत बसला होता, पण घरी पोचताच मोठमोठ्याने ओक्साबोक्शी रडू लागला. आईने त्याला समजावून थोपटून थोपटून निजवले. पाच दिवसांनी सुमीताईला घरी सोडले. मात्र किमान दोन महिने तिला घरातच विश्रांती घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तसेही तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिला चालता येत नव्हते. भास्करला अशा अवस्थेत सुमीताईला पाहवत नव्हते. पण आता ती बोलू शकत होती ही भास्करसाठी त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट होती. शाळा सुटल्यावर तो पळतच सुमीताईच्या घरी गेला. पण ती झोपलेली होती. तो बराच वेळ थांबला पण ती जागी झाली नाही. मग तो तसाच घरी निघून गेला. आता रोजच शाळेत जाताना आणि शाळेतून येताना भास्कर सुमीताईस भेटायला जाई. तिच्याजवळ बसे, तिच्याशी गप्पा मारी. सुमीताईला फार बोलता यायचे नाही, त्यामुळे भास्करच सगळा वेळ तिला शाळेतल्या, मित्रांच्या गोष्टी सांगत बसे. जवळजवळ महिना लोटला पण अजूनही सुमीताईला चालता येत नव्हते. ती अंथरुणावर कंटाळली होती. पण अजून पायाची झीज भरून यायला खूप वेळ लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. एक दिवस जेव्हा भास्कर शाळेतून येताना तिच्याकडे गेला तेव्हा तिने विचारले, "भास्कर तू माळावर गेला होतास का रे?" भास्कर म्हणाला, "नाही गेलो. तू नाहीस त्यामुळे मला तिकडे जायला आवडत नाही. तू लवकर बरी हो मग आपण दोघे सोबतच जाऊ." "अरे असे नकोस करू. माळावर जात जा की. मघाशी मला या खिडकीतून चारपाच पिवळी फुलपाखरे दिसली. म्हणजे फुलपाखरांचा ऋतू चालू झालाय. पण सगळी फुलपाखरे तेवढी माळावरच येतात. ही उसाची शेते ओलांडून इकडे फारसे कुणी फिरकतच नाही. तू जाउन पहा ना रे, आणि मग मला येउन गम्मत सांग." भास्कर मग मधून मधून माळावर जाई आणि तिथे पाहिलेल्या फुलपाखरांच्या गमतीजमती सुमीताईला येउन सांगे.

एक दिवस मात्र मोठा चमत्कार घडला, भास्कर शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे माळावर गेला, पण माळावर त्याला एकही फुलपाखरू दिसले नाही. त्याने सगळ्या माळावर इकडेतिकडे फिरून पाहिले, पण नाहीच, साधे एक फुलपाखरुही त्याच्या दृष्टीस पडले नाही. त्याला मोठे नवल वाटले. अजून फुलपाखरांना जायला खूप दिवस होते. आता तर कुठे ती मोठ्या प्रमाणात येऊ लागली होती. मग आज अचानक ती कुठे गायब झाली ते त्याला कळेना. तो मग तसाच सुमीताईच्या घरी गेला. तो गेला तेव्हा ती झोपलेलीच होती, बराच वेळ बसूनही ती उठली नाही मग भास्कर तिच्याशी न बोलताच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येताना त्याने माळरानावर नजर टाकली, आज मात्र त्यास तिथे फुलपाखरे उडताना दिसली. त्याला थोडे बरे वाटले. मग शाळा सुटल्या सुटल्या तो लगेच माळरानावर धावला, आणि काय आश्चर्य, सकाळी एवढी बागडताना दिसलेली फुलपाखरे आता परत गायब झाली होती. पुन्हा त्याला एकही फुलपाखरू दिसले नाही. तो हिरमुसून परत सुमीताईला हे सांगण्यासाठी गेला पण ती आजही गाढ झोपलेली होती. त्याला तिला सांगताच आले नाही. असे अजून चारपाच दिवस घडत राहिले. सकाळी दिसणारी फुलपाखरे शाळा सुटल्यावर गायब होत. आणि सुमीताईदेखील नेमकी भास्कर घरी जाण्याच्या वेळेतच झोपलेली असे. त्यामुळे भास्करला हे तिलाही सांगता आले नाही.

एके दिवशी मग भास्करने मनाशी एक निश्चय केला. सकाळी फुलपाखरे दिसतात पण शाळा सुटताना ती नसतात असे का? त्याने नेमके काय होते ते पहायचे ठरविले. मग त्यादिवशी तो मधल्या सुट्टीतच माळावर गेला. त्याला दिसले की फुलपाखरे आज माळावरच होती. सगळीकडे नेहमीसारखी खूप सारी फुलपाखरे होती. मग तो तसाच सुमीताईकडे निघाला. ऊसाच्या शेतांजवळ तो पोचला तेव्हा त्याने परत सहज माळावर वळून पाहिले, आणि त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना, सगळ्या फुलपाखरांनी एक मोठा घोळका केला होता, आणि ती सगळी गावाकडच्या टेकडीकडे उडत चालली होती. भास्कर हे पाहून पळत पळत थेट सुमीताईकडे पोचला. ती झोपायच्याच तयारीत होती. भास्कराला पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने विचारले, "अरे आज तुझी शाळा लवकर सुटली काय?" भास्कर म्हणाला, "नाही, मी मधल्या सुट्टीतच निघून आलोय. मी मागचा आठवडाभर रोज येत होतो पण तू नेमकी झोपलेलीच असायचीस,  मला तुला काहीतरी सांगायचेय. मागचे चार पाच दिवस आणि आजही मी एक खूप चमत्कारिक गोष्ट पाहिली." सुमीताईने भास्करकडे निरखून पाहिले आणि मग हसत म्हणाली, "मला माहितीये तुझी चमत्कारिक गोष्ट." भास्कर म्हणाला, "नाही तू कल्पनाही करू शकणार नाहीस, खूप विचित्र गोष्ट आहे." सुमीताई म्हणाली, "अरे बाबा मला खरेच माहित आहे तुझी विचित्र गोष्ट काय आहे ते." भास्कर म्हणाला, "असे होय? मग सांग बरे ती कोणती गोष्ट आहे?" यावर सुमीताई म्हणाली, "हेच ना की मागचे चारपाच दिवस तुला माळावर फुलपाखरेच दिसली नाहीत?" हे ऐकून आता चाट पडायला आलेल्या भास्करने आश्चर्याने विचारले, "होय, मला हेच सांगायचे होते पण तुला कसे कळले?" सुमीताई नुसतीच हसली. मग भास्कर म्हणाला, "आणि आज तर काय झाले माहित आहे?" "काय?" सुमीताईने विचारले. "अगं आता मघाशी ना, मी पाहिले की माळावरच्या सगळ्या फुलपाखरांनी एक मोठा थवा तयार केला होता आणि ते थव्याने त्या पलीकडच्या टेकडीकडे उडत चालले होते." "काय?" सुमीताई म्हणाली, आणि मग तिने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले, "अगं बाई खरच की, आता त्यांची रोजची वेळ झाली." ती काय बोलतेय हे भास्करला कळेना. "अगं तू काय बोलतेस? कुणाची वेळ झाली? मला काही कळत नाहीये. आधीच माझे डोके फिरलेय, आणि आता तुही असे कोड्यात बोलते आहेस." सुमीताई म्हणाली, "हो हो सांगते सांगते. मी तुला भेटले की लगेच सांगणारच होते पण आपली चार पाच दिवस भेटच झाली नाही ना. एक काम कर, इथे माझ्या उशीखाली माझी फुलपाखरांची वही ठेवली आहे ना ती जरा बाहेर काढ." भास्करने उशीखालून ती वही बाहेर काढली. ही तीच वही होती ज्यात सुमीताई नेहमी कोणत्याही फुलपाखरांच्या पंखांचे सांडलेले रंग टिपून ठेवत असे. त्याने ती काढून तिच्याकडे देऊ केली. ती म्हणाली, "राहू दे तुझ्याकडेच, आता ना जरा तिचे पहिले पान उघड." भास्करने वहीचे पहिले पान उघडले, त्यावर पिवळे पिवळे कण होते,  त्याने ते पान उघडताच त्या कणांतून भुर्र उडत खुप सारी पिवळी फुलपाखरे बाहेर पडली, आणि सगळ्या खोलीत बागडू लागली. मग सुमीताईने त्यास पुढची पाने उघडायला सांगितली, जसजशी तो पाने उघडत होता, तसे तसे त्या पानांवरील विविध रंगांच्या कणांतून वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे बाहेर पडत होती, हळूहळू सगळी खोली विविध रंगांच्या आणि आकारांच्या लक्षावधी फुलपाखरांनी भरून गेली. मग सुमीताई त्याला म्हणाली, "आता इथे ये आणि माझ्या शेजारी झोप." मग भास्कर तिच्या शेजारी जाउन झोपला. "आता डोळे घट्ट मिटून घे." त्याने डोळे मिटले. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. खोलीत आता इतकी फुलपाखरे जमली होती की आजूबाजूस रंगच रंग सोडून काहीही दिसत नव्हते. ती फुलपाखरे हळूहळू जवळ आली, आणि दोघांच्याही भोवती गोळा झाली. मग त्या सगळ्या फुलपाखरांनी सुमीताई आणि भास्कर या दोघांनाही हलकेच उचलले आणि ती त्यांना त्या खोलीतून उचलून घॆउन उंच उंच वर आकाशात जाऊ लागली. 

सुमीताई आणि भास्कर आता ढगांकडे चालले होते. पांढरे शुभ्र ढग.!! भास्करने खाली पाहीले. खाली सगळे काही किती छोटे छोटे दिसत होते. गाव, शाळा, माळ, माळावर एकही फुलपाखरू नव्हते. शाळा सुटली होती आणि पोरांचे घोळके रस्त्यावरून गावाकडे सरकताना दिसत होते. ते दोघे अजून वर गेले. हळूहळू गाव, शाळा, शेते, माळ हे सारे सारे एकमेकांत मिसळून गेले. भास्कर म्हणाला, "किती गम्मत आहे ना सुमीताई, खाली असताना किती लांब वाटतात ही अंतरे. गावाच्या एका टोकावरून शाळेपर्यंत येताना किती थकायला होते. आणि इथून सगळे एका चिमटीत धरता येईल एवढेसेच वाटते. आणि ती नदी बघ ना किती वाकडी तिकडी वाहते. मला तर नेहमी वाटायचे की ती सरळच वाहत असेल. आपल्या टेकडीच्याही पलीकडे एवढा मोठा डोंगर आहे हे तर मला माहीतच नव्हते." सुमीताई अमाप कौतुकाने हे सगळे पाहून हरखून गेलेल्या भास्करकडे पाहत होती. थोड्या वेळाने गावही दिसेनासे झाले. आता ते ढगांत पोचले होते. खालचे काहीही दिसत नव्हते. भास्करने आपले दोन्ही हात पंखांसारखे पसरले. ढगांतून आता त्याला उडण्याचा आनंद मिळत होता. मऊशार लोण्यातून आपण डुंबत आहोत असा त्याला भास झाला. जिकडे पहावे तिकडे नुसता पांढरा शुभ्र रंग. उन्हात अत्यंत तेजाने चकाकणारा.! ते ढगांतून पुढे पुढे जात राहिले. एकामागून एक पडदे उघडावेत तसे पुढे सरकता सरकता ढगांची दारे एकामागून एक उघडली जात होती. भास्करने त्या कापसात गिरक्या घेतल्या, कोलांटउड्या मारल्या. ढगांचे तुकडे हातात तोडून घेतले आणि लांब इकडेतिकडे भिरकावले. सुमीताई आनंदाने वेड्या झालेल्या भास्करला हसून पाहत होती. मग ती म्हणाली, "भास्कर मज्जा आली ना? आता अजून गम्मत पाहण्यासाठी तयार रहा." मग हळूहळू ते खाली येऊ लागले. भास्करने एक ढगाचा मोठा गोळा कवेत धरून ठेवला, पण ढगातून खाली येताच तो विरळ होत जाऊन गायब झाला. भास्करने खाली पाहिले, आपण कुठे आलो आहोत ते त्याला कळेना. खाली जिकडे पहावे तिकडे नुसते रंगच  रंग दिसत होते. कितीतरी वेगवेगळ्या रंगांच्या नद्या वाहत होत्या, लाल रंगाची नदी, पिवळ्या रंगाची नदी, हिरव्या रंगाची नदी तर किती प्रचंड मोठी दिसत होती, आणि इंद्रधनुष्यासारख्या सगळ्या नद्या एकमेकींना समांतर वळणे घेत वाहत होत्या. लांबच लांब सगळ्या जमिनीवर फुलांच्या पखरणी पसरलेल्या होत्या. हवेतून विविध रंगांचे कण इकडे तिकडे उडत होते. थोडे पुढे एके ठिकाणी मोठा धबधबा दिसत होता. सगळ्या रंगीत नद्या त्या प्रचंड मोठ्या धबधब्यावरुन खाली कोसळत होत्या. त्या पाण्याला नेहमीचा आवाज नव्हता, तर त्यातून संगीताचे स्वर उमटल्यासारखे वाटत होते. धबधब्यानंतर पुन्हा नद्या वेगवेगळ्या वाहत असल्या तरी जिथे त्या खाली कोसळत होत्या तिथे आजूबाजूच्या दोन नद्यांचे पाणी काहीसे एकत्रितपणे खालच्या दगडांवर आदळून दोन रंग मिसळून बनणाऱ्या विविध छटांचे तुषार आसमंत भरून टाकत होते. त्या तुषारांवर पडणारी सूर्याची किरणे त्या दृश्यास एक अलौकिक आणि स्वर्गीय झळाळी देत होती.

हळूच मग ते दोघे एका मोठ्या फुलात उतरले. मग त्या फुलाच्या पाकळीवरून हळूच घसरगुंडी करून दोघे खाली आले.  दोन फुलपाखरे त्यांच्या पुढे आली, त्या दोन फुलपाखरांच्या मागे एक फुलांचा सुंदर रथ होता आणि त्यात एक परी बसलेली होती. तिने दोघांना "सुस्वागतम" म्हंटले आणि माझ्या मागे या असे सांगितले. भास्करने सुमीताईचा हात हातात धरला आणि दोघे परीच्या मागे चालू लागले. आजूबाजूला हजारो रंगांची फुलपाखरे रांगेने उभी होती. पंख फडकावून ती सगळी या दोघांचे स्वागत करीत होती. चालता चालता ते एका ठिकाणी पोचले. तिथे विविधरंगांची तळी होती. त्या तळ्यांतून काही फुलपाखरे आपल्या सोंडेत रंग भरून घेऊन वेगवेगळ्या फुलांवर शिंपित होती. काही फुलपाखरे दुसऱ्या फुलपाखरांचे पंख रंगवीत होती. थोडे पुढे गेल्यावर अतिशय सुगंधी दर्प येऊ लागले. त्या दर्पांनी सुमीताई आणि भास्करची मने अत्यंत उल्हासित झाली. तिथे एका मोठ्या सोनेरी झाडातून एक अत्तराची धार निघत होती. त्या धारेतले अत्तर कुपिंत भरून त्यात वेगवेगळी द्रव्ये मिसळून निरनिराळ्या फुलांत ओतली जात होती. भास्करने आपल्या शाळेच्या पांढऱ्या शर्टवर सगळ्या रंगांनी फुलपाखरांसारखे रंगवून घेतले. अत्तराच्या धारेखाली ओंजळ भरून घेऊन दीर्घ श्वासाने तो दिव्य सुगंध उरात भरून घेतला. उरलेली ओंजळ हात उंचावून चोहिंकडे शिंपडली. चहूबाजूंनी पसरलेल्या फुलपाकळ्यांवर मनसोक्त हुंदडला.

भास्करने परीला विचारले, "इथे फुलपाखरांना आणि फुलांना रंग दिला जातो, पण आमच्याकडे तर फुले आणि फुलपाखरे रंगीतच जन्मास येतात." परी हसली. ती म्हणाली, "तुमच्या इथे दिसणारी फुले ही येथूनच रंगवून पाठविलेली असतात. हे बघा, या इथे रंगवून झालेली सगळी फुले आणि फुलपाखरे ही अशी सगळ्या बाजूंनी क्षितिजापर्यंत उडत जातात, आणि मग जगभरात पसरतात. ज्या रंगांच्या नद्या तुम्ही येताना पाहिल्या असतील, त्याही वाहत जाऊन क्षितिजावर पोचल्यावर इंद्रधनुष्य बनून आकाशात जातात, आणि तिथूनच सगळ्या जगावर रंगांची पेरण करतात. सगळे काही कसे अगदी एका लयबद्ध रीतीने प्रमाणशीरपणे आणि सृष्टीचक्राच्या नियमानुसार चालू असते. तुम्हाला दिसणारे सारे रंग गंध हे इथूनच पाठविलेले असतात." भास्कर आश्चर्याने स्तिमित झाला. आपण काहीतरी खूप भव्य दिव्य बघत आहोत हे त्याला जाणवले. परीने मग भास्कर आणि सुमीताईला चालत चालत एका विशालकाय महालाकडे नेले. महाल कसला, मोठा अवाढव्य संगमरवरी पर्वतच होता जणू तो.! विविधरंगी अन वेगवेगळ्या आकारांच्या सुंदर सुंदर फुलांनी आच्छादलेला.!! एका मोठ्या वेलींच्या दरवाजातून ते दोघे आत गेले. मुख्य गाभ्यात रंगीत काचांच्या तावदानांतून विविधरंगी प्रकाशझोत आत येउन आतल्या सफेद संगमरवरी भिंती आणि फरशीस रंगवीत होते. त्या कवडशांतून मधेच वेगवेगळ्या रंगांचे परागकण दिसत आणि त्यांच्यावर पडून रंगांचा प्रकाश चारही बाजूंस परावर्तित होई तेंव्हा भिंतींवर प्रकाशाची सजावट केल्यासारखे वाटे. हवेत एक आल्हाददायक सुगंध आणि गारवा भरून राहिलेला होता. परीने दोघांस समोरच्या जिन्याने चढून वरच्या शय्याकक्षात नेले.  तिथे फुलांनी सजविलेली एक शेज होती. तिथे पोचल्यावर परीने त्यांस सांगितले की तुमची आजची फेरी पूर्ण झाली आहे आता तुम्ही दोघांनाही या शेजेवर विश्रांती घ्यावी. मग परीने दोघांना तिथे निजवले. वेलीफुलांची एक चादर त्यांच्या अंगावर टाकली. ती चादर टाकताच दोघांनाही झोप येऊ लागली, मग थोड्याच वेळात ते झोपूनही गेले.

जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते परत सुमीताईच्या घरातल्या तिच्या पलंगावर होते. भास्कर कमालीचा खुश होता. "काय मग कसे वाटले?" सुमीताईने भास्करला विचारले. भास्कर म्हणाला, "मला किती मज्जा आलीय म्हणून सांगू सुमीताई. पण हे स्वप्न तर नव्हते ना?" सुमीताई म्हणाली, "अरे वेड्या हे स्वप्न असते तर आपल्या दोघांनाही एकच स्वप्न कसे पडेल?" भास्करने मान डोलावली आणि म्हणाला, "हो की. माझ्या हे लक्षातच आले नाही. आणि तसेही सुमीताई तू म्हणतेस ते सगळे खरेच असणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे.  पण तुला तिकडे अशाप्रकारे जाता येईल हे कसे काय कळले?" सुमीताई म्हणाली, "अरे त्या मागे नाही का मी तुला सांगितले की माळावर फुलपाखरे बघून येत जा म्हणून? मग तू माळावर जाउन मला सगळी गम्मत येउन सांगायचास, तेव्हा तू निघून गेलास की मला तिकडे जाता येत नाही याचे मला खूप रडू यायचे. एक दिवस तू निघून गेल्यावर मी अशीच अंथरुणात खूप रडत होते. मला माळ, फुलपाखरे बघता येत नाहीत म्हणून मी खूप निराश झाले होते. मग मी ठरविले की खिडकीतून जमेल तेवढे बाहेर फुलपाखरे बघायची. मी पलंगावरून उठले. आणि खिडकीकडे जाण्यासाठी पाउल टाकले. पण पहिलेच पाउल टाकल्याबरोबर माझ्या पायात प्रचंड कळ आली, आणि वेदना सहन न होऊन माझा तोल गेला. मी पलंगास धरून सावरण्याचा प्रयत्न केला पण अंथरूणच खाली ओघळून आले, आणि मी खाली पडले. बराच वेळ मला काही कळले नाही. जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत एक सुंदर फुलपाखरू आले होते. मी जागी होताच ते समोर आले आणि माझ्या हाताच्या बोटावर बसले. त्यानंतर ते उडाले आणि जवळच पडलेल्या माझ्या या वहीवर जाउन बसले. मग परत वहीवरून उठून माझ्या हातावर आले. असे त्याने दोन तीन वेळा केल्यावर मला वाटले की ते मला वहीत काहीतरी शोधायला सांगते आहे. म्हणून मी वही उघडली आणि मग जशी जशी मी वहीची पाने उघडत गेले तशी तशी त्या पानांतून आजच्यासारखीच कित्येक फुलपाखरे बाहेर पडली. आणि त्यांनी मला अलगद उचलून पलंगावर ठेवले आणि मग ती मला उचलून त्यांच्या दुनियेत घेऊन गेली." "ताई म्हणजे तू रोज जातेस त्या फुलपाखरांच्या दुनियेत?" "हो. मला खूप छान वाटते. तुला मी मागे म्हंटले होते ना की हेच माझे स्वप्न होते? ते स्वप्न अशा रीतीने रोज रोज पूर्ण होताना पाहायला मला खूप आवडते." "मग आता मलाही रोज जायचे आहे तुझ्याबरोबर." "नाही नाही हे चालणार नाही. कारण ती फुलपाखरे रोज दहा वाजताच येतात तेव्हा तुझी शाळा असते.  रोज येण्यासाठी तुझी शाळा रोज बुडेल. त्यापेक्षा असे कर, रविवारी सुट्टीच्या दिवशी तू वेळेवर येत जा मग तेव्हा मी तुला घेऊन जात जाईल. ठीक आहे?"  सुमीताईने भास्करला काही सांगितले आणि त्याला ते पटले नाही असे कधीच झाले नव्हते त्यामुळे याहीवेळी त्याला तिचे म्हणणे पटले आणि तो पुढच्या रविवारची वाट पाहत तिथून निघून गेला.

रविवारी सकाळीच भास्कर सुमीताईच्या घरी पोचला. पण तिथे गेला तर त्याला कळले की सुमीताईस चेकअपसाठी हॉस्पिटलला नेलेले आहे. त्याला फार वाईट वाटले. कारण आता जर तो त्या सफरीवर गेला नाही तर थेट आठवडाभरानेच जाता येणार होते. त्याला काय करावे ते सुचेना. मनात किंचितसे चाचरतच तो सुमीताईच्या खोलीत पोचला. दहा वाजायला फक्त पाच मिनिटे बाकी होती. त्याला काय करावे ते सुचेना. त्याच्या मनाचा मोठा गोंधळ झाला होता. सुमीताईची वही उघडून पहावी काय? एक मिनिटभर तो अस्वस्थपणे बसून राहीला. आता दहा वाजायला केवळ एक मिनिट बाकी होता, भास्करला राहवले नाही. तो तडक उठला आणि सुमीताईच्या बिछान्याजवळ गेला, तिथे जाऊन त्याने उशी बाजूला केली. वही त्याखालीच ठेवलेली होती. त्याने वहीचे पान उचकले, आणि पानावरून पिवळी फुलपाखरे बाहेर पडली. मग त्याने एकेक करून सारी पाने उघडली. आणि मग सगळी फुलपाखरे बाहेर आल्यावर तो डोळे मिटून बिछान्यावर पडला. फुलपाखरांनी त्याला हलकेच उचलले आणि पुन्हा वर वर उडत घेऊन गेले.

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर भास्कर सुमीताईला भेटायला गेला. सुमीताईने त्याला विचारले, "तू काल आला होतास का? अरे ते एक जिल्ह्याच्या शहरातले डॉक्टर आहेत ते फक्त रविवारीच आपल्या गावी येतात. म्हणून नेमके रविवारीच मला जावे लागले. त्यामुळे तुला मी सफरीवर नेऊ शकले नाही म्हणून तुझी माफी मागते." भास्कर म्हणाला, "नाही सुमीताई, अगं मी काल इथे आलो होतो, आणि तू नव्हतीस तरी मी तुझी वही उघडून पाहीली, तर पुन्हा जादू झाली, आणि मी एकट्याने सफर करून आलो." "अरे वा. बरे झाले म्हणजे माझी काळजी मिटली. उगीच मनाला रुखरुख लागून राहिली होती रे. म्हणजे आता पुढेही रविवारी मी हॉस्पिटलला गेले तरी तू एकटाच जाऊ शकशील. नाही का?" भास्कर म्हणाला, "पण मला तुझ्याबरोबरच अधिक मजा आली होती एकट्याने नाही आली." सुमीताई म्हणाली, "अरे फक्त एकदोन रविवार अजून. मग आपण दोघे मिळूनच जात जाऊ ठीक आहे?"

आपण किती गम्मत केली, करतो ते भास्करला कुणालातरी सांगावेसे वाटे. त्याला वाटे की आपण किती भाग्यशाली आहोत ते सगळ्यांना कळावे. मग त्याने सर्वात आधी त्याच्या आईला सांगितले. आई म्हणाली अरे वेड्या स्वप्न पडले असेल तुला, असे काही नसते बरे. मग त्याने शेजारच्या काकुला सांगितले, वर्गातल्या त्याच्या सगळ्या मित्रांनाही सांगितले. पण सगळ्यांनी त्याला वेड्यातच काढले. तू स्वप्नच पाहिले होतेस आणि असे कधी घडूच शकत नाही असे त्यास सगळे म्हणाले. मग शेवटी चिडून भास्कर शनिवारी त्याचा मित्र दिन्यास म्हणाला, "खोटे वाटतेय ना? मग उद्या तू माझ्याबरोबर चल, तुलाही जादूच्या सफरीवर घेऊन जातो." दिन्या तयार झाला. मग रविवारी दोघे सुमीताईच्या घरी पोचले. आजही ती डॉक्टरांना भेटायला गेली होती. भास्कर दिन्याला घेऊन थेट सुमीताईच्या खोलीकडे गेला. दिन्या त्याला म्हणाला, "अरे या अशा औषधांच्या वासाने भरलेल्या खोलीत फुलपाखरे चुकूनही येणार नाहीत. मला तर इथे गुदमरायला होते आहे. चल, मला नको तुझी जादूची सफर बिफर." भास्कर म्हणाला, "तू थांब तर, मग तुला मी दाखवतोच." दहा वाजले आणि दिन्याने सुमीताईची वही घेतली. "आता बघच हं तू दिन्या" असे म्हणून त्याने वहीचे पहिले पान उघडले. त्यावर पिवळे पिवळे रंगाचे कण होते. भास्करने पान उघडून समोर धरले, पण त्यातून फुलपाखरे बाहेर येईनात. भास्कर कासावीस झाला. मग त्याने घाईने पुढची पाने उघडली. पण व्यर्थ.! सगळी वही दोन तीन वेळा उघडूनही फुलपाखरे आलीच नाहीत. दिन्या म्हणाला, "अरे कुठे आहेत फुलपाखरे? नक्कीच तुला वेड लागले आहे. मीही मूर्खच होतो की अश्या वेड्याचे म्हणणे ऐकून इकडे आलो. परत तुझे मी काहीही ऐकणार नाही." असे म्हणून दिन्या निघून गेला. भास्करला आज असे का झाले तेच कळेना. कदाचित वहीची जादू आता संपली असावी असा विचार त्याच्या मनात आला. तो खूप हिरमुसला झाला आणि घरी निघून गेला.
                            
सुमीताईला दवाखान्यातच ठेवले गेले, त्यामुळे ती तीनचार दिवस घरी आली नाही. आता जादू संपली असावी अशी भास्करची ठाम खात्री झाली होती. सुमीताईला काय वाटेल याची काळजी त्याला सारखी खात होती. त्यात दिन्याने त्याची फजिती सगळ्या शाळेत सांगून दिल्याने त्याला सगळे 'वेडा रे वेडा' असे चिडवीत होते. मग शनिवारी सुमीताई घरी आली आणि रविवारी सकाळीच भास्कर तिला भेटायला गेला. गेल्यागेल्या भास्करने तिला सगळी हकीगत सांगितली, आणि बहुदा मी सगळ्यांना सांगितल्यामुळेच जादू नष्ट झाली असेल, त्यामुळे मला माफ कर असे म्हणून तो रडू लागला. सुमीताई त्याला म्हणाली, "अरे रडू नकोस. थांब आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू. आणि जादू संपली तर संपू दे की. आपण जे पहायचे होते ते पाहून तर घेतलेच आहे ना? चल बरे आता डोळे पूस. दहा वाजणार आहेत, आपण एकदा प्रयत्न करून पाहूयात." मग भास्करने डोळे पुसले. उसासे टाकत उशीखालून सुमीताईची वही काढली, आणि तिचे पहिले पान उघडले. पिवळ्या कणांचे पान..! भास्करने ते पान उघडून समोर धरले, त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती, त्याने अपराधी भावनेने डोळेच मिटून घेतले होते. मग सुमीताईने त्याला आवाज देऊन सांगितले की भास्कर आता पुढचे पान उघड. पुढचे पान उघडण्यासाठी भास्करने हळूच डोळे उघडले, आणि पाहिले तर खोलीत खुपशी पिवळे फुलपाखरे आली होती, आणि सुमीताई हसत होती. ते पाहून भास्करचा पडलेला चेहरा लगेच खुलला, आणि त्याने पुढची पाने उघडली, त्यातून आधीसारखीच हजारो विविधरंगी फुलपाखरे बाहेर पडली. मग भास्कर जाऊन सुमीताईशेजारी डोळे मिटून पडला. परत फुलपाखरांनी दोघांना उचलले आणि वर वर घेऊन गेले.

तिकडे फुलपाखरांच्या जादुई दुनियेत मग महालात पोचल्यावर न राहवून भास्करने परीस विचारले. "मागच्या वेळी वहीने काम झाले नाही. वहीतून एकही फुलपाखरू बाहेर पडले नाही. मला तर वाटले की वहीची जादू संपली की काय." परीने हसून भास्करकडे पाहिले आणि म्हणाली, "हो मला ठाऊक आहे. मागच्या रविवारी तू इकडे येण्याचा प्रयत्न करत होतास असा संदेश मला मिळाला होता." "हो पण मला येता आले नाही असे का बरे?" परीने विचारले, "मागच्या वेळी तुझ्याबरोबर कुणी दुसरेही होते का?" भास्कर म्हणाला, "होय. तो माझा मित्र दिनू होता. त्याचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून मला त्याला इथे प्रत्यक्ष आणून सगळे दाखवायचे होते. पण तसे काही घडलेच नाही. असे का झाले?" परी म्हणाली, "भास्कर तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तरदेखील दडलेले आहे. तुला माहितीये तुझ्या सुमीताईबरोबर तुलाही इकडे कसे येता आले? कारण तुझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. आणि जगातली कुठलीही सुंदर गोष्ट पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी अथवा तिचे परमोच्च सुख मिळविण्यासाठी आवश्यक असतो तो त्या गोष्टीवरचा किंवा ती आपणास देवविणाऱ्या माणसावरचा विश्वास.!! मात्र दिनूचा तुझ्यावर किंवा तू सांगितलेल्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. किंबहुना तो तुझी फजिती पाहण्यासाठीच आला होता, त्यामुळे त्याला आणि त्याच्यासोबत असल्याने तुलाही हे दिसणे शक्यच नव्हते. एवढेच नाही तर जेव्हा तू सुमीताईच्या अपरोक्ष तिची वही उघडलीस तेव्हापासून तुलाही पुन्हा इथे येणे बंद होऊ शकले असते. मात्र तुझे मन शुद्ध होते, तुझी इथे येण्याची तळमळ ही मनापासून होती, म्हणून तू इथे येऊ शकलास. आणि त्यानंतर सुमीताई भेटताच तू तिला प्रामाणिकपणे सगळे सांगितलेस व तिनेही ते सहजगत्या स्वीकारले म्हणून आज तुम्हा दोघांनाही परत इथे येता आले. शुद्ध आंतरिक ओढ, प्रामाणिकपणा आणि विश्वास हीच कोणतेही सुख मिळविण्याची त्रिसूत्री आहे. जोपर्यंत तुम्ही दोघे ही त्रिसूत्री पाळाल तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा इथे येऊ शकाल. जर सुमीताईने हे पहिल्यांदाच तुझ्यापासून लपवले असते तर तिलाही पुन्हा इथे येता आले नसते. पण तिने अगदी मनमोकळेपणाने तुला हे सांगितले, आणि सुख हे इतरांस वाटल्यानेच टिकते आणि वाढते. त्यामुळे तुम्ही पुढेही हे कुणापासून लपवू नका. ज्यांचा तुमच्यावर विश्वास असेल त्या तुमच्यासारख्याच कितीही जणांना तुम्ही इथे आणू शकाल." आपण आयुष्यभर इथे येऊ शकतो हे ऐकल्यावर भास्करने अतिशय आवेगाने त्याच्या सुमीताईला मिठी मारली. तिच्यामुळेच त्याला ही दिव्य सृष्टी पहायला मिळाली होती. तिच्याही डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. दोघेही कितीतरी वेळ तसेच निश्चल उभे राहिले. बऱ्याच वेळाने परीनेच दोघांना आवाज देऊन सांगितले की, "आजची आपली सफर पूर्ण झाली आहे, तेव्हा कृपया शय्यागृहातील बिछान्यावर विश्राम करावा."  मग दोघेही अपार आनंदात तिथे बिछान्यावर जाऊन पहुडले. परीने वेलीफुलांची चादर त्यांच्या अंगावर टाकली, आणि हळूहळू दोघांच्याही डोळ्यांत झोप दाटू लागली..