हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

फुलपाखरे



एक शहरवजा गाव, गावात शाळा, शाळेत चौथीचा वर्ग, वर्गाच्या ब तुकडीत भिंतीकडील रांगेच्या तिसऱ्या बेंचवर बसणारा भास्कर. बेंचशेजारीच खिडकी, खिडकीबाहेर एका बाजूला गुलमोहोराचे झाड, अन दुसऱ्या बाजूला मुख्याध्यापकांनी मुलांकडून बनवून, निगा राखून फुलवलेली फुलझाडांची बाग. बाजूने झेंडू, मग सदाफुली, त्यापुढे निशिगंध, मग वेगवेगळ्या तऱ्हेचे कितीतरी गुलाब, बाजूला मोगरा, त्यांच्यापुढे मोठी झालेली दोन चाफ्याची झाडे, आणि भिंतीच्या बाजूला उगीच फोफावलेला जास्वंद. दोन्ही चाफ्यांच्या मधल्या जागेत एक संपूर्ण वाफा जरबेराच्या विविधरंगी फुलांचा. पुढे शाळेच्या बाउन्ड्रीवर रेषेत लावलेली कर्दळ. कर्दळीच्या पुढे पडका माळ, त्याच्यावर अशीच कधीमधी विरळ फुलणारी रानफुले, माळावर उगीच जमिनीवरच्या विरळ गवताच्या बुंध्यांना तोंड लावीत हिंडणारी गुरे. माळाच्या पुढे दूर उसाची हिरवीगार शेते, त्या शेतांच्या पलीकडे गावातली घरे, यस्टीचे स्टॅंड, बाजारपेठ आदि. पण भास्करला शेतांच्या पुढचे गाव अजिबात दिसायचे नाही. शाळेच्या पुढच्या बाजूने गावात जाणारा रस्ता त्याला शेतांजवळील वळणापर्यंत दिसायचा. तोही रोज तिथवरच बघायचा. तिथे वळणाच्या बाजूला पांढऱ्या भिंतींचे एकुलते एक घर दिसायचे. गावाच्या सुरुवातीलाच असलेले हेच एकमेव घर शाळेतून दिसे. खरेतर एवढ्या दुरवर काही स्पष्ट दिसत नसे पण तरीही भास्कर सारखा अधूनमधून घराकडेच पाहत राही. घरापुढे सगळ्यात आधी एक आकृती दिसे मग तो ओळखे की ही मंदाकाकी, दुसरी थोडी छोटी आकृती दिसली की सखूआजी. कधी कधी मग मधूनच एक खूप इकडे तिकडे फिरणारी आकृती दिसे, आणि भास्करच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरे. मग तो हर्षून तिलाच निरखित राही. ती अवखळ आकृती असे सुमीताईची. भास्करची खूप आवडती ताई. ती भास्करचे खूप लाड करी आणि भास्करलाही तिचा फार लळा होता. सुमीताई यंदाच नववीत गेली होती, नववी, दहावीची शाळा दुपारी भरे. मागची तिन्ही वर्षे भास्कर सुमीताईबरोबरच शाळेत येई. त्याला तिच्याबरोबर शाळेत यायला खूप मजा येई. यंदा त्याला तिच्याविना यायला अजिबात आवडत नसे. मग तो खिडकीतून सारखा घराबाहेर सुमीताई दिसते का ते बघत राही. 

सुमीताईला फुलपाखरे खूप आवडत, मागच्या वर्षीपर्यंत सकाळची शाळा सुटली की इतर मुलांबरोबर सरळ रस्त्याने न जाता सुमीताई भास्करबरोबर बागेत जाई, तिथून मग समोरच्या माळावर फिरत ते दोघे पुढे घरी पोचत. बागेत फुले फुललेली असली की खूप फुलपाखरे बागडताना दिसत. समोर माळरानावर तर फुलपाखरांची जत्राच भरलेली असे. छोटी छोटी पिवळी फुलपाखरे संख्येने सर्वाधिक दिसत. लाल ठिपक्यांची काळी फुलपाखरे, निळ्या पंखांची फुलपाखरे, पंखांवर मोरपिसासारखा डोळा असणारी फुलपाखरे, राजा, राणी नावाची मोठी फुलपाखरे, करडी, पांढरी, विविधरंगी फुलपाखरे.!! कित्येकवेळा फुलपाखरे आपसूक येउन सुमीताईच्या खांद्यावर, डोक्यावर, हातावर बसत. अशावेळी सुमीताई अगदी निस्तब्ध बसून राही. मग फुलपाखरेही कित्येकवेळ तशीच बसून राहत. कधीकधी तर चार पाच फुलपाखरे एकाचवेळी तिच्या अंगावर येउन बसत. भास्करच्याही अंगावर कधी चुकून एखादे फुलपाखरू येउन बसे पण त्याला निश्चल राहताच येत नसे, त्यामुळे ते लगेच उडून जाई. फुलपाखरांशी सुमीताईचे हे सुंदर नाते पाहून भास्करला फार छान वाटे. कुठेही एखादे नवे किंवा तिचे खूप आवडते फुलपाखरू दिसले की तो लगेच तिला ते दाखवत असे. भास्करने एकदा एक फुलपाखरू पकडले, दोन बोटांच्या चिमटीत त्याचे पंख पकडून तो सुमीताईला ते दाखवायला गेला. ते बिचारे भास्करच्या हातातून सुटण्यासाठी फडफडत होते. सुमीताईने ते पाहिले आणि ती भास्करला रागेच भरली. "अरे असे का पकडलेस त्याला? बघ बरे त्याला किती त्रास होतोय. त्याचे पंखसुद्धा फाटले. आता बिचारे उडता नाही आले तर मरून जाईल. चल सोड पाहू त्याला." भास्करलाही आपल्यामुळे एवढे सुंदर फुलपाखरू मरणार याचे वाईट वाटले, आणि त्याने ते फुलपाखरू सोडून दिले. त्याचा एक पंख फाटलेला असूनही ते उडाले आणि दूर निघून गेले. "खरेच का गं ते फुलपाखरू माझ्यामुळे मरेल सुमीताई? अगं खूप सुंदर होते म्हणून मी तुला दाखविण्यासाठी पकडून आणले. मला आता पाप लागेल ना?" यावर मग सुमीताईने भास्करला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली, "नाही रे बाबा, तुला पाप नाही लागणार हो. ते मेले तरी पाप मलाच लागेल, कारण मला दाखविण्यासाठीच तर तू त्याला पकडले होतेस ना?" यावर भास्करचे समाधान होण्याऐवजी तो अजूनच कोमेजला. त्याच्या चेहऱ्यावर 'आपल्यामुळे सुमीताईला पाप लागणार' या अपराधाची भावना अजूनच गडदली. ते पाहून मग सुमीताईच म्हणाली,  "काळजी करू नकोस रे नाही मरणार. बघ ना पंख फाटूनही छान उडाले ना? आता जगेल ते." मग ती म्हणाली तुझा हात पाहू, भास्करने तिला हात दाखवला, हाताच्या बोटांवर त्या पकडलेल्या फुलपाखराचे रंग माखून राहिलेले होते. छोटे छोटे चमकणारे रंगबिरंगी कण.! सुमीताईने ते हळूच आपल्या वहीच्या पानावर उमटवून घेतले आणि म्हणाली, "भास्कर बघ, तू त्या फुलपाखराचे पंख फाडूनही त्याने तुझ्या हातावर किती सुंदर रंगांची नक्षी भेट दिली. आपल्याला त्रास देणारांनाही आपण असे प्रेमाने काही दिले की देव आपल्याला फुलपाखरासारखेच सुंदर बनवतो. तू सुद्धा फ़ुलपाखरासारखा बनशील ना?" भास्करने मान डोलावली. खरेतर सुमीताईचे फुलपाखरांवरचे प्रेम पाहून भास्करलाही आपणच फुलपाखरू असल्यासारखे वाटे. कारण ती जशी फुलपाखरांची काळजी घेई त्यांच्यावर जीव ओवाळून टाकी तशीच ती भास्करशीही वागे. कुणी भास्करला त्रास दिलेला तिला सहन होत नसे. एकदा एका मुलाने तिला आपल्या वहीत दाबून ठेवलेली चारपाच फुलपाखरे दाखवली तेव्हा ती फार ओरडली त्याच्यावर. 'पुन्हा असे केलेस तर याद राख' असे ती त्याला म्हणाली आणि ती सगळी फुलपाखरे अलगद काढून घेऊन तिने माळावर जाउन एका खड्ड्यात पुरून टाकली. भास्कर म्हणायचा, "तुला एवढी आवडतात ना फुलपाखरे? मग तू या माळावरच का राहत नाहीस?" सुमीताई म्हणाली, "मला तर खरेच असे वाटते की इथेच रहावे. मस्तपैकी या माळावर पहुडावे, मग एखाद्या फुलपाखराने हळूच माझ्या गालांवर पंख फडकावून मला जागे करावे. मी खूप खूप फुलपाखरांना आवाज द्यावा, आणि त्यांनी चोहीकडून उडत उडत येउन माझ्या सर्वांगावर बसावे. कधी मला अलगद उचलून लांब ढगांची सफर करवून आणावी. त्यांच्या पंखांना जिथून रंग मिळतात तिथे मला न्यावे, मला सुंदर सुंदर सुगंधी फुलांच्या सान्निध्यात नेउन ठेवावे..." असे काही बोलू लागली की सुमीताई बोलतच राही, आणि भास्करसुद्धा कितीही वेळ ते भारावून ऐकत राही. 
कधीकधी तर माळावर एखादे खूप दुर्मिळ फुलपाखरू दिसले की सुमीताई पार वेडी होऊन जाई, दप्तर खाली टाकून ती कितीतरी वेळ त्याच्या मागे मागे धावत राही, आणि भास्कर तिच्यामागे धावत राही. एकदा त्यांना एक निळ्या, हिरव्या अन लाल रंगाचे खूप डोळे असलेले एक पिवळसर चमक असणाऱ्या पंखांचे फुलपाखरू दिसले. सुमीताई म्हणाली, "भास्कर अरे बघ ना किती सुंदर आहे हे फुलपाखरू, चल आपण त्याच्या मागे फिरूयात." मग भास्करच्या प्रतिसादाची वाटही न पाहता तिने दप्तर खाली टाकले आणि त्या फुलपाखराच्या मागे मागे पळू लागली. भास्करही तिच्याबरोबर पळू लागला. हे फुलपाखरू फारच चपळ होते. त्याच्याबरोबर खूप वेळ धावताना सुमीताई काही थांबेना, पण भास्कर मात्र पार थकून गेला. मग तो धापा टाकत कमरेत वाकून गुडघ्यांवर हात ठेवून एका जागी उभा राहीला. आणि म्हणाला, "सुमीताई आता बस झाले, मी पार दमलोय, आता थांब आणि चल घरी जाउयात." सुमीताई थांबली. "असा कसा रे तू फुसक्या भास्कर? लगेच दमतोस. तुझे नाव भास्कर नाही तर फ़ुस्कर असायला पाहिजे होते. किती सुंदर होते ते फुलपाखरू, बघ तुझ्यामुळे हरवले ना आता? भास्कर फुस्कर कुठला." फुस्कर म्हंटले की भास्करला खूप राग येई. मग तो चिडून तोंड फुगवून बसला. सुमीताई त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, "बाई गं एका पोराच्या गालाचा तर फुगा झालाय. दोरी बांधली तर खेळता पण येईल." असे म्हणून ती त्याच्या शेजारी हसत हसत बसली. भास्करचा फुगा अजून थोडा मोठा झाला. मग म्हणाली, "ठीक आहे बाबा, आजपासून मी नाही म्हणणार तुला फुस्कर. मग तर झाले?" तरीही फुगा फुटेना. मग सुमीताई नुसतीच शेजारी बसून राहिली. तेवढ्यात भास्करला ते मघाचे फुलपाखरू दिसले आणि तो आनंदाने आपला रागही विसरून म्हणाला, "सुमीताई ते बघ ते मघाचे फुलपाखरू इकडेच येतेय." सुमीताईने तिकडे पाहिले तर खरेच मघाशी एवढे पळायला लावणारे ते फुलपाखरू शेजारीच एका झुडूपाभोवती घोंगावत होते. "वा किती सुंदर आहे ना सुमीताई हे फुलपाखरू. आपण आजपर्यंत पाहिलेल्यांपैकी सर्वाधिक सुंदर. हो ना?' भास्कर म्हणाला. पण सुमीताईचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. ती त्या फुलपाखराला बघण्यात तल्लीन होऊन गेली होती. "श्श… आवाज आणि हालचाल करू नकोस", असे ती हळूच पुटपुटली. ते फुलपाखरू त्या झुडूपाजवळून उडाले आणि थेट सुमीताईच्या खांद्यावर येऊन बसले. सुमीताईच्या तर आनंदाला पारावार उरला नव्हताच पण भास्करही अगदी हरखून गेला. बस एखाद दोन क्षण आणि लगेच पंख फडकावित ते फुलपाखरू उडूनही गेले. भास्कर म्हणाला, "सुमीताई अगं त्या फुलपाखराने उडताना पंख हलविले ना तेव्हा तुझ्या खांद्यावर सोन्याचे कण पडलेत बघ." सुमीताई म्हणाली, "त्याला मी आवडले ना म्हणून त्याने मला ही भेट दिलीये." "मग ते माझ्या खांद्यावर का नाही बसले?" "कारण त्याला फक्त मीच आवडते." सगळ्या फुलपाखरांना सुमीताईच आवडते हे तर भास्करला चांगलेच ठाऊक होते. मग सुमीताईने हळूच तिच्या खांद्यावर सांडलेले ते पिवळे कण आपल्या वहीच्या पानावर टिपून घेतले.

आज जवळजवळ आठवडाभराने भास्कर वर्गात आला होता, बाहेरचा गुलमोहोर, बाग, माळ, शेत हे काहीही आज त्याला पहावेसे वाटत नव्हते. तो बाहेर पाहतही नव्हता. मध्येच एक वाऱ्याची झुळूक आली आणि बाहेरच्या मोगऱ्याचा गंध वर्गात आला. बाहेर बघणे टाळत असूनही त्या सुगंधाबरोबर सवय म्हणून भास्करची मान बाहेर वळली. नेहमीप्रमाणे त्याची नजर लांब शेतांजवळच्या वळणापर्यंत गेली. त्याला तेच पांढऱ्या रंगाचे घर दिसले, आज काही तिथे सुमीताई दिसणार नाही हे त्याला जाणवले आणि टचकन त्याच्या डोळ्यात पाणी आले. चार दिवसांपूर्वीची गोष्ट, सुमीताई गावात रस्ता ओलांडत असताना एका भरधाव जीपने तिला धडक दिली. तब्बल दोन दिवस ती बेशुद्ध होती. भास्करला तशी अंगभर बँडेज गुंडाळलेली सुमीताई बघून सारखे गलबलून येई. आपली सुमीताई कधी बरी होईल असे तो सारखा त्याच्या आईला, मंदाकाकीला, सखूआजीला विचारत राही. त्याला सुमीताईसाठी काहीतरी करावे असे खूप वाटे पण काय करावे हे सुचत नसे आणि तो अधिकच व्याकुळ होई. दोन दिवसांनी सुमीताई शुद्धीवर आली तेव्हा भास्कर हॉस्पिटलमधेच होता. तिने डोळे उघडून सगळ्यांकडे पाहिले. भास्करकडे पाहून ती हलकेच हसली. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पाचेक दिवसांनी तिला घरी नेता येईल असे डॉक्टर म्हणाले. भास्कर दिवसभर सुमीताईशेजारीच बसून राहिला. तिला बोलता येत नव्हते. ती फक्त डोळे उघडून पाहत असे आणि हलकेसे हसत असे. संध्याकाळीही त्याला तिच्याजवळच थांबायचे होते पण लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये थांबू देत नाहीत असे सांगून त्याच्या आईने त्याला बळेच तिथून घरी नेले. दिवसभर हॉस्पिटलमध्ये तो गांगरून अगदी शांत बसला होता, पण घरी पोचताच मोठमोठ्याने ओक्साबोक्शी रडू लागला. आईने त्याला समजावून थोपटून थोपटून निजवले. पाच दिवसांनी सुमीताईला घरी सोडले. मात्र किमान दोन महिने तिला घरातच विश्रांती घ्यावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तसेही तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिला चालता येत नव्हते. भास्करला अशा अवस्थेत सुमीताईला पाहवत नव्हते. पण आता ती बोलू शकत होती ही भास्करसाठी त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट होती. शाळा सुटल्यावर तो पळतच सुमीताईच्या घरी गेला. पण ती झोपलेली होती. तो बराच वेळ थांबला पण ती जागी झाली नाही. मग तो तसाच घरी निघून गेला. आता रोजच शाळेत जाताना आणि शाळेतून येताना भास्कर सुमीताईस भेटायला जाई. तिच्याजवळ बसे, तिच्याशी गप्पा मारी. सुमीताईला फार बोलता यायचे नाही, त्यामुळे भास्करच सगळा वेळ तिला शाळेतल्या, मित्रांच्या गोष्टी सांगत बसे. जवळजवळ महिना लोटला पण अजूनही सुमीताईला चालता येत नव्हते. ती अंथरुणावर कंटाळली होती. पण अजून पायाची झीज भरून यायला खूप वेळ लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. एक दिवस जेव्हा भास्कर शाळेतून येताना तिच्याकडे गेला तेव्हा तिने विचारले, "भास्कर तू माळावर गेला होतास का रे?" भास्कर म्हणाला, "नाही गेलो. तू नाहीस त्यामुळे मला तिकडे जायला आवडत नाही. तू लवकर बरी हो मग आपण दोघे सोबतच जाऊ." "अरे असे नकोस करू. माळावर जात जा की. मघाशी मला या खिडकीतून चारपाच पिवळी फुलपाखरे दिसली. म्हणजे फुलपाखरांचा ऋतू चालू झालाय. पण सगळी फुलपाखरे तेवढी माळावरच येतात. ही उसाची शेते ओलांडून इकडे फारसे कुणी फिरकतच नाही. तू जाउन पहा ना रे, आणि मग मला येउन गम्मत सांग." भास्कर मग मधून मधून माळावर जाई आणि तिथे पाहिलेल्या फुलपाखरांच्या गमतीजमती सुमीताईला येउन सांगे.

एक दिवस मात्र मोठा चमत्कार घडला, भास्कर शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे माळावर गेला, पण माळावर त्याला एकही फुलपाखरू दिसले नाही. त्याने सगळ्या माळावर इकडेतिकडे फिरून पाहिले, पण नाहीच, साधे एक फुलपाखरुही त्याच्या दृष्टीस पडले नाही. त्याला मोठे नवल वाटले. अजून फुलपाखरांना जायला खूप दिवस होते. आता तर कुठे ती मोठ्या प्रमाणात येऊ लागली होती. मग आज अचानक ती कुठे गायब झाली ते त्याला कळेना. तो मग तसाच सुमीताईच्या घरी गेला. तो गेला तेव्हा ती झोपलेलीच होती, बराच वेळ बसूनही ती उठली नाही मग भास्कर तिच्याशी न बोलताच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत येताना त्याने माळरानावर नजर टाकली, आज मात्र त्यास तिथे फुलपाखरे उडताना दिसली. त्याला थोडे बरे वाटले. मग शाळा सुटल्या सुटल्या तो लगेच माळरानावर धावला, आणि काय आश्चर्य, सकाळी एवढी बागडताना दिसलेली फुलपाखरे आता परत गायब झाली होती. पुन्हा त्याला एकही फुलपाखरू दिसले नाही. तो हिरमुसून परत सुमीताईला हे सांगण्यासाठी गेला पण ती आजही गाढ झोपलेली होती. त्याला तिला सांगताच आले नाही. असे अजून चारपाच दिवस घडत राहिले. सकाळी दिसणारी फुलपाखरे शाळा सुटल्यावर गायब होत. आणि सुमीताईदेखील नेमकी भास्कर घरी जाण्याच्या वेळेतच झोपलेली असे. त्यामुळे भास्करला हे तिलाही सांगता आले नाही.

एके दिवशी मग भास्करने मनाशी एक निश्चय केला. सकाळी फुलपाखरे दिसतात पण शाळा सुटताना ती नसतात असे का? त्याने नेमके काय होते ते पहायचे ठरविले. मग त्यादिवशी तो मधल्या सुट्टीतच माळावर गेला. त्याला दिसले की फुलपाखरे आज माळावरच होती. सगळीकडे नेहमीसारखी खूप सारी फुलपाखरे होती. मग तो तसाच सुमीताईकडे निघाला. ऊसाच्या शेतांजवळ तो पोचला तेव्हा त्याने परत सहज माळावर वळून पाहिले, आणि त्याचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना, सगळ्या फुलपाखरांनी एक मोठा घोळका केला होता, आणि ती सगळी गावाकडच्या टेकडीकडे उडत चालली होती. भास्कर हे पाहून पळत पळत थेट सुमीताईकडे पोचला. ती झोपायच्याच तयारीत होती. भास्कराला पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने विचारले, "अरे आज तुझी शाळा लवकर सुटली काय?" भास्कर म्हणाला, "नाही, मी मधल्या सुट्टीतच निघून आलोय. मी मागचा आठवडाभर रोज येत होतो पण तू नेमकी झोपलेलीच असायचीस,  मला तुला काहीतरी सांगायचेय. मागचे चार पाच दिवस आणि आजही मी एक खूप चमत्कारिक गोष्ट पाहिली." सुमीताईने भास्करकडे निरखून पाहिले आणि मग हसत म्हणाली, "मला माहितीये तुझी चमत्कारिक गोष्ट." भास्कर म्हणाला, "नाही तू कल्पनाही करू शकणार नाहीस, खूप विचित्र गोष्ट आहे." सुमीताई म्हणाली, "अरे बाबा मला खरेच माहित आहे तुझी विचित्र गोष्ट काय आहे ते." भास्कर म्हणाला, "असे होय? मग सांग बरे ती कोणती गोष्ट आहे?" यावर सुमीताई म्हणाली, "हेच ना की मागचे चारपाच दिवस तुला माळावर फुलपाखरेच दिसली नाहीत?" हे ऐकून आता चाट पडायला आलेल्या भास्करने आश्चर्याने विचारले, "होय, मला हेच सांगायचे होते पण तुला कसे कळले?" सुमीताई नुसतीच हसली. मग भास्कर म्हणाला, "आणि आज तर काय झाले माहित आहे?" "काय?" सुमीताईने विचारले. "अगं आता मघाशी ना, मी पाहिले की माळावरच्या सगळ्या फुलपाखरांनी एक मोठा थवा तयार केला होता आणि ते थव्याने त्या पलीकडच्या टेकडीकडे उडत चालले होते." "काय?" सुमीताई म्हणाली, आणि मग तिने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले, "अगं बाई खरच की, आता त्यांची रोजची वेळ झाली." ती काय बोलतेय हे भास्करला कळेना. "अगं तू काय बोलतेस? कुणाची वेळ झाली? मला काही कळत नाहीये. आधीच माझे डोके फिरलेय, आणि आता तुही असे कोड्यात बोलते आहेस." सुमीताई म्हणाली, "हो हो सांगते सांगते. मी तुला भेटले की लगेच सांगणारच होते पण आपली चार पाच दिवस भेटच झाली नाही ना. एक काम कर, इथे माझ्या उशीखाली माझी फुलपाखरांची वही ठेवली आहे ना ती जरा बाहेर काढ." भास्करने उशीखालून ती वही बाहेर काढली. ही तीच वही होती ज्यात सुमीताई नेहमी कोणत्याही फुलपाखरांच्या पंखांचे सांडलेले रंग टिपून ठेवत असे. त्याने ती काढून तिच्याकडे देऊ केली. ती म्हणाली, "राहू दे तुझ्याकडेच, आता ना जरा तिचे पहिले पान उघड." भास्करने वहीचे पहिले पान उघडले, त्यावर पिवळे पिवळे कण होते,  त्याने ते पान उघडताच त्या कणांतून भुर्र उडत खुप सारी पिवळी फुलपाखरे बाहेर पडली, आणि सगळ्या खोलीत बागडू लागली. मग सुमीताईने त्यास पुढची पाने उघडायला सांगितली, जसजशी तो पाने उघडत होता, तसे तसे त्या पानांवरील विविध रंगांच्या कणांतून वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे बाहेर पडत होती, हळूहळू सगळी खोली विविध रंगांच्या आणि आकारांच्या लक्षावधी फुलपाखरांनी भरून गेली. मग सुमीताई त्याला म्हणाली, "आता इथे ये आणि माझ्या शेजारी झोप." मग भास्कर तिच्या शेजारी जाउन झोपला. "आता डोळे घट्ट मिटून घे." त्याने डोळे मिटले. थोड्या वेळाने त्याने डोळे उघडले. खोलीत आता इतकी फुलपाखरे जमली होती की आजूबाजूस रंगच रंग सोडून काहीही दिसत नव्हते. ती फुलपाखरे हळूहळू जवळ आली, आणि दोघांच्याही भोवती गोळा झाली. मग त्या सगळ्या फुलपाखरांनी सुमीताई आणि भास्कर या दोघांनाही हलकेच उचलले आणि ती त्यांना त्या खोलीतून उचलून घॆउन उंच उंच वर आकाशात जाऊ लागली. 

सुमीताई आणि भास्कर आता ढगांकडे चालले होते. पांढरे शुभ्र ढग.!! भास्करने खाली पाहीले. खाली सगळे काही किती छोटे छोटे दिसत होते. गाव, शाळा, माळ, माळावर एकही फुलपाखरू नव्हते. शाळा सुटली होती आणि पोरांचे घोळके रस्त्यावरून गावाकडे सरकताना दिसत होते. ते दोघे अजून वर गेले. हळूहळू गाव, शाळा, शेते, माळ हे सारे सारे एकमेकांत मिसळून गेले. भास्कर म्हणाला, "किती गम्मत आहे ना सुमीताई, खाली असताना किती लांब वाटतात ही अंतरे. गावाच्या एका टोकावरून शाळेपर्यंत येताना किती थकायला होते. आणि इथून सगळे एका चिमटीत धरता येईल एवढेसेच वाटते. आणि ती नदी बघ ना किती वाकडी तिकडी वाहते. मला तर नेहमी वाटायचे की ती सरळच वाहत असेल. आपल्या टेकडीच्याही पलीकडे एवढा मोठा डोंगर आहे हे तर मला माहीतच नव्हते." सुमीताई अमाप कौतुकाने हे सगळे पाहून हरखून गेलेल्या भास्करकडे पाहत होती. थोड्या वेळाने गावही दिसेनासे झाले. आता ते ढगांत पोचले होते. खालचे काहीही दिसत नव्हते. भास्करने आपले दोन्ही हात पंखांसारखे पसरले. ढगांतून आता त्याला उडण्याचा आनंद मिळत होता. मऊशार लोण्यातून आपण डुंबत आहोत असा त्याला भास झाला. जिकडे पहावे तिकडे नुसता पांढरा शुभ्र रंग. उन्हात अत्यंत तेजाने चकाकणारा.! ते ढगांतून पुढे पुढे जात राहिले. एकामागून एक पडदे उघडावेत तसे पुढे सरकता सरकता ढगांची दारे एकामागून एक उघडली जात होती. भास्करने त्या कापसात गिरक्या घेतल्या, कोलांटउड्या मारल्या. ढगांचे तुकडे हातात तोडून घेतले आणि लांब इकडेतिकडे भिरकावले. सुमीताई आनंदाने वेड्या झालेल्या भास्करला हसून पाहत होती. मग ती म्हणाली, "भास्कर मज्जा आली ना? आता अजून गम्मत पाहण्यासाठी तयार रहा." मग हळूहळू ते खाली येऊ लागले. भास्करने एक ढगाचा मोठा गोळा कवेत धरून ठेवला, पण ढगातून खाली येताच तो विरळ होत जाऊन गायब झाला. भास्करने खाली पाहिले, आपण कुठे आलो आहोत ते त्याला कळेना. खाली जिकडे पहावे तिकडे नुसते रंगच  रंग दिसत होते. कितीतरी वेगवेगळ्या रंगांच्या नद्या वाहत होत्या, लाल रंगाची नदी, पिवळ्या रंगाची नदी, हिरव्या रंगाची नदी तर किती प्रचंड मोठी दिसत होती, आणि इंद्रधनुष्यासारख्या सगळ्या नद्या एकमेकींना समांतर वळणे घेत वाहत होत्या. लांबच लांब सगळ्या जमिनीवर फुलांच्या पखरणी पसरलेल्या होत्या. हवेतून विविध रंगांचे कण इकडे तिकडे उडत होते. थोडे पुढे एके ठिकाणी मोठा धबधबा दिसत होता. सगळ्या रंगीत नद्या त्या प्रचंड मोठ्या धबधब्यावरुन खाली कोसळत होत्या. त्या पाण्याला नेहमीचा आवाज नव्हता, तर त्यातून संगीताचे स्वर उमटल्यासारखे वाटत होते. धबधब्यानंतर पुन्हा नद्या वेगवेगळ्या वाहत असल्या तरी जिथे त्या खाली कोसळत होत्या तिथे आजूबाजूच्या दोन नद्यांचे पाणी काहीसे एकत्रितपणे खालच्या दगडांवर आदळून दोन रंग मिसळून बनणाऱ्या विविध छटांचे तुषार आसमंत भरून टाकत होते. त्या तुषारांवर पडणारी सूर्याची किरणे त्या दृश्यास एक अलौकिक आणि स्वर्गीय झळाळी देत होती.

हळूच मग ते दोघे एका मोठ्या फुलात उतरले. मग त्या फुलाच्या पाकळीवरून हळूच घसरगुंडी करून दोघे खाली आले.  दोन फुलपाखरे त्यांच्या पुढे आली, त्या दोन फुलपाखरांच्या मागे एक फुलांचा सुंदर रथ होता आणि त्यात एक परी बसलेली होती. तिने दोघांना "सुस्वागतम" म्हंटले आणि माझ्या मागे या असे सांगितले. भास्करने सुमीताईचा हात हातात धरला आणि दोघे परीच्या मागे चालू लागले. आजूबाजूला हजारो रंगांची फुलपाखरे रांगेने उभी होती. पंख फडकावून ती सगळी या दोघांचे स्वागत करीत होती. चालता चालता ते एका ठिकाणी पोचले. तिथे विविधरंगांची तळी होती. त्या तळ्यांतून काही फुलपाखरे आपल्या सोंडेत रंग भरून घेऊन वेगवेगळ्या फुलांवर शिंपित होती. काही फुलपाखरे दुसऱ्या फुलपाखरांचे पंख रंगवीत होती. थोडे पुढे गेल्यावर अतिशय सुगंधी दर्प येऊ लागले. त्या दर्पांनी सुमीताई आणि भास्करची मने अत्यंत उल्हासित झाली. तिथे एका मोठ्या सोनेरी झाडातून एक अत्तराची धार निघत होती. त्या धारेतले अत्तर कुपिंत भरून त्यात वेगवेगळी द्रव्ये मिसळून निरनिराळ्या फुलांत ओतली जात होती. भास्करने आपल्या शाळेच्या पांढऱ्या शर्टवर सगळ्या रंगांनी फुलपाखरांसारखे रंगवून घेतले. अत्तराच्या धारेखाली ओंजळ भरून घेऊन दीर्घ श्वासाने तो दिव्य सुगंध उरात भरून घेतला. उरलेली ओंजळ हात उंचावून चोहिंकडे शिंपडली. चहूबाजूंनी पसरलेल्या फुलपाकळ्यांवर मनसोक्त हुंदडला.

भास्करने परीला विचारले, "इथे फुलपाखरांना आणि फुलांना रंग दिला जातो, पण आमच्याकडे तर फुले आणि फुलपाखरे रंगीतच जन्मास येतात." परी हसली. ती म्हणाली, "तुमच्या इथे दिसणारी फुले ही येथूनच रंगवून पाठविलेली असतात. हे बघा, या इथे रंगवून झालेली सगळी फुले आणि फुलपाखरे ही अशी सगळ्या बाजूंनी क्षितिजापर्यंत उडत जातात, आणि मग जगभरात पसरतात. ज्या रंगांच्या नद्या तुम्ही येताना पाहिल्या असतील, त्याही वाहत जाऊन क्षितिजावर पोचल्यावर इंद्रधनुष्य बनून आकाशात जातात, आणि तिथूनच सगळ्या जगावर रंगांची पेरण करतात. सगळे काही कसे अगदी एका लयबद्ध रीतीने प्रमाणशीरपणे आणि सृष्टीचक्राच्या नियमानुसार चालू असते. तुम्हाला दिसणारे सारे रंग गंध हे इथूनच पाठविलेले असतात." भास्कर आश्चर्याने स्तिमित झाला. आपण काहीतरी खूप भव्य दिव्य बघत आहोत हे त्याला जाणवले. परीने मग भास्कर आणि सुमीताईला चालत चालत एका विशालकाय महालाकडे नेले. महाल कसला, मोठा अवाढव्य संगमरवरी पर्वतच होता जणू तो.! विविधरंगी अन वेगवेगळ्या आकारांच्या सुंदर सुंदर फुलांनी आच्छादलेला.!! एका मोठ्या वेलींच्या दरवाजातून ते दोघे आत गेले. मुख्य गाभ्यात रंगीत काचांच्या तावदानांतून विविधरंगी प्रकाशझोत आत येउन आतल्या सफेद संगमरवरी भिंती आणि फरशीस रंगवीत होते. त्या कवडशांतून मधेच वेगवेगळ्या रंगांचे परागकण दिसत आणि त्यांच्यावर पडून रंगांचा प्रकाश चारही बाजूंस परावर्तित होई तेंव्हा भिंतींवर प्रकाशाची सजावट केल्यासारखे वाटे. हवेत एक आल्हाददायक सुगंध आणि गारवा भरून राहिलेला होता. परीने दोघांस समोरच्या जिन्याने चढून वरच्या शय्याकक्षात नेले.  तिथे फुलांनी सजविलेली एक शेज होती. तिथे पोचल्यावर परीने त्यांस सांगितले की तुमची आजची फेरी पूर्ण झाली आहे आता तुम्ही दोघांनाही या शेजेवर विश्रांती घ्यावी. मग परीने दोघांना तिथे निजवले. वेलीफुलांची एक चादर त्यांच्या अंगावर टाकली. ती चादर टाकताच दोघांनाही झोप येऊ लागली, मग थोड्याच वेळात ते झोपूनही गेले.

जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते परत सुमीताईच्या घरातल्या तिच्या पलंगावर होते. भास्कर कमालीचा खुश होता. "काय मग कसे वाटले?" सुमीताईने भास्करला विचारले. भास्कर म्हणाला, "मला किती मज्जा आलीय म्हणून सांगू सुमीताई. पण हे स्वप्न तर नव्हते ना?" सुमीताई म्हणाली, "अरे वेड्या हे स्वप्न असते तर आपल्या दोघांनाही एकच स्वप्न कसे पडेल?" भास्करने मान डोलावली आणि म्हणाला, "हो की. माझ्या हे लक्षातच आले नाही. आणि तसेही सुमीताई तू म्हणतेस ते सगळे खरेच असणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे.  पण तुला तिकडे अशाप्रकारे जाता येईल हे कसे काय कळले?" सुमीताई म्हणाली, "अरे त्या मागे नाही का मी तुला सांगितले की माळावर फुलपाखरे बघून येत जा म्हणून? मग तू माळावर जाउन मला सगळी गम्मत येउन सांगायचास, तेव्हा तू निघून गेलास की मला तिकडे जाता येत नाही याचे मला खूप रडू यायचे. एक दिवस तू निघून गेल्यावर मी अशीच अंथरुणात खूप रडत होते. मला माळ, फुलपाखरे बघता येत नाहीत म्हणून मी खूप निराश झाले होते. मग मी ठरविले की खिडकीतून जमेल तेवढे बाहेर फुलपाखरे बघायची. मी पलंगावरून उठले. आणि खिडकीकडे जाण्यासाठी पाउल टाकले. पण पहिलेच पाउल टाकल्याबरोबर माझ्या पायात प्रचंड कळ आली, आणि वेदना सहन न होऊन माझा तोल गेला. मी पलंगास धरून सावरण्याचा प्रयत्न केला पण अंथरूणच खाली ओघळून आले, आणि मी खाली पडले. बराच वेळ मला काही कळले नाही. जेव्हा जाग आली तेव्हा खोलीत एक सुंदर फुलपाखरू आले होते. मी जागी होताच ते समोर आले आणि माझ्या हाताच्या बोटावर बसले. त्यानंतर ते उडाले आणि जवळच पडलेल्या माझ्या या वहीवर जाउन बसले. मग परत वहीवरून उठून माझ्या हातावर आले. असे त्याने दोन तीन वेळा केल्यावर मला वाटले की ते मला वहीत काहीतरी शोधायला सांगते आहे. म्हणून मी वही उघडली आणि मग जशी जशी मी वहीची पाने उघडत गेले तशी तशी त्या पानांतून आजच्यासारखीच कित्येक फुलपाखरे बाहेर पडली. आणि त्यांनी मला अलगद उचलून पलंगावर ठेवले आणि मग ती मला उचलून त्यांच्या दुनियेत घेऊन गेली." "ताई म्हणजे तू रोज जातेस त्या फुलपाखरांच्या दुनियेत?" "हो. मला खूप छान वाटते. तुला मी मागे म्हंटले होते ना की हेच माझे स्वप्न होते? ते स्वप्न अशा रीतीने रोज रोज पूर्ण होताना पाहायला मला खूप आवडते." "मग आता मलाही रोज जायचे आहे तुझ्याबरोबर." "नाही नाही हे चालणार नाही. कारण ती फुलपाखरे रोज दहा वाजताच येतात तेव्हा तुझी शाळा असते.  रोज येण्यासाठी तुझी शाळा रोज बुडेल. त्यापेक्षा असे कर, रविवारी सुट्टीच्या दिवशी तू वेळेवर येत जा मग तेव्हा मी तुला घेऊन जात जाईल. ठीक आहे?"  सुमीताईने भास्करला काही सांगितले आणि त्याला ते पटले नाही असे कधीच झाले नव्हते त्यामुळे याहीवेळी त्याला तिचे म्हणणे पटले आणि तो पुढच्या रविवारची वाट पाहत तिथून निघून गेला.

रविवारी सकाळीच भास्कर सुमीताईच्या घरी पोचला. पण तिथे गेला तर त्याला कळले की सुमीताईस चेकअपसाठी हॉस्पिटलला नेलेले आहे. त्याला फार वाईट वाटले. कारण आता जर तो त्या सफरीवर गेला नाही तर थेट आठवडाभरानेच जाता येणार होते. त्याला काय करावे ते सुचेना. मनात किंचितसे चाचरतच तो सुमीताईच्या खोलीत पोचला. दहा वाजायला फक्त पाच मिनिटे बाकी होती. त्याला काय करावे ते सुचेना. त्याच्या मनाचा मोठा गोंधळ झाला होता. सुमीताईची वही उघडून पहावी काय? एक मिनिटभर तो अस्वस्थपणे बसून राहीला. आता दहा वाजायला केवळ एक मिनिट बाकी होता, भास्करला राहवले नाही. तो तडक उठला आणि सुमीताईच्या बिछान्याजवळ गेला, तिथे जाऊन त्याने उशी बाजूला केली. वही त्याखालीच ठेवलेली होती. त्याने वहीचे पान उचकले, आणि पानावरून पिवळी फुलपाखरे बाहेर पडली. मग त्याने एकेक करून सारी पाने उघडली. आणि मग सगळी फुलपाखरे बाहेर आल्यावर तो डोळे मिटून बिछान्यावर पडला. फुलपाखरांनी त्याला हलकेच उचलले आणि पुन्हा वर वर उडत घेऊन गेले.

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर भास्कर सुमीताईला भेटायला गेला. सुमीताईने त्याला विचारले, "तू काल आला होतास का? अरे ते एक जिल्ह्याच्या शहरातले डॉक्टर आहेत ते फक्त रविवारीच आपल्या गावी येतात. म्हणून नेमके रविवारीच मला जावे लागले. त्यामुळे तुला मी सफरीवर नेऊ शकले नाही म्हणून तुझी माफी मागते." भास्कर म्हणाला, "नाही सुमीताई, अगं मी काल इथे आलो होतो, आणि तू नव्हतीस तरी मी तुझी वही उघडून पाहीली, तर पुन्हा जादू झाली, आणि मी एकट्याने सफर करून आलो." "अरे वा. बरे झाले म्हणजे माझी काळजी मिटली. उगीच मनाला रुखरुख लागून राहिली होती रे. म्हणजे आता पुढेही रविवारी मी हॉस्पिटलला गेले तरी तू एकटाच जाऊ शकशील. नाही का?" भास्कर म्हणाला, "पण मला तुझ्याबरोबरच अधिक मजा आली होती एकट्याने नाही आली." सुमीताई म्हणाली, "अरे फक्त एकदोन रविवार अजून. मग आपण दोघे मिळूनच जात जाऊ ठीक आहे?"

आपण किती गम्मत केली, करतो ते भास्करला कुणालातरी सांगावेसे वाटे. त्याला वाटे की आपण किती भाग्यशाली आहोत ते सगळ्यांना कळावे. मग त्याने सर्वात आधी त्याच्या आईला सांगितले. आई म्हणाली अरे वेड्या स्वप्न पडले असेल तुला, असे काही नसते बरे. मग त्याने शेजारच्या काकुला सांगितले, वर्गातल्या त्याच्या सगळ्या मित्रांनाही सांगितले. पण सगळ्यांनी त्याला वेड्यातच काढले. तू स्वप्नच पाहिले होतेस आणि असे कधी घडूच शकत नाही असे त्यास सगळे म्हणाले. मग शेवटी चिडून भास्कर शनिवारी त्याचा मित्र दिन्यास म्हणाला, "खोटे वाटतेय ना? मग उद्या तू माझ्याबरोबर चल, तुलाही जादूच्या सफरीवर घेऊन जातो." दिन्या तयार झाला. मग रविवारी दोघे सुमीताईच्या घरी पोचले. आजही ती डॉक्टरांना भेटायला गेली होती. भास्कर दिन्याला घेऊन थेट सुमीताईच्या खोलीकडे गेला. दिन्या त्याला म्हणाला, "अरे या अशा औषधांच्या वासाने भरलेल्या खोलीत फुलपाखरे चुकूनही येणार नाहीत. मला तर इथे गुदमरायला होते आहे. चल, मला नको तुझी जादूची सफर बिफर." भास्कर म्हणाला, "तू थांब तर, मग तुला मी दाखवतोच." दहा वाजले आणि दिन्याने सुमीताईची वही घेतली. "आता बघच हं तू दिन्या" असे म्हणून त्याने वहीचे पहिले पान उघडले. त्यावर पिवळे पिवळे रंगाचे कण होते. भास्करने पान उघडून समोर धरले, पण त्यातून फुलपाखरे बाहेर येईनात. भास्कर कासावीस झाला. मग त्याने घाईने पुढची पाने उघडली. पण व्यर्थ.! सगळी वही दोन तीन वेळा उघडूनही फुलपाखरे आलीच नाहीत. दिन्या म्हणाला, "अरे कुठे आहेत फुलपाखरे? नक्कीच तुला वेड लागले आहे. मीही मूर्खच होतो की अश्या वेड्याचे म्हणणे ऐकून इकडे आलो. परत तुझे मी काहीही ऐकणार नाही." असे म्हणून दिन्या निघून गेला. भास्करला आज असे का झाले तेच कळेना. कदाचित वहीची जादू आता संपली असावी असा विचार त्याच्या मनात आला. तो खूप हिरमुसला झाला आणि घरी निघून गेला.
                            
सुमीताईला दवाखान्यातच ठेवले गेले, त्यामुळे ती तीनचार दिवस घरी आली नाही. आता जादू संपली असावी अशी भास्करची ठाम खात्री झाली होती. सुमीताईला काय वाटेल याची काळजी त्याला सारखी खात होती. त्यात दिन्याने त्याची फजिती सगळ्या शाळेत सांगून दिल्याने त्याला सगळे 'वेडा रे वेडा' असे चिडवीत होते. मग शनिवारी सुमीताई घरी आली आणि रविवारी सकाळीच भास्कर तिला भेटायला गेला. गेल्यागेल्या भास्करने तिला सगळी हकीगत सांगितली, आणि बहुदा मी सगळ्यांना सांगितल्यामुळेच जादू नष्ट झाली असेल, त्यामुळे मला माफ कर असे म्हणून तो रडू लागला. सुमीताई त्याला म्हणाली, "अरे रडू नकोस. थांब आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू. आणि जादू संपली तर संपू दे की. आपण जे पहायचे होते ते पाहून तर घेतलेच आहे ना? चल बरे आता डोळे पूस. दहा वाजणार आहेत, आपण एकदा प्रयत्न करून पाहूयात." मग भास्करने डोळे पुसले. उसासे टाकत उशीखालून सुमीताईची वही काढली, आणि तिचे पहिले पान उघडले. पिवळ्या कणांचे पान..! भास्करने ते पान उघडून समोर धरले, त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती, त्याने अपराधी भावनेने डोळेच मिटून घेतले होते. मग सुमीताईने त्याला आवाज देऊन सांगितले की भास्कर आता पुढचे पान उघड. पुढचे पान उघडण्यासाठी भास्करने हळूच डोळे उघडले, आणि पाहिले तर खोलीत खुपशी पिवळे फुलपाखरे आली होती, आणि सुमीताई हसत होती. ते पाहून भास्करचा पडलेला चेहरा लगेच खुलला, आणि त्याने पुढची पाने उघडली, त्यातून आधीसारखीच हजारो विविधरंगी फुलपाखरे बाहेर पडली. मग भास्कर जाऊन सुमीताईशेजारी डोळे मिटून पडला. परत फुलपाखरांनी दोघांना उचलले आणि वर वर घेऊन गेले.

तिकडे फुलपाखरांच्या जादुई दुनियेत मग महालात पोचल्यावर न राहवून भास्करने परीस विचारले. "मागच्या वेळी वहीने काम झाले नाही. वहीतून एकही फुलपाखरू बाहेर पडले नाही. मला तर वाटले की वहीची जादू संपली की काय." परीने हसून भास्करकडे पाहिले आणि म्हणाली, "हो मला ठाऊक आहे. मागच्या रविवारी तू इकडे येण्याचा प्रयत्न करत होतास असा संदेश मला मिळाला होता." "हो पण मला येता आले नाही असे का बरे?" परीने विचारले, "मागच्या वेळी तुझ्याबरोबर कुणी दुसरेही होते का?" भास्कर म्हणाला, "होय. तो माझा मित्र दिनू होता. त्याचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून मला त्याला इथे प्रत्यक्ष आणून सगळे दाखवायचे होते. पण तसे काही घडलेच नाही. असे का झाले?" परी म्हणाली, "भास्कर तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तरदेखील दडलेले आहे. तुला माहितीये तुझ्या सुमीताईबरोबर तुलाही इकडे कसे येता आले? कारण तुझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. आणि जगातली कुठलीही सुंदर गोष्ट पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी अथवा तिचे परमोच्च सुख मिळविण्यासाठी आवश्यक असतो तो त्या गोष्टीवरचा किंवा ती आपणास देवविणाऱ्या माणसावरचा विश्वास.!! मात्र दिनूचा तुझ्यावर किंवा तू सांगितलेल्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. किंबहुना तो तुझी फजिती पाहण्यासाठीच आला होता, त्यामुळे त्याला आणि त्याच्यासोबत असल्याने तुलाही हे दिसणे शक्यच नव्हते. एवढेच नाही तर जेव्हा तू सुमीताईच्या अपरोक्ष तिची वही उघडलीस तेव्हापासून तुलाही पुन्हा इथे येणे बंद होऊ शकले असते. मात्र तुझे मन शुद्ध होते, तुझी इथे येण्याची तळमळ ही मनापासून होती, म्हणून तू इथे येऊ शकलास. आणि त्यानंतर सुमीताई भेटताच तू तिला प्रामाणिकपणे सगळे सांगितलेस व तिनेही ते सहजगत्या स्वीकारले म्हणून आज तुम्हा दोघांनाही परत इथे येता आले. शुद्ध आंतरिक ओढ, प्रामाणिकपणा आणि विश्वास हीच कोणतेही सुख मिळविण्याची त्रिसूत्री आहे. जोपर्यंत तुम्ही दोघे ही त्रिसूत्री पाळाल तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा इथे येऊ शकाल. जर सुमीताईने हे पहिल्यांदाच तुझ्यापासून लपवले असते तर तिलाही पुन्हा इथे येता आले नसते. पण तिने अगदी मनमोकळेपणाने तुला हे सांगितले, आणि सुख हे इतरांस वाटल्यानेच टिकते आणि वाढते. त्यामुळे तुम्ही पुढेही हे कुणापासून लपवू नका. ज्यांचा तुमच्यावर विश्वास असेल त्या तुमच्यासारख्याच कितीही जणांना तुम्ही इथे आणू शकाल." आपण आयुष्यभर इथे येऊ शकतो हे ऐकल्यावर भास्करने अतिशय आवेगाने त्याच्या सुमीताईला मिठी मारली. तिच्यामुळेच त्याला ही दिव्य सृष्टी पहायला मिळाली होती. तिच्याही डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. दोघेही कितीतरी वेळ तसेच निश्चल उभे राहिले. बऱ्याच वेळाने परीनेच दोघांना आवाज देऊन सांगितले की, "आजची आपली सफर पूर्ण झाली आहे, तेव्हा कृपया शय्यागृहातील बिछान्यावर विश्राम करावा."  मग दोघेही अपार आनंदात तिथे बिछान्यावर जाऊन पहुडले. परीने वेलीफुलांची चादर त्यांच्या अंगावर टाकली, आणि हळूहळू दोघांच्याही डोळ्यांत झोप दाटू लागली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा