हा ब्लॉग शोधा

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

सुदाम्याचे पोहे

~सुदाम्याचे पोहे~
स्वत:च्या घरापेक्षा माझा अधिक वेळ त्याच्याच घरात जायचा. त्याची आई त्याच्यापेक्षा माझेच अधिक लाड करायची. जरा याच्याकडून काहीतरी शिक असे त्याचे रागावालेले वडील माझ्याबद्दल आणि माझे वडील त्याच्याबद्दल बोलत. त्याच्या मामाचे गाव मला त्याच्याएवढेच आणि माझे आजोळ त्याला माझ्याएवढेच ओळखी.
गोट्या खेळताना कधी मी हरलो तर तो मला हरलेल्या गोट्या परत जिंकून वसूल करुन देई आणि मी त्याचे संपले की माझा चिंचोक्यांचा डबा सगळाच्या सगळा त्याला देऊन टाकी. जित्याशी माझे भांडण झाले म्हणून त्यानेही त्याच्याशी कट्टी घेतली. जो कुणी त्याला फेगड्या म्हणून चिडवी त्याला मी बुकलुन काढत असे.
गावकीच्या माळावर मोठा चिंच होता. त्याला खुप चिंचा पिकायच्या. मी झाडावर चढून आकडे पाडी आणि तो खाली वेचत राही. किती अमाप चिंचा लागतात त्या झाडाला. कितीही पाडले तरी आकडे संपत नसत.
~सुभद्राहरण~
मनीषा आज ना माझा आवडता ड्रेस घालून आलेय. किती सुंदर दिसते ना ती या ड्रेसमधे! तो असे म्हणे आणि मलाही त्या ड्रेसमधे मनीषा अत्यंत सुंदर दिसू लागे. एकतर्फी असले की प्रेम दिवसागणिक प्रचंड वाढू लागते.त्याचेही आभाळ भेदुन वाढत होते.
तो तिला पत्र लिही. मलाही ते वाचायला देई. पण तिला देऊ देत नसे. तिने नकार दिला तर? ही भिती. छान असत ती पत्रे. तो कविताही करी. एकजात साऱ्याच प्रेमकविता. मला त्याही आवडत. मनीषाला ती एकही वाचायला मिळाली नाही. मात्र एकदा नोटिस बोर्डावर ज्या कवितेत मनीषा हे नाव प्रत्येक ओळीत लपलेले होते ती कविता मनीषाने वाचलेली त्याने पाहिले होते. त्याच्या काव्यप्रतिभेचे सार्थक झाले असे तो म्हणाला.
दिवसभर अन रात्रभर तो नुसता मनीषा मनीषा करत राही. M या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाची प्रत्येक गोष्ट त्याला आवडे. मैगी, माऊली जनरल स्टोअर, माळेगावची एसटी, आणि एकूण साऱ्याच गाड्या त्याला आवडत. का? तर प्रत्येकीचा नंबर MH ने सुरु होई म्हणून. डांबरी रोडवर, नदीच्या कातळांवर, बेंचवर, भिंतीवर, बाजूच्या डोंगरावरील किल्ल्याच्या तटबंदीवर असे कुठे कुठे मनीषा हे नाव अथवा बदामाच्या आकारात MH ही अक्षरे लिहिली गेली असतील याला गणती नाही.
~खांडववन~
हॅलो अरे आज मुंबईत आलोय. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे. अँड देन आय विल बी फ्री. बोल कुठे बसायचे?
अरे मग घरीच ये ना
का? वहिनी बाहेर गेलीय काय?
नाही
नको मग बाहेरच बसू.
एकदा गावी दिवाळीला बऱ्याच वर्षांनंतर तो आला होता.मग सगळे मित्र जमले. विज्या तर 15 वर्षांनी सगळ्यांना भेटत होता. कुठेतरी सगळे फिरायला जायचे ठरले. मी म्हणालो देवडीच्या वाडीत जाऊ. आपला जूना नेहमीचा स्पॉट.
नको नको, काय ती झाडी अन पडके देऊळ बघायचे? हजारदा पाहिलेय. तिकडे घेता पण येणार नाही. निम्मेजण जमणार नाही असे म्हणाले. अरे पण आपल्याला निवांत भेटायचे बोलायचे होते ना? प्यायलाच कशाला पाहीजे?
मग काय? च्यायला किती दिवसांनी भेटतोय आपण, मग सेलिब्रेट नको करायला? बोलतो तर आपण कधीही फोनवर. च्यायला बसायचे नसेल तर काय उपयोग भेटून? नुसते एकमेकांना बघायचे होते तर आता आपण बघतोच आहोत. मी त्याच्याकडे पाहिले, निदान तू तरी येशील का देवडीला? पण तोच म्हणाला, राव्हल्या तो साईप्रसाद बार अजुन चालु आहे ना? तिथेच जाऊ. निवांत कितीही वेळ बसता येईल.
~गीता~
चिंचोके गोट्या आधी मनीषाच्या नावामधे विरुन गेले आणि आता मनीषाही पेल्यात विरघळून गेलेली आहे.
मागच्या दहा वर्षांत आम्ही चार तास एकत्र आहोत आणि पिणे झाले नाही असा एकही प्रसंग नाही. तोच तो आहे अन तोच मी आहे. पण प्रायोरिटीज कश्या बदलल्यात.!
तेव्हा दोघेही सगळे चिंचोके, गोट्या हरलो तरीही मैत्री कमी व्हायची नाही. मनीषाचे लग्न दुसऱ्याशी झाले, तरीही आमची मैत्री अजुनच दृढ झाली. पण आता नको बसूयात म्हंटले की मग जाऊ दे नंतर भेटु किंवा यावेळी जमणार नाही या हुकमी वाक्यांवर मैत्री हेलकावे खात राहते.
चिंचांचे आकडे=सुदाम्याचे पोहे, मनीषा=सुभद्राहरण.!!
खांडववन जाळण्याआधी कृष्ण अन अर्जुनाने खुप दारु प्यायली. इतकी की एकमेकांस लाथा मारू लागले. त्याच नशेत त्यांनी खांडववन जाळले. आज आम्ही खांडववन जाळत आहोत. बहुतेक थोड्याच वर्षांनी मला गीता सांगावी लागणार.!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा