हा ब्लॉग शोधा

बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

रामायण स्फुट 11

उत्तरेकडून येणाऱ्या थंड झुळुका मन मोहवून टाकीत होत्या. शर्वरी तलावाच्या काठी असलेल्या पायरीवर बसली होती. पाण्यात पाय बुडविले तर स्थिर झालेले चंद्रबिंब विक्षुब्ध होईल म्हणून ती पाय सावरून बसली होती. तिला रात्र फार प्रिय होती. तिच्या दालनाजवळच्या या तलावात चंद्राच्या प्रतिबिंबासोबत आपला अंधुकसा चेहरा न्याहाळत बसायला तिला खूप आवडे. तिचा जन्मच रात्रीच्या पहिल्या प्रहराच्या अंतसमयाच्या आसपास झाला होता. म्हणूनच तिचे नाव तिच्या पित्याने शर्वरी असे ठेवले होते. हे नाव संस्कृत होते. मात्र तिचे नगरच नव्हे तर पूर्ण राज्यातही संस्कृत जाणणारे कुणी नसल्याने आणि एकंदरीतच संस्कृत शब्द आणि नामे उच्चारण्यास कठीण असल्याने तिचा पिता वगळता तिच्या मातेसकट इतर कुणीही तिला अचूक शर्वरी अशी हाक कधीच मारली नाही.
आज शर्वरीचे स्वत:स न्याहाळणे नेहमीचे नव्हते. आज ती अगदी मोहरून स्वत:स पाहत होती. तलावातील कमलदलावरील जलबिंदू आज तिला मोत्यासमान वाटत होते. क्षणोक्षणी मनात उठणाऱ्या कुठल्याशा मधुर तरंगांनी तिचे अंग मोहरून उठत होते. आजूबाजूस निरव शांतता असूनही कानात कुठल्याशा संगीतबद्ध सुरांचे गुंजन तिस ऐकू येत होते. एकदा आपल्या प्रतिबिंबाकडे आणि एकदा चंद्रबिंबाकडे आळीपाळीने बघून ती उगीचच स्वतःशीच मंदसे हसत होती. थोड्या वेळाने ती अजून पुढे झुकली आणि थोडे वाकून पुढे पाहू लागली. पाण्यात आता आपला कमनीय बांधा, महत वक्ष, वक्राकार कटी आणि कटिवस्त्राच्या थोडीशी वर बरोबर पोटाच्या मध्यभागी असलेली नाजुकशी नाभी हे पाहून उगीच तिच्या अंगावर एक बारीकसा शहारा उठला. आपली कटी किती कमनीय आणि आपले वक्ष किती बृहत आहेत याची तिला जाणीव झाली आणि परत एकदा ती स्वतःशीच अपार लाजली. राजपुत्री शर्वरीचे असे कितीतरी वेळ स्वतःलाच न्याहाळत वारंवार रोमांचित होण्याचे नेमके कारण तरी काय होते?

दूर पूर्वेचा एका संघप्रमुखाचा तरुण पुत्र रामभद्र हा उद्या तिच्या वधुपरीक्षेसाठी येणार होता. रामभद्रच्या राजबिंडेपणाची व शौर्याची कीर्ती त्रिखंडांत दुमदुमत होती. रामभद्र हा कुणी सामान्य राजपुत्र नव्हता. स्वतः शर्वरीच्या पराक्रमी पित्यास त्याने युद्धात लीलया हरवले होते. वायव्येकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या कित्येक युद्धटोळ्यांचा बंदोबस्त करून त्याने आपले राज्य समृद्ध आणि सुरक्षित केले होते. विंध्यपर्वत ओलांडून आपले राज्य थेट मलयगिरीपर्यंत विस्तारणारा तो पहिला योद्धा होता. असा महापराक्रमी वीर आपल्यास वरणार आहे या मात्र विचारानेच शर्वरी अत्यंत रोमांचित होत होती. चारच दिवसांपूर्वी शर्वरीच्या पित्याच्या राज्यावर मोठे संकट आले होते, रामभद्र एकामागून एक देश जिंकत थेट शर्वरीच्या राज्याच्या सीमेवर येऊन ठाकला होता. शर्वरीच्या पित्याने युद्धाची जोरदार तयारी केली, युद्धाला तोंडही फुटले मात्र एका प्रहराभरात रामभद्राने शर्वरीच्या पित्याची वाताहत करून टाकली. युद्धाचे पारडे रामभद्राच्या बाजूने फिरलेले पाहताच अनाठायी अधिक संहार नको म्हणून शर्वरीच्या पित्याने शरणागती पत्करली आणि रामभद्रही मग युध्दविरामास तयार झाला. रामभद्राचा पराक्रम पाहून स्वतः असीम पराक्रमी असलेल्या शर्वरीच्या पित्याने जेव्हा त्यास मैत्रीचे आवाहन केले तेव्हा त्यानेही ते आनंदाने स्वीकारले. त्याचवेळी तिच्या पित्याने त्यास शर्वरीशी विवाहाचा प्रस्ताव दिल्यावर त्याने तोही मान्य केला होता. रामभद्र त्यानंतर नगरीच्या बाहेरच उभारलेल्या एका आलिशान शिबिरात थांबला होता. उद्याची वधुपरीक्षा ही केवळ औपचारिक होती. रामभद्रचा शर्वरीशी आणि शर्वरीच्या ज्येष्ठ बंधूचा रामभद्रच्या भगिनीशी विवाह निश्चित झालेला होता.
................

मग तो दिवस उगवला. शर्वरीच्या पित्याने नगर प्रचंड सुशोभित करवून घेतले होते. त्रिखंडातील सर्वश्रेष्ठ वीर आपल्या पुत्रीच्या वधुपरिक्षेसाठी येत आहे तेव्हा आपल्या आदरातिथ्यात कुठेही तसूभरही उणीव राहता काम नये हे त्याने अत्यंत दक्षतेने पाहीले होते. गुढ्या, पताका, तोरणे यांनी संपूर्ण नगर आणि राजवाड्याकडे येणारा हमरस्ता भरून गेला होता. राजवाड्याच्या छतावरील दालनातून संपूर्ण हमरस्ता अगदी स्पष्ट पाहता येत असे. शर्वरी सगळा साजशृंगार घाई घाईने आटोपून केव्हाची त्या दालनात येऊन थांबली होती. थोड्या वेळाने तिला दिसला एक सोन्याने मढविलेला हत्ती आणि त्याचे पाठीवरील सुवर्ण अंबारी. अंबारीवर रामभद्राचा लाल ध्वज डौलाने फडकत होता. मात्र अंबारीत कुणी बसलेले दिसत नव्हते. शर्वरीने अजून थोडी सूक्ष्म नजर करून पाहिले तेव्हा तिला दिसले की एक राजबिंडा तरुण त्या हत्तीच्या पुढे पुढे अनवाणी चालत येत आहे. त्याच्या प्रत्येक पावलागणिक त्याच्यातील राजबिंडेपणा आणि वीरता स्पष्टपणे झळकत होती. हाच आपला जीवनासाथी होणार असलेला रामभद्र हे ओळखायला शर्वरीस वेळ लागला नाही. पण रामभद्र असा पायी का चालतो आहे? असे शर्वरीने सखीस विचारले तेव्हा तिने सांगितले की पूर्वेकडील देशांत तशीच रीत आहे. आपली जीवनसंगिनी निवडणारा पुरुष आधी आपल्या पायांनी वधूच्या नगरातील मातीस स्पर्श करून आपण त्या मातीशी एकरूप होण्यास तयार आहोत हे दाखवतो, त्या मातीत आपले बीज पेरण्याची परवानगी घेतो आणि मगच त्याची वधू निश्चिती होते. आणि ते पहा राजकुमारी अंबारीत एका स्त्रीची मूर्ती आहे. पूर्वेचे लोक हे स्त्रीप्रभुत्वाचे पालन करणारे आहेत. ती मूर्ती रामभद्रच्या भगिनीची आहे जिच्याशी आपले बंधू विवाह करणार आहेत. तिथे स्त्रीला नेहमी पुरुषापेक्षा श्रेष्ठ दर्जा दिला जातो म्हणून तिच्या मूर्तीस रामभद्रपेक्षाही वरचे म्हणजे अंबारीत स्थान देण्यात आलेले आहे.
सखी हे सगळे सांगत असली तरी शर्वरीचे कुठे तिकडे लक्ष होते? तिची नजर फक्त रामभद्रवरच खिळलेली होती. रामभद्रला तसा चालत येताना शर्वरीला पाहतच बसावेसे वाटत होते पण तेवढ्यात एका दासाने तिला महाराजांनी वधुपरीक्षेसाठी बनविलेल्या दालनात यायला सांगितल्याचा निरोप दिला आणि ती तिकडे जायला निघाली.
वधुपरीक्षेच्या दालनात मोठी गर्दी होती. दालन कसले ती तर शर्वरीची आवडती बागच होती. तो तलाव, निर्झर, झाडे, फुलझाडे, पक्षी, मयूर, मृग सगळे होते आणि त्याबरोबरच अगदी कल्पकतेने एक शामियाना बनवून त्यात बैठकीची आसने मांडून ठेवण्यात आली होती. शर्वरी तिथे पोचण्याआधीच आजूबाजूच्या देशांतील कितीतरी राजे आणि विश्वामित्र, वसिष्ठ, गौतम व अगस्त्य हे महर्षीही आले होते. सहसा महर्षी कोणत्याही विवाह वा वधुपरीक्षणाला जात नसतात त्यामुळे त्यांस खास आपणास आशीर्वाद देण्यासाठी आलेले पाहून शर्वरीला खूप चांगले आणि मंगल वाटले.

रामभद्र दालनात दाखल होताच एकच लगबग चालू झाली. शर्वरीच्या भावाने स्वतः होऊन त्यास त्याच्या आसनापर्यंत नेले. तो स्थानापन्न होताच बाकी सर्वजणही स्थानापन्न झाले. मग शर्वरीचा पिता उठला आणि त्याने महर्षिंस अभिवादन करून सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर शर्वरी दालनात आली आणि बरोबर मध्यभागी बनविलेल्या एका छोट्याशा मंचकावर उभी राहिली. तिच्या शेजारी दुसऱ्या एका मंचकावर रामभद्राच्या बहिणीची सुवर्णमूर्तीदेखील ठेवण्यात आली. शर्वरी तिथे येऊन उभी राहताच सर्वांच्या नजरा तिजवर खिळल्या. शर्वरीने सर्वांकडे नजर फिरविताना हलकेच रामभद्रकडे पाहीले. तोही एकाग्रतेने शर्वरीकडेच पाहत होता. दोघांची क्षणभरच नजरानजर झाली. आणि शर्वरीने लाजून नजर खाली झुकवली. त्यानंतर शर्वरीच्या पित्याने उभे राहून रामभद्रास आपण माझ्या मुलीचे पाणिग्रहण करावे असे आवाहन केले. रामभद्र त्यास रुकार देणार एवढ्यात महर्षींपैकी अगस्त्य उभे राहिले आणि म्हणाले, थांबा. शर्वरीस वरण्यासाठी रामभद्र यास तिला पणात जिंकावे लागेल. जर रामभद्र खरा वीर असेल तर तो आधी पण पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारेल आणि मगच शर्वरीस प्राप्त करता होईल. महर्षींचे हे आव्हान ऐकताच रामभद्र उभा राहीला आणि म्हणाला की ठीक आहे, चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांपैकी कोणत्याही विषयातील नैपुण्य जोखण्यासाठी आपण जो काही पण ठेवाल तो पूर्ण केल्याशिवाय मी शर्वरीस वरणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.
अचानक उद्भवलेल्या या अशा प्रसंगामुळे दालनात एकच खळबळ माजली. शर्वरीही भांबावून गेली. महर्षींनी मधेच हे काय काढले? तिने प्रश्नार्थक नजरेने आपल्या पित्याकडे पाहीले. ते तात्काळ उठून महर्षी अगस्त्यांकडे गेले. दोहोंत काही चर्चा घडली आणि मग शर्वरीच्या पित्याने स्वयंवराचा पण हा धनुर्विद्येची परीक्षा घेणारा असेल असे जाहीर केले. महर्षी अगस्त्य मग पुढे आले. ज्या बागेत हा सोहळा होत होता तिच्या दक्षिण बाजूला सात मोठे वृक्ष अर्धगोलाकार आकार बनवतील अशा रीतीने लावण्यात आलेले होते. महर्षी तिथे गेले. त्यांनी एक वीस हात असलेली मूर्ती आणून बरोबर त्या अर्धगोलाच्या बाहेर मध्यभागी ठेवली. मग त्यांनी पण जाहीर केला की रामभद्राने पहील्या वृक्षावर एक बाण अशा प्रकारे चालवावा की तो बाण पहील्या वृक्षास भेदून नंतर परावर्तित होत होत अनुक्रमे या सातही वृक्षांना स्पर्शला पाहिजे. एवढेच नाही तर सातव्या वृक्षापासून परावर्तित झाल्यानंतर त्या बाणाने बरोबर या समोर ठेवलेल्या वीस हातांच्या मूर्तीचा भेद केला पाहीजे. 
पण तर अत्यंत अवघड होता. रामभद्र अत्यंत पराक्रमी असला तरी हा पराक्रमाचा नव्हे तर मोठ्या अद्भुत कौशल्याचा पण होता. रामभद्र हा पण पूर्ण करू शकेल का? आणि नाही करू शकला तर काय? असे विचार मनात येऊन शर्वरीच्या काळजात धस्स झाले. एवढा अवघड पण ठेवल्याबद्दल तिला महर्षींचा किंचित रागही आला. मनाने तर तिने केव्हाच रामभद्रास वरले होते.  पण महर्षींच्या शब्दापुढे कुणीही जाऊ शकत नाही हे तिला ठाऊक होते. तिने अत्यंत निराश होऊन रामभद्रकडे पाहीले. तो मात्र अत्यंत शांत आणि दृढपणे उभा राहून मंदसा हसत होता, बहुदा त्याला शर्वरीच्या मनातली घालमेल कळली असावी, त्याने नजरेनेच तिला काही काळजी करू नकोस असा इशारा केला असे तिला वाटले. मात्र तरीही शर्वरीची भीतीने होणारी थरथर थांबायला तयार नव्हती. महर्षींनी एखादा सोपा पण ठेवायला हवा होता ना. जर रामभद्र हा पण पूर्ण करू शकला नाही तर भारतवर्षातील इतर कुणीही तो पूर्ण करू शकेल असे वाटत नव्हते. त्यामुळे जर रामभद्र अयशस्वी झाला तर रामभद्रच काय इतर कुणाशीही तिचे लग्न होण्याची काहीही शक्यता नव्हती. कारण एकदा स्वयंवराचा पण जाहीर केला की कुणीतरी तो पूर्ण केल्याशिवाय त्या युवतीचा विवाह होऊ शकत नाही. जर एखाद्या वीराने तो पण पूर्ण केला मात्र वधूस तो युवक पति म्हणून नकोसा असेल तर ती त्यानंतरही अजून एखादा पण ठेवण्याची विनंती करू शकत होती. मात्र जर तो पहीला पणच पूर्ण झाला नाही तर तिचा विवाह कधीही होत नसे. स्वयंवर पद्धतीची ही अट एवढ्यासाठी होती की वधूच्या पित्याने आपली कन्या आजन्म अविवाहित राहील या भीतीने तरी कुणालाही साध्य होणार नाही असा काही अवघड पण ठेवू नये. मात्र इथे शर्वरीच्या पित्याने नव्हे तर साक्षात महर्षींनीच हा पण ठेवला होता. 
महर्षींच्या म्हणण्याप्रमाणे मग सगळेजण बागेच्या दक्षिणेस योजित ठिकाणी आले. रामभद्रने आपले धनुष्य हातात घेतले आणि तो पहील्या झाडाच्या दिशेने बाणाची प्रत्यंचा ओढून वीरासनात बसला. महर्षींनी इशारा केला आणि रामभद्रने प्रत्यंचेतून बाण सोडला. पापणीही लवायच्या आत बाण आदळून त्या वीस हातांच्या मूर्तीच्या ठिकऱ्या उडाल्या. हेच नाही तर एकामागून एक सातही वृक्ष मधून मोडून बाहेरच्या दिशेला पडले. हे सगळे इतके क्षणार्धात झाले की विस्मयाने सर्व दर्शक अगदी शांत होऊन गेले होते. सात वृक्षांच्या पडण्याचा आवाज आला आणि मग रामभद्रने पण पूर्ण केल्याची सर्वाना जाणीव झाली व एकच कल्लोळ झाला. शर्वरीच्या आणि तिच्या पित्याच्या हर्षाला तर पारावार नव्हता. एवढेच नाही तर चारही महर्षी का कुणास ठाऊक पण अपार हर्षाने एकमेकांचेच अभिनंदन करत होते. 

महर्षींनी विवाहासाठी येणाऱ्या तृतीयेचा मुहूर्त सांगितला. म्हणजे अजून वीस दिवस. एवढ्या दिवसात रामभद्रची बहीणही पूर्वेकडून येऊ शकणार होती. फक्त वीस दिवस, मात्र शर्वरीस ते वीस दिवस जणू वीस युगांसारखे भासू लागले. सगळ्या राजधानीत त्या क्षणापासूनच अत्यंत उत्साहात विवाह समारंभाची तयारी चालू झाली. मुहूर्त जाहीर केल्यावर चारही महर्षी शर्वरीच्या पित्याकडे आले आणि त्यांनी एका गुप्त दालनात जाऊन त्याचेशी काही मंथन करण्याचा प्रस्ताव त्यास सांगितला. त्यानुसार शर्वरीच्या पित्याने लगोलग बाकीची जबाबदारी प्रधानांकडे सोपवून गुप्त बैठकीची व्यवस्था केली. त्या गुप्त बैठकीत नेमके काय होणार आहे याची शर्वरीच्या पित्यास काहीही कल्पना नव्हती. मात्र त्याचा महर्षिंवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे जे काही होणार आहे ते आपल्या व आपल्या कन्येच्या भाग्याचेच असेल याची त्याला पूर्ण खात्री होती. गुप्त दालनात सर्व महर्षी आपली व्याघ्रजिने अंथरून त्यावर बसले. शेजारीच मोकळ्या जागेवर शर्वरीचा पिताही भूमीवरच मांड घालून बसला आणि मग चर्चेस सुरुवात झाली. 
महर्षी वसिष्ठ यांनी सर्वप्रथम बोलण्यास सुरुवात केली. ते शर्वरीच्या पित्यास म्हणाले की महाराज आम्ही काही संकल्प धरून इथे आलो आहोत. दक्षिणेकडे रावण नामक असुरकुलीन राजा अत्यंत बलशाली झाला असून त्याने आपल्या बळाच्या प्रयोगाने स्वर्गासहीत संपूर्ण पाताळावरही विजय मिळविला आहे. त्यास अनेक सिद्धी प्राप्त आहेत. तो स्वतः पराक्रमी असण्याबरोबरच अत्यंत बुद्धिमानही असल्यामुळे त्याने अनेक वैश्विक शक्तींवर वर्चस्व मिळविले आहे. आता त्यास संपूर्ण मानवविश्व जिंकायचे असून इथली संपूर्ण व्यवस्था, मानवी विश्वाच्या चलनासंबंधीचे सगळे नियम हे सारे बदलून आपल्या इच्छेप्रमाणे मानवजातीचे विश्वचलन करावयाचे आहे. त्यास आजचा विश्वप्रमुख जो ब्रह्मा त्याची जागा घ्यावयाची आहे. समस्त अधिकारप्राप्त देवपदे त्यांस निदेशित असलेल्या अधिकारांसह बदलून त्यास आपल्या आप्तांस द्यावयाची आहेत. सर्व महर्षींचा महर्षी दर्जा तर तो काढून घेणारच आहे, त्याउपर समस्त भारतवर्षीय राजवंश नष्ट करून प्रत्येक राज्यावर असुरकुलीन मनुष्यांस राज्याभिषेक करविण्याचा आणि त्यायोगे पूर्ण विश्वावर पिढ्यानपिढ्या आपल्याच वंशाचे राज्य चालावे अशी व्यवस्था निर्मिण्याचा त्याचा बेत आहे. देवलोक जिंकून स्वर्गाची सत्ता मिळविल्यावर त्याने आपल्या अधिकारात विश्वनियमांत असे बंधन घालून ठेवले आहे की त्यास देव अथवा असुर या सर्वात प्रबल मानवजातींपैकी कोणीही मारू शकणार नाही. त्यामुळे आता रावणास संपविण्याचा एकच उपाय राहतो तो म्हणजे हजारो मानव वंशांपैकी संख्येने आणि प्रभावाने सर्वात मोठे असलेल्या दक्षिणेतील वानर, मध्यभागातील नाग वा पूर्वेकडील सौरवंशीय अथवा उत्तर पश्चिमेकडील चांद्रवंशीय मानव समूहातील एखाद्या पुरुषाकडून त्याचा वध करविणे हा होय. त्यातही नागवंशीय मानव पूर्ववैमनस्यामुळे कधीही देवांच्या मदतीसाठी असुरवंशीय मानवांशी युद्ध करणार नाहीत आणि वानरवंशीय मानव युद्ध आणि तंत्र या बाबतीत अत्यंत मागास आहेत, तद्वत ते रावणापुढे मोठ्या युद्धात तग धरू शकणार नाहीत. तेव्हा आपल्याकडे केवळ पूर्व आणि उत्तरेतील मनुष्यवंश उरले आहेत. तेही रावणाहून अधिक बलशाली अथवा प्रगत नाहीत मात्र सगळे वैश्विक अधिकारी एकत्र आले तर त्यांतून एखाद्या वीरास रावणाशी मुकाबला करण्यासाठी तयार करू शकतात.
विश्वात सर्वाधिक अधिकार प्राप्त असलेल्या बहुव्यक्ती गटापैकी म्हणजे सप्तर्षींपैकी आम्ही चार म्हणजेच 'सप्तर्षी बहुमत' आज त्यासाठीच इथे आलो आहोत. आम्हाव्यतिरिक्त वैयक्तिक सर्वाधिक वैश्विक अधिकार प्राप्त असलेले ब्रह्म, शिव आणि विष्णू याही पदांवरील व्यक्तींकडून आम्ही या ठरावासाठीचे अंतिम निर्णयअधिकार प्राप्त केले आहेत. तेव्हा आज आम्ही इथे जे ठरवू ते संबंध विश्वात सर्वमान्य होईल.
....
मानवी विश्वाचे संचालन काही विशिष्ट नियमांनीच चालते. हे नियम ठरविण्याची तसेच बदलण्याची शक्ती अथवा प्राधिकार हे काही विशिष्ट व्यक्तींस दिलेले आहेत. बरेचसे देवकुलीन मनुष्य, सप्तर्षी,  दहा अश्वमेध यज्ञ करणारे राजे, अनेक विशिष्ट वातावरणीय एवं हवामान प्रभागांचे प्रमुख अशा काही व्यक्ती हे अधिकार धारण करतात हे शर्वरीच्या पित्यास माहीत होते. जरी ते स्वतः हे नियम बनविणारे असले तरी त्या सर्व प्राधिकारी व्यक्तींस स्वतः तर हे नियम पाळावे लागतातच पण कुणी अन्य बलशाली मनुष्यदेखील या व्यक्तींचा कितीही कट्टर विरोधक असला तरी त्यालाही ते वैश्विक नियम पाळावेच लागतात हेही त्याला ठाऊक होते. अगदी रावणासही ते पाळावे लागतात. मात्र जर कुणी या प्राधिकार प्राप्त लोकांस युद्ध करून व युद्धशास्त्राच्या नियमांचे पालन करून पराभूत अथवा ठार केले तर तो विजेता व्यक्ती आपसूक नवा प्राधिकारी बनून त्यास त्या युद्धात पराभूत अथवा मृत व्यक्तींचे तमाम अधिकार मिळतात व त्यायोगे तो हे नियम बदलू अथवा पूर्णतः बाद करून दुसरे नियम नव्याने बनवू शकतो हेही तो जाणत होता.
हे नियम अथवा प्राधिकार म्हणजे मुख्यत्वे कुणास वर अथवा शापरुपी करार करून देणे, आणि ते वर व शाप अगदी कटाक्षाने पूर्ण होतील याची सर्व व्यवस्था करणे. स्त्री-पुरुष संबंध आणि वैवाहिक पद्धतींचे नियमन करणे, एखाद्यास काही विशिष्ट प्रक्रियेने मृत्यू येणार नाही अशी हमी देणे, जशी हिरण्यकश्यपूस कुणाही मनुष्य अथवा श्वापदांकडून मृत्यू येणार नाही अशी हमी देण्यात आली होती. कुणास थेट मृत्यू देता येत नसला तरी त्याच्या मृत्यूचे कारण अथवा कारक योजून त्या उपायाने त्याचे जीवित संपविणे, म्हणजे जसे हिरण्यकश्यपूचेच जीवन त्यास दिलेल्या जीविताच्या सर्व हमींचे पालन तंतोतंत करूनही अन्य उपाय योजून संपविले होते, याव्यतिरिक्त राजकीय वारस ठरविणे, युद्धाचे नियम, धर्म, उपासना, यज्ञवैकल्ये यांचे नियम ठरवणे आणि त्याचे काटेकोर पालन झालेच पाहिजे याची खात्री करणे, अशा अनेक पद्धतींनी आणि नियमनांनी वैश्विक चलनाची प्रक्रिया नियंत्रित केली जात होती. यातील अनेक नियम अथवा सुविधा यांचा उपयोग करण्याचे अधिकार केवळ निर्दिष्टित प्राधिकारी व्यक्तींनाच होते तर काही सवलती व सुविधा कोणाही सामान्य मनुष्यास वापरता येत होत्या. सामान्यजनांत सर्वात सुलभ आणि लोकप्रिय हे उपासनेचे नियम होते कारण त्यायोगे कुणीही मनुष्य तप करून कुणाही देवपदाकडून काही वर मिळवू शकत होता. एखाद्या देवतेचे वा प्राधिकाऱ्याचे तप करणे याचा अर्थ त्याने विकसित केलेल्या व शोधलेल्या तमाम तंत्र आणि विद्यांचा अभ्यास करून त्यात पारंगत होणे असा होतो. तप पूर्ण झाल्यावर त्या अभ्यासक्रमाच्या अधिकारी देवतेकडून अध्यायीस काही इच्छित वर मिळत असे. किमान बारा वर्षे हा अभ्यास करावा लागत असे, काही देवांची तपे तर याहून अधिक काळ चालू शकत असत, मात्र वैश्विक नियमानुसार बारा वर्षे होईपर्यंत कोणत्याही विद्यार्जनास तप हा दर्जा देता येत नसे. अनेक असुर मानव या उपासनेच्या म्हणजेच तपाच्या तुलनेने शिथिल असलेल्या नियमांचा गैरफायदा घेऊन अनेक वर मिळवीत असत. अर्थात हे वर म्हणजे अगदी कोणतीही मागणी सर्रास पूर्ण करणारे करार अथवा वचने नसत. त्या बाबतीतही वर प्रदान करणाऱ्या देवपदास काही बंधने होती. तसेच वर मागणारासाठीही काही संहीता होती. त्याच संहितेस अनुसरून शिवाने तपश्चर्या पूर्ण करूनही रावणाच्या काही वरदानांच्या मागण्या नाकारल्या होत्या हे शर्वरीच्या पित्यास माहीत होते. ब्रह्म विष्णू आणि शिव यांच्यानंतर असे वैश्विक नियमनांचे अधिकार सर्वात जास्त होते ते सप्तर्षींना हेही शर्वरीच्या पित्यास ठाऊक होते, मात्र आज हे सप्तर्षी नेमके काय ठराव करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत हेच त्यास उमगेना, त्याने नुसतेच प्रश्नार्थक मुद्रेने सर्वांकडे पाहीले. 
मग अगस्त्य मुनी बोलू लागले. ते म्हणाले, रावणाने आपणास देव अथवा असुर यांजकडून मृत्यू येणार नाही असा वैश्विक नियम स्वअधिकारात ठरवून घेतला आहे हे तर तुम्हाला सांगितले आहेच. त्यामुळे आता तो एका अर्थाने अजेय आणि अमर झालाच आहे. आपल्याला त्याला रोखण्याची एकमेव संधी आहे ती म्हणजे त्यास कुणा सामान्य मानववंशातील व्यक्तीकडून मृत्यू देवविणे. मात्र कुणालाही असे सहजासहजी मारता येत नाही. यमधर्म हा मृत्यूचे वैश्विक नियम मोडून मारलेल्या व्यक्तीचे प्राण हरत नाही, किंबहुना हरू शकतच नाही. तद्वत कुणीही सामान्य मनुष्य वैश्विक नियमांतील बंधनामुळे रावणास असे सहज अथवा थेट मारू शकत नाही. त्यासाठी कुणातरी महान योग्यता असलेल्या पुरुषास काही विशेष शक्ती आणि साधने देऊन त्याचे हस्ते रावणास मारावे लागेल. मात्र कुणाही सामान्य मनुष्यास वैश्विक नियमानुसार युद्ध जिंकण्यासाठी अथवा इतर कोणत्याही कार्यासाठी देव अथवा कुणाही विश्व प्राधिकाऱ्याकडून थेट आणि विनासायास वा विनातपस्या काही सवलती अथवा साधने देता येऊ शकत नाहीत. अशा सवलती व साधने देण्यासाठी किमान ब्रह्म, शिव आणि विष्णू या तीनही देवतांची तपस्या पूर्ण केलेला पुरुष अथवा अवतारी पुरुषाच्या दर्जाची व्यक्ती हवी असते. केवळ अवतारी पुरुषासच काही विशेष शक्ती व क्षमता थेट म्हणजे विनातपस्या प्रदान करता येऊ शकतात. रावणास मारण्यासाठी कुणातरी महान योग्यता असलेल्या पुरुषास अवतारी पुरुषाचा दर्जा देऊन त्यास अशा शक्ती प्रदान करून मग त्याचे हस्ते रावणास मारावे लागेल. मात्र कुणीही व्यक्ती अवतारी पुरुष बनू शकत नाही. अवतारी पुरुष हा प्रचंड योग्यतेचा, बलशाली, युद्धनिपुण आणि बुद्धिमान असाच पुरुष निवडावा लागतो. आजच्या घडीला संपूर्ण भारतवर्षात असा एकमेव पुरुष आम्हाला दिसतो आहे तो म्हणजे आपला होणारा जमातृ रामभद्र हा होय. ती परीक्षा जी आम्ही घेतली ती खरेतर शर्वरीच्या स्वयंवरासाठी नव्हे तर रामभद्रास अवतारी पुरुष हा दर्जा देण्यासाठी होती. सात वृक्ष एकाच बाणाने भेदणारा रामभद्र हा त्यायोगे नक्कीच अवतारी पुरुषाचा दर्जा मिळण्यासाठी योग्य सिद्ध झाला आहे. तेव्हा शर्वरीशी विवाहापश्चात आपण त्यास अधिकृतरीत्या तसा दर्जा देऊ. मात्र त्यासाठी आपण त्यास रावणाविरुद्ध लढण्यासाठी राजी करायला हवे. एकदा तो अवतारी पुरुष म्हणून घोषित झाला की त्यास हव्या त्या आणि वैश्विक नियमांनुसार शक्य त्या सर्व शक्ती, क्षमता आणि तंत्रे देवलोकांकडून देण्यात येतील, ज्यायोगे तो रावणाचा वध करू शकेल. बोला आपणांस हे मान्य आहे का? मात्र एक लक्षात ठेवा, हे जेवढे महान भाग्याचे कार्य आहे तेवढीच यात प्रचंड जोखीम सुद्धा आहे, थेट आपल्या कन्येचे सौभाग्यच या कामी पणास लागू शकते, कारण रावणाने स्वर्गलोक जिंकून तो एक असीम पराक्रमी वीर आहे हे सिद्ध केलेच आहे. त्यामुळे आपण संमती देण्यापूर्वी पूर्ण विचारांती निर्णय घ्या. या कामी स्वतः रामभद्रास त्याची अनुमती विचारता येऊ शकत नाही कारण अवतारी पुरुष हा निवडायचा असतो, रामभद्रास अशा परवानगीसाठी विचारले तर ते संमतीने मंजूर केल्यासारखे होईल, अवतारी पुरुषास त्याचे स्वतःचे संमतीने निवडता येत नाही. धर्मशास्त्रानुसार आपली कन्या आपण त्यास देणार असल्याने रामभद्रच्या राज्यातील स्त्रीसत्ताक पद्धतीनुसार विवाहानंतर रामभद्रच्या पित्यापेक्षा आपला अधिकार त्याचेवर अधिक असेल, म्हणून आम्ही त्याच्या पित्यास न विचारता आपणास विचारत आहोत. आपण यासाठी संमत आहात की नाही ते कृपया विचार करून सांगावे.
हे ऐकून शर्वरीचा पिता काही क्षण शांत होऊन विचारात गढून गेला. अवतारी पुरुष म्हणजे विष्णूने ठरवून एखाद्या मानवी वंशात जन्म घेणे असेच तो आजपर्यंत मानत आला होता, मात्र अवतारी पुरुष अशा प्रकारे निवडला जातो हे पाहून तो एका प्रकारे आनंदमिश्रित आश्चर्याने भांबावून गेला होता. परंतु जास्त वेळ संभ्रमात न राहता पुढच्याच क्षणी तो म्हणाला की प्रत्यक्ष नृसिंह, वामन आणि परशुराम यांच्या पंक्तीत बसण्याचे भाग्य माझ्या भावी जमातृस मिळत असेल तर ही माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या कन्येसाठी आणि आमच्या संपूर्ण कुलासाठीही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, तेव्हा मी आपल्या निर्णयास याच क्षणी पूर्ण संमती देत आहे.
शर्वरीच्या पित्याकडून अशी संमती मिळाल्यावर मग विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे तर. आम्हास तीनही मुख्य वैयक्तिक प्राधिकारी म्हणजे ब्रह्म, शिव आणि विष्णू यांनी रामभद्रास अवतारी पुरुष दर्जा द्यावा की नाही हे ठरविण्याचे पूर्णअधिकार दिले आहेत, सप्तर्षींपैकी 'सप्तर्षी बहुमत' म्हणजे आम्ही चौघेही या निर्णयात सामील आहोतच, तेव्हा मी रामभद्र याची पुढील अवतारी पुरुष म्हणून निवड करण्यात आली आहे हा ठराव मंजूर करतो, आणि रामभद्राच्या अवतारी दर्जाची अधिकृत घोषणा ही रामभद्र आणि शर्वरी यांचे विवाहानंतर करण्यात येईल अशी आपणांस खात्री देऊन आपल्याकडून प्रस्थानासाठी परवानगी घेतो.
......
शर्वरीच्या पित्याच्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता. शेकडो वर्षांनंतर पृथ्वीवर एक अवतारी पुरुष जन्माला येतो. हा सन्मान आपल्या हयातीत आणि तोही आपल्याच होणाऱ्या जमातृस मिळतो आहे या जाणिवेनेच तो अत्यंत आनंदी होत होता. आपली लाडकी कन्या किती भाग्यशाली आहे आणि आपण तिजसाठी निवडलेला वर किती महान कार्यासाठी निवडला गेला आहे हे तिस सांगावे अशी त्याला तीव्र इच्छा होत होती. महर्षींनी ही बातमी गुप्त ठेवण्याविषयी काही सांगितले नव्हतेच. तसेही वीस दिवसांनी जे जगजाहीर होणार आहे ते आताच आपल्या कन्येस सांगून तिचा आनंद सहस्त्रगुणीत केला तर काय वाईट असा विचार करून त्याने शर्वरीस सांगितले की तिचा होणारा पति रामभद्र हा कुणी साधा मनुष्य नसून तो साक्षात विष्णूचा नवा अवतार आहे. मात्र उगीचच अधिक विभ्रांति आणि प्रश्नांची सरबराई टाळण्यासाठी त्याने शर्वरीस अवतारी पुरुष निवडीची पद्धत मात्र सांगितली नाही. रामभद्र कुणी साधारण युवक नसून साक्षात अवतारी पुरुष आहे हे ऐकून तर शर्वरीच्या आनंदास पारावारच राहीला नाही. आपला उपयोजित पति हा साक्षात मानवरूपात जन्म घेतलेला विष्णू आहे ही तिच्यासाठी अत्यंत सौभाग्याची वार्ता होती. तिनेही मग तशाच आनंदाच्या भरात आपल्या सखीस ही वार्ता दिली. तिनेही अन्य कुणा तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीस हे सांगितले आणि अशा प्रकारे नेमके ज्याला ज्याला ही बातमी कळाली ते सर्वजण अतिशय आनंदाने आणि जोमाने विवाहाच्या तयारीस लागले.
.....

शेवटी विवाहाचा दिवस आला. देशोदेशीचे राजे, मोठमोठे रथी, महारथी वीर, सप्तर्षी, इतकेच काय तर हिमालयाकडील आणि पश्चिमेच्या सागरातटावरील अनेक देवलोकही शर्वरी रामभद्राच्या विवाहसमारंभासाठी आले होते. सगळे नगर विस्मयकारी कलाकुसरीने सुशोभित करण्यात आले होते. शंभरेक वेगवेगळ्या प्रदेशांतून सर्वोत्तम बल्लव स्वयंपाकासाठी बोलविण्यात आले होते. बाहेरून आलेल्या अतिथींसाठी आलिशान दालने उभी करण्यात आली होती. लग्नमंडपाची शोभा तर अवर्णनीयच होती. सुगंधी आणि रंगीत द्रव्यांचे कृत्रिम झरे विवाह दालनात तयार करण्यात आले होते. पुष्पांची विविध रोपे कल्पकतेने मांडून त्यांचे विविध आकार बनविण्यात आले होते. मयूर, मृग, राजहंस आदी सौंदर्यशाली जीव उद्यानांत सोडण्यात आले होते, सर्वाना बसण्यासाठी मऊशार रेशमी आसने निर्मिली गेली होती. मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या कलात्मकतेने वाकवून व छाटून सावली आणि कमानी तयार करण्यात आल्या होत्या. न भूतो न भविष्यति असा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य विवाहसोहळा पाहण्यासाठी, त्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता.
मुहूर्ताचा क्षण जवळ येऊ लागला तशी लगबग वाढू लागली. होमात आहुत्या पडून त्यातून धूर आणि ज्वाला उठू लागल्या. ढोल, वाद्यांच्या गजरांनी सारे विवाहदालन निनादून गेले. शर्वरी आपल्या वधूदालनात संपूर्ण साजशृंगारात नटून तयार होऊन बसली होती. शर्वरीचा भाऊ सर्वात आधी मंडपात हजार झाला आणि लगेचच रामभद्रही येऊन त्याचे शेजारील नियोजित जागी उभा राहिला. मंत्रोच्चारांना सुरुवात झाली. इकडे वधुदालनात जशी जशी घटिकापात्रातली वालुका कमी होत होती तसे तसे शर्वरीच्या हृदयाचे ठोके अत्यानंदाने जोरजोरात वाढू लागले होते. कोणत्याही क्षणी आता तिचा पिता तिस लग्नवेदीवर घेऊन जाण्यासाठी येणार होता. ती डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट पाहत होती. घटिकापात्र आता जवळ जवळ रिते झालेच होते. तेवढ्यात शर्वरीच्या दालनाबाहेर काही लगबग झाली. आपला पिता आपणास नेण्यासाठी आला हे शर्वरीस कळले. ती तात्काळ उठली आणि दालनाच्या द्वाराच्या दिशेने आपल्या पित्याच्या येण्याकडे नजर लावून उभी राहीली.  पुढच्याच क्षणी द्वाराचा पडदा बाजूस सरकला आणि तिला घेऊन जाण्यासाठी आलेल्या तिच्या पित्याचा चेहरा शर्वरीस दिसला. आता रामभद्रशी आपल्या विवाहाचा तो असीम भाग्याचा क्षण आला या जाणीवेच्या अपार आनंदाने तिने स्वतःहुन पुढे पाऊल टाकले आणि बघते तर काय, तिचा पिता रक्ताच्या धारांत न्हाऊन निघत होता. द्वाराशी पोचताच तो कोलमडून खाली पडला. पडता पडता शर्वरीस एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्वरित जाऊन लपून बस असे त्याने सांगितले आणि तत्क्षणी प्राण सोडला. काय होते आहे हे कळायच्या आत बाहेरून प्रचंड किंकाळ्यांचे आणि अस्त्रशस्त्रे चालविण्याचे आवाज येऊ लागले. शर्वरीला काय घडते आहे ते काहीच उमजेना, तिला प्रचंड धक्का बसला होता तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असा अनपेक्षितपणे भंगून सर्वाधिक दु:खद क्षणात बदलून गेला होता. तिला हे सारे सहन न होऊन ती क्षणार्धात तिथेच मूर्च्छित होऊन पडली. सखीनेच मग प्रसंगावधान राखत तिच्या पित्याच्या अंतिम सूचनेप्रमाणे कसेबसे तीस उचलून क्षणार्धात तिथून दूर गुप्त सुरक्षित ठिकाणी नेले.
.....
सप्तर्षींनी रामभद्र नावाच्या एका व्यक्तीस अवतारी पुरुष घोषित करून रावणाचा वध करण्याची योजना बनवली आहे ही वार्ता कशी कुणास ठाऊक पण थेट लंकेपर्यंत पोचली होती. आपल्याला ठार करण्यासाठी अशी काही योजना बनविली जात असल्याचे कळून रावणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्याशी प्रत्यक्ष लढण्याची हिम्मत नसलेले देव अशा गुप्तमार्गाने षडयंत्र रचत आहेत हे पाहून त्यानेही उलटपक्षी आपणच देवांची योजना विफल करण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्याने स्वतः एक अग्रीम योजना बनवली. रामभद्रास अवतारी पुरुष घोषित करण्यापूर्वीच ठार करायचे आणि त्याचेनंतर भविष्यात कुणीही मनुष्य अशा साहसास करू धजणार नाही असे रणक्रंदन माजविण्याचे रावणाने ठरविले. रामभद्र हा एक वीर आणि युद्धनिपुण पुरुष आहे ही वार्ता त्याच्यापर्यंत आली होतीच. त्यामुळे रामभद्र सर्वाधिक बेसावध आणि विनातयारी असताना अकस्मात त्याचेवर हल्ला करण्याचे रावणाने ठरविले. रामभद्र अशाप्रकारे विनातयारी आणि पूर्णतः बेसावध सापडण्याची एकमेव संधी होती ती म्हणजे त्याच्या विवाहप्रसंगी.! मुत्सद्दी रावणाने मग एक अत्यंत गुप्त योजना बनवून ऐन विवाहाच्या प्रसंगी सर्वशक्तीनिशी हल्ला करून रामभद्रसह, देव, ऋषीगण आणि उपस्थित सर्वांचे शिरकाण करून आपल्या मृत्यूची योजना बनविण्याचा पुरेपूर सूड घ्यायचा असे ठरविले. गुप्तपणे शर्वरीच्या नगराबाहेरील वनात रावणाचे संपूर्ण सैन्य कधी येऊन दाखल झाले याची विवाहाच्या धामधुमीत असलेल्या शर्वरीच्या पित्यास पुसटशीही वार्ता लागली नाही. रामभद्रनेही विवाह निश्चित झाल्यावर आपल्या बहिणीस आणण्यासाठी जे दल पाठविले होते त्याचेबरोबर आपले बहुतांश सैन्यदेखील गरज नाही म्हणून परत स्वदेशी पाठवून दिले होते. त्याचे मागे उरलेले अल्प सैन्यही विवाहदालनापासून दूर नगराच्या बाहेर ठेवलेले होते. रावणाने अत्यंत सटीक योजना बनवून नेमका डाव साधला होता.
सर्वात आधी रावणाने शर्वरीचा पिता, बंधू आणि रामभद्र यांस पकडून घेतले आणि मगच इतरांस मारण्यास सुरुवात केली. इंद्रजिताने शर्वरीच्या पित्यावर प्रथमतः वार केला मात्र तो कसाबसा तिथून सुटून शर्वरीच्या दालनापर्यंत जखमी अवस्थेत पोचला. रावणाने मग स्वहस्ते सैनिकांनी पकडून ठेवलेल्या शर्वरीच्या भावाचा व रामभद्रचा सर्वांसमक्ष शिरच्छेद केला. रामभद्रचे तुटलेले शीर घेऊन त्याने हाच का देवतांचा मला मारणारा अवतारी पुरुष? अशी विकट गर्जना केली आणि आपल्या सैन्यास उपस्थित उर्वरित सर्व पुरुषांस ठार करण्याची व स्त्रियांस बंदी बनवून सोबत घेण्याची आज्ञा दिली. स्वतः त्याने रामभद्राच्या बहिणीस पकडून घेतले व शर्वरीसही शोधून आणा असा आदेश दिला. त्यानंतर रावणाच्या सैन्याने जे शिरकाण सुरु केले त्याने संपूर्ण नगरच अक्षरश: रक्ताने भरून गेले. हजारो नगरवासी, अतिथी राजे, देवलोक, ऋषी, पंडित या सर्वांस गाठून ठार मारण्यात आले. स्त्रियांस बंदी बनविण्यात आले आणि मग अशा प्रकारे संपूर्ण विध्वंस करून झाल्यावर रावण रामभद्राच्या बहिणीसह अनेको स्त्रियांचे अपहरण करून तिथून निघून गेला. सखीने अत्यंत चपळाईने शर्वरीस गुप्त ठिकाणी नेल्याने ती रावणाच्या हाती लागली नाही. 
.......
तब्बल दहा प्रहरांनी शर्वरी शुद्धीवर आली. नगरात काही लहान मुले, काही वृद्ध स्त्रीपुरुष, वृषभ व महिषवर्गीय जनावरे आणि प्रेतांचा खच याशिवाय काही उरलेले नव्हते. शर्वरी शुद्धीत आल्यावर तिस काही खावयास देऊन सखीने सर्व वृत्तांत सांगितला. शर्वरी ते थिजलेल्या भावनांनी ऐकत होती आणि यांत्रिकपणे एकेक घास चावून गिळत होती. अचानक एका क्षणी ती उठली. आपल्या अंगावरची वस्त्रे व दागिने तिने ओरबाडून फेकून दिले आणि भ्रमित झाल्यासारखी उठून चालू लागली. सखीने तिचा हात धरून तिला बसवण्याचा प्रयत्न केला पण तिने अत्यंत क्रोधाने मला रोखू नकोस असा तिस डोळ्यानेच इशारा केला आणि संथपणे चालत विवाहवेदीच्या ठिकाणी आली. जिकडेतिकडे रक्त आणि मृतदेह पडलेले होते. विवाहवेदीवर शिरच्छेद करण्यात आलेली दोन धडे पडलेली होती. शर्वरी त्यातील रामभद्राच्या देहाजवळ गेली. त्याच्या मानेतून निघालेले आणि आता काळे पडून गेलेले रक्त तिने आपल्या माथ्यावर लावले, आणि एक मोठा हंबरडा फोडून त्याच्या चरणांस स्पर्श करून स्वामी अशी आर्त किंकाळी मारत प्रचंड विलाप करीत तिथून निघाली. मनाने वरलेल्या, स्वतःहुन अधिक प्रेम केलेल्या, ज्याच्याशी सुखी वैवाहिक जीवन आणि शृंगाराची असंख्य स्वप्ने पाहिली होती त्या रामभद्रच्या निष्प्राण देहाकडे नव्हे तर आपल्या अपार दुर्दैवाकडे केवीलवाणेपणाने पाहत ती तिथून निघून गेली. सखी तिच्या पाठोपाठ येऊ लागली पण शर्वरीने तिस आदेश देऊन माघारी परतण्यास सांगितले आणि ती एकटीच चालत नगराबाहेर निघून गेली. 
 .........
लोक म्हणत शर्वरी वेडी झाली. शर्वरी नव्हे कारण ते संस्कृत नाव कुणास उच्चारता येतच नसे. सगळे म्हणत की शबरी आता भूत पिशाच्चांसारखी रानोमाळ भटकते, झाडांची पाने, मुळे, गवत असे काहीही खाते, तिस वस्त्रांचे भान राहत नाही. कुठेही निजते, वनात कुठेही फिरते अशी शबरीबद्दलची ऐकीव माहीती लोक एकमेकांत चर्चित असत. अशीच विपन्न जीवन जगत असताना एके दिवशी शबरी तिच्या शोधात असलेल्या तिच्या मावसभावास म्हणजे जटायूस वनात एका झाडाखाली झोपलेली सापडली. शर्वरीविवाहाच्या वेळी जटायू नगरात नव्हता त्यामुळे तिच्या स्वकीयांतील तो एकमेव पुरुष जिवंत राहिलेला होता. त्याने शबरीस आपल्यासोबत घेतले. शबरीचे नगर आणि राज्य आता पूर्णतः उध्वस्त झाले होते त्यामुळे जटायू स्वतःदेखील भणंग अवस्थेत आयुष्य कंठीत होता. मात्र राजकन्या असलेल्या आपली भगिनी शबरीचे तरी असे हाल होऊ नयेत म्हणून त्याने तिस त्याच वनात असलेल्या मातंग ऋषींच्या आश्रमात ठेवायचे ठरविले. जटायूने शबरीस सांगितले की त्या दुर्दैवी दिवसानंतर आता रावणाने त्यांच्या राज्यासह संपूर्ण दंडकारण्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले असून दंडकारण्याच्या विविध भागांच्या कारभारासाठी आपले असुर प्रतिनिधी नेमलेले आहेत. कधी ना कधी रावण आपल्या साम्राज्यात समाविष्ट केलेल्या या प्रदेशाच्या कारभाराची व्यवस्था तपासण्यासाठी येईलच. तेव्हा मी त्याचेशी द्वंद्व करून त्यास ठार मारीन व आपल्या प्रियजनांच्या हत्यांचा बदला घेईन. तोपर्यंत मी असाच संपूर्ण दंडकारण्यात संचार करून रावणाशी लढण्याची तयारी करत राहील. रावण अगदी अप्ल्पकाळासाठी जरी इथे आला तरीही माझ्याशी द्वंद्व केल्याशिवाय तो जाऊ शकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. जटायू कितीही आवेशात बोलत असला तरी शबरी आता सूड अथवा प्रतिशोधादि भावनांपलीकडे जाऊन दु:खाच्या खोल असीमित गर्तेत हरवून गेली होती. जटायूच्या या वाङनिश्चयाचे ना तिला कौतुक वाटले ना वैषम्य.   
मातंग ऋषींस शबरीबद्दल माहिती होती. त्यांचे शबरीच्या पित्याशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांचा आश्रम स्वतः शबरीच्या पित्यानेच उभारून दिला होता. तिच्यावर गुदरलेल्या दुर्भागी प्रसंगामुळे ती अशी सैरभैर होऊन विपन्नावस्थेस पोचली आहे हे पाहून ते खूप हळहळले. त्यांचेसाठी ती कन्येसारखीच होती त्यामुळे त्यांनी तिचा सांभाळ करण्याचे त्वरित मान्य केले. मग जटायू तिला आश्रमात सोडून निघून गेला. शबरी या दुःखावेगी अवस्थेत काहीशी वेड लागल्यासारखे वागत असली तरी मातंग ऋषींनी तिस प्रयत्नाने अनेक गोष्टींचे वळण लावले. हळूहळू ती थोडी सावरू लागली. बरीचशी कामे व्यवस्थितपणे करू लागली. यज्ञ, हवनाची तयारी, सायंपूजा, प्रभातकालीन प्रार्थना, अन्न शिजवणे, वनातून जाऊन फळे कंदमुळे गोळा करून आणणे हे सगळे ती करू लागली. जवळ जवळ सामान्यत्वाला आली. इतकेच नाही तर पाठांतर, वाचन इत्यादींतही तिने उत्तम प्रगती केली, मात्र ती कधीही इवलीशीही हसत नसे. सगळी कामे करी पण अतिशय यांत्रिकपणे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक उदासभाव दाटून राहत असे, ती केवळ विचारलेल्या प्रश्नास प्रत्युत्तर देणे याव्यतिरिक्त कुणाशी काही बोलतही नसे, कुणाच्याही नजरेस नजर भिडवत नसे. मातंग ऋषी तिचे खूप सांत्वन करत. मात्र आश्रमातील तिच्या जवळजवळ चाळीस वर्षांच्या वास्तव्यात ते स्वतःही अगदी एके समयीदेखील शबरीच्या चेहऱ्यावर काही केल्या आनंदाचे भाव आणू शकले नाहीत. त्यांचे वयही आता खूप झाले होते. आपल्या पश्चात आपल्या या मानसकन्येचे काय होईल याची त्यांस चिंता लागून राहिली होती. आपल्या अंत्यसमयी आजारपणाने शय्येस खिळलेले असताना त्यांनी आपणानंतर शबरी हीच आश्रमाची प्रमुख बनेल असे जाहीर केले आणि मग काही दिवसांनी आपले प्राणोत्क्रमण केले.
मातंग ऋषींच्या निधनानंतर शबरी जरी आश्रमप्रमुख बनली असली तरी तिच्या वर्तणुकीत काहीही फरक पडला नाही. त्यामुळे इतर ऋषिकुमारांपैकी सर्वात मोठा जो रवनिश तोच आश्रमाची सगळी जबाबदारी पार पाडत असे. मातंग ऋषींच्या दशमवर्ष स्मृतीदिनी जेव्हा मृत्योपरांत त्यांचे शेवटचे विधी पार पाडण्याची तो तयारी करत होता तेव्हाच आश्रमात सातही सप्तर्षींचे आगमन झाले.
सप्तर्षींनी येताच रवनिश यास शबरी कुठे आहे ते विचारले आणि मग ते सातही जण थेट तिच्या कुटीकडे गेले. शबरी आपल्या कुटीतच होती, त्या सर्वांनी तिस अभिवादन करून आपापला परिचय दिला. शबरीनेही त्यांस अभिवादन करून येण्याचे प्रयोजन विचारले.
सप्तर्षींपैकी गौतम उत्तरले, देवी आमच्या मागील पिढीतील सप्तर्षींनी अशा एके दिवशी आम्ही आपणांस भेटण्यास यावे असे सांगून ठेवले होते. मागच्या पिढीतील सप्तर्षींच्या कार्यकाळात आणि त्यांचे उपस्थितीत आपणांवर हे दुर्दैव ओढवले याची आम्हाला जाणीव आणि अपार खेद आहे. समस्त सप्तर्षी संघ त्यासमयी आपल्या स्वामींस वाचवू न शकल्याबद्दल आपला क्षमायाचक आहे. आपण अत्यंत दु;खात इतके दिवस आपले जीवन व्यतीत केले आहे याची आम्हास जाणीव आहे मात्र आम्ही आज आपल्यासाठी एक आनंददायी बातमी घेऊन आलो आहोत.
आपल्या प्रिय रामभद्रच्या मृत्यूनंतर जगात कोणतीही बातमी आपल्यासाठी आशादायी वा आनंददायी असूच शकत नाही याची या सप्तर्षींस काय कल्पना येणार अशी भावना मनात येऊनही शबरीने अत्यंत विनम्रतेने ती वार्ता कथन करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी सांगितले की हे देवी आपले उपयोजित मृत स्वामी हे नवा जन्म घेऊन परत आले आहेत. कालच इथून जवळच असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर त्या युवकाने एकाच बाणाच्या संधानाने ओळीत असलेल्या सात वृक्षांचा वेध घेतला. मागच्या जन्मी जरी रावणाच्या कपटामुळे त्यांस वीरगती लाभली असली तरी या जन्मी मात्र ते रावणास ठार करून आपल्या दु:खाचा पूर्णपणे बदला घेतील याची आम्हास शाश्वती आहे. त्यांचे नाव या जन्मातही राम हेच आहे. रामचंद्र.!! आम्ही मागील पिढीतील सप्तर्षींच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र यांस त्यांच्या पूर्वजन्मीची ओळख देऊन आपला परीचय करविला आहे. तद्वत त्यांनीही आपणांस भेटण्याची कामना केली आहे. त्याप्रमाणे आपली अनुज्ञा असेल तर उद्या स्वयं रामचंद्र आपल्या भेटीस इथे आश्रमात येणार आहेत. आपणांस हीच अग्रीम वार्ता देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कृपया आपली अनुज्ञा द्यावी.
.... 
आपल्या मागच्या पिढीतील सप्तर्षींनी अनावधानाने का होईना रामभद्रास अवतारी पुरुष घोषित करण्यास विलंब केला होता, त्यामुळे ऐन रावणाच्या हल्ल्याच्या वेळी रामभद्रास तिथून तंत्र आणि मोहविद्येने वाचविता येण्याची शक्यता असूनही केवळ त्यास तोपावेतो अवतारी पुरुषाचा दर्जा मिळाला नसल्याने देवांस सदर कृती करता आली नाही. रामभद्र हा तोपर्यंत एक सामान्य पुरुष होता व सामान्यजनांस कोणत्याही विश्व प्राधिकाऱ्याकडून थेट आणि विनासायास वा विनातपस्या काही सवलती अथवा साधने देता येऊ शकत नाहीत, म्हणून देव ऐनसमयी त्यास अशा काही शक्ती अथवा सवलती देऊन वाचवू शकले नाहीत. परंतु असे अधिकारप्राप्त असलेल्या सर्व सप्तर्षींना मात्र त्यावेळी विवाहादालनातून देवांनी मोहविद्येने बाहेर काढून शिताफीने वाचविले होते. रामभद्राच्या मृत्यूनंतर शबरीची झालेली दुरावस्था सप्तर्षींस ज्ञात झाली होती, म्हणून एका संधानात सात वृक्ष भेदणारा आणि योग्यतेचे इतरही सर्व निकष पूर्ण करणारा नवा पुरुष रामचंद्र यास शोधल्यावर त्यांनी सर्वप्रथम त्यास अवतारी पुरुषाचा दर्जा देऊन, तेव्हाच्या सप्तर्षींच्या चुकीचे क्षालन म्हणून किमान वृद्ध शर्वरीच्या उत्तरआयुष्यात तरी एक आनंदाचा क्षण देता यावा म्हणून त्याने तिस भेटावे अशी त्यास विनंती केली होती व रामानेही ती मान्य केली होती. 
....
जवळ जवळ चार तपांइतक्या काळानंतर शबरीच्या मनात पहील्यांदा आनंदाच्या भावनेचा अंकुर फुटला होता. इतक्या वर्षात शबरीचा चेहरा पहिल्यांदा आनंदाने उजळला होता, ती अर्धशतकानंतर पहिल्यांदा हसली होती, आणि का हसू नये तिने? आज अशक्य ते शक्य झाले होते, शबरीच्या मनावर, आयुष्यावर ज्याने पूर्णतः मोहिनी घातली होती, शबरीने ज्याच्या चरणांशी स्वतःस केव्हाच अर्पण केले होते, तो तिचा उपयोजित स्वामी, तिचा सखा, प्रियकर रामभद्र साक्षात मृत्यूलाही मात देऊन पुन्हा तिस भेटायला आला होता. तिच्या प्रेमाच्या तपस्येने, तिच्या पवित्र प्रितीने आज अक्षरश: प्राक्तनालाही मात दिली होती.

रामचंद्राच्या आगमनाचा दिवस उगवला आणि शबरीची उष:कालापासूनच मोठी लगबग सुरु झाली. माझ्या प्रभूसाठी मी काय करू आणि काय नको असे तिस झाले होते. तिला आपल्या विवाहाच्या दिवसाची रामभद्रच्या स्वागतासाठी तिच्या पित्याने केलेली अलौकिक तयारी आठवली. आजही आपल्या प्रभूच्या स्वागतासाठी तिला पुन्हा तसेच काहीसे योजित करायचे होते, मात्र ती काही आता राज्याधिकारी नव्हती. मग ती सगळ्या सृष्टीसच प्रभूच्या स्वागतासाठी सहकार्य करण्याची विनंती करू लागली. हे पाखरांनो आपल्या गळ्यांतून सुंदर स्वर आळवा, फुलांनो आपल्या कोमल देहाच्या पखरणी पसरा. महातरुंनो जरा झुकून माझ्या भगवंताच्या शिरी छायादार कमानी धरा. कस्तुरी मृगांनो येथून कस्तुरी उधळीत जा, निर्झरांनो माझ्या प्रभूचे चरणकमल धुवा. हे वायुतत्वा आपल्याबरोबर तू सुखद शीतल सुगंध वाहून आण, मयूरांनो आपले मधुर नर्तन माझ्या प्रभूस दाखवा, जे जे उद्दात्त, सुंदर आहे ते सर्व माझ्या प्रभूस दिसू द्या. माझ्या प्रभूसाठी जे जे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम तेच मज हवे आहे.
प्रभूस बसण्यासाठी शबरीने सर्वात सुंदर रंगसंगतीची आणि मऊशार स्पर्शाची फुले आणून ती आसनावर मांडून ठेवली. प्रभुंवर वारा चालण्यासाठी मयूरपंखांचा पंखा बनवून ठेवला. प्रभूंस प्राशनासाठी सर्वोत्तम जल हवे म्हणून तिने थेट पंपा सरोवरात जाऊन स्वहस्ते जल आणले, तिच्या मनात आले की रामप्रभूस स्वागतार्थ देण्यासाठी सर्वात सुमधुर फळे हवीत... पण हा ऋतू कुठे मधुर फळांचा आहे? या ऋतूत तर केवळ बदरीफळे मिळतात वनात. तीही असतात काही खट्ट तर काही मधुर. माझ्या प्रभूंस खट्ट फळे कशी द्यावीत? त्यांस तर केवळ मधुर फळे मिळावयास हवी, मात्र बदरीफळांहून अन्य फळ समस्त वनात उपलब्धही नाही, मग हे पवित्र वृक्षांनो तुम्हीच सांगा, माझ्या प्रभूंस मी केवळ मधुर बदरीफळे कशी निवडून देऊ?

मध्यान्हीनंतर तिसऱ्या प्रहरी रामाचे आश्रमात आगमन झाले. शबरीस तर स्वर्ग केवळ दोन अंगुळे थिटा उरला होता. तिने अत्यंत उत्साहाने रामाचे स्वागत केले, पुष्पाच्छादित आसनावर त्यास बसविले, पवित्र पम्पा सरोवराचे जल प्यावयास दिले, आणि मग खाण्यासाठी बदरीफळांनी भरलेली एक टोपली पुढे केली...  

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

पुरानी कापी

यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली

लाइनों में गिरफ्तार कुछ अल्फाज दिखे, तो कई भूले जज्बात मिले
एक पन्ने पे सल्फ्यूरिक एसिड की पीएच, लिटमस पेपर से नापी मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

कछुए से हारनेवाला खरगोश चाँद पे दिखा, सिंड्रेला का खोया जूता मिला
और याद आयी तूफ़ान में खोई हुई लूसी ग्रे, जो किसीको न कदापि मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

कभी धरती बॉल जैसी गोल दिखाई दी, कहीँ ऊँचा एवरेस्ट मिला
उत्तर में टुण्ड्रा, पूरब में त्रिभुज, दक्षिण में सागर तो पश्चिम में तापी मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

सजा में पाया रगड़ा मिला, छोटी छोटी बातोंपे किया झगडा मिला
कैसे मुस्कुरा उठा हूँ मैं जो छड़ी के मार की याद हथेली पे छपी मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

बाकी दिन मिट्टीसे भरे हाथ पैर, और इतवार को पानी से भरी आँखे मिली  
कुसुमाग्रज के कविता की 'घरी जायला हवे' ये लाइन, बार बार अलापी मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

स्याही के दाग लगी कमीज, छेद जड़े जुतोंके तलवे, सब याद है  
लायब्ररी की वो किताब जो खो गयी थी, होस्टल में गद्दे के निचे छिपी मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

वो मासूम चेहरा मेरा, जो अब मुझसा दिखते किसी दूरके रिश्तेदार का लगता है,
उस के हर लेश में मेरे यारोंके अक्स हैं, उन अक्सोंके मोतियोंकी सीपी मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

उस कापी के पन्ने पलटते हैं, फड़फड़ाते हैं, फिर बेंचपर बैठने बुलाते हैं
वे मेरे स्कुल के दिन मैं फिर से जी लूँ, कोई हलकी गुंजाईश भी यद्यपि मिली
यादोंसे बंधी एक गठरी खोली तो स्कुल की पुरानी कापी मिली 

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

कहानी में ट्विस्ट नही, ट्विस्ट मे कहानी (The Cavendish Torsion bar experiment)

सहसा आपण कहानी मे ट्विस्ट ही फ्रेज ऐकतो, पण आज तसे होणार नाही आज मी जी सांगणार आहे ती आहे ट्विस्ट मे कहानी.

पार्ट १:  सबसे बडा खिलाडी "न्यूटन"


आपण आपल्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे गोष्टीत गोष्ट सांगत असतो तर आज ती गोष्टीतली गोष्ट सुरुवातीलाच सांगतो. 

एका राजाने काहीतरी पण ठेवला आणि हे घोषित केले की जो कोणी हे काम करेल त्याला हत्तीच्या वजनाइतके सोने देण्यात येईल. मग एका माणसाने तो पण पूर्ण केला आणि वेळ आली ती हत्तीच्या वजनाइतके सोने देण्याची. मित्रो तुमचा विश्वास बसणार नाही पण पूर्वीचे राजे आताच्या नेत्यांसारखे नव्हते मोठमोठी आश्वासने देऊन इलेक्शन झाले की ती सपशेल विसरून जायला. तद्वत राजाने कबुल केलेले सोने द्यायचा निश्चय केला, पण एक प्रॉब्लेम झाला. हत्तीचे वजन मोजावे कसे? एवढा मोठा तराजू कुठून आणावा की ज्यात एका बाजूला हत्ती आणि दुसऱ्या बाजूला सोने टाकता येईल? अन्यथा अशा तराजूविना हत्तीचे वजन करावेच कसे? काहीच मार्ग मिळेना, कुणालाही काही सुचेना. काही लोक जे आताच्या टेररीस्ट लोकांच्या मेन्टॅलिटीचे होते त्यांनी सांगितले की हत्तीला कापा आणि त्याचे तुकडे तुकडे करून वजन करा. पण राजा एवढा वेडा नव्हता, त्याने लागलीच हा मार्ग निकाली काढला. अशाप्रकारे मग इच्छा असूनही केवळ टेक्निकल डिफिकल्टीमुळे राजावर वचन मोडण्याचे लांच्छन येऊ घातले होते. मग प्रत्येक क्लायमॅक्सला येतो तसा मदतीसाठी समोर आला एक हिरो.
त्या हिरोने काय करावे? पाण्यात एक बोट घेतली, तिच्यात हत्तीस चढविले. हत्तीच्या वजनाने ती बोट पाण्यात दाबली जाऊन थोडी खाली गेली, आणि मग काही वेळाने स्थिर झाली. त्या हिरोने मग बोट जितकी पाण्यात बुडाली होती त्या लाईनवर म्हणजे हत्ती चढल्यावर बोटीला ज्या भागापर्यंत पाणी लागले होते तिथे एक रेघ आखून ठेवली आणि मग हत्तीला खाली उतरवले. हत्तीला खाली उतरविल्यावर बोट परत पाण्यातून थोडी वर आली. मग हिरो म्हणाला की आता बोटीत तोपर्यंत सोने टाका की जोपर्यंत बोट त्या मी केलेल्या रेघेच्या खुणेपर्यंत पाण्यात बुडत नाही. ती तेवढी बुडाली की झाले हत्तीच्या वजनाइतके सोने. ओहो केवढा हुशार आपला हिरो..!! एवढा हुशार माणूस आज असता तर नक्कीच आरबीआयचा गव्हर्नर झाला असता आणि कुणी त्याच्यावर आक्षेपही घेतला नसता, पण असो.  

हत्ती ही त्या मानाने खूप लहान गोष्ट झाली. त्याहून मोठ्या वस्तूचे वजन कसे करायचे? डबल स्लीट एक्स्पेरिमेंट या सिरीज मध्ये मी कळसूबाईचा डोंगर आणि पृथ्वी यांचे तुलनात्मक वजन सांगितले आहे.
समजा मी तुम्हास विचारले की पृथ्वीचे करेक्ट वजन मोजा, तर तुम्ही काय कराल? पृथ्वीचे वजन कसे मोजता येईल? आता पृथ्वी तर काही हत्तीसारखी मोठ्या बोटीत ठेवता येणार नाही.  मग काय करावे?
केशवसुतांची एक कविता आहे जी अत्यंत समर्पक आहे पण लोकांनी त्यावरून बरेच ट्रोल केले होते. ती कविता अशी आहे,
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनि

यावर लोक ट्रोल करायचे की आम्ही का आणून देऊ तुतारी? तुमची तुम्ही आणून काय फुंकायची ती फुंका की. वा रे वा म्हणजे तुतारी आमची आणि आयते फुंकणार तुम्ही? (बिचारे केशवसुत) 
अशाच प्रकारे पृथ्वीचे वजन कर असे सांगितल्यावर कुणी म्हणेल की 'एक तराजू द्या मज आणूनि तोलीन मी पृथ्वी ज्यात स्वप्राणाने,' मग अशावेळी गाढवापुढे गीता वाचण्याच्या पश्चातापाची अनुभूती आपणांस येईल. असो, पण डोके चालवा की पृथ्वीचे वजन मोजता येईल का?
शक्य तरी आहे का हे? असे करू पाहणारा वेडाच असेल नाही का?
पण नाही. खूप खूप हुशारातील हुशार लोकांनी पृथ्वीचे वजन मोजण्याचा प्रयत्न केला आहे. एकतर असे काही मनात येणे (म्हणजे पृथ्वीचे वजन करूयात वगैरे) हेच ग्रेट. ही असे विचार करणारी, आणि असे विचार करणारांना सन्मान देणारी युरोपातली लोके खरेच भन्नाट होती. नाहीतर आपण. आपल्या लोकांना वाटत होते की पृथ्वी क्षीरसागरात तरंगते आहे. आणि दोन प्राणी पृथ्वीचे वजन सांगू शकतात. एक वराह अवतारातले ते डुक्कर ज्याने पृथ्वी पाण्यातून वर उचलून आणली. आणि दुसरा म्हणजे शेषनाग ज्याच्या फण्यावर पृथ्वी डोलते आहे. असेच काही प्रवाद तिकडे युरोपातही होते पण तिथे ऍरिस्टोटल, गॅलिलिओ अशा काही जणांनी वेगळ्या रीतीने आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार करण्याची हिम्मत दाखवली. आणि हा वैज्ञानिक दृष्टीकोन न्यूटनपर्यंत येता येता तिथल्या लोकांनी स्वीकृत करण्यास सुरुवातही केली. आपल्याकडेही असे लोक नव्हते असे नाही पण आपण त्यांना इतके दुर्लक्षित केले की ते पूर्णतः विस्मृतीतच गेले. आर्यभटाने पृथ्वीचा व्यास आणि त्रिज्या अगदी तंतोतंत सांगितली होती. त्यानेच पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते हेही सांगितले होते. आणि केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे हेही सांगितले होते. ब्रह्मगुप्त आणि वराहमिहीर यांनी ग्रॅव्हिटीसारखा काहीतरी फोर्स अस्तित्वात असल्याचे नमूद केले होते. पण आपणातले करोडो लोक अजूनही शेषनाग आणि वराहअवतार कल्पना त्यागायला तयार नाहीत. 
असो,
न्यूटनने जो ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला त्या शोधामुळे लोकांस पृथ्वीचे वजन मोजणे शक्य होऊ शकते असे वाटायला लागले.
न्यूटनचे कार्य इतके महान आहे ना की न्यूटनशिवाय आपल्या अनेक विज्ञानकथा पूर्ण होणे शक्यच नसते. तर न्यूटनने त्याच्या या सर्वोच्च शोधात नेमके काय म्हंटले हे पाहू. 
सफरचंद डोक्यात पडल्यावर न्यूटनला ग्रॅव्हिटीचा शोध लागला. एवढेच आपल्याला माहीत असते. पण पृथ्वी वस्तूंस स्वतःकडे ओढते त्या क्रियेला ग्रॅव्हिटी म्हणायचे एवढे सांगणे म्हणजे विज्ञान नव्हे. ते गणितीय आकड्यांनी सिद्ध करावे लागते आणि वैश्विक तत्वांशी पडताळून पहावे लागते.

न्यूटन म्हणतो की ग्राविटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण हा एक फोर्स आहे. तो विश्वातल्या प्रत्येक कणात असतो, जिला काही मास म्हणजे वजन आहे त्या प्रत्येक वस्तूत हा फोर्स असतो, तुमच्यात आहे आणि माझ्यातही आहे. आणि तो फोर्स जगातील दुसऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचतो. पण हा फोर्स असाच मोघमपणे कुणालाही आपल्याकडे खेचत नाही. आणि एवढेच नाही तर कोणत्याही दोन वस्तूंमधील हा फोर्स सगळीकडे सारखाच नसतो. तर तो अवलंबून असतो त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर म्हणजेच वजनावर आणि त्या दोन वस्तूंतील अंतरावर. जितके दोन वस्तूचे वजन जास्त तितका त्यांच्यात हा खेचण्याचा फोर्स जास्त असतो, आणि जितके त्यांच्यातील अंतर वाढेल तितका तो क्षीण म्हणजे कमी होत जातो,  हे आपल्याला थोडे गणिताने समजून घ्यावे लागेल.

समजा आपण स्पेसमध्ये दोन मोठे दगड घेतले तर या दोघांमध्ये न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे ग्राविटी म्हणजेच एकमेकांस आपल्याकडे खेचणारा फोर्स असतो. मग हा फोर्स नेमका किती असतो?

न्यूटन सांगतो की हा फोर्स त्या दोन वस्तूंच्या वजनांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतो. म्हणजे समजा एका दगडाचे वजन १० क्विंटल आणि दुसऱ्याचे वजन ५ क्विंटल आहे तर त्यांच्यातील ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्यांच्या वजनांच्या गुणाकाराइतक्या म्हणजे १० गुणिले ५ म्हणजेच ५०च्या अनुपातात असेल. समजा त्यांचे वजन २० क्विंटल आणि १५ क्विंटल इतके घेतले तर हाच फोर्स खूप अधिक म्हणजे २० गुणिले १५ म्हणजेच ३०० इतक्या जास्त अनुपातात वाढेल. म्हणजेच काय तर जितके दोन वस्तूंचे वजन जास्त तितके त्यांच्यातील हे गुरुत्वाकर्षण जास्त वाढते.  

समजा एक माणूस फोनवर बोलत आहे, त्याच्या तोंडातून निघालेला आवाज फोनच्या माईकमध्ये घेतला जाऊन पलीकडच्या माणसाकडे पाठवला जातो. जर आपण अगदी हळू आवाजात बोललो तर माईकमध्ये कमी आवाज जातो आणि पलीकडच्या माणसास काही स्पष्ट ऐकू येत नाही. बोलणारा माणूस जितका मोठा आवाज काढेल तितका अधिक आवाज माईकमध्ये जाईल आणि पलीकडचा माणूस तितका अधिक स्पष्टपणे तो आवाज ऐकू शकेल. तसेच तो जितका कमी आवाज काढेल तितका माइकमध्ये कमी आवाज जाईल. असेच गुरुत्वाकर्षणाचे होते. जितका मोठा आवाज तितके स्पष्ट संभाषण तसेच जितके मोठे वस्तुमान तितके अधिक गुरुत्वाकर्षण असते.
आता समजा बोलणाराने फोनचा माईक आपल्या तोंडाजवळ धरला, तर अशाही वेळी जास्तीत जास्त आवाज माइकमध्ये जातो आणि समोरच्यास अधिक चांगले ऐकू येते, पण जर समजा त्याने फोनचा माईक तोंडापासून लांब केला तर पलीकडच्यास ऐकू येणे कमी होते आणि जर समजा माईक त्याहून अधिक लांब धरला तर समोरच्यास काहीच स्पष्ट ऐकू येत नाही. हेही गुरुत्वाकर्षणात दिसते. दोन वस्तूंमधले अंतर जितके वाढते तितके त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण म्हणजेच एकमेकांस आकर्षून घेण्याची शक्ती कमी होते.
तर लक्षात ठेवा की दोन वस्तूंचे जितके वजन जास्त तितके गुरुत्वाकर्षण जास्त, मात्र त्याउलट त्यांत जितके अंतर जास्त तितके गुरुत्वाकर्षण कमी. 

अगदी गणितीय भाषेत सांगायचे झाले तर दोन वस्तूंच्या वजनांचा गुणाकार जितका जास्त, तितके त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण जास्त. आणि दोन्ही वस्तूंतील अंतरांचा गुणाकार जितका जास्त तितके त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण कमी. आता खरेतर जसे पुण्यापासून मुंबईपर्यंतचे अंतर आणि मुंबईपासून पुण्यापर्यंतचे अंतर हे एकच आहे, त्यामुळे दोन्ही अंतराचा गुणाकार म्हणजे कोणत्याही एका अंतराचा वर्गच असतो, तसेच गुरुत्वाकर्षणात आपण वर सांगितल्याप्रमाणे दोन वस्तूंमधील अंतराचा गुणाकार न म्हणता त्याला एकाच अंतराचा वर्ग म्हणता येईल. तर मग आता आपली व्याख्या काय होते? गुरुत्वाकर्षणाचे बल (किंवा फोर्स) हे दोन त्या वस्तूंच्या वजनाच्या गुणाकाराच्या प्रमाणात वाढते तर त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या प्रमाणात घटते. हे समजून घेण्यासाठी गणिताचा आधार घ्यावा लागेल.
तर पुढे थोडे गणित आहे. खरेतर गणितांनी माझेही डोके फिरते पण त्यांच्याशिवाय काही वैज्ञानिक तत्वे सिद्ध होतच नाहीत त्यामुळे आपण अगदी सोप्या स्वरूपात ती पाहू. यातील काही इक्वेशन पाहून घाबरून जाऊ नका, असे अनेकवेळा होते की एखाद्या आर्टिकलमध्ये खूप इक्वेशन पाहून मी घाबरून जातो की हे काहीतरी जाम अवघड असेल, पण जेव्हा मी ते वाचतो तेव्हा कळते की हे नुसते दिसायला अवघड आहे, अन्यथा ये तो बाये हाथ का खेल है. इथेही तुम्हाला तसेच वाटेल. 

तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट.

समजा एक आचारी आहे तो तंदुरी रोट्या बनवतो.  त्याला एक किलो पीठ दिले तर तो ४० रोट्या बनवतो, अर्धा किलो पीठ दिले तर तो २० बनवतो, २ किलो दिले तर ८० बनवतो, अडीच किलो दिले तर १०० बनवतो.  म्हणजेच काय तर तो बनवत असलेल्या रोट्यांची संख्या ही त्याला दिलेल्या पिठाच्या अनुपातात किंवा प्रपोर्शनमधेच असते.  म्हणजे पीठ वाढवले तर रोट्यांची संख्या वाढते. आणि पीठ कमी दिले तर रोट्यांची संख्या कमी होते.  पण हे वाढणे किंवा कमी होणे असे मोघम नाही, ते एका ठराविक प्रमाणातच आहे. म्हणजे जर आपण पिठाचे प्रमाण दुप्पट केले तर रोट्यांची संख्याही बरोबर दुप्पट होते.  पिठाचे प्रमाण निम्मे केले तर रोट्यांची संख्याही बरोबर निम्मीच होते. म्हणजेच काय तर तो बनवत असलेल्या रोट्यांची संख्या ही अगदी तंतोतंत त्याला दिलेल्या पिठाच्या अनुपातात असते. यालाच असेही म्हणतात की रोट्यांची संख्या ही पिठाच्या प्रमाणास प्रपोर्शनल आहे. जर तो आचारी पिठाचे प्रमाण जितके वाढवले त्यापेक्षा वेगळ्या प्रमाणात रोट्यांची संख्या वाढवत असेल तर मात्र रोट्यांची संख्या ही पिठाच्या अनुपातात वाढते असे म्हणता येणार नाही. म्हणजे आपण त्याला १ किलो पीठ दिले आणि त्याने ४० रोट्या बनवल्या. आणि दीड किलो पीठ दिले तेव्हा ५०च रोट्या बनवल्या तर रोट्यांच्या संख्येची वाढ ही पिठाच्या वजनाच्या अनुपातात झाली असे म्हणता येणार नाही. त्याऐवजी जर त्याने दीड किलो पिठाच्या ६० रोट्या बनवल्या तरच ही वाढ प्रपोर्शनल म्हणजेच अनुपातात झाली असे म्हणता येईल. 
जर वाढ किंवा घट ही अनुपातात होणारी म्हणजेच प्रपोर्शनल असेल तर आपल्याला प्रपोर्शनलालिटी कॉन्स्टन्ट काढता येतो. म्हणजे काय तर जर आपण त्याला चार किलो आणि ३०० ग्राम एवढे पीठ दिले (४.३ किलो) तर किती रोट्या बनतील हे कसे शोधायचे?
तर ते शोधण्यासाठी आपण पुढीलप्रमाणे इक्वेशन म्हणजे समीकरण मांडतो. 
१ kg ४० रोट्या , म्हणजेच
४० 
हे चिन्ह = च्या चिन्हाऐवजी घेतले आहे हे लक्षात घ्या, कारण आपण १ = ४० असे लिहिले तर ते चुकीचे ठरेल, कारण १ आणि ४० हे बरोबर म्हणजे समान असू शकत नाहीत. त्यामुळे असे लिहावे लागते की १ kg ४० रोट्या, म्हणजे १ किलो पीठ प्रपोर्शनल आहे ४० रोट्यांशी. 
तसेच २ kg ८० रोट्या, म्हणजे २ किलो पीठ प्रपोर्शनल आहे ८० रोट्यांशी. 
तर आपल्याला शोधायचे आहे की
४.३ kg मध्ये किती रोट्या मिळतील ?
हे शोधण्यासाठी मग आपल्याला मग आपल्याला १ ४० हे समीकरण = हे चिन्ह वापरून लिहावे लागेल आणि मग सोडवावे लागेल, कारण  हे चिन्ह असलेले समीकरण सोडवता येणे शक्य नाही. 
तर = असलेले समीकरण मांडण्यासाठी आपल्याला ४० मध्ये काहीतरी बदल करावा लागेल
तो बदल पुढीलप्रमाणे असतो.
४०  म्हणजेच १ = क्ष  x ४०, 
प्रपोर्शनालिटीला म्हणजेच या चिन्हास असे क्ष या कॉन्स्टन्ट संख्येने बदलले की मग आपल्याला चे समीकरण = ने लिहिता येते. आता या क्ष ला कॉन्स्टन्ट का म्हणायचे? तर जेव्हा एक संख्या दुसरीस प्रपोर्शनल आहे असे आपण म्हणतो तेव्हा समजा १ ४०  आणि २ ८० असेल तेव्हा १ = क्ष  x ४० असते आणि २ = क्ष  x ८० असे असते. म्हणजे पहिली संख्या कितीही असो, तिच्या तुलनेत दुसरी संख्या ही क्ष पटीनेच वाढते. म्हणजे क्ष ही संख्या कायम स्थिर म्हणजे कॉन्स्टन्टच असते म्हणून तिला प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट असे म्हणायचे असते. हा प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट शोधला की मग आपल्याला एका संख्येवरून तिला प्रपोर्शनल असलेली दुसरी संख्या सहज काढता येते.  आपल्या उदाहरणात म्हणजेच १ = क्ष  x ४० सोडविले की आपल्याला क्ष ची किंमत मिळते ती अशी
  क्ष = १  / ४० = ०.०२५
हा कॉन्स्टन्ट मग पिठाच्या वजनाच्या कोणत्याही संख्येशी जुळविला की आपल्याला त्या संख्येस प्रपोर्शनात असलेली रोट्यांची दुसरी संख्या मिळते.
उदाहरणार्थ ३ किलो पिठाच्या किती रोट्या बनतील? हे आपण १ किलोच्या ४०, दोन किलोच्या ८० म्हणजेच तीन किलोच्या ४० + ८० = १२० असे करून शोधू शकतो, तेच प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट वापरून कसे काढता येते ते पहा.

३ kg पीठ = क्ष  x किती रोट्या बनतील ती संख्या. 

म्हणजेच

३ / क्ष = किती रोट्या बनतील ती संख्या 

आपण वर शोधले आहे की क्ष हा ०.०२५ इतका आहे. म्हणूनच

३ / ०.०२५ = किती रोट्या बनतील ती संख्या = १२०

मग अशाच प्रकारे ४.३ किलो पिठाच्या बनतील
४.३ / ०.०२५ = १७२ रोट्या. 

हे झाले प्रपोर्शनली वाढण्याच्या उदाहरणाचे. अनेक वेळा दोन गोष्टी या एकमेकांच्या अनुपातात म्हणजे प्रपोर्शनमध्ये कमी होत असतात. म्हणजे एक संख्या वाढली की दुसरी तिच्या अनुपातात वाढण्याऐवजी कमी होते. अशा दोन संख्यांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असे म्हणतात. 
म्हणजे कसे? तर समजा की एक २००० लिटरची पाण्याची टाकी आहे आणि तिचा नळ हलकासा उघडा आहे. तर ती टाकी एकदा भरल्यावर समजा एक तासानंतर तिच्यात १००० लिटर पाणी होते, २ तासांनंतर तिच्यात ५०० लिटर पाणी उरले, ४ तासानंतर २५० लिटर पाणी उरले, तर आपल्याला असे लक्षात येईल की जसे जसे टाइम वाढला तसे तसे टाकीतले पाणी त्या अनुपातात कमी झाले. म्हणजे पाण्याचे प्रमाण हे टाइमशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. हेच गणितात पुढीलप्रमाणे मांडले जाते.

पाण्याचे प्रमाण ∝ १ / टाइम

(लक्षात घ्या की जेव्हा दोन वस्तू प्रपोर्शनल होत्या तेव्हा दुसरी संख्या (रोट्यांची) ही या चिन्हापुढे numerator म्हणजे अंशस्थानी होती, मात्र जेव्हा दोन वस्तू इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात तेव्हा दुसरी संख्या (म्हणजे इथे टाकीत उरलेले पाणी) ही denominator म्हणजेच भाजक स्थानी येते.) 
तर 

पाण्याचे प्रमाण ∝ १ / टाइम

इथेही ऐवजी = असलेले इक्वेशन मांडण्यासाठी एक कॉन्स्टन्ट "य" घ्यावा लागेल त्यामुळे इक्वेशन होईल 


पाण्याचे प्रमाण = १ x य / टाइम   

इथे "य" हा १००० इतका आहे. म्हणजे टाइम कितीही घेतला तरी य = १००० हाच राहतो आणि त्यावरून आपल्याला टाकीत कोणत्या वेळी किती पाणी उरलेले असेल ते कळते.
उदाहरणार्थ जर आपणांस साडेतीन तासानंतर किती पाणी उरले हे पाहायचे असेल तर वरचे इक्वेशन होईल

उरलेले पाण्याचे प्रमाण = १ x य / ३.५

य हा १००० आहे हे आपल्याला माहीत आहे. म्हणून

 उरलेले पाण्याचे प्रमाण = १ x १००० / ३.५ = २८६

म्हणजेच साडेतीन तासानंतर टाकीत २८६ लिटर पाणी उरलेले असेल.
इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या की दोन संख्या प्रपोर्शनल असो की इन्व्हर्सली प्रपोर्शनल, त्यांचा प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट हा स्थिरच राहतो. अशावेळी ते दोन कॉन्स्टन्ट वेगवेगळे असले तरी त्यांचा गुणाकार हाही एक कॉन्स्टंटच असतो. म्हणजे समजा वरील दोन्ही उदाहरणे एकत्र करायची झाली तर एकाचा प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट आणि दुसऱ्याचा इन्व्हर्सली प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट म्हणजे ०.०२५ x १००० = २५ हाही एक कॉन्स्टंटच असेल. मला वाटते आता प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट म्हणजे नेमकी काय भानगड आहे ते कळले असेल. 

इतक्या गणितानंतर आता आपण परत न्यूटनच्या सिद्धांताकडे येऊ.

सिद्धांत समजण्यासाठी आपण परत तेच आधीचे उदाहरण घेऊ. समजा स्पेसमध्ये दोन मोठे दगड आहेत.  एकाचे वजन आपण  १० क्विंटल म्हणजेच M आहे असे समजू, तर दुसऱ्याचे वजन हे ५ क्विंटल म्हणजेच m आहे असे समजू. जर या दोन दगडांतील अंतर १०० सेंटीमीटर म्हणजेच R इतके असेल तर न्यूटन सांगतो की  त्या दोन दगडांतील गुरुत्वाकर्षण फोर्स F हा त्या दोन दगडांच्या वजनांच्या गुणाकाराला प्रपोर्शनल तर त्यांच्यातील अंतराच्या वर्गाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल.

म्हणजेच
∝ M*m किंवा F= a*M*m 

आणि 

F ∝ 1 / R*R किंवा F= b*1 / (R*R)

(या ठिकाणी इंग्रजी अल्फाबेट्स X आणि गुणिलेंचे चिन्ह x यांच्यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून गुणिले म्हणजेच x या चिन्हाऐवजी * हे चिन्ह घेतले आहे मात्र त्याला गुणिले म्हणजेच x असेच समजावे)

इथे लक्षात घ्या की पहिल्या इक्वेशनचा प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट हा a आहे तर दुसऱ्या इक्वेशनचा प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट हा b  आहे. 
हे दोन्ही इक्वेशन एकत्र केले तर आपल्याला पुढील इक्वेशन मिळते.

 


इथे दोन्ही इक्वेशनच्या प्रपोर्शनीलिटी कॉन्स्टंटचाही गुणाकार केला असून ते a*b = G असे घेतले आहे. यात G या प्रपोर्शनालिटी कॉन्स्टंटला न्यूटनने नाव दिले युनिवर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टन्ट. न्यूटनचे हे ग्राविटीचे इक्वेशन केवळ पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण विश्वास लागू होते. इथे आपले बहुतांश लोक सरकारचेच नाही तर देवाधर्माचे कायदे आणि नियमसुद्धा नीट पाळत नाहीत, मात्र या विश्वातला प्रत्येक कण अन कण मात्र न्यूटनचा हा नियम पाळतोच पाळतो. म्हणजे न्यूटन हा कोणत्याही सरकारपेक्षा अथवा अगदी देवापेक्षाही मोठा खिलाडी आहे कारण कुणी कितीही कट्टर आस्तिक असो वा नास्तिक असो, चांगला असो की वाईट असो, अन्याय सहन करणारा असो की विद्रोही, हुशार असो की ठार वेडा, तो प्रत्येकजण न्यूटनचा नियम निमूटपणे पाळतोच पाळतो. 

हे इक्वेशन सोडवले तर
त्या दोन दगडांतील गुरुत्वीय बल पुढीलप्रमाणे असेल

 F= G*१०क्वी *५क्वी  / (१००सेमी *१०० सेमी) 

समजून घेण्यासाठी आपण यातील क्विंटल आणि सेमी ही एकके बाजूला ठेवू
तर उत्तर होईल
F= G*१०*५  / (१००*१००) 
म्हणजेच 
F = G * ५० / १००००

न्यूटनच्या याच इक्वेशनचा वापर करून लोकांनी पृथ्वीचे वजन शोधण्याचा प्रयत्न केला. कसा ते पुढील भागात पाहू.  

 ........................................................................................





 
पार्ट २:  जी (G) ललचाये, रहा ना जाये.!!

तर मित्रांनो न्यूटनने त्याच्या सिद्धांताचे (गुरुत्वीय फोर्स F= GMm / R2) हे समीकरण तर अगदी परफेक्ट शोधले, मात्र त्याला त्यातील युनिवर्सल प्रपोर्शनालिटी कॉन्स्टन्ट म्हणजेच G ची किंमत शोधून मोजता आली नाही. पण ती कशी शोधता येईल हे मात्र त्याला माहीत होते. (हे म्हणजे असे झाले की सैराटमधल्या लंगड्याला स्वतःला मुलगी पटत नाही, मात्र ती कशी पटवायची हे त्याला चांगले ठाऊक असते)
न्यूटनला हे माहीत होते की G हा इतका छोटा अंक आहे की तो मोजता येणे खूप अवघड आहे, कारण त्यासाठी खूप प्रचंड वस्तुमान असलेली वस्तू घेऊन तिच्या गुरुत्वाकर्षणाने दुसऱ्या वस्तूवर होणाऱ्या परिणामास मोजावे लागेल तेव्हा G ची किंमत मिळेल. आता मोठी वस्तू म्हणजे काय? तर न्यूटन म्हणाला की एखादा खूप मोठा पर्वत घ्यावा लागेल, आणि त्या पर्वताजवळ एखादी दुसरी वस्तू नेऊन ती पर्वताकडे किती खेचली जाते ते पहावे लागेल, आणि मग ती किती खेचली गेली त्यावरून आपल्याला G काढता येईल.
यासाठी मग न्यूटनने पर्वताचे वजन, आणि एखाद्या पर्वताकडे दुसरी वस्तू किती खेचली जाऊ शकेल ते अंदाजे घेऊन, आणि समीकरणे मांडून G साधारण किती असेल ते शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला असे लक्षात आले की G ही इतकी छोटी किंमत किंवा संख्या आहे की पर्वताएवढी वस्तू घेऊनही ती मोजता येणार नाही. तो संत तुकारामांचा एक अभंग आहे ना ज्यात अशीच एक प्रचिती आहे तो अभंग म्हणजे सुख G-वापाडे, आणि M पर्वताएवढे.!! आता संत तुकारामांचा उल्लेख आलाच आहे तर हेही सांगतो की न्यूटन आणि संत तुकाराम हे दोघेही या पृथ्वीतलावर जवळ जवळ आठ वर्षे एकाच वेळी जीवन जगत होते. संत तुकाराम यांचा मृत्यू झाला तेव्हा न्यूटन ८ वर्षांचा होता. 
तर स्वतः न्यूटनलाच G मोजणे हे अशक्य वाटत होते त्यामुळे न्यूटननंतर जवळ जवळ १०० वर्षांपर्यंत कुणीही G मोजू शकला नाही. मात्र अनेकांनी प्रयत्न जरूर केले.
नाही म्हणायला बुगे (Bouguer)  या शास्त्रज्ञाने असा काहीसा प्रयत्न पहिल्यांदा केला होता तो १७४० मध्ये. हा प्रयोग बुगेने G शोधण्यासाठी नव्हे तर पृथ्वीची घनता म्हणजे डेन्सिटी मोजण्यासाठी केला होता. त्याने समुद्रसपाटीवर पेन्डूलमच्या साहाय्याने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे काही मोजमाप केले आणि मग एका उंच पठारावरही असेच काही मोजमाप केले मात्र त्याचे जे वैल्यू आले ते खूपच जास्त होते.
त्यांनतर अजून एक मोठा आणि बऱ्याच अंशी सक्सेसफुल झालेला एक प्रयोग करण्यात आला, त्याला म्हणतात शिहेलिओन एक्सपिरिमेंट. शिहेलिओन हा स्कॉटलंडमधील एक पर्वत आहे. तो पर्वत हा प्रयोग करण्यासाठी अतिशय योग्य होता कारण त्याचा आकार सिमेट्रिकल तर होताच आणि वरून त्याच्या आजूबाजूला बऱ्याच अंतरापर्यंत दुसरा काही डिस्टर्बन्सही नव्हता. एका मोठ्या भूभागाच्या मध्यभागी हा पर्वत होता. हा प्रयोगही खरेतर बुगेच्या प्रयोगाप्रमाणे पृथ्वीची घनता आणि मग पर्यायाने पृथ्वीचे वजन शोधण्यासाठीच होता आणि या प्रयोगातही पेंड्युलमचाच वापर करण्यात आला होता. आता अशाप्रकारे पर्वताजवळ पेंड्युलम वापरून पृथ्वीची घनता कशी शोधता येईल ते पाहू.

खाली दिलेली आकृती पहा. समजा आपण एक क्रिकेट एक बॉल घेतला, आणि तो पीचच्या बरोबर मध्ये जमिनीपासून थोडा वर टांगून ठेवला.  या बॉलपासून पिचच्या पृष्ठभागाला काटकोनात जाईल अशी एक रेघ आपण आकाशात आखली तर ती खूप उंचीपर्यंत जाईल.  जर समजा आकाशात ती रेघ एखाद्या ताऱ्यास जाऊन टेकली, तर त्या ताऱ्यास आपण आपल्या बॉलचा शीर्षबिंदू (किंवा इंग्रजीत झेनीथ) असे म्हणू.आता हे झेनिथ फिनीथ कशासाठी? तर जेव्हा आपल्याला पृथ्वीवर असे काही मोजमाप करायचे असते तेव्हा पृथ्वीबाहेर एखादा संदर्भ बिंदू घ्यावा लागतो. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी पृथीवरचाच संदर्भबिंदू घेता येणार नाही. आताच्या काळात उपग्रहांच्या मदतीने आपण हे मोजू शकू पण उपग्रह हा देखील पृथ्वीच्या बाहेरचाच तर संदर्भ बिंदू आहे. 
थोडक्यात काय तर बॉलचा (किंवा पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूचा) शीर्षबिंदू म्हणजे आकाशातला असा एक बिंदू जिथे पृथ्वीच्या एगझॅक्ट सेंटरमधून (म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूतून) निघालेली एखादी सरळ रेषा बरोबर त्या बॉलच्या सेंटरमधून घेऊन अजून वर आकाशात वाढवत नेली तर एगझॅक्टली त्या बिंदूला जाऊन मिळेल. मात्र जर आपण हा बॉल उचलून थोडा लांब दुसऱ्या जागी नेऊन ठेवला, तर मात्र रेषा पृथ्वीच्या केंद्रबिंदूतून निघून बॉलच्या सेंटरमधून जाऊन पुढे वाढवत नेली तर ती अशावेळी बॉलच्या आपण आधी ठरविलेल्या शीर्षबिंदूपर्यंत पोचणार नाही. आणि ती आकृतीत दाखविलेल्या निळ्या रेषेप्रमाणे त्या जुन्या शीर्षबिंदूशी बनलेल्या रेषेशी एक काहीतरी θ एवढा अँगल बनवेल.  


अशाच प्रकारे पृथ्वीच्या एका मोठया सपाट पृष्ठभागावर जिथे पृथ्वीच्या सपाटीमुळे गुरुत्वाकर्षणाचा फोर्स सर्व बाजूंनी समान असेल तिथे जेव्हा आपण एक प्लम्ब बॉब (पेंड्युलमचाच एक प्रकार) टांगतो तेव्हा तो अगदी सरळ रेषेत पृथ्वीच्या सेंटरकडे निर्देश करून उभा राहतो, आणि प्लम्ब बॉबची दोरी ही पृथ्वीचे केंद्र आणि प्लम्ब बॉबचा आकाशातील शीर्षबिंदू यांना सरळ रेषेत जोडते. (प्लम्ब बॉब म्हणजे आपल्याकडे गवंडी लोक भिंत तिरकी किंवा कलती झाली नाही ना हे बघण्यासाठी वापरतात तो ओळंबा होय.) मात्र हाच प्लम्ब बॉब म्हणजेच ओळंबा आपण जेव्हा एका बाजूला मोठा पर्वत असलेल्या ठिकाणी टांगतो तेव्हा मात्र तो अगदी सरळ रेषेत उभा न राहता गुरुत्वाकर्षणामुळे थोडासा त्या पर्वताकडे खेचला जातो, आणि तो तसा खेचला गेल्यामुळे मग तो आपल्या आकाशातील शीर्षबिंदूपासून काहीसा ढळतो आणि शीर्षबिंदूच्या रेषेशी एक नवा अँगल बनवतो. हा ओळंबा पर्वताच्या गुरुत्वाकर्षणाने खेचला गेल्याने शीर्षबिंदूच्या रेषेपासून ज्या अँगलने सरकला त्या अँगलवरून पर्वताचे गुरुत्वाकर्षण किती असेल ते मोजता येते.

या प्रयोगात मग सगळ्यात आधी पर्वताचा प्रभाव जाणवणार नाही अशा लांब अंतरावर एका ओळंब्याचा शीर्षबिंदू म्हणजे झेनिथ तारा ठरविण्यात आला. जर तो ओळंबा पर्वताच्या जवळ नेला तर तो ओळंबा त्या पर्वताच्या गुरुत्वाकर्षणाशिवाय त्याच्या झेनिथशी कोणता अँगल बनवेल ते गणिताने शोधण्यात आले आणि मग अशाप्रकारे त्या ठिकाणी पर्वत नसता तर झेनिथशी ओळंब्याने किती अँगल केला असता हे मोजण्यात आले.  त्यानंतर मग प्रत्यक्ष पर्वताजवळ तो ओळंबा टांगून प्रत्यक्ष झेनिथ ताऱ्याशी त्याचा किती अँगल बनतो ते पाहण्यात आले. आणि अर्थातच पर्वताच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचला गेल्याने ओळंब्याचा अँगल थेरॉटिकली मोजून (म्हणजे पर्वत नसता तर किती आला असता तेवढा) आलेल्या अँगलपेक्षा मोठा आढळून आला. म्हणजे पर्वताने गुरुत्वाकर्षणाने स्वतःकडे ओढून ओळंब्याला अपेक्षेपेक्षा अधिक तिरके करून त्याचा झेनिथ अँगल वाढवला होता. तो अधिकचा अँगल म्हणजेच पुढील आकृतीत दाखविल्याप्रमाणे आलेला θ होय. 

 

आता या अँगलवरून पर्वताचे गुरुत्वाकर्षण कसे काढायचे याचे एक सोपे डेरीव्हेशन आहे पण आपण ते इथे टाळूयात कारण आपला खरा एक्सपिरिमेंट हा नव्हे तर पुढे येणारा आहे. फक्त एवढे लक्षात ठेवा की जर आपण पर्वताचे क्षेत्रफळ आणि घनता मोजली आणि पृथ्वीचे क्षेत्रफळ आणि त्रिज्या या आधीच माहीत असलेल्या किंमती फॉर्म्युल्यात टाकल्या तर पृथ्वीची घनता म्हणजेच पर्यायाने वजन कॅल्क्युलेट करता येते. त्यासाठी पुढील फॉर्म्युला वापरला जातो.


 शिहेलिओन पर्वताचे क्षेत्रफळ आणि घनता मोजण्यासाठी मग कांटूर डायग्रॅम किंवा कांटूर ग्राफ ही नवी पद्धत शोधण्यात आली जी आजही अनेक ठिकाणी वापरण्यात येते. मात्र कितीही केले तरी फक्त पृष्ठभागाचे वजन अथवा क्षेत्रफळ मोजून आपण संपूर्ण पर्वताचे क्षेत्रफळ अथवा घनता एक्यूरेट काढू शकत नाही. कारण पर्वताच्या सरफेसच्या खूप आत अधिक घनता असलेला भाग असू शकतो, एवढेच नाही तर जमिनीखाली असलेला पर्वताचा भाग आपल्याला वाटतो त्याहून खूप मोठा किंवा खूप घनता असलेला असू शकतो. आणि कृष्ण, रावण व हनुमान यांच्यासारखे पर्वत उचलू शकणारे लोक आजकाल मिळत नाहीत त्यामुळे आपण पर्वताचे नेमके क्षेत्रफळ आणि घनता काढू शकत नाही. अर्थातच त्यामुळे शिहेलिओन एक्सपिरिमेंटचे रिझल्ट काहीसे चुकीचे आले. पण तरीही ते त्या वेळेपर्यंत काढण्यात आलेले खऱ्या व्हॅल्यूच्या सर्वात जवळ जाणारे रिझल्ट होते.  
शिहेलिओन प्रयोग अयशस्वी झाला असे मात्र अजिबात म्हणता येणार नाही. या प्रयोगात आपल्याला अनेक कंट्रोल न करता येणाऱ्या अथवा मोजता न येऊ शकणाऱ्या व्हॅल्यू वापराव्या लागत असल्याने कोणत्याही नैसर्गिक वस्तूंच्या वस्तुमानाचा उपयोग करून आपल्याला नेमका G  शोधता येणार नाही हे लक्षात आले. मग त्यासाठी मानवनिर्मित वजनी वस्तू वापरून G काढता येईल का असा विचार लोकांनी करायला सुरुवात केली. 

तिसऱ्या भागात आपण आपला प्रत्यक्ष प्रयोग काय होता ते बघू 
त्यापूर्वी आपल्याला पूर्वतयारी म्हणून टॉर्क म्हणजे काय ते पहावे लागेल.

लहानपणी कोल्ड्रिंकच्या बाटलीचे पत्र्याचे झाकण सपाट करून, त्याला बरोबर मध्ये दोन होल पाडून त्या दोन्ही होलमधून एका दोऱ्याची दोन्ही टोके घालून टोकांची गाठ मारून दोऱ्याचा एक लूप आम्ही बनवायचो. आणि मग दोन हातांच्या दोन बोटांत त्या लुपांची टोके अडकवून आधी थोडे गोलाकार हेलकावुन दोऱ्याला एकदा पीळ बसला की मग फक्त आळीपाळीने दोन्ही बोटे लांब ओढून आणि ढिली सोडून भिंगरी फिरवायचो. दोरी ढिली सोडली की दोरीला पीळ बसायचा आणि बाहेर ओढली की तो पीळ सुटल्यामुळे भिंगरी अजून फिरायची. मग पुन्हा ढिली सोडली की पुन्हा पीळ बसायचा. असे आम्ही बोटे दुखेस्तोवर खेळतच बसायचो. तो जो दोरीला बसलेला पीळ असायचा ना? तो सुटल्यामुळे जे बल किंवा फोर्स निर्माण व्हायचा त्यामुळे भिंगरी गोल फिरायची. तो फोर्स म्हणजे दोरीचा टॉर्क होय. थोडक्यात काय तर टॉर्क म्हणजे असे बल ज्यामुळे कोणतीही वस्तू एका अक्षाभोवती वर्तुळाकार फिरते. दोरीला बसलेला पीळ म्हणजे दोरीचे टॉर्शन (torsion) होय, तर हे टॉर्शन सुटण्यासाठी दोरीकडून जे बल लावले जाते ते म्हणजे टॉर्क होय. एवढे कळले की आपला पुढचा प्रयोग सोपा होईल.




पार्ट ३:  तोलुनी मज द्यावे पृथ्वीवजन हे


लंडनमध्ये एका भागातले लोक एका घराकडे किंबहुना त्या घरामागे असलेल्या एका छोट्याशा खोलीकडे बोट दाखवून आपल्या मुलांना सांगतात की बेटा हे बघ हेच ते घर आहे जिथे आपल्या पृथ्वीचे वजन करण्यात आले.

ते घर एका मोठ्या विचित्र माणसाचे होते. हा प्रचंड एकलकोंडा माणूस होता. त्याला लोकांत जायला आजिबात आवडत नसे. आणि स्त्रियांची तर त्याला इतकी एलर्जी होती की तो त्याच्या स्त्री नोकरांशी बोलत देखील नसे, जर त्याला त्या स्त्रियांस काही काम सांगायचे असेल तर तो चिट्ठीवर लिहून ठेवी आणि मग त्या स्त्रिया त्याने काय लिहिले आहे ते वाचून त्याप्रमाणे ते काम करीत. त्याच्या रूममधून घराबाहेर पडायचे झाले तर घरात असलेली एखादी स्त्री उगीच दिसेल आणि तिच्याशी काही संवाद करावा लागेल म्हणून त्याने आपल्या खोलीच्या मागच्या बाजूने एक रस्ता बनवून घेतला होता जेणेकरून तो परस्पर कोणत्याही स्त्रीला न पाहता घराबाहेर पडू शकेल. लोकांनी आपल्याकडे आपली पुस्तके मागू नयेत म्हणून या पठ्ठयाने काय करावे? तर साहेबांनी आपली लायब्ररी आपल्या घरापासून ४-५ मैल दूरवर बनवली होती, जेणेकरून कुणी एखादे पुस्तक मागितलेच तर ते खूप दूर आहे असे सांगून त्यास टाळता येईल. 

१० ऑक्टोबर १७३१ ला हा माणूस जन्मला, म्हणजे त्याची बर्थ एनिवर्सरी माझ्या बर्थडेच्या दुसऱ्याच दिवशी येते. (उगाच आपली काहीतरी तुलना करून भाव खाऊ बघायचा) त्यानेच हायड्रोजन वायूचा शोध लावला. मात्र त्याच्या लाजरेपणामुळे त्याने अनेक शोधांचे श्रेय गमावले. जसे की त्याने त्याचे शोध प्रसिद्ध म्हणजेच प्रकाशित केले असते तर आज कुलंबचा लॉ त्याच्या नावावर असता. 

तर अशा या अतर्क्य माणसाचे नाव होते हेनरी कॅव्हेंडिश. 

जगात सर्वात आधी पृथ्वीचे वजन मोजले ते याच माणसाने. अर्थातच पृथ्वीचा व्यास आणि परीघ हे फार आधीच शोधण्यात आले होते (आपल्या आर्यभटाने ते अचूक मोजले होते हे तर मी सांगितले आहेच) त्याचा उपयोग करून पृथ्वीचे वजन शोधायचे होते. पृथ्वीचे वजन तराजूच्या साहाय्याने करता येणार नव्हतेच त्यामुळे 'जब घी सिधी उंगली से ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है' या उक्तीप्रमाणे काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार होता. 

त्यासाठी पृथ्वीचे वजन ज्यात अंतर्भूत करता येऊ शकेल असे काहीतरी सूक्त वापरून त्या सूक्तातील इतर गोष्टी शोधून त्यावरून पृथ्वीचे वजन शोधणे ही बेसिक आयडिया होती. आणि हे सूक्त म्हणजे न्यूटनचा ग्राविटेशनचा सिद्धांत होय. शिहेलिओन प्रयोगात तसा प्रयत्न करून पाहण्यात आला पण ते पर्वताचे अचूक वजन मोजता न आल्यामुळे तितकेसे जमले नाही. "मेरे नयना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा" तसेच न्यूटनच्या सुक्ताने पृथ्वीचे वजन काढता येईल हे सर्वांना कळत होते पण त्यासाठी नेमके काय करावे तेच कुणालाही समजत नव्हते. मग अर्थातच आपल्या प्रयोगांत नेहमी येतो तसा फटा पोस्टर आणि बाहेर आला एक हिरो, तो म्हणजे कॅव्हेंडिश.

पर्वताचा वापर करावा हे तर न्यूटननेच सांगितले होते, पण त्याने काही पृथ्वीचे वजन मोजणे जमत नव्हते मग त्याहून वेगळी काय शक्कल लढवावी? पहा बरे काही सुचतंय का? नाही ना? कसे सुचेल? अहो आपण भाजी घ्यायला गेलो तरी भाजीवाला वजनात काटा मारतो हे आपल्या धड लक्षात येत नाही तिथे पृथ्वीच्या वजनात कुठे डोके घालताय? 

असो तर जॉन मिशेल नावाचा एक पठ्ठया होता त्याला एक आयडीया सुचली आणि त्याने पृथ्वीचे वजन मोजण्यासाठी एक तराजू तयार केला. तराजू? पृथ्वीचे वजन मोजण्यासाठी तराजू? (शोलेमध्ये असाच एक डायलॉग आहे. पिस्तोल? हमारी जेल में पिस्तोल? असे आश्चर्यमिश्रित किंचाळीचे डायलॉग मारून तो अंग्रेजोंके जमाने का जेलर त्याच्या टेबलावर असलेला पृथ्वीचा गोल खाली पाडत असतो. आणि इथे या प्रयोगात खऱ्या पृथ्वीच्या गोलाचे वजन केले जातेय. व्हाट्टे योगायोग.!!) होय तराजूच. त्या तराजूचे नाव होते टॉर्शन बॅलन्स. पण दुर्दैवाने जॉनला या तराजूने पृथ्वी तोलता आली नाही. त्याच्या मृत्यूनंतर हा तराजू दिला गेला कॅव्हेंडिशला आणि तो तराजू कॅव्हेंडिशला दिला गेल्यानेच मला हे लिहिण्याची आणि तुम्हाला वाचण्याची संधी मिळालीय. 

कॅव्हेंडिशने या टॉर्शन बॅलन्समध्ये योग्य त्या सुधारणा केल्या त्याचे डिझाईन अधिक सुयोग्य बनवले आणि मग सुरु केला आपला कॅव्हेंडिश प्रयोग.

हा प्रयोग समजून घेण्यासाठी आपल्याला या बॅलन्सचे डिजाईन आणि त्याचे तत्व थोडक्यात समजून घ्यावे लागेल. त्यासाठी खाली दिलेली आकृती पहा. हाच आहे कॅव्हेंडिशचा तराजू.




या टॉर्शन बॅलन्समध्ये दोन सामान आकाराचे मोठे शिसे या धातूचे गोळे घेतले गेले. शिसे या धातूचे वजन लोखंडापेक्षा जवळजवळ दुप्पट असते. त्यामुळे अर्थातच त्याचे गुरुत्वाकर्षणही जास्त असणार म्हणून शिशाचे गोळे घेतले. आपण या दोन मोठ्या समान गोळ्यांना म्हणू मोटू-१ आणि मोटू-२. (दोन्ही मोटुंचा व्यास म्हणजे डायमीटर हा प्रत्येकी एक फूट आणि वजन हे प्रत्येकी १५८ किलो होते.) हे दोन्ही गोळे हिरव्या रंगाने दाखविलेल्या एका रॉडवर आकृतीप्रमाणे समान उंचीवर टांगण्यात आले होते. त्यानंतर शिशाचेच दोन समान आकाराचे परंतु छोटे गोळे घेण्यात आले, त्यांना आपण पतलू-१ आणि पतलू-२ असे म्हणूयात (दोन्ही पतलूंचा प्रत्येकी व्यास हा ५ सेंटीमीटर तर वजन हे प्रत्येकी पाऊण (०. ७३ kg) किलो इतके होते). हे दोन छोटे गोळे आकृतीत दाखविल्याप्रमाणे त्या दोन मोठ्या गोळ्यांनाच समांतर पातळीवर एका दुसऱ्या रॉडद्वारे अशाप्रकारे टांगण्यात आले की सर्व चारही गोळ्यांचे मध्यबिंदू एकाच प्रतलात म्हणजेच एकाच सरळ रेषेत येतील. (आणि हो आकृतीत जरी तसे दिसत नसले तरी दोन्ही मोटुन्ना जोडणारा रॉड आणि दोन्ही पतलुंना जोडणारा रॉड हे दोन्ही रॉड सामान लांबीचेच म्हणजे १.८६ मीटर इतक्या लांबीचे होते बरे का). दोन पतलुंना टांगणारी जी तार आहे तिच्यावर एक आरसा लावलेला होता, या आरशाचे काय काम असेल? तुम्हाला कल्पनाही येणार नाही पण त्या आरशाचे काम एकच होते ते म्हणजे कॅव्हेंडिशचे केस खूप लांब आणि दाट होते. तो दिवसभर एकटाच प्रयोगाची निरीक्षणे नोंदवित बसलेला असे तेव्हा मधून मधून आरशात पाहून केस विंचरता यावेत म्हणून त्याने हा आरसा लावला होता.

हा संपूर्ण तराजू मग एका बंदिस्त खोलीत ठेवला गेला जेणेकरून हवेच्या थोड्याही हालचालीचा प्रयोगाच्या निष्कर्षांवर परिणाम होऊ नये. हा बॅलन्स अशाप्रकारे तयार करून सेटअप झाल्यावर मग आधी दोन्ही मोटू आणि दोन्ही पतलू हे एकमेकांना क्रॉस होतील असे म्हणजे दोन्ही रॉड एकमेकांस + असण्याच्या स्थितीत ठेवले. आणि मग हळूहळू दोन्ही मोटुन्ना एका बाजूने फिरवत दोन्ही पतलुंच्या जवळ नेले. दोन्ही रॉड क्रॉस असल्याने मधल्या तारेच्या बाजूने फिरवल्यावर एक मोटू एका बाजूने पहिल्या पतलूच्या तर दुसरा मोटू त्याच्या विरुद्ध बाजूने दुसऱ्या पतलूच्या जवळ जाऊ लागला. अशा प्रकारे हळू हळू दोन्ही मोटू दोन्ही बाजूंनी जेव्हा गोलाकार फिरवून दोन्ही पतलुंकडे नेले तेव्हा दोघांमधील अंतर म्हणजेच या सीरिजच्या पार्ट १ मध्ये सांगितलेल्या फॉर्मुल्यातील R हे अंतर जसे जसे कमी होत गेले तसे तसे त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण वाढत गेले. गुरुत्वाकर्षणाचा पहील्या भागात सांगितलेला नियम आठवतोय ना? दोन वस्तूंतील अंतर जितके जास्त तितके गुरुत्वाकर्षण कमी आणि दोहोंतले अंतर जितके कमी तितके गुरुत्वाकर्षण जास्त.

तर अशा प्रकारे एका ठराविक अँगलपर्यंत वळविल्यानंतर एके क्षणी आपोआप दोन्ही पतलू हे दोन्ही मोटुंकडे गुरुत्वाकर्षणामुळे ओढले गेले. बरोबर या स्थितीत मोटुन्ना स्थिर ठेवले की हळूहळू पतलू ज्या तारेने टांगले गेले होते त्या तारेस हलकासा पीळ घालत मोटुंकडे आकर्षिले जात. आणि हो मघाशी तो आरसा का लावण्यात आला होता त्याचे मी सांगितलेले कारण तुम्हाला खरे वाटले की काय? हा हा हा किती तुम्ही भोळे. अरे तो आरसा यासाठी लावला होता की त्या आरश्यावर एक प्रकाश बीम सोडला जाई आणि जेव्हा दोन्ही पतलू गुरुत्वाकर्षणामुळे मोटुंकडेओढले जात तेव्हा हा आरसाही हलकासा गोल फिरे आणि मग त्या आरशावर टाकलेले ते प्रकाशाचे बीम एके बाजूला रिफ्लेक्ट होऊन आरसा म्हणजेच तार नेमकी किती फिरलीय ते कळे.

म्हणजे आधी पतलू गोळे हे एका पोजीशनला स्थिर ठेवले जात. त्यानंतर मग मोटू गोळे किती अंतरापर्यंत जवळ आणल्यावर पतलुंना गुरुत्वाकर्षणाने आकर्षित करतात हे कळल्यावर मोटू गोळे गोल फिरवत बरोबर तेवढ्या अंतरापर्यंत आणून स्थिर केले जात. या अंतरावर मोटुन्ना स्थिर केल्यावर मग गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू आधी स्थिर पोजीशनला ठेवलेले पतलू गोळे आपोआप मोटुंकडे आकर्षित होत. पतलू हे नेमके किती अँगलने मोटुंकडे सरकलेत हे पतलुंवर लावलेल्या आरशावरून बाजूला रिफ्लेक्ट झालेल्या प्रकाश बीमचा रिफ्लेक्टेड अँगल मोजून कळे. हे नेमके कसे होते ते खालील एनिमेशन पाहून कळेल. (एनिमेशनमध्ये सोयीसाठी मोटू गोळे वरून टांगलेले दाखविण्याऐवजी खालून सपोर्ट दिलेले दाखविले आहेत. दोन्ही केसेसमध्ये एकच इफेक्ट मिळतो) या एनिमेशनमध्ये लाल रंगाने दाखविलेला प्रकाश बीम हा पतलू गोळे गुरुत्वाकर्षणामुळे मोटुंकडे आकर्षिले जाताच आरसा फिरल्यामुळे कसा बाजूस रिफ्लेक्ट होऊन एक अँगल बनवतो हेही बघा. 




मोटू गोळ्यांना पतलुंजवळ आणून स्थिर केल्यावर हळूहळू पतलू त्यांचेकडे सरकत. पतलुंच्या या सरकण्यामुळे ते ज्या तारेस टांगलेले होते त्या तारेस हलकासा पीळ बसे. कोणत्याही तारेला एका बाजूस फिरविल्याने पीळ बसला की ती तार त्या पीळामुळे बसलेली अढी किंवा ताण किंवा टॉर्शन हे सोडविण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे ती तार तिला देण्यात आलेल्या पीळाच्या विरुद्ध बाजूने पीळ सुटण्यासाठी थोडा फोर्स किंवा बल लावते, आणि परत आधीच्या स्थिर जागी येऊ पाहते. यामुळेच गुरुत्वाकर्षण असले तरी पतलू गोळे थेट जाऊन मोटू गोळ्यांशी टकरत नाहीत. तार तिला बसणारा पीळ किंवा ट्विस्ट सोडविण्यासाठी पतलू गोळ्यांना परत त्यांच्या आधीच्या स्थिर जागेकडे ढकलते. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे जसा भिंगरीत दोरा त्यास पीळ बसल्यानंतर तो पीळ सोडविण्यासाठी विरुद्ध बाजूने फिरतो तसेच इथे तारही तिला बसलेला पीळ म्हणजेच ट्विस्ट सोडविण्यासाठी पीळाच्या विरुद्ध बाजूस जोर किंवा बल लावते. 

म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बल हे पंतलुंना मोटुंकडे ओढत असते तर तारेचा ट्विस्ट म्हणजेच टॉर्क हा त्यांना मोटुंपासून दूर ढकलत असतो. अशा प्रकारे मग तेरा ना मेरा अशी मांडवली करून शेवटी दोन्ही मोटू पतलू एका ठराविक अँगलला स्थिर होतात. म्हणजेच या ठराविक अँगलला गुरुत्वाकर्षणाचे बल आणि तारेचा पीळ सोडविण्याचा टॉर्क हे दोन्ही समान होतात. आपण आधीच पाहिल्याप्रमाणे फोर्स आणि टॉर्क ही दोन्ही एकाच प्रकारची परिमाणे किंवा क्वांटीटीज आहेत त्यांत फरक फक्त हा की फोर्स हा वस्तूस सरळ ढकलतो तर टॉर्क हा वास्तूस गोलाकार म्हणजेच रोटेशनल मोशनमध्ये फिरवतो. आता नेमका किती अँगलला तारेचा टॉर्क हा गुरुत्वाकर्षणाशी जुळेल म्हणजेच समान होईल ते त्या तारेच्या गुणधर्मावर अवलंबून असते. तारेच्या या गुणधर्माला टॉर्शन कोइफिशियंट असे म्हणतात. तर समजा गुरुत्वाकर्षणाचा फोर्स आणि तारेचा टॉर्क हे ज्या अँगलला समान होतात तो अँगल म्हणजे θ होय. हे खालील आकृतीत अधिक स्पष्ट करून दाखवले आहे. 



टॉर्क हा फिरण्याच्या एक्सीसपासून लावलेले बल किती अंतरावर आहे त्यावर अवलंबून असतो. आपल्या केसमध्ये फिरण्याचा एक्सीस म्हणजे जिथे तार पतलुंच्या रॉडला जोडली गेली आहे ते ठिकाण होय. कारण याच ठिकाणी तारेस ट्विस्ट मिळतो. तर या बिंदूपासून बल लावले गेलेल्या बिंदूपर्यंत म्हणजेच पतलूच्या मध्यबिंदूपर्यंत जे अंतर आहे ते अंतर म्हणजे L हे पहिल्या आकृतीत दाखविले आहेच. अशाच प्रकारे मध्यबिंदूपासून दुसऱ्याही बाजूला L इतक्याच अंतरावर पतलू-२ द्वारेही असेच बल लावले जात असल्यामुळे एक्सीस बिंदूपासून बल लावण्याच्या बिंदूपर्यंतच्या अंतराला आपण या दोन्ही अंतराच्या बेरजेइतके म्हणजेच २L इतके घेऊ शकतो.

तर या θ या अँगलला गुरुत्वाकर्षण फोर्स आणि तारेचा रिस्टोरिंग टॉर्क हे समान होतात हे कळले ना? मग यावरून आपण खालीलप्रमाणे समीकरण मांडू शकतो.  

यासाठी दोन्ही मोटूंचे वजन हे M आहे (कॅपिटल M) आणि दोन्ही पंतलुंचे वजन हे m आहे (स्मॉल m) असे समजू. वरच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक पतलू एका बाजूने एका मोटूच्या जितका जवळ जातो तितकाच दुसरा पतलू दुसऱ्या बाजूने दुसऱ्या मोटूच्या जवळ जातो. म्हणजेच दोन मोटू आणि दोन पतलू यांच्यातले अंतर समान आहे, म्हणजेच एका पतलुच्या मध्यबिंदूपासून एका मोटूच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आणि दुसऱ्या पतलूच्या मध्यबिंदूपासून दुसऱ्या मोटूच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर ही दोन्ही अंतरे समान आहेत. त्या अंतरास आपण R असे म्हणू. 

तर आपण आधीच बघितल्याप्रमाणे प्रमाणे न्यूटनचा नियम सांगतो की 



दोन्ही मोटू आणि दोन्ही पतलू यांतील या गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे तारेस जो ट्विस्ट पडला त्याचा टॉर्क काढण्यासाठी आपल्याला या फोर्स लावण्याचा बिंदू (म्हणजे एका पतलूचा मध्यबिंदू) ते रोटेशन एक्सीस (म्हणजे जिथे तार रॉडला जोडली आहे तो बिंदू म्हणजेच रॉडचा मध्यबिंदू) यांतील अंतराने त्या बलास गुणावे लागेल. आता हे अंतर L आहे हे आपण पाहिले आहेच मात्र दोन्ही पतलू हा फोर्स तारेवर लावत असल्याने हे अंतर दुप्पट म्हणजेच २L इतके घ्यावे लागेल. मग आपला ट्विस्टिंग टॉर्क म्हणजे तारेस पीळ घालणारा टॉर्क पुढील प्रमाणे होईल. 



हा ट्विस्टिंग टॉर्क हा आपल्या दोन्ही मोटू पतलू जोड्यांतील गुरुत्वाकर्षणामुळे तारेवर पडला. आणि आपण हेही पाहिले की तार या टॉर्कच्या विरुद्ध दिशेने आपला पीळ सोडविण्याचा टॉर्क लावत असते. 

तो पीळ सोडविण्याचा टॉर्क हा तार किती अँगलने ट्विस्ट झाली आणि तिचा टॉर्शन कोइफिशियंट (म्हणजे जर आपण अँगल डिग्रीत मोजत असू तर एक डिग्री अँगल वाढविल्यास तारेत निर्माण होणारा टॉर्क किती असतो तो म्हणजे तिचा टॉर्शन कोइफिशियंट होय)

आपली तार ही θ या अँगलने ट्विस्ट झाली हे आपण वरती पाहिले आहे तर तिचा पीळ सोडविण्याचा टॉर्क हा पुढीलप्रमाणे होईल 

पीळ सोडविण्याचा टॉर्क= C x θ

इथे θ हा ट्विस्टिंग अँगल आहे तर C हा तारेचा टॉर्शन कोइफिशियंट आहे.
जशी मागच्या भागात सांगितलेली भिंगरी पीळ सोडविण्यासाठी विरुद्ध बाजूने फिरते आणि तशी ती फिरली की तिच्या वेगामुळे (किंवा खरेतर इनर्शिया मुळे) ती विरुद्ध बाजूने पीळ घालते आणि परत तोही पीळ सोडविण्यासाठी भिंगरी परत उलट्या बाजूने फिरते आणि अशाच प्रकारे आलटून पालटून दोन्ही बाजूंना पीळ घालत ती फिरतच राहते. असेच तारेचेही होते. तार एका बाजूने पिळली गेली की तो पीळ सोडविण्यासाठी दुसऱ्या बाजूस फिरते आणि या फिरण्याच्या इनर्शियामुळे तार बराच वेळ तिच्या नॉर्मल पीळ नसलेल्या स्थितीच्या दोन्ही बाजूंस आळीपाळीने ओशिलेशन्स सारखी ट्विस्ट आणि अनट्विस्ट होत राहते. तारेच्या याच आळीपाळीने फिरण्याच्या वेळेवरून तारेचा C काढला जातो.कॅव्हेंडिशने याच प्रकारे याच सेटअप मधून पतलुंच्या तारेचा C शोधला होता. 

जेव्हा ट्विस्टिंग टॉर्क आणि पीळ सोडविण्याचा टॉर्क सेम होतात तेव्हा तार θ या अँगलला येऊन थांबते. म्हणजेच या स्थितीस आपण पुढील इक्वेशनने दाखवू शकतो,




म्हणजेच



आता यातच रिअरेंजमेंट केली की आपल्याला G ची किंमत मिळते. 




खरेतर कॅव्हेंडिशने हा प्रयोग G शोधण्यासाठी नव्हे तर पृथ्वीची घनता म्हणजेच पर्यायाने पृथ्वीचे वजन मोजण्यासाठी केला होता मात्र या क्रियेत G शोधणे अनिवार्य होते त्यामुळेच कॅव्हेंडिशच्या मेथडने निघालेला G हा पुढील प्रमाणे येतो. 

आज मान्यताप्राप्त G ची किंमत ही पुढीलप्रमाणे आहे. 

म्हणजे केवळ १% एरर पर्सेंटेजच्या कक्षेत कॅव्हेंडिशने G ची किंमत शोधली होती, इतक्या कमी एरर पर्सेंटेजला विज्ञानात खरी किंमत म्हणून मान्यता देण्यात येऊ शकते. म्हणून सव्वाशे वर्षांपूर्वीच्या लिमिटेड तंत्राने मोजमाप करूनही एवढी जवळजवळ तंतोतंत जुळणारी किंमत कॅव्हेंडिशने शोधली हे अत्याधिक कौतुकास्पद आहे. 

अशा प्रकारे तारेच्या ट्विस्ट वरून कॅव्हेंडिशला G मिळाला. म्हणूनच आपण या सीरिजला ट्विस्ट में कहानी हे नाव दिले आहे. पण आपले काम एवढ्यात संपले नाहीये. पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून आपल्याला पृथ्वीचे वजन मोजायचे आहे. हे मोजण्यासाठीही आपल्याला न्यूटनचीच मदत घ्यावी लागते.

न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की कोणत्याही वस्तूवर लागणारा फोर्स हा त्याचे मास म्हणजेच वस्तुमान आणि त्याला मिळालेले एक्सलरेशन यांच्या गुणाकाराइतका असतो.

F= मास x एक्सलरेशन म्हणजेच F = m x

पृथ्वीची ग्राविटी जी आपण म्हणतो ती ग्राविटी म्हणजे एक प्रकारचे एक्सलरेशनच असते ज्यामुळे वस्तू वेगाने पृथ्वीकडे खेचली जाते. याला एक्सलरेशन ड्यू टू ग्राविटी असे म्हणतात. हे एक्सलरेशन ड्यू टू ग्राविटी g (स्मॉल g) या अक्षराने दाखविले जाते. त्यामुळेच आपण वरील समीकरणात आपण ग्राविटीच्या फोर्स साठी a ऐवजी g घेऊ शकतो. म्हणजे m इतक्या वस्तुमानाची कोणतीही वस्तू पृथ्वीकडे ज्या फोर्सने ओढली जाते तो फोर्स पुढीलप्रमाणे असतो. 


F = m x

म्हणजेच 

F = mg 

आता हेच सूक्त आपण न्यूटनच्या आपण आधीच पाहिलेल्या पुढील वैश्विक ग्रॅव्हिटेशनल सिद्धांताशी जुळवू. 


ही दोन्ही इक्वेशन एकत्र केल्यावर आपल्याला मिळते. 



म्हणजेच



रिएरेन्ज करून आपल्याला पुढीलप्रमाणे M म्हणजेच पृथ्वीचे मास मिळते. 



म्हणजेच 



R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या फार पूर्वीच शोधलेली होती. ती आहे ६३७१ किलोमीटर. स्मॉल g सहज कोणत्याही वस्तूवर लागलेल्या बलाचे मोजमाप करून शोधतता येतो. तो आहे.  

याप्रमाणे मग आपण R, g आणि G यांच्या किंमती वरील समीकरणात टाकल्या की आपल्याला पृथ्वीचे वजन मिळते. अशा प्रकारे मोजलेले पृथ्वीचे वजन हे पुढीलप्रमाणे येते. 


न्यूटनच्या सिद्धांतातील युनिवर्सल ग्राविटेशनल कॉन्स्टन्ट म्हणजेच G ची किंमत मिळाल्याने आता आपण केवळ पृथ्वीचेच नाही तर चंद्र, सूर्य, इतर सगळे ग्रह किंवा आपल्या  संपूर्ण ब्रह्मांडातील कोणत्याही ग्रह वा ताऱ्याचे वजन मोजू शकतो. तर समस्त पंचक्रोशीतील बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी पृथ्वीमातेचे वजन करून 'असाध्य ते साध्य करीता सायास' ही उक्ती खरी करून दाखविली आहे ती आपल्या कॅव्हेंडिश भाऊंनी. याबद्दल या ठिकाणी मी कॅव्हेंडिश भाऊंचे अखिल भारतीय वजनात काटा मार मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो, आणि माझे दोन शब्द संपवतो.

जय न्यूटन, जय पृथ्वी.