हा ब्लॉग शोधा

रविवार, १७ जानेवारी, २०१६

बंद झालेले फोन


जिहाले मस्कीन लागलेले असायचे तिकडे fm वर आणि इकडे फोन वाजायचा.
मग fm च्या स्पीकरजवळ फोन धरला जायचा.
गाणे जेमतेम ऐकू यायचे
छातीवर डोके ठेऊन हृदयाचे मंद ठोके ऐकावेत तसे,
आणि मग खरेच नाही कळायचे की
सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है।

कधी कुठे ट्रेनमध्ये भेटायचा तुला एखादा रसिक आपल्यासारखाच
गालिब वाचणारा
किंवा तेंडुलकरपेक्षा द्रविड अधिक आवडणारा.!!
लगेच फोन यायचा
आणि त्या कधीही न भेटलेल्या अन कधीही न भेटणाऱ्या इसमाबरोबर कसे
एका वेगळ्याच प्रतलावरचे बोलणे व्हायचे.

बनारसच्या घाटावर कधी न जाऊनही
तिथला मनमोहक सूर्यास्त मी पाहिलाय तुझ्या शब्दांतून,
रात्रीच्या घनभोर अंधारात गंगेच्या पात्रात लुकलुकणारे दिवे पाहिलेत
आणि कुणा मांझीच्या नावेत बसल्यावर
गंगेच्या धुक्यात दोन्ही किनारे हरवल्यावरचा अध्यात्मिक एकांतपणा मीही अनुभवलाय तुझ्या फोन मधूनच.

बड्डे फिड्डे चे दोघांनाही अजिबात कौतुक नाही
आणि तरीही रात्री पावणे बारालाच फोन करायचास बड्डेच्या दिवशी,
की जेणेकरून ऐन 12 वाजेच्या शुभेच्छूकांच्या गर्दीत सापडू नये.
आणि एकटाच बोलत बसायचास साडे बारापर्यंत.
बाकीचे किती वैतागायचे फोन बीजी येतो म्हणून.

गुलजारची एखादी त्रिवेणी असो
की एखाद्या पुस्तकातला अचानक भावलेला एक पॅरेग्राफ,
किंवा कोण कुणा अनोळख्याला माझी कविता ऐकवून
त्याची प्रतिक्रिया थेट माझ्यापर्यंत पोचावी म्हणून केलेला फोन,

रात्रीचे 2 वाजलेले असोत की पहाटेचे 5,
ती रिंग आणि फोनवरचे तुझे नाव...
किंबहुना अशा फोन न करण्याच्या वेळीच फोन वाजला
की न बघताही कळायचे, फोन कुणाचा असेल.!

वेडेपणा होता काय तो सारा?
कारण आता कामाशिवाय फोन येतच नाहीत.
कित्येकदा तर कट केला जातो...
पूर्वी शेकड्याने एसेमेस यायचे जायचे,
आता फोन कट केल्यावर येतो तो I will call you later हाच एकमेव एसेमेस.


सुख देणाऱ्या तुझ्या फोनांपेक्षा 
स्कीम देणाऱ्या कंपन्यांचे फोन येतात कितीतरी अधिक,
तो इनबॉक्स ज्यावर केवळ तुझे राज्य होते,
आजही भरलेला असतो,
 पण बँक आणि क्रेडीट कार्डांच्या एसेमेसनी.!
तुझा एखादा एसेमेस वाळीत टाकल्यासारखा बुजून बसतो एखाद्या कोपऱ्यात..

वेळीअवेळी वाजत नाहीच आता फोन,
बिनकामाच्या तासनतास गप्पांचे होत नाहीत सेशन,
आपले फोन स्मार्टफोन झाले म्हणून,
की आपणच शहाणे झालोय म्हणून?

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

रियल व्हर्चुआलीटी

आधी व्याख्या करू आणि मग हळू हळू विस्तारू. 

व्हर्चुअल वल्ड किंवा आभासी जग म्हणजेच अशा संकल्पना अथवा गोष्टींवर बेतलेले काल्पनिक जग ज्यास काहीही वास्तव/भौतिक अस्तित्व नाही. या आभासी जगाचे सर्वात पॉप्युलर प्रातिनिधिक मानक म्हणजे फेसबुक. किंबहुना संपूर्ण इंटरनेट हेच एक मोठे आभासी विश्व होय. विशेषत:  इंटरनेटनंतरच हा शब्द प्रामुख्याने वापरला जाऊ लागला. वास्तववादी लोक या व्हर्चुअल जगण्यावर खूप टीका करतात. ठीक आहे पण ज्याला आपण वास्तव जग म्हणतो ते तरी वास्तव आहे का? की आपण आभासालाच वास्तव समजतो आहोत? चला बघुयात.  

फार पूर्वी (कदाचित आताही येत असेल) बहुदा 'नवाकाळ' हा पेपर मी जेव्हा कधी वाचला तेव्हा त्यात एक वाक्य हमखास छापून यायचे ते असे की "अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत." आणि याच वाक्यात आपल्या आजच्या सगळ्या समस्यांचे, दु:खाचे किंवा अगदी आनंदाचे देखील कारण सामावलेले आहे. 

अगदी दैनंदिन गोष्टींपासून सुरुवात करू. पहिली आभासी गोष्ट म्हणजे पैसा.!! आता तुम्ही म्हणाल पैसा तर भौतिक गोष्ट आहे आपण ती पाहू शकतो हाताळू शकतो मग तो आभासी कसा? आपण जो बघतो हाताळतो ते असतात केवळ काही कागदाचे तुकडे. आणि पैसा म्हणजे ते कागदाचे तुकडे नव्हेत तर आपण त्यांना ठरवून दिलेली एक पर्टिक्युलर किंमत म्हणजे पैसा. आणि किंमत ही निव्वळ एक आभासी गोष्टच तर आहे. एखाद्या जागतिकीकरणाचे वारे न लागलेल्या खेड्यात जा आणि तिथे एखाद्यापुढे एक  १०० रुपयाची आणि एक १०० डॉलरची नोट धरा आणि यातली एक तुला घे म्हणा. तो माणूस १००% ती १०० रुपयाचीच नोट घेईल. १०० डॉलरचे मुल्य तुम्ही मान्य केले म्हणून त्याला तुमच्या लेखी किंमत. सोन्याला तुम्ही मान्य केले म्हणून किंमत. एखाद्या शेतकऱ्यासाठी गायीचे शेण हे खत म्हणून अत्यंत किंमती, पण तेच एका शहरातल्या माणसासाठी शून्य किंमतीचे किंबहुना त्रासदायकच म्हणजे निगेटिव व्याल्यूचे असेल. 

दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे नाव. 'राहुल भांगरे' नावाचे पंचवीसेक लोक आहेत फेसबुकवर. मात्र ही जी काही पकाऊगिरी चालविली आहे ती फक्त एकट्या मीच. मग हे राहुल भांगरेने लय भारी लिहिलेय असे कुणी (चुकून) बोलले तर इतर चोवीस राहुल भांगरे थोडेच खुश होणार आहेत? म्हणजे महत्व नावाला नव्हे तर व्यक्तीला आहे. माझे नाव पांडुरंग सांगवीकर असते किंवा अण्णू गोगट्या असते तरी तुमची माझ्याबद्दल जी काही प्रतिक्रिया असती ती सेमच असती. नाव म्हणजे केवळ एक संबोधन, आणि अगदीच सायंटीफिक बोलायचे तर एक पर्टिक्युलर आवाज, जो आपणास असाइन झाला आहे असे मानून तो ऐकून आपण पुकारणाराला प्रतिसाद देतो, ज्याला आपण ठरविले म्हणून काहीतरी मुल्य आहे अन्यथा नुसती शिट्टी वाजवली किंवा अहो शुक शुक असे केले तरी आपण अनोळख्यालाही प्रतिसाद देतोच की.! मला वाटते  'आपणांस प्रतिसाद देण्यास उद्युक्त करणारा आवाज म्हणजे नाव' या व्याख्येप्रमाणे शिट्टी हे तर एक वैश्विक नाम ठरेल. फार कशाला शेक्सपियर सुद्धा तर नावाबद्दल हेच म्हणतो.  

तिसरी गोष्ट म्हणजे आपली जात आणि धर्म. "गर्वच नाही तर माज आहे xxx असल्याचा,  xxx ला नडला तर फोडला,"वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजिती दात ही जात xxxची, गर्वसे कहो हम xxx है", म्हणजे ट्रकांच्या मागे लिहिल्या जाणाऱ्या शायरीच्या लायकीची ही वाक्ये xxx च्या जागी वेगवेगळी नावे लिहिली जाउन अत्यंत स्वाभिमानी आवेशपूर्ण स्वरूपात हजारांदा व्हाट्सअप इत्यादी ठिकाणी येत असतात. आणि वरून खरे xxx असाल तर निदान शंभर जणांना हे फोरवर्ड करा अशी निर्बुद्ध आवाहन कम मखलाशीही जोडलेली असते. ही विकृती एवढी पराकोटीची आहे ना आपल्या देशात की एखादा माणूस चांगला की वाईट किंवा तो आपल्याला आवडावा की नाही हे आपण त्याचे कार्य नव्हे तर त्याची जात/ धर्म पाहून ठरवतो. किंवा आवडला तर त्याची जात काय असेल हे शोधतो. Dhoni catches असे गुगलून पहा, catches चा c टाईप करताच पहिले सजेशन येते dhoni caste असे, अजय अतुल कम्पोझिशन्स असे टाईप करा तरी तेच. कसे काय लोक या माणसांची जात शोधू पाहत असतील? अरे कसला धर्म आणि कसली जात? आपण नावासारखीच हीही लेबले स्वत:स चिकटवली आणि त्यांना मुल्य देऊ लागलो बस्स. 'अमर अकबर एन्थोनी' पाहिलाय ना? बस फिर इतने समझदार तो दिखते ही हो तुम तो समझ जाव ना यार की ही जात आणि धर्म संकल्पना सुद्धा किती फोल आणि आभासी आहे ते. 

चौथी गोष्ट म्हणजे देव. तो कुणाला दाखवताही येत नाही आणि त्याला बोलावताही येत नाही, पण त्याला मानणारे आस्तिक असोत की शिव्या देणारे नास्तिक दोघेही एका भौतिक अस्तित्व नसलेल्या व्यक्तीस भजत किंवा निंदत असतात. असो, देव या संकल्पनेवर फॉर आणि अगेन्स्ट असा दोन्ही दृष्टिकोनांचा इतका वैचारिक चोथा पडला आहे की म्या पामराने अधिक तो काय भूस पांगवावा?

अशी हजारो उदाहरणे आहेत. चांगले, वाईट, सुख, दु:ख, श्रेष्ठ, नीच, पाप, पुण्य, आठवणी, बंधने, कायदे, सौंदर्य हे सगळे आभास. एवढेच कशाला, अरे जे जग आपण भौतिक म्हणतो तोही एक आभासाच आहे. रंग, टाईम, डीस्टंस, वस्तुमान,  उजेड, अंधार हे सगळे केवळ आभास होत. अंधार किंवा उजेड नावाचे काही नाहीच. विश्वात अनंत वेव स्पेक्ट्रम आहेत, अगदी अंधारातही ते आहेत. उजेड याही वेव्ज आहेत, फक्त त्या वेव्जची तरंगलांबी आपल्या दृष्य तरंगलाम्बीशी मैच झाली की आपण तिला उजेड समजतो. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात तर टाईम डीस्टंस या गोष्टी आपण समजतो त्या स्वरूपात अस्तित्वात नाहीत. जे काही आपल्याला दिसते ते फक्त उर्जेचे काहीतरी रूप किंवा तिचा प्रवाह. पण मूळ उर्जा दिसत नाही, फक्त भासते. ज्याला आपण वास्तव समजतो तोही केवळ भास. आणि आपण या अभौतिक संकल्पनांना गुळाच्या ढेपेसारखे चिकटून बसलेले मुंगळे. या निरर्थकतेसाठी आपण कोट्यानकोटी माणसे मारली/मारतो, रोज शेकड्यांदा आपली मने मारतो, प्रचंड रागावतो, बेचैन होतो, दु:खी होतो. असो, भौतिक-अभौतिकीच्या गर्तेत आपण गटांगळ्या खातच राहणार, जे आपल्याला जाणवते तेच सत्य किंवा तेच वास्तव असे मानायचे व स्वत:ला आणि इतरांनाही अधिकाधिक सुखी करायचे. जीना इसी का नाम है.!!