जिहाले मस्कीन लागलेले असायचे तिकडे fm वर आणि इकडे फोन वाजायचा.
मग fm च्या स्पीकरजवळ फोन धरला जायचा.
गाणे जेमतेम ऐकू यायचे
छातीवर डोके ठेऊन हृदयाचे मंद ठोके ऐकावेत तसे,
आणि मग खरेच नाही कळायचे की
सुनाई देती है जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल है।
कधी कुठे ट्रेनमध्ये भेटायचा तुला एखादा रसिक आपल्यासारखाच
गालिब वाचणारा
किंवा तेंडुलकरपेक्षा द्रविड अधिक आवडणारा.!!
लगेच फोन यायचा
आणि त्या कधीही न भेटलेल्या अन कधीही न भेटणाऱ्या इसमाबरोबर कसे
एका वेगळ्याच प्रतलावरचे बोलणे व्हायचे.
बनारसच्या घाटावर कधी न जाऊनही
तिथला मनमोहक सूर्यास्त मी पाहिलाय तुझ्या शब्दांतून,
रात्रीच्या घनभोर अंधारात गंगेच्या पात्रात लुकलुकणारे दिवे पाहिलेत
आणि कुणा मांझीच्या नावेत बसल्यावर
गंगेच्या धुक्यात दोन्ही किनारे हरवल्यावरचा अध्यात्मिक एकांतपणा मीही अनुभवलाय तुझ्या फोन मधूनच.
बड्डे फिड्डे चे दोघांनाही अजिबात कौतुक नाही
आणि तरीही रात्री पावणे बारालाच फोन करायचास बड्डेच्या दिवशी,
की जेणेकरून ऐन 12 वाजेच्या शुभेच्छूकांच्या गर्दीत सापडू नये.
आणि एकटाच बोलत बसायचास साडे बारापर्यंत.
बाकीचे किती वैतागायचे फोन बीजी येतो म्हणून.
गुलजारची एखादी त्रिवेणी असो
की एखाद्या पुस्तकातला अचानक भावलेला एक पॅरेग्राफ,
किंवा कोण कुणा अनोळख्याला माझी कविता ऐकवून
त्याची प्रतिक्रिया थेट माझ्यापर्यंत पोचावी म्हणून केलेला फोन,
रात्रीचे 2 वाजलेले असोत की पहाटेचे 5,
ती रिंग आणि फोनवरचे तुझे नाव...
किंबहुना अशा फोन न करण्याच्या वेळीच फोन वाजला
की न बघताही कळायचे, फोन कुणाचा असेल.!
वेडेपणा होता काय तो सारा?
कारण आता कामाशिवाय फोन येतच नाहीत.
कित्येकदा तर कट केला जातो...
पूर्वी शेकड्याने एसेमेस यायचे जायचे,
आता फोन कट केल्यावर येतो तो I will call you later हाच एकमेव एसेमेस.
सुख देणाऱ्या तुझ्या फोनांपेक्षा
स्कीम देणाऱ्या कंपन्यांचे फोन येतात कितीतरी अधिक,
तो इनबॉक्स ज्यावर केवळ तुझे राज्य होते,
आजही भरलेला असतो,
पण बँक आणि क्रेडीट कार्डांच्या एसेमेसनी.!
तुझा एखादा एसेमेस वाळीत टाकल्यासारखा बुजून बसतो एखाद्या कोपऱ्यात..
वेळीअवेळी वाजत नाहीच आता फोन,
बिनकामाच्या तासनतास गप्पांचे होत नाहीत सेशन,
आपले फोन स्मार्टफोन झाले म्हणून,
की आपणच शहाणे झालोय म्हणून?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा