हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २१ जून, २०१६

कमला आणि अमला (खरेखुरे रियल लाईफ जंगल बुक)

जंगल बुकचे जे कार्टून लहानपणी यायचे ते आता आलेल्या चित्रपटापेक्षा लय भारी होते. मी टारझनची गोष्ट सुद्धा खूप लहानपणी वाचली होती त्यामुळे लहानपणापासून मी कधी एखाद्या जंगलात गेलो की मला वाटायचे काय घ्यावे इथेही कोणी मोगली किंवा टारझन सापडेल. नंतर थोडे मोठे झाल्यावर असे होणे शक्य नाही हे कळू लागले. कोणीही प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या मुलाला पाळू शकत नाही.
कोकीळ आणि कावळ्याची गोष्ट मला कळल्यावर मला पुन्हा उत्सुकता जागृत झाली. जशी कोकीळ आपली अंडी कावळीच्या घरट्यात घालते आणि कावळी कोकिळेची पिल्ले स्वतः:ची समजून वाढवते तसे माणसालाही प्राणी वाढवू शकतील? मग वाटले असे होऊ शकेल पण केवळ साधर्म्य असलेल्या प्राण्यांत म्हणजे एखाद्या कुत्र्याला कोल्हे किंवा लांडगे वाढवू शकतील कारण ते सारखे दिसतात, पण कुणी माणसाला वाढविणे शक्य नाही. अगदी माकडांनी सुद्धा माणसांना वाढवणे अवघड आहे कारण एनाटॉमी बहुतांशी सारखी असली तरी माणसाच्या अंगावर केस नसणे व माणसाला शेपटी नसणे हे फार मोठे फरक आहेत.
एकदा डिस्कव्हरीवर मी दोन डॉक्युमेंटरी पाहील्या, एके डॉक्युमेंटरीत एक चित्ता एका हरीणाच्या पिलाचे रक्षण करत होता, तर दुसरीत एक सिंहीण देखील एका हरिणाच्या पिल्लाला पाळीत होती. सिंहीणीची गोष्ट तर अतिशय हृदयस्पर्शी होती. त्या पिलासाठी तिने तिची टोळी सोडली कारण दुसऱ्या सिंहांनी त्या पिलाला मारले असते. तिने १५ दिवस शिकार सुद्धा केली नाही कारण त्यासाठी त्या पिलाला एकटे सोडावे लागले असते. शेवटी एका मोठ्या सिंहाने तिला गाठून त्या पिल्लावर झेप घेतली. तिने मुकाबला केला पण शेवटी तो राजा सिंह होता त्याने त्या पिलाला क्षणार्धात फाडून टाकले. डिस्कव्हरीवाले ग्रेट आहेत त्यांनी हे सगळे कॅमेऱ्यात कैद केले होते.
आता मी पुढे सांगणार आहे ती सत्य घटना १९२०ची आहे. बंगालातल्या मिदनापूरची.!!
मिदनापूरच्या जंगलातील एक गावाच्या लोकांनी दोन विचित्र प्राणी पाहीले. ते दोन प्राणी एका लांडग्यांच्या टोळीत होते. डोक्यावर लांब केस, अंगावर खवले असल्यासारखी त्वचा असे काहीसे ते प्राणी होते. गावकरी त्यांना भुते समजले. कारण ते प्राणी ऐन रात्रीच्या वेळीच त्या लांडग्यांच्या टोळीबरोबर धावताना, फिरताना नजरेस पडले होते. या प्राण्यांची बातमी मग पोचली ती रेव्हरँड सिंग यांचेपर्यंत. तेही उत्सुकतेपोटी या दोन प्राण्यांना पहायला मिदनापूरला आले. त्या विचित्र प्राण्यांना ठार करण्यासाठी म्हणून जंगलात जिथे ते प्राणी अनेकदा दिसले होते तिथल्या जलाशयाभोवती लख्ख चांदण्या रात्री एक मचाण बांधून ते दबा धरून बसले. अपेक्षेप्रमाणे ती लांडग्यांची टोळी आली त्यात ते दोन प्राणीही होते. सिंग यांनी बंदुकीचा नेम लावला, आणि मग ते अचानक थांबले. कारण त्यांना दिसले की ते कोणतेही विचित्र प्राणी अथवा भुते नसून त्या दोन मानवी मुली होत्या. डोक्यावर अत्यंत गुंता झालेले आणि मळके विस्फारलेले केस आणि अंगावर मळाची पुटावर पुटे चढलेली असल्याने त्यांची त्वचा खवल्यांसारखी दिसत होती.
मग सिंग यांनी गावकऱ्यांना हे सांगून त्या दोन मुलींना त्या लांडग्यांच्या तावडीतून सोडवायचा निर्धार केला. मग त्यांनी त्या लांडग्यांच्या गुहा शोधून काढल्या. त्यांना दिसले की एका गुहेत त्या दोन मुली एका मादी लांडग्याबरोबर तिच्या पिल्लांसह राहत होत्या. त्यातली एक मुलगी फक्त २ वर्षांची तर एक ८ वर्षांची होती. जेव्हा माणसांनी त्या लांडग्यांना हाकलून देऊन त्या मुलींना पकडायचा प्रयत्न केला तेव्हा आधी तर लांडगे आणि त्यांचेबरोबर त्या मुलीही पळून गेल्या. नंतर त्यांना कोंडीत पकडल्यावर जेव्हा त्या लांडग्यांना कळले की माणसे त्या दोन मुलींना पकडू पाहत आहेत तेव्हा त्यांनी जोरजोरात हल्ले करून माणसांना त्यांच्याजवळ येण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. ते लांडगे त्यांना आपल्यातलेच समजत होते. विशेषतः: त्या दोन्ही मुलींची आईच झालेली जी मादी लांडगा होती ती तर काही केल्या माणसांना त्यांच्या जवळ येऊच देईना. जखमी होऊनही ती पूर्ण शक्तीनिशी त्यांचे रक्षण करतच राहीली. इतर लांडगे पळून गेले पण तिने त्या मुलींना सोडले नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल पण जंगल बुकमध्ये शेरखान माणसांबद्दल जे बोलतो ना ते अगदी शंभर टक्के खरे आहे. कारण शेवटी सिंग यांनी त्या मुलींच्या त्या लांडगा आईला गोळी घालून ठार केले आणि मगच ते त्या दोन मुलींना घेऊन जाऊ शकले. मरताना त्या आईला काय वाटले असेल, त्या दोन मुलींना त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई पाहून काय वाटले असेल आणि त्या आईच्या बाकी पिलांचे पुढे काय झाले असेल हे प्रश्न आपण स्वतः:ला विचारायचे नाहीत, कारण या पृथ्वीवर काय योग्य आणि काय अयोग्य हे आपण आपल्या सोयीप्रमाणे ठरवायचे असते, हे प्रश्न स्वतः:स विचारणे आपणांस गैरसोयीचे आहे. ती लांडगा आई ज्या भीतीपोटी मुलींना माणसांच्या ताब्यात जाण्यापासून रोखत होती तिची ती भीती खरी ठरली असेल का? त्या मुलींचे माणसांत येऊन भले झाले असेल?
श्री सिंग हे त्या मुलींना ते स्वतः: चालवत असलेल्या अनाथाश्रमात घेऊन गेले. त्या दोन मुली एकमेकींच्या खऱ्या बहीणी नव्हत्या. लांडगे गावातील मुलांना पळवून नेऊन मारून खाण्याच्या घटना तेव्हा कित्येकदा घडत. कसे कुणास ठाऊक पण या दोन वेगवेगळ्या वेळी आणि बहुदा वेगवेगळ्या ठिकाणांहून पळवून नेलेल्या मुलींना लांडग्यांनी ठार न मारता सांभाळले होते. सिंग यांनी त्या दोघींना कमला आणि अमला अशी नावे दिली. त्या मुली चार पायावरच चालत (दोन हातांना त्या पुढचे पायच समजत). त्यांना दोन पायांवर उभे राहताच येत नसे चालणे तर दूरच. त्या घातलेले कपडे फाडून टाकत. भिंतीवर किंवा कुठेही नखांनी ओरखडून ठेवत. पाणी दिले की ते खाली ओतून चाटून पीत. त्यांची त्वचा अतिशय राट झालेली होती. त्यांना तूप लावून त्वचा मऊ करण्याचा सिंग यांनी प्रयत्न केला. त्या फक्त कच्चे मांस खात. त्यांची श्रवणशक्ती अतिशय तीक्ष्ण होती, अगदी दूरवरचे छोटे छोटे आवाजही त्यांना ऐकू येत. आणि त्यांची वास घेण्याची क्षमता तर अफाट होती. अगदी ५० ते ७० मीटर अंतरावर ठेवलेल्या कच्च्या मांसाचाही त्या बरोबर वास ओळखत. मध्यरात्रीनंतर त्या लांडग्यांसारख्या तोंड वर करून ओरडत. त्या दोघी नेहमी सोबतच राहत आणि जमिनीवरच मुटकुळे करून एकमेकींस बिलगून झोपत.
सिंग यांनी त्यांना अनेक मानवी गोष्टी, सवयी शिकविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्यातच छोटी अमला काही दिवसांतच आजारी पडून मरण पावली. ती मेल्यावर कमला अजूनच प्रचंड निराशेत गेली. पुढील जवळ जवळ आठ नऊ वर्षात कमला जास्तीत जास्त २० ते ३० मानवी शब्द शिकू शकली. मानस शास्रज्ञांनी कमलाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या उपायांनी तिला शिकविण्याचा प्रयत्न केला पण ती काही शिकू शकली नाही. आमच्या बालपणी जवळ जवळ याच वयात म्हणजे पाचवीत आम्ही इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषा शिकलो पण कमला काहीही शिकू शकली नाही. असे कसे काय झाले असेल? आठेक वर्षे लांडग्यांच्या सानिध्यात राहील्यावर भाषा शिकणे हा मानवी गुणधर्म ती मुळातूनच गमावून बसली होती काय? असे म्हणतात की कमलाला बघायला लोक येत तेव्हा सिंग कदाचित त्यांचेकडून पैसे घेत आणि या देशी परदेशी उच्चभ्रू पाहुण्यांसमोर सिंग यांना हवे तसे कमलाने वागावे म्हणून ते तिला मारहाण सुद्धा करीत. काही जण तर या एकंदर कहाणीवरच शंका घेतात. मात्र एका परदेशी बिशपने कमलाला दोन वर्षे पाहिल्याची नोंद करून ठेवलेली आहे. सिंग याने कमलाचे काही फोटोही काढलेले आहेत.
१९२०ला ही कहाणी सुरू झाली तेव्हा सगळ्या जगातच मोठी खळबळ माजली होती, मात्र अमलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मानवी गुणधर्म न शिकताच किंवा न स्वीकारताच म्हणा पण कमलासुद्धा अल्पकाळातच १९२९ साली मरण पावली. त्या लांडग्यांच्या टोळीबरोबरच त्या दोघी अधिक चांगल्या रीतीने राहू शकल्या असत्या का? त्यांना माणसात आणणे हे आपण सामाजिक आणि मानवीय दृष्ट्या योग्य मानू पण स्वतः: त्या दोघींसाठी ते योग्य होते का? अमेरिकेत एका मानसशास्त्रज्ञाने एका चिंपांझीस शंभर एक शब्द शिकवले होते तो चिंपांझी त्यांची साधी साधी तीन शब्दांची वाक्ये सुद्धा बनवू शकत होता. पण कमलाला हे का शक्य झाले नसेल? कमला आणि अमलाची ही कहाणी वाचल्यावर कळते की जीवन किंवा सुख जे आपण समजतो त्याहुनही कदाचित कितीतरी वेगळे काहीतरी असावे. आपण कोण असतो? आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या समाजाच्या प्रभावाने घडलेले जीव असतो का? लांडग्यांच्या समाजात राहून आपण माणूस असूनही सर्वार्थाने लांडगे होत असू तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आदर्श सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी त्यांचेसाठी त्याच दृष्टीने तसेच पोषक सामाजिक वातावरण आपण त्यांना द्यायला नको का? आपण हे असे भ्रष्ट, स्वार्थी, भेदभावाने, द्वेषाने आणि हिंसेने लिडबिडलेले सामाजिक वातावरण त्यांच्यासमोर ठेऊन ते पुढे शांतीने, सौहार्दाने व सुरक्षित राहतील अशी अपेक्षा ठेऊ शकतो का?

सोमवार, २० जून, २०१६

रामायण स्फुट २१

"मग बाळांनो सीता त्या महर्षींकडे गेली." महर्षी वाल्मिकी त्यांच्या आश्रमातील बालकांस त्यांनीच लिहिलेली रामायणाची कथा सांगत होते. महर्षींनी सीतेस विचारले, "लेकी अशा अवस्थेत तू इकडे का आलीस?"
ती म्हणाली, "माझ्या प्रभूंचा वनवास चौदा वर्षांचा आणि माझा अठ्ठावीस वर्षांचा. त्यांचा संपला, आता मी भोगते.."
पण गुरुवर्य, अग्निपरिक्षेनंतरही प्रभू रामाने सीतेचा त्याग का केला? एका बालकाने प्रश्न केला. 
आता मला तपशीलात सगळे आठवत नाही रे बाळांनो, खूप दिवस झाले ना मला ही कथा लिहून. आता वय झाले लेकरांनो, स्मृति कमी होते या वयात. त्या हस्तलिखित प्रतीत पुन्हा पहावे लागेल मला. उद्या पुन्हा बघून सांगतो ठीक आहे?
पण गुरुजी आज तुम्ही केवळ एकाच कवनाचे कथासार सांगितलेत आम्हाला अजून ऐकायचेच आहे. असे सगळी मुले मोठमोठ्याने म्हणू लागली.
मुलांच्या खूप आग्रहामुळे मग गुरुजींनी लगेच कथेचे वाचन करून कथा अजून पुढे सांगायची ठरवली. मग ते एका मुलाकडे वळले आणि म्हणाले, 
"कुश, लेकरा जा जरा तुझ्या मातेकडून ती हस्तलिखित प्रत घेऊन ये. तुझी माताच सांभाळून आणि संकलित करून ठेवीत होती माझे लिखाण. तेवढी एकच प्रत आहे माझ्या रचनेची, ती जीर्ण झाली तर माझे सगळे काव्य नष्ट होईल. आता मी आश्रमातील तुम्हा सगळ्या मुलांकडून ती मुखोद्गत करून आणि लिहूनही घेईल. म्हणजे ते काव्य टिकेल." गुरुजींनी असे सांगितल्यावर मग कुश लगेच जाऊन त्याच्या मातेकडून ती प्रत घेऊन आला. मग महर्षींनी ती प्रत वाचायला घेतली. 
"मी वाचूनच दाखवतो हं तो प्रसंग मुलांनो...
तर अग्निपरिक्षेनंतर सगळे व्यवस्थित झाले, लक्ष्मण, भरतादि बंधू, तिन्ही माता सर्वजण अत्यंत आनंदात होती. सुग्रीव, बिभीषण परत किष्किंधा आणि लंकेस गेले, हनुमान मात्र मागे अयोध्येतच थांबला होता. तो जणू रामाची सावलीच झाला होता. प्रजा तर अजूनही आनंदोत्सव साजरा करीत होती. नगरातली सजावट अजूनही तशीच होती. राम सीता असे दोघेही हे पाहून आनंदाच्या लाटेवर आरूढ होते, तब्बल चौदा वर्षांनी सीता राजसुखाचा आस्वाद घेत होती. राजसभेतही प्रभुराम सीतेस आपल्या शेजारीच सिंहासनावर बसवित. संपूर्ण भारतवर्षात कोणत्याही राज्याचा राजा आपल्या पत्नीस असा सन्मान देत नसे. सगळ्या भारतवर्षात आपला पती सर्वात श्रेष्ठ असा अजेय पुरुषोत्तम आहे आणि एखाद्या नवविवाहितेवर करावे असे प्रेम आपल्यावर करतो आहे हे जाणवून कित्येकदा सीतेला आपल्याच भाग्याचा हेवा वाटे.
एके रात्री अगदी मध्यरात्र कधीची टळून गेल्यावर राम शय्यागृहात आला. सीता मंचकावर पडून असली तरी रामाच्या प्रतीक्षेत अजूनही जागीच होती. राम आला की तो गोड आवाजात सीतेला हाक मारी, सीतेने झोपेचे नाटक करून रामाची गंमत बघायचे ठरविले, व ती मुद्दाम डोळे मिटून निद्रीस्त असल्यासारखी पडून राहिली. आता राम आपल्याला हाक मारेल, मग हळूच अलिंगनात घेईल आणि मग आपल्या पोटातल्या बाळाशी कितीतरी वेळ गप्पा मारत बसेल हे तिला माहीत होते. पण बराच वेळ झाला तरी राम काही बोलेना वा त्याची काही चाहुलही लागेना हे पाहून सीता आश्चर्यचकित झाली. मग तिनेच स्वयें डोळे उघडले आणि समोर पाहीले तर काय.!! राम अत्यंत विषण्ण मुद्रेत मंचकाच्या कोपऱ्यावर खाली मान घालून निस्तब्ध बसला होता.
प्रभू काय झाले? सीतेने चिंतातुर होऊन विचारले, आणि ती लगेच मंचकावरून उठून रामाजवळ आली.
रामाने काही उत्तर तर दिले नाहीच, आणि मान वर करून सीतेकडे पाहीले देखील नाही.
सीतेला खूप काळजी वाटली. ती रामाजवळ आली आणि हातांनी त्याचा चेहरा वर करून विचारले, काय झाले देवा? काही दुःखद घटना घडली का? मला सांगा प्रभू, तुमचे दुःख ते माझे दुःख."

एवढे काव्य वाचून आणि त्यावरचे कथन करून झाल्यावर वाल्मिकी ऋषींनी समोर पाहीले, लव, कुश आणि इतरही मुले समोर बसून कथा ऐकत होती. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर एक काळजीयुक्त उत्सुकतेची छटा दिसत होती. सहसा महर्षी एवढे काव्यचरण वाचून झाल्यावर मुलांकडून आधी ते मुखोद्गत करून घेत, पण आज त्यांनी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे औत्सुक्य पाहून पाठांतर करण्याऐवजी पुढचे कथन करायचे ठरविले. आणि मग ते पुढे म्हणाले,
राम काही केल्या सीतेच्या नजरेस नजर मिळवीत नव्हता, सीतेने पुन्हा विचारले,
"प्रभू काय झाले मला सांगा तरी"
तिने असे बोलल्यावर राम काहीश्या जड आवाजात बोलला, "सीते उद्या तुला लक्ष्मण दंडकारण्यात महर्षी वाल्मिकी यांचेकडे घेऊन जाईल."
"प्रभू एवढेच ना? मग त्यात उदास काय व्हायचे एवढे? महर्षी वाल्मीकींचा आशीर्वाद आपल्या होणाऱ्या बाळास मिळणे हे तर भाग्याचेच आहे. मी आणि बाळ दूर जाऊ म्हणून उदास झालात का आपण? आपल्यासारख्या वीर पुरुषास या एवढ्याशा कारणाने असे चिंताग्रस्त होणे शोभते का? मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित येईन, फक्त एक करा, मला पालखीत पाठवा, रथात खूप धक्के बसतात, बाळासाठी ते योग्य नव्हे ना."
पण राम तरीही काही बोलला नाही किंवा त्याने सीतेकडे पाहिले देखील नाही.
यावर सीताच हसून म्हणाली,
"चला आता हसा बरे आणि निजून घ्या. बारा दिवस जायला, बारा दिवस यायला आणि तिथे राहायला थोडे दिवस असा महिनाभराचाच तर प्रश्न आहे. आम्ही त्याहीपेक्षा लवकर परतण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.?"
यावर राम कसाबसा अगदी जड आणि तुटक आवाजात म्हणाला, "सीते तू परत यायचे नाहीये."
"काय? का बरे? राजवैद्याने सांगितले ना तुम्हाला? दुष्टच आहे तो. आधीही मला सांगत होता की बाळाच्या योग्य वाढीसाठी नगराच्या गोंगाटातून दिवसातून काही वेळ दूर जाऊन रहा म्हणून. पण मी काही ऐकणार नाही हा. मी माझ्या प्रभूंजवळच राहीन. तुम्ही त्या राजवैद्याला हे सांगून टाका."
"मला हे राजवैद्यानेही सांगितले नाहीये सीते, मीच तुझा परित्याग करण्याचे ठरविले आहे."

काय? सीता आत्यंतिक आश्चर्यचकित होऊन जवळ जवळ किंचाळलीच. "परित्याग? पण का? माझी काही चूक झाली का प्रभू? तुम्ही माझा त्याग करत आहात? तेही मी अशा अवस्थेत असताना? माझा नाही विश्वास बसत."
"मी कधीही असत्य बोलत नाही हे तुला ठाऊक नाही का सीते?" राम थोड्या कठोर आवाजात बोलला.
"माहीत आहे, पण निदान आपण असे का करताय, माझी काय चूक झाली ते तरी सांगाल प्रभू?"
एवढे वाचून महर्षी थांबले. मुलांपैकी लवने न राहवून विचारले, "मग राम काय म्हणाले ते सांगा ना गुरुवर्य."
महर्षींनी थोडे आजूबाजूला पाहिले, ज्या वस्त्रात ग्रंथ ठेवलेला होता ते जरा चाचपून पाने वर खाली करून काहीतरी शोधले. आणि मग म्हणाले, "हे एक पर्ण फाटलेले आहे. याचा पुढचा भाग कुठेतरी हरवला आहे बहुदा. एवढी एकच प्रत आहे. आणि ही रचना करून एक तपाहून अधिक काळ लोटला आहे त्यामुळे ते मला आठवतही नाही. चला आज एवढे पुरे. हे एवढे काव्य तुम्ही मुखोद्गत करा. मी जानकीस विचारतो, कदाचित तिच्या कुटीत कुठेतरी मिळेल ते पान."
मग महर्षी मुलांकडून आजचे काव्य मुखोद्गत करवून घेऊन सीतेकडे आले. जानकी हीच रामायणाची सीता आहे हे मुलांना अजून माहीत नव्हते. महर्षी मुलांना रामायण पाठांतर करायला सांगताना बोलत की हे सगळे चार तपांपूर्वीच घडून गेले आहे. त्यामुळे अगदी लव कुशासही आपणच रामपुत्र असल्याची कल्पनाही आली नव्हती.
मग महर्षी सीतेच्या कुटीत गेले, त्यांनी कपड्यात बांधलेला तो ग्रंथ तिच्याकडे दिला आणि म्हणाले, "सीते, पुत्री या ग्रंथाचे एक पान फाटले आहे, त्याचा दुसरा तुकडा कुठे सापडतो का बघ, तू हा ग्रंथ ठेवतेस तिथे कदाचित पडलेला असेल. तुला तर माहीत आहे ही एकच प्रत आहे, आणि आता मला काही सगळे जसेच्या तसे आठवत नाही. किती दिवस म्हणतोय मुलांकडून अजून काही प्रति लिहून घ्याव्यात, एवढे कथन पूर्ण झाले की मी तेच करणार होतो, पण आता या फाटलेल्या पानाचे काय करावे?"
मी शोधते. असे म्हणून सीता ग्रंथ संग्रहीत ठेवण्याच्या जागी गेली आणि तिने तिथे शोधले पण तिला काही ते सापडले नाही. ती महर्षींना म्हणाली की तिथे कोणतेही पान नाहीये, नेमके कोणते पान हरवले आहे?
तिने असे विचारल्यावर महर्षींनी ग्रंथ उघडून तिला ते पान दाखवले. ते फाटलेले पान पाहताच सीतेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिला काहीतरी आठवले होते, तिने मान खाली घातली आणि म्हणाली, "गुरुवर्य ते पान फाटले नाही तर फाडले आहे."
"काय? फाडले आहे? कुणी?"
"मीच."
"तू फाडले आहेस पुत्री? पण का?"
"कारण महर्षी तुमचे हेच काव्य पुढे माझ्या रामप्रभूंचा इतिहास म्हणून जगापुढे येणार आहे, आणि प्रभूंनी मला शपथेवर हे कुणासही न सांगण्याचे कबूल करवून घेतले होते. त्या वेळी प्रथमतः लक्ष्मणाने आश्रमात आणून सोडल्यावर भावनेच्या भरात आणि गर्भावस्थेत प्रभूंनी माझा त्याग केल्याच्या रागात मी हे आपणांस सांगितले होते. पण जेव्हा तुम्ही ते लिहून काढलेत आणि माझ्याकडे ते संग्रहीत करण्यासाठी दिलेत तेव्हा ते वाचताना मला कळले की माझ्या प्रभूंनी दिलेले वचन मी मोडले. आणि मग त्यांचे ते गुपित जगापासून लपून राहावे म्हणून मी ते पर्ण फाडून टाकले. मला ज्ञात होते की तुम्ही केवळ एकच हस्तलिखित प्रत तयार करत आहात. म्हणून एका भाबड्या आशेपायी मी ही चूक केली, मला क्षमा करावी."
"पण सत्य हे सत्य असते सीते, एक पर्ण फाडल्याने सत्य कसे बदलेल? आता मला सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट आठवते आहे की तेव्हा काय झाले होते."
त्यादिवशी रामाला भेटायला तारा आली होती. सुग्रीवपत्नी तारा. थेट किष्किंधेहून ती कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय आणि लवाजम्याशिवाय अयोध्येस कशी पोचली याचे रामास मोठे आश्चर्य वाटले. रामाने विचारले, "देवी, किष्किंधेत सर्व क्षेमकुशल आहे ना? सुग्रीव कसा आहे?" तारा थोडी संतापलेली दिसत होती. ती या प्रश्नावर काहीच बोलली नाही. मग रामानेच तिला पुन्हा विचारले, "काय झाले देवी? आपण काहीशा चिंतेत दिसता? माझा प्रिय सुग्रीव तर ठीक आहे ना?" यावर तारा म्हणाली, "आपण वारंवार मला त्या माणसाचे क्षेम विचारू नका." पण का? राम म्हणाला. "आपल्या पतीचे क्षेम विचारल्यावर आपण अशा क्रोधीत का झालात?" "मी त्याची पत्नी नाही. मी वालीची पत्नी होते. वालीच्या वधानंतर जरी मी सुग्रीवबरोबर राहत असले तरी मी त्याची पत्नी नाही. त्याने माझे अधिग्रहण केले आहे पाणिग्रहण नव्हे."
हे ऐकून रामास थोडा आश्चर्याचा धक्काच बसला आणि तो तारास म्हणाला, "पण देवी, धर्माला अनुसरून आता आपण सुग्रीवाची पत्नीच ठरता."
"नाही. धर्माला अनुसरायचे तर माझ्या पतीस सुग्रीवाने नव्हे आपण मारले आहे. त्यामुळे मजवर सुग्रीवाचा नव्हे तर आपला अधिकार आहे. माझी जबाबदारी आपण उचलावी हाच आपला धर्म ठरणार नाही काय?"
"हे कसे शक्य आहे? की जेव्हा मी जाणतो की सुग्रीवाने आपला पत्नी म्हणून स्वीकार केला आहे?"
"पत्नी तर दूर, सुग्रीवाने मला एका कुलीन स्त्रीचा देखील दर्जा दिलेला नाही. मी फक्त त्याच्यासाठी एक मादी आहे."
"हेही मला सत्य वाटत नाही. कारण मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की सुग्रीव हा एक अतिशय धर्माचारी मनुष्य आहे. दानधर्म, पूजा अर्चा, यज्ञ वैकल्ये असे सर्व धर्माचार तो करतो. तो असा दुराचार करणे कदापि संभव नाही."
"धर्माचार हा आपले मूळ दुर्गुण लपविण्यासाठी घेतलेला मुखवटा असतो. आपल्या काम पुरुषार्थाचे विकृत रूप लपविण्यासाठी धर्म पुरुषार्थाचा अत्याधिक दिखावा केला जातो. तुम्हाला आठवत असेल की वालीवधानंतर जेव्हा सुग्रीव आपणांस दिलेले मदतीचे वचन विसरून सुखलोलुप होऊन पडला होता तेव्हा आपले बंधू लक्ष्मण प्रचंड क्रोधीत होऊन जाब विचारण्यासाठी किष्किंधेस आले होते."
"हो मला आठवते, मीच लक्ष्मणास पाठवले होते."
"पण तुम्हाला हे ठाऊक नसेल की क्रोधीत लक्ष्मणाचा क्रोध घालविण्यासाठी सुग्रीवाने मला लक्ष्मणापुढे पाठवले होते. त्याने मला ही सूचना दिली होती की माझ्या दैवी सौंदर्याचा प्रभाव वापरून मी लक्ष्मणास कामोत्तेजीत करून रिझवावे. त्याला वाटते सगळे पुरुष त्याच्यासारखेच कामलोलुप असतील, मात्र आपला बंधू लक्ष्मण हा खरा धर्मपालक आहे. त्याने मला पाहताच 'माता' असे म्हणून माझे अभिवादन केले, आणि मग मी केवळ वार्तालाप करून किष्किंधेच्या भल्यासाठी सुग्रीवाची बाजू घेऊन लक्ष्मणास समजावले, आणि त्यानेही अत्यंत आदराने माझ्या बोलण्याचा स्वीकार केला. आता तुम्ही सांगा आपल्या स्वार्थापायी आपल्या स्त्रीस कुणाही परपुरुषाकडे पाठविणारा माणूस तिचा पती असू शकतो काय? माझ्यासारख्या पतिव्रतेच्या नशिबी हे आले कारण तुम्ही माझ्या पतिस अन्यायाने आणि अधर्माने ठार केलेत."
"नाही नाही तो अधर्म नव्हता. मी तर केवळ सुग्रीवावर अन्याय केल्याबद्दल वालीस दंड दिला."
"काय अन्याय केला होता वालीने सुग्रीवावर? उलट सुग्रीवानेच वालीस मारण्याचा प्रयत्न करून राज्यसत्ता आणि मलाही मिळविण्याचा कट केला होता. आपण शहानिशा न करता आपल्या स्वार्थासाठी सुग्रीवाची मदत केली. हा तुमच्या हातून घडलेला घोर अधर्मच होय. तुम्हामुळेच एका पतिव्रतेची अवस्था अशी झाली. तुम्ही माझे, वालीचे व आमच्या अंगदाचे देखील गुन्हेगार आहात. आणि या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. मी त्यासाठीच इथवर आले आहे. तुमच्या अधर्माचे भोग मी भोगत असताना तुम्ही इथे राजसुख आणि पत्नीसुख कसे काय भोगू शकता? मी तुम्हाला शाप देते की जसे तुम्ही लपून शरसंधान करून माझ्या पतीस ठार केले तसेच तुमच्या पुढील जन्मी माझा पति वाली हा लपून शरसंधान करून तुमचेही जीवन संपवेल. मात्र ही झाली केवळ वालीच्या वधाची शिक्षा, जे मी आणि माझा पुत्र भोगत आहोत त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला मी अजून एक शाप देते की तुमच्या पत्नीच्या प्रसूतीसमयी तुमच्या जन्मणाऱ्या मुलाचा आणि पत्नीचा असा दोहोंचाही मृत्यू होईल. 

राम हे भयंकर शाप ऐकून अत्यंत चिंतेत पडला पण दुसऱ्याच क्षणी स्वतःस सावरीत म्हणाला की देवी आपणांस माहीत असेलच की वर अथवा शाप हे केवळ वल्गना नसून ते करार असतात. या करारांची स्वीकृती ही वैश्विक असल्याने शाप अथवा वर देण्याचा अधिकार प्रत्येकास मिळालेला नाही. केवळ काही विशिष्ट गुणांचे अधिग्राही अथवा विश्वमान्य अधिकार असलेली व्यक्तीच शाप देऊ शकते. वैश्र्विक अनुशंगात आपणांस असा अधिकार नाही तेव्हा आपला शाप कोणत्याही कराराने मज लागू होणार नाही.
"आपण एक गोष्ट विसरता आहात श्रीराम. मी समुद्रमंथनातुन प्रकट झालेली अप्सरा स्त्री आहे आणि समुद्रमंथनातील १४ रत्नांप्रमाणेच या महान प्रयोगातच प्रकट झाल्याने मलाही आपसूकच काही वैश्विक अधिकार मिळाले आहेत ज्यायोगे मी तीन वर अथवा तीन शाप देऊ शकते ज्यांची पूर्तता करणे हे वैश्विक शक्तींस बंधनकारक आहे. तुम्हास हे शाप भोगावेच लागतील."
हे ऐकल्यावर रामास अगदी शरीरातून प्राणच निघून गेल्यासारखे वाटले. शापांच्या परिणामांची तीव्रता जाणवून तो गयावया करीत तारास म्हणाला, "माफी असावी देवी, आपल्या प्रथम शापाप्रमाणे जे भोगायचे असेल ते मी स्वतः भोगतो. पण कृपया आपल्या द्वितीय शापातली माझ्या चुकीची शिक्षा माझ्या पत्नी आणि होणाऱ्या बाळास देऊ नये. कारण यात त्यांची काही चूक नाही."
तारा म्हणाली,  "माझी काय चूक होती श्रीराम? आणि माझा अंगद आणि माझे पति यांची तरी काय चूक होती?"
"पण माझे बाळ तर अजून जन्माला यायचे आहे. निदान त्याच्यासाठी तरी हा शाप मागे घ्यावा. आपणही एक माता आहात. आपण माझ्या पत्नीचे दु:ख समजू शकता." 
"ठीक आहे केवळ माझ्या मातृत्वास आपण आवाहन केलेत म्हणून मी उ:शाप देते की तुमची पत्नी व होणारे मूल जगेल, मात्र त्यासाठी तुम्हास आपल्या पत्नीचा उद्याच त्याग करून तीस आणि तुमच्या होणाऱ्या बालकास चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवावे लागेल."
"हे तर मृत्यूइतकेच भयंकर आहे. गर्भार पत्नीस अशा अवस्थेत त्यागण्यापेक्षा मला मरण आले तर ते उत्तम. हा उशा:प नव्हे हाही शापच आहे. कृपया असे करू नये."
"नाही श्रीराम, मी आता शाप आणि उ:शाप असे दोन्ही उच्चारले आहेत. त्यात बदल होऊ शकत नाही हे तुम्ही जाणता. तुमच्या चुकीची शिक्षा म्हणून आता त्याचे दुःख भोगायला तुम्ही तयार व्हा. हा उ:शाप देण्याचाही माझा एक उद्देश आहे. तो असा की जेव्हा आपण आपल्या गरोदर पत्नीस वनवासात पाठवाल तेव्हा सीता आणि इतर प्रजाजनदेखील तिस अशा अवस्थेत त्यागण्याचे कारण आपणांस विचारतील. त्यावेळी मग त्याचे कारण सांगताना सुग्रीवाचा मला अशी वागणूक देणारा चेहरा जगापुढे आलेला मला पहायचा आहे." असे म्हणून तारा तशीच माघारी फिरली आणि निघून गेली.

एवढे कथन जसेच्या तसे करून वाल्मिकी सीतेकडे वळले आणि म्हणाले, "हेच सत्य आहे सीते, आणि ते बदलणार नाही."
"मुनीवर सत्य बदलो वा न बदलो, इतिहास नक्कीच बदलला जाऊ शकतो. रामप्रभूंनी माझ्याकडून वचन घेतले होते की काहीही झाले तरी सितात्यागाचे निमित्ताने सुग्रीवावर लांछन लागता कामा नये, कारण सुग्रीवाने संकटसमयी एक मित्र बनून प्रभुंची मदत केली होती. भलेही यास्तव रामप्रभू  स्वतः लांछित झाले तरी त्यांस ते मान्य असेल."
सीतेने हे सांगितल्यावर वाल्मिकी म्हणाले, "पण सीते मी सत्य जाणत असताना माझ्या काव्यात असत्य कथन करू शकत नाही."
"नाही मुनिवर, मी तुमची मानसकन्या तुम्हाकडे एवढीच मागणी करते की तुम्ही ताराचा व सुग्रीवाचा या प्रसंगात उल्लेखही करू नये. नाहीतर मला माझ्या प्रभूंनी दिलेले वचन भंग केल्याबद्दल प्राणत्यागाशिवाय इतर कुठलेही प्रायश्चित्त समोर दिसत नाही."
सीतेचे हे बोल ऐकून मग महर्षी वाल्मिकी अगदी निशब्द झाले. बराच वेळ तसेच  उभे राहून मग शेवटी नुसतेच सीतेच्या मस्तकावर हात फिरवून काहीसा अस्पष्ट आशीर्वाद पुटपुटत कुठल्याशा गहन विचारांत ते तिच्या कुटीच्या बाहेर आले. हा प्रसंग लिहिणे तर गरजेचे होते, कारण लव कुशासारखी कुशाग्र बुद्धीची बालके, या प्रश्नाचे उत्तर मिळविल्याशिवाय शांत बसणार नव्हती.

मग ते लागलीच आपल्या कुटीत गेले आणि एक नवे भूर्जपत्र घेऊन त्यावर काय लिहावे या विचारात गढून गेले. ते तसे काय लिहावे याचा विचार करत बसलेले असतानाच, स्वानंद नावाचा त्यांचा एक शिष्य तिथे आला, त्याने कसलेसे एक गाठोडे बांधून आणले होते, ते त्याने गुरुजींना दाखवले आणि म्हणाला, गुरुजी हे पहा ना ही किती तलम आणि मऊ वस्त्रे आहेत, आपण अशी वस्त्रे का परिधान करत नाही? महर्षींनी ती वस्त्रे पाहिली, ती सुती आणि रेशमी वस्त्रे होती, ती पाहून त्यांना थोडे आश्चर्यच वाटले. त्यांनी स्वानंदास ती पुन्हा बांधून ठेवण्यास सांगितली आणि म्हणाले, ही आपली वस्त्रे नाहीत बाळा, ज्ञानोपासना करणाऱ्या लोकांनी वल्कले नेसायची असतात, ही तर सुखवस्तू लोकांची वसने आहेत. ती त्यांना शोभतात आपणांस नव्हे. कुठून मिळाली तुला ही वस्त्रे?
गुरुजी आज ना नदीवर एक मनुष्य आणि त्याचा लहान पुत्र भेटले, त्याचा पुत्र पाण्यात पडला तेव्हा मी पाण्यात उडी मारून त्यास वाचवले, म्हणून त्या मनुष्याने मला हे बक्षीस दिले.
अरेरे हे काय केलेस तू बाळ? गरजूंस मदत करणे हे तर आपले कर्तव्यच आहे, त्याचा मोबदला घेणे हा अधर्मच होय, तर मग जा बरे, लवकर त्यास गाठ आणि विनम्रतापूर्वक त्याची ही भेट त्यास परत करून ये.
असे महर्षींनी म्हणताच स्वानंद लागलीच ते गाठोडे घेऊन बाहेर निघाला. तेवढ्यात कुटीच्या बाहेर पडणाऱ्या स्वानंदाला महर्षींनी हाक मारून पुन्हा विचारले,
"अरे तो मनुष्य कोण होता? त्याला नाव वगैरे विचारलेस की नाही?"
"त्याने काही नाव सांगितले नाही, केवळ मी परीट असून, पूर्वेच्या कुठल्याशा राज्यात व्यवसायासाठी निघालो आहे असे त्याने सांगितले. जाऊ मी आता गुरुजी? अन्यथा तो परीट दूर निघून जाईल." महर्षींनी त्याला लगेच जाण्यास संमती दिली आणि स्वानंद लगबगीने निघाला. 
पाठमोऱ्या स्वानंदला पाहत असतानाच महर्षींनी कधी नकळत त्यांचा टंक हातात घेतला हे त्यांनाही कळाले नाही, बहुदा त्यांना तो प्रसंग नव्याने लिहिण्यासाठी काहीतरी सुचले होते.