जंगल बुकचे जे कार्टून लहानपणी यायचे ते आता आलेल्या चित्रपटापेक्षा लय
भारी होते. मी टारझनची गोष्ट सुद्धा खूप लहानपणी वाचली होती त्यामुळे
लहानपणापासून मी कधी एखाद्या जंगलात गेलो की मला वाटायचे काय घ्यावे इथेही
कोणी मोगली किंवा टारझन सापडेल. नंतर थोडे मोठे झाल्यावर असे होणे शक्य
नाही हे कळू लागले. कोणीही प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या मुलाला पाळू शकत
नाही.
कोकीळ आणि कावळ्याची गोष्ट मला कळल्यावर मला पुन्हा उत्सुकता
जागृत झाली. जशी कोकीळ आपली अंडी कावळीच्या घरट्यात घालते आणि कावळी
कोकिळेची पिल्ले स्वतः:ची समजून वाढवते तसे माणसालाही प्राणी वाढवू शकतील?
मग वाटले असे होऊ शकेल पण केवळ साधर्म्य असलेल्या प्राण्यांत म्हणजे
एखाद्या कुत्र्याला कोल्हे किंवा लांडगे वाढवू शकतील कारण ते सारखे दिसतात,
पण कुणी माणसाला वाढविणे शक्य नाही. अगदी माकडांनी सुद्धा माणसांना वाढवणे
अवघड आहे कारण एनाटॉमी बहुतांशी सारखी असली तरी माणसाच्या अंगावर केस नसणे
व माणसाला शेपटी नसणे हे फार मोठे फरक आहेत.
एकदा डिस्कव्हरीवर मी
दोन डॉक्युमेंटरी पाहील्या, एके डॉक्युमेंटरीत एक चित्ता एका हरीणाच्या
पिलाचे रक्षण करत होता, तर दुसरीत एक सिंहीण देखील एका हरिणाच्या पिल्लाला
पाळीत होती. सिंहीणीची गोष्ट तर अतिशय हृदयस्पर्शी होती. त्या पिलासाठी
तिने तिची टोळी सोडली कारण दुसऱ्या सिंहांनी त्या पिलाला मारले असते. तिने
१५ दिवस शिकार सुद्धा केली नाही कारण त्यासाठी त्या पिलाला एकटे सोडावे
लागले असते. शेवटी एका मोठ्या सिंहाने तिला गाठून त्या पिल्लावर झेप घेतली.
तिने मुकाबला केला पण शेवटी तो राजा सिंह होता त्याने त्या पिलाला
क्षणार्धात फाडून टाकले. डिस्कव्हरीवाले ग्रेट आहेत त्यांनी हे सगळे
कॅमेऱ्यात कैद केले होते.
आता मी पुढे सांगणार आहे ती सत्य घटना १९२०ची आहे. बंगालातल्या मिदनापूरची.!!
मिदनापूरच्या जंगलातील एक गावाच्या लोकांनी दोन विचित्र प्राणी पाहीले. ते
दोन प्राणी एका लांडग्यांच्या टोळीत होते. डोक्यावर लांब केस, अंगावर खवले
असल्यासारखी त्वचा असे काहीसे ते प्राणी होते. गावकरी त्यांना भुते समजले.
कारण ते प्राणी ऐन रात्रीच्या वेळीच त्या लांडग्यांच्या टोळीबरोबर
धावताना, फिरताना नजरेस पडले होते. या प्राण्यांची बातमी मग पोचली ती
रेव्हरँड सिंग यांचेपर्यंत. तेही उत्सुकतेपोटी या दोन प्राण्यांना पहायला
मिदनापूरला आले. त्या विचित्र प्राण्यांना ठार करण्यासाठी म्हणून जंगलात
जिथे ते प्राणी अनेकदा दिसले होते तिथल्या जलाशयाभोवती लख्ख चांदण्या
रात्री एक मचाण बांधून ते दबा धरून बसले. अपेक्षेप्रमाणे ती लांडग्यांची
टोळी आली त्यात ते दोन प्राणीही होते. सिंग यांनी बंदुकीचा नेम लावला, आणि
मग ते अचानक थांबले. कारण त्यांना दिसले की ते कोणतेही विचित्र प्राणी अथवा
भुते नसून त्या दोन मानवी मुली होत्या. डोक्यावर अत्यंत गुंता झालेले आणि
मळके विस्फारलेले केस आणि अंगावर मळाची पुटावर पुटे चढलेली असल्याने
त्यांची त्वचा खवल्यांसारखी दिसत होती.
मग सिंग यांनी गावकऱ्यांना
हे सांगून त्या दोन मुलींना त्या लांडग्यांच्या तावडीतून सोडवायचा निर्धार
केला. मग त्यांनी त्या लांडग्यांच्या गुहा शोधून काढल्या. त्यांना दिसले की
एका गुहेत त्या दोन मुली एका मादी लांडग्याबरोबर तिच्या पिल्लांसह राहत
होत्या. त्यातली एक मुलगी फक्त २ वर्षांची तर एक ८ वर्षांची होती. जेव्हा
माणसांनी त्या लांडग्यांना हाकलून देऊन त्या मुलींना पकडायचा प्रयत्न केला
तेव्हा आधी तर लांडगे आणि त्यांचेबरोबर त्या मुलीही पळून गेल्या. नंतर
त्यांना कोंडीत पकडल्यावर जेव्हा त्या लांडग्यांना कळले की माणसे त्या दोन
मुलींना पकडू पाहत आहेत तेव्हा त्यांनी जोरजोरात हल्ले करून माणसांना
त्यांच्याजवळ येण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. ते लांडगे त्यांना
आपल्यातलेच समजत होते. विशेषतः: त्या दोन्ही मुलींची आईच झालेली जी मादी
लांडगा होती ती तर काही केल्या माणसांना त्यांच्या जवळ येऊच देईना. जखमी
होऊनही ती पूर्ण शक्तीनिशी त्यांचे रक्षण करतच राहीली. इतर लांडगे पळून
गेले पण तिने त्या मुलींना सोडले नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल पण जंगल
बुकमध्ये शेरखान माणसांबद्दल जे बोलतो ना ते अगदी शंभर टक्के खरे आहे. कारण
शेवटी सिंग यांनी त्या मुलींच्या त्या लांडगा आईला गोळी घालून ठार केले
आणि मगच ते त्या दोन मुलींना घेऊन जाऊ शकले. मरताना त्या आईला काय वाटले
असेल, त्या दोन मुलींना त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई पाहून काय
वाटले असेल आणि त्या आईच्या बाकी पिलांचे पुढे काय झाले असेल हे प्रश्न आपण
स्वतः:ला विचारायचे नाहीत, कारण या पृथ्वीवर काय योग्य आणि काय अयोग्य हे
आपण आपल्या सोयीप्रमाणे ठरवायचे असते, हे प्रश्न स्वतः:स विचारणे आपणांस
गैरसोयीचे आहे. ती लांडगा आई ज्या भीतीपोटी मुलींना माणसांच्या ताब्यात
जाण्यापासून रोखत होती तिची ती भीती खरी ठरली असेल का? त्या मुलींचे
माणसांत येऊन भले झाले असेल?
श्री सिंग हे त्या मुलींना ते स्वतः:
चालवत असलेल्या अनाथाश्रमात घेऊन गेले. त्या दोन मुली एकमेकींच्या खऱ्या
बहीणी नव्हत्या. लांडगे गावातील मुलांना पळवून नेऊन मारून खाण्याच्या घटना
तेव्हा कित्येकदा घडत. कसे कुणास ठाऊक पण या दोन वेगवेगळ्या वेळी आणि बहुदा
वेगवेगळ्या ठिकाणांहून पळवून नेलेल्या मुलींना लांडग्यांनी ठार न मारता
सांभाळले होते. सिंग यांनी त्या दोघींना कमला आणि अमला अशी नावे दिली. त्या
मुली चार पायावरच चालत (दोन हातांना त्या पुढचे पायच समजत). त्यांना दोन
पायांवर उभे राहताच येत नसे चालणे तर दूरच. त्या घातलेले कपडे फाडून टाकत.
भिंतीवर किंवा कुठेही नखांनी ओरखडून ठेवत. पाणी दिले की ते खाली ओतून चाटून
पीत. त्यांची त्वचा अतिशय राट झालेली होती. त्यांना तूप लावून त्वचा मऊ
करण्याचा सिंग यांनी प्रयत्न केला. त्या फक्त कच्चे मांस खात. त्यांची
श्रवणशक्ती अतिशय तीक्ष्ण होती, अगदी दूरवरचे छोटे छोटे आवाजही त्यांना ऐकू
येत. आणि त्यांची वास घेण्याची क्षमता तर अफाट होती. अगदी ५० ते ७० मीटर
अंतरावर ठेवलेल्या कच्च्या मांसाचाही त्या बरोबर वास ओळखत. मध्यरात्रीनंतर
त्या लांडग्यांसारख्या तोंड वर करून ओरडत. त्या दोघी नेहमी सोबतच राहत आणि
जमिनीवरच मुटकुळे करून एकमेकींस बिलगून झोपत.
सिंग यांनी त्यांना
अनेक मानवी गोष्टी, सवयी शिकविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्यातच छोटी
अमला काही दिवसांतच आजारी पडून मरण पावली. ती मेल्यावर कमला अजूनच प्रचंड
निराशेत गेली. पुढील जवळ जवळ आठ नऊ वर्षात कमला जास्तीत जास्त २० ते ३०
मानवी शब्द शिकू शकली. मानस शास्रज्ञांनी कमलाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न
केला, वेगवेगळ्या उपायांनी तिला शिकविण्याचा प्रयत्न केला पण ती काही शिकू
शकली नाही. आमच्या बालपणी जवळ जवळ याच वयात म्हणजे पाचवीत आम्ही इंग्रजी
आणि हिंदी अशा दोन भाषा शिकलो पण कमला काहीही शिकू शकली नाही. असे कसे काय
झाले असेल? आठेक वर्षे लांडग्यांच्या सानिध्यात राहील्यावर भाषा शिकणे हा
मानवी गुणधर्म ती मुळातूनच गमावून बसली होती काय? असे म्हणतात की कमलाला
बघायला लोक येत तेव्हा सिंग कदाचित त्यांचेकडून पैसे घेत आणि या देशी
परदेशी उच्चभ्रू पाहुण्यांसमोर सिंग यांना हवे तसे कमलाने वागावे म्हणून ते
तिला मारहाण सुद्धा करीत. काही जण तर या एकंदर कहाणीवरच शंका घेतात. मात्र
एका परदेशी बिशपने कमलाला दोन वर्षे पाहिल्याची नोंद करून ठेवलेली आहे.
सिंग याने कमलाचे काही फोटोही काढलेले आहेत.
१९२०ला ही कहाणी सुरू
झाली तेव्हा सगळ्या जगातच मोठी खळबळ माजली होती, मात्र अमलाच्या दुर्दैवी
मृत्यूनंतर मानवी गुणधर्म न शिकताच किंवा न स्वीकारताच म्हणा पण कमलासुद्धा
अल्पकाळातच १९२९ साली मरण पावली. त्या लांडग्यांच्या टोळीबरोबरच त्या दोघी
अधिक चांगल्या रीतीने राहू शकल्या असत्या का? त्यांना माणसात आणणे हे आपण
सामाजिक आणि मानवीय दृष्ट्या योग्य मानू पण स्वतः: त्या दोघींसाठी ते योग्य
होते का? अमेरिकेत एका मानसशास्त्रज्ञाने एका चिंपांझीस शंभर एक शब्द
शिकवले होते तो चिंपांझी त्यांची साधी साधी तीन शब्दांची वाक्ये सुद्धा
बनवू शकत होता. पण कमलाला हे का शक्य झाले नसेल? कमला आणि अमलाची ही कहाणी
वाचल्यावर कळते की जीवन किंवा सुख जे आपण समजतो त्याहुनही कदाचित कितीतरी
वेगळे काहीतरी असावे. आपण कोण असतो? आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या
वातावरणाच्या समाजाच्या प्रभावाने घडलेले जीव असतो का? लांडग्यांच्या
समाजात राहून आपण माणूस असूनही सर्वार्थाने लांडगे होत असू तर आपल्या
येणाऱ्या पिढ्यांना आदर्श सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी त्यांचेसाठी त्याच
दृष्टीने तसेच पोषक सामाजिक वातावरण आपण त्यांना द्यायला नको का? आपण हे
असे भ्रष्ट, स्वार्थी, भेदभावाने, द्वेषाने आणि हिंसेने लिडबिडलेले सामाजिक
वातावरण त्यांच्यासमोर ठेऊन ते पुढे शांतीने, सौहार्दाने व सुरक्षित
राहतील अशी अपेक्षा ठेऊ शकतो का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा