हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

The evolution of god and religion - in seven generations (देवाची उत्क्रांती)

जशी सजीवांची उत्क्रांती होत असते तशी मानवी समाजात देवाची आणि त्याच्या जोडीने धर्मांचीही उत्क्रांती होत गेलेली आहे. देवाचा जन्म कसा झाला हे युवाल हरारीने 'सेपियन्स' मध्ये छान सांगितले आहे. त्यामुळे आपण सरळ तो कसा बदलत गेला याची ढोबळ सात जनरेशन्समध्ये टाइमलाईन बघू. तशी देव ही संकल्पना इतकी कॉम्प्लेक्स होत होत इव्हॉल्व्ह झाली आहे की त्याचे ७०० वा अगदी ७००० जनरेशन्स मधेही परफेक्ट वर्गीकरण होणार नाही. त्यामुळे हे अगदीच ढोबळ निरीक्षण आहे हे लक्षात घ्यावे.  
सगळ्यात आधी फर्स्ट जनरेशनचा देव ही एक अदृश्य शक्ती होती. आणि तो कुठेतरी वर आकाशात स्वर्ग नावाच्या काल्पनिक जागेत राहत होता व तिथूनच मानवाच्या जीवनाला प्रभावित करत होता. पण या कल्पनेला खूप दिवस झाले. त्यात काही थ्रिल राहीले नाही. असा कसा देव जो कसा दिसतो तेही माहीत नाही? देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसला पाहीजे ही कल्पना प्रबळ होऊ लागली. मग दुसऱ्या जनरेशन मध्ये सूर्य, आकाश, चंद्र, पाऊस हेच देव आहेत असे जगातल्या सगळ्या संस्कृतींत सांगण्यात आले. आता देव अदृश्य मधून दृश्य स्वरूपात तर आला, पण लवकरच हे सगळे सुद्धा अगदीच सामान्य होऊन गेले. सूर्य असो की आकाश की इतर काही असे विश्वाचा भाग असलेले देव, ते नित्याचेच होते आणि काहीच वेगळे करत नव्हते. आता देवाला नुसते दृश्य नाही तर ऍक्टिव्ह सजीव/मानवी रूप दिले पाहीजे आणि त्याने याच रूपातून विश्वाची निर्मिती वा संचलन केले पाहीजे ही नवी कल्पना समोर आली आणि तिसऱ्या जनरेशन मध्ये मग ग्रीकचा केऑस वा भारताचा ब्रम्हा असे अनेक मानवसदृश सजीव स्वरूप घेतलेले देव निर्माण झाले. या जनरेशनच्या देवांचे जन्म कुठेतरी अतर्क्य ठिकाणी, अतर्क्य पद्धतीने होत होते (म्हणजे पित्या व मातेपासून होत नव्हते). आणि या जनरेशनचे देव लाखो करोडो वर्षे राज्य करत होते. उदाहरणार्थ चीनच्या 'युहांग' या देवाने १७५० इऑन इतका काळ राज्य केले. एक इऑन म्हणजे एक लाख ३० हजार वर्षे. असेच काहीसे अचाट कालमापन आपल्याकडेही युग वगैरे कल्पनांच्या बाबतीत सुद्धा आहे. इतकेच काय तर या देवांना जी मुले होत होती तीही नेहमीच्या पद्धतीने होत नव्हती. ती मुले उपजत नव्हती तर तयार केली जात होती. अशा प्रकारे मग कुणी टायटन्स जन्माला घालत होता तर कुणी सूर्यचंद्र. पण कल्पनेत का होईना मानवसदृश रूपात आले असले तरी अजूनही हे सगळे देव माणसाच्या संपर्काच्या बाहेर होते. त्यामुळे त्यांचाही प्रभाव कमी होऊ लागला. मग देव आपल्याला डोळ्यांनी दिसला पाहीजे ही कल्पना तर मानवाच्या मनात आलीच पण तो प्रत्यक्ष आपल्यात आला पाहीजे, या पृथ्वीवर वावरला पाहीजे अशी साधारण लोकांची भावना होऊ झाली. आता पहील्या जनरेशनचा अदृश्य/रूप नसलेला देव असो वा दुसऱ्या तिसऱ्या जनरेशन मधला रूप असलेला मात्र कुठल्यातरी अनएक्सेसिबल ठिकाणी राहणारा देव असो, तो लोकांना जास्त रुचेना. हळूहळू मानवाची बौद्धिक वैचारिक पातळी वाढू लागल्याने या तीन जनरेशन्सच्या देवांवर प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली.
मग आले चौथ्या जनरेशन मधले देव अवतार रूपात पृथ्वीवर. आता देवांनी माणूस म्हणूनच जन्म घेतला जेणेकरून तो लोकांना अधिक आपलासा वाटावा. मग एक साधारण माणूस म्हणून जन्मलेला कृष्ण गीतेत म्हणाला की मीच देव आहे. जगातल्या अनेक संस्कृतींत अनेक जण देव म्हणून घोषित झाले. तेच राजे झाले, मग त्यात भारताचा कृष्ण असो की मेसोपोटेमियाचा नरामसन. खूप वर्षे हे देव चालले. माझ्यामते देवाच्या मानवी अवताराला (म्हणजे खरेतर राजाला) प्रत्यक्ष असलेल्या शहरांशी/ठिकाणांशी जोडण्याची कल्पना सगळ्यात श्रेष्ठ होती कारण रामानंतरही कित्येक वर्षांनी लोक अयोध्या वा पंचवटी हे प्रत्यक्ष पाहू शकत होते. ही अशी मथुरा, जेरुसलम, मक्कासारखी जिऑग्राफिकल लोकेशन्स देवाशी निगडित करण्याच्या कल्पनेमुळे देवाचा प्रभाव कित्येक पिढ्यांपर्यंत कायम राहू शकत होता. म्हणजे देव कुठल्यातरी अतर्क्य आणि न दिसणाऱ्या स्वर्ग या ठिकाणाहून आधी सूर्य पाऊस आदी रूपांत दृष्टीक्षेपात म्हणजे आकाशात आला. आणि पुढे तर तो थेट पृथ्वीवर मानवी शहरांतच आला. पण देव पृथ्वीवर आला आहे आणि तरीही तो आपल्याला हवे तसे का करत नाही? अशी लोकांची भावना झाली. देव इतका कमजोर आहे का? की तो प्रत्यक्ष पृथ्वीवर येऊनही इथले दुःख संपवू शकत नाही? बरे हा देव स्वतः राजा/सम्राट बनतो पण आम्हाला मात्र गरीबच ठेवतो. अशी जागरूकता समाजात येऊ लागली. मग यातून लोकांना पटेल असा देवाच्या ऑथॉरिटीचा दुसरा मार्ग शोधण्याची धडपड चालू झाली आणि मग आला पाचव्या जनरेशनचा येशू ख्रिस्त. त्याने सांगितले की मी देव नाही तर देवाचा पुत्र आहे. तोही सम्राट वगैरे नाही तर लोकांहून गरीब, भणंग फकीर असलेला पुत्र.! अर्थातच देवापेक्षा देवाच्या पुत्राकडून लोकांनी कमी अपेक्षा करायला हवी. पण नाही, नेपोटीजमला अगदी आजपर्यंत मानवी समाजात किती महत्व आहे हे आपण पाहतोच. त्यामुळे देव नाही देवाचा पुत्र असला तरी त्यानेही तेवढेच चमत्कार केले पाहीजेत अशी लोकांची अपेक्षा झाली. आता रे ब्वा? मग आता यातून मार्ग काढण्यासाठी पुढच्या सहाव्या जनरेशन मध्ये आले प्रेषित मुहम्मद. त्यांनी सांगितले की ना मी देव आहे ना मी देवाचा पुत्र आहे. मी फक्त देवाचा प्रेषित म्हणजे मेसेंजर आहे. मी काही चमत्कार करणार नाही. जे करायचे ते देव करणार. मी फक्त देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पोचवणार. आता फक्त देवाचा संदेश पोचवणारा प्रेषित आला आहे म्हंटल्यावर चमत्कार वगैरे करण्याचा काही प्रश्नच राहत नाही वा आपल्या अडचणी सांगून देवाला जबाबदार ठरवण्याचाही प्रश्न येत नाही. प्रेषित हा मुख्यत्वे एकमार्गी संदेशवाहक असतो. म्हणजे फक्त देवाचा संदेश माणसांना पोचवणारा. माणसांचे संदेश देवापर्यंत पोचवणे हे त्याचे काम नोहे. ही प्रेषिताची संकल्पना तशी खूप काळ अनचॅलेंज्ड रहायला हवी होती पण लवकरच यांनतरही मग नवी कल्पना घेऊन आले सातव्या आणि लेटेस्ट जनरेशनमध्ये गुरु नानक. ते ना देव होते, ना देवाचे पुत्र, ना देवाचे प्रेषित. ते फक्त देवाचा संदेश चांगल्या रीतीने समजावून सांगणारे गुरु होते.  
काळानुसार प्रबोधन आणि एकंदर प्रगतीमुळे मानवी समाज बऱ्याच अंशी वैचारिक दृष्ट्या प्रगत होत गेला. आणि या सगळ्या देव वगैरेंसारख्या गोष्टींबद्दल त्याच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. एकंदर देवाच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या ऑथॉरिटीवर आक्षेप घेण्याची किंवा प्रूफ मागण्याची लोकभावना कालानुरूप अधिकाधिक रुजू लागली. जशी जशी पुढची पिढी हुशार होत जाईल तशी तशी या ऑथॉरिटीची जवाबदेही देखील वाढत राहील आणि पुढे घोषित होणाऱ्या प्रेषित अथवा गुरूंवर म्हणजे पर्यायाने देवावरच प्रश्न उपस्थित होतील म्हणूनच मग माझ्यानंतर कोणीही प्रेषित होणार नाही हे प्रेषित मुहम्मद यांनी आणि गुरु ग्रंथ साहीब हेच इथून पुढे गुरु राहतील, नवे गुरु जन्माला येणार नाहीत असे गुरु गोविंद सिंग यांनी जाहीर केले. सातव्याच जनरेशनमध्ये घेता येतील अशा दलाई लामांच्या प्रथेलाही कदाचित लवकरच असा कायमस्वरूपी अंत मिळेल. 

आधी सांगितल्याप्रमाणे देव संकल्पनेचा इतका बहुरंगी आणि व्यापक विस्तार झाला आहे की आज देव या संकल्पनेची केवळ एक सर्वमान्य अशी व्याख्या सुद्धा होऊ शकत नाही. इतकेच नाही तर इतके प्रबोधन व वैचारिक जागरूकता होऊनही आजही अगदी पहील्या जनरेशन पासून ते सातव्या जनरेशन पर्यंतच्या प्रत्येक व्हर्जनला मानणारे कोट्यवधी लोक आहेत. काही जुन्याच स्वरूपाला मान्य करणारे आहेत, काही जुन्या नव्या दोन्ही स्वरुपांना मानणारे आहेत तर काही नव्या स्वरुपांना मानणारे आहेत. जोपर्यंत भीती, असहायता किंवा अज्ञान या गोष्टी राहतील तोपर्यंत जुन्या/नव्या स्वरूपात देव हे टिकूनच राहतील. त्यामुळे इथून पुढेही देवांचे हे इव्होल्यूशन चालूच राहील. पण हे खरे की देवाचे इव्होल्यूशन हे एका अदृश्य अतर्क्य चमत्कारी शक्तीपासून आता अधिकाधिक मानवी आणि बिना चमत्कारी स्वरूपाचे होत चालले आहे. पुढे कधी जेव्हा ते तंतोतंत मानवी होईल तेव्हा देव नष्ट होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा