उद्गारवाचक चिन्हांत इटालीक्समध्ये अशा कवितेच्या अथवा प्रसिद्ध सुविचाराच्या, विषयाशी काहीही संबंध नसलेल्या दोन ओळी एकदा निबंधाच्या सुरुवातीला, एकदोनदा मध्ये आणि एकदा शेवटी लिहिल्या की पैकीच्या पैकी मार्क मिळायचे, म्हणून हे लिहिलेय. बाकी विषय थोडा आक्षेपार्ह आहे, त्यामुळे वैधानिक चेतावनी देतो आहे की लिहिणाऱ्यासारख्या निगरगट्ठ लोकांनीच पुढे वाचावे.
....
तर फार फार पूर्वी, एक "फार फार अवे" नावाचे गाव होते (गावाचे नाव इंग्रजीत आहे, कारण जंटलमनांनो, कथा फार फार ग्लोबल करावयाची आहे). तिथे फार फार विचित्र लोक राहत असत. गावात कुणाचीही ओळख त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वाने फार फार क्वचितच होई. प्रत्येकजण हा त्याच्या खानदानी ओळखीनेच जाणला जाई. कोण रे तू? हा प्रश्न कुणाला फार फार नशिबानेच विचारला जाई. नेहमी "कंच्याचा रे तू?" हाच सवाल झडे. मग उदाहरणार्थ उत्तर असे, "शामराव कुऱ्हाड्याचा".!! "आसं आसं, म्हंजे त्या खानावळीवाल्या शाम्याचा का?" असे विचारून मग तो परिचय पूर्ण होई. कुणी फार फार वृद्ध असेल तर त्याहीपुढे जाऊन "म्हंजी तू त्या गज्याच्या शाम्याचा का रे? गज्या अजून हाये की गेला? अशी ओळखीबरोबरच जोड विचारपुस्ती करून टाकी. कुणी तर फार फार वृद्ध असण्याबरोबरच फार फार अनुभवी आणि फार फार माहीतगार असे. तो मग विचारी, "म्हंजे तूवा बा शाम्या हा त्या गज्याच्या कोणत्या बायकुचा रं? घारगाववालीचा, का त्या वाण्याच्या मागंलागीचा?" (घारगाववाली म्हणजे जिचे माहेर घारगाव आहे ती. आणि मागंलागी म्हणजे विवाहबाह्य फार फार उफाळलेल्या प्रेमाखातर घरात आणलेली/आलेली). या प्रश्नात तसा फार फार मोठा अपमान वगैरे नसे. पण सोबतीला दुसरे मित्र असले की पोरे थोडी ओशाळत, आणि मग फार फार खालच्या आवाजात, "त्या दुसरीचा.!" असे उत्तर देत.
फार फार अवेमधल्या त्या फार फार विचित्र लोकांची मुले तर फार फार निरुद्योगी आणि म्हणूनच फार फार उपद्व्यापी होती. ही मुले जेव्हा तेव्हा आपापल्या खानदानाचा यथोचित उद्धार करण्यात फार फार तरबेज होती. नेहमी काही ना काही कुटाळक्या, लफडी करताना पकडले जात आणि मग त्यांच्या बापाच्या, आज्याच्या नावाचा जिकडे तिकडे गावभर फार फार गाजावाजा होई. एकंदर काय तर गावात पुरुषप्रधान नव्हे तर बापप्रधान संस्कृती होती.
म्हणजे तशी गावात ही पद्धत पारंपारीक नव्हती, पण टारगट पोरांची अनेक टोळकी होती, ते एकमेकांना सदानकदा बापाच्या नावानेच हाक मारीत. पण मोठ्यांना कळू नये अशा ठिकाणीच हे चाले. एकमेकांच्या घरी गेल्यावर स्वनामाचाच पुकारा केला जाई. फार फार तर कुजबुजलेल्या स्वरात अगदी बोलण्यात फार फार निकड भासत असेल तरच बापाचे नाव घेतले जाई. म्हणजे 'प्रकाश गणपत गोर्डे' याला टोळीतले लोक "गणप्या" म्हणूनच हाक मारणार. फार फार तर "ए गणप्याच्या" असे म्हंटले जाई.!! आता हा गणप्या म्हणजे 'गणपत खाशाबा गोर्डे' हा तसा बँकेत मोठा साहेब बरेका. त्यामुळे गावात "गणपत रावसाहेब" अशाच संबोधनाने तो फार फार प्रसिद्ध.! पण बाप जेवढा मोठा, तेवढी टोळक्यात पोराच्या पित्रोद्धाराची शक्यता मोठी होई. त्यामुळेच 'प्रकाश गणपत गोर्डे' हा इसम फार फारदा '"बेवडा गणप्या" अथवा "बेवड्या गणप्याचा"ने संबोधला जाई. एखादा गरीब बिचारा असेल तर केवळ "गणप्या"ने काम भागे. तसा हा बापनामाचा जप अगदी सर्रास चाले बरे का, पण फार फार सफाईने. म्हणजे गावातली मोठी माणसे वगळता हा प्रकार सगळ्यांच्या पुढे बोभाटपणे केला जाई. इतक्या खुलेआम हे चाले की इतर कित्येक अनोळखी लोकांना तर कधीच कळायचे नाही की या मुलांची खरी नावे काय आहेत. टोळक्याकडे फार फार आकर्षित झालेली नवी मुले, पोरांमध्ये मधून मधून फार फार मिसळू पाहणारे काही चाळीशी-पन्नाशीचे लोक, हे तर बापाची नावे हीच पोरांची खरी नावे आहेत असे समजत. त्यामुळे कधी कधी फार फार घोटाळे होत. पण ज्याचा त्याचा घोटाळा ज्याने त्याने निस्तरावा असा टोळक्याचा अलिखित नियमच होता. फार फार तर निस्तरायला इतरजण मदत करीत. पण भोग ज्याचे तोच भोगी. नंतर नंतर वाढत्या वयाची फार फार नवी पोरे टोळक्यांत वाढू लागली. त्या नव्या प्रत्येकालाही या अशा संबोधनाची फार फार गम्मत वाटे. त्यामुळे असे करणारांची संख्या गावात फार फार वाढली. तसेही जो जेवढा फार फार टुकार, तो तेवढाच फार फार हिरो अशी त्या वयाच्या मुलांची एक जनधारणाच असते म्हणा. तर खूप पोरांत पसरल्याने हा प्रकार गावात इतका फार फार वाढला की अनेकदा कित्येकांच्या घरीही या गोष्टी कळू लागल्या. मग पोरांना घरून टोळक्यात न जाण्यासाठी फार फार तंबी मिळू लागली.
एकदा क्रिकेटची मॅच होती. फार फार महत्वाची. पण पक्या (हो हो बेवड्या गणप्याचाच) लवकर आला नाही. मग "संज्याच्या गोट्या"ला एकाने सांगितले, "त्या गणप्याच्या घरी जा, आणि हरामखोराला घेऊन ये". गोट्या हा टोळीत फार फार शिरू पाहणारा नवा कोवळा पोऱ्या, तो टुण्णकन निघाला. गोट्याला माहीतच नाही की पक्याचे नाव पक्या आहे, गणप्या नव्हे. सायकलला टांग मारून पुढच्या मिनिटाला गोट्या पक्याच्या घरापुढे हजर झाला. त्याने फार फार घाईने दाराची कडी वाजवली. आतून पक्याच्या आईने दार उघडले. त्या माऊलीने फार फार मंजुळ गोड आवाजात फार फार प्रेमाने गोट्याला "कोण पाहिजे रे बाळा?" असे विचारले. "मावशी, जरा गणप्याला पटकन बाहेर पाठवा ना." गोट्या म्हणाला. मावशी चपापली. "काय?", "अहो गणप्याला सांगा की उशीर झालाय, लवकर चल." मावशी फार फार लालबुंद झाली. "माझा नवरा एवढा बँकेतला साहेब, गावात त्याचा एवढा मानसन्मान, आणि हे चिल्लर कार्टे त्याला नावाने हाक मारतेय? नुसते नावानेच नव्हे तर वरून गणप्या म्हणतेय? गोट्याच्या गालावर उमटायला मावशीची बोटे फार फार आतुरली. पण तेवढ्यात मागून स्वत: गणपत रावसाहेब अवतीर्ण झाले. त्यांनी गोट्यास "काय रे पोरा? कोण पाहिजे?" असे फार फार साहेबी आवाजात दरडावून विचारले. मावशी फुसफुसत होतीच, "कुणाचं कार्ट आहे काय की बाई, कसले वळण नाही पोराला, येडं बेंद्र कुठलं" तेवढ्यात गोट्या म्हणाला, "काका अहो आमची मॅच चालू होणार आहे त्यामुळे मी गण्.............. गोट्या पुढे काही बोलायच्या आत फार फार मोठी इमरजन्सी लागल्यासारखा पक्या पळत आला आणि आलो आलो रे थांब थांब असे फार फार जोरात ओरडून क्षणार्धात कुणाला काही कळायच्या आत बाहेर पडून गोट्याला घेऊन निघून देखील गेला. केवळ प्रसंगावधानाने पक्या आणि गणप्या या दोघांच्याही गोट्या कपाळात जाऊन (संज्याचा गोट्या बरे का) कपाळ फुटण्याचा फार फार बाका प्रसंग टळला.
एके दिवशी काश्याच्या मुन्न्याने (म्हणजे कासीमचा सुपुत्र मुन्ना याने) गज्याच्या घरी फोन केला. (गज्या म्हणजे गजेंद्र भीमराव बांबळे वल्द भीमराव सोमाजी बांबळे (मुख्याध्यापक) हा पोऱ्या होय). बापलेक असल्याने गज्या आणि टकल्या भीम्याचा (म्हणजे कोण हे सुज्ञांस कळलेच असेल) आवाज फार फार एकमेकांसारखा होता. फोन मुख्याध्यापकांनीच उचलला. "हॅलो", "हा हॅलो". काश्याच्याला वाटले गज्याच बोलतोय. "कोण बोलतंय"? -मुख्या. "नालायका आवाज ओळखू येत नाही का"? "नाही हो, कोण आपण?" -मुख्या. "गाढवा मी सोम्या बोलतोय", -काश्याचा. "कोण सोम्या"? -नालायक म्हंटल्याने वैतागलेले मुख्या. "अरे माकडा बापाचे नाव विसरला का? सोमाजी बांबळे.!! सांगू का टकल्या भीम्याला?" असे म्हंटल्यावर आता टकलावर उजेड पडला. त्याला कळले की संभाषण जरी आपल्याच नावाने चालू असले तरीही सदर फोन आपल्याऐवजी आपल्या फार फार थोर सुपुत्रांसाठी असून पलीकडे त्याचा कोणी फार फार जीडी बोलत आहे. त्याने मग फार फार वैतागलेल्या सुरात "गजु घरात नाही" असे म्हणून फोन आपटला.
एकदा एसटी स्टांडवर इठल्याचा बाळ्या आणि इठल्या (विठ्ठल गोविंद खापरे) हे दोघे उभे होते. पंढरपूर आणि बाळ्याचे घर अशा दोन्ही ठिकाणी न गेलेल्या रम्याला विठ्ठलरावांचे दर्शन पूर्वी कधी घडलेच नव्हते. आणि त्यातच दैवदुर्गतीने रम्याची नजर बाळ्यावर पडली. मग त्याने फार फार जोरात ओरडून "ए इठल्या" अशी हाक मारली. बाळ्याला काय करावे ते कळेना. त्याने नजर दुसरीकडे फिरवली. एव्हना रम्याची भक्तिभावपूर्ण हाक विठ्ठलरावांपर्यंत पोचली होती. पण जगात एवढे फार फार विठ्ठल नामधारी असल्याने अशी उद्धट हाक आपल्याला असूच शकत नाही असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. बाळ्या दुसरीकडे बघून आपणांस मुद्दाम टाळत आहे असे वाटून रम्या फार फार चेकाळला. "अरे ए टोपी इठल्या" अशी त्याने अजून जोरात हाक मारली. या हाकेसरशी विठ्ठलरावांच्याही डोक्यावरची टोपी थोडीसी थरथरली आणि काळजाचा ठोका हलकासा चुकला. हा अतिप्रसंग आलेला पाहून बाळ्या रम्याकडे अजूनच दुर्लक्ष करतां झाला. मग फार फार चिडलेला रम्या उठला आणि तडक त्याचेकडे फार फार जोरात निघाला. बाळ्याने संकट एवढे फार फार जोरात धावून येताना पाहिले आणि मग त्याने दस्तुरखुद्द विठ्ठलरावांच्या मागे लपत खाणाखुणांनी साक्षात विठ्ठलराव समोर उभे आहेत हे रम्याला सांगण्याचा फार फार प्रयत्न चालू केला. पण आधीच मंदबुद्धी असलेला रम्या, कस्तुरीमृगाला जशी त्याच्याच नाभीत कस्तुरी असल्याची जाणीव होत नाही तसे आपल्या समोरच साक्षात विठ्ठलराव उभे असल्याचे त्याच्या डोक्यात जाईना. तो फार फार जवळ आला. एव्हाना विठ्ठलरावांना कळून चुकले होते की हे गाभडू जो हा फार फार मोठा जयघोष करीत आहे तो आपल्याच नावाचा होय. रम्या जवळ गेला. बाळ्या मागून त्याला डोळ्याने फार फार खुणावत होता, पण रम्या थेट जाउन त्याला धडकलाच. काय रे इठल्या डोळा काय मारतो? असे म्हणून रम्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला देखील. विठ्ठलरावांकडे बघण्याची बाळ्याची हिम्मत होईना. मग खाली मान घालून तो हळूच म्हणाला "अरे मित्रा माझे नाव बाळू आहे. हे माझे वडील आहेत, आणि विठ्ठल हे माझे नाही तर त्यांचे नाव आहे." यानंतर बराच वेळ रम्या, बाळू आणि विठ्ठलराव, यांचेपैकी कुणीच कुणाकडे पहिले नाही. मग विठ्ठलराव हळूच, "बाळू मी जरा पेपर घेऊन येतो" असे म्हणून तिथून बाजूला गेले. मात्र त्या प्रसंगानंतर कधीही बाळ्याकडे त्यांनी त्या प्रसंगाचा उल्लेखदेखील केला नाही.
फार फार दिवस लोटलेत या सगळ्या गोष्टींना. टोळीतली सगळी टाळकी फार फार चांगली आणि काही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालीत. घरी गेलो की सगळे बाप आपल्या पोराच्या (बाह्य जगात तसे एवढेही फार फार विशेष न वाटणाऱ्या) कर्तृत्वाबद्दल भरभरून फार फार कौतुकाने बोलतात. आता टोळक्यातले फार फार कुणी एकमेकांना बापाच्या नावाने हाक मारीत नाहीत. मोबाईलमधले काही वर्षांपूर्वी ज्याचे त्याचे त्यांच्या बापाच्याच नावाने सेव्ह असलेले नंबर नंतर त्यांच्या स्वत:च्या नावाने आपसूक कधी सेव्ह झाले ते आमच्या लक्षातही आले नाही. कालच्या थर्टी फस्टच्या पार्टीला टोळक्यातले बरेचजण एकत्र जमलो तेव्हा सहज म्हणून मी सगळ्यांचे मोबाईल बघायला घेतले. एक फार फार स्पष्ट बदल सगळ्यांच्याच मोबाईलांत मला आढळून आला...
...आता सगळ्यांनी एकेकाळी बापांच्या नावाने सेव्ह असलेले एकमेकांचे नंबर्स आपल्या मोबाईलांत ज्याच्या त्याच्या पहिल्या पोरांच्या नावाने सेव्ह केलेले आहेत...!!!
...आणि म्हणूनच ही कथा कवितेच्या/गाण्याच्याच ओळींनी समाप्त करून फार फार समर्पक होण्यासाठी आता समारोपाला आमच्याही आताच्या भावना आमच्या पोरांप्रति अशाच पुढीलप्रमाणे बरे का..
"मेरे बाद भी इस दुनिया में, ज़िंदा मेरा नाम रहेगा।
जो भी तुझको देखेगा, तुझे मेरा लाल कहेगा।
तेरे रूप में मिल जाएगा, मुझको जीवन दोबारा।
तुझे सुरज कहुँ या चंदा, तुझे दीप कहुँ या तारा,
मेरा नाम करेगा रौशन, जग में मेरा राजदुलारा।" ""