हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

बिब्बा आणि बिंब


काटा मोडलाय रे पायात.
''थांब मी सुईने काढून बिब्बा भरतो, दुखणे थांबेल.''
- नको राहू दे, तो ठणकाच बरा वाटतो.. अगदी तुझ्या जुन्या आठवणीसारखा.! {१}

बघ अत्तराचा थेंब झिरपून गेला उशीत.
''जाऊ देत की. रात्रभर सुगंध येईल उशीचा, थेंब झिरपू देण्याचा आटापिटा का?''
- कारण उशीत पडले की अत्तराचे अस्तित्वच दिसत नाही, जशी तुझ्यात मी.. {२}

मी दिवा विझवते.
''अगं बोटाच्या चिमटीने काय धरतेस ती वात? हात भाजेल. फुंकर घाल की.''
- नको रे, तो चटका चालेल, पण फुंकरल्यावरचे तिचे ते तसे हेलावणे बघवत नाही.. {३}

चल आता झोपुयात.
''एवढ्यातच? तू आजकाल माझ्यासाठी जागत नाहीस..''
- कशी जागू सांग ना? मला हवा असतो प्रियकर, पण भेटतो नुसताच पुरुष.!!{४}

आता पाठमोऱ्या माझ्याकडे उगीच चक्रावून बघत बसू नकोस.
''काय झालेय तुला? अशी का वागतेयस? तू बदललीयेस.''
- हो बदलले आहे, पण माझ्यात बदललेले दिसते ते तुझेच प्रतिबिंब.. आता मी तुझा आरसा झालेय..!! {५}

मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

रात्र

पुन्हा आली रोजसारखी परतून रात्र,
आजही ठेवावी दावणीला बांधून रात्र.!
हळू हळू ओतावी पापण्यांत अन,
पुन्हा स्वप्नांशी ठेवावी सांधून रात्र.!!

चांदण्यांच्या आभाळकाळ्या मखरात रात्र,
डोळ्यांच्या भिरभिरणाऱ्या पाखरात रात्र.!
पण ती आली की सगळे दरवाजे बंद होतात,
कुणालाच नको असते का आपल्या घरात रात्र.?

हळूहळू सगळ्या समुद्रावर, शहरावर दाटणार रात्र,
वीस वॅटच्या सीएफएल दिव्यांनी किती दूर लोटणार रात्र.!
एवढ्यात लॉगआऊट करू नका रे,
चंद्राची स्माईली घेऊन ऑनलाईन भेटणार रात्र.!

मवाली वस्तीत, पोलिसांच्या गस्तीत भरडणार रात्र,
दव बनून पहाटेला रड रड रडणार रात्र.!
काय दुर्दैव म्हणावे तिचे की,
हा असा एखादा फालतू कवी, कवितेत खरडणार रात्र.!!

शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

विरजण

"जनी आजी" ही खरेतर माझी दूरची आजी, ती खरी पंढ्याची आजी. जनाबाई तिचे नाव. पण जवळजवळ सगळी गावची पोरे तिला जनी आजीच म्हणायची. जनी आजी अतिशय प्रेमळ होती. प्रत्येकाशी ती अतिशय ममतेने वागे. आमचा नात्यातून चांगला घरोबा असल्याने मी नेहमी तिच्या घरी जायचो. पंढ्याबरोबर आम्ही कुणीही घरी गेलो की जनी आजी सगळ्यांचे खूप खूप लाड करायची. पंढ्यासाठी तर जनी आजी म्हणजे जीव की प्राण होती. आम्ही काहीही केले तरी जनी आजी कधीच आमच्यावर रागावायची नाही. कधी कधी पंढ्यावर मात्र ती थोडेसे रागावायची. पण त्याला तिने कधी चुकूनही मारले नाही. आम्हाला जनी आजीच्या घरी गेले की मनसोक्त गोंधळ घालायला मिळायचा, अगदी आमचे वडील, काका, आई असे कुणीही असले तरी आमचा गोंधळ विनाव्यत्यय चालू असायचा कारण कुणी आम्हाला "गोंगाट करू नका रे" किंवा "आता खेळणे बस झाले रे पोरांनो" असे रागावले की जनी आजी उलट त्यांनाच रागे भरायची. "पोरेच आहेत, त्यांना खेळू द्यावे" असे ती म्हणायची. आम्ही खूप खूप वेळ खेळायचो खूप मज्जा यायची. मला जनी आजीच्या घरी जायला खूप आवडायचे. पण ह्या आवडीचे खरे कारण तिथे खूप खूप खेळायला मिळते हे नव्हते.

जनी आजी रांजणात, मडक्यांत खूप दही लावायची. कधीही जा दही तयार. मी तर गेल्या गेल्या, "आजे, दही भाकर दे खायला" असे म्हणायचो, जनी आजी मला चुलीजवळ बसवायची. आणि मग चुलीवर भाकरी भाजली की लगेच माझ्या ताटात पडायची. गरम गरम नागलीची (नाचणी) भाकरी आणि जनी आजीचे मडक्यातले थंडगार घट्ट दही, अहाहा.!! जनी आजीच्या दह्याला एक अफाट सुंदर चव होती. मी मिटक्या मारीत मारीत तीन तीन भाकरी सहज संपवायचो. चितळे, अमूल, वारणावाल्यांनी जनी आजीचे दही फक्त एकदा जरी  खाल्ले असते ना तरी तिला साष्टांग दंडवत घातला असता एवढी त्या दह्याची चव अलौकिक असे. जनी आजी सांगायची की तिच्या त्या दह्याचे विरजण खूप खूप जुने होते. जनी आजीच्या आजे सासूने तिला ते विरजण देऊन कधीही त्यात खंड पडू देऊ नकोस असे बजावले होते. तेव्हापासून जनी आजीचे विरजण कधीच मोडले नाही. तिच्या आजेसासुने आयुष्यभर विरजणात खंड पडू दिला नव्हता. तोच वारसा तिने जनी आजीला चालवायला दिला. कदाचित तिच्याही आधीच्या कित्येक पिढ्यांपासून ते विरजण तसेच विनाखंड पुढे आले होते. केवळ जनी आजी आणि तिची आजे सासू या दोघींनीच मिळून जवळ जवळ सलग शंभर वर्षे ते विरजण टिकवले होते. म्हणूनच कदाचित त्या दह्यास तशी अलौकिक चव लाभली होती. जनी आजीचे हे दही पंचक्रोशीत तर प्रसिद्ध होतेच, पण कितीतरी दूरच्या गावांवरून देखील लोक तिच्याकडे विरजण घ्यायला येत. पंचक्रोशीत तर अपवादानेच असे घर सापडेल ज्यांनी कधी जनी आजीकडून विरजण आणून दही लावले नसेल. रोज कमीत कमी दोन ते तीन माणसे आजीकडून विरजण घेऊन जायची. विरजण तेच असले तरी दह्याची चव जी जनी आजीच्या घरी येई तशी दुसरीकडे मात्र (उदाहरणार्थ आमच्या घरी) तेच विरजण लावलेले असूनही यायची नाही. जेव्हा मोका मिळेल तेव्हा चार पाच दिवसातून एकदा मी जनी आजीकडे दही खायला जायचो म्हणजे जायचोच. जनी आजीकडे विरजण मागायला आलेला पाहुणाही कधी जेवल्याशिवाय गेला नाही. गावातल्या लेकीबाळींना तर आजीचा एवढा लळा की माहेरपणास आलेली एखादी मुऱ्हाळीन घरी नंतर जायची पण जनी आजीला आधी भेटायची.  

जनी आजी सांगायची की मागे केव्हातरी आमच्या जन्माच्या कितीतरी वर्षे आधी मोठा दुष्काळ पडला होता. गावातली कित्येक माणसे, जनावरे मेली. कित्येकांनी एकतर कवडीमोलाने जनावरे विकून टाकली, अथवा रानोमाळ मोकळी सोडून दिली. जनी आजीच्या ४ गायी आणि पाच वासरे मेली. जनी आजीकडे दोन गायी उरलेल्या होत्या, सावित्री आणि कपिली. सावित्री नुकतीच व्याली होती तर कपिली गाभण होती. आजा म्हणाला, दोन्ही विकून टाकायच्या, उगीच खायला काळ अन भुईला भार नको. पण आजी तयार झाली नाही. ती आज्याशी खूप भांडली. म्हणाली या दोघी जणीच माझे दही आणि माझी लेकरे या दोघांनाही या दुष्काळात जगवतील. मग जनी आजीने प्रसंगी स्वत: उपाशी राहून उन्हातान्हात दूर दुरवर भटकून झाडपाला, वाळकी गवतकाडी असे अविरतपणे पुरवून त्या दोन गाई जगविल्या, आणि त्या दोन गायांच्या दुधाने पंढ्याचा बाप आणि तीन आत्या जगल्या. आजे सासुला दिलेला शब्द जनी आजीने तंतोतंत पाळला. काहीही झाले तरी विरजण खंडित होऊ दिले नाही. दोन गायांतली जी सावित्री तिची नात कालवड अजूनही आजीकडे होती. आजी तिला खूप खूप जीव लावायची. "तुझ्या आजीमुळे माझी लेकरे जगली. तू ही मला लेकीसारखीच आहेस गं बाई", असे ती तिला म्हणायची. कोणत्याही सणावाराला पुरणपोळीचा पहिला घास हा देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वी आजी त्या कालवडीलाच खाऊ घालायची. तिच्या जवळ कित्येकदा बसून जनी आजी तिच्या मानेला खरारा करत, तिच्या कपाळावरून हात फिरवत गाणी गुणगुणत बसायची.

कधी कधी जनी आजी दह्याचे लोणी काढायला घ्यायची. तो एक मोठा सोहळा असे. दहा बारा चिल्ली पिल्ली आणि चारपाच बाया असा लवाजमा जमलेला असायचा. "तुमच्यातली कोणी विटाळात तर नाही ना गं बायांनो?" असे आजी बायांना विचारायची, आणि मगच त्यांना कामे सोपवायची. कुणी विटाळात असेल तर आजी तिला कशालाच हात लावू द्यायची नाही. "त्याने दही, ताक खराब लागते, आणि तूप पुरेसे निघत नाही" असे तिचे म्हणणे होते..!! एक मोठा रांजण घराच्या एका खांबापुढे ठेऊन त्यात दही ओतले जायचे. त्यात मग एक स्वच्छ धुतलेले मुसळ टाकून त्याला दोरीने मागच्या खांबाला अडकविले जाई. मग एक खूप मोठी लाकडी रवी त्यात टाकून ती मुसळाशी दोरीने जोडली जाई. मग रवीला चार पाच वेढे घालून एक लांब दोरी तिची दोन्ही टोके पुढून पकडता येतील अशा तऱ्हेने बांधली जाई. मग त्या दोरीच्या टोकांना पकडून समोर उभे राहून आळीपाळीने एकेका हाताने पुढे मागे करून ओढले की दही घुसळायला सुरुवात होई. मला ते तसे हाताने दोरी ओढून ताक घुसळायला खूप आवडायचे.  मी एकटाच कितीतरी वेळ ते घुसळीत बसायचो. खूप वेळाने मग रांजणातून लोणी तरारून वर येई. सगळीकडे एक छानसा आंबट दुधी वास पसरलेला असे. आजी मग ते लोणी काढून घ्यायची, आणि बाहेर अंगणात मोठी चूल पेटलेली असे तिच्यावरच्या मोठ्या कढईत ते कढवायला ठेवायची. बरेचसे लोणी आम्ही तिथेच मिटक्या मारीत मारीत खात असू.  आणि ते कढविलेले गरम गरम तूपही मग आम्ही भाकरी त्यात अक्षरश: बुडवू बुडवून खात असू. आमची तोंडे , कपडे, हात हे सगळे लोण्या अन तुपाने पार तेलकट होऊन जात, पण आम्हाला त्याची पर्वा कुठे असायची? आजी आग्रह करून करून सगळ्यांना अजून खायला द्यायची. आमच्याकडे बाटल्या भरभरून तूप घरी नेण्यासाठी द्यायची.

आम्ही तेव्हा तिसरी चौथीत असू. पंढ्याची आई पाचव्या बाळंतपणात गेली. पंढ्याच्या बापाने मग सहा महिन्यांच्या आत पंढ्यासाठी दुसरी आई आणली. पंढ्याच्या नव्या आईचे आणि जनी आजीचे पटेना. ती आल्यागेल्याची विचारपूस तर सोडाच उलट त्यांचेशी तिरकस बोलून भांडायची. पोरांना, विशेषत: पंढ्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप मारायची. अन्नाची नासाडी करायची. जनी आजीला असे केलेले आवडायचे नाही. आपल्या घरी आलेला पाहुणा रावळा हा देव असतो, त्याला कधी नाराज करू नये असे ती नव्या सुनेला सांगायची, मात्र सून तसे वागायची नाही. जनी आजी घरी नसेल तर विरजण मागण्यास आलेला पाहुणा रिकाम्या हातीच परत जाऊ लागला. आजीने सुनेस काही सांगितले की ती अजिबात ऐकायची नाही. दोघींची मग सारखी भांडणे होत. पंढ्याचा बाप आधी लक्ष द्यायचा नाही. पण पंढ्याची नवी आई मग रोजच त्याच्या बापावर रुसू लागली. एक दिवस तिने "तुमच्या आईचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या अंगाला हात लावू नका" असे म्हणून पंढ्याच्या बापाशी अबोला धरला. पंढ्याच्या बापाने दोन चार दिवस तरीही दुर्लक्ष केले, पण ती इरेलाच पेटली होती. तिने त्याला हातच लावू दिला नाही. मग पाचव्या दिवशी पंढ्याच्या बापाला कळ काढवेना. त्या दिवशी मग पंढ्याचा बाप जनी आजीवर पहिल्यांदा ओरडला. जनी आजी त्या दिवशी खूप खूप रडली असे पंढ्याने आम्हाला सांगितले. पंढ्या नेहमीच घरात काय घडते ते आमच्या घरी येउन सांगायचा. आई ते ऐकून फार हळहळायची आणि पंढ्याच्या नव्या आईची नालस्ती करायची. आमच्या दादांनीही एक दोनदा पंढ्याच्या बापाला समजावले पण तो तेवढ्यापुरता हो म्हणायचा आणि घरी जाताच बायकोचे ऐकून आजीस भांडायचा. आजी आता रोजच रडू लागली, पंढ्याचा बाप तिच्यावर रोजच ओरडू लागला. आई आता आम्हाला पंढ्याच्या घरी जायला मनाई करायची, पण आम्हाला जनी आजीची आठवण यायची आणि आम्ही जायचोच. आता आम्ही गेलो की आजी तशाही परिस्थितीत मन दह्याहुन घट्ट करून हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला दही भाकरी खायला द्यायची, पण का कुणास ठाऊक ती जुनी चव दह्याला यायचीच नाही. 

एके दिवशी मग मोठा तमाशा झाला. जनी आजी घरातल्या चुलीतून जळके लाकूड काढून बाहेर पाणी तापविण्याची चूल पेटविण्यासाठी नेत होती. तेवढ्यात पंढ्या जोरात पळत आला, आणि आजीच्या हाताला त्याचा धक्का लागला. आजीच्या हातातून ते जळते लाकूड उडाले ते थेट पंढ्याच्या नव्या आईच्या पायावर जाऊन पडले. चटका वगैरे फार बसला नाही पण तिने उगीचच मोठा हंबरडा फोडला. पंढ्याच्या नव्या आईने तेवढ्या कारणावरून मोठमोठ्याने रडून सगळा गाव गोळा केला. "म्हातारीने मला जळक्या लाकडाने डाग दिले, आज पायावर निभावले, पण उद्या मला ही म्हातारी कदाचित पेटवून सुद्धा देईल" असे म्हणून ती धाय मोकलून रडू लागली. पंढ्याचा बाप तेवढ्यात बाहेरून आला आणि तिचे रडणे ऐकून मग खूप पिसाळला. तो रागारागात घरात घुसला आणि आधीच थरथर कापणाऱ्या जनी आजीला हाताला धरून घराबाहेर घेऊन आला. गावातले सगळे लोक चिंतातूर चेहऱ्यांनी बघत होते. पंढ्याच्या घरात कुणीही कधीही असे काही झालेले पहिले नव्हते.  मग गावातली दोन चार थोरली मंडळी पुढे आली आणि त्यांनी पंढ्याच्या बापाला समजवायचा प्रयत्न केला. पण त्याने सगळ्यांना तुम्ही माझ्या घरच्या भानगडीत लक्ष देऊ नका असे खडसावले. तो खूप रागावलेला होता. मग जनी आजीला अंगणातून बाहेर काढून, "ए म्हातारे किती छळतेस त्या बिचारीला? खूप सहन केले मी तुझे सगळे नखरे. चल आताच्या आता माझे घर सोडून निघून जा" असे तो म्हणाला. जनी आजी एक शब्दही न बोलता मागे फिरली. मान खाली घालून वाहणारे डोळे आणि जड पावलांनिशी ती तशीच चालत शेजारच्या गावी लेकीच्या घरी राहायला गेली. जनी आजीला तसे जाताना पाहून गावातल्या हरेक स्त्रीने डोळ्याला पदर लावला, आम्ही सगळी पोरे तर दिवसभर मुसुमुसु रडत राहिलो. गोठ्यात सावित्री गायीची नात असलेली भिमी कालवड उगीच कितीतरी वेळ करुण हंबरडा फोडत राहिली. 

शेकडो वर्षांचे परंपरागत विरजण जनी आजीने जीवापाड जपून लावून ठेवले. लेकरांना, नातवंडांना, अगदी दुसऱ्यांच्या पोराबाळांना देखील त्या दह्यासारखीच घट्ट, अवीट माया लावली. पण तिच्याच नात्यात पडलेल्या विरजणाने सगळेच काही नासवून टाकले.

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

पापा कहते है बडा नाम करेगा

"तुझे सुरज कहुँ या चंदा, तुझे दीप कहुँ या तारा,
मेरा नाम करेगा रौशन, जग में मेरा राजदुलारा"
उद्गारवाचक चिन्हांत इटालीक्समध्ये अशा कवितेच्या अथवा प्रसिद्ध सुविचाराच्या, विषयाशी काहीही संबंध नसलेल्या दोन ओळी एकदा निबंधाच्या सुरुवातीला, एकदोनदा मध्ये आणि एकदा शेवटी लिहिल्या की पैकीच्या पैकी मार्क मिळायचे, म्हणून हे लिहिलेय. बाकी विषय थोडा आक्षेपार्ह आहे, त्यामुळे वैधानिक चेतावनी देतो आहे की लिहिणाऱ्यासारख्या निगरगट्ठ लोकांनीच पुढे वाचावे. 
....
तर फार फार पूर्वी, एक "फार फार अवे" नावाचे गाव होते (गावाचे नाव इंग्रजीत आहे, कारण जंटलमनांनो, कथा फार फार ग्लोबल करावयाची आहे). तिथे फार फार विचित्र लोक राहत असत. गावात कुणाचीही ओळख त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वाने फार फार क्वचितच होई. प्रत्येकजण हा त्याच्या खानदानी ओळखीनेच जाणला जाई.  कोण रे तू? हा प्रश्न कुणाला फार फार नशिबानेच विचारला जाई. नेहमी "कंच्याचा रे तू?" हाच सवाल झडे.  मग उदाहरणार्थ उत्तर असे, "शामराव कुऱ्हाड्याचा".!!  "आसं आसं, म्हंजे त्या खानावळीवाल्या शाम्याचा का?" असे विचारून मग तो परिचय पूर्ण होई. कुणी फार फार वृद्ध असेल तर त्याहीपुढे जाऊन "म्हंजी तू त्या गज्याच्या शाम्याचा का रे? गज्या अजून हाये की गेला? अशी ओळखीबरोबरच जोड विचारपुस्ती करून टाकी. कुणी तर फार फार वृद्ध असण्याबरोबरच फार फार अनुभवी आणि फार फार माहीतगार असे. तो मग विचारी, "म्हंजे तूवा बा शाम्या हा त्या गज्याच्या कोणत्या बायकुचा रं? घारगाववालीचा, का त्या वाण्याच्या मागंलागीचा?" (घारगाववाली म्हणजे जिचे माहेर घारगाव आहे ती. आणि मागंलागी म्हणजे विवाहबाह्य फार फार उफाळलेल्या प्रेमाखातर घरात आणलेली/आलेली). या प्रश्नात तसा फार फार मोठा अपमान वगैरे नसे. पण सोबतीला दुसरे मित्र असले की पोरे थोडी ओशाळत, आणि मग फार फार खालच्या आवाजात, "त्या दुसरीचा.!" असे उत्तर देत.
फार फार अवेमधल्या त्या फार फार विचित्र लोकांची मुले तर फार फार निरुद्योगी आणि म्हणूनच फार फार उपद्व्यापी होती. ही मुले जेव्हा तेव्हा आपापल्या खानदानाचा यथोचित उद्धार करण्यात फार फार तरबेज होती. नेहमी काही ना काही कुटाळक्या, लफडी करताना पकडले जात आणि मग त्यांच्या बापाच्या, आज्याच्या नावाचा जिकडे तिकडे गावभर फार फार गाजावाजा होई. एकंदर काय तर गावात पुरुषप्रधान नव्हे तर बापप्रधान संस्कृती होती.  
               म्हणजे तशी गावात ही पद्धत पारंपारीक नव्हती, पण टारगट पोरांची अनेक टोळकी होती, ते एकमेकांना सदानकदा बापाच्या नावानेच हाक मारीत. पण मोठ्यांना कळू नये अशा ठिकाणीच हे चाले. एकमेकांच्या घरी गेल्यावर स्वनामाचाच पुकारा केला जाई. फार फार तर कुजबुजलेल्या स्वरात अगदी बोलण्यात फार फार निकड भासत असेल तरच बापाचे नाव घेतले जाई. म्हणजे 'प्रकाश गणपत गोर्डे' याला टोळीतले लोक "गणप्या" म्हणूनच हाक मारणार. फार फार तर "ए गणप्याच्या" असे म्हंटले जाई.!! आता हा गणप्या म्हणजे 'गणपत खाशाबा गोर्डे' हा तसा बँकेत मोठा साहेब बरेका. त्यामुळे गावात "गणपत रावसाहेब" अशाच संबोधनाने तो फार फार प्रसिद्ध.! पण बाप जेवढा मोठा, तेवढी टोळक्यात पोराच्या पित्रोद्धाराची शक्यता मोठी होई. त्यामुळेच 'प्रकाश गणपत गोर्डे' हा इसम फार फारदा '"बेवडा गणप्या" अथवा "बेवड्या गणप्याचा"ने संबोधला जाई. एखादा गरीब बिचारा असेल तर केवळ "गणप्या"ने काम भागे. तसा हा बापनामाचा जप अगदी सर्रास चाले बरे का, पण फार फार सफाईने. म्हणजे गावातली मोठी माणसे वगळता हा प्रकार सगळ्यांच्या पुढे बोभाटपणे केला जाई. इतक्या खुलेआम हे चाले की इतर कित्येक अनोळखी लोकांना तर कधीच कळायचे नाही की या मुलांची खरी नावे काय आहेत. टोळक्याकडे फार फार आकर्षित झालेली नवी मुले, पोरांमध्ये मधून मधून फार फार मिसळू पाहणारे काही चाळीशी-पन्नाशीचे लोक, हे तर बापाची नावे हीच पोरांची खरी नावे आहेत असे समजत. त्यामुळे कधी कधी फार फार घोटाळे होत. पण ज्याचा त्याचा घोटाळा ज्याने त्याने निस्तरावा असा टोळक्याचा अलिखित नियमच होता. फार फार तर निस्तरायला इतरजण मदत करीत. पण भोग ज्याचे तोच भोगी. नंतर नंतर वाढत्या वयाची फार फार नवी पोरे टोळक्यांत वाढू लागली. त्या नव्या प्रत्येकालाही या अशा संबोधनाची फार फार गम्मत वाटे. त्यामुळे असे करणारांची संख्या गावात फार फार वाढली. तसेही जो जेवढा फार फार टुकार, तो तेवढाच फार फार हिरो अशी त्या वयाच्या मुलांची एक जनधारणाच असते म्हणा. तर खूप पोरांत पसरल्याने हा प्रकार गावात इतका फार फार वाढला की अनेकदा कित्येकांच्या घरीही या गोष्टी कळू लागल्या. मग पोरांना घरून टोळक्यात न जाण्यासाठी फार फार तंबी मिळू लागली.
              एकदा क्रिकेटची मॅच होती. फार फार महत्वाची. पण पक्या (हो हो बेवड्या गणप्याचाच) लवकर आला नाही. मग "संज्याच्या गोट्या"ला एकाने सांगितले, "त्या गणप्याच्या घरी जा, आणि हरामखोराला घेऊन ये".  गोट्या हा टोळीत फार फार शिरू पाहणारा नवा कोवळा पोऱ्या, तो टुण्णकन निघाला. गोट्याला माहीतच नाही की पक्याचे नाव पक्या आहे, गणप्या नव्हे. सायकलला टांग मारून पुढच्या मिनिटाला गोट्या पक्याच्या घरापुढे हजर झाला. त्याने फार फार घाईने दाराची कडी वाजवली. आतून पक्याच्या आईने दार उघडले. त्या माऊलीने फार फार मंजुळ गोड आवाजात फार फार प्रेमाने गोट्याला "कोण पाहिजे रे बाळा?" असे विचारले. "मावशी, जरा गणप्याला पटकन बाहेर पाठवा ना." गोट्या म्हणाला.  मावशी चपापली. "काय?", "अहो गणप्याला सांगा की उशीर झालाय, लवकर चल." मावशी फार फार लालबुंद झाली. "माझा नवरा एवढा बँकेतला साहेब, गावात त्याचा एवढा मानसन्मान, आणि हे चिल्लर कार्टे त्याला नावाने हाक मारतेय? नुसते नावानेच नव्हे तर वरून गणप्या म्हणतेय? गोट्याच्या गालावर उमटायला मावशीची बोटे फार फार आतुरली. पण तेवढ्यात मागून स्वत: गणपत रावसाहेब अवतीर्ण झाले. त्यांनी गोट्यास "काय रे पोरा? कोण पाहिजे?" असे फार फार साहेबी आवाजात दरडावून विचारले. मावशी फुसफुसत होतीच, "कुणाचं कार्ट आहे काय की बाई, कसले वळण नाही पोराला, येडं बेंद्र कुठलं" तेवढ्यात गोट्या म्हणाला, "काका अहो आमची मॅच चालू होणार आहे त्यामुळे मी गण्.............. गोट्या पुढे काही बोलायच्या आत फार फार मोठी इमरजन्सी लागल्यासारखा पक्या पळत आला आणि आलो आलो रे थांब थांब असे फार फार जोरात ओरडून क्षणार्धात कुणाला काही कळायच्या आत बाहेर पडून गोट्याला घेऊन निघून देखील गेला. केवळ प्रसंगावधानाने पक्या आणि गणप्या या दोघांच्याही गोट्या कपाळात जाऊन (संज्याचा गोट्या बरे का) कपाळ फुटण्याचा फार फार बाका प्रसंग टळला.
                  एके दिवशी काश्याच्या मुन्न्याने (म्हणजे कासीमचा सुपुत्र मुन्ना याने) गज्याच्या घरी फोन केला. (गज्या म्हणजे गजेंद्र भीमराव बांबळे वल्द भीमराव सोमाजी बांबळे (मुख्याध्यापक) हा पोऱ्या होय). बापलेक असल्याने गज्या आणि टकल्या भीम्याचा (म्हणजे कोण हे सुज्ञांस कळलेच असेल) आवाज फार फार एकमेकांसारखा होता. फोन मुख्याध्यापकांनीच उचलला. "हॅलो", "हा हॅलो". काश्याच्याला वाटले गज्याच बोलतोय. "कोण बोलतंय"? -मुख्या. "नालायका आवाज ओळखू येत नाही का"? "नाही हो, कोण आपण?" -मुख्या. "गाढवा मी  सोम्या बोलतोय", -काश्याचा. "कोण सोम्या"? -नालायक म्हंटल्याने वैतागलेले मुख्या. "अरे माकडा बापाचे नाव विसरला का? सोमाजी बांबळे.!! सांगू का टकल्या भीम्याला?" असे म्हंटल्यावर आता टकलावर उजेड पडला. त्याला कळले की संभाषण जरी आपल्याच नावाने चालू असले तरीही सदर फोन आपल्याऐवजी आपल्या फार फार थोर सुपुत्रांसाठी असून पलीकडे त्याचा कोणी फार फार जीडी बोलत आहे. त्याने मग फार फार वैतागलेल्या सुरात "गजु घरात नाही" असे म्हणून फोन आपटला.
                         एकदा एसटी स्टांडवर इठल्याचा बाळ्या आणि इठल्या (विठ्ठल गोविंद खापरे) हे दोघे उभे होते.  पंढरपूर आणि बाळ्याचे घर अशा दोन्ही ठिकाणी न गेलेल्या रम्याला विठ्ठलरावांचे दर्शन पूर्वी कधी घडलेच नव्हते. आणि त्यातच दैवदुर्गतीने रम्याची नजर बाळ्यावर पडली. मग त्याने फार फार जोरात ओरडून "ए इठल्या" अशी हाक मारली. बाळ्याला काय करावे ते कळेना. त्याने नजर दुसरीकडे फिरवली. एव्हना रम्याची भक्तिभावपूर्ण हाक विठ्ठलरावांपर्यंत पोचली होती. पण जगात एवढे फार फार विठ्ठल नामधारी असल्याने अशी उद्धट हाक आपल्याला असूच शकत नाही असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. बाळ्या दुसरीकडे बघून आपणांस मुद्दाम टाळत आहे असे वाटून रम्या फार फार चेकाळला. "अरे ए टोपी इठल्या" अशी त्याने अजून जोरात हाक मारली. या हाकेसरशी विठ्ठलरावांच्याही डोक्यावरची टोपी थोडीसी थरथरली आणि काळजाचा ठोका हलकासा चुकला. हा अतिप्रसंग आलेला पाहून बाळ्या रम्याकडे अजूनच दुर्लक्ष करतां झाला. मग फार फार चिडलेला रम्या उठला आणि तडक त्याचेकडे फार फार जोरात निघाला. बाळ्याने संकट एवढे फार फार जोरात धावून येताना पाहिले आणि मग त्याने दस्तुरखुद्द विठ्ठलरावांच्या मागे लपत खाणाखुणांनी साक्षात विठ्ठलराव समोर उभे आहेत हे रम्याला सांगण्याचा फार फार प्रयत्न चालू केला. पण आधीच मंदबुद्धी असलेला रम्या, कस्तुरीमृगाला जशी त्याच्याच नाभीत कस्तुरी असल्याची जाणीव होत नाही तसे आपल्या समोरच साक्षात विठ्ठलराव उभे असल्याचे त्याच्या डोक्यात जाईना. तो फार फार जवळ आला. एव्हाना विठ्ठलरावांना कळून चुकले होते की हे गाभडू जो हा फार फार मोठा जयघोष करीत आहे तो आपल्याच नावाचा होय. रम्या जवळ गेला. बाळ्या मागून त्याला डोळ्याने फार फार खुणावत होता, पण रम्या थेट जाउन त्याला धडकलाच. काय रे इठल्या डोळा काय मारतो? असे म्हणून रम्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला देखील. विठ्ठलरावांकडे बघण्याची बाळ्याची हिम्मत होईना. मग खाली मान घालून तो हळूच म्हणाला "अरे मित्रा माझे नाव बाळू आहे. हे माझे वडील आहेत, आणि विठ्ठल हे माझे नाही तर त्यांचे नाव आहे." यानंतर बराच वेळ रम्या, बाळू आणि विठ्ठलराव, यांचेपैकी कुणीच कुणाकडे पहिले नाही. मग विठ्ठलराव हळूच, "बाळू मी जरा पेपर घेऊन येतो" असे म्हणून तिथून बाजूला गेले. मात्र त्या प्रसंगानंतर कधीही बाळ्याकडे त्यांनी त्या प्रसंगाचा उल्लेखदेखील केला नाही. 
                         फार फार दिवस लोटलेत या सगळ्या गोष्टींना. टोळीतली सगळी टाळकी फार फार चांगली आणि काही बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालीत. घरी गेलो की सगळे बाप आपल्या पोराच्या (बाह्य जगात तसे एवढेही फार फार विशेष न वाटणाऱ्या) कर्तृत्वाबद्दल भरभरून फार फार कौतुकाने बोलतात. आता टोळक्यातले फार फार कुणी एकमेकांना बापाच्या नावाने हाक मारीत नाहीत. मोबाईलमधले काही वर्षांपूर्वी ज्याचे त्याचे त्यांच्या  बापाच्याच नावाने सेव्ह असलेले नंबर नंतर त्यांच्या स्वत:च्या नावाने आपसूक कधी सेव्ह झाले ते आमच्या लक्षातही आले नाही. कालच्या थर्टी फस्टच्या पार्टीला टोळक्यातले बरेचजण एकत्र जमलो तेव्हा सहज म्हणून मी सगळ्यांचे मोबाईल बघायला घेतले. एक फार फार स्पष्ट बदल सगळ्यांच्याच मोबाईलांत मला आढळून आला...
...आता सगळ्यांनी एकेकाळी बापांच्या नावाने सेव्ह असलेले एकमेकांचे नंबर्स आपल्या मोबाईलांत ज्याच्या त्याच्या पहिल्या पोरांच्या नावाने सेव्ह केलेले आहेत...!!!
...आणि म्हणूनच ही कथा कवितेच्या/गाण्याच्याच ओळींनी समाप्त करून फार फार समर्पक होण्यासाठी आता समारोपाला आमच्याही आताच्या भावना आमच्या पोरांप्रति अशाच पुढीलप्रमाणे बरे का.. 
"मेरे बाद भी इस दुनिया में, ज़िंदा मेरा नाम रहेगा।
जो भी तुझको देखेगा, तुझे मेरा लाल कहेगा।
तेरे रूप में मिल जाएगा, मुझको जीवन दोबारा। 

तुझे सुरज कहुँ या चंदा, तुझे दीप कहुँ या तारा,
मेरा नाम करेगा रौशन, जग में मेरा राजदुलारा।" ""