हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

विरजण

"जनी आजी" ही खरेतर माझी दूरची आजी, ती खरी पंढ्याची आजी. जनाबाई तिचे नाव. पण जवळजवळ सगळी गावची पोरे तिला जनी आजीच म्हणायची. जनी आजी अतिशय प्रेमळ होती. प्रत्येकाशी ती अतिशय ममतेने वागे. आमचा नात्यातून चांगला घरोबा असल्याने मी नेहमी तिच्या घरी जायचो. पंढ्याबरोबर आम्ही कुणीही घरी गेलो की जनी आजी सगळ्यांचे खूप खूप लाड करायची. पंढ्यासाठी तर जनी आजी म्हणजे जीव की प्राण होती. आम्ही काहीही केले तरी जनी आजी कधीच आमच्यावर रागावायची नाही. कधी कधी पंढ्यावर मात्र ती थोडेसे रागावायची. पण त्याला तिने कधी चुकूनही मारले नाही. आम्हाला जनी आजीच्या घरी गेले की मनसोक्त गोंधळ घालायला मिळायचा, अगदी आमचे वडील, काका, आई असे कुणीही असले तरी आमचा गोंधळ विनाव्यत्यय चालू असायचा कारण कुणी आम्हाला "गोंगाट करू नका रे" किंवा "आता खेळणे बस झाले रे पोरांनो" असे रागावले की जनी आजी उलट त्यांनाच रागे भरायची. "पोरेच आहेत, त्यांना खेळू द्यावे" असे ती म्हणायची. आम्ही खूप खूप वेळ खेळायचो खूप मज्जा यायची. मला जनी आजीच्या घरी जायला खूप आवडायचे. पण ह्या आवडीचे खरे कारण तिथे खूप खूप खेळायला मिळते हे नव्हते.

जनी आजी रांजणात, मडक्यांत खूप दही लावायची. कधीही जा दही तयार. मी तर गेल्या गेल्या, "आजे, दही भाकर दे खायला" असे म्हणायचो, जनी आजी मला चुलीजवळ बसवायची. आणि मग चुलीवर भाकरी भाजली की लगेच माझ्या ताटात पडायची. गरम गरम नागलीची (नाचणी) भाकरी आणि जनी आजीचे मडक्यातले थंडगार घट्ट दही, अहाहा.!! जनी आजीच्या दह्याला एक अफाट सुंदर चव होती. मी मिटक्या मारीत मारीत तीन तीन भाकरी सहज संपवायचो. चितळे, अमूल, वारणावाल्यांनी जनी आजीचे दही फक्त एकदा जरी  खाल्ले असते ना तरी तिला साष्टांग दंडवत घातला असता एवढी त्या दह्याची चव अलौकिक असे. जनी आजी सांगायची की तिच्या त्या दह्याचे विरजण खूप खूप जुने होते. जनी आजीच्या आजे सासूने तिला ते विरजण देऊन कधीही त्यात खंड पडू देऊ नकोस असे बजावले होते. तेव्हापासून जनी आजीचे विरजण कधीच मोडले नाही. तिच्या आजेसासुने आयुष्यभर विरजणात खंड पडू दिला नव्हता. तोच वारसा तिने जनी आजीला चालवायला दिला. कदाचित तिच्याही आधीच्या कित्येक पिढ्यांपासून ते विरजण तसेच विनाखंड पुढे आले होते. केवळ जनी आजी आणि तिची आजे सासू या दोघींनीच मिळून जवळ जवळ सलग शंभर वर्षे ते विरजण टिकवले होते. म्हणूनच कदाचित त्या दह्यास तशी अलौकिक चव लाभली होती. जनी आजीचे हे दही पंचक्रोशीत तर प्रसिद्ध होतेच, पण कितीतरी दूरच्या गावांवरून देखील लोक तिच्याकडे विरजण घ्यायला येत. पंचक्रोशीत तर अपवादानेच असे घर सापडेल ज्यांनी कधी जनी आजीकडून विरजण आणून दही लावले नसेल. रोज कमीत कमी दोन ते तीन माणसे आजीकडून विरजण घेऊन जायची. विरजण तेच असले तरी दह्याची चव जी जनी आजीच्या घरी येई तशी दुसरीकडे मात्र (उदाहरणार्थ आमच्या घरी) तेच विरजण लावलेले असूनही यायची नाही. जेव्हा मोका मिळेल तेव्हा चार पाच दिवसातून एकदा मी जनी आजीकडे दही खायला जायचो म्हणजे जायचोच. जनी आजीकडे विरजण मागायला आलेला पाहुणाही कधी जेवल्याशिवाय गेला नाही. गावातल्या लेकीबाळींना तर आजीचा एवढा लळा की माहेरपणास आलेली एखादी मुऱ्हाळीन घरी नंतर जायची पण जनी आजीला आधी भेटायची.  

जनी आजी सांगायची की मागे केव्हातरी आमच्या जन्माच्या कितीतरी वर्षे आधी मोठा दुष्काळ पडला होता. गावातली कित्येक माणसे, जनावरे मेली. कित्येकांनी एकतर कवडीमोलाने जनावरे विकून टाकली, अथवा रानोमाळ मोकळी सोडून दिली. जनी आजीच्या ४ गायी आणि पाच वासरे मेली. जनी आजीकडे दोन गायी उरलेल्या होत्या, सावित्री आणि कपिली. सावित्री नुकतीच व्याली होती तर कपिली गाभण होती. आजा म्हणाला, दोन्ही विकून टाकायच्या, उगीच खायला काळ अन भुईला भार नको. पण आजी तयार झाली नाही. ती आज्याशी खूप भांडली. म्हणाली या दोघी जणीच माझे दही आणि माझी लेकरे या दोघांनाही या दुष्काळात जगवतील. मग जनी आजीने प्रसंगी स्वत: उपाशी राहून उन्हातान्हात दूर दुरवर भटकून झाडपाला, वाळकी गवतकाडी असे अविरतपणे पुरवून त्या दोन गाई जगविल्या, आणि त्या दोन गायांच्या दुधाने पंढ्याचा बाप आणि तीन आत्या जगल्या. आजे सासुला दिलेला शब्द जनी आजीने तंतोतंत पाळला. काहीही झाले तरी विरजण खंडित होऊ दिले नाही. दोन गायांतली जी सावित्री तिची नात कालवड अजूनही आजीकडे होती. आजी तिला खूप खूप जीव लावायची. "तुझ्या आजीमुळे माझी लेकरे जगली. तू ही मला लेकीसारखीच आहेस गं बाई", असे ती तिला म्हणायची. कोणत्याही सणावाराला पुरणपोळीचा पहिला घास हा देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वी आजी त्या कालवडीलाच खाऊ घालायची. तिच्या जवळ कित्येकदा बसून जनी आजी तिच्या मानेला खरारा करत, तिच्या कपाळावरून हात फिरवत गाणी गुणगुणत बसायची.

कधी कधी जनी आजी दह्याचे लोणी काढायला घ्यायची. तो एक मोठा सोहळा असे. दहा बारा चिल्ली पिल्ली आणि चारपाच बाया असा लवाजमा जमलेला असायचा. "तुमच्यातली कोणी विटाळात तर नाही ना गं बायांनो?" असे आजी बायांना विचारायची, आणि मगच त्यांना कामे सोपवायची. कुणी विटाळात असेल तर आजी तिला कशालाच हात लावू द्यायची नाही. "त्याने दही, ताक खराब लागते, आणि तूप पुरेसे निघत नाही" असे तिचे म्हणणे होते..!! एक मोठा रांजण घराच्या एका खांबापुढे ठेऊन त्यात दही ओतले जायचे. त्यात मग एक स्वच्छ धुतलेले मुसळ टाकून त्याला दोरीने मागच्या खांबाला अडकविले जाई. मग एक खूप मोठी लाकडी रवी त्यात टाकून ती मुसळाशी दोरीने जोडली जाई. मग रवीला चार पाच वेढे घालून एक लांब दोरी तिची दोन्ही टोके पुढून पकडता येतील अशा तऱ्हेने बांधली जाई. मग त्या दोरीच्या टोकांना पकडून समोर उभे राहून आळीपाळीने एकेका हाताने पुढे मागे करून ओढले की दही घुसळायला सुरुवात होई. मला ते तसे हाताने दोरी ओढून ताक घुसळायला खूप आवडायचे.  मी एकटाच कितीतरी वेळ ते घुसळीत बसायचो. खूप वेळाने मग रांजणातून लोणी तरारून वर येई. सगळीकडे एक छानसा आंबट दुधी वास पसरलेला असे. आजी मग ते लोणी काढून घ्यायची, आणि बाहेर अंगणात मोठी चूल पेटलेली असे तिच्यावरच्या मोठ्या कढईत ते कढवायला ठेवायची. बरेचसे लोणी आम्ही तिथेच मिटक्या मारीत मारीत खात असू.  आणि ते कढविलेले गरम गरम तूपही मग आम्ही भाकरी त्यात अक्षरश: बुडवू बुडवून खात असू. आमची तोंडे , कपडे, हात हे सगळे लोण्या अन तुपाने पार तेलकट होऊन जात, पण आम्हाला त्याची पर्वा कुठे असायची? आजी आग्रह करून करून सगळ्यांना अजून खायला द्यायची. आमच्याकडे बाटल्या भरभरून तूप घरी नेण्यासाठी द्यायची.

आम्ही तेव्हा तिसरी चौथीत असू. पंढ्याची आई पाचव्या बाळंतपणात गेली. पंढ्याच्या बापाने मग सहा महिन्यांच्या आत पंढ्यासाठी दुसरी आई आणली. पंढ्याच्या नव्या आईचे आणि जनी आजीचे पटेना. ती आल्यागेल्याची विचारपूस तर सोडाच उलट त्यांचेशी तिरकस बोलून भांडायची. पोरांना, विशेषत: पंढ्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप मारायची. अन्नाची नासाडी करायची. जनी आजीला असे केलेले आवडायचे नाही. आपल्या घरी आलेला पाहुणा रावळा हा देव असतो, त्याला कधी नाराज करू नये असे ती नव्या सुनेला सांगायची, मात्र सून तसे वागायची नाही. जनी आजी घरी नसेल तर विरजण मागण्यास आलेला पाहुणा रिकाम्या हातीच परत जाऊ लागला. आजीने सुनेस काही सांगितले की ती अजिबात ऐकायची नाही. दोघींची मग सारखी भांडणे होत. पंढ्याचा बाप आधी लक्ष द्यायचा नाही. पण पंढ्याची नवी आई मग रोजच त्याच्या बापावर रुसू लागली. एक दिवस तिने "तुमच्या आईचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या अंगाला हात लावू नका" असे म्हणून पंढ्याच्या बापाशी अबोला धरला. पंढ्याच्या बापाने दोन चार दिवस तरीही दुर्लक्ष केले, पण ती इरेलाच पेटली होती. तिने त्याला हातच लावू दिला नाही. मग पाचव्या दिवशी पंढ्याच्या बापाला कळ काढवेना. त्या दिवशी मग पंढ्याचा बाप जनी आजीवर पहिल्यांदा ओरडला. जनी आजी त्या दिवशी खूप खूप रडली असे पंढ्याने आम्हाला सांगितले. पंढ्या नेहमीच घरात काय घडते ते आमच्या घरी येउन सांगायचा. आई ते ऐकून फार हळहळायची आणि पंढ्याच्या नव्या आईची नालस्ती करायची. आमच्या दादांनीही एक दोनदा पंढ्याच्या बापाला समजावले पण तो तेवढ्यापुरता हो म्हणायचा आणि घरी जाताच बायकोचे ऐकून आजीस भांडायचा. आजी आता रोजच रडू लागली, पंढ्याचा बाप तिच्यावर रोजच ओरडू लागला. आई आता आम्हाला पंढ्याच्या घरी जायला मनाई करायची, पण आम्हाला जनी आजीची आठवण यायची आणि आम्ही जायचोच. आता आम्ही गेलो की आजी तशाही परिस्थितीत मन दह्याहुन घट्ट करून हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला दही भाकरी खायला द्यायची, पण का कुणास ठाऊक ती जुनी चव दह्याला यायचीच नाही. 

एके दिवशी मग मोठा तमाशा झाला. जनी आजी घरातल्या चुलीतून जळके लाकूड काढून बाहेर पाणी तापविण्याची चूल पेटविण्यासाठी नेत होती. तेवढ्यात पंढ्या जोरात पळत आला, आणि आजीच्या हाताला त्याचा धक्का लागला. आजीच्या हातातून ते जळते लाकूड उडाले ते थेट पंढ्याच्या नव्या आईच्या पायावर जाऊन पडले. चटका वगैरे फार बसला नाही पण तिने उगीचच मोठा हंबरडा फोडला. पंढ्याच्या नव्या आईने तेवढ्या कारणावरून मोठमोठ्याने रडून सगळा गाव गोळा केला. "म्हातारीने मला जळक्या लाकडाने डाग दिले, आज पायावर निभावले, पण उद्या मला ही म्हातारी कदाचित पेटवून सुद्धा देईल" असे म्हणून ती धाय मोकलून रडू लागली. पंढ्याचा बाप तेवढ्यात बाहेरून आला आणि तिचे रडणे ऐकून मग खूप पिसाळला. तो रागारागात घरात घुसला आणि आधीच थरथर कापणाऱ्या जनी आजीला हाताला धरून घराबाहेर घेऊन आला. गावातले सगळे लोक चिंतातूर चेहऱ्यांनी बघत होते. पंढ्याच्या घरात कुणीही कधीही असे काही झालेले पहिले नव्हते.  मग गावातली दोन चार थोरली मंडळी पुढे आली आणि त्यांनी पंढ्याच्या बापाला समजवायचा प्रयत्न केला. पण त्याने सगळ्यांना तुम्ही माझ्या घरच्या भानगडीत लक्ष देऊ नका असे खडसावले. तो खूप रागावलेला होता. मग जनी आजीला अंगणातून बाहेर काढून, "ए म्हातारे किती छळतेस त्या बिचारीला? खूप सहन केले मी तुझे सगळे नखरे. चल आताच्या आता माझे घर सोडून निघून जा" असे तो म्हणाला. जनी आजी एक शब्दही न बोलता मागे फिरली. मान खाली घालून वाहणारे डोळे आणि जड पावलांनिशी ती तशीच चालत शेजारच्या गावी लेकीच्या घरी राहायला गेली. जनी आजीला तसे जाताना पाहून गावातल्या हरेक स्त्रीने डोळ्याला पदर लावला, आम्ही सगळी पोरे तर दिवसभर मुसुमुसु रडत राहिलो. गोठ्यात सावित्री गायीची नात असलेली भिमी कालवड उगीच कितीतरी वेळ करुण हंबरडा फोडत राहिली. 

शेकडो वर्षांचे परंपरागत विरजण जनी आजीने जीवापाड जपून लावून ठेवले. लेकरांना, नातवंडांना, अगदी दुसऱ्यांच्या पोराबाळांना देखील त्या दह्यासारखीच घट्ट, अवीट माया लावली. पण तिच्याच नात्यात पडलेल्या विरजणाने सगळेच काही नासवून टाकले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा