हा ब्लॉग शोधा

शनिवार, २६ एप्रिल, २०१४

क्षिति

किती घेतेस गिरक्या, किती धावतेस !!
तुझे आभाळ माझ्यापर्यंत पसरून,
मलाही सोबत यायला लावतेस !!

मी आजन्म बघतो आहे तुझ्या निळ्याशार पदरावरची हिरवी नक्षी !!
सांग माझे हे जागोजाग टिचरलेले धवल वस्त्र,
भरते काय कधी तुझ्याही अक्षी?

तू आधी कशी प्रसन्न असायचीस, किती नटायचीस, मुरडायचीस !!
मधेच कधी मऊशार कापसाआड लपायचीस,
अन त्यातूनही मी तुला शोधले की मोठ्यांदा गर्जून ओरडायचीस !!  

तुझ्या अंगणात होत्या रंगांच्या पखरणी, मंद वाहणारे गंधित वारे !!
मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत बसायचो,
तिथल्या पाखरांचे, नद्या, निर्झरांचे संगीत सारे !!

युगांतरे लोटली तुझ्यापासून दूर आलो, मात्र मनात अंतर नाही !!  
लेकुरवाळी प्रौढ झालीस तू केव्हाची, पण तरीही,
समस्त विश्वात आजही तुझ्याएवढे कोणी सुंदर नाही !!

आताआताशा मात्र तू खूप कोमेजलेली असतेस !!
धुरात, गोंगाटात घुसमटलेली अन,
कुठल्याशा काळ्या दुर्गंधी स्त्रावांनी घामेजलेली दिसतेस !!

तुझ्या उरात धगधगती वेदना आहे, पण तू क्वचितच करतेस व्यक्त !!
जपतेस जीवापाड ज्यांस, ती लेकरे तुझी काळजी घेतात का गं,
की लोचतात तुला, अगदी थानांतून निघेपर्यंत रक्त?

काल चंद्र पृथ्वीला विचारीत होता..............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा