हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

सुली

"सुलीबाय आली का नाही ओ काकू भाऊबीजेला? संप्या मुऱ्हाळी गेला का नाही?"
…….
(सुलोचना किंवा सुलीच नाव असेल तिचे. एकूण आम्हा सगळ्या पोरांपेक्षा साताठ वर्षे तरी मोठी असेल. म्हणून सगळे सुलीबाय किंवा सुलीताय म्हणायचे. मी आधी ताय म्हणायचो, आता बाय म्हणतो. गावात कधी होती नीटशी आठवत नाही. फक्त परकर झंपर आणि दोन लाल रिबीन बांधलेल्या वेण्या एवढेच आठवते तिच्या लग्नाआधीचे. कधीतरी फार पूर्वी आम्हाला काही कळू लागण्याच्या आधीच लग्न करून गेल्याने ना ती आमच्या ध्यानीमनी ना आम्ही तिच्या.
तिचे लग्न झाल्यावर कधीतरी आम्ही हायस्कुलात असताना एकदा भाऊबीजेला आल्यावर तिला पाहिली होती. ती तेव्हाची मात्र एकदम ठळक आठवते. तेव्हापासूनच दर दिवाळीत भाऊबीज हुरहूर लावायची. तेव्हापासूनच संप्या माझा जिवलग मित्र झाला. एक काहीतरी अपार आनंद होता ती दिवाळीचे ते दोन दिवस गावात असण्यात, आणि त्याच दोन दिवसांत मुद्दाम गावाच्या त्या टोकाला संप्याच्या घरी चार चकरा मारल्यावर ती एकदा दिसण्यात, तेवढ्यासाठी अठ्ठेचाळीस चकरा तिकडे मारण्यात. मी तिच्याशी त्यानंतरही बहुदा दहाएक वर्षे एक शब्दही बोललो नव्हतो. प्रेम म्हणणे मोठे धारिष्ट्य होईल पण ती जाम आवडायची हे शंभरांदा खरे आणि त्या दहा वर्षात वर्षागणिक ती आवडण्यात अपार भर पडतच राहीली हे ही खरेच.
घे ना रे अजून चिवडा गणू. असे एकदा कधीतरी ती मला म्हणाली होती. 'गणू' ही जिंदगीत कुणी मारलेली सर्वात प्रेमळ आणि गोड हाक.! एरवी नुसतेच गण्या किंवा गणप्या ऐकण्याची कानाला सवय. त्यानंतर जवळजवळ महिनाभर कितीदा एकटा असताना आरशात स्वत:ला गणू अशी हाक मारून स्वत:चा खुललेला चेहरा पाहण्यात किती वेळ घालवलाय ते काय सांगू.
ते मागच्या वर्षी सम्प्याच्या घरी एकदा सुरसुरीने पाऊस पेटवल्यावर तो बघताना पंधरा वीस सेकंद तिने माझ्या खांद्यावर नकळत ठेवलेला हात, आणि मग त्या स्पर्शाने अन त्याच्या आठवणीने अजूनही अंगावर उठणारा शहारा आणि एक अनामिकसा थरकाप.…
मोबाइलमध्ये गेल्यावर्षी गुपचूप घेतलेला तिचा फोटो अजूनही आहे, एपलॉकने हाईड करून ठेवलेला.)
….
"नाही रे गन्पा यंदा सुली येणार नाही."
"का बरे?"
"दुष्काळात कसली दिवाळी अन कसली भाऊबीज पोरा."

दिवाळीची दिवटी घेऊन तेल मागायला आलेल्या नव्या पोरांना यंदा दिवाळीची सगळी गाणी येत नव्हती. एकच दिन दिन दिवाळी हे गाणे येत होते.
त्यादिवशी माझे सगळे फटाके मी शेतातल्या वाटेकऱ्याला देऊन टाकले. म्हणालो तू वाजव नाहीतर पुढे पिकात घुसणारी वानरे पळवून लावण्यासाठी जपून ठेव.

सुलीच्या गावी दुष्काळ आहे. मी न पाहीलेल्या सुलीच्या नवऱ्याने काहीही करून निदान ती भाऊबीजेला येईल एवढी तरी तजवीज करावी ना. आळशी लेकाचा. आणि संप्याला तर बहिणभावाच्या प्रेमाची आर्तता कळतच नाही.

भाऊबिजेच्या दिवशी संध्याकाळी संप्या माझ्याकडे आला. आणि फोन मागीतला सुलीला फोन करण्यासाठी. म्हणाला माझा बेलेंस संपलाय, सुलीताई आली नाही निदान फोन तरी करतो. अर्धा तास डायल करूनही फोन लागला नाही. संप्या निघून गेला.
….
सुलीचा नंबर मिळाला. आता फोन, मग व्हाट्सप, भारी भारी प्रेमाचे मेसेज आणि मग काय काय.! मी खुशीत एक रॉकेट उडवायला अंगणात घेऊन आलो. तेवढ्यात माझा फोन वाजला म्हणून मी रॉकेट शेजारच्या हऱ्याकडे दिले आणि फोन उचलला. सुलीचा आवाज नुसत्या हेलोने ओळखला नसता तर जन्म वाया गेला असता म्हणा की माझा.
"हेल्लो हा कुणाचा नंबर आहे? मला मिसकॉल आले होते या नंबर वरून."
"सुलीबाय अगं मी गणू. ओळखलं नाही का? धारेवाडीहुन बोलतोय."
"गणू? कोण गणू? मी कोणा गणूला ओळखत नाही. असे अनोळखी नंबरावर इतके मिसकॉल द्यायला लाज नाही वाटत का?"
….
तिकडे हऱ्याने रॉकेट पेटवले होते ते भुर्रकन वर उंच आकाशात गेले आणि फाट्टदीशी आवाज करून फुटले. खेळ खल्लास. फोन कट, पत्ता कट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा