पार्श्वभूमी
आजची संस्कृती जगबुडीमुळे नष्ट झाली, आजचे बहुतांश लोक नष्ट झाले. जे थोडे वाचले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मुंबईतील उत्खननात फक्त शाहरुख खानचा बंगला जमिनीत बऱ्यापैकी अवस्थेत टिकून असलेला सापडतो आणि त्यात काही LED TV आणि शाहरुखच्या काही फिल्म्सच्या हार्ड डिस्क सुस्थितीत सापडतात. त्यांना इलेक्ट्रिसिटीचाही शोध लागलेला असल्याने ते लोक हे LED TV आणि हार्ड डिस्क वापरायला सहज शिकतात.
योगायोग म्हणजे शाहरुख खानच्या प्रसिद्ध फिल्म्सच्या कहाण्या जगबुडीतून वाचलेल्या लोकांद्वारे लोककथा म्हणून या नव्या सभ्यतेपर्यंत आधीच पोचल्या होत्या, ज्यात नंतर कुणी अधिक आदर्शवादी आणि दैवी भर टाकून या कथा लिखित रुपात आणल्याने त्यांना धर्मग्रंथांचा दर्जा मिळाला आणि त्यात आता त्याच फिल्म्सच्या LED वर बघता येतील अशा हार्ड डिस्क उत्खननात सापडण्याची भर पडली.
वर्ष 4040
उत्खननांत काही लांबच लांब पसरलेल्या लोखंडी समांतर पट्ट्या सापडल्या आहेत. अशाच पट्ट्या देशाच्या इतर विविध भागांत सापडल्या असून या पट्ट्या त्या काळात कोणत्यातरी धार्मिक परंपरेचा भाग असणार असा अंदाज आहे. बऱ्याच ठिकाणी या पट्ट्या खंडित झालेल्या आढळल्या असल्या तरी जुन्या संस्कृतीच्या उत्कर्ष काळात पूर्ण देशात आढळणाऱ्या या सर्व पट्ट्या एकमेकांशी जोडलेल्या असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
समुद्रात आणि किनाऱ्यावर काही खूप उंच आणि अनेकमजली इमारतींचे अवशेष सापडले असून, मुंबई नावाची नगरी एकेकाळी याठिकाणी अस्तित्वात होती या अनेक पुराणमतवादी लोकांच्या विश्वासाला यामुळे बळ मिळाले आहे.
मुंबई असल्याचा दावा केला जाणाऱ्या उत्खनन क्षेत्राच्या सेक्टर 23-S या उत्खनन साईटवर ज्या अनेक आयताकार चपट्या वस्तू मिळाल्या होत्या त्यांस एक विशिष्ट इलेक्ट्रिक व्होल्टेज दिले असता त्यातून हलती चित्रे दिसत असल्याचे आणि सोबतच काही आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सुरुवातीला एखाद्या लिपिसारखे दिसणारे पॅटर्न सुद्धा या चपट्या वस्तूंवर उमटत असल्याचे आढळून आले असून उत्तर भारतात सापडलेल्या मेमरी कॅप्सूल मधील लिपी आणि या हलत्या चित्रांतील लिपी व आवाज यांचा संबंध असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळेच मेमरी कॅप्सूलची लिपी डिकोड करणाऱ्या तज्ञास हे अभ्यासण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
वर्ष 4060
उत्तर भारतातील मेमरी कॅप्सूलची लिपी आणि सेक्टर 23-S मध्ये मिळालेल्या चलचित्रातील लिपी ही थोडी वेगळी भासत असली तरी दोन्ही एकच असल्याचे सिद्ध झाले असून या चलचित्रांच्या सुरुवातीला येणारी लिपी ही उत्तर भारतातील कॅप्सूलशी तंतोतंत जुळत असल्याचे आढळले आहे. ही लिपी पूर्वीच डिकोड झाली असल्याने आपल्याला लिखित शब्दांचे अर्थ कळत नसले तरी आता लिहिलेले सगळे उच्चाराप्रमाणे वाचता येऊ लागले आहे. पूर्वी मौखिक स्वरूपात असलेल्या मात्र 3300 साली लिखित स्वरूपात आणलेल्या बॉली धर्माच्या अनेक धर्मग्रंथांतील कहाण्यांचेच ही चलचित्रे हे पुरावे किंवा संदर्भ असू शकतात असे या हलत्या चित्रांच्या मालिकेवरून अंदाजे बोलले जात आहे. ही चलचित्रे म्हणजे या धर्मग्रंथांचेच एक प्रगत तंत्रातील मुद्रणीकरण असावे असे मानण्यात येते आहे. या चलचित्रांतील सुरुवातीला दिसणाऱ्या लिपीत लिहिलेल्या अक्षरांत 'शाहरुख खान' हे शब्द आणि अशा प्रत्येक चलचित्रात दिसणारा एक कॉमन चेहरा असणाऱ्या माणसाचा काहीतरी संबंध असेल असे वाटते. हे बहुतेक त्या व्यक्तीचे नाव असून प्रथमदर्शनी तरी हा 'शाहरुख खान' हाच बॉली धर्मातील प्रमुख देवता 'शारकान' असल्याचे मानले जात आहे. मात्र देव वगैरे विज्ञानाच्या कसोटीवर खोटे ठरत असल्याने हा केवळ नामसाधर्म्याचा योगायोग आहे असे अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे. त्या काळच्या लोकांकडे आपले धर्मग्रंथ असे उच्च तंत्रज्ञान वापरून चलचित्र स्वरूपात जतन करून ठेवण्याचे तंत्र असल्यामुळेच त्यांनी तुलनेने कनिष्ठ तंत्र असलेल्या लिखित स्वरूपात ते जतन केले नसावेत, आणि म्हणूनच आज त्याचे सन 3300 च्या आधीचे लिखित पुरावे सापडत नाहीत असे पुरातत्ववेत्यांचे म्हणणे आहे.
वर्ष 4080
सेक्टर 23-S मध्ये मिळालेल्या अनेक चपट्या इलेक्ट्रिक वस्तू या एक विशिष्ट व्होल्टेज देऊन अगदी इफिशियंटली चल स्वरूपात आणण्यात आता यश मिळाले आहे. पूर्वी यातील अस्पष्ट असणारा ऑडिओ आता स्पष्ट करून त्यातून मानवी आवाज आणि इन्स्ट्रुमेंटल आवाज सेपरेट करून ऐकण्यात यश मिळाले आहे. या ऑडीओ मधील जवळजवळ अर्धी भाषा आजच्या काही आदिवासी जमातींत प्रचलित असलेल्या 'हिंग्लिश' या भाषेशी मॅच होत असल्याचे आढळून आल्याने त्या काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्ष 4100
शाहरुख खान असलेली आजपर्यंत 12 चलचित्र उपकरणे त्यातल्या त्यात बऱ्या स्थितीत सापडली असून यातील 4 ही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेची तर दोन दोन ही प्रत्येकी दिल तो पागल है आणि चक दे इंडिया या नावाची आहेत. बाकी चलचित्रांपैकी फक्त एकच थोडेफार चालत असून ते चलचित्र कुछ कुछ होता है या प्रसिद्ध धर्मग्रंथाचे असावे असा अंदाज आहे. बॉली धर्मातील याच नावांच्या चार ग्रंथांत शारकान देवतेचे जे राज, राहुल आणि कबीर नावाचे पुत्रअवतार सांगण्यात आले आहेत तेच पुत्रअवतार या चलचित्रांत प्रत्यक्ष दिसत असल्याचा दावा कट्टर बॉली उत्थान(KBU) संघटनेतर्फे करण्यात आला आहे.
दुसरे म्हणजे दिलवाले दुल्हनिया मधे सांगितलेली ज़्यूरीच, लंडन ही शहरे खरेचच तिकडे युरोपात झालेल्या उत्खननात सापडली असून यामुळे शारकान देवतेचा पुत्रअवतार असलेला 'राज' ही फक्त एक कविकल्पना आहे असे म्हणनारांना ही मोठी चपराक आहे असे KBU तर्फे बोलले जात आहे. KBU नुसार दूर युरोपात सापडलेली ही शहरे हा 'राज' आणि 'दिलवाले दुल्हनिया' या धर्मग्रंथांच्या सत्यतेचा पुरावा नाही तर अन्य काय असू शकेल? 'राज' आणि 'दिलवाले दुल्हनिया' हे सत्य नसते तर आदिग्रंथप्रेषित आदरणीय 'आदित्य चोप्रा' हे भारतात राहून त्या पुरातन काळात इतक्या दूर असलेल्या लंडन आणि ज्यूरिक बद्दल इतके तंतोतंत कसे काय सांगू शकले असते? दुसरे म्हणजे 'चक दे इंडिया' या धर्मग्रंथांत लिहिलेल्या आणि त्या चलचित्रातही दिसणाऱ्या हॉकी खेळाच्या खेळण्याची जी एक वैशिष्ट्यपूर्ण काठी आहे तशा अनेक काठ्या पंजाबातील एका उत्खननात आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा देखील शारकान देवतेचा 'कबीर' नावाचा पुत्रअवतार खरेच होऊन गेल्याचा पुरावा आहे असा KBU चा दावा आहे.
वर्ष 4120
कट्टर बॉली उत्थान संघटनेच्या दबावाखाली सेक्टर 23-S चे अधिकृत नाव आता 'मुंबई' करण्यात आले असून मुंबईत जिथे शारकान देवतेची चलचित्रे सापडली होती ते स्थान पुरातत्व संग्रहालय म्हणून न राखता त्याचा "पवित्र शारकान पुजास्थल" म्हणून विकास होईल असे जाहीर करण्यात आले आहे. दहाच वर्षांपूर्वी चक दे इंडिया मध्ये असलेल्या खेळ मैदानासारखे एक चहुबाजूंनी पायऱ्या असलेले गोलाकार खेळ मैदान पंजाब येथे उत्खननात सापडले असून याने कबीर या पुत्रअवताराच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे असे KBU तर्फे सांगण्यात येत आहे. KBU संघटनेने इतके ऐतिहासिक पुरावे मिळाले असूनही राज, राहुल आणि कबीर हे या पृथ्वीतलावर होऊन गेलेले खरेखुरे पुत्रअवतार नसून मनोरंजनासाठी बनविलेल्या कथांची काल्पनिक पात्रे आहेत असे म्हणणाऱ्या, आणि त्यांच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक पुरावे मागणाऱ्या लिबटार्ड फुर्रोघामी लोकांवर कायदा बनवून बॉलीद्रोहाच्या गुन्ह्याखाली कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वर्ष 4150
राज अवतारातील लंडन आणि ज्यूरिच अशी शहरे सापडणे, हॉकी खेळाच्या कित्येक काठ्या आणि मैदान सापडणे, DTPH च्या राहुल अवतारातील छोटी चांदीची मूर्ती सापडणे हे सगळे याच गोष्टीचे पुरावे आहेत की राज, राहुल आणि कबीर हे केवळ मनोरंजक कथांची काल्पनिक पात्रे नसून, ते या पृथ्वीतलावर एकेकाळी अस्तित्वात असलेले ते दैवी पुत्रअवतार होते ज्यांनी जगाला DDLJ मधून दोन पुरुष एक स्त्री, तर DTPH व KKHH मधून एक पुरुष दोन स्त्रिया यांच्यामध्ये कशाप्रकारे पवित्र प्रेम झाले पाहीजे आणि चक दे मधून स्त्रियांना लढायला लावून कशी विजयश्री मिळवली पाहीजे हा दिव्य संदेश जगाला दिला. DDLJ, DTPH, चक दे हे केवळ कथाग्रंथ नसून ते आमच्या उज्ज्वल इतिहासाचे खरेखुरे दस्तावेज आहेत. ते आमचा देव शारकान आणि त्याचे दैवी पुत्रअवतार खरे असल्याचे भक्कम पुरावे आहेत.
जे आजच्या विज्ञानालाही अजूनही बनवायला जमले नाही ती चलचित्रे त्या काळी कुठलेही तंत्रज्ञान नसताना बनविणाऱ्या आमच्या जुन्या प्रगतिशील संस्कृतीची थोडीही बरोबरी आजचा कोणताही प्रगत म्हंटला जाणारा समाज करू शकत नाही. स्वतः शारकान देवाची चलचित्र स्वरूपातील प्रतिमा आजच्या लोकांना स्वतःच्या डोळ्याने पाहता येणे याहून देवाची कोणती मोठी थोरवी असू शकते? जरी अनेक वैज्ञानिक लोक हे उत्खननात सापडलेले सामान फक्त तीन ते चार हजार वर्षे जुने आहे असे म्हणत असले तरी त्यावर आमचा विश्वास नाही. आमची ही संस्कृती निश्चितच २० हजार वर्षांहून अधिक जुनी आहे हेच खरे आहे. मौखिक लोककथांमधून लिखित स्वरूपात आलेले आमचे धर्मग्रंथ, त्यांचे मुंबईत सापडलेल्या चलचित्रांशी होणारे तंतोतंत मॅचिंग हा दैवी चमत्कार नाही तर अन्य काय आहे? शारकानचे अस्तित्व सत्य असण्याचा अजून काय पुरावा पाहीजे? आमची श्रद्धा अशाप्रकारे आजच्या तकलादू वैज्ञानिक तर्कांना पुरून उरली असून आमची संस्कृती ही कित्येक वर्षांपासून चालत आलेली जगातील सर्वात जुनी आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे हेच सिद्ध झाले आहे. सर्वशक्तिमान शारकान देव आणि त्याच्या पुत्रअवतारांचे सत्य अस्तित्व आज शतप्रतिशत सिद्ध झालेले आहे.
जे आजच्या विज्ञानालाही अजूनही बनवायला जमले नाही ती चलचित्रे त्या काळी कुठलेही तंत्रज्ञान नसताना बनविणाऱ्या आमच्या जुन्या प्रगतिशील संस्कृतीची थोडीही बरोबरी आजचा कोणताही प्रगत म्हंटला जाणारा समाज करू शकत नाही. स्वतः शारकान देवाची चलचित्र स्वरूपातील प्रतिमा आजच्या लोकांना स्वतःच्या डोळ्याने पाहता येणे याहून देवाची कोणती मोठी थोरवी असू शकते? जरी अनेक वैज्ञानिक लोक हे उत्खननात सापडलेले सामान फक्त तीन ते चार हजार वर्षे जुने आहे असे म्हणत असले तरी त्यावर आमचा विश्वास नाही. आमची ही संस्कृती निश्चितच २० हजार वर्षांहून अधिक जुनी आहे हेच खरे आहे. मौखिक लोककथांमधून लिखित स्वरूपात आलेले आमचे धर्मग्रंथ, त्यांचे मुंबईत सापडलेल्या चलचित्रांशी होणारे तंतोतंत मॅचिंग हा दैवी चमत्कार नाही तर अन्य काय आहे? शारकानचे अस्तित्व सत्य असण्याचा अजून काय पुरावा पाहीजे? आमची श्रद्धा अशाप्रकारे आजच्या तकलादू वैज्ञानिक तर्कांना पुरून उरली असून आमची संस्कृती ही कित्येक वर्षांपासून चालत आलेली जगातील सर्वात जुनी आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे हेच सिद्ध झाले आहे. सर्वशक्तिमान शारकान देव आणि त्याच्या पुत्रअवतारांचे सत्य अस्तित्व आज शतप्रतिशत सिद्ध झालेले आहे.
विश्वनिर्मात्या शारकान देवतेचा विजय असो, राज, राहुल, कबीर या अवतारी देवांचा विजय असो, त्यांस काल्पनिक कथांची पात्रे म्हणणाऱ्या लिबरांडू बुध्दीवाद्यांचा धिक्कार असो. जगातील सर्वश्रेष्ठ बॉली धर्माचा विजय असो. करोडो लोकांच्या श्रद्धेने विज्ञान नावाच्या थोतांडावर मिळविलेल्या विजयाचा विजय असो.
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा