हा ब्लॉग शोधा

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

41

काळासोबत कधी अगदी उर फाटेस्तोवर पळलो
कधी अनंतासाठी कोण्या एकाच क्षणात रेंगाळलो
मीच कुठे माझा मलाही आहे पुरेसा अद्याप कळलो

डोळ्यांपेक्षा दुनियेस या मनानेच अधिक पाहीले
सुन्न प्रतिसादही संवेदनांनी खोलवर जाणवत राहीले
कोरड्या ओल्या दोन्ही भावनांनी सारखेच हळहळलो

कधी आभाळाला मारली घट्ट बिलगती मिठी
कधी मातीच्या इवल्या कणावर वाहीली दिठी
कधी उगवलो मध्यरात्री, कधी मध्यान्ही मावळलो

ठेवले रितेच कित्येकदा चांगुलपणाचे रकाने
कितीदा सद्गुणांची अन बसलो मांडून दुकाने
कधी ठाम राहीलो सत्याशी, कधी सहज ढळलो

भरले कुणी दोन डोळ्यांत विश्वाएवढे दाटून
कुणी झाले बारमाही पाऊस, कुणी गेले आटून
लपवले कुणास मनात अन कुणावर खुलेआम भाळलो

गाठली स्नेहसोबतीने कधी आनंदाची निळीभोर शिखरे
कधी एकांती कारेत कोंडली स्वप्नांची स्वच्छंद पाखरे
कधी गोठलो स्पर्शून कुणा, कधी फक्त आठवून वितळलो

सत्कर्मासाठी कधी लागलो मी संकटांच्या कच्छपि
कैकदा फक्त सापडलो नाही म्हणून ठरलो नाही पापी
गुन्ह्यांचा केला माज, कधी भलेपणातही ओशाळलो

शिरलो कधी अज्ञाताच्या व्योमी खुशाल शड्डू ठोकून
तर कधी परिचितांच्या गर्दीतही राहीलो जरा संकोचून
लगडलो सुखाच्या वेलीस कधी, कधी अश्रूंतून ओघळलो

राहीलो कधी लाचार होऊन नि शोषणास झालो राजी
हुकुमाचा एक्का बनून अन कधी मारली हरेक बाजी
लढलो कधी प्राणपणाने, कधी बिनविरोध ढासळलो
मीच कुठे माझा मलाही आहे पुरेसा अद्याप कळलो



..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा