हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

तख़ल्लुस


इक इतने से तख़ल्लुस का, कितना बडा बोझ था
सुकून बस इक पल का, और दर्द कईं रोज था

कुछ अनकही दास्तानों में ही खोया रहा उम्रभर
न बना किसी का साहीर, ना मै कोई इमरोज था

तुम थे मेरे ग़म और ख़ुशी दोनों का ही ज़रिया
मरहम था तेरा पास आना, दूर जाना सोज़ था

दुनिया से ताउम्र लड़ता ही रहा हूँ अपनी जंगें
कभी था अकेला सिपाही, कभी मै पूरी फौज था

जिंदगी के तजुर्बे ने सिखाया कि मेरी कहानी में
हक़ीक़त थी गंगू तेली, पर ख्वाब राजा भोज था

सरहदें तोड़नी चाहीं मगर अपने दायरे में ही रहा
मै किनारे से टकराकर, मिट जानेवाली मौज था

राहुल तेरी क़ीमत इस दुनिया में होगी ही कितनी
तू किसी से था खोया, और किसी की खोज था






*तखल्लूस-शायरीतले नाव
*ज़रिया-Source
*सोज़-दुःख


रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

बयालीस

 

उद्याकडे जाताना उगा, कालच्या आठवणींनी मागे ओढू नये
वाढदिवसाच्या शुभेच्छांतही कोणी, जुने उल्लेख जोडू नये

कशापाठी अजूनही जीवापाड धावतो आहे तेच कळत नाही
वाटते थांबावे सगळे; ज्ञान, अनुभव, वय, काहीकाही वाढू नये
 
पुरे झाल्या उन्हाच्या झळा, पुरे उजेडासाठी जळणे जाळणे
बसावे कवटाळून आपला अंधार, आता सकाळ उजाडू नये 

सुबह भुल भी जाएं रास्ता गर तो, शाम होते घर ही लौट चलेंगे  
आता कोणत्याही नाविन्याची, अनोळखी सीमा ओलांडू नये 

अंतर्मनाच्या अनाहत नादात, मिसळू नयेत हळवे वेदनेचे सूर
गावी फक्त किशोरची गाणी, नाजुकशी तलतची धून छेडू नये  

ठेवावी मूठ अगदी घट्ट झाकून, सव्वा लाख दुखऱ्या गुपितांची
कैफीयत आपल्या व्यथांची, जिवलगांच्याही पुढ्यात मांडू नये 

Dont ignore the simplest, dont seek only the best
ऐकत रहावा मनसोक्त गुलजार, अन समीरलाही मोडीत काढू नये 

नको भूतकाळाची फार दुरुस्ती, नको भविष्याचे अति व्यवस्थापन 
स्वीकाराव्यात त्रुटी आपल्या, केल्या चुकाही आवर्जून खोडू नये

जितने मिलें हैं वफा ओ दर्द ओ सितम, काफी है इक उम्र के लिये
आता कुणीही मनाला आपल्या, नव्याने आवडू वा नावडू नये 

स्थिर व्हावे, स्थावर रहावे, खोल झाल्यावर खळखळाट करू नये 
आता शहाणा हो राहुल, बेचाळीशीत तरी पोरकट दळण कांडू नये



..

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

The evolution of god and religion - in seven generations (देवाची उत्क्रांती)

जशी सजीवांची उत्क्रांती होत असते तशी मानवी समाजात देवाची आणि त्याच्या जोडीने धर्मांचीही उत्क्रांती होत गेलेली आहे. देवाचा जन्म कसा झाला हे युवाल हरारीने 'सेपियन्स' मध्ये छान सांगितले आहे. त्यामुळे आपण सरळ तो कसा बदलत गेला याची ढोबळ सात जनरेशन्समध्ये टाइमलाईन बघू. तशी देव ही संकल्पना इतकी कॉम्प्लेक्स होत होत इव्हॉल्व्ह झाली आहे की त्याचे ७०० वा अगदी ७००० जनरेशन्स मधेही परफेक्ट वर्गीकरण होणार नाही. त्यामुळे हे अगदीच ढोबळ निरीक्षण आहे हे लक्षात घ्यावे.  
सगळ्यात आधी फर्स्ट जनरेशनचा देव ही एक अदृश्य शक्ती होती. आणि तो कुठेतरी वर आकाशात स्वर्ग नावाच्या काल्पनिक जागेत राहत होता व तिथूनच मानवाच्या जीवनाला प्रभावित करत होता. पण या कल्पनेला खूप दिवस झाले. त्यात काही थ्रिल राहीले नाही. असा कसा देव जो कसा दिसतो तेही माहीत नाही? देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसला पाहीजे ही कल्पना प्रबळ होऊ लागली. मग दुसऱ्या जनरेशन मध्ये सूर्य, आकाश, चंद्र, पाऊस हेच देव आहेत असे जगातल्या सगळ्या संस्कृतींत सांगण्यात आले. आता देव अदृश्य मधून दृश्य स्वरूपात तर आला, पण लवकरच हे सगळे सुद्धा अगदीच सामान्य होऊन गेले. सूर्य असो की आकाश की इतर काही असे विश्वाचा भाग असलेले देव, ते नित्याचेच होते आणि काहीच वेगळे करत नव्हते. आता देवाला नुसते दृश्य नाही तर ऍक्टिव्ह सजीव/मानवी रूप दिले पाहीजे आणि त्याने याच रूपातून विश्वाची निर्मिती वा संचलन केले पाहीजे ही नवी कल्पना समोर आली आणि तिसऱ्या जनरेशन मध्ये मग ग्रीकचा केऑस वा भारताचा ब्रम्हा असे अनेक मानवसदृश सजीव स्वरूप घेतलेले देव निर्माण झाले. या जनरेशनच्या देवांचे जन्म कुठेतरी अतर्क्य ठिकाणी, अतर्क्य पद्धतीने होत होते (म्हणजे पित्या व मातेपासून होत नव्हते). आणि या जनरेशनचे देव लाखो करोडो वर्षे राज्य करत होते. उदाहरणार्थ चीनच्या 'युहांग' या देवाने १७५० इऑन इतका काळ राज्य केले. एक इऑन म्हणजे एक लाख ३० हजार वर्षे. असेच काहीसे अचाट कालमापन आपल्याकडेही युग वगैरे कल्पनांच्या बाबतीत सुद्धा आहे. इतकेच काय तर या देवांना जी मुले होत होती तीही नेहमीच्या पद्धतीने होत नव्हती. ती मुले उपजत नव्हती तर तयार केली जात होती. अशा प्रकारे मग कुणी टायटन्स जन्माला घालत होता तर कुणी सूर्यचंद्र. पण कल्पनेत का होईना मानवसदृश रूपात आले असले तरी अजूनही हे सगळे देव माणसाच्या संपर्काच्या बाहेर होते. त्यामुळे त्यांचाही प्रभाव कमी होऊ लागला. मग देव आपल्याला डोळ्यांनी दिसला पाहीजे ही कल्पना तर मानवाच्या मनात आलीच पण तो प्रत्यक्ष आपल्यात आला पाहीजे, या पृथ्वीवर वावरला पाहीजे अशी साधारण लोकांची भावना होऊ झाली. आता पहील्या जनरेशनचा अदृश्य/रूप नसलेला देव असो वा दुसऱ्या तिसऱ्या जनरेशन मधला रूप असलेला मात्र कुठल्यातरी अनएक्सेसिबल ठिकाणी राहणारा देव असो, तो लोकांना जास्त रुचेना. हळूहळू मानवाची बौद्धिक वैचारिक पातळी वाढू लागल्याने या तीन जनरेशन्सच्या देवांवर प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली.
मग आले चौथ्या जनरेशन मधले देव अवतार रूपात पृथ्वीवर. आता देवांनी माणूस म्हणूनच जन्म घेतला जेणेकरून तो लोकांना अधिक आपलासा वाटावा. मग एक साधारण माणूस म्हणून जन्मलेला कृष्ण गीतेत म्हणाला की मीच देव आहे. जगातल्या अनेक संस्कृतींत अनेक जण देव म्हणून घोषित झाले. तेच राजे झाले, मग त्यात भारताचा कृष्ण असो की मेसोपोटेमियाचा नरामसन. खूप वर्षे हे देव चालले. माझ्यामते देवाच्या मानवी अवताराला (म्हणजे खरेतर राजाला) प्रत्यक्ष असलेल्या शहरांशी/ठिकाणांशी जोडण्याची कल्पना सगळ्यात श्रेष्ठ होती कारण रामानंतरही कित्येक वर्षांनी लोक अयोध्या वा पंचवटी हे प्रत्यक्ष पाहू शकत होते. ही अशी मथुरा, जेरुसलम, मक्कासारखी जिऑग्राफिकल लोकेशन्स देवाशी निगडित करण्याच्या कल्पनेमुळे देवाचा प्रभाव कित्येक पिढ्यांपर्यंत कायम राहू शकत होता. म्हणजे देव कुठल्यातरी अतर्क्य आणि न दिसणाऱ्या स्वर्ग या ठिकाणाहून आधी सूर्य पाऊस आदी रूपांत दृष्टीक्षेपात म्हणजे आकाशात आला. आणि पुढे तर तो थेट पृथ्वीवर मानवी शहरांतच आला. पण देव पृथ्वीवर आला आहे आणि तरीही तो आपल्याला हवे तसे का करत नाही? अशी लोकांची भावना झाली. देव इतका कमजोर आहे का? की तो प्रत्यक्ष पृथ्वीवर येऊनही इथले दुःख संपवू शकत नाही? बरे हा देव स्वतः राजा/सम्राट बनतो पण आम्हाला मात्र गरीबच ठेवतो. अशी जागरूकता समाजात येऊ लागली. मग यातून लोकांना पटेल असा देवाच्या ऑथॉरिटीचा दुसरा मार्ग शोधण्याची धडपड चालू झाली आणि मग आला पाचव्या जनरेशनचा येशू ख्रिस्त. त्याने सांगितले की मी देव नाही तर देवाचा पुत्र आहे. तोही सम्राट वगैरे नाही तर लोकांहून गरीब, भणंग फकीर असलेला पुत्र.! अर्थातच देवापेक्षा देवाच्या पुत्राकडून लोकांनी कमी अपेक्षा करायला हवी. पण नाही, नेपोटीजमला अगदी आजपर्यंत मानवी समाजात किती महत्व आहे हे आपण पाहतोच. त्यामुळे देव नाही देवाचा पुत्र असला तरी त्यानेही तेवढेच चमत्कार केले पाहीजेत अशी लोकांची अपेक्षा झाली. आता रे ब्वा? मग आता यातून मार्ग काढण्यासाठी पुढच्या सहाव्या जनरेशन मध्ये आले प्रेषित मुहम्मद. त्यांनी सांगितले की ना मी देव आहे ना मी देवाचा पुत्र आहे. मी फक्त देवाचा प्रेषित म्हणजे मेसेंजर आहे. मी काही चमत्कार करणार नाही. जे करायचे ते देव करणार. मी फक्त देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पोचवणार. आता फक्त देवाचा संदेश पोचवणारा प्रेषित आला आहे म्हंटल्यावर चमत्कार वगैरे करण्याचा काही प्रश्नच राहत नाही वा आपल्या अडचणी सांगून देवाला जबाबदार ठरवण्याचाही प्रश्न येत नाही. प्रेषित हा मुख्यत्वे एकमार्गी संदेशवाहक असतो. म्हणजे फक्त देवाचा संदेश माणसांना पोचवणारा. माणसांचे संदेश देवापर्यंत पोचवणे हे त्याचे काम नोहे. ही प्रेषिताची संकल्पना तशी खूप काळ अनचॅलेंज्ड रहायला हवी होती पण लवकरच यांनतरही मग नवी कल्पना घेऊन आले सातव्या आणि लेटेस्ट जनरेशनमध्ये गुरु नानक. ते ना देव होते, ना देवाचे पुत्र, ना देवाचे प्रेषित. ते फक्त देवाचा संदेश चांगल्या रीतीने समजावून सांगणारे गुरु होते.  
काळानुसार प्रबोधन आणि एकंदर प्रगतीमुळे मानवी समाज बऱ्याच अंशी वैचारिक दृष्ट्या प्रगत होत गेला. आणि या सगळ्या देव वगैरेंसारख्या गोष्टींबद्दल त्याच्या मनात प्रश्न उभे राहू लागले. एकंदर देवाच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या ऑथॉरिटीवर आक्षेप घेण्याची किंवा प्रूफ मागण्याची लोकभावना कालानुरूप अधिकाधिक रुजू लागली. जशी जशी पुढची पिढी हुशार होत जाईल तशी तशी या ऑथॉरिटीची जवाबदेही देखील वाढत राहील आणि पुढे घोषित होणाऱ्या प्रेषित अथवा गुरूंवर म्हणजे पर्यायाने देवावरच प्रश्न उपस्थित होतील म्हणूनच मग माझ्यानंतर कोणीही प्रेषित होणार नाही हे प्रेषित मुहम्मद यांनी आणि गुरु ग्रंथ साहीब हेच इथून पुढे गुरु राहतील, नवे गुरु जन्माला येणार नाहीत असे गुरु गोविंद सिंग यांनी जाहीर केले. सातव्याच जनरेशनमध्ये घेता येतील अशा दलाई लामांच्या प्रथेलाही कदाचित लवकरच असा कायमस्वरूपी अंत मिळेल. 

आधी सांगितल्याप्रमाणे देव संकल्पनेचा इतका बहुरंगी आणि व्यापक विस्तार झाला आहे की आज देव या संकल्पनेची केवळ एक सर्वमान्य अशी व्याख्या सुद्धा होऊ शकत नाही. इतकेच नाही तर इतके प्रबोधन व वैचारिक जागरूकता होऊनही आजही अगदी पहील्या जनरेशन पासून ते सातव्या जनरेशन पर्यंतच्या प्रत्येक व्हर्जनला मानणारे कोट्यवधी लोक आहेत. काही जुन्याच स्वरूपाला मान्य करणारे आहेत, काही जुन्या नव्या दोन्ही स्वरुपांना मानणारे आहेत तर काही नव्या स्वरुपांना मानणारे आहेत. जोपर्यंत भीती, असहायता किंवा अज्ञान या गोष्टी राहतील तोपर्यंत जुन्या/नव्या स्वरूपात देव हे टिकूनच राहतील. त्यामुळे इथून पुढेही देवांचे हे इव्होल्यूशन चालूच राहील. पण हे खरे की देवाचे इव्होल्यूशन हे एका अदृश्य अतर्क्य चमत्कारी शक्तीपासून आता अधिकाधिक मानवी आणि बिना चमत्कारी स्वरूपाचे होत चालले आहे. पुढे कधी जेव्हा ते तंतोतंत मानवी होईल तेव्हा देव नष्ट होतील.

सोमवार, ३० मे, २०२२

ट्रेक पंढरीची वारी नळीच्या वाटेने

ट्रेकर्सची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड. तसा तो आधीही कितीतरी वेळा केलाय. अगदी लहानपणापासून दर शिवरात्रीला वीस पंचवीस हजार लोकांच्या सोबत तो पाचनई किंवा तोलार खिंडीच्या रस्त्यानेच नेहमी केला होता. दरवेळी गेल्यावर कोकणकड्यावरून उजवीकडे दिसणारी नळीची वाट नेहमीच खुणावत असे. कधी न कधी हरिश्चंद्रगड त्या नळीच्या वाटेने करायचाच हे माझे खूप दिवसांचे स्वप्न होते मात्र का कुणास ठाऊक तसा योगच जुळून येत नव्हता. पण म्हणतात ना, किसी चीज को शिद्दत से चाहो तो.. या ऑक्टोबरमध्ये मोरोशीच्या भैरवगडाचा आमचा प्लॅन होता. आमचे ट्रेकिंग गाईड कमा भाऊ यांच्या घरापासून नळीची वाटही जवळच आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले मग आदल्या दिवशीच्या व्हाट्सअप कॉल मध्ये नळीच्या वाटेचा विषय निघताच आम्ही भैरवगड ऐवजी नळीच्या वाटेनेच हरिश्चंद्रगड करायचा असे ठरवले. अगदी शेवटच्या क्षणी आमचा भैरवगड प्लॅन बदलून नळीच्या वाटेचा झाला आणि कित्येक वर्षे नळीच्या वाटेने जाण्याचे आमचे स्वप्न पुरे होण्याचा योग आला.

अंदाजे हरिश्चंद्रगडावर येणाऱ्या 'दहा हजारांत एक' याच प्रमाणात नळीच्या वाटेने येणाऱ्यांची संख्या असावी. फक्त बाप लोकांनी करावयाचा आहे हा ट्रेक. पूर्वी नळीची वाट केलेले ट्रेकर्स असोत की अनेक ट्रेक ब्लॉगर वा युट्युबर्स, या सर्वांकडून तुम्ही नळीच्या वाटेने हरिश्चंद्र केला नाही तर खरे ट्रेकिंग केलेच नाही ही गोष्ट कित्येक दिवस आमच्या कानीकपाळी पडत होती. हा ट्रेक कसा प्रचंड थ्रिलिंग आहे, अवघड आहे, थकवणारा आहे हे अनेकदा वाचून, ऐकून काही केल्या आम्हाला तो करायचाच होता. आपल्या फिजिकल आणि मेंटल अशा दोन्ही क्षमतांचा कस लावणारा हा ट्रेक होय.

 खालून दिसणारा हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा

पहाटे हा ट्रेक सुरू करणे सर्वात हुशारीचे काम. पण आमच्यातला प्रशांत हा पुण्याहून, नित्या हा नाशिकवरून आणि मी मुंबईवरून येणार असल्याने आम्हाला पोचतो दुपार झाली. आणि मग जेवण वगैरे करण्यात वेळ गेल्याने ट्रेक आम्ही दुपारी 2 वाजता सुरू केला. खरेतर दुपारी हा ट्रेक करणे चूक आहे, पहाटेच सुरू केला पाहीजे असे सगळ्यांनी सांगितले होते पण आता उशीर झाला म्हंटल्यावर काय करणार. आमचे दोन गाईड होते, अलंग कुलंग मदन ट्रेकचा एक्सपर्ट लहू आणि नळीची वाट तसेच माकडनाळ ट्रेकचे सर्वात अनुभवी आणि विश्वासू गाईड कमा भाऊ. आम्ही उशीर झाला तरी चढू हे आम्ही दोघांना सांगितले आणि मग त्यांनीही तुम्ही साथ द्या, मग इतक्या उशिरा कुणी न केलेले हे दिव्य आपण नक्की पार पाडू अशी हिंमत दिली आणि आम्ही सुरुवात केली.

मोठमोठ्या शिळांची वाट, मधेच खूप लूज असलेल्या दगडांच्या व मुरुमाच्या कपच्या, घसरते लूज दगडगोटे, आणि अगदी उरावर येणारे चढ. सगळेच प्रचंड थरारक आहे नळीच्या वाटेत. दोन ठिकाणी कंपल्सरी रोप लावूनच चढावे लागते. आणि अजूनही दोन तीन ठिकाणी काहींना रोप लावण्याची गरज पडू शकते. त्यामुळे दोन रोप आणि वर मुक्कामासाठी टेंट सुद्धा आम्ही सोबत घेतले होते. ट्रेक करण्यासाठी लागणारा एवरेज टाइम म्हणजे नऊ तास असे कमा भाऊंनी आम्हाला सांगितले होते. पण जेव्हा आपण हरिश्चंद्रगडासारख्या अजस्त्र कड्याखाली उभे असतो तेव्हा दिसणाऱ्या अंतराचा आपल्याला बरोबर अंदाज येत नाही. त्यामुळे आपण 5 तासात ट्रेक पूर्ण करू असे आम्ही म्हंटले. कमाभाऊ ते ऐकून काही आमच्याशी वाद घालत बसले नाहीत, फक्त थोडेसे हसले.

नळीची वाट म्हणजे आधी नदीतून मोठमोठे दगड आणि शिळा पार करत जावे लागते. ऑक्टोबर हिटच्या भर दुपारच्या उन्हात निघाल्यामुळे थोड्याच वेळात आमच्या अंगातून घामाच्या धारा निघायला सुरुवात झाली. आमच्या प्रत्येकाकडे पाण्याच्या चार ते पाच बाटल्या, वर गेल्यावर बदलण्यासाठी दोन ड्रेस, टॉवेल आणि अंतर्वस्त्रे, तसेच थंडी वाजेल म्हणून घेतलेले जॅकेट, पावर बँक, स्नॅक्स असा भरपूर बोजा होता. हा असा बोजा आणि डोक्यावर रखरखते ऊन यामुळे तीस चाळीस मिनिटांतच आम्हाला विश्रांतीसाठी बसावे लागले. थोडावेळ बसून एकमेकांना चिअर अप करत निघालो तर मोठमोठ्या दगडांची वाट सुरू झाली. मोठ्या शिळांवर हातांनी आधार घेत चढून आणि छोट्या शिळांवर मोठमोठ्या ढांगा टाकत चढावे लागत होते. आधी तरी मधून मधून झाडांची सावली येत होती, पण या नदीतून जाणाऱ्या रस्त्यावर सावली तर नाहीच, पण उन्हाने प्रचंड तापलेल्या दगडांतून निघणाऱ्या गरम गरम झळांमुळे ती वाट अजूनच दमछाक करणारी ठरली. परत घामाच्या धारा, ऊन, पाठीवरचा बोजा आणि धपापलेले उर घेऊन काही केल्या थांबायचे नाही असे एकमेकांना सांगत आम्ही चालतच होतो. तसेच घामाघूम होऊन उन्हात चालत असताना एखादे मृगजळ दिसावे तसे अचानक समोर एका ठिकाणी छान खळाळता झरा आणि एक डोह दिसले. मग काय पाठीवरच्या बॅगा उतरवून थेट अंगावरच्या कपड्यांसकट त्यात उडी टाकली. मस्त धबधबा अंगावर घेतला, डोहभर पोहलो, वाहत्या पाण्यात मनसोक्त लोळलो आणि मग हळूहळू सगळा थकवा गेला. 

 

झऱ्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेताना आम्ही


https://www.youtube.com/watch?v=S74zuhl4XJo

उशीर होईल चला जास्त वेळ घालवू नका असा दोन्ही गाईड्सनी धोशा लावलेला असूनही, त्या झऱ्यातले ते स्वर्गसुख लुटताना आम्हाला काही केल्या झऱ्याच्या बाहेर निघावेसेच वाटेना. पण मग थोड्यावेळाने एकमेकांना समजावत बाहेर निघालो. भर उन्हातला तो सुखाचा अर्धा तास आमच्यात प्रचंड जोश आणि ऊर्जा भरून गेला आणि मग नव्या ऊर्जेने तसेच भिजल्या कपड्यांनिशी आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. फक्त झऱ्याचा कडा ओलांडलाच होता तर नित्याचा गोप्रो खालीच कुठेतरी राहिल्याचे लक्षात आले. झाले, परत खाली जाऊन गोप्रो शोधण्याची मोहीम चालू झाली. तो एवढासा काळा गोप्रो आणि तेवढ्याच आकारा आणि रंगाच्या दगडांनी भरलेला तो झरा. गोप्रो सापडेनाच. पण अजून थोडे आजूबाजूला जाऊन शोधल्यावर एकदाचा सापडला आणि आमचा प्रवास सुरु झाला. परत बॅगा पाठीवर घेतल्या. एकाची बॅग त्याला जड वाटत होती म्हणून मी त्याच्या बॅगेतून एक पाण्याची बाटली माझ्या बॅगेत घेतली आणि चालू लागलो. तेवढ्यात झाले काय की एका ठिकाणी दगडावर पाय टाकताच तिथल्या शेवाळावरून माझा पाय घसरला आणि मी मस्तपैकी आजूबाजूच्या दगडांवर धडका घेत धपकन एका पाण्याच्या डबक्यात पडलो. तसे काहीच जास्त लागले नाही, फक्त हाताला थोडेसे खरचटले. पण पाठीवरची पिशवी मात्र पूर्ण पाण्यात भिजली. मोबाईलही पँटच्या खिशात होता, आणि तो खिसा मी पडल्यावर पाण्यात अक्षरशः पाण्यात पोहत होता पण वाटरप्रूफ मोबाईल असल्याने चिंता नव्हती. त्या डबक्यातून मग मी एकटाच कसाबसा सावरून उठलो आणि आधी बॅग चेक केली. बॅग ओपन केल्यावर वरून तरी कपडे कोरडे दिसत होते त्यामुळे मला हायसे वाटले. पण अचानक बॅग खूपच जड वाटायला लागली. मघाशी मित्राकडून पाण्याची बाटली माझ्या बॅगेत घेतल्याने जड झाली असेल असे वाटले आणि मग तसाच चालत राहीलो. 


 मुख्य नळीची सुरुवात

बराच वेळ त्या मोठ्या दगडांतून चालल्यावर मग एकदाचे आम्ही मुख्य नळीच्या तोंडाशी पोचलो. इथे आता बाजूच्या कड्याची सावली येत असल्याने उन्हाचा त्रास गेला. पण तसेही एव्हना सूर्य मावळतीला लागल्याने अंधार पडू लागला होता. एका दमात बराच मोठा पल्ला गाठल्याने आता बसूयात असा बेत करत असतानाच पुढे एक मोठा पॅच आहे जिथे वरून दगड पडू शकतात असे गाईडने सांगितले. तो पॅच काही झाले तरी थोडाफार उजेड असतानाच पार करूयात असे कमा भाऊंनी सांगितले मग काय थकल्यासारखे वाटत असूनही मग अंधाराच्या भीतीने तो अतिशय तीव्र चढाचा आणि तोही मोठमोठ्या दगडांनी भरलेला पॅच जोरात चढून गेलो, आणि ती वरून दगड पडण्याची जागा क्रॉस करून मगच आरामासाठी थोडावेळ बसलो. जिथे बसलो होतो तिथे बाजूला कड्यातून पाणी झिरपून ठिबकत होते, त्याखाली पुन्हा एकदा डोके ठेवून ते थंडगार तुषार डोक्यावर घेतले. पाण्याच्या धारेत पाण्याची बाटली धरून ते मस्त झिरपणारे गारेगार पाणी पोटभर प्यायलो.


नळीच्या वाटेमधून समोर दिसणारी माकडनाळ

आता अंधार अगदी गडद होत चालला होता. आणि पार करायचा होता तो एक अगदी निमुळता आणि मोकळ्या लूज मुरुमाच्या कपच्यांचा एक लांबच लांब पॅच. ही एक खूपच अवघड कसरत होती. एकतर अत्यंत कमी उजेड, थोडा जास्त भार दिला की पायाखालून निसटणाऱ्या कपच्या. अशा स्थितीत सांभाळून पाठीवरची जड बॅग बॅलन्स करत जपून चालायचे होते कारण दोन्ही बाजूंनी खोल असलेली ती एक निमुळती वाट होती. निघून निसटणाऱ्या कपच्यांमुळे एकेक पाऊल जपून टाकत तो टपरा अथकपणे सगळ्यांनी पार केला तेव्हा अगदी गुडूप अंधार पडला होता. अंधाराचा एक अत्यंत मोठा तोटा म्हणजे हा की अंधारात ट्रेकचे फोटोच मिळत नाहीत. म्हणजे फ्लॅश मारून स्वतःचे फोटो मिळतात, पण फ्लॅशची रेंज खूपच मर्यादित असल्याने त्या सुंदर ट्रेकचे लँडस्केप हे फोटोंतही मिळत नाहीत आणि आपल्यालाही दिसत नाहीत.

वरून दगड पडणारा आणि कपच्यांचा दोन्ही बाजूंनी दरी असलेले दोन अवघड पॅच तर झुंजूमंजू प्रकाशात पार केले पण आता पुढे आमची खरी परीक्षा होती कारण पुढचे दोन्ही रोप क्लाइम्ब आता आम्हाला गुडूप अंधारातच करावे लागणार होते. मग त्यापूर्वी थोडा आराम करावा म्हणून सगळे बसलो आणि आजूबाजूला नजर टाकली तर त्या अंधुक चंद्रप्रकाशात दोन्ही बाजूचे अक्राळविक्राळ कडे अगदी अंगावर कोसळण्याच्या बेतात आहेत इतके जवळ आणि डोक्यावर वाकल्यासारखे दिसत होते. उजव्या बाजूला कड्यावर एक मोठी शिळा अगदी टोकावर येऊन अडकलेली होती, आणि अंधारात ती शिळा एखाद्या शिरच्छेद करून ठेवलेल्या अजस्त्र राक्षसाच्या डोक्यासारखी भासत होती. तिथली भयाण शांतता, गडद अंधार, मधेच दुरून ऐकू येणारे माकडांचे चित्कार या सगळ्यांमुळे ही राक्षसाच्या मुंडक्याची केवळ कल्पना आहे हे माहीत असूनही एक अनोळखी भीतीचा शहारा मधेच अंगातून वाहून जात होता. थोडे बसून मग आम्ही क्लाइम्बला सुरुवात केली. पहील्या क्लाइम्बला आपापल्या बॅग तशाच पाठीवर ठेवून टॉर्चच्या उजेडात रोपने वरती चढून गेलो. दुसरा क्लाइम्ब मात्र काहीसा आडवे आडवे जाण्याचा आणि अधिक उंच व सरळ होता. टॉर्चच्या उजेडात कमाभाऊ रोप घेऊन वर गेले, आणि रोप धरण्यासाठी लहू खाली राहीला. कमाभाऊंनी वर पोचल्यावर एका ठिकाणी दोर बांधला आणि खाली सोडला. त्या दोराला बांधून आम्ही सगळे सामान आणि बॅगा आधी वर पाठवल्या आणि मग एकेक करून वरती चढायला सुरुवात केली. काळाकुट्ट अंधार असल्याने चढणाराला दिसावे म्हणून खालून टॉर्च मारत असताना माझ्या लक्षात आले की टॉर्चमुळे वर चढणाऱ्याची सावली समोरच्या कड्यावर पडते आहे आणि ती सावली इतकी प्रचंड मोठी दिसत होती की एखादा पाच मजली इमारती इतका उंच राक्षसच दोरीने वरती चढत आहे असे दिसत होते. हे तसे अत्यंत भयानक दृश्य असूनही आम्हाला भीती नाही तर मज्जा वाटत होती. वर चढत असताना समोरच्या कड्यावर पडणारी आपलीच विशाल सावली बघून एक वेगळीच मजा येत होती. भीती फक्त एवढीच होती की कुट्ट अंधारामुळे आजूबाजूला किती आणि कुठे खोल आहे व नेमका पाय कुठे ठेवावा ते कळत नव्हते. पण कमाभाऊंना सगळी नळीची वाट अगदी पाठ असल्याने कुठवर पोचल्यावर कुठे ग्रीप मिळेल आणि कुठे पाय ठेवायचा ते त्यांना चांगले माहीत होते. मग त्यांनी सांगितले तसेच पकडत आणि त्यांनी सांगितले तिथे पाय ठेवत गेल्यामुळे तो चढ वाटत होता तेवढा अवघड जाणवला नाही. कोणत्याही ट्रेकला चांगला आणि अनुभवी गाईड सोबत असणे किती फायद्याचे असते ते आम्हाला तिथे कळले.


 आमचे दोन बेस्ट गाईड्स लहू मुठे आणि कमाभाऊ पोकळे

सगळे वर पोचल्यावर मग तिथून परत त्या कड्याला वळसा घालून एका अत्यंत चिंचोळ्या वाटेवरून टॉर्च आणि मोबाईल्सच्या उजेडात आम्ही एकदाचे नळीच्या वरच्या खिंडीत पोचलो. मात्र उशीर झालेला असल्याने थांबायचे नाही हे आम्ही ठरवलेच होते. नळीची वाट खालून बघितली किंवा आधीही वरून बघायचो तेव्हा वाटायची त्यापेक्षा खूपच जास्त लांबीची आहे. संपता संपत नाही अशी ती सगळी चढाई होती. आता पोचलो असे वाटताच पुढे अजून एक खूप उंच टप्पा दिसे, तो पार केला की अजून एक. असे एकामागून एक कित्येक टप्प्यांची ती लांबच लांब अशी चढाई होती.
इथेही खिंडीत पोचलो म्हणजे आता दहा एक मिनिटांत वर पोचू असे वाटले होते पण कमा भाऊ म्हणाले की अजून खूप वेळ लागेल. अजूनही आम्हाला दोन अवघड टप्पे अंधारात चढायचे होतेच पण अजून एक अडचण होती ती अशी की करोनामुळे 2020 ला बहुतेक कुणीच नळीची वाट केली नव्हती. आणि कमाभाऊंनी सांगितले की 2021 मधेही नळीची वाट करणारे आम्हीच पहीले लोक होतो. नुकताच पावसाळा संपलेला असल्याने वाटेवर प्रचंड गवत वाढलेले होते. म्हणजे आम्हाला पुढे फक्त चढाईच करायची नव्हती तर दोन वर्षे वापरलीच न गेल्यामुळे गवताने बुजलेली वाट पुन्हा नव्याने बनवत चालायचे होते. बरे अगदी कमरेइतके वाढलेले गवत आणि मिट्ट अंधार अशा अडचणीतूनही गवतात लपलेले साप, विंचू बाजूला जावेत म्हणून काठीने गवत झोडत वाट बनवत बनवत पुढचे दोन्ही अवघड टप्पेही चढून जात आम्ही बरोबर रात्री साडेआठला वर कोकणकड्यावर पोचलो. म्हणजे तब्बल आठ ते नऊ तासांचा ट्रेक आम्ही फक्त साडेसहा तासात आणि तोही अर्धा पूर्ण मिट्ट काळोखात पूर्ण केला होता.

वर पोचल्यावर आता घामाने भिजलेले कपडे बदलावे म्हणून मी बॅग उघडली आणि बघतोय काय तर बॅगेतले सगळे कपडे पूर्णत: भिजलेले होते. जॅकेट, दोन्ही ड्रेस, टॉवेल, अंतर्वस्त्रे सगळे ओलेचिंब झालेले होते. मी खाली डबक्यात पडलो होतो तेव्हा बॅग उघडून पाहीले तेव्हा मला कपड्यांची फक्त वरची लेयर कोरडी दिसली होती, पण खाली खरेतर सगळेच कपडे भिजले होते. आणि मित्राची पाणी बॉटल घेतल्यामुळे नाही तर सगळे कपडे भिजल्याने माझी बॅग प्रचंड जड झाली होती. एवढी प्रचंड जड बॅग सहा तासांच्या थकवणाऱ्या चढाईतून आणली याचे दुःख नव्हते पण ती एवढी आणूनही त्यातील साधा रुमालही वापरण्यायोग्य राहीला नव्हता, आणि हे सगळे उगीच हेलपाट्याचे ओझे ठरले होते हे माझ्यासाठी खूप मोठे दुःख होते. मग मी मित्राचा टीशर्ट आणि शॉर्ट घालून ती वेळ रात्रीपुरती मारून नेली.

सकाळी कोकणकड्याचे फोटो काढण्याचा मोह प्रत्येकाला होतोच

दुसऱ्या दिवशी उतरताना आम्ही सादड्याच्या घाटाने उतरलो. कालची नळीची वाट प्रचंड कस लावणारी होतीच पण त्यावर कडी म्हणजे या सादडे घाटाने उतरणे हा तर अजून दिव्य अनुभव ठरला. प्रचंड सुंदर आहे सादडे घाट. पण इतका लांब आणि इतका उतरता आहे की उतरताना आम्ही सगळे खरेच अक्षरशः गलितगात्र होऊन गेलो होतो. प्रचंड जास्त अंतर असल्यामुळे उतरणे हा अनुभव चढाईपेक्षा त्रासदायक होता.


उतरण्याचा मार्ग - सादडे घाट

परत सहा सात तासांच्या उतराईनंतर सादडे घाटाच्या खाली पोचल्यावरही एक नदी लागली आणि मग लगेच कालच्याप्रमाणे आजही आम्ही पुन्हा नदीच्या वाहत्या पाण्यात स्वतःला झोकून दिले तेव्हा कुठे हायसे वाटले.

तळटीप: नळीच्या वाटेने जात असताना समोर दिसणारी अजूनच अवघड असलेली माकडनाळ ही आम्हाला खुणावत होतीच. आणि नळीच्या वाटेच्या अनुभवाच्या जोरावर लगेच तीनच महिन्यांच्या आत आम्ही तीही मोहीम फत्ते केली.




..

सोमवार, २१ मार्च, २०२२

कविता - जागतिक कविता दिन

 

उगीच वाटते की आपणांस कळते कविता
आपलीच आपल्याला किती छळते कविता

बागडत राहते कधी उनाड पोरासारखी गावभर
कधी अव्यक्ताच्या पिंजऱ्यात व्याकुळते कविता

शब्दांच्या अमिषालाही फसत नाही कैकदा
कुणास ठाऊक का मला अशी वगळते कविता

आनंदाचा चेहरा होते, कधी सुखाचा कल्लोळ
स्वप्नांचे किती पुष्पहार गळा माळते कविता

माझ्या हाकांना देत नाही प्रतिसाद अनेकदा
तुझ्या आवाजास मात्र नेहमी भाळते कविता

वार फुलांचेही सहन होत नाहीत तिजला
अनावधाने जखम होऊन भळभळते कविता

मनाच्या अगदी खोल आत ठेवतो दडवून
तरी व्यथेतून थेंब थेंब ओघळते कविता

किती मोहक होतो तुझ्या माझ्यातला दुरावा
आपल्यातल्या अंतरात जेव्हा मिसळते कविता

दुःखाचे सरपण लपवून ठेवतो मी तिजपासून
अन्यथा अंतर्बाह्य मला खाक जाळते कविता

तू सोडून अन्य विषय नाही तिला बोलायला
पण नाव मात्र तुझे कटाक्षाने टाळते कविता

माझ्या हातांतून स्त्रवत नाही कागदावर कधी
तुला पाहताना नजरेतून जी निथळते कविता





..