हा ब्लॉग शोधा

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

सीमेवर..

आडव्या उभ्या रेघांचे प्राणहीन नकाशे फक्त..
परतीची वाट पाहून डोळ्यात आता उतरले रक्त..!!

पक्षीण जशी जाते फुलत्या वयात पिलाला एकटेच सोडून.!
मायभू घेते आहे दुधाचे... पुरते पांग फेडून..!

निरोपाच्या फुलांचे मनात अजून घाव ताजे..
रस्त्यावरचा दगड सांगतो दूर अजून गाव माझे..!

मलयाच्या शीतलाम हवांनो आणा एक ओळखीचा गंध..
माझ्या सह्याद्रीवरून वाहणारी एखादी तरी झुळूक मंद.!

दिल्लीच्या मुत्सद्द्यांचे पडोत कसेही फासे..
देशासाठी केले आम्ही वध-स्तंभांचे उशे.!

छातीचा करून कोट उभा दिन-रात, माते तुझ्या साठी..
आसेतुहिमाचलास्तव अभिमानाने सांडेल हे रक्त मराठी.!


गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

२६ नोव्हेंबर

भीषण भयावह तांडव करीत आली एक रात्र..
निष्पाप जीवांचे अग्निकुंडात करावयास होत्र..

अकस्मात पडली, गिधाडांची धाड..
निशस्त्रांना मारीत गेले, निर्दयी भ्याड.!

झडल्या फैरींवर फैरी, उठले धुरांचे लोट..
अचंभून भेदरले, तमाम शंभर कोट.!


चालते फिरते देह झाले, रक्त मांसाचा चिखल..
रस्तोरस्ती जखमांचे अन यातनांचे कोलाहल.!


अडीच दिवस लांडग्यांनी, ठेवला ताज ओलीस..
प्राणपणाने लढले आमुचे, कमांडो अन पोलीस.!

मग पेटला जनसागर अन उसळली गगनचुंबी लाट..
शत्रूंचा घास गिळूनच, शमला समुद्रकाठ.!

अमाप  शौर्याने लढले, मातृभूमीचे सपूत..
एक एक वेचून ठेचले, दहशतीचे दूत.!

आता नाही सहन करणार, एकही जिव्हारी वार..
आक्रमणाआधीच परजून उठेल, स्वरक्षणार्थ तलवार.!

ज्योत शहिदांच्या बलिदानांची, राहील तेवत उरी..
अखंड वैभवाने नांदेल, सदैव मुंबापुरी.!

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

काही बोलायाचे आहे..

थोडे बोलायचे होते miss झालेल्या महाभारताच्या episodes वर..
A R रेहमानच्या अंतरंगात निनादणाऱ्या nodes वर..


बऱ्याच मध्यरात्री न हिंडलेल्या सूर्यावर..
सह्याद्रीच्या राकट दगडी वाऱ्यावर..

गणपतीने पुऱ्या न केलेल्या नवसावर..
किंचाळणाऱ्या नोव्हेंबरच्या पावसावर..

थोडे बोलायचे होते.. अहिल्येच्या शिलेवर..
गुलजारच्या शब्दांत भिजणाऱ्या उर्मिलेवर..