हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

एक हरवलेली आठवण..

आठवणी.. काही बऱ्या, काही वाईट, थोड्या ओल्या, थोड्या कोरड्या.. बऱ्याचदा अवखळ.. बऱ्याचदा स्थितप्रज्ञ.. काही वारंवार सापडणाऱ्या, काही वारंवार हरवणाऱ्या.. शब्दांनी बांधलेल्या, शब्दांनी तुटलेल्या तर काही नुसत्याच मुक्या अबोल भावनांत गोठलेल्या..!! एक अशीच हरवलेली आठवण शोधतोय.. स्मृतीपटलावर कुठेशी ऊन्हे झेलीत, वादळे सोशीत, असेल तग धरून अजुनही..कदाचित..!! काही भेटी, काही प्रसंग, काही माणसे असतात ना अशीच अस्पष्ट, धूसर, फिकट..!! एखादी मैफल.. एखादा सिनेमा.. त्यातले एखादे पात्र, एखादा प्रसंग, एखादा संवाद.. एखादा सूर.. अचानक आठवेनासा होतो.. ती अनुभूती आठवते पण त्याचा साक्षात्कार होत नाही.. म्हणजे बर्फाखालून पाणी वाहते आहे एवढेच कळावे, पाण्याचा स्पर्श मात्र होऊ नये असेच काहीसे.. एखादे खूप आवडते इतरांदा सहज ओठावर येणारे गाणे कधी कधी आजिबात आठवत नाही.. रात्री अमाप सुखावणारे वा दुखावणारे स्वप्न सकाळी थोडेही स्मरत नाही.. फक्त एक अनुभूती उरलेली असते त्या प्रसंगांदरम्यानच्या भावनांच्या उत्कटतेची.. तीही अस्पष्ट, पुसटशी.. मात्र प्रचंड बेचैन करून जातो यातला प्रत्येक अनुभव..!!
स्मृती एक अजोड वरदान आहे.. आणि विस्मृतीही..!! सुखकर स्मृतींच्या वारंवारीतेने जसे सुख मिळते तसेच दु:खद गोष्टींच्या विस्मृतींनी दु:ख हरते. म्हणूनच स्मृती आणि विस्मृती ही दोन्ही दैवी वरदाने आहेत.. पण सुख आठवावे आणि दुःख विसरावे एवढे सरळ साधे असेल तर ते मानवी मन कसले.!! हे मन मोठे विलक्षण आहे. ते दु:खद स्मृती सहजतेने विसरत नाही आणि आणि कित्येकदा सुखद स्मृती उगीच हरवून टाकते.. जे नकोसे त्यास जपून ठेवते आणि हवे हवेसे त्यास लपवून टाकते.. या मनाच्या स्मृती-विस्मृतींच्या खेळात फक्त रंगमंचासारखा प्रवेश आणि निकास एवढेच नसते.. या दोन्ही स्थितींच्या मध्येही एक स्थिती असते, अस्पष्ट आठवणींची.. अर्ध्या-मुर्ध्या विरलेल्या सुरावटींची.. फिकट पडलेल्या रंगांची, ढगाआड दडलेल्या सूर्याची.!! म्हणजे तिथे असलेल्या त्या स्मृतीची जाणीव असते, फक्त तिचे प्रारूप स्पष्ट होत नाही..
आठवतं तुला? असं म्हणून जेव्हा तू आपले जुने ते काही उलगडत जातेस ना तेव्हा मी पुन्हा कुठेतरी हरवत असतो.. तू मांडलेली असतेस एक जुनी संध्याकाळ उघडून समोर.. आणि माझे विश्व फक्त श्रुतींमय झालेले असते.. अजूनही तुझा स्वर तसाच कापरा होतो तेव्हाच्या दिवसांबद्दल बोलताना.. आणि आताही मी अंतर्मनात तसाच झंकारत असतो.. तुला ऐकताना कधी माझे मी पण अस्तित्वात नसतेच.. आणि नव्हतेही.. माझ्या तमाम जाणीवा फक्त श्रुतींत एकवटलेल्या असतात.. एखाद्या अनोळख्या भाषेतली सुंदर स्वर्गीय मेलडी मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावी तसेच.! तसा तुझा शब्द न शब्द पाझरलेला असतो कणाकणात.. मात्र त्याला अर्था-अनार्थांची मोजमापे लावली जात नाहीत.. फक्त एक अनुभूती.. एक गोड हुरहुरती जाणीव भरून राहते आसमंतात.. महिन्याभरातून कधीतरी पौर्णिमेच्या चंद्रासारखी तू भरून आलेली असतेस.. आणि मग मी फक्त त्या चांदण्यात न्हाऊन घेतो.. कित्येकदा हुंकारूनही मला प्रतिसाद द्यावासा वाटत नाही.. टिपेस लागलेल्या सुराला टाळी वाजवून दाद दिली तर रसभंग होतो ना तसेच काहीसे.. तुला हे पटत नाही.. आणि मग.. माझ्या अबोल्यास दुर्लक्ष समजून तू किती अबोल होतेस..
काल पहिल्या भेटीची आठवण काढलीस.. आणि विचारलेस शंभर प्रश्न मला निरुत्तर ठेवणारे.. त्या क्षणांचे हिशेब मांडून मी ते कधीच नोंदवून ठेवले नव्हते.. म्हणूनच पहिली, दुसरी आणि त्या तमाम भेटी मला एकसारख्याच वाटतात आजतागायत.. पण तुला प्रत्येक भेटीतला एकूण एक बारकावा मला आठवायला हवा असतो.. म्हणूनच आज म्हंटले.. मनाच्या तावदानावरचे धुके पुसून पहावे पलीकडचे काही दिसते का ते.. ही जाणीव आता नवी आहे.. अनुभूतींच्या पलीकडले काही आठवावेसे वाटेल असे कधीच वाटले नव्हते आजपर्यंत.. पण आता ते वाटते आहे..!तेव्हा पहिल्या भेटीत तू आधी बोललीस की मी? तुला मी ऐकविलेला पहिला शब्द कोणता होता? तू अनोळख्यासारखी बोलत होतीस की मीच जन्मांतरीची ओळख असल्यासारखे ऐकत होतो? एक भावनांच्या उत्कटतेची पातळी वगळली तर जगातल्या तमाम पहिल्या भेटींपेक्षा काय वेगळे घडले होते? आजही जेव्हा कधी आपण निवांतसे बसलेलो असतो तेव्हा जानविणारी घट्ट ओढ पहिल्या भेटीतही तेवढीच होती का? आज एकमेकांचे अनेक पैलू उलगडल्यावर जो विश्वास, जी दृढता जाणवते नात्यातली, त्यातली कितीशी तेव्हा जाणवली होती? हे सगळे तुला तरी आठवते का? एक फरक मात्र आहे पहिल्या अणि तद्नंतरच्या तमाम भेटींत.. पहिल्या भेटीत पूर्वीची कोणतीही आठवण नव्हती.. एवढे वगळता बाकी काय बदललेले होते? तू भरविलेला पहिला घास मी कितीवेळा चावला हे लक्षात ठेवले असते तर त्याचा आनंद पुरेसा कसा मिळाला असता? तुझ्या चेहऱ्यावरचे पहिले हसू आणि डोळ्यांतला पहिला आसू.. सगळ्या ब्रम्हांडातही साठवता येणार नाही एवढे विशाल आणि एवढे खोल होते.. मग ते सर्व स्मृतींत कसे साठवून ठेवता येतील? आणि तुझा आग्रहच असेल तर चल आज निवांत समुद्रकिनारी जाऊ दोघेच.. पुन्हा मावळत्या सूर्याच्या साथीने.. अगदी खात्रीने सांगतो.. आज जे काही घडेल ना.. त्याहून काहीही वेगळे घडलेले नसेल तेव्हाही..!! आणि खरेच विचारशील ना मला तर आजही माझ्या क्षमता त्या सगळ्या भावनांना यथावत साठवून नाहीच ठेवू शकणार..!!

२ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Kaal paravaach kuthetari vaachal' ki Europe madhalya eka agency ne aakkhya bramhandacha foto kadhala! Foto hi paahila. Pan pahataana he jaanavalach ki tya andakruti aakarachya baaher kahitari aahe ani aaplya dnyaan, jaaniva an kalpanaanchya kshitijaachyahi baaher!

    He vaachataanahi asach kaahitari jaanavalay baba! 'Shabdanchya palikade' ya shabdaanmadhehi n' maavanaar'! Sundar, uttung, afaat, bhayanak he shabdahi kuthetari aadoshyala mutakuli maarun basalet kadhich gaarthun! Mag thambayach ka ithech?

    Utkhanan joraat chalu raahu de! Kahi ardhe murdhe tutake avayav haati laagtil, kaahi futaki bhaandi; kaahi anukuchidaar shastr' tar kaahi shilaalekhahi! He sagal' sagal' hav' aahe! Fakt varachi dhool pusun tar kalas'ch disel, mala gaabha havaay, tya gabhyaatun zirapnaari ti avit shaantata, to chittvrutti stabilize karnaara thandpana, he havay malaa! Mala maahit ahe menduchya 2/4 abj peshintun barobar havi tich peshi shodhun kaadhaayachi kiti avghad aahe te! Kadaachit saapadnaar naahich, pan mag ata thambaaych ka ithech?

    NAAHICH! Tu lihich! Kas' sangu? Ti aasamantaat bharun rahanaari hurhurati jaaniv shabdaant gothavanaari kshamata maazyat naahi, pan maazya lihinyaatala ekhada 'paachu' tu ya ratnjadit kathet nakkich taakat raha!



    Ani ho, hi kavita naahi, thoda sail houn mokala lihi! Shabdaanchya premaat faar nako padus! Shevati he sagal' shabdaachya palikadalech! Fakt ek lekh asata tar ha form great ch! Pan aapalyala khup khup motthi gosht lihaachiy! Hich aapali theme! haravalelya, lapalelya, gaadalelya zaakolelya an fakt anubhuti shillak raahilelya aathavaninche khodkaam!

    उत्तर द्याहटवा