हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

गाव

  
दूर कुठेसे एक गाव होते, जीवाभावाची माणसे होती..
हिरव्यागार शेतांमध्ये.. मोत्यांची कणसे होती..!!

राबते बैल होते, दुभत्या गायी होत्या,
करवंदांच्या जाळी होत्या, आंब्यांच्या राई होत्या..!!

वासुदेवाची साद होती, कोंबड्याची बांग होती..
एकादशी, पुनवेला... देवळाला जाग होती..!!


आषाढाच्या एकादशीला, पंढरीची वारी होती..
चैत्राच्या जत्रेत, तमाशाची बारी होती..!! 

इवल्या इवल्या सोहळ्यांचे, नाच होते, गाणी होती..
जत्रेतल्या दुकानात
मातीचे बैल होते, पिपाणी होती..!! 

पाहुण्याच्या स्वागताला, सताड उघडी दारे होती..
बाजाराला नेण्यासाठी रडणारी पोरे होती..

आल्यागेल्याला रामराम.. वयोवृद्धांना आदर होता..
लेकीसुनांच्या डोक्यावर.. लाजेचा पदर होता..!!!

मैतरांच्या गाठीभेटींत, पान तंबाखुचा विडा होता..
भाऊबंदकीच्या भांडणात चपलेचा जोडा होता..!!

उखळा-जात्यांवर गायलेली, माहेराची गीते होती..
जमिनीचा ऊर फोडणारी, चार बैलांची औते होती..!!

चावडीपुढच्या पारावर रंगणारी खलबते होती..
गावकुसाच्या पिंपळावर, झपाणारी भुते होती..!!

बांधावरच्या झाडाखाली, न्याहरीची पाटी होती..
खेळताना छपरावर, अडकणारी विटी होती..

दारामध्ये सर्जा राजाची, घुंगराची बैलगाडी होती..
भाऊबीजेला माहेरवाशिणीला, हक्काची साडी होती..!!!


याच्या त्याच्या कार्याला झटणारे मदतीचे हात होते..
अठरा पगड, बारा बलुते गुण्यागोविंदाने राहत होते..!!


माणसे आहेत अजूनही,  पण ओळखीचे कुणी दिसत नाही..
तसेच मेघ दाटून येतात.. डोळ्यांतून मात्र बरसत नाही..!!


नळ आले, पूल झाला, आता नदीत कुणी उतरत नाही..
विजेचे दिवे ओलांडून, चांदणे अंगणात झरत नाही..!!

देवळातला दत्त दिगंबरही आता नवसाला पावत नाही..
दूरचे ते गाव अलीकडे, स्वप्नामधेही गावत नाही..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा