राम म्हणाला, "लक्ष्मणा.! आज कमंडलूतले पाणी गढूळसे आहे.
आचमन कसे घ्यावे?
कावडीचे जलही तांबडेसे दिसते.
जानकीने अन्न कसे शिजवावे?"
लक्ष्मण म्हणाला, "देवा, गेली चौदा लाख युगे,
हा सह्याद्रि वनवास भोगतो आहे..
अन् पुन्हा एकदा जगत्कल्याणास्तव,
वरुणराजास अंगाखांद्यावर घेऊन नाचतो आहे..!!"
"हिरव्या साजात सजला आहे,
मेघांचे उत्तरिय ल्याला आहे..!!
कित्येक गंगा शिरी धारणारा,
जणु दुसरा सांब भोळा आहे..!!"
"पण राघवा, कितीही दृढ महापुरुष असला तरीही,
काळजात कुठेतरी असतोच ना पीळ..
हलाहल प्राशतो म्हणणारांचाही,
कंठ होतोच ना नीळ..!!!"
"घामांच्या धारा असोत वा खळाळते निर्झर,
आतली वेदना ज्याची त्यालाच कळते..!!
म्हणूनच रघुनन्दना, या राकट पर्वताचेही
अमृत होऊन वाहण्यापूर्वी, पाणी जरा गढुळते..."
Apratim...
उत्तर द्याहटवाDhanyavaad Mayur
उत्तर द्याहटवा