हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

सुख जवापाडे

वेळ- भविष्यातले "क्ष" वर्ष
जगभरातल्या न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांचे मथळे एकाच बातमीने आठवडाभर भरून गेले आहेत. केंब्रीज विद्यापीठातले जैवतंत्रज्ञानाचे भारतीय वंशाचे प्राध्यापक श्री. समीर बोऱ्हाडे यांचा "नेचर" या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेला प्रबंध हे त्याचे कारण होय. यापूर्वी प्रा. बोऱ्हाडे यांचे तीन प्रबंध "नेचर" मध्ये प्रकाशित झाले होते परंतु यावेळी मात्र त्यांच्या प्रबंधास जगभराने डोक्यावर उचलून घेतले आहे. प्राध्यापक महाशयांनी सुखाच्या गुणसुत्राचा म्हणजे डीएनए कोडचा शोध लावला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यावरून एक लस देखील तयार केली असून ती लस टोचताच कुणालाही सुखी होता येणार आहे. प्राध्यापक म्हणाले की आज मी जगातला सर्वात आनंदी माणूस आहे, कारण मला सापडलेल्या सुखाच्या सूत्राने मी जगातले सगळे दु:ख संपविणार आहे. आता एकाही मनात निराशा नांदणार नाही. आणि एकाही डोळ्यात अश्रू असणार नाहीत.   
...
वेळ- "क्ष" वर्ष+एक महिना… 
जगभरात आता चर्चांचा काथ्याकुट चालू आहे. डब्लू.एच.ओ.च्या देखरेखीखाली जगातल्या जवळ जवळ सगळ्या देशांनी आपल्या तमाम नागरीकांस ही लस टोचण्याचा निर्णय घेतला आहे.  आणि ज्या देशांच्या सरकारांनी असा निर्णय घेतला नाही तिथल्या विरोधी पक्षांच्या निवडणूक जाहिरनाम्यांत तो स्वीकारण्याचा वायदा केला गेला आहे. किंबहुना जाहीरनाम्यात हा एकमेव वायदा आहे. सगळे वैज्ञानिक हे 'हाच जगातला अंतिम शोध होय' असे सांगू लागले आहेत. सगळे धर्ममार्तंड हे 'ही लस म्हणजे ईश्वराचा प्रसाद' असल्याचे सांगत आहेत. कम्युनिस्ट या अभूतपूर्व लसीने येऊ घातलेल्या समानतेमुळे आनंदी आहेत तर भांडवलदारदेखील पैसा हा शेवटी आनंदासाठीच असतो आणि तो आनंद आता आयताच लाभतो आहे म्हणून खुश आहेत.
...
वेळ- "क्ष"+एक वर्ष…
आता सगळ्या जगभरात ही लस टोचली गेली आहे. लस टोचून घेण्यास कुणीही अपवादानेदेखील विरोध केला नाही. सुखी कुणाला व्हायचे नाही? काही विशेष घटना घडली नाही, संपत्ती प्राप्त झाली नाही, इतर कोणतीही मिळकत नाही, तरीही प्रत्येक जण  एका अलोट आनंदाच्या लाटेवर स्वार आहे. कुणीही कोणत्याही कारणाने अथवा विनाकारण आनंदी होत आहे. नुसता सूर्य उगवल्याने लोकांस आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, मावळल्याने फुटताहेत. भूक लागली म्हणून लोक आनंदी आहेत, भागली म्हणून आनंदी आहेत. आवाज आला, आनंद! शांतता आहे, आनंद.! डोळे उघडा, आनंद! बंद करा, आनंद.! बोला, आनंद! शांत बसा, आनंद.!! काम करा, आनंद! करू नका, आनंदच..!! शाळा नाहीत, ऑफिसे नाहीत, बँका बंद पडल्या आहेत, शेअर मार्केटात बैल अन अस्वलांच्या मुर्त्या सोडून कुणीही उरलेले नाही. कित्येकजण त्यांची आवडती कामे जी त्यांस आधी करायला मिळाली नाहीत ती करून घेत आहेत. माणसे स्वखुशीने शेतात राबताहेत, गाणी बनवून गाताहेत, कारखान्यांत कामे करताहेत. कुणी गाड्या चालवत आहे, कुणी कम्प्युटरवर वेगवेगळे सॉफ्टवेअर लिहितो आहे. पण या कामांना वेळेचे बंधन नाही. कोणतेही टारगेट नाही. जो तो हवे ते हवे तेवढे करतो आहे.  जगातल्या सगळ्या दहशतवादी संघटनांनी समर्पण केले आहे. सगळे फरार गुन्हेगार समोर आले आहेत. त्यांना कुणी अटकही करत नाहीये. तुरुंग ओस पडले आहेत, घरे ओस पडली आहेत. शहरे, गावे आणि अगदी देश वगैरे अशा सीमाच राहिल्या नाहीत. माणसे कुठेही फिरताहेत. कुणीही मनाला वाटेल ते काम करताहेत, मन भरले की ते काम सोडून देताहेत. चराचरात नुसते सुखच सुख आहे.
...
वेळ- "क्ष"+दोन वर्षे... 
प्रेयसींनी, बायकांनी रुसणे सोडले आहे. कारण त्या रुसल्या तरी प्रियकरा-नवऱ्यांस आनंदच होतोय. पोरे आईबापांस वैताग देऊ देऊन वैतागली पण आईबाप आपले आनंदीच.  एका फडतूस नटाने अत्यंत वाईट सिनेमा काढला,  प्रेक्षक आनंदीच.  शंभर कवींच्या नवकविता ऐकूनही श्रोता खुश. तो सर्वात लोकप्रिय क्रिकेटर सलग दहादा शून्यावर गेला तरी देशात आनंदाचे भरते आलेले.  भाजीत मीठ नाही, पण खाणारे खुशीत. आजारी झाला तर डॉक्टर पेक्षा रुग्णच आनंदी आहेत. पोरे कडू औषधे पिऊनही हसत आहेत.   

वेळ- "क्ष"+चार वर्षे...  
जगभरात आज खळबळ माजली आहे. सगळ्या टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्रे, इंटरनेटवर एकच खबर ऐकायला मिळत आहे. भारत नावाच्या देशात, महाराष्ट्र नावाच्या राज्यात, मुंबई या शहरात एक माणूस लस टोचल्यानंतरही दु:खी झाल्याचे आढळून आले आहे. सदरहु माणूस हा पूर्वाश्रमीचा (म्हणजे लसीपूर्वीचा) राजकारणी नेता असल्याची माहिती आहे. जगभरात अफवांना ऊत आला आहे. लस बनविणाऱ्या कारखान्यातील एक लॉट हा सदोष असल्याची अफवा पसरली आहे. डब्लू.एच.ओ.मध्ये नव्या ऐच्छिक संचालक मंडळाने सदरहु प्रकरणात सखोल चौकशीची शिफारस केली असून (हल्ली कुणीही आदेश देत नाही, शिफारस करतात) लोकांस अफवांवर विश्वास न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
...
वेळ- "क्ष"+पाच वर्षे... 
डब्लू.एच.ओ.द्वारा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर येत आहेत.  सदरहु नेत्यानंतर त्याचा पूर्वीचा मित्र असलेल्या एका मोठ्या उद्योगपतीस दु:खावेगाचा झटका आल्याचे समितीने नमूद केले असून हळू हळू जगभरातल्या इतर नेते आणि उद्योगपतींत ही कमतरता पसरू लागली आहे. या नेते आणि उद्योगपतींनंतर कित्येक सामान्य माणसांतही हळू हळू दु:खावेगाची लक्षणे दृष्टीस पडू लागली आहेत. यामागच्या कारणांचे निष्कर्ष हे धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
...
वेळ- "क्ष"+सहा वर्षे... 
माणसे आनंदी झाली, सुखी झाली, पण पूर्ण समाधानी झाली नाहीत. मध्यंतरी अलास्कातून जपानला गेलेल्या काही पर्यटकांनी असे नमूद केले की तेथील लोक हे जगातील इतर लोकांपेक्षा अधिक आनंदी आहेत. त्यामुळे जपान्यांनी लसीच्या मूळ घटकांत काही बदल करून आपल्या नागरिकांस सुधारित लस दिली असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. पण हा केवळ एक आरोप ठरला. मात्र आता संशयाचे हे भूत संपूर्ण जगात पसरू लागले आहे. सुरुवातीचा आनंदाचा बहर ओसरल्यावर लोक एकमेकांत आपल्या सुखांची तुलना करू लागले आहेत. तुलनेतून लोकांस असे वाटू लागलेय की सगळेच आनंदी असल्याने आनंदात काही वेगळेपण राहिलेले नाहीये. प्रत्येक क्षण आनंदाचा असल्याने आनंदही कंटाळवाणा ठरू लागला आहे. याहीपेक्षा आपण स्वत: तर आनंदी आहोतच मात्र आपल्यापेक्षा इतरजण अधिक आनंदी वाटत आहेत. लोकांना कळले आहे की काही लोकांना विशिष्ट काम केल्यावर अधिक आनंद मिळतो. मग सगळे लोक तीच कामे करण्यासाठी धडपडू लागले आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक जण गाडी चालविण्याची संधी शोधू लागला आहे, विमान उडविण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. पण प्रत्येकाला ती संधी मिळेना. काहीजण तर गवतावरून अनवाणी चालणे हे त्यांचे आवडते काम असूनही गाडी चालविल्यास वेगळा आनंद होईल काय या कुतूहलातून गाडी चालविण्याची कामना बाळगू लागले आहेत. विशेष म्हणजे जे काम करण्याची इच्छा झाली ते काम करण्यास मिळाले नाही तरी लोकांस आनंद हा मिळतच आहे कारण लस ही काहीही झाले तरी आनंदाची अनुभूती देणारीच आहे. पण लोकांचे समाधान होईना. तोच तोच पणा तीच ती भावना याचा लोकांस कंटाळा येतो आहे. जे आपल्याजवळ नाही ते मिळाल्यावर अथवा जे आपणास करायला मिळत नाही ते केल्यावर कसे वाटेल याचे कुतूहल लोकांना सतावू लागले आहे. खरेतर जगात आता दु:ख व्हावे असे काहीच उरले नाहीये. प्रत्येक गोष्टीत केवळ आणि केवळ आनंद आहे. मात्र इतरांस जे मिळते आहे त्याची आपल्यास स्वभावत: आवड असो वा नसो, त्या गोष्टीची आपणांस गरज असो वा नसो पण ते दुसऱ्याजवळ आहे आणि आपल्याकडे नाही एवढेच नव्हे तर दुसऱ्यास कदाचित तिच्यायोगे काही विशेष आनंदाची प्राप्ती होत असेल, ही भावना माणसांस सतावू लागली आहे. काहीजणांस उगीच आपले लसीकरणपूर्व आयुष्य अधिक रमणीय आणि रोमांचकारी होते असे वाटू लागले आहे. जो पहिला दु:खी माणूस समोर आला होता तो राजनेता याच भावनेतून दु:खी झाला होता. आपणांस जे मिळते आहे तेच इतरांना मिळते आहे हे पाहून त्याचे आपल्या सुखद अनुभूतींनी समाधान होईना. मी पूर्वाश्रमीचा कुणी विशेष असतांना आता एक सामान्य झालो आहे या भावनेने तो पूर्वीपेक्षा आता अधिक आनंदात असूनही असमाधानी राहू लागला. इतर राजनेते आणि उद्योगपतीही याच भावनेतून असमाधानी झाले.  जगात इतरत्र असलेल्या कित्येक अनोळखी गोष्टींपासून आपण कदाचित वंचित असू अशी भावना लोकांत मूळ धरू लागली आहे. जे दुसऱ्याकडे आहे ते मला आवश्यक असो की नसो, दुसरा आनंदी दिसतोय म्हणजे ते मला मिळायलाच हवे असे प्रत्येकजणास वाटू लागले आहे.
....

लसीकरणाच्या पूर्वीची स्थिती तरी कुठे वेगळी होती? प्रत्येकाकडे काही गोष्टी होत्या, काही नव्हत्या. जोपर्यंत एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही याची कल्पना नव्हती तोपर्यंत सगळे काही व्यवस्थित चालू होते. पण एखादी वस्तू दुसऱ्याकडे दिसली की ती आपल्याकडे नाही म्हणून माणसे दु:खी होत होती. त्यांना उगीचच त्या गोष्टीची गरज वाटू लागे आणि मग ती मिळविताना अपयश आले की ती अजून दु:खी होत. आणि समजा ती गोष्ट मिळालीच तरीही पुढे लगेच दुसरी गोष्ट दिसत असे. आणि मग पुन्हा ती नवी गोष्ट मिळविण्याची धडपड चालू होई. खरेतर दु:ख हे आपल्याकडे एखादी गोष्ट नाही याचे नसते, तर आपल्याकडे एखादी गोष्ट नाही पण ती दुसऱ्याकडे आहे याचे असते.

 वेळ- "क्ष"+आठ वर्षे...
प्रसंग-प्राध्यापक बोऱ्हाडे यांची प्रेस कॉन्फरंस.
प्राध्यापक म्हणाले, आज माझ्यावर जगातल्या जवळ जवळ ४६ देशांतल्या न्यायालयांत केस दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी जामीन मिळविण्याएवढी रक्कम आणि वेळसुद्धा माझ्याकडे नाही. आठ वर्षांपूर्वी मी खूप उत्साही आणि आनंदी माणूस होतो, कारण माझा प्रयत्न प्रामाणिक होता. मला जगातली सगळी माणसे सुखी करायची होती. पण आता माझ्या लक्षात आले आहे की असे कधीही होऊ शकत नाही. कारण मानवी भावना, कल्पना, गरजा या अमर्याद आहेत. माणसाचे कुतूहल आणि नित्यनाविन्याची आस हाच त्याच्या सुख आणि दु:ख या दोहोंचे कारण आहे. डबके साचलेले राहिले की ते कुजते आणि त्यात दुर्गंधी येऊ लागते. माझी सुखाची लस ही त्याच डबक्यासारखी होती. स्थिर. अप्रवाही.!! जीवन प्रवाही आणि गतिशील असावे लागते. ते अवखळपणे वहावे लागते. त्याला उन्हाचे चटके आणि मेघांची छाया अशा दोघांचीही आवश्यकता असते तेव्हाच त्याचे सौंदर्य खुलते. दु:ख असले तरच सुखास किंमत आहे. सुख किंवा दु:ख ही कुठलीही विशिष्ट आणि ठोस अवस्था नाही ती फक्त एक तुलनात्मक स्थिती आहे. म्हणूनच दु:ख जेवढे मोठे तेवढाच सुखाचा आनंद मोठा होय. जवापाडे सुखासाठी दु:ख पर्वताएवढे हवेच हे मला उमजले नाही, म्हणून सुखाची लस बनविणारा मी स्वत:च आज जगातला सर्वात दु:खी माणूस आहे.

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

इज्या, बिज्या आणि फज्जा

जाऊ तिथे शहाणपणा हा आमचा दोघांचाही स्थायीधर्म.! मी आणि विज्या.! आमच्या जोडगोळीला सगळे "इज्या-बिज्या" म्हणतात, आम्हाला तिज्या मात्र कधी मिळाला नाही. तर, कुठेही जावो, काहीही कानावर पडो, आम्ही आपल्या मताची इथे तिथे पिंक टाकणारच. विषय अनोळखी असला तरी पत्ते वाटल्यासारखे धाड धाड सल्ले आम्ही वाटत असतो. आणि विषय ओळखीचा निघाला तर? मग मात्र आमच्या अस्मानभराऱ्यांस आभाळही थिटे पडलेच म्हणून समजा. गप्पा अशा मोठ्या मोठ्या आणि एवढ्या अविर्भावात की आजूबाजूच्या लोकांस वाटावे की हे कुणीतरी खूप मोठी असामी आहेत की काय. विशेषत: स्टेशनवर किंवा लोकलमध्ये अथवा एखाद्या पर्यटनस्थळी, हॉटेलात, किंवा कॉन्फरंसमध्ये, लग्नात इत्यादी, थोडक्यात काय तर जिथे खूप श्रोते असतील तिथे आम्हाला एक प्रकारचे स्फुरण चढते. एकदा एका लग्नात आमच्या "हिंदी चित्रपटसृष्टीतील विवाहाचे चित्रीकरण" या विषयावरची गहन चर्चा ऐकून तीन जणांनी आग्रह करून आमच्या बरोबर फोटो काढून घेतला होता. एकदा एका पार्टीत वाजत असलेल्या एका गीताची चाल ही कशी पॉल लुईस (कधीही अस्तित्वातच नसलेला गायक) याच्या गाण्यावरून घेतली आहे इथून सुरु झालेली चर्चा थेट वर्तमान भारतीय संगीतावर प्रखर ताशेरे ओढत राजा कृष्णकृतवर्मा (हा कोण कुणास ठाऊक) याच्या दरबारातील "पंडित धृत्पद्मनाग" या गायकाने रचलेल्या "बैसाख शलाका" या रागाच्या उत्पत्तीपर्यंत येउन ठेपली (आता हा गायक आणि त्याचा राग हे म्हणजेही केवळ "पुड्या" हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच). आमच्या या महान संगीत ज्ञानप्रकाशाने दिपलेल्या एका होतकरू मुलाने आवर्जून डायरीत आमचा पत्ता विज्याच्या सहीसहित लिहून घेतला. असे अनेकदा होई. आमच्या अद्वितीय व्यासंगाने (तो आतून कितीही पोकळ का असेना) भारावून कित्येक जण उगीचच हस्तांदोलन करतील, तुमचे कार्ड आहे का विचारतील किंवा प्लीज तुमचा मोबाइल नंबर देता का असे म्हणतील. तर असे आम्ही थोर. त्यामुळे कधी आमच्या दृष्टीक्षेपास पडलात तर लक्षात ठेवा आमच्या व्यासंगाशी संग, प्राणाशी गाठ.!! कधी कुणी बकरा सापडला आणि त्यास आमच्याशी वाद घालण्याची दुर्बुद्धी झाली की त्याचा बळी गेलाच समजायचा. 
तर असेच एकदा सुरतला निघालो होतो. ट्रेनने. गर्दी बऱ्यापैकी, पण आमचा पट्टा सुरु होईना. हे गुजराथी पण ना, मोजून मापूनच बोलणार, त्यामुळे आम्हाला गप्पा टाकायला माणूस आणि विषयच मिळेना. तेवढ्यात एकजण डोळे मिटून हनुमानचालिसा म्हणू लागला. फिनिश झाल्यावर मी उठून गेलो आणि म्हणालो, "हे काय मधेच? काही मुहूर्त वगैरे होता काय सहस्त्रनामाचा?" तो म्हणाला, "मुहूर्त नाही हो, अहो इथे ४ वर्षांपूर्वी एक ट्रेन अपघात झाला होता. ३३ लोक मेले होते. म्हणून इथून ट्रेन जाताना आपली ट्रेन सुखरूप रहावी म्हणून मी नेहमी अशी रामरक्षा म्हणतो." (अच्छा म्हणजे ती ह.चा. अथवा स. ना. नसून रा. र. होती तर!) काही असो आता आम्हाला एक गिऱ्हाईक भेटले होते. मी फासे टाकायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला काय वाटते त्या ३३ जणांचे आत्मे ही ट्रेन उलथून टाकतील की काय?  "असे बोलू नका हो. असे बोलू नये. एकदा मला इथेच रात्री एक लाल शर्टवाला माणूस भेटला होता. जो त्याच ट्रेन अपघातात मरण पावला होता. तो नेहमी रात्रीच्या ट्रेनमध्ये थोडावेळ येउन बसतो" (माझे स्वगत: वा रे पठ्ठ्या कसा नेमका भेटलास, आता रामरक्षा तुझी भुतांपासून रक्षा करील कदाचित, पण आमच्यापासून कदापि नव्हे. ही ही हा हा)
आम्ही पुढे बोलणार तेवढ्यात एक विचित्र प्रसंग घडला. एक ट्रेन आमच्या बाजूच्या पटरीवरून आम्हास क्रॉस झाली. आणि आम्हाला दिसले की एक लाल शर्टवाला माणूस त्या ट्रेनच्या दरवाजात उभा आहे. (मग काय विशेष? असेल तिकडच्या ट्रेनमधील एखादा माणूस दरवाजात उभा.!! हे तुमचे स्वगत बरे का चाणाक्ष वाचकहो) तर यात विचित्र असे की ती बाजूची ट्रेन पूर्णपणे आम्हाला क्रॉस होईपर्यंत बाहेर फक्त तोच माणूस आणि तोच दरवाजा दिसत होता. आता पुढच्या ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या दारात तर एक माणूस लाल शर्ट घालून उभा नसणार ना? आणि असला तरी तो असा कंटीन्युअसली कसा दिसेल? आणि हे दृश्य फक्त आम्हीच नव्हे तर डब्यातल्या सर्व जणांनी पाहिले. डब्यात दोनचार मिनिटे एक चिडीचूप शांतता पसरली. "इतना सन्नाटा क्यों है भाई" असे म्हणून हा सन्नाटा तोडायचा या बेतात मी असतानाच जोरजोरात रामरक्षा चालू झाली. मी त्याला थांबविले पण तो थांबेना. सगळे लोक भेदरले आहेत हे स्पष्ट दिसत होते. मग विज्या बोलू लागला "अरे घाबरण्याचे काही कारण नाही लोकांनो. मी सांगतो काय झाले असणार. आपल्या ट्रेन एका वळणावर क्रॉस झाल्या असणार त्यामुळे त्या ट्रेनचे बहिर्वक्री आणि आपल्या ट्रेनचे अंतर्वक्री रुपात सामना झाला. त्यामुळे एक भिंग तयार झाले आणि एकच प्रतिमा या भिंगाच्या वक्रतेमुळे आपल्याला शेवटपर्यंत दिसली. एखाद्या चमच्याच्या नाही का बोट खोलगट भागासमोरून फिरवले तर त्याचे रिफ्लेक्शन बरोबर उलट्या दिशेने पुढे पुढे जाताना दिसते? असे सांगून विज्याने लोकांकडे कौतुकाच्या अपेक्षेने पाहीले पण याच्यापेक्षा तो रामरक्षेवालाच बरा अशीच लोकांची भावना दिसली. एकजण म्हणाला, अहो पूर्ण मुंबईपासून तर वलसाडपर्यंत ट्रेनच्या रस्त्यास एकही वळण नाही.काहीही सांगता काय? परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून मग अजून सायंटीफिक फंडा टाकावा म्हणून मी बोलू लागलो. वळण नसले तर नसू द्या हो पण तुम्हाला प्रकाशाचे डीफ्राक्शन हा प्रकार माहित आहे का? प्रकाश किरणांच्या मार्गात जेव्हा एखादा शार्प अडथळा येतो तेव्हा त्यांची दिशा बदलते. आता वेळ काय झालाय? १२ वाजून ३० मिनिटे. सूर्य नेमका मध्यावरून पश्चिमेला झुकलाय, त्यामुळे सूर्यकिरण तिरपे होऊन आले, आपल्या गाडीचा त्यांस अडथळा निर्माण झाला, प्रकाशाचे वक्रीकरण झाले आणि एकच प्रतिमा आपल्याला प्रकाशाच्या वक्रीकरणामुळे दिसली.
"उगीच काहीही फेकू नका हो." गाडीच्या उजव्या दरवाजाकडून आवाज आला. सगळ्यांनी दचकुन तिकडे पहिले तर तोच मघाशी बाजूच्या ट्रेनमध्ये दिसलेला लाल शर्टवाला माणूस डब्यात शिरत होता. भर दुपारीमुळे की काय कुणास ठाऊक पण डब्यातल्या प्रत्येकाच्या अंगाला दरदरून घाम फुटला. प्रकाशाचे वक्रीकरण होऊन प्रकाश जेवढा वळतो त्यापेक्षा हजारपट अधिक माझी बोबडी वळली होती. रामरक्षा अतिशय वेगाने पण अत्यंत दबक्या आवाजात चालू झाली. लाल शर्टवाला पुढे येउन आमच्या सीटजवळ उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला (पिवळी होणे म्हणजे काय ते तुम्हाला काय माहित हो?)
मग तो म्हणाला, "काय राव मघापासून ऐकतोय तुम्ही काहीही बोलताय. अहो तो माणूस मीच होतो. आणि समोरच्या ट्रेनमध्ये नव्हे तर याच ट्रेनच्या दारात उभा होतो. ही जी ट्रेन क्रॉस झाली ना ती होती राजधानी एक्स्प्रेस. ती आहे संपूर्ण एसी गाडी.! त्यामुळे सगळ्या डब्यांना काळ्या काचा आहेत. त्याच काळ्या काचांवर मी आपल्या डब्याच्या दारात उभा असल्याने माझे रिफ्लेक्शन तुम्हाला ट्रेन संपूर्ण पास होईपर्यंत कंटीन्युअसली दिसले.
त्या दिवसापासून आजतागायत विज्या आणि मी कोणत्याही ट्रेनमध्ये कुणाशी काही बोललो नाहीये.

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

उम्या आणि पक्या



आता उम्या मोठा माणूस झालाय. गाडी, ड्रायवर, एसी केबिन, पर्सनल सेक्रेटरी असा उम्याचा जाम थाट आहे.


तसा उम्या आधीपासूनच बऱ्यापैकी हुशार. पण आम्ही तेव्हा त्याला "घासू" हे नाव ठेवले होते. विषय कोणताही असो उम्या नुसता पाठ करत बसायचा. अगदी गणितेसुद्धा..!! (अर्थात आमचा गणिताशी तसाही ३६चाच आकडा असल्याने गणिताच्या अभ्यासाची नेमकी पद्धत काय हे अजूनही आम्हास ठाऊक नाही हा भाग अलाहिदा, पण पाठांतर ही नक्कीच योग्य पद्धत नाही. नव्हे का?)


उम्या म्हणजे तसा अगदी वॉलफ्लॉवरच असे मात्र नाही हो. तसा तो पोरांत यायचा. पण मी, राज्या, नित्या असे त्याचे सर्वात जवळचे तीनचारजण असले तरच तो गप्पांत सामील व्ह्यायचा. एरवी पोरांत असूनही नसल्यासारखाच.! कधी कधी मूड आला की मग मात्र जाम बोलायचा, हसायचा. नाचला मात्र कधीच नाही. पण आमचा नाच कम अंगविक्षेप पाहून हसायचा मात्र खूप. आम्ही तेव्हा आमच्या आणि खालच्या वर्गातल्या पोरींबद्दल जाम गप्पा हाणायचो. उम्या अपवादानेच त्यात सामील व्हायचा. आम्हीही त्याला अशा विषयांत सामील करीत नसू. एकदा मांसाहारी जोक्सचा फड रंगला होता, तेवढ्यात उम्या तिथे आला. नित्या त्याला म्हंटला, "उम्या तू जा बाबा, ये बच्चोंके खेलने की चीज नही है बच्चे." यावर आम्ही एकमेकांच्या टाळ्या घेऊन उम्याला जाम हसलो. उम्या शांतपणे बसला आणि म्हणाला तुम्ही स्वत:ला काय समजता रे? आणि मग उम्याने आम्हाला एक जोक सांगितला. एकदम फाडू. आम्ही चाट पडलो. च्यायला उम्या तू सुद्धा? कुठे मिळाले तुला अशा जोक्सचे पुस्तक? अजूनही बरेच पाठ केले असतील ना? मग सांग की अजून. मग उम्याने जो दांडपट्टा फिरवलाय म्हणून सांगू की त्यानंतर त्याला पिल्लू, बच्चा असे म्हणणे सपशेल बंदच झाले.


तर उम्या एवढा पुस्तकी किडा की क्रिकेट खेळायला देखील पुस्तक घेऊन यायचा. त्याचा आम्हाला फक्त फिल्डिंगपुरता उपयोग व्हायचा. पण उम्याला तेवढेही लय आवडायचे. मी कधी लवकर आउट झालो की मग मला सल्ला द्यायचा. "राहुल (होय मला राहुल्या न म्हणता शुद्ध राहुल म्हणणारा उम्या हा एक दुर्मिळ सजीव होय) तू प्रत्येक बॉलचा पाठलाग करत जाऊ नकोस रे, एखादा बॉल सोडून दिला तरी काही फरक पडत नाही. प्रत्येक बॉल खेळायचाच या अट्टाहासामुळे तू बऱ्याचदा आउट होतोस." मला ते त्याचे समजावणे आवडायचे नाही. मग मी म्हणायचो, "असे का? कुठल्या पुस्तकातून तू हा सल्ला वाचून पाठ करून आलास रे घाश्या? आता बापाला शिकवणार का रे भाड्या?". बॅटिंग असली की उम्या त्याचा नंबर येईपर्यंत पुस्तक वाचत बसे. "माझा बॅटिंगला नंबर यायला वेळ आहे तोपर्यंत एखाद दोन पॅरेग्राफ तरी पाठ होतील" अशी त्याची भूमिका. एकदा मी त्याला एक कादंबरी वाचायला दिली. दोन तासांत पठ्ठ्याने ती परत केली आणि म्हणाला "यात काय वाचायचे? दहा पाने सलग वाचली आणि मग मला पहिल्या पानावरचे काही आठवेना. प्रत्येक पान दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कथा माझ्या डोक्यात बसणार नाही, आणि असे करायला खूप वेळ वाया जाईल. तेव्हा ही तुझी कादंबरी तू परत घे बाबा." "च्यायला तू खरा जातिवंत घाश्या रे उम्या. अरे रट्टा मारण्याची एवढी सवय लागलीय तुला की एखादी गोष्टही सरळ वाचून समजत नाही. तुझे अवघड आहे यार. जरा सुधर." उम्या काही बोलला नाही, नुसताच हसला. पण त्या हसण्यात "बापाला शिकवतो का रे भाड्या?" हा माझाच डायलॉग लपलेला होता असे मला उगीच वाटले.


...


पक्या हा उम्याचा सर्वात मोठा जानी दुश्मन. तसा तोही आमच्याच कंपूतला, मात्र त्याचा कायम उम्याशी वाद.!! मागे कधीतरी एकदा पक्याने काहीतरी खोडी केल्यावर घटनेचा एकमेव साक्षीदार असलेल्या उम्याने मास्तरला त्याचे नाव सांगितले होते, आणि मास्तरांनी मग पक्याला जाम सुजवला होता. तेव्हापासून उम्या हा मास्तरचा चाटू आहे, गद्दार आहे, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये असे पक्या नेहमीच म्हणायचा. पक्या तसा जरा उर्मटच होता. त्याच्या बापाचे आमदाराकडे कायम उठणे-बसणे असायचे. बाप पंधराएक वर्षांपूर्वी एकदा जिल्हा परिषदेवरही निवडून गेला होता. अर्थात त्यानंतर तो परत कधी जिंकला नाही, पण त्या एका निवडीचा तोरा पक्या कायम मिरवत असे. ग्रुपमध्ये आमच्यावर मात्र त्याचा हा तोरा चालत नसे. पक्या नेहमी शेर/चारोळ्या मारायचा. आम्ही त्याला 'ग्रेस' म्हणत असू. पण हे नाव त्याला त्याच्या काव्यप्रतिभेमुळे मिळाले नव्हते तर आठवीपासून प्रत्येक वर्गात पक्या गणितात ग्रेस मार्क्स घेऊन पास होत आला होता म्हणून मिळालेले होते.! प्रत्येक वेळा बरोबर असूनही पक्या आणि उम्यामधून विस्तव जात नसे. पक्याला उम्याने काही चांगला उपदेश/सल्ला दिला की पक्या जाम तापायचा. "तू मला शिकवू नकोस साल्या गद्दारा. तुझ्यासारखे छप्पन्न जण मी घरी घरगडी म्हणून ठेऊ शकतो." असे काहीसे म्हणूण तो नेहमी उम्याचा पाणउतारा करायचा. पक्याची ही माजोरी त्याच्या बापामुळे होती. निवडणूक हरत असला तरी आमदार साहेबांचा वरदहस्त असल्याने अनेक कंत्राटे, ठेके त्याला मिळत. त्यातून तो जाम पैसा छापी. वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून साहेबांचे टेबलाखालचे कलेक्शन करण्याची जबाबदारी देखील पक्याच्या बापाचीच होती. त्यामुळे पक्या आणि त्याचा बाप जरा गुर्मीतच राहत.




नंतर आम्ही सगळे पांगलो. मी आणि उम्या मुंबईत नोकरीला लागलो तर नित्या रत्नागिरी आणि राज्या अमरावतीस कामाला लागले. पक्या गावातच होता. त्याच्या बापाचा धंदा जोरात होता त्यामुळे त्याला नोकरीची काही फिकीर नव्हती. त्यावर्षी दिवाळीत आम्ही सगळेजण गावात जमलो. जवळजवळ तीन वर्षांनी आम्ही एकत्र येत होतो. मग आम्ही मोटारसायकलींवर आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलो. सिगरेटी फुकल्या. आता प्रत्येकाचा ब्रांड बदलला असल्याचे म्हणजे महागडा हायफाय झाल्याचे आमच्या लक्षात आले. मग सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. आमच्या मुंबईच्या गोष्टी तर नित्याच्या रत्नागिरीच्या. आम्ही तिघे खुश होतो पण राज्या अमरावतीस वैतागला होता. मग मोर्चा वळला तो पक्याकडे. पक्या एकदम बेफिकीर होता. तो नोकरीला नाही याचे त्याला काही वैषम्य वाटत नव्हते आणि त्यास ते वाटण्याचे काही कारणही नव्हते. तरी आपला उम्याला त्याचा उमाळा आलाच. आणि तो म्हणाला, "यार प्रकाश तुला काय सांगू, नोकरी करण्यात आणि स्वत: कमावण्यात एक वेगळीच मज्जा आहे. तू सुद्धा आमच्यासारखा ग्रॅज्युएट आहेस. तू नोकरीसाठी प्रयत्न तर करून बघ, किती दिवस असाच बापाच्या जीवावर उड्या मारीत राहणार?" पक्या उखडला, त्याने सरळ उम्याच्या कानशिलात भडकावली आणि चेकाटून म्हणाला, "साल्या उम्या तू मला शिकवणार का रे? आहेस तरी कोण तू? एक साधा कारकुंडाच ना? मग आयुष्यभर एवढी घास घास घासलीस त्याचा काय उपयोग झाला? ह्या राव्हल्याला बघ. साला कॉलेजला सगळी मज्जा करूनदेखील तुझ्या दुप्पट पगार घेतोय. च्यायला तू मला नोकरीचे सल्ले देतोस? अरे तूच ये माझ्या घरी आणि घरगडी बन. तुला तुझ्या आताच्या नोकरीपेक्षा जास्त पगार मी देतो." उम्यानेही मग पक्याची गच्ची धरली. पण आम्ही मध्ये पडून दोघांना बाजूला केले. "बघून घेईल तुला सुद्धा. बापाच्या जीवावर किती दिवस माज करशील?" असे म्हणत उम्या फणफणत निघून गेला आणि त्यानंतर परत अड्ड्यावर आला नाही अथवा आम्हा कुणाला फोनही केला नाही.
असे बरेच दिवस गेले. पक्याचा बाप मध्यंतरी पतसंस्थेच्या एका मोठ्या घोटाळ्यात पकडला गेला. आमदारसाहेबांचा पाठींबा असल्याच्या गुर्मीत पठ्याने एसीबीवाल्यांची पार आयमाय करून टाकली. पण साहेबाने सपशेल काखा वर केल्या, आणि मग एसीबीने पक्याच्या बापाला असा काही गुंतविला की बस्स. त्याची तीन चारी बँक खाती सील झाली. जमीन, दागिने, घरातली रोकड, दोन ट्रक, एक ट्रॅक्टर आणि तीन जीपा हे सगळे जप्त झाले. बापच आत आणि साहेबाने तोंड फिरवलेले त्यामुळे पक्याला काही करता येईना. दोनेक महिन्याभरात पक्याच्या घराची दुर्दशा झाली. कामधंदा नाही, नोकरी नाही, पक्याचे ठरलेले लग्नही मोडले. नातेवाईकांनीदेखील पाठ फिरवली. पक्यावर उपासमारीची वेळ आली. मग सगळा मानमरातब सोडून पक्या रोजंदारीवर जाऊ लागला. रोजगार केंद्रात नाव नोंदविले. नोकरीसाठी अर्ज खरडू लागला. पक्या वर्षभरात एजबार होणार होता. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी आता त्याला केवळ वर्षभराचाच वेळ होता.
काही दिवसांनी पक्याला एक कॉललेटर आले. मुंबईचे. क्लार्कची पोस्ट होती. सरकारी नोकरी. पक्याला बऱ्याच दिवसांत पहिल्यांदाच थोडा आनंद झाला. आठ दिवसांनी मुंबईत त्याची मुलाखत होती. पक्या तयारीला लागला. भाड्याचे पैसे जमविले. मुंबईच्या बहिणीला फोन करून येत असल्याचे कळविले. पक्याला आता एजबार व्हायला फक्त दोन महिने होते म्हणून त्याला सगळ्या सेटिंग लावायच्या होत्या. तद्वत सगळा अपमान गिळून तो आमदार साहेबांना भेटायला गेला, शब्द टाका म्हणून. पण साहेब म्हणाले, "प्रकाश तुला तर माहीतच आहे ते खाते अनिल मोरेंकडे आहे. आणि हा मोरे म्हणजे पक्षातील माझा सर्वात मोठा विरोधक. त्यामुळे मी शब्द टाकला तर उलट तुझे नाव मुद्दाम वगळतील ते लोक. पण तू काळजी करू नकोस. बघू आपण अजून कुठेतरी प्रयत्न करु." अर्थात ही साहेबाची तोंडाला पाने पुसण्याची स्टाइल होती, त्यामुळे पक्या काय उमजायचे ते उमजला. मुंबईत फोर्टला मुलाखत होती. पक्या आधी शंभरांदा मुंबईस गेला असल्याकारणाने काही अडचण नव्हती. ठरल्या दिवशी मग पक्या फोर्टला पोहोचला. पक्याचा पाचवा नंबर होता. आधीचे तीन चार जण पक्याहुन खूप तरुण होते. पक्या शांत होता. कुणाशी काही बोलत नव्हता. काय होणार याचे त्याला टेंशन आले होते. थोड्या वेळाने चौथा उमेदवार रुमालाने घाम पुशीत बाहेर पडला आणि शिपायाने पक्याचे नाव पुकारले. पक्या उठला. कागदपत्रांची फ़ाइल घेतली आणि आत गेला. आत जाउन खुर्चीवर बसला आणि मग समोर बघतो तर काय. मुलाखत कमेटीच्या अध्यक्षस्थानी उम्या बसलेला. पक्या चपापला. उम्याही पक्याला पाहून आश्चर्यचकित झाला. चारेक वर्षे गावी न फिरकल्यामुळे उम्याला पक्याच्या परीस्थितीची काहीच कल्पना नव्हती. दोघांनाही तो चार वर्षांपूर्वीचा दिवाळीतला प्रसंग आठवला. पक्या खाली मान घालून स्तब्ध बसला होता. उम्या म्हणाला, "अरे प्रकाश तू? तू मुलाखतीला कसा?" पक्या काहीच बोलला नाही. उम्या खुर्चीतून उठला, पक्याकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "अरे किती दिवसांनी भेटतोयेस तू.!" मग उरलेल्या कमेटी मेंबर्सना उद्देशून उम्या उद्गारला, "जंटलमेन, मिस्टर प्रकाश जाधव इज अ वेरी क्लोज चाईल्डहूड फ्रेंड ऑफ माइन, अँड हेंस आय रिक्वेस्ट ए फेवर फ्रॉम ऑल ऑफ यू. आय वांट धीस पोस्ट टू बी गीव्हन टू मिस्टर प्रकाश ओन्ली. व्हाट डू यू ऑल से?" कमेटीतले इतर सगळेजण आश्चर्यमिश्रित आनंदात हसत होते. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. पक्याची मान अजून खालीच होती. उम्याने त्याच्या खांद्यावर जरा थोपटले आणि म्हणाला, "कॉंग्रॅच्युलेशन्स प्रकाश, अँड वेलकम टू माय डिपार्टमेंट." पक्याच्या नाकातून आता उष्म श्वास बाहेर येत होते. तो अचानक उठला. खांद्यावरचा उम्याचा हात झिडकारला आणि खुर्चीच्या बाहेर आला. "मला तुझे उपकार नकोत. समजलास काय? मी तुझा मिंधा बनून तुझ्या हाताखाली काम करीन असे तुला वाटले तरी कसे? मी लाथ मारतो तुझ्या या नोकरीला" असे म्हणून दोनच महिन्यांनंतर एज-बार होऊन कुठेही नोकरी करण्यास नालायक ठरणार असलेला पक्या थरथर कापत आपली फाइल घेऊन धुसमुसत थेट बिल्डींगच्या बाहेर निघून गेला.
तर मध्यंतरी कारकुनीतून अभ्यास करून, परीक्षा देऊन उम्या मोठा साहेब झाला. मी मुंबईतच असल्याने आम्ही त्यानंतर एक दोनदा भेटलो देखील. पण उम्या आधीसारखा नेहमी गावाला जायचा बंद झाला. उम्या नव्या पोस्टला जॉईन झाल्यावर एकदा सीएसटीवर भेटला होता. मी त्याला पाहिल्या पाहिल्या जोरात "ए उम्या" अशी बिनधास्त मोठी आरोळी ठोकून दिली. त्या आवाजाने उम्या चकित होऊन त्याचे बरोबरच्या माणसांना काहीसे सांगून माझ्याकडे आला. जवळ आला, "हॅलो" असे म्हणून माझ्याशी शेकहॅंड केला. आणि त्या दिवशी अचानक माझ्याशी अहो जाहो घालून बोलू लागला. म्हणजे "अहो भांगरे साहेब इकडे कुठे? खूप दिवसांनी तुम्ही भेटलात, खूप बरे वाटले" असे काहीसे खूप औपचारिक बोलला. मला काही कळले नाही. पण "मी आता खूप घाईत आहे, नंतर फोन करतो, मग आपण निवांत भेटू बरे का भांगरे साहेब, आता तुमची रजा घेतो" असे म्हणून त्याने काढता पाय घेतला आणि त्याच्या बरोबरच्या इतर काळ्या कोटावाल्यांबरोबर गर्दीत मिसळून गेला.












उम्याने नव्याने फेसबुक जॉईन केले. मला एका फ्रेंडच्या लिस्टमध्ये तो दिसला म्हणून मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने ऍक्सेप्ट केली. मग मी त्याच्या वॉलवर 'काय रे उम्या भाड्या, कसा गाठला मी तुला इथे.! नालायका साल्या कंजुसा आता पार्टी कधी देतो ते बोल' अशी पोस्ट टाकली. उम्याने तिला रिप्लाय तर केला नाहीच पण उलट ती पोस्ट डिलीट करून टाकली असे माझ्या लक्षात आले.

एकदा गावात दिवाळीच्या सुट्टीला उम्यादेखील आल्याचे कळले. मी त्याच्या घरी भेटायला गेलो. "या भांगरे साहेब कधी आलात?" असे विचारून त्याने सुरुवात केली. मी म्हणालो, "अरे उम्या हरामी, गावी येणार होतास तर सांगायचे तरी होतेस ना? आपण बरोबर आलो असतो". "नाही हो, माझे काही नक्की नव्हते. अचानक प्रोग्राम ठरला आणि आलो. त्यामुळे तुम्हाला सांगायला जमले नाही." उम्याने हे 'तुम्ही तुम्ही' का लावले आहे ते मला कळेना. मी विचारले, "अरे हे काय लावले आहेस? मला हे 'तुम्ही, साहेब' असे का बोलतो आहेस बाबा?" उम्या म्हणाला, "अहो कुणी मोठा साहेब झाल्यावर त्यांना योग्य तो मान नको का द्यायला?" मी हे ऐकून चक्रावलो. मग गावातल्या काही पोरांनी मला सांगितले की उम्याने त्यांना "मला उम्या अशी हाक मारू नका" असे बजावले होते. "मला अहो जाहो घालून बोलायचे असेल तर बोला, अन्यथा माझ्याशी बोलला नाहीत तरी चालेल" अशी त्याने पोरांना ताकीद दिली होती. मग मला त्याचे मला 'अहो-जाहो, तुम्ही' इत्यादी म्हणण्याचे कारण कळले. मला स्पष्टपणे 'माझ्याशी आदरार्थी बोल' हे सांगता येत नाही म्हणून त्याने हा आडमार्गाचा उपाय शोधला होता. पण मी तसे करणारेय थोडाच? लगेच उम्याच्या घरी गेलो आणि बाहेरून "ए उम्या घाश्या बाहेर ये, चल फिरायला जाऊ" अशी आरोळीवजा हाक मारली. उम्या पडलेल्या चेहऱ्याने बाहेर आला आणि माझी तब्येत ठीक नाही मी येऊ शकणार नाही असे म्हणाला. मी हसून तिथून निघालो. दुसऱ्याच दिवशी उम्या मुंबईला निघून गेल्याचे कळले. नंतर उम्याला दोन चार वेळा फोन लावले, फेसबुकवर मेसेज केले पण उम्याने रिस्पॉंड केले नाही. उम्या आता माझ्या कुठल्याही पोस्टवर रिप्ल्याय देणे सोडा, साधे लाइकदेखील करत नाही. मी त्याच्या वॉलवर किंवा पोस्टवर कमेंट केली तरी तो तिला लाइक अथवा कमेंट करत नाही. गंमत तर अशी की उम्याच्या एखाद्या पोस्टवर आलेल्या सगळ्या लोकांच्या कमेंट्सला उम्या लाइक करतो, केवळ माझी कमेंट सोडून.!! मला त्याने असे केल्यावर त्याची जाम मजा येते. मग मी मुद्दाम त्याच्या एखाद्या पोस्टवर "ए उम्या" अशी कमेंट टाकतो. या कमेंटला मात्र तो न चुकता रिस्पॉंड करतो... ती कमेंट डिलीट करून..!!




तर त्या मुलाखतीच्या प्रसंगानंतरची ही अशी उम्याची कहाणी. मग पक्याचे काय झाले? तो दोन महिन्यांनी एज-बार होण्याआधी नोकरीला लागला की नाही? आता काय करतो? हे काहीही मी सांगणार नाहीये. पक्याच्या बाबतीत ही असू देत आमची "झाकली मुठ सव्वा लाखाची..!!!"

रविवार, १ डिसेंबर, २०१३

डिसेंबर महिना आणि रविवारची सकाळ..

एव्हना गाव कडाक्याच्या थंडीत पार गोठून गेलेले असते. आपण आपले सकाळी सकाळी उठावे, ब्लॅंकेट पांघरावे आणि अंगणातून उगवणारा मोठ्ठा लालतांबडा सूर्य पहावा. घराच्या छतावरून मग कोवळी पिवळीलाल ऊन्हे हळूहळू रानभर पांगताना बघावी. त्या उन्हात डोक्यावर सकाळीच भरलेल्या दुडी अन तीडीच्या उतरंडी घेऊन चाललेल्या लेकीबाळी अन आयाबायांचे चकाकणारे हंडे पहावेत. ऊन सगळ्या परिसरावरचे धुक्याचे पांघरूण काढून घेते, पण भरलेली नदी ऊन्हाचे ऐकत नाही. धुक्याची दुलई ती घट्ट धरून ठेवते. आणि मग छतावरून मला दिसते नदीच्या पात्रावर एक लांबच लांब पसरलेली वाकडी तिकडी धुक्याची पट्टी. पण ऊनही ईरेला पेटलेले असते. ते थोड्याच वेळात नदीवरचे धुक्याचे पांघरूण काढून घेतेच.
              मात्र नदीपेक्षाही ऊन्हाला अजिबात दाद न देणारे अजून कुणीतरी असते. ती असते डोंगराची सावलीकडची बाजू..!! ती पूर्ण धुक्यात वेढलेली असते. जसे जसे ऊन वर येते आणि डोंगराच्या किनारीवरून खाली खाली डोकावू लागते तशी तशी मग सावलीतल्या धुक्याची तारांबळ उडते. ते सावलीतल्या सावलीत लपून राहण्याचा प्रयत्न करते. पण मिडासचा स्पर्श होऊन कशाचेही सोने व्हावे तसे जिथे जिथे ऊन पोचेल तिथे तिथे पिवळे सोने पसरू लागते. अगदी कवायतीला जमलेल्या शाळेच्या पोरांसारखी ऊन आणि धुक्याची जिथे भेट होते तिथे अशी एक सरळ रेष डोंगर माथ्यावरून ते थेट जिथे सावली जमिनीला टेकते तिथपर्यंत दिसते. सगळ्यात आधी मग उंच उंच झाडांचे शेंडे धुक्याच्या वर येऊन डोकावू लागतात. ऊन अजून चढू लागते तसे धुके अजून खाली खाली जाते. मग जवळ जवळ सगळी झाडे दिसू लागतात. आणि मग तो स्वर्गीय नजारा दिसतो... ...जवळजवळ सगळ्या रानावर उन्हाचे सोने विखुरलेले असताना या झाडांच्या बुंध्यांत मात्र थोडे थोडे धुके तसेच कितीतरी वेळ गुरंफटून पडलेले असते. प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी धुक्याचे छोटेसे आळे तयार झालेले असते. तान्ह्या बाळाला लोकरीचे शुभ्र पायमोजे घालावेत ना अगदी तसे.. जाग आलेली असूनही स्वप्नातच असल्याचा अनुभव येतो ते पाहताना..!!
               आपल्या तोंडातून आता हवा बाहेर सोडली की धुरासारखी वाफ बाहेर निघते. मग उगीचच आपली सिगरेट चिमटीत असल्यासारखी दोन बोटे ओठांवर टेकवावीत आणि झोकात तो वाफेचा धूर बाहेर सोडत बसावे. थोड्यावेळाने कुणीतरी हाळ घालतो, मग आपण छतावरून निघून थेट नदी गाठावी. नदी वाफाळत असते. कपडे काढून कुडकुडत नदीच्या कडेला बसावे. गारठ्यामुळे पाण्यात उतरायची हिम्मत होत नाही. मग कितीतरी वेळ नुसते पाय बुडवून बसावे. मग अंगाला पार गार वारे बोचू लागले की अंग पाण्यात झोकून द्यावे. नदीचे पाणी थंड नव्हे तर गरम उबदार असते. भिजण्याआधी पाण्यात जावेसे वाटत नाही आणि एकदा पाण्यात गेलो की बाहेर निघावेसे वाटत नाही. कडक थंडीत नदीच्या उबदार पाण्यात डुंबत राहण्याइतके दुसरे सुख नाही.
थोड्या वेळाने बाहेर यावे अंग पुसून कपडे घालावेत आणि मग गवतातून परत गावाकडे चालत निघावे. गुडघ्यापर्यंत वाढलेले गवत दवाने डवरून गेलेले असते. गावात पोचेतो गुडघ्यांपर्यंत पाय पार भिजून गेलेले असतात. पायाची बोटे एवढी गारठून जातात की त्यांना स्पर्श केलेला देखील जाणवत नाही. तसेच बांधावरल्या वाटेने चालत गावात पोचावे आणि मग कुणाच्यातरी शेकोटीभोवतीच्या कडबोळ्यात सामील व्हावे..
           ....गावच्या शेकोटीच्या त्या शेकाची आणि नदीच्या पहाटेच्या वाफाळत्या पाण्याची ती ऊब आता इथे मुंबईत फक्त एकाच गोष्टीला येते... गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना..