हा ब्लॉग शोधा

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

उम्या आणि पक्या



आता उम्या मोठा माणूस झालाय. गाडी, ड्रायवर, एसी केबिन, पर्सनल सेक्रेटरी असा उम्याचा जाम थाट आहे.


तसा उम्या आधीपासूनच बऱ्यापैकी हुशार. पण आम्ही तेव्हा त्याला "घासू" हे नाव ठेवले होते. विषय कोणताही असो उम्या नुसता पाठ करत बसायचा. अगदी गणितेसुद्धा..!! (अर्थात आमचा गणिताशी तसाही ३६चाच आकडा असल्याने गणिताच्या अभ्यासाची नेमकी पद्धत काय हे अजूनही आम्हास ठाऊक नाही हा भाग अलाहिदा, पण पाठांतर ही नक्कीच योग्य पद्धत नाही. नव्हे का?)


उम्या म्हणजे तसा अगदी वॉलफ्लॉवरच असे मात्र नाही हो. तसा तो पोरांत यायचा. पण मी, राज्या, नित्या असे त्याचे सर्वात जवळचे तीनचारजण असले तरच तो गप्पांत सामील व्ह्यायचा. एरवी पोरांत असूनही नसल्यासारखाच.! कधी कधी मूड आला की मग मात्र जाम बोलायचा, हसायचा. नाचला मात्र कधीच नाही. पण आमचा नाच कम अंगविक्षेप पाहून हसायचा मात्र खूप. आम्ही तेव्हा आमच्या आणि खालच्या वर्गातल्या पोरींबद्दल जाम गप्पा हाणायचो. उम्या अपवादानेच त्यात सामील व्हायचा. आम्हीही त्याला अशा विषयांत सामील करीत नसू. एकदा मांसाहारी जोक्सचा फड रंगला होता, तेवढ्यात उम्या तिथे आला. नित्या त्याला म्हंटला, "उम्या तू जा बाबा, ये बच्चोंके खेलने की चीज नही है बच्चे." यावर आम्ही एकमेकांच्या टाळ्या घेऊन उम्याला जाम हसलो. उम्या शांतपणे बसला आणि म्हणाला तुम्ही स्वत:ला काय समजता रे? आणि मग उम्याने आम्हाला एक जोक सांगितला. एकदम फाडू. आम्ही चाट पडलो. च्यायला उम्या तू सुद्धा? कुठे मिळाले तुला अशा जोक्सचे पुस्तक? अजूनही बरेच पाठ केले असतील ना? मग सांग की अजून. मग उम्याने जो दांडपट्टा फिरवलाय म्हणून सांगू की त्यानंतर त्याला पिल्लू, बच्चा असे म्हणणे सपशेल बंदच झाले.


तर उम्या एवढा पुस्तकी किडा की क्रिकेट खेळायला देखील पुस्तक घेऊन यायचा. त्याचा आम्हाला फक्त फिल्डिंगपुरता उपयोग व्हायचा. पण उम्याला तेवढेही लय आवडायचे. मी कधी लवकर आउट झालो की मग मला सल्ला द्यायचा. "राहुल (होय मला राहुल्या न म्हणता शुद्ध राहुल म्हणणारा उम्या हा एक दुर्मिळ सजीव होय) तू प्रत्येक बॉलचा पाठलाग करत जाऊ नकोस रे, एखादा बॉल सोडून दिला तरी काही फरक पडत नाही. प्रत्येक बॉल खेळायचाच या अट्टाहासामुळे तू बऱ्याचदा आउट होतोस." मला ते त्याचे समजावणे आवडायचे नाही. मग मी म्हणायचो, "असे का? कुठल्या पुस्तकातून तू हा सल्ला वाचून पाठ करून आलास रे घाश्या? आता बापाला शिकवणार का रे भाड्या?". बॅटिंग असली की उम्या त्याचा नंबर येईपर्यंत पुस्तक वाचत बसे. "माझा बॅटिंगला नंबर यायला वेळ आहे तोपर्यंत एखाद दोन पॅरेग्राफ तरी पाठ होतील" अशी त्याची भूमिका. एकदा मी त्याला एक कादंबरी वाचायला दिली. दोन तासांत पठ्ठ्याने ती परत केली आणि म्हणाला "यात काय वाचायचे? दहा पाने सलग वाचली आणि मग मला पहिल्या पानावरचे काही आठवेना. प्रत्येक पान दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कथा माझ्या डोक्यात बसणार नाही, आणि असे करायला खूप वेळ वाया जाईल. तेव्हा ही तुझी कादंबरी तू परत घे बाबा." "च्यायला तू खरा जातिवंत घाश्या रे उम्या. अरे रट्टा मारण्याची एवढी सवय लागलीय तुला की एखादी गोष्टही सरळ वाचून समजत नाही. तुझे अवघड आहे यार. जरा सुधर." उम्या काही बोलला नाही, नुसताच हसला. पण त्या हसण्यात "बापाला शिकवतो का रे भाड्या?" हा माझाच डायलॉग लपलेला होता असे मला उगीच वाटले.


...


पक्या हा उम्याचा सर्वात मोठा जानी दुश्मन. तसा तोही आमच्याच कंपूतला, मात्र त्याचा कायम उम्याशी वाद.!! मागे कधीतरी एकदा पक्याने काहीतरी खोडी केल्यावर घटनेचा एकमेव साक्षीदार असलेल्या उम्याने मास्तरला त्याचे नाव सांगितले होते, आणि मास्तरांनी मग पक्याला जाम सुजवला होता. तेव्हापासून उम्या हा मास्तरचा चाटू आहे, गद्दार आहे, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये असे पक्या नेहमीच म्हणायचा. पक्या तसा जरा उर्मटच होता. त्याच्या बापाचे आमदाराकडे कायम उठणे-बसणे असायचे. बाप पंधराएक वर्षांपूर्वी एकदा जिल्हा परिषदेवरही निवडून गेला होता. अर्थात त्यानंतर तो परत कधी जिंकला नाही, पण त्या एका निवडीचा तोरा पक्या कायम मिरवत असे. ग्रुपमध्ये आमच्यावर मात्र त्याचा हा तोरा चालत नसे. पक्या नेहमी शेर/चारोळ्या मारायचा. आम्ही त्याला 'ग्रेस' म्हणत असू. पण हे नाव त्याला त्याच्या काव्यप्रतिभेमुळे मिळाले नव्हते तर आठवीपासून प्रत्येक वर्गात पक्या गणितात ग्रेस मार्क्स घेऊन पास होत आला होता म्हणून मिळालेले होते.! प्रत्येक वेळा बरोबर असूनही पक्या आणि उम्यामधून विस्तव जात नसे. पक्याला उम्याने काही चांगला उपदेश/सल्ला दिला की पक्या जाम तापायचा. "तू मला शिकवू नकोस साल्या गद्दारा. तुझ्यासारखे छप्पन्न जण मी घरी घरगडी म्हणून ठेऊ शकतो." असे काहीसे म्हणूण तो नेहमी उम्याचा पाणउतारा करायचा. पक्याची ही माजोरी त्याच्या बापामुळे होती. निवडणूक हरत असला तरी आमदार साहेबांचा वरदहस्त असल्याने अनेक कंत्राटे, ठेके त्याला मिळत. त्यातून तो जाम पैसा छापी. वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून साहेबांचे टेबलाखालचे कलेक्शन करण्याची जबाबदारी देखील पक्याच्या बापाचीच होती. त्यामुळे पक्या आणि त्याचा बाप जरा गुर्मीतच राहत.




नंतर आम्ही सगळे पांगलो. मी आणि उम्या मुंबईत नोकरीला लागलो तर नित्या रत्नागिरी आणि राज्या अमरावतीस कामाला लागले. पक्या गावातच होता. त्याच्या बापाचा धंदा जोरात होता त्यामुळे त्याला नोकरीची काही फिकीर नव्हती. त्यावर्षी दिवाळीत आम्ही सगळेजण गावात जमलो. जवळजवळ तीन वर्षांनी आम्ही एकत्र येत होतो. मग आम्ही मोटारसायकलींवर आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलो. सिगरेटी फुकल्या. आता प्रत्येकाचा ब्रांड बदलला असल्याचे म्हणजे महागडा हायफाय झाल्याचे आमच्या लक्षात आले. मग सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. आमच्या मुंबईच्या गोष्टी तर नित्याच्या रत्नागिरीच्या. आम्ही तिघे खुश होतो पण राज्या अमरावतीस वैतागला होता. मग मोर्चा वळला तो पक्याकडे. पक्या एकदम बेफिकीर होता. तो नोकरीला नाही याचे त्याला काही वैषम्य वाटत नव्हते आणि त्यास ते वाटण्याचे काही कारणही नव्हते. तरी आपला उम्याला त्याचा उमाळा आलाच. आणि तो म्हणाला, "यार प्रकाश तुला काय सांगू, नोकरी करण्यात आणि स्वत: कमावण्यात एक वेगळीच मज्जा आहे. तू सुद्धा आमच्यासारखा ग्रॅज्युएट आहेस. तू नोकरीसाठी प्रयत्न तर करून बघ, किती दिवस असाच बापाच्या जीवावर उड्या मारीत राहणार?" पक्या उखडला, त्याने सरळ उम्याच्या कानशिलात भडकावली आणि चेकाटून म्हणाला, "साल्या उम्या तू मला शिकवणार का रे? आहेस तरी कोण तू? एक साधा कारकुंडाच ना? मग आयुष्यभर एवढी घास घास घासलीस त्याचा काय उपयोग झाला? ह्या राव्हल्याला बघ. साला कॉलेजला सगळी मज्जा करूनदेखील तुझ्या दुप्पट पगार घेतोय. च्यायला तू मला नोकरीचे सल्ले देतोस? अरे तूच ये माझ्या घरी आणि घरगडी बन. तुला तुझ्या आताच्या नोकरीपेक्षा जास्त पगार मी देतो." उम्यानेही मग पक्याची गच्ची धरली. पण आम्ही मध्ये पडून दोघांना बाजूला केले. "बघून घेईल तुला सुद्धा. बापाच्या जीवावर किती दिवस माज करशील?" असे म्हणत उम्या फणफणत निघून गेला आणि त्यानंतर परत अड्ड्यावर आला नाही अथवा आम्हा कुणाला फोनही केला नाही.
असे बरेच दिवस गेले. पक्याचा बाप मध्यंतरी पतसंस्थेच्या एका मोठ्या घोटाळ्यात पकडला गेला. आमदारसाहेबांचा पाठींबा असल्याच्या गुर्मीत पठ्याने एसीबीवाल्यांची पार आयमाय करून टाकली. पण साहेबाने सपशेल काखा वर केल्या, आणि मग एसीबीने पक्याच्या बापाला असा काही गुंतविला की बस्स. त्याची तीन चारी बँक खाती सील झाली. जमीन, दागिने, घरातली रोकड, दोन ट्रक, एक ट्रॅक्टर आणि तीन जीपा हे सगळे जप्त झाले. बापच आत आणि साहेबाने तोंड फिरवलेले त्यामुळे पक्याला काही करता येईना. दोनेक महिन्याभरात पक्याच्या घराची दुर्दशा झाली. कामधंदा नाही, नोकरी नाही, पक्याचे ठरलेले लग्नही मोडले. नातेवाईकांनीदेखील पाठ फिरवली. पक्यावर उपासमारीची वेळ आली. मग सगळा मानमरातब सोडून पक्या रोजंदारीवर जाऊ लागला. रोजगार केंद्रात नाव नोंदविले. नोकरीसाठी अर्ज खरडू लागला. पक्या वर्षभरात एजबार होणार होता. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी आता त्याला केवळ वर्षभराचाच वेळ होता.
काही दिवसांनी पक्याला एक कॉललेटर आले. मुंबईचे. क्लार्कची पोस्ट होती. सरकारी नोकरी. पक्याला बऱ्याच दिवसांत पहिल्यांदाच थोडा आनंद झाला. आठ दिवसांनी मुंबईत त्याची मुलाखत होती. पक्या तयारीला लागला. भाड्याचे पैसे जमविले. मुंबईच्या बहिणीला फोन करून येत असल्याचे कळविले. पक्याला आता एजबार व्हायला फक्त दोन महिने होते म्हणून त्याला सगळ्या सेटिंग लावायच्या होत्या. तद्वत सगळा अपमान गिळून तो आमदार साहेबांना भेटायला गेला, शब्द टाका म्हणून. पण साहेब म्हणाले, "प्रकाश तुला तर माहीतच आहे ते खाते अनिल मोरेंकडे आहे. आणि हा मोरे म्हणजे पक्षातील माझा सर्वात मोठा विरोधक. त्यामुळे मी शब्द टाकला तर उलट तुझे नाव मुद्दाम वगळतील ते लोक. पण तू काळजी करू नकोस. बघू आपण अजून कुठेतरी प्रयत्न करु." अर्थात ही साहेबाची तोंडाला पाने पुसण्याची स्टाइल होती, त्यामुळे पक्या काय उमजायचे ते उमजला. मुंबईत फोर्टला मुलाखत होती. पक्या आधी शंभरांदा मुंबईस गेला असल्याकारणाने काही अडचण नव्हती. ठरल्या दिवशी मग पक्या फोर्टला पोहोचला. पक्याचा पाचवा नंबर होता. आधीचे तीन चार जण पक्याहुन खूप तरुण होते. पक्या शांत होता. कुणाशी काही बोलत नव्हता. काय होणार याचे त्याला टेंशन आले होते. थोड्या वेळाने चौथा उमेदवार रुमालाने घाम पुशीत बाहेर पडला आणि शिपायाने पक्याचे नाव पुकारले. पक्या उठला. कागदपत्रांची फ़ाइल घेतली आणि आत गेला. आत जाउन खुर्चीवर बसला आणि मग समोर बघतो तर काय. मुलाखत कमेटीच्या अध्यक्षस्थानी उम्या बसलेला. पक्या चपापला. उम्याही पक्याला पाहून आश्चर्यचकित झाला. चारेक वर्षे गावी न फिरकल्यामुळे उम्याला पक्याच्या परीस्थितीची काहीच कल्पना नव्हती. दोघांनाही तो चार वर्षांपूर्वीचा दिवाळीतला प्रसंग आठवला. पक्या खाली मान घालून स्तब्ध बसला होता. उम्या म्हणाला, "अरे प्रकाश तू? तू मुलाखतीला कसा?" पक्या काहीच बोलला नाही. उम्या खुर्चीतून उठला, पक्याकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "अरे किती दिवसांनी भेटतोयेस तू.!" मग उरलेल्या कमेटी मेंबर्सना उद्देशून उम्या उद्गारला, "जंटलमेन, मिस्टर प्रकाश जाधव इज अ वेरी क्लोज चाईल्डहूड फ्रेंड ऑफ माइन, अँड हेंस आय रिक्वेस्ट ए फेवर फ्रॉम ऑल ऑफ यू. आय वांट धीस पोस्ट टू बी गीव्हन टू मिस्टर प्रकाश ओन्ली. व्हाट डू यू ऑल से?" कमेटीतले इतर सगळेजण आश्चर्यमिश्रित आनंदात हसत होते. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. पक्याची मान अजून खालीच होती. उम्याने त्याच्या खांद्यावर जरा थोपटले आणि म्हणाला, "कॉंग्रॅच्युलेशन्स प्रकाश, अँड वेलकम टू माय डिपार्टमेंट." पक्याच्या नाकातून आता उष्म श्वास बाहेर येत होते. तो अचानक उठला. खांद्यावरचा उम्याचा हात झिडकारला आणि खुर्चीच्या बाहेर आला. "मला तुझे उपकार नकोत. समजलास काय? मी तुझा मिंधा बनून तुझ्या हाताखाली काम करीन असे तुला वाटले तरी कसे? मी लाथ मारतो तुझ्या या नोकरीला" असे म्हणून दोनच महिन्यांनंतर एज-बार होऊन कुठेही नोकरी करण्यास नालायक ठरणार असलेला पक्या थरथर कापत आपली फाइल घेऊन धुसमुसत थेट बिल्डींगच्या बाहेर निघून गेला.
तर मध्यंतरी कारकुनीतून अभ्यास करून, परीक्षा देऊन उम्या मोठा साहेब झाला. मी मुंबईतच असल्याने आम्ही त्यानंतर एक दोनदा भेटलो देखील. पण उम्या आधीसारखा नेहमी गावाला जायचा बंद झाला. उम्या नव्या पोस्टला जॉईन झाल्यावर एकदा सीएसटीवर भेटला होता. मी त्याला पाहिल्या पाहिल्या जोरात "ए उम्या" अशी बिनधास्त मोठी आरोळी ठोकून दिली. त्या आवाजाने उम्या चकित होऊन त्याचे बरोबरच्या माणसांना काहीसे सांगून माझ्याकडे आला. जवळ आला, "हॅलो" असे म्हणून माझ्याशी शेकहॅंड केला. आणि त्या दिवशी अचानक माझ्याशी अहो जाहो घालून बोलू लागला. म्हणजे "अहो भांगरे साहेब इकडे कुठे? खूप दिवसांनी तुम्ही भेटलात, खूप बरे वाटले" असे काहीसे खूप औपचारिक बोलला. मला काही कळले नाही. पण "मी आता खूप घाईत आहे, नंतर फोन करतो, मग आपण निवांत भेटू बरे का भांगरे साहेब, आता तुमची रजा घेतो" असे म्हणून त्याने काढता पाय घेतला आणि त्याच्या बरोबरच्या इतर काळ्या कोटावाल्यांबरोबर गर्दीत मिसळून गेला.












उम्याने नव्याने फेसबुक जॉईन केले. मला एका फ्रेंडच्या लिस्टमध्ये तो दिसला म्हणून मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने ऍक्सेप्ट केली. मग मी त्याच्या वॉलवर 'काय रे उम्या भाड्या, कसा गाठला मी तुला इथे.! नालायका साल्या कंजुसा आता पार्टी कधी देतो ते बोल' अशी पोस्ट टाकली. उम्याने तिला रिप्लाय तर केला नाहीच पण उलट ती पोस्ट डिलीट करून टाकली असे माझ्या लक्षात आले.

एकदा गावात दिवाळीच्या सुट्टीला उम्यादेखील आल्याचे कळले. मी त्याच्या घरी भेटायला गेलो. "या भांगरे साहेब कधी आलात?" असे विचारून त्याने सुरुवात केली. मी म्हणालो, "अरे उम्या हरामी, गावी येणार होतास तर सांगायचे तरी होतेस ना? आपण बरोबर आलो असतो". "नाही हो, माझे काही नक्की नव्हते. अचानक प्रोग्राम ठरला आणि आलो. त्यामुळे तुम्हाला सांगायला जमले नाही." उम्याने हे 'तुम्ही तुम्ही' का लावले आहे ते मला कळेना. मी विचारले, "अरे हे काय लावले आहेस? मला हे 'तुम्ही, साहेब' असे का बोलतो आहेस बाबा?" उम्या म्हणाला, "अहो कुणी मोठा साहेब झाल्यावर त्यांना योग्य तो मान नको का द्यायला?" मी हे ऐकून चक्रावलो. मग गावातल्या काही पोरांनी मला सांगितले की उम्याने त्यांना "मला उम्या अशी हाक मारू नका" असे बजावले होते. "मला अहो जाहो घालून बोलायचे असेल तर बोला, अन्यथा माझ्याशी बोलला नाहीत तरी चालेल" अशी त्याने पोरांना ताकीद दिली होती. मग मला त्याचे मला 'अहो-जाहो, तुम्ही' इत्यादी म्हणण्याचे कारण कळले. मला स्पष्टपणे 'माझ्याशी आदरार्थी बोल' हे सांगता येत नाही म्हणून त्याने हा आडमार्गाचा उपाय शोधला होता. पण मी तसे करणारेय थोडाच? लगेच उम्याच्या घरी गेलो आणि बाहेरून "ए उम्या घाश्या बाहेर ये, चल फिरायला जाऊ" अशी आरोळीवजा हाक मारली. उम्या पडलेल्या चेहऱ्याने बाहेर आला आणि माझी तब्येत ठीक नाही मी येऊ शकणार नाही असे म्हणाला. मी हसून तिथून निघालो. दुसऱ्याच दिवशी उम्या मुंबईला निघून गेल्याचे कळले. नंतर उम्याला दोन चार वेळा फोन लावले, फेसबुकवर मेसेज केले पण उम्याने रिस्पॉंड केले नाही. उम्या आता माझ्या कुठल्याही पोस्टवर रिप्ल्याय देणे सोडा, साधे लाइकदेखील करत नाही. मी त्याच्या वॉलवर किंवा पोस्टवर कमेंट केली तरी तो तिला लाइक अथवा कमेंट करत नाही. गंमत तर अशी की उम्याच्या एखाद्या पोस्टवर आलेल्या सगळ्या लोकांच्या कमेंट्सला उम्या लाइक करतो, केवळ माझी कमेंट सोडून.!! मला त्याने असे केल्यावर त्याची जाम मजा येते. मग मी मुद्दाम त्याच्या एखाद्या पोस्टवर "ए उम्या" अशी कमेंट टाकतो. या कमेंटला मात्र तो न चुकता रिस्पॉंड करतो... ती कमेंट डिलीट करून..!!




तर त्या मुलाखतीच्या प्रसंगानंतरची ही अशी उम्याची कहाणी. मग पक्याचे काय झाले? तो दोन महिन्यांनी एज-बार होण्याआधी नोकरीला लागला की नाही? आता काय करतो? हे काहीही मी सांगणार नाहीये. पक्याच्या बाबतीत ही असू देत आमची "झाकली मुठ सव्वा लाखाची..!!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा