हा ब्लॉग शोधा

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

हिवाळा-२: अगतिक

"ऋतू वसंताचा आहे, फुलांमध्ये नवा रंग, नवा सुगंध आहे, नदी संथ वाहतेय आणि हवेत मंद धुंद गारवा आहे. यांपैकी अंगावर शहारा नेमका कशाने उठतो हे सांगणे कठीण आहे. 
आठवड्यापूर्वी सहज पहाटे आले होते इथे, धुके पसरले होते आजूबाजूला. मध्येच मग एक मंदसा गार झोत आला वाऱ्याचा. सकाळच्या नाजूक समयी माझ्या डोळ्यांना ती शीतल झुळूक सहन झाली नाही, डोळे भरले. मी ते हळूच टिपले, तेवढ्यात सूर्यबिंब वर आले आणि हळूहळू धुके विरळले. नदीच्या पात्रावरून ते तलम शुभ्र पडदे हलकेच बाजूला झाले, व मग समोर मला दिसला तो पैलतीरीचा मोहक रंगमंच..!! तेव्हापासून मागचे काही दिवस मी रोज इथे या कातळावर बसून बघत असते लांब तिकडे पैलतीरावर.!! पहा ना इथल्यापेक्षा किती दाट झाडी आहे पैलतीरी. किती सुंदर दिसतात त्या आम्रतरुंच्या ओळी. आपल्याकडे चराईसाठी वापरली जात असल्याने इथल्या कुरणांत अपवादानेच मृग क्रीडा करताना दिसतात, मात्र तिथली गवत कुरणे मृगांनी भरलेली आहेत. इकडच्याहुन अधिक मयूर तिकडे आहेत. तुला माहितीये हे राजहंस आहेत ना, इथे फक्त फिरायला येतात, त्यांचा मुक्काम असतो तिथे तिकडच्या किनाऱ्यावर. किती सुंदर कवायती करत असतात. आपण ना आपल्यातच तल्लीन असतो, पलीकडे पाहतच नाही. तुला माहितीये ते राजहंस ना असे गोल गोल रिंगण करून फिरतात. मग हळूहळू रिंगण छोटे होत जाते आणि मध्यात पोचले की एका पाठोपाठ एक असे सगळे पाण्यात डुबकी मारून गायब होतात. त्यानंतर मग क्षणार्धात एकेक पुन्हा बाहेर येऊ लागतात व वेगवेगळे आकार घेतात. इथून असे वाटते की पाण्यातून पांढरी फुले क्षणार्धात उमलत आहेत आणि माळा बनून पाण्यावर तरंगत आहेत. या वसंत ऋतुत जेव्हा कधी वाऱ्याचा झोत पैलतीरावरुन येतो ना, तेव्हा किती मोहक सुगंध येतो म्हणून सांगू.!! ती अन्वेषा सांगत होती की तिकडे म्हणे कस्तूरीमृग आहेत. आणि वसंतात मिलनेच्छेने व्याकुळ झालेले ते मृग जेव्हा सैरभैर धावत असतात तेव्हा त्यांच्या नाभिंतुन तो दिव्य सुगंध चौफेर शिंपडला जातो. किती श्रृंगारिक कारक म्हणावा न त्या दिव्य सुगंधाचा.!! किती मोहक, किती सुंदर असेल ना रे पैलतीर. मला तर तिकडे जाऊन त्या सगळ्या स्वर्गीय आनंदात खुप खुप न्हाऊन घ्यावेसे वाटते.
"अगं कित्येक जण जातात पैलतीरी. तिथे खूप सुख आहे असे सांगतात सगळे. एकदा तिकडे गेले की कुणीही परत येत नाही तिथून." 
"हो पण मला काल एक व्यक्ती भेटली तिकडची. तिने सांगितले की पैलतीर जेवढा सुंदर, जेवढा मोहक आहे तेवढाच विस्मयकारी, आणि कठोर सुद्धा आहे. तिथल्या राज्यात फार कडक नियम आहेत. कुणासाठीही ते शिथिल होत नाहीत. तिथे प्रचंड सुख आहे पण प्रत्येकाला तेवढे सुख लाभतेच असे नाही. काही जणांचा तर प्राण गुदमरतो तिथल्या नियम व्यवस्थांनी. पण एक मात्र खरे की कुणीही तिथल्या घुसमटीबद्दल बोलत नाही. ती व्यक्ती सांगत होती की एकदा तिकडे गेले की परत इथे येता येत नाही. थोड़े दिवस तो काठ आपल्याला खुप भावतो, पण नंतर कित्येकांना पुन्हा हाच किनारा खुणावू लागतो, एवढा की आपण कासाविस होतो तिकडून इकडे साधी नजर गेली तरी. बघ ना ती काठावरची झाडे कशी इकडेच झुकली आहेत. प्रवाहाबरोबर आपल्याच वनातील वृक्षांच्या वाहून तिकडे गेलेल्या बीजांतुन अंकुरली आहेत ती. त्यांना परतून इकडे यायचे असते पण तिथली त्यांची रुजलेली मुळे सोडून त्यांना येता येत नाही. एवढे मोठे पात्र ओलांडून परत इकडे येणे हे माणसांनाही सहज शक्य नाही तिथे त्या तरूंची काय तमा.! इथे ऐलतीरी आपली माणसे, आपल्या परिचयाची वने आहेत. तिथे सारेच अनोळखी. आपल्याला अलिकडून तिकडचा दिसतो तो केवळ एक छोटासा भाग. काय घ्यावे खुप आत काय असेल.?
काही दिवसांपासून माझे मातापिता, माझी सखी दीपशिखा असे सगळे मला हेच सांगत असतात की तो पैलतीर फार मोहक आहे. त्यांना वाटते तिकडे खूप सुख आहे म्हणून त्यांस मला तिकडे धाडायचे आहे. पण मला इथेच राहायचे आहे. हे माझे नगर आहे. हे माझे तरुवन आहे. इथे माझे जे काही आहे ते तेवढे सुखदायी असो की नसो पण ते मला त्यागावेसे वाटत नाही. मी गेल्यावर हे जे माझे आहे ते दुसऱ्या कुणाचे होईल. मला ही कल्पना सहन होत नाही." 
"जे आपले आहे ना ते कुठेही गेले तरी आपलेच राहते. आणि जे आपले नाही ते आपण कितीही इच्छा केली तरी ते दुसऱ्या ज्या कुणाचे असते त्यालाच मिळणे श्रेयस्कर होय हे मानण्यातच खरा समंजसपणा आहे."
"आपले सुख कशात आहे हे आपल्या स्वत:स सोडून कुणाला ठाऊक असते? बाकीच्यांचे जाऊदे पण माझे तातश्री तुझे पिताश्री, थोरला दादा, आणि तू स्वत: हे सगळे जेव्हा मला याविषयी बोलतात ना तेव्हा मला वाटते की मी तुम्हा सर्वांस नकोशी आहे. आपण आपल्या सर्वाधिक प्रिय व्यक्तीस नकोसे आहोत या भावनेचे दु:ख फार मोठे आहे. 
तुला एक गोष्ट सांगते ऐक..
एक गरुड होता. रुद्रध्वज नावाचा. साताठ महिने वय असेल त्याचे. तुला माहितीये? दीड दोन वर्षाची होईपर्यंत गरुडाच्या पिलांस उडता येत नाही. ती एवढा काळ तशीच उंच झाडावरच्या त्यांच्या घरट्यात अडकून राहतात. माता पिता त्याच्यासाठी भक्ष्य घेऊन येतात. आणि ती तिथेच वाढतात. मग एके दिवशी त्यांच्या पंखात पुरेसे बळ आले की ती आपली पहिली गगनझेप घेतात. एवढे दिवस प्रतीक्षा केल्यावर पुरेसे सामर्थ्य कमावून पहिल्याच प्रयत्नात मग ती आभाळ जिंकतात.
या रुद्रध्वजाचा पिता वीरधन्वा हा मोठा शूर होता. तो वयाच्या केवळ पाचव्या महिन्यातच उडायला शिकला होता. संबंध पक्षीकुलात त्याचा मोठा लौकीक होता. त्याला फार वाटे की रुद्रध्वजाने देखील आपल्यासारखेच इतरांपेक्षा लवकर उडायला शिकुन आपल्यासारखेच लौकीकास प्राप्त व्हावे. वीरधन्वा हा स्वत:च केवळ शुरवीर नव्हे तर त्याचे बीजदेखील तेवढेच सामर्थ्यशाली आहे असे जगाने म्हणावे असे त्यास वाटे. रुद्रध्वजास तो सांगे की जेवढा लवकर तो उडायला शिकेल तेवढे लवकर त्यास एक नवा बंधू आणता येईल, आणि असे ते खूप भाऊ झाले की सगळ्या आसमंताचे राज्य ते जिंकू शकतील. याचसाठी तो पाचव्या महिन्यापासूनच रुद्रध्वजास उडण्यास प्रवृत्त करू लागला होता मात्र आता सात महिने लोटले तरी रुद्रध्वजाची उडण्याची हिंमत होत नव्हती. आता वीरधन्वाचा संयम सुटला. त्याचा पुत्र असूनही रुद्रध्वज त्याचेसारखा सामर्थ्यशाली नाही असे लोक बोलू लागले होते. त्याने मग ठरवले की काहीही झाले तरी रुद्रध्वजास उडायला शिकवायचे, आणि त्यास सामान्य म्हणणाऱ्या लोकांची तोंडे बंद करायची. त्याने रुद्रध्वजास खुप समजावले, दरडावले पण तो काही बधला नाही. मग वीरधन्वाने त्यास उडायला लागेपर्यंत भक्ष्य आणून द्यायचे नाही असे ठरविले. त्याने भक्ष्य आणणे बंद करून टाकले. दोन दिवस उपाशी राहून रुद्रध्वज अगदी व्याकुळ झाला आणि मग तिसऱ्या दिवशी त्याने पित्यास सांगितले की तो उड्डाण करण्यास तयार आहे. हे ऐकून वीरधन्वा अत्यंत आनंदित झाला. त्याने मग मोठ्या थाटामाटाने जवळचा मुहूर्त शोधून रुद्रध्वजाचे पहिले उड्डाण साजरे करण्याचा निर्णय घेतला. आपला पुत्र इतर गरुडांपेक्षा कितीतरी लवकर उड्डाण भरणार आहे, त्याच्या नसांत वाहणारे आपले रक्तही तेवढेच वीरश्रीने भारलेले आहे हे सर्वांनी पहावे म्हणून रुद्रध्वजाच्या त्या प्रथम झेपेचे साक्षीदार होण्यासाठी त्याने पक्षीराज्यातील कित्येक जणांस बोलाविले.
त्या दिवशी मग वीरधन्वा सर्वांना दिसेल अशा एका मोठ्या झाडाच्या फांदीवर बसला. त्याला इतक्या लोकांपुढे आपला पुत्र शक्तीप्रदर्शन करणार याचा अभिमान वाटत होता. रुद्रध्वज मग घरट्याच्या टोकावर आला. त्याने अपार दु:खाने आपल्या त्या घरट्याकडे पाहिले. पुन्हा कधीही तो घरट्यात येऊ शकणार नव्हता. ती जागा आता दुसऱ्या कुणासाठी तरी राखली जाणार होती. जगावर राज्य करण्यासाठी त्याला सोबत आवश्यक असलेल्या त्याच्या इतर बंधुंसाठी.!!  त्याने खाली पाहीले. तेवढी उंचीही त्याला कित्येक योजने अंतराएवढी अधिक वाटली. त्याला उगीच थोडीशी भीती वाटून गेली. त्याने जमलेल्या लोकांकडे पाहीले. हरेकजण आश्चर्यमिश्रित कौतुकाने त्याचेकडेच पाहत होता. मग त्याने वळून आपल्या पित्याकडे पाहिले. पण त्याचे रुद्रध्वजाकडे लक्षच नव्हते. तो आपला गुंग होता लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या कौतुकाचे उमटलेले भाव बघण्यात. रुद्रध्वजाने पंख फैलावले. त्याचे पाय काहीसे लटपटले. त्याने एकदा परत वीरधन्वाकडे पाहिले. आता मात्र त्यांची नजरानजर झाली. रुद्रध्वजाने आतीव करुणेने आज मला जमणार नाही तेव्हा हा सोहळा नंतर करा अशी नजरेनेच त्यास विनंती केली. मात्र यावर वीरधन्वाने अत्यंत क्रुद्ध नजरेने त्याचेकडे पाहुन त्यास निमुटपणे उडण्याचा इशारा केला.
आता गत्यंतर नव्हते. रुद्रध्वजाने नखांची फांदीवरची पकड़ सैल केली आणि डोळे मिटुन मनाचा मोठा निग्रह करून समोर उडी घेतली. आता तो पूर्ण अधांतरी होता. त्याने जोराजोरात पंख हलवले, मात्र अजून त्याच्या पंखांत पुरेसे बळ न आल्याने त्याला तोल सावरता येईना. तो वेगाने खाली जाऊ लागला. तातश्री मला वाचवा अशी त्याने आरोळी ठोकली. पण वीरधन्वा त्याची तशी केविलवाणी अवस्था पाहुन प्रचंड अपमानित भावनेने थिजुन गेला होता. खरेतर त्याला सहज शक्य होते एका झेपेत आपल्या पिलास पकडून पुन्हा वर घरट्यात आणून ठेवणे. पण त्याने तसे काही केले नाही. त्याची इच्छा असेलही कदाचित रुद्रध्वजास वाचविण्याची मात्र त्याची ही भावना कृतीत येऊ शकली नाही. त्याच्या संवेदना जणू दगड झाल्या होत्या. रुद्रध्वजाने पडता पडता पाहिले की त्याचा पिता जागेवरून तसुभरही हलला नाही. आणि मग तसाच वेगाने हेलपाटत रुद्रध्वज असहायपणे खाली कोसळला. मरणापेक्षा आपल्या सर्वाधिक प्रिय व्यक्तीची प्रतारणा रुद्रध्वजास अधिक दू:ख देऊन गेली असेल. नाही का? लोकभावना, लोकनिंदा ही एवढी अगतिक करून टाकते पुरुषांस? एवढा सामर्थ्यशाली वीरधन्वा, पक्षीकुलातील सर्वश्रेष्ठ पक्षीराज..!! तो चाहता तर सहज आपल्या पुत्रास वाचविता. आणि त्यास निंदिणारांस देखील चूप करविता. पण त्याने असे केले नाही. त्याने आपल्या पुत्रास आपल्या डोळ्यांदेखत मरू दिले. याचे काय कारण असेल? की सगळे पुरुष असेच वागतात?"

"दोष वीरधन्वाचा नव्हता असे मी म्हणणार नाही पण दोष त्याचाच होता असेही नाही. मी तर म्हणेन की रुद्रध्वजाने उड्डाण भरण्याआधीच हार मानली होती म्हणून तो मृत्यू पावला. त्याला घरटे हवे होते. आपल्या मातापित्यांकरवी होणारी सेवा अजून खूप काळापर्यंत हवी होती. आपण इथून गेलो की आपल्या नंतर आपल्या मातापित्यांचा नवीन पुत्र इथे येईल, आपण एकटे पडू या भीतीने तो ग्रासला होता. पण म्हणून रुद्रध्वजच दोषी होता असेही नाही. कधी कधी काळच फार वाईट असतो. अपरिहार्य असतो. मला ठाऊक आहे तुझ्या कथेतला वीरधन्वा मीच आहे. वीरधन्वाने आपल्या पुत्रास का वाचवले नाही हा अनाकलनीय प्रश्न आहे. तो त्याचा वाईटपणा होता असेच नाही. कधी कधी प्रत्यक्ष दिसणाऱ्या कृतींमागे फार वेगळे उद्देश दडलेले असू शकतात. तर निर्णय घेण्यास कधी कधी वेळ कमी असतो तेव्हा एक प्रकारची वैचारीक ग्लानी येते. अनेक गोष्टी असतात ज्या सहजसाध्य वाटतात परंतु परिस्थितीची अगतिकता त्यांचे साध्य होणे अशक्य करून टाकते. या सपाट प्रदेशावरुन वाहताना शक्य असतानाही ही यमुना उलट प्रवाहीत होऊ शकत नाही, होय ना? यालाच अपरिहार्यता किंवा अगतिकता म्हणतात. मी ही तसाच कुठल्या तरी कारणाने अगतिक झालेला असू शकतो ना?

"आता मी ही तुला एक गोष्ट सांगतो. खुप खुप पूर्वीची गोष्ट आहे. इथे आपल्या नगरात एक स्त्री राहत होती. ती म्हणायची की मला पैलतीरी जायचे आहे. तेव्हा आजच्यासारख्या नावा वगैरे नव्हत्या. तोपर्यंत कुणीही कधीही पैलतीरी गेले नव्हते. सगळे तिला विचारीत की तुला पैलतीरी का जायचे आहे? ती म्हणे हा सूर्य तिकडे जाऊन मावळतो ना, मला तो सूर्य हवा आहे. लोक म्हणत अगं पण सूर्य तर इथेही उगवत असतो. त्यासाठी तिकडे जाण्याची काय गरज? यावर ती म्हणे इथला सूर्य काय कामाचा? इथे तो कुठे फक्त माझा आहे? सोळा हजार लोक आहेत या नगरात, आणि सूर्य त्या सगळ्यांना मिळतो. मला हे मान्य नाही. सूर्य मला एकटीला हवा आहे. तिथे पैलतीरी तो मावळल्यावर जिथे थांबतो तिथे मला एकटीला मिळेल. तिच्या या वेड्या समजुतीपासून तिला परावृत्त करण्यासाठी सगळ्यांनी खुप प्रयत्न केले पण ती ऐकेना. तिला कसे समजवावे हे कुणालाच कळेना, मग एक दिवस ती कुणाचेही न ऐकता पाण्यात उतरली आणि पैलतीराकडे झेपावली. ती आता वाहून जाणार असे सर्वांना वाटले पण प्रवाहात वाहत वाहत ती चमत्कारीकरीत्या कशीबशी तिकडे पैलतीरी जिवंत पोचली. आणि तिकडे गेल्यावर काय झाले माहितीये? इथे सूर्य मावळला ना तसा तो तिथेही मावळला. तिला काही तो एकटीला मिळालाच नाही. तिने हे पाहून परतण्याचे खुप प्रयत्न केले पण वेगाने वाहणाऱ्या नदीने तिला परत येऊ दिले नाही. लोक म्हणतात की ती नदीत उडी मारून वाहून गेली तर काही म्हणतात की आपल्या दुर्भाग्यास दूर करण्यासाठी तिने तप केले अन मग त्यायोगे काही दिवसांनी ती चांदणी बनून आकाशात गेली. काहीही झालेले असो पण तिचा अंत दुर्दैवी झाला हेच खरे. तिचे काय चुकले सांगू? सूर्य कधी कुणा एकट्याचा होऊ शकतो का सांग बरे.? तो सर्वांसाठी असतो. सर्वांना सारखाच प्रकाश देतो. प्रत्येकाला त्याचा प्रकाश पुरेपुर मिळतोच. नव्हे काय? मग तो केवळ आपल्यालाच मिळावा अशी कामना का करावी? तिने तशी कामना केली आणि म्हणून ती आपले सुखमय आयुष्य गमावून बसली."

हो तिचा जो काही अंत झाला तो नक्कीच वेदनादायी असावा. मात्र तिचे जे काही बरेवाईट झाले त्यामागे तिची स्वत:ची इच्छा होती. परंतु जर कधी असे झाले की आपणांस सूर्यापासून दूर ठेवण्यासाठीच पैलतीरी पाठवले जात असेल तर?

असे काय बोलते आहेस तू?

मी काय बोलते आहे ते तुला चांगलेच माहित आहे. मला माहीत आहे कान्हा की तुझ्या गोष्टीतली ती स्त्री मीच आहे. तुझी राधा.!! आणि तू आहेस माझा तो सूर्य. मला ठाऊक आहे की माझ्यासाठी अगदी समोर असूनही सूर्य मावळला आहे. आता मी जाते. तो मावळला आहे या विचारानेच आता झरझर दव पडू लागेल. तू ते पाहू नयेस. मलाच ते तुला दाखवायचे नाही. दवाने भिजून सूर्य कधी विझणार नाही. आजपर्यंत सोळा हजारांच्या या नगरीतही तू केवळ माझा होतास, म्हणूनच मला जायला हवे विवाहाची यमुना पार करून संसाराच्या पैलतीरी. म्हणजे माझ्यानंतर तू त्या सोळा हजारांस लाभशील. तू योग्य बोलतोस. सूर्य असतो तो संपूर्ण जगाचा. तो फक्त आपला एकट्याचा असावा ही अपेक्षा करणे गैरच.
तू ठरविलेस तर काय होऊ शकत नाही कान्हा? पण तू तसे करत नाहीस ही तुझी अगतिकता आहे, वीरधन्वासारखी..!! आणि तुझी ही अगतिकता मला उथळ करून टाकते. तुला माहितीये? उथळ जागीच यमुना अधिक वेगाने वाहते. म्हणून मलाही आता निरोप दे आणि वाहू दे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा