हा ब्लॉग शोधा

बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

रामायण स्फुट 11

उत्तरेकडून येणाऱ्या थंड झुळुका मन मोहवून टाकीत होत्या. शर्वरी तलावाच्या काठी असलेल्या पायरीवर बसली होती. पाण्यात पाय बुडविले तर स्थिर झालेले चंद्रबिंब विक्षुब्ध होईल म्हणून ती पाय सावरून बसली होती. तिला रात्र फार प्रिय होती. तिच्या दालनाजवळच्या या तलावात चंद्राच्या प्रतिबिंबासोबत आपला अंधुकसा चेहरा न्याहाळत बसायला तिला खूप आवडे. तिचा जन्मच रात्रीच्या पहिल्या प्रहराच्या अंतसमयाच्या आसपास झाला होता. म्हणूनच तिचे नाव तिच्या पित्याने शर्वरी असे ठेवले होते. हे नाव संस्कृत होते. मात्र तिचे नगरच नव्हे तर पूर्ण राज्यातही संस्कृत जाणणारे कुणी नसल्याने आणि एकंदरीतच संस्कृत शब्द आणि नामे उच्चारण्यास कठीण असल्याने तिचा पिता वगळता तिच्या मातेसकट इतर कुणीही तिला अचूक शर्वरी अशी हाक कधीच मारली नाही.
आज शर्वरीचे स्वत:स न्याहाळणे नेहमीचे नव्हते. आज ती अगदी मोहरून स्वत:स पाहत होती. तलावातील कमलदलावरील जलबिंदू आज तिला मोत्यासमान वाटत होते. क्षणोक्षणी मनात उठणाऱ्या कुठल्याशा मधुर तरंगांनी तिचे अंग मोहरून उठत होते. आजूबाजूस निरव शांतता असूनही कानात कुठल्याशा संगीतबद्ध सुरांचे गुंजन तिस ऐकू येत होते. एकदा आपल्या प्रतिबिंबाकडे आणि एकदा चंद्रबिंबाकडे आळीपाळीने बघून ती उगीचच स्वतःशीच मंदसे हसत होती. थोड्या वेळाने ती अजून पुढे झुकली आणि थोडे वाकून पुढे पाहू लागली. पाण्यात आता आपला कमनीय बांधा, महत वक्ष, वक्राकार कटी आणि कटिवस्त्राच्या थोडीशी वर बरोबर पोटाच्या मध्यभागी असलेली नाजुकशी नाभी हे पाहून उगीच तिच्या अंगावर एक बारीकसा शहारा उठला. आपली कटी किती कमनीय आणि आपले वक्ष किती बृहत आहेत याची तिला जाणीव झाली आणि परत एकदा ती स्वतःशीच अपार लाजली. राजपुत्री शर्वरीचे असे कितीतरी वेळ स्वतःलाच न्याहाळत वारंवार रोमांचित होण्याचे नेमके कारण तरी काय होते?

दूर पूर्वेचा एका संघप्रमुखाचा तरुण पुत्र रामभद्र हा उद्या तिच्या वधुपरीक्षेसाठी येणार होता. रामभद्रच्या राजबिंडेपणाची व शौर्याची कीर्ती त्रिखंडांत दुमदुमत होती. रामभद्र हा कुणी सामान्य राजपुत्र नव्हता. स्वतः शर्वरीच्या पराक्रमी पित्यास त्याने युद्धात लीलया हरवले होते. वायव्येकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या कित्येक युद्धटोळ्यांचा बंदोबस्त करून त्याने आपले राज्य समृद्ध आणि सुरक्षित केले होते. विंध्यपर्वत ओलांडून आपले राज्य थेट मलयगिरीपर्यंत विस्तारणारा तो पहिला योद्धा होता. असा महापराक्रमी वीर आपल्यास वरणार आहे या मात्र विचारानेच शर्वरी अत्यंत रोमांचित होत होती. चारच दिवसांपूर्वी शर्वरीच्या पित्याच्या राज्यावर मोठे संकट आले होते, रामभद्र एकामागून एक देश जिंकत थेट शर्वरीच्या राज्याच्या सीमेवर येऊन ठाकला होता. शर्वरीच्या पित्याने युद्धाची जोरदार तयारी केली, युद्धाला तोंडही फुटले मात्र एका प्रहराभरात रामभद्राने शर्वरीच्या पित्याची वाताहत करून टाकली. युद्धाचे पारडे रामभद्राच्या बाजूने फिरलेले पाहताच अनाठायी अधिक संहार नको म्हणून शर्वरीच्या पित्याने शरणागती पत्करली आणि रामभद्रही मग युध्दविरामास तयार झाला. रामभद्राचा पराक्रम पाहून स्वतः असीम पराक्रमी असलेल्या शर्वरीच्या पित्याने जेव्हा त्यास मैत्रीचे आवाहन केले तेव्हा त्यानेही ते आनंदाने स्वीकारले. त्याचवेळी तिच्या पित्याने त्यास शर्वरीशी विवाहाचा प्रस्ताव दिल्यावर त्याने तोही मान्य केला होता. रामभद्र त्यानंतर नगरीच्या बाहेरच उभारलेल्या एका आलिशान शिबिरात थांबला होता. उद्याची वधुपरीक्षा ही केवळ औपचारिक होती. रामभद्रचा शर्वरीशी आणि शर्वरीच्या ज्येष्ठ बंधूचा रामभद्रच्या भगिनीशी विवाह निश्चित झालेला होता.
................

मग तो दिवस उगवला. शर्वरीच्या पित्याने नगर प्रचंड सुशोभित करवून घेतले होते. त्रिखंडातील सर्वश्रेष्ठ वीर आपल्या पुत्रीच्या वधुपरिक्षेसाठी येत आहे तेव्हा आपल्या आदरातिथ्यात कुठेही तसूभरही उणीव राहता काम नये हे त्याने अत्यंत दक्षतेने पाहीले होते. गुढ्या, पताका, तोरणे यांनी संपूर्ण नगर आणि राजवाड्याकडे येणारा हमरस्ता भरून गेला होता. राजवाड्याच्या छतावरील दालनातून संपूर्ण हमरस्ता अगदी स्पष्ट पाहता येत असे. शर्वरी सगळा साजशृंगार घाई घाईने आटोपून केव्हाची त्या दालनात येऊन थांबली होती. थोड्या वेळाने तिला दिसला एक सोन्याने मढविलेला हत्ती आणि त्याचे पाठीवरील सुवर्ण अंबारी. अंबारीवर रामभद्राचा लाल ध्वज डौलाने फडकत होता. मात्र अंबारीत कुणी बसलेले दिसत नव्हते. शर्वरीने अजून थोडी सूक्ष्म नजर करून पाहिले तेव्हा तिला दिसले की एक राजबिंडा तरुण त्या हत्तीच्या पुढे पुढे अनवाणी चालत येत आहे. त्याच्या प्रत्येक पावलागणिक त्याच्यातील राजबिंडेपणा आणि वीरता स्पष्टपणे झळकत होती. हाच आपला जीवनासाथी होणार असलेला रामभद्र हे ओळखायला शर्वरीस वेळ लागला नाही. पण रामभद्र असा पायी का चालतो आहे? असे शर्वरीने सखीस विचारले तेव्हा तिने सांगितले की पूर्वेकडील देशांत तशीच रीत आहे. आपली जीवनसंगिनी निवडणारा पुरुष आधी आपल्या पायांनी वधूच्या नगरातील मातीस स्पर्श करून आपण त्या मातीशी एकरूप होण्यास तयार आहोत हे दाखवतो, त्या मातीत आपले बीज पेरण्याची परवानगी घेतो आणि मगच त्याची वधू निश्चिती होते. आणि ते पहा राजकुमारी अंबारीत एका स्त्रीची मूर्ती आहे. पूर्वेचे लोक हे स्त्रीप्रभुत्वाचे पालन करणारे आहेत. ती मूर्ती रामभद्रच्या भगिनीची आहे जिच्याशी आपले बंधू विवाह करणार आहेत. तिथे स्त्रीला नेहमी पुरुषापेक्षा श्रेष्ठ दर्जा दिला जातो म्हणून तिच्या मूर्तीस रामभद्रपेक्षाही वरचे म्हणजे अंबारीत स्थान देण्यात आलेले आहे.
सखी हे सगळे सांगत असली तरी शर्वरीचे कुठे तिकडे लक्ष होते? तिची नजर फक्त रामभद्रवरच खिळलेली होती. रामभद्रला तसा चालत येताना शर्वरीला पाहतच बसावेसे वाटत होते पण तेवढ्यात एका दासाने तिला महाराजांनी वधुपरीक्षेसाठी बनविलेल्या दालनात यायला सांगितल्याचा निरोप दिला आणि ती तिकडे जायला निघाली.
वधुपरीक्षेच्या दालनात मोठी गर्दी होती. दालन कसले ती तर शर्वरीची आवडती बागच होती. तो तलाव, निर्झर, झाडे, फुलझाडे, पक्षी, मयूर, मृग सगळे होते आणि त्याबरोबरच अगदी कल्पकतेने एक शामियाना बनवून त्यात बैठकीची आसने मांडून ठेवण्यात आली होती. शर्वरी तिथे पोचण्याआधीच आजूबाजूच्या देशांतील कितीतरी राजे आणि विश्वामित्र, वसिष्ठ, गौतम व अगस्त्य हे महर्षीही आले होते. सहसा महर्षी कोणत्याही विवाह वा वधुपरीक्षणाला जात नसतात त्यामुळे त्यांस खास आपणास आशीर्वाद देण्यासाठी आलेले पाहून शर्वरीला खूप चांगले आणि मंगल वाटले.

रामभद्र दालनात दाखल होताच एकच लगबग चालू झाली. शर्वरीच्या भावाने स्वतः होऊन त्यास त्याच्या आसनापर्यंत नेले. तो स्थानापन्न होताच बाकी सर्वजणही स्थानापन्न झाले. मग शर्वरीचा पिता उठला आणि त्याने महर्षिंस अभिवादन करून सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर शर्वरी दालनात आली आणि बरोबर मध्यभागी बनविलेल्या एका छोट्याशा मंचकावर उभी राहिली. तिच्या शेजारी दुसऱ्या एका मंचकावर रामभद्राच्या बहिणीची सुवर्णमूर्तीदेखील ठेवण्यात आली. शर्वरी तिथे येऊन उभी राहताच सर्वांच्या नजरा तिजवर खिळल्या. शर्वरीने सर्वांकडे नजर फिरविताना हलकेच रामभद्रकडे पाहीले. तोही एकाग्रतेने शर्वरीकडेच पाहत होता. दोघांची क्षणभरच नजरानजर झाली. आणि शर्वरीने लाजून नजर खाली झुकवली. त्यानंतर शर्वरीच्या पित्याने उभे राहून रामभद्रास आपण माझ्या मुलीचे पाणिग्रहण करावे असे आवाहन केले. रामभद्र त्यास रुकार देणार एवढ्यात महर्षींपैकी अगस्त्य उभे राहिले आणि म्हणाले, थांबा. शर्वरीस वरण्यासाठी रामभद्र यास तिला पणात जिंकावे लागेल. जर रामभद्र खरा वीर असेल तर तो आधी पण पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारेल आणि मगच शर्वरीस प्राप्त करता होईल. महर्षींचे हे आव्हान ऐकताच रामभद्र उभा राहीला आणि म्हणाला की ठीक आहे, चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांपैकी कोणत्याही विषयातील नैपुण्य जोखण्यासाठी आपण जो काही पण ठेवाल तो पूर्ण केल्याशिवाय मी शर्वरीस वरणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.
अचानक उद्भवलेल्या या अशा प्रसंगामुळे दालनात एकच खळबळ माजली. शर्वरीही भांबावून गेली. महर्षींनी मधेच हे काय काढले? तिने प्रश्नार्थक नजरेने आपल्या पित्याकडे पाहीले. ते तात्काळ उठून महर्षी अगस्त्यांकडे गेले. दोहोंत काही चर्चा घडली आणि मग शर्वरीच्या पित्याने स्वयंवराचा पण हा धनुर्विद्येची परीक्षा घेणारा असेल असे जाहीर केले. महर्षी अगस्त्य मग पुढे आले. ज्या बागेत हा सोहळा होत होता तिच्या दक्षिण बाजूला सात मोठे वृक्ष अर्धगोलाकार आकार बनवतील अशा रीतीने लावण्यात आलेले होते. महर्षी तिथे गेले. त्यांनी एक वीस हात असलेली मूर्ती आणून बरोबर त्या अर्धगोलाच्या बाहेर मध्यभागी ठेवली. मग त्यांनी पण जाहीर केला की रामभद्राने पहील्या वृक्षावर एक बाण अशा प्रकारे चालवावा की तो बाण पहील्या वृक्षास भेदून नंतर परावर्तित होत होत अनुक्रमे या सातही वृक्षांना स्पर्शला पाहिजे. एवढेच नाही तर सातव्या वृक्षापासून परावर्तित झाल्यानंतर त्या बाणाने बरोबर या समोर ठेवलेल्या वीस हातांच्या मूर्तीचा भेद केला पाहीजे. 
पण तर अत्यंत अवघड होता. रामभद्र अत्यंत पराक्रमी असला तरी हा पराक्रमाचा नव्हे तर मोठ्या अद्भुत कौशल्याचा पण होता. रामभद्र हा पण पूर्ण करू शकेल का? आणि नाही करू शकला तर काय? असे विचार मनात येऊन शर्वरीच्या काळजात धस्स झाले. एवढा अवघड पण ठेवल्याबद्दल तिला महर्षींचा किंचित रागही आला. मनाने तर तिने केव्हाच रामभद्रास वरले होते.  पण महर्षींच्या शब्दापुढे कुणीही जाऊ शकत नाही हे तिला ठाऊक होते. तिने अत्यंत निराश होऊन रामभद्रकडे पाहीले. तो मात्र अत्यंत शांत आणि दृढपणे उभा राहून मंदसा हसत होता, बहुदा त्याला शर्वरीच्या मनातली घालमेल कळली असावी, त्याने नजरेनेच तिला काही काळजी करू नकोस असा इशारा केला असे तिला वाटले. मात्र तरीही शर्वरीची भीतीने होणारी थरथर थांबायला तयार नव्हती. महर्षींनी एखादा सोपा पण ठेवायला हवा होता ना. जर रामभद्र हा पण पूर्ण करू शकला नाही तर भारतवर्षातील इतर कुणीही तो पूर्ण करू शकेल असे वाटत नव्हते. त्यामुळे जर रामभद्र अयशस्वी झाला तर रामभद्रच काय इतर कुणाशीही तिचे लग्न होण्याची काहीही शक्यता नव्हती. कारण एकदा स्वयंवराचा पण जाहीर केला की कुणीतरी तो पूर्ण केल्याशिवाय त्या युवतीचा विवाह होऊ शकत नाही. जर एखाद्या वीराने तो पण पूर्ण केला मात्र वधूस तो युवक पति म्हणून नकोसा असेल तर ती त्यानंतरही अजून एखादा पण ठेवण्याची विनंती करू शकत होती. मात्र जर तो पहीला पणच पूर्ण झाला नाही तर तिचा विवाह कधीही होत नसे. स्वयंवर पद्धतीची ही अट एवढ्यासाठी होती की वधूच्या पित्याने आपली कन्या आजन्म अविवाहित राहील या भीतीने तरी कुणालाही साध्य होणार नाही असा काही अवघड पण ठेवू नये. मात्र इथे शर्वरीच्या पित्याने नव्हे तर साक्षात महर्षींनीच हा पण ठेवला होता. 
महर्षींच्या म्हणण्याप्रमाणे मग सगळेजण बागेच्या दक्षिणेस योजित ठिकाणी आले. रामभद्रने आपले धनुष्य हातात घेतले आणि तो पहील्या झाडाच्या दिशेने बाणाची प्रत्यंचा ओढून वीरासनात बसला. महर्षींनी इशारा केला आणि रामभद्रने प्रत्यंचेतून बाण सोडला. पापणीही लवायच्या आत बाण आदळून त्या वीस हातांच्या मूर्तीच्या ठिकऱ्या उडाल्या. हेच नाही तर एकामागून एक सातही वृक्ष मधून मोडून बाहेरच्या दिशेला पडले. हे सगळे इतके क्षणार्धात झाले की विस्मयाने सर्व दर्शक अगदी शांत होऊन गेले होते. सात वृक्षांच्या पडण्याचा आवाज आला आणि मग रामभद्रने पण पूर्ण केल्याची सर्वाना जाणीव झाली व एकच कल्लोळ झाला. शर्वरीच्या आणि तिच्या पित्याच्या हर्षाला तर पारावार नव्हता. एवढेच नाही तर चारही महर्षी का कुणास ठाऊक पण अपार हर्षाने एकमेकांचेच अभिनंदन करत होते. 

महर्षींनी विवाहासाठी येणाऱ्या तृतीयेचा मुहूर्त सांगितला. म्हणजे अजून वीस दिवस. एवढ्या दिवसात रामभद्रची बहीणही पूर्वेकडून येऊ शकणार होती. फक्त वीस दिवस, मात्र शर्वरीस ते वीस दिवस जणू वीस युगांसारखे भासू लागले. सगळ्या राजधानीत त्या क्षणापासूनच अत्यंत उत्साहात विवाह समारंभाची तयारी चालू झाली. मुहूर्त जाहीर केल्यावर चारही महर्षी शर्वरीच्या पित्याकडे आले आणि त्यांनी एका गुप्त दालनात जाऊन त्याचेशी काही मंथन करण्याचा प्रस्ताव त्यास सांगितला. त्यानुसार शर्वरीच्या पित्याने लगोलग बाकीची जबाबदारी प्रधानांकडे सोपवून गुप्त बैठकीची व्यवस्था केली. त्या गुप्त बैठकीत नेमके काय होणार आहे याची शर्वरीच्या पित्यास काहीही कल्पना नव्हती. मात्र त्याचा महर्षिंवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे जे काही होणार आहे ते आपल्या व आपल्या कन्येच्या भाग्याचेच असेल याची त्याला पूर्ण खात्री होती. गुप्त दालनात सर्व महर्षी आपली व्याघ्रजिने अंथरून त्यावर बसले. शेजारीच मोकळ्या जागेवर शर्वरीचा पिताही भूमीवरच मांड घालून बसला आणि मग चर्चेस सुरुवात झाली. 
महर्षी वसिष्ठ यांनी सर्वप्रथम बोलण्यास सुरुवात केली. ते शर्वरीच्या पित्यास म्हणाले की महाराज आम्ही काही संकल्प धरून इथे आलो आहोत. दक्षिणेकडे रावण नामक असुरकुलीन राजा अत्यंत बलशाली झाला असून त्याने आपल्या बळाच्या प्रयोगाने स्वर्गासहीत संपूर्ण पाताळावरही विजय मिळविला आहे. त्यास अनेक सिद्धी प्राप्त आहेत. तो स्वतः पराक्रमी असण्याबरोबरच अत्यंत बुद्धिमानही असल्यामुळे त्याने अनेक वैश्विक शक्तींवर वर्चस्व मिळविले आहे. आता त्यास संपूर्ण मानवविश्व जिंकायचे असून इथली संपूर्ण व्यवस्था, मानवी विश्वाच्या चलनासंबंधीचे सगळे नियम हे सारे बदलून आपल्या इच्छेप्रमाणे मानवजातीचे विश्वचलन करावयाचे आहे. त्यास आजचा विश्वप्रमुख जो ब्रह्मा त्याची जागा घ्यावयाची आहे. समस्त अधिकारप्राप्त देवपदे त्यांस निदेशित असलेल्या अधिकारांसह बदलून त्यास आपल्या आप्तांस द्यावयाची आहेत. सर्व महर्षींचा महर्षी दर्जा तर तो काढून घेणारच आहे, त्याउपर समस्त भारतवर्षीय राजवंश नष्ट करून प्रत्येक राज्यावर असुरकुलीन मनुष्यांस राज्याभिषेक करविण्याचा आणि त्यायोगे पूर्ण विश्वावर पिढ्यानपिढ्या आपल्याच वंशाचे राज्य चालावे अशी व्यवस्था निर्मिण्याचा त्याचा बेत आहे. देवलोक जिंकून स्वर्गाची सत्ता मिळविल्यावर त्याने आपल्या अधिकारात विश्वनियमांत असे बंधन घालून ठेवले आहे की त्यास देव अथवा असुर या सर्वात प्रबल मानवजातींपैकी कोणीही मारू शकणार नाही. त्यामुळे आता रावणास संपविण्याचा एकच उपाय राहतो तो म्हणजे हजारो मानव वंशांपैकी संख्येने आणि प्रभावाने सर्वात मोठे असलेल्या दक्षिणेतील वानर, मध्यभागातील नाग वा पूर्वेकडील सौरवंशीय अथवा उत्तर पश्चिमेकडील चांद्रवंशीय मानव समूहातील एखाद्या पुरुषाकडून त्याचा वध करविणे हा होय. त्यातही नागवंशीय मानव पूर्ववैमनस्यामुळे कधीही देवांच्या मदतीसाठी असुरवंशीय मानवांशी युद्ध करणार नाहीत आणि वानरवंशीय मानव युद्ध आणि तंत्र या बाबतीत अत्यंत मागास आहेत, तद्वत ते रावणापुढे मोठ्या युद्धात तग धरू शकणार नाहीत. तेव्हा आपल्याकडे केवळ पूर्व आणि उत्तरेतील मनुष्यवंश उरले आहेत. तेही रावणाहून अधिक बलशाली अथवा प्रगत नाहीत मात्र सगळे वैश्विक अधिकारी एकत्र आले तर त्यांतून एखाद्या वीरास रावणाशी मुकाबला करण्यासाठी तयार करू शकतात.
विश्वात सर्वाधिक अधिकार प्राप्त असलेल्या बहुव्यक्ती गटापैकी म्हणजे सप्तर्षींपैकी आम्ही चार म्हणजेच 'सप्तर्षी बहुमत' आज त्यासाठीच इथे आलो आहोत. आम्हाव्यतिरिक्त वैयक्तिक सर्वाधिक वैश्विक अधिकार प्राप्त असलेले ब्रह्म, शिव आणि विष्णू याही पदांवरील व्यक्तींकडून आम्ही या ठरावासाठीचे अंतिम निर्णयअधिकार प्राप्त केले आहेत. तेव्हा आज आम्ही इथे जे ठरवू ते संबंध विश्वात सर्वमान्य होईल.
....
मानवी विश्वाचे संचालन काही विशिष्ट नियमांनीच चालते. हे नियम ठरविण्याची तसेच बदलण्याची शक्ती अथवा प्राधिकार हे काही विशिष्ट व्यक्तींस दिलेले आहेत. बरेचसे देवकुलीन मनुष्य, सप्तर्षी,  दहा अश्वमेध यज्ञ करणारे राजे, अनेक विशिष्ट वातावरणीय एवं हवामान प्रभागांचे प्रमुख अशा काही व्यक्ती हे अधिकार धारण करतात हे शर्वरीच्या पित्यास माहीत होते. जरी ते स्वतः हे नियम बनविणारे असले तरी त्या सर्व प्राधिकारी व्यक्तींस स्वतः तर हे नियम पाळावे लागतातच पण कुणी अन्य बलशाली मनुष्यदेखील या व्यक्तींचा कितीही कट्टर विरोधक असला तरी त्यालाही ते वैश्विक नियम पाळावेच लागतात हेही त्याला ठाऊक होते. अगदी रावणासही ते पाळावे लागतात. मात्र जर कुणी या प्राधिकार प्राप्त लोकांस युद्ध करून व युद्धशास्त्राच्या नियमांचे पालन करून पराभूत अथवा ठार केले तर तो विजेता व्यक्ती आपसूक नवा प्राधिकारी बनून त्यास त्या युद्धात पराभूत अथवा मृत व्यक्तींचे तमाम अधिकार मिळतात व त्यायोगे तो हे नियम बदलू अथवा पूर्णतः बाद करून दुसरे नियम नव्याने बनवू शकतो हेही तो जाणत होता.
हे नियम अथवा प्राधिकार म्हणजे मुख्यत्वे कुणास वर अथवा शापरुपी करार करून देणे, आणि ते वर व शाप अगदी कटाक्षाने पूर्ण होतील याची सर्व व्यवस्था करणे. स्त्री-पुरुष संबंध आणि वैवाहिक पद्धतींचे नियमन करणे, एखाद्यास काही विशिष्ट प्रक्रियेने मृत्यू येणार नाही अशी हमी देणे, जशी हिरण्यकश्यपूस कुणाही मनुष्य अथवा श्वापदांकडून मृत्यू येणार नाही अशी हमी देण्यात आली होती. कुणास थेट मृत्यू देता येत नसला तरी त्याच्या मृत्यूचे कारण अथवा कारक योजून त्या उपायाने त्याचे जीवित संपविणे, म्हणजे जसे हिरण्यकश्यपूचेच जीवन त्यास दिलेल्या जीविताच्या सर्व हमींचे पालन तंतोतंत करूनही अन्य उपाय योजून संपविले होते, याव्यतिरिक्त राजकीय वारस ठरविणे, युद्धाचे नियम, धर्म, उपासना, यज्ञवैकल्ये यांचे नियम ठरवणे आणि त्याचे काटेकोर पालन झालेच पाहिजे याची खात्री करणे, अशा अनेक पद्धतींनी आणि नियमनांनी वैश्विक चलनाची प्रक्रिया नियंत्रित केली जात होती. यातील अनेक नियम अथवा सुविधा यांचा उपयोग करण्याचे अधिकार केवळ निर्दिष्टित प्राधिकारी व्यक्तींनाच होते तर काही सवलती व सुविधा कोणाही सामान्य मनुष्यास वापरता येत होत्या. सामान्यजनांत सर्वात सुलभ आणि लोकप्रिय हे उपासनेचे नियम होते कारण त्यायोगे कुणीही मनुष्य तप करून कुणाही देवपदाकडून काही वर मिळवू शकत होता. एखाद्या देवतेचे वा प्राधिकाऱ्याचे तप करणे याचा अर्थ त्याने विकसित केलेल्या व शोधलेल्या तमाम तंत्र आणि विद्यांचा अभ्यास करून त्यात पारंगत होणे असा होतो. तप पूर्ण झाल्यावर त्या अभ्यासक्रमाच्या अधिकारी देवतेकडून अध्यायीस काही इच्छित वर मिळत असे. किमान बारा वर्षे हा अभ्यास करावा लागत असे, काही देवांची तपे तर याहून अधिक काळ चालू शकत असत, मात्र वैश्विक नियमानुसार बारा वर्षे होईपर्यंत कोणत्याही विद्यार्जनास तप हा दर्जा देता येत नसे. अनेक असुर मानव या उपासनेच्या म्हणजेच तपाच्या तुलनेने शिथिल असलेल्या नियमांचा गैरफायदा घेऊन अनेक वर मिळवीत असत. अर्थात हे वर म्हणजे अगदी कोणतीही मागणी सर्रास पूर्ण करणारे करार अथवा वचने नसत. त्या बाबतीतही वर प्रदान करणाऱ्या देवपदास काही बंधने होती. तसेच वर मागणारासाठीही काही संहीता होती. त्याच संहितेस अनुसरून शिवाने तपश्चर्या पूर्ण करूनही रावणाच्या काही वरदानांच्या मागण्या नाकारल्या होत्या हे शर्वरीच्या पित्यास माहीत होते. ब्रह्म विष्णू आणि शिव यांच्यानंतर असे वैश्विक नियमनांचे अधिकार सर्वात जास्त होते ते सप्तर्षींना हेही शर्वरीच्या पित्यास ठाऊक होते, मात्र आज हे सप्तर्षी नेमके काय ठराव करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत हेच त्यास उमगेना, त्याने नुसतेच प्रश्नार्थक मुद्रेने सर्वांकडे पाहीले. 
मग अगस्त्य मुनी बोलू लागले. ते म्हणाले, रावणाने आपणास देव अथवा असुर यांजकडून मृत्यू येणार नाही असा वैश्विक नियम स्वअधिकारात ठरवून घेतला आहे हे तर तुम्हाला सांगितले आहेच. त्यामुळे आता तो एका अर्थाने अजेय आणि अमर झालाच आहे. आपल्याला त्याला रोखण्याची एकमेव संधी आहे ती म्हणजे त्यास कुणा सामान्य मानववंशातील व्यक्तीकडून मृत्यू देवविणे. मात्र कुणालाही असे सहजासहजी मारता येत नाही. यमधर्म हा मृत्यूचे वैश्विक नियम मोडून मारलेल्या व्यक्तीचे प्राण हरत नाही, किंबहुना हरू शकतच नाही. तद्वत कुणीही सामान्य मनुष्य वैश्विक नियमांतील बंधनामुळे रावणास असे सहज अथवा थेट मारू शकत नाही. त्यासाठी कुणातरी महान योग्यता असलेल्या पुरुषास काही विशेष शक्ती आणि साधने देऊन त्याचे हस्ते रावणास मारावे लागेल. मात्र कुणाही सामान्य मनुष्यास वैश्विक नियमानुसार युद्ध जिंकण्यासाठी अथवा इतर कोणत्याही कार्यासाठी देव अथवा कुणाही विश्व प्राधिकाऱ्याकडून थेट आणि विनासायास वा विनातपस्या काही सवलती अथवा साधने देता येऊ शकत नाहीत. अशा सवलती व साधने देण्यासाठी किमान ब्रह्म, शिव आणि विष्णू या तीनही देवतांची तपस्या पूर्ण केलेला पुरुष अथवा अवतारी पुरुषाच्या दर्जाची व्यक्ती हवी असते. केवळ अवतारी पुरुषासच काही विशेष शक्ती व क्षमता थेट म्हणजे विनातपस्या प्रदान करता येऊ शकतात. रावणास मारण्यासाठी कुणातरी महान योग्यता असलेल्या पुरुषास अवतारी पुरुषाचा दर्जा देऊन त्यास अशा शक्ती प्रदान करून मग त्याचे हस्ते रावणास मारावे लागेल. मात्र कुणीही व्यक्ती अवतारी पुरुष बनू शकत नाही. अवतारी पुरुष हा प्रचंड योग्यतेचा, बलशाली, युद्धनिपुण आणि बुद्धिमान असाच पुरुष निवडावा लागतो. आजच्या घडीला संपूर्ण भारतवर्षात असा एकमेव पुरुष आम्हाला दिसतो आहे तो म्हणजे आपला होणारा जमातृ रामभद्र हा होय. ती परीक्षा जी आम्ही घेतली ती खरेतर शर्वरीच्या स्वयंवरासाठी नव्हे तर रामभद्रास अवतारी पुरुष हा दर्जा देण्यासाठी होती. सात वृक्ष एकाच बाणाने भेदणारा रामभद्र हा त्यायोगे नक्कीच अवतारी पुरुषाचा दर्जा मिळण्यासाठी योग्य सिद्ध झाला आहे. तेव्हा शर्वरीशी विवाहापश्चात आपण त्यास अधिकृतरीत्या तसा दर्जा देऊ. मात्र त्यासाठी आपण त्यास रावणाविरुद्ध लढण्यासाठी राजी करायला हवे. एकदा तो अवतारी पुरुष म्हणून घोषित झाला की त्यास हव्या त्या आणि वैश्विक नियमांनुसार शक्य त्या सर्व शक्ती, क्षमता आणि तंत्रे देवलोकांकडून देण्यात येतील, ज्यायोगे तो रावणाचा वध करू शकेल. बोला आपणांस हे मान्य आहे का? मात्र एक लक्षात ठेवा, हे जेवढे महान भाग्याचे कार्य आहे तेवढीच यात प्रचंड जोखीम सुद्धा आहे, थेट आपल्या कन्येचे सौभाग्यच या कामी पणास लागू शकते, कारण रावणाने स्वर्गलोक जिंकून तो एक असीम पराक्रमी वीर आहे हे सिद्ध केलेच आहे. त्यामुळे आपण संमती देण्यापूर्वी पूर्ण विचारांती निर्णय घ्या. या कामी स्वतः रामभद्रास त्याची अनुमती विचारता येऊ शकत नाही कारण अवतारी पुरुष हा निवडायचा असतो, रामभद्रास अशा परवानगीसाठी विचारले तर ते संमतीने मंजूर केल्यासारखे होईल, अवतारी पुरुषास त्याचे स्वतःचे संमतीने निवडता येत नाही. धर्मशास्त्रानुसार आपली कन्या आपण त्यास देणार असल्याने रामभद्रच्या राज्यातील स्त्रीसत्ताक पद्धतीनुसार विवाहानंतर रामभद्रच्या पित्यापेक्षा आपला अधिकार त्याचेवर अधिक असेल, म्हणून आम्ही त्याच्या पित्यास न विचारता आपणास विचारत आहोत. आपण यासाठी संमत आहात की नाही ते कृपया विचार करून सांगावे.
हे ऐकून शर्वरीचा पिता काही क्षण शांत होऊन विचारात गढून गेला. अवतारी पुरुष म्हणजे विष्णूने ठरवून एखाद्या मानवी वंशात जन्म घेणे असेच तो आजपर्यंत मानत आला होता, मात्र अवतारी पुरुष अशा प्रकारे निवडला जातो हे पाहून तो एका प्रकारे आनंदमिश्रित आश्चर्याने भांबावून गेला होता. परंतु जास्त वेळ संभ्रमात न राहता पुढच्याच क्षणी तो म्हणाला की प्रत्यक्ष नृसिंह, वामन आणि परशुराम यांच्या पंक्तीत बसण्याचे भाग्य माझ्या भावी जमातृस मिळत असेल तर ही माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या कन्येसाठी आणि आमच्या संपूर्ण कुलासाठीही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, तेव्हा मी आपल्या निर्णयास याच क्षणी पूर्ण संमती देत आहे.
शर्वरीच्या पित्याकडून अशी संमती मिळाल्यावर मग विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे तर. आम्हास तीनही मुख्य वैयक्तिक प्राधिकारी म्हणजे ब्रह्म, शिव आणि विष्णू यांनी रामभद्रास अवतारी पुरुष दर्जा द्यावा की नाही हे ठरविण्याचे पूर्णअधिकार दिले आहेत, सप्तर्षींपैकी 'सप्तर्षी बहुमत' म्हणजे आम्ही चौघेही या निर्णयात सामील आहोतच, तेव्हा मी रामभद्र याची पुढील अवतारी पुरुष म्हणून निवड करण्यात आली आहे हा ठराव मंजूर करतो, आणि रामभद्राच्या अवतारी दर्जाची अधिकृत घोषणा ही रामभद्र आणि शर्वरी यांचे विवाहानंतर करण्यात येईल अशी आपणांस खात्री देऊन आपल्याकडून प्रस्थानासाठी परवानगी घेतो.
......
शर्वरीच्या पित्याच्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता. शेकडो वर्षांनंतर पृथ्वीवर एक अवतारी पुरुष जन्माला येतो. हा सन्मान आपल्या हयातीत आणि तोही आपल्याच होणाऱ्या जमातृस मिळतो आहे या जाणिवेनेच तो अत्यंत आनंदी होत होता. आपली लाडकी कन्या किती भाग्यशाली आहे आणि आपण तिजसाठी निवडलेला वर किती महान कार्यासाठी निवडला गेला आहे हे तिस सांगावे अशी त्याला तीव्र इच्छा होत होती. महर्षींनी ही बातमी गुप्त ठेवण्याविषयी काही सांगितले नव्हतेच. तसेही वीस दिवसांनी जे जगजाहीर होणार आहे ते आताच आपल्या कन्येस सांगून तिचा आनंद सहस्त्रगुणीत केला तर काय वाईट असा विचार करून त्याने शर्वरीस सांगितले की तिचा होणारा पति रामभद्र हा कुणी साधा मनुष्य नसून तो साक्षात विष्णूचा नवा अवतार आहे. मात्र उगीचच अधिक विभ्रांति आणि प्रश्नांची सरबराई टाळण्यासाठी त्याने शर्वरीस अवतारी पुरुष निवडीची पद्धत मात्र सांगितली नाही. रामभद्र कुणी साधारण युवक नसून साक्षात अवतारी पुरुष आहे हे ऐकून तर शर्वरीच्या आनंदास पारावारच राहीला नाही. आपला उपयोजित पति हा साक्षात मानवरूपात जन्म घेतलेला विष्णू आहे ही तिच्यासाठी अत्यंत सौभाग्याची वार्ता होती. तिनेही मग तशाच आनंदाच्या भरात आपल्या सखीस ही वार्ता दिली. तिनेही अन्य कुणा तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीस हे सांगितले आणि अशा प्रकारे नेमके ज्याला ज्याला ही बातमी कळाली ते सर्वजण अतिशय आनंदाने आणि जोमाने विवाहाच्या तयारीस लागले.
.....

शेवटी विवाहाचा दिवस आला. देशोदेशीचे राजे, मोठमोठे रथी, महारथी वीर, सप्तर्षी, इतकेच काय तर हिमालयाकडील आणि पश्चिमेच्या सागरातटावरील अनेक देवलोकही शर्वरी रामभद्राच्या विवाहसमारंभासाठी आले होते. सगळे नगर विस्मयकारी कलाकुसरीने सुशोभित करण्यात आले होते. शंभरेक वेगवेगळ्या प्रदेशांतून सर्वोत्तम बल्लव स्वयंपाकासाठी बोलविण्यात आले होते. बाहेरून आलेल्या अतिथींसाठी आलिशान दालने उभी करण्यात आली होती. लग्नमंडपाची शोभा तर अवर्णनीयच होती. सुगंधी आणि रंगीत द्रव्यांचे कृत्रिम झरे विवाह दालनात तयार करण्यात आले होते. पुष्पांची विविध रोपे कल्पकतेने मांडून त्यांचे विविध आकार बनविण्यात आले होते. मयूर, मृग, राजहंस आदी सौंदर्यशाली जीव उद्यानांत सोडण्यात आले होते, सर्वाना बसण्यासाठी मऊशार रेशमी आसने निर्मिली गेली होती. मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या कलात्मकतेने वाकवून व छाटून सावली आणि कमानी तयार करण्यात आल्या होत्या. न भूतो न भविष्यति असा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य विवाहसोहळा पाहण्यासाठी, त्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता.
मुहूर्ताचा क्षण जवळ येऊ लागला तशी लगबग वाढू लागली. होमात आहुत्या पडून त्यातून धूर आणि ज्वाला उठू लागल्या. ढोल, वाद्यांच्या गजरांनी सारे विवाहदालन निनादून गेले. शर्वरी आपल्या वधूदालनात संपूर्ण साजशृंगारात नटून तयार होऊन बसली होती. शर्वरीचा भाऊ सर्वात आधी मंडपात हजार झाला आणि लगेचच रामभद्रही येऊन त्याचे शेजारील नियोजित जागी उभा राहिला. मंत्रोच्चारांना सुरुवात झाली. इकडे वधुदालनात जशी जशी घटिकापात्रातली वालुका कमी होत होती तसे तसे शर्वरीच्या हृदयाचे ठोके अत्यानंदाने जोरजोरात वाढू लागले होते. कोणत्याही क्षणी आता तिचा पिता तिस लग्नवेदीवर घेऊन जाण्यासाठी येणार होता. ती डोळ्यात प्राण आणून त्या क्षणाची वाट पाहत होती. घटिकापात्र आता जवळ जवळ रिते झालेच होते. तेवढ्यात शर्वरीच्या दालनाबाहेर काही लगबग झाली. आपला पिता आपणास नेण्यासाठी आला हे शर्वरीस कळले. ती तात्काळ उठली आणि दालनाच्या द्वाराच्या दिशेने आपल्या पित्याच्या येण्याकडे नजर लावून उभी राहीली.  पुढच्याच क्षणी द्वाराचा पडदा बाजूस सरकला आणि तिला घेऊन जाण्यासाठी आलेल्या तिच्या पित्याचा चेहरा शर्वरीस दिसला. आता रामभद्रशी आपल्या विवाहाचा तो असीम भाग्याचा क्षण आला या जाणीवेच्या अपार आनंदाने तिने स्वतःहुन पुढे पाऊल टाकले आणि बघते तर काय, तिचा पिता रक्ताच्या धारांत न्हाऊन निघत होता. द्वाराशी पोचताच तो कोलमडून खाली पडला. पडता पडता शर्वरीस एखाद्या सुरक्षित ठिकाणी त्वरित जाऊन लपून बस असे त्याने सांगितले आणि तत्क्षणी प्राण सोडला. काय होते आहे हे कळायच्या आत बाहेरून प्रचंड किंकाळ्यांचे आणि अस्त्रशस्त्रे चालविण्याचे आवाज येऊ लागले. शर्वरीला काय घडते आहे ते काहीच उमजेना, तिला प्रचंड धक्का बसला होता तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असा अनपेक्षितपणे भंगून सर्वाधिक दु:खद क्षणात बदलून गेला होता. तिला हे सारे सहन न होऊन ती क्षणार्धात तिथेच मूर्च्छित होऊन पडली. सखीनेच मग प्रसंगावधान राखत तिच्या पित्याच्या अंतिम सूचनेप्रमाणे कसेबसे तीस उचलून क्षणार्धात तिथून दूर गुप्त सुरक्षित ठिकाणी नेले.
.....
सप्तर्षींनी रामभद्र नावाच्या एका व्यक्तीस अवतारी पुरुष घोषित करून रावणाचा वध करण्याची योजना बनवली आहे ही वार्ता कशी कुणास ठाऊक पण थेट लंकेपर्यंत पोचली होती. आपल्याला ठार करण्यासाठी अशी काही योजना बनविली जात असल्याचे कळून रावणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्याशी प्रत्यक्ष लढण्याची हिम्मत नसलेले देव अशा गुप्तमार्गाने षडयंत्र रचत आहेत हे पाहून त्यानेही उलटपक्षी आपणच देवांची योजना विफल करण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्याने स्वतः एक अग्रीम योजना बनवली. रामभद्रास अवतारी पुरुष घोषित करण्यापूर्वीच ठार करायचे आणि त्याचेनंतर भविष्यात कुणीही मनुष्य अशा साहसास करू धजणार नाही असे रणक्रंदन माजविण्याचे रावणाने ठरविले. रामभद्र हा एक वीर आणि युद्धनिपुण पुरुष आहे ही वार्ता त्याच्यापर्यंत आली होतीच. त्यामुळे रामभद्र सर्वाधिक बेसावध आणि विनातयारी असताना अकस्मात त्याचेवर हल्ला करण्याचे रावणाने ठरविले. रामभद्र अशाप्रकारे विनातयारी आणि पूर्णतः बेसावध सापडण्याची एकमेव संधी होती ती म्हणजे त्याच्या विवाहप्रसंगी.! मुत्सद्दी रावणाने मग एक अत्यंत गुप्त योजना बनवून ऐन विवाहाच्या प्रसंगी सर्वशक्तीनिशी हल्ला करून रामभद्रसह, देव, ऋषीगण आणि उपस्थित सर्वांचे शिरकाण करून आपल्या मृत्यूची योजना बनविण्याचा पुरेपूर सूड घ्यायचा असे ठरविले. गुप्तपणे शर्वरीच्या नगराबाहेरील वनात रावणाचे संपूर्ण सैन्य कधी येऊन दाखल झाले याची विवाहाच्या धामधुमीत असलेल्या शर्वरीच्या पित्यास पुसटशीही वार्ता लागली नाही. रामभद्रनेही विवाह निश्चित झाल्यावर आपल्या बहिणीस आणण्यासाठी जे दल पाठविले होते त्याचेबरोबर आपले बहुतांश सैन्यदेखील गरज नाही म्हणून परत स्वदेशी पाठवून दिले होते. त्याचे मागे उरलेले अल्प सैन्यही विवाहदालनापासून दूर नगराच्या बाहेर ठेवलेले होते. रावणाने अत्यंत सटीक योजना बनवून नेमका डाव साधला होता.
सर्वात आधी रावणाने शर्वरीचा पिता, बंधू आणि रामभद्र यांस पकडून घेतले आणि मगच इतरांस मारण्यास सुरुवात केली. इंद्रजिताने शर्वरीच्या पित्यावर प्रथमतः वार केला मात्र तो कसाबसा तिथून सुटून शर्वरीच्या दालनापर्यंत जखमी अवस्थेत पोचला. रावणाने मग स्वहस्ते सैनिकांनी पकडून ठेवलेल्या शर्वरीच्या भावाचा व रामभद्रचा सर्वांसमक्ष शिरच्छेद केला. रामभद्रचे तुटलेले शीर घेऊन त्याने हाच का देवतांचा मला मारणारा अवतारी पुरुष? अशी विकट गर्जना केली आणि आपल्या सैन्यास उपस्थित उर्वरित सर्व पुरुषांस ठार करण्याची व स्त्रियांस बंदी बनवून सोबत घेण्याची आज्ञा दिली. स्वतः त्याने रामभद्राच्या बहिणीस पकडून घेतले व शर्वरीसही शोधून आणा असा आदेश दिला. त्यानंतर रावणाच्या सैन्याने जे शिरकाण सुरु केले त्याने संपूर्ण नगरच अक्षरश: रक्ताने भरून गेले. हजारो नगरवासी, अतिथी राजे, देवलोक, ऋषी, पंडित या सर्वांस गाठून ठार मारण्यात आले. स्त्रियांस बंदी बनविण्यात आले आणि मग अशा प्रकारे संपूर्ण विध्वंस करून झाल्यावर रावण रामभद्राच्या बहिणीसह अनेको स्त्रियांचे अपहरण करून तिथून निघून गेला. सखीने अत्यंत चपळाईने शर्वरीस गुप्त ठिकाणी नेल्याने ती रावणाच्या हाती लागली नाही. 
.......
तब्बल दहा प्रहरांनी शर्वरी शुद्धीवर आली. नगरात काही लहान मुले, काही वृद्ध स्त्रीपुरुष, वृषभ व महिषवर्गीय जनावरे आणि प्रेतांचा खच याशिवाय काही उरलेले नव्हते. शर्वरी शुद्धीत आल्यावर तिस काही खावयास देऊन सखीने सर्व वृत्तांत सांगितला. शर्वरी ते थिजलेल्या भावनांनी ऐकत होती आणि यांत्रिकपणे एकेक घास चावून गिळत होती. अचानक एका क्षणी ती उठली. आपल्या अंगावरची वस्त्रे व दागिने तिने ओरबाडून फेकून दिले आणि भ्रमित झाल्यासारखी उठून चालू लागली. सखीने तिचा हात धरून तिला बसवण्याचा प्रयत्न केला पण तिने अत्यंत क्रोधाने मला रोखू नकोस असा तिस डोळ्यानेच इशारा केला आणि संथपणे चालत विवाहवेदीच्या ठिकाणी आली. जिकडेतिकडे रक्त आणि मृतदेह पडलेले होते. विवाहवेदीवर शिरच्छेद करण्यात आलेली दोन धडे पडलेली होती. शर्वरी त्यातील रामभद्राच्या देहाजवळ गेली. त्याच्या मानेतून निघालेले आणि आता काळे पडून गेलेले रक्त तिने आपल्या माथ्यावर लावले, आणि एक मोठा हंबरडा फोडून त्याच्या चरणांस स्पर्श करून स्वामी अशी आर्त किंकाळी मारत प्रचंड विलाप करीत तिथून निघाली. मनाने वरलेल्या, स्वतःहुन अधिक प्रेम केलेल्या, ज्याच्याशी सुखी वैवाहिक जीवन आणि शृंगाराची असंख्य स्वप्ने पाहिली होती त्या रामभद्रच्या निष्प्राण देहाकडे नव्हे तर आपल्या अपार दुर्दैवाकडे केवीलवाणेपणाने पाहत ती तिथून निघून गेली. सखी तिच्या पाठोपाठ येऊ लागली पण शर्वरीने तिस आदेश देऊन माघारी परतण्यास सांगितले आणि ती एकटीच चालत नगराबाहेर निघून गेली. 
 .........
लोक म्हणत शर्वरी वेडी झाली. शर्वरी नव्हे कारण ते संस्कृत नाव कुणास उच्चारता येतच नसे. सगळे म्हणत की शबरी आता भूत पिशाच्चांसारखी रानोमाळ भटकते, झाडांची पाने, मुळे, गवत असे काहीही खाते, तिस वस्त्रांचे भान राहत नाही. कुठेही निजते, वनात कुठेही फिरते अशी शबरीबद्दलची ऐकीव माहीती लोक एकमेकांत चर्चित असत. अशीच विपन्न जीवन जगत असताना एके दिवशी शबरी तिच्या शोधात असलेल्या तिच्या मावसभावास म्हणजे जटायूस वनात एका झाडाखाली झोपलेली सापडली. शर्वरीविवाहाच्या वेळी जटायू नगरात नव्हता त्यामुळे तिच्या स्वकीयांतील तो एकमेव पुरुष जिवंत राहिलेला होता. त्याने शबरीस आपल्यासोबत घेतले. शबरीचे नगर आणि राज्य आता पूर्णतः उध्वस्त झाले होते त्यामुळे जटायू स्वतःदेखील भणंग अवस्थेत आयुष्य कंठीत होता. मात्र राजकन्या असलेल्या आपली भगिनी शबरीचे तरी असे हाल होऊ नयेत म्हणून त्याने तिस त्याच वनात असलेल्या मातंग ऋषींच्या आश्रमात ठेवायचे ठरविले. जटायूने शबरीस सांगितले की त्या दुर्दैवी दिवसानंतर आता रावणाने त्यांच्या राज्यासह संपूर्ण दंडकारण्य आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले असून दंडकारण्याच्या विविध भागांच्या कारभारासाठी आपले असुर प्रतिनिधी नेमलेले आहेत. कधी ना कधी रावण आपल्या साम्राज्यात समाविष्ट केलेल्या या प्रदेशाच्या कारभाराची व्यवस्था तपासण्यासाठी येईलच. तेव्हा मी त्याचेशी द्वंद्व करून त्यास ठार मारीन व आपल्या प्रियजनांच्या हत्यांचा बदला घेईन. तोपर्यंत मी असाच संपूर्ण दंडकारण्यात संचार करून रावणाशी लढण्याची तयारी करत राहील. रावण अगदी अप्ल्पकाळासाठी जरी इथे आला तरीही माझ्याशी द्वंद्व केल्याशिवाय तो जाऊ शकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. जटायू कितीही आवेशात बोलत असला तरी शबरी आता सूड अथवा प्रतिशोधादि भावनांपलीकडे जाऊन दु:खाच्या खोल असीमित गर्तेत हरवून गेली होती. जटायूच्या या वाङनिश्चयाचे ना तिला कौतुक वाटले ना वैषम्य.   
मातंग ऋषींस शबरीबद्दल माहिती होती. त्यांचे शबरीच्या पित्याशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांचा आश्रम स्वतः शबरीच्या पित्यानेच उभारून दिला होता. तिच्यावर गुदरलेल्या दुर्भागी प्रसंगामुळे ती अशी सैरभैर होऊन विपन्नावस्थेस पोचली आहे हे पाहून ते खूप हळहळले. त्यांचेसाठी ती कन्येसारखीच होती त्यामुळे त्यांनी तिचा सांभाळ करण्याचे त्वरित मान्य केले. मग जटायू तिला आश्रमात सोडून निघून गेला. शबरी या दुःखावेगी अवस्थेत काहीशी वेड लागल्यासारखे वागत असली तरी मातंग ऋषींनी तिस प्रयत्नाने अनेक गोष्टींचे वळण लावले. हळूहळू ती थोडी सावरू लागली. बरीचशी कामे व्यवस्थितपणे करू लागली. यज्ञ, हवनाची तयारी, सायंपूजा, प्रभातकालीन प्रार्थना, अन्न शिजवणे, वनातून जाऊन फळे कंदमुळे गोळा करून आणणे हे सगळे ती करू लागली. जवळ जवळ सामान्यत्वाला आली. इतकेच नाही तर पाठांतर, वाचन इत्यादींतही तिने उत्तम प्रगती केली, मात्र ती कधीही इवलीशीही हसत नसे. सगळी कामे करी पण अतिशय यांत्रिकपणे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक उदासभाव दाटून राहत असे, ती केवळ विचारलेल्या प्रश्नास प्रत्युत्तर देणे याव्यतिरिक्त कुणाशी काही बोलतही नसे, कुणाच्याही नजरेस नजर भिडवत नसे. मातंग ऋषी तिचे खूप सांत्वन करत. मात्र आश्रमातील तिच्या जवळजवळ चाळीस वर्षांच्या वास्तव्यात ते स्वतःही अगदी एके समयीदेखील शबरीच्या चेहऱ्यावर काही केल्या आनंदाचे भाव आणू शकले नाहीत. त्यांचे वयही आता खूप झाले होते. आपल्या पश्चात आपल्या या मानसकन्येचे काय होईल याची त्यांस चिंता लागून राहिली होती. आपल्या अंत्यसमयी आजारपणाने शय्येस खिळलेले असताना त्यांनी आपणानंतर शबरी हीच आश्रमाची प्रमुख बनेल असे जाहीर केले आणि मग काही दिवसांनी आपले प्राणोत्क्रमण केले.
मातंग ऋषींच्या निधनानंतर शबरी जरी आश्रमप्रमुख बनली असली तरी तिच्या वर्तणुकीत काहीही फरक पडला नाही. त्यामुळे इतर ऋषिकुमारांपैकी सर्वात मोठा जो रवनिश तोच आश्रमाची सगळी जबाबदारी पार पाडत असे. मातंग ऋषींच्या दशमवर्ष स्मृतीदिनी जेव्हा मृत्योपरांत त्यांचे शेवटचे विधी पार पाडण्याची तो तयारी करत होता तेव्हाच आश्रमात सातही सप्तर्षींचे आगमन झाले.
सप्तर्षींनी येताच रवनिश यास शबरी कुठे आहे ते विचारले आणि मग ते सातही जण थेट तिच्या कुटीकडे गेले. शबरी आपल्या कुटीतच होती, त्या सर्वांनी तिस अभिवादन करून आपापला परिचय दिला. शबरीनेही त्यांस अभिवादन करून येण्याचे प्रयोजन विचारले.
सप्तर्षींपैकी गौतम उत्तरले, देवी आमच्या मागील पिढीतील सप्तर्षींनी अशा एके दिवशी आम्ही आपणांस भेटण्यास यावे असे सांगून ठेवले होते. मागच्या पिढीतील सप्तर्षींच्या कार्यकाळात आणि त्यांचे उपस्थितीत आपणांवर हे दुर्दैव ओढवले याची आम्हाला जाणीव आणि अपार खेद आहे. समस्त सप्तर्षी संघ त्यासमयी आपल्या स्वामींस वाचवू न शकल्याबद्दल आपला क्षमायाचक आहे. आपण अत्यंत दु;खात इतके दिवस आपले जीवन व्यतीत केले आहे याची आम्हास जाणीव आहे मात्र आम्ही आज आपल्यासाठी एक आनंददायी बातमी घेऊन आलो आहोत.
आपल्या प्रिय रामभद्रच्या मृत्यूनंतर जगात कोणतीही बातमी आपल्यासाठी आशादायी वा आनंददायी असूच शकत नाही याची या सप्तर्षींस काय कल्पना येणार अशी भावना मनात येऊनही शबरीने अत्यंत विनम्रतेने ती वार्ता कथन करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी सांगितले की हे देवी आपले उपयोजित मृत स्वामी हे नवा जन्म घेऊन परत आले आहेत. कालच इथून जवळच असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर त्या युवकाने एकाच बाणाच्या संधानाने ओळीत असलेल्या सात वृक्षांचा वेध घेतला. मागच्या जन्मी जरी रावणाच्या कपटामुळे त्यांस वीरगती लाभली असली तरी या जन्मी मात्र ते रावणास ठार करून आपल्या दु:खाचा पूर्णपणे बदला घेतील याची आम्हास शाश्वती आहे. त्यांचे नाव या जन्मातही राम हेच आहे. रामचंद्र.!! आम्ही मागील पिढीतील सप्तर्षींच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र यांस त्यांच्या पूर्वजन्मीची ओळख देऊन आपला परीचय करविला आहे. तद्वत त्यांनीही आपणांस भेटण्याची कामना केली आहे. त्याप्रमाणे आपली अनुज्ञा असेल तर उद्या स्वयं रामचंद्र आपल्या भेटीस इथे आश्रमात येणार आहेत. आपणांस हीच अग्रीम वार्ता देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कृपया आपली अनुज्ञा द्यावी.
.... 
आपल्या मागच्या पिढीतील सप्तर्षींनी अनावधानाने का होईना रामभद्रास अवतारी पुरुष घोषित करण्यास विलंब केला होता, त्यामुळे ऐन रावणाच्या हल्ल्याच्या वेळी रामभद्रास तिथून तंत्र आणि मोहविद्येने वाचविता येण्याची शक्यता असूनही केवळ त्यास तोपावेतो अवतारी पुरुषाचा दर्जा मिळाला नसल्याने देवांस सदर कृती करता आली नाही. रामभद्र हा तोपर्यंत एक सामान्य पुरुष होता व सामान्यजनांस कोणत्याही विश्व प्राधिकाऱ्याकडून थेट आणि विनासायास वा विनातपस्या काही सवलती अथवा साधने देता येऊ शकत नाहीत, म्हणून देव ऐनसमयी त्यास अशा काही शक्ती अथवा सवलती देऊन वाचवू शकले नाहीत. परंतु असे अधिकारप्राप्त असलेल्या सर्व सप्तर्षींना मात्र त्यावेळी विवाहादालनातून देवांनी मोहविद्येने बाहेर काढून शिताफीने वाचविले होते. रामभद्राच्या मृत्यूनंतर शबरीची झालेली दुरावस्था सप्तर्षींस ज्ञात झाली होती, म्हणून एका संधानात सात वृक्ष भेदणारा आणि योग्यतेचे इतरही सर्व निकष पूर्ण करणारा नवा पुरुष रामचंद्र यास शोधल्यावर त्यांनी सर्वप्रथम त्यास अवतारी पुरुषाचा दर्जा देऊन, तेव्हाच्या सप्तर्षींच्या चुकीचे क्षालन म्हणून किमान वृद्ध शर्वरीच्या उत्तरआयुष्यात तरी एक आनंदाचा क्षण देता यावा म्हणून त्याने तिस भेटावे अशी त्यास विनंती केली होती व रामानेही ती मान्य केली होती. 
....
जवळ जवळ चार तपांइतक्या काळानंतर शबरीच्या मनात पहील्यांदा आनंदाच्या भावनेचा अंकुर फुटला होता. इतक्या वर्षात शबरीचा चेहरा पहिल्यांदा आनंदाने उजळला होता, ती अर्धशतकानंतर पहिल्यांदा हसली होती, आणि का हसू नये तिने? आज अशक्य ते शक्य झाले होते, शबरीच्या मनावर, आयुष्यावर ज्याने पूर्णतः मोहिनी घातली होती, शबरीने ज्याच्या चरणांशी स्वतःस केव्हाच अर्पण केले होते, तो तिचा उपयोजित स्वामी, तिचा सखा, प्रियकर रामभद्र साक्षात मृत्यूलाही मात देऊन पुन्हा तिस भेटायला आला होता. तिच्या प्रेमाच्या तपस्येने, तिच्या पवित्र प्रितीने आज अक्षरश: प्राक्तनालाही मात दिली होती.

रामचंद्राच्या आगमनाचा दिवस उगवला आणि शबरीची उष:कालापासूनच मोठी लगबग सुरु झाली. माझ्या प्रभूसाठी मी काय करू आणि काय नको असे तिस झाले होते. तिला आपल्या विवाहाच्या दिवसाची रामभद्रच्या स्वागतासाठी तिच्या पित्याने केलेली अलौकिक तयारी आठवली. आजही आपल्या प्रभूच्या स्वागतासाठी तिला पुन्हा तसेच काहीसे योजित करायचे होते, मात्र ती काही आता राज्याधिकारी नव्हती. मग ती सगळ्या सृष्टीसच प्रभूच्या स्वागतासाठी सहकार्य करण्याची विनंती करू लागली. हे पाखरांनो आपल्या गळ्यांतून सुंदर स्वर आळवा, फुलांनो आपल्या कोमल देहाच्या पखरणी पसरा. महातरुंनो जरा झुकून माझ्या भगवंताच्या शिरी छायादार कमानी धरा. कस्तुरी मृगांनो येथून कस्तुरी उधळीत जा, निर्झरांनो माझ्या प्रभूचे चरणकमल धुवा. हे वायुतत्वा आपल्याबरोबर तू सुखद शीतल सुगंध वाहून आण, मयूरांनो आपले मधुर नर्तन माझ्या प्रभूस दाखवा, जे जे उद्दात्त, सुंदर आहे ते सर्व माझ्या प्रभूस दिसू द्या. माझ्या प्रभूसाठी जे जे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम तेच मज हवे आहे.
प्रभूस बसण्यासाठी शबरीने सर्वात सुंदर रंगसंगतीची आणि मऊशार स्पर्शाची फुले आणून ती आसनावर मांडून ठेवली. प्रभुंवर वारा चालण्यासाठी मयूरपंखांचा पंखा बनवून ठेवला. प्रभूंस प्राशनासाठी सर्वोत्तम जल हवे म्हणून तिने थेट पंपा सरोवरात जाऊन स्वहस्ते जल आणले, तिच्या मनात आले की रामप्रभूस स्वागतार्थ देण्यासाठी सर्वात सुमधुर फळे हवीत... पण हा ऋतू कुठे मधुर फळांचा आहे? या ऋतूत तर केवळ बदरीफळे मिळतात वनात. तीही असतात काही खट्ट तर काही मधुर. माझ्या प्रभूंस खट्ट फळे कशी द्यावीत? त्यांस तर केवळ मधुर फळे मिळावयास हवी, मात्र बदरीफळांहून अन्य फळ समस्त वनात उपलब्धही नाही, मग हे पवित्र वृक्षांनो तुम्हीच सांगा, माझ्या प्रभूंस मी केवळ मधुर बदरीफळे कशी निवडून देऊ?

मध्यान्हीनंतर तिसऱ्या प्रहरी रामाचे आश्रमात आगमन झाले. शबरीस तर स्वर्ग केवळ दोन अंगुळे थिटा उरला होता. तिने अत्यंत उत्साहाने रामाचे स्वागत केले, पुष्पाच्छादित आसनावर त्यास बसविले, पवित्र पम्पा सरोवराचे जल प्यावयास दिले, आणि मग खाण्यासाठी बदरीफळांनी भरलेली एक टोपली पुढे केली...  

1 टिप्पणी: