संयमाची फुले वाहीली, उतावळ्या निखाऱ्यांत तुला जाळले नाही
चंदनाचे अंग असेच झिजविले, सहाणेवर त्यास उगाळले नाही
तू उगवत राहिलीस पुन्हा पुन्हा मनाच्या देठावर फुल होऊन
मीच करंटा जे तुला मी माझ्या नशीबाच्या हारात माळले नाही
तू विजेसारखी अनपेक्षितपणे समोर क्षणभर आलीस तेव्हा
निस्तब्ध होतो झालो जरासा, नाही मी तुला टाळले नाही
हो सुखाचे आव आणतो खूप मी या सोशियल मीडियावर
उगा जाहीरपणे कधी माझे अश्रु कुणापुढे मी ढाळले नाही
मला नाही होता येत कधीच, व्यक्त मनाजोगते तुझ्यापुढे
पण असा एकही क्षण नाही की मनात तुला सांभाळले नाही
तू असतेच बागडत सदैव एकरूप, अंतर्बाह्य माझ्यात
मी एक क्षणही माझ्या डोळ्यांतून रूप तुझे गाळले नाही
तू कुणा अनोळखी गाभाऱ्यात सुगंध होऊन दरवळतेस
माझे आसक्त श्वास तुझ्या रेशमी धुपाने कधी गंधाळले नाही
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा