हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

धनगरांची अनुसूचित जमातींत समाविष्ट होण्याची मागणी कशी पूर्णतः अयोग्य आहे

 

धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.

पहिला मुद्दा: ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग (Dhangad) असे झाले आहे.

प्रतिवाद: धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D) असे लिहिले जाते. हा एक मोठाच जावईशोध म्हणावा लागेल. हे खरे आहे की इंग्रजीत 'र' आणि 'ड' यांचा बदल होतो, परंतु हा बदल नेहमी 'ड' चा 'र' असा होतो तो कधीही 'र' चा 'ड' होत नाही. (उदाहरणार्थ 'साडी' हा शब्द 'सारी' (Sari) असा होतो, 'अनाडी' हा शब्द 'अनारी' (Anari) असा होतो, परंतु नारी हा शब्द कधीही नाडी असा होत नाही, वारी हा शब्द कधीही वाडी असा होत नाही. धारवाड हे Dharwar लिहिता येऊ शकते मात्र कारवार हे कधीही Karwad (कारवाड) असे लिहिले जाऊ शकत नाही. अशी अनेको उदाहरणे देता येतील) मग जर इंग्रजीचे स्पेलिंग चुकले असेलच तर धनगड (Dhangad) चे धनगर (Dhangar) होऊ शकते मात्र कधीही धनगर (Dhangar) चे धनगड/ धांगड (Dhangad) असे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धनगर बांधवांचा दावा की 'धनगर'चे स्पेलिंग Dhangad असे लिहिले गेले आहे हा तांत्रिकदृष्ट्या देखील सपशेल फोल ठरतो. आणि म्हणूनच आपल्या धनगर बांधवांचे असे "र-ड-णे" हे हास्यास्पदच ठरते.

'र' च्या उच्चारणात येणाऱ्या दुर्बलतेला 'रॉटासिजम' असे म्हणतात. हा अनेक भाषांत आहे. आयरिश आणि स्कॉटिश भाषेत 'र' आणि 'न' यांचा बदल होतो. स्पॅनिश भाषेत 'र' चा उच्चार 'ट' असा होतो. म्हणजे इंग्रजांऐवजी स्पेनने भारतावर राज्य केले असते तर धनगरांच्या डोक्यात ही कल्पनाही आली नसती.

दुसरा मुद्दा : धनगर म्हणतात की त्यांस छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये धनवार (dhanwar) या नावाने आरक्षण मिळाले असून तेथील धनवार व महाराष्ट्रातील धनगर हे एकच आहेत.

प्रतिवाद : पहिल्या मुद्द्यात दावा केलेली Dhangad (धांगड) आणि छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील Dhanwar (धनवार) या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आहेत. धनगरांचा नेमका दावा 'धांगड' वर आहे की 'धनवार'वर आहे हे त्यांचे त्यांनाच पुरेसे स्पष्ट नाही. धनवार आणि धनगर या जातींत संस्कृती, चालीरीती, धार्मिक परंपरा, देवदैवते, भाषा, पेहराव यापैकी काहीही समान नाही. मग ते एक कसे ठरतील? आता धनगर बांधवांचा असा तर दावा नाही ना की इंग्रजीत g चा सुद्धा w होतो, कारण त्याशिवाय Dhangar चे Dhanwar होऊ शकत नाही.

२०१३ साली धनवार या जातीशी नामसाधर्म्य साधणारी दोन जातीनामे छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींत सामील करण्यास हिरवा कंदील मिळाला. ती दोन नावे धनुवार/धनुहार अशी आहेत. दोन्ही शब्दांत 'न' या अक्षरास उकार आहे, त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुद्धा धनगर अनुसूचित जमातींत येऊ शकत नाहीत. कारण धनगर या शब्दात उकार नाहीच. त्यामुळे त्यांत नामसाधर्म्य देखील आढळत नाही.

बहुदा आपले धनगर बांधव अनुसूचित जमातीची कलम ३४२ नुसार केलेली व्याख्याच वाचायला विसरले असावेत. त्यात स्पष्ट लिहिले आहे की अनुसूचित जमाती केवळ त्यांनाच म्हणता येईल की ज्यांत १) आदिम वैशिष्ट्ये असतील, २) त्यांची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, ३) ते भौगोलिक दृष्ट्या पृथक असतील म्हणजेच त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश हा निश्चित आणि दुर्गम असेल, ४) ते इतर जमातींत मिसळण्यास कचरत असतील.

यापैकी मुद्धा २ म्हणजे वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही एक व्यापक व्याख्या आहे आणि भारतातील सर्वच जातींची आणि धर्मांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. (उदाहरणार्थ ब्राम्हण, जैन, पारसी, मुस्लिम, शीख या सगळ्यांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.) पण म्हणून याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा अनुसूचित जमाती ठरण्यास पात्र आहेत.

मग बाकीचे मुद्दे पहिले तर असे लक्षात येते की धनगर या जातीत कोणतीही आदिम वैशिष्ट्ये नाहीत. ते भौगोलिक दृष्ट्या अजिबात पृथक नाहीत. (पृथक भौगोलिक क्षेत्र हे अनुसूचित जमातींचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.) उलट त्यांची वस्तीस्थाने ही नेहमी बदलत राहतात, त्यामुळे त्यांना मिळालेले भटक्या जमाती हे आरक्षणच योग्य आहे. धनगर दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत, त्यांचे वास्तव्य हे कायम नागरी वस्तींत असते. ते इतर जमातींत व्यवहारासाठी मिसळण्यास कचरत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धनगर हे अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.

 

धनगरांची मुद्रणदोषाच्या नावाखाली चाललेली मागणी ही काही नवी गोष्ट नाही.

सन १९९६ मध्ये अशाच प्रकारची एक केस बिहारमध्ये समोर आली होती. बिहारमध्ये Lohara/Lohra अशा नावाने अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेली एक जमात आहे. इंग्लिश मध्ये तीचे नाव योग्य रीतीने लिहिले गेले आहे, मात्र जेव्हा त्याचा हिंदीत अनुवाद केला गेला तेव्हा ते हिंदीत "लोहार" असे लिहिले गेले. त्यामुळे तेथील लोहार (blacksmith) या OBC जातीच्या लोकांनी या अनुवादानुरूप आपणांस ST चा दर्जा मिळावा म्हणून केस दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने अनेक पुस्तके, अहवाल यांचा अभ्यास करून निर्णय दिला की लोहार आणि लोहरा हे वेगवेगळे असून केवळ अनुवादात तशी नोंद झाली म्हणून लोहार हे ST ठरू शकत नाहीत.

अशाच प्रकारे महाराष्ट्रातही एक केस समोर आली होती. सन २००१ मध्ये मिलिंद शरद कोष्टी या विद्यार्थ्याने MBBS च्या एडमिशन साठी 'हलबा कोष्टी' ही जात म्हणजे महाराष्ट्रात अनुसूचित जमातींच्या यादीत १९ क्रमांकावर असलेल्या हलबा/हलबी या जमातीची उपजात असल्याचा दावा करून ST जातप्रमाणपत्र मिळविले होते. यावर त्या जातप्रमाणपत्राच्या अवैधतेचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले की अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांची १९५०च्या कायद्यात दर्शविलेल्या स्वरुपातील नोंद हीच ग्राह्य धरावी. आणि सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितले की एखाद्या जाती/जमातीने अथवा एखाद्या जाती/जमातीतील समुहाने, जर त्यांच्या जाती/जमातीचे नाव १९५० च्या यादीत अगदी स्पष्टपणे विनिर्दिष्ट (specifically mentioned) केलेले नसेल, तर आपण त्या यादीतील एखाद्या जातनामाशी साधर्म्य असणारी जमात आहोत असे म्हणणेसुद्धा निषिद्ध आहे.

Apex Court held that scheduled tribe or scheduled caste must be read as it is in the 1950 Order and it is not even permissible to say that a tribe, subtribe,part of or group of any tribe or tribal community is synonymous to the one mentioned in the Scheduled Tribes Order if they are not so specifically mentioned in it.

मग या न्यायाने धनगरांनी धांगड या जातीशी साधर्म्य असल्याचे सांगणे हे ही निषिद्ध ठरते. कारण १९५० च्या यादीत धनगर या जातीचे नाव ST मध्ये specifically mentioned केलेलेच नाही. उलटपक्षी तिथे Dhangad ही जमात म्हणजे उरांव या जमातीचाच भाग असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

 

धनगर नावाशी साधर्म्य असणाऱ्या भारतातील जाती आणि त्यांचे वर्गीकरण

खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे. इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे.

त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धांगड (Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धांगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उरांव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे.

मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धांगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत?

यादी खालीलप्रमाणे

Scheduled Tribes

State Sr. No Name

Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad

Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad

Maharashtra 36 Oraon, Dhangad

Scheduled Castes

Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor, Dharikar, Dharkar, Domra

Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi

Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi

Jharkhand 9. Dom, Dhangad

Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi

Uttar Pradesh 27. Dhangar

West Bengal 17. Dom, Dhangad

Uttaranchal 27. Dhangar

वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो.

पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगर अथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे.

१) छत्तीसगड   २) दमन आणि दीव   ३) दिल्ली         ४) गोवा

५) गुजराथ     ६) झारखंड     ७) कर्नाटक     ८) मध्य प्रदेश

९) महाराष्ट्र

 

वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT चा विशेष दर्जा दिला आहे.  ती राज्ये पुढील प्रमाणे.

 १) छत्तीसगड   २) गुजराथ   ३) मध्य प्रदेश   ४) महाराष्ट्र

 

याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC चा दर्जा दिलेला आहे. 

१) बिहार        २) हरियाणा    ३) हिमाचल प्रदेश       ४) झारखंड

५) पंजाब       ६) उत्तर प्रदेश ७) पश्चिम बंगाल         ८) उत्तरांचल

 

एकाही राज्याने धनगर या जातीस ST चा दर्जा दिलेला नाही.  खालील तीन राज्यांत धांगड (उरांव) या जमातीस ST चा दर्जा आहे.

१) छत्तीसगड  २) मध्यप्रदेश  ३) महाराष्ट्र

या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन वेगवेगळ्या जातींची  वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे.  धांगड या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान देण्यात आले आहे. 

हे कुणाच्याही लक्षात येईल की धांगड या जमातीस या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धांगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही. धनगर चे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी. 

NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED, NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES (MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA) यांचा REPORT VOLUME – I,  Dated JUNE 30, 2008

या अहवालात Observations and Suggestions या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की, 

5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is written as Dhangar, whereas in English it is written as Dhangara.

 

अनुसूचित जमाती आणि धनगर यांतील फरक

१) व्यवसाय:

अनुसूचित जमातींचा कोणताही वंशपरंपरागत अर्थार्जनाचा व्यवसाय नसतो. अगदी अलीकडच्या काळात ते स्थायी शेती करू लागले आहेत. मात्र धनगर हे वंशपरंपरेने पशुपालक आहेत. धनगरांकडे मेंढ्या, शेळ्या, म्हशी, घोडे असे मोठ्या भांडवली किंमतीचे पशु असतात. ते पशुआधारित दुधाचा व्यवसाय, लोकरीचा व्यवसाय, पशुमांस विकण्याचा व्यवसाय, सुत कातण्याचा व्यवसाय, शेळी मेंढी पालन हे व्यवसाय करून अर्थार्जन करतात. अनुसूचित जमातीचे लोक जे पशु पाळतात ते व्यवसाय म्हणून नव्हे तर वैयक्तिक उपयोगासाठी पाळतात. जसे शेतीसाठी बैल किंवा राखणीसाठी कुत्रा वगैरे. त्यामुळे आर्थिक मिळकतीसाठी पशु पाळणारे धनगर अनुसूचित जमाती या वर्गीकरणात बसत नाहीत.

२) भौगोलिक प्रदेश:

अनुसूचित जमातीचे निकष ठरविण्यासाठी संविधानाच्या ३४२व्या कलमात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांचा वास्तव्याचा प्रदेश हा पृथक असायला हवा (Geographical isolation). याचा अर्थ असा की अनुसूचित जमातीच्या लोकांचा वास्तव्याचा प्रदेश हा एका छोट्या भौगोलिक क्षेत्रातच सीमित असून, तो इतर नागरी वस्तीपासून पूर्णत: अलिप्त असतो. अनुसूचित जमातींच्या गावांत शक्यतो केवळ एकाच जमातीच्या माणसांची वस्ती असते.

याउलट धनगर हे नेहमी स्थलांतर करीत असल्याने त्यांचा कोणताही भौगोलिक प्रदेश निश्चित नाही. धनगरांची वसतिस्थाने ही वेगळी असली तरी ती पृथक/अलिप्त नसतात (non-isolated). त्यांची वस्ती ही नेहमी इतर नागरी वस्त्यांच्याच सान्निध्यात असते. मराठा आणि इतर उच्चवर्णीय जातींतच धनगर समाजाची वस्ती आहे, त्यामुळे त्या वस्त्या पृथक म्हणजेच isolated ठरत नाहीत. आणि भौगोलिक प्रदेशाचा पृथक (isolated) असणे हा सर्वात महत्वाचा निकष ते पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमातींचे भौगोलिक क्षेत्र हे काही जिल्ह्यांपुरातेच मर्यादित आहे, बहुतांश जमाती या वैयक्तिकरित्या प्रामुख्याने प्रत्येकी एक किंवा दोन जिल्ह्यांतीलच ठराविक दुर्गम अलिप्त, आणि पृथक भौगोलिक क्षेत्रांत वसलेल्या आहेत, त्याउलट धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे, त्यामुळे त्यांचा भौगोलिक प्रदेश हा पृथक (isolated) म्हणताच येऊ शकत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा काही पृथक (isolated) प्रदेश ठरू शकत नाही.

३) आर्थिक स्थिती

आर्थिक स्थितीचे अचूक आकडे मिळत नाहीत, मात्र काही सरकारी अथवा संशोधन संस्थांची प्रकाशित झालेली आकडेवारी ग्राह्य धरता येऊ शकते.

धनगरांच्या आर्थिक सुबत्तेविषयी माहिती देण्यासाठी एक संदर्भ देतो.

Indian Veterinary Research Institute, Izatnagar आणि Central Avian Research Institute, Izatnagar यांनी केलेला एका सामाजिक आर्थिक अभ्यासमालेचे निष्कर्ष सादर करतो. सदर निष्कर्ष हे Journal of Recent Advances in agriculture या अभ्यासपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. (पूर्ण संदर्भ पुढील प्रमाणे : Socio Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of Maharashtra, India, by Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and Singh D.P., in J. Rec. Adv. Agri. 2012, vol. 1(3): pages 84-91)

वरील अभ्यास निरीक्षणानुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत प्रत्येक धनगर कुटुंबाकडे सरासरी ६९.४८ इतक्या मेंढ्या, आणि २० इतक्या शेळ्या एवढी संपत्ती स्वत:च्या मालकीची होती, आणि ही एक दोन नव्हे तर परीक्षण केलेल्या प्रत्येक कुटुंबाची सरासरी आहे हे विशेष. याव्यतिरिक्त घोडे आणि म्हशी यांचीही उपलब्धता प्रत्येक कुटुंबाकडे उल्लेखनीय संख्येत आहे. याच अभ्यासमालेत असे निदर्शनास आले आहे की एकूण ७३% धनगर कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे ६०००० रुपयांहून अधिक होते. (म्हणजे दरमहा ५००० रुपयांहून अधिक) तर भूमिहीन लोकांची संख्या केवळ १४% होती.

याउलट STATISTICAL PROFILE OF SCHEDULED TRIBES IN INDIA 2010 या जनजातिय कार्य मंत्रालय भारत सरकार, (MINISTRY OF TRIBAL AFFAIRS) यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ५६.६% आदिवासी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. तर २००६-१० च्या दरम्यान करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ४० % हून अधिक आदिवासी लोकसंख्या भूमिहीन होती. या आर्थिक स्थितीच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की सामाजिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या देखील धनगर हे अनुसूचित जमातींपेक्षा वेगळे आणि अधिक पुढारलेले आहेत,

४) ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक स्थिती

धनगरांचा इतिहास पाहिल्यास पुढील बाबी समोर येतात, विजयनगर साम्राज्याची स्थापना धनगरांनी केली होती. धनगरांनीच होयसाळ, होळकर, राष्ट्रकुट, मौर्य आणि पल्लव या इतिहासातील मोठ्या राजसत्ता स्थापन केल्या आहेत. प्रसिद्ध कवी कालिदास आणि कनकदास हेदेखील धनगर होते. थोडक्यात असे लक्षात येते की धनगरांनी इतिहासात राजसत्ता उपभोगल्या असून, त्यांची सामाजिक स्थिती देखील उत्कर्षाची राहिली आहे. (संदर्भ: http://www.dhangar.org/)

त्याउलट आदिवासी जमातींचा इतिहास पाहिला तर अगदी थेट महाभारतीय काळातही उपेक्षित असलेल्या एकलव्याच्या उदाहरणावरून त्यांच्या ऐतिहासिक दुर्लक्षित, उपेक्षित आणि पृथक सामाजिक परिस्थितीची कल्पना येते.

आणि म्हणूनच धनगर हे अनुसूचित जमातींपासून पूर्णत: वेगळे ठरतात.

 

फसव्या मार्गाने ST प्रमाणपत्र मिळवणे हा गुन्हा

महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला (जारी करणे व पडताळणी नियमन) कायदा २०००, कलम ११-१(अ)नुसार, जो कोणी खोटी माहिती देऊन किंवा खोटे विधान किंवा दस्तऐवज किंवा कोणत्याही इतर फसवणुकीच्या मार्गाने (other fraudulent means) खोटे प्रमाणपत्र प्राप्त करील, तो कमीत कमी सहा महिने ते दोन वर्षे कठोर कारावास अथवा दोन हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांस पात्र राहील.

(According to the THE MAHARASHTRA SCHEDULED CASTES, SCHEDULED TRIBES, DE-NOTIFIED TRIBES (VIMUKKTA JATIS), NOMADIC TRIBES, OTHER BACKWORD CLASSES AND SPECIAL BACKWARD CATEGORY (REGULATION OF ISSUANCE AND VERIFICATION OF)) CASTE CERTIFICATE ACT 2000, Section 11-1(a), Whoever obtains a false certificate by furnishing false information or filling false statement or documents or by any other fraudulent means, shall on conviction be punished with rigourous imprisonment for a term which shall not be less than six months but which may extend upto two years or with fine which shall not be less than two thousand rupees, but which may extend upto twenty thousand rupees or both.)

वरील कायद्यानुसार फसवणुकीच्या मार्गाने (by other fraudulent means) धनगर बांधव अनुसूचित जमातीचे आरक्षणाचा फायदा मिळवू पाहत आहेत. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांचेवर कदाचित केस करता येऊ शकते. मात्र याच कायद्याच्या कलम ११(२) नुसार थेट कोर्टात केस दाखल करता येत नाही. अशी केस फक्त एखादी चौकशी समिती अथवा सदर समितीने नियुक्त केलेला एखादा अधिकारी हाच करू शकतो. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल अशा प्रकारे केस करता येईल काय याचा कायदेतज्ञांशी मसलत करून विचार करता येईल. तसेच अशाच स्वरूपाच्या इतर कायद्यांतील कलमांनुसार काही गुन्हे दाखल करता येतील का हेदेखील कायदेतज्ञांशी विमर्श करून ठरवता येईल.

आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तेव्हा केवळ धनगर बांधवांची मागणी ही चुकीची कशी आहे हे दाखवून देण्याचा बचावात्मक पवित्रा न घेता कायद्याच्या चौकटीतून अशा प्रकारे आक्रमकतेने हा लढा लढला पाहिजे.


..

शनिवार, २९ जून, २०२४

मला नाही येत😄


तुला येतं छान वाचणं, लिहिणं मला नाही येत
भावनांना शब्द देऊन वाहणं, मला नाही येत

कितीदा मोहरता येतं कितीदा बहरता येतं
पण तुझ्या बागेतलं फुल होणं, मला नाही येत

युगांतरांचे योग असतात भेटीगाठींचे
तुला येतं न येणं, मला नाही येत

तुला भजता भजता स्वतःचाच न राहिलो
तुझं असूनही तुझं होणं, मला नाही येत

वादळांतही राहू शकतो मी अगदी ठाम उभा
पण तू जाताना स्वतःला सावरणं, मला नाही येत

आनंदाच्या यात्रेवर चालतोच आहे कधीचा
मुक्कामाचं गाव गाठणं, मला नाही येत

जगाला ओरडून सांगतो, सगळं येतं मला
पण तुला माहीत आहे, मला नाही येत



..

शुक्रवार, २८ जून, २०२४

दोहरा

आँखो पे फिर नींद का पहरा नहीं देखा

जबसे हमने वो एक चेहरा नहीं देखा


जिंदगी को देखता हूँ तो एक दौड़ है बस

किसी मुसाफ़िर को यहाँ ठहरा नही देखा


इन आँखों में उतरने से पहले सोच लेना

मैंने कोई दरिया इतना गहरा नहीं देखा


हमारी कोई भी दुआ कभी कुबूल नही हुई

हमने खुदा से बड़ा कोई बहरा नही देखा


हर चाल, हर बाजी अपनी नाकाम ही रही

हमने खुद से कमज़र्फ कोई मोहरा नही देखा


तब धुँआ कर दिया अपने सारे ख़्वाबोंको

जब उन्होने कहा हमने कोहरा नही देखा


परिंदोंने बचपन का घोंसला क्या छोड़ दिया

बूढ़ी शाख को फिर किसीने हरा नही देखा


किसीने कहा अपने अंदर के रावण को जलाओ

फिर एक भी दिन न गुजरा कि दशहरा नही देखा


दिल मे कुछ और रखते हो, जुबाँ पे कुछ और

राहुल हमने कोई इंसाँ तुमसा दोहरा नही देखा



..

बुधवार, २६ जून, २०२४

थँक यू मेकॉले

थँक यू मेकॉले

ब्रिटिश पार्लमेंटने भारतीयांच्या (आणि त्यांच्या सर्व वसाहतींच्या) शिक्षणासाठी 1813 मध्ये एक कायदा बनवला होता आणि 1830ला मेकॉले यांच्याकडे त्यात सुधारणा सुचविण्यासाठी प्रस्ताव दिला होता.
त्याला मेकॉलेने भारतात 4 वर्षे अभ्यास करून जे उत्तर दिले ते मेकॉलेचा खलिता या नावाने प्रसिद्ध आहे व त्याच्या त्या खलीत्यातील शिफारशींमुळेच भारताच्या आधुनिक शिक्षणाचा पाया रचला गेला हे म्हणण्यास काही हरकत नाही. 
मला माहीत आहे आपणा बहुतांशांपैकी मेकॉलेचा हा खलिता कुणी वाचलेला नसतो पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्ञानावर भरोसा ठेवून मेकॉले कसा चुकीचा होता हे मात्र आवर्जून कधी न कधी बोललेले असते. म्हणून मी मेकॉले त्यात नेमके काय म्हणतो ते थोडक्यात सांगतो.

तेव्हाच्या इंग्रजांच्या शिक्षण धोरणाचे उद्दिष्ट होते 'साहित्याची समीक्षा आणि प्रसार तसेच शिक्षित भारतीयांना प्रोत्साहन'. मेकॉलेचा यातील संज्ञांवर आक्षेप होता. साहीत्य म्हणजे काय? अरबी आणि संस्कृत भाषेतील साहीत्य? आणि शिक्षित लोक म्हणजे कोण? ज्यांना न्यूटनच्या फिजिक्ससारखे आधुनिक विज्ञानाचे शिक्षण मिळाले आहे ते, की हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या ग्रंथांचे शिक्षण मिळाले आहे ते? इंग्रजांना दुसरा अर्थ अपेक्षित होता पण मेकॉलेचा त्याला विरोध होता.
मेकॉले म्हणतो की मागील अधिकाऱ्यांचा अहवाल आहे की जे लाखो रुपये ब्रिटिश सरकारने शिक्षणाच्या बजेटसाठी मंजूर केले आहेत ते जर अरबी आणि संस्कृतमधल्या साहित्याच्या अभ्यासासाठी खर्च केले नाहीत तर लोकांच्या भावना दुखावतील. पण मी म्हणतो की भावना तर कुणाच्याही कशानेही दुखू शकतात. पण आपण ठरवायला हवे की योग्य काय आहे. हा भारतीय लोकांच्या हक्काचा पैसा आहे जो खऱ्या अर्थाने त्यांच्या भल्यासाठीच खर्च व्हायला हवा. 
पूर्वी युरोपात देवीच्या रोगासाठी त्या पुरळातील पू निरोगी लोकांना लावून त्यांचे रक्षण करण्याची पारंपरिक पद्धत होती. पण त्यात खूप लोक मरत असत. मात्र आता जेन्नरने शोधलेल्या लसीनंतर जर आपण ती धोकादायक पारंपरिक पद्धत टाळून नवी सुरक्षित लसीकरण पद्धत अवलंबली तर परंपरा मोडली म्हणून लोकांची भावना जरूर दुखेल. पण म्हणून काय आपण लोकांच्या कल्याणाची जी खरी योग्य पद्धत आहे ती स्वीकारायची नाही?
मी तर म्हणतो की ब्रिटिश सरकारने सगळ्याच वायफळ गोष्टींवरील खर्च ताबडतोब थांबवावा. मग तो मैसूरमध्ये वाघांच्या शिकारीसाठी देण्याचे बक्षीस असो की चर्चमध्ये प्रार्थना गाणारांना देण्याचे अनुदान असो. सरकारने हे सगळे त्वरीत थांबवले पाहीजे (लक्षात घ्या मेकॉलेने चर्चचे अनुदान सुद्धा थांबवायला सांगितले आहे).
सरकारकडे आता एक शैक्षणिक फंड उपलब्ध आहे जो भारत देशातील लोकांच्या बौद्धिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी खर्च करणे आवश्यक आहे. मग त्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठीचा सर्वोत्तम मार्ग कोणता असेल?
भारतात हजारो बोलीभाषा बोलल्या जातात मात्र त्यांच्यात कुठलेही लिखित साहित्य अथवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन हे लिखित स्वरूपात नाही. वरून या प्रत्येक प्रांतागणिक बोलल्या जाणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या बोलीभाषा अशा स्थितीत नाहीत की त्यांच्यात सायंटिफिक ज्ञान हे ट्रान्सलेट करून छापता येईल (आजही अगदी हिंदी मराठी सारख्या मोठ्या भाषांतही कित्येक टेक्निकल शब्दांसाठी सोपे पर्याय नाहीत. त्यामुळे जेव्हा बहुतांश भाषांत काहीही लिखित नव्हते त्याकाळी मेकॉले काही चुकीचे बोलत नव्हता). मी हे मान्य करतो की लोकांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणे अधिक चांगले असते. पण त्यासाठी तशी एक भाषाही सुयोग्य माध्यम म्हणून उपलब्ध असणे गरजेचे आहे. भारताच्या हजारो बोलीभाषांत तरी ती सध्या क्षमता नाही. त्यामुळे मग आता भारतात शिक्षणाचे माध्यम म्हणून फक्त 3 पर्याय शिल्लक राहतात. अरबी भाषा, संस्कृत आणि इंग्लिश.

(इथून पुढेच येते मेकॉलेला सर्वाधिक शिव्या खाऊ घालणारे त्याचे विवादित वक्तव्य). मेकॉले म्हणतो की शिक्षण कमिटीच्या अर्ध्या मेंबर्सचे म्हणणे आहे की शिक्षण इंग्रजीत द्यायला हवे, मात्र बाकी अर्ध्यांचे म्हणणे आहे की शिक्षण अरबी आणि संस्कृतमध्ये दिले पाहीजे. मला अरबी अथवा संस्कृत या दोन्ही भाषा येत नाहीत. मात्र मी या भाषांतुन अनुवादित झालेले खूपसे साहीत्य वाचले आहे. मी या भाषांच्या अनेक तज्ञांशीही बोललो आहे. सगळ्यांचे म्हणणे हेच आहे की अरबी आणि संस्कृत या दोन्ही भाषा आधुनिक सायंटिफिक ज्ञान देण्याच्या दृष्टीने पुरेशा सक्षम नाहीत. या भाषांत कुठल्याही प्रकारच्या ज्ञानदायी (वैज्ञानिक) साहित्याचा अभाव आहे. मला भेटलेल्या सर्व अरबी आणि संस्कृत भाषा तज्ज्ञांनी त्यामुळे हेही मान्य केले आहे की युरोपातील कोणत्याही एखाद्या नावाजलेल्या लायब्ररीतील एका शेल्फवरील पुस्तकांचे मोल हे या दोन्ही भाषांतील तमाम साहित्याच्या मोलापेक्षा अधिक भरेल.
हे वाक्य वाचून कुणालाही अपमान वाटणे साहजिक आहे. पण आपण आपल्या भावना आणि अभिमान बाजूला ठेवून त्रयस्थपणे वैज्ञानिक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहीले तर ते अतिशयोक्तीचे असले तरी बहुतांशी खरे नाही का? युरोपातील कशाला, आज पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या जयकर लायब्ररीतील कोणत्याही सायन्सच्या शेल्फवर जिथे 20 पुस्तके असतील, त्यांतील ज्ञान मॅच करायला तुम्ही मला भारतातील अरबी आणि संस्कृतमधल्या 20 पुस्तकांची वा ग्रंथांची नावे सांगू शकता का? नाही सांगू शकणार. अर्थात असे काही ग्रंथ भारतात नक्कीच आहेत जे आर्यभट्ट, वराहमिहीर यांसारख्या श्रेष्ठ वैज्ञानिक ऋषींच्या तत्वांचे पुरस्कार करतात, पण ते आहेत किती? चार किंवा पाच. आणि त्यातही हे ग्रंथ पूर्णपणे फक्त वैज्ञानिक सिद्धांतावर नाहीत तर त्यात अनेक साहित्यिक विषय सुद्धा अंतर्भूत आहेत. इतकेच नाही तर त्यांतील अनेक वैज्ञानिक सिद्धांत सुद्धा आजच्या मानाने तितकेसे ऍक्युरेट नाहीत. त्यामुळे शोधून शोधून 10 ग्रंथ आपण मिळवले तरी त्यांतील खरे सायंटिफिक व्हॅल्यू असलेले टेक्स्ट हे आजही पुण्याच्या जयकर लायब्ररीतील एका शेल्फवरील विज्ञानाच्या पुस्तकांतील ज्ञानाच्या मुल्याशी मॅच करू शकणार नाही हे दुर्दैवाने खरेच नाही का? मग मेकॉलेचे काय चुकले?

पुढे मेकॉले हेही म्हणतो की जर आपण युरोपियन काव्य आणि अरबी व संस्कृत काव्य यांची तुलना केली तर दोन्हींत कोणते श्रेष्ठ यावर तज्ज्ञांचे एकमत होणार नाही दोन्ही तुल्यबळ आहेत. (म्हणजे मेकॉले या दोन भारतीय भाषांना सरळसरळ टाकाऊ म्हणत नाहीय तर त्यातील काव्याचे श्रेष्ठत्व आणि मूल्य हे तो इन डायरेक्टली मान्य करतो हे लक्षात घेतले पाहीजे)
मात्र जेव्हा आपण कल्पनांच्या विश्वातून (काव्य) निघून अधिकाधिक अशा साहित्याकडे येतो ज्यात वैज्ञानिक तथ्ये योग्य रीतीने नोंदवलेली आहेत आणि ज्यात प्राप्त माहीतीची योग्य चिकित्सा आणि सखोल व पद्धतशीर अभ्यास केलेला आहे, त्या क्षेत्रात मात्र या दोन भारतीय भाषा युरोपियन भाषांपुढे टिकाव धरू शकत नाहीत.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांत इतिहास आणि तत्वज्ञान यांची उज्ज्वल परंपरा होती. पण साधा भारतीयांचा इतिहाससुद्धा संस्कृत भाषेत अशा सुत्रबद्ध रीतीने लिखित स्वरूपात उपलब्ध नाही जसा की इंग्लंडमधल्या छोट्या मुलांच्या शाळेच्या पुस्तकांत असतो. (हेही दुर्दैवाने खरे आहे कारण भारतीयांना काहीही लिहून/नोंदवून न ठेवण्याची वाईट सवय आहे हे तर इंग्रजांच्या दीड हजार वर्षांपूर्वी आलेल्या मेगास्थेनसने सुद्धा लिहून ठेवलेले आहे. आपले पूर्वज काहीच नोंदवून ठेवत नव्हते म्हणून तर आपल्याला आपला इतिहास या बाहेरच्या प्रवाशांच्या प्रवासवर्णनातून शोधावा लागतो).
त्यामुळे हे नक्की आहे की भारतीयांना जर आधुनिक वैज्ञानिक ज्ञान द्यायचे असेल तर त्यांना ते अरबी वा संस्कृत ऐवजी दुसऱ्या परकीय भाषेतूनच द्यावे लागेल. 
मग पुढे मेकॉले याकामी समस्त परकीय भाषांपैकी इंग्लिश कशी योग्य आहे ते सांगतो. इंग्रजीतील विज्ञान, कायदा, इतिहास आणि इतर माहीती जी इंग्रजांनी 300 वर्षांत जगभरातून मिळवून संकलित करून ठेवली आहे तेवढी अन्य कोणत्याही भाषेत नाही. वरून भारतातील रुलिंग क्लास(राजे राजवाडे वा अधिकारी) हा इंग्रजीतच बोलतो त्यामुळे लवकरच सामान्य लोकही इंग्रजीत बोलू लागतील म्हणून इंग्रजी हीच भाषा भारतात शिक्षणाचे माध्यम म्हणून योग्य आहे.
तो पुढे हेही खोचकपणे विचारतो की अरबी व संस्कृत भाषांत असे काय साहीत्य आहे जे सर्वांना शिकवले जायला हवे? यांच्या पुस्तकांत ग्रहांची दशा पूजेने बदलणारी अस्ट्रोनॉमी आहे ती शिकवायची? की यांच्या ग्रंथांत 30-30 फूट उंचीचे राजे होते आणि त्यांनी तीस तीस हजार वर्षे राज्य केले असे लिहिले आहे ते इतिहास म्हणून शिकवायचे? की जगात दुधातुपाचे समुद्र (क्षीरसागर?) आहेत हे जॉग्राफीमध्ये शिकवायचे?

मेकॉले म्हणतो की पाचव्या आणि सहाव्या शतकात आपण इंग्रजसुद्धा आजच्या भारतीयांसारखेच होतो. तेव्हा जगातले सगळे चांगले ज्ञान हे लॅटिन आणि ग्रीक भाषेत उपलब्ध होते. तेव्हा जर आपल्या पूर्वजांनी स्वतःच्याच भाषांचा आग्रह धरला असता तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊन पुढे आपली प्रगती होऊ शकली असती का? आज भारतीयांची तीच स्थिती आहे जी पाचव्या शतकात आपली होती. आपण या परक्या भाषा शिकलो म्हणून आपल्याला ज्ञानाची कवाडे खुली झाली. मग आज आपण भारतीयांसाठीही ज्ञानची कवाडे तशीच खुली करायला नको का? इंग्रजी व्यतिरिक्त आज कोणत्या भाषेत ज्ञानसाहित्य इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे?
मेकॉले पुढे रशियाचेही उदाहरण देतो. तो म्हणतो की आपल्या आजोबांच्या काळी रशिया हा पंजाबपेक्षा मागास होता. पण रशियाने युरोपियन भाषा आणि त्यातील ज्ञान स्वीकारले. रशिया उगाच स्वतःच्या भाषेचा आग्रह धरून आणि आपल्या लोकसाहित्यातील परिकथाच आम्ही शिकू हा आग्रह धरून बसला नाही. त्यामुळे आता अशी स्थिती आहे की आपल्या आजोबांच्या काळात मागास असलेला रशिया हा आपल्या नातवांच्या काळात सर्वात प्रगत अशा कोणत्याही युरोपियन देशाइतका सक्षम म्हणून उदयास येईल. मग आपण भारतीयांना देखील ती संधी का देऊ नये?

मेकॉले पुढे सांगतो की आज भारतात लोकांना अरबी आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी आपल्याला अनुदान द्यावे लागते. उलट इंग्रजी शिकण्यासाठी लोक स्वतःहून पैसे खर्च करायला तयार आहेत. तो एका मदरशाचे उदाहरण देतो की एका मदरशात 77 विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी सरकारला महिन्याला 500 रुपये द्यावे लागतात. त्याउलट इंग्लिश शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 3 महिन्यात सरकारलाच 103 रुपये प्राप्त झाले आहेत. मला कळले आहे की भारतातील विद्यार्थी हे त्यांच्या भाषेवरील प्रेमापायी नव्हे तर अनुदान मिळते म्हणून त्या भाषा शिकतात. त्यांची या भाषा शिकण्याची खरेच मनापासून इच्छा नसते.
त्यानंतर मेकॉले काही संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांची केस मांडतो की हे विद्यार्थी सरकारचे अनुदान घेऊन 12 वर्षे संस्कृत शिकले. त्यांच्याकडे संस्कृत प्राविण्याच्या डिग्री सुद्धा आहेत, पण त्या डिग्री बघून त्यांना कुणीही नोकरी देत नाही. कारण संस्कृतचे ज्ञान व्यवहारात काही उपयोगाचे नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी सरकारला विनंती केली आहे की तुमच्या आग्रहामुळे आम्ही संस्कृत शिकण्यासाठी आमचे आयुष्य खर्च केले पण आता आम्हाला कुठेही काम मिळत नाही त्यामुळे सरकारनेच आम्हाला कोणतीही छोटीमोठी नोकरी मिळवून द्यावी वा आयुष्यभर काही अनुदान देत रहावे.
म्हणजे आपल्या जुन्या अरबी आणि संस्कृत साहीत्य शिकविण्याच्या आणि त्यासाठी अगदी अनुदान ही देण्याच्या पॉलिसीमुळे आपण अशी कमावण्यायोग्य नसणाऱ्या पण धार्मिक शिक्षणात ऐन उमेदीचे आयुष्य वाया गेलेल्या लोकांची फौज उभी करत आहोत. आपण आपले धोरण बदलले नाही तर भारतीय नेहमीच खऱ्या ज्ञानापासून वंचित राहतील. ते कधीही सत्य आणि विज्ञानाचे विद्वान बनू शकणार नाही. आपण त्यांना आधुनिक ज्ञान विज्ञानापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करत आहोत.
जुन्या शिक्षण कमिटीने 1 लाख रुपये खर्च करून अरबी आणि संस्कृत पुस्तके छापली. पण ती पुस्तके कोणीही खरेदी करायला तयार नाही. तीन वर्षात ही पुस्तके छापून सरकार 1000 रुपयांचीही विक्री करू शकले नाहीय. त्याउलट स्कुल बुक सोसायटी ही संस्था दरवर्षी 7 ते 8 हजार इंग्रजी पुस्तके छापून विकते, ज्यायोगे त्यांचा प्रिंटिंग खर्च तर निघतोच, आणि वरून 20 टक्के नफा सुद्धा कमावला जातो.

मेकॉले हेही आवर्जून सांगतो की आपण कधीही अशा लोकांना अजिबात समर्थन देता कामा नये जे इथल्या लोकांना धर्मांतर करवून ख्रिश्चन बनवत आहेत. पण त्याचबरोबर आपण इथल्या लोकांना अनुदानाची लाच देऊन संस्कृत आणि अरबी शिकवणे ही बंद केले पाहीजे. जे अवैधानिक आहे ते काहीही वा कुणाच्याही बाबतीत असो, थांबवलेच गेले पाहीजे.
पौर्वात्य (अरबी आणि संस्कृत) भाषांचे समर्थक म्हणतात की भारतीय लोक इंग्लिश शिकू शकणार नाहीत आणि केवळ तोडकीमोडकी इंग्रजी शिकण्यापर्यंतच पोचू शकतील, म्हणून त्यांना इंग्रजी शिकवू नये. मात्र मेकॉले म्हणतो की हे खरं नाही. तो सांगतो की या शहरातच मी अनेक इंग्रजीवर कमांड असलेले हिंदू पाहीले आहेत. इतकेच नाही तर मी ठामपणे सांगू शकतो की काही हिंदूंचे इंग्रजीवर इतके प्रभुत्व आहे की कोणत्याही इतर फॉरेनरपेक्षा ते वरचढ ठरतील. माझ्या एका प्रस्तावावर इंग्रजीत मत नोंदविणाऱ्या एका हिंदूंची इंग्लिश आणि ज्ञानाची पातळी ही सरकारच्या या शिक्षण विभागाच्या कमिटीतील कोणत्याही तज्ञापेक्षा थोडीही कमी नव्हती.

आता पुढे येते मेकॉलेचे दुसरे सर्वात विवादित वक्तव्य.
मेकॉले म्हणतो की मी पौर्वात्य शिक्षणाचे आग्रही असणाऱ्या लोकांशी एका बाबतीत सहमत होऊ शकतो की आपण या प्रचंड मोठ्या देशाच्या प्रचंड मोठ्या जनसंख्येला चुटकीसरशी इंग्रजीत प्रवीण करू शकत नाही. पण म्हणून आपण सुरुवात करायचीच नाही का? किमान आपण आता आपल्या लिमिटेड फंडाने एवढी तर सुरुवात करू शकतो ना की जेणेकरून भारतात एक असा वर्ग तयार होईल जो की रंग आणि रक्ताने तर भारतीय असेल मात्र हा वर्ग अभिरुची (taste), जाणीवा (opinion), तत्वे (morals) आणि बुद्धिमत्ता (intellect) यांनी इंग्रजांच्या तुल्यबळ असेल (किंवा इंग्रज असेल).
याही वाक्यावर खरेतर आक्षेप घेणे तितकेसे बरोबर नाही. इंग्रज असणे म्हणजे श्रेष्ठ असणे असे मेकॉलेला म्हणायचे आहे. ज्याला आपण आज नक्कीच रेसिस्ट म्हणू शकतो, पण त्याकाळी किमान मेकॉलेने हे रेसिस्ट भावनेने म्हंटले असेल असे वाटत नाही. म्हणजे अरबी आणि संस्कृत साहित्याला जे त्याने कमी दर्जाचे म्हंटले आहे तेही त्याने त्यांच्या वैज्ञानिक मूल्यावरून म्हंटले आहे ना की रेसिस्ट भावनेतून, असे मलातरी वाटते. अजून असे आहे की मेकॉलेनेच भारतीय लोक आणि इंग्रज यांना कायद्यापुढे समान पातळीवर आणले याचेही त्याला श्रेय दिले जाते. नाहीतर त्यापूर्वी एकाच गुन्ह्यासाठी इंग्रजांना वेगळी (सौम्य) आणि भारतीयांना वेगळी (कडक) सजा होती. मेकॉले धर्मद्वेषी सुद्धा नव्हता. नाहीतर चर्चला अनुदान देऊ नका अथवा भारतीयांच्या ख्रिस्ती धर्मात धर्मांतराला समर्थन करू नका असे तो सरकारला म्हंटला नसता. उलट आपण भारतीयांचा एक आपल्याच लेव्हलचा क्लास तयार करू असे तो म्हणतो. (आपल्यासाठी कारकुनी करणारा क्लास तयार करू असे तो म्हंटलेला नाही, ती शुद्ध अफवा आहे). 
पुढे तो सांगतो की एकदा असा एक वर्ग तयार झाला की मग बाकीच्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी आपण या वर्गावर सोपवू शकतो. मग या लोकांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञान त्यांच्यात्यांच्या स्थानिक भाषेत अनुवादित करून शिकवले तरी हरकत नाही. त्यांना जे योग्य आणि सोपे वाटेल तसे ते करतील जेणेकरून सगळ्या भारतीयांना खरे ज्ञान मिळेल.
म्हणून आपण आता संस्कृत आणि अरबी भाषांच्या शिक्षणासाठी अनुदान देणे बंद केले पाहीजे. फक्त बनारसमध्ये एक संस्कृत कॉलेज आणि दिल्लीत एक अरबी मदरसा यांना वगळता कोणालाही अनुदान देण्यात येऊ नये. या फंडातून देशातील प्रमुख शहरांत इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा उघडण्यात याव्यात. आणि लोकांना अनुदानाची लालूच दाखवून एखादे (अरबी/संस्कृत) शिक्षण देण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या मर्जीने शिक्षण आणि माध्यम निवडू द्यावे.

शेवटी मेकॉले म्हणतो की जर ब्रिटिश क्राऊन माझ्या या प्रस्तावाला राजी नसेल तर मला त्यांनी समितीतून काढून टाकावे. इंग्रज सरकारची सध्या लागू असलेली जुनी शिक्षण पद्धती ही भारतीय समाजाची सत्याकडे (truth) होणारी वाटचाल वेगवान करण्याऐवजी फक्त या समाजाचा पाखंडाच्या जोखडांमुळे होऊ घातलेल्या मृत्यूकडचा प्रवास लांबविण्याचा प्रयत्न करत आहे (delay the natural death of expiring errors).
जर आपण मी सुचवलेली सुधारणा करणार नसू तर मग आपल्याला शिक्षण विभाग म्हणवून घेण्याचा काही नैतिक अधिकार नाही. मग आपल्याला केवळ सरकारी पैसा वाया घालवणारा विभाग असे म्हंटलेलेच योग्य राहील. सरकारी अनुदानाचे लालूच दाखवून निरुपयोगी पदवीधरांची सद्दी वाढविण्यापेक्षा योग्य ज्ञान देऊन सक्षम भारतीय नागरिक घडवले जावोत हीच माझी अपेक्षा आहे.

खरेच मेकॉलेने इतक्या परखड भाषेत हे मिनिट्स लिहीले नसते आणि येऊ दे रे माझ्या मागल्या ही भूमिका घेऊन संस्कृत आणि अरबी धार्मिक शिक्षण देण्याची जुनी इंग्रज पॉलिसी कायम ठेवली असती तर भारतीय समाजाला स्वातंत्र्य, समानता, लोकशाही, कायद्याचे राज्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान, विज्ञान या गोष्टी कितीतरी काळ समजल्याच नसत्या. आजही कित्येक आफ्रिकन देशांत हे विचार आणि संकल्पना रुजलेल्या नाहीत. मेकॉलेमुळे त्या भारतीयांना कळल्या, आणि ज्या भारतीयांनी इंग्रजी शिक्षण घेतले त्यांना या संकल्पना समजल्या म्हणून त्यांना गुलामगिरीची, हक्काची, समानतेची जाणीव झाली, आणि म्हणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला, आणि आपण स्वतंत्र झालो. विचार करा दादाभाई नौरोजींपासून गोखले, आगरकर, महात्मा फुले, सावरकर, गांधी, पटेल, नेहरू, मौलाना आझाद, सुभाषबाबू, आंबेडकर, राजाराम मोहन रॉय हे सगळे इंग्रजी शिक्षण घेतलेले लोक होते. तुम्ही किती स्वातंत्र्यसैनिकांची नावे सांगू शकता ज्यांनी इंग्रजी शाळांत शिक्षण घेतले नव्हते? अगदी अत्यल्प. या सर्व भारतीय नेत्यांत जवळजवळ सगळेच उच्चशिक्षित होते. कुणी IAS तर कुणी बॅरिस्टर होते. त्यामुळेच त्यांच्यात आधुनिक मूल्ये रुजली आणि स्वातंत्र्यभावनेचा स्फुल्लिंग पेटला. एकूण भारतीय समाजही आधुनिक इंग्रजी शिक्षणामुळेच बहुतांशी अनेक चुकीच्या जोखडांतून मुक्त झाला.

मेकॉले म्हणतच होता की कोणत्याही समाजाला जर चॉईस दिला तर तो योग्य आणि पारंपरिक यात नेहमी पारंपरिक गोष्टींनाच प्रेफरन्स देईल. आजही आपण बघतो की आपल्याकडे शिक्षण घेऊनही लोक या पारंपरिकतेच्या प्रेमातून मुक्त झालेले नाहीत. म्हणून आपण अजूनही पूर्णतः आधुनिक आणि त्यामुळे पुरेसे प्रगत होऊ शकलो नाहीय. अजूनही आपल्यात पुराणतेकडे ढकलणाऱ्या प्रवृत्ती प्रबळ आहेत. मेकॉले म्हणतो की माणसाची भावनिक ओढ ही नेहमी परंपरेकडे असतो. परंतु भावनिक ओढ आणि बौद्धिक आरोग्य/विकास यांपैकी बौद्धिक विकास हा मार्ग कमी पॉप्युलर असला तरी कोणत्याही समाजासाठी तोच महत्वाचा असतो.

ज्यांना आज वाटते की मेकॉलेने आधुनिक शिक्षण आणून चूक केली त्यांच्यासाठी मला वाटते की सरकारने जरूर संस्कृत, उर्दू, अरबी या भाषांत धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा काढाव्यात आणि या लोकांच्या मुलांना त्यात थेट पदवीपर्यंत शिक्षण द्यावे. फी सुद्धा सध्याच्या सरकारी अनुदानित शाळांची जेवढी आहे तितकीच ठेवावी. धर्मग्रंथांत वा पुरातन ग्रंथांत लिहिलेले सगळे विषय त्यात शिकवावेत. आधुनिक विषयांचा गंधही त्यांना लागू देऊ नये. इतकेच नाही तर असे शिक्षण घेणाऱ्या लोकांची जितकी संख्या वाढेल तितकी अशा शाळा कॉलेजेसची संख्या देखील वाढवत न्यावी. बघूच आपण वैयक्तिक प्रगती आणि धार्मिक शिक्षण यात कोण प्रबळ ठरते.

असो, हे नक्की की आज आपल्यात जी थोडीफार लोकशाही, वैज्ञानिकता, समानता, आधुनिकता आहे त्याचे श्रेय सर्वात आधी मेकॉलेच्या परखड भूमिकेलाच जाते. त्याच्यामुळे जे शिक्षण भारतात आले त्याच्या पाठबळावर आज आपण जागतिक ताकदींशी तुल्यबळ पातळीवर उभे आहोत, नाहीतर आपण अजूनही अनेक आफ्रिकी देशांसारखे जगाच्या 50-60 वर्षे मागे राहीलो असतो. आपल्या आजच्या प्रगतीचे कारण हे आधुनिक शिक्षण हेच आहे आणि भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया रचण्याचे सर्वात मोठे श्रेय हे निर्विवादपणे मेकॉलेचेच आहे. म्हणूनच तर मी वर सगळ्यात आधी म्हंटले की 'थँक यू मेकॉले'.


..

मंगळवार, १८ जून, २०२४

युनिव्हर्सल रिकरन्स

History repeats itself किंवा इतिहासाची पुनरावृत्ती होते हे आपण कित्येकदा ऐकलेले आहे. 

सहसा आपण ही संकल्पना अगदी ढोबळपणे आणि तौलनिक संदर्भात घेतो. पूर्वी इतिहासात काही घडले असेल तशाच कारणांनी आज काही घडले की अशा घटनांनाच आपण इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतो. पण हे इतके साधे सरळ नाही.

नित्शे हा या इतिहासाच्या पुनरावृत्तीचा पुरस्कार करणारा सर्वात मोठा विचारवंत आहे. पण फक्त इतिहास नाही तर सगळे विश्वच आणि विश्वातील सगळ्या घटना या पुन्हा पुन्हा आणि जशाच्या तशाच घडत असतात असे नित्शे म्हणतो. मी जी ही पोस्ट लिहितो आहे ती मी पूर्वीही अगणित वेळा लिहीली आहे आणि पुढेही अगणित वेळा अगदी तंतोतंत अशीच्या अशी लिहीणार आहे, आणि जेवढे लोक ती आता वाचतील तेच आणि तेवढेच लोक ती या दरवेळी वाचतील असे नित्शे म्हणतो.

भारतीय धारणेनुसार सुद्धा चार युगे एकानंतर एक अशी पुन्हापुन्हा येत असतात असे मानले जाते, हाही नित्शेच्या युनिव्हर्सल रिकरन्स सारखाच विचार आहे. रामायणातील राम आपली अंगठी पाताळात टाकतो आणि हनुमानाला ती आणायला पाठवतो ही कथा मी पूर्वी कधीतरी एका पोस्टमध्ये लिहिली होती, ती या युनिव्हर्सल रिकरन्स सिद्धांताचे परफेक्ट उदाहरण आहे.

अर्थात हा फक्त एक विचार आहे. पण खरेच असे युनिव्हर्सल रिकरन्स होते का? किंबहुना होऊ शकते का? विश्वातील घटना परत रिपीट होऊ शकतात का?

सापशिडीचा खेळ किंवा द्युत या खेळात आपण जे फासे (dice) टाकतो त्या फाशांना प्रत्येकी 6 बाजू असतात. एकच फासा असेल आणि तो टाकल्यावर पहील्या सहा वेळा वेगवेगळा स्कोअर आला तर सातव्या वेळा फासा टाकल्यानंतर हमखास आधी आलेला स्कोअर रिपीट होईल हे नक्की. जर दोन फासे असतील तर दोन्हींच्या सहा सहा मिळून एकूण बारा बाजू म्हणजेच एकूण बारा व्हेरिएबल्स असतील. आता मात्र दोन्ही फाशांचे मिळून प्रत्येक वेळी वेगळे कॉम्बिनेशन बनले तर अशी वेगवेगळी एकूण 36 कॉम्बिनेशन बनू शकतात. त्यामुळे 37 व्या वेळेपर्यंत काहीही केले तरी आधीचे कोणते ना कोणते कॉम्बिनेशन रिपीट होईल हे नक्की.

जर तीन फासे असतील तर एकूण 18 व्हेरिएबल्स असतील आणि तिन्हींचे मिळून 6x6x6 अशा 216 थ्रो नंतर हमखास कोणते ना कोणते कॉम्बिनेशन रिपीट होईल (आधीही रिपीट होऊ शकते पण नाहीच झाले तरी 216 नंतर हमखास होईलच).

तर एखाद्या घटनेत जितके अधिक व्हेरिएबल्स असतील तितके त्याचे जास्त कॉम्बिनेशन म्हणजे जास्त आऊटकम किंवा रिझल्ट्स शक्य असतात.

जर सगळेच रिझल्ट्स येण्याची सारखीच शक्यता असेल तर रिझल्ट रिपीट व्हायला खूप वेळ लागू शकतो. मात्र फक्त काही पर्टीक्युलर रिझल्ट्स येण्याची शक्यता जास्त असेल तर मात्र असे रिझल्ट अनेकदा रिपीट होऊ शकतात.

उदाहरणार्थ भारताच्या संसदेत एकूण 543 लोकसभा सीट आहेत. तर एकूण 543 निवडणुकांनंतर काँग्रेसचा वा बीजेपीचा वा कोणत्याही पार्टीचा कोणता ना कोणता पूर्वीचा स्कोअर हा रिपीट होईल हे नक्की. 

मला सांगायचे हे आहे की कितीही जास्त व्हेरिएबल्स असोत, कधी ना कधी त्याचे सगळे कॉम्बिनेशन्स पूर्ण होतात आणि ते पूर्ण घडून गेले की पुढच्या प्रत्येक वेळी अपरिहार्यपणे आधीचा स्कोअर किंवा घटना रिपीट होते. 

वरच्या उदाहरणात सांगितल्या प्रमाणे एका फाशाचे एकेक वेळा 1, 2, 3, 4, 5, 6 असे सगळे स्कोअर येऊन गेले की मग त्यानंतर भविष्यात टाकलेला कोणताही फासा हे कोणत्यातरी जुन्याच घडून गेलेल्या स्कोअरचे म्हणजे घटनेचे रिपीटेशन असेल. असेच आपल्या विश्वाचे आहे. विश्व आपल्याला आपल्या कल्पनेहून अमर्याद वाटत असले तरी त्यातील व्हेरिएबल्स हे फायनाईट आहेत हे नक्की. आणि पुढच्या ट्रीलियन्स ऑफ इयर्स नंतर कधी ना कधी या साऱ्या व्हेरिएबल्सच्या कॉम्बिनेशन्सनी घडणे शक्य असणाऱ्या सर्व घटना घडून गेल्यावर त्यांनतर विश्वात होणारी प्रत्येक घटना ही आधीच्या कोणत्यातरी घटनेचे रिपीटेशनच असेल. 

यातही अजून एक गंमत आहे. या जगात रँडम वाटणाऱ्या घटना खरेतर तितक्या रँडम नसतात. म्हणजे कसे की एखाद्या घटनेत जितके अधिक व्हेरिएबल्स असतील तितके त्याचे रिझल्ट हे सगळे पॉसीबल कॉम्बिनेशन्स पूर्ण व्हायच्या आधीच रिपीट व्हायला लागतात. उदाहरणार्थ दोन फासे घेतल्यावर त्यात परफेक्ट 12 किंवा परफेक्ट 2 हे टोकाचे रिझल्ट मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र 5 ते 8 हे स्कोअर्स रिपीटेडली अनेकदा मिळण्याची शक्यता जास्त असते. याला गॉशियन किंवा नॉर्मल डिस्ट्रिब्युशन म्हणतात. जर तीन फासे असतील तर त्यात 3 किंवा 18 हे एक्स्ट्रीम स्कोअर मिळण्याची शक्यता अगदीच धूसर असते मात्र 8 ते 12 हे स्कोअर्स मिळण्याची शक्यता प्रचंड जास्त असते. चल्लसपाणी मधेही 4 किंवा 8 मिळण्याची शक्यता सगळ्यात कमी असते आणि जास्तीत जास्त वेळा आपल्याला 2 किंवा 3 हेच स्कोअर मिळतात. जितके जास्त व्हेरिएबल्स असतील तितके एक्स्ट्रीम कॉम्बिनेशन्सचे रिझल्ट मिळणे दुरापास्त असते आणि जास्त शक्यता असलेले रिझल्ट्सच परत परत मिळण्याची शक्यता जास्त असते. T20 मध्ये शक्य आहे की 0 स्कोअर वर सगळी टीम बाद होईल किंवा प्रत्येक बॉल वर 6 मारून 720 स्कोअर होणेही शक्य आहे. मात्र या एक्स्ट्रीम घटना कधीच घडत नाहीत. आपण बघू शकतो की जास्तीत जास्त T20 स्कोअर्स हे 150च्याच आपसास असतात. म्हणजे  जर कोणत्याही टीमने 150 च्या आसपास स्कोअर केला तर हीच शक्यता असते की तो स्कोअर पूर्वीच्या कोणत्या तरी मॅचच्या स्कोअरचेच रिपीटेशन असेल. विश्वातही असेच सगळ्या व्हेरिएबल्सच्या कॉम्बिनेशन्सचे जे एक्स्ट्रीम रिझल्ट्स असतील ते कधीच घडत नाहीत. विश्वाची हीच टेंडन्सी आहे की घडणाऱ्या घटनांचे सर्व आऊटकम्स हे सुवर्णमध्य साधणारे किंवा गॉशियन डिस्ट्रिब्युशन देणारे असतात. आपण हेही पाहीले की एखाद्या घटनेत जितके जास्त व्हेरिएबल्स असतील तितके त्या घटनेचा रिझल्ट हा सुवर्णमध्य साधणाराच येण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे घटना रिपीट होण्याचीच शक्यता अधिक असते. विश्वाच्या मानाने आपल्या पृथ्वीवर व्हेरिएबल्स कमी आहेत त्यामुळे फक्त काही विशिष्ट घटना (जसे की ऋतू) रिपीट होतात. पण होतात हे मात्र नक्की. 

म्हणजे नित्शे म्हणतो ते युनिव्हर्सल रिकरन्स हे स्टॅटिस्टिकली तरी खोटे वा अशक्य नाहीय. पण त्याचबरोबर ते नित्शे सांगतो त्या स्वरूपात होणे (म्हणजे मी ही पोस्ट आधीही लिहिलेली असणे) मात्र किमान बिलियन्स ऑफ ट्रीलियन्स ऑफ इयर्स पर्यंत होणे शक्य नाही. तोपर्यंत कदाचित पृथ्वी टिकणारही नाही त्यामुळे ते परत होईल हे अशक्य आहे असे आपण म्हणू शकतो.

गुरुवार, २ मे, २०२४

कोविड लसीकरणाची परिणामकारकता

कोविडमध्ये लसीमुळे फायदा झाला की नाही हे कसे कळेल? आपले प्राण किंवा आरोग्य लसीमुळे सुरक्षित राहीले हे सिद्ध झाले का? की लस न घेताही मृत्युदर इतकाच राहीला असता?  लस न घेता पोस्ट कोविड आरोग्य समस्या इतक्याच राहील्या असत्या की वाढल्या असत्या या प्रश्नांची उत्तरे सहजासहजी मिळत नाहीत. आपल्या देशात तर असा काही अभ्यास होणे व तो जाहीर होणे, किंवा किमान मीडियाने त्या बाबतीत लोकांना जागरूक करणे हे एखाद्या दिवास्वप्नासारखेच आहे. म्हणून मी इतर अनेक देशांतील या संबंधातील प्रकाशित झालेला सायंटिफिक डेटा बघितला. यातील काही प्रमुख निष्कर्ष मी खाली देत आहे. या प्रत्येक निष्कर्षाचा वैज्ञानिक संदर्भही मी लेखाच्या खाली अनुक्रमानुसार दिलेला आहे.

1. जॉर्डनमधल्या एका अभ्यासात लक्षात आले की वॅक्सीन न घेतलेल्या लोकांत मृत्युदर हा तब्बल ३२ टक्के इतका होता. लक्षात घ्या की WHO ने सांगितलेला कोविडचा जागतिक मृत्युदर हा 3.4% इतका आहे.

2. स्पेनमधल्या एका अभ्यासात कळले की ज्यांनी वॅक्सीन घेतले होते त्यांत प्रत्येकी एक लाख लोकांत ८ जणांना कोविडमुळे Myocarditis and pericarditis या हार्टच्या आजारांचा प्रादुर्भाव झाला. आणि ज्यांनी वॅक्सीन घेतले नाही अशा पेशंट्समध्ये एक लाखात ७० लोकांना प्रादुर्भाव झाला. म्हणजे जवळजवळ नऊ पट अधिक लोक वॅक्सीन न घेतल्यामुळे या आजारांनी ग्रासित झाले. 

3. आयर्लंडच्या एका अभ्यासात कळले की आयसीयूमध्ये दाखल केलेल्या कोविडच्या एकूण पेशंट्स पैकी ६२% हे एकही लस न घेतलेले होते. 

4. नॉर्वेमध्ये जवळजवळ १ लाख लोकांचा सर्वे केला असता लक्षात आले की कोविड पॉजिटीव्ह होऊन गेलेल्या पेशंट्समध्ये कोविडचे सामान्य लॉन्ग टर्म त्रास (३ ते १५ महीने) हे लस घेतलेल्या लोकांत आणि न घेतलेल्या लोकांत जवळजवळ सारखेच आहेत मात्र मेमरी प्रॉब्लेम हे लस न घेतलेल्या लोकांत काहीसे जास्त होते. 

5. युरोपच्या सहा देशांत वेगवेगळ्या करोना व्हेरिएंटवर केलेल्या अभ्यासानुसार लक्षात आले की लस घेतलेल्या लोकांपेक्षा लस न घेतलेल्या लोकांत पोस्ट कोविड आजारांचे प्रमाण खूप जास्त होते. 

6. तुर्कीच्या ऑलिम्पिक सेंटरमधल्या लस न मिळालेल्या अनेक एथलीटांचा अभ्यास केला असता लक्षात आले की त्यांना कोविडनंतर झालेले श्वसनाचे विकार अधिक तीव्र होते. काहींना दम्याचा सुद्धा त्रास होत होता. तसेच त्यांना त्यांची रेग्युलर प्रॅक्टिस सुरु करण्याइतके फिट होण्यासाठी लस घेतलेल्या एथलीटांपेक्षा खूपच जास्त काळ लागला. 

7. ग्रीसमध्ये केलेल्या एका अभ्यासात लक्षात आले की लस न घेतलेल्या २७ टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले, त्याउलट ३ डोस घेतलेल्या फक्त ५ टक्के लोकांना ऍडमिट करावे लागले. लस न घेतलेल्या १९% पेशंट्सला ऑक्सिजनवर ठेवावे लागले, त्या उलट लस घेतलेल्या फक्त ४% लोकांना ऑक्सिजनची गरज पडली. लसीचे तीन डोस घेतलेल्या एकाही पेशंटला आयसीयूत दाखल करावे लागले नाही वा एकाचाही मृत्यू झाला नाही. लस न घेतलेल्या लोकांत मात्र हे प्रमाण ४ टक्के इतके होते. 

8. इटलीतील शारीरिकदृष्ट्या अतिशय दुर्बल असलेल्या लोकांवर केलेल्या एका अभ्यासात लक्षात आले की अशा लोकांत लस घेतलेले आणि न घेतलेले यांच्यात मृत्युदरात फरक नव्हता, मात्र लस घेतलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याचे, ऑक्सिजन देण्याचे प्रमाण कमी होते. इतकेच नाही तर लस घेतलेले लोक हे लस न घेतलेल्यांपेक्षा खूप लवकर निगेटिव्ह होत होते. 

याव्यतिरिक्त अनेक दुर्मिळ किंवा विशिष्ट आजार झालेल्या लोकांत कोविड लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या लोकांचे अनेक अभ्यास आहेत. या सर्व अभ्यासांतही लस घेणारे लोक अधिक सुरक्षित होते हेच रिझल्ट आलेले आहेत. 

यावरून कोविडच्या लसीमुळे अनेक जीव वाचलेत आणि अनेक पोस्ट कोविड आजार सौम्य झालेत असेच लक्षात येते. अर्थात हा अगदीच अल्प डेटा आहे. पूर्ण डेटा मिळाला असता तर आपल्याला नक्कीच अजून स्पष्ट रिझल्ट्स मिळाले असते. मात्र पूर्ण डेटा मध्ये प्रॉब्लेम हा आहे सगळ्याच पेशंट्स चा लस घेण्या न घेण्याचा डेटा नोंद झालेला नाही. मला वाटते भारतात सुद्धा विशेषतः प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या लोकांचा असा डेटा बहुतांशी नोंदवूनही ठेवला नसेल. सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले असतील तरी ते खरेच आहे का याची शहानिशा करण्यात आली नसेल. असा डेटा आवर्जून आणि जपून ठेवण्याचे महत्व आपल्याला कळेल तेव्हाच आपल्याला आपल्या हेल्थ केअरच्या विविध योजनांचे परिणाम योग्य रीतीने कळू शकतील.


संदर्भ:
1. F. Mayyas et al. / Infection Prevention in Practice 5 (2023) 100278
2. Biomedicine & Pharmacotherapy 171 (2024) 116181
3. Vaccine 41 (2023) 2811–2815
4. International Journal of Infectious Diseases 126 (2023) 10–13
5. www.thelancet.com/oncology Vol 24 April 2023, 335
6. Respiratory Physiology & Neurobiology 308 (2023) 103983
7. Journal of Autoimmunity 131 (2022) 102846
8. International Journal of Infectious Diseases 131 (2023) 155–161

गुरुवार, २१ मार्च, २०२४

देवाची निर्मिती आणि कारण

अनेकदा जगभरात सापडणाऱ्या आदिमानवांच्या गुहांत विचित्रशी गुंफाचित्रे दिसून येतात. तीन डोक्यांचा प्राणी, गोल चेहऱ्यावर तोंड नाक काही नाही फक्त एक डोळा असलेला आणि खाली सापासारखे शरीर असलेला प्राणी अशी अनेक विचित्र भित्तिचित्रे अशा अनेक गुहांत बघायला मिळतात. आता तुम्ही रात्री हिस्ट्री चॅनल बघत असाल तर पहीली प्रतिक्रिया हीच असेल की आदिमानवाच्या काळात नक्कीच पृथ्वीवर एलियन येत असणार आणि म्हणूनच तर त्यांनी त्यांची भित्तिचित्रे गुफांत काढून ठेवली. जर त्यांनी तेव्हा असे एलियन पाहिलेच नसतील तर ते तशी चित्रे का काढतील? कुणालाही हा विचार बरोबरच वाटेल. आणि खरेच या अशा विचित्र चित्रांच्या पॉसिबल कारणांपैकी एलियन हेच कारण सकृतदर्शनी जास्त शक्य वाटते. 

चित्र : आदिमानवाच्या गुहेतील विचित्र आकाराचे एलियनचे वाटणारे चित्र 


कॅलिफोर्नियातील अशाच एका आदिमानवांच्या गुहेत एकदा छताच्या बाजूला एक ऑरगॅनिक फॉसिलसारखे काहीतरी सापडले. हे फंगस असणार असे आधी वैज्ञानिकांना वाटले. अनेक गुहांत असे वेगवेगळे फंगस सापडतच असतात. पण जेव्हा त्याचे स्ट्रक्चरल एनालिसिस केले तेव्हा लक्षात आले की ते फंगस नाहीय तर आता जसे तंबाखू खाऊन थुंकतात, तसे तेव्हाच्या मानवाने काहीतरी चावून ते गुहेच्या छतावर फेकले होते आणि ते तिथेच चिकटून राहिले होते. तो तसा चोथा फक्त आणि फक्त दातांनी चावल्यामुळेच बनत असतो. हे कळल्यानंतर मग पुढे त्याचे केमिकल एनालिसिस केले असता लक्षात आले की त्यात सायकेडेलिक (अंमली) पदार्थ होते. हा एका प्रकारच्या धोत्र्याच्या फुलाचा चावून टाकलेला चोथा होता. त्या गुहेत या धोत्र्याच्या फुलाचे चित्रदेखील काढलेले आहे. या फुलात सायकेडेलिक ड्रग्ज असतात. म्हणजे आजच्या भाषेत अंमली पदार्थ किंवा नशीले ड्रग्ज. हे ड्रग्ज खाल्ल्याने माणसाला भ्रम होऊ लागतात, चित्रविचित्र आकृत्या दिसू लागतात. अगदी अतर्क्य अशा जाणीवा होतात व विचित्रशी दृश्ये दिसू लागतात. सायकेडेलिक ड्रग्जच्या नशेमुळे या विचित्र भ्रामक अनुभवाबरोबरच सोबत एक भन्नाट अशी आनंदाची फीलिंग सुद्धा येते, म्हणून त्याचे व्यसन लागत असते. या गुहेतील धोत्र्याच्या फुलाव्यतिरिक्त ही अशी एलियनची वाटावीत अशी विचित्र चित्रे असणाऱ्या आदिमानवांच्या बहुतांश अतिप्राचीन गुहांत विशेषत्वाने मशरूम्सची देखील अनेक चित्रे चितारलेली सापडतात. आणि गंमत ही आहे की सायकडेलिक ड्रग्जचा म्हणजे नशील्या पदार्थांचा मशरूम हा देखील एक उत्तम नैसर्गिक सोर्स आहे. स्पेनमध्ये सापडलेल्या एका गुहेतील मानवी केसांचे एनालिसिस केले असता त्यातही ते ज्याचे केस होते त्या माणसाने भ्रम निर्माण करणारे ड्रग्ज घेतले असल्याचे आढळून आले. 

The mushrooms of Selva Pascuala in situ Photo courtesy of Juan Francisco Ruiz López

चित्र : आदिमानवाच्या गुहेतील मशरूम्सची चित्रे. या मशरूम्समधेही नशीले पदार्थ असतात

 

बहुदा ब्राझीलमधील एका आदिवासी जमातीत एका झाडाची मुळे आणि दुसऱ्या एका झाडाची पाने असे एकत्र चावून खातात. त्याने अशीच नशा होते आणि मेंदूत भ्रम निर्माण होतात. आता एका खाद्य नसलेल्या झाडाची मुळी कशाला लोक खातील? आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या एका रँडम झाडाची पाने (तीही खाद्य नाहीत) त्या मुळीसोबत खाल्ली तर  त्याने अशी नशा होईल हा शोध त्यांनी कसा लावला असेल कुणास ठाऊक. पण अगदी आदिमानवाच्या काळापासूनच सगळ्या जगभरातच सगळ्या काळांत मानवांकडून असे हॅल्यूशिनेशन्स म्हणजे भ्रम निर्माण करणारे ड्रग्ज घेतले जात होते याचे पुरावे सापडतात.
आफ्रिकेत अनेक आदिवासी जमातींत झाडांची मुळे वा इतर काही पदार्थ खाऊन मृत माणसांच्या विश्वात जायची परंपरा आहे. हे नशीले पदार्थ खाल्ल्यावर माणसे अनेक दिवसांपर्यंत स्वतःचे भान हरपून नशेत राहतात. पण ही नशा आहे अशी जाणीव नसल्याने ही नशा केलेली माणसे मृत माणसांच्या विश्वात जातात असे ते लोक मानतात. एशियामध्ये सुद्धा अनेक मानवी समूहांत अजूनही असे काहीतरी खाऊन मृत पूर्वजांच्या जगात जाता येते अशा मान्यता आहेत. भारतातही गांजा, धोत्रा हे अनेक धार्मिक कार्यांत वापरले जातात. भांग हा पदार्थ असाच एक सायकेडेलिक म्हणजे नशीला धार्मिक पदार्थ आहे. आजचे दारू, अफू वा LSD वगैरे सारखे ड्रग्ज हे त्याच आदिम नशेचे आधुनिक प्रकार आहेत. इतकेच नाही तर सोमरस जो आता विलुप्त झालाय तो सुद्धा एक वनस्पती बेस्ड सायकडेलिक पदार्थच असेल अशी अनेक अभ्यासकांना दाट शंका आहे.
तर देवाच्या रूपाचा जन्मसुद्धा अशाच सायकडेलिक ड्रग्जमुळे झाला असणार हे नक्की. नशा करून जे भ्रम होऊ लागले त्यात तीन डोकी असलेला देव, अर्धे प्राण्याचे अर्धे माणसाचे शरीर असलेला देव, आकाश आपल्या खांद्यावर उचलून पृथ्वीवर पडू न देणारा देव आणि अशा शेकडो अतर्क्य आकृत्या नशेत माणसाला दिसल्या असणार. यांपैकी ज्या आकृत्या आणि नशेतली एक प्रचंड आनंदाची अनुभूती हे एकत्र असत ते देव झाले आणि ज्या आकृत्या दिसल्या तेव्हा आनंदापेक्षा अधिक त्रास झाला त्या आकृत्या सैतान झाल्या. आपल्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि विचित्र दिसतेय याचा अर्थ लावण्यासाठी माणसाने हे कोणीतरी दिव्य व दुसऱ्या जगातील अलौकिक वा स्पेशल लोक आहेत अशी समजूत करून घेतली आणि त्यातूनच देव वा सैतान या कल्पना जन्माला आल्या. माणसाला वेळोवेळी पडलेले अनेक अतर्क्य आणि अनाकलनीय प्रश्न आणि त्याला नशेतून आलेली ही विचित्र मात्र सुखावह अनुभूती यातूनच देव संकल्पना जन्मली असणार यात वाद नाही. आणि आदिमानवच नाही तर काय घ्या सॅक्रेड गेम्समध्ये दाखवलेय तसे अनेक सो कॉल्ड बाबा लोक आजही आपल्या प्रसादांतून भक्तांना कोणतेतरी सायकडेलिक ड्रग्जच देत असणार व कदाचित त्यामुळेच भक्तांना परमानंदाची अनुभूती होत असेल. 

Your Brain On Magic Mushrooms | IFLScience

 चित्र : सायकेडेलिक ड्रग्जमुळे मेंदूवर परिणाम होऊन होणारे विचित्र आभास

 

मानवी मेंदू विचार करायला लागला तेव्हा ज्या गोष्टी अतर्क्य वाटतात त्यांचे उत्तर शोधण्यासाठी देव नावाचे एक सोपे उत्तर त्याला मिळाले. आजारी का झालो? देवाने केले. पाऊस का पडतो? देव पाडतो. मी का जन्माला आलो? तर देवाचा काही प्लॅन आहे. जग कसे अस्तित्वात आले? तर देवाने बनवले. अशा स्वरूपात अनेक अनाकलनीय प्रश्नांसाठी देव हे एक खोटे पण चपखल उत्तर माणसाला मिळाले. पण हा देव अस्तित्वात आहे तर दिसत का नाही? असा प्रश्न आल्यावर मग तो देव दिसण्याची अनुभूती घेण्यासाठी हे अनेको सायकेडेलिक ड्रग्ज वापरण्यात आले. कुणालाही हे ड्रग्ज घेतल्यावर जे चित्रविचित्र भ्रम निर्माण होत ते म्हणजे देवच आहे अशी त्यांची समजूत होत राहिली. सायकेडेलिक ड्रग्जमुळे जे अत्यंत आनंदाचे अद्भुत असे फिलिंग येते त्यामुळे इतका आनंद देणाऱ्या या विचित्र आकृत्या नक्कीच दिव्य लोक वा देव असणार अशी माणसांची खात्री पटली असणार. मात्र अशा प्रकारे पॉप्युलर झाल्यावर आणि त्यामुळे या ड्रग्जची मागणी वाढल्यावर पुढेपुढे त्या ड्रग्जच्या वनस्पती कमी पडू लागल्या असतील. आणि त्यानंतर मात्र या ड्रग्ज घेण्याला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी मग कधीही हे ड्रग्ज डायरेक्ट न घेता त्यासाठी काही ठराविक दिवस/ऋतू ठरवले गेले असणार. अजून त्याचा वापर मर्यादित करण्यासाठी अनेक प्रकारची अनुष्ठाने वगैरे बनविण्यात आली असणार. अनुष्ठान केल्याशिवाय हे ड्रग्ज (किंवा प्रसाद) घेणे देवाला आवडत नाही वगैरे अफवा पसरवण्यात आल्या. या सगळ्या अटी पूर्ण करणारे सुद्धा खूप लोक असतील मग सगळे जुळून आल्यावरही वनस्पती पासून ड्रग निर्माण करण्यापर्यंतचा वेळ घालवण्यासाठी प्रार्थना वगैरे आल्या. त्यानंतर या वनस्पतींची अधिकच कमतरता भासू लागल्यावर मग मात्र काही विशिष्ट लोकांनाच हे मिळेल अशी व्यवस्था आली. नंतर या सगळ्या नशेच्या अवडंबरात पुढे अजूनच श्रेष्ठत्व आणण्यासाठी पवित्रता किंवा दिव्यतेची भावना घुसडण्यात आली आणि आणि मग देव हळूहळू प्रस्थापित झाले. अर्थात यात सुरुवातीला तरी काही भामटेगिरी नसेल. नशा आणि त्यातून होणारे भास किंवा भ्रम या खऱ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत असेच लोकांना वाटत असणार. योग्य ज्ञानच नसल्याने हे केवळ आपल्या मेंदूचे खेळ आहेत अशी त्या लोकांना कल्पनाही आली नसेल. त्यामुळे या अनुभूतींसाठी जे देव संकल्पनेचे एक्सप्लेनेशन त्यांना समर्पक वाटत होते त्याहून वेगळी इतर काही शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.  

 Buy Trippy Tapestry Mushroom God Space Colorful UV Backdrop XL Dark  Tapestry Psychedelic Uv-reactive Fluorescent Wall Art Online in India - Etsy

चित्र : सायकेडेलिक्सच्या भ्रमांतून दिसणाऱ्या आकृत्या ज्यांना संभाव्य देव समजले गेले असेल

 

माणसांचा एक सामान्य गुण असा आहे की माणूस हा खूप लवकर फॉलोवर बनतो. 'सबमिशन टू ऑथॉरिटी' हा माणसाचा मोठा सद्गुण आणि दुर्गुणही आहे. जेव्हा ऑथॉरिटीने सांगितलेल्या गोष्टीची तार्कीक चिकित्सा करून ती पडताळून पाहून मगच स्वीकारली जाते तेव्हा तो सद्गुण होय, आणि जेव्हा तार्कीक चिकित्सा न करता परंपरा, संस्कृती, भीती, अज्ञान, दुराभिमान यांपोटी काही स्वीकारले जाते तेव्हा तो दुर्गुण होय. कुणीतरी ऑथॉरिटी सांगतेय म्हणजे ते स्वीकृत करायचेच ही सहज सामान्य मानवी प्रवृत्ती आहे. कधी ही ऑथॉरिटी एखादा नेता असतो, कधी देवाचा पुजारी, कधी धर्मगुरू, कधी गुरु, कधी सोशियल मीडिया इन्फ्लुएन्सर तर कधी एखादे पुस्तक.!! आपण संविधानाचे नियम पाळतो हेही सबमिशन टू ऑथॉरिटीच आहे. यात संविधान ही ऑथॉरिटी आहे. काहींसाठी ती गीता, बायबल, कुराण अशीही असू शकते. आणि आजही बहुतांश (अगदी पीएचडी वगैरेंपर्यंत शिकले सवरलेले लोकही) तार्कीक चिकित्सा न वापरता सर्रास सबमिटेड टू ऑथॉरिटी होतात. आणि त्यांची ही ऑथॉरिटी देव, धर्म अशी काहीही असू शकते.
पण खरे हे आहे की माणसाला पडणारे सगळे प्रश्न सुटण्याइतके ज्ञान त्याला अद्याप प्राप्त झाले नसल्यामुळे देव नावाची एक युनिव्हर्सल संकल्पना त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर म्हणून जुन्या काळी समोर आली. पुढे काळानुरूप देव आहे तर दिसत का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. मग देव दिसणे ही सर्वसामान्य नाही तर वैयक्तिक अनुभूती आहे अशी अट आली. आणि ही वैयक्तिक अनुभूती सायकेडेलिक ड्रग्जमुळे वेगवेगळे अतर्क्य (ज्याला दिव्य सुद्धा म्हणू शकतो) दृश्ये बघितल्यामुळे अजून ठाम झाली. जसे गणितातील सगळ्या व्हेरिएबल्सला जर झिरो ही किंमत दिली तर अंकांऐवजी फक्त व्हेरिएबल्स असणारी जवळजवळ सगळी इक्वेशन्स परफेक्टली सुटतात. मात्र ही इक्वेशन्स अशाप्रकारे परफेक्टली सुटत असली आणि तद्वत कोणत्याही इक्वेशनसाठी शून्य हे चपखल उत्तर ठरत असले तरी ते खरे उत्तर नसते. तसेच देव हे अनेक प्रश्नांवरचे एक सपशेल खोटे पण चपखल उत्तर होते म्हणून ते पॉप्युलरली एक्सेप्ट झाले. इतकेच नाही तर निर्बुद्धपणे त्यावरून इतरांच्या हत्या सुद्धा करण्याइतकी माणसे त्या उत्तराने मोहित झाली. सोबतीला या कल्पनेच्या दृढीकरणासाठी सायकेडेलिक्स होतेच. नंतर नंतर तर ज्यांनी हे सायकेडेलिक ड्रग्ज आयुष्यात कधीही घेतले नाहीत ते लोकही 'सबमिशन टू ऑथॉरिटी' या गुणामुळे इतरांच्या नशेतील भ्रमांचे अनुभव ऐकून देव या संकल्पनेला अगदी आजतागायत शिरोधार्यच मानून चालले आहेत.  
असो, एक खूप छान वाक्य आहे. त्यात देव, धर्म या सगळ्या कल्पनांचे परफेक्ट सार सांगितलेले आहे.
Believing in your own hallucinations is called insanity, and believing in someone else's hallucinations is called as religion.



माहीतीचे संदर्भ:

https://psychedelicspotlight.com/5-examples-of-ancient-psychedelic-cave-art/
 

https://www.businessinsider.in/science/news/ancient-humans-were-getting-high-on-hallucinogenic-drugs-during-cave-rituals-3000-years-ago-study-claims/articleshow/99321171.cms
 

https://bigthink.com/the-past/psychedelic-origins-mystical-rites-religion/ 

 

चित्र सोर्स :

https://www.aboriginal-bark-paintings.com/wp-content/uploads/2020/03/Arnhen-Land-Cave-painting.jpg 

https://i0.wp.com/www.mushroomthejournal.com/wp-content/uploads/2015/01/Selva-Pascuala_20110929mushroom_closeups_036.jpg?resize=650%2C433&ssl=1

https://www.imperial.ac.uk/news/image/mainnews2012/23110.jpg

https://i.etsystatic.com/18130733/r/il/94f8be/3777150921/il_570xN.3777150921_2b6z.jpg


..