धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.
पहिला मुद्दा: ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग (Dhangad) असे झाले आहे.
प्रतिवाद: धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D) असे लिहिले जाते. हा एक मोठाच जावईशोध म्हणावा लागेल. हे खरे आहे की इंग्रजीत 'र' आणि 'ड' यांचा बदल होतो, परंतु हा बदल नेहमी 'ड' चा 'र' असा होतो तो कधीही 'र' चा 'ड' होत नाही. (उदाहरणार्थ 'साडी' हा शब्द 'सारी' (Sari) असा होतो, 'अनाडी' हा शब्द 'अनारी' (Anari) असा होतो, परंतु नारी हा शब्द कधीही नाडी असा होत नाही, वारी हा शब्द कधीही वाडी असा होत नाही. धारवाड हे Dharwar लिहिता येऊ शकते मात्र कारवार हे कधीही Karwad (कारवाड) असे लिहिले जाऊ शकत नाही. अशी अनेको उदाहरणे देता येतील) मग जर इंग्रजीचे स्पेलिंग चुकले असेलच तर धनगड (Dhangad) चे धनगर (Dhangar) होऊ शकते मात्र कधीही धनगर (Dhangar) चे धनगड/ धांगड (Dhangad) असे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धनगर बांधवांचा दावा की 'धनगर'चे स्पेलिंग Dhangad असे लिहिले गेले आहे हा तांत्रिकदृष्ट्या देखील सपशेल फोल ठरतो. आणि म्हणूनच आपल्या धनगर बांधवांचे असे "र-ड-णे" हे हास्यास्पदच ठरते.
'र' च्या उच्चारणात येणाऱ्या दुर्बलतेला 'रॉटासिजम' असे म्हणतात. हा अनेक भाषांत आहे. आयरिश आणि स्कॉटिश भाषेत 'र' आणि 'न' यांचा बदल होतो. स्पॅनिश भाषेत 'र' चा उच्चार 'ट' असा होतो. म्हणजे इंग्रजांऐवजी स्पेनने भारतावर राज्य केले असते तर धनगरांच्या डोक्यात ही कल्पनाही आली नसती.
दुसरा मुद्दा : धनगर म्हणतात की त्यांस छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये धनवार (dhanwar) या नावाने आरक्षण मिळाले असून तेथील धनवार व महाराष्ट्रातील धनगर हे एकच आहेत.
प्रतिवाद : पहिल्या मुद्द्यात दावा केलेली Dhangad (धांगड) आणि छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील Dhanwar (धनवार) या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आहेत. धनगरांचा नेमका दावा 'धांगड' वर आहे की 'धनवार'वर आहे हे त्यांचे त्यांनाच पुरेसे स्पष्ट नाही. धनवार आणि धनगर या जातींत संस्कृती, चालीरीती, धार्मिक परंपरा, देवदैवते, भाषा, पेहराव यापैकी काहीही समान नाही. मग ते एक कसे ठरतील? आता धनगर बांधवांचा असा तर दावा नाही ना की इंग्रजीत g चा सुद्धा w होतो, कारण त्याशिवाय Dhangar चे Dhanwar होऊ शकत नाही.
२०१३ साली धनवार या जातीशी नामसाधर्म्य साधणारी दोन जातीनामे छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींत सामील करण्यास हिरवा कंदील मिळाला. ती दोन नावे धनुवार/धनुहार अशी आहेत. दोन्ही शब्दांत 'न' या अक्षरास उकार आहे, त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुद्धा धनगर अनुसूचित जमातींत येऊ शकत नाहीत. कारण धनगर या शब्दात उकार नाहीच. त्यामुळे त्यांत नामसाधर्म्य देखील आढळत नाही.
बहुदा आपले धनगर बांधव अनुसूचित जमातीची कलम ३४२ नुसार केलेली व्याख्याच वाचायला विसरले असावेत. त्यात स्पष्ट लिहिले आहे की अनुसूचित जमाती केवळ त्यांनाच म्हणता येईल की ज्यांत १) आदिम वैशिष्ट्ये असतील, २) त्यांची वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, ३) ते भौगोलिक दृष्ट्या पृथक असतील म्हणजेच त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश हा निश्चित आणि दुर्गम असेल, ४) ते इतर जमातींत मिसळण्यास कचरत असतील.
यापैकी मुद्धा २ म्हणजे वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही एक व्यापक व्याख्या आहे आणि भारतातील सर्वच जातींची आणि धर्मांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. (उदाहरणार्थ ब्राम्हण, जैन, पारसी, मुस्लिम, शीख या सगळ्यांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.) पण म्हणून याचा अर्थ असा नाही की ते सुद्धा अनुसूचित जमाती ठरण्यास पात्र आहेत.
मग बाकीचे मुद्दे पहिले तर असे लक्षात येते की धनगर या जातीत कोणतीही आदिम वैशिष्ट्ये नाहीत. ते भौगोलिक दृष्ट्या अजिबात पृथक नाहीत. (पृथक भौगोलिक क्षेत्र हे अनुसूचित जमातींचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.) उलट त्यांची वस्तीस्थाने ही नेहमी बदलत राहतात, त्यामुळे त्यांना मिळालेले भटक्या जमाती हे आरक्षणच योग्य आहे. धनगर दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत, त्यांचे वास्तव्य हे कायम नागरी वस्तींत असते. ते इतर जमातींत व्यवहारासाठी मिसळण्यास कचरत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धनगर हे अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.
धनगरांची मुद्रणदोषाच्या नावाखाली चाललेली मागणी ही काही नवी गोष्ट नाही.
सन १९९६ मध्ये अशाच प्रकारची एक केस बिहारमध्ये समोर आली होती. बिहारमध्ये Lohara/Lohra अशा नावाने अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेली एक जमात आहे. इंग्लिश मध्ये तीचे नाव योग्य रीतीने लिहिले गेले आहे, मात्र जेव्हा त्याचा हिंदीत अनुवाद केला गेला तेव्हा ते हिंदीत "लोहार" असे लिहिले गेले. त्यामुळे तेथील लोहार (blacksmith) या OBC जातीच्या लोकांनी या अनुवादानुरूप आपणांस ST चा दर्जा मिळावा म्हणून केस दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने अनेक पुस्तके, अहवाल यांचा अभ्यास करून निर्णय दिला की लोहार आणि लोहरा हे वेगवेगळे असून केवळ अनुवादात तशी नोंद झाली म्हणून लोहार हे ST ठरू शकत नाहीत.
अशाच प्रकारे महाराष्ट्रातही एक केस समोर आली होती. सन २००१ मध्ये मिलिंद शरद कोष्टी या विद्यार्थ्याने MBBS च्या एडमिशन साठी 'हलबा कोष्टी' ही जात म्हणजे महाराष्ट्रात अनुसूचित जमातींच्या यादीत १९ क्रमांकावर असलेल्या हलबा/हलबी या जमातीची उपजात असल्याचा दावा करून ST जातप्रमाणपत्र मिळविले होते. यावर त्या जातप्रमाणपत्राच्या अवैधतेचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले की अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांची १९५०च्या कायद्यात दर्शविलेल्या स्वरुपातील नोंद हीच ग्राह्य धरावी. आणि सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितले की एखाद्या जाती/जमातीने अथवा एखाद्या जाती/जमातीतील समुहाने, जर त्यांच्या जाती/जमातीचे नाव १९५० च्या यादीत अगदी स्पष्टपणे विनिर्दिष्ट (specifically mentioned) केलेले नसेल, तर आपण त्या यादीतील एखाद्या जातनामाशी साधर्म्य असणारी जमात आहोत असे म्हणणेसुद्धा निषिद्ध आहे.
Apex Court held that scheduled tribe or scheduled caste must be read as it is in the 1950 Order and it is not even permissible to say that a tribe, subtribe,part of or group of any tribe or tribal community is synonymous to the one mentioned in the Scheduled Tribes Order if they are not so specifically mentioned in it.
मग या न्यायाने धनगरांनी धांगड या जातीशी साधर्म्य असल्याचे सांगणे हे ही निषिद्ध ठरते. कारण १९५० च्या यादीत धनगर या जातीचे नाव ST मध्ये specifically mentioned केलेलेच नाही. उलटपक्षी तिथे Dhangad ही जमात म्हणजे उरांव या जमातीचाच भाग असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
धनगर नावाशी साधर्म्य असणाऱ्या भारतातील जाती आणि त्यांचे वर्गीकरण
खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे. इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे.
त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धांगड (Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धांगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उरांव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे.
मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धांगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत?
यादी खालीलप्रमाणे
Scheduled Tribes
State Sr. No Name
Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad
Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad
Maharashtra 36 Oraon, Dhangad
Scheduled Castes
Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor, Dharikar, Dharkar, Domra
Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi
Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi
Jharkhand 9. Dom, Dhangad
Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi
Uttar Pradesh 27. Dhangar
West Bengal 17. Dom, Dhangad
Uttaranchal 27. Dhangar
वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो.
पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगर अथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे.
१) छत्तीसगड २) दमन आणि दीव ३) दिल्ली ४) गोवा
५) गुजराथ ६) झारखंड ७) कर्नाटक ८) मध्य प्रदेश
९) महाराष्ट्र
वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT चा विशेष दर्जा दिला आहे. ती राज्ये पुढील प्रमाणे.
१) छत्तीसगड २) गुजराथ ३) मध्य प्रदेश ४) महाराष्ट्र
याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC चा दर्जा दिलेला आहे.
१) बिहार २) हरियाणा ३) हिमाचल प्रदेश ४) झारखंड
५) पंजाब ६) उत्तर प्रदेश ७) पश्चिम बंगाल ८) उत्तरांचल
एकाही राज्याने धनगर या जातीस ST चा दर्जा दिलेला नाही. खालील तीन राज्यांत धांगड (उरांव) या जमातीस ST चा दर्जा आहे.
१) छत्तीसगड २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र
या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे. धांगड या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान देण्यात आले आहे.
हे कुणाच्याही लक्षात येईल की धांगड या जमातीस या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धांगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही. धनगर चे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी.
NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED, NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES (MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA) यांचा REPORT VOLUME – I, Dated JUNE 30, 2008
या अहवालात Observations and Suggestions या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की,
5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is written as Dhangar, whereas in English it is written as Dhangara.
अनुसूचित जमाती आणि धनगर यांतील फरक
१) व्यवसाय:
अनुसूचित जमातींचा कोणताही वंशपरंपरागत अर्थार्जनाचा व्यवसाय नसतो. अगदी अलीकडच्या काळात ते स्थायी शेती करू लागले आहेत. मात्र धनगर हे वंशपरंपरेने पशुपालक आहेत. धनगरांकडे मेंढ्या, शेळ्या, म्हशी, घोडे असे मोठ्या भांडवली किंमतीचे पशु असतात. ते पशुआधारित दुधाचा व्यवसाय, लोकरीचा व्यवसाय, पशुमांस विकण्याचा व्यवसाय, सुत कातण्याचा व्यवसाय, शेळी मेंढी पालन हे व्यवसाय करून अर्थार्जन करतात. अनुसूचित जमातीचे लोक जे पशु पाळतात ते व्यवसाय म्हणून नव्हे तर वैयक्तिक उपयोगासाठी पाळतात. जसे शेतीसाठी बैल किंवा राखणीसाठी कुत्रा वगैरे. त्यामुळे आर्थिक मिळकतीसाठी पशु पाळणारे धनगर अनुसूचित जमाती या वर्गीकरणात बसत नाहीत.
२) भौगोलिक प्रदेश:
अनुसूचित जमातीचे निकष ठरविण्यासाठी संविधानाच्या ३४२व्या कलमात असे स्पष्ट लिहिले आहे की त्यांचा वास्तव्याचा प्रदेश हा पृथक असायला हवा (Geographical isolation). याचा अर्थ असा की अनुसूचित जमातीच्या लोकांचा वास्तव्याचा प्रदेश हा एका छोट्या भौगोलिक क्षेत्रातच सीमित असून, तो इतर नागरी वस्तीपासून पूर्णत: अलिप्त असतो. अनुसूचित जमातींच्या गावांत शक्यतो केवळ एकाच जमातीच्या माणसांची वस्ती असते.
याउलट धनगर हे नेहमी स्थलांतर करीत असल्याने त्यांचा कोणताही भौगोलिक प्रदेश निश्चित नाही. धनगरांची वसतिस्थाने ही वेगळी असली तरी ती पृथक/अलिप्त नसतात (non-isolated). त्यांची वस्ती ही नेहमी इतर नागरी वस्त्यांच्याच सान्निध्यात असते. मराठा आणि इतर उच्चवर्णीय जातींतच धनगर समाजाची वस्ती आहे, त्यामुळे त्या वस्त्या पृथक म्हणजेच isolated ठरत नाहीत. आणि भौगोलिक प्रदेशाचा पृथक (isolated) असणे हा सर्वात महत्वाचा निकष ते पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.
महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमातींचे भौगोलिक क्षेत्र हे काही जिल्ह्यांपुरातेच मर्यादित आहे, बहुतांश जमाती या वैयक्तिकरित्या प्रामुख्याने प्रत्येकी एक किंवा दोन जिल्ह्यांतीलच ठराविक दुर्गम अलिप्त, आणि पृथक भौगोलिक क्षेत्रांत वसलेल्या आहेत, त्याउलट धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे, त्यामुळे त्यांचा भौगोलिक प्रदेश हा पृथक (isolated) म्हणताच येऊ शकत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा काही पृथक (isolated) प्रदेश ठरू शकत नाही.
३) आर्थिक स्थिती
आर्थिक स्थितीचे अचूक आकडे मिळत नाहीत, मात्र काही सरकारी अथवा संशोधन संस्थांची प्रकाशित झालेली आकडेवारी ग्राह्य धरता येऊ शकते.
धनगरांच्या आर्थिक सुबत्तेविषयी माहिती देण्यासाठी एक संदर्भ देतो.
Indian Veterinary Research Institute, Izatnagar आणि Central Avian Research Institute, Izatnagar यांनी केलेला एका सामाजिक आर्थिक अभ्यासमालेचे निष्कर्ष सादर करतो. सदर निष्कर्ष हे Journal of Recent Advances in agriculture या अभ्यासपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. (पूर्ण संदर्भ पुढील प्रमाणे : Socio Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of Maharashtra, India, by Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and Singh D.P., in J. Rec. Adv. Agri. 2012, vol. 1(3): pages 84-91)
वरील अभ्यास निरीक्षणानुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत प्रत्येक धनगर कुटुंबाकडे सरासरी ६९.४८ इतक्या मेंढ्या, आणि २० इतक्या शेळ्या एवढी संपत्ती स्वत:च्या मालकीची होती, आणि ही एक दोन नव्हे तर परीक्षण केलेल्या प्रत्येक कुटुंबाची सरासरी आहे हे विशेष. याव्यतिरिक्त घोडे आणि म्हशी यांचीही उपलब्धता प्रत्येक कुटुंबाकडे उल्लेखनीय संख्येत आहे. याच अभ्यासमालेत असे निदर्शनास आले आहे की एकूण ७३% धनगर कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे ६०००० रुपयांहून अधिक होते. (म्हणजे दरमहा ५००० रुपयांहून अधिक) तर भूमिहीन लोकांची संख्या केवळ १४% होती.
याउलट STATISTICAL PROFILE OF SCHEDULED TRIBES IN INDIA 2010 या जनजातिय कार्य मंत्रालय भारत सरकार, (MINISTRY OF TRIBAL AFFAIRS) यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ५६.६% आदिवासी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. तर २००६-१० च्या दरम्यान करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ४० % हून अधिक आदिवासी लोकसंख्या भूमिहीन होती. या आर्थिक स्थितीच्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की सामाजिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या देखील धनगर हे अनुसूचित जमातींपेक्षा वेगळे आणि अधिक पुढारलेले आहेत,
४) ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक स्थिती
धनगरांचा इतिहास पाहिल्यास पुढील बाबी समोर येतात, विजयनगर साम्राज्याची स्थापना धनगरांनी केली होती. धनगरांनीच होयसाळ, होळकर, राष्ट्रकुट, मौर्य आणि पल्लव या इतिहासातील मोठ्या राजसत्ता स्थापन केल्या आहेत. प्रसिद्ध कवी कालिदास आणि कनकदास हेदेखील धनगर होते. थोडक्यात असे लक्षात येते की धनगरांनी इतिहासात राजसत्ता उपभोगल्या असून, त्यांची सामाजिक स्थिती देखील उत्कर्षाची राहिली आहे. (संदर्भ: http://www.dhangar.org/)
त्याउलट आदिवासी जमातींचा इतिहास पाहिला तर अगदी थेट महाभारतीय काळातही उपेक्षित असलेल्या एकलव्याच्या उदाहरणावरून त्यांच्या ऐतिहासिक दुर्लक्षित, उपेक्षित आणि पृथक सामाजिक परिस्थितीची कल्पना येते.
आणि म्हणूनच धनगर हे अनुसूचित जमातींपासून पूर्णत: वेगळे ठरतात.
फसव्या मार्गाने ST प्रमाणपत्र मिळवणे हा गुन्हा
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला (जारी करणे व पडताळणी नियमन) कायदा २०००, कलम ११-१(अ)नुसार, जो कोणी खोटी माहिती देऊन किंवा खोटे विधान किंवा दस्तऐवज किंवा कोणत्याही इतर फसवणुकीच्या मार्गाने (other fraudulent means) खोटे प्रमाणपत्र प्राप्त करील, तो कमीत कमी सहा महिने ते दोन वर्षे कठोर कारावास अथवा दोन हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांस पात्र राहील.
(According to the THE MAHARASHTRA SCHEDULED CASTES, SCHEDULED TRIBES, DE-NOTIFIED TRIBES (VIMUKKTA JATIS), NOMADIC TRIBES, OTHER BACKWORD CLASSES AND SPECIAL BACKWARD CATEGORY (REGULATION OF ISSUANCE AND VERIFICATION OF)) CASTE CERTIFICATE ACT 2000, Section 11-1(a), Whoever obtains a false certificate by furnishing false information or filling false statement or documents or by any other fraudulent means, shall on conviction be punished with rigourous imprisonment for a term which shall not be less than six months but which may extend upto two years or with fine which shall not be less than two thousand rupees, but which may extend upto twenty thousand rupees or both.)
वरील कायद्यानुसार फसवणुकीच्या मार्गाने (by other fraudulent means) धनगर बांधव अनुसूचित जमातीचे आरक्षणाचा फायदा मिळवू पाहत आहेत. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांचेवर कदाचित केस करता येऊ शकते. मात्र याच कायद्याच्या कलम ११(२) नुसार थेट कोर्टात केस दाखल करता येत नाही. अशी केस फक्त एखादी चौकशी समिती अथवा सदर समितीने नियुक्त केलेला एखादा अधिकारी हाच करू शकतो. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल अशा प्रकारे केस करता येईल काय याचा कायदेतज्ञांशी मसलत करून विचार करता येईल. तसेच अशाच स्वरूपाच्या इतर कायद्यांतील कलमांनुसार काही गुन्हे दाखल करता येतील का हेदेखील कायदेतज्ञांशी विमर्श करून ठरवता येईल.
आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तेव्हा केवळ धनगर बांधवांची मागणी ही चुकीची कशी आहे हे दाखवून देण्याचा बचावात्मक पवित्रा न घेता कायद्याच्या चौकटीतून अशा प्रकारे आक्रमकतेने हा लढा लढला पाहिजे.
..