हा ब्लॉग शोधा

शनिवार, २९ जून, २०२४

मला नाही येत😄


तुला येतं छान वाचणं, लिहिणं मला नाही येत
भावनांना शब्द देऊन वाहणं, मला नाही येत

कितीदा मोहरता येतं कितीदा बहरता येतं
पण तुझ्या बागेतलं फुल होणं, मला नाही येत

युगांतरांचे योग असतात भेटीगाठींचे
तुला येतं न येणं, मला नाही येत

तुला भजता भजता स्वतःचाच न राहिलो
तुझं असूनही तुझं होणं, मला नाही येत

वादळांतही राहू शकतो मी अगदी ठाम उभा
पण तू जाताना स्वतःला सावरणं, मला नाही येत

आनंदाच्या यात्रेवर चालतोच आहे कधीचा
मुक्कामाचं गाव गाठणं, मला नाही येत

जगाला ओरडून सांगतो, सगळं येतं मला
पण तुला माहीत आहे, मला नाही येत



..

शुक्रवार, २८ जून, २०२४

दोहरा

आँखो पे फिर नींद का पहरा नहीं देखा

जबसे हमने वो एक चेहरा नहीं देखा


जिंदगी को देखता हूँ तो एक दौड़ है बस

किसी मुसाफ़िर को यहाँ ठहरा नही देखा


इन आँखों में उतरने से पहले सोच लेना

मैंने कोई दरिया इतना गहरा नहीं देखा


हमारी कोई भी दुआ कभी कुबूल नही हुई

हमने खुदा से बड़ा कोई बहरा नही देखा


हर चाल, हर बाजी अपनी नाकाम ही रही

हमने खुद से कमज़र्फ कोई मोहरा नही देखा


तब धुँआ कर दिया अपने सारे ख़्वाबोंको

जब उन्होने कहा हमने कोहरा नही देखा


परिंदोंने बचपन का घोंसला क्या छोड़ दिया

बूढ़ी शाख को फिर किसीने हरा नही देखा


किसीने कहा अपने अंदर के रावण को जलाओ

फिर एक भी दिन न गुजरा कि दशहरा नही देखा


दिल मे कुछ और रखते हो, जुबाँ पे कुछ और

राहुल हमने कोई इंसाँ तुमसा दोहरा नही देखा



..

बुधवार, २६ जून, २०२४

थँक यू मेकॉले

थँक यू मेकॉले

ब्रिटिश पार्लमेंटने भारतीयांच्या (आणि त्यांच्या सर्व वसाहतींच्या) शिक्षणासाठी 1813 मध्ये एक कायदा बनवला होता आणि 1830ला मेकॉले यांच्याकडे त्यात सुधारणा सुचविण्यासाठी प्रस्ताव दिला होता.
त्याला मेकॉलेने भारतात 4 वर्षे अभ्यास करून जे उत्तर दिले ते मेकॉलेचा खलिता या नावाने प्रसिद्ध आहे व त्याच्या त्या खलीत्यातील शिफारशींमुळेच भारताच्या आधुनिक शिक्षणाचा पाया रचला गेला हे म्हणण्यास काही हरकत नाही. 
मला माहीत आहे आपणा बहुतांशांपैकी मेकॉलेचा हा खलिता कुणी वाचलेला नसतो पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्ञानावर भरोसा ठेवून मेकॉले कसा चुकीचा होता हे मात्र आवर्जून कधी न कधी बोललेले असते. म्हणून मी मेकॉले त्यात नेमके काय म्हणतो ते थोडक्यात सांगतो.

तेव्हाच्या इंग्रजांच्या शिक्षण धोरणाचे उद्दिष्ट होते 'साहित्याची समीक्षा आणि प्रसार तसेच शिक्षित भारतीयांना प्रोत्साहन'. मेकॉलेचा यातील संज्ञांवर आक्षेप होता. साहीत्य म्हणजे काय? अरबी आणि संस्कृत भाषेतील साहीत्य? आणि शिक्षित लोक म्हणजे कोण? ज्यांना न्यूटनच्या फिजिक्ससारखे आधुनिक विज्ञानाचे शिक्षण मिळाले आहे ते, की हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या ग्रंथांचे शिक्षण मिळाले आहे ते? इंग्रजांना दुसरा अर्थ अपेक्षित होता पण मेकॉलेचा त्याला विरोध होता.
मेकॉले म्हणतो की मागील अधिकाऱ्यांचा अहवाल आहे की जे लाखो रुपये ब्रिटिश सरकारने शिक्षणाच्या बजेटसाठी मंजूर केले आहेत ते जर अरबी आणि संस्कृतमधल्या साहित्याच्या अभ्यासासाठी खर्च केले नाहीत तर लोकांच्या भावना दुखावतील. पण मी म्हणतो की भावना तर कुणाच्याही कशानेही दुखू शकतात. पण आपण ठरवायला हवे की योग्य काय आहे. हा भारतीय लोकांच्या हक्काचा पैसा आहे जो खऱ्या अर्थाने त्यांच्या भल्यासाठीच खर्च व्हायला हवा. 
पूर्वी युरोपात देवीच्या रोगासाठी त्या पुरळातील पू निरोगी लोकांना लावून त्यांचे रक्षण करण्याची पारंपरिक पद्धत होती. पण त्यात खूप लोक मरत असत. मात्र आता जेन्नरने शोधलेल्या लसीनंतर जर आपण ती धोकादायक पारंपरिक पद्धत टाळून नवी सुरक्षित लसीकरण पद्धत अवलंबली तर परंपरा मोडली म्हणून लोकांची भावना जरूर दुखेल. पण म्हणून काय आपण लोकांच्या कल्याणाची जी खरी योग्य पद्धत आहे ती स्वीकारायची नाही?
मी तर म्हणतो की ब्रिटिश सरकारने सगळ्याच वायफळ गोष्टींवरील खर्च ताबडतोब थांबवावा. मग तो मैसूरमध्ये वाघांच्या शिकारीसाठी देण्याचे बक्षीस असो की चर्चमध्ये प्रार्थना गाणारांना देण्याचे अनुदान असो. सरकारने हे सगळे त्वरीत थांबवले पाहीजे (लक्षात घ्या मेकॉलेने चर्चचे अनुदान सुद्धा थांबवायला सांगितले आहे).
सरकारकडे आता एक शैक्षणिक फंड उपलब्ध आहे जो भारत देशातील लोकांच्या बौद्धिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी खर्च करणे आवश्यक आहे. मग त्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठीचा सर्वोत्तम मार्ग कोणता असेल?
भारतात हजारो बोलीभाषा बोलल्या जातात मात्र त्यांच्यात कुठलेही लिखित साहित्य अथवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन हे लिखित स्वरूपात नाही. वरून या प्रत्येक प्रांतागणिक बोलल्या जाणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या बोलीभाषा अशा स्थितीत नाहीत की त्यांच्यात सायंटिफिक ज्ञान हे ट्रान्सलेट करून छापता येईल (आजही अगदी हिंदी मराठी सारख्या मोठ्या भाषांतही कित्येक टेक्निकल शब्दांसाठी सोपे पर्याय नाहीत. त्यामुळे जेव्हा बहुतांश भाषांत काहीही लिखित नव्हते त्याकाळी मेकॉले काही चुकीचे बोलत नव्हता). मी हे मान्य करतो की लोकांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणे अधिक चांगले असते. पण त्यासाठी तशी एक भाषाही सुयोग्य माध्यम म्हणून उपलब्ध असणे गरजेचे आहे. भारताच्या हजारो बोलीभाषांत तरी ती सध्या क्षमता नाही. त्यामुळे मग आता भारतात शिक्षणाचे माध्यम म्हणून फक्त 3 पर्याय शिल्लक राहतात. अरबी भाषा, संस्कृत आणि इंग्लिश.

(इथून पुढेच येते मेकॉलेला सर्वाधिक शिव्या खाऊ घालणारे त्याचे विवादित वक्तव्य). मेकॉले म्हणतो की शिक्षण कमिटीच्या अर्ध्या मेंबर्सचे म्हणणे आहे की शिक्षण इंग्रजीत द्यायला हवे, मात्र बाकी अर्ध्यांचे म्हणणे आहे की शिक्षण अरबी आणि संस्कृतमध्ये दिले पाहीजे. मला अरबी अथवा संस्कृत या दोन्ही भाषा येत नाहीत. मात्र मी या भाषांतुन अनुवादित झालेले खूपसे साहीत्य वाचले आहे. मी या भाषांच्या अनेक तज्ञांशीही बोललो आहे. सगळ्यांचे म्हणणे हेच आहे की अरबी आणि संस्कृत या दोन्ही भाषा आधुनिक सायंटिफिक ज्ञान देण्याच्या दृष्टीने पुरेशा सक्षम नाहीत. या भाषांत कुठल्याही प्रकारच्या ज्ञानदायी (वैज्ञानिक) साहित्याचा अभाव आहे. मला भेटलेल्या सर्व अरबी आणि संस्कृत भाषा तज्ज्ञांनी त्यामुळे हेही मान्य केले आहे की युरोपातील कोणत्याही एखाद्या नावाजलेल्या लायब्ररीतील एका शेल्फवरील पुस्तकांचे मोल हे या दोन्ही भाषांतील तमाम साहित्याच्या मोलापेक्षा अधिक भरेल.
हे वाक्य वाचून कुणालाही अपमान वाटणे साहजिक आहे. पण आपण आपल्या भावना आणि अभिमान बाजूला ठेवून त्रयस्थपणे वैज्ञानिक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहीले तर ते अतिशयोक्तीचे असले तरी बहुतांशी खरे नाही का? युरोपातील कशाला, आज पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या जयकर लायब्ररीतील कोणत्याही सायन्सच्या शेल्फवर जिथे 20 पुस्तके असतील, त्यांतील ज्ञान मॅच करायला तुम्ही मला भारतातील अरबी आणि संस्कृतमधल्या 20 पुस्तकांची वा ग्रंथांची नावे सांगू शकता का? नाही सांगू शकणार. अर्थात असे काही ग्रंथ भारतात नक्कीच आहेत जे आर्यभट्ट, वराहमिहीर यांसारख्या श्रेष्ठ वैज्ञानिक ऋषींच्या तत्वांचे पुरस्कार करतात, पण ते आहेत किती? चार किंवा पाच. आणि त्यातही हे ग्रंथ पूर्णपणे फक्त वैज्ञानिक सिद्धांतावर नाहीत तर त्यात अनेक साहित्यिक विषय सुद्धा अंतर्भूत आहेत. इतकेच नाही तर त्यांतील अनेक वैज्ञानिक सिद्धांत सुद्धा आजच्या मानाने तितकेसे ऍक्युरेट नाहीत. त्यामुळे शोधून शोधून 10 ग्रंथ आपण मिळवले तरी त्यांतील खरे सायंटिफिक व्हॅल्यू असलेले टेक्स्ट हे आजही पुण्याच्या जयकर लायब्ररीतील एका शेल्फवरील विज्ञानाच्या पुस्तकांतील ज्ञानाच्या मुल्याशी मॅच करू शकणार नाही हे दुर्दैवाने खरेच नाही का? मग मेकॉलेचे काय चुकले?

पुढे मेकॉले हेही म्हणतो की जर आपण युरोपियन काव्य आणि अरबी व संस्कृत काव्य यांची तुलना केली तर दोन्हींत कोणते श्रेष्ठ यावर तज्ज्ञांचे एकमत होणार नाही दोन्ही तुल्यबळ आहेत. (म्हणजे मेकॉले या दोन भारतीय भाषांना सरळसरळ टाकाऊ म्हणत नाहीय तर त्यातील काव्याचे श्रेष्ठत्व आणि मूल्य हे तो इन डायरेक्टली मान्य करतो हे लक्षात घेतले पाहीजे)
मात्र जेव्हा आपण कल्पनांच्या विश्वातून (काव्य) निघून अधिकाधिक अशा साहित्याकडे येतो ज्यात वैज्ञानिक तथ्ये योग्य रीतीने नोंदवलेली आहेत आणि ज्यात प्राप्त माहीतीची योग्य चिकित्सा आणि सखोल व पद्धतशीर अभ्यास केलेला आहे, त्या क्षेत्रात मात्र या दोन भारतीय भाषा युरोपियन भाषांपुढे टिकाव धरू शकत नाहीत.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांत इतिहास आणि तत्वज्ञान यांची उज्ज्वल परंपरा होती. पण साधा भारतीयांचा इतिहाससुद्धा संस्कृत भाषेत अशा सुत्रबद्ध रीतीने लिखित स्वरूपात उपलब्ध नाही जसा की इंग्लंडमधल्या छोट्या मुलांच्या शाळेच्या पुस्तकांत असतो. (हेही दुर्दैवाने खरे आहे कारण भारतीयांना काहीही लिहून/नोंदवून न ठेवण्याची वाईट सवय आहे हे तर इंग्रजांच्या दीड हजार वर्षांपूर्वी आलेल्या मेगास्थेनसने सुद्धा लिहून ठेवलेले आहे. आपले पूर्वज काहीच नोंदवून ठेवत नव्हते म्हणून तर आपल्याला आपला इतिहास या बाहेरच्या प्रवाशांच्या प्रवासवर्णनातून शोधावा लागतो).
त्यामुळे हे नक्की आहे की भारतीयांना जर आधुनिक वैज्ञानिक ज्ञान द्यायचे असेल तर त्यांना ते अरबी वा संस्कृत ऐवजी दुसऱ्या परकीय भाषेतूनच द्यावे लागेल. 
मग पुढे मेकॉले याकामी समस्त परकीय भाषांपैकी इंग्लिश कशी योग्य आहे ते सांगतो. इंग्रजीतील विज्ञान, कायदा, इतिहास आणि इतर माहीती जी इंग्रजांनी 300 वर्षांत जगभरातून मिळवून संकलित करून ठेवली आहे तेवढी अन्य कोणत्याही भाषेत नाही. वरून भारतातील रुलिंग क्लास(राजे राजवाडे वा अधिकारी) हा इंग्रजीतच बोलतो त्यामुळे लवकरच सामान्य लोकही इंग्रजीत बोलू लागतील म्हणून इंग्रजी हीच भाषा भारतात शिक्षणाचे माध्यम म्हणून योग्य आहे.
तो पुढे हेही खोचकपणे विचारतो की अरबी व संस्कृत भाषांत असे काय साहीत्य आहे जे सर्वांना शिकवले जायला हवे? यांच्या पुस्तकांत ग्रहांची दशा पूजेने बदलणारी अस्ट्रोनॉमी आहे ती शिकवायची? की यांच्या ग्रंथांत 30-30 फूट उंचीचे राजे होते आणि त्यांनी तीस तीस हजार वर्षे राज्य केले असे लिहिले आहे ते इतिहास म्हणून शिकवायचे? की जगात दुधातुपाचे समुद्र (क्षीरसागर?) आहेत हे जॉग्राफीमध्ये शिकवायचे?

मेकॉले म्हणतो की पाचव्या आणि सहाव्या शतकात आपण इंग्रजसुद्धा आजच्या भारतीयांसारखेच होतो. तेव्हा जगातले सगळे चांगले ज्ञान हे लॅटिन आणि ग्रीक भाषेत उपलब्ध होते. तेव्हा जर आपल्या पूर्वजांनी स्वतःच्याच भाषांचा आग्रह धरला असता तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊन पुढे आपली प्रगती होऊ शकली असती का? आज भारतीयांची तीच स्थिती आहे जी पाचव्या शतकात आपली होती. आपण या परक्या भाषा शिकलो म्हणून आपल्याला ज्ञानाची कवाडे खुली झाली. मग आज आपण भारतीयांसाठीही ज्ञानची कवाडे तशीच खुली करायला नको का? इंग्रजी व्यतिरिक्त आज कोणत्या भाषेत ज्ञानसाहित्य इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे?
मेकॉले पुढे रशियाचेही उदाहरण देतो. तो म्हणतो की आपल्या आजोबांच्या काळी रशिया हा पंजाबपेक्षा मागास होता. पण रशियाने युरोपियन भाषा आणि त्यातील ज्ञान स्वीकारले. रशिया उगाच स्वतःच्या भाषेचा आग्रह धरून आणि आपल्या लोकसाहित्यातील परिकथाच आम्ही शिकू हा आग्रह धरून बसला नाही. त्यामुळे आता अशी स्थिती आहे की आपल्या आजोबांच्या काळात मागास असलेला रशिया हा आपल्या नातवांच्या काळात सर्वात प्रगत अशा कोणत्याही युरोपियन देशाइतका सक्षम म्हणून उदयास येईल. मग आपण भारतीयांना देखील ती संधी का देऊ नये?

मेकॉले पुढे सांगतो की आज भारतात लोकांना अरबी आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी आपल्याला अनुदान द्यावे लागते. उलट इंग्रजी शिकण्यासाठी लोक स्वतःहून पैसे खर्च करायला तयार आहेत. तो एका मदरशाचे उदाहरण देतो की एका मदरशात 77 विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी सरकारला महिन्याला 500 रुपये द्यावे लागतात. त्याउलट इंग्लिश शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 3 महिन्यात सरकारलाच 103 रुपये प्राप्त झाले आहेत. मला कळले आहे की भारतातील विद्यार्थी हे त्यांच्या भाषेवरील प्रेमापायी नव्हे तर अनुदान मिळते म्हणून त्या भाषा शिकतात. त्यांची या भाषा शिकण्याची खरेच मनापासून इच्छा नसते.
त्यानंतर मेकॉले काही संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांची केस मांडतो की हे विद्यार्थी सरकारचे अनुदान घेऊन 12 वर्षे संस्कृत शिकले. त्यांच्याकडे संस्कृत प्राविण्याच्या डिग्री सुद्धा आहेत, पण त्या डिग्री बघून त्यांना कुणीही नोकरी देत नाही. कारण संस्कृतचे ज्ञान व्यवहारात काही उपयोगाचे नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी सरकारला विनंती केली आहे की तुमच्या आग्रहामुळे आम्ही संस्कृत शिकण्यासाठी आमचे आयुष्य खर्च केले पण आता आम्हाला कुठेही काम मिळत नाही त्यामुळे सरकारनेच आम्हाला कोणतीही छोटीमोठी नोकरी मिळवून द्यावी वा आयुष्यभर काही अनुदान देत रहावे.
म्हणजे आपल्या जुन्या अरबी आणि संस्कृत साहीत्य शिकविण्याच्या आणि त्यासाठी अगदी अनुदान ही देण्याच्या पॉलिसीमुळे आपण अशी कमावण्यायोग्य नसणाऱ्या पण धार्मिक शिक्षणात ऐन उमेदीचे आयुष्य वाया गेलेल्या लोकांची फौज उभी करत आहोत. आपण आपले धोरण बदलले नाही तर भारतीय नेहमीच खऱ्या ज्ञानापासून वंचित राहतील. ते कधीही सत्य आणि विज्ञानाचे विद्वान बनू शकणार नाही. आपण त्यांना आधुनिक ज्ञान विज्ञानापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करत आहोत.
जुन्या शिक्षण कमिटीने 1 लाख रुपये खर्च करून अरबी आणि संस्कृत पुस्तके छापली. पण ती पुस्तके कोणीही खरेदी करायला तयार नाही. तीन वर्षात ही पुस्तके छापून सरकार 1000 रुपयांचीही विक्री करू शकले नाहीय. त्याउलट स्कुल बुक सोसायटी ही संस्था दरवर्षी 7 ते 8 हजार इंग्रजी पुस्तके छापून विकते, ज्यायोगे त्यांचा प्रिंटिंग खर्च तर निघतोच, आणि वरून 20 टक्के नफा सुद्धा कमावला जातो.

मेकॉले हेही आवर्जून सांगतो की आपण कधीही अशा लोकांना अजिबात समर्थन देता कामा नये जे इथल्या लोकांना धर्मांतर करवून ख्रिश्चन बनवत आहेत. पण त्याचबरोबर आपण इथल्या लोकांना अनुदानाची लाच देऊन संस्कृत आणि अरबी शिकवणे ही बंद केले पाहीजे. जे अवैधानिक आहे ते काहीही वा कुणाच्याही बाबतीत असो, थांबवलेच गेले पाहीजे.
पौर्वात्य (अरबी आणि संस्कृत) भाषांचे समर्थक म्हणतात की भारतीय लोक इंग्लिश शिकू शकणार नाहीत आणि केवळ तोडकीमोडकी इंग्रजी शिकण्यापर्यंतच पोचू शकतील, म्हणून त्यांना इंग्रजी शिकवू नये. मात्र मेकॉले म्हणतो की हे खरं नाही. तो सांगतो की या शहरातच मी अनेक इंग्रजीवर कमांड असलेले हिंदू पाहीले आहेत. इतकेच नाही तर मी ठामपणे सांगू शकतो की काही हिंदूंचे इंग्रजीवर इतके प्रभुत्व आहे की कोणत्याही इतर फॉरेनरपेक्षा ते वरचढ ठरतील. माझ्या एका प्रस्तावावर इंग्रजीत मत नोंदविणाऱ्या एका हिंदूंची इंग्लिश आणि ज्ञानाची पातळी ही सरकारच्या या शिक्षण विभागाच्या कमिटीतील कोणत्याही तज्ञापेक्षा थोडीही कमी नव्हती.

आता पुढे येते मेकॉलेचे दुसरे सर्वात विवादित वक्तव्य.
मेकॉले म्हणतो की मी पौर्वात्य शिक्षणाचे आग्रही असणाऱ्या लोकांशी एका बाबतीत सहमत होऊ शकतो की आपण या प्रचंड मोठ्या देशाच्या प्रचंड मोठ्या जनसंख्येला चुटकीसरशी इंग्रजीत प्रवीण करू शकत नाही. पण म्हणून आपण सुरुवात करायचीच नाही का? किमान आपण आता आपल्या लिमिटेड फंडाने एवढी तर सुरुवात करू शकतो ना की जेणेकरून भारतात एक असा वर्ग तयार होईल जो की रंग आणि रक्ताने तर भारतीय असेल मात्र हा वर्ग अभिरुची (taste), जाणीवा (opinion), तत्वे (morals) आणि बुद्धिमत्ता (intellect) यांनी इंग्रजांच्या तुल्यबळ असेल (किंवा इंग्रज असेल).
याही वाक्यावर खरेतर आक्षेप घेणे तितकेसे बरोबर नाही. इंग्रज असणे म्हणजे श्रेष्ठ असणे असे मेकॉलेला म्हणायचे आहे. ज्याला आपण आज नक्कीच रेसिस्ट म्हणू शकतो, पण त्याकाळी किमान मेकॉलेने हे रेसिस्ट भावनेने म्हंटले असेल असे वाटत नाही. म्हणजे अरबी आणि संस्कृत साहित्याला जे त्याने कमी दर्जाचे म्हंटले आहे तेही त्याने त्यांच्या वैज्ञानिक मूल्यावरून म्हंटले आहे ना की रेसिस्ट भावनेतून, असे मलातरी वाटते. अजून असे आहे की मेकॉलेनेच भारतीय लोक आणि इंग्रज यांना कायद्यापुढे समान पातळीवर आणले याचेही त्याला श्रेय दिले जाते. नाहीतर त्यापूर्वी एकाच गुन्ह्यासाठी इंग्रजांना वेगळी (सौम्य) आणि भारतीयांना वेगळी (कडक) सजा होती. मेकॉले धर्मद्वेषी सुद्धा नव्हता. नाहीतर चर्चला अनुदान देऊ नका अथवा भारतीयांच्या ख्रिस्ती धर्मात धर्मांतराला समर्थन करू नका असे तो सरकारला म्हंटला नसता. उलट आपण भारतीयांचा एक आपल्याच लेव्हलचा क्लास तयार करू असे तो म्हणतो. (आपल्यासाठी कारकुनी करणारा क्लास तयार करू असे तो म्हंटलेला नाही, ती शुद्ध अफवा आहे). 
पुढे तो सांगतो की एकदा असा एक वर्ग तयार झाला की मग बाकीच्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी आपण या वर्गावर सोपवू शकतो. मग या लोकांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञान त्यांच्यात्यांच्या स्थानिक भाषेत अनुवादित करून शिकवले तरी हरकत नाही. त्यांना जे योग्य आणि सोपे वाटेल तसे ते करतील जेणेकरून सगळ्या भारतीयांना खरे ज्ञान मिळेल.
म्हणून आपण आता संस्कृत आणि अरबी भाषांच्या शिक्षणासाठी अनुदान देणे बंद केले पाहीजे. फक्त बनारसमध्ये एक संस्कृत कॉलेज आणि दिल्लीत एक अरबी मदरसा यांना वगळता कोणालाही अनुदान देण्यात येऊ नये. या फंडातून देशातील प्रमुख शहरांत इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा उघडण्यात याव्यात. आणि लोकांना अनुदानाची लालूच दाखवून एखादे (अरबी/संस्कृत) शिक्षण देण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या मर्जीने शिक्षण आणि माध्यम निवडू द्यावे.

शेवटी मेकॉले म्हणतो की जर ब्रिटिश क्राऊन माझ्या या प्रस्तावाला राजी नसेल तर मला त्यांनी समितीतून काढून टाकावे. इंग्रज सरकारची सध्या लागू असलेली जुनी शिक्षण पद्धती ही भारतीय समाजाची सत्याकडे (truth) होणारी वाटचाल वेगवान करण्याऐवजी फक्त या समाजाचा पाखंडाच्या जोखडांमुळे होऊ घातलेल्या मृत्यूकडचा प्रवास लांबविण्याचा प्रयत्न करत आहे (delay the natural death of expiring errors).
जर आपण मी सुचवलेली सुधारणा करणार नसू तर मग आपल्याला शिक्षण विभाग म्हणवून घेण्याचा काही नैतिक अधिकार नाही. मग आपल्याला केवळ सरकारी पैसा वाया घालवणारा विभाग असे म्हंटलेलेच योग्य राहील. सरकारी अनुदानाचे लालूच दाखवून निरुपयोगी पदवीधरांची सद्दी वाढविण्यापेक्षा योग्य ज्ञान देऊन सक्षम भारतीय नागरिक घडवले जावोत हीच माझी अपेक्षा आहे.

खरेच मेकॉलेने इतक्या परखड भाषेत हे मिनिट्स लिहीले नसते आणि येऊ दे रे माझ्या मागल्या ही भूमिका घेऊन संस्कृत आणि अरबी धार्मिक शिक्षण देण्याची जुनी इंग्रज पॉलिसी कायम ठेवली असती तर भारतीय समाजाला स्वातंत्र्य, समानता, लोकशाही, कायद्याचे राज्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान, विज्ञान या गोष्टी कितीतरी काळ समजल्याच नसत्या. आजही कित्येक आफ्रिकन देशांत हे विचार आणि संकल्पना रुजलेल्या नाहीत. मेकॉलेमुळे त्या भारतीयांना कळल्या, आणि ज्या भारतीयांनी इंग्रजी शिक्षण घेतले त्यांना या संकल्पना समजल्या म्हणून त्यांना गुलामगिरीची, हक्काची, समानतेची जाणीव झाली, आणि म्हणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला, आणि आपण स्वतंत्र झालो. विचार करा दादाभाई नौरोजींपासून गोखले, आगरकर, महात्मा फुले, सावरकर, गांधी, पटेल, नेहरू, मौलाना आझाद, सुभाषबाबू, आंबेडकर, राजाराम मोहन रॉय हे सगळे इंग्रजी शिक्षण घेतलेले लोक होते. तुम्ही किती स्वातंत्र्यसैनिकांची नावे सांगू शकता ज्यांनी इंग्रजी शाळांत शिक्षण घेतले नव्हते? अगदी अत्यल्प. या सर्व भारतीय नेत्यांत जवळजवळ सगळेच उच्चशिक्षित होते. कुणी IAS तर कुणी बॅरिस्टर होते. त्यामुळेच त्यांच्यात आधुनिक मूल्ये रुजली आणि स्वातंत्र्यभावनेचा स्फुल्लिंग पेटला. एकूण भारतीय समाजही आधुनिक इंग्रजी शिक्षणामुळेच बहुतांशी अनेक चुकीच्या जोखडांतून मुक्त झाला.

मेकॉले म्हणतच होता की कोणत्याही समाजाला जर चॉईस दिला तर तो योग्य आणि पारंपरिक यात नेहमी पारंपरिक गोष्टींनाच प्रेफरन्स देईल. आजही आपण बघतो की आपल्याकडे शिक्षण घेऊनही लोक या पारंपरिकतेच्या प्रेमातून मुक्त झालेले नाहीत. म्हणून आपण अजूनही पूर्णतः आधुनिक आणि त्यामुळे पुरेसे प्रगत होऊ शकलो नाहीय. अजूनही आपल्यात पुराणतेकडे ढकलणाऱ्या प्रवृत्ती प्रबळ आहेत. मेकॉले म्हणतो की माणसाची भावनिक ओढ ही नेहमी परंपरेकडे असतो. परंतु भावनिक ओढ आणि बौद्धिक आरोग्य/विकास यांपैकी बौद्धिक विकास हा मार्ग कमी पॉप्युलर असला तरी कोणत्याही समाजासाठी तोच महत्वाचा असतो.

ज्यांना आज वाटते की मेकॉलेने आधुनिक शिक्षण आणून चूक केली त्यांच्यासाठी मला वाटते की सरकारने जरूर संस्कृत, उर्दू, अरबी या भाषांत धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा काढाव्यात आणि या लोकांच्या मुलांना त्यात थेट पदवीपर्यंत शिक्षण द्यावे. फी सुद्धा सध्याच्या सरकारी अनुदानित शाळांची जेवढी आहे तितकीच ठेवावी. धर्मग्रंथांत वा पुरातन ग्रंथांत लिहिलेले सगळे विषय त्यात शिकवावेत. आधुनिक विषयांचा गंधही त्यांना लागू देऊ नये. इतकेच नाही तर असे शिक्षण घेणाऱ्या लोकांची जितकी संख्या वाढेल तितकी अशा शाळा कॉलेजेसची संख्या देखील वाढवत न्यावी. बघूच आपण वैयक्तिक प्रगती आणि धार्मिक शिक्षण यात कोण प्रबळ ठरते.

असो, हे नक्की की आज आपल्यात जी थोडीफार लोकशाही, वैज्ञानिकता, समानता, आधुनिकता आहे त्याचे श्रेय सर्वात आधी मेकॉलेच्या परखड भूमिकेलाच जाते. त्याच्यामुळे जे शिक्षण भारतात आले त्याच्या पाठबळावर आज आपण जागतिक ताकदींशी तुल्यबळ पातळीवर उभे आहोत, नाहीतर आपण अजूनही अनेक आफ्रिकी देशांसारखे जगाच्या 50-60 वर्षे मागे राहीलो असतो. आपल्या आजच्या प्रगतीचे कारण हे आधुनिक शिक्षण हेच आहे आणि भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया रचण्याचे सर्वात मोठे श्रेय हे निर्विवादपणे मेकॉलेचेच आहे. म्हणूनच तर मी वर सगळ्यात आधी म्हंटले की 'थँक यू मेकॉले'.


..

मंगळवार, १८ जून, २०२४

युनिव्हर्सल रिकरन्स

History repeats itself किंवा इतिहासाची पुनरावृत्ती होते हे आपण कित्येकदा ऐकलेले आहे. 

सहसा आपण ही संकल्पना अगदी ढोबळपणे आणि तौलनिक संदर्भात घेतो. पूर्वी इतिहासात काही घडले असेल तशाच कारणांनी आज काही घडले की अशा घटनांनाच आपण इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतो. पण हे इतके साधे सरळ नाही.

नित्शे हा या इतिहासाच्या पुनरावृत्तीचा पुरस्कार करणारा सर्वात मोठा विचारवंत आहे. पण फक्त इतिहास नाही तर सगळे विश्वच आणि विश्वातील सगळ्या घटना या पुन्हा पुन्हा आणि जशाच्या तशाच घडत असतात असे नित्शे म्हणतो. मी जी ही पोस्ट लिहितो आहे ती मी पूर्वीही अगणित वेळा लिहीली आहे आणि पुढेही अगणित वेळा अगदी तंतोतंत अशीच्या अशी लिहीणार आहे, आणि जेवढे लोक ती आता वाचतील तेच आणि तेवढेच लोक ती या दरवेळी वाचतील असे नित्शे म्हणतो.

भारतीय धारणेनुसार सुद्धा चार युगे एकानंतर एक अशी पुन्हापुन्हा येत असतात असे मानले जाते, हाही नित्शेच्या युनिव्हर्सल रिकरन्स सारखाच विचार आहे. रामायणातील राम आपली अंगठी पाताळात टाकतो आणि हनुमानाला ती आणायला पाठवतो ही कथा मी पूर्वी कधीतरी एका पोस्टमध्ये लिहिली होती, ती या युनिव्हर्सल रिकरन्स सिद्धांताचे परफेक्ट उदाहरण आहे.

अर्थात हा फक्त एक विचार आहे. पण खरेच असे युनिव्हर्सल रिकरन्स होते का? किंबहुना होऊ शकते का? विश्वातील घटना परत रिपीट होऊ शकतात का?

सापशिडीचा खेळ किंवा द्युत या खेळात आपण जे फासे (dice) टाकतो त्या फाशांना प्रत्येकी 6 बाजू असतात. एकच फासा असेल आणि तो टाकल्यावर पहील्या सहा वेळा वेगवेगळा स्कोअर आला तर सातव्या वेळा फासा टाकल्यानंतर हमखास आधी आलेला स्कोअर रिपीट होईल हे नक्की. जर दोन फासे असतील तर दोन्हींच्या सहा सहा मिळून एकूण बारा बाजू म्हणजेच एकूण बारा व्हेरिएबल्स असतील. आता मात्र दोन्ही फाशांचे मिळून प्रत्येक वेळी वेगळे कॉम्बिनेशन बनले तर अशी वेगवेगळी एकूण 36 कॉम्बिनेशन बनू शकतात. त्यामुळे 37 व्या वेळेपर्यंत काहीही केले तरी आधीचे कोणते ना कोणते कॉम्बिनेशन रिपीट होईल हे नक्की.

जर तीन फासे असतील तर एकूण 18 व्हेरिएबल्स असतील आणि तिन्हींचे मिळून 6x6x6 अशा 216 थ्रो नंतर हमखास कोणते ना कोणते कॉम्बिनेशन रिपीट होईल (आधीही रिपीट होऊ शकते पण नाहीच झाले तरी 216 नंतर हमखास होईलच).

तर एखाद्या घटनेत जितके अधिक व्हेरिएबल्स असतील तितके त्याचे जास्त कॉम्बिनेशन म्हणजे जास्त आऊटकम किंवा रिझल्ट्स शक्य असतात.

जर सगळेच रिझल्ट्स येण्याची सारखीच शक्यता असेल तर रिझल्ट रिपीट व्हायला खूप वेळ लागू शकतो. मात्र फक्त काही पर्टीक्युलर रिझल्ट्स येण्याची शक्यता जास्त असेल तर मात्र असे रिझल्ट अनेकदा रिपीट होऊ शकतात.

उदाहरणार्थ भारताच्या संसदेत एकूण 543 लोकसभा सीट आहेत. तर एकूण 543 निवडणुकांनंतर काँग्रेसचा वा बीजेपीचा वा कोणत्याही पार्टीचा कोणता ना कोणता पूर्वीचा स्कोअर हा रिपीट होईल हे नक्की. 

मला सांगायचे हे आहे की कितीही जास्त व्हेरिएबल्स असोत, कधी ना कधी त्याचे सगळे कॉम्बिनेशन्स पूर्ण होतात आणि ते पूर्ण घडून गेले की पुढच्या प्रत्येक वेळी अपरिहार्यपणे आधीचा स्कोअर किंवा घटना रिपीट होते. 

वरच्या उदाहरणात सांगितल्या प्रमाणे एका फाशाचे एकेक वेळा 1, 2, 3, 4, 5, 6 असे सगळे स्कोअर येऊन गेले की मग त्यानंतर भविष्यात टाकलेला कोणताही फासा हे कोणत्यातरी जुन्याच घडून गेलेल्या स्कोअरचे म्हणजे घटनेचे रिपीटेशन असेल. असेच आपल्या विश्वाचे आहे. विश्व आपल्याला आपल्या कल्पनेहून अमर्याद वाटत असले तरी त्यातील व्हेरिएबल्स हे फायनाईट आहेत हे नक्की. आणि पुढच्या ट्रीलियन्स ऑफ इयर्स नंतर कधी ना कधी या साऱ्या व्हेरिएबल्सच्या कॉम्बिनेशन्सनी घडणे शक्य असणाऱ्या सर्व घटना घडून गेल्यावर त्यांनतर विश्वात होणारी प्रत्येक घटना ही आधीच्या कोणत्यातरी घटनेचे रिपीटेशनच असेल. 

यातही अजून एक गंमत आहे. या जगात रँडम वाटणाऱ्या घटना खरेतर तितक्या रँडम नसतात. म्हणजे कसे की एखाद्या घटनेत जितके अधिक व्हेरिएबल्स असतील तितके त्याचे रिझल्ट हे सगळे पॉसीबल कॉम्बिनेशन्स पूर्ण व्हायच्या आधीच रिपीट व्हायला लागतात. उदाहरणार्थ दोन फासे घेतल्यावर त्यात परफेक्ट 12 किंवा परफेक्ट 2 हे टोकाचे रिझल्ट मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र 5 ते 8 हे स्कोअर्स रिपीटेडली अनेकदा मिळण्याची शक्यता जास्त असते. याला गॉशियन किंवा नॉर्मल डिस्ट्रिब्युशन म्हणतात. जर तीन फासे असतील तर त्यात 3 किंवा 18 हे एक्स्ट्रीम स्कोअर मिळण्याची शक्यता अगदीच धूसर असते मात्र 8 ते 12 हे स्कोअर्स मिळण्याची शक्यता प्रचंड जास्त असते. चल्लसपाणी मधेही 4 किंवा 8 मिळण्याची शक्यता सगळ्यात कमी असते आणि जास्तीत जास्त वेळा आपल्याला 2 किंवा 3 हेच स्कोअर मिळतात. जितके जास्त व्हेरिएबल्स असतील तितके एक्स्ट्रीम कॉम्बिनेशन्सचे रिझल्ट मिळणे दुरापास्त असते आणि जास्त शक्यता असलेले रिझल्ट्सच परत परत मिळण्याची शक्यता जास्त असते. T20 मध्ये शक्य आहे की 0 स्कोअर वर सगळी टीम बाद होईल किंवा प्रत्येक बॉल वर 6 मारून 720 स्कोअर होणेही शक्य आहे. मात्र या एक्स्ट्रीम घटना कधीच घडत नाहीत. आपण बघू शकतो की जास्तीत जास्त T20 स्कोअर्स हे 150च्याच आपसास असतात. म्हणजे  जर कोणत्याही टीमने 150 च्या आसपास स्कोअर केला तर हीच शक्यता असते की तो स्कोअर पूर्वीच्या कोणत्या तरी मॅचच्या स्कोअरचेच रिपीटेशन असेल. विश्वातही असेच सगळ्या व्हेरिएबल्सच्या कॉम्बिनेशन्सचे जे एक्स्ट्रीम रिझल्ट्स असतील ते कधीच घडत नाहीत. विश्वाची हीच टेंडन्सी आहे की घडणाऱ्या घटनांचे सर्व आऊटकम्स हे सुवर्णमध्य साधणारे किंवा गॉशियन डिस्ट्रिब्युशन देणारे असतात. आपण हेही पाहीले की एखाद्या घटनेत जितके जास्त व्हेरिएबल्स असतील तितके त्या घटनेचा रिझल्ट हा सुवर्णमध्य साधणाराच येण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे घटना रिपीट होण्याचीच शक्यता अधिक असते. विश्वाच्या मानाने आपल्या पृथ्वीवर व्हेरिएबल्स कमी आहेत त्यामुळे फक्त काही विशिष्ट घटना (जसे की ऋतू) रिपीट होतात. पण होतात हे मात्र नक्की. 

म्हणजे नित्शे म्हणतो ते युनिव्हर्सल रिकरन्स हे स्टॅटिस्टिकली तरी खोटे वा अशक्य नाहीय. पण त्याचबरोबर ते नित्शे सांगतो त्या स्वरूपात होणे (म्हणजे मी ही पोस्ट आधीही लिहिलेली असणे) मात्र किमान बिलियन्स ऑफ ट्रीलियन्स ऑफ इयर्स पर्यंत होणे शक्य नाही. तोपर्यंत कदाचित पृथ्वी टिकणारही नाही त्यामुळे ते परत होईल हे अशक्य आहे असे आपण म्हणू शकतो.