थोडी पार्श्वभूमी आणि मग मुख्य माहिती सांगू. सहसा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्याबद्दल सर्वश्रुत असलेल्या गोष्टी टाळून कमी ज्ञात असलेली माहितीच देण्याचा प्रयत्न करतो.
1818 ला पेशवाई संपली तेव्हा पेशवाईच्या बाजूने लढणाऱ्या सरदारांना, नाईकांना इंग्रजांनी त्यांच्या बहादुरीमुळे पोलीस सेवेत सामावून घेतले. या नव्या इंग्रज पोलीस सेवेतील पदांची रचना पुढीलप्रमाणे होती. सगळ्यात मोठा असायचा नाईक त्यानंतर त्याच्या हाताखाली असायचे अधिकारी दर्जाचे काही पोलीस जमादार. जमादाराच्या हाताखाली जे पोलीस अधिकारी असायचे त्यांचे पद होते नाईकवाडी आणि या प्रत्येक नाईकवाडीसोबत एक कारकून असे.
पेशवाईच्या अंतानंतर इंग्रजांनी सारापद्धत अतिशय कडक आणि जुलमी पद्धतीची केली ज्यात उत्पन्नावर नाही तर जमिनीच्या प्रमाणात सारा लावण्यात आला. शिवाजीराजांनी लावलेल्या शेतकरीधार्जिनी रयतवारी पद्धतीत बदल करून शोषण करणारी सारापद्धत लागू झाली.
तीनच वर्षांत म्हणजे 1821 पासून शेतीमालाच्या किमती अचानक प्रचंड घसरल्या आणि ही कृषीमंदी पुढची तीस वर्षे तशीच कायम राहिली. इंग्रजांनी उत्पादित शेतमालावर टॅक्स लावण्याऐवजी एकूण जमिनीवर आणि बैलांची संख्या अश्या गोष्टींवर अव्वाच्या सव्वा टॅक्स लावला. उत्पादनावर आधारित टॅक्स नसल्यामुळे तसेच शेतीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा टॅक्स अजिबात देता येत नव्हता. परंतु इंग्रज सरकार टॅक्समधून कुठलीही सूट देत नसल्यामुळे टॅक्स भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने सावकारांकडून कर्ज काढावे लागत होते. हे सावकार इंग्रजांहून अधिक लुटारू होते आणि फक्त चार महीन्यांसाठीही 12 ते 18 टक्के इतक्या प्रचंड व्याजाने ते कर्जाची वसुली करत असत. एकदा कर्ज घेतले की शेतकरी त्यांचे पूर्ण उत्पादन सावकारांस देऊनही त्या कर्जातून मुक्त होत नसत. अक्षरओळख नसल्याने सावकार कोणत्याही कागदावर त्यांचे अंगठे घेऊन आयुष्यभर शेतकऱ्यांची लूट करत असत.
आपल्या अकोले तालुक्याला खूप आधीपासून क्रांतीची परंपरा आहे. अगदी आरंभीच्या बहामनी सुल्तानांपासूनच बावन्न मावळातील महादेव कोळी हे स्वतंत्रच राहिलेले आहेत. शिवाजीराजांचे जन्मस्थान असलेले जुन्नर आणि आसपासचे किल्ले हे शिवाजी महाराजांच्याच नाही तर अगदी सुलतानी अंमलाच्या आधीपासून काही अपवाद वगळता महादेव कोळ्यांच्याच ताब्यात राहिलेले आहेत. नंतर जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात सुलतानी अंमल चालू झाल्यावरही सगळ्या बावन्न मावळांतील परंपरागत अधिकार हे मात्र कायम अबाधित राहीले आहेत. आणि जेव्हा कुणी या अधिकारांवर गंडांतर आणू पाहीले तेव्हा या मावळ्यांनी समोर कितीही मोठी सत्ता असली तरी तिला टक्कर दिलेली आहे. मग तो औरंगजेबाला टक्कर देणारा शिवनेरीवरचा खेमा नाईक असो, की नाना फडणविसाला नामोहरम करणारा आणि नंतर सेटलमेंट करून पेशव्यांची मोठी सुभेदारी मिळवलेला जावजी बांबळे असो.
पेशव्याविरुद्ध असेच 1798 मध्ये वाळोजी भांगरे याने उठाव केला. तेव्हा पेशव्याने जावजी बांबळेला त्याचा बंदोबस्त करायला सांगितला. जावजीचा मुलगा हिरोजी बांबळे याने वाळोजीला पकडले आणि तोफेच्या तोंडी दिले. त्यानंतर वाळोजीचा पुतण्या रामजी भांगरे यांनी हे बंड चालूच ठेवले.
रामजी भांगरे यांनी अतिशय प्रभावी असा लढा दिला परंतु ते इंग्रजांद्वारे पकडले गेले आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली. रामजी भांगरे पकडले गेल्यावर रामा किरवे यांनी बंड चालू ठेवले पण तेही 1830 मध्ये पकडले गेले आणि त्यांनाही अहमदनगर येथे फाशी देण्यात आली.
रामजी यांच्यानंतर राघोजी भांगरेंना त्यांच्या वडिलांचे जमादार हे पोलीस पद मिळाले नाही तरीही ते मिळालेल्या वंशपरंपरागत पाटीलकीमध्येच समाधान मानून देवगाव येथे राहत होते, परंतु राघोजी यांचा पारंपारिक हक्क असलेले पोलीस जमादारपद मिळालेला अमृतराव कुलकर्णी हा मात्र राघोजी कधीतरी आपले पद काढून घेईल म्हणून अस्वस्थ होता. एक दिवस तो देवगावला गेला, त्याच्यासोबत आबाजी बांबळेसुद्धा होता. त्यांनी राघोजींच्या घरातील स्त्रियांशी गैरवर्तन केले व इतर पुरुषांनाही टॉर्चर केले, आणि छोट्या राघोजीला पकडून घेऊन राजूरला आणून कैदेत टाकले. एक दिवस राघोजींची आई तुरुंगात जेवण घेऊन आली आणि तिने भाकरीमध्ये लपवुन एक सुरा राघोजींच्या हवाली केला. त्या सुऱ्याच्या मदतीने राघोजींनी आपले चामड्याचे बंध तोडून पोलीस स्टेशनमधून पलायन केले.
या प्रसंगानंतर राघोजींनी इंग्रज सत्तेविरुद्ध खुले बंड पुकारले. त्यांनी राजूर पोलीस स्टेशनवर हल्ला करून अमृतराव कुलकर्णी यास ठार केले आणि पोलिसांची शस्त्रे घेऊन ते फरार झाले. यानंतर इंग्रजांनी राघोजींच्या आईला आणि इतर स्त्रियांना अटक करून तुरुंगात त्यांचे खूप हाल केले. हे समजल्यावर विनाकारण आईला अटक करणाऱ्या सर्व पोलिसांना शोधून काढून राघोजींनी ठार मारले.
राघोजींनी 1844 च्या सुरुवातीला तीन इंग्रज शिपायांना चिचोंडी येथे गोळीबारात ठार केले व त्यानंतर सप्टेंबरमध्ये भीमाशंकर येथे इंग्रज पोलिस तुकडीवर हल्ला करून आठ पोलिस ठार केले व तीन पोलीस पकडून ठेवले. या पकडलेल्या पोलिसांना मात्र ठार न करता असे सांगून सोडले की तुम्ही तुमच्या गोऱ्या साहेबाला सांगा की तू काळे शिपाई माझ्याशी लढण्यासाठी का पाठवतोस? त्याऐवजी तू गोऱ्या इंग्रजांना पाठव, मग मी त्या सगळ्यांची शिरे कापून या रानात सगळीकडे टांगून ठेवेल.
याचदरम्यान राघोजींनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला ज्यात त्यांनी इंग्रजांच्या सेवेत असलेल्या लोकांना आणि नगर जिल्ह्याच्या 18 परगण्यातील सर्व लोकांना व अधिकारी, पाटील यांना सांगितले की त्यांनी इंग्रजांशी एकनिष्ठ न राहता "सरदार नाईक राघोजी भांगरे" यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनाच सारा द्यावा. असे न केल्यास इंग्रजांची साथ देणाऱ्यांचे नाक व कान कापले जातील. कुणीही इंग्रजांना घाबरण्याचे कारण नाही, कारण इंग्रजांचे राज्य आता संपल्याचे मी घोषित करत आहे. त्यानंतर राघोजी गावोगावी जाऊन सारा गोळा करत असत. असे करण्यापूर्वी ते गावामध्ये एक शेणाचा गोळा आणि एक टोकाला कापड गुंडाळलेला बाण पाठवत असत. शेणाचा गोळा पाठवणे म्हणजे तुम्ही माझे ऐकले नाहीत तर तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा होईल असा संकेत होता तर टोकाला कापड गुंडाळलेला बाण म्हणजे तुमची घरे-दारे जाळून टाकण्यात येतील असा संकेत होता. अनेक ठिकाणी उल्लेख केला जातो की राघोजींनी गावांत दरोडे टाकले, परंतु ते दरोडे नव्हते तर राघोजी प्रत्येक गावात जाऊन पाटलाला भेटून पाटलाने किती कर गोळा केला आहे ते विचारून त्याच्याकडून तो कर स्वतः घेत असत. आणि कर वसूल केला नसेल तर त्याला त्यावेळी कर वसूल करायला लावून त्याच्याकडून ही रक्कम घेऊन त्याला त्याची रीतसर लेखी पावती सुद्धा देत असत. जर ते दरोडे असते तर अशी पावती देण्याचे काही कारण नव्हते. आपण इंग्रज सत्ता अमान्य करत असून स्वदेशी राज्य स्थापित केले आहे, आणि म्हणून कर वसूल करत आहोत अशी राघोजींची भूमिका होती.
इंग्रजी सत्तेबरोबरच राघोजींनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सावकारांविरुद्ध सुद्धा खूप कारवाया केल्या. गावोगावच्या अन्यायी सावकारांवर हल्ला करून राघोजी त्यांची नाके व कान कापून त्यांच्या हिशेबाच्या साऱ्या कागदपत्रांची होळी करत असत. जर कुणी विरोध केला तर त्यांची घरेही जाळून टाकली जात. मात्र त्यांची घरे जाळण्यापूर्वी आजूबाजूच्या लोकांना सावध करून आग तुमच्या घरापर्यंत पोचणार नाही यासाठी सावध रहायला सांगत.
राघोजी भांगरे यांनी अहमदनगर कोर्टाला लिहिलेल्या एका पत्रात सांगितले होते की रयतेचे फार हाल होत असून इंग्रज न्यायालय आणि सावकार हे रयतेला खूप त्रास देत आहेत. मी सावकारांचा बंदोबस्त केला असून सरकारने जर आता रयतेस त्रास देणे थांबवले नाही तर तुमचा देखील तसाच बंदोबस्त करण्यात येईल.
नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा आणि कोकण या भागांत राघोजींनी अनेक अन्यायी सावकारांवर हल्ले करून त्यांचे रेकॉर्ड्स जाळून टाकून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. सगळ्या गावांतून राघोजींचे स्वागत आणि समर्थन केले जात होते. ते जिथे लपले असतील तिथे जवळच्या गावातील लोक त्यांना जंगलात धान्य आणि अन्य रसद स्वतःहून पुरवत असत.
स्त्रियांच्या मान सन्मानाच्या बाबतीतही राघोजी अत्यंत तत्वप्रिय व संवेदनशील होते. ज्या अन्यायी सावकारांना कान व नाक कापून त्यांनी अद्दल घडवली त्यांच्या घरातील कोणत्याही स्त्रीला त्यांनी कधीही थोडीफारही इजा केली नाही. राघोजींनी ज्या गावांतून कर वसुली केली वा सावकारांना अद्दल घडवली त्यातील अनेक पंचनामे इंग्रजांनी लिहून ठेवले आहेत. अशा कुठल्याही मोहीमेत कधीही कोणत्याही स्त्रीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्याचे इंग्रजांच्या कोणत्याही नोंदींत नमूद नाही. उलट स्त्रियांच्या सन्मान ठेवला नाही म्हणून राघोजींनी अनेकांना शिक्षा केल्या. एकदा तर राघोजी यांनी त्यांच्याच टोळीतील एका सैनिकाने एका स्त्रीशी गैरवर्तन केले म्हणून त्यास ठार मारण्याची शिक्षा दिली होती.
राघोजींचे मित्र आणि समर्थक त्यांच्याशी इतके एकनिष्ठ होते की बुधा पेढेकर या मित्रास जेव्हा इंग्रजांनी पकडले आणि राघोजींचा ठावठिकाणा सांगण्यासाठी टॉर्चर केले तेव्हा ठावठिकाणा दाखवतो असे सांगून बुधा पेढेकर त्यांना घेऊन एका डोंगरावर गेले आणि तिथे गेल्यावर कड्यावरून उडी घेऊन प्राण दिले पण राघोजींची माहीती अजिबात सांगितली नाही.
1839 ला साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांचे संस्थान खालसा करण्यात आले, व ते उत्तरेत निघून गेले. त्यानंतर इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्यासाठी आणि आणि पुन्हा प्रतापसिंह त्यांना छत्रपती बनविण्यासाठी गुप्तपणे हालचाली चालू झाल्या. 1843 मध्ये अंतोबा लोटेकर यांनी एक सनद महाराष्ट्रात आणली जी त्यांना ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी दिलेली होती, आणि त्यात सातारचे राजे प्रतापसिंह यांना परत छत्रपती बनविण्याचा उल्लेख होता. 29 जानेवारी 1844 ला अंतोबा लोटेकर हे राघोजी भांगरे यांना पाडोशी येथे भेटले आणि त्यांनी राघोजी यांना ती सनद दाखवली व इंग्रजांचे राज्य उलथवून छत्रपतींचे राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी राघोजी यांनी गुप्तपणे उत्तरेत जाऊन छत्रपती प्रतापसिंह यांचीही गुप्त भेट घेतल्याचे नमूद केलेले आहे.
राघोजींच्या आधीही अनेक बंडे झाली. मात्र ती बंडे शक्यतो वैयक्तिक ध्येयासाठी होती. जनतेसाठी लढा देणाऱ्या क्रांतीची अजून सुरुवात झाली नव्हती. वैयक्तिक लढ्यापासून जनतेसाठीच्या लढ्याच्या परिवर्तनाच्या टाईमलाईनवर बरोबर मध्यावर राघोजी यांचा लढा येतो. राघोजी हे पहीले क्रांतिकारक होते ज्यांनी त्यांचा लढा जनतेसाठी लढला. इंग्रज सत्ता नष्ट करून आपल्या एतद्देशीय सत्तेची स्थापना करण्यासाठी लढा लढला. शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धही पहील्या सशस्त्र लढ्याचे श्रेय राघोजी भांगरे यांनाच जाईल. राघोजींनी नुसता एक सशस्त्र लढाच उभारला नाही तर लोकांमध्ये हक्कांसाठी लढण्याची चेतना जागृत केली.
ज्या स्त्रियांनी चूल आणि मूल यापलीकडे काही विचार केला नाही त्यांच्यातही राघोजी यांच्या लढ्याने अन्यायाविरुद्ध जाब विचारण्याची प्रेरणा निर्माण केली. बंडकरी न मिळाल्यामुळे पोलीस त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बायका व कुटुंबातील इतर स्त्रियांना त्रास देत व कधीकधी त्यांनाच अटक करून तुरुंगामध्ये डांबत असत. त्यामुळेच 1844 मध्ये इंग्रजांनी कैदेत टाकलेल्या बंडकऱ्यांच्या बायकांपैकी एका स्त्रीने अहमदनगरच्या इंग्रज अधिकाऱ्यास पत्र लिहून असा जाब विचारला की तुमचे सरकार असे कुठल्या प्रकारचे सरकार आहे जे स्त्रियांना बंदी करून मग क्रांतिकारकांशी लढू इच्छिते? एक लक्षात ठेवा, स्त्रियांना त्रास देऊन कोणीही क्रांतिकारक तुम्हाला वश होणार नाही. तुमचा कायदा निरपराध लोकांना त्रास देण्यास मनाई करत असताना तुम्ही आम्हा स्त्रियांस का अटक केली आहे? जर तुमच्यात आम्हाला मोकळे सोडण्याची हिंमत नसेल तर आम्हाला असे नुसते तुरुंगात डांबण्यापेक्षा आम्हाला अहमदनगरला नेऊन थेट फासावर चढवावे.
नेहमी इंग्रजांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झालेल्या राघोजी यांना कुणीतरी फितुरी करून टीप दिल्याने 1848 मध्ये पंढरपूर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना एकतर्फी खटला चालवून डिफेन्सची संधी न देता दोषी ठरवून 2 मे 1848ला ठाणे कारागृहात फाशी देण्यात आले. राघोजींचे प्राण घेण्यात आले मात्र राघोजींच्या लढ्याची प्रेरणा घेऊन बंड मात्र चालूच राहीले. वासुदेव बळवंत फडके यांनी राघोजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आणि राघोजींचीच मोडस ऑपरेंडी वापरून 1875ला आपला लढा उभारला. राघोजींनंतर नगर आणि पुणे जिल्ह्यांत होनाजी केंगले यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा उभारला, त्यानंतर दगडू देशमुख, कोंडाजी नवले, चिमण निर्मळ, सत्तू मराडे या आणि आपल्या भागातील अशा अनेक महान क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध दंड थोपटून, बंड उभारून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत लढत राहून आपल्या प्राणांची आहुती दिली.
..
Ref:
David Hardiman (1995) Community, patriarchy, honour:
Raghu Bhanagre's revolt, The Journal of Peasant Studies, 23:1, 88-130, DOI:
10.1080/03066159508438601
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा