हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

एक हरवलेली आठवण..

आठवणी.. काही बऱ्या, काही वाईट, थोड्या ओल्या, थोड्या कोरड्या.. बऱ्याचदा अवखळ.. बऱ्याचदा स्थितप्रज्ञ.. काही वारंवार सापडणाऱ्या, काही वारंवार हरवणाऱ्या.. शब्दांनी बांधलेल्या, शब्दांनी तुटलेल्या तर काही नुसत्याच मुक्या अबोल भावनांत गोठलेल्या..!! एक अशीच हरवलेली आठवण शोधतोय.. स्मृतीपटलावर कुठेशी ऊन्हे झेलीत, वादळे सोशीत, असेल तग धरून अजुनही..कदाचित..!! काही भेटी, काही प्रसंग, काही माणसे असतात ना अशीच अस्पष्ट, धूसर, फिकट..!! एखादी मैफल.. एखादा सिनेमा.. त्यातले एखादे पात्र, एखादा प्रसंग, एखादा संवाद.. एखादा सूर.. अचानक आठवेनासा होतो.. ती अनुभूती आठवते पण त्याचा साक्षात्कार होत नाही.. म्हणजे बर्फाखालून पाणी वाहते आहे एवढेच कळावे, पाण्याचा स्पर्श मात्र होऊ नये असेच काहीसे.. एखादे खूप आवडते इतरांदा सहज ओठावर येणारे गाणे कधी कधी आजिबात आठवत नाही.. रात्री अमाप सुखावणारे वा दुखावणारे स्वप्न सकाळी थोडेही स्मरत नाही.. फक्त एक अनुभूती उरलेली असते त्या प्रसंगांदरम्यानच्या भावनांच्या उत्कटतेची.. तीही अस्पष्ट, पुसटशी.. मात्र प्रचंड बेचैन करून जातो यातला प्रत्येक अनुभव..!!
स्मृती एक अजोड वरदान आहे.. आणि विस्मृतीही..!! सुखकर स्मृतींच्या वारंवारीतेने जसे सुख मिळते तसेच दु:खद गोष्टींच्या विस्मृतींनी दु:ख हरते. म्हणूनच स्मृती आणि विस्मृती ही दोन्ही दैवी वरदाने आहेत.. पण सुख आठवावे आणि दुःख विसरावे एवढे सरळ साधे असेल तर ते मानवी मन कसले.!! हे मन मोठे विलक्षण आहे. ते दु:खद स्मृती सहजतेने विसरत नाही आणि आणि कित्येकदा सुखद स्मृती उगीच हरवून टाकते.. जे नकोसे त्यास जपून ठेवते आणि हवे हवेसे त्यास लपवून टाकते.. या मनाच्या स्मृती-विस्मृतींच्या खेळात फक्त रंगमंचासारखा प्रवेश आणि निकास एवढेच नसते.. या दोन्ही स्थितींच्या मध्येही एक स्थिती असते, अस्पष्ट आठवणींची.. अर्ध्या-मुर्ध्या विरलेल्या सुरावटींची.. फिकट पडलेल्या रंगांची, ढगाआड दडलेल्या सूर्याची.!! म्हणजे तिथे असलेल्या त्या स्मृतीची जाणीव असते, फक्त तिचे प्रारूप स्पष्ट होत नाही..
आठवतं तुला? असं म्हणून जेव्हा तू आपले जुने ते काही उलगडत जातेस ना तेव्हा मी पुन्हा कुठेतरी हरवत असतो.. तू मांडलेली असतेस एक जुनी संध्याकाळ उघडून समोर.. आणि माझे विश्व फक्त श्रुतींमय झालेले असते.. अजूनही तुझा स्वर तसाच कापरा होतो तेव्हाच्या दिवसांबद्दल बोलताना.. आणि आताही मी अंतर्मनात तसाच झंकारत असतो.. तुला ऐकताना कधी माझे मी पण अस्तित्वात नसतेच.. आणि नव्हतेही.. माझ्या तमाम जाणीवा फक्त श्रुतींत एकवटलेल्या असतात.. एखाद्या अनोळख्या भाषेतली सुंदर स्वर्गीय मेलडी मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावी तसेच.! तसा तुझा शब्द न शब्द पाझरलेला असतो कणाकणात.. मात्र त्याला अर्था-अनार्थांची मोजमापे लावली जात नाहीत.. फक्त एक अनुभूती.. एक गोड हुरहुरती जाणीव भरून राहते आसमंतात.. महिन्याभरातून कधीतरी पौर्णिमेच्या चंद्रासारखी तू भरून आलेली असतेस.. आणि मग मी फक्त त्या चांदण्यात न्हाऊन घेतो.. कित्येकदा हुंकारूनही मला प्रतिसाद द्यावासा वाटत नाही.. टिपेस लागलेल्या सुराला टाळी वाजवून दाद दिली तर रसभंग होतो ना तसेच काहीसे.. तुला हे पटत नाही.. आणि मग.. माझ्या अबोल्यास दुर्लक्ष समजून तू किती अबोल होतेस..
काल पहिल्या भेटीची आठवण काढलीस.. आणि विचारलेस शंभर प्रश्न मला निरुत्तर ठेवणारे.. त्या क्षणांचे हिशेब मांडून मी ते कधीच नोंदवून ठेवले नव्हते.. म्हणूनच पहिली, दुसरी आणि त्या तमाम भेटी मला एकसारख्याच वाटतात आजतागायत.. पण तुला प्रत्येक भेटीतला एकूण एक बारकावा मला आठवायला हवा असतो.. म्हणूनच आज म्हंटले.. मनाच्या तावदानावरचे धुके पुसून पहावे पलीकडचे काही दिसते का ते.. ही जाणीव आता नवी आहे.. अनुभूतींच्या पलीकडले काही आठवावेसे वाटेल असे कधीच वाटले नव्हते आजपर्यंत.. पण आता ते वाटते आहे..!तेव्हा पहिल्या भेटीत तू आधी बोललीस की मी? तुला मी ऐकविलेला पहिला शब्द कोणता होता? तू अनोळख्यासारखी बोलत होतीस की मीच जन्मांतरीची ओळख असल्यासारखे ऐकत होतो? एक भावनांच्या उत्कटतेची पातळी वगळली तर जगातल्या तमाम पहिल्या भेटींपेक्षा काय वेगळे घडले होते? आजही जेव्हा कधी आपण निवांतसे बसलेलो असतो तेव्हा जानविणारी घट्ट ओढ पहिल्या भेटीतही तेवढीच होती का? आज एकमेकांचे अनेक पैलू उलगडल्यावर जो विश्वास, जी दृढता जाणवते नात्यातली, त्यातली कितीशी तेव्हा जाणवली होती? हे सगळे तुला तरी आठवते का? एक फरक मात्र आहे पहिल्या अणि तद्नंतरच्या तमाम भेटींत.. पहिल्या भेटीत पूर्वीची कोणतीही आठवण नव्हती.. एवढे वगळता बाकी काय बदललेले होते? तू भरविलेला पहिला घास मी कितीवेळा चावला हे लक्षात ठेवले असते तर त्याचा आनंद पुरेसा कसा मिळाला असता? तुझ्या चेहऱ्यावरचे पहिले हसू आणि डोळ्यांतला पहिला आसू.. सगळ्या ब्रम्हांडातही साठवता येणार नाही एवढे विशाल आणि एवढे खोल होते.. मग ते सर्व स्मृतींत कसे साठवून ठेवता येतील? आणि तुझा आग्रहच असेल तर चल आज निवांत समुद्रकिनारी जाऊ दोघेच.. पुन्हा मावळत्या सूर्याच्या साथीने.. अगदी खात्रीने सांगतो.. आज जे काही घडेल ना.. त्याहून काहीही वेगळे घडलेले नसेल तेव्हाही..!! आणि खरेच विचारशील ना मला तर आजही माझ्या क्षमता त्या सगळ्या भावनांना यथावत साठवून नाहीच ठेवू शकणार..!!

बुधवार, १५ डिसेंबर, २०१०

एक शाम चुपचाप...


एक शाम चुपचाप खामोश सी आएगी..
रात की सतह पर ज़िन्दगी सफ़ेद चादरों में लिपटी
बे-खरोश सी पड़ी रहेगी..!!

बे-खरोश=silent,dead

फ़ज़ा-ए-मुर्दा-ए-दिल में गूंजेंगी..
गम-ए-हिजरां के सन्नाटों की मौसीकी..
फिर दांव पर लगाएगी ये
मुझ से कई मख्मुरों की आशिकी..!!
इसी महफ़िल में फिर किसी से रूठ सी जाएगी..!! 
एक शाम चुपचाप खामोश सी आएगी..

मौसीकी=music
फ़ज़ा-ए-मुर्दा-ए-दिल= Environment around a dead soul
मखमूर=Drunk

वहां दूर किनारों में आकर
बुझ जाती है आरजुओं सी लहरें..
खुदा या मेरी कालिख पर है
क्यों सफ़ेद चांदनी के पहरे..!!
अहद-ए-तरब कब ये मुख्तमिल हुआ पाएगी..!!
एक शाम चुपचाप खामोश सी आएगी..

अहद-ए-तरब=Promise of good times.
 मुख्तमिल=Complete

एक धुंधला सा एहसास साथ आयेगा..
फिर वो चौराहे का मकान याद आएगा..!!
आधी खुली खिड़की में जाकर
दिल फिर बेबस सा गुम-गश्ताह हो जायेगा..!!
कुछ टूटे दिल, कुछ टूटे पैमाने बाकी रख जायेगी..
एक शाम चुपचाप खामोश सी आएगी..!!

गुम-गश्ताह=missing

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१०

सीमेवर..

आडव्या उभ्या रेघांचे प्राणहीन नकाशे फक्त..
परतीची वाट पाहून डोळ्यात आता उतरले रक्त..!!

पक्षीण जशी जाते फुलत्या वयात पिलाला एकटेच सोडून.!
मायभू घेते आहे दुधाचे... पुरते पांग फेडून..!

निरोपाच्या फुलांचे मनात अजून घाव ताजे..
रस्त्यावरचा दगड सांगतो दूर अजून गाव माझे..!

मलयाच्या शीतलाम हवांनो आणा एक ओळखीचा गंध..
माझ्या सह्याद्रीवरून वाहणारी एखादी तरी झुळूक मंद.!

दिल्लीच्या मुत्सद्द्यांचे पडोत कसेही फासे..
देशासाठी केले आम्ही वध-स्तंभांचे उशे.!

छातीचा करून कोट उभा दिन-रात, माते तुझ्या साठी..
आसेतुहिमाचलास्तव अभिमानाने सांडेल हे रक्त मराठी.!


गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०१०

२६ नोव्हेंबर

भीषण भयावह तांडव करीत आली एक रात्र..
निष्पाप जीवांचे अग्निकुंडात करावयास होत्र..

अकस्मात पडली, गिधाडांची धाड..
निशस्त्रांना मारीत गेले, निर्दयी भ्याड.!

झडल्या फैरींवर फैरी, उठले धुरांचे लोट..
अचंभून भेदरले, तमाम शंभर कोट.!


चालते फिरते देह झाले, रक्त मांसाचा चिखल..
रस्तोरस्ती जखमांचे अन यातनांचे कोलाहल.!


अडीच दिवस लांडग्यांनी, ठेवला ताज ओलीस..
प्राणपणाने लढले आमुचे, कमांडो अन पोलीस.!

मग पेटला जनसागर अन उसळली गगनचुंबी लाट..
शत्रूंचा घास गिळूनच, शमला समुद्रकाठ.!

अमाप  शौर्याने लढले, मातृभूमीचे सपूत..
एक एक वेचून ठेचले, दहशतीचे दूत.!

आता नाही सहन करणार, एकही जिव्हारी वार..
आक्रमणाआधीच परजून उठेल, स्वरक्षणार्थ तलवार.!

ज्योत शहिदांच्या बलिदानांची, राहील तेवत उरी..
अखंड वैभवाने नांदेल, सदैव मुंबापुरी.!

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

काही बोलायाचे आहे..

थोडे बोलायचे होते miss झालेल्या महाभारताच्या episodes वर..
A R रेहमानच्या अंतरंगात निनादणाऱ्या nodes वर..


बऱ्याच मध्यरात्री न हिंडलेल्या सूर्यावर..
सह्याद्रीच्या राकट दगडी वाऱ्यावर..

गणपतीने पुऱ्या न केलेल्या नवसावर..
किंचाळणाऱ्या नोव्हेंबरच्या पावसावर..

थोडे बोलायचे होते.. अहिल्येच्या शिलेवर..
गुलजारच्या शब्दांत भिजणाऱ्या उर्मिलेवर..

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

लहान माझी बाहुली



अळवाच्या पानावर थेंब होऊन नाचते ती..
दुडक्या पावलांनी माझेच बालपण वेचते ती..
तिन्ही माझे लोक व्यापते.. इवल्याशा तीन पाऊली..
लहान माझी बाहुली

एक एक सोहळा होतो तिचा चिऊ काऊचा घास..
पापण्यांची उघडझाप मांडते चांदण्याची आरास..
उत्साहाची पेरण होते मात्र तिच्या चाहुली..
लहान माझी बाहुली..

मंगळवार, २७ जुलै, २०१०

येरे येरे पावसा

"मऊ रेशमी कापसामधून टप टप नाचत खाली उतर रे मेघा..
अन सकाळी आरुच्या शाळेवरून थेट क्षितिजापावेतो ओढ सात रंगांच्या रेघा..!!"


"कोसळ अगदी बेभान, स्वैर, उन्मत्त होऊन..
येरे येरे पावसा सरीवर सर घेऊन.!!


कशी अंगभर भिजून निथळू देत तिला..
गारांसवे मोती होऊन, उसळू देत तिला!"


मुठीमध्ये घट्ट धरलेला छत्रीचा दांडा..
चिखलाच्या इवल्या इवल्या पावलांनी माखलेला व्हरांडा..!!


कागदाच्या होड्या आणि मैत्रिणींच्या खोड्या..
नद्या, झरे, ओढे सारे भरून टाक गड्या..!!