हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

कोडे

कमळी ती तशी घामेजलेली, विस्कटलेले केस आणि कमरेभोवती पदराचा बांधलेला काचा अशा अवतारात घरात घुसली. सोताला देव माणूस म्हणवून घेतो पण कुत्रा आहे मेला कुत्रा. असे म्हणत तिने चुलीत लाकडे कोंबली आणि डब्यातून पीठ काढून तिथेच चूल फुंकता फुंकता रागारागात ते मळू लागली. बाहेर खेळत असलेल्या सुंदऱ्या आणि पिंट्याने आपल्या आईला घरात येताना पाहिले. दोघांपैकी धाकटा पिंट्या तसाच खेळणे सोडून पळत तिच्या मागोमाग घरात घुसून चुलीजवळ आला, आणि आये मला भूक लागलेय असे म्हणून कुरकुरू लागला. तिने त्याच्या पाठीत तशाच पिठाच्या हाताने एक गुद्दा घातला आणि म्हणाली दिसत नाही का मेल्या तुलाच गिळायला सैपाक करतेय ना आल्याआल्या.? त्या गुद्याबरोबर डोळ्यात पाणी आले पिंट्याच्या. पण निदान त्याचा कुरबुरीचा आवाज बंद झाला एवढेच कमळीला समाधान. आई घरात आल्याआल्या लगेच जे खायला मिळू शकते ते म्हणजे केवळ फटका हे सुंदऱ्याला थोरला असल्याने अनुभवातून कळून चुकले होते त्यामुळे तो काही भूक लागलेली असूनही पिंट्याबरोबर घरात गेला नाही.   
कमळी ही मंगळूची बायको. मंगळूला स्वत:चा असा फक्त एक बारीक जमिनीचा तुकडा वडिलोपार्जित संपत्ती म्हणून मिळालेला. त्यात फक्त एक पावसाळी पीक निघे. जेमतेम चार पोती भात व्हायचा म्हणजे पाच सहा मण तांदूळ. कितीही राबले तरी वर्षभरासाठी ती मायमाती फक्त एवढेच देऊ शकायची. मग मंगळूला चरितार्थासाठी दुसऱ्यांच्या शेतावर काम करावे लागे. गाव काही फार सधन शेतकऱ्यांचे नसल्याने कामही जेमतेमच मिळे. तेही त्या गावात शेतात काम करण्याच्या बदल्यात पैसे देण्याची पद्धतच नव्हती. कामाच्या बदल्यात डाळीडूळी मिळत, कधी बाजरी, ज्वारी, भुईमुगाच्या शेंगा अशा वस्तू मिळत, त्यातूनच रोजच्या भाकर अन कालवणाची तरतूद होई. पण दोन पोरे, बायको आणि एक म्हातारी जगवायची म्हणजे पैसा तर लागणारच. डॉक्टरचे पैसे नाहीत म्हणून कित्येक वर्षे अंगावरच खोकला काढलेल्या मंगळूच्या म्हातारीचा आवाजच बंद झाला होता. आणि आजकाल तिची तब्येत वरचेवर जरा जास्तच वेळा बिघडत असे. पैसाच नाही म्हणून डॉक्टरकडे जात नाही हे खरे कारण असले तरीही कुणी डॉक्टरकडे जा असे म्हंटले की मला तर बाई त्या डाक्टरच्या सुईची लय भीती वाटते असे म्हातारी म्हणायची आणि दुखणे अंगावरच काढायची. 
गावात कामाच्या बदल्यात पैसा मिळायचा तो फक्त गेनू पाटलाच्या इथे. तेही शेतीव्यतिरिक्त इतर काम असेल तरच. गेनू पाटील तसा बोलूनचालून बरा होता. अडीनडीला कोणालाही मदत करायचा. मंगळू त्याचेकडेच सिजनला कामाला जायचा, त्यातून  मिळणाऱ्या पैशानेच त्याला घरात मीठमिरची खरेदी करता यायची. आणि कसलाही नाद वा व्यसन नसल्याने गाठीला दोन पैसे जमवून लेकराबाळाला एखादा कपडालत्ता करता यायचा. मंगळू हा एक प्रामाणिक, निर्व्यसनी आणि अत्यंत कष्टाळू गडी म्हणूनच सगळ्या गावात ओळखला जायचा.

एके वर्षी दुष्काळ पडला. मंगळूच्या जमिनीच्या तुकड्यात भाताचा एक दाणाही उगवला नाही. पावसाचा थेंबही न पडल्याने डोंगर, गावाकुसाची जमीन हिरवी झालीच नाही. लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे नदीला मात्र पाणी आले होते एवढाच काय तो पंचक्रोशीला दिलासा. स्वत:च्या शेतातही काही नाही आणि पाटलाकडेच काय तर गावात कुणाकडेही काही काम नाही त्यामुळे त्या वर्षी मंगळूवर उपासमारीने मारण्याची वेळ आली. पण नशिबाने अशा ऐन दुष्काळात पाटलीण बाळंत झाली तेव्हा मदतीला आणि घरकामाला म्हणून पाटलाने मंगळूला एखादी बाई पाहायला सांगितली. मंगळूने मग हीच संधी साधून कमळीला तिथे कामाला ठेवले. पण चौथ्याच दिवशी कमळी दुपारीच घाबऱ्याघुबऱ्या घरी आली आणि मंगळूला म्हणाली की उद्यापास्न मी पाटलाच्या घरी कामाला जाणार नाही. त्या पाटलाची नजर लय वंगाळ हाये. मंगळू म्हणाला येडी झाली का तू? घरात खायला एक दाणा अन खिशात एक दमडी उरल्याली न्हाई. समद्या तालुक्यात लोक उपाशी मरू लागल्यात, पाटील कसाबी आपल्याला जगण्यापुरता काहीतरी देईल. आपली म्हातारी बी हाथरुनाला पडलेय. तिला आज ना उद्या डाक्टर दाखवावाच लागेल. अन परत पुढच्या साली पेरणीचे दिवस येतील तवा गाठीला चार पैसे नकोत का? ते कोण दिल आपल्याला? आणि पाटलाचं म्हंशील तर देवमाणूस हाये त्यो, समद्या गावाला माहित हाये पाटील किती चांगला हाये ते. त्येच्यामुळं तर घरात पोरांच्या पोटाला दोन घास लागत्यात. तूला भरम झालाय. गप वाड्यावं जात जा.  मी हाये ना तोवर तसली कायबी काळजी करू नको. त्यानेच असे बोलल्यावर मग कमळी नाखुशीने का होईना, पाटलाकडे कामाला जात राहिली.
कमळीच्या कामाचे पैसे पाटील थेट मंगळूला देत असे. एरवी कोणत्याही कामाला पाटील मंगळूलाच बोलावीत असे. त्यामुळे तो नेहमी वाड्यावर असे. पण आता काही कामच नसल्याने मंगळूचे पाटलाच्या वाड्यावर जाणे बंदच झाले. फक्त कमळीचा पगार घ्यायला आठवड्यातून एकदा तो वाड्यावर जाई. अशात कमळी परत एके दिवशी मंगळूला म्हणाली की मला पाटलाकडे नाही जायचे, त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे हायेत. तुम्हाला कळत कसं न्हाई? पण मंगळू ऐकला नाही, कारण दोनच दिवसांपूर्वी पाटलाने मंगळूला कमळीच्या कामाचे पैसे आता रोजचे तीन रुपये वाढवून देत जाईल असे सांगितले होते. कमळी आता रोजच मला कामाला पाठवू नको असा धोशा लावु लागली, मग वैतागून एकदिवस मंगळू तिच्यावर खूप ओरडला आणि परत पाटलाबद्दल आसं बोलून कामाला जाणार नाही असे म्हणाली तर बघ असा त्याने तिला दम दिला.
तीनेक महिने लोटले असतील. दुष्काळामुळे कुणाला कामच नसल्याने गावात गावकुटाळक्या ऐन भरात होत्या. गावात आता हलक्या आवाजात पाटील अन कमळीबद्दल कुरबुर होत होती. ती मंगळूला कळत नव्हती असे नाही. त्याला त्याचे फार वाईट वाटायचे पण पाटील असं करणार नाही हे त्याला पक्के माहित होते. त्यामुळे तो थोडा काळजीत असला तरी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होता. मात्र एक दिवस त्याने त्याचा मित्र गणपा आणि कुशाबाला बोलताना ऐकले. गणपा सांगत होता की आज त्यानं प्रत्यक्ष पाहीलं की पाटील कमळीला हातात उचलून घेऊन पाटलाच्या मळ्यातल्या घरात घेऊन गेला आणि आतून दाराची कडी लावून घेतली. वरून तो हेही म्हणाला की पाटील तसा वाटत नाही पण नक्कीच कमळीनं आपल्या देखण्या रूपाच्या जोरावर त्याच्या पैशाच्या लोभाने त्याला फसवलं असणार. गेले कित्येक दिवस दोघांचा हा उद्योग बिनबोभाट चालू आहे. पण आता हे मंगळूला तरी कंच्या तोंडानं सांगावं? गणपा निदान आपल्या बाबतीत तरी कधीच खोटे बोलणार नाही याची मंगळूला खात्री होती त्यामुळे त्याचे हे बोलणे ऐकून त्या दिवशी मात्र मंगळूचे माथेच फिरले. तो प्रचंड रागात घरी आला. कमळी आधीच घरात येउन रडत बसली होती. मंगळू बाहेरून आला तशी कमळी लगेच त्याच्या जवळ जाउन त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन ओक्साबोक्षी रडू लागली. आज मला पाटलाने जबरदस्ती… एवढेच म्हणून ती अजूनच धाय मोकलून रडू लागली. मंगळूने तिला तशीच दूर ढकलली आणि ओरडला, पाटलाने? जबरदस्तीने की मर्जीने? मला सगळे कळलेत तुझे धंदे, चल हट बाजूला.  असे म्हणून मंगळूने तिला दूर लोटले. आणि अजून जोरात तिच्यावर खेकसला. त्याच्या खेकसन्यासरशी एक आंबटशा किळसवाण्या वासाचा भपकारा कमालीच्या नाकातोंडात गेला. 
तुमी दारू पिली? अवो पण का? घरात दोन वेळ दाणापाणी येत रहावे म्हणून मी काय काय सहन करतेय, इथं तुमची म्हतारी आजाराने मरायला टेकलीय आणि अशात ही थेरं कराया तुमाला लाज न्हाई वाटत?
तू मला शिकवती का गं? माझी लाज काढती? छीनाल साली. अशी शिवी हासडून मंगळूने आयुष्यात पहिल्यांदा कमळीवर हात उचलला. चल हट बाजूला असे म्हणून त्याने तिला लाथ मारून बाजूला ढकलली आणि घराबाहेर तनातना निघून गेला. कमळी कितीतरी वेळ रडत राहीली. दोन्ही पोरे एकमेकांना बिलगून रात्रीपर्यंत एका कोपऱ्यात घाबरीघुबरी होऊन गप्पगार बसून राहीली. यानंतर चार दिवस कमळी पाटलाच्या घरी गेली नाही. पण पाचव्या दिवशी पोरांच्या चेहऱ्यावरची भूक पाहून तिला राहवले नाही, आणि ती कामाला गेली. पोरांची भूक मंगळूलाही दिसत होतीच. तोही कमळीस जाताना पाहूनही काहीच बोलला नाही. 
या प्रसंगानंतर बरेच दिवस उलटून गेले. आता सगळ्या गावाला माहीत झालं होतं की गेनू पाटील कमळीवर कित्येक दिवसांपासून हात टाकतोय. गावभरात ही गोष्ट कुजबुजली जाऊ लागली होती. पाटील एवढा चांगला माणूस असूनही त्यानं असं कसं केलं याचं लोक नवल करीत. नक्कीच कमळीनेच पाटलाला जाळ्यात फसवले असणार असे लोक म्हणत. सगळ्या गावाला कळलेय ते मंगळूला कसे कळत नाही याचेही लोक नवल करीत. पण मंगळूला हे सगळं कळत होतं, फक्त ते थांबवणं त्याच्या शक्तीपलीकडे होतं. याच मनस्थितीमुळे मंगळू एव्हना दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. सदानकदा दारू पिउन तो आधी निदान घरातच निपचित पडून राहायचा पण आता मात्र तो सरसकट गावात कुठेही लोळत पडलेला दिसू लागला होता. कमळीच्या दु:खाला तर पारावार नव्हता. मंगळू दारू प्यायचे सोडून दुसरे काहीच काम करीत नव्हता. त्यामुळे पाटलाकडे गेले नाही तर उपाशी मरावे लागेल हे तिला माहित होते. म्हणून कसेही मन मारून ती पाटलाकडे जातच राहिली. मंगळू आता घरात कशावरूनही तिला भांडायचा आणि मारायचा. दिलेला पैसा मंगळू दारूत उडवतो म्हणून एकदा कमळीने पाटलाकडून थेट आपल्याकडेच पगाराचे पैसे घेतले. त्यादिवशी मंगळूने तिला इतके मारले की दोन्ही पोरे मध्ये आली नसती तर तिचा जीवच गेला असता.

मंगळू कमळीशी काहीच बोलायचा नाही. तिला स्पर्श करणे तर दूरच. जे काही होत होते ते त्याच्या मनाला खूप कुरतडून काढायचे. पण पोरांच्या पोटाला पीळ बसू नये म्हणून मंगळू आपल्या मनाचा हा पीळ सहन करत होता. एक दिवस दारूच्या गुत्त्यातून मंगळू बाहेर पडला. झोकांड्या खात तो चालला होता तसा त्याची गाठ म्हैपतीशी पडली. मागे एकदा म्हैपती हा पाटलाच्या दुधाच्या हिशेबात घोटाळा करतो हे मंगळूने पाटलाला सांगितले होते आणि पाटलाने तपासल्यावर तो तसे करतो हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हापासून म्हैपतीला पाटलाच्या वाड्यावर बंदी होती, त्यामुळे तो मंगळूवर डूख धरूनच होता. मंगळूने त्याला येताना पाहिले आणि नशेत असूनही आपण त्याला टाळले पाहिजे हे त्याला लगेच कळले व तो दुसऱ्या दिशेने जाऊ लागला. आम्ही सगळे जवळच पारावर बसलेलो होतो. आम्हाला पाहून आता मंगळूचा आमच्यासमोर पाणउतारा करण्याची नामी संधी आहे हे म्हैपतीने लगेच हेरले आणि त्याने वाट बदलून कलटी मारून निघालेल्या मंगळूला मुद्दाम हाक मारून बोलावले. मंगळू म्हणाला नको घाई हाये जरा म्हणून घरी निघालोय. म्हैपती म्हणाला, आरं ल्येका तुझ्या घरात आता तुझं हाय तरी काय? जे हाय ते समदं गेनू पाटलाचं  हाय, ये वाइच इकडं. जरा चार माणसात येत जा की लेका.  तो असे बोलल्यावर आणि आम्हा सगळ्यांना पाहिल्यावर मग मंगळू नाइलाजाने हेलपाटत पाराजवळ आला. म्हैपती म्हणाला, काय मग मंगळू? वाड्यावरलं काम कसं चाललंय? कमळी वैनी म्हणे तिथं लय शेवा करतीया? पाटील म्हणे तुला शेपरेट अन कमळी वैनीला शेपरेट पगार देतुया? मजा हाये लेका तुजी. ऐन दुस्काळात दोन दोन पगार.!! आसं कंचं काम करती रं वैनी वाड्यावं? मंगळू काहीच न बोलता मान खाली घालून उभा होता. आरं सांग की ल्येका. असे म्हणून म्हैपतीने मंगळूची हनुवटी धरून बळजबरीने त्याचा चेहरा वर केला. मंगळूच्या कपाळावर उठलेली आठी मला स्पष्ट दिसत होती. तो म्हैपतीला म्हणाला, आसं काय बी न्हाई बगा म्हैपतराव. पाटलीनबाय बाळंत झाली म्हणून जाते ही वाड्यावं. आणि आवो फक्त माज्याकडंच देत्यात पगार पाटील. हिला न्हाई देत पैसे. तिला पैसे न्हाई देत? म्हणजी कमळी वैनी जे काम करती त्ये फुकाट करती काय? मायला मग आशी कामं जर ती फुकाट करीत आसंल तं एखाद्या टायमाला आमच्याकडं बी दे की पाठवून लेका तिला. म्हैपती असे बोलल्यावर मंगळूच्या कपाळावरची शीर तडातडा उडू लागली होती आणि डोळे लालबुंद झाले होते, हाताच्या मुठी त्याने करकचून आवळल्या होत्या. तशाच अवस्थेत त्याने पारावर बसलेल्या आमच्याकडे पाहीले आणि मग काहीसे विचीत्रसे हसत मला म्हणाला, पहा ना नामदेवराव, काही म्हणा म्हैपतरावाचा सोभाव लय मस्कऱ्या बगा. येंच्या नादाला कोणी लागू नये. जो लागला त्येचं  म्हैपतराव बोलून बोलून पार कातडं सोलून काढतील न्हाई का? असे म्हणून परत हा हा हा असे जोरात कृत्रिमपणे आणि अत्यंत भेसूर भकास हसत पुन्हा झोकांड्या खात मंगळू तिथून निघून गेला. खूप दारू पिल्यामुळे एवढे जिव्हारी लागलेले बाण, आणि अपमानाचे घोट गिळून मंगळू तो तसा भकास हसत होता की आजकाल वारंवार घडणाऱ्या अशा प्रसंगी तसे हसता यावे म्हणून एवढी दारू पीत होता हे मला न सुटलेले कोडे आहे. 








मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

सुली

"सुलीबाय आली का नाही ओ काकू भाऊबीजेला? संप्या मुऱ्हाळी गेला का नाही?"
…….
(सुलोचना किंवा सुलीच नाव असेल तिचे. एकूण आम्हा सगळ्या पोरांपेक्षा साताठ वर्षे तरी मोठी असेल. म्हणून सगळे सुलीबाय किंवा सुलीताय म्हणायचे. मी आधी ताय म्हणायचो, आता बाय म्हणतो. गावात कधी होती नीटशी आठवत नाही. फक्त परकर झंपर आणि दोन लाल रिबीन बांधलेल्या वेण्या एवढेच आठवते तिच्या लग्नाआधीचे. कधीतरी फार पूर्वी आम्हाला काही कळू लागण्याच्या आधीच लग्न करून गेल्याने ना ती आमच्या ध्यानीमनी ना आम्ही तिच्या.
तिचे लग्न झाल्यावर कधीतरी आम्ही हायस्कुलात असताना एकदा भाऊबीजेला आल्यावर तिला पाहिली होती. ती तेव्हाची मात्र एकदम ठळक आठवते. तेव्हापासूनच दर दिवाळीत भाऊबीज हुरहूर लावायची. तेव्हापासूनच संप्या माझा जिवलग मित्र झाला. एक काहीतरी अपार आनंद होता ती दिवाळीचे ते दोन दिवस गावात असण्यात, आणि त्याच दोन दिवसांत मुद्दाम गावाच्या त्या टोकाला संप्याच्या घरी चार चकरा मारल्यावर ती एकदा दिसण्यात, तेवढ्यासाठी अठ्ठेचाळीस चकरा तिकडे मारण्यात. मी तिच्याशी त्यानंतरही बहुदा दहाएक वर्षे एक शब्दही बोललो नव्हतो. प्रेम म्हणणे मोठे धारिष्ट्य होईल पण ती जाम आवडायची हे शंभरांदा खरे आणि त्या दहा वर्षात वर्षागणिक ती आवडण्यात अपार भर पडतच राहीली हे ही खरेच.
घे ना रे अजून चिवडा गणू. असे एकदा कधीतरी ती मला म्हणाली होती. 'गणू' ही जिंदगीत कुणी मारलेली सर्वात प्रेमळ आणि गोड हाक.! एरवी नुसतेच गण्या किंवा गणप्या ऐकण्याची कानाला सवय. त्यानंतर जवळजवळ महिनाभर कितीदा एकटा असताना आरशात स्वत:ला गणू अशी हाक मारून स्वत:चा खुललेला चेहरा पाहण्यात किती वेळ घालवलाय ते काय सांगू.
ते मागच्या वर्षी सम्प्याच्या घरी एकदा सुरसुरीने पाऊस पेटवल्यावर तो बघताना पंधरा वीस सेकंद तिने माझ्या खांद्यावर नकळत ठेवलेला हात, आणि मग त्या स्पर्शाने अन त्याच्या आठवणीने अजूनही अंगावर उठणारा शहारा आणि एक अनामिकसा थरकाप.…
मोबाइलमध्ये गेल्यावर्षी गुपचूप घेतलेला तिचा फोटो अजूनही आहे, एपलॉकने हाईड करून ठेवलेला.)
….
"नाही रे गन्पा यंदा सुली येणार नाही."
"का बरे?"
"दुष्काळात कसली दिवाळी अन कसली भाऊबीज पोरा."

दिवाळीची दिवटी घेऊन तेल मागायला आलेल्या नव्या पोरांना यंदा दिवाळीची सगळी गाणी येत नव्हती. एकच दिन दिन दिवाळी हे गाणे येत होते.
त्यादिवशी माझे सगळे फटाके मी शेतातल्या वाटेकऱ्याला देऊन टाकले. म्हणालो तू वाजव नाहीतर पुढे पिकात घुसणारी वानरे पळवून लावण्यासाठी जपून ठेव.

सुलीच्या गावी दुष्काळ आहे. मी न पाहीलेल्या सुलीच्या नवऱ्याने काहीही करून निदान ती भाऊबीजेला येईल एवढी तरी तजवीज करावी ना. आळशी लेकाचा. आणि संप्याला तर बहिणभावाच्या प्रेमाची आर्तता कळतच नाही.

भाऊबिजेच्या दिवशी संध्याकाळी संप्या माझ्याकडे आला. आणि फोन मागीतला सुलीला फोन करण्यासाठी. म्हणाला माझा बेलेंस संपलाय, सुलीताई आली नाही निदान फोन तरी करतो. अर्धा तास डायल करूनही फोन लागला नाही. संप्या निघून गेला.
….
सुलीचा नंबर मिळाला. आता फोन, मग व्हाट्सप, भारी भारी प्रेमाचे मेसेज आणि मग काय काय.! मी खुशीत एक रॉकेट उडवायला अंगणात घेऊन आलो. तेवढ्यात माझा फोन वाजला म्हणून मी रॉकेट शेजारच्या हऱ्याकडे दिले आणि फोन उचलला. सुलीचा आवाज नुसत्या हेलोने ओळखला नसता तर जन्म वाया गेला असता म्हणा की माझा.
"हेल्लो हा कुणाचा नंबर आहे? मला मिसकॉल आले होते या नंबर वरून."
"सुलीबाय अगं मी गणू. ओळखलं नाही का? धारेवाडीहुन बोलतोय."
"गणू? कोण गणू? मी कोणा गणूला ओळखत नाही. असे अनोळखी नंबरावर इतके मिसकॉल द्यायला लाज नाही वाटत का?"
….
तिकडे हऱ्याने रॉकेट पेटवले होते ते भुर्रकन वर उंच आकाशात गेले आणि फाट्टदीशी आवाज करून फुटले. खेळ खल्लास. फोन कट, पत्ता कट.

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

Small Bang Theory-1 (The almighty and past miracles)

आजपासून तब्बल १० हजार वर्षांनी (एका संस्कृतीचा काळ आपण ५-७ हजार वर्षे धरू). एक मोठे उत्खनन झाले तर त्या माणसांस आपली शहरे गावे इत्यादि पाहून आजच्या आपल्या ज्ञानाबद्दल नक्कीच आश्चर्य वाटेल. आज जशा आपण मोहेंजोदडो, हडप्पा, मेसोपोटेमिया इत्यादी संस्कृती उत्खननात बघतो आणि त्यांचे ज्ञान पाहून अचंबित होतो तशीच भविष्यातील माणसे आपले अवशेष पाहूनही अचंबित होतील. हडप्पा मेसोपोटेमिया आणि तशाच कित्येक जुन्या प्रगत संस्कृती त्यांच्या सर्वोच्च उत्कर्ष काळातच नष्ट झाल्या असाव्यात, आणि बहुदा सर्वसंहारक युद्ध हेच त्याचे कारण असावे. मला वाटते प्रगत मानवी समूह हे ५-७ हजार वर्षांच्या कालावधीनंतर अंतर्गत कलहांपरांत नेहमीच स्वत:ला पूर्णत: नष्ट करून टाकत असावेत. आणि मग कुठेतरी विजनात तग धरून राहिलेली अप्रगत माणसे अथवा त्या नष्ट झालेल्या प्रगत संस्कृतीतील अलिप्त (बहुदा मागासपणामुळे/ अशिक्षितपणामुळे अथवा बंड करून वेगळी लपून राहिलेली) माणसे पुन्हा नव्याने नवीन मानवी प्रगती आणि संस्कृती निर्मितीस सुरुवात करीत असतील.
शक्यतो ही नव्याने सुरु करण्याची सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानीक प्रगती अथवा सांस्कृतिक नवनिर्मिती मोठी भ्रमीत करणारी एवं गोंधळपूर्ण असेल. म्हणजे कसे? हे समजून घेण्यासाठी आपण थोडे कल्पनारंजन करूयात.  
तर असे समजू की आजच्या काळात म्हणजे आजपासून काही वर्षांत एक मोठे महायुद्ध होऊन आजचे सगळे देश त्यात पूर्णत: विनाश पावले. मात्र या विनाशातूनही समजा सोमालियातले काही  बंडखोर जे समुद्रात पळून जाउन एखाद्या बेटावर जाउन लपून राहीले असतील ते, अथवा ब्राजीलमधील जंगलांत अजूनही प्रकाशात न आलेली एखादी आदिम जमात हे मानवी समूह बचावले. तर मग पृथ्वीवर मानवी वंश पुढे चालविण्याची पूर्ण जबाबदारी ही या समूहांवर येउन पडेल.  आता प्रगती हा मानवी स्थायीभावच असल्याने समयपरत्वे हे दोन्ही समूह उपलब्ध साधनांचा उपयोग करून जीवन अधिकाधिक सुखकर आणि सुसूत्र करण्यासाठी हळूहळू विविध प्रकारे प्रगती करू लागतील. 
आता ब्राजीलातील ती आदिम जमात ही जशी अश्मयुगातील माणसाची झाली असे आपण म्हणतो, तशी त्यांच्या नैसर्गिक वेगाने प्रगतीकडे वाटचाल करती होईल, पण सोमालियातील बंडखोर हे मात्र सगळा सावळा गोंधळ माजवतील. हा गोंधळ या गोष्टीमुळे माजेल की सोमालीयनांना आजचे उपग्रह, कम्प्युटर, मोबाइल, इन्टरनेट, चंद्रावर मानवी पाऊल, विमान, रॉकेट, पेट्रोल/डीजेलवर चालणाऱ्या गाड्या, अणुबॉम्ब आदी सगळे माहित तर असेल मात्र त्याविषयीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान त्यांचेकडे असणार नाही. मग ते या साऱ्यांचे अस्तित्व आणि उपयोग हे माहित असूनही यातली कोणतीही वस्तू बनवू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रगत तंत्रांची अथवा साधनांची संकल्पना तर त्यांना माहित आहे, किंबहुना तिचा वापर करण्याचा अनुभव सुद्धा आहे मात्र त्यांचे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्या साधनांची निर्मिती करून वापर करता येत नाही म्हणून त्यांच्यात एकप्रकारच्या हतबलतेतून आलेल्या न्यूनगंडाने मोठा गोंधळ माजेल. म्हणजे त्यांचेकडे मोबाइल असतील, गाड्या असतील अथवा जिथे ते लपून बसले होते त्या बेटावरून परत मुख्य भूमीत आल्यावर त्यांना ते सापडतील, मात्र ते मोबाइल वगैरे साधनांचे इन्फ्रास्ट्रक्चरच नष्ट झालेले असल्यामुळे त्याचा उपयोग करू शकणार नाहीत. वाहने ते थोडाकाळ फारतर उपयोगात आणू शकतील पण एका काळानंतर तीही निरुपयोगी बनून गंजून नष्ट होऊन जातील. आणि मग अर्थातच उपयोगात नसल्याने त्या गोष्टींबद्दलची माहिती अथवा त्यांचे एकूण अस्तित्व हेच संपुष्टात येइल. अशा प्रकारे मग आजच्या मानवाची तंत्र आणि विज्ञानातली एवढी मोठी प्रगती ही पुरेशा ज्ञानाअभावी नष्ट होऊन जाईल. 
नव्याने जन्मलेल्या पिढीला तर ते सगळे कळणार नाहीच पण जुन्या पिढीतील ते लोक ज्यांनी हे सगळे पाहीले अनुभवले आणि वापरले असेल तेही मग वेगाने झालेल्या या अध:पतनामुळे अतिशय निराश होऊन जातील. त्यातील काहीजण बऱ्यापैकी संवेदनशील असतील आणि त्यांना वाटले की निदान पुढच्या पिढ्यांना या सगळ्या प्रगतीची माहिती तरी व्हावी जेणेकरून पुढच्या कुठल्याशा पिढीत कोणी न्यूटन अथवा आइनस्टाइन जन्मला तर तो किमान या साधनांच्या संकल्पनेचा धागा पकडून त्यांचे तंत्र शोधू शकेल. अन्यथा संकल्पना शोधण्यातच किती तरी बुद्धिवंतांची बुद्धी खर्च पडून कालपरत्वे वाया जात असते. म्हणून मग ते त्यासाठी किमान ही सगळी तंत्रे काय होती आणि ती कशी काम करायची हे माहित नसले तरी काय काम करायची हे तरी लिहून ठेवतील. आणि ही त्यांनी लिहिलेली माहिती सुद्धा येणाऱ्या काळात नष्ट होऊ नये म्हणून येणाऱ्या पिढ्यांकडून ते ती वदवून, रटून घेतील. अर्थातच मग ही माहिती लिहून ठेवलेली पुस्तके ही त्यांनी एकेकाळी स्वत: अनुभवलेल्या तांत्रिक प्रगतीचे म्हणजेच जुन्या मानवी इतिहासाचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणून गणले जातील. तंत्राचा उपयोग तर माहित आहे पण बनविण्याचे ज्ञान तेवढे नाही आणि त्यामुळे एकंदर जीवन फार कठीण होणार आहे, त्यामुळे निदान पुढे कोणती तरी पिढी हुशार निपजेल तेव्हा ही तंत्रांची जुजबी माहिती त्यांना खूप उपयोगी होईल या भावनेने ते सदर माहिती अंतर्भूत असलेले ग्रंथ हे फार महत्वाचे ठरवून पिढी दरपिढी ते पुढे दिले जात रहावेत, अभ्यासले जात रहावेत म्हणून त्या ग्रंथांना काहीतरी अत्यंत महत्वाचा अथवा दैवी दर्जा देतील. पुढे मग एखादी पिढी त्या माहितीला एखाद्या वेधक आणि नाट्यमय स्वरूपात मांडून सुधारीत आवृत्ती बनवतील. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांस ते अभ्यासणे रटाळवाणे वाटणार नाही. अशा प्रकारे नाट्यमय बनविल्याने व महत्वाचा दर्जा देण्यामुळे आगामी अनेक पिढ्या त्यांचे पठन करत राहतील. मात्र यामुळे नव्या पिढ्यांत ग्रंथप्रामाण्य मानण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टीकोण येण्याऐवजी त्या अधिकाधिक दैववादी होत जातील. 

या सगळ्या घटनांच्या नंतर जवळ जवळ चारेक हजार वर्षांनी वैज्ञानिकतेचा पाया रोवला जाईल. आणि मग थोड्याफार वैचारिक संघर्षानंतर विज्ञान हळूहळू जुन्या परंपरा आणि संकल्पनांवर आघात करू लागेल. नवे शोध लागतील, नवी तंत्रे विकसित होतील. थोडक्यात काय तर प्रत्यक्ष स्वयंअनुभूती आणि प्रायोगीकतेवर आधारीत नवयुगाची सुरुवात होईल. 

आता समजा या नव्या प्रगतीच्या ओघात त्या भविष्यातील मनुष्यांस आपले आजच्या युगाचे जे शोध लागले आहेत म्हणजे जसे की लॉज ऑफ मोशन, फिशन, रिलेटीविटी, इलेक्ट्रोनिक्स इत्यादि ते न लागता त्यांचेकडून वैश्विक रचनेची आताहुन काही वेगळीच तत्वे शोधली गेली तर काय होईल? म्हणजे समजा इलेक्ट्रोमेग्नेटीझमचा शोध या नव्या प्रगत संस्कृतीस लागलाच नाही आणि त्यांनी आपली संचार, उर्जादि गरज भागविण्यासाठी दुसऱ्याच एखाद्या तत्वाचा शोध लावला, तर मग आपली आताची इलेक्ट्रोनिक प्रगती ही त्यांच्यासाठी एक मिथकच ठरेल. असे झाले तर त्यांस त्या सोमालियातील बचावलेल्या आपल्या काळातील माणसांनी लिहिलेली व परंपरागत श्रेष्ठ दर्जा दिलेली पुस्तके, ग्रंथ हे त्यांच्या संस्कृतीने सत्याचे दस्तऐवज म्हणून पिढ्यान पिढ्या अभ्यासले असले तरीही ते त्यांच्या तेव्हाच्या वैज्ञानिक ज्ञानाने सिद्ध होऊ शकत नसल्याने ते खोटे वाटू लागतील. इलेक्ट्रोमेग्नेटीझम माहीतच न झाल्याने आज आपण वापरत असलेले मोबाईल, उपग्रह, इंटरनेट, कम्प्युटर, एलईडी इत्यादी सर्व साधने काम करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसणार नाही, कारण या किंवा अशा सोयस्कर कामांसाठी त्यांनी विज्ञानाच्या दुसऱ्या नियमांवर आधारित शोधांवरून काही अन्य तंत्रे शोधली असतील. आणि ज्या मूळ इलेक्ट्रोमेग्नेटीझम या तत्वावर आपली आजची सगळी तंत्रप्रणाली बेतलेली आहे तिची कल्पनाच न आल्यामुळे त्यांना आपले आजचे शोध आजिबात खरे वाटणार नाहीत.
अशावेळी पारंपारिक आणि नवविचारांत संघर्ष होणे अटळच. मग नवविचारांचे समर्थक परंपरावाद्यांस म्हणजे कम्प्युटर उपग्रह आदि गोष्टींवर विश्वास ठेवणारांस अनेक प्रकारे मागास आणि निर्बुद्ध सिद्ध करतील. ते सरळ सरळ म्हणतील की तुमच्या या परंपरागत ग्रंथांत लिहिलेल्या गोष्टी या केवळ कल्पनेचे मनोरे आहेत. एक सहज हातात धरता येणारे यंत्र (म्हणजे मोबाईल) ज्याद्वारे जगाच्या कुठल्याही व्यक्तीशी थेट (लाइव) बोलले जाऊ शकते असे अस्तित्वात असणे शक्यच नाही. आणि एक असे यंत्र (टीवी) ज्यात माणसे जगातली कुठलीही घटना घरात बसून पाहू प्रत्यक्ष शकत, ती अस्तित्वात होती असे मानणे म्हणजे तर निर्बुद्धपणाच होय. आणि काय तर म्हणे तेव्हाची माणसे एका यंत्राच्या सहाय्याने (कम्प्युटर) केवळ काही कळा दाबून बसल्या बसल्या मोठमोठी कामे करत. कितीही गोष्टींची माहिती कायमस्वरूपी साठवून ठेऊ शकत, मोठमोठी गणिते केवळ काही सेकंदांत करू शकत, आणि आकाशात सोडलेल्या यंत्रांच्या (उपग्रह) आधारे संपूर्ण पृथ्वीवर नजर ठेऊ शकत असे मानणे ही तर बौद्धिक दिवाळखोरीच होय. तुमची परंपरागत दैवी पुस्तके ही कुठल्याही वैज्ञानिक कसोटीवर खरी ठरू शकत नाहीत. त्या केवळ कवीकल्पना असून, नाट्यमय रीतीने मांडलेल्या या कल्पनांस खरे मानणे हा मूर्खपणा होय. जर तुम्ही ती यंत्रे बनवून वापरून दाखवू शकत नसाल तर त्यांचे अस्तित्व होते असे मानणे हे निव्वळ मागासपणाचे लक्षण होय. हे मोबाईल, कम्प्युटर, विमान, टीवी, उपग्रह इत्यादि कधी अस्तित्वात असणेच शक्य नाही. आणि अर्थातच इलेक्ट्रोमेग्नेटीझमचा शोधच लागलेला नसल्याने परंपरावादी लोक अशी काही साधने अस्तित्वात होती हे सिद्ध करूच शकणार नाहीत.  मग ते आपोआप खोटारडे अथवा कनिष्ठ ठरतील.
हेच सद्य स्थितीतही खरे नाही का? शंकराने मारलेल्या हत्तीचे मुंडके गणपतीस जोडणे, येशुने मृत मुलांस जिवंत करणे अथवा स्वत: मृत्युनंतर ३ दिवसांनी जिवंत होऊन परत येणे, कृष्ण, हनुमानाने पर्वत उचलणे, अल्लाहने आपले संदेश पैगंबरास सांगणे, हलाल केलेले पक्षी अल्लाहच्या चमत्काराने जिवंत होऊन उडत उडत परत येणे, संजीवनी विद्या, आकाशवाणी, अमृत, स्वर्ग, पाताळ, नरक, देवदूत, शाप, वरदान, अक्षय्य भाता, वज्र या जुन्या ग्रंथांतील नोंद केलेल्या गोष्टींपैकी एकतरी कल्पना आज विज्ञानाच्या कसोटीस उतरते का? मग हे सगळे नेमके काय? केवळ कपोलकल्पिते की आजच्या विज्ञानाच्या आवाक्याबाहेर असलेले सत्य?

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

बूमरॅंग

पाटील, गावात एक नवीन पाखरू आलंय. सुभान पाटलाकडून घेतलेली तंबाखू मळता मळता किसना म्हणाला.
कोण रं?
आवं त्या गडदुल्या भिवाजीची सून.
म्हणजे कोण त्या हारकुची नवरी काय रं?
व्हय व्हय तीच. गोरी गोरी पान हाये रंगानं, आक्शी पांढरी फटक. आगदी आंगावं चुना फासल्यागत दिसतीया बगा. कुटं ती येवडी ढवळी बाय आन कुटं त्ये काळंचिंद्र आन बैलावानी माजेल हारक्या.! पाटील तुमच्या सारक्या गोऱ्यापान मर्दानंच ठीवावी आशी बाई. येक लंबर कंडा माल हाये बगा.
आरं कशाचं काय. हारक्याच्या लग्नाला गेलू व्हतु की म्या. हालापूरला. आमच्या आईचं म्हायेर. आमच्या म्हाताऱ्याचं उभं वैर व्हतं सासूरवाडीवाल्यांबरुबर. म्हणून जिवंत व्हता तोवर सोता बी कदी ग्येला न्हाई आणि आमाला बी जाऊ धिलं न्हाई आमच्या आजोळी. त्या लग्नाला पयल्यांदा हालापुराला गेलू व्हतु म्या. पण आजोळी तरी बी ग्येलोच न्हाई.  म्हणलं कशाला म्हाताऱ्याच्या आत्म्याला दुखवा? न्हाई का? म्या पाह्यली हाय तिला. माल बिल काय न्हाई, निस्तीच पांढरी पाल हाये बस. मला काय नगं. तुला येवडी पसंत हाये तर जाय की तूच घ्ये तिला. पण लक्षात ठीव किसना, मायला त्यो हारक्या म्हंजी खरंच बैल हाये. त्येला कळालं आन त्येचं डोस्क फिरलं तर तुला आशी काही ढुशी मारील का परत तू काय ताठ उबा ऱ्हाणार न्हाईस.
सुभान पाटील म्हंजी पंचक्रोशीताला सगळ्यात रंगेल गडी. त्येनं गावातच न्हाई तर आजूबाजूच्या गावांत बी किती अन कुटं कुटं श्यान खाल्लं आसंल अन किती पोरी अन बायांचा नास केला आसंल त्येला गणती न्हाय. या नादापायी त्येनं दोन चार जणांचं खून बी पाडलं आसल्याचं गावात बोललं जातंया. त्येचा बाप आर्जून पाटील मातुर चांगला व्हता. आधीच पाटीलकी आन वरून कामाची आवड असल्यानं त्येनं कष्ट करून रग्गड पैका कमावला व्हता. पण पोराचे आसले धंदे पाहून बिचारा साठीच्या आदीच कळवळून म्येला. ऐन तरनाईत येवडा पैका अन पाटीलकी मिळाल्यावर तर सुभानराव मोकाट सुटला. नको नको ते घाणेरडे धंदे त्येनं केले. फुकटे गावगुंड पोसले आसल्यानं कुणी त्येच्या इरुद येक सबुद बी काढीत नसंत.
किसना त्येच्यापेक्षा बराच मोठा असूनबी त्येचा मैतूर व्हता, मैतूर म्हणण्यापरीच त्येचं बांडगुळंच म्हणाना. पाटलाच्या परतेक धंद्यात हाच त्येला जोडी आसे. पाटलाच्या उष्ट्या खरकट्यावर ताव मारायचा येक बी चानस त्यो सोडीत नसं. आपली थुकी जरी पडली तं लगोलग झेलणारा आसल्यानं पाटील बी त्येला नेहमी जवळ करी.  
ग्येली कित्येक वरसं दोगांच धंदं बिनबोभाट चालू व्हतं.

येक दिवस असाच किसना वाडयावं आला, आन आल्या आल्या म्हणाला, काय पाटील? ती हारक्याची पांढरी पाल मला नगं म्हंतालात ना तवा? आन मला सांगल्याबिगर गपचिप डाव बी क्येलात व्हय?
आरं काय बोलतुयास? त्वांड हाय का xxx? बोलातुयास की हागतुयास रं सुक्काळीच्या.? कोण पाल? अन कंचा डाव? 
आवं ती भिवाजीची सून, हारक्याची बायकू म्हणतुया मी .
हा मंग तिचं काय झालं?
तिचं काय न्हाई झालं मालक, तिला झालंय, एक प्वार तीन वर्सापूर्वी. आता त्ये गावात फिरतंय. आन आक्षी तुमचाच मुखडा घेतलाय पोरानं. कोणी बी जुनं जाणतं माणूस ज्येनं तुमास्नी ल्हानपणी पाहिलंय ते सपस्ट सांगल की ही तुमचीच निपज हाय म्हणून.जसं तुमी दिसायचा ल्हानपणी आगदी तसंच दिसतया ते प्वार. 
काय सांगतूस? आरं लग्नात दिसली व्हती तवापासून म्या तिला परत पाह्यली सुदीक न्हाई. प्वार काडायचं तं लांबच राह्यलं.
काय सांगता मालक? मग पोरानं तुमचा तोंडावळा कसा घ्येतला म्हणावा?
नक्की प्वार माज्यावानीच दिसतंय म्हन्तूस?
म्हणजे काय मालक? आवो येक्शे अन येक टक्के तुमीच.
किसना आरं आता माज्या ध्यानात आलं. आमचा म्हतारा नव्हं तर आमची मायच आमास्नी मायेरी न्येत नव्हती, येकटीच जात व्हती. नक्कीच आमच्या म्हताऱ्यानं सासुरवाडीला झ्येंगाट जमिवलं आसणार. म्हणूनच माय आमास्नी तिकडं  न्येत नव्हती. तरी म्हणलं म्हातारं तर सरळ सादं व्हतं आशीच सगळी गावातली लोकं म्हणत्यात मग आमच्यातच हा रंगेलपणा कुठून आला. आज कळलं. म्हंजी म्हातारं थेट सासुरवाडीतच रंग उधळीत व्हतं तर. मायला मानला बरका आमच्या आबाला. मजा केली पर पण ह्या कानाची त्या कानाला खबर लागू धीली न्हाई भादरानं.
 म्हंजी प्वार तुमच्या नव्हं तर थोरल्या मालकाच्या उद्योगामुळं तुमच्यावानी दिसतंय म्हणा की.
आरं व्हय की रं खरंच. आसं म्हणून हसून दोगांनी टाळ्या घेतल्या.
 म्हंजी आता हारकु तुमचा दाजी झाला की मालक. हा हा हा.! पर मालक कावणार नसाल तं येक गोष्ट सांगायची व्हती
बोल
तुम्ही नगं म्हणालात तवा मी तुमास्नी न सांगता येकदा तिकडं चानस माराया गेलू होतु. पर हारक्यानं मला वाटंतच हाडकला. म्या म्हनालू सुबान पाटलानं पाठीवलंय तुज्या म्हताऱ्याकडं काही रक्कम निगतीया ती घ्यायला चाललोय. तर त्यो मला म्हणतो की माज्या बा नं कदी कोणती रक्कम घ्येतली न्हाय. आमाला तुमची गरज न्हाय. माझा म्हतारा कष्टकरी व्हता. कदी कुणापुडं हात न्हाई पसरलं त्येनं. काहीबी सांगू नको. म्या चांगला वळीकतो तुला. जर परत तू न्हाई तर तुजा सुबान पाटील इकडं वाकडी नजर टाकाया परत आलात तर शपथ घेऊन सांगतो की तुमचं डोळं न्हाई फोडलं त भिवाजीचं नाव सांगणार न्हाई. आमची खाण तुमच्या पाटलावाणी गावजानी न्हाई. तवा गप मापात ऱ्हावा. गावची चार लोकं आजूबाजूला व्हती पाटील तरीबी तेन्च्यासमोर तुम्हाला त्यो आसं घालून पाडून बोलला रांडीचा.  
काय? आमची खान गावजानी हाय आसं म्हणाला त्यो?
आरं मग त्वा मुस्काड कसं फोडलं न्हाई त्या भोसडीच्याचं?
 मालक अवो आजून लोकात तमाशा झाला आसता म्हणूनशान गप बसलो. आणि तसाबी गडी आडदांड हाये त्यो. अन मला म्हाईत व्हतं की आपल्याला बी नक्की वखुत मिळंल त्येचं नाक ठेचाया. आता त्यो वाखुत आलाय पाटील. तुमच्या अपमानाचा सूड घ्याया हीच येळ हाये. तुमाला गावजाना म्हनतुया ना, चला आता त्येलाच जाऊन सांगू की कसा त्येचाच ल्योक एका गावजानीच्या पोरीच्या पोटी जल्माला आलाय त्ये.!
"व्हय व्हय नुसतं त्येलाच का? समद्या गावाम्होरं तमाशा करून आबरू काडू भूसनळ्याची, चालच तू." आसं म्हणून दोगं तडक हारक्याच्या घरी निगालं.     
हारक्याच्या घराजवळ त्ये पोचले तवा दारात एक पोरटं मातीत काहीबाही चिवडीत बसलं व्हतं. मायला ह्येच का रं त्ये गाभडू किसना? आरं खरंच की आगदी माझ्यावानीच तोंडावळा हाये की रं रांडीच्याचा. आमच्या ल्हानपणीच्या फोटूत आम्ही आगदी आसंच दिसतुया की रं.!!
आसं म्हणून पाटलानं त्या पोराला जवळ बोलीवलं व इचारलं तुवं नाव काय रं पोरा? पण प्वार काही न बोलता टिंगराला पाय लावून थेट घरात पळून ग्येलं. मग पाटील अन किसना अंगणात आलं. सुभान पाटील घराच्या दाराकडं त्वांड करून जोरात वरडला. 
"हारक्या आरं ये हारक्या, तुह्या मायला भायेर निग सुक्काळीच्या."  आसं म्हणून पाटील हारक्याला आजून घाणेरड्या शिव्या देत वरडू लागला
सुभान पाटलाच्या वरड्यानं गर्दी जमा व्हाया लागली. तसा हाराकू लगबगीनं घराभायेर आला अन पाटलाला म्हणाला काय झालं पाटील? ह्ये बगा तुमचं ज्ये काय म्हणणं आसंल त्ये आपुन पुन्हा कधीतरी मिटवू, पर आज नगं. आज माज्या घरी पाव्हणं आल्यालं हायती.
आरं तुझा पावणा कोण मोठा गोपाळशेट हाये का रं?. पावणा हाये तं बोलीव त्या मायचोद्याला बी भायेर. मायला दोगांचीबी आयमाय लावून टाकतो हिथल्या हिथं. मला गावजाना म्हन्तुस काय रं घाणघाल्या?
पाटील म्या तुमास्नी हात जोडतो. सासरा अन त्येच्या सोबत दुसरी सासुरवाडीची मंडळी आल्याली हाये. त्येंच्याफुडं तमाशा नगं. म्या उद्या सोता तुमच्या वाड्यावं येतो तिथं काय झालं आसंल ते पाहू. पण आता इथून जा.
आरं हाड. मला गावजाना म्हन्तुस व्हय रं? आज म्या समद्या गावाला दावून देणार हाय कोणाची खाण गावजानी हाये ती. तुजा सासरा हिथं हाये ह्ये ब्येसच झालं. बोलीव तुज्या कार्ट्याला अन सासऱ्याला बी भायेर. गावकऱ्यानू आज म्या तुमास्नी दावतो या हारकुच्या वंशाच्या दिव्यात कंचं त्याल पडलंय त्ये.!! गावकऱ्यानो, आरं ह्या हारक्याचा सासरा म्हंजी त्या पांढऱ्या पालीचा बाप नामर्द हाये नामर्द. आरं ये की नामर्दा भायेर. का बांगड्या भरून बसलाइस आतच? असे सुभान पाटील ओरडू लागला. किसना बी शिव्या देऊन त्येला साथ करीत व्हताच. भायेर गावाची लोकं जमल्याली अन घरात सासरची मंडळी त्यामुळं हारक्याला काय करावं त्ये सुधरंना. त्यो भांबावून पाटलाला शांत व्हा पाटील म्हणून इनवित राह्यला.  
तेवढ्यात भायेर ह्यो समदा गडबड गोंधळ चालू आसतानाच घरातून हारकुचा सासरा काय भानगड हाय त्ये पहाया भायेर आला.
सासरा भायेर येउन दरवाज्यात उभा ऱ्हायला. सुभान पाटलाचं त्येच्याकडं लक्ष ग्येलं, आणि त्याला पाहताच ओरडणारा पाटील एकदम गप्पगार झाला. त्याचा रागाने लालबुंद झालेला चेहरा अचानक पांढरा फटक पडला. किसन्याच्या तोंडातून बी सबूत फुटंना. त्याला पुढं येताना पाहून पाटलानं लागलीच मान खाली घातली आणि उलटा फिरून काहीही न बोलता तो अन किसना आशे दोगंबी तडक माघारी निघून ग्येले.
तमाशा नको म्हणून दारातून भायेर येणाऱ्या सासऱ्याला तसेच मागच्या मागे घरात वळवून हारकु आत घेऊन गेला. नेमकं काय झालं अन येवढा रागावलेला सुभान पाटील अचानक पाहुण्याला पाहून का घाबरला याचं नवल करीत जमल्याली गर्दी बी हळूहळू पांगून गेली. 
कोणाच्या ध्यानात आलं व्हतं की न्हाई कुणास ठाऊक पण पाटील हारक्याच्या सासऱ्याला बगून लगोलग माघारी फिरला त्याला एक कारण व्हतं. त्या माणसाला बगताच पाटलाचा सारा माज खर्रकन गळून पडला व्हता कारण, जवा त्यो माणूस दारात आला अन पाटलानं त्येच्याकडं पाह्यलं तवा त्येला आसं वाटलं की जणू त्यो दरवाजा नसून मोठा आरसाच हाये, अन पाटील त्या आरश्यात सोतालाच पाहतोय. त्या माणसाचा चेहरा आगदी शेमटू शेम सुभान पाटलावानीच व्हता. त्ये पाहताच सुभान पाटलाच्या लगेच लक्षात आलं की जे हारक्याचं प्वार हे आपल्या बापाच्या रंगरेलीची निपज म्हणून जल्माला आलंय आसं सिद्ध करून त्यो हारक्याची इज्जत काढणार व्हता त्ये प्वार पाटलाच्या बापाच्या बीजाची निपज नसून उलट सोता पाटील हाच हारक्याच्या सासऱ्याची निपज व्हता. ह्यो हारक्याचा सासरा नक्कीच सुभान पाटलाच्या आईच्या म्हायेराचा यार असणार अन म्हणूनच त्येचा बाप आर्जून पाटील त्यास्नी कदीच आजोळास जाऊ द्येत नव्हता. आणि हारक्याचा सासरा न्हवं तर बहुतेक सोता आर्जून पाटीलच नामर्द व्हता अन म्हणूनच सुभान पाटलाला दुसरं कंचच भावंड न्हवतं.

मंगळवार, १४ जुलै, २०१५

लिविंग इज समथिंग डीफरंट द्यान स्टेयिंग अलाइव


रविवारी कसारा ट्रेनमध्ये भेटला एक अवलीया. पायात एक तुटकी पण दोऱ्याने शिवून जोडलेली ती ब्लू व्हाईट स्लीपर जी आजकाल दिसतही नाही ती घातली होती त्याने. तीही नावापुरतीच. जमीन आणि पायातले अंतर जेमतेम चार मिलीमिटरचे ठेवेल एवढी घासलेली. शरीरयष्टी बऱ्यापैकी जाडीजुडी म्हणावी अशी. हाफ शर्ट आणि पॅंट घातलेली होती आणि दुसऱ्याच्या हातातला पेपर डोकावून वाचत होता म्हणजे किमान हायस्कुलपर्यंत शाळा शिकलेला असावा. वय पन्नाशीच्या आसपास असावे. गळ्यावर, उघड्या छातीवर फाटलेली त्वचा, हातावरही नायटासदृश विकारांच्या खुणा असा काहीसा अवतार होता त्याचा.
मी आजपर्यंत धम्मक पिवळे दात असलेली माणसेही पाहिली आहेत, पण याचे दात अक्षरश: काळेकभिन्न होते. त्यांची ठेवणसुद्धा वाडग्याच्या कडेला फुटक्या वेगवेगळ्या आकाराच्या फरश्या कंपाउंड म्हणून वाकड्या तिकड्या रोवून ठेवाव्यात तशीच होती. मात्र तरीही तो ओंगळवाणा नव्हता. कपडे मळके नव्हते.
खिडकीच्या शेजारी माझ्या समोरच बसला होता तो. कुणीही विचारले नसूनही आजूबाजूच्यांना ट्रेन कधी सुटेल आणि कधी कुठे पोचेल हे अविरत बडबड करून सांगत होता. माझा मित्र एक पाण्याची बाटली घेऊन आला. आम्ही त्यातून घोट घोटभर पाणी प्यालो. तेवढ्यात डब्यात पाणी बॉटल विकणारा आला. त्याने त्याचेकडून एक बाटली घेतली आणि म्हणाला ही मला अशीच दे. विक्रेता म्हणाला अशीच म्हणजे? तो म्हणाला म्हणजे मी पैसे नाही देणार. विक्रेता म्हणाला असे कसे? तो म्हणाला अरे माझे आशीर्वाद लाभतील तुला, धंद्याची भरभराट होईल. विकणारा म्हणे फुकट दिल्याने धंद्याची भरभराट कशी होईल? तेवढ्यात विक्रेत्याचा दुसरा जोडीदार लांबून ओरडला, अरे त्याचेकडून घे ती बाटली आधी. उगीच टाईमपास नको. मग त्याने ती बाटली परत केली. त्यानंतर डब्यात वडापाववाला येवो की भेळवाला, त्याने प्रत्येकाकडे त्याची वस्तू फुकटात मागीतली पण कुणीही दिली नाही. परत एक पाण्याच्या बाटलीवाला आला याने परत त्याचेकडेही बाटली मागीतली. त्याने दिली आणि वीस रुपये मागीतले. हा म्हणाला फुकट दे. बाटलीविक्याने त्याचे हातातून बाटली परत हिसकून घेतली. अशा प्रकारे प्रत्येक विक्रेत्याकडून नकार घेऊनही त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे, दु:खाचे अथवा क्रोधाचे इवलेसेही एक्स्प्रेशन उमटले नाही. तो भिकारी नव्हता पण मी तर कित्येक भिकाऱ्यांन्नाही भीक न दिल्यावर केविलवाणा चेहरा केलेले अथवा अगदी शिवी दिलेले पाहिले आहे. पण याचे रसायन काही वेगळेच होते. मग त्याने माझ्याकडे पाणी मागीतले मी त्याला माझी बाटली दिली. त्याने बाटलीला तोंड लावूनच पाणी पिले. त्याच्या काळ्या दातांचे दर्शन घेतल्यावर मी त्याने उष्टी केलेली बाटली परत घेणे शक्यच नव्हते. मी त्याला म्हंटले की ती बाटली तुम्हालाच राहू द्या.
त्याचेकडे एक भरलेली बाजाराची पिशवी होती. ती त्याने आम्ही समोरासमोर बसलेले असल्याने आमच्या दोघांच्याही पायाच्या मध्ये ठेवली होती. मग त्याने त्या पिशवीत हात घालून एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली दुसरी एक पिशवी काढली आणि तिच्यातून थोडी तंबाखू हातावर घेतली आणि मला चुना मागीतला. मी म्हणालो मी तंबाखू खात नाही. मग त्याने बसल्या जागेवरूनच इकडे तिकडे वळून ज्या कुणाचे त्याचेकडे लक्ष जाइल अशा प्रत्येकाकडे चुना मागितला. पण त्याला कुणीच चुना दिला नाही. मग तो उठला आणि त्याच्या जागेवर पिशवी ठेऊन दुसरीकडे चुना आणायला गेला. एकाच मिनिटात हातात चुन्याची डबी घेऊन तो परत आला. मी म्हणालो अहो कुणाची डबी आणलीत? त्याला चुना काढून परत करा की ? तो म्हणाला नाही नाही त्याने ती मलाच देऊन टाकली आहे. 
मग त्याने तंबाखूचा तोबरा भरला. आमच्या शेजारी एक ट्रेकर्स ग्रुप बसला होता ती पोरे याचे चाळे पाहून त्याचेवर जोक्स मारून हसत होती. पण त्याला त्याने काडीचाही फरक पडत नव्हता. त्याची अविरत बडबड चालूच होती. या पोरांनी काहीतरी खाऊ खायला काढला. याने त्यांना खाताना पाहीले. आणि म्हणाला खा खा तुम्ही बिनधास्त खा. त्याला ते काय खाताहेत ते खायचे असावे पण जसे विक्रेत्यांकडे तो सरळ सरळ वस्तू मागत होता तसे त्याने या पोरांकडे सरळ नाही मागीतले. पण त्या पोरांनी त्याचेकडे लक्षही दिले नाही उलट त्याचेवर काहीतरी कमेंट मारून त्यांनी एकमेकांच्या टाळ्या घेतल्या.
मी मित्राला म्हणालो की मला वाटते हे एक परफेक्ट स्टोरी मटेरीयल आहे आपण याची थोडी अजून माहिती काढू. मी मग त्याला विचारले की तुमचे गाव कोणते? त्याने आसनगावजवळचे कोणतेसे गाव सांगितले. तो आसनगावला उतरून तिथून एसटी किंवा जीप अथवा रिक्षा पकडून गावी जाणार होता. (याने ट्रेनचे तिकीट काढले असेल का? असा विचार माझ्या मनात आला. आणि ट्रेनमध्ये एकवेळ तो सुटेल पण एसटीवाले त्याला विनातिकीट प्रवास करू देतील?) मी म्हणालो इकडे कशाला आला होतात तुम्ही? तो म्हणाला बाजार करायला, ही काय बाजाराची पिशवी.! मी त्याला विचारले इथे बाजारात तुम्हाला पैसे न देता लोक वस्तू देतात? तो म्हणाला हो तर. म्हणजे वस्तूंच्या दुकानावाले वस्तू देत नाहीत पण भाजीवाले देतात थोडी थोडी भाजी. ही काय मी सगळी पिशवी भरून घेतली आहे. आणि एवढेच नाही तर हे बघा एका दुकानदाराने तर मला चिकनसुद्धा दिले आहे असे म्हणून त्याने त्याच्या पिशवीतली एक दीडेकशे ग्राम चिकन असलेली काळी पिशवी काढून दाखविली. मी या माणसाच्या या अंगभूत गुणाने अचंबित झालो होतो. मला तर माझी स्वत:ची दुसऱ्याला दिलेली एखादी वस्तू त्याला मी परत मागितल्याने वाईट तर वाटणार नाही ना अशा विचाराने परत मागण्याची लवकर हिम्मत होत नाही,  आणि हा मनुष्य या क्रूर व्यावहारिक जगात सहजपणे कुणाकडेही त्याला हव्या त्या वस्तू खुशाल आणि फुकट मागत होता. आणि त्यात आजतागायत यशस्वी देखील झालेला होता.
मला एकंदर त्याच्या जीवनशैलीबद्दल अंदाज आला होता. मग मी त्याला थोडे वेगळे प्रश्न विचारायचे ठरविले. मी विचारले तुम्हाला मोदी कोण आहेत हे माहित आहे का? तो म्हणाला हो माहित आहेत. मी म्हणालो कोण आहेत मोदी? तो म्हणाला "सरकार". त्याच्या या उत्तरावर ट्रेकर्स ग्रुप मधून हशा उसळला. त्या हसण्याने मात्र त्याला वाईट वाटले असावे. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने एका विचित्र नजरेने माझ्याकडे पाहून तू मुद्दाम माझे हसे करण्यासाठीच तर हा प्रश्न विचारला नाहीस ना असे नजरेनेच मला विचारल्यासारखे वाटले. त्याचा चेहरा काहीसा उतरला असावा असे मला जाणवले. मला त्याचे फार वाईट वाटले. मी मग त्याला प्रश्न विचारणे बंद केले. मित्र म्हणाला अजून माहिती काढ ना त्याची. मी म्हणालो नको रे बाबा, काय घ्यावे पुन्हा लोक त्याला हसले तर तो माझ्या कानाखाली देखील खेचायचा. पण मित्र म्हणाला असे काही होणार नाही थांब मीच विचारतो तू नुसते ऐक. पण कथा भन्नाट झाली पाहीजे. मी म्हणालो अरे एवढे पुरेसे आहे यात मी माझ्या मनाने त्याच्या कॅरेक्टरला अजून कंगोरे जोडून लिहील रे. पण मित्र म्हणाला नाही आपण त्याला अजून विचारुच. मग आम्ही दोघांनीही परत त्याला थोडे प्रश्न विचारले. त्यातून त्याचेबद्दल मिळालेली माहिती अशी. तो कुठलेही काम, धंदा, नोकरी करत नाही. तो फक्त आठवड्यातून तीन वेगवेगळ्या गावच्या बाजारांत जातो. आणि तिथून असाच फुकट मागून बाजार करतो. त्याला घरचे कोणी नाही. लग्न झाले नाही. तो बहिणीकडे राहतो. पण फुकट कसे रहावे म्हणून असा बाजार करून आणतो. कधी कधी विनातिकीट प्रवास करता येत नाही, रिक्षा अथवा जीपवाले लोक मारायला धावतात मग अशावेळी त्यांना द्यायला पैसे असावेत म्हणून तो दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात रुईच्या पानाच्या माळा बनवून विकतो. त्याने खिशातून एक डायरी काढून त्यात ठेवलेल्या दहा दहाच्या दोन नोटादेखील मला दाखविल्या.  खरेतर देवापुढे अशा वस्तू विकून धंदा करण्याच्या प्रथांचा मला अत्यंत तिटकारा आहे. असा कसा देव जो भक्तांना लुबाडायला इतर भामट्यांना मदत करतो असे मला वाटते. पण तो मारुतीच्या माळा विकतो हे ऐकल्यावर मी लौकिकार्थाने नास्तिक असलो तरीही माझी देवाप्रतीची ही तक्रार निदान आतापुरती तरी दूर झाली आहे. भलेही भक्तांना लुबाडणारे लाखो लोक असा धंदा करत असोत पण देव ते सगळे खपवून घेतो कारण देवाला अशा एखाद्या भणंग वेड्याला तिकिटाचे पैसे देत नाही म्हणून मार खाण्यापासून वाचवायचे असते. या अशा एकाला वाचविण्यासाठी देव इतर हजार लुबाडणारांनाही सहन करतो.
मी त्याला म्हणालो तुम्ही मुंबईला का जात नाही मग? तिथे काही काम मिळेल. कधी गेला आहात का मुंबईला? तो म्हणाला, नाही गेलो कधीच. आयुष्यभर कसारा-आसनगाव ट्रेन प्रवास करणारा माणूस कधीच मुंबईला गेला नाही हे एक आश्चर्यच नव्हे काय? मग तो म्हणाला एकदा गेलो होतो पण मुंबईला नव्हे तर ठाण्याला. मी म्हणालो कशाला? तर म्हणाला ते xy जातीचे अधिवेशन होते ना तेव्हा खूप गाड्या पाठविण्यात आल्या होत्या, त्यात बसवून मला घेऊन गेले होते अधिवेशनाला. खूप छान होते अधिवेशन कारण आम्हाला पैकेटमध्ये भरून जेवण देखील तिथे फुकट दिले आणि मग परत गावीही गाडीतच बसवून आणून सोडले. मी मनातच म्हणालो वाह रे जात.!! अधिवेशनासाठी उपस्थितांची संख्या एकाने वाढविणारा एवढीच जातीला त्याची किंमत. बाकी आयुष्याला जात नुसतीच बिनकामाची फरफटविलेल्या गोंदणासारखी कायमची माखलेली.
ते काही असो त्याच्या आयुष्यात प्रचंड वेदना होती पण चेहऱ्यावर निरंकार भाव होते. ही निर्विकारता त्यास बिकट परिस्थितीतून साकारली होती की अपघाताने साधली होती हे माहित नाही, पण याच निरपेक्ष निरंकार स्थितीला पोचण्यासाठी ज्ञानी लोक आपली अवघी आयुष्ये तपश्चर्येत घालवितात हे मला माहित आहे.

जीवन म्हणजे तरी काय असते? किती माणसे खऱ्या अर्थाने आयुष्य जगतात? आणि किती नुसतीच जिवंत असतात? नुसते बक्कळ पैसा कमाविणे, शरीरास भोग देणे आणि ऐषोरामात लोळणे म्हणजे जगणे काय? 
'द कृड्स' या चित्रपटात एक वाक्य आहे. अश्मयुगातील आपल्या कुटुंबाला अनेको हिंस्त्र पशुंपासून वाचविण्यासाठी नेहमी एका गुहेतच बंद करून ठेवणाऱ्या बापाला त्याची नुकतीच वयात आलेली मुलगी म्हणते,  "धिस इज नॉट लिविंग, धिस इज जस्ट नॉट डायींग." मी अजूनही हे ठरवू शकलो नाहीये की हा माणूस नुसताच जिवंत आहे की थोर आणि अत्यंत कठोर तपश्चर्येपश्चात प्राप्त होणाऱ्या स्थितीस सहजपणे पोचून खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो आहे?

शुक्रवार, २६ जून, २०१५

वृष्टी


आषाढवृष्टी अवचित भिडते अंगास
अन वसनांचे सैल होतात भ्रम
मातीच्या माझ्या देहावर
थेंबांचे उलगडत जातात क्रम

विद्युल्लता शिर्शीरते अंतर्बाह्य 
भोगासाठी व्याकुळ होतो देह
उचंबळतो आवेग पंचेन्द्रीयांचा
अंग अंग व्यापतो मोह

तुझा वाहणारा ऋतू
माझे पायरीशी रुतलेले पाय
मातीवर ओल्या रेघोट्यांत
अभिलाषेची उतू जाणारी साय

श्वास तुटतो, आस सुटत नाही
विळखा आवळतो सर्प
मी तप्त लाव्याखाली
गोठवत राहतो बर्फ

व्यथा भोगातून मोक्षात उतरते
पर्वताला वेढतो मेघ
नसांत वारा भरला की
वारूस आवरत नाही वेग

अंगास लागते धार अन
क्षणार्धात ओघळून जाते माया
पुन्हा पुढच्या पावसासाठी
शुष्क होते काया

सोमवार, २२ जून, २०१५

टाइम वार्प- युद्ध


1.
तुम्ही कोण आहात?
मी तुझा पप्पा आहे बेटा
मग इतके दिवस तुम्ही कुठे होता?
मी ना खुप लांब गेलो होतो काम करण्यासाठी.
तुम्ही इथे जवळच काम का करत नाही डॅनियलच्या पप्पांसारखे? म्हणजे तुम्हीही रोज घरी याल.


2.
पप्पा तुमचा ड्रेस असा का आहे?
मी सोल्जर आहे ना बेटा म्हणून.
सोल्जर म्हणजे काय पप्पा?
म्हणजे जे लढाई करतात ते.
मग लढाई म्हणजे काय?
म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना मारणे.
तो डॅनियल मला खुप त्रास देतो पप्पा तुम्ही त्याला माराल?

3.
पप्पा तुम्ही लढलात ही लढाई?
हो बेटा.
वॉव.! तुम्ही किती दुश्मनांना मारले?
23 जणांना.
वॉव पप्पा तुम्ही किती ब्रेव आहात.! आय एम् प्राउड ऑफ यु.!!
वुई शुड बी प्राउड ऑफ अवर नेशन बेटा. एक अत्यंत अवघड आणि निर्णायक विजय मिळविला आहे आपल्या देशाने..

4.
पप्पा आता पुन्हा युद्ध होईल का हो?
माहीत नाही बेटा, त्या एशियन देशाशी चर्चेतून तोडगा निघाल्यास उत्तम.
पण युद्ध झालेतर तुम्ही जाणार?
हो जावेच लागेल.
देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

5.
पप्पा तुम्हाला 'बी' क्रॉस मिळाला ना?
हो. आपल्या देशाचा दूसरा सर्वोच्च मिलिटरी सन्मान आहे तो.
यावेळी तुम्ही किती जणांना मारले?
मला नक्की माहीत नाही बेटा. पण खुप लोक होते.
यु मस्ट बी वेरी प्राउड ना पप्पा.
कुणाही सैनिकासाठी ही खुप गौरवाची बाब आहे बेटा.!!

6.
पप्पा पहा तुमचे नाव टीव्हीवर किती वेळा घेतले जातेय आज. दुसऱ्या महायुद्धानंतरचे हे शत्रुदेशाच्या सर्वाधिक केज्युअल्टीज् झालेले युद्ध होते. यु आर अ हीरो पप्पा. नॉट जस्ट हीरो, यु आर द रियल लाइफ सुपरहीरो फॉर मी.!!
हीरो वगैरे काही नाही बेटा. आपण जिंकणारच होतो. एवढासा तो देश आपल्या अफाट सामर्थ्यापुढे काय टिकणार होता?

7.
पप्पा तुम्हाला 'ए' क्रॉस डिक्लेयर झालाय. आय एम सो हॅप्पी.!!
व्हाट्स देअर टू बी सो हॅप्पी डियर?
म्हणजे काय पप्पा? अशा कट्टर देशाबरोबर लढून तुम्ही हजारो दुष्मनांना मारले आहे. आपला मोठा विजय झाला आहे. तुम्हाला देशाचा सर्वोच्च सन्मान, 'ए' क्रॉस मिळाला आहे. बी आणि ए असे दोन्ही क्रॉस मिळविणारे तुम्ही आपल्या देशाच्या इतिहासातले केवळ चौथे वीर आहात. आणि जीवंतपणी तो मिळविणारे पहिलेच.!! इट्स अनडाउटेडली द मोस्ट प्लीजन्ट थिंग टू हॅप्पन इन एनिबडिज् लाइफ पप्पा.!!

8.
पप्पा आता कसे वाटतेय तुम्हाला? स्वत: प्रेसिडेंटनी तुम्हाला सेल्यूट केला 'ए' क्रॉस प्रदान करताना.!!
त्यात काय विशेष वाटायला हवे?.
विशेष कसे नाही पप्पा? अहो असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेय. यु आर ग्रेटर द्यान द ग्रेटेस्ट पप्पा.
पण याची खुप मोठी किंमत मोजली आहे मी बेटा. जेवढ्या शत्रुंना मी आजपर्यंत मारले त्याहुन अधिक सहकारी गमावले आहेत. आधी विजयाच्या उन्मादात मला हे जाणवत नसे पण आता जाणवते. अरे कित्येक वेळा आपल्या देशासाठी वेडे होऊन लढणाऱ्या तुझ्या वयाहून लहान मुलांना मी मारले आहे. या अशा लढण्यात काय पुरुषार्थ? आणि छोट्या मुलांना मारण्यात कोणती देशभक्ती?  बेटा कोणताही विजय अंतिम नसतो हे युद्धाचे सर्वात मोठे अपयश आहे.
पण पप्पा मी तर सेना जॉइन करुन देशासाठी तुम्हासारखे पराक्रम गाजविण्याचे स्वप्न बघतो आहे. तुम्ही असे काय बोलता आहात? मी मिलिटरी जॉइन करू की नको?
या प्रश्नाचे मला हवे असलेले उत्तर मी तुला देऊ शकत नाही.
पण का पप्पा?
कारण आज माझ्या छातीवर हे 'ए' आणि 'बी' असे दोन्ही क्रॉस आहेत बेटा.!

सोमवार, १८ मे, २०१५

कोंबडी आधी की अंडे याचे उत्तर


आणि मग अखंड मानवजात हजारो वर्षे याच एका गहन कोड्यात खितपत पडलेली असताना मग खडकी व राजूर संस्थानाच्या श्रीमंतांनी ठरविले की जगातील सर्वात अवघड प्रश्नास उत्तर द्यायचे.
खरेतर खडकी व राजूर संस्थानाच्या श्रीमंतांचा शब्द हाच प्रमाण, पण तरीही काही शहाजोग आधुनिक नतद्रष्ट याचे स्पष्टीकरण मागू धजतील तर त्यांचेसाठी औदार्याचे मूर्तिमंत प्रतिक स्वयं खाशा श्रीमंतांचे हे घ्या स्पष्टीकरण.
खडकी आणि राजूर ही जशी एकाच श्रीमंतांची दोन संस्थाने तशीच या एकाच प्रश्नाची दोन वेगवेगळी रूपे आहेत.
१) कोंबडी आधी की कोंबडीचे अंडे आधी?
तर प्रजाजनहो, इव्होल्युशन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे खडकी व राजूर संस्थानात त्यांचेसाठी रूढ करावयाचा शब्द आहे उत्क्रांती.!! तर सगळे सजीव हे निरंतर उत्कर्षित म्हणजे इवोल्व होत असतात. प्रामुख्याने हे इवोल्युशन आधीच्या प्रजातीत काही जनुकीय बदल किंवा म्युटेशन झाल्यामुळे होत असते. म्युटेशन हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. म्युटेशनमुळेच एका प्रजातीतून दुसरी प्रजाती निर्माण होते. जसे मानव (म्हणजे अगदी खडकी राजूर संस्थानातले मानव सुद्धा बरे का) हे माकडापासून इवोल्व झाले आहेत. हे म्युटेशन प्रामुख्याने बीजकोशात होत असते तेव्हाच नवी प्रजाती निर्माण होते.
तर असे समजू की एवोल्युशनमध्ये कोंबडी ही एका दुसऱ्या प्रजातीपासून निर्माण झाली. त्या आधीच्या प्रजातीला आपण चोंबडी म्हणू.
तर पहिली कोंबडी ही या चोंबडीच्या म्युटंट अंड्यापासून तयार झाली. हे म्युटेशन सक्षम असल्याने कोंबडी सर्वाइव झाली. आणि मग कोंबडीने जे नवे अंडे दिले त्या अंड्यातून कोंबड्याच कोंबड्या निर्माण झाल्या, आणि त्या कोंबड्या खडकी राजूर संस्थानाच्या श्रीमंतांच्या मुदपाकखान्यात रुजू झाल्या.
मग काय? मिळाले ना उत्तर. ज्या अंड्यातून पहिली कोंबडी निर्माण झाली ते अंडे कोंबडीचे नव्हते तर चोंबडीचे होते. म्हणजेच कोंबडी आधी की कोंबडीचे अंडे आधी या प्रश्नाचे उत्तर अर्थातच आहे "कोंबडी आधी."
२) कोंबडी आधी की अंडे आधी?
वरील प्रश्नाच्या रूपाचे उत्तर कोंबडी असे असेल तर प्रश्नाच्या या दुसऱ्या रूपाचे उत्तर खडकी आणि राजूर संस्थानाचे श्रीमंत "अंडे आधी" असे देतील. कारण कोंबडी ही चोंबडीच्या का होईना पण अंड्यातूनच निर्माण झाली. म्हणून कोंबडीच्या आधी अंडे हेच उत्तर. या अंड्याच्या आधी कोंबडी अस्तित्वातच नव्हती. कारण ते अंडे चोंबडीचे होते. म्हणजे कोंबडी या नव्याच प्रजातीची सुरुवात या अंड्यापासून झाली म्हणून या प्रश्नाचे उत्तर ठरेल, "अंडे आधी."
दोन्ही उत्तरे अगदी १००% खरी आहेत. तुम्ही प्रश्न कसा विचारता त्यावर उत्तर अवलंबून आहे.
कोण आहे रे तिकडे? श्रीमंतांच्या सन्मानार्थ ढोल, नगारे आणि तुताऱ्या धुमधडाक्याने वाजू द्या.

विषवल्ली


जागतिक मंचापुढे एक ओघवते भाषण देऊन जगातला तो सर्वात बलाढ्य देशाचा प्रेसिडेंट स्टेजवरून खाली उतरला आणि थेट आपल्या कक्षाकडे निघून गेला. तो निघून गेल्यावरही कितीतरी वेळ सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत राहीला.

तिकडे प्रसिद्धी सचिवांस निरोप धाडून प्रेसिडेंटने अर्ध्या तासात अहवाल मागितला. सुरक्षा विभाग प्रमुखास समोर बोलावून एकंदरीत सर्व सुरक्षेचा आढावा घेतला. सुरक्षा आढाव्याच्या बाबतीत प्रेसिडेंट अतिशय काटेकोर असतात. किती गम्मत आहे ना, जगातला सर्वात सुरक्षित माणूस सुद्धा किती घाबरत असतो.!

'विकेंद्रीकरणातून लोकशाही सुदृढीकरण' या परीसंवादात आपली मते मांडली होती प्रेसिडेंट महाशयांनी. आजकाल जगभर वाढत चाललेल्या राजकीय क्षेत्रातील कौटुंबिक वर्चस्वाला छेद देण्याचे आव्हान करणाऱ्या त्या भाषणाने श्रोतेवृंद रोमांचित झाले होते. आजतागायत कुणीही जागतिक नेता एवढ्या स्पष्टपणे या विषयावर बोलला नव्हता. आणि तेव्हा तर संबंध सभागृह निस्तब्ध झाले होते जेव्हा अगदी स्वत:च्या देशातही आपल्याच कुटुंबियांना भावी नेते म्हणून रेटणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी निषेध केला, तेही एका माजी प्रेसिडेंटच्या उपस्थितीत जे स्वत: एका माजी प्रेसिडेंटचे पुत्र होते. कुणीही एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्मला म्हणून सुयोग्य नेता ठरू शकत नाही. कुणी महान अभिनेत्याचा मुलगा अथवा कुणी महान धावपटूची मुलगी तशीच महान अभिनेता अथवा धावपटू असेल असे नाही. नेता, अभिनेता वा खेळ विजेता कुणीही आपल्या संततीस आपल्यावर लादत असेल तर त्यांस झुगारून द्या असे आवाहन प्रेसिडेंटने सगळ्या जगातील जनतेस केले होते .

थोड्याच वेळात प्रसिद्धी सचिव आले. प्रेसिडेंटने त्यांस विचारले काय कसा काय प्रभाव?

साहेब ओवरव्हेल्मिंग प्रतिसाद येतोय जगभरातून. हे पहा चीन, रशियाच नव्हे तर अगदी उत्तर कोरियातही भाषण लाइव्ह दाखविले गेलेय. बीबीसी, सीएनएन, अल जजीरा, फॉक्स न्यूज आदि सर्व आघाडीच्या वाहिन्यांनी प्राइम टाईमला आपल्याच भाषणाची समीक्षा करणारे कार्यक्रम जाहीर केले आहेत. जगभरात या क्षणाला हरेक टीव्हीवर आपल्याच भाषणाचे रिपीट टेलिकास्ट चालू आहे. प्रेसिडेंट हे ऐकून आत्यंतिक आनंदी झाले. त्यांनी समोरच्या टीव्हीवर बीबीसीचे रिपीट टेलिकास्ट लावण्याचा आदेश दिला. रिपीट टेलिकास्टमध्ये प्रेसिडेंट आता चालत स्टेजवर येत होते. कोटावर पर्पल टाय लावण्याचा तुझा सल्ला छान होता हं एली. छान दिसतेय रंगसंगती. प्रेसिडेंटने त्यांची पर्सनल सेक्रेटरी एली हिस दाद दिली. एलीनेही मंद हसून ती स्वीकारली. आणि प्रेसिडेंट आपले पुढचे भाषण ऐकण्यात आणि बॉटमच्या रनिंग न्यूज लाइनवर जगभरातील प्रतिक्रिया वाचून आनंदी होण्यात दंग होऊन गेले.

थोड्या वेळाने एली हळूच प्रेसिडेंटच्या कानाशी झुकली, आणि मग प्रेसिडेंटने सांगितले की त्यांना आत बोलावून घ्या. मग लागलीच बाहेर उभे असलेले देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या सर्वात श्रेष्ठ गुप्तहेर संस्थेचे प्रमुख आत येउन प्रेसिडेंटपुढे उभे राहिले. टीव्हीचा आवाज कमी झाला. प्रेसिडेंटने विचारले अशी काय महत्वाची बातमी आहे? "सर बातमी युरोपातून आली आहे." "काय ते सांगा." "सर जगावर विश्वयुद्ध लादणाऱ्या त्या क्रूरकर्म्याच्या वंशाचा एक तरुण समोर आला आहे. आणि तो वेगाने लोकप्रिय होतो आहे." "काय? पण आपण तर ही विषवल्ली तेव्हाच महायुद्ध जिंकल्यावर समूळ आणि सकुळ नष्ट केली होती ना? मग हा कुठून निपजला?"

"तेव्हाच्या त्या क्रूरकर्म्याच्या काही कट्टर समर्थकांनी अगदी गुप्तपणे त्या तरुणाचा पिता आणि त्याच्याशी संबंधित सर्व कागदपुरावे यशस्वीपणे आपणांपासून लपवून ठेवले होते. त्या क्रूरकर्म्याला असा कुणी मुलगा होता अशी कुणालाही तेव्हा नोंद देखील सापडली नव्हती अन्यथा तेव्हाच त्यांस संपविता आले असते."
"पण हा त्याचाच वंशज आहे हे कशावरून? तो थापाड्यासुद्धा असू शकतो." "सर दोन वर्षांपूर्वीच हा मुलगा राजकारणात आला आहे आणि प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याने आपला एक स्वतंत्र पक्ष सुद्धा स्थापला आहे आणि वर्षभरात एका प्रांताची सत्ता देखील हस्तगत केली आहे. कालच एका कार्यक्रमात तो त्या क्रूरकर्म्याचा वंशज असल्याची माहिती देणारी कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. आणि एवढेच नाही तर त्याचा डीएनए रिपोर्टदेखील त्या कृरकर्म्याशी तंतोतंत जुळतो आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे."
प्रेसिडेंट आता प्रचंड अस्वस्थ झाले. महायुद्धाची भीषणता, भय हे त्यांनी ऐन बालवयात स्वत: अनुभवले होते. त्यांच्यासमोर त्या क्रूरकर्म्याचा चेहरा उभा राहीला. ते फटदिशी आपल्या सोफ्यावरून उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितले की त्वरित एक एक्स्ट्रीम प्रायोरिटी मिशन आयोजित करा आणि त्यास संपवा. गुप्तहेर प्रमुख म्हणाले, "पण सर त्याचा पक्ष मवाळ तत्वांचा आहे. 'शांती सौहार्द संघ' असे त्याच्या पक्षाचे नाव आहे. 'अहिंसात्मक लोकशाही मार्गाने लोकोद्धार' हे त्याचे ब्रीद आहे. आम्ही त्याचे पक्षाच्या अगदी कोर ग्रुप मधून माहिती काढली आहे. त्याचेपासून धोका संभवत नाही."
"तुम्ही वेडे तर झाले नाहीत? हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आता या क्षणी मी आपणांस आदेश देतो आहे की ही विषवल्ली फोफावण्यापूर्वीच समूळ नष्ट करण्यात यावी. मला अधिक काही ऐकायचे नाही. आपण आता निरोप घ्यावा."

गुप्तहेर खात्याचे प्रमुख तो आदेश ऐकून निमूटपणे बाहेर जायला निघाले. टीव्हीवर लावलेले प्रेसिडेंटचे भाषण आता संपायला आले होते. प्रेसिडेंट एक दीर्घ श्वास घेऊन परत खुर्चीवर बसले आणि त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवायला सांगितला.

टीव्हीवर प्रेसिडेंटचे ते शेवटचे वाक्य प्रसारित होत होते ज्या वाक्यावर सभागृह टाळ्यांनी निनादून गेले होते. प्रेसिडेंट म्हणत होते की, मी स्वत: असे जाहीर करतो की माझ्या कुटुंबातील पुढच्या किमान दोन पिढ्यांतील एकही सदस्य राजकीय क्षेत्रात येणार नाही. कोणतीही संतती आपल्या माता पित्याचे गुण अथवा अवगुण घेऊन जन्माला येत नाही. प्रत्येक जीव हा स्वयंभू आहे आणि त्याची योग्यायोग्यता ही त्याच्या अभिभावकांच्या कार्यावरून नव्हे तर त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावरून ठरविली पाहिजे.

भाषण संपले आणि सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गडगडाट चालू झाला.


बुधवार, १३ मे, २०१५

रामायण स्फुट १७






सगळे झोपी गेले होते. उत्तरेकडचा शंभर योजने समुद्र हजारो योजने लांबीच्या अंधारात गुडूप झाला होता. झोप येत नसल्याने दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात सभोवताल थरथरता भासून अधिकच अस्वस्थता वाढत गेल्यामुळे अंथरुणावर नुसताच पडून असलेला राम उगीचच इकडून तिकडे सारखी कूस बदलत होता. लक्ष्मण बाजूच्या राहुटीत झोपला होता. तिथला दिवा मालवलेला होता म्हणजे तो गाढ झोपला असावा. सगळी लंकाच निद्रेच्या अधीन झाली होती. केवळ एकटा हनुमान बाहेर त्यानेच बांधलेल्या तटबंदीच्या दरवाजावर जागता पहारा देत उभा होता.

बराच वेळ असा अस्वस्थ अवस्थेत पहुडलेला राहील्यावर सगळे गाढ झोपले असावेत असा विचार करून राम उठून बसला. त्याच्या मनात विचारांचे थैमान चालू होते. अजब आहे ही लंका, आपल्या अयोध्येपेक्षा कितीतरी प्रगत आणि समृद्ध. किती नानाविध पद्धती वापरतात हे लोक जीवन अधिक सोपे सुसह्य करण्यासाठी. संपूर्ण भारतवर्षात कुठेच आपल्याला एवढी क्लिष्ट आणि तरीही अतिशय चपखल काम करणारी अवजारे किंवा पद्धती दिसल्या नाहीत. यांनी अजब तंत्रे विकसित केली आहेत. हिला सोन्याची लंका म्हणतात. आणि खरेच इथल्या नगराच्या मोठ्या गृहांवरचे घुमट सोन्याचे असल्याचे भासते. मात्र हे घुमट काही पूर्ण सोन्याचे नाहीत. तर ते फक्त दगडी घुमटांवर सोन्याचे पातळशे पत्रे मढविलेले आहेत. आणि मी एक अजब गोष्ट पाहिली आहे की या घुमटांच्या सुवर्णपत्रास जोडलेली एक ताम्रधातूची जाडशी तार भिंतीवरून खाली आणून घराजवळ जमिनीत पुरलेली असते. हे कशासाठी केले असेल यांनी? इथले मोठमोठ्या दालनांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. माणसांनी हाताने धरून ते ओढून उघडावे अथवा बंद करावे लागत नाहीत. नुसते एवढेच नाही तर या रावणाने म्हणे वर्षभर फळे येणाऱ्या वृक्षांची एक वाटिका तयार केली आहे. वर्षभर आम्रफल खावे, वर्षभर जांभळे चाखावीत, सारेच अजब आहे इथे.

त्या इंद्रजिताचा रथ पाहून तर मी थक्कच झालो होतो. त्याला खरेखुरे घोडे जोडलेले नाहीत. नुसत्याच घोड्यांच्या प्रतिकृती आहेत आणि घोड्यांच्या पुढच्या पायांपाशी दिसणार नाहीत अशा रीतीने दोन छोटी छोटी चाके बसविलेली आहेत. रथाच्या छतावर एक मोठमोठ्या पात्यांचे चक्र बसविलेले आहे. त्याचा रथ किती कर्कश आवाज करत येतो. साध्या रथापेक्षा त्याच्या रथाचा वेग चौपट अधिक आहे. आणि तेव्हा तर मी क्षणभर स्तिमितच झालो होतो जेव्हा त्याच्या रथाच्या छतावरचे ते चक्र प्रचंड आवाज करत जोरजोरात फिरू लागले आणि मग अचानक प्रचंड धूळ उडवून त्याचा रथ हवेत उडू लागला. देवादिकांकडेच अशी अद्भुत साधने असतात असे ग्रंथांत वाचले होते. या रावणाकडे एक उडणारे यानदेखील आहे म्हणे. सगळे त्यास पुष्पक विमान म्हणतात. जटायू सांगत होता की त्या यानास पंख वगैरे काही नाही. आणि मी समजत होतो त्याप्रमाणे तो अश्वांऐवजी मोठ्या मोठ्या गरुडांनी ओढलेला रथ सुद्धा नाही. ते एक शंकूच्या आकाराचे यान असून या इंद्रजीताच्या उडणाऱ्या कर्कश रथाविपरित रावणाच्या त्या यानाचा य:किंचितही आवाज होत नाही.

अशाच विचारांत गढलेला असताना थोड्यावेळाने बाहेरून कुणीतरी येत असल्यासारखा आवाज झाला आणि राम उठून बसला. तो बिभीषण होता. तो रामाजवळ आला. "भगवन आपण अद्याप जागे कसे?" "झोप येत नव्हती बिभीषण, पण तू इकडे कसा? कुठून येतो आहेस?" "मी रावणाकडून येतो आहे प्रभू. आज इंद्रजीत धारातीर्थी पडला तेव्हा मी सांत्वनासाठी गेलो होतो त्याचेकडे. एवढा वेळ मी त्याचेच बरोबर होतो. त्याने मला थांबवून घेतले होते. पुत्रशोकाने तो पूर्ण खचला आहे. त्याला आपल्याशी बोलायचे आहे. म्हणून मी इथे आलो आहे. आपण त्याच्याशी चर्चा करावी अशी त्याची इच्छा आहे. कुणी सांगावे कदाचित त्यास युद्धबंदीचा प्रस्ताव मांडायचा असेल." "अरे पण रावण हा अतिशय चतुर मनुष्य आहे ना? त्याला खरेच चर्चा करायची आहे की चर्चेसाठी बोलावून अंगद, हनुमानास त्याने जसे मारण्याचे प्रयत्न केले होते तसे मलाही कपटाने मारायचे आहे?" रामाचे हे उद्गार हे ऐकून बिभीषण म्हणाला, "नाही नाही प्रभू असे काही असते तर मी आपणांस असा सल्ला कसा दिला असता? चर्चेसाठी रावणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपणांस इथूनच चर्चा करता येईल." "काय? म्हणजे तू रावणालाच इकडे घेऊन आला आहेस? हनुमानाने तुम्हास आत कसे सोडले?" "नाही नाही श्रीराम, रावणदेखील इथे आलेला नाही आणि आपणांसही त्याचेकडे जाण्याची आवश्यकता नाही." असे म्हणून बिभीषणाने सोबत आणलेली एक अतिशय बारीक आकाराच्या तारेची गुंडाळी आणि सहा खुंटीसदृश कळा बाहेर काढल्या. नंतर त्याने पाकशाळेतून एक गोलाकार धातुपात्र आणले आणि त्या सहा कळा त्या पात्राच्या काठावर समानांतर सहा ठिकाणी बसविल्या. मग त्याने त्या सहाही कळांना सोबत आणलेल्या तारेने अशा रीतीने बांधले की एक कळ किमान तीन इतर कळांस जोडली गेली होती मात्र कुठल्याही दोन कळांमधील तारा एकमेकांस स्पर्श करत नव्हत्या. हे असे यंत्र तयार झाल्यावर मग त्याने दुसरा एक विशिष्ट प्रकारचा शंख रामाकडे दिला. हा शंख एका बाजूने निमुळता तर एका बाजून मोठे तोंड असलेला होता. तो केवळ नैसर्गिक अवस्थेतला समुद्री शंख नव्हता. तो आतून पूर्णत: पोकळ करून त्याचे आत काही धातूंच्या पट्ट्या आणि काही वृत्तचीत्तीकार धातूनलिका बसविलेल्या दिसत होत्या. बिभीषण म्हणाला की या यंत्राद्वारे आपणांस रावणाशी बोलता येईल. हे यंत्र रावणाने खास तयार करवून घेतलेले आहे ज्याकरवी तो लंकेत कुणाशीही कुठूनही बोलू शकतो. त्या शंखास बरोबर तारा बांधलेल्या यंत्रासमोर धरून त्याच्या मोठ्या तोंडाच्या बाजूकडून त्यातून बोलायचे असे. आणि जेव्हा पलीकडून आवाज ऐकावयाचा तेव्हा तो शंख तसाच त्या यंत्रासमोर ठेवून कानाशी धरावयाचा असे. संभाषणाचे वेळी त्या कळांस जोडलेल्या तारांत कंपने निर्माण होत. आणि मग त्या गोलाकार धातुपात्राच्या यंत्राच्या मध्यभागी असलेल्या पोकळीत त्या कंपनांच्या स्पंदनांनी ध्वनी निर्माण होई. बिभिषनाने ही सगळी पद्धत रामास समजावून सांगितली आणि मग तो बाहेर निघून गेला.

"प्रणाम दशरथपुत्र श्रीराम" यंत्रातून आवाज आला. पलीकडून रावण बोलत होता. "प्रणाम लंकानरेश." राम उत्तरला.
"आपण प्रथमच एकमेकांशी बोलत आहोत नाही का?"
"होय. आणि आजही आपण बोललो नसतोच, जर आपणांस पुत्रवियोग झालेला नसता.!! आपल्या पत्नीचे हरण करणाराशी कुणी चर्चा करेल काय?"
"होय बरोबर आहे आपले म्हणणे, पण मी आपल्या पत्नीचे हरण विनाकारण केले नव्हते. तो फक्त सूड होता माझी भगिनी शूर्पणखेच्या विटंबनेचा."
"शुर्पणखेची विटंबना केली नव्हती, तीस फक्त दंड दिला होता."
"असा काय गुन्हा केला होता शुर्पणखेने की तीस दंड दिला जावा? फक्त लक्ष्मणाकडे प्रेमाची याचनाच तर केली होती."
"नाही लंकापति ती प्रेमाची याचना नव्हती. तिला फक्त शारीरिक सुख हवे होते. प्रणयातदेखील प्रेम असते पण तिला फक्त मैथुन हवे होते आणि तेही काहीशा अनैसर्गिक राक्षसी पद्धतीचे. पहिल्याच भेटीत अशी मागणी करणाऱ्या स्त्रीस कोण स्वीकारेल? म्हणून लक्ष्मणाने तिला नकार दिला तर ती त्याच्या अंगचटीसच आली आणि माझ्या समक्ष तिने त्याचे वस्त्रास हात घातला. कोण सुसंस्कृत मनुष्य हे सहन करेल ते आपणच सांगा. लक्ष्मण तर या प्रकाराने हादरूनच गेला होता म्हणून मी त्यास तिला दंड करण्याची आज्ञा दिली. खरेतर अशा गुन्ह्यास मृत्युदंडच द्यावा, मात्र ती एक स्त्री असल्यामुळे मी फक्त तिचे नाक कापण्यास सांगितले."
"हे जरी आपले म्हणणे असले तरीही शुर्पणखेने इथे येऊन सांगितलेली हकीगत वेगळी होती. तिने सांगितले की तिने लक्ष्मणास एक फुलांची परडी देऊन प्रेमयाचना केली. मात्र शूर्पणखा ही रामाच्या पत्नीहून सुंदर असल्याने रामास ते रुचले नाही. लक्ष्मणास आपल्याहून अधिक रूपवान पत्नी मिळू नये असे त्याला वाटले. आणि तिच्या सौंदर्यावर भाळून तिच्या प्रेमयाचनेस तो बळी पडू नये म्हणून तीस विद्रूप करण्यासाठी त्याने लक्ष्मणास आज्ञा देऊन तिचे नाक कापण्यास सांगितले. एवढेच नाही तर तिची देहयष्टीदेखील रामपत्नी सीतेहून अधिक कमनीय आणि मोहक असल्यामुळे तिचे शरीरही विद्रूप करावे म्हणून त्याने त्यास तिची स्तनाग्रे देखील कापण्यास सांगितली. भर राजसभेत शुर्पणखेने तिची अशी व्यथा सांगितल्यावर संबंध राजसभा सुडाच्या भावनेने पेटून उठली. आणि त्वरीत आपल्यावर आणि आपल्या अयोध्या राज्यावर हल्ला करावा अशी मागणी राजसभेने केली. मात्र मी युद्धाऐवजी ज्या सीतेसाठी रामाने हे वाईट कर्म केले तिचेच अपहरण करून तिची विटंबना करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा काहीशा नाराजगीने का होईना पण राजसभेने तो प्रस्ताव स्वीकारला."
"शुर्पणखेने केलेले कथन हे धादांत खोटे आहे. कुणाच्या कथनाची सत्यासत्यता न पडताळता एका राजाने असा निर्णय घेणे हे योग्य आहे का?"
"हे रघुकुलभूषण राम, राज्यकर्ते असले की सत्य काहीही असो, पण भडकलेल्या जनभावनेचा आदर ठेवत आपणांस काही कठोर पावले उचलावीच लागतात. सीताहरण हे तसेच एक पाऊल होते. शूर्पणखा ही खरे बोलत असेल याची मला खात्री नव्हती मात्र ती पीडित असल्याने तिच्यावर विश्वास न ठेवणेही योग्य नव्हते. तिच्या व्यथेची वार्ता संपूर्ण लंकेत वाऱ्यासारखी पसरली होती आणि आपण स्वर्गासह त्रिलोक जिंकणारे श्रेष्ठ मानव असूनही आपल्या राजकन्येची एका य:किंचित मानवाकडून अशी विटंबना व्हावी या वार्तेने सगळे लंकाजन अत्यंत प्रक्षोभित झाले होते. या प्रक्षोभास शमविण्यासाठी एक राजा म्हणून काही ठोस आणि कठोर पाउल उचलणे आवश्यक होते."
"पण आपण तपास करून जनतेपुढे सत्य मांडायास हवे होते. ती खरी न्यायनिष्ठ भूमिका ठरली असती. आपण तसे न केल्यामुळे हे युद्ध झाले आणि असुर कुल तसेच वानर कुलातील कित्येक मनुष्यांस प्राणास मुकावे लागले. स्वयं आपणांसही पुत्रशोक झाला."
"दशरथपुत्र राम, राज्यकर्त्याची अपरिहार्यता आपण अजून अनुभवली नाही म्हणून आपण असे म्हणत आहात. आपणावरही जर भविष्यात कधी असाच प्रसंग आला तर त्याच समयी आपल्यालाही माझ्या मनस्थितीची अनुभूती येईल."
"मग आता काय कारणास्तव आपण चर्चा करण्याची इच्छा जाहीर केलीत? आपणांस समेट करायचा आहे काय? आपण सन्मानपूर्वक पूर्ण शरणागती पत्करण्यास तयार असाल तर माझी काहीही हरकत नाही समेटास."
"माझी तर तीच इच्छा आहे श्रीराम, पण मी तसे करू शकत नाही. कारण तसे केल्यास ब्रम्हांडावर विजय मिळविणारे आम्ही असुरकुलीन मनुष्य एका सामान्य कुलातील मानवापुढे हरलो अशी जनभावना होईल. पराभवाचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मी मरण पत्करणे पसंत करेल."
"मग या चर्चेचे प्रयोजन काय?"
"माझ्या महापराक्रमी मेघनादास गमावल्यानंतर मला माझा पराभव तर अटळ दिसतो आहे. त्यामुळे मला आपणांस एक गोष्ट सांगायची आहे. उद्या जर मी पराभूत झालो आणि मृत्यू पावलो तर तुम्ही लंकेचे अधिपती व्हाल म्हणून तुम्हास ही गोष्ट ठाऊक असणे आवश्यक आहे."
"अशी कोणती विशेष गोष्ट आहे जी आपण प्रत्यक्ष आपल्या शत्रूस सांगू इच्छित आहात?"
"श्रीराम आपण जाणता की आम्ही लंकाजन भौतिकज्ञान आणि तंत्रविद्येत अतिशय प्रवीण आहोत. हे ज्ञान आमच्या शेकडो पिढ्यांनी प्रयत्न आणि तपश्चर्या करून मिळविले आहे. या थोर ज्ञानाने संबंध मानवजातीचे कल्याण होऊ शकते. मात्र परंपरेनुसार एका पिढीकडून दुसरीकडे हस्तांतरित करताना त्याचा केवळ आमच्या कुळातील मनुष्यांनाच फायदा व्हावा म्हणून आम्ही हे ज्ञान सीमित ठेवले होते. आमच्या या धोरणामुळे आज संपूर्ण लंकेत हे ज्ञान फक्त माझ्याजवळ आहे आणि माझ्या पश्चात ते नष्ट होऊन जाईल. पुन्हा हेच ज्ञान मिळविण्यासाठी मानवाच्या शेकडो पिढ्यांस तपश्चर्या करावी लागेल. म्हणून मी आपणांस ते देऊ इच्छितो. मी माझ्या मेघनादास हे ज्ञान दिले होते. तो एक समर्थ पुरुष होता. त्याने या ज्ञानाची अजून भरभराट केली असती. मात्र आता त्याच्या मृत्युनंतर मला तरी संपूर्ण असुर कुळातील मनुष्यांत तेवढा सक्षम पुरुष दिसत नाही. आमच्या पितरांची ही शेकडो वर्षांची तपश्चर्या वाया जाऊ नये म्हणून मी हे ज्ञान, ही माहिती आणि इतर सारी तंत्रे यांचे स्वामित्व आपल्या सारख्या समर्थ पुरुषास देऊ इच्छितो."
"हो तुमच्या लंकानगरीत आल्यापासून मीही आपण वापरत असलेल्या विविध तंत्रांनी आश्चर्यचकित झालो आहे."
"श्रीराम, आपण जी पाहिली आहात ती विविध तंत्रे जसे कृषीतंत्र, गृहबांधणी इत्यादि आमच्या अनेक लोकांस अवगत आहेत. मी जे बोलतो आहे ते आमच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तंत्राबद्दल आहे."
"काय आहे आपले सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तंत्र? विमान बनविण्याचे तंत्र हेच ना?"
"नाही विमानाचे तंत्र देखील आम्हा सर्व भावांस अवगत आहे. बिभीषण देखील ते जाणतो."
"मग विमानाहुन श्रेष्ठ असलेले असे कोणते तंत्रज्ञान आहे आपणाकडे?" रामाने आश्चर्यमिश्रित स्वरात विचारले.
"श्रीराम आमच्याकडे एक असे तंत्र आहे ज्यायोगे आम्ही मर्त्यलोकाच्याही पार जे स्वर्ग, नरक, पाताळ लोक आहेत तिथेदेखील प्रत्यक्ष जाऊ शकतो. सामान्य लोकांस ज्ञात असलेला मर्त्य लोकातून स्वर्गलोकी जाण्याचा एक मार्ग म्हणजे मृत्यू.!! पण मृत्यू हा केवळ एकदिशीय मार्ग आहे, म्हणजे त्यातून फक्त जाता येते, परतता येत नाही. मात्र असे अजून कित्येक मार्ग आहेत ज्याद्वारे तिन्ही लोकांत जाता येऊ शकते. आज त्यातला सर्वाधिक सक्षम जो मार्ग आहे त्याचा वापर देवलोक करतात. आणि देवलोक त्या मार्गाचे ज्ञान कधीही मानवांस देणार नाहीत. मी कैलासावर जाऊन महादेवाची याचना करून त्यांचेकडे या ज्ञानाचे तंत्र मागितले होते की जेणेकरून आम्हाला आमच्या तंत्रात अधिक सुसूत्रता आणि सहजता आणता येईल परंतु त्यांनीही मला हे दिले नाही. म्हणून मग ईर्ष्येने आम्ही लंकाजनांनीही आमचा स्वयंभू मार्ग अपार कष्टांपरांत अधिक सुसुत्रतापूर्ण केला. आज निदान संख्यात्मक क्षमतेच्या बाबतीत तरी आमचे तंत्र देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याच मार्गाने आमची संपूर्ण सेना नेऊन आम्ही स्वर्ग जिंकीला होता. मर्त्यलोकांत असा मार्ग माहित असलेले मानव केवळ आम्हीच आहोत. महर्षी नारद यांचेकडेही त्या मार्गाचे स्वयंभू तंत्र आहे. मात्र कुणीही इतरांस आपले तंत्र सांगत नाही. या देवलोकांस अमरत्वाचे तंत्रही अवगत असल्याने त्यांस त्यांचे हे ज्ञान विलुप्त होण्याची भीती नाही. मीही अमरत्वाचे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे माझा मृत्यू झाला तर आमचे हे ज्ञान लोप पावेल."
"असे आहे तर मी आपला प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे. आपण मला आपले हे सर्वोत्तम तंत्रज्ञान द्यावे आणि आपण अमरत्वाची जेवढी सिद्धी प्राप्त केली आहे ती माझ्या प्रिय हनुमानास द्यावी. तो आत्यंतिक बुद्धिमान मनुष्य असून आपण त्यास आपले अमरत्वाचे मूळ तंत्र दिलेत तर त्यात सुधारणा करून तो त्यास अधिक उपयुक्त बनवेल."
"ठीक आहे मीही आपला प्रस्ताव स्वीकारतो. जर युद्धात मी पराभूत होऊन मज मृत्यू प्राप्त होत असेल तर मृत्युशय्येवर असताना मी आपणांस त्या ज्ञानाचे रहस्य सांगेन. तत्पूर्वी हवे असल्यास आपण माझ्या त्या यंत्राद्वारे पाताळलोकाची एक छोटीशी यात्रा करून येऊ शकता. पाताळावर अद्यापही आमचेच राज्य आहे. त्यामुळे तिथे मी आपणांस पाठवू शकतो. स्वर्गात मात्र देवांनी पुन:श्च आपले राज्य स्थापल्यामुळे आम्ही आता तिकडे जात नाही. आपणांस हवे असेल तर आपण याक्षणी तो यात्रानुभव घेऊ शकता. आपणांस काही अपकार होणार नाही असे मी वाचन देतो. हवेतर आपण बिभीषणाचा सल्ला घ्यावा."
"ठीक आहे. मी या यात्रेस तयार आहे मात्र त्या यंत्राच्या कार्यपद्धती विषयी आपण मला साधारण उपयुक्त माहिती द्यावी."
"ठीक आहे ऐकावे. आम्ही एक अनंत पायऱ्यांचा दादर बनविला आहे. म्हणजे खरेतर त्या ५२ पायऱ्या आहेत, पण त्या सातत्याने एकापाठोपाठ एक अशा वृत्तीय आवर्तनांत फिरत राहतात त्यामुळे त्या अनंत भासतात. या पायऱ्या कुठल्याही दूर अंतरावर आपणांस नेत नाहीत. त्या एकाच जागी वृत्ताकार फिरत असतात. या पायऱ्या वेगाने फिरायला लागतात आणि मग त्यांचा वाढता वेग आपणांस काळ, तेज, वायू आणि वस्तुमान या महाभूतांच्याही पार घेऊन जातो. याच वाढत जाणाऱ्या एका विशिष्ट वेगास आपले भौतिक अस्तित्व शून्य होते. तिथे काळही स्थितप्रज्ञ होतो. याही अवस्थेपेक्षा आपला वेग अधिक झाला की आपण आपली पृथ्वी, आकाश या महाभूतांच्या पार असलेल्या नव्या अवकाशात जाऊन पोचतो. ते या महाभूतांच्या पार असलेले अवकाश म्हणजेच स्वर्ग, पाताळ इत्यादि होत. आणि या आपल्या स्वर्ग पाताळादि इच्छित स्थळावरूनदेखील त्याच मार्गे परतही येता येते. या पायऱ्या सुरुवातीस फिरायला लागल्या की मग त्यावर उभे राहायचे असते. या दादरापर्यंत पोचण्यासाठी एक दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून आत येणाऱ्या मनुष्यांस अलगद उचलून एखाद्या फिरत्या पायरीवर ठेवले जाते. हा दादर निरंतर फिरता असल्याने त्याचेवर एकाच वेळी लाखो मनुष्य उभे राहू शकतात. आपण बिभीषणाच्या मदतीने दादरापर्यंत जाऊ शकता. मी तो सक्रिय अवस्थेत ठेवीन.

हा संवाद घडल्यावर रामाने बिभीषणास हाक मारली. लक्ष्मणही आला. राम बिभीषणास म्हणाला, "आम्ही दोघे भाऊ रावणाच्या स्वर्ग पाताळाच्या शिडीवरून पाताळात जात आहोत. मात्र हे कुणास कळता कामा नये. आम्ही हनुमानाच्या तटबंदीतून भिंतीजवळ एक छोटेसे भुयार खणून बाहेर जाऊ. शक्यतो आम्ही अरुणोदयापुर्वीच परतू मात्र काही कारणास्तव आम्हास विलंब झाला तर आम्ही परतून इकडे येईपर्यंत तू इथे सर्वांस सांभाळ. विशेषत: माझा प्रिय हनुमान मला न पाहून खूप अस्वस्थ होईल त्याची व्यवस्थित समजूत काढ. आम्ही केवळ पाताळ लोकाचे दर्शन घेऊन लागलीच परत येऊ."
असे म्हणून रामाने शशकास बोलावले. त्याने क्षणभरात भुयार खणून दिले व राम, लक्ष्मण आणि बिभीषण त्यातून बाहेर पडले. बिभीषणाने मग त्यांस रावणाच्या पाताळ मार्गाच्या दादरकडे नेले. व त्यांना तिथे सोडून तो परत युद्धभूमीवर त्याच्या राहुटीकडे झोपण्यासाठी निघून गेला.


त्या रावणाच्या दादराच्या दरवाजातून आत जाताच राम लक्ष्मण एका पायरीवर पोचले. मग पायऱ्या फिरू लागल्या. मात्र राम लक्ष्मण जागच्या जागी उभे होते. जसा जसा पायऱ्यांच्या फिरण्याचा वेग वाढला तसा तसा दोघांना आपण वजनशुन्य होऊन पाय टेकलेले असूनही अधांतरी असण्याचा भास होऊ लागला. थोड्या अधिक वेगानंतर एक प्रखर तेजाची शलाका त्यांच्या बरोबर माथ्यावर वर्तुळाकार फिरत असल्यासारखी भासु लागली. मग ते तेज अजून वाढले आणि दोघांनी डोळे मिटून घेतले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा सभोवती दाट अंधार दाटलेला होता. बहुदा पायऱ्याही फिरायच्या थांबल्या होत्या. मग हळूहळू तो अंधार दूर झाला. पायऱ्या थांबल्या नसून फिरतच आहेत असे त्यांस जाणवले आणि मग अचानक एके क्षणी ते त्या दरवाजातून बाहेर आले.

आता ते पाताळात होते. बाहेरची सृष्टी अत्यंत विलक्षण होती. कोणत्याही दोन गोष्टींमधील अंतराचा अदमास येत नव्हता. सगळे भासमान वाटत होते. रामास लक्ष्मण खूप दूर दिसे मात्र तो अगदी खेटून उभा आहे असा भास होत राही. ते दोघे चालू लागले आणि एक विचित्र गोष्ट घडली. प्रत्येक पावलानिशी आपण खोल खोल पायऱ्या उतरल्यासारखे खाली खालीच जात आहोत हे त्यांच्या लक्षात आले. ही मोठी विचित्र स्थिती होती म्हणजे समतल दिसणारे पृष्ठभागसुद्धा खरेतर खोलगट होते. हे पाहून काहीसा विचार करून लक्ष्मणाने एक पाऊल मागे टाकून पाहीले. पण काय आश्चर्य! मागे पाऊल टाकल्यावर आधी होता त्याच जागी पोचूनही तो वर चढला नव्हता, तर खालीच उतरला होता. म्हणजे तिथे वर ही दिशाच नव्हती. अगदी वर वळून पाहिले तरी जमीन खाली दिसते अगदी तशीच समतल वरही दिसे. अगदी वर, खाली, सभोवताली असे सगळीकडे एकसमान पृष्ठभाग होते. जे एरवी आकाशासारखे डोक्यावर आहे असे वाटावे तिथेही सहजगत्या पावले टाकत उतरून सहज पोचता येत होते. म्हणजे संबंध सृष्टी ही केवळ उतरतीच होती. आपण मान इकडे तिकडे फिरवूनही वेगळ्या दिशेने पाहत आहोत अशी तिथे जाणीवच होत नसे. आजूबाजूला उद्यानासारखी कित्येक सुशोभित भूरूपे होती मात्र ती उद्याने नव्हती. समोर अनेक सुंदर सुंदर महाल होते. विविधरंगी वस्त्रे ल्यालेले स्त्री पुरुष होते. अतिशय चमकदार रंगाचे पशु होते. झाडांसारखी मात्र हिरवी नव्हे तर पिवळी पाने असलेल्या काही संरचना होत्या पण त्या झाडांसारख्या त्या एका जागी स्थिर नसून जमीनीतून सरकत सरकत इकडे तिकडे फिरत होत्या. त्या उद्यानसदृश भूरुपांत अनेको प्राणी होते. मृग होते. सोनेरी मृग.! पंचवटीत अगदी असाच एक मृग दिसल्यावर त्याला मारण्यासाठी राम अरण्यात एकटाच धावला होता. ते मृग पाहून उगीचच लक्ष्मण थोडा अस्वस्थ झाला. याच मृगांमुळे एवढ्या गोष्टी घडल्या होत्या. उगीच काहीशी दगाफटक्याची शंका मनी येऊन तो रामास म्हणाला, "हे ज्येष्ठ भ्राता आपण आता पाताळ लोक पाहिला आहे तेव्हा इथून त्वरित मृत्युलोकास परतलेले योग्य."
पण राम म्हणाला थांब आपण थोडे अजून या नगरात फिरून पाहू. मग ते थोडे अजून पुढे गेले. तेवढ्यात अचानक त्यांना खाली खोलवरून एक वाहन वेगाने येताना दिसले. खोल दरीतून जवळ येत असलेले दिसूनही ते वाहन अजून खोल उतरत असल्याचाच भास होत होता. मग क्षणार्धात कितीतरी मोठे अंतर दूर भासणारे ते वाहन दोघांच्या जवळ आले आणि सुसाट निघूनही गेले. त्या वाहनात एक अलौकिक लावण्यवती बसलेली होती. राम लक्ष्मण त्या सौंदर्यवतीस पाहून स्तिमित झाले. लक्ष्मणा ही कोण दैवी सौंदर्यवती होती याची चौकशी कर. नक्कीच ती कुणी श्रेष्ठकुलीन स्त्री असेल. तिच्याकरवी आपणांस पाताळाविषयी अधिक माहिती मिळू शकेल, असे तो लक्ष्मणास म्हणाला. ती वाहनात बसलेली स्त्री इतकी आत्यंतिक सुंदर होती की आपला एवढा संयमी आणि पापभिरू बंधू राम तिजवर भाळला तर नसावा अशी शंका उगीच लक्ष्मणाच्या मनास चाटून गेली. पण या शंकेस झटकून देत तो ज्येष्ठ भावाच्या आज्ञेस अनुसरून तिची चौकशी करण्यास गेला.

तिकडे लंकेत दोन प्रहर उलटून गेल्यावर राम लक्ष्मण एव्हाना परतले असतील तर त्यांस जाऊन भेटावे असा विचार करून जागा झालेला बिभीषण रामाच्या राहुटीकडे निघाला. बाहेर तटबंदीच्या दरवाजावर हनुमान जागा राहून पहारा देतच होता. बिभीषण जवळ येताच तो आश्चर्याने म्हणाला, बिभीषण महाराज आताच काही क्षणांपूर्वी मी आपणांस आत सोडले होते मग आपण बाहेर कसे आलात? मी तर तुम्हास बाहेर जाताना बघितले नाही. बिभीषणाच्या लक्षात आले की आपणही रामाबरोबरच भुयारातून बाहेर गेल्याने हनुमानास काही कळले नाही. मग आता अजून गोंधळ नको म्हणून तो हनुमानास म्हणाला की नाही महाबली मी तर आताच प्रथमत: येतो आहे. आपला काहीतरी गैरसमज झाला असावा. मात्र हनुमानास हे पटले नाही. तो म्हणाला मला खात्रीने आठवते की आपण काही क्षणांपूर्वी आला होतात आणि मीच आपल्याला आत सोडले होते. जर ते तुम्ही नव्हतात तर नक्कीच तो मायावी रावण अथवा त्याने पाठविलेला कुणी मायावी हेर असेल. रामप्रभूंस काही दगाफटका तर झाला नसेल म्हणून हनुमान त्वरित आत धावला. रामाच्या राहुटीत कुणीही नव्हते. एवढेच नव्हे तर लक्ष्मणाची राहुटी देखील रिकामी होती. हे पाहून हनुमान काळजीने व्याकुळ झाला. त्याने इकडे तिकडे फिरून पाहिले तर तटबंदीच्या भिंतीजवळ उकरलेली माती होती. त्याने जवळ जाउन पाहिले तर एक भुयार खणलेले होते. हनुमान ते पाहून क्रोधाने लालबुंद झाला. त्याने रावणाची मोठ्या शब्दांत निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. रावणाने राम लक्ष्मणांचे अपहरण केले आहे आता मी त्याला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून तो सुग्रीव, अंगदास हाका मारू लागला.
बिभीषणाने त्यास कसे बसे शांत बसण्यास सांगितले आणि म्हणाला, "शांत रहा उगीच इतरांस विनाकारण उठवून छावणीत घबराट पसरू देऊ नकोस. रावण राम लक्ष्मणांस घेऊन गेलेला नसून ते आपल्या मर्जीने त्याच्या यंत्रात बसून पाताळलोकी गेले आहेत थोड्या समयापरांत ते स्वत: परत येतील."
"काय? रामप्रभू स्वमर्जीने त्या लबाड रावणाकडे जातील यावर माझा विश्वास नाही."
"अरे मी स्वत: त्यांस रावणाकडे घेऊन गेलो होतो तू काळजी करू नकोस?"
"काय तू त्यांस रावणाकडे घेऊन गेला होतास? म्हणजे तू प्रतारणा केलीस आमच्या विश्वासाची. शेवटी तू आमचा विश्वासघात करून आपल्या भावाकडेच परत गेलास ना? मी तुलाही सोडणार नाही. राम लक्ष्मण मला सांगितल्याशिवाय कुठे जाणारच नाहीत." असे म्हणत बिभीषणास धरून ठेवून हनुमानाने सुग्रीव अंगदास बोलावले. ते आल्यावर हनुमानाने त्यांना सगळी वार्ता सांगितली आणि बिभीषणास तत्काळ दंड देण्याची आज्ञा करण्याची विनंती केली. पण सुग्रीव म्हणाला, "बिभीषण आपली प्रतारणा करेल असे वाटत नाही. मात्र तरीही तुला शंका असेल तर आपण त्यास दंड देऊ शकतो मात्र त्यामुळे राम लक्ष्मण परत येणार नाहीत. मला वाटते ते जिथे कुठे गेले असतील तिथून त्यांस परत आणण्यासाठी बिभीषण हाच एकमेव दुवा आपल्याकडे आहे. तेव्हा मी बिभीषणासच आज्ञा देतो की त्याने हनुमानास राम लक्ष्मण हे पाताळ वा अन्य जिथे कुठे गेले असतील तिथे घेऊन जावे. असे न केल्यास त्यास दंड देण्यात येईल."

मग बिभीषण हनुमानास घेऊन त्याच भुयारातून रावणाच्या त्या दादराकडे गेला व त्यास त्या यंत्राच्या दरवाजातून आत पाठविले.

इकडे पाताळात चौकशी करण्यास गेलेला लक्ष्मण परत रामाकडे आला. आणि त्याने रामास सांगितले की त्या स्त्रीचे नाव चंद्रसेना असून ती पाताळ लोकाचा राजा अहिरावण याची पत्नी आहे. मात्र ती विष्णूची भक्त असून त्यामुळे ती अहिरावणाशी पत्निधर्माने वागत नाही. पण तरीही अहिरावण तिला त्यागण्यास तयार नाही. आपण विष्णूपेक्षा अधिक श्रेष्ठ आहोत हे तो तिला पटवून देऊन तीस खऱ्या अर्थाने प्राप्त करण्याची संधी शोधत आहे. अहिरावण हा रावणाचा भ्राता असून रावणाने आपणांस कपटाने येथे पाठवून मारण्याचा डाव योजिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"अरे मग काही दगाफटका होण्यापूर्वी आपणच अहिरावणास ठार करूयात ना. आणि अशी आवई उठवून देऊ की मीच विष्णू किंवा विष्णूचा अवतार आहे आणि त्याच्या पत्नीची सुटका करण्यासाठी आलो आहे, म्हणजे आपणांस इथल्या जनतेकडूनही विरोध होणार नाही."

"भ्राता राम आपणाकडे कोणतीही शस्त्रे नाहीत त्यामुळे आपण अहिरावणाशी युद्ध करू शकत नाही. इथले लोक म्हणतात की अहिरावण एका देवीचा भक्त आहे आणि तो रोज तिची पूजा करतो. तिच्याद्वारे त्यास अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा पराभव करणे अशक्य आहे."
राम हे ऐकून संतापला. तो लक्ष्मणास म्हणाला, "लक्ष्मणा माझ्या सामर्थ्यास शस्त्रांची आवश्यकता आहे असे तुला वाटते काय? तू जवळ शस्त्रे नसल्यामुळे घाबरलेला दिसतोस. पण तू अहिरावणाशी युद्धास तयार नसला तरी मी एकटा युद्ध करेल. तुला जर नि:शस्त्र असण्याची एवढी भीती वाटत असेल तर मी तुला आज्ञा देतो की तू जो स्वयं धर्म आणि समाज मर्यादा पाळण्यासाठी लौकिकास प्राप्त आहेस, स्वत:च इथे स्वत:साठी एक मर्यादा रेखा आख आणि माझ्या आज्ञेशिवाय ती ओलांडू नकोस. मी दशरथपुत्र राम आता पण करतो की मी अहिरावणाचा वध केल्याशिवाय परतणार नाही. लक्ष्मणाने मग ओशाळून रामाच्या आज्ञेनुसार स्वत:समोरच एक लक्ष्मणरेखा आखली आणि रामास सांगितले की काहीही झाले तरी तुझ्या आज्ञेशिवाय मी ही रेखा ओलांडणार नाही.

लक्ष्मणाशी वाद झाल्यावर राम आता अहिरावणास कसे मारावे या विचारांत गढलेला असतानाच हनुमान तिथे पोचला. हनुमानास पाहून राम अतिशय आनंदी झाला. आता रामाची शक्ती अनेक पटींनी वाढली होती. शस्त्रे नसली तरीही हनुमान आपल्या ताकदीच्या जोरावर कुणालाही ठार करू शकतो हे रामास ठाऊक होते. मग रामाने एक योजना बनविली. अहिरावण देवीची पूजा करत असताना देवळात एकटा असतो तेव्हा तिथे आधीच लपून बसून तो ध्यानस्थ असताना हनुमानाने त्याला गळा आवळून ठार करावे आणि मग पाताळ लोक विष्णूच्या अवताराने म्हणजेच रामाने जिंकल्याची आवई उठवून देऊन आपण सर्वांनी सुरक्षित परत जावे अशी योजना रामाने बनविली. 

त्यांनी आधी ते मंदिर शोधले. मग हनुमान ठरल्याप्रमाणे अहिरावणाच्या संध्यापूजेच्या वेळी गुपचूप मंदिरात जाऊन लपून बसला. अहिरावण येऊन पूजा करून ध्यानस्थ बसल्यावर हनुमानाने लगेच त्यास गळा आवळून ठार केले. मग तो थेट अहिरावणाच्या राजसभेत गेला आणि प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेल्या रामाने अहिरावणाची
त्याची धर्मपत्नी चंद्रसेना हिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिजबरोबरच समस्त पाताळ लोकांस बंधमुक्त केले आहे असे जाहीर केले. 
त्याने दरबारात असे जाहीर करताच दरबारात प्रचंड कल्लोळ माजला. थोड्याच वेळात राणीवशातून स्वत: चंद्रसेना दरबारासमोर आली आणि हनुमानास म्हणाली की अहिरावणास मारणारा पुरुष कोण आहे त्याचे दर्शनाचा लाभ आम्हास द्यावा. आता तोच पाताळनरेश आहे.  आणि जर तो विष्णूचा अवतार असेल तर मला अहिरावणापासून केवळ मुक्ती नको आहे, मुक्तीबरोबरच मी स्वत: विष्णूची अभिलाषी आहे हे त्यास ठाऊक असेलच. जसा तो पाताळाचा धनी आहे तसा आता माझ्या पतीचा वध केल्यानंतर तो माझाही धनी झाला आहे. तरी त्याने आता माझे पाणिग्रहण करावे. तिचे हे आवाहन ऐकून सबंध दरबारानेही तिचे म्हणणे उचलून धरले. या प्रस्तावावर हनुमानाचा अबोला पाहून दरबारातले वातावरण हळूहळू चिघळू लागले. यावर उपाय म्हणून हनुमानाने भगवान विष्णू हे आपल्या सर्व भक्तांवर प्रेम करतात, त्यामुळे मी भगवान विष्णुंस तुम्हास दर्शन देण्याची विनंती करेन मात्र जशी भगवंताची इच्छा असेल तेच होईल असे तीस सांगितले.
 
हनुमानाने मग रामास चंद्रसेनेची कामना सांगितली. रामाने यावर त्वरित तिला भेटण्यास संमती दाखवली. हे पाहून केवळ हनुमानच नव्हे तर लक्ष्मणही अचंबित झाला मात्र दोघेही काही बोलले नाहीत.   


हनुमान मग चंद्रसेनेकडे गेला विष्णू तीस भेटण्यास तयार आहे असे सांगितले. तिने त्यास रात्री आपल्या महालात भेटण्यासाठी बोलावले. रामाच्या मनात चंद्रसेनेसारख्या अलौकिक लावण्यवतीस पाहून विषयवासना तर उत्पन्न झाली नसावी ना या विचाराने हनुमान आणि लक्ष्मण असे दोघेही चिंतीत झाले होते. अहिरावण मेला असला तरीही अजूनही रामाने लक्ष्मणास त्याची मर्यादा रेखा ओलांडण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे जर रामाच्या मनात विषयविकार उत्पन्न झाला असेल तर हनुमानाने काही उपाय योजून रामास या अध:पतनापासून रोखलेच पाहिजे असे त्यांनी ठरविले. मग त्यांनी एक योजना बनविली. त्यानुसार रामाच्या अपरोक्ष भेटीच्या जागेची सुरक्षा पाहणी करण्याच्या बहाण्याने राम चंद्रसेनेकडे जाण्यापूर्वीच हनुमान तिथे गेला. त्याने पाहिले की तिथे केवळ भेटीची तयारी चाललेली नसून प्रियाराधनेची तयारी चालू होती. एका सुंदर महालात एक अत्यंत सुंदर असा मंचक सजविला गेला असून अत्यंत योजनाबद्ध रीतीने रामास कामभावनेत फसविण्याचा यत्न करण्यात येत आहे हे त्याने ओळखले. मग हनुमान त्या महालात गेला आणि त्याने त्या सजविलेल्या मंचकाचा एक पाय तोडून नुसताच तुटलेल्या तुकड्यावर वठवून ठेवला व स्वत: मंचकावरची चादर काहीशी खालपर्यंत ओढून मंचकाखालीच लपून बसला. जर राम चंद्रसेनेच्या काव्यास बळी पडलाच तर तो मंचकावर बसताच मंचक खाली पाडून त्याचा कामभंग करावा जेणेकरून तो कामविकाराच्या प्रभावातून बाहेर येईल, व अध:पतनापासून वाचेल असा त्याने मानस केला.

मग ठरल्या वेळी राम चंद्रसेनेच्या महाली आला. चंद्रसेना विष्णुच्या प्रेमात अक्षरश: हरवून गेलेली स्त्री होती. आपल्या सौंदर्याची तिला पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच आता मोठ्या भाग्याने भेटलेल्या विष्णूस आपल्या सौंदर्याच्या मोहपाशात गुंतवून आपल्या जवळच थांबवून ठेवावे असे तिला वाटत होते. त्यामुळे ती तिच्या मनमंदीरात वसलेल्या विष्णूस प्रथम भेटीतच प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कामोत्तेजक पेहरावात मंचकावर पहुडली होती. रामाने त्या गृहाचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि त्याची नजर लगेच मंचकावर पहुडलेल्या चंद्रसेनेच्या श्रुंगारासक्त देहाकडे गेली. कित्येक दिवस रामाने स्त्रीसंग केला नव्हता. त्यामुळे आधीच अपार लावण्यवती असलेल्या चंद्रसेनेस तशा पेहरावात पाहून तो आत्यंतिक विषयोत्तेजीत झाला. त्या प्रखर विषयवेगाने त्याची मति क्षणभर भंग झाली. त्याचे मनात तीव्र विषयविकार उत्पन्न झाला. तिकडे मंचकावर दिवास्वप्नात गुंग असल्यामुळे रामाच्या येण्याची जाणीव न झालेल्या व डोळे मिटून विष्णूशी संगाची कल्पनेतच कामना करीत असलेल्या चंद्रसेनेने अचानक स्वत:शीच मंद हसून एका कुशीवर वळण घेतले तेव्हा पाठमोऱ्या तीस पाहून तर राम अधिकच प्रवर्धित झाला, इतका की त्या उत्तेजनेपायी त्याचे सत्वर शौर्य द्रवले. आणि मग मात्र अशा एकाएकी नि:तेज झालेल्या रामाच्या मनावरून 
विषयज्वरदेखील तत्पर उतरला आणि त्याची जागा लगेच खजीलपणाने घेतली. एका य:किंचित कामभावनेने आपण केवढ्या अध:पतनास तयार झालो या विचाराने तो प्रचंड लज्जित झाला. त्याने याही प्रसंगी डोळे मिटून विष्णुनामच पुटपुटणाऱ्या चंद्रसेनेच्या मुखाकडे पाहीले आणि त्यास अचानक सीतेची आठवण आली. तीही निरंतर असेच रामनाम जपत असते असे हनुमानाने त्यास सांगितल्याचे आठवले. आपण आपल्या धर्मपत्नीशी केवढी मोठी प्रतारणा करायला निघालो होतो या पापभावनेने राम वरमला, आणि तसाच आल्या पावली चंद्रसेनेस स्पर्शही न करता माघारी फिरला.

राम खिन्न अपराधी चेहऱ्याने बाहेर लक्ष्मणाकडे आला. हनुमानही मागाहून आला. आणि मग झाल्या प्रकाराबद्दल अवाक्षरही न काढता तिघेही लगबगीने तिथून इहलोकी  परतण्यास निघाले.

पृथ्वीवर पोचले तेव्हा सुग्रीवादिंनी बिभीषणास पाश बांधून बंदिस्त केलेले होते. पाताळ म्हणजे नेमके काय हे माहीत नसल्याने सगळे त्या भुयाराजवळ रामादिकांच्या येण्याची वाट पाहत उभेच होते. घडलेल्या घटनेचा गाजावाजा होऊ नये म्हणून रामाने हनुमानास त्या भूयारातूनच परत राहुटीत जाण्याचे सांगितले. भुयारातून राहुटीत तटबंदीच्या आत पोचल्यावर खालच्या खड्ड्यातून वर येण्यासाठी उंचपुऱ्या हनुमानाने राम आणि लक्ष्मणास खांद्यावर बसवून वरती उचलले. मग ते खड्ड्यातून बाहेर आले नंतर हनुमान उडी मारून स्वत: खड्ड्याच्या बाहेर आला. ते दृष्य पाहणाऱ्या काही वानर सैनिकांनी पाताळ हे जमिनीच्या खाली असते आणि तिथून हनुमान राम लक्ष्मणास खांद्यावर घेऊन त्या अनंत पोकळीतून वर उड्डाण करीत आला अशी वार्ता संपूर्ण वानरसेनेत पसरविली. आणि पुढे अशीच वदंता प्रचलित झाली. जवळजवळ अष्टप्रहरांपश्चात राम आणि लक्ष्मण परत आले होते. सेनेत त्यांच्या गैरहजेरीमुळे काही अनिष्ट प्रवाद पसरून खळबळ उडू नये म्हणून राम लंकेत नाही ही वार्ता कुणासही न लागू देता सेनापती सुग्रीवाने प्रत्यक्ष स्वत: त्या दिवशी नेतृत्व करून युद्ध चालू ठेवले होते. राम लक्ष्मणास सुरक्षित परत आलेले पाहील्यावर मग बिभीषणाची माफी मागून सुग्रीवाने त्यास मुक्त केले. यानंतर आपण सुरक्षित असल्याची हमी देत रामाने सर्वांस झोपण्यासाठी पाठवले.

काल ते बिभीषणाने बनविलेले संवाद यंत्र अजूनही तसेच होते. रामाने सहज तो शंख त्याचेपुढे धरला व त्यातून तो 'नमस्कार' असे हाक मारल्यासारखे मोठ्या आवाजात बोलला. त्याचा अंदाज खरा होता. पलीकडून रावणही त्याचा पुकारा येण्याचीच वाट पाहत होता. मग त्यांच्यात पुन्हा चर्चा सुरु झाली.
"कसा वाटला पाताळ?"
"पाताळ अतिशय अचंबित करणारा आहे. या आपल्या लंकेहूनही कितीतरी विलक्षण."
"आपणांस तिथल्या सृष्टीचा, मनुष्यांचा काही वेगळा अनुभव आला काय?"
"अर्थातच.! तिथली सृष्टी अपार विलक्षण होती. मात्र आम्ही कुणा मनुष्यांशी काही संपर्क अथवा संवाद वगैरे केला नाही त्यामुळे त्यांचे जीवन अथवा परंपरांचे बाबतीत काही विशेष अनुभव आला नाही."
रावण हे ऐकून हलकेच हसला आणि म्हणाला, "श्रीराम मी आपणांस एक गोष्ट सांगू इच्छितो. खरेतर मला हे कालच बोलायचे होते पण मला बोलता आले नाही. आज मात्र मी ते बोलू शकतो. आता आपल्या पत्नीच्या विरहाच्या दु:खात आणि युद्धाच्या गदारोळात कदाचित आपल्या मनात सर्वप्रथम आपल्या पत्नीस मुक्त करण्याव्यतिरिक्त अन्य विचार येणार नाहीत, मात्र युद्ध संपल्यावर आणि आपल्या पत्नीस प्रत्यक्ष भेटल्याच्या काही समयापरांत आपल्या मनात कलुषित विचार येऊ शकतात. म्हणून मी स्वयं आपणांस सांगू इच्छितो की आपली पत्नी ही एखाद्या देवीइतकीच पवित्र आहे. माझ्या मनात तिच्या अपहरणानंतर विषयविकार उत्पन्न झालाच नाही असे नाही, मात्र अशा विषयवासनेने जेव्हा जेव्हा मी तिजजवळ गेलो तेव्हा मला माझी प्रियपत्नी मंदोदरी हिचीच स्मृति होत असे. माझ्या पतिव्रता धर्मपत्नीच्या माझ्या स्मृतीतील या अस्तित्वाच्या जाणीवेने मला आपल्या धर्मपत्नीपासून दूर ठेवले. आपल्या पत्नीची आपल्यावरची निस्सीम श्रद्धा आणि विश्वास या गोष्टीदेखील मी पाहिल्या आहेत. अशा सती पतिव्रतेस स्पर्शण्याची त्यामुळेच माझी हिम्मत देखील झाली नाही. म्हणूनच माझी इच्छा आहे की मनात यत्किंचितही किंतु न धरिता युद्धानंतर आपण आपल्या धर्मपत्नीस शुद्ध अंत:करणाने स्वीकारावे."
"लंकानरेश, ज्या स्त्रीच्या स्वयंवरात आपण अभिलाषी म्हणून आला होतात आणि तीस मिळविण्यास असमर्थ ठरला होतात, तीस अपहृत केल्यावर विषयवासनेने बाधित असूनही आपण स्पर्श केला नाही यावर कुणी विश्वास ठेवेल काय?"
"इतर कुणी ठेवो ना ठेवो, पण आपण विश्वास ठेवा श्रीराम. एका पतिव्रतेचे अपहरण करण्याचे पातक माझ्या माथी आहेच पण ती गंगेच्या जलासारखी पवित्र असूनही माझ्यामुळे तिची निर्भत्सना व्हावी हा दंभ तरी किमानपक्षी मज नको."
"माझ्या पत्नीवर माझा विश्वास आहे, मात्र आपणावर माझा विश्वास बसणे अप्राप्य आहे. आणि आपण असमयोचीतपणे ही विषवल्ली माझ्या मनात पेरल्याने मी संभ्रमित झालो आहे. बहुदा माझे मानसिक खच्चीकरण करून हे युद्ध जिंकण्याचा आपला डाव आहे हे आता माझ्या लक्षात आले आहे."
"नाही नाही श्रीराम. मी त्रैलोक्याचे अधिराज्य भोगलेला रावण, माझ्या सर्वाधिक प्रिय स्वर्गवासी पुत्राची शपथ घेऊन सांगतो की मी जे बोललो ते त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे सांगण्यात माझा कोणताही मानसिक छल करण्याचा मानस नाही."
"लंकापती, विषयवासना माणसास कोणताही अधर्म करण्यास प्रवृत्त करते. मी हे जाणत असताना आपणावर कसा विश्वास ठेवेल?"
"रामचंद्र आपण मला माफ करणार असाल तर एक गोष्ट सांगतो. विषयवासना नक्कीच अत्यंत बलशाली असली तरीही ती प्रत्येकवेळी अधर्म घडवून आणण्यात यशस्वी होतेच असे नाही."
"हे फक्त योगायोगांवर आधारलेले एक गृहीतक आहे. आपण जिचे आत्यंतिक अभिलाषी आहोत अशी एक काहीही आधार नसलेली स्त्री आपल्या ताब्यात आहे आणि आपण तिला स्पर्शत नाही असे प्रत्यक्षात होऊ शकत नाही."
"होऊ शकते राम. जसे काही समयापुर्वी चंद्रसेनेच्या बाबतीत झाले होते."
हे ऐकून राम चपापला. "हे आपल्याला कसे कळले?"
"पाताळावर आजही माझेच राज्य आहे हे विसरू नका राम. तिथल्या कुठल्याही भागातली इत्यंभूत माहिती मी कधीही अनेको हेरगिरीच्या साधनांनी विनासायास मिळवू शकतो."
राम ओशाळून म्हणाला, "लंकानरेश आपण योग्य बोललात. विषयवासनेने मी काही क्षणांपूर्वी एका परस्त्रीची कामना केली होती. कुणासही ही वार्ता कळली तर मी त्या स्त्रीशी संग केला नाही यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र सत्य परिस्थिती ही नक्कीच निराळी असू शकते हे आपले म्हणणे आता मला पटले आहे. माझा माझ्या धर्मपत्नीवर विश्वास आहेच आणि आता आपल्यावर विश्वास न ठेवण्यात काहीही तथ्य नाही हेही मला उमजले आहे."
"आपला विश्वास आपल्या पत्नीवर असेलच याची मला खात्री होती रामचंद्र, पण जसे आपल्या मनात किल्मिष उत्पन्न होऊन ते नाहीसे देखील झाले तसे कदाचित आपल्या स्नेहीसंबंधी, इतर बंधू अथवा राज्यातील प्रजेबाबतीत होणार नाही. त्यांतल्या कुणी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला तरी आपण त्यास महत्व देऊ नये. मी कालच आपणांस म्हणालो नव्हतो का? की मला हे युद्ध थांबवायचे आहे मात्र लोकभावनेस्तव मी ते थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे कदाचित आपणही लोकभावनेस बळी पडून आपल्या धर्मपत्नीस पवित्रतेचे पुरावे मागू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. खरा श्रेष्ठ नृपति तोच जो लोकनिंदेने खचून न जाता योग्य तोच निर्णय घेण्याची क्षमता अंगी धारतो.

"मी आपले कथन नक्की स्मरणात ठेवेल. चला आता मी आपणांस निरोप देतो. परत आपण एकमेकांशी बोलणार नाही. आणि बोलूही नये."

"श्रीराम एक शेवटचे, कालच्या आपल्या पाताळयात्रेतील कोणतीही घटना मी कुणास सांगणार नाही याचे आपणांस वचन देतो. आपणांस मी आधी सांगितल्याप्रमाणे मी जर मृत्युशय्येवर पडलोच तर आमच्या तंत्रज्ञानाचे रहस्य ऐकण्यासाठी आपण यावे अथवा आपल्या बंधूस मजकडे पाठवावे. आणि याव्यतिरिक्त आपण माझी फक्त एक गोष्ट माझी मान्य करावी. काल चंद्रसेनेस बोलल्याप्रमाणे आपण विष्णूचे अवतार आहात ही वदंता मी माझ्या सेनेतही पसरविणार आहे. म्हणजे किमान माझा पराभव झाला तरी तो कुणा सामान्य कुळातील मनुष्याकडून झाला नसून एका दैवी अवतारी पुरुषाकडून झाला आहे असे माझ्या प्रजेस वाटेल. आपण या वदंतेस नाकारू नये ही विनंती. आता आपला निरोप घेतो."

सोमवार, २ मार्च, २०१५

गॉड अंडरस्कोर रिलिजन डॉट एक्स वाय झेड

देव जे सर्वप्रचलित आहेत ते मी मानत नाही की मानतो हा भाग अलाहिदा पण माझ्यापरीने प्रचलित किंवा रूढ देव आणि धर्म ही संकल्पना सर्वाधिक सामर्थ्यवान आधुनिक साधनाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
कम्प्युटर हे ते आधुनिक साधन.  या स्पष्टीकरणात एकदा कम्प्युटर बनला की त्यात बाहेरून युजर काहीही हार्डवेअर बदल करत नाही असे मानावे.

१. समजा की कम्प्युटर हे ब्रम्हांड आहे. आणि माणसे या त्यातल्या फाईल्स. आधी कम्प्युटर निर्माण झाले आणि नंतर फाईल्स. त्यामुळे फाईल्सना हे कळणेच शक्य नाही की कम्प्युटरास कुणी किंवा कसे निर्माण केले. फाइल्सच्या कुठल्याही डाटाबेसची नोंद त्यांच्या निर्मितीच्या शोधात जास्तीतजास्त त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या इंस्टोलेशनपर्यंत जाऊ शकते. जशी आपली बिग बँग पर्यंत जाते. 
२. या कम्प्युटरमधील ऑपरेटिंग सिस्टीम हे जीवनचक्र आहे. तर हार्डवेअर हे फिजीकल मॅटर (म्हणजे आपली पंच महाभूते). इव्होल्युशन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट होत राहणे. ओ.एस.मध्ये बदल होत राहतो, मात्र हार्डवेअर बदलत नाही (जशी पंच महाभूते कायम आहेत). समजा फ़ाइल्स एका इंटेलीजंट सिस्टीमचा भाग असल्याने त्यांस स्वत:चा सोर्स कोड शोधण्याची भावना निर्माण झाली तर काय होईल? फ़ाइलची जी अड्रेस इन्फो असते त्या धाग्याने मग फाईल्स त्यांना रन करणाऱ्या इनिशियल अड्रेसला म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टोलेशन फाइललाच आपला निर्माता किंवा देव मानतील. त्यातही पुन्हा काही जण त्या संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टोलेशन फाइलला एकच फोल्डर मानतील आणि म्हणतील की देव एकच आहे. तर काही जण त्यातल्या सगळ्या सब-फोल्डरांना देव मानून अनेकेश्वरवादाचा पुरस्कार करतील.  प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम हे एक वेगळ्या कल्पनेतले विश्व असेल. जसे भारतात भारतीय उपखंड हीच संपूर्ण पृथ्वी किंवा विश्व होय असा प्रघात पूर्वी प्रचलित होता, तर आज आपली गैलेक्सी हे आपले विश्व आहे.

३. आताची जी क्लिष्ट धर्म पद्धती आहे ती स्पष्ट करण्यासाठी वर सांगीतल्याप्रमाणे ओएसला विश्व मानू.
सगळ्या फ़ाइल्स सारख्या काम करत नाहीत. काही फ़ाइल्स गाण्याच्या असतात, काही व्हिडीओच्या असतात,  काही संख्या साठवणाऱ्या तर काही लिखित माहिती साठविणाऱ्या असतात. त्या वेगवेगळ्या मुख्य प्रोग्रामद्वारेच चालतात. उदाहरणार्थ वीएलसी प्लेअर हा विडीओ आणि गाणीच वाजवतो. तर फोटोशोप हे फक्त फोटो फाईल्स प्रोसेस करते. म्हणजे विशिष्ट फ़ाइल्स या फक्त त्या विशिष्ट प्रोग्रामने ठरवून दिलेले नियम आणि मर्यादा यांचेच पालन करतात. थोडक्यात दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास प्रोग्राम्स हे धर्म आहेत. हे प्रोग्राम्स फ़ाइल्स्च्या जीवनपद्धतीचे नियम ठरवून देतात. मग ऍडोब ऍक्रोबॅट हा एक धर्म, विंडोज ऑफिस हा दुसरा धर्म. मॅटलॅब हा एक धर्म, कोरेल ड्रॉ हा एक धर्म असे अनेक धर्म बनतात. आणि माणसांसारखी ईर्ष्या त्यांत निर्माण झाली तर  प्रत्येक धर्म/प्रोग्राम हा स्वत:लाच श्रेष्ठ समजेल हे वेगळे सांगायला नकोच.   
४. आता फक्त विंडोज या विश्वापुरते पाहू. यातील प्रत्येक प्रोग्रामची म्हणजे धर्माची काही वेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यांच्या फाईल्सचे स्वरूप वेगवेगळे असते. वेगवेगळी नावे असतात. उदाहरणार्थ .mat हे मॅटलॅबच्या फाईल्सचे नाव असते तर .doc हे एमएस ऑफिसच्या.  काही प्रोग्राम इतरांच्या काही फाईल्स ओपन करू शकतात किंवा स्वत:त सामावून घेऊ शकतात तर काही प्रोग्राम इतरांना आपल्यात सामावून घेत नाहीत. उदाहरणार्थ ऍडोब ऍक्रोबॅट हा टेक्स्ट फाईल किंवा वर्ड फाईल किंवा अगदी पिक्चर फाईलसुद्धा स्वत:त सामावून घेऊ शकतो. जसे काही धर्म इतरांना स्वीकारतात तर काही स्वीकारत नाहीत. काही प्रोग्राम म्हणजे धर्म तर असे असतात की आपल्याच उपजातींना एकमेकांत मिसळू देत नाहीत. जसे एमएस ऑफिसमधील एक्सेलच्या फाईल्स वर्डमध्ये किंवा वर्डच्या एक्सेलमध्ये उघडत नाहीत. हाच तो धर्मांतर्गत जातीवाद होय.

५. आता श्रेष्ठ कोण असा प्रश्न निर्माण झालाच तर  धर्माधर्मात तेढ निर्माण होणे स्वाभाविक आहे. असे झाल्यावर अनेक अडचणी उद्भवतात. मग एक प्रोग्राम दुसऱ्या प्रोग्रामच्या फाईल नुसते उघडणे टाळत नाही तर बहुतांश वेळा ब्लॉक सुद्धा करतो, किंवा अनइंस्टोल करण्यास भाग पाडतो. हा दहशतवाद होय. याउलट काही प्रोग्राम फुकट मिळतात जेणेकरून फुकटच्या लालसेने त्यांचे युजर्स वाढतील. हे म्हणजे लालूच दाखवून धर्मांतर करणे होय.

६. आता जर समजा हे प्रोग्राम एकमेकांवर कुरघोडी करू पाहत असतील तर ते एकमेकांची उणीदुणी काढत आपापला धर्मप्रसार कसा करतील? 
ऍडोब ऍक्रोबॅट हा ऑफिस फाईल्सना सांगेल की बघा तुम्हाला सर्वांना सारखी वागणूक मिळत नाही. वेगवेगळ्या जातींत भेदभाव केला जातो. सर्वात सुंदर आहेत त्या .ppt फाईल्स. कुठेही प्रेजेंट करण्यासाठी .ppt वापरले जाते. बिचारे .doc आणि .xls एवढी मेहनत घेतात पण त्यांना हा मान मिळत नाही. एवढेच नाही तर तुमच्या फाईल सगळ्या भाषांना समान वागणूक देत नाही. फक्त प्रस्थापितांच्या फॉंन्टला रेकोग्नाइज केले जाते. विशेषत: भारतीय फॉंन्टशी तर फार भेदभाव केला जातो. त्याउलट आमच्याकडे पहा, आमच्या सगळ्याच फाईल्स .pdf आहेत आणि सगळ्यांना सारखाच दर्जा आहे, मग भलेही तिचे कंटेंट हे चित्र, संख्या किंवा मजकूर असे काहीही का असेना. एवढेच नाही तर आम्ही प्रत्येक भाषेच्या फॉंन्टला सुद्धा समान दर्जा देतो. म्हणून हे .doc आणि .xls फाईल्सनो तुमच्यावरील .ppt चा अन्याय टाळायचा असेल, भेदभाव नष्ट करायचा असेल, समानता आणायची असेल तर .pdf बना.
कोरेल ड्रॉ म्हणेल तुम्ही आमच्यात या आम्ही तुम्हाला सुंदर बनवू. तुमचा दर्जा वाढवू. हेच पहा ना आमच्या छोट्यात छोट्या फाईलची साइज सुद्धा २ एमबी पेक्षा कमी नसते. तुम्ही २० केबीचे असाल तरी आम्ही तुम्हाला २० एमबीचे बनवू. म्हणून स्वत:चा दर्जा वाढवायचा असेल तर आमच्यात या.  
ऑफिस म्हणेल आमची परंपरा उज्वल आहे, उदात्त आहे.  आमचा धर्म वैश्विक आणि सर्वमान्य आहे. बाकीच्या सगळ्या धर्मांचा मूळ पाया आम्हीच आहोत. तेव्हा या उदात्त परंपरेचा भाग व्हायचे असेल तर पुन्हा आमच्यात या. 
...............
तर एकंदर सारे असे आहे. या कम्प्युटर प्रमाणेच आपला देव, धर्म हे सारे इतकेच काल्पनिक अथवा अमूर्त आहे. या सगळ्या आपण विनाकारण पाडून घेतलेल्या कल्पित सीमा आहेत.
आपल्या उत्पत्तीविषयी बोलायचे झाले तर एकच खरे की जर आपल्याला निर्मिणाऱ्या शक्तीला आपणांस सांगायचेच नसेल तर आपली  खरी निर्मिती कशी झाली, कुणी केली हे आपल्याला काहीही केल्या समजू शकत नाही. कारण आपली क्षमता, पोहोच ही मर्यादित आहे. तसेच प्रत्येक प्रोग्रामसारखा प्रत्येक धर्म आपापल्या जागी योग्य आहे. कुणी आम्हीच श्रेष्ठ आहोत असे म्हणत असेल तर ते खरे नाही. प्रत्येकाची निर्मिती काही विशिष्ट कार्य सिद्धीस नेण्यासाठी झाली आहे. इन्डीविज्युअल फाईल आणि तिच्यात असलेल्या माहितीचा दर्जा महत्वाचा. ती कोणत्या प्रोग्राममध्ये बनली अथवा कोणत्या प्रोग्राममध्ये कार्य करते हे महत्वाचे नाही. असे विभ्रमित करणारे भेदभाव अथवा श्रेष्ठ कनिष्ठता कम्प्युटर आणि त्यातल्या फाईल्स पाळत नाहीत. म्हणून एकत्रितरीत्या ती एक उच्च दर्जाची सिस्टीम ठरते. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी हे जग चांगले बनविण्यास आपापल्या परीने हातभार लावला तर आपल्याही सिस्टीममधून एक अत्यंत सुंदर आणि मौल्यवान आउटपुट मिळेल.