हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

सुख जवापाडे

वेळ- भविष्यातले "क्ष" वर्ष
जगभरातल्या न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांचे मथळे एकाच बातमीने आठवडाभर भरून गेले आहेत. केंब्रीज विद्यापीठातले जैवतंत्रज्ञानाचे भारतीय वंशाचे प्राध्यापक श्री. समीर बोऱ्हाडे यांचा "नेचर" या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेला प्रबंध हे त्याचे कारण होय. यापूर्वी प्रा. बोऱ्हाडे यांचे तीन प्रबंध "नेचर" मध्ये प्रकाशित झाले होते परंतु यावेळी मात्र त्यांच्या प्रबंधास जगभराने डोक्यावर उचलून घेतले आहे. प्राध्यापक महाशयांनी सुखाच्या गुणसुत्राचा म्हणजे डीएनए कोडचा शोध लावला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यावरून एक लस देखील तयार केली असून ती लस टोचताच कुणालाही सुखी होता येणार आहे. प्राध्यापक म्हणाले की आज मी जगातला सर्वात आनंदी माणूस आहे, कारण मला सापडलेल्या सुखाच्या सूत्राने मी जगातले सगळे दु:ख संपविणार आहे. आता एकाही मनात निराशा नांदणार नाही. आणि एकाही डोळ्यात अश्रू असणार नाहीत.   
...
वेळ- "क्ष" वर्ष+एक महिना… 
जगभरात आता चर्चांचा काथ्याकुट चालू आहे. डब्लू.एच.ओ.च्या देखरेखीखाली जगातल्या जवळ जवळ सगळ्या देशांनी आपल्या तमाम नागरीकांस ही लस टोचण्याचा निर्णय घेतला आहे.  आणि ज्या देशांच्या सरकारांनी असा निर्णय घेतला नाही तिथल्या विरोधी पक्षांच्या निवडणूक जाहिरनाम्यांत तो स्वीकारण्याचा वायदा केला गेला आहे. किंबहुना जाहीरनाम्यात हा एकमेव वायदा आहे. सगळे वैज्ञानिक हे 'हाच जगातला अंतिम शोध होय' असे सांगू लागले आहेत. सगळे धर्ममार्तंड हे 'ही लस म्हणजे ईश्वराचा प्रसाद' असल्याचे सांगत आहेत. कम्युनिस्ट या अभूतपूर्व लसीने येऊ घातलेल्या समानतेमुळे आनंदी आहेत तर भांडवलदारदेखील पैसा हा शेवटी आनंदासाठीच असतो आणि तो आनंद आता आयताच लाभतो आहे म्हणून खुश आहेत.
...
वेळ- "क्ष"+एक वर्ष…
आता सगळ्या जगभरात ही लस टोचली गेली आहे. लस टोचून घेण्यास कुणीही अपवादानेदेखील विरोध केला नाही. सुखी कुणाला व्हायचे नाही? काही विशेष घटना घडली नाही, संपत्ती प्राप्त झाली नाही, इतर कोणतीही मिळकत नाही, तरीही प्रत्येक जण  एका अलोट आनंदाच्या लाटेवर स्वार आहे. कुणीही कोणत्याही कारणाने अथवा विनाकारण आनंदी होत आहे. नुसता सूर्य उगवल्याने लोकांस आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, मावळल्याने फुटताहेत. भूक लागली म्हणून लोक आनंदी आहेत, भागली म्हणून आनंदी आहेत. आवाज आला, आनंद! शांतता आहे, आनंद.! डोळे उघडा, आनंद! बंद करा, आनंद.! बोला, आनंद! शांत बसा, आनंद.!! काम करा, आनंद! करू नका, आनंदच..!! शाळा नाहीत, ऑफिसे नाहीत, बँका बंद पडल्या आहेत, शेअर मार्केटात बैल अन अस्वलांच्या मुर्त्या सोडून कुणीही उरलेले नाही. कित्येकजण त्यांची आवडती कामे जी त्यांस आधी करायला मिळाली नाहीत ती करून घेत आहेत. माणसे स्वखुशीने शेतात राबताहेत, गाणी बनवून गाताहेत, कारखान्यांत कामे करताहेत. कुणी गाड्या चालवत आहे, कुणी कम्प्युटरवर वेगवेगळे सॉफ्टवेअर लिहितो आहे. पण या कामांना वेळेचे बंधन नाही. कोणतेही टारगेट नाही. जो तो हवे ते हवे तेवढे करतो आहे.  जगातल्या सगळ्या दहशतवादी संघटनांनी समर्पण केले आहे. सगळे फरार गुन्हेगार समोर आले आहेत. त्यांना कुणी अटकही करत नाहीये. तुरुंग ओस पडले आहेत, घरे ओस पडली आहेत. शहरे, गावे आणि अगदी देश वगैरे अशा सीमाच राहिल्या नाहीत. माणसे कुठेही फिरताहेत. कुणीही मनाला वाटेल ते काम करताहेत, मन भरले की ते काम सोडून देताहेत. चराचरात नुसते सुखच सुख आहे.
...
वेळ- "क्ष"+दोन वर्षे... 
प्रेयसींनी, बायकांनी रुसणे सोडले आहे. कारण त्या रुसल्या तरी प्रियकरा-नवऱ्यांस आनंदच होतोय. पोरे आईबापांस वैताग देऊ देऊन वैतागली पण आईबाप आपले आनंदीच.  एका फडतूस नटाने अत्यंत वाईट सिनेमा काढला,  प्रेक्षक आनंदीच.  शंभर कवींच्या नवकविता ऐकूनही श्रोता खुश. तो सर्वात लोकप्रिय क्रिकेटर सलग दहादा शून्यावर गेला तरी देशात आनंदाचे भरते आलेले.  भाजीत मीठ नाही, पण खाणारे खुशीत. आजारी झाला तर डॉक्टर पेक्षा रुग्णच आनंदी आहेत. पोरे कडू औषधे पिऊनही हसत आहेत.   

वेळ- "क्ष"+चार वर्षे...  
जगभरात आज खळबळ माजली आहे. सगळ्या टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्रे, इंटरनेटवर एकच खबर ऐकायला मिळत आहे. भारत नावाच्या देशात, महाराष्ट्र नावाच्या राज्यात, मुंबई या शहरात एक माणूस लस टोचल्यानंतरही दु:खी झाल्याचे आढळून आले आहे. सदरहु माणूस हा पूर्वाश्रमीचा (म्हणजे लसीपूर्वीचा) राजकारणी नेता असल्याची माहिती आहे. जगभरात अफवांना ऊत आला आहे. लस बनविणाऱ्या कारखान्यातील एक लॉट हा सदोष असल्याची अफवा पसरली आहे. डब्लू.एच.ओ.मध्ये नव्या ऐच्छिक संचालक मंडळाने सदरहु प्रकरणात सखोल चौकशीची शिफारस केली असून (हल्ली कुणीही आदेश देत नाही, शिफारस करतात) लोकांस अफवांवर विश्वास न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
...
वेळ- "क्ष"+पाच वर्षे... 
डब्लू.एच.ओ.द्वारा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर येत आहेत.  सदरहु नेत्यानंतर त्याचा पूर्वीचा मित्र असलेल्या एका मोठ्या उद्योगपतीस दु:खावेगाचा झटका आल्याचे समितीने नमूद केले असून हळू हळू जगभरातल्या इतर नेते आणि उद्योगपतींत ही कमतरता पसरू लागली आहे. या नेते आणि उद्योगपतींनंतर कित्येक सामान्य माणसांतही हळू हळू दु:खावेगाची लक्षणे दृष्टीस पडू लागली आहेत. यामागच्या कारणांचे निष्कर्ष हे धक्कादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
...
वेळ- "क्ष"+सहा वर्षे... 
माणसे आनंदी झाली, सुखी झाली, पण पूर्ण समाधानी झाली नाहीत. मध्यंतरी अलास्कातून जपानला गेलेल्या काही पर्यटकांनी असे नमूद केले की तेथील लोक हे जगातील इतर लोकांपेक्षा अधिक आनंदी आहेत. त्यामुळे जपान्यांनी लसीच्या मूळ घटकांत काही बदल करून आपल्या नागरिकांस सुधारित लस दिली असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. पण हा केवळ एक आरोप ठरला. मात्र आता संशयाचे हे भूत संपूर्ण जगात पसरू लागले आहे. सुरुवातीचा आनंदाचा बहर ओसरल्यावर लोक एकमेकांत आपल्या सुखांची तुलना करू लागले आहेत. तुलनेतून लोकांस असे वाटू लागलेय की सगळेच आनंदी असल्याने आनंदात काही वेगळेपण राहिलेले नाहीये. प्रत्येक क्षण आनंदाचा असल्याने आनंदही कंटाळवाणा ठरू लागला आहे. याहीपेक्षा आपण स्वत: तर आनंदी आहोतच मात्र आपल्यापेक्षा इतरजण अधिक आनंदी वाटत आहेत. लोकांना कळले आहे की काही लोकांना विशिष्ट काम केल्यावर अधिक आनंद मिळतो. मग सगळे लोक तीच कामे करण्यासाठी धडपडू लागले आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक जण गाडी चालविण्याची संधी शोधू लागला आहे, विमान उडविण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. पण प्रत्येकाला ती संधी मिळेना. काहीजण तर गवतावरून अनवाणी चालणे हे त्यांचे आवडते काम असूनही गाडी चालविल्यास वेगळा आनंद होईल काय या कुतूहलातून गाडी चालविण्याची कामना बाळगू लागले आहेत. विशेष म्हणजे जे काम करण्याची इच्छा झाली ते काम करण्यास मिळाले नाही तरी लोकांस आनंद हा मिळतच आहे कारण लस ही काहीही झाले तरी आनंदाची अनुभूती देणारीच आहे. पण लोकांचे समाधान होईना. तोच तोच पणा तीच ती भावना याचा लोकांस कंटाळा येतो आहे. जे आपल्याजवळ नाही ते मिळाल्यावर अथवा जे आपणास करायला मिळत नाही ते केल्यावर कसे वाटेल याचे कुतूहल लोकांना सतावू लागले आहे. खरेतर जगात आता दु:ख व्हावे असे काहीच उरले नाहीये. प्रत्येक गोष्टीत केवळ आणि केवळ आनंद आहे. मात्र इतरांस जे मिळते आहे त्याची आपल्यास स्वभावत: आवड असो वा नसो, त्या गोष्टीची आपणांस गरज असो वा नसो पण ते दुसऱ्याजवळ आहे आणि आपल्याकडे नाही एवढेच नव्हे तर दुसऱ्यास कदाचित तिच्यायोगे काही विशेष आनंदाची प्राप्ती होत असेल, ही भावना माणसांस सतावू लागली आहे. काहीजणांस उगीच आपले लसीकरणपूर्व आयुष्य अधिक रमणीय आणि रोमांचकारी होते असे वाटू लागले आहे. जो पहिला दु:खी माणूस समोर आला होता तो राजनेता याच भावनेतून दु:खी झाला होता. आपणांस जे मिळते आहे तेच इतरांना मिळते आहे हे पाहून त्याचे आपल्या सुखद अनुभूतींनी समाधान होईना. मी पूर्वाश्रमीचा कुणी विशेष असतांना आता एक सामान्य झालो आहे या भावनेने तो पूर्वीपेक्षा आता अधिक आनंदात असूनही असमाधानी राहू लागला. इतर राजनेते आणि उद्योगपतीही याच भावनेतून असमाधानी झाले.  जगात इतरत्र असलेल्या कित्येक अनोळखी गोष्टींपासून आपण कदाचित वंचित असू अशी भावना लोकांत मूळ धरू लागली आहे. जे दुसऱ्याकडे आहे ते मला आवश्यक असो की नसो, दुसरा आनंदी दिसतोय म्हणजे ते मला मिळायलाच हवे असे प्रत्येकजणास वाटू लागले आहे.
....

लसीकरणाच्या पूर्वीची स्थिती तरी कुठे वेगळी होती? प्रत्येकाकडे काही गोष्टी होत्या, काही नव्हत्या. जोपर्यंत एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही याची कल्पना नव्हती तोपर्यंत सगळे काही व्यवस्थित चालू होते. पण एखादी वस्तू दुसऱ्याकडे दिसली की ती आपल्याकडे नाही म्हणून माणसे दु:खी होत होती. त्यांना उगीचच त्या गोष्टीची गरज वाटू लागे आणि मग ती मिळविताना अपयश आले की ती अजून दु:खी होत. आणि समजा ती गोष्ट मिळालीच तरीही पुढे लगेच दुसरी गोष्ट दिसत असे. आणि मग पुन्हा ती नवी गोष्ट मिळविण्याची धडपड चालू होई. खरेतर दु:ख हे आपल्याकडे एखादी गोष्ट नाही याचे नसते, तर आपल्याकडे एखादी गोष्ट नाही पण ती दुसऱ्याकडे आहे याचे असते.

 वेळ- "क्ष"+आठ वर्षे...
प्रसंग-प्राध्यापक बोऱ्हाडे यांची प्रेस कॉन्फरंस.
प्राध्यापक म्हणाले, आज माझ्यावर जगातल्या जवळ जवळ ४६ देशांतल्या न्यायालयांत केस दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी जामीन मिळविण्याएवढी रक्कम आणि वेळसुद्धा माझ्याकडे नाही. आठ वर्षांपूर्वी मी खूप उत्साही आणि आनंदी माणूस होतो, कारण माझा प्रयत्न प्रामाणिक होता. मला जगातली सगळी माणसे सुखी करायची होती. पण आता माझ्या लक्षात आले आहे की असे कधीही होऊ शकत नाही. कारण मानवी भावना, कल्पना, गरजा या अमर्याद आहेत. माणसाचे कुतूहल आणि नित्यनाविन्याची आस हाच त्याच्या सुख आणि दु:ख या दोहोंचे कारण आहे. डबके साचलेले राहिले की ते कुजते आणि त्यात दुर्गंधी येऊ लागते. माझी सुखाची लस ही त्याच डबक्यासारखी होती. स्थिर. अप्रवाही.!! जीवन प्रवाही आणि गतिशील असावे लागते. ते अवखळपणे वहावे लागते. त्याला उन्हाचे चटके आणि मेघांची छाया अशा दोघांचीही आवश्यकता असते तेव्हाच त्याचे सौंदर्य खुलते. दु:ख असले तरच सुखास किंमत आहे. सुख किंवा दु:ख ही कुठलीही विशिष्ट आणि ठोस अवस्था नाही ती फक्त एक तुलनात्मक स्थिती आहे. म्हणूनच दु:ख जेवढे मोठे तेवढाच सुखाचा आनंद मोठा होय. जवापाडे सुखासाठी दु:ख पर्वताएवढे हवेच हे मला उमजले नाही, म्हणून सुखाची लस बनविणारा मी स्वत:च आज जगातला सर्वात दु:खी माणूस आहे.

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

इज्या, बिज्या आणि फज्जा

जाऊ तिथे शहाणपणा हा आमचा दोघांचाही स्थायीधर्म.! मी आणि विज्या.! आमच्या जोडगोळीला सगळे "इज्या-बिज्या" म्हणतात, आम्हाला तिज्या मात्र कधी मिळाला नाही. तर, कुठेही जावो, काहीही कानावर पडो, आम्ही आपल्या मताची इथे तिथे पिंक टाकणारच. विषय अनोळखी असला तरी पत्ते वाटल्यासारखे धाड धाड सल्ले आम्ही वाटत असतो. आणि विषय ओळखीचा निघाला तर? मग मात्र आमच्या अस्मानभराऱ्यांस आभाळही थिटे पडलेच म्हणून समजा. गप्पा अशा मोठ्या मोठ्या आणि एवढ्या अविर्भावात की आजूबाजूच्या लोकांस वाटावे की हे कुणीतरी खूप मोठी असामी आहेत की काय. विशेषत: स्टेशनवर किंवा लोकलमध्ये अथवा एखाद्या पर्यटनस्थळी, हॉटेलात, किंवा कॉन्फरंसमध्ये, लग्नात इत्यादी, थोडक्यात काय तर जिथे खूप श्रोते असतील तिथे आम्हाला एक प्रकारचे स्फुरण चढते. एकदा एका लग्नात आमच्या "हिंदी चित्रपटसृष्टीतील विवाहाचे चित्रीकरण" या विषयावरची गहन चर्चा ऐकून तीन जणांनी आग्रह करून आमच्या बरोबर फोटो काढून घेतला होता. एकदा एका पार्टीत वाजत असलेल्या एका गीताची चाल ही कशी पॉल लुईस (कधीही अस्तित्वातच नसलेला गायक) याच्या गाण्यावरून घेतली आहे इथून सुरु झालेली चर्चा थेट वर्तमान भारतीय संगीतावर प्रखर ताशेरे ओढत राजा कृष्णकृतवर्मा (हा कोण कुणास ठाऊक) याच्या दरबारातील "पंडित धृत्पद्मनाग" या गायकाने रचलेल्या "बैसाख शलाका" या रागाच्या उत्पत्तीपर्यंत येउन ठेपली (आता हा गायक आणि त्याचा राग हे म्हणजेही केवळ "पुड्या" हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच). आमच्या या महान संगीत ज्ञानप्रकाशाने दिपलेल्या एका होतकरू मुलाने आवर्जून डायरीत आमचा पत्ता विज्याच्या सहीसहित लिहून घेतला. असे अनेकदा होई. आमच्या अद्वितीय व्यासंगाने (तो आतून कितीही पोकळ का असेना) भारावून कित्येक जण उगीचच हस्तांदोलन करतील, तुमचे कार्ड आहे का विचारतील किंवा प्लीज तुमचा मोबाइल नंबर देता का असे म्हणतील. तर असे आम्ही थोर. त्यामुळे कधी आमच्या दृष्टीक्षेपास पडलात तर लक्षात ठेवा आमच्या व्यासंगाशी संग, प्राणाशी गाठ.!! कधी कुणी बकरा सापडला आणि त्यास आमच्याशी वाद घालण्याची दुर्बुद्धी झाली की त्याचा बळी गेलाच समजायचा. 
तर असेच एकदा सुरतला निघालो होतो. ट्रेनने. गर्दी बऱ्यापैकी, पण आमचा पट्टा सुरु होईना. हे गुजराथी पण ना, मोजून मापूनच बोलणार, त्यामुळे आम्हाला गप्पा टाकायला माणूस आणि विषयच मिळेना. तेवढ्यात एकजण डोळे मिटून हनुमानचालिसा म्हणू लागला. फिनिश झाल्यावर मी उठून गेलो आणि म्हणालो, "हे काय मधेच? काही मुहूर्त वगैरे होता काय सहस्त्रनामाचा?" तो म्हणाला, "मुहूर्त नाही हो, अहो इथे ४ वर्षांपूर्वी एक ट्रेन अपघात झाला होता. ३३ लोक मेले होते. म्हणून इथून ट्रेन जाताना आपली ट्रेन सुखरूप रहावी म्हणून मी नेहमी अशी रामरक्षा म्हणतो." (अच्छा म्हणजे ती ह.चा. अथवा स. ना. नसून रा. र. होती तर!) काही असो आता आम्हाला एक गिऱ्हाईक भेटले होते. मी फासे टाकायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला काय वाटते त्या ३३ जणांचे आत्मे ही ट्रेन उलथून टाकतील की काय?  "असे बोलू नका हो. असे बोलू नये. एकदा मला इथेच रात्री एक लाल शर्टवाला माणूस भेटला होता. जो त्याच ट्रेन अपघातात मरण पावला होता. तो नेहमी रात्रीच्या ट्रेनमध्ये थोडावेळ येउन बसतो" (माझे स्वगत: वा रे पठ्ठ्या कसा नेमका भेटलास, आता रामरक्षा तुझी भुतांपासून रक्षा करील कदाचित, पण आमच्यापासून कदापि नव्हे. ही ही हा हा)
आम्ही पुढे बोलणार तेवढ्यात एक विचित्र प्रसंग घडला. एक ट्रेन आमच्या बाजूच्या पटरीवरून आम्हास क्रॉस झाली. आणि आम्हाला दिसले की एक लाल शर्टवाला माणूस त्या ट्रेनच्या दरवाजात उभा आहे. (मग काय विशेष? असेल तिकडच्या ट्रेनमधील एखादा माणूस दरवाजात उभा.!! हे तुमचे स्वगत बरे का चाणाक्ष वाचकहो) तर यात विचित्र असे की ती बाजूची ट्रेन पूर्णपणे आम्हाला क्रॉस होईपर्यंत बाहेर फक्त तोच माणूस आणि तोच दरवाजा दिसत होता. आता पुढच्या ट्रेनच्या प्रत्येक डब्याच्या दारात तर एक माणूस लाल शर्ट घालून उभा नसणार ना? आणि असला तरी तो असा कंटीन्युअसली कसा दिसेल? आणि हे दृश्य फक्त आम्हीच नव्हे तर डब्यातल्या सर्व जणांनी पाहिले. डब्यात दोनचार मिनिटे एक चिडीचूप शांतता पसरली. "इतना सन्नाटा क्यों है भाई" असे म्हणून हा सन्नाटा तोडायचा या बेतात मी असतानाच जोरजोरात रामरक्षा चालू झाली. मी त्याला थांबविले पण तो थांबेना. सगळे लोक भेदरले आहेत हे स्पष्ट दिसत होते. मग विज्या बोलू लागला "अरे घाबरण्याचे काही कारण नाही लोकांनो. मी सांगतो काय झाले असणार. आपल्या ट्रेन एका वळणावर क्रॉस झाल्या असणार त्यामुळे त्या ट्रेनचे बहिर्वक्री आणि आपल्या ट्रेनचे अंतर्वक्री रुपात सामना झाला. त्यामुळे एक भिंग तयार झाले आणि एकच प्रतिमा या भिंगाच्या वक्रतेमुळे आपल्याला शेवटपर्यंत दिसली. एखाद्या चमच्याच्या नाही का बोट खोलगट भागासमोरून फिरवले तर त्याचे रिफ्लेक्शन बरोबर उलट्या दिशेने पुढे पुढे जाताना दिसते? असे सांगून विज्याने लोकांकडे कौतुकाच्या अपेक्षेने पाहीले पण याच्यापेक्षा तो रामरक्षेवालाच बरा अशीच लोकांची भावना दिसली. एकजण म्हणाला, अहो पूर्ण मुंबईपासून तर वलसाडपर्यंत ट्रेनच्या रस्त्यास एकही वळण नाही.काहीही सांगता काय? परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहून मग अजून सायंटीफिक फंडा टाकावा म्हणून मी बोलू लागलो. वळण नसले तर नसू द्या हो पण तुम्हाला प्रकाशाचे डीफ्राक्शन हा प्रकार माहित आहे का? प्रकाश किरणांच्या मार्गात जेव्हा एखादा शार्प अडथळा येतो तेव्हा त्यांची दिशा बदलते. आता वेळ काय झालाय? १२ वाजून ३० मिनिटे. सूर्य नेमका मध्यावरून पश्चिमेला झुकलाय, त्यामुळे सूर्यकिरण तिरपे होऊन आले, आपल्या गाडीचा त्यांस अडथळा निर्माण झाला, प्रकाशाचे वक्रीकरण झाले आणि एकच प्रतिमा आपल्याला प्रकाशाच्या वक्रीकरणामुळे दिसली.
"उगीच काहीही फेकू नका हो." गाडीच्या उजव्या दरवाजाकडून आवाज आला. सगळ्यांनी दचकुन तिकडे पहिले तर तोच मघाशी बाजूच्या ट्रेनमध्ये दिसलेला लाल शर्टवाला माणूस डब्यात शिरत होता. भर दुपारीमुळे की काय कुणास ठाऊक पण डब्यातल्या प्रत्येकाच्या अंगाला दरदरून घाम फुटला. प्रकाशाचे वक्रीकरण होऊन प्रकाश जेवढा वळतो त्यापेक्षा हजारपट अधिक माझी बोबडी वळली होती. रामरक्षा अतिशय वेगाने पण अत्यंत दबक्या आवाजात चालू झाली. लाल शर्टवाला पुढे येउन आमच्या सीटजवळ उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला (पिवळी होणे म्हणजे काय ते तुम्हाला काय माहित हो?)
मग तो म्हणाला, "काय राव मघापासून ऐकतोय तुम्ही काहीही बोलताय. अहो तो माणूस मीच होतो. आणि समोरच्या ट्रेनमध्ये नव्हे तर याच ट्रेनच्या दारात उभा होतो. ही जी ट्रेन क्रॉस झाली ना ती होती राजधानी एक्स्प्रेस. ती आहे संपूर्ण एसी गाडी.! त्यामुळे सगळ्या डब्यांना काळ्या काचा आहेत. त्याच काळ्या काचांवर मी आपल्या डब्याच्या दारात उभा असल्याने माझे रिफ्लेक्शन तुम्हाला ट्रेन संपूर्ण पास होईपर्यंत कंटीन्युअसली दिसले.
त्या दिवसापासून आजतागायत विज्या आणि मी कोणत्याही ट्रेनमध्ये कुणाशी काही बोललो नाहीये.

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

उम्या आणि पक्या



आता उम्या मोठा माणूस झालाय. गाडी, ड्रायवर, एसी केबिन, पर्सनल सेक्रेटरी असा उम्याचा जाम थाट आहे.


तसा उम्या आधीपासूनच बऱ्यापैकी हुशार. पण आम्ही तेव्हा त्याला "घासू" हे नाव ठेवले होते. विषय कोणताही असो उम्या नुसता पाठ करत बसायचा. अगदी गणितेसुद्धा..!! (अर्थात आमचा गणिताशी तसाही ३६चाच आकडा असल्याने गणिताच्या अभ्यासाची नेमकी पद्धत काय हे अजूनही आम्हास ठाऊक नाही हा भाग अलाहिदा, पण पाठांतर ही नक्कीच योग्य पद्धत नाही. नव्हे का?)


उम्या म्हणजे तसा अगदी वॉलफ्लॉवरच असे मात्र नाही हो. तसा तो पोरांत यायचा. पण मी, राज्या, नित्या असे त्याचे सर्वात जवळचे तीनचारजण असले तरच तो गप्पांत सामील व्ह्यायचा. एरवी पोरांत असूनही नसल्यासारखाच.! कधी कधी मूड आला की मग मात्र जाम बोलायचा, हसायचा. नाचला मात्र कधीच नाही. पण आमचा नाच कम अंगविक्षेप पाहून हसायचा मात्र खूप. आम्ही तेव्हा आमच्या आणि खालच्या वर्गातल्या पोरींबद्दल जाम गप्पा हाणायचो. उम्या अपवादानेच त्यात सामील व्हायचा. आम्हीही त्याला अशा विषयांत सामील करीत नसू. एकदा मांसाहारी जोक्सचा फड रंगला होता, तेवढ्यात उम्या तिथे आला. नित्या त्याला म्हंटला, "उम्या तू जा बाबा, ये बच्चोंके खेलने की चीज नही है बच्चे." यावर आम्ही एकमेकांच्या टाळ्या घेऊन उम्याला जाम हसलो. उम्या शांतपणे बसला आणि म्हणाला तुम्ही स्वत:ला काय समजता रे? आणि मग उम्याने आम्हाला एक जोक सांगितला. एकदम फाडू. आम्ही चाट पडलो. च्यायला उम्या तू सुद्धा? कुठे मिळाले तुला अशा जोक्सचे पुस्तक? अजूनही बरेच पाठ केले असतील ना? मग सांग की अजून. मग उम्याने जो दांडपट्टा फिरवलाय म्हणून सांगू की त्यानंतर त्याला पिल्लू, बच्चा असे म्हणणे सपशेल बंदच झाले.


तर उम्या एवढा पुस्तकी किडा की क्रिकेट खेळायला देखील पुस्तक घेऊन यायचा. त्याचा आम्हाला फक्त फिल्डिंगपुरता उपयोग व्हायचा. पण उम्याला तेवढेही लय आवडायचे. मी कधी लवकर आउट झालो की मग मला सल्ला द्यायचा. "राहुल (होय मला राहुल्या न म्हणता शुद्ध राहुल म्हणणारा उम्या हा एक दुर्मिळ सजीव होय) तू प्रत्येक बॉलचा पाठलाग करत जाऊ नकोस रे, एखादा बॉल सोडून दिला तरी काही फरक पडत नाही. प्रत्येक बॉल खेळायचाच या अट्टाहासामुळे तू बऱ्याचदा आउट होतोस." मला ते त्याचे समजावणे आवडायचे नाही. मग मी म्हणायचो, "असे का? कुठल्या पुस्तकातून तू हा सल्ला वाचून पाठ करून आलास रे घाश्या? आता बापाला शिकवणार का रे भाड्या?". बॅटिंग असली की उम्या त्याचा नंबर येईपर्यंत पुस्तक वाचत बसे. "माझा बॅटिंगला नंबर यायला वेळ आहे तोपर्यंत एखाद दोन पॅरेग्राफ तरी पाठ होतील" अशी त्याची भूमिका. एकदा मी त्याला एक कादंबरी वाचायला दिली. दोन तासांत पठ्ठ्याने ती परत केली आणि म्हणाला "यात काय वाचायचे? दहा पाने सलग वाचली आणि मग मला पहिल्या पानावरचे काही आठवेना. प्रत्येक पान दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कथा माझ्या डोक्यात बसणार नाही, आणि असे करायला खूप वेळ वाया जाईल. तेव्हा ही तुझी कादंबरी तू परत घे बाबा." "च्यायला तू खरा जातिवंत घाश्या रे उम्या. अरे रट्टा मारण्याची एवढी सवय लागलीय तुला की एखादी गोष्टही सरळ वाचून समजत नाही. तुझे अवघड आहे यार. जरा सुधर." उम्या काही बोलला नाही, नुसताच हसला. पण त्या हसण्यात "बापाला शिकवतो का रे भाड्या?" हा माझाच डायलॉग लपलेला होता असे मला उगीच वाटले.


...


पक्या हा उम्याचा सर्वात मोठा जानी दुश्मन. तसा तोही आमच्याच कंपूतला, मात्र त्याचा कायम उम्याशी वाद.!! मागे कधीतरी एकदा पक्याने काहीतरी खोडी केल्यावर घटनेचा एकमेव साक्षीदार असलेल्या उम्याने मास्तरला त्याचे नाव सांगितले होते, आणि मास्तरांनी मग पक्याला जाम सुजवला होता. तेव्हापासून उम्या हा मास्तरचा चाटू आहे, गद्दार आहे, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये असे पक्या नेहमीच म्हणायचा. पक्या तसा जरा उर्मटच होता. त्याच्या बापाचे आमदाराकडे कायम उठणे-बसणे असायचे. बाप पंधराएक वर्षांपूर्वी एकदा जिल्हा परिषदेवरही निवडून गेला होता. अर्थात त्यानंतर तो परत कधी जिंकला नाही, पण त्या एका निवडीचा तोरा पक्या कायम मिरवत असे. ग्रुपमध्ये आमच्यावर मात्र त्याचा हा तोरा चालत नसे. पक्या नेहमी शेर/चारोळ्या मारायचा. आम्ही त्याला 'ग्रेस' म्हणत असू. पण हे नाव त्याला त्याच्या काव्यप्रतिभेमुळे मिळाले नव्हते तर आठवीपासून प्रत्येक वर्गात पक्या गणितात ग्रेस मार्क्स घेऊन पास होत आला होता म्हणून मिळालेले होते.! प्रत्येक वेळा बरोबर असूनही पक्या आणि उम्यामधून विस्तव जात नसे. पक्याला उम्याने काही चांगला उपदेश/सल्ला दिला की पक्या जाम तापायचा. "तू मला शिकवू नकोस साल्या गद्दारा. तुझ्यासारखे छप्पन्न जण मी घरी घरगडी म्हणून ठेऊ शकतो." असे काहीसे म्हणूण तो नेहमी उम्याचा पाणउतारा करायचा. पक्याची ही माजोरी त्याच्या बापामुळे होती. निवडणूक हरत असला तरी आमदार साहेबांचा वरदहस्त असल्याने अनेक कंत्राटे, ठेके त्याला मिळत. त्यातून तो जाम पैसा छापी. वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून साहेबांचे टेबलाखालचे कलेक्शन करण्याची जबाबदारी देखील पक्याच्या बापाचीच होती. त्यामुळे पक्या आणि त्याचा बाप जरा गुर्मीतच राहत.




नंतर आम्ही सगळे पांगलो. मी आणि उम्या मुंबईत नोकरीला लागलो तर नित्या रत्नागिरी आणि राज्या अमरावतीस कामाला लागले. पक्या गावातच होता. त्याच्या बापाचा धंदा जोरात होता त्यामुळे त्याला नोकरीची काही फिकीर नव्हती. त्यावर्षी दिवाळीत आम्ही सगळेजण गावात जमलो. जवळजवळ तीन वर्षांनी आम्ही एकत्र येत होतो. मग आम्ही मोटारसायकलींवर आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर गेलो. सिगरेटी फुकल्या. आता प्रत्येकाचा ब्रांड बदलला असल्याचे म्हणजे महागडा हायफाय झाल्याचे आमच्या लक्षात आले. मग सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. आमच्या मुंबईच्या गोष्टी तर नित्याच्या रत्नागिरीच्या. आम्ही तिघे खुश होतो पण राज्या अमरावतीस वैतागला होता. मग मोर्चा वळला तो पक्याकडे. पक्या एकदम बेफिकीर होता. तो नोकरीला नाही याचे त्याला काही वैषम्य वाटत नव्हते आणि त्यास ते वाटण्याचे काही कारणही नव्हते. तरी आपला उम्याला त्याचा उमाळा आलाच. आणि तो म्हणाला, "यार प्रकाश तुला काय सांगू, नोकरी करण्यात आणि स्वत: कमावण्यात एक वेगळीच मज्जा आहे. तू सुद्धा आमच्यासारखा ग्रॅज्युएट आहेस. तू नोकरीसाठी प्रयत्न तर करून बघ, किती दिवस असाच बापाच्या जीवावर उड्या मारीत राहणार?" पक्या उखडला, त्याने सरळ उम्याच्या कानशिलात भडकावली आणि चेकाटून म्हणाला, "साल्या उम्या तू मला शिकवणार का रे? आहेस तरी कोण तू? एक साधा कारकुंडाच ना? मग आयुष्यभर एवढी घास घास घासलीस त्याचा काय उपयोग झाला? ह्या राव्हल्याला बघ. साला कॉलेजला सगळी मज्जा करूनदेखील तुझ्या दुप्पट पगार घेतोय. च्यायला तू मला नोकरीचे सल्ले देतोस? अरे तूच ये माझ्या घरी आणि घरगडी बन. तुला तुझ्या आताच्या नोकरीपेक्षा जास्त पगार मी देतो." उम्यानेही मग पक्याची गच्ची धरली. पण आम्ही मध्ये पडून दोघांना बाजूला केले. "बघून घेईल तुला सुद्धा. बापाच्या जीवावर किती दिवस माज करशील?" असे म्हणत उम्या फणफणत निघून गेला आणि त्यानंतर परत अड्ड्यावर आला नाही अथवा आम्हा कुणाला फोनही केला नाही.
असे बरेच दिवस गेले. पक्याचा बाप मध्यंतरी पतसंस्थेच्या एका मोठ्या घोटाळ्यात पकडला गेला. आमदारसाहेबांचा पाठींबा असल्याच्या गुर्मीत पठ्याने एसीबीवाल्यांची पार आयमाय करून टाकली. पण साहेबाने सपशेल काखा वर केल्या, आणि मग एसीबीने पक्याच्या बापाला असा काही गुंतविला की बस्स. त्याची तीन चारी बँक खाती सील झाली. जमीन, दागिने, घरातली रोकड, दोन ट्रक, एक ट्रॅक्टर आणि तीन जीपा हे सगळे जप्त झाले. बापच आत आणि साहेबाने तोंड फिरवलेले त्यामुळे पक्याला काही करता येईना. दोनेक महिन्याभरात पक्याच्या घराची दुर्दशा झाली. कामधंदा नाही, नोकरी नाही, पक्याचे ठरलेले लग्नही मोडले. नातेवाईकांनीदेखील पाठ फिरवली. पक्यावर उपासमारीची वेळ आली. मग सगळा मानमरातब सोडून पक्या रोजंदारीवर जाऊ लागला. रोजगार केंद्रात नाव नोंदविले. नोकरीसाठी अर्ज खरडू लागला. पक्या वर्षभरात एजबार होणार होता. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी आता त्याला केवळ वर्षभराचाच वेळ होता.
काही दिवसांनी पक्याला एक कॉललेटर आले. मुंबईचे. क्लार्कची पोस्ट होती. सरकारी नोकरी. पक्याला बऱ्याच दिवसांत पहिल्यांदाच थोडा आनंद झाला. आठ दिवसांनी मुंबईत त्याची मुलाखत होती. पक्या तयारीला लागला. भाड्याचे पैसे जमविले. मुंबईच्या बहिणीला फोन करून येत असल्याचे कळविले. पक्याला आता एजबार व्हायला फक्त दोन महिने होते म्हणून त्याला सगळ्या सेटिंग लावायच्या होत्या. तद्वत सगळा अपमान गिळून तो आमदार साहेबांना भेटायला गेला, शब्द टाका म्हणून. पण साहेब म्हणाले, "प्रकाश तुला तर माहीतच आहे ते खाते अनिल मोरेंकडे आहे. आणि हा मोरे म्हणजे पक्षातील माझा सर्वात मोठा विरोधक. त्यामुळे मी शब्द टाकला तर उलट तुझे नाव मुद्दाम वगळतील ते लोक. पण तू काळजी करू नकोस. बघू आपण अजून कुठेतरी प्रयत्न करु." अर्थात ही साहेबाची तोंडाला पाने पुसण्याची स्टाइल होती, त्यामुळे पक्या काय उमजायचे ते उमजला. मुंबईत फोर्टला मुलाखत होती. पक्या आधी शंभरांदा मुंबईस गेला असल्याकारणाने काही अडचण नव्हती. ठरल्या दिवशी मग पक्या फोर्टला पोहोचला. पक्याचा पाचवा नंबर होता. आधीचे तीन चार जण पक्याहुन खूप तरुण होते. पक्या शांत होता. कुणाशी काही बोलत नव्हता. काय होणार याचे त्याला टेंशन आले होते. थोड्या वेळाने चौथा उमेदवार रुमालाने घाम पुशीत बाहेर पडला आणि शिपायाने पक्याचे नाव पुकारले. पक्या उठला. कागदपत्रांची फ़ाइल घेतली आणि आत गेला. आत जाउन खुर्चीवर बसला आणि मग समोर बघतो तर काय. मुलाखत कमेटीच्या अध्यक्षस्थानी उम्या बसलेला. पक्या चपापला. उम्याही पक्याला पाहून आश्चर्यचकित झाला. चारेक वर्षे गावी न फिरकल्यामुळे उम्याला पक्याच्या परीस्थितीची काहीच कल्पना नव्हती. दोघांनाही तो चार वर्षांपूर्वीचा दिवाळीतला प्रसंग आठवला. पक्या खाली मान घालून स्तब्ध बसला होता. उम्या म्हणाला, "अरे प्रकाश तू? तू मुलाखतीला कसा?" पक्या काहीच बोलला नाही. उम्या खुर्चीतून उठला, पक्याकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "अरे किती दिवसांनी भेटतोयेस तू.!" मग उरलेल्या कमेटी मेंबर्सना उद्देशून उम्या उद्गारला, "जंटलमेन, मिस्टर प्रकाश जाधव इज अ वेरी क्लोज चाईल्डहूड फ्रेंड ऑफ माइन, अँड हेंस आय रिक्वेस्ट ए फेवर फ्रॉम ऑल ऑफ यू. आय वांट धीस पोस्ट टू बी गीव्हन टू मिस्टर प्रकाश ओन्ली. व्हाट डू यू ऑल से?" कमेटीतले इतर सगळेजण आश्चर्यमिश्रित आनंदात हसत होते. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. पक्याची मान अजून खालीच होती. उम्याने त्याच्या खांद्यावर जरा थोपटले आणि म्हणाला, "कॉंग्रॅच्युलेशन्स प्रकाश, अँड वेलकम टू माय डिपार्टमेंट." पक्याच्या नाकातून आता उष्म श्वास बाहेर येत होते. तो अचानक उठला. खांद्यावरचा उम्याचा हात झिडकारला आणि खुर्चीच्या बाहेर आला. "मला तुझे उपकार नकोत. समजलास काय? मी तुझा मिंधा बनून तुझ्या हाताखाली काम करीन असे तुला वाटले तरी कसे? मी लाथ मारतो तुझ्या या नोकरीला" असे म्हणून दोनच महिन्यांनंतर एज-बार होऊन कुठेही नोकरी करण्यास नालायक ठरणार असलेला पक्या थरथर कापत आपली फाइल घेऊन धुसमुसत थेट बिल्डींगच्या बाहेर निघून गेला.
तर मध्यंतरी कारकुनीतून अभ्यास करून, परीक्षा देऊन उम्या मोठा साहेब झाला. मी मुंबईतच असल्याने आम्ही त्यानंतर एक दोनदा भेटलो देखील. पण उम्या आधीसारखा नेहमी गावाला जायचा बंद झाला. उम्या नव्या पोस्टला जॉईन झाल्यावर एकदा सीएसटीवर भेटला होता. मी त्याला पाहिल्या पाहिल्या जोरात "ए उम्या" अशी बिनधास्त मोठी आरोळी ठोकून दिली. त्या आवाजाने उम्या चकित होऊन त्याचे बरोबरच्या माणसांना काहीसे सांगून माझ्याकडे आला. जवळ आला, "हॅलो" असे म्हणून माझ्याशी शेकहॅंड केला. आणि त्या दिवशी अचानक माझ्याशी अहो जाहो घालून बोलू लागला. म्हणजे "अहो भांगरे साहेब इकडे कुठे? खूप दिवसांनी तुम्ही भेटलात, खूप बरे वाटले" असे काहीसे खूप औपचारिक बोलला. मला काही कळले नाही. पण "मी आता खूप घाईत आहे, नंतर फोन करतो, मग आपण निवांत भेटू बरे का भांगरे साहेब, आता तुमची रजा घेतो" असे म्हणून त्याने काढता पाय घेतला आणि त्याच्या बरोबरच्या इतर काळ्या कोटावाल्यांबरोबर गर्दीत मिसळून गेला.












उम्याने नव्याने फेसबुक जॉईन केले. मला एका फ्रेंडच्या लिस्टमध्ये तो दिसला म्हणून मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने ऍक्सेप्ट केली. मग मी त्याच्या वॉलवर 'काय रे उम्या भाड्या, कसा गाठला मी तुला इथे.! नालायका साल्या कंजुसा आता पार्टी कधी देतो ते बोल' अशी पोस्ट टाकली. उम्याने तिला रिप्लाय तर केला नाहीच पण उलट ती पोस्ट डिलीट करून टाकली असे माझ्या लक्षात आले.

एकदा गावात दिवाळीच्या सुट्टीला उम्यादेखील आल्याचे कळले. मी त्याच्या घरी भेटायला गेलो. "या भांगरे साहेब कधी आलात?" असे विचारून त्याने सुरुवात केली. मी म्हणालो, "अरे उम्या हरामी, गावी येणार होतास तर सांगायचे तरी होतेस ना? आपण बरोबर आलो असतो". "नाही हो, माझे काही नक्की नव्हते. अचानक प्रोग्राम ठरला आणि आलो. त्यामुळे तुम्हाला सांगायला जमले नाही." उम्याने हे 'तुम्ही तुम्ही' का लावले आहे ते मला कळेना. मी विचारले, "अरे हे काय लावले आहेस? मला हे 'तुम्ही, साहेब' असे का बोलतो आहेस बाबा?" उम्या म्हणाला, "अहो कुणी मोठा साहेब झाल्यावर त्यांना योग्य तो मान नको का द्यायला?" मी हे ऐकून चक्रावलो. मग गावातल्या काही पोरांनी मला सांगितले की उम्याने त्यांना "मला उम्या अशी हाक मारू नका" असे बजावले होते. "मला अहो जाहो घालून बोलायचे असेल तर बोला, अन्यथा माझ्याशी बोलला नाहीत तरी चालेल" अशी त्याने पोरांना ताकीद दिली होती. मग मला त्याचे मला 'अहो-जाहो, तुम्ही' इत्यादी म्हणण्याचे कारण कळले. मला स्पष्टपणे 'माझ्याशी आदरार्थी बोल' हे सांगता येत नाही म्हणून त्याने हा आडमार्गाचा उपाय शोधला होता. पण मी तसे करणारेय थोडाच? लगेच उम्याच्या घरी गेलो आणि बाहेरून "ए उम्या घाश्या बाहेर ये, चल फिरायला जाऊ" अशी आरोळीवजा हाक मारली. उम्या पडलेल्या चेहऱ्याने बाहेर आला आणि माझी तब्येत ठीक नाही मी येऊ शकणार नाही असे म्हणाला. मी हसून तिथून निघालो. दुसऱ्याच दिवशी उम्या मुंबईला निघून गेल्याचे कळले. नंतर उम्याला दोन चार वेळा फोन लावले, फेसबुकवर मेसेज केले पण उम्याने रिस्पॉंड केले नाही. उम्या आता माझ्या कुठल्याही पोस्टवर रिप्ल्याय देणे सोडा, साधे लाइकदेखील करत नाही. मी त्याच्या वॉलवर किंवा पोस्टवर कमेंट केली तरी तो तिला लाइक अथवा कमेंट करत नाही. गंमत तर अशी की उम्याच्या एखाद्या पोस्टवर आलेल्या सगळ्या लोकांच्या कमेंट्सला उम्या लाइक करतो, केवळ माझी कमेंट सोडून.!! मला त्याने असे केल्यावर त्याची जाम मजा येते. मग मी मुद्दाम त्याच्या एखाद्या पोस्टवर "ए उम्या" अशी कमेंट टाकतो. या कमेंटला मात्र तो न चुकता रिस्पॉंड करतो... ती कमेंट डिलीट करून..!!




तर त्या मुलाखतीच्या प्रसंगानंतरची ही अशी उम्याची कहाणी. मग पक्याचे काय झाले? तो दोन महिन्यांनी एज-बार होण्याआधी नोकरीला लागला की नाही? आता काय करतो? हे काहीही मी सांगणार नाहीये. पक्याच्या बाबतीत ही असू देत आमची "झाकली मुठ सव्वा लाखाची..!!!"

रविवार, १ डिसेंबर, २०१३

डिसेंबर महिना आणि रविवारची सकाळ..

एव्हना गाव कडाक्याच्या थंडीत पार गोठून गेलेले असते. आपण आपले सकाळी सकाळी उठावे, ब्लॅंकेट पांघरावे आणि अंगणातून उगवणारा मोठ्ठा लालतांबडा सूर्य पहावा. घराच्या छतावरून मग कोवळी पिवळीलाल ऊन्हे हळूहळू रानभर पांगताना बघावी. त्या उन्हात डोक्यावर सकाळीच भरलेल्या दुडी अन तीडीच्या उतरंडी घेऊन चाललेल्या लेकीबाळी अन आयाबायांचे चकाकणारे हंडे पहावेत. ऊन सगळ्या परिसरावरचे धुक्याचे पांघरूण काढून घेते, पण भरलेली नदी ऊन्हाचे ऐकत नाही. धुक्याची दुलई ती घट्ट धरून ठेवते. आणि मग छतावरून मला दिसते नदीच्या पात्रावर एक लांबच लांब पसरलेली वाकडी तिकडी धुक्याची पट्टी. पण ऊनही ईरेला पेटलेले असते. ते थोड्याच वेळात नदीवरचे धुक्याचे पांघरूण काढून घेतेच.
              मात्र नदीपेक्षाही ऊन्हाला अजिबात दाद न देणारे अजून कुणीतरी असते. ती असते डोंगराची सावलीकडची बाजू..!! ती पूर्ण धुक्यात वेढलेली असते. जसे जसे ऊन वर येते आणि डोंगराच्या किनारीवरून खाली खाली डोकावू लागते तशी तशी मग सावलीतल्या धुक्याची तारांबळ उडते. ते सावलीतल्या सावलीत लपून राहण्याचा प्रयत्न करते. पण मिडासचा स्पर्श होऊन कशाचेही सोने व्हावे तसे जिथे जिथे ऊन पोचेल तिथे तिथे पिवळे सोने पसरू लागते. अगदी कवायतीला जमलेल्या शाळेच्या पोरांसारखी ऊन आणि धुक्याची जिथे भेट होते तिथे अशी एक सरळ रेष डोंगर माथ्यावरून ते थेट जिथे सावली जमिनीला टेकते तिथपर्यंत दिसते. सगळ्यात आधी मग उंच उंच झाडांचे शेंडे धुक्याच्या वर येऊन डोकावू लागतात. ऊन अजून चढू लागते तसे धुके अजून खाली खाली जाते. मग जवळ जवळ सगळी झाडे दिसू लागतात. आणि मग तो स्वर्गीय नजारा दिसतो... ...जवळजवळ सगळ्या रानावर उन्हाचे सोने विखुरलेले असताना या झाडांच्या बुंध्यांत मात्र थोडे थोडे धुके तसेच कितीतरी वेळ गुरंफटून पडलेले असते. प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी धुक्याचे छोटेसे आळे तयार झालेले असते. तान्ह्या बाळाला लोकरीचे शुभ्र पायमोजे घालावेत ना अगदी तसे.. जाग आलेली असूनही स्वप्नातच असल्याचा अनुभव येतो ते पाहताना..!!
               आपल्या तोंडातून आता हवा बाहेर सोडली की धुरासारखी वाफ बाहेर निघते. मग उगीचच आपली सिगरेट चिमटीत असल्यासारखी दोन बोटे ओठांवर टेकवावीत आणि झोकात तो वाफेचा धूर बाहेर सोडत बसावे. थोड्यावेळाने कुणीतरी हाळ घालतो, मग आपण छतावरून निघून थेट नदी गाठावी. नदी वाफाळत असते. कपडे काढून कुडकुडत नदीच्या कडेला बसावे. गारठ्यामुळे पाण्यात उतरायची हिम्मत होत नाही. मग कितीतरी वेळ नुसते पाय बुडवून बसावे. मग अंगाला पार गार वारे बोचू लागले की अंग पाण्यात झोकून द्यावे. नदीचे पाणी थंड नव्हे तर गरम उबदार असते. भिजण्याआधी पाण्यात जावेसे वाटत नाही आणि एकदा पाण्यात गेलो की बाहेर निघावेसे वाटत नाही. कडक थंडीत नदीच्या उबदार पाण्यात डुंबत राहण्याइतके दुसरे सुख नाही.
थोड्या वेळाने बाहेर यावे अंग पुसून कपडे घालावेत आणि मग गवतातून परत गावाकडे चालत निघावे. गुडघ्यापर्यंत वाढलेले गवत दवाने डवरून गेलेले असते. गावात पोचेतो गुडघ्यांपर्यंत पाय पार भिजून गेलेले असतात. पायाची बोटे एवढी गारठून जातात की त्यांना स्पर्श केलेला देखील जाणवत नाही. तसेच बांधावरल्या वाटेने चालत गावात पोचावे आणि मग कुणाच्यातरी शेकोटीभोवतीच्या कडबोळ्यात सामील व्हावे..
           ....गावच्या शेकोटीच्या त्या शेकाची आणि नदीच्या पहाटेच्या वाफाळत्या पाण्याची ती ऊब आता इथे मुंबईत फक्त एकाच गोष्टीला येते... गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना..

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

ओळख

(प्राथमिक निवेदन - ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यात कुठलाही तथ्यांश नाही. घडलेल्या खऱ्या प्रसंगांचे, घटनांचे उल्लेख आणि संदर्भ हे केवळ कथानकाच्या सोयीसाठी घेतलेले आहेत.) 

"अहमदनगर", सामान्य माणसांचे एक सामान्य महाराष्ट्रीय शहर.! त्या शहरात १५ जानेवारी १९८२ला असाच एक सामान्य मुलगा जन्मास आला. अहमद त्याचे नाव. तीन मुलींनंतर झालेला अब्दुल आणि रिझवाना तांबोळी यांचा हा मुलगा. सहा वर्षांचा होताच अब्दुलने त्यास झेडपीच्या शाळेत टाकले. पोरगा चांगला हुशार निघाला. वर्गशिक्षक शिंदेमास्तर जेव्हा कधी बाजारात अब्दुलला भेटत तेव्हा अहमदच्या हुशारीबद्दल भरभरून कौतुक करीत आणि अब्दुलची छाती अभिमानाने भरून येई. "छोकरे कु भोत बडा आदमी बनायेंगे" असे तो नेहमी रिझवानेस सांगायचा.
चौथी पाचवीपासूनच अहमदला वाचनाची प्रचंड गोडी लागली. पण शाळेच्या लायब्ररीत जेमतेम पन्नासएक पुस्तके होती. म्हणून मग त्याने नगरपालिकेच्या लायब्ररीत जायला सुरुवात केली. खांडेकरांपासून सुशिंपर्यंत सगळे मराठी लेखक वाचून काढले. मृत्युंजय ही त्याची सर्वात आवडती कादंबरी. कर्णाने त्याच्या किशोर मनास पार हेलावून टाकले. मृत्युंजयाची त्याने पंधराएक पारायणे तरी केली असतील.
'अहमदला दुसऱ्या चांगल्या शाळेत टाका' असे शिंदेमास्तर आता नेहमी म्हणू लागले होते. "इथे पोराला योग्य न्याय मिळणार नाही. चांगली शाळा मिळाली ना अब्दुल तर तुझा पोरगा बोर्डात येईल बोर्डात.!" अब्दुललाही हे कळत होते, पण पोराच्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्चण्याची त्याची ऐपत नव्हती. त्याची परिस्थिती हलाखीची होती. ज्या घरात ते राहत त्याचीही कोर्टात केस चालू होती. शेजारचा किराणा दुकानदार त्यावर दावा करीत होता. पैशाअभावी अब्दुलच्या दोन मुली कोवळ्या वयातच आजारपणाने मृत्युमुखी पडल्या होत्या. तिथे मुलाच्या शाळेसाठी खर्च तो काय करणार? अहमद झेडपी शाळेतच राहिला.
अहमद दहावीला असताना अब्दुल घराची केस हरला. वस्तीत कोंबड्यांच्या मुत्र-विष्ठांचा वास आल्याने शेजाऱ्यांना त्रास होतो म्हणून त्याचा धंदा आधीच शेजाऱ्यांनी बंद करायला लावला होता, आता डोक्यावरचे छप्पर देखील गेले. अब्दुलने निर्णय घेतला मुंबईला जाण्याचा. मुंबईला त्याचा एक चुलत भाऊ बऱ्याच वर्षांपूर्वी गेला होता. तिकडे किमान जगण्यापुरते काम तरी मिळेल असे त्याने सांगितले होते. अब्दुलने अहमदला घेऊन मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. अहमदने दहावीचे वर्ष तरी मला इथेच राहूदेत म्हणून प्रचंड त्रागा केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अहमदच्या बहिणीस आणि रीझवानास तिच्या भावाकडे ठेऊन दोघे मुंबईस गोवंडीत आले.
अब्दुल एका कॉन्ट्रॅक्टरकडे रोजंदारीवर काम करू लागला आणि अहमद एका चहावाल्याकडे. शाळा कायमची सुटली ती सुटलीच. अशात काही वर्षे गेली. मध्यंतरी नगरला त्याच्या मोठ्या बहिणीचा त्यांनी निकाह लावून दिला. आता एकट्या असलेल्या अम्मीस मुंबईत आणायला हरकत नाही असे बाप-बेटयांत ठरू लागले. पण त्याच काळात सन १९९२ला बाबरी मशीद पडली आणि अचानक अहमदचे आयुष्यच बदलून गेले. वस्तीत जिकडे तिकडे इस्लाम, हिंदू, शिवसेना, भाजप या चर्चा रंगू लागल्या. आपण काहीतरी वेगळे आहोत, मुसलमान आहोत, याची त्याला पहिल्यांदाच प्रखर जाणीव झाली. आणि मग मुंबईत सुरु झाली एक जीवघेणी क्रूर दंगल. त्या दिवसांत घाबरून अहमद दिवसभर घरात दडून राही. आजूबाजूचे मित्र रात्री अपरात्री काठ्या, कोयते घेऊन येत आणि चल आमच्याबरोबर असे म्हणत. पण अहमद अजून भेदरून जाऊन नकार देई. एके दिवशी अब्दुल घरी परतला नाही. त्याला शोधण्यासाठी बाहेर जाण्यासही अहमदला धीर होईना. दोन दिवसांनी शेजारच्या मुनाफने सांगितले, तुझ्या अब्बाचे प्रेत रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेय म्हणून..
अहमद आता आतल्या आत धुसमुसत होता. त्याच्या अब्बूचा मृत्यू त्याच्या काही केल्या पचनी पडेना. एवढा गरीब, शांत, प्रेमळ अब्बा, त्याला कुणी का मारले असेल? अहमदचे रोम अन रोम थरथरुन उठत होते. मुठी आवळल्या जात होत्या. इन्तकाम, इन्तकाम, इन्तकाम हा एकाच शब्द त्याच्या मनात रुंजी घालत होता. वस्तीत एके रात्री एक मिटिंग झाली. त्यातली भाषणे ऐकता ऐकता अहमदची तळपायाची आग मस्तकाला जात होती. कानशिले गरम झाली होती. सभा संपली आणि घरी परतताना अहमद मुनाफला म्हणाला, "माझ्याकडे एक कोयता दे आणि चल, दिसेल त्या काफीराची आताच्या आता खांडोळी करायची आहेत मला". मुनाफने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, "थांब. असा उतावीळ होऊ नकोस. तुला संधी नक्की मिळेल. आपल्या डोक्यातली आग तोपर्यंत काबूत ठेव."
दोन महिन्यांनंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. मुनाफ त्या दिवसापासून गायब झाला. वस्तीतले अनेकजण पोलिसांनी पकडून नेले. पुन्हा संपूर्ण मुंबईभर तणाव निर्माण झाला. अहमद आणि इतर मुले रात्ररात्रभर कित्येक दिवस टोळकी करून वस्तीत गस्त घालत राहिली. मिटींगा होत राहिल्या, भाषणे होत राहिली. दिवसेंदिवस सुडाची भावना अहमदच्या मनात अधिकाधिक दृगोच्चर होत राहीली. मात्र काही दिवसांनी वातावरण निवळले. मुंबई पुन्हा धावू लागली. आता अहमद रफिकभाईच्या गॅरेजमध्ये कामाला लागला. अशीच चारेक वर्षे गेली. अहमद आता दाढी राखू लागला होता. शर्ट पॅन्ट त्यागून कुर्ता घालू लागला होता. अब्बूची आणि अम्मीची त्याला सारखी आठवण येई. मध्यंतरी दोनतीन वेळा तो नगरला जाउन अम्मीला भेटून आला. मात्र आता अब्बुच्या जाण्यानंतर त्याला अम्मीला मुंबईस आणावेसे वाटेना. काही दिवसांनी मुनाफ वस्तीत परत आला. इतके दिवस दुबईला नोकरीसाठी गेलो असल्याचे त्याने सगळ्यांना सांगितले. एके दिवशी तो अहमदकडे आला. त्याला कसा आहेस ते विचारले. अब्बू की मौत भूल तो नही गया ना? असे विचारले.  मग तो रोज रात्री अहमदकडे येऊ लागला. दोघे खूप गप्पा मारीत. तो दुबईला नव्हे तर पाकिस्तानात गेला असल्याचे त्याने अहमदला सांगितले. "ये काफिर लोग हमारे लिये कूछ नही करेंगे, उलटा इनका बस चले तो ये हमे जिंदा काट देंगे", असे तो म्हणे. "पण आपणही शांत बसायचे नाही, जब टाईम आयेगा तब कौम के लिये कुर्बानी देने के लिये तैय्यार रहना" असे तो अहमदला नेहमी सांगे. वेळी अवेळी वेगवेगळी माणसे मुनाफला भेटायला येत. ते सगळे नेहमी कुठल्याश्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलत असत. अशात ९ सप्टेंबरला अमेरिकेत वल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला झाला आणि पुन्हा एकदा तणाव मुंबईत निर्माण झाला. आता दंगल झाली तर थेट तीत तुटून पडायचे असे अहमदने ठरविले. पण दंगल झाली नाही. टीव्हीवर रात्रंदिवस बातम्या ऐकून आणि ओसामा बिन लादेन हे नाव ऐकून अहमदला त्याचेबद्दल मोठे कुतूहल वाटे. काफिरांबरोबर आता त्याचा एक नवा शत्रू निर्माण झाला होता, अमेरिका.! एक वर्षानंतर गुजरातेत दंगल उसळली. मार्चमध्ये एक दिवस मुनाफ आला, त्याचेकडे एक लॅपटॉप होता. त्याने अहमदला त्यातून काही व्हिडीओ दाखविले. आणि म्हणाला, " अब कूछ तो करना ही पडेगा. तू तय्यार रहना." मग एके रात्री मुनाफ अहमदकडे आला आणि म्हणाला "चल, बडा काम करनेका टाईम आ गया". दोघे कुर्ल्यात आले. तिथे अजून बरीच मुले होती. एक मोठा दाढीवाला माणूस सगळ्यांना काहीतरी सांगत होता. खोलीत जाताच मुनाफने ओळख करून दिली, "ये अहमद है, इसका अब्बा ९३ के दंगे मे मारा गया, इंतकाम लेना चाहता है, कौम के लिये कुछ करना चाहता है." त्या माणसाने अहमदच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला की तुम्हारा वक्त भी आयेगा. हम तुम्हारे अब्बू का और हमारे हजारो भाईयोंका बदला जरूर लेकर रहेंगे. मग त्याच रात्री अहमद आणि मुनाफ़सह वीसजण पाटण्याच्या ट्रेनमध्ये चढले. पाटण्यावरुन काही दिवसांनी त्यांना दिल्ली आणि तिथून काश्मीरमार्गे पाकिस्तानात नेण्यात आले. ते तिथे एका प्रशिक्षण शिबिरात ३ महिने राहिले. मुनाफची तिथे बऱ्याच जणांशी आधीच ओळख होती. नंतर मग त्यांना शपथ देववून पुन्हा भारतात पाठविण्यात आले.
भारतात परतल्यावर आधी काही दिवस अहमद आजमगडमध्ये राहिला. अनेक तरुण तिथे येत, गप्पा मारीत आणि शपथा घेत. बॉम्ब बनविण्याचे सराव केले जात. एक इंजिनियर होता, तो बॉम्बबद्दल बरीच माहिती देई. ते अनेक पुस्तके आणीत आणि वाचीत बसत. अहमदला मात्र ती पुस्तके वाचता येत नसत. त्याला उर्दूचे ज्ञान नव्हते. मुनाफ त्यावरून त्याला खूप दुषणे लावीत असे. काफिरांची भाषा वाचून तू त्यांचे विरुद्ध कसा लढणार असे त्याला त्याचे नवे मित्र म्हणत. त्याने उर्दू शिकायचे ठरविले. तोपर्यंत मग त्याला हिंदीतली पुस्तके वाचायला दिली जात. सगळी पुस्तके धार्मिक, आणि धर्मावरील अन्यायाला उद्गत करीत असत. कधी कधी मात्र एखादे मगेझीन हातात आले की वाचता वाचता अहमदला नगरची, शाळेची आणि अम्मीची खूप आठवण येई. आपण करत आहोत ते योग्य आहे का असा प्रश्न पडे. पण मग मुनाफशी बोलले की त्याच्या शंका कुशंका दूर होऊन जात. तिथेच एक दिवस त्याची भेट यासीन भटकळशी झाली. हा खूप तापट डोक्याचा माणूस होता. दोन तीन वेळा त्याने त्याच्याच साथीदारांच्या कानफटात मारल्याचे अहमदने पाहिले. तो नेहमीच खूप आवेशात बोलत असे. असेच काही दिवस गेल्यावर एकदा सगळ्या जणांनी आजमगडमधून पांगण्याचे व नंतर मुंबईत भेटायचे ठरविले. सगळ्यांनी आपापली सीमकार्ड्स तोडून टाकली आणि नवी सीमकार्ड्स घेतली. मुंबईत पोचताच ही सीमकार्ड्स देखील फेकून द्यायची होती. अहमदला आधी हैदराबादला पाठविण्यात आले. आणि निरोप येताच मुंबईला यायला सांगितले. त्या आधी त्याला एक दिवसासाठी नगरला जाउन अम्मीस भेटण्याची परवानगी मिळाली. 
अम्मी आजारी होती. अहमद तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. घरी आल्यावर अंथरुणावरच्या अम्मीला अहमद म्हणाला, अम्मी मी आता एका मोठ्या कामासाठी जात आहे. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. अम्मी रडू लागली. "बेटा असे का बोलतोस? तू एखादे वाईट काम तर करत नाहीस ना? तू वाईट लोकांच्या संगतीत तर पडला नाहीस ना? इकडे रोज रोज वेगवेगळ्या बातम्या ऐकून मला घाबरायला होते." "नाही अम्मी मी एक मोठे काम करायला चाललो आहे. तू काळजी करू नकोस. मी असे काम करणार आहे ज्यामुळे तुला फक्र वाटेल तुझ्या मुलावर." मग अम्मीकडे थोडे पैसे देऊन अहमदने निरोप घेतला.
मुंबईत आल्यावर रात्री ठरल्याप्रमाणे मुनाफ आला आणि त्याला घेऊन कुर्ल्याच्या त्याच घरात गेला. तिथे अजून १० लोक होते. बऱ्याच नव्या कोऱ्या बॅगा आणि प्रेशर कुकरची खोकी पडलेली होती. गुजरातेचा सूड घेण्याची वेळ आली आहे, आता तयार व्हा असे अहमद आणि इतर तरुणांस सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी परत सगळे जमले. प्रत्येकाला काही सुचना मिळाल्या. "घाबरू नका, खुदा आपल्या बरोबर आहे", असे सांगण्यात आले. सगळे जण परतले. आणि मग तो ठरलेला दिवस उजाडला. सकाळी नऊ वाजता सगळे कुर्ल्यात जमले. अहमदसह इतर दहा जणांकडे एक एक बॅग आणि त्यात एक एक प्रेशर कुकर ही सामग्री देण्यात आली. सगळ्यांना टी शर्ट जीन्स अथवा फॉर्मल ऑफिस ड्रेस घालायला आधीच सांगितले होते. प्रत्येकाला फस्ट क्लासची तिकिटे देण्यात आली. प्रत्येकाला गाडीची वेळ आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर थांबायचे, काय करायचे याच्या सूचना देण्यात आल्या. चार टॅक्सींत बसुन सगळेजण तीन वाजेच्या दरम्यान चर्चगेटकडे रवाना झाले. काम झाले की सर्वांनी वेगवेगळे मुंबई सोडून जायचे होते. कुणाशीही याबद्दल काही बोलायचे नाही आणि आपले मोबाइल टाकून द्यायचे असे ठरले. त्यानुसार संध्याकाळी पाच वाजता अहमद विरार लोकलमध्ये चढला आणि दादरला उतरून कुर्ल्यावरुन गोवन्डीस आला. तिथून इतर कुठेही न जाता त्याने मैत्री पार्कवरून पुण्याची गाडी पकडली आणि रातोरात नगरला निघून गेला.
नगरला पोचल्यावरच त्याने टीव्हीवर बातम्या पाहिल्या. तो प्रचंड घाबरलेला होता. कसाबसा झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो टीव्हीवरच्या बातम्या बघत होता. अम्मी अजून आजारातून बरी झाली नव्हती. मग तो बाहेर गेला. एस.टी.डी.वरून एक फोन केला आणि पडलेल्या चेहऱ्याने घरी परतला. मुनाफ पकडला गेला होता. आणि हे ऐकून अहमदच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो प्रचंड अस्वस्थ झाला. मग दुपारी तो अम्मीकडे गेला. "अम्मी तू बातम्या तर पहिल्याच आहेत, मी त्यातला एक बॉम्ब ठेवला होता. मुझे अब्बा की याद आ रही है" असे सांगून तो ढसाढसा रडू लागला. अम्मीने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, "असे का केलेस? मी तुला सांगितले होते ना अशा वाईट लोकांपासून दूर रहायला? तू निरपराध लोकांचा बळी कसा घेऊ शकलास? अल्लाताला तुला कधीही माफ करणार नाही." "पण अम्मी मला अब्बुचा सूड घ्यायचा होता माझ्या हजारो बंधू भगिनींचा सूड घ्यायचा होता." अम्मी हे ऐकून स्तब्ध झाली आणि ढसाढसा रडू लागली. रडता रडता ती अहमदला मारू लागली. "क्या हुआ अम्मी? क्या तुझे लगता है कि मैने कुछ गलत किया? क्या अब्बू की मौत का बदला इन काफिरोंसे लेना गलत है? आपल्या कौमवर होणारे अन्याय बघून माझे रक्त उसळल्याशिवाय कसे राहील? मी रक्ताला जागलो आहे अम्मी. इस कौम के लिये मेरा, मेरे भाईयोंका खून बहेगा तो मै काफिरोंका खून भी बहाउंगा."
अम्मीने त्याचा गालावर एक जोरात थप्पड मारून म्हंटले, "किस खून की बात कर रहा है तू? हे जे तुझे रक्त उसळून येते असे तू म्हणतोस ना? ते रक्त कोणा मुसलमानाचे नाहीच. तू मुसलमान नाहीस तर एका हिंदुचाच मुलगा आहेस."
"ऐक. मला तुझ्या आधी तीन मुली झाल्या होत्या आणि तुझ्या आजीला मुलगाच हवा होता. आता परत मुलगी झाली तर अब्दुलचा दुसरा निकाह लावून द्यायचा असे ती म्हणत असे. तुझी मावशी सरकारी दवाखान्यात नर्स होती. मला तिथेच प्रसूतीसाठी घेऊन गेले. मावशीनेच माझी प्रसूती केली आणि मला पुन्हा एक मुलगीच झाली. ती ही मृत. मावशी म्हंटली तू काळजी करू नकोस. त्याच रात्री अजून एक प्रसूती झाली होती. एका हिंदू ऊसतोडणी कामगाराच्या बायकोची. तिला मुलगा झाला होता. प्रसुतीनंतर ती बेशुद्ध होती. त्यावेळी मावशीने त्या मुलाची आणि माझ्या मृत मुलीची अदलाबदल केली. तू तोच मुलगा आहेस. ते बिचारे गरीब लोक मृत मुलगी झाली म्हणून दु:ख करीत निघून गेले. पण त्यांची हाय मला लागली. माझ्या दोन मुली आणि शौहर मरण पावले. तिसऱ्या मुलीचाही तलाक झाला, आणि तू ही असा दहशतवादी निघालास. मी आणि तुझ्या मावशीने तुझ्या जन्माचे हे गुपित शेवटपर्यंत कुणालाही, अगदी तुझ्या अब्बालादेखील सांगितले नाही. आणि तोच तू आज अशा घाणेरड्या बाता करतोस?" हे ऐकून अहमद स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूदेखील वाहेनासे झाले. चक्कर येउन तो अचानक खाली कोसळला. 
भानावर आल्यावर त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. त्याला काही सुचेना. तो उठला आणि बाजूच्या टेकडीवरील पीराच्या मझारकडे निघून गेला.  तिथे जाउन तो ओक्साबोक्षी रडू लागला. झालेल्या घटना क्रमवार त्याच्या डोळ्यांपुढून सरकत होत्या. टीव्हीवरचे छोट्या छोट्या मुलांचे आणि स्त्रियांचे आक्रोश आठवून त्याला हुंदके दाटून येत होते. असे कसे झाले? ज्या माणसांना पाहून माझ्या कपाळाची शीर तडकत असे, मी ही त्यांचेपैकीच एक आहे? आता या क्षणाला माझा धर्म तरी कोणता? हट साला धर्म बिर्म सब झूट आहे. तुमचा वंश काय आणि रक्त कोणते याचा विचार आणि त्याचा अभिमान, अथवा इतरांचा द्वेष हे सारे मिथ्या आहे.  नाहीतर रक्ताने हिंदू असलेला मी हिंदूंचाच द्वेष का करतां? माझे खरे आईबाप कुठे आणि कसे असतील? मी त्यांना शोधू काय? ते मला स्वीकारतील काय? पण मग माझ्यावर एवढे प्रेम करणाऱ्या अम्मीचे आणि अब्बुचे काय? माझ्या तलाकशुदा बहिणीचे काय? अहमदला मग त्याचे लहानपणीचे मित्र आठवले. तेव्हा हिंदू काय आणि मुसलमान काय हेच माहित नव्हते. कुणी कोणत्या धर्माचा आहे त्याने काही फरक पडत नव्हता. त्याला शाळा आठवली, शिंदेमास्तर आठवले, नगरपालिकेची लायब्ररी आठवली. आणि मग अचानक मृत्युंजयचा कर्ण आठवला. कर्ण त्याच्या बालपणीचा महानायक..!! कर्णाला जेव्हा कळले की तो पांडवांचा भाऊच आहे तेव्हा त्याची माझ्यासारखीच स्थिती झाली असेल काय? आणि तो राजा होईल हे माहित असूनही तो पांडवांकडे का गेला नसेल? अहमदला आता त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. जसा कर्ण त्याला  सांभाळणाऱ्या कुटुंबाला आणि दुर्योधनाला सोडून गेला नाही, तसा काहीही झाले तरी मी अम्मीला सोडून जाणार नाही. मी आजन्म मुस्लिमच राहणार. ही खुणगाठ मनाशी बांधून तो घरी आला. घरी पोचला तर त्याची बहिण धाय मोकलून रडत होती. मामाने त्याला कुठे गेला होतास म्हणून विचारले. "बेटा अहमद, एक घंटा पहले रिझवाना अल्लाह को प्यारी हो गई." अहमद मटकन खालीच बसला. बराच वेळ तो सुन्नपणे बसून होता. थोड्या वेळाने त्याची बहिण त्याचेजवळ आली आणि तिने त्याचा हात पकडताच अहमद हंबरडा फोडून रडून लागला.
स्वत:ला पोलिसांच्या हवाली करावे असा अहमद विचार करीत होता. त्याच विवंचनेत त्याचे दिवस चालले होते. तो मनाशी काहीतरी ठरवणारच होता पण एके दिवशी मामा त्याला म्हणाला, "हे बघ बेटा अहमद, मी आता थकलो आहे. मला धंदा सांभाळणे जमत नाही. आता तुलाच धंद्याची आणि कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागेल. तू परत मुंबईला जाऊ नकोस. तू निघून गेलास तर आम्ही सगळे उपासमारीने मरू." मग अहमदने दुसरी कुठलीही भूमिका न घेता नगरलाच राहण्याचे ठरविले.
दोन वर्षांनी २६ नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. आता अहमदचे मन त्याला आतल्या आत खात होते. त्याला वारंवार वाटे की पोलिसांकडे जाउन आपल्या गुन्ह्यांची कबुली द्यावी. पण मग त्याला त्याची बहिण, मामा, त्याची मुले यांचे चेहरे आठवत, आणि तो हा विचार सोडून देई. आता नगरमध्ये देखील जिकडे तिकडे जिहाद, दहशतवाद, पाकिस्तान, कसाब याच चर्चा कानावर पडत. अहमदला सगळ्यांच्या नजरांत त्याच्याविषयी एक संशय दिसून येई. त्याला त्याचे मन सारखे कुरतडत राही. याच विवंचनेत आतल्या आत कुंठत तो दिवस व्यतीत करीत होता. १२ फेब्रुवारी २०१०ला एकजण अहमदला घरी भेटायला आला. त्याने त्याला त्याच्या गोवंडीच्या ओळखीवरून इथे आल्याचे सांगितले.  आणि मला इथून औरंगाबादेस पोचविण्याची व्यवस्था कर असे म्हणाला. अहमदने त्याला एक भाड्याची जीप बघून दिली. तो अजून तीन जणांना घेऊन औरंगाबादला निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुण्यात बॉम्बब्लास्ट झाले. अहमदला आपण पुन्हा नकळत एखाद्या दहशतवाद्यास मदत तर केली नाही ना अशी शंका आली. दीड-एक वर्षाने तोच माणूस पुन्हा एकदा अहमदकडे आला आणि गाडीची व्यवस्था कर म्हणाला. अहमदने त्याला तू नेमका कोण आहेस असे विचारले. तो नुसता हसला. यावेळी त्याने अहमदला त्याचेबरोबर यावयास सांगितले. अहमदने नकार दिला पण तो आणि त्याचे बरोबरचे आणखी चार जण ऐकायला तयार होईनात. ते हमरीतुमरीवर आले.  ड्रायवर हे पाहून अहमदकडे आला आणि क्या बात है अहमदभाई? असे विचारले. आता अधिक तमाशा नको म्हणून अहमद म्हणाला काही नाही. पाहुणे म्हणताहेत की औरंगाबादला चल . मग आता चल मी ही बरोबर येतो. 
औरंगाबादला पोचल्यावर त्यांनी गाडी परत पाठवली. अहमद म्हणाला की मी ही आता गाडीबरोबरच परत जातो पण त्यांनी ऐकले नाही. मग एक रिक्षा करून ते एके ठिकाणी गेले. तिथे भटकळ होता. अहमदला पाहून तो म्हणाला बंबई का काम तुने बखुबी किया भाई, और पुलिस को भी अच्छा चकमा दिया. आता अजून एक काम करावे लागेल. आपल्याला अजून एक धमाका करावयाचा आहे. इस बार हमला सबसे बडा होगा. मी आता नेपाळला जात आहे. तिथे आय.एस.आयचे अधिकाऱ्यांस भेटायचे आहे आणि प्लान फ़ायनल करायचा आहे. दोन महिन्यांनी मी परत येईन तेव्हा अशीच आपल्या माणसांची व्यवस्था करायची, हे तुला पर्सनली सांगण्यासाठी मी इथे बोलावले आहे. यावेळी तू जरा खळखळ करत होतास असे मला कळले. कौम को तुम्हारी जरुरत है भाई. ठीक आहे? मी येत्या पंधरा तारखेला नेपाळ बॉर्डर पार करणार आहे. त्यानंतर महिन्याभरात तुझ्याशी पुन्हा संपर्क करीन. तयार रहा. मग अहमदकडे त्याने एक पिस्तुल दिले आणि सांभाळून ठेव असे सांगितले. इसे चला पाओगे ना? पाकिस्तान मे ली हुई ट्रेनिंग भुले तो नही? असे म्हणून हसत त्याने अहमदला निरोप दिला. अहमद दुसऱ्या दिवशी घरी आला. त्याच्या मनात आता थैमान चालू झाले. त्याला आता स्वस्थ बसवेना. दहशतवादाचा ससेमिरा त्याची पाठ सोडायला तयार नव्हता. तो घरात गेला आणि उद्या आपण पुण्याला जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी पुण्यात जाउन त्याने एका लॉजवर मुक्काम ठोकला. मुंबई एटीएसला आधी एका कॅफेतुन मेल केला आणि मग आणि मग एका नव्यानेच घेतलेल्या सीमकार्डवरून फोन लावला. यासीन भटकळची सगळी माहिती त्यांना सांगितली. तो नेपाळला कधी कुठे केव्हा असणार आहे ते सांगितले. आणि मग ते सीमकार्ड फेकून देऊन नगरचा रस्ता धरला. 
नगरला आला तेव्हा त्याचेकडे दोन पाहुणे आले होते. ते त्याला आधी औरंगाबादेत भेटले होते. त्यांनी अहमदला तातडीने दोन लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. अहमदला काही सुचेना. तो जितका या सर्वांपासून दूर पळत होता तितका अजूनच त्यात ओढला जात होता. त्याने त्या दोघांस तुम्ही बाहेर चला मी पैशाची तजवीज करून निघतो असे सांगितले. मामा आणि बहिणीस थोड्या दिवसांनी परत येतो म्हंटला आणि बाहेर पडला. त्या दोघांना घेऊन तो बसस्टॅंडकडे गेला. एक गाडी पकडली आणि ते सगळे औरंगाबादेस निघाले. थोड्या वेळाने त्याने मी स्वत: औरंगाबादला येण्याची गरज आहे का असे त्याने विचारले. "नही भाई सिर्फ हमको पैसा दिया तो भी चलेगा."  मग पांढरीच्या पुलाजवळ पोचल्यावर त्याने त्यांना तिथेच उतरण्यास सांगितले. मी इथूनच परत जाईल आणि तुम्ही दुसरी गाडी पकडून पुढे जा असे म्हणाला. मग ते कुणास दिसू नये म्हणून रस्त्यापासून थोडे दूर बाजूस झुडपांआड गेले. रस्त्यापासून पुरेसे दूर आडोश्याला गेल्यावर अहमदने सोबत आणलेली बॅग खांद्यावरून बाजूला काढली. पूर्ण दोन लाख आहेत ना? एकाने विचारले. अहमद फक्त हसला. मग त्याने बॅगेतून भटकळने दिलेले पिस्तुल काढले, आणि त्या दोघांवर दोन गोळ्या झाडून मग स्वत:च्या डोक्यातही गोळी झाडून घेतली.

आठ दिवसांनी पोलिसांना यासीन भटकळ नेपाळ बॉर्डरवर ताब्यात सापडला. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी तीन बेवारस आणि सडलेले मृतदेह व एक पिस्तुल पांढरीच्या पुलाजवळच्या झुडुपांत सापडले. त्या मृतदेहांजवळ एक बॅगदेखील सापडली.  तिच्यात मृत्युंजय ही कादंबरी ठेवलेली होती.. 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अपकर्ष - Der Untergang (The Downfall)



"डॉक्टर म्हणाला होता की सायनाईड प्राशन करून डोक्यात गोळी मारणे हा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे मरण्याचा.! ही हिमलरने दिलेली सायनाईडची कॅप्सूल आणि हे माझे भरलेले पिस्तूल.. पाचदहा सेकंदांचा खेळ फक्त.!! मग सगळेच संपेल.. सगळे संपेल? सगळे संपवावे? इतक्या सहज? एवढ्या पराक्रमाने जिंकलेला संपूर्ण युरोप!! जगावर राज्य करायला तयार असलेले माझे सैन्य...!! पण आता सगळे कसे पालटले आहे. युरोप तर ताब्यातून गेलाच पण खुद्द माझ्याच देशात हे रशियन शत्रूसैन्य इथे या माझ्या बंकरपासून केवळ एका किलोमीटरपर्यंत येउन ठेपले आहे. जिंकलेले प्रदेश एकेक करून निखळले. या प्रदेशांचे काय? आज गेले उद्या परत येतील. पण माझी माणसे? त्यांचे निखळणे हे अधिक वेदनादायक आहे. माझा सर्वात विश्वसनीय हिमलर मलाच फितूर व्हावा? आणि गोअरींग सुद्धा? छे.. हे सारे असहनीय आहे."
"सगळे म्हणतात की बर्लीन सोडून जा, कुठेही अज्ञातवासात जा, वा दुसऱ्या देशात आश्रीत म्हणून रहा. त्यांना त्यांचा फ्युरर जिवंत हवा आहे. मात्र मी माझ्या सगळ्या जनरल्सना स्पष्ट सांगितले होते की मी बर्लिन सोडून जाणार नाही. भले तर जीव देईन पण माझा देश सोडणार नाही.
आणि एक मात्र नक्की की मी एवढ्या सहजासहजी पराभव आणि मृत्यु स्वीकारणार नाही. जगाच्या इतिहासातून माझे, या फ्युररचे नाव अशा ओंगळवाण्या रीतीने कदापि पुसले जाणार नाही."
....
"समोर ही ईव्हा कशी निवांत झोपली आहे. ती चेहऱ्यावर काळजीचा, चिंतेचा लवलेशही दिसू देत नाही. तिला म्हंटले इथून तिच्या जाण्याची व्यवस्था करतो पण ती मला सोडून जायला तयार नाही. किती उत्साही आणि अवखळ स्त्री आहे ही. अगदी विजययात्रांत डौलाने फडकणाऱ्या माझ्या स्वस्तिक झेंड्यासारखी..!! मी सोडून तिला जगात काहीच नको आहे. कालच मी तिच्याशी लग्न केले आणि ती बिचारी माझ्याशी नव्हे तर दुर्दैवाशी विवाहबद्ध झाली.. ईव्हा माझी प्रिय ईव्हा..!! हिला मृत्युच्या स्वाधीन कसा करू? नाही. माझी हिम्मत नाही असे करण्याची. होय या जगात असेही काही आहे जे करण्याची हिम्मत साक्षात या फ्युरर मध्येही नाही."
"या इथे एक गुप्त दरवाजा आहे. तिथून एक भुयारी रस्ता बाहेर जातो... थेट रशियन सैन्यवेढ्याच्याही कितीतरी बाहेरपर्यंत.. ईव्हाला घेऊन त्यातून निघून जाऊ? पण मग जग मला पळपुटा म्हणून हसणार नाही काय? पण असे हसे होऊ नये याचीही तजवीज करता येईल. माझा प्रिय गोबेल्स त्यातूनही काहीतरी मार्ग नक्की काढेल. माझ्या मृत्यूची अफवा उडवून देईल अथवा मी भूमिगत राहून लढणार आहे अशी द्वाही फिरवेल.. या गोष्टीत त्याचा हातखंडा आहे.. किंवा असे केले तर…. छे.. विचार, विचार, विचार... नुसतेच विचार.. विचार हा ही एक त्रासदायक विकार आहे, नाही काय? मी थकलो आहे. गेले कित्येक दिवस फक्त पराभव, फितुरी आणि विद्रोहांच्या बातम्या ऐकून ऐकून मला प्रचंड शीण आला आहे. थोडे पहुडावे म्हणतो, पण झोप ती कशी कित्येक दिवसांत आलीच नाहीये.. तरीही आता या क्षणी या सर्वांच्या परोक्ष काहीतरी आनंददायी करावे म्हणतोय. माझे आवडते राष्ट्रगीत "हॉस्ट व्हेसल लीड" गुणगुणले की नेहमीच किती प्रसन्न वाटते..!!
"आम्ही आगेकूच करीतच राहू
सर्वकाही का विच्छिन्न होईना मग,
आज जर्मनी आमची आहे अन
उद्या आमचेच असेल सारे जग"
तेच हॉस्ट व्हेसल लीड गुणगुणत बसून थोडावेळ डोळे मिटून पडूयात तर खरे.. "
...
"अरे तू कोण आहेस? आणि तू आत कसा आलास? तू रशियन तर नाहीस ना? तुला मी कधी पाहिल्याचे स्मरत नाही. तुझा पेहराव देखील किती निराळा आहे. काही दगाफटका करायला आला असशील तर याद राख. चल निघ बाहेर इथून. नाहीतर थांब मी माझ्या सुरक्षारक्षकांस बोलावतो."
"थांब थांब.. फ्युरर थांब.!! कुणालाही बोलावण्याची गरज नाही. कारण त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. मी माझ्या मर्जीने आलो आहे आणि मर्जीनेच जाणार. तुझे सुरक्षारक्षक मला पाहूदेखील शकणार नाहीत. मी तुला दगाफटका करायला नव्हे तर तुझी मदत करायलाच आलो आहे."
"माझी मदत करायला तू आहेस कोण? एखादा देवदूत तर नाहीस ना? आणि मला मदत करायला आला आहेस म्हणजे नेमके काय करणार आहेस तू? युद्धाचे पारडे फिरवणार आहेस? पुन्हा माझ्या देशाला उभारी देणार आहेस? की मला येथून सपत्निक सुरक्षित बाहेर नेणार आहेस?"
"नाही, मी असे काहीही करणार नाहीये. फक्त थोड्या गप्पा मारणार आहे तुझ्याशी."
"निव्वळ गप्पा मारल्याने माझी काय मदत होणार आहे? मला वाटते की एकतर तू वेडा असशील अथवा मला वेडा ठरविण्यासाठी सोंग घेऊन आला असशील. थांब मी ईव्हास उठवितो आणि तुला बाहेर घालवून देतो."
"नको नको वीर पुरुषा, तिला निद्रीस्तच राहू देत. मी सांगतो तुला मी कोण आहे ते... मी देखील तुझ्यासारखाच एक महायुद्ध घडवून आणलेला आणि त्यात पराभूत झालेला दुर्दैवी योद्धा आहे. माझ्यासाठी देखील युद्धात लक्षावधी वीरांनी प्राणाहुती दिली आहे. मी देखील एक मोठे साम्राज्य गमावून बसलेलो आहे. खरेतर मी आधीच तुला भेटावयास यायला हवे होते जेणेकरून हे युद्ध टाळता आले असते. पण या युद्धात एवढी हानी होईल याची मला कल्पना नव्हती, आणि जरी असती तरी तू माझे ऐकून युद्ध थांबविले नसतेस. युद्धज्वर ही मृत्युशिवाय कशानेही बरी न होणारी व्याधी आहे. युद्ध पुकारणारावर तो चढला की कुणीही त्यास उतरवू शकत नाही. मी कितीही समजावले असते तरी तू थांबला नसतास. मी तरी कुठे बधलो होतो कित्येक थोरा-मोठ्यांच्या सांगण्याला? तुझ्यासारखाच मलाही ठाम विश्वास होता, माझ्या सैन्य ताकदीवर आणि माझ्या शूर योद्ध्यांवर..! आणि तो अगदीच काही अनाठायी देखील नव्हता. त्यामुळे त्याच ताकदीच्या गर्वामुळे मला सामोपचाराचे सल्ले देणारांस, मग तो साक्षात देव का असेना, मी धुडकावून लावले होते."


"ते सगळे सोड. मला मरायचे नाहीये आणि पळपुटा देखील म्हणवून घ्यायचे नाहीये. तेव्हा आता मी कुठे दडी मारून बसू ते सांग, जेणेकरून शत्रू राष्ट्रे मला कधीच शोधू शकणार नाहीत?"
"अहो महाशय या जगात पराभूताचे मरण अटळ आहे, आणि जर तो पराभूत पुरुष मोठ्या नरसंहारास कारणीभूत असेल तर तो कधीच दडून राहू शकत नाही."
"असे कसे म्हणतोस तू? अरे एवढी मोठी ही पृथ्वी आहे, एवढी अब्जावधी माणसे आहेत, त्यात एक माणूस बेमालूम मिसळून जाऊ शकत नाही?"
"नाही.. जेत्यांच्या हातून जीताच्या प्राक्तनातला मृत्यू तो लपून बसल्याने टळत नाही. फार फार तर काही काळ तो लांबू शकतो, पण अपमानास्पद मरण त्याला टळू शकत नाही. इतिहासातही ते मृत्यू टळले नाहीत आणि भविष्यातही टळणार नाहीत. माझा स्वत:चा अनुभव आहे हा.! मी ही युद्ध समाप्तीच्या समयी नदीच्या एका निर्जन, खोल डोहात लपून बसलो होतो. मात्र त्यांनी मला शोधून काढलेच. तद्वत तुझेही मरण अटळ आहे."


"असे असेल तर मी निकराने लढेल आणि लढता लढता धारातीर्थी पडेल. हुतात्मा ठरेल. काही झाले तरी माझ्या राष्ट्रास मी न भूतो न भविष्यति अशा उत्कर्षास नेले होते.! माझ्या मृत्यूनंतरही माझ्या राष्ट्राच्या पुढील सगळ्या पिढ्या माझे गोडवे गातील, अभिमानाने माझे नाव घेतील. माझा मृत्यू राष्ट्रभक्तीचे एक आदर्श प्रतिमान ठरेल."


"खरे सांगू का? भविष्याच्या पिढ्यांपर्यंत आपला तोच इतिहास पोचतो, जो जेते त्यांना सांगतात. युद्ध हरणारे नेहमीच खलनायक ठरतात. जेते चांगले असोत वा वाईट, त्यांचे फक्त चांगले स्वरूप पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचते आणि जीतांचे केवळ वाईट स्वरुप.!! मी काय, तू काय किंवा भविष्यात जन्मणारा अजून कुणी पराभूत पुरुष काय, आपला इतिहास एवढा विकृत केला जातो की कुणी आपल्या एखाद्या सद्गुणास वाखाणने हे देखील दुर्वर्तन समजले जाते. हा भोग मी भोगतो आहे आणि तुही भोगशील."

"आणि मला आपली चुक सुधारायची असेल तर? पश्चाताप करण्याची संधी प्रत्येकास मिळायलाच हवी. तेच न्याय्य आहे, नाही का?"

"आपल्या आत्यांतिक दुर्गर्व आणि तिरस्कारातून छेडल्या गेलेल्या युद्धाची चुक सुधारण्याची एकच वेळ असते.. ती चुक घडण्याआधीची.. एकदा ती घडली की तिला माफी नाही.. या पृथ्वीतलावर मृत्युही त्यातून आपली सुटका करीत नाही... आपले दोष, उणीवा येणाऱ्या हजारो पिढ्यांपर्यंत आपल्याला कुरतडत असतात.. हेच बघ ना, मृत्यूनंतर मलाही माझ्या शत्रूंप्रमाणे परलोकांत नरक न लाभता स्वर्गच लाभला.. पण इहलोकी मात्र हजारो वर्षांनंतरही मी एक खलनायकच आहे, आणि निर्भत्सनेच्या नरकातच खितपत पडलो आहे."

"पण माझे शत्रू दावा करतात की त्यांचे युद्ध मानवतेच्या हितासाठी आहे, मग ते मला माफ करणे सोड, पण किमानपक्षी सन्मानजनक मृत्यू देणार नाहीत कशावरून? शेवटी त्यांची बाजू मानवतावादी मुल्यांची आणि न्यायाची आहे..."

"हा हा हा.. !!! तुझ्या सहकारी मुसोलिनीचा मृत्यु विसरलास? त्याला नाही का अपमानास्पद रीतीने मारून त्याच्या मृतदेहाचे देखील धिंडवडे काढण्यात आले. त्याच्या मृतदेहाला त्यांनी लाथा मारल्या, त्यावर थुंकले, आणि तेवढ्याने समाधान झाले नाही म्हणून मृतदेह भर चौकात उलटे टांगून लोकांनी त्याला दगड फेकून मारले. मी हा जो तुझ्याशी बोलतो आहे, त्या मला कसे मरण लाभले माहीत आहे? स्वत:ला धर्माचे पालक समजणारे माझे शत्रू जे खरेतर माझेच बांधव होते, घायाळ मरणासन्न अवस्थेत रानात मला एकटेच सोडून गेले... आकाशात गिधाडे आणि आजूबाजूस हिंस्र श्वापदे आपल्या मरण्याची वाट पाहत घिरटया घालत आहेत आणि आपली प्राणज्योत मालवताच किंबहुना अगदी जिवंत असतानाच आपल्या शरीराचे लचके तोडले जाणार आहेत हे माहीत असलेल्या मन:स्थितीत मी मृत्युस सामोरा गेलोय.. इथे माझ्या जवळ ये आणि ही माझी विच्छिन्न झालेली मांडी बघ... बघ आर्यपुत्रा.. मी महाभारतीय महायुद्धाचा पराभूत योद्धा दुर्योधन आहे..!!!"
....

दुसऱ्या दिवशी जगभरातल्या वर्तमानपत्रांत मथळा झळकला......
"नाझी भस्मासुर हिटलरची डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या"


गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१३

नाव



काही वर्षांपूर्वी मी गावातला एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जायचो. म्हणजे अगदी पहिल्या बॉलपासून मी सिक्सर मारायला टपलेलो असायचो. सेटल होणे, पीचचा अंदाज घेणे आदी गोष्टी माझ्या कधीच खिजगणतीत नव्हत्या. प्रत्येक बॉलरला मी माझे गिऱ्हाईक मानायचो. त्यामुळेच अनेकदा मी कित्येक बॉलरांच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत. मला विरुद्ध टीमवाले जरा वचकूनच असायचे. वर्षभरात खूप क्रिकेट टूर्नामेंट व्हायच्या. आम्ही सगळ्या खेळायचो.
तर एकदा अशीच एका टूर्नामेंटची फ़ायनल चालू होती. मी ओपनिंगला गेलो. समोरून एक धिप्पाड बॉलर बोलिंग करत होता. त्याने तुफान स्पीडमध्ये पहिला बॉल टाकला आणि मी तो पुल करून सीमापार टोलावला. प्रचंड टाळ्या आणि जल्लोष झाला. पुढचे दोन बॉलदेखील मी चौकार मारले. चौथ्या बॉलवर मग मी माझ्या नेहमीच्या स्टाईलने डान्सिंग डाऊन जात लाँगऑनच्या डोक्यावरून त्याला लांब भिरकावला आणि अंपायरने दोन्ही हात वर करून सिक्सर देण्याआधीच ग्राउंडच्या बाहेर जल्लोषात धिंगाणा चालू झाला. चार बॉल अठरा रन्स.!! मी फुल मूडमध्ये होतो. पुढचे दोन्ही बॉलसुद्धा टोलवायचेच या बेतात होतो, तेवढ्यात नॉन-स्ट्राईक वरून नाम्या धावत धावत आला, "अरे येडा झाला का राव्हल्या? एवढ्या एका बॉलरला तरी सांभाळून खेळ. अरे शेवटी हा गण्या बनसोडे आहे गण्या बनसोडे.!" मी शॉक झालो, "काय? हाच का तो गण्या बनसोडे?" गण्या बनसोडे हा तालुक्यातलाच नव्हे तर जिल्ह्यातला एक चांगला बॉलर म्हणून नावाजलेला होता. तो रणजीसुद्धा खेळलेला होता. जहीर खानच्या बरोबर त्याने बोलिंग केलेली होती. जहीर नंतर जिल्ह्यातला सर्वात भारी बॉलर म्हणजे गण्याच. मी फक्त त्याच्याबद्दल ऐकले होते आणि मला नेहमीच त्याला खेळण्याची इच्छा होती. मी त्याला आधी कधी पहिले नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदा पाहत होतो, आणि ज्याच्या नुसत्या नावाने मोठ मोठे फलंदाज टरकत असत त्याच या गण्याला मी मजबूत फोडला देखील होता.
पुढच्या बॉलवर गण्या रनअप घेत आला आणि त्याने गुड लेन्थवर एक इनस्विंगर टाकला. माझा आवडता चेंडू.!! कारण शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा मी तो लाँगऑनवरून बाहेर भिरकावून देत असे. पण यावेळी मी तो डिफेंड केला. बॉल पाय आणि बॅटच्या मधून निघाला आणि त्याने माझे फर्निचर उखडून टाकले.
कित्येक वेळा माणसापेक्षा त्याचे नाव जास्त काम करते नाही का? त्या दिवशी नाम्याने मला त्या बॉलरचे नाव गण्या बनसोडे आहे हे सांगितले नसते तर मी अजिबात आउट झालो नसतो याची मला ठाम खात्री आहे.

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

व्हिडीओ चॅट



सुऱ्या म्हणजे एकदम लेटेस्ट टेक सावी कॅरेक्टर. परवा मला म्हणतो "तुला सांगतो iOS7 म्हणजे आउट ऑफ धीस वल्ड आहे. व्हाट इंटरफेस, व्हाट परफोर्मंस, व्हाट स्टाईल.! आय टेल यू, आयफोनपुढे हे तुमचे सॅमसंग, ब्लॅकबेरी झक मारतात झक." मी त्याला जरा चपापुनच असतो. एकतर काही लेटेस्ट गजेट वगैरे घेण्यासाठी सुऱ्याचा सल्ला घ्यावा असे वाटते, पण आपण रिसर्च करून त्याला काही विचारले की तो आपल्या अकलेचे वाभाडे काढून टाकतो. मागे मी त्याला एकदा विचारले, "यार मायक्रोमाक्सचा नवा फोन आलाय. स्पेसिफिकेशन भन्नाट वाटताहेत. तुझे काय म्हणणे आहे?" त्यावर म्हणतो, "तुम्ही साले डबक्यातली बेडके डबक्यातच राहणार. थिंक बिग राव्हल्या थिंक बिग.!!" सुऱ्याचे सगळेच काही एकदम हायटेक. मागे गाडी घेताना मी म्हंटले स्विफ्ट घे भन्नाट गाडी आहे. तर माझ्याकडे डबक्यातले बेडूक पहावे तसा पाहून म्हणतो कसा, "मला फालतू सल्ले देऊ नकोस." मग एक आठवड्याने एक नवी कोरी थ्री सिरीज सीडान घेऊन आला. "तुला काय बाबा.. चोवीस लाख पगारावाला तू.!!" अशी माझी अचंबित प्रतिक्रिया. च्यायला सुऱ्या नसता तर मला कधीच बीएमडब्लूमध्ये बसायला मिळाले नसते बहुतेक. कॉलेजला असताना मी आणि पप्याने पैसे जमवून कॉन्ट्रीमध्ये एक वॉकमन घेतला तेव्हा सुऱ्या आयपॉड घेऊन फिरत होता. म्हणजे आता मोठ्या पगाराची नोकरी आहे म्हणून सुऱ्याची ही दिखाऊगिरी नाहीये तर त्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास आधीपासूनच ती त्याची 'पॅशन' आहे.


सुऱ्यानेच मला पहिले ईमेल अकाउंट काढून दिले, मेल पाठवायला शिकवले. गुगल ही कशी जादूची कांडी आहे हे दाखविले आणि बरेच काही.


तर सुऱ्याच्या खूप मैत्रिणी..!! एक से एक मॉड आणि फॅशनवाल्या..!! आम्ही कॉलेजमध्ये असताना कुठल्या बोल्ड मुलींशी बोललो असू तर केवळ सुऱ्याच्या मैत्रिणींशी. लेक्चर बंक करून, संध्याकाळी, दुपारी, रात्री अगदी कधीही सुऱ्या कोणत्या ना कोणत्या पोरीबरोबर फिरत असायचा. आम्ही आपले प्रामाणिकपणे खरे प्रेम, विश्वास, जीवनाचे उद्दिष्ट अशा आम्हालाच न कळलेल्या गोष्टींवर प्रवचने देऊन सुऱ्याला या अध:पतनापासून रोखण्याचा प्रयत्न करीत असू, पण सुऱ्या तो सुऱ्याच..!! मग आम्ही तो नाद सोडला. हळू हळू मग आमचेच कुतूहल चाळवले. मग आम्ही सुऱ्याला विचारायचो की पोरी काय गप्पा मारतात रे? तुम्ही कोणत्या विषयांवर बोलता? वगैरे.. "काही नाही रे आपण जसे बोलतो तसेच त्या बोलतात" हे सुऱ्याचे उत्तर.!


"तुझ्या लेटेस्ट गजेट्सच्या बळावर तू मुली पटवतोस. खरे ना?" एकदा मी सुऱ्याला विचारले. तो हसला. "तुला काय वाटते? मुली या अशा गोष्टींमुळे पटतात? अरे हट. मला सांग राव्हल्या, तुझ्या कविता कॉलेजच्या नोटीस बोर्डावर सगळ्या पोरी आवर्जून वाचतात. पण त्या कविता वाचून तुला एक तरी पोरगी पटलीये? अरे दीज थिंग्स नेव्हर मॅटर यार. एकदा पोरगी पटल्यावर दे माईट बूस्ट द इन्वोल्व्हमेंट, बट दे डोंट ट्रिगर द इनिशियल बॉन्डिंग." थोडक्यात काय तर हे एकंदर मेकॅनिझम आपल्या समजुतीच्या आवाक्याबाहेरचे आहे एवढे मला कळले.


एकदा सुऱ्या रात्री पीसीवर बराच वेळ काही टाईप करत होता. मला झोप येत नव्हती म्हणून मग मी उठलो आणि त्याला विचारले "काय करतोयस?" तो म्हणाला "चॅट करतोय." "कुणाशी?"मी. "नंबर 4शी." तो. मी वाचायला येऊ का? ये की बस इथे खुर्ची घेऊन. मग मी कुतुहलाने त्याच्या शेजारी बसलो. जीमेल वर चॅट चालू होते. मला काही अर्थ लागेना. मी म्हंटले पूर्ण कॉन्वरसेशन दाखव. मग त्याने स्क्रोल करून सगळे काही वाचायला दिले. मग इतर मुलींशी केलेले दुसरे जुने चॅट्स त्याने ओपन करून वाचायला दिले. मी स्तब्धपणे वाचत होतो फक्त. सगळे वाचून झाल्यावर मी आत्यंतिक अचंबित झालेलो होतो. माझ्या एकूण स्त्रीजातीबद्दल असलेल्या कित्येक समजुतींना मोठा छेद गेला होता. असंही काही असतं?


च्यायला मुली अशा कशा बोलू शकतात? ही नंबर 2 तर किती साधी मुलगी आहे. नेहमी व्यवस्थित आणि सोज्वळ वेशभूषा, अभ्यास एके अभ्यास करणारी ही मुलगी आणि इथे.. "अरे मुली वेड्या असतात रे. त्यांना असे सांगायचे की आपले त्यांचेवर खरे खुरे प्रेम आहे की मग त्या आपण बोलू तसे वागायला तयार होतात." सुऱ्या म्हणाला. "पण मग त्यांना तुझी एवढी लफडी आहेत त्यांचा संशय येत नाही?"मी. "त्याचे काय आहे ना, परंपरा, घर, समाज अशा अनेक बंधनांत बंद असलेल्या या मुली प्रेमात पडल्यावर स्वत:पुरती एक गुप्त, छोटीशी, स्वातंत्र्याची, निर्बंधतेची अशी जागा निर्माण झाली असे समजतात. आणि मग तेवढ्या जागेत त्या संपूर्ण स्वातंत्र्योपभोग घेऊ आणि बेबंदपणा, स्वैरपणा करू पाहतात. तेव्हा त्यांना भान राहत नाही. आपण हे आपले प्रायव्हेट विश्व ज्या कुणाबरोबर शेअर केले आहे, तो तेवढा विश्वासार्ह आणि प्रामाणिक आहे की नाही याचीही त्या शहानिशा करत नाहीत. आणि मग त्या फसतात." हे ही वरून सुऱ्याच म्हणाला. तो विषय तिथेच संपला. पण पुढेही अनेक वेळा सुऱ्याबरोबर बसून त्याचे लाइव्ह चॅट वाचत वाचत आम्ही खूप हसत असू. मीच नव्हे तर आमच्या रूमवर येणारे सगळे मित्र ते चॅट वाचून हसत असत. अशी तीन चार वर्षे गेली. सुऱ्याच्या कित्येक मैत्रिणी गेल्या आणि नव्या मैत्रिणी आल्या. आमचे लाईफ ऍज युज्युअल चालत राहिले.


खूप दिवसांनी सुऱ्याला एक मुलगी भेटली. सुऱ्या तिच्या खऱ्याखुऱ्या प्रेमात पडला. मी हिच्याशीच लग्न करणार असे पहिल्यांदाच कुणातरीविषयी बोलू लागला. एकदा तो तिच्याशी चॅट करत होता. मी वाचायला गेलो. सगळे नेहमी सारखेच. तसे सुऱ्या आणि माझ्या मैत्रीत एकमेकांपासून लपवावे असे काहीच नव्हते. ही मुलगी सुद्धा इतर जणींहुन काही वेगळी नव्हती. आम्ही तिच्या रिप्लाइजला तसेच हसत होतो.


एक दिवस सुऱ्या कम्प्युटरसमोर कानाला इयर फोन लावून माइकवर काहीतरी बोलत होता. मी म्हंटले काय करतोयस? तो उत्तरला "अरे आता एक नवी टेक्नोलॉजी आली आहे...व्हिडीओ चॅटिंग.! ये मी तुला दाखवतो." मग सुऱ्याने मला जवळ बोलावले. कोपऱ्यात एक छोटीशी विंडो होती आणि त्यात सुऱ्याची नवी मैत्रीण बोलताना दिसत होती. आयला हा प्रकार भारीच आहे की रे. हे लाईव आहे का? आपणही तिला दिसतोय? माझी सरबत्ती चालू झाली. होय लाईव आहे. पण आपण तिला दिसत नाही. कारण आपल्याकडे वेबकॅम नाहीये ना. उद्या आणतो आणि लावतो मग इथलेही तिकडे दिसू लागेल. अरे माझ्या ऑफिसच्या लॅपटॉपला वेबकॅम आहे ना मग आता त्यावरून माझे फ़क्त व्हिडिओ चॅटिंगच चालु असते." "असे होय.!!" मी म्हणालो. मी त्या मुलीला पहिल्यांदाच पाहत होतो. "च्यायला सुऱ्या ही आयटम कोण आहे रे.?" मी म्हणालो. "भई ही आयटम नाही. तुझी वहिनी होणार आहे वहिनी. मी हिच्याशी लग्न करणार आहे." सुऱ्या. "काय बोलतोस? सुंदर आहे रे पोरगी. बोलताना गोडच दिसतेय."माझी प्रतिक्रिया. "अरे हे तर काहीच नाही मी इथे वेबकॅमवर तिला काहीही करायला लावू शकतो", सुऱ्या. "काय बोलतोस? चल यार काही पण सांगू नकोस. आजकाल हे एमेमेस वगैरे एवढे प्रकार येत असतांना कुणीही मुलगी असे काही करणार नाही", मी. "असे म्हणतोस? मग बघच तू." असे म्हणून सुऱ्याने तिला काहीसे सांगितले. तिने मान हलवून नकार दिला. पण सुऱ्याचा आग्रह सुरूच होता. "आता बघ." सुऱ्या हळूच म्हणाला. ती मुलगी उठली. तिने कॅमेरा थोडा ऍडजस्ट केला. मग ती थोडी मागे गेली. आणि मग अंगावरची ओढणी काढून टाकली. मी पटकन बाजूला झालो. सुऱ्याला म्हणालो, "बंद कर मला हे बघायचे नाही". "अरे पण मला काहीच हरकत नाही तू बघितलेस तर". "तुला हरकत नसेल पण मला आहे." मी रूममधून बाहेर निघून गेलो.


बाहेर आलो टपरीवरून सिगारेट घेऊन पेटविली, आणि मग विचार करू लागलो की नेमके काय झाले? असे काही बघू नये एवढा लाजरा अथवा सज्जन तर मी खचितच नाही. मग मी बाहेर का आलो?


सुऱ्या म्हणतो मी या मुलीशी लग्न करणार आहे. सुऱ्या आणि मी पुढेही नेहमीसाठी मित्र राहणार आहोत. मी जर या मुलीस असे आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि जर हीच मुलगी त्याची पत्नी झाली तर आयुष्यभर मी तिच्या नजरेला नजर भिडवू शकणार नाही... मला आता कळले की वपुंचा पार्टनर किरणला बघणे का टाळत असेल. एक अनोळखी स्त्री जी आपल्या खूप जवळच्या माणसाशी खूप जवळच्या नात्याने जोडली जाणार आहे, तिला आधीच बघितल्यावर 'ही अगदीच एवढी काही खास नाहीये', अशी एक तिच्याबद्दलची धारणा मनात तयार झाली तर? किंबहुना खरेतर न जाणो तिच्याबद्दल एक असूयेचा, आसक्तीचा छोटासा तरंग मन:पटलावर उमटून गेला तर? तसे त्या आपल्या जवळच्या माणसाला आपल्या मनातल्या भावना कधीच कळणार नाहीत. मात्र आपल्या मनाला आपण कसे फसवायचे? आपण आयुष्यभर अपराधी भावनेने जळत राहणारच की..!! आपलेच मन आपल्याला कुरतडत राहणार..!! म्हणून मी बाहेर निघून आलो होतो.


सिगरेट संपली मी थोटूक पायाखाली विझविले. थोड्यावेळाने रूममध्ये गेलो. सुऱ्या झोपलेला होता. कम्प्युटर ऑनच ठेऊन साहेब पेंगाळले होते. मी सुऱ्याचे मेल लॉगआउट केले आणि कम्प्युटर बंद करून टाकला.






आज तीच मुलगी सुऱ्याची बायको आहे. आणि नॉनवेज काय झकास बनवते..!! दर महिन्या-पंधरा दिवसांनी सुऱ्याकडे जेवणाचा बेत असतो. माझ्या तोंडून नव्या रेसीपीचे कौतुक आणि वहिनीच्या तोंडून सुऱ्याची गाऱ्हाणी संपता संपत नाहीत.

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

ठकाजी वाळेकर



तसा तो 'ठक्या वाळंकर' म्हणूनच सगळ्यांना ज्ञात आहे (गावी तांबेकराला 'तांबकर', भांगरेला 'भांगरा', दिघेला 'दिघा' अशी संबोधनपद्धती प्रचलित आहे). आम्ही त्याला 'ठक्या बाबा' म्हणत असू. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर आणि दोन्ही कानांच्या पाळयांवर गंधटिळा, पायात वर्षानुवर्षांच्या त्याच जाड्या-जुड्या अन दणगट वहाणा, कमरेला धोतर, अंगात कोपरी, गळ्यात मफलर किंवा उपरणे, आणि नेहमी डोक्यावर टोपी अथवा पागोटे आणि त्यातून डोकावणारे पिकलेले केस असा त्याचा पेहराव.! आमच्या सदानकदा उघड्या झिपऱ्या पाहून 'माणसाने कधीही बोडके राहू नये' असे तो नेहमी आम्हाला सांगायचा. ठक्या वाळंकराच्या वाट्याला दीड एकरच्या आसपास जमीन, ४ शेरड्या अन एक गाय आली होती. जमिनीत केवळ भात होई. बहुतेक वेळा मी त्याला आमच्याच शेतावर काम करताना बघायचो. आमचेच बैलजोडी अन नांगर दोन तीन दिवसांसाठी घेऊन जाऊन ठक्या बाबा त्याची भाताची पेरणी आटोपत असे. कित्येक वेळा मी त्याला आमच्याच इथून आजीकडून तांदूळ, डाळी-डुळी नेताना बघायचो. दिवसभर ठक्या वाळंकर राब राब राबायचा, उन्हातान्हात थकून मरगळून जायचा. मात्र संध्याकाळ झाली की त्याच्यात एक नवा उत्साह संचारत असे. सांजवेळ होताच तो देवळाचा ताबा घ्यायचा. आणि मग तिथली झाडलोट, दिवाबत्ती झाली की त्याची एक विणा होती ती संथपणे वाजवीत बसायचा. आम्ही सगळी लहान पोरे हळूहळू देवळात जमा व्हायचो. मग दहा बारा पोरे जमली की ठक्या बाबा आम्हाला देवळात घेऊन त्याचेबरोबर भजने गायला लावायचा. पुढे तो वीणा घेऊन भजने म्हणायचा आणि आम्ही टाळ घेऊन त्याला साथ करीत असू. रोज रात्रीचा त्याचा हाच कार्यक्रम असे. दिवसभर काबाडकष्ट अन रात्री भजन..!! गावचा हरिनाम सप्ताह चालू झाला की मग मात्र ठक्या बाबाचे अष्टौप्रहर देवळातच जायचे. सप्ताहात देवाच्या भजनाची वीणा कधीच खाली ठेवायची नसते. एकाची घेऊन झाली की दुसरा अशी ती संपूर्ण सप्ताह घॆउन उभे रहावे लागते. अर्थात सर्वात अधिक वेळ वीणा ठक्या वाळंकराच्याच हाती असायची. ज्याच्या हातात वीणा असेल त्याच्या सर्व लहानथोर लोक पाया पडतात. नेहमी "ए ठक्या" असेच एकेरी उद्धटपणे संबोधणाऱ्या लहान पोरांपासून तर पाटील, सरपंचांपर्यंत कुणीही ठक्या वाळंकराला आदरसन्मान दिल्याची ती एकमेव वेळ असायची. आलेल्या कीर्तन-प्रवचनकारांची देवळात उठबस करण्यात, त्यांना भजनात साथ देण्यात ठक्या वाळंकर तल्लीन होऊन जायचा. ठक्या बाबा खूप अभंग गायचा आणि 'हे अभंग मी स्वत: रचले आहेत' असे तो आम्हाला सांगायचा. प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या ओळीत "ठका म्हणे" असे शब्द असायचे. स्वत:च्या शब्दांसकट त्याने अभंगांना लावलेल्या त्या सुंदर चालींमुळे त्याच्या या महान प्रतिभेचे आम्हाला कोण कौतुक आणि आदर वाटायचा.!! आम्हाला ते अभंग काही कळत नसले तरी मुखोद्गत झालेले असायचे. त्यांची लयबद्ध चाल आणि त्यावर त्याची वीणा आणि आमचे टाळ व मृदंग यांचा तो मेळ आमचे भान हरपून टाकायचा. आमच्या लहानपणीच्या कैक रात्री त्याच्या या प्रतिभेने भारावून गेल्याच्या आनंदात आम्ही व्यतीत केल्या आहेत. मात्र जसे जसे मोठे होत गेलो तसे तसे गावातले लोक त्याची टर उडवतात हे आमच्या लक्षात येऊ लागले. संत एकनाथ, नामदेव, तुकाराम इत्यादी यांचेच अभंग म्हणून त्यात "तुका म्हणे"च्या जागी तो "ठका म्हणे" असे स्वत:चे नाव चिकटवतो असे लोक म्हणत. त्यात बव्हंशी तथ्यही होते. संतवाङ्ग्मयाशी माझा पुस्तकातून परिचय झाल्यावर तो असे करतो हे मलाही कळले. कित्येकदा तो दोन संतांचे वेगवेगळे अभंग अर्धेमुर्धे जोडून त्यालाही 'ठका म्हणे' लावून टाकत असे. असे असले तरीही त्याच्या किमान अर्ध्या रचना तरी स्वरचित होत्या याची मला अजूनही खात्री आहे. मात्र एकदा 'ढापू' हे नाव पडले की त्याच्या खऱ्या निर्मितेकडेही लोक लक्ष देत नाहीत. म्हणून ठक्या वाळंकराचे स्वरचित अभंगही दुर्लक्षिले आणि उपेक्षिले गेले ते गेलेच. माझाही मग ठक्या वाळंकराबद्दल असलेला आदर हळूहळू कमी होत जाउन मग देवळात रोज भजन गाणे वगैरेतला रस संपला. काही असो पण ठक्या वाळंकरामुळेच मला अभंगाची, भजनाची गोडी लागली हे मात्र खरे. नाव बदलून का होईना पण ठीकठाकशी अक्षरओळख होण्यापूर्वीच या महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ वारसा असणाऱ्या संतवाङ्ग्मयाशी माझे आणि कित्येकांचे नाते जोडले गेले ते ठक्या वाळंकरामुळे हे निर्विवाद सत्य आहे.
ठक्या वाळंकराला दोन पोरे. बायको दुसऱ्या पोराच्या जन्माच्या वेळीच गेली होती. ठक्या वाळंकराने बाप आणि आई दोन्ही बनून पोरे सांभाळली. मोठ्या लेकाचे लग्न झाल्यावर तो भांडून वायला (वेगळा) निघाला. ठक्या आता धाकट्याकडे राहतो. आधीच्याच दीड एकराचे दोन तुकडे झाले आणि गरिबी अजून मोठी झाली. आता त्याचा धाकटा लेक आमच्याकडे शेत कामाला येतो. ठक्या वाळंकराचा विषय मी काढला की "आमचा म्हातारा येडा होता आणि टाळ कुटण्यात त्याने जल्म वाया घालवला" असे तो नेहमी म्हणतो. अजूनही ठक्या वाळंकर नित्यनेमाने देवळात दिवाबत्ती करतो. गेली सत्तर-एक वर्षे त्याने देवळातला दिवा विझू दिला नाहीये. ठक्या वाळंकराच्या घरात मी कधी गेलो नाही किंवा त्यानेही कधी मला नेले नाही. पण जेव्हा कधी त्याच्या घरात डोकावलो तेव्हा दिवसाउजेडीदेखील त्याच्या घरात कुट्ट अंधार दिसायचा. मी एकदा लहानपणी त्याला विचारले होते की "ठक्या बाबा किती अंधार आहे घरात दिवा का लावीत नाहीस?" तर म्हणाला की "दिवा लावायला तेल लागते त्यासाठी पैसे कुठून आणणार?" मी म्हणालो की "देवळात सगळे जण रोज एवढे तेल आणून देतात त्यातून थोडेसे घेऊन यायचे", तर म्हणाला "नाही रे बाबा त्ये महापाप होईल. अंधारात राहीन, उपाशी मरेन पण देवाच्या एवढ्याशा वस्तूला हात लावणार नाही मी.!!" ठक्या वाळंकराच्या लेकाला मुलबाळ झाले नाही. आयुष्यभर देवाच्या गाभाऱ्यातला दिवा पाजळता ठेवणाऱ्या ठक्या वाळंकराच्या घराला उजेडाचा आणि वंशाचाही दिवाच लाभला नाही....
परवा रात्री गावात गेल्यावर परतताना देवळात भजनाचा आवाज ऐकू आला. सहज म्हणून देवळात गेलो तर आता ऐंशी-पंच्याऐंशीचा सुरकुतलेला ठक्या वाळंकर तसाच आठ-दहा वर्षांच्या पोरांना घेऊन वीणा हातात धरून अभंग गात होता. पोरे भजनात तल्लीन होऊन गेली होती, आणि ठक्या वाळंकराने दोनदा "ठका म्हणे"ची ओळ गाउन पुढचा अभंग सुरु केला होता. मी त्या कोवळ्या निरागस पोरांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव बघून दुरूनच हात जोडले, दत्ताला नव्हे तर ठक्या वाळंकराला..!!

बुधवार, ३१ जुलै, २०१३

अभंग

हाती ब्युरेट, पीपेट, बीकरे।। आम्ही विठोबाची लेकरे।।धृ।।

सॉल्वेंट आणि सोल्युशने।। विज्ञाननिष्ठांची भूषणे।।
कशास जन देत दूषणे।। नास्तिकतेची।।१।।

जगी दुर्जनांचा साह।। जसा ऍसिडाचा दाह।।
तू रे ऑक्सिजनचा प्रवाह।। बा विठ्ठला।।२।।

तू विश्वव्यापी विराट।। आमचे इवले मेगा-गीगा बाईट।।
ही हार्डडिस्क पायीची वीट।। तुझिया व्हावी।।३।।

माझी ही जी लॅबोरेटरी।। झालीसे तीच पंढरी।।
प्रेरणा होय तूच अंतरी।। अस्मादिकाच्या।।४।।

हाती ब्युरेट, पीपेट, बीकरे।। आम्ही विठोबाची लेकरे।।

कोशिश


...
काल एक कपल भेटले. इनफ़ॅक्ट एक ट्रिपल..!! बाप, आई अन मुलगा..!!!
बाप जन्मजात बहिरा. आणि म्हणूनच 'अव्यंग साथीदार मिळण्याचा त्यास अधिकारच नव्हे', या जगरहाटीच्या क्रूर न्यायानुसार आईदेखील जन्मजात बहिरी.!! कधी शब्दच कानावर न पडल्यामुळे दोघांनाही आपसूक मिळालेले मुकेपण..!! बाप बऱ्यापैकी हुशार.. म्हणून सुखेनैव राहता यावे एवढा पगार असणारी नोकरी.!! मुल होण्यापूर्वी दोघांनीही कान तपासून घेतले. मग श्रवणयंत्रे मिळाली. आणि कोण आश्चर्य..!! आता दोघांनाही बऱ्यापैकी ऐकू येऊ लागले.! पण भाषेचा प्रश्न आलाच.! तशी बऱ्यापैकी शाळा शिकल्याने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा अवगत झालेल्या… पण फक्त अक्षरओळखीने..!! शब्द मनात, मात्र ओठांवर येत नाहीत.. उच्चार करता येत नाही..!! मग त्यावरही मात करून भाषाउच्चार तज्ञांच्या मदतीने दोघांनी बोलायला सुरुवात केली. पण अडखळत अडखळतच..!! प्रत्येक शब्द दोन-दोनदा उच्चारावा लागत होता. मध्येच जिभेचे गुंतणे वगैरे.. आईची प्रगती त्यामानाने बरी. ती थोडी कमी अडखळत होती. संवाद हा शब्दांचा आधार घेत, मात्र खाणा-खुणांच्या भाषेतच अधिक..!!
..
पेडियाट्रीशियनकडे दोघे आत आले तेव्हा मुल झोपलेले होते. खत्रूड रीशेप्शनिष्टने वैतागलेला चेहरा करून आणि जरूर नसताना त्रासिकसे जोरजोरात ओरडून फॉर्म भरून घेतला. थोड्या वेळाने ४-५ वर्षांचे ते मुल रडत रडत उठले. माझ्या मनात आले, मुलाला ऐकू/बोलता येत असेल? पण त्याने रडून होताच हाताचा अंगठा डोक्याला लावून आईला काहीतरी विचारले (हाताचा अंगठा कपाळास लावणे ही वडिलांसाठीची सांकेतिक खुण होय). आईने दूर बसलेल्या बापाकडे निर्देश केला, आणि मग मुलाच्या चेहऱ्यावर एक छानसे स्मित उमटले. मग बराच वेळ फक्त उंहू उंहू आणि हसणे खिदळणे चालू होते. अनुवान्शिकतेने सावकाराच्या कर्जासारखे आईबापाचे व्यंग मुलातही आले होते? दोघांपैकी एकजण जरी नॉर्मल असते तरी मुलाला कदाचित.......
...थोड्या वेळाने टोकनच्या डिस्प्लेचा 'टिंग टिंग' आवाज झाला, आणि त्यावरचा नंबर बदलला. मुलाने त्या नव्या आवाजाच्या दिशेने दचकुन पाहिले, आणि जोरात ओरडला "मम्मा ते बघ, थ्ली वन वन"
..
आई, बापही तूच अन पुंडलिकदेखील तूच. पांडुरंगा तू महान कृपाळू आहेस बाबा. पहिल्यांदा आषाढीच्या दिवशी एक नितांतसुंदर अन परमानंद देणारा अभंग ऐकविलास. त्या अभंगाचे बोल होते…
"थ्ली वन वन"

गुरुवार, ४ जुलै, २०१३

बीत गया

कब मिली, कब ढली ज़िंदगी याद नही..
पचास सालका सफ़र इक लम्हासा बीत गया..!!

बस कशमकश में रहे संजने-संवरने की,
और बिना मनाए हर जलसा बीत गया..!!

शब और सहर में ही उलझी रही
उमर,
हर एक आज हमारा, कलसा बीत गया..!!

रोज़गार का क़ानून चर्चा में फँसा रहा,
बच्चोंकी भूख में बचा-बचाया, पैसा बीत गया..!!

घर बह गये हज़ारोंके, तो वो रिपोर्टर बहुत रोया..
"हाय बिना फुटेजके ही ये हादसा बीत गया..!!"

चंद अच्छी बातें सुनूँ तो शायद चैन आये..
मगर पिछले मोड़ पर ही, मदरसा बीत गया..!!

उसका दीदार भी काले बादल जैसा,
मिनट दो मिनटभर बरसा.... बीत गया..!!!

हम तो हारे मगर वो भी कहां जीत पाया..
बिना नतीजे के ये किस्सा बीत गया..!!

कुछ इस तरह की उसने बेवफ़ाई कि,
यकीं तो हुआ मगर, भरोसा बीत गया..!!!

अब एहसास नही होता, या आदतसी हो गयी..
मनाया भी नही और हमारा, गुस्सा बीत गया..!!

दुख तो पहले भी था मगर अब,
तेरे बाजुओंसे लिपटने का, दिलासा बीत गया..!!

इश्क सूना है हँसाता है, और रुलाता भी..
हमें तो हँसाए हुए, अरसा बीत गया..!!

कलयुग में किस पयम्बर को पुकारता है 'अस्मादिक'..
दो हज़ार साल पहले ही ईसां बीत गया..!!

(शब-night, सहर-morning)
(पयम्बर=prophet, ईसां=Jesus Christ)

मंगळवार, २ जुलै, २०१३

गढुळ


राम म्हणाला, "लक्ष्मणा.! आज कमंडलूतले पाणी गढूळसे आहे.
आचमन कसे घ्यावे?
कावडीचे जलही तांबडेसे दिसते.
जानकीने अन्न कसे शिजवावे?"

लक्ष्मण म्हणाला, "देवा, गेली चौदा लाख युगे,
हा सह्याद्रि वनवास भोगतो आहे..
अन् पुन्हा एकदा जगत्कल्याणास्तव,
वरुणराजास अंगाखांद्यावर घेऊन नाचतो आहे..!!"

"हिरव्या साजात सजला आहे,
मेघांचे उत्तरिय ल्याला आहे..!!
कित्येक गंगा शिरी धारणारा,
जणु दुसरा सांब भोळा आहे..!!"

"पण राघवा, कितीही दृढ महापुरुष असला तरीही,
काळजात कुठेतरी असतोच ना पीळ..
हलाहल प्राशतो म्हणणारांचाही,
कंठ होतोच ना नीळ..!!!"

"घामांच्या धारा असोत वा खळाळते निर्झर,
आतली वेदना ज्याची त्यालाच कळते..!!
म्हणूनच रघुनन्दना, या राकट पर्वताचेही
अमृत होऊन वाहण्यापूर्वी, पाणी जरा गढुळते..."

शुक्रवार, २८ जून, २०१३

उत्तराखंड

"पोरा चार दिस झाले आपण काही खाल्ले नाही. म्या तर काय म्हातारीच हाय पण तू बी चालून चालून दमला असशील ना? जरा वाइच कुठं काय खायला मिळतंय का बघ."
"आता इथं माह्या बानं काय हॉटेल काढून ठिवलय का म्हातारे, गप गुमान चालत रहा. हि इथली लोकं रांडेचे चार भाकरी, भाजी अन एक बाटली पाण्याचं हजार दीड हजार रुपडं मागत्यात. मले घरी जायचंय जे काय ५-६ हजार रुपडे उरलेत त्ये तिकिटासाठी हायेत."
"मले म्हातारीले आता चालवत न्हाई रं बाबा...!! पायजे तर ह्ये माहे कांगनं घ्ये, विक अन कुणीतरी बघ… झोळी करून मले न्यायला.."
"आये तू बी ना.!! तरी तुला आधीच म्हणत होतो कशाला पायजे ती चार धामं? पण ऐकशील तर ना. चल दे इकडं ते कांगनं म्या बघतो कोणी मिळतंय का. तू बस इथं दगडावर कुठं जाऊ नगस. म्या आलोच."
........
"सर अभी अभी खबर आई है, की सेक्टर ४२ के रेस्क्यू ऑपरेशन में व्यस्त एक हेलीकॉप्टर गिर गया है, मेरा 'आयएएफ'वाला भाई भी था उसी टीम में.!! मेरे ख़याल से मुझे वहाँ जाना चाहिए.!!"
"अरे देशमुख ये एक अफवाह भी हो सकती है, आगे हमारे रेस्क्यू कॅम्पमें पहुँचनेपर ही पक्की खबर मिलेगी. चाहो तो तुम अभी वहां जाकर तसल्ली कर सकते हो."
...
"साबजी जय हिंद.!!" "अभी अभी वायरलेस पर मेसेज आया है कि एक रेस्क्यू हेलीकॉप्टर गिर गया है, करीब बीस लोग मरने की आशंका है, शायद हमारे देशमुख का भाई भी था उनमे.. मगर अभीतक किसी नाम की पुष्टी नही हुई है.!!"
"कहां पर हुआ ये हादसा?"
"सर यहां से १२० किमी दूर की पहाडीयोंमे.. अगर देशमुख पीछे की तरफ जाये तो वहां पे जो हायवे है वहांसे उसे कोई गाडी मिलेगी उधर जानेवाली."
"हां शफीक मुझे लागता है कि हमें देशमुख को पीछे भेज देना चाहिये."
..
"साबजी यहां एक बुढी औरत बेहोश पडी है, जल्दी आईये मुझे लगता है इसे जल्द से जल्द कैंप के अस्पताल में पहुंचाना चाहिए"
"अरे इन्हे पहुँचायेंगे कैसे? इनकी हालत देखते हुए इनका चलना मुश्किल ही लगता है, इन्हें तो उठाकर ले जाना होगा"
"मगर हम तो ४ ही लोग है, एक वायरलेस वाला, एक मै, एक आप और एक देशमुख.!! हमें आगे जो पूल टुटा है वहांपर किसी भी हालत में पहुंचना पडेगा.. वहा सैन्कडो लोग फसे हैं.. हममें से कम से कम तीन का वहां जाना जरुरी है, ताकि छोटा टेम्पररी पुल बनवा कर रस्सियोंके सहारे लोगोंको पार निकाल सकें..!! देशमुख को भी अपने भाई के पास जाना होगा.!! और वैसे भी पच्चिस किमी तक किसी को इन्हे अकेले ले जाना मुश्किल है.. अब क्या करे?"
"साबजी मांजी को मै लेकर जाउंगा..!!"
"क्या देशमुख तुम जाओगे? मगर अकेले आदमी को पच्चीस किमी तक किसी को उठाकर ले जाना वो भी ऐसे मौसम में तो नामुमकिन है!! और तुम्हे अपने भाई की खबर लेने भी तो जाना होगा."
"सर मैं नही जानता की मेरा भाई जिंदा है या नही, और यदि वो मर चुका है तो मैं वहां जाने के बजाय यहां एक जिंदगी को बचाना ज्यादा उचित समझता हूँ..!! रही बात मुश्किल की, तो मै आपको भरोसा दिलाता हुं कि इस औरत को कॅम्पतक पहुंचाए बगैर मै दम नही लुंगा. आप बस मुझे इजाजत दें!!
......
"काय झाले आजी इथे एकट्या कशा आलात? कुणी बरोबर नव्हते काय?"
"माझा ल्योक आहे ना. तो गेलाय बाजुला एखादे गाव असेल तर मदत मागायला.. सकाळच्याला गेलाय आता दुपार ढळली अजून कसा येईना? माझी सोन्याची कांगणं बी घेऊन गेलाय.. म्हणे इथली लोकं खूप पैसे मागत्यात मदत करण्यासाठी.. पैसे बी सारे त्याचेकडच हायेत थोड्या वेळात येइलच तो."
"आजी अगं तुझा पोरगा पैसे अन दागिने घेऊन पळून गेला असणार आता कसला परत येतोय तो?? जिथे देव माणसाचा नाही राहिला तिथे तुझा पोरगा काय तुझा राहणार? चल बस माझ्या पाठकुळी मी तुला घेऊन जातो सुरक्षित जागी."
"पोरा तू म्हणतोस कि देव बी माणसावर उलटलाय, मग तू मला मदत करणारा त्या देवाहून चांगला असा आहेस तरी कोण?"
"मी? मी "भारतीय सैनिक" आहे आजी. चल निघुयात...!!"

सोमवार, १७ जून, २०१३

नदी

मुसळधार पाऊस होतो सुरु.
माती दरवळून जाते.. नव्या नवरीसारखी लाजून ओलीचिंब होते..
कोवळे हिरवे अंकुर धुमाऱ्यांसारखे फुटू लागतात कणाकणांतून..
कुणी जीवाभावाचे भेटल्यावर असंख्य आठवणी उमलून याव्यात तसे
कित्येक प्राणी, पक्षी, कीटक बाहेर येउन बागडू लागतात..
रात्रभर संसद भरलेली असते बेडकांची.
डोंगर टेकड्यांना पाझर फुटतात...
काळ्या डोंगरांवर झऱ्यांच्या पांढऱ्या रेघा दिसू लागतात.....

सखारामचे भाताचे रोप तरारून आलेले असते..
गजाबा सांगत असतो नातवंडांना चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या मोठ्ठ्या पुराची कहाणी..
कोथळ्याकडची पेरणी झाली का रे दादा? असे येणाऱ्या जाणाऱ्यास विचारून
लक्ष्मीबाई घेत असते माहेरचे क्षेम...
अगं गोवरी घाल ना चुलीत किती धूर झालाय? म्हणून दारकाबाई सुनेवर ओरडत असते..
अशात एक दिवस महादू जाता जाता हाळ घालतो..
नदी आलेय शिसवदपर्यंत.. दुपारपर्यंत येईल आपल्या पासानदहाडात..!!
(पासानदहाड हा आमच्या इथला नदीचा मोठा डोह)

आम्ही मग कशीबशी न्याहारी उरकून सुटायचे नदीकडे पळत...
जमेल तेवढे अधिक पश्चिमेकडे.
बऱ्याच वेळाने मग प्रचंड आवाज येऊ लागायचा..
आधी गुरगुरणाऱ्या वाघासारखा आणि मग ढगांच्या गडगडाटासारखा..!!!
आम्ही मग "बा-अदब बा-मुलाहिजा होशियार" व्हायचो..!!!
आणि मग वरचा काठवट नावाचा डोह भरून गढूळलेल्या पाण्याचा एक प्रचंड लोट लोळण घेत, रोरावत उतरायचा पासानदहाडात....

आधी वाळू, मग मोठे दगड आणि मग खडक एकापाठोपाठ एक गुडूप व्हायचे पाण्यात…
हळूहळू पासानदहाड भरू लागायचे. वरून वाहून आणलेले मोठमोठे ओंडके, फांद्या घेऊन बाणाच्या टोकासारखे मध्ये गढूळ पाणी आणि बाजूने जुने नितळ पाणी असा तो लवाजमा पुढे सरकायचा..
आम्ही नदीच्या काठावरून सुसाट पळत जायचो त्या प्रवाहाबरोबर शर्यत लावत...
हळूहळू सगळे पासानदहाड गढूळ होऊन जायचे, आणि मग काठोकाठ भरल्यावर पुन्हा ढोलताशे वाजवीत पाणी पुढच्या जाखुबाईच्या डोहात उडी घ्यायचे...
आठ महिने सासुरवास सोसून माहेरास निघालेल्या सवाष्णीसारखी आनंदी आणि उत्साही भासायची तेव्हा मुळा..
बराच वेळ ते वाहत जाणारे तांबडे पाणी पाहत बसल्यावर मग आम्ही गावात येणार आणि "नदी निघून गेली रे" असा गावभर डंका पिटून टाकणार...
...
...काल फोनवर कळले यंदाची नदी निघून गेल्याचे........
.... खरेच खूप दूर निघून गेली आहे नदी. नाही का?

रविवार, ७ एप्रिल, २०१३

कोळी चौथरा




राकट काळा सह्याद्री होता झाला जेरबंद..
अस्मानी सुलतानीला नव्हता उरला पायबंद.!!

देव धर्माला गिळत होत्या पाशवी पातशाह्या,
गोदा-भीमेचे पाणी होते यवनी सेवेत जात वाया..!!

अशात शिवबाने थोपटले होते परसत्तेविरुद्ध बाहू,
होते मराठी डोळे लागले स्वप्ने स्वराज्याची पाहू..!!

गडातटांवर शिवरायाची ऐकून अभिमानी ललकारी,
चढली सह्याद्रीच्या शिवपुत्रांनाही स्वातंत्र्याची खुमारी.!!

मातृधर्म अन मायभूच्या ऋणास झालासे पाईक,
तळहातावर शीर घॆउन निघाला खेमा नाईक..!!!

मायभूने दिला आवाज शीलरक्षणाचा,
सरसावून उठले मातीचे पूत.. विलंब न क्षणाचा..!!

बलदंड बाहू सरसावले उधळण्या यवनी राजवट,
सह्याद्रीचे कडे-कातळ झाले स्वराज्याचे अभेद्य तट..!!

सुटले मुंडासे, शिरस्त्राणाने सजले मावळाचे राजे..
टाळ मृदंग भंगले आता रणदुंदुभी वाजे..!!

घोड्यांस मारल्या टाचा, उपसल्या म्यानांतून तलवारी..
यवन निर्दालून घेतला परत ताब्यात शिवनेरी..!!

गडकोट घेतले जिंकून, जिंकला मुलुखमावळ सारा,
विजयापरांतच करविला अभिषेक भिमाशंकरा..!!

मुघल सरदारांकडून गेले थेट दिल्लीस खलिते..
की स्वाभिमानाचे सह्याद्रीत पेटलेत पलिते..!!

लाख फौज घेऊन आला शहजादा औरंग,
दख्खन सारी चिरडेन म्हणाला करून मोठा जंग..!!

निरोप धाडीला, सोडावा काफिर धर्म यावे निमूट शरण,
अन्यथा स्वत:च्या डोळ्यांनी पहाल साऱ्या कुळाचे मरण..!!

त्वेषाने मग पेटून उठले ते महादेवाचे भक्त..
हसत अर्पू जर स्वतन्त्रतेला हवेच असेल रक्त..!!

पराक्रमाला कसे रोखतील परिणामांचे हिशेब..
निर्भीडपणे ललकारला त्यांनी खासा औरंगजेब..!!!

चवताळल्या शहजाद्याने धाडीला हजारोंचा फौजफाटा,
बोलला मिळेल त्यास मारा, मिळेल ते लुटा..!!

मुठभर मावळ्यांवर पडली हजारोंची धाड..
शर्थ केली पराक्रमाची पण कसा लागावा पाड..!!!

प्राणपणे शत्रूशी लढले ते राकट मावळवीर,
न सुटली तलवारीची मुठ, न सुटला तसूभर धीर..!!

शेकडोंनी ठेविले रणभूमीवर लढता लढता प्राण,
पण वैऱ्याने शिताफीने केले दीड हजार बंदिवान..!!

आणले मैदानात बंदी वीरांस बांधून साखळदंड,
स्वाभिमानाचा पुरस्कार तो देण्या देहदंड..!!

फिरले प्राक्तनाचे फासे झाला काळसर्पाचा दंश,
विद्रोही रक्त संपविण्यासाठी केला नाईक निर्वंश..!!

क्रूरपणे धरिला रक्तसंबंधातला प्रत्येकजण, वृद्ध वा तान्हा,
नृशंसपणे समोर कापिल्या सगळ्यांच्या माना..!!

"हर हर महादेव" गुंजल्या गर्जना भेदीत आभाळा..
त्या आवाजांनी कांपून उठल्या सह्याद्रीच्या शिळा..!!

देश रक्षणार्थ झाला जरी आमुचा समूळ कुलक्षय..
सह्याद्रीच्या रक्तात नसतेच कधी मृत्यूचे भय..!!

या सांडल्या रक्तातूनच निपजेल पुढची प्रत्येक पिढी,
थेट दिल्लीच पादाक्रांत करतील मराठी मुलखाची घोडी..!!

भडकलेल्या मुघलांचे सुटले या बोलांनी भान,
क्षणार्धात करा म्हणाले सर्वांचे शीरकाण..!!!

एक एक करून झाली साऱ्यांची धडावेगळी शीरे...
मातीतली मातीतच मिसळली मराठी लेकुरे..!!

दीड हजार मुंडक्यांच्या लागल्या एकावर एक राशी..
मायभूनेच कवटाळले ते निष्प्राण पुत्र उराशी..!!


रक्ताच्या नदीने भिजली शिवनेरीची धरा,
शीरांच्या राशींवर बांधला काळा चबुतरा..!!

नाही मिळाला चुडाग्नि, नाही मिळाले सरण,
पण लाभले मातृभूमीसाठी सौभाग्याचे मरण..!!

रेंगाळलाच असेल क्षितिजावर जरा मावळतीचा सूर्य,
पाहून वेड्या मावळ्यांचे ते अपरिमित शौर्य..!!

मरणाच्या दारातही होती मान ठेविली ताठ..
अजून मातीत जिरले नाहीत त्या रक्ताचे पाट..!!

अजून त्यांच्या गर्जनांनी आसमंत थरारून उठतो..
अजून इथे अश्रू ढाळण्यासच हरेक मेघ दाटतो..!!

ही मातीच बलिदानांच्या रक्ताने रंगलेली..
ही भूमीच शूरांच्या पराक्रमाने झिंगलेली..!!

स्वदेशास्तव हसत बांधतो आम्ही कलेवरांच्या मोळी..
रक्तानेच लिहिल्या जातात आमच्या इतिहासाच्या ओळी..!!

सोमवार, ११ मार्च, २०१३

ती......

"आपके पैर बडे हसीन हैं, इन्हे जमीन पे मत रखना.. मैले हो जायेंगे...!!!"
--ती पाय ठेवते अग्निकुंडात.. आणि गडप होते जमिनीच्या अंतरात.. *सीता*

"इन हाथोंपर तो चूडीयां कयामत ढायेंगी.."
--ती हाती घेते तलवार.. अन लोळविते एका महासत्तेला समरात....*राणी लक्ष्मीबाई*

"एक तू ही धनवान है गोरी.. बाकी सब कंगाल..!!"
--ती घेते वसा "गरिबी हटाव"चा आणि भरते अन्न कोट्यावधी उदरांत..!!! *इंदिरा गांधी*

"ये चांद सा रौशन चेहरा.. जुल्फोंका रंग सुनहरा.."
--ती घेते चंद्र कुशीत.. आणि हात मिळविते सूर्याशी अंबरात... *कल्पना चावला*

तीच कधी नागवली जाते भर कुरुसभेत.. कधी दिल्लीच्या रस्त्यांवर..
मारली जाते.. पंचतारांकित वसाहतीपासून मळक्या शापित वस्त्यांवर..
तीच घडविते शिवबा.. आणि बनते कित्येक रंजलेल्यांची मदर
थेट यमाकडून प्राणांकित करविते तीच सत्यवानाचे कलेवर..
ती बहिण, ती कन्या.... ती पत्नी.. तीच आई.....
तिच्या एवढे पवित्र नाते दुजे कोणतेच नाही...!!!