हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

2020


एक साल ये कुछ ऐसे गुजर गया
कोई बोझ जैसे सीने से उतर गया

खिलखलाती मुस्कानों को कैद कर के
आंँखो में उदासी का पानी भर गया

सबको जीने मरने की जंग में उतारकर
जाने कितनी जिंदगियों को कुतर गया

मुखौटे पहनकर जीनेवाले चेहरों पर
ये मजबुरियोंके और नकाब धर गया

भूख जलते पांवों से रास्तोंपे चलती रही
जाने कौन घर गया और कौन मर गया

चलती फिरती दुनिया को लगाम लगाई
सारा जहाँ जैसे बेजान सा ठहर गया

एक ख्वाब मेरी आंखो में कत्ल हुआ
दिल टूटकर चारो तरफ बिखर गया

मार्च मे आया था एक बुरा सपना बनकर
चलो उसे खत्म करके ही दिसम्बर गया

एक साल ये कुछ ऐसे गुजर गया
कोई बोझ जैसे सीने से उतर गया

 

 


..

रविवार, २० डिसेंबर, २०२०

चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी



मै कहीं दूर किसी पहाड की चोटी पे
कुछ हसरतें बो रहा था एक बंजर सी मिट्टी पे
कुछ सर्द सी सिसकियाँ थी, जो मैने दिल की आग में तापी
चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी

मैने उम्मीदों के अलाव में उसे नही जलाया
मैने उसे कोई वास्ता देकर नाम से नही बुलाया
मैने कभी उससे अपने रिश्ते की गहराई नही नापी
चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी

ख्वाबों के परिंदे पलको से उतार दिये
कुछ संभाले हुए लम्हें थे, मैंने गुजार दिये
खिलखिलाते सिलसिले पे रख दी, इक लंबी सी चुप्पी
चिकू हॅप्पी तो मै हॅप्पी



.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

चाळीशी म्हणजे

कशी क्षणार्धात निसटून गेली दशके चार कळले नाही
जे लाभले ते थोडेसेच आहे, की आहे फार, कळले नाही

हिशेब ठेवले नाहीत सुखांचे, दुःखांचे प्रमाण मोजले नाही
व्हायचे ते असेच होत गेले, मी आवर्जून काही योजले नाही

उत्सवाचे कारण आहे आज, अन संकोचाचाही बहाणा आहे
समंजस, निर्विकार व्हावे इतका, अजून कुठे मी शहाणा आहे

ऋतूंचे रंग कसे अजूनही, डोळ्यांत माखून रुजत राहतात
मनाची राने अजूनही कशी, चिंब होऊन भिजत राहतात

अजून घेऊन फिरतो मी, स्वतःतच एक प्रचंड मोठा कल्लोळ
नाहीच अजून सुचत कवितेत, भावनांचा आरसा होणारी ओळ

उरात अजून फुटत असतात, अगणित स्वप्नांचे नवथर कोंब
अजून निखळतो आपसूकच, गालावरून एक चुकार थेंब

अजून तशीच उतरते नजरेत, आभाळाची गर्द निळी ओल
अजून रुतलेला आहे आत कुठेतरी, एक चेहरा अगदी खोल

इवल्याशा क्षणाची हयात सारी, पण अगणित तिच्या कहाण्या
महाकाव्याहून मोठ्या काही, काही एका ओळीहून लहान्या 

आयुष्याच्या रणातली, वय ही दुधारी अशी तलवार आहे
जरा हुल आहे एक फसवीशी, एक जरासा आधार आहे

अनोख्या वळणावर दाटणारे, हे नेहमीचेच तर काहूर आहे
चाळीशी म्हणजे नव्या चेतनेचा, एक जुनाच तर सूर आहे



.

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

लसीची कथा

जवळ जवळ इसवी सन २०० वर्षे इतक्या पूर्वी चीन आणि भारतात लसीकरण सदृश उपाय केले जात असल्याचे काही पुस्तकांत उल्लेख आहेत. या पद्धतीत ज्यांना देवी (चेचक) हा रोग होऊन गेला आहे त्यांच्या शरीरावरील देवीच्या जखमांच्या भरलेल्या खपल्या काढून घेतल्या जायच्या आणि त्याची पावडर बनवून इतर लोकांच्या नाकात ती पावडर नळीद्वारे फुंकून टाकली जायची. असे केल्याने त्या लोकांना कधीही देवी व्हायच्या नाहीत.

काही कमी अधिक प्रमाणात अशीच पद्धत सोळाव्या सतराव्या शतकात इतरही देशांत आढळून आल्याच्या नोंदी आहेत. लेडी मेरी मॉन्टेग्यु हिने तुर्कीमध्ये आपल्या मुलाला देवीची टोचणी केल्याची नोंद केली आहे. तिथल्या काही म्हाताऱ्या स्त्रिया वर्षातून एकदा शरद ऋतूमध्ये लोकांच्या शरीरात देवीचे विष (म्हणजे देवी झालेल्या लोकांच्या शरीरातून घेतलेला स्त्राव) सुईच्या टोकावर माखवून ती सुई लोकांच्या शरीरात टोचत असत. अशा प्रकारे टोचणी केलेल्या लोकांना पुढे कधीही देवी होत नसे. बोस्निया मधील माथर नावाच्या एका मंत्र्याने एकदा एक आफ्रिकन गुलाम विकत घेतला होता, त्याने त्याला बायबल मधील एका सेवाभावी गुलामाचे नाव दिले होते, ते नाव म्हणजे वनसिमस. वनसिमसच्या शरीरावर देवीची टोचणी घेतल्याचा व्रण होता. त्याने सांगितले की आफ्रिकेत ते लोक असेच टोचणी करून घेतात आणि त्यानंतर त्यांना कधीही हा रोग होत नाही. हीच पद्धत मग माथरने त्यांच्या देशात वापरली आणि त्यायोगे लाखो लोकांचे प्राण वाचवले.  
 
देवी झालेल्या लोकांपैकी ३० टक्के लोकांचा दोन आठवड्यात मृत्यू होत असे, आणि जे वाचले त्यांच्या शरीरावर आयुष्यभरासाठी देवीचे व्रण राहत असत. मात्र एव्हना अनेक देशांत वापरल्या जात असलेल्या देवीच्या फोडांतील स्त्राव दुसऱ्या माणसाच्या शरीरावावर जखम करून तिथे लावण्याच्या पद्धतीमुळे हेच प्रमाण ३० टक्के वरून ३ टक्क्यांपर्यंत आले होते. मात्र तरीही ३ टक्के ही खूप मोठी संख्या होती आणि ही टोचणी न करून घेणाऱ्या लोकांची संख्याही प्रचंड मोठी होती. 
 
एडवर्ड जेन्नर हा त्याच्या आईवडिलांच्या ९ मुलांपैकी एक होता. त्याला प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे निरीक्षण करण्यात फार रस होता. त्याचे घर हे वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे, पक्षांची घरटी, दगड इत्यादी वस्तूंनी भरलेले असे. तो एक कोकीळ स्पेशालिस्ट होता. किंबहुना त्याचे वेगवेगळे पशुपक्षी आणि निसर्गातील विविध घडामोडींचे ज्ञान इतके चांगले होते की प्रसिद्ध खलाशी कॅप्टन कुक याने त्याला त्याच्या दुसऱ्या सफरीवर सोबत येण्याचे आमंत्रण दिले होते, पण जेन्नरने ते नाकारले. 
जेन्नरने आधी एका गावच्या वैद्याच्या आणि नंतर एका नामांकित सर्जनच्या हाताखाली काम केले. त्याकाळी देवीच्या साथीने लोक खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू पावतच असत. तसेच अनेकजण धार्मिक वगैरे कारणांनी देवीची तेव्हा प्रचलित असलेली टोचणीची पद्धत वापरत नसत. वर सांगितल्याप्रमाणे एका आफ्रिकन निग्रोने सांगितलेली पद्धत आपण वापरणे कमीपणाचे ठरेल या भावनेने माथरला बोस्टनमध्ये देवीच्या टोचणी पद्धतीच्या प्रसाराला खूप अडथळे आले होते. याव्यतिरिक टोचणी करूनही ३ टक्के लोकांचा मृत्यू होतच असे, आणि अनेकांना आयुष्यभर देवीचे व्रण शरीरावर घेऊनच जगावे लागत असे. 
 
एकदा जेन्नरने त्याच्या ओळखीच्या एका गवळणीला असे म्हणताना ऐकले की आता मला काऊ पॉक्स झाला आहे त्यामुळे मी कधीही देवीच्या रोगाला बळी पडून विद्रुप होणार नाही. हे ऐकल्यावर जेन्नरची उत्सुकता चाळवली. त्याने अजून थोडी माहिती घेतली आणि मग त्याला कळले की देवीसारखाच एक रोग गायींनाही होत असे आणि गायींच्या आचळावर त्याचे फोड येत असत. ज्या गवळणी गायीचे दूध काढत असत त्यांना त्या फोडांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या हातावरही तसेच फोड येत असत आणि काही दिवसांनी ते बरे होऊन त्यानंतर त्यांना पुढे आयुष्यात कधीही देवीची लागण होत नसे. 
जेन्नरने मग यावर खूप विचार आणि निरीक्षणे केली. काही असो, गायीला होणारा रोग देवीसारखाच असला तरी सौम्य स्वरूपाचा असतो आणि तो होऊन गेला की अधिक धोकादायक असा देवी रोगसुद्धा पुन्हा कधीच होत नाही हे जेन्नरच्या लक्षात आले. वेगवेगळ्या गवळणींना हा रोग झाल्यावर खरेच देवी होत नाहीत हे पाहून मग त्याने एक प्रयोग करायचा ठरवला. 
 
जेन्नरने त्यासाठी ज्याला पूर्वी कधीच देवी किंवा काऊ पॉक्स झाला नाही असा 'जेम्स फिप्स' नावाचा एक आठ वर्षांचा मुलगा निवडला. 'सारा' नावाच्या एका गवळणीला काऊ पॉक्स झालेला होता तिच्या हातावर जे त्या रोगाचे फोड आले होते त्यातून जेन्नरने थोडा स्त्राव घेतला आणि जेम्सच्या हातावर चार जखमा करून त्या जखमांवर तो स्त्राव लावला. हे केल्यानंतर जेम्स आजारी झाला त्याला थोडा ताप आला आणि मग सहा आठवड्यांत तो पूर्णपणे बरा झाला. तो बरा झाल्यावर मग जेन्नरने त्याला प्रत्यक्ष देवीच्या रोगाच्या फोडांतील स्त्राव टोचून बघायचे ठरवले. हे खरेतर धोक्याचे होते कारण देवी होणाऱ्या तिघांतील एकजण मरत असे. पण जेन्नर आणि जेम्स यानेही हिम्मत दाखवली व जेन्नरने जेम्सच्या हातावर पूर्वीप्रमाणेच चार जखमा करून त्यांत देवीचा स्त्राव टाकला. आणि जेन्नरच्या अपेक्षेप्रमाणे जेम्सला असे करूनही देवी झाल्याच नाहीत. हाच होता भविष्यातील लसीकरणाचा पाया. आज आपल्याला ज्या लसी उपलब्ध आहेत, त्यासाठी आपण जेन्नरइतकेच या स्वतःच्या जीवाची बाजी लावलेल्या छोट्या जेम्स फिप्सचे सुद्धा ऋणी आहोत. आधीच्या टोचणी पद्धतीत लोकांना देवीच्याच रोगाचा स्त्राव दिला जात असे, त्यातून अनेक मृत्यू होत आणि अनेक जणांचे प्राण वाचले तरी अंगावर देवीचे व्रण आयुष्यभर राहत असत. पण जेन्नरची पद्धत ही अधिक चांगली होती. एकतर काऊ पॉक्स हा जीवघेणा आजार नव्हता आणि तो होऊन गेल्यावर पुन्हा कधीही देवी होत नसत. 
 
म्हणजे एखादा कमी प्रभावी असलेला विषाणू शरीरात टोचला की त्यामुळे आपल्या शरीरात इम्युनिटी निर्माण होऊन पुढे तशाच प्रकारच्या दुसऱ्या अधिक धोकादायक विषाणूपासून आपले संरक्षण होते एडवर्ड जेन्नरने जगाला सांगितले. म्हणूनच त्याला फादर ऑफ इम्युनॉलॉजी म्हणतात. अगदी आजही कोणत्याही रोगावर लस बनविण्यासाठी हेच तत्व वापरले जाते. पोलिओ असो की टेटॅनस, रोगाच्या विषाणू किंवा बॅक्टेरियाला अगदी सौम्य बनवून शरीरात दिले जाते. हे विषाणू इतके सौम्य केलेले असतात की त्याने लस दिलेल्या माणसाला रोग होत नाही, मात्र त्या रोगासाठीची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होऊन तो रोग पुढे कधीच होत नाही. लॅटिन भाषेत गायीला vacca असे म्हणतात, म्हणून या नव्या पद्धतीला जेन्नर याने vaccination असे नाव दिले. जेन्नरच्याच तत्वावर आधारीत सौम्य स्वरूपाच्या कोविड करोना व्हायरसची लस बनविण्याचे काम आज जगभरात चालू आहे. अर्थात जेन्नरने जसे खूप धोका घेऊन जेम्सवर प्रयोग केला होता तसे आज आपण करू शकत नाही. आज ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात येते त्यांच्यावर त्या लसीचा काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्यांना अतिशय काटेकोर निरीक्षणाखाली ठेवावे लागते. कितीवेळा लस द्यावी लागेल किंवा किती प्रमाणात वा कोणत्या स्वरूपात द्यावी लागेल वगैरे अनेक गोष्टी अभ्यासून ठरवाव्या लागतात. लस दिल्यानंतरही त्यात काही त्रुटी असल्यास ज्याला लस दिली आहे त्याच्या शरीरावर पुढील किमान वर्ष-दोन वर्षभरात काही वेगळा परीणाम तर होत नाही ना याचे निरीक्षण करून खात्री करावी लागते. जर या स्वयंसेवकांवर लसीचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, आणि त्यांच्यात यामुळे त्या रोगासाठी पुरेशी प्रभावी प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे असे आठळून आले की मगच अशी लस सर्वांना देण्यासाठी योग्य आहे असे ठरवले जाते. ही सगळी निरीक्षणे घेण्यासाठी वर्ष दोन वर्षे लागतातच. म्हणूनच कोविड करोनाची लस येण्यास उशीर होतो आहे. तसे आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार सौम्य किंवा इनक्टिव्ह व्हायरस न वापरता व्हायरसचा पूर्ण जिनोम डिकोड करून, आपल्याच शरीरातील पेशींतुन व्हायरस सारखे अँटिजेन तयार करून शरीरात त्या अँटीजनच्या अँटिबॉडी तयार होऊ द्यायच्या, ह्याच अँटिबॉडी मग प्रत्यक्ष विषाणूला निष्प्रभ करतील असे जलद काम करणारे तंत्र आले आहे. बहुतांश कोविड लसी अशाच बनवल्या जात आहेत. 
एडवर्ड जेन्नरने विकसित केलेल्या लसीकरणामुळेच देेवी, पोलिओ अशा अत्यंत घातक रोगांपासून आपण जगाला मुक्त करण्यात यशस्वी झालेलो आहोत, आणि लवकरच कोविड करोनापासूनही आपण अशीच पूर्ण मुक्ती मिळवू अशी अपेक्षा करूयात. 

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

मास्क/फिल्टर्स यांची क्षमता


सगळ्यांनी ऐकले असेल की N95 मास्क हा 0.3 मायक्रोन साईजच्या पार्टिकल्सला 95% फिल्टर करतो. 
यावरून तुमच्याही मनात असे प्रश्न आले आहेत का?

1) मास्कची क्षमता सांगताना असे 0.3 मायक्रोन हाच अंक का सांगतात? 1 मायक्रोन किंवा किमान 0.1 मायक्रोन का नाही?

2) व्हायरस साईज तर 100nm म्हणजे 0.1 मायक्रोन किंवा त्याहून कमी असते, आणि N95 तर त्याहून तिप्पट मोठ्या म्हणजे 0.3 मायक्रोन साईजच्या पार्टिकल्सला 95% रोखतो, मग करोना किंवा कोणताही व्हायरस N95 वापरून कसा काय रोखता येऊ शकेल?

याचे उत्तर हे आहे की N95 हा 0.3 मायक्रोनपेक्षा मोठ्या पार्टीकल्स किंवा व्हायरसला 100 टक्के फिल्टर करतोच, पण तो 0.3 मायक्रोनपेक्षा खूप छोट्या असलेल्या पार्टीकल्सना सुद्धा 100 टक्के फिल्टर करतो.

मला माहीत आहे की कोणताही फिल्टर जो 0.3 मायक्रोन साईजच्या कणांना 95 टक्केच फिल्टर करतो तो त्याहून कमी साईजच्या पार्टीकल्सना 100 टक्के कसाकाय फिल्टर करेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते जाणण्यासाठी आपल्याला हे फिल्टर्स नेमके कसे काम करतात ते जाणून घ्यावे लागेल.
 
तर फिल्टर्स नेमके कसे काम करतात आणि 0.3 मायक्रोनपेक्षा कमी साईजचे पार्टीकलही कसे काय 100% फिल्टर होतात याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. 

हे जे मी पार्टीकल्स फिल्टरेशनचे तंत्र आणि तत्व सांगणार आहे ते फक्त मल्टीलेयर फायबर्स असलेल्या फिल्टर्स साठी लागू पडते. म्हणजे असे फिल्टर्स ज्यात हजारो मायक्रो-फायबर्स आडवेतिडवे एकमेकांत गुंफलेले असतात. मागे एका मोठ्या नेत्याने म्हंटले होते की मी रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे गुळगुळीत बनवेल. पण प्रत्यक्षात ते रस्ते होते ओम पुरीच्या गालांसारखे. तसेच बाहेरून या फायबर्स वाल्या फिल्टर्स किंवा मास्कचा सरफेस गालांसारखा प्लेन दिसत असला तरी मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर ते अस्ताव्यस्त पडलेल्या धाग्यांसारखे दिसतात. म्हणजे असे फिल्टर्स हे आडव्या उभ्या तिरक्या अशा कुठल्याही प्रकारे गुंफलेल्या फायबर्सचे म्हणजेच धाग्यांचे जाळे असते. उदाहरणार्थ हेपा फिल्टर्स (हेमा नाही हेपा; HEPA म्हणजे High Efficiency Particulate Air Filters). (हे असे फिल्टर्स किंवा मास्क मायक्रोस्कोपखाली कसे दिसतात यासाठी खालील फोटो नं 1 पहा)
 
 
या HEPA सारख्या फिल्टर्समध्ये पार्टीकल फिल्टरेशन करण्यासाठी वेगवेगळे मेकॅनिजम असतात. म्हणजे फिल्टरवर बाहेरून येणारा कोणताही पार्टीकल हा ज्या तंत्राने अडवला जातो ते तंत्र म्हणजे त्याचे मेकॅनिजम होय. वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे पार्टीकल हे या एकाच फिल्टरवर वेगवेगळ्या मेकॅनिजमने अडवले म्हणजेच फिल्टर केले जातात. हे पार्टीकल किंवा व्हायरसकण फिल्टर करण्याचे मेकॅनिजम समजून घेण्याआधी एक उदाहरण पाहू. यात जे इम्पॅक्शन, इंटरसेप्शन आणि डिफ्युजन हे शब्द मी वापरणार आहे ते फक्त लक्षात ठेवा. त्यांचे स्पष्टीकरण पुढे देईलच. 
 
तर उदाहरणार्थ एखाद्या मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानात जाणारे ग्राहक यांना आपण पार्टीकल समजू, दुकान हे मास्क किंवा फिल्टर समजू आणि दुकानातील वेगवेगळे काउंटरवर हे या ग्राहकांना ट्रॅप करणारे मेकॅनीजम आहेत असे मानू. आपल्या सोयीसाठी खूप बीजी असलेले ग्राहक यांना आपण "मोठे" ग्राहक म्हणू, थोडे कमी बीजी असलेले ग्राहक यांना आपण "कमी मोठे किंवा मध्यम" ग्राहक म्हणू, आणि अजिबात बीजी नसलेले ग्राहक यांना आपण "छोटे" ग्राहक म्हणू. 
 
तर काही लोक हे दुकानात गेले की धडक त्याच काउंटरवर जातात जे सामान त्यांना घ्यायचे असते. तिथल्या काउंटरला आपण इम्पॅक्शन म्हणू. हे बीजी म्हणजेच "मोठे" ग्राहक असतात. तर असे लोक या इम्पॅक्शनवर जातात आणि थेट हवी ती वस्तू विकत घेतात. उगीच इकडे तिकडे डोकावणे नाही की नसत्या चौकशा नाहीत. या मोठ्या बीजी ग्राहकांचे असे थेट एका काउंटरवर जाऊन धडकणे आणि तिथे ट्रॅप होणे म्हणजे तिथली वस्तू घेणे हे झाले इम्पॅक्शन. 
 
काहीजण मनात एक वस्तू घ्यायची ठरवून दुकानात शिरतात, पण लगेच हवी ती वस्तू घेत नाहीत, कारण थेट तीच वस्तू मागितली की दुकानदार जास्त किंमत सांगतो अशी त्यांची समजूत असते. त्यापेक्षा दुसरी वस्तू घ्यायची आहे असे भासवून आपल्याला हवी ती वस्तू पसंत नाही पण उगीच इंटरेस्ट आहे म्हणून विचारतोय असे दाखवून दुकानदार फसेल आणि तिची खरी किंमत सांगेल, मग आपण ती लगेच घेऊ अशी चलाखी हे लोक करतात. हे लोक फारच जास्त बीजी नसतात आणि वेळ काढून खरेदीला आलेले असतात. असे थेट हवे त्या काउंटरवर न धडकता चतुरपणे इन्डायरेक्टली खरेदी करून ट्रॅप होणारे "मध्यम मोठे" ग्राहक  लोक म्हणजेच इंटरसेप्शनने ट्रॅप झालेले लोक होत. 
 
तिसऱ्या प्रकारचे लोक सगळ्यात डेंजर असतात. हे अजिबात बीजी नसलेले म्हणजे "छोटे" ग्राहक होत. त्यांना स्पेसिफिकली ठरवून काहीच घ्यायचे नसते. नुसती एसीची हवा घ्यायची आणि वेगवेगळ्या दुकानांत होईल तितका टाईमपास करीत भटकायचे हे यांचे काम. हे लोक एका काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर उगीच रँडम भटकत राहतात. जे घ्यायचे नाही असा वस्तूंबद्दलही बिनकामी चौकशा करतात. असे लोक सहज कोणत्याही काउंटरवर थेट ट्रॅप होत नाहीत. पण अनेक काउंटर्सपैकी एखाद्या काउंटरवर मात्र त्यांना एखादा खाष्ट विक्रेता भेटतोच. तो खाष्ट विक्रेता थेट "ए भाई लेना है तो ही दिखाता हूं वर्ना खाली फुकट मेरा टाइम खोटी मत कर" असे सुनावतो. किंवा "ये महंगा है आप नही लेंगे, आपको दुसरा सादे मे सस्ता दिखाऊ?" असे खिजवतो. आणि मग आपला नुसताच रँडम उंडारणारा "छोटा" ग्राहकही अशा खाष्ट विक्रेत्यापुढे ट्रॅप होतो आणि लाजेकाजे काहीतरी वस्तू खरेदी करतो. या अशा ट्रॅप होण्याला आपण म्हणूयात डिफ्युजन. 
 
याव्यतिरिक्त चौथ्या प्रकारचे लोक असतात, जे नुसतेच मॉलमध्ये एसीची हवा खायला आणि गर्दीतले छान छान चेहरे पहायला व एलेव्हेटरवरून वरखाली जाण्याची गंमतगाडी खेळायला आलेले असतात. अशा लोकांना ट्रॅप करणे म्हणजे खरेदी करायला लावणे हे खूप अवघड असते. यांना आपण "कजाग" ग्राहक म्हणू. जो दुकानदार यांना माल विकू शकला तो खरा श्रेष्ठ दुकानदार होय.

आता या उदाहरणात सांगितलेल्या सर्व ट्रॅप होण्याच्या मेकॅनिजम्सचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. मास्क किंवा फिल्टरवर कोणतेही पार्टिकल्स यापैकी कोणत्या ना कोणत्या मेकॅनिजमनेच ट्रॅप होतात. 

1) इम्पॅक्शन किंवा धडक- म्हणजे फिल्टरमधून हवा आत ओढल्यावर बाहेरचा पार्टीकल जाऊन थेट फिल्टरच्या कोणत्या ना कोणत्या फायबर्सवर धडकतो आणि तिथे अडकून राहतो. जेवढी बाहेरून येणाऱ्या पार्टीकलची साईज "मोठी" असेल, तेवढा तो पार्टीकल फिल्टरच्या आडव्या तिडव्या हजारो धाग्यांपैकी कोणत्या ना कोणत्या धाग्यावर धडकून अडकण्याची शक्यता जास्त असते. काही पार्टीकल जास्त मोठे असतील तर ते फिल्टरच्या बाहेरच्या धाग्यांवरच धडकून अडकतील. आणि बाकीचे जरी बाहेरच्या धाग्यांतून सुटले तरी ते आतल्या कुठल्या तरी लेयरमधील धाग्यावर धडकून अडकतीलच. पार्टिकलची साईज जेवढी मोठी तेवढा तो सहजपणे इम्पॅक्ट होऊन फिल्टरमध्ये अडकतो.

2) इंटरसेप्शन किंवा अवरोध- म्हणजे आधीच फिल्टरवर अडकून राहीलेल्या पार्टीकलला धडकून दुसऱ्या पार्टीकलचे अडकणे. किंवा फिल्टरमधील फायबरला थेट मधोमध न धडकता त्याच्या बाहेरच्या कडेला स्पर्शून अडकणे. या मेकॅनिजममुळे "मध्यम मोठे" पार्टीकल फिल्टरवर अडकून राहतात. आणि याही मेकॅनिजममध्ये इम्पॅक्शन प्रमाणेच पार्टीकलची साईज जशी जशी मोठी होईल तशी तशी पार्टीकल फायबरवर अडकण्याची शक्यता वाढत जाते.

3) डिफ्युजन: हे सर्वात महत्वाचे मेकॅनिजम आहे. डिफ्युजन म्हणजे जास्त काँसंट्रेशन कडून कमी काँसंट्रेशन कडे मूव्हमेंट होणे. पण फिल्ट्रेशन मध्ये असा शब्दशः एवढाच अर्थ अंतर्भूत नाही. तर जेव्हा अनेक फायबर्सच्या मधल्या पोकळीत पार्टीकल येतो तेव्हा तो ब्राऊनियन मोशनमध्ये म्हणजेच सगळ्या दिशांना रँडम मोशनमध्ये फिरतो. आणि असे रँडम कुठल्याही दिशेला फिरताना मग तो या फायबर्स मधल्या पोकळीतून थोडा बाहेर सरकला की आजूबाजूच्या हजारो फायबर्स पैकी कोणत्या ना कोणत्या फायबरला धडकतोच आणि तिथेच ट्रॅप होतो. पण हे फक्त "छोट्या" पार्टीकल्सच्या बाबतीतच होते. मोठे पार्टीकल त्यांच्या मोठ्या साइजमुळे ब्राऊनियन मोशन फॉलो करू शकत नाहीत, त्यामुळे मोठे पार्टीकल या मेकॅनिजमने अजिबात ट्रॅप होत नाहीत. पार्टीकल जितका कमी साईजचा असेल तितका तो हवेत जास्त प्रमाणात इकडे तिकडे उडत राहील म्हणजेच जास्त ब्राऊनियन मोशन फॉलो करेल आणि जितका जास्त ब्राऊनियन मोशन फॉलो करेल तितका जास्त तो फायबरवर अडकण्याची शक्यता वाढेल. बाजूला हजारो फायबर्स असल्याने असा रँडम भटकणारा पार्टीकल त्यातील कोणत्या ना कोणत्या फायबरवर अडकतोच अडकतो. म्हणजेच पार्टीकलची साईज जितकी कमी असेल तितकी त्याची डिफ्युजन मेकॅनिजमने ट्रॅप होण्याची शक्यता जास्त वाढेल. म्हणजे असे की 0.1 मायक्रोन पार्टीकल पेक्षा 0.01 मायक्रोन साईजचे पार्टीकल हे डिफ्युजनने जास्त प्रमाणात ट्रॅप होतात.

4) या तीन मुख्य मेकॅनिजम व्यतिरिक्त ग्राविटेशनल सेटलींग, इलेक्ट्रोस्टॅटिक attraction हे एडिशनल मेकॅनिजम सुद्धा पार्टीकल्सना ट्रॅप करतात. हे थोडे कमी महत्वाचे मेकॅनिजम आहेत, त्यामुळे फक्त आपण मुख्य तीन मेकॅनिजम वरच लक्ष देऊ. 
 
वर फोटो 1 च्या आकृतीत जे फायबर्सचे जाळे दिसते त्यातील एका फायबरला घेऊन त्यावर वरील मेकॅनिजम नेमके कसे काम करतात ते खालील आकृतीत दाखवले आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा बाहेरची हवा मास्कच्या अनेक फायबर्स मधून आत ओढली जाते. याच हवेत मास्कमधून फिल्टर होण्याच्या आधी व्हायरस किंवा इतर पार्टिकल्स असतात. खालील आकृतीत निळ्या बाणाने हवेची फायबरपासून आत जातानाची दिशा दाखवली आहे. फायबर हा राखाडी रंगाने आणि आपला पार्टीकल किंवा व्हायरस हा करड्या रंगात दाखवला आहे. वर सांगितलेल्या चारही मेकॅनिजम्सचे हे चित्ररूपातील सादरीकरण आहे. एक लक्षात ठेवा, हवा ही फिल्टरच्या फायबर्समधून आरपार जात नाही तर अनेक फायबर्सच्या मध्ये जो गॅप असतो त्यातून जात असते. म्हणून खालील आकृतीत फायबरजवळून जाताना हवेची दिशा ही फायबरच्या आरपार जाणारी न दाखवता त्याच्याजवळ  आल्यावर बाजूने वळून गेलेली दाखवली आहे.
 

फायनल फिल्ट्रेशन हे या सर्व मेकॅनिजमचा एकत्रित प्रभाव होऊन मग साध्य होते.
थोडक्यात असे की मोठे पार्टीकल हे इम्पॅक्शन आणि इंटरसेप्शनने ट्रॅप होतात तर पार्टीकल जितके छोटे असतील तितके ते डिफ्युजनमुळे अधिक ट्रॅप होतात. या सर्व मेकॅनिजमला एकत्रितपणे 'पार्टीकल साईज' विरुद्ध 'ट्रॅप करण्याची इफिशीयंसी' असे प्लॉट केले तर खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे रिझल्ट मिळतो.
 
या आकृतीत स्पष्ट दिसते की डिफ्युजनमुळे ट्रॅप होण्याची क्षमता छोट्या पार्टीकल्समध्ये 100 टक्के असते, मात्र जशी जशी x ऍक्सिस वर पार्टीकलची साईज मोठी होत जाते तशी त्या मोठ्या पार्टीकल्सची डिफ्युजनने ट्रॅप होण्याची इफिशीयंसी ही कमी कमी होऊन 10 मायक्रोन साईजच्या पुढे ती शून्य होऊन जाते. नेमके याच्या उलट इम्पॅक्शनने ट्रॅप होण्याची क्षमता 0.5 मायक्रॉनपेक्षा छोट्या पार्टिकल्सची शून्य असते आणि जसे जसे पार्टीकल मोठे होत जातात तसे त्यांची ट्रॅप होण्याची क्षमता 100 टक्के होते. असेच इंटरसेप्शनने देखील घडते.     
आता खालील आकृती पहा.

या आकृतीत सगळ्या मेकॅनिजमचा एकत्रित प्रभाव दाखवला आहे. यात आपण स्पष्ट बघू शकतो की मोस्ट पेनिट्रेटिन्ग पार्टीकल साईज म्हणून जी जागा दाखवली आहे तिथे पार्टीकल ट्रॅप होण्याची इफिशियंसी ही सर्वात कमी असते. या साईजपेक्षा कमी साईजच्या पार्टिकल्ससाठी फिल्टरची इफिशियंसी जास्त असते आणि या पॉईंटपेक्षा मोठ्या साईजच्या पार्टीकलसाठीही ट्रॅप करण्याची इफिशियंसी जास्त असते. फिल्टरवर या साईजपेक्षा छोटे पार्टीकल डिफ्युजनमुळे ट्रॅप होतात तर याहून मोठे पार्टीकल इम्पॅक्शन आणि इंटरसेप्शनमुळे ट्रॅप होतात. ही जी मोस्ट पेनिट्रेटिन्ग पार्टीकल साईज आहे जिथे इफिशियंसी सगळ्यात कमी आहे ती साईज असते 0.3 मायक्रोन. थोडक्यात काय तर 0.3 मायक्रोन साईजचे पार्टीकल इतकेही छोटे नसतात की डिफ्युजनमुळे पूर्णपणे ट्रॅप होतील, आणि ते इतकेही मोठे नसतात की इम्पॅक्शन वा इंटरसेप्शनमुळे पूर्णपणे ट्रॅप होतील. म्हणून कोणताही फिल्टर हा 0.3 मायक्रोनसाठीच सगळ्यात कमी इफिशियंसी देतो. आणि म्हणूनच कोणत्याही फिल्टरची इफिशियंसी सांगताना ती 0.3 मायक्रोन याच साईजसाठी सांगितली जाते. म्हणजेच 0.3 मायक्रोन इतक्या साईजचे पार्टीकल जर 95% ट्रॅप होत असतील तर त्याचा अर्थ हा की त्याहून कमी साईजच्या आणि त्याहून मोठ्या साईजच्या पार्टीकल्ससाठी ही ट्रॅप करण्याची इफिशियंसी अर्थातच 95% पेक्षा जास्त असते. हेपा फिल्टर जे सर्वोत्तम फिल्टर्स समजले जातात त्यांच्यामध्ये 0.3 मायक्रोन साठीची इफिशियंसी ही 99.97% असते, म्हणजेच 0.3 मायक्रोनहून छोट्या वा मोठ्या पार्टीकलसाठी हेपाची फिल्टरेशन इफिशियंसी ही 100 टक्के असते. वर उदाहरणात सांगितलेले कुठेही खरेदी न करणारे "कजाग" ग्राहक म्हणजे हेच 0.3 मायक्रोनचे पार्टिकल्स होत. किंबहुना 'तीन तिघाडा काम बिघाडा' ही म्हण 0.3 मायक्रोनसाठीच बनली असावी असे वाटते. 
 
थोडक्यात काय तर वेगवेगळ्या साईजचे किती पार्टीकल ट्रॅप किंवा फिल्टर होतील याचे साईजनुसार असणारे प्रमाण हे मुख्यत्वे त्या फिल्टर मटेरियलवर नाही तर पार्टीकलच्याच साईजवर अवलंबून असते. फिल्टर किंवा मास्क चांगला असो की खराब, तो नेहमी 0.3 मायक्रोनसाठीच सर्वात कमी इफिशियंसी देतो आणि त्याहून छोट्या व मोठ्या साईजच्या पार्टिकल्ससाठी जास्त इफिशियंसी देतो. म्हणजे जर मास्क किंवा फिल्टर खराब असेल तर तो 0.3 मायक्रोन पार्टिकल्स साठी समजा 10 टक्के इफिशियंसी देईल आणि त्याहून छोट्या वा मोठ्या पार्टिकल्स साठी 10 टक्के पेक्षा जास्त इफिशियंसी देईल. तसेच मास्क जर N95 सारखा चांगला असेल तर तो 0.3 मायक्रोनसाठी 95% इफिशियंसी देतो आणि त्याहून छोट्या वा मोठ्या पार्टिकल्ससाठी 95% पेक्षाही जास्त इफिशियंसी देतो. म्हणजेच 0.3 मायक्रोनसाठी ज्या मास्कची इफिशियंसी जास्त असेल तो मास्क चांगला आणि ज्या मास्कची इफिशियंसी 0.3 मायक्रोनसाठी कमी असेल तो मास्क खराब. कोणताही फायबरने बनलेला असलेल्या मटेरियलचा मास्क हा 0.3 मायक्रोनसाठीच सगळ्यात कमी इफिशियंसी देतो.  N95 देखील पॉलीप्रोपिलीन फायबर्सचा बनलेला असतो त्यामुळे त्यालाही हे लागू होते. सर्जिकल मास्क सुद्धा असाच असतो मात्र तो खूप पातळ असल्याने त्याची डिफ्युजनने ट्रॅप करण्याची आणि म्हणूनच 0.3 मायक्रोन पार्टिकल्ससाठीची इफिशियंसी कमी असते. त्यामुळे तो N95 इतका प्रभावी नसतो.
थोडक्यात काय तर N95 मास्क हा 0.3 मायक्रोनपेक्षा फक्त मोठ्याच नव्हे तर कमी साईजच्या पार्टीकल्ससाठीही खूप उपयोगाचा आहे हे कळले असेल अशी अपेक्षा करतो.

नोट: हे मेकॅनिजम फक्त फायबरने बनलेल्या फिल्टर्सला लागू होतात. फायबर्स नसलेल्या सेल्युलोज किंवा इतर मेटल वा प्लास्टीक फिल्टर्समध्ये मात्र मिनिमम पोअर साईजपेक्षा कमी साईजचे पार्टीकल ट्रॅप होत नाहीत. कारण तिथे हजारो फायबर्सचे जाळे नसल्याने डिफ्युजन काम करत नाही. 
तसेच कॉटन (सुती) किंवा रेशीम कापड जर ६०० TPI (threads per inch) चे असेल, म्हणजे एक स्क्वेअर इंच कापडात ३०० आडवे आणि ३०० उभे धागे असतील तर अशा प्युअर कॉटनच्या सुती कापडाचे किंवा रेशीम कापडाचे तीन लेयरचे मास्कसुद्धा चांगली इफिशियंसी देतात.

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

म्हणू का

डोळ्यांतून उल्का निसटली त्याला शकुन म्हणू का 
मनातल्या हळव्या उधाणाला तुझीच खुण म्हणू का

तुला वजा केल्यावरती उरते जे काही माझ्यात बाकी
अस्तित्वाच्या त्याच अवस्थेला मी न्यून म्हणू का

असे नाही की नैतिकतेचे पाश मी लावत नाही मनाला 
तुझ्यासाठीच्या अनावर ओढीला मी अवगुण म्हणू का

तू जाणूनबुजून संभ्रमाच्या ढगाआड दडवतेस सूर्य
तुझ्या नजरेच्या सूचक कटाक्षालाच मी ऊन म्हणू का

जन्मजन्मांतरीचे साकडे नाही घालणार मी तुला 
फक्त एकदा तुझ्याशी माझे नाव जोडून म्हणू का






..

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

खुदाई

पार्श्वभूमी 
आजची संस्कृती जगबुडीमुळे नष्ट झाली, आजचे बहुतांश लोक नष्ट झाले. जे थोडे वाचले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मुंबईतील उत्खननात फक्त शाहरुख खानचा बंगला जमिनीत बऱ्यापैकी अवस्थेत टिकून असलेला सापडतो आणि त्यात काही LED TV आणि शाहरुखच्या काही फिल्म्सच्या हार्ड डिस्क सुस्थितीत सापडतात. त्यांना इलेक्ट्रिसिटीचाही शोध लागलेला असल्याने ते लोक हे LED TV आणि हार्ड डिस्क वापरायला सहज शिकतात.
योगायोग म्हणजे शाहरुख खानच्या प्रसिद्ध फिल्म्सच्या कहाण्या जगबुडीतून वाचलेल्या लोकांद्वारे लोककथा म्हणून या नव्या सभ्यतेपर्यंत आधीच पोचल्या होत्या, ज्यात नंतर कुणी अधिक आदर्शवादी आणि दैवी भर टाकून या कथा लिखित रुपात आणल्याने त्यांना धर्मग्रंथांचा दर्जा मिळाला आणि त्यात आता त्याच फिल्म्सच्या LED वर बघता येतील अशा हार्ड डिस्क उत्खननात सापडण्याची भर पडली.

वर्ष 4040
उत्खननांत काही लांबच लांब पसरलेल्या लोखंडी समांतर पट्ट्या सापडल्या आहेत. अशाच पट्ट्या देशाच्या इतर विविध भागांत सापडल्या असून या पट्ट्या त्या काळात कोणत्यातरी धार्मिक परंपरेचा भाग असणार असा अंदाज आहे. बऱ्याच ठिकाणी या पट्ट्या खंडित झालेल्या आढळल्या असल्या तरी जुन्या संस्कृतीच्या उत्कर्ष काळात पूर्ण देशात आढळणाऱ्या या सर्व पट्ट्या एकमेकांशी जोडलेल्या असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
समुद्रात आणि किनाऱ्यावर काही खूप उंच आणि अनेकमजली इमारतींचे अवशेष सापडले असून, मुंबई नावाची नगरी एकेकाळी याठिकाणी अस्तित्वात होती या अनेक पुराणमतवादी लोकांच्या विश्वासाला यामुळे बळ मिळाले आहे.
मुंबई असल्याचा दावा केला जाणाऱ्या उत्खनन क्षेत्राच्या सेक्टर 23-S या उत्खनन साईटवर ज्या अनेक आयताकार चपट्या वस्तू मिळाल्या होत्या त्यांस एक विशिष्ट इलेक्ट्रिक व्होल्टेज दिले असता त्यातून हलती चित्रे दिसत असल्याचे आणि सोबतच काही आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सुरुवातीला एखाद्या लिपिसारखे दिसणारे पॅटर्न सुद्धा या चपट्या वस्तूंवर उमटत असल्याचे आढळून आले असून उत्तर भारतात सापडलेल्या मेमरी कॅप्सूल मधील लिपी आणि या हलत्या चित्रांतील लिपी व आवाज यांचा संबंध असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळेच मेमरी कॅप्सूलची लिपी डिकोड करणाऱ्या तज्ञास हे अभ्यासण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

वर्ष 4060
उत्तर भारतातील मेमरी कॅप्सूलची लिपी आणि सेक्टर 23-S मध्ये मिळालेल्या चलचित्रातील लिपी ही थोडी वेगळी भासत असली तरी दोन्ही एकच असल्याचे सिद्ध झाले असून या चलचित्रांच्या सुरुवातीला येणारी लिपी ही उत्तर भारतातील कॅप्सूलशी तंतोतंत जुळत असल्याचे आढळले आहे. ही लिपी पूर्वीच डिकोड झाली असल्याने आपल्याला लिखित शब्दांचे अर्थ कळत नसले तरी आता लिहिलेले सगळे उच्चाराप्रमाणे वाचता येऊ लागले आहे. पूर्वी मौखिक स्वरूपात असलेल्या मात्र 3300 साली लिखित स्वरूपात आणलेल्या बॉली धर्माच्या अनेक धर्मग्रंथांतील कहाण्यांचेच ही चलचित्रे हे पुरावे किंवा संदर्भ असू शकतात असे या हलत्या चित्रांच्या मालिकेवरून अंदाजे बोलले जात आहे. ही चलचित्रे म्हणजे या धर्मग्रंथांचेच एक प्रगत तंत्रातील मुद्रणीकरण असावे असे मानण्यात येते आहे. या चलचित्रांतील सुरुवातीला दिसणाऱ्या लिपीत लिहिलेल्या अक्षरांत 'शाहरुख खान' हे शब्द आणि अशा प्रत्येक चलचित्रात दिसणारा एक कॉमन चेहरा असणाऱ्या माणसाचा काहीतरी संबंध असेल असे वाटते. हे बहुतेक त्या व्यक्तीचे नाव असून प्रथमदर्शनी तरी हा 'शाहरुख खान' हाच बॉली धर्मातील प्रमुख देवता 'शारकान' असल्याचे मानले जात आहे. मात्र देव वगैरे विज्ञानाच्या कसोटीवर खोटे ठरत असल्याने हा केवळ नामसाधर्म्याचा योगायोग आहे असे अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे. त्या काळच्या लोकांकडे आपले धर्मग्रंथ असे उच्च तंत्रज्ञान वापरून चलचित्र स्वरूपात जतन करून ठेवण्याचे तंत्र असल्यामुळेच त्यांनी तुलनेने कनिष्ठ तंत्र असलेल्या लिखित स्वरूपात ते जतन केले नसावेत, आणि म्हणूनच आज त्याचे सन 3300 च्या आधीचे लिखित पुरावे सापडत नाहीत असे पुरातत्ववेत्यांचे म्हणणे आहे.

वर्ष 4080
सेक्टर 23-S मध्ये मिळालेल्या अनेक चपट्या इलेक्ट्रिक वस्तू या एक विशिष्ट व्होल्टेज देऊन अगदी इफिशियंटली चल स्वरूपात आणण्यात आता यश मिळाले आहे. पूर्वी यातील अस्पष्ट असणारा ऑडिओ आता स्पष्ट करून त्यातून मानवी आवाज आणि इन्स्ट्रुमेंटल आवाज सेपरेट करून ऐकण्यात यश मिळाले आहे. या ऑडीओ मधील जवळजवळ अर्धी भाषा आजच्या काही आदिवासी जमातींत प्रचलित असलेल्या 'हिंग्लिश' या भाषेशी मॅच होत असल्याचे आढळून आल्याने त्या काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
वर्ष 4100
शाहरुख खान असलेली आजपर्यंत 12 चलचित्र उपकरणे त्यातल्या त्यात बऱ्या स्थितीत सापडली असून यातील 4 ही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेची तर दोन दोन ही प्रत्येकी दिल तो पागल है आणि चक दे इंडिया या नावाची आहेत. बाकी चलचित्रांपैकी फक्त एकच थोडेफार चालत असून ते चलचित्र कुछ कुछ होता है या प्रसिद्ध धर्मग्रंथाचे असावे असा अंदाज आहे. बॉली धर्मातील याच नावांच्या चार ग्रंथांत शारकान देवतेचे जे राज, राहुल आणि कबीर नावाचे पुत्रअवतार सांगण्यात आले आहेत तेच पुत्रअवतार या चलचित्रांत प्रत्यक्ष दिसत असल्याचा दावा कट्टर बॉली उत्थान(KBU) संघटनेतर्फे करण्यात आला आहे.
दुसरे म्हणजे दिलवाले दुल्हनिया मधे सांगितलेली ज़्यूरीच, लंडन ही शहरे खरेचच तिकडे युरोपात झालेल्या उत्खननात सापडली असून यामुळे शारकान देवतेचा पुत्रअवतार असलेला 'राज' ही फक्त एक कविकल्पना आहे असे म्हणनारांना ही मोठी चपराक आहे असे KBU तर्फे बोलले जात आहे. KBU नुसार दूर युरोपात सापडलेली ही शहरे हा 'राज' आणि 'दिलवाले दुल्हनिया' या धर्मग्रंथांच्या सत्यतेचा पुरावा नाही तर अन्य काय असू शकेल? 'राज' आणि 'दिलवाले दुल्हनिया' हे सत्य नसते तर आदिग्रंथप्रेषित आदरणीय 'आदित्य चोप्रा' हे भारतात राहून त्या पुरातन काळात इतक्या दूर असलेल्या लंडन आणि ज्यूरिक बद्दल इतके तंतोतंत कसे काय सांगू शकले असते? दुसरे म्हणजे 'चक दे इंडिया' या धर्मग्रंथांत लिहिलेल्या आणि त्या चलचित्रातही दिसणाऱ्या हॉकी खेळाच्या खेळण्याची जी एक वैशिष्ट्यपूर्ण काठी आहे तशा अनेक काठ्या पंजाबातील एका उत्खननात आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा देखील शारकान देवतेचा 'कबीर' नावाचा पुत्रअवतार खरेच होऊन गेल्याचा पुरावा आहे असा KBU चा दावा आहे.

वर्ष 4120
कट्टर बॉली उत्थान संघटनेच्या दबावाखाली सेक्टर 23-S चे अधिकृत नाव आता 'मुंबई' करण्यात आले असून मुंबईत जिथे शारकान देवतेची चलचित्रे सापडली होती ते स्थान पुरातत्व संग्रहालय म्हणून न राखता त्याचा "पवित्र शारकान पुजास्थल" म्हणून विकास होईल असे जाहीर करण्यात आले आहे. दहाच वर्षांपूर्वी चक दे इंडिया मध्ये असलेल्या खेळ मैदानासारखे एक चहुबाजूंनी पायऱ्या असलेले गोलाकार खेळ मैदान पंजाब येथे उत्खननात सापडले असून याने कबीर या पुत्रअवताराच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे असे KBU तर्फे सांगण्यात येत आहे. KBU संघटनेने इतके ऐतिहासिक पुरावे मिळाले असूनही राज, राहुल आणि कबीर हे या पृथ्वीतलावर होऊन गेलेले खरेखुरे पुत्रअवतार नसून मनोरंजनासाठी बनविलेल्या कथांची काल्पनिक पात्रे आहेत असे म्हणणाऱ्या, आणि त्यांच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक पुरावे मागणाऱ्या लिबटार्ड फुर्रोघामी लोकांवर कायदा बनवून बॉलीद्रोहाच्या गुन्ह्याखाली कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वर्ष 4150
राज अवतारातील लंडन आणि ज्यूरिच अशी शहरे सापडणे, हॉकी खेळाच्या कित्येक काठ्या आणि मैदान सापडणे, DTPH च्या राहुल अवतारातील छोटी चांदीची मूर्ती सापडणे हे सगळे याच गोष्टीचे पुरावे आहेत की राज, राहुल आणि कबीर हे केवळ मनोरंजक कथांची काल्पनिक पात्रे नसून, ते या पृथ्वीतलावर एकेकाळी अस्तित्वात असलेले ते दैवी पुत्रअवतार होते ज्यांनी जगाला DDLJ मधून दोन पुरुष एक स्त्री, तर DTPH व KKHH मधून एक पुरुष दोन स्त्रिया यांच्यामध्ये कशाप्रकारे पवित्र प्रेम झाले पाहीजे आणि चक दे मधून स्त्रियांना लढायला लावून कशी विजयश्री मिळवली पाहीजे हा दिव्य संदेश जगाला दिला. DDLJ, DTPH, चक दे हे केवळ कथाग्रंथ नसून ते आमच्या उज्ज्वल इतिहासाचे खरेखुरे दस्तावेज आहेत. ते आमचा देव शारकान आणि त्याचे दैवी पुत्रअवतार खरे असल्याचे भक्कम पुरावे आहेत.
जे आजच्या विज्ञानालाही अजूनही बनवायला जमले नाही ती चलचित्रे त्या काळी कुठलेही तंत्रज्ञान नसताना बनविणाऱ्या आमच्या जुन्या प्रगतिशील संस्कृतीची थोडीही बरोबरी आजचा कोणताही प्रगत म्हंटला जाणारा समाज करू शकत नाही. स्वतः शारकान देवाची चलचित्र स्वरूपातील प्रतिमा आजच्या लोकांना स्वतःच्या डोळ्याने पाहता येणे याहून देवाची कोणती मोठी थोरवी असू शकते? जरी अनेक वैज्ञानिक लोक हे उत्खननात सापडलेले सामान फक्त तीन ते चार हजार वर्षे जुने आहे असे म्हणत असले तरी त्यावर आमचा विश्वास नाही. आमची ही संस्कृती निश्चितच २० हजार वर्षांहून अधिक जुनी आहे हेच खरे आहे. मौखिक लोककथांमधून लिखित स्वरूपात आलेले आमचे धर्मग्रंथ, त्यांचे मुंबईत सापडलेल्या चलचित्रांशी होणारे तंतोतंत मॅचिंग हा दैवी चमत्कार नाही तर अन्य काय आहे? शारकानचे अस्तित्व सत्य असण्याचा अजून काय पुरावा पाहीजे? आमची श्रद्धा अशाप्रकारे आजच्या तकलादू वैज्ञानिक तर्कांना पुरून उरली असून आमची संस्कृती ही कित्येक वर्षांपासून चालत आलेली जगातील सर्वात जुनी आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे हेच सिद्ध झाले आहे. सर्वशक्तिमान शारकान देव आणि त्याच्या पुत्रअवतारांचे सत्य अस्तित्व आज शतप्रतिशत सिद्ध झालेले आहे.
विश्वनिर्मात्या शारकान देवतेचा विजय असो, राज, राहुल, कबीर या अवतारी देवांचा विजय असो, त्यांस काल्पनिक कथांची पात्रे म्हणणाऱ्या लिबरांडू बुध्दीवाद्यांचा धिक्कार असो. जगातील सर्वश्रेष्ठ बॉली धर्माचा विजय असो. करोडो लोकांच्या श्रद्धेने विज्ञान नावाच्या थोतांडावर मिळविलेल्या विजयाचा विजय असो.



..

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

नाचरा मोर

रिक्त रिक्त वाटलं की अगदी काठोकाठ भरून यावं
आठवणींच्या गावातून जरा, अनवाणी फिरून घ्यावं

हवी तशी गुणगुणावी खुशाल, आपली आवडती धून
शब्दांमध्येच उगा शोधत बसू नये, आपुलकीची खूण

नुसतीच घालावी साद मोठ्याने, नाव कुणाचे घेऊ नये
हरवून जावे स्वतःतच इतके की भानावरतीच येऊ नये

नसावेत कोणते सोपस्कार नि नकोच कोणते रिवाज
धावून जावे सोबतीसाठी, जरी नसेल दिला आवाज

चेहऱ्यावरती नेहमी ल्यावी, एक मंद हसरी चंद्रकोर
अंतर पडले तरी नाचू द्यावा, अंतरातला नाचरा मोर

कितीही पळाले तरी सुखाचा कदापि सोडू नये पिच्छा
(ही ओळ पर्सनल आहे, बाकी तुमची इच्छा)






..

शनिवार, १८ जुलै, २०२०

कोई रिश्ता

कभी तू कोई मुरत कभी साया सा लगे
कभी बहुत अपना कभी पराया सा लगे

मैने कई लम्हों के अलाव जला के देखें हैं
तेरे बगैर गुजरा हर इक पल ज़ाया सा लगे

जब से तुम गये हो मेरी नजरोंसे बुझकर
हर इक अक्स आँखों में जलाया सा लगे

तेरे नजदीकी की महक जो खो गयी तो
मेरी सांसों का चमन मुरझाया सा लगे 

तेरे कंधे पे पीली धूप कैसी फुरसत से उतरी
जुल्फोंमें इक झोंका युँही बौखलाया सा लगे

जब जब उम्मीदों के चराग बुझने लगते हैं
तेरा एहसास फानुस बन के आया सा लगे

इक अरसा हो गया कोई जलसा किये हुए
अब बस तेरा रुठनाही कुछ मनाया सा लगे

जब भी चौथ का चांद देखता हूँ तो मुझे
तेरीही आँखोकी झील में नहाया सा लगे

नाम नही इसका कोई मगर कई जन्मों से
कोई गहरा रिश्ता तुझसे निभाया सा लगे



अलाव- मशाल/शेकोटी
ज़ाया- वाया जाणे
अक्स - प्रतिमा
फानुस- दिव्याला हवेपासून वाचविणारी काच



.

मंगळवार, ७ जुलै, २०२०

लिहिणार फक्त आनंदगाणी

पहिली ओळ ही दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा दोन्ही सानींची उला म्हणून वापरण्याचा प्रयोग केला आहे. अशा फक्त सहा ओळी (सानी) समाविष्ट केल्याने गजलेत थेट सहा शेर वाढले. म्हणून 18 ओळींत आता 12 शेर बनले आहेत. एरवी12 शेरांसाठी 24 ओळी लागतात.
वाचताना पहील्या दोन ओळी वाचल्यावर तिसऱ्या ओळीच्या आधी पुन्हा पहीली ओळ वाचावी, म्हणजे शेर पूर्ण होतो.
😊😊

लिहिणार फक्त आनंदगाणी, सल मनीचा कधी सांगणार नाही
आता पुन्हा तुझ्या सुरांकडे मी, माझे शब्द सजवून मागणार नाही
पुन्हा काळजाच्या ठोक्यातून मी, सलगीचा जोगवा मागणार नाही

पुढेही पडत राहील चंद्रास साकडे, माझ्या चांद्रमौळी डोळ्यांचे
पण तुझ्या ओवळणीच्या ताटाबाहेर, चांदणे त्याचे पांगणार नाही
पण तुझ्या उपासनेच्या रात्रीस मी, याचक होऊन जागणार नाही

जेवढा उजेड वाहीला पुढ्यात तुझ्या, तेवढाच तू क्षितिजी माखून घे
तुझ्या आकाशी माझ्या ओल्या उन्हाचे, इंद्रधनु पुन्हा रंगणार नाही
पुन्हा मनाच्या कवडशांची तोरणे मी, तुझ्या नभास टांगणार नाही

कधी आवेगाने फुटतीलही आपसूक, उरी साठलेल्या उमाळ्यांस पान्हे 
पण तू रुजविलेल्या ओलाव्यातुन पुन्हा, स्वप्नांचा कोंब उगणार नाही
मात्र उपेक्षेच्या अभिशापांची वेदना, मी पुन्हा कदापि भोगणार नाही

माझ्या चिरंजीव व्यथेचा जन्मजात मणी, मी दक्षीणेत देईन मात्र
उत्तरेच्या गर्भावर माझ्या वाहत्या जखमेचे, ब्रम्हास्त्र डागणार नाही
पश्चातापाच्या आवाहनाने भिक्षेत दुःखाचा, उ:शाप मागणार नाही

मी व्रतस्थ केवळ तुझ्या सुखाचा, त्यास मी याचनेने भागणार नाही
माझ्या स्वप्नातील भविष्याचा दाह, तुझ्या वर्तमानास लागणार नाही
जे सौख्य मागितले ती चूक होती, मी पुन्हा असे स्वार्थी वागणार नाही




..

गुरुवार, २ जुलै, २०२०

जो हमारे दिल में था


हम उसे सारे जमाने से मांगते रहे, वो जो हमारे दिल में था
अकेले था तो साथ था मेरे, और तनहा भरी महफील में था

मुझे इक सफर चाहिए जिसमे हर कदम वो हमकदम चाहिए
मेरी खामोश सी चाहत का हासिल कब किसी मंजिल में था

लोग कहते होंगे दिल की बात, चांद सितारों की चमक के साथ
हमारे इजहार का दायरा तो बस आँखों की झिलमील में था

कितनी आसानी ने कर दिया उसने हमे खुद से यूँ दरकिनार
पर मेरी दिवानगी को मिटाने का हुनर कहाँ उस कातिल मे था

अब सीखना है सलीका मुझे भी जरा उसकी तरह बेरूखी का
दिल ने कोई अंजाम सोचा न था इसलिये बडी मुश्किल में था

तमाम हसरतें अपनी तो समंदर की गहराईयोंमे डूबने की हैं
हमारे दिल की चाहतों का बसर कब उथले साहील में था

उसने आँखो से जाने कितने रंग उतार दिये मुझे देखने के बाद
युं उजड जाने का सिला बदकिस्मती से मेरी ही हासिल मे था



..

गुरुवार, ११ जून, २०२०

अर्धी मुर्धी

मनात उगवणारी फुले एकदा ओठांवरही फुलू दे ना
डोळ्यांच्या झोपाळ्यावर थोडे स्वप्नांनाही झुलू दे ना

मौनालाही असतात हळवे अर्थ माहीत आहे मला, पण
कधी भावनांच्या अबोलीलाही गुलाब होऊन बोलू दे ना 

आकांक्षांची किती विविधरंगी फुलपाखरे वेचलीत मी मनात
थोडी हास फक्त, त्यांच्यासाठी फुलांचे ताटवे उमलू दे ना

अष्टौप्रहर सोबतीचे सोहळे तुज कुठे मागितले मी, मात्र
सांज ढळताना तुझ्या खांद्यावर एकदा जरासे कलू दे ना

मी केसांत तुझ्या एक गजरा मोगऱ्याचा खोवून देतो, तू
माझ्या काळजात तुझ्या वेदनेचा एक काटा तरी सलू दे ना

प्रेमासारखी कविताही कधी कधी राहू द्यावी अर्धी मुर्धी
न लिहिलेल्या ओळींना जरा अव्यक्ताचे भार पेलू दे ना




.

मंगळवार, १२ मे, २०२०

कुठवर

कुठवर जगत बसायचे हे असे बंदीवासातले अनिवार्य जीणे
कुठवर लादून घ्यायची श्वासांवर ही मुखवट्यांची बंधने

कुठवर हे हाडामांसाचे जत्थे रस्त्यांवरून वाहत राहतील भीतीने
कुठवर निर्दोष असण्याची क्रूर शिक्षा त्यांनी भोगावी अशा रीतीने

हे कसे मोडले नाहीत अजून देहाचे ओझे वाहणारे कोवळे कणे
त्या निष्पाप लेकरांचे दोष कोणते, सांगा तयांचे नेमके काय गुन्हे

घरांत उपासमारीचे फास आणि रस्त्या रुळांवर पेटलेली सरणे
श्वास श्वास महागलेला आणि अगदी स्वस्त झालेली मरणे

लाखो आक्रोश चालत आहेत रस्त्यांवरून निमूटपणे
गुन्हा केवळ एकच त्या सर्वांचा - पोटाला भूक लागणे

कुठवर ल्यावेत इवल्या लेकरांनी अंगावर जखमांचे दागिने
कुठवर स्वतःस जाळून घ्यावे या असहाय्यतेच्या आगीने

कुठवर पुरेल या अनिश्चिततेकडून असे आयुष्य उधार घेणे
केवळ निष्पाप दारिद्र्यानेच का नेहमी ल्यावे दुर्भाग्याचे लेणे

कुठवर आपण आठवणींतुनच तुडवायची ती ओली हिरवी राने
कुठवर खिडकीच्या तुरुंगातूनच ऐकावे वाऱ्याचे अवखळ गाणे

कधी लपेटतील पुन्हा अंगास उगवती मावळतीची केशरी उन्हे
हा पिंजरा तोडून कधी घ्यायची पुन्हा मोकळ्या आसमंती उड्डाणे







.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

कल्पवृक्ष


कधी झुळझुळणारा झरा कधी दृढ उभा पहाड असतो
बाप म्हणजे सारं काही देणारं कल्पवृक्षाचं झाड असतो

किती गर्दी आहे इथे मुखवट्याआड दडल्या चेहऱ्यांची
एक त्याच्या मनाचा दरवाजा मात्र उघडा सताड असतो

मनावरच्या जखमा आणि अंगावरच्या व्रणांचा कधीही
लेकरांस थांग लागू देत नाही, बाप मोठा लबाड असतो

झिजण्याला त्याच्या अंत नाही, त्याला त्याची खंत नाही
आपल्याला वसंत देताना तो स्वतः मात्र उजाड असतो

कसे पेलतो माहीत नाही सर्वांच्या अपेक्षांचे जड ओझे
त्याच्या कष्टांचा आवाका कल्पनेच्याही पल्याड असतो

निरपेक्ष मायेचं अन निस्सीम प्रेमाचं अक्षय दान देत राहतो
या कडवट दुनियेच्या रानातला तो रसाळ गोड पाड असतो

तो उन्हामधली सावली आणि गारव्यातली ऊब असतो 
त्याचे सुख दिसते पुढ्यात अन हुंदका नजरेआड असतो

तोच चेतनेतला स्वर, अन तोच जाणिवेतला निर्धार होतो
त्याच्याविना आयुष्याचा पट अगदी उदास, ओसाड असतो

आपल्या हरेक तहानेसाठी कधी न आटणारा आड असतो
बाप म्हणजे फक्त देतच राहणारं कल्पवृक्षाचं झाड असतो





.

मंगळवार, १७ मार्च, २०२०

मोरपिसारे काही

अजून ओलावतात तुझ्या आठवांनी किनारे काही
पेटतात अद्याप त्या विझल्या भेटीतले धुमारे काही 

तुला पाहून डोळ्यांत उमटलेले ते फुलपाखरांचे रंग 
आणि मनावरती हळुवार फिरलेले मोरपिसारे काही 

तुझ्या चेहऱ्यावरच्या बटांत होता गंधाळला जो वारा 
अजून उरातुन ऐकू येतात मला त्याचे सुस्कारे काही

मी थरथरत्या हातांत झेलले होते एकच दान तुझे 
लाजत बोलणाऱ्या नजरा अन अबोल इशारे काही

नव्याने ओळख दाखविणाऱ्या जुन्याच पाऊलवाटा
ओळखीचे तरीही अनोळखी भासणारे नजारे काही

तू एका फुलास हातांनी गोंजारून कर माझ्या हवाली
तुझ्या स्पर्शांचे वेचून घेईल मी त्यातूनच शहारे काही 




..